सुंदर पिचई आणि ऐंशीच्या दशकातली गरीबी...
सुंदर पिचईबद्दल लेख वाचला लोकमतमधे...
आजकाल कुणीही यशस्वी झाला की तो कसा गरिबीत जगला याचं फारच चर्वितचर्वण करतात बॉ पत्तर्कार लोक. काय तर म्हणे "तीनच" खोल्यांचं घर होतं, 'स्कूटर'वरून चौघे फिरायचे, 'साधा' टेलिफोनही नव्हता (१९८५), तो आणि त्याच्या भावाला बाहेरच्या खोलीत झोपायला लागायचं.. अरे काय राव गरिबाची चेष्टा करताय. हे ऐंशीच्या दशकातल्या एका साध्या गरिब मध्यमवर्गीय कुटूंबाचं वर्णन आहे का? आयआयटीत पदवी आणि स्टॅनफर्डमधे पदव्युत्तर शिक्षण घेणारा गरिब मध्यमवर्गीय? जनरल इलेक्ट्रीक मध्ये वरिष्ठ अभियंता पदावर असणारे वडील गरिब मध्यमवर्गीय?
ऐंशीच्या दशकात टीवी, कार्स, फोन्स, बंगलोज हे फक्त अतिश्रीमंत, धनाढ्य व गर्भश्रीमंत लोकांकडेच होते. त्यांच्याशिवाय जे ही भारतीय होते ते सर्व गरीब? माझ्यामते तर अभियंता, डॉक्टर असणारे, मोठ्या कंपनीत, बँकेत नोकरी असणारे, स्कूटर, घर वैगेरे असणारे सुखवस्तू, सेटल्ड समजले जात होते. गरीब नाही. सुशिक्षित व सुखवस्तू घरांमधे या मुलांना योग्य त्या संधी मिळणे यात काय मोठं आहे? की उगाच कि...त्त्ती गरीब होते म्हणून त्यांचे फुकाचे कौतुक.
अशी वर्णने वाचली की आम्ही जी गरीबी बघितली 'त्ये काय व्हतं मग?' असं विचारायला होतं बुवा.
माध्यमांमधून खर्या गरिबीची अवहेलनाच होत नाहीये का?
की कुणीही यशस्वी झाला की तो गरिबच होता हे अट्टाहासाने सांगितलं तरच त्याच्या यशाला उजळपणा येतो?
कि लोकांना असलंच काही (रॅग्स टू रिचेस) वाचावंसं वाटतं म्हणून पत्रकार रंगवतात कहान्या?
मुन्शीपाल्टीच्या दिव्याखाली अभ्यास केला वैगेरे सांगितले की फार रोम्यांटीक वाटतं.. नाही का?
तुम्हाला काय वाटतं मंडळी...? ऐंशीच्या दशकात जे विशीत होते त्यांच्याकडून ऐकायला आवडेल.
त्यामुळे, अश्या गोष्टी जोपर्यंत अंध व्यक्तीपूजेसाठी अथवा इतर काही गैरफायदा घेण्यासाठी वापरल्या जात नाहीत तोपर्यंत फायदेशीरच ठरतात.असे लिहिले आहे ! :)