"कर" आहे त्यालाच "डर" आहे…
एक सतत छळणारा प्रश्न आज तुम्हाला विचारू इच्छितो…. आपल्या ह्या देशात सगळ्या प्रकारचे कर भरून माणूस श्रीमंत होणं राहिलाच पण सुखी तरी राहू शकतो का?
उत्पन्नाचा कर ,विक्रीकर,सेवाकर,मूल्यवर्धित कर आणखी इतर हजारो प्रकारचे कर भरून भारतीय माणसाच्या खिशात उरतं तरी काय ? बरं, इतकं करून, कर भरून आणि त्याच्या ओझ्याखाली मरून त्याचे सरकारकडून काही लाभ मिळावेत असं म्हणावं तर तेही नाही….
निकृष्ट आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थ… रस्त्यावरचे हजारो खड्डे , लोकलची गर्दी , एक न दोन हजार कारणं !! ह्यातच पुढची पिढी आपला एक नवीन अडथळ्यांचा प्रवास सुरु करते आहे …. सशक्त आणि सुजाण नागरिक घडणार कसे आणि कुठून ?
ज्यांना शक्य आहे ते सरळ परदेशाचा रस्ता धरतात …. भले त्यांच्या नावाने आणि ब्रेन ड्रेन म्हणून कोणी कितीही कोकलो पण ते एका अर्थाने शहाणेच म्हणायचे !! ज्यांना काहीच जमत नाही ते राहतात असेच कुढत वर्षानुवर्षे…आयुष्यभर नोकरी करून त्या पैशात मुंबई पुण्यात जर एक साधे घर येत नसेल तर माणसाने करायचे तरी काय …. आणि कसली अपेक्षा मनात धरून उमेदीने काम करत राहायचे?
ह्या सगळ्याचा सर्वोच्च त्रास मध्यमवर्गीय पांढरपेशांना जे सहज पकडले जाऊ शकतात …. गुंड, लुटारू, राजकारणी, बुवा-बाबा आणि त्या कात्रीत न सापडणारे व्यापारी आणि इतर लोक अलाहिदाच राहणार नेहमीच ….
जगावं तरी कोणत्या उत्साहाने ह्या ठिकाणी माणसाने ? की मेंढरांच्या कळपासारखं नाशिबात असेपर्यंत जगात राहावं आपल्याच नशिबाला दोष देत ? मानवी आयुष्याला काहीच किंमत नाही का ह्या देशात?
पुनर्जन्माचे माहित नाही पण तो असलाच तर पुन्हा हेच रहाट गाडगं नको रे देवा !!
मदनबाण.....