Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ज्ञानेश्वरी- भाग-१ - प्राणेश्वरासाठी

म
मारवा
Sun, 09/27/2015 - 12:29
🗣 73 प्रतिसाद
भुमिका ज्ञानेश्वरी तील स्त्री संदर्भातील या ओव्यांवीषयी वाचकांचे मत काय आहे हे जाणुन घ्यायला आवडेल.आणि ज्ञानेश्वरीतील आणि एकुणच धर्मग्रंथांतुन व्यक्त/ ध्वनित (प्रतिके आदिंतुन ) होणारया मानवी मुल्यां चे समकालीन स्थान, धर्मग्रथांची कालबाह्यता वा कालातीतता, चिकीत्सेतुन निवड करण्याची निकड, या मुल्यांचा आजच्या जगण्याशी संबंध आदि. संदर्भातील मांडणी या अंगाने चिकीत्सा विचारमंथन व्हावे अशी इच्छा. यासाठी माझी निवड ज्ञानेश्वरी हा ग्रंथ. तर स्त्री संदर्भातील या निवडक प्रातिनीधीक अशा ओव्या एकत्र करण्याचा मी एक छोटा प्रयत्न केलेला आहे. या शिवाय अजुन ही आहेत ती त्रुटी एकंदर चर्चेतुन मंथनातुन पुर्ण व्हावी अशी अपेक्षा. जाणकारांनी चुका दाखवल्यास स्वागत आहे. खालील प्रातिनीधीक ओवीत न आलेला स्त्री संदर्भातील एखादा वेगळा विचार असलेली ओवी आल्यास त्याचेही अर्थातच स्वागत त्याने चर्चा व्यापक व अर्थपुर्ण होईल. ओवी चा संदर्भ लवकर लागावा म्हणुन काहि ठीकाणी पुढची मागची ओवी जोडुन घेतलेली आहे व काही ठीकाणी पुनुरुक्ती टाळण्यासाठी निवडक ओव्या घेतल्या आहेत. शक्यतो संदर्भ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चुकला असल्यास जाणकारांनी दाखवुन द्यावा. १- दुर्योधना च्या तोंडी आपल्या बाजुच्या वीरांची स्तुती करतांना आलेले खालील उद्बार संदर्भातील ओवी हे अप्रतिमल्ल जगीं , पुरता प्रतापु अंगीं परी सर्व प्राणे मजचिलागीं, आराइले असती. पतिव्रतेचे ह्र्दय जैसे, पतीवांचुनी न स्पर्शे, मी सर्वस्व या तैसे, सुभटांसी अर्थ- अंगी पुर्ण प्रतापी असलेले, जगात अजिंक्य वीर म्हणुन प्रसिद्ध असलेले, प्राणपणाने लढण्यासाठी माझ्या बाजुला आलेले आहेत. पतिव्रतेचे चित्त पतीशिवाय इतरांना स्पर्श सुद्धा करीत नाही. त्याचप्रमाणे या सर्व योद्ध्यांचे मीच श्रद्धासर्वस्व झालो आहे. (अ-१ ओ-११०-१११) २- अर्जुन मोहित झाल्या संदर्भातील त्याच्या अवस्थेचे वर्णन करणारी ओवी नविये आवडीचेनि भरें, कामुक निज वनिता विसरे, मग पाडेवीण अनुसरे, भ्रमला जैसा. अर्थ- नवयौवनाचा बहर असलेल्या नव्या स्त्रीच्या प्रेमभरात लंपट पुरुष स्वत:च्या पत्नीला विसरतो. आणि त्यास्त्रीची योग्यता न पाहता वेडा होऊन बेतालपणे तिच्या म्हणण्या प्रमाणे वागतो. पाडेवीण- योग्यतेविना, निज वनिता- स्वत:ची पत्नी ( अ-१ ओ-१८७) ३- अर्जुनाने क्षत्रियाचा स्वधर्म आचरला नाही तर त्याची स्थिती कशी होइल या संदर्भातील ओवी. जैसी भ्रतारेहीन वनिता, उपहति पावे सर्वथा, तैसी दशा जीवीता, स्वधर्मेवीण. अर्थ- ज्याप्रमाणे पतिविरहीत स्त्री सर्वांकडुन अपमानित होते, त्याप्रमाणे ( हे अर्जुना ) स्वधर्माचा त्याग केल्यावर त्या जीवाची ( अशी ) दशा होते.(अ-२ ओ-१९९) ४- अविवेकी लोक धर्म कसा घालवितात त्या संदर्भातील उदाहरण देणारी ओवी. जैसी रांधवणी रससोय निकी, करुनियां मोलें विकी, तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्मु. अर्थ- ज्या प्रमाणे गृहीणी स्वयंपाकीणीने ( रांधणारीने ) उत्तम रसपुर्ण स्वयंपाक करावा आणि तो द्र्व्याच्या लालसेने विकुन टाकावा ( कुटुंबीयांना वाढण्याचा धर्म न पाळता ) त्या प्रमाणेच हे अविवेकी लोक सुखोपभोगाच्या लालसेने हाती आलेला धर्म व्यर्थ घालवितात.(अ-२ ओ-२५४) ५- स्वधर्माचे पालन नाना देवदेवतांच्या पुजनापेक्षाही कसे अधिक महत्वाचे आहे या संदर्भातील ओव्या. देवतांतरा न भजावे, हे सर्वथा कांही न करावे, तुम्ही स्वधर्मयज्ञी यजावे, अनायासे. अहेतुके चित्तें, अनुष्ठा पां ययाते, पतिव्रता पतीतें, जियापरी तैसा स्वधर्मरुप मखु, हाचि सेव्यु तुम्हां एकु, एसे सत्यलोकनायकु, म्हणता जहाला. अर्थ- नाना प्रकारच्या देवतांचे पुजन करु नका , विनासायास ( सहज ) घडणारा स्वधर्माचरणाचा यज्ञ करीत जा. पतिव्रता स्त्री ज्याप्रमाणे पतीची एकनिष्ठपणे सेवा करते (स्वधर्म आचरते) त्याप्रमाणे निष्काम बुध्द्नीने स्वधर्माचे आचरण करा. कारण तुम्हाला हाच एकमेव स्वधर्मरुपी यज्ञ अनुष्ठान करण्यास उचित आहे. असे सत्यलोकांचा स्वामी ब्रह्मदेव म्हणाला. (अ-३ ओ-९१-९२-९३) ६- स्वधर्म आचरण्यास कीतीही कठीण वाटला तरी परधर्मापेक्षा तो आचरणेच कसे योग्य श्रेयस्कर आहे ( परधर्मो भयावह:) चे उदाहरण पटवुन देतांना दिलेल्या ओव्या. सांगे शुद्रघरीं आघवीं, पक्वान्ने आहाती बरवीं, तीं द्विजें केंवी सेवावीं, दुर्बळु जरी जाहला. हे अनुचित कैसेनी कीजे, अप्राप्य केवीं, इच्छिजे, अथवा इच्छिलेंही पाविजे, विचारीं पां हें असो वनिता आपुली, कुरुप जरी जाहली, तरी भोगितां तेचि भली, जियापरी. अर्थ- मला असे सांग, शुद्राच्या घरी मधुर चवीची पक्वान्ने आहेत, आणि एखादा दरिद्री ब्राह्मण आहे म्हणुन त्याने ती सेवन करावी का ? असे अनुचित कृत्य दरिद्री ब्राह्मणाने कसे बरे करावे? जे घेण्यास योग्य नाही अशा गोष्टीची का इच्छा करावी ? इच्छा करुन अशा पक्वान्नांची प्राप्ती जरी झाली तरी त्याचे सेवन करावे का ? हे असु दे आपली धर्मपत्नी कुरुप असली तरी तिलाच भोगणे हेच योग्य असते याप्रमाणे.(अ-३-ओ-२२१-२२२-२२४) ७- स्वत:च्या साहित्याची बोलण्या ची गुणवैशिष्ट्ये सांगतांना माझे बोलणे कसे आहे ? तर ते जेथ साहित्य आणि शांति, हे रेखा दिसे बोलती, जैसी लावण्यगुणकुळवती आणि पतिव्रता आधींच साखर आवडे, तेचि जरी ओखदीं जोडे, तरी सेवावी ना का कोडे नावानावा. अर्थ- ज्याप्रमाणे एखादि स्त्री लावण्य रुप , गुणसंपन्न आणि कुळ (उच्चकुलीन आहे ) इतकच नव्हे तर शिवाय पतिव्रता देखील आहे ( दुग्ध शर्करा योग जणु ) त्याप्रमाणे माझ्या बोलण्यात साहित्य आणि शांती यांच्यातील बोलक्या सीमारेखा दिसतील. मुळातच साखर आवडते आणि तीच जर औषध म्हणुन मिळाली तर आवडीने पुन्हापुन्हा (नावानावा) का खाऊ नये ? (अ-४ ओ-२१८ ) ८- भगवंत भक्तीची महती सांगतांना च्या संदर्भातील ओवी ज्यात लक्ष्मी चे वर्णन येते जीच्या घरी श्री सारख्या दासी आहेत, जिच्या संपत्तीची कोणी बरोबरी करु शकत नाही, जिच्या दासींनी एखाद्या झाडाकडे जरी पाहीले तरी तो कल्पवृक्ष होतो आदि वर्णन आलेल्या ३ सलग ओव्यानंतर लक्ष्मी संदर्भात खालील ओवी येतेय एसे जियेचियां जवळिकां, सामर्थ्य घरिचियां पाइकां, ते लक्ष्मी मुख्यनायका न मनेचि एथ. मग सर्वस्वे करुनि सेवा, अभिमान सांडुनि पांडवा, ते पाय धुवावयाचिया दैवा, पात्र जाहाली. अर्थ – अशा जिच्या सहवासांतील दासींची शक्ती आहे, अशी जी ऎश्वर्याची मुख्य मालकीण लक्ष्मी, तिचीही येथे किंमत नाही. हे पांडुपुत्रा ती अभिमान सांडुन सर्वार्पण (संपुर्ण समर्पण ) भावनेने जेव्हा सेवा करु लागते तेव्हा ती कुठे माझे चरण चुरायला लायक होते पात्र होते.(अ-९-ओ-३७६-३७७) ९- बाहेरी धीट जैसी, दाटुगा पति कळासी, करी टेहणी तैसी प्रवृत्तीसी जसे घराबाहेर व्याभिचाराचे साहस करणार्याु स्त्रीला जसा खोलीत कोंडुन ठेवतो त्याप्रमाणे अंत:करणाच्या एकुण एक हालचालींवर जो निरंतर नजर ठेवतो. (अ-१३ ओ-५०५) १०-अज्ञानी पुरुषाची लक्षणे सांगतांना अज्ञानी पुरुष कोण असे सांगतांना आलेल्या ओवींपैकी या ओवी म्हातारपणी जालें, माणिक एक विपायिलें, तयाचे का जेतुलें, माता पितरा. तेतुलेनि पाडे पार्था, घरीं जया प्रेम आस्था आणि स्त्री वांचुनि सर्वथा जाणेना जो तैसा स्त्री देही जो जीवे. पडोनियां सर्वभावे कोण मी काय करावे काही नेणें चित्त आराधी स्त्रीयेचे आणि स्त्रीयेचेनि छंदे नाचे माकड गारुडीयाचे जैसे होय. स्त्रीयेचां तरी विखीं भोगुसंपत्ती अनेकी आणी वस्तु निकी जे जे देखे. प्रेमाथिलेनि भक्ते , जैसेनि भजिजे कूळदैवते, तैसा एकाग्रचित्ते स्त्री जो उपासी. नायटेयां भेण न मोडिजे नागांची आण तैसी पाळी उणखुण स्त्रीयेची जो किंबुहना धनंजया स्रीचि सर्वस्व जया आणि तियेचिया जालिया लागी प्रेम आणिकही जे समस्त तेथिचे संपत्तिजात ते जीवाहुनि आप्त मानी जो का तो अज्ञानासी मुळ अज्ञाना तेणे बळ, हे असो केवळ तो तेंचि रुप अर्थ – वृद्धपणी झालेल्या एकमेव पुत्र रत्नाचे आईवडिलास जेवढे प्रेम असते अरे अर्जुना त्याच प्रमाणे ज्याला घराची आपुलकी आणि प्रेम असते आणि जो स्त्रीवाचुन दुसरे काही मुळी जाणतच नाही. स्त्री देहाला जो जीव भजुन राहतो आणि मी कोण? काय करावे ? या गोष्टीची ज्याला काहीच जाण नसते. जसे गारुड्याचे माकड गारुड्याच्या इच्छेप्रमाणे छंदाप्रमाणे वागणारे असते तसा तो स्त्री च्या मनाची पुजा करतो. जो स्त्रीच्या शब्दावर इशार्या वर नाचतो. तथापि स्त्री साठी ज्या ज्या चांगल्या भेटवस्तु दिसतील त्या आणतो तसेच भोगांची ऎश्वर्य साधने आणतो. प्रेमळ साधकाने जसे कुलदेवतेला एकनिष्ठेने पुजावे त्याप्रमाणे जो स्त्रीची उपासना एकाग्र चित्ताने करतो. ज्याप्रमाणे खरुज-नायट्याच्या भयाने घेतलेली देवीची शपथ मोडवत नाही त्याप्रमाणे असा पुरुष स्त्रीची मर्जी सांभाळत असतो. अरे अर्जुना फ़ार काय वर्णावे, त्याचे सर्व काय ते एकमेव स्त्रीच असते आणि तिच्यापासुन झालेल्या मुलांवर ज्याचा जीव असतो. त्या स्त्रीचे सर्व वैभव वस्तु त्याला स्वत:च्या जीवापेक्षा अधिक प्रिय असते. असा हा पुरुष अज्ञानाचे मुळ आहे. आणि अज्ञानाला च त्यायोगे बळ येते. (अ-१३ ओ-७८७-७८८-७९०-७९२-७९६-७९७-८००-८०१-८०२) ११- गांवा गेलीया वल्लभु, पतिव्रतेचा विरहक्षोभु, भलतेसणी हानिलाभु, न मनीं जेवी. अर्थ- प्रिय पती गावाला गेल्यानंतर पतिव्रतेला जे विरहाचे दु:ख होते त्या दु:खाने पोळलेली ती कोणत्याच फ़ायद्या तोट्याकडे लक्ष देत नाही तिची वृत्ती पतीकडे लागलेली असते. (अ-१६ ओ-७९) १२- क्षत्रिया रणी पळोनि जाणें, तें कोंण साहे लाजिरवाणे, कां वैधव्ये पाचारणें, महासतियेतें. अर्थ- क्षत्रियाला युद्धातुन पळुन जाणे जसे लाजिरवाणे वाटते, कोण मानी क्षत्रिय ही पळुन जाण्याचे कृती लाजिरवाणी कृती सहन करील ? जसे सौभाग्यवती महापतिव्रतेला वैधव्यवाचक नावाने हाक मारणे जसे तिला लाजिरवाणे वाटते. ( विधवा संबोधन जिला लाजिरवाणे वाटते.) (अ-१६-ओ-१७७) 13- तेज-क्षमा- धैर्य, शौच, अद्रोह, अमानित्व हे गुण दैवी संपत्तीत जन्म पावलेल्या माणसांमध्ये असतात. ( हा अर्थ असलेल्या मुळ गीतेचा श्लोक समजावुन सांगतांना ज्ञानेश्वर खालील उदाहरणाने या ओवीची सुरुवात करतात.) वोखटे मरणाऎसें, तेंही आले अग्निप्रवेशें, परी प्राणेश्वरोद्देशें, न गणीची सती. अर्थ –अगोदरच मरणाऎवढा वाईट प्रसंग कोसळलाय, आणि तोही कसा तर अग्निप्रवेश करावा लागेल असा, परंतु पतिव्रता स्त्री सती स्त्री प्राणेश्वरा साठी ( प्राणेश्वरोद्देशे) या मरणाची देखील पर्वा करत नाही. वोखटे- वाईट, न गणीची – पर्वा करत नाही, गणत नाही. (अ-१६- ओ-८६)’

प्रतिक्रिया द्या
18047 वाचन

💬 प्रतिसाद (73)
प
प्रचेतस Sun, 09/27/2015 - 14:26 नवीन
ज्ञानेश्वरीतील उपरोक्त ओव्यांचे मूल्यमापन करताना तत्कालीन काळाच्या परिप्रेक्ष्यानच पाहायला हवे. नपेक्षा २००० वर्षापूर्वीचे गाहासत्तसईमधील उल्लेख वाचून स्त्रिया छचोर असतात असे वाटू शकेल व ते एक फुकाचे अरण्यरूदनच होऊन बसेल.
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Sun, 09/27/2015 - 14:32 नवीन
सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
म
मारवा Sun, 09/27/2015 - 21:48 नवीन
या ओवींचे मुल्यमापन करतांना त्या कालाचा तत्कालिक संदर्भ काय होता याचा विचार सर्वप्रथम केला पाहीजे. मात्र त्यानंतर दुसरी पायरी म्हणजे त्या मुल्यांचा समकालीन जीवनाशी कितपत संबंध उरलेला आहे ? ती कालबाह्य आहे की अजुनही कालोचित आहेत. हे देखील तपासणे अगत्याचे आहे असे मला तरी वाटते. या सर्व प्रक्रियेला मी सुसुत्रतेने मांडण्याचा प्रयत्न करतो. १- सर्वप्रथम या ओवींचा त्यातील मुल्यांचा तात्कालिक संदर्भ काय होता याचा विचार केला पाहिजे. २- त्यानंतर या ओवींचा समकालीन जीवनात काय रेलेव्हन्स राहिलेला आहे त्यातला कुठला भाग कालबाह्य झालेला आहे कुठला काळाच्या कसोटीवर टिकुन राहिलेला आहे हे बघितल पाहिजे. ३- या चिकीत्सेनंतर जो भाग ग्राह्य आहे तो स्वागतशीलतेने स्वीकारला पाहीजे तसेच जो भाग त्याज्य आहे त्यालाही निसंदिग्धतेने नकार दिला पाहीजे. ४- ही चिकीत्सा करतांना संवेदनशीलता बाळगली पाहिजे त्याज्य भाग हा हळुवारपणे वेगळा काढला पाहिजे (जसे आपण बाळाच्या पायातील काटा काढतांना त्याच्या पायाला जीवाला कमीत कमी इजा होइल याची काळजी वाहतो तसे.) त्यावेळेस जो चांगला कालोचित ग्राह्य भाग आहे त्याला संवेदनशीलतेने आग्रहाने जपलं पाहिजे. ५- चिकित्से चा येथे उदा. ज्ञानेश्वर आहे म्हणुन त्यांचे च उदाहरण घेतो ज्ञानेश्वरीतील फ़ार थोडा भाग काहि मुल्ये काहि ओव्या इतकाच त्याज्य आहे त्यातील ग्राह्य भाग त्या तुलनेने फ़ार मोठा अनमोल असा ठेवा आहे. उदा. त्यातील अफ़ाट शब्द भाषा काव्य सौंदर्य, काहि सद्यस्थितील उत्क्रांत मुल्यांचा प्राथमिक अवस्थेतील अविष्कार, काहि अति प्रगत विचारांचा भाग, काही महान मानवी मुल्ये इ. त्या सर्वांची जपणुक करणे हि तर आपली सांस्कृतिक जबाबदारीच आहे. ६- मात्र याचा अर्थ यातील प्रत्येक अक्षर पवित्र ओवी पवित्र मुल्यभाव योग्यच अचुकच कालातीतच असे नाही असे सर्व च आणि म्हणुन चिकीत्सेस अपात्रच असे नव्हे. म्हणुन चिकीत्सा अधिकाधिक प्रामाणिकपणे खुलेपणाने झाली पाहीजे. ७- हे करतांना यात त्याज्य आहे याने निराश होण्याची गरज नाही तसेच चांगला भाग परंपरे चा स्वीकार अंगिकार पुरस्कार करण्यातही संकोच का करावा. ८- आणि आजच्या काळात जर जुन्या चुकीच्या मुल्यांमुळे आजच्या उन्नत उत्क्रांत श्रेष्ठ मुल्यांना अडसर येत असेल तर अशा जुन्या जाचक मुल्यांचा चिकीत्सेने ठामपणाने जमेल तितक्या हळुवार पणे संवेदनशीलतेने , तार्किकतेने विरोध निषेध नायनाट केला पाहीजे असे मला प्रामाणिकपणे वाटते. यासाठी ज्ञानेश्वरांच्याच सुंदर ओवीचा आधार घेतो व त्यांनीच प्रोत्साहन दिलेल्या विवेकाचे उदा. देतो. सलिली पय जैसे, एक होऊनी मीनले असे परी निवडुनी राजहंसे वेगळें किजे. ( पाण्यामध्ये (सलिली) दुध जसे मिसळुन एकरुप झालेले असते पण राजहंस पाण्यातुन दुध निवडुन वेगळे करतो.) किंवा कीं अग्निमुखे किडांळ, तोडोनियां चोखांळ, निवडती केवळ, बुद्धीमंत ( ज्याप्रमाणे चतुर सोनार अग्नीमध्ये सोने तापवुन त्यातील हिन ( किडाळ) जाळुन टाकुन त्यातील शुद्ध सोने चांगले ( चोखाळ ) वेगळे काढतो. किंवा ना तरी जाणिवेचिया आयणी, करितां दधिकडसणी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे ( किंवा बुद्धीच्या सामर्थ्याने दह्याचे कौशल्यपुर्वक घुसळणे केले असता शेवटी जसे नवनीत वेगळे निघते) किंवा किं भुस बीज एकवट, उपणिता राहे घनवट, तेथ उडे ते फलकट , जाणो आले. ( कोंडायुक्त धान्य वार्यावर धरुन उपणले असता वजनदार कसदार दाणे घनवट खाली राहते पोकळ असलेले फोलकट वार्याबरोबर उडुन जाते तसे इथे विचारांचे नवनीत काढण्याचा प्रयत्न करण्यास हरकत काय असावी ? असे आपण केले पाहीजे असे मला प्रामाणिकपणे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
पैसा Mon, 09/28/2015 - 07:19 नवीन
त्याज्य भाग हा हळुवारपणे वेगळा काढला पाहिजे
नक्की काय सांगायचे आहे? आता जे भाग चुकीचे वाटतात ते वेगळे काढून डिलिटायचे का? अजून ५००/८०० वर्षांनी अजून काही डिलिटले जाईल. शेवट असे काही पुस्तक होते हेच नाकारायचे का? तेव्हाच्या लिखाणाची आताच्या कसोट्या लावून चिकित्सा केलीच पाहिजे का? ते त्या काळाचे चित्र आहे म्हणून त्यातील निव्वळ साहित्यमूल्ये, किंवा गीतेत काय सांगितले आहे ते प्राकृतात आणणे हे केवढे मोठे काम होते म्हणून त्याचे निर्भेळ कौतुक करणे तुम्हाला अशक्य वाटते का? ज्ञानेश्वरीला गीतेवरील टीकाग्रंथ असे म्हणतात. अवश्य वाटत असेल तर तुम्ही ज्ञानेश्वरीवर टीकाग्रंथ लिहायला मोकळे आहात. तो त्या दर्जाचा झाला तर लोक डोक्यावर घेतील. ५००/८०० वर्षांनी कोणीतरी त्यावर पुन्हा टीका लिहील. ज्ञानेश्वरीतले आता चुकीचे भाग त्याग करायचे किंवा वेगळे काढायचा उपद्व्याप का हेच मला मुळात कळत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
प
पैसा Mon, 09/28/2015 - 07:23 नवीन
आताच्या कसोट्यांवर उतरत नाही म्हणून अशी सगळ्याची चिरफाड करायला बसलो तर जगातला कोणताच तथाकथित धर्मग्रंथ शिल्लक रहायचा नाही, एवढेच काय १९५० च्या आधीचे बहुतेक साहित्य निव्वळ जाळून टाकावे लागेल. कारण त्यातले तुम्हाला वाटते ते नीरक्षीर वेगळे करणे हे मर्त्य माणसाला शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मारवा Mon, 09/28/2015 - 09:29 नवीन
कारण त्यातले तुम्हाला वाटते ते नीरक्षीर वेगळे करणे हे मर्त्य माणसाला शक्य नाही. जगातल्या कुठल्या विषयातील संशोधन आजच्या घडिला पुर्णपणे थांबलेल आहे. न्युटन आइनस्टाइन गेले म्हणुन त्यांच्या नंतर त्यांच्या विचारांना पुढे नेण चिकीत्सा करण थांबल का ? कुठला असा विषय आहे ज्यात नित्यनुतन दररोज संशोधन होत नाही जुन जे आहे त्यागल जात नाही. स्टॅनफोर्ड चा एनसाय्क्लोपीडीआ ऑफ फिलॉसॉफी बघा सातत्याने नविन संकल्पना येतात तत्वाच्या क्षेत्रात रोज एक जुने तत्व नष्ट होते एक निर्माण होते. ही एक चिरंतन विकासाची उत्क्रांतीची प्रक्रिया आहे जी होतच राहणार. त्यात तुम्हाला इतक असहाय अशक्य का वाटत ही मल्टीलेव्हल वर चालणारी चिरंतन प्रक्रीया आहे. कुठला असा धर्मग्रंथ नाही की ज्याची चिकीत्सा करण्याचा प्रयत्न झालाच नाही व झालातर त्यातुन काहीही अर्थपुर्ण निष्पत्ती झाली नाही. तुमचा काठिण्याला विरोध आहे की करुच नये असे तुमचे मत आहे ? असा न्युनगंड का ज्ञानेश्वर माणुसच होते त्यांच्या काळाचे अपत्य होते आपल्या पेक्षा उत्क्रांती च्या मागल्या टप्प्यावर उभे होते. अनेक गोष्टी ज्यांची त्यांनी कल्पनाही केली नसती आज आपल्याला उपलब्ध आहेत. आपल्या क्षमता विषयी नाही मला वाटत काही अडचण आहे. आणि अस एकही क्षेत्र नाही जिथे आज कालच्या निर्मात्याला आज आव्हान दिल जात नाही. यात नकारात्मक काहीच नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मारवा Mon, 09/28/2015 - 09:15 नवीन
नक्की काय सांगायचे आहे? आता जे भाग चुकीचे वाटतात ते वेगळे काढून डिलिटायचे का? अजून ५००/८०० वर्षांनी अजून काही डिलिटले जाईल. शेवट असे काही पुस्तक होते हेच नाकारायचे का? डिलीटायचे असा माझ्या म्हणण्याचा अर्थ नाही. त्यातील त्याज्य भाग चर्चा मंथन होऊन हायलाइट व्हावा. आणि त्याचे समर्थन आचरण पुरस्कार न होता त्याचा निसंदिग्ध निषेध वैचारीक पातळीवर व्हावा. फिजीकली पुस्तक जाळणे वा त्यातील भाग यापुढे त्या ओव्या गाळुन छापावा असे कुठेही कधीही मी म्हणालो नाही. तो चुकीचा भाग हि एक महत्वाचा एतिहासिक दस्तएवजच आहे जो पुढील पिढीला विचारांची उत्क्रांती कशी झाली याचे उदाहरण म्हणुन अभ्यासायला उपलब्ध असणे आवश्यकच आहे. दुसरे असे दडपल्याने जाळल्याने विचार नष्ट तर नाहीच होत उलट अमर होतात असे मी मानतो. शिवाय जे काही आपले बरे वाईट सहित सांस्कृतिक एवज आहेत ते जतन करणे हि अर्थातच आपली सांस्कृतिक जबाबदारीच आहे. पुस्तकातील त्याज्य भाग वैचारीक पातळीवर नकारला जावा हि सरळ स्पष्ट अपेक्षा पुस्तक जाळणे वा संपादित करणे नाही. तेव्हाच्या लिखाणाची आताच्या कसोट्या लावून चिकित्सा केलीच पाहिजे का ? चिकीत्सा तर केलीच पाहिजे मात्र फक्त आताच्या कसोट्याच लावुन करा तेव्हाचा तात्कालिक संदर्भ लक्षात घेउच नका असे मी म्हणालो नाही तुम्ही माझा प्रचेतस ना दिलेला प्रतिसाद पुन्हा वाचावा हि विनंती. तेव्हाचे तात्कालिक संदर्भ लक्षात घेण देखील आवश्यक आहे. पण यात ही एक बाब लक्षात घ्या तात्कालिन संदर्भापेक्षा आजच्या काळाचा रेलेव्हन्स हा अधिक महत्वाचा आहे यात तर दुमत नसावे. त्यातील ध्वनित व्यक्त कळत नकळत प्रोत्साहीत प्रतिपादीत मुल्ये आजच्या काळात कालबाह्य त्याज्य झालेली आहेत की आजही कालोचित ग्राह्य आहे हे तपासणे अधिक महत्वाचे आहे. कारण आपण आजच्या काळात जगत आहोत आजचे आपले जीवन अधिक महत्वपुर्ण व आपल्या वर्तमानाला आपण देत असलेला प्रतिसाद व भुमिका अधिक महत्वाची आहे. त्यामुळे मुल्यांची चिकीत्सा होतांना तत्कालिन जितके शक्य होइल तितके जास्तीत जास्त आकलन करणे गरजेचेच मात्र निर्णयाप्रत येण्यासाठी त्याहुन महत्वाचे मुल्यांचा समकालीन संदर्भ तपासणे हेच होय. हे अगदि स्वाभाविक निकडीचे आहे ना. आज उदा. अंधश्रद्धा निर्मुलन समिती जादुटोणा विरोधी कायद्याविषयी प्रचार करत आहे. आज अंधश्रध्दे चा विरोध करण अगत्याच आहे तर आज जर संताचा संदर्भ ते अंधश्रध्देविरोधात होते असा करायचा तर आजच ज्ञानेश्वरांचे मांत्रिक भुत खेत या संदर्भाचे विचार तपासण अगत्याच ठरत नाही का ? त्यातुन त्यांचा या सर्वांवर विश्वास प्रोत्साहन असे दिसत असेल तर तुम्ही त्यांच्या साहित्याच्या आधारवर आजच्या अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या उपक्रमाला नैतिक पाठींबा घेउ शकता का ? तसा तो घेतला जातोय पण चिकीत्सेविनाच मग आता नाहीतर कधी तपासणार हे विचार ? ते त्या काळाचे चित्र आहे म्हणून त्यातील निव्वळ साहित्यमूल्ये, किंवा गीतेत काय सांगितले आहे ते प्राकृतात आणणे हे केवढे मोठे काम होते म्हणून त्याचे निर्भेळ कौतुक करणे तुम्हाला अशक्य वाटते का? अहो तुम्ही माझा प्रतिसाद वाचाहो एकदा तरी व्यवस्थित माझा संपुर्ण ज्ञानेश्वर या व्यक्तीला वा संपुर्ण ज्ञानेश्वरीला विरोध नाही. तुम्ही काव्याच म्हणताय मी जर काव्य या एकाच विषयावर फोकस करुन लेख माला लिहीली तर दहा लेख तरी नक्केच अपुरे पडतील तरी अर्थातच त्यातील द ग्रेट ब्युटी कव्हर होणार नाही. पण तुम्हाला असे का वाटते मला हाच प्रश्न अगोदरही विचारला गेला. आपला ठावो ना सांडीता अनुराग भोगणारी कुमुदिनी, जैसे पवन तोय हालविले आणि तरंगाकार जाहले, किंवा भ्यासुर आणि सुरेख हे रुपाचे स्वरुप देख, जैसी दिपकळीका धाकुटी परी बहु तेजाते प्रकटी, जैसी वरिवरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालिजे, जैसा अमृताचा निर्झरु, प्रसवे जयाचा जठरु, तया क्षुधेतृषेचा अडदरु कहिची नाही.,जैसी अक्षोभिता सागरी, किंवा जे चिदरुपी मिळता , देहांतीची व्याकुळता, यातील व्याकुळता मलाही कळते, ज्ञानेश्वरांची मायानदी वर्णनात हर्मन हेसे च्या नदी ला टक्कर देते. प्रलयकाळाचा वडनावळु नरकाची वर्णने डान्टे ला पुरुन उरतात असंख्य रोमांचीत करणार्या ओव्या आहेत ज्ञानेश्वर महान कवी आहेतच पण त्या पेक्षा मला अधिक निकडीचे विषय दुसरे वाटतात म्हणुन एक धागा लेखक म्हणुन कुठला विषय फोकस करावा याचे स्वातंत्र्य मला असु नये का ? आणि तुम्हाला ही तो आजचा काळ पाहता निकडीचा वाटत नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 09/28/2015 - 13:10 नवीन
दोन्ही प्रतिसाद मी नीट वाचलेत. तरी तुमचे उत्तर मला पुरेसे वाटले नाही हे माझे मत राखीव ठेवते. आता माझा प्रश्न पुन्हा एकदा नीट वाचा. इतक्या जुन्या ज्ञानेश्वरीची चिकित्सा कशासाठी करायची? आज नवर्‍याला पतिपरमेश्वर मानणे वगैरे गोष्टी चूक हे मला माहीत आहे. त्यासाठी मला ज्ञानेश्वरीचा आधार नको आहे. ज्ञानेश्वरी मी स्त्रीवादी चिकित्सेसाठी वाचणार नाही. त्यातल्या कविता, भाषा सौंदर्यासाठी आणि झेपेल तेवढ्या तत्त्वज्ञानासाठी वाचेन. ती प्राकृत कोंकणीला जवळची वाटते म्हणून मला आता जास्त चांगली समजते म्हणून वाचेन. तुम्ही म्हणता की ज्ञानेश्वरीत चुका आहेत. केलं मान्य. पुढे काय करणार? ते सुधारता येणार आहे का? नाही बदलता येणार. त्या काळात ज्ञानेश्वरांचं जे काम होतं, जी गरज होती ती त्यांनी पुरी केली. वेदातलं गीतेतलं तत्त्वज्ञान जनसामान्यांच्या भाषेत आणलं. संपलं. आता त्यात अमूक चूक होतं म्हणून सांगून ते ज्ञानेश्वरांना स्वतःला कळणार आहे का? का ते येऊन बदलणार आहेत? आज तुम्हाला वेगळी मूल्ये महत्त्वाची वाटतात, तर ती रुजवण्यासाठी आधीच्या लोकांचे ऋण मान्य करून पुढे जाणे शहाणपणाचे असे मला वाटते. शक्य असेल त्याने स्वतंत्रपणे लोकांमधे ती मूल्ये रुजवायचा प्रयत्न करावा. लोकांना बदलणे शक्य नसेल तर आपल्यापुरता काय तो बदल करावा. ज्ञानेश्वरीइतकंही मागे जायला नको. अमिताभचे ७०-८० च्या दशकातले मेगॅहिट सिनेमे त्यात स्त्रियांची स्थिती कशी दाखवली आहे म्हणून आपण बघतो का? तीन तास मजेत घालवायला बघतो ना? आता त्या सिनेमांची स्त्रीवादी चिकित्सा केली. तरी काय होणार आहे? त्या सिनेमांनी अमिताभला अफाट लोकप्रियता मिळाली आणि निर्माते दिग्दर्शकांना पैसे मिळाले. अमिताभच्या सिनेमांवर आज टीका केली की त्यात हिरॉईनला फारच अपमानास्पद पद्धतीने वागवलेले दिसते, तर ते काही बदलणार आहे का? मग जे करून काही बदलण्याची शक्यता नाही ते सव्यापसव्य कशासाठी करायचे? त्यापेक्षा करण्यासारख्या दुसर्‍या गोष्टी बर्‍याच असतात. ज्ञानेश्वरीतल्या चुका शोधत बसण्यापेक्षा तेवढ्याच वेळात मी अमृतानुभव वाचून काढीन. या लेखावर प्रतिक्रिया द्यावी की न द्यावी असा विचार करत होते पण न राहवून लिहिले आहे. तुम्ही कधी कधी फार उत्तम लिहिता. पण त्याहून जास्त वेळा तुमचे लिखाण मला चमचाभर साबणाचा बादलीभर फेस काढल्यासारखे वाटते. जरा कठोर लिहिले आहे त्याबद्दल माफ करा. पण तुमचा हल्लीचा विवेकानंदांबद्दलचा लेख सहज आठवला, तसेच इतर काही लेख आठवले. मी सर्वसामान्य माणूस, वाचक आहे. या लोकांचे मोठेपण मी मान्य करून टाकले आहे. त्यांच्या लिखाणात काही विसंगतीसुद्धा दिसली तर मी तेही मनाशी नोंदवून पुढे जाते. कारण आजच्या दृष्टिकोनातून त्यांच्या चुका उगाळत बसण्यापेक्षा आज लिहिणारे लोक बरोबर लिहीत आहेत का चूक ते पहाणे मला जास्त गरजेचे वाटते. ज्ञानेश्वरांनी काय लिहिले याची आज चिकित्सा करण्यापेक्षा सनातन प्रभात मधे काय लिहीत आहेत हे जास्त लक्ष देऊन वाचा आणि मग त्याबद्दल लिहा असे मी सुचवेन. अर्थात हे माझे वैयक्तिक मत. हे सगळे वाचले ना की मला बालकवींची "चिंतातूर जंतू" कविता आठवते. अजून जरा दवणीय भाषेत लिहू का? आम्ही लोक पौर्णिमेच्या चंद्राचे चांदणे बघून खुश होतो. तुम्ही मात्र त्यावर काळे डाग पाहून चिंताग्रस्त होता असे वाटते. कधीतरी डागांकडे न बघता निव्वळ चांदणे अनुभवून बघा! थोडेफार वैयक्तिक वाटेल तर त्याबद्दल क्षमस्व. पण तुम्ही जर लिहू शकता तर ज्यामुळे काही वाहवा आपोआप तोंडातून निघेल असे काहीतरी सकारात्मक लिहा. ते मला जास्त आवडेल. आणि हो,
एक धागा लेखक म्हणुन कुठला विषय फोकस करावा याचे स्वातंत्र्य मला असु नये का ?
तुम्हाला आवडेल ते लिहायचे स्वातंत्र्य जरूर आहे. तसेच ते लिखाण मला आवडले नाही किंवा पटले नाही. अजून काही स्पष्टीकरण पाहिजे असे लिहायचे स्वातंत्र्य आम्हा वाचकांनाही आहेच! इति लेखनसीमा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
ब
बोका-ए-आझम Mon, 09/28/2015 - 17:39 नवीन
सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मारवा Mon, 09/28/2015 - 18:51 नवीन
गोचिड फार रीपीट झाल उंदीर ही झाल ढोंगी झाल आता जंतु हे तस नविन आहे आणि मला अत्यंत प्रिय असलेल्या आत्महत्यापंथातले बालकवींच छान आहे विशेषणाचा सहर्ष स्वीकार. आम्ही लोक पौर्णिमेच्या चंद्राचे चांदणे बघून खुश होतो. तुम्ही मात्र त्यावर काळे डाग पाहून चिंताग्रस्त होता असे वाटते. कधीतरी डागांकडे न बघता निव्वळ चांदणे अनुभवून बघा! तुम्ही मला व्यक्तीगत ओळखत असतात तर कदाचित असा सल्ला दिला नसता. म्हणजे तुम्हालाच हसु आल असत या विचाराने खुदक्क्न. आणि हो चमचाभर साबणाचा बादलीभर फेस माझ्यावरील टिकेव्यतीरीक्त रीन च्या मराठी जाहीराती साठी एक चांगली पंचलाइन होऊ शकते. तुम्ही लेखनसीमा म्हणालात तर ठीक आहे. असो तुम्ही तुमचे विचार तरी स्पष्टपणे मांडले त्यासाठी मन:पुर्वक धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 09/28/2015 - 19:02 नवीन
कविता गोविंदाग्रजांची आहे. चुकून बालकवि लिहिले वाटते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मांत्रिक Mon, 09/28/2015 - 19:07 नवीन
गोचिड फार रीपीट झाल उंदीर ही झाल ढोंगी झाल आता जंतु हे तस नविन आहे आणि मला अत्यंत प्रिय असलेल्या आत्महत्यापंथातले बालकवींच छान आहे विशेषणाचा सहर्ष स्वीकार. यातलं पैसाताई तुम्हाला काहीही म्हणालेल्या नाहीत. नीट वाचा. त्यांचा तो उद्देश नाही. तुम्ही फक्त आरोप करणार असाल तर चर्चा थांबू देत. पण उगाच काहीही आरोप करणे बरोबर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
प
पैसा Mon, 09/28/2015 - 19:13 नवीन
गोविंदाग्रजांची कविता आहे, मी चुकून बालकवी लिहिले होते. पण सगळी कविता इथे देते. म्हणजे त्यात जंतू कुठे आणि आहेत का नाहीत ते त्यांना समजेल. चिंतातुर जंतू! "निजले जग; का आता इतक्या तारा खिळल्या गगनाला | काय म्हणावे त्या देवाला – "वर जाउनि म्हण जा त्याला" || १ || "तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या | उधळणूक ती बघवत नाही " "डोळे फोडुनि घेच गड्या" || २ || "हिरवी पाने उगाच केली झाडांवर इतकी का ही | मातित त्यांचे काय होतसे?" "मातिस मिळुनी जा पाहीं!" || ३ || "पुराबरोबर फुकटावारी पाणी हे वाहुनि जात | काय करावे जीव तळमळे" "उडी टाक त्या पूरात" || ४ || "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ || देवा, तो विश्वसंसार राहू द्या राहिला तरी | ह्या चिंतातुर जंतूंना एकदा मुक्ति द्या परी ! || ६ ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
म
मांत्रिक Mon, 09/28/2015 - 19:15 नवीन
तुम्हाला सांगू? मी पण अनेक वेळा तो विचार केला. पण एका ईश्वरी शक्तीच्या भरोशावर तो सोडून दिला. आणि तुम्ही सतत त्या शक्तीलाच सुरुंग लावू पाहता. अहो त्याला हाक मारा, विश्वासाने!!! तो आहेच, आहेच, आहेच. हाक मारली की धावून येतो. तो तुमच्या आतच आहे. अन्यत्र नाही. म्हणून त्याला नाकारलं की तो सापडत नाही. तुमच्या आतच आहे तो. विश्वासाने हाक मारा. आत्महत्या करताना अगदी टोकापासून मागे ओढून घेईल तो. अजून किती खोलून सांगू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
म
मांत्रिक Mon, 09/28/2015 - 19:25 नवीन
झोपलेल्यास उठवता येतं!!! झोपेचं सोंग केलेल्यास नाही, हेच खरे!!! देवा ज्ञानोबा, सर्व ईश्वराचीच रुपे!!! हे तूच म्हणालास!!! बाकी मी काय बोलू??? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
न
नया है वह Tue, 09/29/2015 - 12:46 नवीन
मला चमचाभर साबणाचा बादलीभर फेस काढल्यासारखे वाटते
हा हा हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मांत्रिक Sun, 09/27/2015 - 14:44 नवीन
मला असे सांग, शुद्राच्या घरी मधुर चवीची पक्वान्ने आहेत, आणि एखादा दरिद्री ब्राह्मण आहे म्हणुन त्याने ती सेवन करावी का ? असे अनुचित कृत्य दरिद्री ब्राह्मणाने कसे बरे करावे? जे घेण्यास योग्य नाही अशा गोष्टीची का इच्छा करावी ? इच्छा करुन अशा पक्वान्नांची प्राप्ती जरी झाली तरी त्याचे सेवन करावे का ? हे असु दे आपली धर्मपत्नी कुरुप असली तरी तिलाच भोगणे हेच योग्य असते याप्रमाणे.(अ-३-ओ-२२१-२२२-२२४) याचा खरा अर्थ जो पुरुष सर्वांभूती वसणार्या परब्रह्म परमात्म्याला जाणतो असा पुरुष विषयवासनांनी बरबटलेल्या, काम क्रोध मत्सराने पेटलेल्या सामान्य मनुष्याप्रमाणे क्षणभंगुर सुखांची, विषयोपभोगांची इच्छा करत नाही. असे विचार मनात निर्माण झाले तरी ते लगेच त्यजित करावेत. ईश्वरी मार्गावर चालणार्या व्यक्तीच्या मनातही अनेकदा माझ्याच वाट्याला दुःख, दारिद्र्य, कमतरता, अन्याय, अपमान ही का येतात? आणि अमुक एक मनुष्य दुष्ट, क्रूर, लबाड असूनही सुखात कसा? अशी तुलना येते. त्यावेळी मनाला अशा प्रकारे समजवावे लागते. हाच खरा अर्थ व तोच गृहित धरावा.
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Sun, 09/27/2015 - 14:52 नवीन
अर्जुना त्याच प्रमाणे ज्याला घराची आपुलकी आणि प्रेम असते आणि जो स्त्रीवाचुन दुसरे काही मुळी जाणतच नाही. स्त्री देहाला जो जीव भजुन राहतो आणि मी कोण? काय करावे ? या गोष्टीची ज्याला काहीच जाण नसते. जसे गारुड्याचे माकड गारुड्याच्या इच्छेप्रमाणे छंदाप्रमाणे वागणारे असते तसा तो स्त्री च्या मनाची पुजा करतो. जो स्त्रीच्या शब्दावर इशार्या वर नाचतो. तथापि स्त्री साठी ज्या ज्या चांगल्या भेटवस्तु दिसतील त्या आणतो तसेच भोगांची ऎश्वर्य साधने आणतो. प्रेमळ साधकाने जसे कुलदेवतेला एकनिष्ठेने पुजावे त्याप्रमाणे जो स्त्रीची उपासना एकाग्र चित्ताने करतो. ज्याप्रमाणे खरुज-नायट्याच्या भयाने घेतलेली देवीची शपथ मोडवत नाही त्याप्रमाणे असा पुरुष स्त्रीची मर्जी सांभाळत असतो. अरे अर्जुना फ़ार काय वर्णावे, त्याचे सर्व काय ते एकमेव स्त्रीच असते आणि तिच्यापासुन झालेल्या मुलांवर ज्याचा जीव असतो. त्या स्त्रीचे सर्व वैभव वस्तु त्याला स्वत:च्या जीवापेक्षा अधिक प्रिय असते. असा हा पुरुष अज्ञानाचे मुळ आहे. आणि अज्ञानाला च त्यायोगे बळ येते. याचा तर स्पष्ट अर्थ मायाशक्तीने भ्रमित झालेला जीव स्वतःचे ब्रह्मरुप विसरुन क्षणभंगुर मायाजन्य सुखांसाठी कसा वेडा होतो त्याचे वर्णन आहे. आणिकही जे समस्त तेथिचे संपत्तिजात या ओळींनी तर या श्लोकांचा स्पष्ट निर्देश मायेच्या राज्यातील सुखोपभोगांकडे होतो. अर्थातच आत्मानंद त्या सर्वांहून श्रेष्ठ आहे हे सांगायचंय माऊलींना. माऊली लिंगभेद आणि जातीभेद मानत होते असा त्याचा अर्थ होत नाही.
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Sun, 09/27/2015 - 15:03 नवीन
अशा जिच्या सहवासांतील दासींची शक्ती आहे, अशी जी ऎश्वर्याची मुख्य मालकीण लक्ष्मी, तिचीही येथे किंमत नाही. हे पांडुपुत्रा ती अभिमान सांडुन सर्वार्पण (संपुर्ण समर्पण ) भावनेने जेव्हा सेवा करु लागते तेव्हा ती कुठे माझे चरण चुरायला लायक होते पात्र होते.(अ-९-ओ-३७६-३७७) याचा अर्थ ब्रह्मज्ञान झालेल्या व्यक्तीला मायाजनित सुखोपभोग भ्रम पाडू शकत नाहीत. माया त्यांना नानाप्रकारे भुलवू पाहते परंतु अशी व्यक्ती बधत नाही. शेवटी मायाच अशा दृढनिश्चयी ब्रह्मज्ञ व्यक्तीपुढे हार मानते.
  • Log in or register to post comments
म
मारवा Sun, 09/27/2015 - 21:53 नवीन
मांत्रिक जी तुमच म्हणण वरील विधानांमध्ये अध्यात्मिक अर्थ आहे व तो प्रतिकात्मक अशा अर्थाने वापरलेला आहे. आणि त्याचा प्रत्यक्ष सरळ असा लिटरली अर्थ न घेता प्रतिकात्मच अर्थ घेतला पाहिजे असेच तुमचे मत आहे का ? म्हणजे तुमचे म्हणणे नेमके काय आहे ते समजण्याच्या प्रयत्नात हा प्रश्न नम्रपणे विचारलेला आहे असे आवर्जुन नमुद करतोय.
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Mon, 09/28/2015 - 04:56 नवीन
हो, काही ठिकाणी आध्यात्मिक अर्थ सरळसरळ दृग्गोचर होतो. काही ठिकाणी व्यावहारिक दृष्टांत असू शकतात, असतीलच असे नाही. कारण मुळात ज्ञा.कालीन मराठीचा अर्थ चटकन लक्षात येत नाही. ज्ञानेश्वरांचे एकूण साहित्य पाहता व त्यांचे एकूण व्यक्तीमत्व अभ्यासता माऊली जातभेद व लिंगभेद या गोष्टींचा पुरस्कार करत असतील असे मला तर मुळीच वाटत नाही. आपण काटछाट किंवा फेरबदल करण्यापेक्षा जे उपलब्ध आहे त्याचा अभ्यास करुन माऊलींना खरंच कोणता अर्थ अमिप्रेत आहे हे माझ्याप्रमाणे पाहिले पाहिजे. तशी दृष्टी ठेवली तर माऊलींच्या साहित्याचा खरा गहन आध्यात्मिक अर्थ समोर येईल व आपणांस एक नवीनच आनंद प्राप्त होईल. बरे काही आक्षेपार्ह दिसले तरी ते प्रक्षिप्त असू शकते याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. अशा गोष्टीकडे खरा साधक तरी दुर्लक्षच करेल. समजा प्रक्षिप्त नसले तरी त्या काळच्या लोकसमजुती स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी, त्याच्यावर भर देण्यासाठी केवळ उदा.मात्र वापरलेल्या असू शकतात. त्याला माऊलींचा पाठिंबा आहे असा अर्थ होत नाही. आता पाहू बाकीचे सदस्य काय मत व्यक्त करतात. मी एकटा तरी किती बोलू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
द
दत्ता जोशी Mon, 09/28/2015 - 05:54 नवीन
अनुसंधान आणि नाम साधनेला चिकटून राहावे हे पटवून देतांना ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज व्यवहारातील दाखले देतात. मला त्यांची प्रवचने अत्यंत वैशिष्टपुर्ण त्यासाठीच वाटतात. लोकांना पटवण्यासाठी रूपके उदाहरणे द्यावीच लागतात. त्यांनी दिलेले दाखले, रूपके आणि उदाहरणे इतके चपखल आणि मार्मिक असतात कि आपण नाकारू शकतच नाही. हेच रूपक बघा ना- एकाद्या ताप आलेल्या ( आणि तापाने तोंडाची चव गमावलेल्या) माणसाच्या जिभेवर साखर ठेवली आणि सांगितलं कि बाबारे हि साखर आहे तरी त्याला ते पटणार नाही. ( किंबहुना तो तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही). अशा मनुष्याला साखरेची गोडी कळायची असेल तर आधी त्याचा ताप बरा ( दूर) व्हावा लागतो. त्याप्रमाणेच........................!!!!!!!
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Mon, 09/28/2015 - 07:08 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता जोशी
न
नाखु Mon, 09/28/2015 - 09:37 नवीन
गोष्ट लहापणी ऐकलेली राजा-उंदीर-आणि टोपी वाली. प्रत्यक्ष्यात उंदराने राजाला अव्हान दिले तर तो दाखवायलही शिल्लक राहणार नाही. अति अवांतर मला चिमणरावांचे चर्‍हाट हे ही पुस्त्क आवडते अनावश्यक चिक्त्सा न करता. सॅलरी बघून पण नेहमीच कॅलरी न बघता मिळेल ते खाणारा भाजीपाला नाखु. अनाहूत सल्ला "मारवा" तुम्हीच एक नव्याने मार्वेश्वरी लिहा आणि प्रकाशीत करा कसे !!!!!!!!!
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली Mon, 09/28/2015 - 09:57 नवीन
प्पकॉर्न घेउन बसल्यो आहे.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 09/28/2015 - 13:09 नवीन
अशा पद्धतीने एखाद्या ग्रंथाची चिरफाड करायची ठरवली तर ज्ञानेश्वरीचा काय कोणत्याच ग्रंथा मधून घेण्यासारखे काहीही शिल्लक रहाणार नाही. किंबहुना या पध्दतीने कोणत्याही ग्रंथाचे काव्यात्मक, नैतिक, सामाजिक किंवा इतर कोणतेही अनुशंगिक मुल्य सुध्दा शुन्य आहे हे सिध्द करता येईल. भगवतगीता काय किंवा ज्ञानेश्वरी काय हे ग्रंथ समग्र विश्र्वाचे कल्याण व्हावे ह्याच उद्देशाने ते लिहिले गेले आहेत हे सर्वश्रुत आहे. त्यामधला केवळ सोयिस्कर भाग निवडुन त्यावर खल करायचा आणि अमुक हा भाग कालबाह्य झाला आहे असे ठरवून टाकायचे हेच मुळात पटत नाही. धर्म किंवा धर्मनियम हे कधिच कालबाह्य होत नाहीत. कालबाह्य होतात त्या धर्माला चिकटलेल्या रूढी आणि परंपरा. भगवतगीता काय किंवा ज्ञानेश्र्वरी वाचून धर्म म्हणजे काय हे समजुन घ्यायचा प्रयत्न करायचा की ते समजावून सांगताना अनुषंगिक संदर्भ म्हणुन आलेल्यां रूढी आणि परंपरांमधेच अडकुन बसायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. एकतर तो संपुर्ण ग्रंथ कालबाह्य म्हणुन बाद करावा किंवा वर पैसाताई म्हणतात तसा त्या गंथावर टिकात्मक ग्रंथ लिहावा ( जे लोकमान्य टिळकांनी केले) किंवा मग तो आहे तसा स्विकारुन ज्ञानेश्वर महाराजांना त्यातुन खरेच काय सांगायचे होते ते समजून घ्यायचा प्रयत्न करावा. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
म
मारवा Mon, 09/28/2015 - 17:52 नवीन
पैजार महोदय धर्म किंवा धर्मनियम हे कधिच कालबाह्य होत नाहीत. तेच तर म्हणतोय धर्मनियम हे कालबाह्य होऊ शकतात असु शकतात म्हणुन च सती चा धर्मनियम आज कालबाह्य झालेला आहे. तो चुकीचा आहे तो मुळातच अन्यायकारक आहे. त्याचे कुठल्याही धर्मनियमाच्या आधारे धर्मग्रंथाच्या आधारे केले गेलेले उद्दात्तीकरण घातक आहे. चुकीचे आहे त्याज्य आहे. माणुस मारण्याच्या या अमानवी क्रुर मुल्याच्या उद्दात्तीकरणाचा निषेध व्हावा त्याची हवी तेवढी चिकीत्सा करा त्यात काय ग्राह्य आहे तुमच्या मते ते सांगा ? भगवतगीता काय किंवा ज्ञानेश्वरी काय हे ग्रंथ समग्र विश्र्वाचे कल्याण व्हावे ह्याच उद्देशाने ते लिहिले गेले आहेत हे सर्वश्रुत आहे. या मध्ये सती जात असलेल्या स्त्रीचे काय कल्याण साध्य होते बरे ? मला समजुन घ्यायचे आहे कृपया विस्तारपुर्वक उलगडा करावा. यात माझ्या मते अत्यंत चुकीचे असे स्पष्ट समर्थन व भीषण असे उद्दात्तीकरण एका क्रुर अमानवी परंपरेचे करण्यात आलेले आहे असे माझे मत आहे. तुम्ही जे मला माहीत नसेल असे काही यात असेल तर अवश्य दाखवुन द्यावे. गीतेचा नविन श्लोक ज्ञानेश्वरीत येतो. १६ व्या अध्यायातला क्रमांक ३ चा. तो असा आहे. तेज: क्षमा: धृति: शौचमद्रोहो नातिमानिता. भवन्ति संपदं दैवीमभिजातस्य भारत अर्थ- तेज क्षमा धैर्य, शौच, अद्रोह अमानित्व हे गुण दैवी संपत्तीत जन्म पावलेल्या माणसामध्ये असतात. या वरील श्लोकाचे अर्थ वर्णन करतांना ज्ञानेश्वर पहिलीच ओवी घेतात ती अशी वोखटे मरणाऎसें, तेंही आले अग्निप्रवेशें, परी प्राणेश्वरोद्देशें, न गणीची सती. लक्षात घ्या मी उदात्तीकरण का म्हणतोय वरील महान उद्दात्त मानवी मुल्यांचे उदा. क्षमा धैर्य इ. चे उदाहरण देतांना ते सर्व कसे सती जाणारया स्त्री च्या ठायी असतात हे ज्ञानेश्वर सांगतात वरील उत्तम गुण सती जाणारी स्त्री आपल्या कृत्यातुन दर्शविते. अगोदर पहिल्या ओवीत निसंदिग्ध समर्थन केल्यानंतर दुसरी ओवी ज्ञानेश्वर पुढील तत्वार्थ विवेचनासाठी रुपक म्हणुन वापरतात. ते म्हणतात तैसे आत्मनाथचिया आधी तैसे तशाप्रकारे त्याप्रमाणे ( सतीप्रमाणे ) आत्मरुपी पतीच्या प्राप्तीच्या चिंतेने..... यात कुठेही पहील्या ओवीचा साधा प्रतिकात्मक सिम्बॉलिक वापर तर नाहीच नाही अगदि उघड असा मुल्यभाव ज्ञानेश्वर सती जात असलेल्या स्त्री साठी वापरतात पैजार महोदय मी जेव्हा पहिल्यांदा ही ओवी वाचली होती मी काही काळासाठी सुन्न होउन बसलो होतो. इतका संवेदनशील कवी कोमल ह्रुदयाचा माणुस इतक क्रुर समर्थन ? तुम्हाला काहिच वाटत नाही का हजारो स्त्रीया ज्या अशा धर्मनियमांनी उद्दात्तीकरणाने सती गेल्या शिर्षक म्हणुन ते आहे. संपादक मंडळाला एक विनंती- शेवटच्या ओवीचा संदर्भ क्रमांक ओ-१८६ असा आहे तो चुकुन फक्त ८६ टंकला गेलेला आहे. जेणेकरुन संदर्भ शोधत असलेल्या ( कुणी असल्यास ) वाचकांस त्रास होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
प
पैसा Mon, 09/28/2015 - 19:26 नवीन
अहो, तेव्हा महाराष्ट्रात सती जाणे ऐच्छिक होते. सक्तीचे नव्हते. बंगालमधे सक्तीचे होते आणि राजस्थानात. तिथल्या प्रथांबद्दल ज्ञानेश्वर गौरवाने कशाला लिहितील? बरे ती प्रथाच होती. सत्यं वद, धर्मं चर अशा प्रकारची धर्माची आज्ञा नव्हती. तुम्ही इतके एक्साईट होऊन लिहिताय, की वाचणार्‍या कोणाला वाटेल की ज्ञानेश्वरांनी कोणा तरी बाईला ती नको म्हणत असताना चितेवर बांधून जाळले असावे! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मांत्रिक Mon, 09/28/2015 - 19:29 नवीन
जाऊ द्या ताई!!! काय बोलणार आपण!!! मीच बरोबर बाकी सर्व चूक म्हटल्यावर प्रतिवाद उरतो कोठे!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 09/29/2015 - 06:59 नवीन
सती चा धर्मनियम आज कालबाह्य झालेला आहे.
मारवा सर कदाचित मला काय म्हणायचे आहे ते आपल्याला निटसे समजले नाही म्हणुन आपण वरील विधान केले आहे. मी असे म्हणालो होतो
धर्म किंवा धर्मनियम हे कधिच कालबाह्य होत नाहीत. कालबाह्य होतात त्या धर्माला चिकटलेल्या रूढी आणि परंपरा
सती ही तशीच एका अनिष्ट रूढी होती जी धर्माला चिकटली होती. जेव्हा सती जाणे हा काही धर्म नियम नाही असे जेव्हा काही जाणत्या / सुधारक लोकांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी त्या नियमाचा त्याग केला.
वोखटे मरणाऎसें, तेंही आले अग्निप्रवेशें, परी प्राणेश्वरोद्देशें, न गणीची सती
या ओवी मधला "वोखटे" या शब्दचा अर्थ "वाईट" किंवा भयंकर असा आहे. सती जाणार्या स्त्री ला किती वाईट किंवा भयंकर मृत्यू येतो. पण असा भयंकर मृत्यू सुध्दा ती आपल्या प्राणेश्र्वरासाठि स्विकार करते. सतीला येणार्या मरणाला माउलिंनी वाईट किंवा भयंकरच म्हटले आहे, त्यांनी त्या प्रथेचे कुठेही समर्थन केलेले नाही. ते केवळ रुपक म्हणुन वापरले . या ओवीच्या मागच्या पुढच्या ओव्या पाहिल्या की ते पुरेसे स्पष्ट होते. आतां ईश्वरप्राप्तीलागीं । प्रवर्ततां ज्ञानमार्गीं । धिंवसेयाचि आंगी । उणीव नोहे ॥ १८६ ॥ वोखटें मरणा{ऐ}सें । तेंही आलें अग्निप्रवेशें । परी प्राणेश्वरोद्देशें । न गणीचि सती ॥ १८७ ॥ तैसें आत्मनाथाचिया आधी । लाऊनि विषयविषाची बाधी । धांवों आवडे पाणधी । शून्याचिये ॥ १८८ ॥ समस्त विश्र्वाचे कल्याण करण्याची प्रार्थना करणार्या ज्ञानेश्र्वर महाराजांनी सती प्रथेचे क्रुर समर्थन केले असे तुम्हाला वाटले याचा मला भयंकर खेद झाला आहे. जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो || भूता परस्परे जडो | मैत्र जीवांचे || दुरितांचे तिमिर जावो | विश्व स्वधर्म सूर्ये पाहो || जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात | असे दान देवाकडे मागणारा मनुष्य जर तुम्हाला क्रुर वाटत असेल तर तुमची क्रूर या शब्दाची व्याख्या तुम्ही परत एकदा तपासावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
प
प्यारे१ Mon, 09/28/2015 - 14:16 नवीन
ज्ञानेश्वरांचीच एक चांगली ओवी आहे. ज्ञानेश्वरीतलीच. ओवी आठवत नाही पण साधारण अर्थ माहिती आहे: गोचीड गायीच्या आचळाच्या वरच्या बाजूस चिकटून तिचं रक्त शोषण करत असतो. थोडासा खाली गेला तर गोड दूध प्यायला मिळेल पण त्याला ते जमत नाही. असो!
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Mon, 09/28/2015 - 14:18 नवीन
***ROFL***
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्रसाद गोडबोले Mon, 09/28/2015 - 17:13 नवीन
अश्रद्दधाना: पुरुषा धर्मस्यास्य परंतप । अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि ॥ ३ ॥ पाहें पां दूध पवित्र आणि गोड । पासीं त्वचेचिया पदराआड । परि तें अव्हेरुनि गोचिड । अशुद्ध काय नेघती ॥ ५७ ॥ https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%BE
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Mon, 09/28/2015 - 17:19 नवीन
धन्यवाद राजे!!! मानलं तुमच्या स्मरणशक्तीला!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Mon, 09/28/2015 - 17:28 नवीन
धन्यवाद राजे!!! मानलं तुमच्या स्मरणशक्तीला!!!
धन्यवाद मांत्रिकतात्या ! देवाची , माऊलींची आणि गुगलची कृपा दुसरे काय ! तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् । ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥ १०॥ लळेयाचिया बाळका किरीटी । गवसणी करूनि स्‍नेहाचिया दिठी । जैसी खेळतां पाठोपाठीं । माउली धांवे ॥ १३४ ॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
म
मांत्रिक Mon, 09/28/2015 - 17:42 नवीन
आमचाही एक अभंग:- ऐसा हा आमुचा धागाकर्तु!! ज्ञानेशावरी चिखल फेकतु!! जागृत मिपाकरी परंतु!! ढोंगचि फोडीयेले!!! ढोंग = वरकरणी समाजसुधारणेचा आव परंतु अंतरंगी सत्पुरुषांवर चिखलफेकीचा उद्देश!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
म
मारवा Mon, 09/28/2015 - 18:03 नवीन
मांत्रिक महोदय माझा तरी असा कुठलाही चिखलफेकीचा उद्देश नाही. मला ज्ञानेश्वरांच्या काव्य प्रतिभेविषयी नितांत आदर आहे. तुम्हाला असे का वाटतेय ते कळत नाही. बहुधा तुम्ही दुखावलेले आहात कुठेतरी नकळ्त तसे असल्यास हा मी माझ्या लेखनशैलीचा दोष समजतो व त्याचा मला प्रामाणिकपणे खेद वाटतो. माझा प्रयत्न व हेतु मात्र प्रामाणिक आहे इतकीच ग्वाही मी देऊ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
म
मांत्रिक Mon, 09/28/2015 - 18:28 नवीन
धन्यवाद!!! उद्या सविस्तर उत्तर देईन की मला कुठं खटकलं ते. आता मोबल्यावर शक्य नाही... बाकी रागावलो नाही. दुसरा कुठलाही धागा काढा, सत्पुरुषांच्या अनादराचा नको, तिथे भेटीनच!!! मस्त फाईट करु... फाईट करायला आवडतं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
द
दमामि Mon, 09/28/2015 - 17:27 नवीन
लिखाण , शैली, त्यामागील विचार , अभ्यास आवडला. पण ते समजून घेण्याइतका आपला समाज अजून प्रगत झाला नाही हे सत्य!
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Mon, 09/28/2015 - 18:05 नवीन
हा सगळा वाद भिन्न दृष्टिकोन असल्यामुळे झालेला आहे. शेवटी प्रत्येकजण आपलं माणसांविषयी, कलाकृतीविषयी आणि घटनांविषयीचं मत हे दृष्टिकोनाच्याच आधाराने बनवत असतो. आणि त्यात बरोबर आणि चूक किंवा योग्य-अयोग्य ठरवणं म्हणजे गोल खोबणीत चौकोनी खुंटी ठोकण्यासारखं आहे.
  • Log in or register to post comments
म
मारवा Mon, 09/28/2015 - 18:18 नवीन
हे फक्त मतांपुरत मर्यादित आहे असे मला वाटत नाही. म्हणजे तुमच मत लाल रंग सुंदर आहे व माझ मत गुलाबी रंग च सुंदर आहे. मी व तुम्ही आपापल्या रंगाचे कपडे वस्तु वापरणार यात काही च कुठेच तस बिघडत नाही. मात्र वरील मते ही नैतिक भुमिका आहेत. त्या प्रत्यक्ष कृती ला प्रेरीत करतात ज्या कॄतींचा फार गहन परीणाम संबंधितांच्या जीवनावर होतो. सती जाण योग्य की अयोग्य अस नुसत मत प्रदर्शन व व्यक्तीगत आचरणाची बाब नाहीये. ते प्रत्यक्ष जीवनावर प्रभाव टाकणार अस आहे. अनेक स्त्रीयांनी आपली इछा नसतांना आपला जीव गमावलेला आहे. इट हॅज डायरेक्टली अ‍ॅफेक्टेड समवन्स लाइफ पातिव्रत्याची संकल्पना ही आयुष्ये प्रभावित प्रत्यक्ष प्रभावित करणारी संकल्पना आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
म
मारवा Mon, 09/28/2015 - 18:10 नवीन
धन्यवाद मला पटलेला एक विचार सत्य असेल तर तो टिकेल नसेल तर नाही. मी चुकीच्या विचारांच समर्थन करत असेल तर ते फार काळ टिकणार नाही. आपण आपली समजुन घेण्याची विचार करण्याची मांडण्याची आदान प्रदान चिकीत्सेची प्रक्रिया का बंद करावी ? असे मला वाटते. इतरांशी संवाद नाही साधु शकलो तर ते मात्र आपल्या संवाद कौशल्याच अपयश आहे.
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Mon, 09/28/2015 - 18:23 नवीन
तुमाला असं वाटत नै का कि सत्पुरुषांविषयी तुमी थोडे पार्शलच होता म्हणून!!! आता मोबल्यावर टंकतोय!!! उद्या नीट प्रतिसाद देईन राजे!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
य
यशोधरा Mon, 09/28/2015 - 19:12 नवीन
स्त्री संदर्भातील या निवडक प्रातिनीधीक अशा ओव्या एकत्र करण्याचा मी एक छोटा प्रयत्न केलेला आहे.
मुळात ह्या ओव्या स्त्री संदर्भात कुठे आहेत?
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Mon, 09/28/2015 - 19:21 नवीन
अरे देवा!!! इतकं मनापासून बोलूनही तुम्हाला समजत नाहीये. काय करणार? जाऊ दे! आम्हीच नाद सोडतो......
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Mon, 09/28/2015 - 19:21 नवीन
सती या शब्दाचा अर्थ हा सती जाणारी स्त्री असा घेणं हे चुकीचं आहे. सती म्हणजे सद्गुणी स्त्री. महासती अनसूया हा उल्लेख ऐकला असेलच तुम्ही. पुराणातील एका कथेनुसार शिवाची पहिली पत्नी सती हिने तिचे पिता दक्षप्रजापति यांच्याहातून झालेला शिवाचा अपमान सहन न होऊन प्राणत्याग केला. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर वडिलांच्याऐवजी पतीला प्राधान्य दिलं. त्यामुळे सतीसारखी पतिव्रता असा उल्लेख होत असावा आणि कालांतराने सती हा पतिव्रतेला समानार्थी शब्द बनला आणि सती जाणे म्हणजे पतीच्या पाठोपाठ मरण पत्करणे असा अर्थ मिळाला. त्याचं पुढे विकृतीकरण झालं आणि सतीची अमानुष चाल सुरु झाली ज्याच्या निर्मूलनार्थ राजा राममोहन राॅय यांनी प्रयत्न केले आणि १८२९ मध्ये तत्कालीन कंपनी सरकारने सतीवर बंदी आणली पण नंतरही सतीप्रथा चालू होती. अगदी ज्यूल्स व्हर्नच्या अराऊंड द वर्ल्ड इन एटी डेज मध्ये सतीचा उल्लेख आहे. पण हे विकृतीकरण झाल्यानंतरचा तो संदर्भ आहे. ज्ञानेश्वरांनी सती हा शब्द गुणी (तत्कालीन मापकांनुसार) या अर्थाने वापरला आहे असं मला वाटतं.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 09/28/2015 - 19:29 नवीन
यादवकाळात सतीप्रथा अस्तित्वात होती. ह्याचे पुरावेही सतीशिळांचे रुपाने आजही आपणास दिसतात. ज्ञानेश्वरांनी सतीच्या रूढार्थानेच हा शब्द वापरलाय ह्यात मला तरी शंका नाही. अर्थात ही प्रथा तत्कालीन समाजरचनेचा एक भाग होती आणि साहित्यावर वर्तमानाचा प्रभाव असतोच त्यामुळेच ज्ञानेश्वरीत ह्या संदर्भाने काही उल्लेख येणे हयात काहीही वावगे नाही मात्र ते उल्लेख आहेत म्हणून ज्ञानेश्वरांच्या नावे गळे काढणे म्हणजे साप साप म्हणून भुई धोपटण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
प
पैसा Mon, 09/28/2015 - 19:38 नवीन
वोखटे मरणाऎसें, तेंही आले अग्निप्रवेशें, परी प्राणेश्वरोद्देशें, न गणीची सती.
यावरून ते स्पष्ट आहे. पण तेव्हा तसे होते. तेव्हा ती प्रथा होती त्यासाठी ज्ञानेश्वरांना आता धोपटून काय होणार आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ब
बोका-ए-आझम Mon, 09/28/2015 - 19:49 नवीन
सतीची चाल होती हे मी नाकारत नाहीच आहे पण ज्ञानेश्वरांनी हा अर्थ घेतला असेल असं मला वाटत नाही. सर्व प्राणिमात्रांविषयी कळवळा असणा-या ज्ञानेश्वरांना सतीप्रथा अमानुष वाटली नसेल? आणि ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी दृष्टांत वापरलेले आहेत. हे सतीचे उल्लेख दृष्टांत म्हणूनही बघू शकतो आपण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 09/28/2015 - 19:58 नवीन
इथे सती म्हणजे नवर्‍याच्या चितेवर जाळून घेणारी स्त्री हा अर्थ आहे, पण ज्ञानोबा माऊली त्या जाळून घेण्याचे उदात्तीकरण करत नाहीयेत. "मरणासारखी वाईट गोष्ट, तीही अग्निप्रवेश करून येणारी, पण ज्या स्त्रीला प्राणेश्वराचा ध्यास आहे ती ती वाईट गोष्ट मोजतच नाही" असा अर्थ आहे. ते त्या ध्यासाबद्दल, निर्धाराबद्दल बोलत आहेत. "सती जाणे कसे चांगले" असे कुठे म्हटलेच नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा