Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अराजक

ड
डॉ. सुधीर राजाराम देवरे
Tue, 10/27/2015 - 13:20
🗣 98 प्रतिसाद
अराजक - डॉ. सुधीर रा. देवरे केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या साहित्य अकादमीसह इतर संस्थांचे पुरस्कार परत करणार्‍या साहित्यिकांची- विचारवंतांची संख्या देशभरात वीस पर्यंत पोचली आहे. (महाराष्ट्रातल्या काही साहित्यिकांनीही महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार परत केले.) आणीबाणी नंतर आजची राजकीय स्थिती ही सर्वात जास्त अराजकतेकडे चालली आहे काय? कोणाला ढळढळीत अराजकता अजूनही दिसून येत नसेल तर फक्‍त एका वर्षात छुपी अराजकता नक्कीच सुरू झाली आहे. डॉ. यू. आर. अनंतमूर्ती... बोलल्याप्रमाणे केवळ देशच नव्हे, तर आख्‍खं जग सोडून निघून गेले! खरंच हे जग आज इतके वाईट आहे का? पण साहित्यिकांच्या या कृतीने सरकारवर अजून तरी साधा ओरखडाही उमटलेला दिसत नाही. राजकारणी लोकांमध्ये आता साहित्यिक- विचारवंतांचा आदर राहिला नाही. आजच्या राजकारणात सुसंस्कृतपणा दिसून येत नाही. एम. एस. कलबुर्गी, गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोळकर या तीन विचारवंतांचा खून. या हत्त्यांमागील लोक कोण हे शोधणे फार दूरचे काम असे आपण समजून चाललो तरी ज्या मारेकर्‍यांनी त्यांना रस्त्यात गाठून हत्त्या केली ते भाडोत्री मारेकरी सुध्दा हाती लागू नयेत हे आकलनापलिकडे आहे. एखादा संशयीत मारेकरी पोलिसांच्या हाती लागला तर तो कसा निष्पाप आहे हे न्यायाधिशांच्या आधी मंत्रीमहोदय सांगतात. कोणी काय खावे हे दुसरा कोणी कसा ठरवू शकतो? कोणी कोणते कपडे घालावेत त्यावरून मतभेद. कोणाचे घर कोणत्या वस्तीत असावे हे तो तो कळप ठरवणार? मोहम्मद अखलाख दादरी हत्याकांडाने आक्खा देश हादरला. थरकाप उडवणारी आणि झोप उडवणारीही हिंसक घटना आहे ही. आपण मध्ययुगीन आदिम काळात जगतो आहोत की काय असा भास व्हायला लागला. आपापल्या जातीधर्माच्या कळपात राहून आपण आपले आदिम हिंसक टोळ्यांमध्ये रूपांतर करू पहात आहोत? गुजरातमध्ये मुस्लीम युवकांना गरबा नृत्य परिसरात येण्यावर बंदी घालण्यात आली. देशभरात विविध संघटनांकडून असे अनेक छोटेमोठे स्थानिक फतवे निघताहेत. हा कोणत्या प्रकारचा जमातवाद आहे. यापुढे कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणे हे देशाच्या दृष्टीने हानीकारक ठरणार आहे का? आपण या देशाच्या विकासासाठीच नक्की सरकार निवडून दिलंय का? हा कोणत्या प्रकारचा विकास आहे? विकासाच्या आरोळ्या मारताना देशातल्या शंभरावर असलेल्या विविध नावांच्या संघटना सुप्तावस्तेत होत्या. सत्ता मिळताच त्या आपल्या खरे रूप दाखवायला लागल्या. रस्त्यांवर नंगानाच होऊ लागला. मत विभाजन होण्यासाठी एखादा नाटकी विरोधकही तसा खमक्या हवा म्हणजे आपला अजेंडा ठोसपणे राबवता येतो. आपल्या समूहावर विषारी टीका केली की आपल्यापासून थोडे दूर गेलेले लोक अजून आपल्या जवळ येतात या सिध्दांताने अगदी ठरवून एका राक्षसालाही जन्म देण्यात आला. तो जितके विषारी बोलेल तितका आपल्याला फायदा. इथे एक कळत नाही की एखाद्या नेत्यावर कोणी टीका केली तर त्या नेत्याच्या धर्माच्या लोकांचा अपमान कसा होऊ शकतो? इतके सारे होत असूनही सिंहासनावर आरूढ झालेली व्यक्‍ती काही बोलायला तयार नाही. तेव्हाचे मौनीबाबा परवडले. आता सोयीनुसार बोलले जाते आणि सोयीनुसार दुर्लक्ष केले जाते. प्रचारसभांमध्ये आणि इतर देशांच्या दौर्‍यांवर जे बोलू नये ते बोलले जाते. रेडीओवर मनातले सगळे सोयीस्कर सांगितले जाते. पण देशांतर्गत हिंसेवर तोंडावर बोट... गडीगुप्प. उत आलेले लोक याचा फायदा उठवत आपला कार्यभाग उरकवताहेत. महात्मा गांधींना संपवता येत नाही तर आता महात्मा गांधींचे नाव घ्यायचे आणि होता आले तर दुसरे महात्मा व्हायला काय हरकत आहे. मंदिरे बांधता बांधता पोटातल्या पोट आपलेही एखादे मंदिर का बांधू नये आता? दोन आक्टोबरला रस्त्यांची स्वच्‍छता करता करता मनातल्या जळमटांची स्वच्‍छता मात्र अजिबात करायची नाही! भारत पंधरा महिण्यांपूर्वी अस्तित्वात होता की नव्हता, माहीत नाही. कदाचित तो आताच घडवला गेला असेल ! चमकता येईल तिथे चमकायचे मग ते फेसबुक का असेना पण जग फिरताना आपल्याच देशाची निंदा करणे गरजेचे आहे का? काल एका चॅनलवर ऐकले: बिहार मध्ये मुस्लीम मते नितीश आघाडीकडे किती जातील आणि भाजपकडे किती. राजपूत आणि तेल्यांची मते कुठे जातील तेही सांगू... माझी जात ज्या कोणाला मते देईल त्यालाच मी माझे मत देईल का? एक जात एक धर्म सर्व मिळून एखाद्या पक्षाला मतदान करू शकतात का? अशा जातीयवादी सर्वे करणार्‍या चॅनल्सना कोर्टात खेचले पाहिजे. कोणतं न्यूज चॅनल नेमकं कोणाला विकलं गेलंय हे सहज कळतं आता! लोकशाहीचा तिसरा स्तंभ विकला गेला आहे का! सावधान! देशाच्या सवोच्च स्थानी असलेल्या नेत्यांची भाषा प्रचार सभांमध्ये पार रसातळाला गेली! आपला देश फक्‍त प्रचार सभांपुरताच आणि निवडून येण्यापुरताच उरला की काय? तसे नसते तर आज प्रचार करताना जातीय धर्मिय समिकरणे जिथक्या उथळपणे वापरली जातात तशी ती वापरली गेली नसती. भारतात अशी अराजकता येणार असेल तर देशाच्या नुकसानासाठी दुसर्‍या शत्रू देशाला काहीच करायची गरज नाही. आपण आपल्याच कृत्यांनी देशाची एकता पोखरून काढू. अथवा शत्रू राष्ट्राला हे निमंत्रण आहे! असे म्हणावे लागेल. आपण खरंच अराजकतेकडे जात आहोत का, याचा सजगपणे विचार करण्याची वेळ आली आहे. (या मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.) - डॉ. सुधीर रा. देवरे Email: sudhirdeore29@rediffmail.com इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: Dr sudhir Deore sudhirdeore29.blogspot.com
वर्गीकरण
लेख - ब्लॉग

प्रतिक्रिया द्या
16340 वाचन

💬 प्रतिसाद (98)
द
दत्ता जोशी Fri, 10/30/2015 - 10:44 नवीन
<<<<तुमचा पोटापाण्याचा धंदा बंद पडेल,>>>> च्छ्या!! फारच त्रास करून घेत बुवा... .. :=D :=D :=D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
आ
आकाश कंदील Fri, 10/30/2015 - 06:14 नवीन
तर्रात जोकर साहेब, काही लोक आपल्या व्यक्तिमत्वा प्रमाणे टोपण नवे वापरतात याची प्रचीती आली
  • Log in or register to post comments
द
दत्ता जोशी Fri, 10/30/2015 - 10:37 नवीन
सहमत. तेव्हढाच तर जमू शकतं ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आकाश कंदील
म
मार्मिक गोडसे Fri, 10/30/2015 - 08:43 नवीन
सिद्ध करा की मे २०१४ पासून कुठले भ्रष्टाचार झाले. त्यात किती पैश्यांचा अपहार झाला आणी त्यात कोण कोण गुंतले आहेत.
एक वेळ तो भष्टाचार परवडला. परंतू सरकार प्रायोजीत कृत्रिम महागाई ही अधीक भयानक. डाळ व कांद्याच्या साठेबाजीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने जनतेच्या खिशातून करोडोचा पैसा व्यापार्‍यांनी लूटला. साखरेचे विक्रमी उत्पादन व मागील वर्षाच साठा शिल्लक असल्यामुळे साखरेचे भाव गडगडले. सरकारने साखरेचा निर्यात कोटा वाढवण्याचा निर्णय घेतल्याबरोबर फक्त ३ दिवसात साखरेचे घरगुती भाव ६- ८ रुपयांनी वाढले. साखरेचा निर्यात भाव २५ ठेवूनही आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी नसल्यामुळे साखरेची निर्यात वाढली नाही. अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांकडून पडेल भावात व्यापार्‍यांनी प्रचंड प्रमाणात साखर खरेदी केली. अनुदान दिल्याशिवाय साखरेची निर्यात वाढणार नाही, साखर निर्यात केल्याशिवाय कारखाने शेतकर्‍यांची ऊस थकबाकी देऊ शकनार नाही, आणि बिहार राज्याच्या निवडणुका झाल्याशिवाय केन्द्र सरकार अनुदान देणार नाही. मधल्यामधे व्यापारी ह्या परिस्थितीचा फायदा उठवत आहे. कांदे,डाळ व साखरेचे खरे लाभार्थी शोधून काढने महाकठीण. कदाचीत २ जी पेक्षाही हा घोटाळा मोठा असू शकेल. निदान २ गी घोटाळ्यामुळे जनतेचे प्रत्यक्ष नुकसान झाले नव्हते, परंतो ह्या कांदे,डा़ळ व सा़खरेच्या घोटाळ्यामुळे जनतेचे थेट आर्थिक नुकसान होत आहे. पुढेही होत राहील.सरकारला भ्रष्टाचार करायची गरजच उरली नाही.
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Fri, 10/30/2015 - 09:30 नवीन
साखरेचे विक्रमी उत्पादन व मागील वर्षाच साठा शिल्लक असल्यामुळे साखरेचे भाव गडगडले.
याला सध्याचे सरकारच कसे जबाबदार आहे? साखर कारखाने काढायला परवानगी देणार्‍यांबद्दल काय?
साखरेचा निर्यात भाव २५ ठेवूनही आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी नसल्यामुळे साखरेची निर्यात वाढली नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारातली मागणी सरकार कसे ठरवू शकेल?
अनुदान दिल्याशिवाय साखरेची निर्यात वाढणार नाही
ऑलरेडी ४००० रुपये प्रतिटन सबसिडी दिली जाते आहेच. पण अनुदान दिल्याशिवाय निर्यात वाढणार नाही हे कसे? तेवढा एकच मार्ग आहे काय? भाव पाडून तर सगळेच देश बसलेत. जर अनुदान वाढवत नेले तर त्याचा फायदा फक्त आणि फक्त कारखान्यांना होईल. मग परत सामान्य माणसाला काय मिळणार? कारखाने काय चॅरिटीसाठी बसलेत का? तसे असेल तर आजवर त्यांनी १५-२० रुपये किलोने साखर (अंदाजे ब्रेक इव्हन भावास) का नाही उपलब्ध केली? यापूर्वी ५०-६० रु. किलो भाव उपलब्ध असताना प्रॉफिट केलाच असेल. तो कुठे गेला? त्यातून ऊस उत्पादकाला पैसे देता आले नसते का?
साखर निर्यात केल्याशिवाय कारखाने शेतकर्‍यांची ऊस थकबाकी देऊ शकनार नाही
प्रच्चंड हास्यास्पद वाक्य! कॉस्ट कंट्रोल मेकॅनिजम्स मोडीत काढून भरमसाट खर्च जो केला तो टाळूनही साखर कारखान्यांकडे तरलता असू शकते. साखरेचे अर्थकारण तुम्हास खरेच माहित आहे काय?
मधल्यामधे व्यापारी ह्या परिस्थितीचा फायदा उठवत आहे.
हे गेल्या सरकारांच्या काळातही चालतच होते. तुम्ही उद्यापासून ३ दिवसात एखाद्या शेअरची किंमत ६-८ रुपयांनी वाढल्यानंतर प्रॉफिट बुक करणार नाही काय? बाकी डाळींच्या बाबतीत धाडी पडल्यावर यापूर्वी व्यापारी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन रडल्याचे वाचले नव्हते. पहिल्यांदाच ही स्थिती बघतोय. शिवाय स्ट्रॅटेजी अंमलात आणल्यापासून ४ दिवसात निदान भाव पडल्याचेही वाचले. (स्वतः खरेदीस रोज बाहेर पडावे न लागल्याने आजचा ताजा भाव माहित नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ग
गॅरी ट्रुमन Fri, 10/30/2015 - 13:52 नवीन
अन्या, अरे ज्या गोष्टींसाठी देवाला दोष देता येत नाही त्या गोष्टींसाठी मोदींना दोष दिला जातो हे माहित नाही का रे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
ट
ट्रेड मार्क Fri, 10/30/2015 - 13:25 नवीन
प्रश्न भ्रष्टाचाराचा विचारला तर त्याला उत्तर डाळ आणी साखरेची वाढलेली किंमत! साठेबाजी कडे कोणी दुर्लक्ष केले तर फक्त मोदींनी, अंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला उठाव नाही त्याला जबाबदार मोदी, कुठल्याही शहरात, गावात काही चुकीचं घडलं तर जबाबदार फक्त मोदी. तसं तर काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या मोठ्या साहेबांनी भविष्यवाणी केली की भाव वाढायचे, Openly सांगायचे की एप्रिल महिन्यात साखरेचे भाव रु. ३५ होतील कि बरोब्बर व्हायचं. तेव्हा पण तुम्हाला हा प्रश्न पडला होता का? साठेबाजीला एक ग्राहक म्हणून आपण काय करू शकतो याचा कोणी विचार केला आहे का? खूपच भाव वाढले आहेत तर नाही करायची खरेदी थोडे दिवस किंवा अगदी थोडी करायची, फारच आवश्यक असेल तर थोडे शहराबाहेर जाउन परस्पर शेतकऱ्याकडून खरेदी करता येतेय का बघावं. तुम्हाला आणी इथल्या इतरांना अजून काही उपाय सुचतात का बघा. फक्त सरकारवर आरोप ठेवणे हे काही उत्तर होवू शकत नाही. आणी हो, ह्या व्यापार्यांकडून पुढे पैसे कसे मोदींपर्यंत पोचतात, किती रुपयांचा घोटाळा आहे हा ते पण सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
व
विनोद१८ Sun, 11/01/2015 - 11:00 नवीन
......तुमच्या म्हणण्यात जर तथ्य असेल तर ह्या विषयात खोलात जाउन 'माहितीच्या अधिकाराखाली' त्याची अधिक माहिती घेउन कोणी सरकारला कोर्टात का नाही खेचत ?? आपल्या देशात असे अनेक जण आहेत जे अशी कामे अगदी मनोभावे करतात. विरोधी पक्षाचे काय काम आहे, ते काय करताहेत ?? त्यांच्यासाठी तर हे आयतेच कोलीत आहे. विकावू मिडीया का गप्प बसलाय त्यांच्यासाठी बराच काळ चघळायला चांगला व अतिशय आवडता विषय आहे हा. का नाही यापैकी कोणी मनावर घेउन काही कारवाइ या भ्रष्टाचारी मोदीसरकारविरूद्ध करीत ?? जर तुमच्या मुद्द्यात तथ्य असेल तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Sun, 11/01/2015 - 13:11 नवीन
तुमच्या म्हणण्यात जर तथ्य असेल तर ह्या विषयात खोलात जाउन 'माहितीच्या अधिकाराखाली' त्याची अधिक माहिती घेउन कोणी सरकारला कोर्टात का नाही खेचत ??
कोणत्या मुद्द्याबद्दल तुम्हाला शंका वाटतेय आणि माहितीच्या अधिकाराखाली सरकारकडून काय माहीती अपेक्षीत आहे तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोद१८
म
मार्मिक गोडसे Sat, 11/07/2015 - 14:28 नवीन
बिहार विधानसभा निवडणुका संपल्याबरोबर केंद्र सरकारने जनतेला दिवाळीची 'भेट' दिली. आता साखरेच्या वाढीव अनुदानाच्या घोषणेची वाट बघतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
श
श्रीगुरुजी Sat, 11/07/2015 - 15:38 नवीन
बिहार विधानसभा निवडणुका संपल्याबरोबर पुरस्कार वापसीची नौटंकी देखील बंद झालेली दिसतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Fri, 10/30/2015 - 11:21 नवीन
ऑलरेडी ४००० रुपये प्रतिटन सबसिडी दिली जाते आहेच. पण अनुदान दिल्याशिवाय निर्यात वाढणार नाही हे कसे?
नवीन अनुदान म्हणायचे होते. वर्तमान सरकारने जर येत्या काही दिवसात साखरेचे निर्यात अनुदान वाढवले तर तुम्ही त्याचे समर्थन कराल का?
हे गेल्या सरकारांच्या काळातही चालतच होते. तुम्ही उद्यापासून ३ दिवसात एखाद्या शेअरची किंमत ६-८ रुपयांनी वाढल्यानंतर प्रॉफिट बुक करणार नाही काय?
म्हणजे आजही व्यापारी फायदा उठवत आहेत हे तुम्हाला मान्य आहे तर. शेअरच्या किमती कमी जास्त होण्यामागे अनेक कारणे असतात, मागणी आणि पुरवठा हे एक कारण असू शकते जे साखरेलाही लागू होते. परंतू यंदा भारतात साखरेचा पुरवठा जास्त व मागणी कमी असे असताना फक्त साखर निर्यातीची घोषणा केल्याबरोबर साखरेचे भाव अचानक ३ दिवसात ६-८ रुपयांनी कसे वाढले?
बाकी डाळींच्या बाबतीत धाडी पडल्यावर यापूर्वी व्यापारी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन रडल्याचे वाचले नव्हते. पहिल्यांदाच ही स्थिती बघतोय. शिवाय स्ट्रॅटेजी अंमलात आणल्यापासून ४ दिवसात निदान भाव पडल्याचेही वाचले. (स्वतः खरेदीस रोज बाहेर पडावे न लागल्याने आजचा ताजा भाव माहित नाही)
तू रडल्यासारखे कर मी मारल्यासारखे करतो असला प्रकार आहे हा तुम्ही इतके हळवे होउ नका.. डाळींचे भाव २५ ट्क्क्यावरून १०० ते १५० टक्क्यापर्यंत वाढेपर्यंत सरकार झोपले होते का? भाव पडल्याचे वाचले ना मग प्रत्यक्ष खात्री करून या की किती ने भाव कमी झाले ते आणि आम्हालाही सांगा.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Fri, 10/30/2015 - 13:50 नवीन
निर्यात न करता ती साखर तशीच पडून ठेवायला पाहिजे होती का? मग शेतकऱ्यांचे उसाचे पैसे कसे दिले असते? घोटाळे तर शेअर मार्केट पासून ते आपल्या स्थानिक मार्केट पर्यंत सगळीकडेच होत आहेत. उपाय सांगा काही असेल तर. मुख्य प्रश्न आहे आपली मानसिकता बदलायचा. सर्वसामान्य माणूस (यात व्यापारी, सेवा देणारे, ग्राहक ई सगळेच आले) किती प्रामाणिकपणे रोजच्या आयुष्यात वागतो? संधी मिळाली तर किती लोक जास्त पैसे मिळवण्यासाठी त्या मार्गाला जातील अथवा जाणार नाहीत? बाकी देशभक्ती, देशासाठी त्याग वगैरे गोष्टी बाजूला ठेवल्या तरी वैयक्तिक आचरण किती लोकांचे चांगले आहे? समोर १००० ची नोट पडलेली दिसली किंवा iPhone सापडला तर किती लोक स्वतःजवळ ठेवणार नाहीत? चित्र आत्तातरी असं दिसतंय की बहुतांशी सगळेच ओरबाडायला बसलेत. थोडक्यात सांगयचं म्हणजे Civic Sense ची कमतरता आहे आपल्या कडे. महत्वाचे - यातील कुठलेही वाक्य तुमच्यावर अथवा येथील कोणावरच वैयक्तिक आरोप करण्याकरता केलेले नाहीये. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
अ
असंका Fri, 10/30/2015 - 14:37 नवीन
महत्वाचे - यातील कुठलेही वाक्य तुमच्यावर अथवा येथील कोणावरच वैयक्तिक आरोप करण्याकरता केलेले नाहीये. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावे.
ही आज्ञा की सुचना की सल्ला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Fri, 10/30/2015 - 15:06 नवीन
आज्ञा किंवा सल्ला मी कोण देणारा? उगाच घुसमट, गळचेपी, व्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला वगैरे चालू होईल. बाकी समजण्याएवढे सगळेच सुज्ञ आहेत असं मला वाटतंय. (हे विधान कोणीही वैयक्तिक घेवू नये अशी विनंती).
  • Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा Fri, 10/30/2015 - 15:38 नवीन
उगाच घुसमट, गळचेपी, व्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला वगैरे चालू होईल.
अहो मग बरंय की मग.. असं झालं की मिपादेशी डु-आयडी परत करतेत म्हणे.. हितेसभौ (सध्या मोगा) नी त्यांचे नुकतेच काही डु-आयडी परत केले म्हणे (त्यांचा कुठला डु आणि कुठला आयडी कै म्हैत नै) .. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
आ
आनंदी गोपाळ Fri, 10/30/2015 - 17:19 नवीन
एकंदर धागा वाचल्यानंतर भाजपाने काहीही केले तरी त्याचे समर्थन करण्यासाठी नेमणूक केलेला सायबर सेल मजबूत जोरात सुरू आहे, हेच समजले. बाकी छाने.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Fri, 10/30/2015 - 18:24 नवीन
धागाकार्त्याची नेमणूक भारताच्या निर्वाचित सरकारच्या विरोधात बोलण्यासाठी/ लिहिण्यासाठी कोणी केली आहे ते पण सांगा. तसेच बाकी विरोधी गटातील पण कोणाची आणी कोणी नेमणूक केली आहे तेही सांगा. फक्त भाजपाच्या बाजूने कोणी बोललं की का असं वाटतं की मोदींनी किंवा भाजपानी काहीतरी मोबदला देवून नेमणूक केली आहे? सगळी गोची इथेच आहे, की फक्त एका गटाला नावं ठेवायची. तीच गोष्ट दुसऱ्या गटांनी केली तर काही बोलायचे नाही किंवा कदाचित समर्थन पण करायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
र
रमेश आठवले Fri, 10/30/2015 - 21:25 नवीन
या सर्व बक्षिसे आणि अनुदाने परत करणार्या तथाकथित पुरोगामी ,सेक्युलर आणि साहित्यक लोकाना अचानक दिल्लीतील भा ज पा सरकार आणि मोदी यांच्यामुळे अराजक माजले आहे आणि सहिष्णुता नाहीशी झाल्याचा भास झाला आहे . असे वाटण्याची जी मुख्य कारण सांगितली जातात त्यांचे तथ्य आणि वास्तव हे जाणले पाहिजे . १. दाभोळकर यांचा खून ऑगस्ट २०१३ मध्ये झला. त्या नंतर १४ महिने महाराष्ट्रात कॉंग्रेस चे सरकार होते. या लोकांनी या खुनाचा उलगडा कॉंग्रेस काळात झाला नसताना त्या विरुद्ध ब्र ही काढला नाही. २. कलबुर्गी यांचा खून कर्नाटकात कॉंग्रेस राजवट असताना झाला आहे परंतु तेथील कायदा व सुव्यवस्था या बाबत यांनी नाराजगी व्यक्त केली नाही . ३. पानसरे खुना नंतर महाराष्ट्र पोलिसांनी मुख्य आरोपी पकडला . पण तेथे भा ज पा चे सरकार असल्यानी या पुरोगामी लोकांनी त्याची दखल घेतली नाही. ४. दादरी हत्येला महिना उलटून गेला तरी अजून आरोप पत्र दाखल झाले नाहि. तेथे भा ज पा विरोधी सरकार असल्याने या गोष्टीकडे पुरोगामी मंडळी कानाडोळा करत आहेत. , तसेच तेथील कायदा व सुव्यवस्था हे केंद्र सरकाr अथवा मोदी यांच्या हातात नाही, या ढोबळ गोष्टीचा याना विसर पडला आहे . ५. हरयाणातील एका गावात दोन कुटुंबामधील जुन्या वैमनस्यामुळे दलित कुटुंबाच्या घराची जाळपोळ झाली. त्या साठी तेथील विद्यमान सरकार व दिल्लीतील सरकार जबाबदार असल्याचा हे गवगवा करतात. नुकत्याच आलेल्या न्याय वैद्यकीय अहवाला प्रमाणे घराचे दार बंद असताना घराच्या आत आग लागली असे आढळले आहे. असे असेल तर हा दलितांवर सवर्णांनी केलेला अत्याचार कसा ? तात्पर्य हे की ही सर्व मंडळी पूर्वग्रह दुषित आहेत. त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भा ज पा याना पहिल्या पासून विरोध होता आणि त्याना नरेंद्र मोदी यांच्या बद्दल खास आकस आहे. नेमके तेच सत्तेवर आल्याने यांची बेचैनी वाढली आहे. त्यांना गेल्या दीड वर्षात केलेल्या स्वछ आणि भरीव कामाची चाड नाही, जनमानसाची कदर नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयांचा आदर नाही . मोदींच्या विरुद्ध त्याना आजतरी पुरेसा दारुगोळा मिळालेला नहॆ. त्यांचा हा अभियानाचा फुगा लवकरच आणखी वर जावून विरेल किंवा खाली येउन फुटेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
भ
भंकस बाबा Sat, 10/31/2015 - 05:21 नवीन
कलबर्गीणी काय लिहिले होते हे सामान्य माणसाला सागिन्तलेच जात नाही. वरील पुरस्कार परत करणाऱ्यानी हिरव्या , पांढऱ्या ,निळ्या रंगाबद्दल आक्षेपार्ह लिहून दाखवावे. मग जी आग लागेल तेव्हा पुरस्कार परत करावेत. कलबुरगीच्या कमेंट्स अजुन सामान्य माणसाला माहितच नाहीत . जेव्हा कळतील तेव्हा मग उत्तर द्यावित्. हिन्दू सहिष्णु आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या डोक्यावर मुतनार काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
ब
बोका-ए-आझम Sat, 10/31/2015 - 16:26 नवीन
आणि समजा केली असेल नेमणूक, तर त्यात चुकीचं असं काय आहे? भाजपा हा एक अधिकृतरित्या नोंदवला गेलेला राजकीय पक्ष आहे. त्याच्यासाठी किंवा इतर कोणत्याही पक्षासाठी काम करणं आणि त्याचा उचित मोबदला घेणं यात चुकीचं काय आहे? भाजपविरोधक विरोधाने एवढेे आंधळ झालेले आहेत की त्यांना भाजपशी संबंधित असणारे कोणीही हे शत्रूच वाटताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Fri, 10/30/2015 - 19:59 नवीन
ज्या सगळ्या घटनांबद्दल एवढा गोंधळ चालू आहे, असहिष्णू वातावरण आहे असं म्हणताहेत, सरकारविरोधात जालावर अथवा वर्तमान पत्रात लिहिण्याची, पुरस्कार परत करण्याची स्पर्धा चालू आहे त्याची सत्यासत्यता तरी बघू - दाभोलकरांची हत्या August 20, 2013 रोजी झाली. केंद्रात आणी राज्यात काँग्रेसचे सरकार होतं. पण या हत्येबद्दल जबाबदार भाजपा आणी मोदी सरकार? गोविंद पानसरे हत्या दिनांक February 20, 2015 कोल्हापूर मध्ये झाली. शिवाजी महाराजांवरील पुस्तक आणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे काम यामुळे कट्टर हिंदुत्ववादी गट जसे सनातन संस्था ई च्या टार्गेट वर होते. या एकाच प्रसंगी भाजपा सरकार केंद्र आणी राज्य दोन्ही कडे होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे यांचे हत्यारे सापडले आहेत. कलबुर्गींची हत्या August 30, 2015 रोजी धारवाड,कर्नाटक मध्ये झाली. स्वतः जातीने लिंगायत असून त्यांनी बसव (बसवेश्वर?) या लिंगायत लोकांतील पूजनीय तत्ववेत्ता, लेखक/कवी यांच्याबद्दल अपमानास्पद विधाने केली होती. ज्यावरून लिंगायत लोकांनी त्यांना विरोध केला होता. त्यानंतर हिंदू लोकांच्या मूर्तीला पूजण्यावरून पण वादग्रस्त विधाने केली होती, ज्यावर त्यांच्या विरोधात एक केस चालू होती. ज्या व्यक्तीविरोधात त्याच्याच जातीतील लोकं होती आणी ज्या लोकांच (लिंगायत) कर्नाटक राज्य सरकार मध्ये बरंच वजन आहे आणी जिथे राज्य सरकार काँग्रेसचं आहे, त्या व्यक्तीची हत्या झाली तरी भाजप आणी मोदी जबाबदार? यांची हत्या करण्यातला मुख्य आरोपीचे शव सापडले असं म्हणत आहेत. परंतु त्याआधी ६ कन्नड साहित्यकांनी आरोपींच्या अटकेला मुद्दाम उशीर केला जातो आहे असा आरोप करून आपले पुरस्कार परत केले आहेत. चर्च वरील हल्ल्याचे सत्य प.बंगालमध्ये नन वर झालेल्या अत्याचारात बांगलादेशी इसमास पकडण्यात आलं होतं. फरीदाबादमधील दलित हत्याकांडावर फोरेन्सिक तज्ञांचे म्हणणे आहे की आग आतूनच लागली आहे (म्हणजे बाहेरून कोणी लावलेली नाही), बातमी इथे पहा. गुरु ग्रंथसाहिब फाडण्यात आला होता त्यातील मुख्य आरोपीला बाप्तिस्मा देण्यात आला होता. म्हणजे त्याने धर्म बदलून ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. बाकी गोमांस खाण्यावर, कपडे घालण्यावर याच धाग्यात किंवा इतर काही धाग्यात बरीच चर्चा झाली आहे. एका हिंदू सोडून दुसर्या धर्माच्या व्यक्तीवर काही वाईट प्रसंग ओढवला तर तो हिंदू दहशतवादाचा बळी, पण हिंदू लोक किती का संख्येने बॉम्बस्फोटात, सशस्त्र हल्ल्यात मेले, हिंदू स्त्रियांवर बलात्कार झाले तर मात्र त्यांच्या कर्माची फळं. कारण हिंदू सोडून इतर धर्मीय कधीच अतिरेकी, दहशतवादी असूच शकत नाहीत. कारण त्यांना प्रेषितानीच सांगितलय ना! धर्म खतरेमे है म्हणालं कि काही पण करायला परवानगी आहे. बाकी देशाचा कायदा काही पण असो… धर्मानी सांगितलं म्हणजे कसला कायदा आणि कसलं काय! सगळ्या अशांततेला, अराजकतेला, असहीष्णुततेला कारणीभूत फक्त हिंदूच? फक्त मे २०१४ नंतरच हे सगळं चालू झालं का? त्या आधी सगळं अगदी आलबेल होतं? प्रत्येक मुद्द्यावर किमान logic ने आणी पुराव्याने उत्तरं दिली जावीत अशी अशा अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Sat, 10/31/2015 - 00:17 नवीन
मग तुमच्या सोसायटीतील काही लोक अथवा तुमचे काही मित्र, एकाच शहरात राहणारे नातेवाईक असे मिळून मार्केट यार्डातून घाऊक खरेदी करू शकता. आम्ही पुण्यात असताना धान्य आणि भाज्या घाऊक खरेदी करून मग वाटून घ्यायचो. फारसं अवघड नाही ते. माझा एक मित्र तर पुण्याजवळच्या गावांमध्ये जाउन एका शेतकऱ्याकडून वर्षभराचे तांदूळ घेवून यायचा. दूध सुद्धा एका भूगाव मधील गवळ्याकडून घ्यायचो, जो रोज सकाळी घरी आणून द्यायचा. थोडी शोधाशोध केली तर पर्याय सामोर येतात, आता एखाद्याला घरात बसून काही प्रयत्न न करता सगळं हवं असेल तर मग ज्या भावात मिळेल त्या भावात घ्यावं लागेल. सरकारनी कुठलं बोलबच्चन दिलं आणी त्यावर कसं काही झालं नाही ते सांगा. तसेच जे केलं ते अजून चांगल्या प्रकारे कसं करता आलं असतं ते ही जमल्यास सांगावं. बारामती ते दिल्ली कशी लिंक आहे त्याचा विदा द्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी
म
मार्मिक गोडसे Sat, 10/31/2015 - 07:40 नवीन
साठेबाजी कडे कोणी दुर्लक्ष केले तर फक्त मोदींनी, अंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला उठाव नाही त्याला जबाबदार मोदी
मोदींचे नाव माझ्या प्रतिसादात तुम्हाला कुठे आढळले? केन्द्रात भाजप पक्षाचे सरकार आहे, मोदींचे नव्हे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला उठाव नाही त्याला वर्तमान सरकार जबाबदार आहे असे मी म्हणलेले नाही. उलट साखरेचा निर्यात भाव २५ ठेवूनही आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी नसल्यामुळे साखरेची निर्यात वाढली नाही असे लिहीले आहे.
Openly सांगायचे की एप्रिल महिन्यात साखरेचे भाव रु. ३५ होतील कि बरोब्बर व्हायचं. तेव्हा पण तुम्हाला हा प्रश्न पडला होता का?
म्ह्णूनच त्यांना पाडले व ह्यांना खांद्यावर घेतले, हे तर आता कानात मुतायला लागले.
साठेबाजीला एक ग्राहक म्हणून आपण काय करू शकतो याचा कोणी विचार केला आहे का? खूपच भाव वाढले आहेत तर नाही करायची खरेदी थोडे दिवस किंवा अगदी थोडी करायची, फारच आवश्यक असेल तर थोडे शहराबाहेर जाउन परस्पर शेतकऱ्याकडून खरेदी करता येतेय का बघावं.
भयानक सल्ला व एकप्रकारे साठेबाजीचे समर्थन. साखरेची साठेबाजी झाली तर शहराबाहेरच्या कोणत्या शेतकर्‍याकडे साखर मिळेल? मुंबईच्या ग्राहकाने तूरडाळीसाठी लातूरच्या शेतकर्‍याकडे जावे असे आपले म्ह्णणे आहे का? मुख्य म्हणजे व्यावहारीक आहे का? आणि शेतमालाची साठेबाजी ही शेतकर्‍याकडील माल संपल्यावरच होते.
निर्यात न करता ती साखर तशीच पडून ठेवायला पाहिजे होती का? मग शेतकऱ्यांचे उसाचे पैसे कसे दिले असते?
नीट वाचा. "अनुदान दिल्याशिवाय साखरेची निर्यात वाढणार नाही, साखर निर्यात केल्याशिवाय कारखाने शेतकर्‍यांची ऊस थकबाकी देऊ शकणार नाही", हा माझा प्रतिसाद. मी निर्यातीला विरोध केलेला नाही हे स्पष्ट दिसतेय. माझा विरोध बिहारच्या निवडणूका संपेपर्यंत सरकारनी साखरेला वाढीव निर्यात अनुदान न देण्याला आहे. दुसरे म्हणजे सध्याच्या निर्यात अनुदानात आंतरराष्ट्रीय बाजारातील स्पर्धेमुळे आपल्या साखरेला उठाव नसताना फक्त साखरेचा निर्यात कोटा वाढवल्यामुळे जर आपल्याकडील बाजारात साखरेचे भाव अचानक ६-८ रू. वाढत असतील तर सरकार काय करत आहे? ह्या दरवाढीचा फायदा साखर कारखान्यांना होत असेल तर निर्यात कोटा वाढवण्याची गरजच नाही.
घोटाळे तर शेअर मार्केट पासून ते आपल्या स्थानिक मार्केट पर्यंत सगळीकडेच होत आहेत. उपाय सांगा काही असेल तर.
बरोबर आहे.. मागील सरकारच्या काळातही हे प्रकार होत होतेच. सध्याच्या सरकारकने तर ह्यावर आमच्याकडे जालिम इलाज आहे असा प्रचार केल्यामूळे जनतेने त्यावर विश्वास ठेवून त्यांना सत्तेवर आणले, आता लोकांकडून उपाय कशाला मागता?
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Sun, 11/01/2015 - 15:42 नवीन
मी ज्या गोष्टीची साठेबाजी होते त्या स्वस्तात कश्या मिळतील यावर मार्ग शोधायचा प्रयत्न करतोय. नेहमीप्रमाणे तुम्ही फक्त दुसरा कसा चुकीचा आहे हे सांगताय. तुम्ही सुचवा कि सर्वसंमत मार्ग. साठेबाजी साखरेची होती का? साठेबाजी वरचा प्रतिसाद तुम्ही साखरेसाठी वापरलात. तसेच बाकी पण प्रतिसादातील काही ठराविक वाक्य घेवून आपल्या पाहिजे तसा अर्थ काढलात. मी कुठे साठेबाजीचे समर्थन केलंय? मुख्य प्रश्न विचारला त्याचं उत्तर मात्र टाळलंत. या व्यापार्यांकडून/ साठेबाजांकडून पैसा सरकारला कसा मिळतो ते सांगा. रच्याकने: ज्या प्रतिसादावर उत्तर देताय त्याच्या खाली तुमचा प्रतिसाद द्या हो. उगाच शोधाशोध करायला लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 10/31/2015 - 07:44 नवीन
पुरस्कार परत करणार्‍यांनी पुरस्काराची रक्कम राज्य सरकारच्या कोट्यामधुन मिलालेली घरं वगैरे परत केल्याचं ऐकिवात नाही. ते करुन दाखवलं तर खरं.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Sat, 10/31/2015 - 11:19 नवीन
दादुस्ला काय रस्त्यावं आननार काय तुमी लोका आं ? घरा परत करा म्हने. घराबिराचा बोलाचा नाय !!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
न
नाखु Sat, 10/31/2015 - 11:34 नवीन
ज्याची आता किंमत नाय तेच वापस करणार घर वापसी कराची बोली नव्हती काय? घरा आम्ही पोरा बाळाम्साठी ठिवणार आणि फक्त पुरस्कार वापस करणार . हा पैश्याचं विचारू नको रे बाबा.
रच्याकाने माझ्या भागात एक पाण्याची पाईपलाईन फुटली आहे आणि एक गटार तुंबले आहे त्याला मी कुणाला जो जिम्मेदार धरू, नगरसेवक की आमदार की फडणवीस का थेट नरेंद्र मोदी का जागतीक आरोग्य संघटना का आणखी कुणी (इथल्या थोर विचारवंतानी प्रकाश विजेरी झोत टाकावा) आणी हो माझ्याकडे एकही पुरस्कार नाही परत द्यायला मग मी काय करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
ग
गॅरी ट्रुमन Sat, 10/31/2015 - 11:47 नवीन
रच्याकाने माझ्या भागात एक पाण्याची पाईपलाईन फुटली आहे आणि एक गटार तुंबले आहे त्याला मी कुणाला जो जिम्मेदार धरू, नगरसेवक की आमदार की फडणवीस का थेट नरेंद्र मोदी का जागतीक आरोग्य संघटना का आणखी कुणी
एवढा सोपा प्रश्न तुम्हाला पडूच कसा शकतो? अर्थातच मोदींना जबाबदार धरायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
इ
इरसाल Mon, 11/02/2015 - 11:11 नवीन
सगल्यान पयल्यांदा तुमी सोताला एक घर-गुती पुर्स्कार देवुनशिनी टाका. (भले तो पुर्स्कार, पत्नीला भाजी चिराला मदत केली, कपडे सुकाला टाकाला मदत केली, दुद आणुनशिनी दिला, पोरा अब्यास नवती करत पोकल बांबुचे फटके दिले असा अस्ला तरी चालल, कं बोल्ता ?) मंग दुसरे छुट पयपलाइन आनी गटरीसाटी मोदीन्ला जिम्मेवार धरुनशिनी सोताला दिलेला पुर्स्कार परत द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ब
बोका-ए-आझम Sat, 10/31/2015 - 11:39 नवीन
अहो ती घरं किमान दोन बीएचके आणि हिरानंदानी किंवा एम आय जी काॅलनी वगैरे ठिकाणी असतात (मुंबईत या दोन ठिकाणी १०% कोटावाल्यांची घरं आहेत.) ती कोण परत करेल? तो विनोद ऐकला असेल तुम्ही - एक मुलगा घरांवर दगड मारत असतो. एक बाई त्याच्या आईकडे तक्रार करते, तेव्हा आई म्हणते - जाऊ दे हो. तो थोडा वेडा आहे. तेव्हा ती बाई म्हणते - मग तो आपल्या स्वतःच्या घरावर का नाही मारत दगड? तेव्हा आई म्हणते - एवढा वेडा नाहीये तो! हे सगळे स्वयंघोषित निर्भीड विचारस्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते आताच जागे होणार. रच्याकने अमर्त्य सेनना भारतरत्न पण भाजपच्या सरकारनेच दिलं होतं. अजूनपर्यंत ते कसं नाही परत केलेलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
अ
असंका Sat, 10/31/2015 - 12:56 नवीन
भारतरत्न परत करणं हा गमतीचा विषय होउ शकत नाही. जेव्हा ते होइल तेव्हा अराजक आले असं म्हणायला खरंच हरकत नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
न
नाना स्कॉच Sat, 10/31/2015 - 12:38 नवीन
समस्तजनहो, पॉलिटिकल alligence हा राष्ट्रनिर्मिती प्रथम डोळ्यासमोर अंगी बाणवायचा असतो, त्याला तोल लागतो मेंदूत, किती कठीण आहे हे विधान समजणे ? मला मोदींचे काही निर्णय आवडतात काही आवडत नाहीत, मोदी हे सद्धया बेस्ट अवेलेबल ऑप्शन आहे पण शेवटी एक ऑप्शनच आहे बाबांनो लोकशाही मधे ऑप्शन ला मेसायापद दिले की अधोगती होतेच हे आपण इंदिरा अन जवाहर उदाहरण समोर असताना ही शिकणार नाही आहोत का? मोदींचे समर्थन म्हणजे काय? हाताची पाचही बोटे लांब करावी का? ते नैसर्गिक असेल का? विचार करा , मोदींचे काही निर्णय काही वर्तन मला आवडते म्हणून मी भक्त होत नाही अन काही निर्णय न आवडल्या मुळे मी विरोधक ही होत नाही बघा काय मत पड़ते आहे अन या बारमधे आमच्या राष्ट्रिय एकात्मता उरलेली ती बहुतेक एकच जागा आजकाल उरली आहे अलग-अलग पथ बतलाते सब पर मैं यह बतलाता हूँ 'राह पकड़ तू एक चला चल, पा जाएगा मधुशाला।। पिऊन ही बौद्धिक तोल न जाऊ देणारा नाना
  • Log in or register to post comments
य
याॅर्कर Sun, 11/01/2015 - 11:47 नवीन
पेशल हं
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 11/01/2015 - 16:23 नवीन
पुरस्कार परत करणाऱ्यांत सगळ्यात आचरट वल्ली गणेश देवी आहेत. या महाशयांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला, पण पद्म पुरस्कार परत केला नाही. ये हुई ना बात! -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sun, 11/01/2015 - 16:31 नवीन
पुरस्कार परत करणाऱ्यांत सगळ्यात आचरट वल्ली गणेश देवी आहेत.
छ्या. असं कसं बोलता गामा पैलवान? गणेश देवी म्हणजे चालतेबोलते विद्यापीठच हे माहित नाही का तुम्हाला? फक्त कुठले विद्यापीठ हे विचारू नका-- जगात हावर्ड, प्रिन्स्टन विद्यापीठे आहेत तसेच ज्ञानेश्वर विद्यापीठही आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
न
नाखु Mon, 11/02/2015 - 08:29 नवीन
हे पुरस्कार पात्र वर्तमान पत्र वाचत नाहीत काय? आजची आणी तात्काळ बातमी चर्चेस तयार पण कदाचीत नवी कारण सांगून (मोदींनीच बे भेटले पाहिजे प्र्त्येक गोष्टीची माफी मागीतली पाहिजे अगदी गुडघे टेकले पाहिजेत यासम बाल बुद्द्धी मागण्या करतील.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 11/02/2015 - 10:50 नवीन
या तथाकथित विचारवंतांचे विचार किती पूर्वग्रहदूषित आहेत हे खालील लेखात दिसते. http://www.loksatta.com/navvodattarinataka-news/article-about-satyashodhak-play-1156299/ अतुल पेठ्यांनी लिहिलेल्या या लेखातील खालील परिच्छेद पहा.
या कानाचे त्या कानाला कळणार नाही अशी यंत्रणा असल्याशिवाय आणि ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असे साटेलोटे असल्याखेरीज दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गीचा खून होऊ शकेल? या तिघांचा गुन्हा काय? तर ते मुख्यत्वे आताच्या काळात धर्मचिकित्सा करीत होते!!!
या तीनही खुनामागचा हेतू अजून स्पष्ट झालेला नाही. २ प्रकरणातील एकही आरोपी सापडलेला नाही तर एका प्रकरणातील संशयिताविरूद्ध फारसे सबळ पुरावे मिळाल्याचे दिसत नाही. तरीसुद्धा या तिघांचा खून त्यांनी केलेल्या धर्मचिकित्सेमुळे झाला हा निष्कर्ष पेठ्यांनी काढलेला आहे.
धर्मचिकित्सा करणाऱ्या सर्वच माणसांना त्यांच्या काळात त्रास सहन करावा लागला. पण आताच्या काळात? थेट गोळ्याच!!! अशा कृत्यांनी आजच्या काळातील खुन्यांना अपेक्षित असलेला धर्म वाढेल? चिकित्सेचा, अभ्यासाचा आणि विचारांचा अवकाश संकुचित करणारी ही माणसे धर्म वाढवतात की बुडवतात? खऱ्या धर्माची मूल्ये कोणती? सहिष्णुता, अहिंसा, करुणा, सहभाव, बंधुत्व, क्षमाशीलता आणि मानवता यांची जोपासना करणे म्हणजेच धर्म ना? आज जे स्वत:ला धर्माचे प्रवक्ते मानतात, ते यातील नेमके कुठले तत्त्व आचरणात आणतात? म्हणजे खरे धर्मप्रेमी कोण आणि खरे धर्मद्रोही कोण? दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी की खुनी?
इथेही तेच. त्या तिघांच्या खुन्यांनी त्यांना त्यांच्या धर्मचिकित्सेमुळेच मारले हे पेठ्यांचे ठाम मत आहे. जरी खुनी सापडले नसले, जरी खुनामागचे हेतू अजूनही स्पष्ट झाले नसले तरी पेठे आपल्या निष्कर्षावर ठाम आहेत.
जोतिबांबाबत महाराष्ट्रात घोषित आणि अघोषित ‘सेन्सॉरशिप’ कायम होती आणि आजही आहे. पण जोतिबा ठामपणे अभेद्य राहिले आहेत.
कसली घोषित आणि अघोषित सेन्सॉरशिप? जोतिबा फुल्यांचा गेली अनेक वर्षे सर्वत्र उदोउदो होत आहे, त्यांच्या साहित्यावर अनेकांनी पीएचडी केली आहे. त्यांच्या नावाचे विद्यापीठात अद्यासन आहे. त्यांच्या घराचे स्मारक झाले आहे. त्यांच्या नावाने पुरस्कार दिले जातात. सावित्रीबाई फुलेंचे नाव विद्यापीठाला दिले आहे. त्यांचे समग्र साहित्य सरकारने प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्यावर लिहिलेल्या नाटकाचे प्रयोग व्यवस्थित सुरू आहेत. मग कोठे आहे सेन्सॉरशिप? उगाच विनाकारण नसलेला बागुलबुवा निर्माण करणे हे असल्या विचारवंतांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. आतासुद्धा देशात आणिबाणीसदृश स्थिती आहे, विचारवंतांचा गळा आवळला आहे, मोदींवर टीका केलेली सहन होत नाही असे अनेक बिनबुडाचे आरोप सुरू आहेत.
अजून एक-पुण्यात फुलेवाडय़ाच्या शंभराव्या मराठी प्रयोगाला डॉ. भालचंद्र नेमाडे आले होते. त्यांनी या नाटकाचे कौतुक केले. (नुकतेच त्यांनाही धमकीचे पत्र आले आहे. गुन्हा काय? तर लोकांना विचार करायला भाग पाडणे!!!)
हे वाचून तर हसायला आहे. नेमाडे म्हणे लोकांना विचार करायला भाग पाडतात! आपल्याबद्दल हे असे वाचले तर नेमाडे सुद्धा खदाखदा हसतील. आव्हाड सुद्धा म्हणतो मला धमकीची पत्रे येतात. नेमाड्यांना कोण धमकीचे पत्र पाठविणार? त्याविरूद्ध त्यांनी पोलिसात तक्रार केली होती का?
दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी या विचारवंत समाजसेवकांचा निर्घृण खून झाला आहे. आपण वृत्तपत्रांत वाचतो की, या खुन्यांनी अशीच मोठी यादी केली आहे. याला खून म्हणण्यापेक्षा कत्तली म्हणावे का? चिकित्सक विचार करायला लावणाऱ्या आणि विचार करू पाहणाऱ्यांच्या ‘धर्माचे शुद्धीकरण’ या नावाखाली आता कत्तलीच होणार आहेत?
परत तेच आणि परत तेच तेच! खुन्यांनी अशी यादी केली असेल तर खुनी सापडले असे समजायचे का? अजून खुनी कोण हेच सापडलेले नाही, खुनाच्या हेतूबद्दल माहिती नाही, पकडलेल्या संशयिताविरूद्ध सबळ पुरावे नाहीत. परंतु कोण खुनी आहेत आणि खून का झाले याविषयी अतुल पेठ्यांची कोणत्याही पुराव्याविना ठाम मते आहेत. हा पूर्वग्रहदूषित विचार आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… Mon, 11/02/2015 - 13:43 नवीन
आपल्या सर्वांचे मनापासून अाभार. छान चर्चा झाली.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 11/02/2015 - 14:01 नवीन
संपले ना? अगदी निश्चित? छान झाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ. सुधीर राजाराम देवरे
ट
ट्रेड मार्क Mon, 11/02/2015 - 16:24 नवीन
असं इथे म्हणावं का? धागाकर्ते नुसता धागा टाकून साठमारी बघत (वाचत?) बसले. आणि सगळ्यात शेवटी नुसतं छान चर्चा झाली म्हणून समारोप? कुठल्याच मुद्द्यावर प्रतिवाद नाही किंवा त्यांचा मुद्दा पटवून दिला नाही. याचा निषेध म्हणून मी पण माझा पुरस्कार परत करणार (न मिळालेला कसा परत करावा बरं??) आहे. ह. घेणे…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ. सुधीर राजाराम देवरे
ट
ट्रेड मार्क Mon, 11/02/2015 - 16:32 नवीन
बिचारे माधवन नायर (पूर्वीचे इस्रो मुख्य) यांनी पुरस्कार परत देणाऱ्यांवर टीका केली. http://www.hindustantimes.com/india/return-of-awards-just-a-show-ex-isro-chief-madhavan-nair/story-NoMeylT6UocGF9tn6j0TGK.html पण सध्या फक्त पुरस्कार परत करणाऱ्यांना महत्व आहे बहुतेक.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 11/02/2015 - 16:40 नवीन
माधवन नायर नक्कीच संघवाले, जातीयवादी असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ड
डॉ. सुधीर राजा… Fri, 11/06/2015 - 13:12 नवीन
सर्वांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे Sun, 11/08/2015 - 00:39 नवीन
एक कुत्ता हमारे भाईसाहब की काफी खिदमत करता था, रोज़ सुबह वह घर आ जाता और भाईसाहब के तलवे चाटने लगता था, भाई साहब भी खुश हो कर उसे टुकड़े डाल देते थे, ये सिलसिला काफी दिनों तक चलता रहा, दोनों खुश थे, भाई साहब तलवे चटवा कर और कुत्ता टुकड़े पा कर, एक दिन भाई साहब ने अपने टूटे बैग से पट्टी काट कर कुत्ते को पहना दी, मैंने कहा अरे भाईसाहब ये क्या कर रहे हैं आवारा कुत्ता है, भाई साहब बोले देखो ये पट्टी अपने किसी मतलब की नहीं है और इसके गले में बाँध दी तो अब ये इसका पट्टा हो गया, बेशक इसकी कीमत हमारे लिए कुछ् भी नहीं बस एक नायलॉन का टुकड़ा है पर इस कुत्ते के लिए इसकी बहुत कीमत है, ये इस पट्टे को ले जा कर पूरी दुनिया को दिखायेगा और इतरायेगा कि आज से में आवारा नहीं रहा, और आ-जीवन मेरा वफादार भी बना रहेगा । भाईसाहब का ट्रान्सफर हो गया वो चले गए, कुत्ता बदस्तूर रोज़ सुबह आता रहा, मुझे तलवे चटवाना पसंद नहीं है सो मैं उसे अपने पैर नहीं चाटने देता, भाईसाहब के जाने के बाद उसे टुकड़े मिलने भी बंद हो गए । आज अचानक कुत्ता आया और अपना पट्टा वापस कर गया । नोट : इस कहानी को अवार्ड वापसी ं से जोड़ कर देखना घोर पाप की श्रेणी में आएगा ।
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Tue, 11/10/2015 - 16:06 नवीन
७-८ नोव्हेंबर नंतर देशांतर्गत परिस्थिती लगेच सुधारलेली दिसतेय. एकही पुरस्कार परत नाही झाला किंवा देश असहिष्णू झाला म्हणून कोणी आरडाओरडा नाही केला. चला २ दिवसात एकदम परिस्थिती बदलली याचं श्रेय कोणाला बरं द्यायचं? राहुल, केजरीवाल, नितीश, लालू का मेडिया?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 11/10/2015 - 16:53 नवीन
+१ (१) बिहार निवडणुकीचा प्रचार सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाला आणि लगेच ३० सप्टेंबरला दादरी प्रकरण घडले. (२) ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून देशात असहिष्णूतेचे वातावरण असल्याचा तथाकथित पुरोगाम्यांना साक्षात्कार झाला व पुरस्कार परत करण्याची मोहीम सुरू झाली. (३) १२ ऑक्टोबरपासून बिहारमध्ये मतदान सुरू झाले. (४) एकदम सर्वांनी पुरस्कार परत करण्याऐवजी रोज ३-४ जणांनी पुरस्कार परत करणे हा प्रकार ५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहिला. (५) सूझन अरूंधती रॉयने ५ नोव्हेंबरला पुरस्कार परत केला. त्यानंतर ही मोहीम थांबली. (६) ५ नोव्हेंबर हा बिहारमधील मतदानाचा शेवटचा दिवस होता. (७) ६ नोव्हेंबरपासून पुरस्कार परत करणे बंद झाले आहे कारण देशात ६ नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा सहिष्णुतेचे वातावरण सुरू झाले आहे. वरील घटनाक्रम हा निव्वळ योगायोग आहे. त्यामागे कोणतेही राजकारण नाही अशी माझी श्रद्धा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
र
रमेश आठवले Wed, 11/11/2015 - 03:21 नवीन
आता जंगल राज २ ची सुरुवात होणार असल्याने असहिष्णुता -असहिष्णुता असा गवगवा करण्याची आवश्यकता उरली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा