टीव्हीवरील मतिमंद कार्यक्रम - मुख्यत्वे मालिका - आणि त्यांचे बहुतेक सारे स्वत:ला विकलेले निव्वळ पोटार्थी पांढरपेशे लेखक(?)
टीव्हीवरील मतिमंद कार्यक्रम - मुख्यत्वे मालिका - आणि त्यांचे बहुतेक सारे स्वत:ला विकलेले निव्वळ पोटार्थी पांढरपेशे लेखक(?)
कोणाच्या व्यवसायाबद्दल एरवी बोलू नये असे वाटते. कारण ब-याचदा तो त्यांच्या पोटापाण्याचा मार्ग असू शकतो.
माझ्या मते या रेम्या डोक्याच्या सिरियल्स समाजाला मानसिकदृष्ट्या अधु करण्याचे काम करत आहेत; मराठी-हिंदी- बहुतेक सगळ्याच. समाजाला चांगला मार्ग दाखवणारे किंवा स्फुर्तिदायक असे विषय हाताळणा-या अगदी क्वचितच.
महिनोंमहिने वा वर्षानुवर्षे हे दळण दळत राहणे हे यामागचे मुख्य कारण आहे असे वाटते. चांगला विषय घेऊन मोजक्या वेळेत तो पूर्ण करणे असे असायला हवे. पण त्याऐवजी प्रेक्षकांना व्यसन लावण्याचे आणि निर्बुद्ध बनवण्याचे काम केले जाते या मतिमंद मालिकांमुळे.
तेव्हा टीआरपी हे तांत्रिक वा आर्थिक कारण असो की इतर काही, हे स्वत:ला विकलेले लेखकच या प्रकाराला जबाबदार आहेत यात शंका नाही.
एरवी कोणतेच काम कमी दर्जाचे नसते. पण हे पांढरपेशे लेखक (खरे तर लेखक म्हणायला हे नालायक - पाट्या टाकणा-या या जातीला समर्पक काहीतरी नवा शब्द हवा. उदा. पोभपाटालेखक - पोटभरूपाट्याटाकणारे लेखक).
मनोरंजनाच्या नावाखाली सतत दुस-याचा मत्सर, कटकारस्थाने, बटबटीतपणा, अतिसोशिकपणा, अचकटविचकट विनोद या गोष्टींचा मारा करत असतात. त्यांना खरोखरच लेखनाची आवड असती तर त्यांनी असे कचरा लेखन केले असते का? त्यामुळे असे विकले जाण्यास त्यांनाच जबाबदार धरायला हवे.
चांगले कार्यक्रम दिले तर कोणाला नको आहेत? टीव्ही पाहण्याशिवाय दुसरे काही करू शकत नाही वा करायची इच्छा नाही, अशा लोकांनी तो कार्यक्रम पाहिला काय आणि न पाहिला काय, काय फरक पडतो?
वर्तमानपत्रात जे विकते ते छापणा-यांना आपण माफ करतो का? अशांना पोटभरू पत्रकारच म्हणतो ना! क्रिकेटच्या मैदानात केवळ चॅनलला किंवा स्पर्धेच्या आयोजकांना सामना रंगतदार व्हायला हवा म्हणून नको त्या गोष्टी केल्या तर आपण त्या सहन करू का? (मॅच फिक्स्ड की काय हे कळायला सहसा मार्ग नसतो ही गोष्ट वेगळी). प्रत्येकाने आपले काम दर्जा राखून करणेच अपेक्षित असायला हवे ना? तेव्हा हे समाजात उजळ माथ्याने वावरणारे हे समाजद्रोही निव्वळ पोटभरूच आहेत आणि त्यांच्यातले काही जेव्हा उठसुट विविध पुरस्कार स्विकारायला जातात तेव्हा त्या पुरस्काराचे नावही पोटभरू आणि विकला गेलेल्यासाठीचा पुरस्कार असेच हवे.
टीआरपीच्या नावाखाली चॅनलला हवे ते द्यायला यांचे डोके तरी यांच्याकडेच असते ना!
व्यावसायिकता म्हणजे स्वत:ला असे विकणे असे तरी अपेक्षित नको.
कोणी म्हणेल, की दाखवतात ते न पाहण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहेच की. मात्र ते सोयीस्करपणे विसरतात की जे सुबुद्ध आहेत ते हे टाळू शकतील, किंबहुना पाहिले तरी विसरून जाऊ शकतील. मात्र येथे बहुसंख्य प्रेक्षक तेवढे सुबुद्ध नसतात. यात कोण किती श्रीमंत, किती शिकलेला किंवा अडाणी, कोणत्या समाजातला, हे अध्याहृत नाही. हा प्रत्येक माणसाच्या स्वभावाचा प्रश्न आहे. तेव्हा असेच लोक बहुसंख्येने असतात. अमेरिकेसह अनेक देशांमधील सामाजिक अभ्यासांवरून लक्षात आलेले आहे की अशा मालिका समाजाला निर्बुद्ध, मठ्ठ बनवतात, स्वत:ची विचारशक्ती गमवायला भाग पाडतात, दुस-याचा हेवा, मत्सर, द्वेष करायला शिकवतात. तेव्हा कोणाला या वरकरणी हार्मलेस प्रकार वाटत असेल तर त्यामागचे सत्य हे आहे. तेव्हा यांचे पोट भरावे म्हणून कामाच्या दर्जात तडजोड करणारे हे लोक समाजाचे गुन्हेगारच आहेत.
जे मनापासून वाटते ते लिहीले.
शीर्षकातील लेखक या शब्दापुढील प्रश्नचिन्ह यांना लेखक म्हणावे तरी कसे यासाठी आहे.
आता धडाडू देत तोफा.....मी यापूर्वी ऐकलेले प्रतिवाद....लिहिणारे लिहितात, पाहणारे पाहतात, माझे काय जाते, टीव्हीचा रिमोट तरी आपल्याकडेच असतो ना...तू नॅशनल जिओग्राफिक पहा, तुला कोणी थांबवलेले अाहे.....यात लेखकाचा/लेखिकेचा दोष नसतो, का तर ते जाहिरातदारांच्या म्हणजे टीआरपीच्या रेट्यामुळे मालिकानिर्मात्यांच्या दबावामुळे तसे लिहितात..........वगैरे. तेव्हा यापेक्षा वेगळा प्रतिवाद पहण्यास आवडेल.
तर मग स्वातंत्र्य नसलेले काम करायला हे काही मिलिटरीचे काम नाही. तेथे आदेश पाळावे लागतात.हल्ली कोणलाच कामात स्वातन्त्र्य नसते. गिर्हाईकाची अपेक्षा हाच आदेश असतो.यातून अगदी अमिताभ बच्चन किंवा पंतप्रधान सुद्धा सुटलेले नाहीत.तेव्हा यामागची कारणे न पाहता या वास्तवावर व त्याच्या परिणामांवर भाष्य करणे योग्य.या काँमेन्टवर नक्की काय प्रतिक्रीया द्यावी हे उमगत नाहिय्ये. इतक्या पोकळ विचारावर हसावे की तुम्हाला कारणे न जाणून घेता केवळ फुटकळ प्रतिक्रीयेतून लेखकाना दोषी ठरवून सुळी देण्यात स्वारस्य आहे हे जाणून रडावे हे समजत नाहिय्ये. असो.......... एकूणातच तुम्हाला कुठल्याच बाबीचा खोलवर उहापोह नको आहे हे जाणवले. आता फक्त झाड शोधून पॉपकॉर्न आणतो.........