मिळू जाउनि इंग्रजी सागराला
मराठी शाळाही धरत आहेत इंग्रजीची कास. लोकसत्ता मधे अशा आशयाची बातमी आहे. माझ्याच शाळेची ती बातमी आहे. हे सांगताना खंत वाटते. मी स्वत: सरस्वती सेकंडरी स्कूल चा एक माजी विद्यार्थी असून हे मी नेहमी अभिमानाने सांगतो. माझे संपूर्ण शिक्षण सरस्वती सेकंडरी स्कूल मधून, मराठी माध्यमातून झाले आहे. आणि सरस्वती ही शाळा महाराष्ट्रातील अग्रेसर मराठी शाळांपैकी एक आहे ही बाब नेहमीच सुखावते. परंतु इंग्रजी माध्यम सुरू करण्याचा शाळेचा निर्णय दु:खद आहे. आज असंही मराठी लोकांवर, मराठी भाषेवर जे वैचारिक आक्रमण सुरू आहे ते चिंताजनक आहे. असं असताना मराठी शाळांनी स्वत:हूनच इंग्रजीची कास धरणं हे म्हणजे माघार घेण्यासारखं आहे. मराठी शाळा इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांइतक्याच किंबहुना त्यांच्याहून जास्त चांगल्या असू शकतात, असा खरा तर शाळेचा पवित्रा हवा होता, पण तो तसा नाही.
आज अवघी जनता ‘ट्रेंड’ च्या मागे धावणारी झालेली आहे. डोळ्यावर झापडं बांधून फक्त सगळे करतात ते आपण करावं अशा प्रकारची एक विचारहीन संस्कृती आकार घेते आहे. त्यामुळे ‘कुणी ठरवलं इंग्रजी माध्यम इतर भाषिक माध्यमाहून श्रेष्ठ?’, ‘मराठीमधून शिक्षण म्हणजे मुलांचं भवितव्य अंधारात, आणि इंग्रजी ही भविष्याची गुरुकिल्ली असं कसं?’ हे आणि असे प्रश्न फार कमी लोकांना पडतात, आणि ज्यांना पडतात तेही त्या प्रश्नांची गळचेपी करून पुन्हा प्रवाहात सामील होतात. माझ्या अगदी निकटच्या व्यक्तीला जेंव्हा 'मी माझ्या मुलाला/मुलीला बेस्ट एज्युकेशन देणार. टॉपच्या कॉन्व्हेंट मधे नाव नोंदवलंय' असं म्हणताना ऐकतो तेंव्हा काय म्हणावं कळत नाही. बरं या व्यक्ती स्वतः मराठी माध्यमातून शिकलेल्या असतात हे विशेष खटकणारं असतं.
'युनेस्को' या एका जागतिक मान्यतेच्या संस्थेने या विषयावर एक पत्रिका प्रकाशित केलेली आहे. या पत्रिकेत असं म्हटलेलं आहे की मातृभाषेतून घेतलेलं शिक्षण हे मुलाच्या एकंदरीत वाढीसाठी, आकलनक्षमतेच्या विकासासाठी चांगलं असतं. युनेस्कोने मल्टिलिंग्वल म्हणजे बहुभाषिक राष्ट्रांना मातृभाषेतील शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं आहे. गूगल वर ‘युनेस्को मदरटंग एज्युकेशन’ हे शब्द टाकून शोध घेतला असता हा आणि असे अनेक मजकूर तुम्हाला वाचता येऊ शकतात. सरस्वतीच नव्हे, इतर कुठल्याही शाळेत आपल्या पाल्याला टाकू बघणार्या प्रत्येक पालकाला मी सांगेन की तुम्ही या पत्रिका जरूर वाचा. समजून घ्या. आणि मगच तुमचा निर्णय घ्या. कारण हे म्हणणं कुणा सामाजिक संस्थेचं किंवा व्यक्तीचं नसून युनेस्कोचं आहे.
इंग्रजी माध्यमाविरोधात काहीही बोललं की अनेकांना असं वाटतं की इंग्रजीला असलेला हा विरोध आहे. विरोध इंग्रजी भाषेला नसून इंग्रजी माध्यमाला आहे. इंग्रजी भाषा ही प्रत्येकाला आलीच पाहिजे आणि नुसती आली पाहिजे नाही तर त्यात प्राविण्य मिळवलं पाहिजे. परंतु त्यासाठी वेगळे प्रयत्न करायला हवेत, इंग्रजी माध्यमाची गरज नाही. लहानपणापासून नियमितपणे इंग्रजीत संभाषण करायची सवय लावली, सराव केला, तर मुलांना इंग्रजी बोलण्याचा न्यूनगंड कधीच भेडसावत नाही. इंग्रजी पुस्तकं, इंग्रजी कविता, गाणी यांच्याशीही योग्य वेळी त्यांचा परिचय करून दिला, तर ते फायद्याचं ठरतं.
'मी नाटकं वगरे बघत नाही. त्यात खूप हाय लेव्हल मराठी असतं' हे वाक्य जेंव्हा एखाद्या मराठी व्यक्तीकडून ऐकायला मिळतं तेंव्हा मात्र कीव करावीशी वाटते, त्यांची आणि त्यांच्या पालकांची. हीच गत इतर भाषांचीही आहे. ही एकट्या मराठीची समस्या नाही, ही भारतातल्या प्रत्येक प्रादेशिक भाषेची समस्या आहे. दुर्दैव हे की आपण इंग्रजीप्रेमात इतके आंधळे झालो आहोत की आपल्याला याच्या परिणामांची पर्वाच नाही. आपल्या मुलाला इंग्रजीत प्रेझेन्टेशन देता आलं पाहिजे, मग त्याला पु लं देशपांडे कोण, शांता शेळके कोण हे माहित नसेल तरी हरकत नाही, असा आजकालचा विचार आहे.
सरस्वती शाळेत झालेल्या भावी पालकांच्या बैठकीत मी उपस्थित होतो. तिथे शाळेतर्फे एका व्यक्तीने असं मत मांडलं की हा मराठीचा वृथा अभिमान आहे आणि तो अयोग्य आहे. शिवाय मराठीतून शिकलेली मुलं ही पुढे जाऊन स्पर्धात्मक जगात मागे पडतात. यावर मी इतकंच म्हणू शकतो आणि जे मी तिथे त्या व्यक्तीशीही बोललो, की वृथा अभिमान इंग्रजीचा असू शकतो; मराठीचा, मातृभाषेचा अभिमान वृथा कसा, हे मला कळत नाही. शिवाय मी आणि माझ्यासारखे तमाम मराठी माध्यमातून शिकलेले विद्यार्थी आज आयुष्यात आपापल्या जागी यशस्वी आहेत. ते कुठेही मागे पडलेले नाहीत आणि या विचाराचं जर एखादी शाळा प्रतिनिधित्व करत असेल तर तो त्या शाळेच्या लेखी पराभव आहे. मराठी शाळेतल्या पालकांना आज मुलांना इंग्रजी शाळेत घालावंसं वाटतं, तिथली फी त्यांना परवडते, यातून हे सिद्ध होतं की ते स्पर्धात्मक युगात यथायोग्य टिकलेले आहेत. ते मागे फक्त एकाच बाबतीत पडले की त्यांना स्वतःच्या मातृभाषेतून झालेल्या शिक्षणाचा विसर पडला आणि ते कमीपणाचं वाटू लागलं.
तरीही, सरस्वती शाळा, तिथले शिक्षक, आणि शाळेचा इतिहास हे सगळं फार उच्च दर्जाचं आहे. त्यामुळे माध्यम कुठलं हा प्रश्न क्षणभर बाजूला ठेवून एक गोष्ट विश्वासाने सांगेन की सरस्वती सेकंडरी स्कूल, नौपाडा, ठाणे ही शाळा इतर शाळांपेक्षा नेहमीच उजवी ठरलेली आहे, आणि पुढेही ठरेल. तेंव्हा मुलाच्या/मुलीच्या भविष्याकरिता सरस्वतीच्या पर्यायाचा जरूर विचार करा.
ब्लॉग दुवा हा: www.apurvaoka.com/2015/11/english-marathi-medium-school.html
💬 प्रतिसाद
(65)
म
माहितगार
Tue, 11/24/2015 - 07:14
नवीन
न्यूनगंडाला मात विश्वासानेच देता येते तो विश्वास देण्यात मराठीप्रेम प्रॅक्टीकली कमी पडते आहे.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 11/24/2015 - 07:17
नवीन
विश्वास मराठीप्रेमाने देण्यापेक्षा, पालकांनी द्यायला हवा. एकमेकांनी एकमेकांना द्यायला हवा. पुढे मोठं झाल्यावर स्वतःच स्वतःला द्यायला हवा.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 11/24/2015 - 09:51
नवीन
'म्हणजे नेमके काय ?' ते व्यावहारीक दृष्ट्या व्यक्त न करता येण्यात तर गोची होत नाहीए ना ? नुसत्या म्हणण्याने विश्वास निर्माण होताना दिसत नाहीए नाही तर या धागा लेखास प्रयोजन राहीले नसते म्हणजे विश्वास निर्माण करण्यात व्यावहारीक दृष्ट्या कुठेतरी काही तरी कमी पडते आहे अशी रास्त शंका वाटते.
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Tue, 11/24/2015 - 07:24
नवीन
माध्यमावर फारसं काही अवलंबून नसतं हो!
ते पोरांवर अवलंबून असतं....
पोरगं जर हुशार असेल तर माध्यम मराठी असो, हिंदी असो, वा इंग्रजी, ते झळकून उठतंच!
आणि ते पोरगं जर ढ ढगातलं असेल तर तुम्ही त्याला अगदी जेकेमध्ये घाला, काऽऽही फरक पडत नाही...
हां, आता जर पोराला सायन्समध्ये इंटरेस्ट असेल तर त्याला इंग्रजी माध्यमात घालणं माझ्या मते चांगलं.
म्हणजे मग त्याची अकरावी, बारावी आणि फर्स्ट इयर जरा सुसह्य होतात!!!
पोरांना काय सोपं पडेल याकडे आईबापांनी लक्ष द्यावं.
आईबापांचे स्वतःचे दुराभिमान फाट्यावर मारून!!
:)
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 11/24/2015 - 07:39
नवीन
तुमची गल्लत झालेली दिसते.
नक्की कशाने काऽऽही फरक पडत नाही, काय फाट्यावर मारून काय सोपं पडेल याचा नीट विचार करा इतकंच.
आणि तरीही हे एकदा वाचाच.
http://www.unesco.org/new/en/education/themes/strengthening-education-systems/languages-in-education/multilingual-education/
http://www.unesco.org/education/education_today/ed_today6.pdf
http://unesdoc.unesco.org/images/0012/001297/129728e.pdf
http://unesdoc.unesco.org/images/0016/001611/161121e.pdf
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Tue, 11/24/2015 - 07:53
नवीन
असं? काय नेमकी गल्लत झाली ते सांगा बॉ!
विचार करूनच सांगतोय, आपल्या मुला-मुलींचं भविष्य महत्वाचं की इंग्रजीव्यतिरिक्त माध्यमाचा आग्रह महत्वाचा हे ज्यानं त्यानं ठरवायचं. मात्र व्हर्नाक्युलर माध्यम घेतल्यावर सायन्सला गेलेल्या मुलांचा अकरावी/बारावीमध्ये पिट्ट्या पडतो हे सत्य आहे...
युनेस्कोच्या लिंका देऊन तुमच्या धाग्याच्या मुद्द्यांत काही साध्य होत नाही हो!
१. मुळात विद्यार्थी हुशार हवा, बहुसंख्य तसे नसतात.
२. हूशार विद्यार्थ्याला माध्यम कोणतंही असलं तरी यशस्वी करियर करण्यात फारसा अडथळा येत नाही.
३. सायन्सकडे कल असल्यास इंग्रजी माध्यम असल्यास जास्त सोपं पडतं
हे माझे मुद्दे.
आता करा प्रतिवाद.
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Tue, 11/24/2015 - 08:01
नवीन
मी तुमच्याशी उगाच हा वादासाठी वाद म्हणून घालत नाहिये.
तर सायन्सकडे जायचं असेल तर इंग्रजी माध्यम जास्त उपयुक्त असतं असं मला प्रामाणिकपणे वाटतं.
(कॉमर्स/ आर्ट्सची काय परिस्थीती आहे ते मला माहिती नाही म्हणून त्याविषयी काही बोलू शकत नाही)
बहुतेक मराठी पुरस्कर्त्यांमध्ये मुलांच्या कल्याणापेक्षा एकतर भाषिक अभिनिवेष तरी दिसतो नाहीतर मग 'आम्ही सोसलं, मग आता तुम्हीही सोसा!' ही भावना दिसते.
म्हणून हा चर्चाप्रपंच!!
:)
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 11/24/2015 - 08:21
नवीन
काही अंशी यात तथ्य असलं तरी तुमच्याच म्हणण्याप्रमाणे मुलगा हुशार असेल तर it does not trouble him much. तो/ती चटकन आत्मसात करतात. टेक्निकल टर्म्स फक्त बदलतात, बाकी इंग्रजी त्याला येत असतंच.
आम्ही सोसलं तुम्ही सोसा... असा विचार कुठलाही सुजाण पालक करणार नाही. इंग्रजीत टाकू हा विचार जसा मुलाच्या भल्यासाठी करतात तसाच मराठीत टाकू हाही भल्यासाठीच केलेला विचार आहे. पण भलं नक्की कशात आहे हा प्रश्न आहे.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Tue, 11/24/2015 - 08:26
नवीन
दुसरे कारण असते की नाही हे माहित नाही पण बहुतांश वेळा पहिले कारण नक्कीच असते.
मी पण त्याच सरस्वती सेकंडरी स्कूलचा विद्यार्थी आहे आणि माझ्या शाळेने आणि शिक्षकांनी खूप काही दिले हे पण नक्कीच. तरीही नव्या काळाची पावले लक्षात घेऊन शाळेने योग्य निर्णय घेतला असे मला वाटते. तो निर्णय घेतला नसता तर काही वर्षांनी शाळा बंद झाली असती अशी भिती वाटते.तसे झाले असते तर अजून वाईट वाटले असते. मला वाटते की शाळेच्या माध्यमापेक्षा विचार कसा करायचा, प्रश्न कसे विचारायचे इत्यादी गोष्टी, ज्याला शिक्षणपध्दती म्हणता येईल ती अधिक महत्वाची आहे.मी शाळेत असताना ही शिक्षणपध्दती भलतीच उच्च दर्जाची होती हे नक्कीच. ती शिक्षणपध्दती तशीच ठेवली किंबहुना आणखी चांगली केली की झाले. मग शाळेचे माध्यम ही दुय्यम गोष्ट आहे.
(माझ्या माहितीतील इतर कोणापेक्षाही जास्त शिक्षणसंस्थांचा विद्यार्थी म्हणून राहिलेला आणि त्या अनेक संस्थांपैकी केवळ दोन संस्थांनी खरोखरची व्हॅल्यू अॅडिशन केली असे मानणारा आणि त्या दोन संस्थांपैकी सरस्वती सेकंडरी स्कूल ही एक आहे असे मानणारा आणि शाळा अजूनही मिस करणारा) ट्रुमन
- Log in or register to post comments
S
sagarpdy
Tue, 11/24/2015 - 07:42
नवीन
पोरगं बालवाडीत असताना कसं समजावं हो त्याला कि सायन्स कशाशी खातात ते ? आवड-बिवड नंतरची गोष्ट !
आणि काही फरक पडत नाही भाषा बदलाने. इंग्रजी माध्यमातून येउन ११ वि थोडी सोपी जाते हे खरं, पण पुढे फार फरक पडत नाही.
- Log in or register to post comments
म
मोगा
Tue, 11/24/2015 - 07:46
नवीन
मिपावर
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 11/24/2015 - 07:50
नवीन
ठाऊक आहे. पण ताजी घटना आहे, महाराष्ट्रात पहिल्या पाच क्रमवारीत असलेली शाळा इंग्रजी माध्यम सुरू करते (मराठी सोबत, ऐवजी नव्हे. हेही नसे थोडके) ही गोष्ट महत्वाची वाटली. म्हणून त्यावर लिहिलं.
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Tue, 11/24/2015 - 08:04
नवीन
ही गोष्ट महत्वाची तर आहेच!
पण का? तुम्ही त्या शाळेच्या संचालकांना विचारून पाहिलंत का?
काय म्हणतात ते?
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 11/24/2015 - 08:10
नवीन
तेच तर सांगतोय. बैठकीला गेलो होतो. त्या आधीही जाऊन मुख्याध्यापकांशी चर्चा केली होती. तरीही निर्णय झाला शाळेचा. मग बैठकीचं निमंत्रण दिलं होतं पालकांना, तिथे गेलो. तिथे त्यांनी जे प्रतिवाद केले ते धाग्यात दिलेत ना! 'वृथा अभिमान, उच्चशिक्षणात, स्पर्धात्मक जगात मागे पडणे इत्यादी'
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Tue, 11/24/2015 - 08:24
नवीन
कारण प्रत्येक मराठी/भारतीयाला आपला मुलगा/मुलगी इंजिनियरच व्हायला हवा/वी असते ना! :)
सुतार, शिक्षक, वार्ताहर वगैरे व्हायला कितीजणांना चालेल? पूर्वी डॉक्टर चालायचं पण आता एमडी होउनही प्रॅक्टिस करण्यातल्या अडचणी दिसल्यापासून ते ही थंडावलंय!!!
मला कधीकधी प्रश्न पडतो की वर्षानुवर्ष इतके इंजिनियर्स काढूनही भारतातलं इन्फ्रास्ट्रक्चर इतकं केविलवाणं का?
:)
- Log in or register to post comments
र
राही
Tue, 11/24/2015 - 08:07
नवीन
ही एक लाट असते. कदाचित तात्पुरती, कदाचित टिकाऊ. व्यावहारिक फायदा जेव्हा उरणार नाही तेव्हा ती आपोआप विरून जाईल. मागणी तसा पुरवठा हा नियम आजच्या मार्केट-ड्रिवन समाजव्यवहाराला लागू आहे. त्यातून शिक्षणक्षेत्र कसे सुटेल?
आणि वैचारिक आक्रमणाऐवजी वैचारिक मंथन, घुसळण हे शब्द जास्त योग्य वाटतात.
भाषा 'हाय लेवल' वाटते याचा अर्थ ग्रांथिक भाषेची व्यवहारभाषेपासून फारकत होते आहे. व्यवहारभाषा ग्रांथिक भाषेला ढकलू पाहाते आहे. आज जर सर्वसामान्य व्यवहाराचे, क्रियाप्रक्रियांचे रूप बदलले असेल तर हे बदल अभिव्यक्त करणारी भाषासुद्धा बदलेलच.
संस्कृतीच्या प्रत्येक बदलटप्प्यावर भाषा बदलते. कृषिसंस्कृतीतून यांत्रिक आणि आता डिजिटल संस्कृतीत येताना फार मोठी भाषिक उलथापालथ होणारच. भारतीय द्वीपकल्पात शहरीकरण किंवा सिटीज़ (सिटीस्टेट्स- हा थोडासा वेगळ्या अर्थाचा शब्द आहे, तरीही) तीन टप्प्यांत झाले असे साधारणपणे म्हणतात. १)हडाप्पन काळ २) ई.स.पू.६००-क्रिस्तोत्तर ३०० (नंद-मौर्य-नाग-शिशुनाग-शुंग-कुशाण-क्षत्रप-गुप्त-सातवाहन-वाकाटक)- हा प्रदीर्घ काळ होता आणि या दरम्यान कितीतरी संस्कृतीबदल, भाषाबदल झाले.३)मुघल ते वसाहतकाळ आणि नंतर.
काळाच्या या प्रदीर्घ पटावर भारतीयांच्या राहाण्यासहाण्यात, बोलण्याचालण्यात, वावरण्यात किती बदल झाले असतील याची कल्पनाही अशक्य आहे. नवे व्यवहार अभिव्यक्त करण्यासाठी प्रचलित भाषा कमी पडत असेल तर तिची जागा नव्या संकल्पना आणि त्यांना साजेसे शब्द असलेली भाषा घेणारच.
महाराष्ट्र हा भूभाग राहाणार आहे ना? त्यात वसणारे ते महाराष्ट्रीय असणार आहेत ना? मग हे महाराष्ट्रीय जी भाषा बोलतील ती मराठीच असेल. फक्त ती सध्याच्या मराठीसारखी नसेल. कदाचित इंग्लिशमिश्रित असेल, पण अधिक अर्थवाही, अधिक समृद्ध असेल.
आणखी एक छोटासा मुद्दा: लहानपणापासून इंग्रजीतून संभाषणाची सवय लावली तर मुलांची व्यवहारभाषा इंग्रजीछापाची होणार नाही कशावरून?
मागणी/क्रेझ्/ट्रेंड या महापुराला अडवण्यात अर्थ नसतो. एकदा लोंढा वाहून गेला, की कालान्तराने उरतो तो निवळशंख शांत इतिहासप्रवाह. आपल्याच गतीने वाहाणारा आणि मधल्या प्रलयाची, नासधुशीची आठवणही न ठेवणारा. किंवा केवळ स्मरणरंजनात्मक खुणा ठेवणारा.
बाकी सरस्वती शाळेविषयीचे आपले पोटतिडिकीतून आलेले निवेदन आपल्या जागी रास्त आहे. त्याविषयी मला काही म्हणायचे नाही.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 11/24/2015 - 09:23
नवीन
ती तशीही होतेच की इंग्रजीतून शिकल्यावर.
सवय म्हणजे सतत बोलण्याची नव्हे. माझं उदाहरण देतो, मी आणि माझा मित्र आमच्या पालकांचा सल्ला मनावर घेऊन संध्याकाळी ठराविक वेळी इंग्रजीत बोलत असू. मुद्दाम. त्याने बोलायची सवय लागली, भीती गेली. अशातच इंग्रजी गाणी, पिक्चर इत्यादींची ओळख झाली. आमच्या एका क्लासच्या बाईंनी मुद्दाम आम्हा विद्यार्थ्यांना बोलवून घरी व्हीसीआर वर इंग्रजी पिक्चर दाखवला होता मला आठवतं. बेन हर पिक्चर होता.
त्यामुळे, सवय लावणं म्हणण्याचा अर्थ असा आहे की हे असे एफर्ट्स घेतले तर फायदा होतो.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Tue, 11/24/2015 - 08:37
नवीन
वेल्लाभट,
इंग्रजी माध्यम म्हणजे यशाचा हमखास मार्ग असं समीकरण जनतेच्या मनात निर्माण झालं आहे. आपण मराठीप्रेमींना हे मोडीत काढायचंय. इंग्रजीच्या तुलनेने मराठी कुठेही कमी नाही. मराठी माध्यमांतून शिकणाऱ्यांना इंग्रजी बोलण्याचा (हो, फक्त बोलण्याचा) सराव होईल असा काही उपक्रम सुरू करता येईल का? उदाहरणार्थ बोली इंग्रजीचा तास घेणे, इंग्रजी सिनेमा पाहणे, इत्यादि?
थोडं अवांतर : तुम्ही सरस्वती मराठी शाळेचे विद्यार्थी आहात हे वाचून आनंद झाला. मी त्या शाळेचा विद्यार्थी नव्हतो, मात्र त्या शाळेशी बऱ्याच सुखद आठवणी निगडीत आहेत. (नाही, त्या शाळेतल्या एकाही पोरींवर लाईन मारलेली नाही.) शैक्षणिक जगाशी संबंधित आठवणी आहेत. या शाळेस इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करावेसे वाटणे हे क्लेशदायी आहे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Tue, 11/24/2015 - 09:10
नवीन
'फाड फाड इंग्रजी बोलणं म्हणजे हुशार माणूस' ह्या गैरसमजातून इंग्रजी माध्यमांनी आपल्याकडे मुळ धरले आहे. मातृभाषेच्या माध्यमातून शिकताना एक दोन विषय इंग्रजीत असावेत असे मला वाटते. जसे, विज्ञान, गणित आणि इंग्रजी इ.इ.इ. बाकी विषय मातृभाषेतच शिकावे/शिकवावे. इंग्रजी माध्यमातून शिकलेली मुलेही इंग्रजी भाषेत काय तारे तोडतात हेही पाहिले आहे. सगळेच तसे नसतात तरी इंग्रजी माध्यमाचा सर्वांनाच फायदा होतो हा गैरसमज नसावा म्हणून.
मातृभाषेत शिकताना इंग्रजी ही विश्वभाषा (कांही अंशी) असल्यामुळे त्यातही प्राविण्य मिळवावेच. पण ते मिळविताना मातृभाषेचा बळी दिला जाऊ नये. आपले मराठी पालकच मातृभाषेबद्दल उदासिन दिसून येतात. गुजराथी, दाक्षिणात्य मातृभाषाभिमानी आढळतात. मातृभाषेबद्दलचे प्रेम पालकांनीच आपापल्या पाल्यांना लावले पाहिजे. त्या करीता आधी त्यांना मातृभाषेबद्दल नितांत प्रेम असणे आवश्यक आहे. मराठी बोलणे, वाचणे, ऐकणे हे घरातूनच घडले पाहिजे. पण चित्र तसे दिसत नाही. एखाद्या पाहुण्याने मराठीतून नांव विचारल्यावर मुले फक्त आपले नांव सांगतात. पण 'आडनांव काय?' विचारल्यावर बुचकळ्यात पडतात. अशा वेळी आपल्या मुलाला विचार करायला वेळ न देता आई लगेच सांगते, 'अरे! सरनेम सांग अंकलना.' असे त्याला सांगून पाहूण्यांसमोर मुलाची आणि आपली 'लाज(?)' सांभाळायचा प्रयत्न आई करते. दोन सख्ख्या मराठी बहिणी एकमेकींशी इंग्रजीतून बोलतात आणि आई म्हणते 'अरे! नाही कळत त्यांना मराठी'. काय बोलणार? मुळात आईवडिलांनाच मातृभाषेची आस नसते आणि मुलांनी इंग्रजीतून केलेल्या संभाषणाचा अभिमान वाटतो.
मी मराठीतूनच शिकलो. इंग्रजी एक विषय होता. पण इंग्र॑जी भाषेचा पास होण्याइतपतच अभ्यास केला आणि बोलण्याचा, लिहीण्याचा, वाचण्याचा सराव केला नाही त्याने थोडे नुकसान नक्कीच झाले. पण तो सराव केला तर इंग्रजी माध्यमाची गरज कोणालाच भासू नये. पण आजही, इंग्रजी माध्यंमातून शिकलेल्या माझ्या अनेक मित्रांपेक्षा इंग्रजी संभाषणात, लेखनात मी मागे नाही. कांहीच्या तर चार पाऊले पुढेच आहे. मराठी वक्तृत्व स्पर्धातून भाग घेऊन, मराठी नाटकांंमध्ये कामे करून सतत स्वतःला पुढे ढकलण्याचा गुण अंगी आला तो भाषा बदलली तरी तसाच राहतो आणि त्याचा फायदाही होतो. इंग्रजी माध्यमाचा अनुभव नसल्याकारणाने इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षणपद्धतीवर आणि व्यक्तिमत्व विकासावर (भाषे व्यतिरिक्त) भाष्य करू शकत नाही.
येत्या २०-२२ वर्षात काळ कसा बदलणार आहे ह्याचा अंदाज येत नसल्यामुळे बहुसंख्य पालक मुलांच्या शिक्षणाबाबत, माध्यमाबाबत जोखिम उचलू इच्छित नसतात. कदाचित, मराठी माध्यमातून शिकल्यामुळे (आणि इंग्रजी भाषेचा सराव न केल्याने) त्यांना इंग्रजी संभाषणाबाबत अडचणी येत असाव्यात किंवा तितकासा आत्मविश्वास वाटत नसावा. त्यामुळे आपण मातृभाषेत शिकलो ह्याचे वैषम्य न वाटताही जरा न्यूनगंड नक्कीच वाटत असावा. त्यामुळे अशी 'चूक' ते मुलांच्या बाबतीत करू इच्छित नसावेत.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 11/24/2015 - 09:25
नवीन
ह्या सर्व चर्चा आताच थोड्याच महिन्यांपूर्वी झाल्या आहेत. पण निमित्तकारणे आपण लेख टाकलात, म्हणून ठिक आहे.
'सरस्वती' ही आम्ही ठाण्यात राहिलो असतो तर एकमेव निवड असती. शाळा असली तरी व्यावसायिक संस्था असल्याने बंद पडण्यापेक्षा काळानुसार बदलणे परिहार्य आहे. कुठल्याही संस्थेचा एकदा मोठा डोलारा झाला की फक्त तत्त्व आणि ध्येयांवर अवलंबून राहून टिकून राहणे होत नाही. काही व्यावसायिक तडजोडी स्विकाराव्याच लागतात. सरस्वती आपले वेगळेपण जपूनच इंग्रजी माध्यम सुरू करत असेल तर स्वागतच आहे.
मराठी माध्यमांत शिकायला असणार्या पाल्यांच्या पालकांना, प्रवाहासोबत वाहत नसल्याने, सामाजिक दबाव-अपमान-कुत्सित बोलणे सहन करावे लागते, प्रत्येक पालकास हे सहन करणे शक्य होत नाही. त्यामुळे सरस्वतीने हा निर्णय घेतला असावा.
युनेस्कोच्या 'मातृभाषेत शिक्षण' ह्या मुद्द्याचा 'मराठी अस्मिते'शी गरज नसलेला संबंध लावून काही सद्स्यांनी इथे वेगळे मत मांडले होते. तीच सगळी चर्चा परत न होवो अशी अपेक्षा आहे. प्राथमिक शिक्षणाला पोटापाण्याच्या कारणापर्यंत ताणणे इंग्रजी माध्यमाचा पुरस्कार करणार्यांना योग्य वाटते. ह्याच मानसिकतेतुन सहा महिन्याच्या मुलांनाही शाळेत टाकण्याच्या हालचाली सुरु असतात. गर्भसंस्कार हे त्याच्याही पुढचे पाऊल.
बाकी, प्रत्येक पालक आपल्या पाल्याबाबत निर्णय घेण्यास स्वतंत्र असला तरी सक्षम असेलच असे नाही. त्यामुळे असोच.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 11/24/2015 - 09:40
नवीन
अनुमोदन. मुद्दा फक्त मराठीचा नाहीच आहे मुळी; पण महाराष्ट्राबद्दल बोलत आहोत म्हणून मराठी. अस्मिता वगैरे राजकीय शब्द झालेत आता.
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Tue, 11/24/2015 - 09:27
नवीन
पेठकर काका - समजा बळी दिला गेला मातृभाषेचा तर काय हरकत आहे हो? मला खरंच काही कळत नाही . आपण मराठीत शिकलो, मुले इंग्लिश मधे शिकली आणि मराठी पण बोलतात. कदाचित त्यांची मुले इंग्लिश मधे शिकतील आणि मराटीत अजिबात बोलणार नाहीत. ठीक आहे ना. बदल तर होतच असतो.
हे म्हणजे "आमच्या वेळी नव्हती असली फॅडं" असे म्हणणार्या जुनाट काळातच खिपचत पडणार्याची आठवण येते.
फक्त भाषे चेच का हो, नव्या पिढीला तुम्हाला आवडत होते ते संगीत तरी आवडते का? मग ते कसे चालते?
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 11/24/2015 - 09:44
नवीन
ठीक आहे मग. राहिलं!
तुम्ही शास्त्रीय पुरावा तपासा; किंवा ज्या संस्थेने हा विचार मांडलाय, (युनेस्को) त्या संस्थेशी संपर्क साधा, विचारा. मी त्या संस्थेची विश्वासार्हता लक्षात घेऊन त्याकडे बघतो. आणि माझी मतं आहेत ती वेगळी; केवळ युनेस्को म्हणते म्हणून लगेच मीही, अशातला भाग नाही.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Tue, 11/24/2015 - 09:47
नवीन
अशी मनोवृत्ती असलेले लोक प्रचंड डोक्यात जातात राव.
सहमत आहे
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Tue, 11/24/2015 - 10:07
नवीन
>>>>समजा बळी दिला गेला मातृभाषेचा तर काय हरकत आहे हो?
काहीच हरकत नाही. देऊ या की बळी. त्यात काय मोठं. अजून कांही पिढ्यांनंतर, शेजारची बाई सुंदर आणि श्रीमंत आहे, सध्या तिलाच सगळे भाव देत आहेत तर आपल्या आईला सोडून तिलाच आई म्हणूया नं. असाही विचार पुढे येईल, काय सांगावे. तेव्हाही काही फरक पडणार नाहीच.
>>>> "आमच्या वेळी नव्हती असली फॅडं" असे म्हणणार्या जुनाट काळातच खिपचत पडणार्याची आठवण येते.
पण असे म्हणणार्यांची मते विचारातच का घ्यावीत? तशी ते जबरदस्ती तर करीत नाहीत नं? हसून सोडून द्यावं, राहू दे की त्यांना त्यांच्याच जुनाट काळात खितपत. मी तर म्हणतो अशा जुन्या खोडांना मिसळपाव ह्या संस्थळावरच बंदी घालावी. आणि त्यांचे सद्स्यत्वच रद्द करुन टाकावे म्हणजे ते आपल्या मतांची पिंक इथे टाकू शकणार नाहीत. पाहा जमलं तर.
नव्या पिढीला तुम्हाला आवडत होते ते संगीत तरी आवडते का?
होsss! आवडतं की. जुन्या गाण्यांचे प्रोग्रॅम किती तरी हाऊसफुल्ल असतात. कॉलेज कुमारही जुन्या गाण्यांमध्ये रमतात. (मला तेव्हढा मोठा मुलगा आहे. तो आणि त्याचे मित्र ऐकतात राजकपूरची, देवानंदची गाणी) शिवाय, मनाला रुचेल असे नविन कांही जमत नसल्यामुळे, फ्यूजनच्या नांवाखाली, पुन्हा जुन्या जुन्या गाण्यांनाच 'नविन' म्हणून (थोडे इंग्रजी मिसळून) सादर केले जाते. सर्व तरूणाई त्यावर थिरकताना रोज रोज टिव्हीवर दिसतंच असतं.
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Tue, 11/24/2015 - 10:34
नवीन
पेठकर काका - स्पेसिफिकली तुमच्या कडुन हे अपेक्षीत नव्हते. तुमच्या सारख्या चाकोरी सोडुन झेप घेऊन कर्तृत्व दाखवणार्या माणसानी असे म्हणणे खरोखर च अपेक्षीत नव्हते.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Tue, 11/24/2015 - 11:15
नवीन
'हे' म्हणजे काय? कांही चुकीचे बोललो आहे का?
माझ्या मूळ प्रतिसादात मी म्हंटले आहेच मराठी शाळेत वक्तृत्व स्पर्धातून भाग घेऊन, मराठी नाटकांंमध्ये कामे करून सतत स्वतःला पुढे ढकलण्याचा गुण अंगी आला तो भाषा बदलली तरी तसाच राहतो आणि त्याचा फायदाही होतो. चाकोरी बाहेर पडण्याचे मूळ ह्या व्यक्तिमत्व विकासाच्या पायाभरणीत आहे. जे मला मराठी शाळेतूनच मिळाले आहे. शिवाय माझ्या सातवी पास (मराठी माध्यम) आईने सतत मागे धोशा लावून सगळ्या वक्तृत्व स्पर्धांमधून, नाटकांमधून भाग घेण्यास भाग पाडण्याच्या संस्कारांमध्ये आहे. असो तो सर्वस्वी वेगळा विषय आहे.
इंग्रजी माध्यमांच्या विरोधात मी नाही. पण मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घातल्यावर त्यांच्या पालकांवर दुहेरी जबाबदारी येते. इंग्रजी भाषेतून मुलांचा अभ्यास घेणे, त्यांची भाषा (इंग्रजी) शुद्ध आणि ओघवती राखणे आणि त्याच बरोबर मराठी भाषेबद्दलही त्यांच्या मनांत प्रेम रुजविणे.
मराठी माध्यमाच्या शाळेत घातल्यावर मुलांचा इंग्रजी भाषेचा अभ्यास घेणे आणि इंग्रजी संभाषण कलाही त्यांना आत्मसात करायला लावणे ही जबाबदारीही येते.
- Log in or register to post comments
र
राही
Tue, 11/24/2015 - 10:40
नवीन
जुने वाईट ठरत नाही तर ते कालबाह्य ठरते.
जुन्या गाण्यांचा एखादा कार्यक्रम हाउस फुल ठरतात पण जुन्या काळात व्हायचे तितक्या वारंवारितेने होऊ लागले तर लोक तिकडे फिरकतील का? पूर्वी सकाळच्या शो(मॅटिनी)ला जुने चित्रपट कमी दरात दाखवले जायचे ते गर्दी खेचायचे. पण रेग्युलर स्लॉटमध्ये ते ठेवले असते तर गर्दी झाली असती का?
आणि बळी वगैरे जात असतो असे म्हणायचे झाले तर तो भाषेच्या एतत्कालीन रूपाचा जात असतो. भाषेचा नाही.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Tue, 11/24/2015 - 11:35
नवीन
>>>>जुन्या काळात व्हायचे तितक्या वारंवारितेने होऊ लागले तर लोक तिकडे फिरकतील का?
आजच्या पिढीला जुने संगित आवडते का? ह्या प्रश्नावर ते माझे उत्तर आहे. त्यामुळे त्यांनाही ते आवडते इतका त्याचा मर्यादित अर्थ आहे.
तुमचा प्रश्न वारंवारीतेचा आहे. त्यावर, पूर्वीच्या काळाच्या मानाने, आता करमणूकीचे एव्हढे पर्याय उपलब्ध आहेत की असे कार्यक्रम वारंवार होऊ लागले तर तेव्हढी गर्दी नक्कीच जमणार नाही. पण ही परिस्थिती नव्या संगिताचीही आहे. नवे संगित जरी वरचेवर कार्यक्रमातून सादर केले तरी गर्दी होणार नाही.
>>>>पूर्वी सकाळच्या शो(मॅटिनी)ला जुने चित्रपट कमी दरात दाखवले जायचे ते गर्दी खेचायचे. पण रेग्युलर स्लॉटमध्ये ते ठेवले असते तर गर्दी झाली असती का?
मॅटीनी शोज हे कॉलेजच्या वेळात॑ कॉलेज कुमारांना आकर्षित करण्यासाठी केले जात. थिएटर रिकामे ठेवण्याऐवजी एक शो ठेवून कॉलेजकुमार-कुमारींचा मोठा वर्ग आकर्षित करायचा ही व्यावसायिक गणितं असतात. रेग्यूलर शोजला आधुनिक चलनी चित्रपट जे कोणी पाहिलेले नसल्याने जास्त गर्दी खेचतात आणि मॅटीनीला जिथे नोकरी/व्यवसाया मुळे कुटुंब वत्सल प्रेक्षक येत नाही पर्यायाने थिएटर रिकामे जाते. अशा वेळी कॉलेज कुमार/कुमारी. जे कॉलेजच्या वेळात, कॉलेजचे तास बुडवून, विविध कारणांसाठी थिएटर जवळ करतात. घरच्यांना वाटते आपला बाबा/बाबी कॉलेजला गेली आहे. सो सेफ. १२ ते ३ ला मिश्र गर्दी असते. कॉलेज कुमारही असतात आणि श्रमिक वर्गही असतो. इथे तिकीट रेट जास्त असतो. मॅटीनीला निव्वळ कॉलेज कुमार असल्याने त्यांच्या पॉकेटमनीमधे बसेल असे रेट असतात आणि म्हणूनच जुने चित्रपट दाखविले जातात जे चित्रपट लायब्ररी/डिस्ट्रिब्यूटर कडून 'स्वस्तात' मिळतात. ही सर्व व्यावसायिक गणितं आहेत.
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Tue, 11/24/2015 - 09:30
नवीन
खरा धोका हिंदी कडुन आहे. हल्ली च्या कॉस्मो युगामुळे पहिली- दुसरीतली मुले एकमेकांशी हिंदीतुन बोलताना बघितली आहेत. हिंदी तर अतिशय भंकस भाषा आहे मराठीच्या तुलनेत सर्वच बाबतीत. त्यापेक्षा इंग्रजी बोललेले बरे. ( किंवा तामिळ )
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Tue, 11/24/2015 - 09:46
नवीन
एका भाषेचा अभिमान हा असा दुस-या भाषेला भंकस वगैरे म्हणूनच दाखवता येतो हे माहित नव्हतं. कुठलीही भाषा भंकस किंवा हिणकस नसते.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 11/24/2015 - 09:48
नवीन
सहमत
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 11/24/2015 - 09:49
नवीन
सहमत.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Tue, 11/24/2015 - 09:52
नवीन
सहमत
- Log in or register to post comments
म
मोगा
Tue, 11/24/2015 - 09:57
नवीन
पोरों के आइबाप का हिंदी जैसा रहेगा वैसा बच्चों का रहेगा ना ?
- Log in or register to post comments
म
मोगा
Tue, 11/24/2015 - 09:57
नवीन
पोरों के आइबाप का हिंदी जैसा रहेगा वैसा बच्चों का रहेगा ना ?
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
Tue, 11/24/2015 - 10:05
नवीन
एक काम करा बघू .
कबीर , रहिम यांच्या दोह्या पासून हिंदी वाचन सुरु करा .
मग पुढे मैथिली शरण गुप्त, सहानी , बच्चन इत्यादी वाचा पाहू .
टिप : मी हिंदी पुस्तके जास्ती वाचली नाहीत . एक भाषा म्हणून शाळेत आणि नंतर हिंदी महासभेच्या परीक्षा, एवढ्या साठी लागेल ती पुस्तके आणि त्यात येणाऱ्या कथा / कविता वाचलेत .
पण एवढ्या कमी वाचनातून हि हिंदी कुठे हि भंकस वाटली नाही . उलट अतिशय सुंदर भाषा वाटली
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Tue, 11/24/2015 - 10:39
नवीन
मालक - मी मुद्दाम तसे "भंकस" वगैरे लिहीले आहे. मला इतकेच दाखवायचे होते की एकाला जे आवडेल ते दुसर्याला आवडेल असे नाही. कोणाला इंग्लिश मधुन मुलांना शिकवावेसे वाटले तर शिकवू दे की. कोणाला नाही वाटले तर नको. उगाच मातृभाषेचा अभिमान वगैरे कशाला?
कोणाला इंग्रजी मधे शिकुन प्रगती होइल असे वाटत असेल तर वाटू दे की. आपण व्हॅल्यु जजमेंट का करायचे? यनावाला तेच तर करतात ना, मग त्यांना तरी का हसायचे.
इथे आपण जिथे जन्मलो तो देश सोडुन दुसरी कडे जातो, तर मातृभाषेचे काय विषेश.
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
Tue, 11/24/2015 - 10:52
नवीन
एकाला जे आवडेल ते दुसर्याला नाहीच आवडणार. किंवा कोणाला कसं शिकून प्रगती होईल असं वाटतं हे हि आपण नाहीच ठरवू शकत .
पण म्हणून इंग्रजीमधूनच प्रगती होईल हा मुद्दा हि बरोबर ठरत नाही न ?
किंवा तुम्ही म्हणता तसं, मला जर हे वाटत असेल कि मराठी /कन्नड / उर्दू किंवा जी काही तुमची आवडीची प्रादेशिक/ राज्यभाषा असेल त्यातून शिकून प्रगती होईल तर त्यात हि चूक काय ?
त्याचं व्हॅल्यु जजमेंट का करायचे आपण ?
बाकी देश सोडून जातात ते पैसे मिळवण्यासाठी . तिथे भाषा मुद्दा नसतोच कधी .
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Tue, 11/24/2015 - 10:59
नवीन
मला वाटते लोक इंग्रजी माध्यमात जातात ते सुद्धा पुढे पैसे मिळवणे सोप्पे जावे म्हणुन.
मी ही तेच म्हणतोय. त्याचा भावनिक मुद्दा बनवायची गरज नाही मातृभाषा वगैरे शब्द वापरुन, हेच सांगतोय
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
Tue, 11/24/2015 - 11:04
नवीन
वोक्के
माझ्याकडून विषय संपला
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Tue, 11/24/2015 - 09:53
नवीन
हेच सगळं २-३ दा बोलुन झालंय ना..? नाही म्हणजे एका शाळेने इंग्रजी माध्यम सुरु केले ह्यासाठी परत मुळातुन मराठी की इंग्रजी ह्या मुद्द्यावर चर्चा का करावी? तुम्ही तुमच्या लेखात मांडलेले मुद्देच जवळपास सगळ्या चर्चांंमध्ये आले होते.
फायनली ज्याला जे योग्य वाटतं तो ते स्वतःच्या पाल्याबाबत करतो. इथे चर्चा करुन कुणाचंही मत बदलेलं नव्हतं. प्रत्येक जण गिगाबायटी प्रतिसाद देऊन आपलीच बाजु योग्य हेच शेवटपर्यंत बोलत राहिला. परत तेच करण्यात नक्की काय हशील?
असो.. इंग्रजीची गरज आहेच आणि शिक्षणाचे माध्यम ह्याचा आपल्या मातृभाषेचा अभिमान, मातृभाषेत बोलण्याची/ वाचण्याची सहजता तसेच व्यावसायिक यश ह्यांच्याशी संबंध नसतो. इंग्रजी माध्यमाची निवड करण्याची अनेक कारणे असु शकतात. आणि अशा माध्यमात शिकणारी मुले मराठी सुद्धा तेवढ्याच उत्कृष्टपणे बोलु शकतात. हे माझे मत अजुनही तसेच आहे. आणि अजुन काय वेगळं बोलल्या जाऊ शकतं ह्याची मला कल्पना नाही.
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 11/24/2015 - 10:05
नवीन
हेच सगळं सारखं लिहून काय उपयोग वेल्लाकाका? थोडा शिक्षकांच्या दृष्टीने विचार केला तर? आपण शाळांतून शिकून बाहेर पडलो, आपल्याला चारी ठाव सगळं आहे. मराठी माध्यम आहे म्हणताना पोरं येत नसली तर शिक्षकांच्या पोटापाण्याचं काय हो? आपण लाख सांगू शाळा चालू ठेवा, पोटाला चिमटा पडला की अभिमान चुलीवर शिजवता येत नाही हो!!
त्यापेक्षा आपल्या परीने जे जमेल ते करावं. काय सांगावं इंग्रजी बोलणार्यांत जास्तीची मेजॉरिटी झाल्यावर मग परत मराठीप्रेमाचे उमाळे येतील? तोवर आपण आपलं भाषाज्ञान वाढवू आणि नंतर ह्या इंग्रजाळलेल्या पोरांच्या मराठी शिकवण्या घेऊ, काय म्हणता? =))
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
Tue, 11/24/2015 - 10:06
नवीन
तोवर आपण आपलं भाषाज्ञान वाढवू आणि नंतर ह्या इंग्रजाळलेल्या पोरांच्या मराठी शिकवण्या घेऊ
+100
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 11/24/2015 - 10:09
नवीन
काळाचा महिमा !
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 11/24/2015 - 10:08
नवीन
आपण काही ग्रुहीतके मनातुन काढून टाकली पाहीजेत.
१) इंग्रजी शाळेत गेला म्हणजे फाडफाड इंग्रजी बोलता येते, हा पहीला गैरसमज. माझे बरेच मित्र आहेत जे इंग्रजी शाळेत शिकूनही इंग्रजीतुन बोलताना अडखळतात.
२)मराठी शाळेत शिकला म्हणजे इंग्रजीतून फाडफाड बोलताच येणार नाही, हा दुसरा गैरसमज. बरेच मराठी माध्यमातुन शिकलेले मित्र इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांपेक्षा शुध्द आणि फाडफाड इंग्रजी बोलतात.
३)इंग्रजी बोलता येते म्हणजे हुशार, हा तिसरा गैरसमज.
माझा मामेभाउ इंग्रजी माध्यमातून शिकला. घरी इंग्रजीचा अजीबात गंध नसल्यामुळे कींवा अन्य काही कारणामुळे आता कोणत्याच भाषेत स्वतःला व्यक्त करु शकत नाही.
बाकी लहानपणापासून सरस्वती शाळेतील मुलांशी स्पर्धा करत असल्यामुळे मला त्या शाळेबद्दल खूप आदर होता. त्यामुळे या शाळेने हा निर्णय घेतला हे कळल्यावर थोडी हळहळ वाटली. पण आता शाळा पुढे चालवण्यासाठी पुरेशी मुलेच येत नसतील तर संचालक तरी काय करणार? असो.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Tue, 11/24/2015 - 10:13
नवीन
माझे दोन पैसे -
मी माहीममध्ये आणि डोंबिवलीत वाढलो. पहिली ते चौथी माहीम आणि मग पाचवी ते दहावी डोंबिवलीत. माझ्या दोन्ही शाळा - लोकमान्य विद्यामंदिर, माहीम आणि टिळकनगर विद्यामंदिर, डोंबिवली या मी शिकत असताना आपापल्या भागातल्या अनुक्रमे चांगल्या आणि अग्रगण्य शाळा म्हणून प्रसिद्ध होत्या. पण दोन्हीही शाळांमधल्या माझ्या मित्रमैत्रिणींपैकी कोणीही स्वतःच्या मुलांना आपल्याच शाळेत घातलेलं नाही. जे तिथून स्थलांतरित झाले त्यांचं सोडा. जे अजूनही तिथेच राहात आहेत - माहीम आणि डोंबिवली इथे - त्यांनी कोणीही आपल्या मुलांना मराठी
माध्यमाच्या शाळेत घातलेलं नाही आणि जेव्हा मी विचारलं तेव्हा - शाळांचा दर्जा खालावलाय असं उत्तर मिळालं. याचा एक अर्थ हा आहे की लोकांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. ती एक सेवा म्हणून बघण्याकडे कल आहे आणि जर आम्ही पैसे मोजले आहेत तर आम्हाला या-या गोष्टी मिळायलाच पाहिजेत ही अपेक्षा आहे. दुर्दैवाने मराठी शाळा या अपेक्षेला उतरु शकलेल्या नाहीत किंवा मग त्या या अपेक्षांना उतरणार नाहीत अशी काही कारणाने लोकांची धारणा झालेली आहे. माझ्या भागात बालमोहन विद्यामंदिरासारखी अत्यंत प्रसिद्ध आणि गाजलेली शाळा आहे. त्यांनीही इंग्रजी माध्यम सुरु केलं. त्याला आता अनेक वर्षं झाली. बालमोहनचे अनेक विद्यार्थी माझ्या भागात राहतात. त्यातल्या अनेकांनी आपल्या मुलांना बालमोहनमध्येच घातलेलं आहे पण इंग्रजी माध्यमात. आणि का या प्रश्नाला तेच उत्तर. दर्जा खालावलेला आहे.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 11/24/2015 - 16:04
नवीन
शाळेचा उपयोग फक्त समवयस्क मित्र-मैत्रीणीं बरोबर खेळण्यापुरता.
एक व्यावहारिक सत्य----> "डोंबोली एम.आय.डी.सी.तला वडेवाला, कुठल्याही प्रकारे वरकमाई नसलेल्या, सामान्य पगारदार माणसापेक्षा (कंपनीतले सी.ई.ओ., प्रेसीडेंट वगैरे) कितीतरी पटीने जास्त पैसे कमावतो."
ज्याच्या बरोबर व्यवहार करायचे आहेत, मग ते आय.टी. फिल्ड मधले क्लायंट असो वा नाट्यगृहातले प्रेक्षक, त्यांची भाषा आत्मसात करता आली आणि तुमचे कार्यशैली (ह्या "कार्यशैली" वर एखादी जिलबी पाडावी का?) जर सर्वोत्तम असेल तर, ह्या जगात कुठल्याही माणसाला, स्वतःची भाकरी स्वतः कमवायला त्रास होत नाही.
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Tue, 11/24/2015 - 10:44
नवीन
- १००% सहमत.
"मुलाला इंग्रजीत प्रेझेन्टेशन देता आलं पाहिजे, मग त्याला पु लं देशपांडे कोण, शांता शेळके कोण हे माहित नसेल तरी हरकत नाही"
- घरातून, पालकांकडून व्यवस्थित लक्ष दिले गेले तर मुले या दोन्ही गोष्टींमध्ये प्रावीण्य मिळवू शकतात.
मोठ्मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी आयोजीत मुलाखतीत इंग्रजीतून उत्तरे देतांना ततपप होणारे मराठी
माध्यमातील विद्यार्थी नंतर आपल्या पालकांच्याच नावाने ओरडतात इंग्रजी माध्यमात का शिकवले नाही म्हणून.
१०वी पर्यंतचे शिक्षण मराठीत, नंतर अचानक पुढील उच्च शिक्षण इंग्रजीतून घेणे त्यांना कठिण जाते,
सर्वच लोक काही अतिहुशार नसतात.
हल्ली बाहेरच्या जगात वावरतांनाही ठिकठिकाणी इंग्रजी वापरावेच लागते.
इंग्रजी आता जागतिक भाषा आहे आणि ती शिकण्यासाठी इंग्रजी माध्यामतील शिक्षणही तसेच गरजेचे आहे,
त्यात कमीपणा वाटण्यासारखे काही नसावे.
माध्यम कोणतेही असो.. शिकणं, स्वतःला घडवणं हे सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून असतं.
अजून खूप काही लिहीता येईल पण...
पुन्हा पुन्हा त्याच त्या चर्चांवर गिगाबायटी प्रतिसाद टाईपण्याचे कष्ट घेणार्या लोकांचं खरंच खूप कौतुक वाटतं.
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Tue, 11/24/2015 - 10:47
नवीन
हे उत्तर पिलीयन रायडर यांच्या प्रतिसादावर..
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »