Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मरणकल्पना, आत्मा, पुनर्जन्म

य
यनावाला
Sun, 01/03/2016 - 09:33
🗣 68 प्रतिसाद
......... सजीव येई जन्मासी ।अटळ असे मृत्यू त्यासी ।जाणीव प्रत्येक व्यक्तीसी ।जी का असते सज्ञानी ॥१॥ अनुभव आणि निरीक्षण । परस्पर संवाद , वाचन । निष्कर्ष तर्काने शोधून । जाणीव विकसित होतसे ॥२॥ सजीवासी मृत्यू अटळ । प्राण्यांना नकळे सकळ । सज्ञानी मानव केवळ । या सत्यासी जाणतसे ॥३॥ व्याघ्र-सिंह- ससे-भेकरे । मेंढ्या-बकर्‍या-गाई-गुरे । मरणाधीन असती सारे । परि ते सत्य न जाणती ॥४ ॥ पुराणांतरी सात जण । अश्वत्थामा-बळी-बिभीषण । परशुराम-व्यास-हनुमान । तैसा कृप पैं सातवा ॥५॥ यांसी म्हणितले चिरंजीव ।कल्पना केवळ मानीव । त्या त्या काळी सजीव ।ते असतील सातही ॥६॥ परंतु काळीं सांप्रत । या सातांतील जिवंत । कोणीही नसे निश्चित । वैज्ञानिक सत्य हे ॥७॥ देव मानिले अजरामर । नाही मरण नसे आजार । स्वर्गीं तयांचा संचार । सारे कल्पित डोलारे ॥८॥ तैसेचि ते अमृतसत्त्व। नाही तयासी अस्तित्व । मानव इच्छिती अमरत्व । मानसिकता ऐसी दिसे ॥९॥ मरण अटळ सर्वां पटे । परी अंतरी भीती दाटे । मरणासंबंधी शब्द वाटे । अशुभ, अभद्र, अमंगळ ॥१०॥ मयत-प्रेत-मढे- स्मशान । चिता-मर्तिक आणि सरण । तिरडी-गोवर्‍या-मसण । ऐशा शब्दां घाबरती ॥११॥ दशक्रिया-अकरावे-बारावे । शब्द अपवित्र न उच्चारावे । शुभकार्यीं अवश्य टाळावे । पाळिती संकेत अलिखित॥१२॥ भान औचित्याचे असावे । भय शब्दांचे नसावे । कोठे काहीही बोलावे । ऐसा अनर्थ न घ्यावा ॥१३ ॥ घडण्याची जें निश्चिती । टाळणे न कोणा हाती । तयाविषयीं ऐसी भीती । वाटे कोण्या कारणे ?॥१४॥ विवेकी व्यक्तीस ऐसे भय ।अनावश्यक अशोभनीय । मरणी भयदायक काय ।घटना एक नैसर्गिक ॥१५ ॥ वेदकाळी वदले चार्वाक । मरणीं गूढ न काही एक । जीवनी भोगावे सुख । आनंदाने मनुजाने ॥१६॥ यद्यपि मरण नैसर्गिक । जगावे काळ अधिकाधिक । प्राणिमात्रासी प्रत्येक । स्वाभाविक ऊर्मी ही ॥१७ ॥ म्हणौनि मृत्यू अप्रिय । टाळण्या सजीव सक्रिय । परंतु मानवा मरणभय । कदापीही नसावे ॥१८॥ प्रत्येकासी येते मरण । याचे जैविक कारण । जीवशास्त्रज्ञां उमगले जाण । सर्वमान्य असे हे ॥१९ ॥ टेलोमियर-जिनोम-जीन । गुणसूत्रे पेशी विभाजन । जिनोम लांबी त्रुटीकरण । प्रकरण ऐसे बिकट हे ॥२० ॥ द्यावे इथेच सोडोन । परी ऐसे जाणोन । नैसर्गिक मरणाचे कारण । ज्ञात आता मानवा ॥२१ ॥ अटळ मरण नि:संदेह । कांही न उरे जाता देह । जगाचा ऐसा चिर विरह ।असह्य वाटे मनुजासी ॥२२॥ यास्तव आत्मा असे अमर । ऐसा रचिला विचार । नाशवंत केवळ शरीर ।आत्मा जन्मे पुन:पुन्हा ॥२३॥ आत्मयासी शस्त्र छेदीना ।आत्मयासी अग्नी जाळीना । आत्मयासी पाणी भिजवीना । ऐसी ख्याती आत्मयाची ॥२४॥ आत्मा नाही देहीं कोठे । आत्म्याचे अस्तित्वचि खोटे । परी श्रद्धाळूंसी सारे पटे । कारण अमरत्व इच्छिती ॥२५ ॥ शरीर म्हणजे मी नोहे । ओळख माझी आत्मा आहे । तो अमर म्हणौनि पाहे । मीही अमर जाहलो ॥२६॥ विचार करिता खोटे सारे । श्रद्धावंता वाटे खरे। जगी वेगे असत्य पसरे । सत्या लागे विलंब ॥२७॥ संतवाणी- कथा -कीर्तने । गोष्टी-गाणी- आख्याने । नाटके-चित्रपट-प्रवचने । अनेक माध्यमे प्रभावी ॥२८॥ यांद्वारे पुनर्जन्म संकल्पना ।सातत्याने जनमना--। वरती बिंबविली भावना । मनी ठसोनी दृढ झाली ॥२९॥ असोनी असत्य आघवे। सश्रद्ध मानिती भावे । शंका काही न उद्भवे । सत्यासत्याविषयींची ।।३० ॥ आहे का जर पुनर्जन्म । निश्चित होता गतजन्म । त्या जन्मीचे नाम-धाम । स्मरते काय कोणासी ॥३१॥ आपण प्रयत्‍न करावे । गतजन्मीचे काही आठवावे । तैसेचि परिचितां पुसावे । कोणा कांही स्मरते का ॥३२॥ याचे उत्तर प्रामाणिक । नकारार्थी देतील लोक । पुनर्जन्म आहे निरर्थक । ऐसेचि सिद्ध होतसे ॥३३॥ गतजन्मीचे काहीही । आठवते ना कोणाही । पुनर्जन्म कल्पना ही । सत्य कैसी मानावी ? ॥३४॥ अपत्यरूपे माता-पितरे । पुन्हा जन्मासी येती खरे । जनुक-संक्रमण आधारे । मानणे हे शक्य दिसे ॥३५ ॥ परंतु माता-पितयाचा । अर्ध-पुनर्जन्मचि साचा । अपत्यजनुकीं दोघांचा समान वाटा निश्चित ॥३६ ॥ जिवंतपणी माय-तात । अर्धपुनर्जन्म देखतात । अपत्य पाहते प्रत्यक्षात । गतजन्म दोन अर्धेची ॥३७ ॥ शरीरशास्त्रग्रंथी देख । आत्म्याचा ना नामोल्लेख । इंद्रियांचे कार्य हृदयादिक । तयांचे वर्णन परिपूर्ण ॥३८॥ शरीर अंतर्बाह्य अभ्यासिती ।शल्यकर्म यशस्वी करिती । परी आत्म्याचे ना नाम घेती । कधीही देहीं न दिसे तो ॥३९॥ यापरी आत्मा नाही नाही । कोणाच्याही हृदयीं देही । तैं पुनर्जन्म कोण घेई । असत्य पुनर्जन्म संकल्पना ॥४०॥ पहिला तैसाचि शेवटचा । एकचि जन्म प्रत्येकाचा । गतजन्म-पुनर्जन्म कोणाचा । शक्य नसे कालत्रयी ॥४१॥ जाणावे आपण सर्वांनी । शंका असली काही मनीं । विचारे विवर-विवरोनी । निरसन पूर्णत्वे करावे ॥४२॥ असे सत्य वैज्ञानिक । जाणिती मानिती जे विवेक । पूर्वग्रहपीडित भाविक । अज्ञानासी कवटाळिती ॥४३॥ आत्मा-पुनर्जन्म-संचित ।अज्ञान सारे खचित । यास्तव याची संगत । निश्चये आपण सोडावी ॥४४॥ वृथा भीती मरणाची ।काढून टाकावी अंतरीची । अंतिम घटना आयुष्याची । काही न राही नंतर ॥४५॥ अर्चिरादि मार्ग सूर्यलोक । चंद्रलोक-विद्युल्लोक । पितृयान- देवयान -ब्रह्मलोक ।कल्पित सार्‍या भरार्‍या ॥४६॥ जाणणे हे आवश्यक । मानव प्रजातीं जन्म एक । लाभला गेला निरर्थक । ऐसे होईल अन्यथा ॥४७॥ ...................................................................................
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
24984 वाचन

💬 प्रतिसाद (68)
म
मन१ Sun, 01/03/2016 - 09:56 नवीन
पूरक . . पुनर्जन्म या व्यवस्थेसंबंधी काही प्रश्न . . http://www.misalpav.com/node/19118
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 01/03/2016 - 11:52 नवीन
यनावाला, तुमची ३३ वी ओवी निखालास खोटी आहे : >> याचे उत्तर प्रामाणिक । नकारार्थी देतील लोक । पुनर्जन्म आहे निरर्थक । ऐसेचि सिद्ध होतसे ॥३३॥ पुनर्जन्म आहे. पूर्वजन्माची स्मृती असलेल्या छोट्या बालकांना प्रश्न करून त्यावरून पूर्वजन्मातील नातेवाईक शोधले गेलेले आहेत. अधिक माहितीसाठी डॉक्टर इयन स्टेव्हनसन यांची ही पुस्तके वाचावीत : १. Children Who Remember Previous Lives: A Question of Reincarnation http://www.amazon.co.uk/Children-Remember-Previous-Lives-Reincarnation/dp/0786409134 २. Twenty Cases Suggestive of Reincarnation http://www.amazon.co.uk/Twenty-Cases-Suggestive-Reincarnation-Stevenson/dp/0813908728 आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sun, 01/03/2016 - 15:34 नवीन
एक नक्की की माहिती पुरवविण्याचा ेपुस्तक हां महत्वाचा मार्ग आहे पण प्रयोगाविना या युगात काहीही सिद्ध होत नसते .प्रयोगान्ती निष्कर्ष नमूद करण्या करिता पुस्तक काढावेच लागते पण म्हणजे हरेक पुस्तक हे सत्याचा पुरावा असतेच असे नाही मग ते आज वाचनात येणारे रामायणासारखे पुस्तक ही असो वा चार्ली चापलिनचे आत्मवृत्त .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sun, 01/03/2016 - 17:29 नवीन
चौकटराजा, तुम्ही म्हणता की प्रयोगाविना हल्ली काहीही सिद्ध होत नाही. मला ते मान्य नाही. एकतर या प्रसंगी कशासंबंधी प्रयोग करायचा आहे ते स्पष्ट नाही. प्रयोगाचे उद्दिष्ट काय असायला पाहिजे यावर प्रकाश टाकावा. दुसरी गोष्ट म्हणजे पुनर्जन्म सिद्ध करण्यासाठी अचूक निरीक्षण पुरेसं आहे. प्रत्यक्ष प्रयोगाची आवश्यकता नाही. ज्योतिषशास्त्रात ( म्हणजे astronomy ) प्रयोग करता येत नाहीत. केवळ निरीक्षणेच करता येतात. तरीपण ते शास्त्र मानले जाते. याच धर्तीवर पुनर्जन्माचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रयोगाची आवश्यकता पडू नये. केवळ निरीक्षणे पुरेशी ठरावीत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
प
पॉइंट ब्लँक Sun, 01/03/2016 - 19:16 नवीन
प्रयोगाविना या युगात काहीही सिद्ध होत नसते
ह्याचा अर्धवट उपयोग आजकाल स्वयंघोषित विज्ञानवादी करतात. जर पुनर्जन्म आहे हा दावा प्रयोगा अभावी करता येत नसेल, तर पुनर्जन्म नसतो हे सिद्ध करणारा प्रयोग आहे का? जर अस प्रयोग नसेल तर तुमचा दावाही तितकाच वायफळ आहे. An atheist can not be a scientist. A scientist can only be an agnostic!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
र
राजेश घासकडवी Sun, 01/03/2016 - 21:25 नवीन
नाही हो, सिद्धतेचं काम असं चालत नाही. 'जोपर्यंत असिद्ध होत नाही तोपर्यंत सत्य' असं नसून 'सिद्ध होतं ते सत्य' अशा पद्धतीने सत्याची शोधणी चालते. हे समजून घेण्यासाठी रसेलची किटली ही संकल्पना उपयोगी पडते. रसेलची किटली 'Russell wrote that if he claims that a teapot orbits the Sun somewhere in space between the Earth and Mars, it is nonsensical for him to expect others to believe him on the grounds that they cannot prove him wrong.' नल हायपोथेसिस In inferential statistics, the term "null hypothesis" usually refers to a general statement or default position that there is no relationship between two measured phenomena, or no difference among groups.[1] Rejecting or disproving the null hypothesis—and thus concluding that there are grounds for believing that there is a relationship between two phenomena (e.g. that a potential treatment has a measurable effect)—is a central task in the modern practice of science, and gives a precise criterion for rejecting a hypothesis. थोडक्यात, इथे 'पूनर्जन्म नसतो' हा नल हायपोथिसिस आहे. 'पुनर्जन्म असतो' हे म्हणणारांवर तो प्रयोगांतून खोडून काढण्याची जबाबदारी असते. रसेलची किटली अस्तित्वात नाही हे सिद्ध करण्याची इतरांवर जबाबदारी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक
क
कवितानागेश Mon, 01/04/2016 - 01:03 नवीन
पुन्हा जन्म होतोय की नाही हे तपासून बघणारा "प्रयोग" कसा काय करायचा? कोण करणार? ;) अशा वेळेस पूर्वग्रह दूषित नसलेल्या लहान मुलांच्या 'आठवनींवर' विश्वास का ठेउ नये??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
प
पॉइंट ब्लँक Mon, 01/04/2016 - 03:04 नवीन
छान शब्द, अर्थ मात्र काडीचा निघत नाही.
it is nonsensical for him to expect others to believe him on the grounds that they cannot prove him wrong
इथेच सगळी गोची आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा असं कुणी म्हणतचं नाहीये. तुम्हाला फक्त चुक आणि बरोबर इतकेच दोन पर्याय दिसतात. अज्ञात नावाचीही एक गोष्ट असते. जेव्हा एखादी गोष्ट अज्ञात असते तेव्हा ती चुक असे म्हणायचे नाही आणि बरोबर असेही म्हणायचे नाही. विज्ञान आणि तत्वाज्ञानात परत गफलत कराताय.
इथे 'पूनर्जन्म नसतो' हा नल हायपोथिसिस आहे.
अरेरे स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे. स्टॅटिस्टिकल इनफरन्स इथे कसा लावायचा हा मुद्दा हा विषय जरा बाजुला ठेवू. पण नल हायपोथिसिसची संकल्पना इथे नक्कीच गंडली आहे. Null hypothesis can only be rejected. It is never accepted. When you can not reject null hypothesis, only conclusion one can draw is that, there is not enough evidence to reject it. Inability reject a null hypothesis does not give anyone an authority to accept it. Going beyond that the rejection when achieved, is only probabilistic, and susceptible to both type 1 and type 2 errors. त्यामुळे जबाबदारी कुणाची का असेना, तुम्हाला स्टॅटिस्टिकल इनफरन्सचा दुरुपयोग करायचा अधिकार नक्कीच नाही. तुम्हाला समजावे म्हणून परत एकदा भावार्थः आक्षेप पुनर्जन्म आहे की नाही ह्याला नसून तुम्हाला त्याविषयी अथवा त्याच्या विरोधात विधान करायचा अधिकार अद्याप विज्ञानाने दिला आहे असा गोड गैरसमज करून घेण्याला आहे. दोन गोष्टींमधला फरक समजला तर विज्ञानातील बुवाबाजी टाळता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 01/04/2016 - 07:58 नवीन
दोन गोष्टींमधला फरक समजला तर विज्ञानातील बुवाबाजी टाळता येईल. +१०० "आम्हाला सगळं खात्रीने माहीत आहे (पक्षी, आम्ही ब्रम्हज्ञानी आहोत)." असा दावा करणारे आस्तिक/नास्तिक आणि धार्मिक/आधुनिक शास्त्रवाले इतके स्वमतांध असतात की दोघांनाही आपण बुवाबाजी करतो आहे हे दिसतच नाही ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक
स
संदीप डांगे Mon, 01/04/2016 - 08:05 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
पॉइंट ब्लँक Mon, 01/04/2016 - 12:46 नवीन
"आम्हाला सगळं खात्रीने माहीत आहे (पक्षी, आम्ही ब्रम्हज्ञानी आहोत)." असा दावा करणारे आस्तिक/नास्तिक आणि धार्मिक/आधुनिक शास्त्रवाले इतके स्वमतांध असतात की दोघांनाही आपण बुवाबाजी करतो आहे हे दिसतच नाही ! :)
मला जे काही म्ह्णायचं होतं ते जास्त चांगल्या शब्दात लिहलं आहे तुम्ही. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सुबोध खरे Mon, 01/11/2016 - 07:23 नवीन
एक्का साहेब + १००००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
र
राजेश घासकडवी Mon, 01/04/2016 - 16:05 नवीन
याच प्रतिसादात 'पूनर्जन्म होणं' याजागी 'गुरू आणि शनिच्या मध्ये कुठेतरी एक चहाची किटली सूर्याभोवती फिरत असणं' हे घालून बघा. त्यातून जी वाक्यं तयार होतात ती तुम्ही तितक्याच जोरकसपणे मांडता येतात का ते तपासून बघा. नल हायपोथिसिस म्हणजे कुठच्यातरी सिद्ध न झालेल्या हायपोथिसिसला 'विरोध करणं' असा नसतो. 'जोपर्यंत पुनर्जन्म/गुरुजवळची किटली/इतर अनेक कल्पित गोष्टी - यांसंबंधात पुरेसा पुरावा नाही, त्यामुळे या गोष्टी अस्तित्वात नाहीत हे गृहित धरून चालणंच योग्य' याला नल हायपोथिसिस म्हणतात. ज्यांना त्या आहेत हे सिद्ध करायचं अाहे त्यांनी ते पुरावे द्यावेत. इतकी शतकं प्रयत्न करूनही पुरेसे पुरावे नाहीत म्हटल्यावर नल हायपोथिसिस खंबीर होत जातो. 'विज्ञानातली बुवाबाजी' हेदेखील 'जीवशास्त्राचा पाया डळमळीत झाला आहे' यासारखं विधान का? एखाददोन लेख त्यावर लिहीत का नाही तुम्ही? का त्यासाठी मिपा ही योग्य जागा नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक
प
पॉइंट ब्लँक Mon, 01/04/2016 - 16:32 नवीन
इतकी शतकं प्रयत्न करूनही पुरेसे पुरावे नाहीत म्हटल्यावर नल हायपोथिसिस खंबीर होत जातो.
हे कुठल्या स्टॅटिस्टिकच्या पुस्तकात दिले आहे जरा सांगा, माझे अज्ञान जरा दूर होईल.
'विज्ञानातली बुवाबाजी' हेदेखील 'जीवशास्त्राचा पाया डळमळीत झाला आहे' यासारखं विधान का?
ज्या लेखावर तो प्रतिसाद दिला आहे तिथून तर पळ काढलात, इथे किडा करून काय उपयोग. तिथे काय ठरलं होतं ह्याची आठवण करून देतो. तुम्ही तुमच्या लेखातल्या आणि प्रतिसादातल्या दाव्यांना संदर्भ द्यायचे (पियर रीव्हुड जरनल, ब्लॉग नाही) मग मी माझ्या विधानांना संदर्भ देइन. मग पुढे बोलू. उगाच हवेत बाण मारून पळवाटा काढू नका. आता तुमच्या अवकाशातल्या किटली विषयी - कुणाला माहित, उद्या एखादा तुमच्यासारखा हुशार, जंबोजेट दृष्टांत लावून सांगेल की किटली तिथे आपोआप तयार झाली असेल. आणि थोड्या अब्जावधी वर्षांनी आपोआपच तिथे चहा पण तयार होईल. तसही किटली आणि चहा सजीवांपेक्षा कमीच क्लीष्ट. लक्षात येतोय का विरोधाभास?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Mon, 01/04/2016 - 16:45 नवीन
तुम्ही तुमच्या लेखातल्या आणि प्रतिसादातल्या दाव्यांना संदर्भ द्यायचे
मी जे सांगतो ते शाळांमध्ये, युनिव्हर्सिटीजमध्ये, पाठ्यपुस्तकांतून शिकवलं जातं. इतकं प्रस्थापित ज्ञान आहे ते.
उद्या एखादा तुमच्यासारखा हुशार, जंबोजेट दृष्टांत लावून सांगेल की किटली तिथे आपोआप तयार झाली असेल. आणि थोड्या अब्जावधी वर्षांनी आपोआपच तिथे चहा पण तयार होईल. तसही किटली आणि चहा सजीवांपेक्षा कमीच क्लीष्ट. लक्षात येतोय का विरोधाभास?
जंबोजेट दृष्टांत हा लेख तुम्ही नीट वाचलेलं दिसत नाही. त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की असे चमत्कार एका झटक्यात घडत नसतात. त्यासाठी अब्जावधी वर्षं सुधारणा करत नेणारी प्रक्रिया लागते. असो. तुम्ही विज्ञानात बुवाबाजी कशी चालते यावर स्वतंत्र लेखन कराच. वाचायला प्रचंड आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक
प
पॉइंट ब्लँक Mon, 01/04/2016 - 17:08 नवीन
मी जे सांगतो ते शाळांमध्ये, युनिव्हर्सिटीजमध्ये, पाठ्यपुस्तकांतून शिकवलं जातं. इतकं प्रस्थापित ज्ञान आहे ते.
काय सांगताय काय? आयला आम्हीच कुठल्या दळभद्रि शाळेत आणि विश्वविद्यालयात गेलो होतो माहित नाही. बिच्यार्यांनी विश्वविद्यालायात तर, चांगल्या जरनल मधले पेपर पन नियमितपणे वाचा म्हणून सांगतिलं होत. आम्ही आपले मूर्खासारखं आजपर्यंत तेच करत आलो आहोत.
जंबोजेट दृष्टांत हा लेख तुम्ही नीट वाचलेलं दिसत नाही. त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की असे चमत्कार एका झटक्यात घडत नसतात. त्यासाठी अब्जावधी वर्षं सुधारणा करत नेणारी प्रक्रिया लागते.
मी तर कुठ म्हंटल की किटली एका झटक्यात तयार होईल. झाली असेल हळू हळू.
असो. तुम्ही विज्ञानात बुवाबाजी कशी चालते यावर स्वतंत्र लेखन कराच. वाचायला प्रचंड आवडेल.
करू आम्ही आमच्या मर्जीनं, सोयीनं आणि सवडीनं. तोपर्यंत प्रतिसाद गोड मानून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजवैभव Fri, 01/08/2016 - 15:15 नवीन
गप्पा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
व
विवेकपटाईत Sun, 01/03/2016 - 14:37 नवीन
वृथा भीती मरणाची, भाऊ पुनर्जन्म असेल तर माणसाला मरणाची भीती राहणार नाही. एकच जन्म असेल तर माणसाला मरणाची भीती राहणारच. ४५वी ओवी पचली नाही. या जन्मात तर आपण बाबूच राहिलो. मेलो तरी काही चिंता नाही, बघू पुढच्या जन्मी ... राजयोग आहे कि नाही.....
  • Log in or register to post comments
V
viraj thale Sun, 01/03/2016 - 15:10 नवीन
चार्वाक काय बोलुन गेले ते आपण ऐकलेत पण आपली संत परंपरा काय बोलोन गेले ते ऐका. 8399999 जन्म घेतल़े की मनुष्यजन्म प्राप्त होतो.
  • Log in or register to post comments
V
viraj thale Sun, 01/03/2016 - 15:18 नवीन
पुढे आता कैंचा जन्म । ऐसा श्रम वारेसा ।। सर्वथाही फिरो नये । ऐसी सोय लागलिया ।। पांडुरंगा ऐसी नाव । तारू भाव असता ।। तुका म्हणे चुकती बापा । पुन्हा खेपा सकळा ।। ============================= तुकाराम महाराज म्हणतात मनुष्याचा जन्म मिळाल्यावर आता यापेक्षा अधिक वेगळ्या कसल्या जन्माची अपेक्षा ठेवायची, कारण मनुष्याचा जन्म जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सोडवण्यास माणसास मदत करू शकतो. ते म्हणतात एकदा का माणसाचा जन्म मिळाला की या त्याचा एका योनीतून दुसऱ्या योनीत फिरणारा प्रवास संपतो, कारण मनुष्याच्या जन्माला येउन माणसाला इच्छित साध्य करून घेत येते. ते म्हणतात पांडुरंग नावाची होडी आपल्याला या भवसागरातून सोडवू शकते, पार नेऊ शकते, एवढेच नव्हे तर हा पांडुरंग जन्म-मरणाच्या फेऱ्यातून देखील सोडवू शकतो फक्त माणसाची त्याच्यावर नितांत श्रद्धा हवी.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 01/03/2016 - 16:10 नवीन
छान काव्य ! बा़की सगळे ठीक आहे पण अन्यथा छान सारासारावर चाललेले काव्य एका ठिकाणी मानसशास्त्रावरून घसरून अध्यात्मात पडले आहे. "वृथा भीती मरणाची । काढून टाकावी अंतरीची ।" हे दुसर्‍याला सांगणे सोपे आहे. पण, कोणताही (आस्तिक, नास्तिक, अज्ञेयवादी किंवा इतर कोणताही) झेंडा हाती धरलेल्या मानवात जीवनाची आसक्ती नसणे हे अत्यंत अभावानेच दिसते. आपले आयुष्य आनंदाने उपभोगता यावे अशी जन्मभर इच्छा धरणारा मानव त्या आयुष्याचा शेवट आल्यावर... काही सन्माननिय अपवाद वगळता... कावराबावरा होतोच. मानवाला मरण अटळ आहे हे सगळ्यांनाच मान्य असते. पण मृत्युची भिती न बाळगणे बहुसंख्य माणसांच्या ताकदीपलिकडचे असते... ... आणि त्यात तसे फार वाईट काहीच नाही. कारण, "जगण्याची आसक्ती" हे मानवी प्रजातीला आतापर्यंत पृथ्वीवर टिकवून ठेवण्यासाठी एक फार महत्वाचे कारण ठरले आहे. इतर वेळेस वाघ असलेले, पण मरणाच्या भितीने चळचळा कापणारे किंवा मरणाच्या मार्गावर असताना त्या कल्पनेनेच गलितगात्र झालेले, खूप नास्ति़क पाहिले आहेत. :)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 01/05/2016 - 05:42 नवीन
इतर वेळेस वाघ असलेले, पण मरणाच्या भितीने चळचळा कापणारे किंवा मरणाच्या मार्गावर असताना त्या कल्पनेनेच गलितगात्र झालेले, खूप नास्ति़क पाहिले आहेत. :)
मला अस वाटत की लोक मरणापेक्षा वेदनेला घाबरतात. मरण कुणाला टळलेल नाही हे प्रत्येक जाणतोच पण ते कसे येणार आहे हे जाणत नाही. म्हणून वेदनादायी मरण येवू नये अशी इच्छा असते. यावरील काही चर्चा परमसखा मृत्यू: किती आळवावा १) परमसखा मृत्यू : किती आळवावा.... http://www.mr.upakram.org/node/1386 २) सुखांत http://www.mr.upakram.org/node/2168 ३) पुन्हा एकदा सुखांत! http://www.mr.upakram.org/node/2491 ४) सन्मानाने मरण्याचा हक्क http://www.aisiakshare.com/node
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अर्धवटराव Tue, 01/05/2016 - 06:42 नवीन
भय मृत्युचं नसुन त्यामुळे येणार्‍या जाणत्या/अजाणत्या दु:खाचं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 01/05/2016 - 07:44 नवीन
मी "मरणाची भिती" लिहिलेय, "वेदनेसह आलेल्या मरणाची भिती" असे लिहीले नाही. त्या वाक्यातील शब्दांमागे कोणताही गर्भित अर्थ नाही. :) "ठासून बोलणे" आणि "प्रत्यक्ष तशी वेळ आल्यावर वागणे" यात बराच (?जमीन-अस्मानाचा) फरक असणे हे माणसात अजिबात विरळ नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
अ
अर्धवटराव Sun, 01/03/2016 - 19:19 नवीन
.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 01/04/2016 - 01:06 नवीन
तुम्हाला अर्थाबद्दल बोलायचय की काव्याबद्दल?! कुणाच्या काव्यगुणाचा अनादर करू नये हो अर्धवटराव. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Mon, 01/04/2016 - 06:49 नवीन
या काव्यप्रकारातुन एक नवी (कि जुनीच ??) बुवाबाजी सुरु आहे त्याचं कौतुक करायचं होतं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
स
संदीप डांगे Mon, 01/04/2016 - 10:51 नवीन
;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
उ
उगा काहितरीच Sun, 01/03/2016 - 21:02 नवीन
७ ओळी (श्लोक) कमी केल्या असत्या तर यनावाला चालीसा झाली असती ! जाऊ द्या यनावाला सत्तेचालीसा म्हटलेले चालेल का ? रच्याकने इतकं मोठं काव्य कसं काय केलं हो ? रचलं ?सुचलं ? झालं ? का स्फुरलं ?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 01/04/2016 - 07:45 नवीन
"पडलं..."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
ग
गामा पैलवान Mon, 01/04/2016 - 20:22 नवीन
उ.का., सत्तेचालीसा वरून ४७ डोकी मारल्याचं आठवलं : http://misalpav.com/node/34341 यास काव्याचा प्रेरणास्रोत म्हणण्यास हरकत नसावी ! ;-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
य
याॅर्कर Mon, 01/04/2016 - 09:12 नवीन
काही प्रश्न 1)पुनर्जन्म आहे म्हणणार्यांना स्वतःचा काही अनुभव? 2)पुढच्या वेळी अमेरिकेत जन्म मिळावा यासाठी कोणत्या प्रकारचे कर्म करावे. 3)पुरूषाला स्त्रीचा आणि स्त्रीला पुरूषाचा जन्म मिळतो का? 4)पुनर्जन्माबाबत स्मृती असलेल्या उदाहरणांपैकी एकही असं उदाहरण नाही कि तो मागच्या जन्मी कुत्रा,बैल,गाढव,घोडा,मासा,साप,हत्ती होता असे सांगत आहे, कारण तसं सांगितल्यावर खात्री करायला कोण जाणार? नाही का? 5)लोकसंख्या वाढत आहे म्हणजेच आत्म्यांची संख्या सुद्धा वाढत आहे.पण आत्म्याचे विभाजन तर होऊ शकत नाही.मग हे वाढीव आत्मे कोठून येत आहेत? म्हणजे 1920 साली भारताची लोकसंख्या 40 कोटी होती म्हणजेच 40 कोटी आत्मे होते, आता ती लोकसंख्या 125 कोटी आहे,म्हणजे मधल्या काळात 85 कोटी नवीन आत्म्यांचं प्रोडक्शन झालं म्हणायचं? 6)कर्मानुसार त्याचं फळ मिळतं.म्हणजे दुसरा जन्म मिळतो,पण वाघाला जर माणसाचा जन्म घ्यायचा असेल तर त्याने कोणते कर्म करावेत? कारण दररोज प्राणीहिंसा करून तो वाघ पापच करत आहे.मग त्याला मनुष्य जन्म मिळणार कसा?
  • Log in or register to post comments
N
NiluMP Mon, 01/04/2016 - 16:55 नवीन
१०१ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 01/04/2016 - 17:04 नवीन
5)लोकसंख्या वाढत आहे म्हणजेच आत्म्यांची संख्या सुद्धा वाढत आहे.पण आत्म्याचे विभाजन तर होऊ शकत नाही.मग हे वाढीव आत्मे कोठून येत आहेत? म्हणजे 1920 साली भारताची लोकसंख्या 40 कोटी होती म्हणजेच 40 कोटी आत्मे होते, आता ती लोकसंख्या 125 कोटी आहे,म्हणजे मधल्या काळात 85 कोटी नवीन आत्म्यांचं प्रोडक्शन झालं म्हणायचं? हँ, हे एकदम सोप्पाय ! या दुष्ट, क्रूर (आणि बरेच काही असलेल्या) मानवांनी स्वच्छता आणि आरोग्याच्या नावाखाली कीटकनाशके वापरून एकंदर किती कीटक मारले, आधुनिक वैद्यकाच्या नावाखाली अँटिबायोटिक्स वापरून एकंदर किती बॅक्टेरिया मारले आणि शिकारीच्या नावाखाली बंदुका वापरून एकंदर किती प्राणी मारले (आणि किती प्रजाती नामशेष केल्या) याचा हिशेब लावलात तर, गेला बाजार, टोटलमध्ये आत्मे कमी पडणे तर सोडाच, पण कित्ती कित्ती तरी आत्मे रिझर्वमध्ये नव्या जन्माची वाट पहात रांगेत उभे असतील हे नक्की पटेल. ;) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर
य
याॅर्कर Mon, 01/04/2016 - 17:29 नवीन
रोचक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
र
राजेश घासकडवी Mon, 01/04/2016 - 17:04 नवीन
लोकसंख्या वाढत आहे म्हणजेच आत्म्यांची संख्या सुद्धा वाढत आहे.पण आत्म्याचे विभाजन तर होऊ शकत नाही.मग हे वाढीव आत्मे कोठून येत आहेत?
काहीतरी यडपणासारखा प्रश्न. एकतर आत्मा अमर आहे पण म्हणून नवीन तयार करता येत नाही असं कोणी सांगितलंय? आणि नवीन करण्याची गरज तरी काय? साडेसहा कोटी वर्षांपूर्वी एक महाप्रचंड उल्का पृथ्वीवर आदळली आणि त्यात सगळे डायनोसॉर मेले. त्यांंचेच आत्मे कित्येक लाख योनींमधून जाऊन आता ह्यूमन फॉर्ममध्ये दिसत आहेत, समजलं?
कारण दररोज प्राणीहिंसा करून तो वाघ पापच करत आहे.मग त्याला मनुष्य जन्म मिळणार कसा?
प्राणीहत्या करणं हेे वाघाचं कर्मच आहे. त्याचं तो मुकाट्याने पालन करतो. मात्र तो इतर वाघांची पोरंदेखील मारून खातो. आता हेदेखील त्याच्या कर्माचाच भाग आहे किंवा कसं हे माहीत नाही. त्यामुळे त्याला पुनर्जन्म चांगला मिळायला मदत होते की नाही हेही तज्ञांनाच विचारायला हवं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर
य
याॅर्कर Mon, 01/04/2016 - 17:37 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
प
पगला गजोधर Mon, 01/04/2016 - 09:54 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 01/05/2016 - 15:06 नवीन
पग, ब्यार्बीवाले मुडदा गाडंत नसतात. पेटीवत्यात. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
त
तिमा Mon, 01/04/2016 - 13:00 नवीन
जगबुडीच्या वेळेस सर्वच आत्मे एकाच वेळेस वर जातील. त्यानंतर पृथ्वीवर पुन्हा अनुकूल परिस्थिती होईपर्यंत ते पुनर्जन्म घेणारच नाहीत का ? की त्यांचे अमीबा होतील ?
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 01/04/2016 - 18:43 नवीन
मेनी लाईव्ज मेनी मास्टर्स वाचा. गंडायला होईल वाचुन.
  • Log in or register to post comments
स
स्पा Tue, 01/05/2016 - 06:08 नवीन
मेनी लाईव्ज मेनी मास्टर्स
वाचलंय, एवढी फेकाफेकी वाचून डोकं ओउट झालं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
स
सतिश गावडे Wed, 01/06/2016 - 18:02 नवीन
अगदी हेच लिहीणार होतो. पण आम्ही पडलो नास्तिक. म्हणून गप्प बसलो होतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
प
प्रसाद गोडबोले Tue, 01/05/2016 - 08:51 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
य
यनावाला Tue, 01/05/2016 - 12:26 नवीन
मरण अटळ आहे हे समजते.म्हणून नैसर्गिक मृत्यूची भीती नाही.मला ७५ व्या वर्षीं नाही.पंचविसाव्या वर्षीं नव्हती, म्हणजे जीवनाची आसक्ती नाही असे नाही. आनंदाने अधिकाधिक जगायचे आहे. जगाविषयीचे सत्यज्ञान मिळवायचे आहे. इतरांना सांगायचे आहे, नैसर्गिकमृत्यू येणार हे समजते. पण जबडा पसरलेला वाघ अचानक समोर आला तर भीती वाटणारच. त्याचे सुळे शरीरात घुसल्यावर ज्या वेदना होतील त्यांची भीती आहे. पण अशा प्रसंगाची संभवनीयता नगण्यच. म्हणून मरणाला चळचळा कापण्याचे काहीच कारण नाही.अनेकांचे शांत मृत्यू पाहिले आहेत.माझ्या ज्येष्ठ बंधूचे निधन हे जवळचे उदाहरण आहे,
  • Log in or register to post comments
य
याॅर्कर Tue, 01/05/2016 - 13:58 नवीन
.मला ७५ व्या वर्षीं नाही
नमस्कार करतो हं आजोबा. . . . . ज्यांनी ज्यांनी सत्य सांगण्याचा प्रयत्न केला त्यांचा फार छळ केलाय समाजाने.(नकळत तुमचाही होत असेल?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
च
चौकटराजा Tue, 01/05/2016 - 14:58 नवीन
मृत्युला तयार आहे. जगण्यात रस वाटतो आहे. वेदनेला घाबरत आहे .नास्तिक आहे पण जन्म पालन व मरण हे ईशवराचे सर्वोत्तम डिझाईन आहे असे मानतो. मी ही शांतपणे आलेले मृत्यु पाहिले आहेत. मला स्वतः ला असे वाटते की खर्या मृत्यूवेदना येण्यापूर्वी माणूस जाणीवांच्या पलिकडे जात असावा.कन्वल्शन कोमा व डेथ अशा तीन अवस्थातून .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
क
कंजूस Tue, 01/05/2016 - 17:03 नवीन
तिनही नाहीत असे बुद्धाचे तत्त्वज्ञान आहे.बरोबर. विषयच संपतो.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 01/05/2016 - 17:04 नवीन
ते कपिलमुनिंच्या सांख्ययोगातूनच घेतले आहे.
  • Log in or register to post comments
न
नितीनचंद्र Wed, 01/06/2016 - 10:20 नवीन
आहे का जर पुनर्जन्म । निश्चित होता गतजन्म । त्या जन्मीचे नाम-धाम । स्मरते काय कोणासी ॥३१॥ आपण प्रयत्‍न करावे । गतजन्मीचे काही आठवावे । तैसेचि परिचितां पुसावे । कोणा कांही स्मरते का ॥३२॥ भारतातले सोडुन द्या लास्ट बर्थ रिग्रेशन थेअरी वाचा. परदेशी सायकोलोजीस्ट ने मांडलेली थेअरी आहे. मग पटणारच. योग सुध्दा आधी परदेशात गाजला मग भारतीय लोकांना पटला.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा