Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वीरगळांच्या शोधात

प
प्रचेतस
Sun, 02/28/2016 - 11:34
💬 154
a २००२ सालचा साधारण मार्चचा महिना. आता नक्की आठवत नाही, पण तेव्हा नासिकवरुन रतनगडला निघालो होतो. घोटीनंतर एक घाट चढून कळसूबाईच्या पायथ्याचं गाव बारी गाठलं. तिथून शेंडी. शेंडी हे भंडारदरा धरणालगतचं गाव. तिथून रतनवाडी साधारण २० किमी. २००२ साली हा भाग फारच दुर्गम होता. वाहतुकीची साधनं अत्यल्प होती, रस्ताही खूप खराब आणि बराचसा कच्चा होता. शेंडीवरुन तेव्हा जवळपास पाऊण तास लागला होता रतनवाडीला पोहोचायला. वाडीच्या सुरुवातीलाच अमृतेश्वर मंदिर. तेव्हा आजूबाजूचा परिसर अगदी साधाचाच होता. आजमितीस मात्र खूपच बदल झाला आहे. तर मंदिराच्या शेजारीच एक पुष्करणी आहे, त्याच्याजवळच एक भलामोठा वृक्ष. त्याच्या बुंध्यापाशी काही भल्यामोठ्या शिळा रचून ठेवलेल्या. जवळपास पुरुषभर उंचीच्या शिळा आणि त्यावर काही युद्धांचे प्रसंग कोरलेले. कुठल्याही प्रकारच्या वीरगळांशी तो माझा प्रथम परिचय. त्याआधीही कित्येकदा वीरगळ पाहिले असतील, नाही असं नाही पण ते आता आठवत नाही किंवा त्यांना काहीतरी कोरलेली अशी शिळा ह्या दृष्टीनेही पाहिलं गेलं असावं किंवा त्यांचं महत्व तेव्हा माझ्या गावीही नसावं. पण रतनगडाची ती भ्रमंती काही नवं असं देणारी ठरली. रतनवाडीतले वीरगळ a ह्यानंतरही जवळपास ७/८ वर्षे गेली. भटकंत्या चालूच होत्या. पण केवळ त्या एका ठराविक दिशेने जात नव्हत्या. मौजमजेसाठी निरुद्देश भटकंती असेच काहीसे स्वरूप येत होते. पण त्याच वेळी मूर्तींविषयी, वीरगळांविषयी, स्मारकशिळांविषयी सुप्तावस्थेतील आकर्षण हळूहळू वाढत होते. नंतरच्या बर्‍याच फिरस्त्यांमध्ये असंख्य वीरगळांशी परिचय होत गेला. त्यापैकी एक आठवतोय तो राजमाचीवरचा. राजमाची किल्ला बहुतेकांना माहितच असेल. लोणावळ्याहून रात्री ११ ला निघालो ते उढेवाडीला पहाटे ४ च्या आसपास पोहोचलो. वाडी खूपच छान, भोवताली सगळं गच्चं रान, मोरांची केकावली तर सततच. बिबट्याच्याही डरकाळ्या काही वेळा ऐकू येतात. वाडीपासून श्रीवर्धनच्या जायच्या पायवाटेने एक हलकसं टेपाड चढून आपण श्रीवर्धन-मनरंजनच्या खिंडीत येतो. तिथेच मध्यभागी भैरवनाथाचं शिवकालीन राऊळ. भोवताली घनगर्द राई. तर राउळाला लागूनच एक वीरगळ आहे. त्याची एकंदर रचना पाहता तो अलीकडचा म्हणाजे शिवकालीन असावा हे तसं लक्षात येतं. शिल्पपट्टीका नाहीत. फक्त लढणारा आणि नंतर मृत झालेला वीर. इतकंच. राजमाचीचा वीरगळ a आपल्या पुण्याजवळच्या बाणेर गावात एक टेकडी आहे. त्या टेकडीत प्राचीन लेणं आहे हे माहित होतं पण जायचा योग आला नव्हता. एकदा मात्र निघालोच. बाणेर गावातल्या हनुमान मंदिरापासूनच लहान बोळांतूनच लेणी मंदिरापर्यंत वर जायला पायर्‍या आहेत. एकाच अखंड कातळात खोदून काढलेलं हे शैव लेणं हे बहुधा ९/१० व्या शतकातलं असावं. त्या लेण्यात आणि लेण्यांबाहेर काही वीरगळ पडलेले आहेत. बहुधा इथे पूर्वी लहानशी लढाई झालेली असावी. ह्या लेणीच्या बाहेरच एक बलीवेदी पण मिळाली. बलीवेदी म्हणजे बळी ज्या शिळेवर देतात तो दगड. ही एक लहानशी चौकोनी सपाट शिळा असून चारही कोपर्‍यांवर बकर्‍याची मुंडकी कोरलेली आहेत. बाणेर वीरगळ a - a बलीशिळा a एकदा अंजनेरीला गेलो होतो. अंजनेरी नाशिकपासून साधारण १०/१२ मैलांवर. भल्यामोठ्या कातळकड्यावर निर्मिलेला अजस्त्र किल्ला आणि पायथ्याला गावात १६ प्राचीन मंदिरांचं संकुल. ह्या मंदिरांत असंख्य भग्नावशेष आहेत. आमलक, स्तंभांचे भाग, मूर्ती, वीरगळ इत्यादी. तिथेच आहे एक आगळावेगळा वीरगळ. आगळावेगळा असं म्हणण्याचं कारण वीरगळाच्या खालच्या पट्टीत एक वीर दुसर्‍या वीराचे केश धरुन त्याचं मस्तक धडावेगळं करताना दाखवलाय. पूर्वीच्या काळी युद्धांत मस्तकाचे केश धरुन सैनिक शत्रूंची मस्तके धडावेगळी करायचे हे टाळण्यासाठी म्हणून बहुतेकवेळा प्रतिस्पर्धी सैनिक मुंडण करुन युद्धात उतरायचे. अंजनेरी वीरगळ a माळशिरस हे लहानसं गाव यवतच्या भुलेश्वरापासून चारेक किमी अंतरावर, अगदी दुर्लक्षित पण पुरातन संपन्न गावची लक्षणे जागोजागी आढळतात, गावची वेस विस्तीर्ण वाड्यांचे भग्नावशेष, १२/१३ व्या शतकातले एक प्राचीन शिवमंदिर जे आता हनुमान मंदिरात परावर्तीत केलं गेलं आहे पण मूळची मंदिरातली आतली शिवपिंड भग्नावस्थेत मंदिराच्या बाहेर झाडोर्‍यांत पडलेली आहे. त्या मंदिराच्या आवारात काही वीरगळ आहेत तर काही थेट गावच्या वेशीवरच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीत चिणलेले आहेत. तीन तीन शत्रूंशी एकहाती युद्ध करुन धारातीर्थी पडलेल्या वीराला चार चार अप्सरांनी स्वर्गास पोहोचवतात. माळशिरस वीरगळ a माळशिरस वीरगळ a- a ह्या माळशिरसपासून जवळच नायगांव हे अगदीच लहानसं गाव. इथेही एक हल्लीच जीर्णोद्धार केलेलं प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर पुष्करिणी. प्रथमदर्शनी मंदिर तसं अनाकर्षकच वाटतं. मंदिराच्या पुढ्यातच नंदीमंडप. ह्या मंदिराच्या आवारात एक वीरगळ अर्धाअधिक जमिनीत पुरलेला आढळेला. सर्वात वरचं 'यावच्चंद्रदिवाकरौ' हे नीटपणे दृश्यमान आहे. ह्याच मंदिराच्या आवारात दोन तीन सतीशिळाही आहेत. ह्यातली एक सतीशिळा तर थेट मंदिराच्या अंतर्भागातल्या भिंतीत चिणलेली आहे. सतीशिळा म्हणजे पतीनिधनानंतर सती गेलेल्या स्त्रीच्या स्मरणाअर्थ तिचे स्मारक म्हणून सतीचा आशीर्वादपर हात कोरलेली शिळा बनवणे. ह्या प्राचीन निष्ठुर परंपरांचा भाग असणार्‍या शिळा मला कायमच अवस्थ करतात. नायगावच्या सिद्धेश्वर मंदिरातील अर्धाअधिक पुरलेला वीरगळ आणि तिथलीच सतीशिळा aa नायगाव सतीशिळा a सतीशिळेवरनं आठवलं. सासवडच्या नाझरे गावानजीक कोथळे नावाचं एक लहानसं गाव आहे. तिथे एकदा फिरत गेलो होतो. गावाशेजारी एक अगदी लहानशी टेकडी आणि टेकडीवर लहानसं प्राचीन शिवमंदिर. ह्या मंदिराच्या आवारातही एक सतीशिळा आहे. a ह्या कोथळ्यातही बरेच वीरगळ आहेत. हया शिवाय वीरगळांसाठी सपाट केलेल्या कित्येक शिल्पविहिन शिळादेखील तिथे पडलेल्या आहेत. तिथे आहेत गोवर्धन वीरगळ. गोवर्धन वीरगळ म्हणजे गाईगुरे पळवण्यास आलेल्या चोरट्यांविरुद्ध्/शत्रूंविरुद्ध युद्ध करुन आपले बलिदान केलेल्या वीरांचे स्मारक. ह्या वीरगळआंमध्ये सर्वात खालच्या पट्टीकेवर मृत वीराच्या बाजूने गाईगुरे कोरलेली आढळतात. गोवर्धन वीरगळही बर्‍याच ठिकाणी आहेत. मी किमान ३० ते ४० तरी आतापर्यंत पाहिलेले आहेत. कोथळ्याचा गोवर्धन वीरगळ a एकदा पूरच्या नारायणेश्वरास गेलो होतो. हे पूर म्हणाजे आताचे सासवडनजीकचे पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याचे नारायणपूर. ह्या गावचा रामचंद्रदेव यादवाचा पूर शिलालेख प्रसिद्ध आहे. ह्या शिलालेखात रामदेवरायच्या दंडनायक बाईदेव व अजून कुण्या एका प्रधान सेनापतीचा उल्लेख आला असून हेमाद्री पंडिताला 'लोककर्माधिकारी' अर्थात लोकोपयोगी कामे करणारा म्हणून नियुक्त केले गेल्याचा उल्लेख आहे. प्रस्तुत लेख सध्या भारत इतिहास संशोधक मंडळात आहे. तर ह्या पुरात नारायणेश्वराचे यादवकालीन मंदिर असून त्याच्या पुढ्यातल्या रस्त्याच्या पलीकडे एका खोपटात व तिथेच एका शेतात अशा दोन सतीशिळा आहेत. ह्यातील एक सतीशिळा फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे. एक.दोन नव्हे तर सतीचे तब्बल चार हात एकाच शिळेवर कोरलेले आहेत ह्यांखेरीज लढाईचे दृश्यही आहेच. कदाचित एकाच वेळी सती गेलेल्या अनेक स्त्रियांचे स्मारक म्हणून ही शिळा कोरलेली असावी. पूरची सतीशिळा a तिथलीच एक दुर्लक्षित सतीशिळा a आताच डिसेंबर महिन्यात रत्नांग्रीस मित्रांबरोबर होतो. तिथे पावसला जाण्याचा योग आला. मग तिथेच गणेशगुळे आणि पावसच्या आसपास भटकत राहिलो. पावसजवळ गुरववाडी म्हणून एक लहानशी वाडी आहे. तिथल्या मंदिरात काही शिळा पडलेल्या दिसल्या. त्या सर्वच सतीशिळा. जवळपास १०/१२ सतीशिळा तेथे इतरत्र विखुरलेल्या आहेत. गुरववाडी, पावस सतीशिळा a भर उन्हाळ्याचे दिवस. साधारण एप्रिल महिन्याची अखेर. उन्ह अगदी रणरणतं. अशा तापत्या दुपारी पेडगावला गेलो होतो पेडगावची ती पहिली भेट. नंतर तीनचार वेळा पुन्हा पुन्हा पेडगावला जाऊन आलो. पेडगावला विस्तीर्ण भुईकोट आहे. सध्या पुर्ण भग्न झालेला. औंरंगजेबाचा सरदार बहादुरखानाने बांधलाय. किल्ल्याचा कोट शिल्लक आहे. आतमध्ये मात्र बांधकामे हुडकावी लागतात. किल्ल्यात फिरणे तसे धोक्याचे कारण सगळीकडे वेड्या बाभळीचे जंगल माजलंय. ह्याच पेडगावच्या बहादूरगडात संभाजी महाराजांना हात लाकडांना बांधून आणि विदुषकाची टोपी घालून औरंगजेबाने मिरवत आणलं होतं, नंतर येतेच राजांचे डोळे काढले होते. तर ह्या पेडगावातच पाच यादवकालीन मंदिरे आहेत. ती पण एकापेक्षा एक सरस आणि अतिशय शिल्पसमृद्ध अशी. ह्या मंदिरांवरुन येथे पूर्वी यादवांचं मोठं ठाणं असावं असं वाटतं. तसंही इथल्या आजूबाजूच्या परिसरात भीमेकाठी असंख्य मंदिरे आहेत. तर पेडगावला अशी सरस पाच मंदिरे असूनही वीरगळ मात्र मला एकच दिसला, येथेच एक सतीशिळाही आहे. पेडगाव वीरगळ a पेडगाव सतीशिळा a एकदा मोरगावजीकच्या लोणी भापकरला गेलो होतो. लोणी भापकर तिथल्या एका प्राचीन मंदिरामुळे आणि तिथे असलेल्या यज्ञवराहाच्या देखण्या मूर्तीमुळे मूर्तीअभ्यासकांत प्रसिद्ध आहे. हा भाग कायमचाच दुष्काळी. ऐन पावसाळ्यातही येथे पावसाचे दुर्भिक्ष्य असते. मात्र येथेही तीन चार मंदिरे आहेत आणि असंख्य सुस्पष्ट वीरगळ. जवळपास २५ ते ३० वीरगळ ह्या गावात आहेत. खास येथील मंदिरे आणि हे वीरगळ बघण्यासाठी गावात यावं. गावात एक पूर्ण बेवसाऊ झालेला गढीवजा किल्लाही आहे. लोणी भापकर वीरगळ a लोणीभापकरच्या जवळच पांडेश्वर हे गाव. तिथून सुमारे १०/ १२ किमी अंतरावर. येथेही एक प्राचीन मंदिर शिवाय असंख्य वीरगळ आहे. मात्र येथे वेगळाअच वीरगळ आहे तशा प्रकारचा मी इतरत्र कुठेही पाहिलेला नाही. तो आहे वाघाशी लढून मृत झालेल्या वीराचा. ह्या वीरगळाच्या मधल्या पट्टीत वीर वाघाशी झुंज घेताना दाखवलाय. पांडेश्वरचा आगळा वेगळा वीरगळ a आता मध्ये मागच्या पावसाळ्यात किकलीला गेलो होतो. किकली मंदिराबदल आणि तिथल्या वीरगळांबद्दल मी लिहिलेलंच आहे. किकली हे जणू वीरांचंच गाव- वीरगळांचंच गाव. सुमारे दोनशेच्या आसपास वीरगळ किकलीत आहेत ते अगदी कुठेही सापडतात. घराच्या भिंतीत चिणलेले, मंदिरांपाशी, विहिरीपाशी, पारावर, अगदी गटारावर देखील. किकलीचे वीरगळ a तर ह्या किकलीपासून शेरी लिंबच्या बारा मोटेची विहिर पाहण्यास निघालो. ही विहिर म्हणजे मराठेकालीन शैलीत बांधलेलं मोठं अद्भूत प्रकरण. शेरी लिंबला जाताना वाटेत गोवे नावाचं एक लहानसं गाव लागतं. ते गाव ओलांडून जाताच वाटेत एक भग्न वीरगळ दुर्लक्षित अवस्थेत दिसला. गोवे वीरगळ a शेरी लिंबवरुन पाचवडमार्गे वाई गाठलं तिथून मेणवलीचा नाना फडवणीसांचा वाडा पाहून धोम गाठलं. धोम गाव बहुत सुंदर. झाडांनी वेढलेलं आणि पेशवेकालीन स्थापत्याची अप्रतिम मंदिरे असलेलं. ह्या धोमच्या अलीकडेच भोगाव आहे. भोगाव प्रसिद्ध आहे ते वामनपंडिताच्या समाधीसाठी. अर्थात मूळ समाधी सातारा जिल्ह्यातच कोरेगाव येथे आहे आणि भोगाव येथील समाधी वामनपंडितांच्याच कुण्या एका शिष्याने गुरुस्मरणार्थ बांधली आहे. ह्या भोगावमधेच अर्धनिम्म यादवकाळातलं मंदिर शिल्लक आहे. छताचा भाग पेशवेकाळात जीर्णोद्धारीत केला गेलेला आहे. ह्या मंदिराच्या पुढ्यातच प्रचंड गचपण आहे. तिथल्या त्या झाडीतच जमिनित पुरला गेलेला एक भग्न वीरगळ दिसला. काट्याकुट्यांतून मार काढत तिथवर पोहोचलो. लढाई आणि धारातीर्थी पडलेला वीर हे भाग गाडलेले गेलेले आहेत तर वरचा अप्सरा वीराला नेतात हा भाग फक्त दृश्यमान आहे. भोगाव वीरगळ. a आता मध्ये परत एकदा अमृतेश्वराला गेलो होतो. अगदी दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट. रतनवाडीला किमान ४/५ वेळा जाऊनही एक गोष्ट ध्यानात आली नव्हती ती तेव्हा आली. मंदिराच्या पाठीमागच्या प्रवेशद्वारातून आत जाताच वर छताकडे पाहिले असता तिथे छताची भिंतउलटे वीरगळ रचलेले आहेत. मंडिराच्या बाहेरील वीरगळांची येथल्या धुव्वाधार पावसामुळे खूपच हानी झालेली दिसते पण येथले आतले वीरगळ अगदी उत्तम स्थितीत आहेत. अर्थत हे पाहण्याकरीता उताणे झोपून वर पाहावे लागतात शिवाय विजेरीचा झोतही मारावा लागतो नाहीतर अंधारामुळे ते दिसत नाहीत. रतनवाडी अमृतेश्वर मंदिरातील छतांत असलेले वीरगळ a ह्याच अमूतेश्चर मंदिराच्या आवारात एक गधेगाळसुद्धा आहे. गधेगाळावरील शिलालेख पूर्णपणे झिजल्याने वाचता येत नाही, शिवाय ह्याचे वाचन पूर्वीही कधी झाले नाही मात्र हा लेख अमृतेश्वर मंदिराला दिलेल्या दानाबद्दलचा असावा व ह्या दानाचा लोप करणार्‍यांविषयी शापवाणी कोरलेली असावी हे निश्चित. रतनवाडी गधेगाळ a गधेगाळावरनं आठवलं. मध्यंतरी एकदा नागावला गेलो होतो. नागावच्या अलीकडेच अक्षी हे गाव. अतिशय सुंदर. गावाच्या सुरुवातीलाच काष्ठमंडप असलेलं सोमेश्वराचं एक सुरेखसं मंदिर आहे. मंदिराच्या बाजूलाच रस्त्याच्या पलीकडे गटारावर एक गधेगाळ आहे. हा शके १२१३ मधला लेख असून रामदेवरायाची राजवट चालू असता त्याचा पादपद्योपजीवि श्री जाईदेव पुत्र इश्वरदेव क्षत्रिय ह्याने अक्षी गावातील कालिकादेवीच्या ब्राह्मणास एक गद्याण दिल्याचा उल्लेख आहे आणि त्याखाली 'तेहाची माएसी गाढौ घोडु..' अशी शापवाणी कोरलेली आहे.. ह्याच गावात मंदिराच्या दुसर्‍या बाजूस सरकारी कचेरीनजीकच अजून एक गधेगाळ आहे. डॉ. तुळपुळे ह्यांच्या मते तो मराट्गीतील आद्य शिलालेख. अर्थात हे मत काही संशोधकांना मान्य नाही कारण काल्लोलेख अस्पष्ट आहे. हा शिलाहार केशीदेवाचा लेख असून त्यात पश्चिमसमुद्राधिपती, कोंकणचक्रवर्ती श्री केशिदेवराय राज्य करत असता त्याचा प्रधान भइर्जु सेणुई ह्याने देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य मोजून दिले. त्याखाली शापवाणी कोरलेली आहे. हे दोन प्राचीन लेख आज पूर्ण दुर्लक्षित अवस्थेत आहेत. यादव रामदेवरायाचा अक्षी गधेगाळ a शिलाहार केशिदेवाचा अक्षी गधेगाळ a मध्ये खिद्रापूरला गेलो होतो. तिथले महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि शिल्पकलेने समृद्ध असलेले कोपेश्वर मंदिर तीन चार वेळा पाहिलेले आहे. तिथल्या सुदर मूर्तींसारखेच सुंदर तिथले वीरगळही. मी आतापर्यंत पाहिलेला लेख असलेला एकमात्र वीरगळ हा तिथल्या मंदिराच्या ओसरीत भिंतीत बसवलेला आहे. लेख असलेले इतरही वीरगळ आहेत पण ते मात्र कर्णाटकात. महाराष्ट्रातला हा पाहिलेला मी एकमेव. ह्या लेखही महत्वाचा. भोजराजा दुसरा ह्याचा सेनपाती बम्मेश ह्याचा हा वीरगळ. हा बम्मेश महापराक्रमी यादवसम्राट सिंघण दुसरा ह्याचेबरोबर झालेल्या युद्धात वीरगतीस प्राप्त झाला. अतिशय देखणा असा हा वीरगळ. ह्याच मंदिराच्या आवारात अजून दोन तीन वीरगळ आहेत. कोपेश्वराच्या ओसरीतील भिंतीत असलेला एक वीरगळ a भोज सेनापती बम्मेशाचा अत्यंत देखणा असलेला वीरगळ a कालचीच गोष्ट, म्हणजे कालपरवाचीच असं नाही, अगदी कालचीच. काल हिंजवडी परिसरातले वीरगळ पाहायला गेलो होतो. हिंजवडीतला वीरगळ माझ्या रोजच्या पाहण्यातला. अगदी जायच्या यायच्याच वाटेवर पण कधी थांबून नीट पाहता आला असं झालं नाही. काल मात्र अगदी ठरवून बाहेर पडलो. हा वीरगळ आहे हिंजवडीतल्या स्मशानाच्या समोरच्या दहाव्याच्या घाटावर. चारी बाजूंनी शिल्पे कोरलेली आहेत. बरेच दिवस तो इथल्याच लहानश्या मंदिराला टेकवून ठेवलेला होता. ४/५ दिवसांपूर्वीच तो नव्या जागेवर उभा केलेला आहे. हिंजवडी वीरगळ a हिंजवडीवरुन निघालो ते नेरे गावात जायला. नेरे गावात बरेच वीरगळ आहेत अशी माहिती मिळाली होती. नेरे गाव मारुंजीच्या पुढे. मारुंजी कासारसाई च्या मध्येच एक उजवीकडे जाणारा फाटा लागतो. तिथून अर्धाकच्च्या रस्त्याने नेरे गाव. गाव असं दिसत नाहीच अधून मधून घरं आणि बाजूला शेतं. तिथेच रस्त्यावर एक शिवकालीम शिवमंदिर आहे. जवळपास पन्नासेक वीरगळ तिथे हारीने मांडून ठेवलेले आहेत. तिथेही गोवर्धन वीरगळ आहेत. ढालाईताशी युद्ध, तीरयुद्ध, अश्वयुद्ध असे बरेच प्रस्ग तिथल्या वीरगळांवर कोरलेले आहेत. तिथेच काही वैशिष्ट्यपूर्ण वीरगळ देखील आहेत. वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे तिथल्या त्या वीरगळांवर नेहमीसारख्या पट्टीका नसून शिळेचा निम्माधिक भाग तलवार हाती घेतलेल्या एकाच वीराने व्यापलेला आहे. असे कित्येक पुरुषभर उंचीचे वीरगळ तिथे आहेत. नेरे वीरगळ a नेरे वीरगळ a नेरे गोवर्धन वीरगळ a नेरे एकाकी योद्धा a नेरे वीरगळ a a आतापर्यंतच्या एकंदरीतच वीरगळ भेटींचा हा सारांश, ह्य लेखांत मुद्दामूनच पुनरुक्ती न व्हावी, म्हणून माझ्या आधीच्या लेखांमध्ये शक्यतो न आलेले वीरगळ घेतलेले आहेत. काही मोजके आधीच्या लेखांमध्ये आलेले असतीलच. वीरगळावर लिहित असताना सतीशिळा आणि गधेगाळांविषयी लिहिणं हे अपरिहार्य होतंच. तसं ते लिहिण्याच्या ओघात लिहूनही झालं ह्या अनाम वीरांचं माझ्यावर काही ऋण असणार. ते फेडण्याचा अल्पसा प्रयत्न मी येथे केला आहे. _/\_

प्रतिक्रिया द्या
57470 वाचन

💬 प्रतिसाद (154)
प
प्रचेतस Tue, 03/01/2016 - 14:04 नवीन
ग्रेट. १००% गधेगाळ. नक्कीच उत्तर कोकणाच्या शिलाहार राजवटीतलाच असावा. ह्याचे वाचन बहुधा झाले नसावे. लेख कितपत स्पष्ट आहे? बर्‍यापैकी झिजलेलाच दिसतोय अर्थात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ह
हाडक्या Wed, 03/02/2016 - 15:37 नवीन
हा "गाळ" बघून शनि शिंगणापूरच्या शिळेची आठवण होतेय का कुणाला.. ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
म
माहितगार गुरुवार, 03/03/2016 - 12:52 नवीन
@ प्रचेतस शिलालेख जमेल तेवढा स्पष्ट करण्याचा काही मार्ग नाही का ? शिलेला नुकसान न पोहोचवणारा पांढरा रंग भरून पुन्हा उतरवणे असे काही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अभ्या.. गुरुवार, 03/03/2016 - 13:12 नवीन
तसे बरेच मार्ग आहेत. खर्चिक पण आहेत. पण मूलतः हे वीरगळ अथवा गधेगाळ घडवतानाच खूप अबड्धोबड स्वरुपात आहेत. त्यासाठी वापरला गेलेला स्टोन निसर्गाचा मारा खाउन जास्त अस्पश्ट झालेले आहेत. पुरातत्व/सांस्क्रुतिक अभ्यासाच्या दृष्टीने महत्व असले तरी एक सुबक आर्टीफॅक्ट असे स्वरुप नाहीये त्यामुळे इतस्ततः विखुरलेल्या ह्या असंख्य वीरगळांचे जतन आणि रिपेअरी कोणी कशाला करेल हा प्रश्नच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ब
बॅटमॅन गुरुवार, 03/03/2016 - 13:23 नवीन
आणि त्यातही बर्‍याचदा असे होते की कोणी संशोधक येतो, शिलालेख वाचतो आणि प्रसिद्ध करतो. पुढे तो शिलालेख एखाद्या म्युझियममध्ये ठेवला जातो किंवा चक्क गायबही होतो. कैक शिलालेख जुन्या पुस्तकांमधले आज लोकेट करू म्हटले तर शक्य होत नाही. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
माहितगार गुरुवार, 03/03/2016 - 13:56 नवीन
किंवा चक्क गायबही होतो...
हम्म प्रचेतस यांच्या लेखातही ह्या शिला अनपेक्षीत ठिकाणी दिसल्याचे उल्लेख आहेत. गायब होण्यावरून आठवले कोकणातल्या समुद्र किनार्‍यावरील एका ऐतिहासिक किल्ल्यातून बर्‍याच तोफा गायब झाल्या आहेत अशी बातमी चार सहा महिन्या पुर्वी कुठल्याशा कोपर्‍यात वाचली. इतर बातम्यांच्या गदारोळात बातमी कुठेशीक हरवून गेली या शिल्पांच्या नशिबी बातम्या सुद्धा नाहीत :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
A
Anand More Mon, 03/07/2016 - 12:52 नवीन
अरे तुम्ही तर माझ्याही आधी पोस्टलेत … आपल्या लोकांना तेल वाहायला फार आवडते… दिसला दगड की ओतलं तेल … अजून एक हजार वर्षांनी उत्खननात डोंबिवली मध्ये तेलाचे साठे सापडतील असा माझा अंदाज आहे….
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस Tue, 03/01/2016 - 14:29 नवीन
लेख पार झिजलाय.पुर्वी यावर तेल ओतताना मी पाहिलंय.तेलापेक्षा दुध दह्याच्या अभिषेकाने दगड फार झिजतो.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 03/01/2016 - 17:37 नवीन
ही असली चौकोनी दगड... मंदिरांच्या आसपास, कधी गावाबाहेर, वड-पिंपळ-उंबराखाली, माळावर तर कधी थडग्यांच्या आजूबाजूला पाहून, यांचा काहीतरी अर्थ असावा असं नेहमी वाटायचं, म्हणजे अगदी लहानपणापासून! पण, कधी याविषयी विशेष वाचनात आलं नव्हत. इथे मिपावरच वल्लींचे लेख वाचनात आले आणि मला काहीतरी निसटलेले परत गवसल्याचा आनंद झाला. नाही म्हणायला, शाळेत इतिहासाच्या पुस्तकात मध्ययुगीन भारत, मंदिरे-स्थापत्यशैल्या, ताम्रपट, शिलालेख याच्याशी संबंधित प्रश्नांनी घाबरवून सोडलं होतं. ते प्रश्न 'मार्कांसाठी' होते, कसेबसे सोडवले पण आताचे प्रश्न हे 'उत्तरासाठी' आहेत. १) 'वीरगळ' ह्या शब्दाची व्युत्पत्ती? २) नक्की कोणत्या काळात ह्यांची निर्मीती सुरू झाली? ३) भारतात अन्यत्र कुठे-कुठे ही आढळतात? ४) 'वीरगतीस प्राप्त होणारे वीर' या विषयाला केंद्रीत धरून असणारे हे वीरगळ निश्चीतच कुणाच्या वेदनेतून/कृतज्ञतेतून निर्मीले गेले असावेत. मग, ह्यांचे स्वरूप मर्यादित का राहिले? लेण्यांची भव्यता यांना का मिळाली नाही? कुठे असल्यास सांगावे. ५) एखादी प्रसिद्ध लढाई आणि तिचा पुरावा कुठल्या वीरगळाशी येऊन मिळतो का? ६) हे सार्वजनिक भावनेतून घडवले जायचे कि वैयक्तिक कुणी आपल्यापुरते घडवून घेत? ७) ह्याच्या कारागिरांविषयी आणि त्यांच्या चालू पिढ्यांविषयी काही माहिती उपलब्ध आहे का? ८) सर्वात भव्य वीरगळ महाराष्ट्रात कुठे आहे? ९) याविषयी सर्वसामान्यात इतके अज्ञान का असावे? म्हणजे, हे नक्की काय आहे? याविषयीची माहिती कुणी पुढच्या पिढीला (जसे की: सध्याच्या) का पोचवित नाही राहिले? १०) ह्यांना घडवण्यामागे नेमका हेतू काय होता? सध्या इतकेच! मला माहिती आहे की मी अगदी 'काहीही' विचारतो आहे, पण नम्र विनंती... जेवढी माहित आहेत, शक्य आहेत तेवढी तरी सांगण्याची कृपा करावी. पुढल्या वेळी डोंगरात मलाही यायला आवडेल ही पुन्हा एकदा आठवण, यानिमीत्ताने करून देतो. धन्यवाद, Sandy
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 03/02/2016 - 04:25 नवीन
धन्यवाद संदीप प्रश्नांबद्दल. आता एकेकाची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.
१) 'वीरगळ' ह्या शब्दाची व्युत्पत्ती?
वीरगळ हा शब्द वीर(संस्कृत) आणि कल्लू (कन्नड) अशा दोन शब्दांचा मिळून झाला आहे. कल्लू म्हणजे दगड अथवा शिळा. वीरपुरुषाच्या स्मरणार्थ घडवलेली शिळा म्हणजेच वीरगळ. पूर्वीच्या प्रथेप्रमाणे एखाद्या वीरपुरुषाने गावावर आलेल्या परचक्राचा सामना केला, गाईगुरांना पळवून लावणार्‍यांपासून त्याचे संरक्षण केले, दरोडेखोरांकडून गावाचे संरक्षण केले आणि हे करता करता लढाईत त्याचे प्राणोत्क्रमण झाले तर त्याचे स्मारक ऊभारण्यात येई. उभट, आयताकृती दगड, त्याच्या चारही बाजूंना चौकटी कोरलेल्या, वर घुमटी अशी याची रचना. चारी बाजूंच्या चौकटींमध्ये युद्धाचे प्रसंग कोरलेले, एका चौकटीवर आडवा पडलेला वीर आणि घुमटीवर चंद्र सूर्य कोरलेले अशी यांची सर्वसाधारण रचना.
२) नक्की कोणत्या काळात ह्यांची निर्मीती सुरू झाली?
ही प्रथा किमान दोनहजार वर्षे तरी जुनी असावी. अगदी सातवाहनकाळापासून वीरांच्या स्मरणार्थ शिळा घडवणे सुरु झाले असावे पण ह्याला माझ्याजवळ तसा पुरावा नाही. मात्र ढोबळमानाने चालुक्यांपासून ह्या शिळांची सुरुवात झालेई असवी असे म्हणता येते. म्हणजे साधारण १४०० वर्षे.
३) भारतात अन्यत्र कुठे-कुठे ही आढळतात?
जवळपास संपूर्ण भारतात वीरगळ आढळतात. अगदी काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत. पण महाराष्ट्र आणि कर्णाटकात ते प्रचंड संख्येने आढळतात.
४) 'वीरगतीस प्राप्त होणारे वीर' या विषयाला केंद्रीत धरून असणारे हे वीरगळ निश्चीतच कुणाच्या वेदनेतून/कृतज्ञतेतून निर्मीले गेले असावेत. मग, ह्यांचे स्वरूप मर्यादित का राहिले? लेण्यांची भव्यता यांना का मिळाली नाही? कुठे असल्यास सांगावे.
वीरगळ हे वीराच्या बलिदानासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याच्या स्मरणार्थ घडवले गेलेत. आणि हे अगदी सामान्य जनतेने उभारलेले आहेत. लेणी आणि वीरगळ हा भिन्न विषय आहे. लेणी मुख्यतः वर्षावासात निवासासाठी उभारली तर वीरगळ केवळ स्मारक म्हणून.
५) एखादी प्रसिद्ध लढाई आणि तिचा पुरावा कुठल्या वीरगळाशी येऊन मिळतो का?
हो. खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील वीरगळ हा शिलाहार राजा भोज दुसरा ह्याचा सेनापती बम्मेशाचा आहे. देवगिरीचा यादवसम्राट सिंघण दुसरा ह्याने कोल्हापूर शिलाहारांचा संपूर्ण पराभव करुन त्यांचे राज्य बुडवले. ही लढाई खिद्रापूरच्या आसपास झाली. ह्यात भोज दुसरा पन्हाळ्यावर पळाला तर बम्मेश लढाईत मृत्यु पावला. बोरीवलीतील एकसर येथील दोन वीरगळ देवगिरीचा महादेव यादव आणि उत्तर कोकण शिलाहार सोमेश्वर दुसरा ह्यांच्यातील आरमारी संघर्ष दाखवतात. सोमेश्वराचा जमिनीवरील युद्धात पराभव झाल्याने घारापुरी बेटाचा आश्रय घेण्यासाठी तो समुद्रात पळाला महादेवाने तेथेही त्याचा नावांद्वारे पाठलाग करुन ही राजवट बुडवली. ह्या नाविक संघर्षाचे चित्रण तेथील वीरगळांवर झाले आहे.
६) हे सार्वजनिक भावनेतून घडवले जायचे कि वैयक्तिक कुणी आपल्यापुरते घडवून घेत?
बहुधा दोन्ही प्रकारे.
७) ह्याच्या कारागिरांविषयी आणि त्यांच्या चालू पिढ्यांविषयी काही माहिती उपलब्ध आहे का?
नाही. पण काही उत्कृष्ट वीरगळांवरची शिल्पे तत्कालीन राजांच्या पदरी असणार्‍या श्रेष्ठ शिल्पकारांनी कोरली आहेत असे म्हणण्यास वाव आहे.
८) सर्वात भव्य वीरगळ महाराष्ट्रात कुठे आहे?
नक्की सांगता येणार नाही पण सर्वसाधारणपणे ह्यांची उंची ३/४ फूटांपासून ८ फूटांपर्यंत असते.
९) याविषयी सर्वसामान्यात इतके अज्ञान का असावे? म्हणजे, हे नक्की काय आहे? याविषयीची माहिती कुणी पुढच्या पिढीला (जसे की: सध्याच्या) का पोचवित नाही राहिले?
काळाचा प्रभाव. दुसरे काय. पण आजदेखील अशा स्मारक शिळा बनवल्या जातात. इस्लामी राजवटीत वीरगळांची जागा थड्यांनी घेतली तर हल्लीच्या काळात मुखवट्यांनी. :)
१०) ह्यांना घडवण्यामागे नेमका हेतू काय होता?
पहिल्याच प्रश्नात उत्तर आलेच आहे. एखादी भटकंती सोबतच करु आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
च
चांदणे संदीप Wed, 03/02/2016 - 06:03 नवीन
खूप खूप धन्यवाद! आता भेट भटकंतीलाच! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अभ्या.. Wed, 03/02/2016 - 15:23 नवीन
रिपब्लिक ऑफ पुणे टाइम्स. दि. १-४-२०६८ : आमच्या वार्ताहराकडून आलेले नुकताच धायरी वडगाव येथे आढळलेल्या वीरगळाचे हे प्रकाशचित्र. ह्या वीरगळावर एका अज्ञात वाहनावरुन मांडी घातलेल्या चित्र कोरलेले आहे असा पुरातत्व शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
प
प्रचेतस Wed, 03/02/2016 - 15:41 नवीन
अगगागागा._/\_ वारलो रे हा वीरगळ पाहून. खालच्या पट्टीकेत बहुधा अप्सरा ल्ल्ल्ल्ल्लूऊऊउ करताहेत वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
च
चांदणे संदीप गुरुवार, 03/03/2016 - 01:39 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
न
नाखु गुरुवार, 03/03/2016 - 09:46 नवीन
तर वरील पट्टीत ताकावरचे लोणी असलेले भांडे दिसत्येय बर का,माझी मेली नजर ठीक आहे म्हणून निभावलं नाहीतर तुम्ही लोकांनी दुर्लक्ष्य केलं असतं भांड्याकडे, छान हो अभ्या अजून काही असेल तर टाकत जा अधनं मधनं असं आमचे हे म्हणत होते" मामो ऑफ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 03/04/2016 - 06:24 नवीन
ही थड़ी आणि ह्यातला क्रमांक दोनचा प्राणी मात्र अत्यंट वरिजनल हाये! Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. अभ्या नी फोटु शॉप नी केलि कड़ी कुडतरकरानी दिली मला थड़ी आणि मोडली मग एकंदर ह्यांची घडी! Image removed. Llllllluuuuu Image removed. धन्यवाद हो सतीश कुडतरकर. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
च
चांदणे संदीप Fri, 03/04/2016 - 06:39 नवीन
अभ्या नी फोटु शॉप नी केलि कड़ी कुडतरकरानी दिली मला थड़ी आणि मोडली मग एकंदर ह्यांची घडी!
=)) =)) गुर्जीन्चा नाद नाय करायचा! ;) (केला नाद, झाला बाद!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
सूड Mon, 03/07/2016 - 17:04 नवीन
अभ्या नी फोटु शॉप नी केलि कड़ी कुडतरकरानी दिली मला थड़ी आणि मोडली मग एकंदर ह्यांची घडी!
आता मी जातो सासं-वडी आणि जेवायला आहे भात आणि कढी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
सूड Mon, 03/07/2016 - 17:06 नवीन
सगळ्यात वरच्या चित्रात हा इसम बोअरला नमस्कार करुन लोटा खाली ठेवून "हापश्या हापश्या पाणी दे" असं गार्‍हाणं घालतोय असं वाटतं. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
महासंग्राम Sat, 04/02/2016 - 06:27 नवीन
वीरगळांवर त्या योध्याच्या आयुष्यातला एखादा महत्वाचा प्रसंग पण कोरलेला असतो ना ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
म
मुक्त विहारि Tue, 03/01/2016 - 18:17 नवीन
वल्लीदा, तुसी ग्रेट हो. (तुम्हाला घेतल्याशिवाय वेरूळला जाणार नाही.)
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 03/01/2016 - 18:18 नवीन
प्रचेतस याचे उत्तर देतीलच पण माझ्या विचाराने- एखादा वीर मरण पावला/लढाइत मारला गेला की त्याचे कलेवर त्याच्या गावी नेण्यात येते अथवा तिथेच जाळत असावेत शत्रुच्या ताब्यात गेल्यास तेही होत नसावे.मग काही वर्षांनी त्याच्या घराजवळ आठवण म्हणून असा दगड घडवत असावेत.जरा संत वगैरेची समाधी/चौथरा उभारला जातो गावात.आपल्याकडे मृतांस जाळत असल्याने मुसलमानांसारखे थडगेही बांधता येत नाही.मोगलांशी संबंध आलेल्या राजस्थानी राजांनी छत्र्या बांधायला सुरुवात केली एक स्मारक म्हणून.पैसे देऊन मृताच्या वारसाने वीरगळ घडवल्यावर कारागिराचे नकव कोरण्याचा प्रश्नच येत नाही.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 03/02/2016 - 07:20 नवीन
पैसे देऊन मृताच्या वारसाने वीरगळ घडवल्यावर कारागिराचे नकव कोरण्याचा प्रश्नच येत नाही.
नोत नेचेस्सर्य. म्हणजे सामान्यतः हे बरोबर आहे पण काही ठिकाणी राजाने उभारलेल्या मंदिरातील मूर्तीखाली शिल्पकाराचे नाव आढळते. विशेषतः चालुक्य व होयसळ राजवटींमधील मंदिरांत. 'मल्लितमा' नामक होयसळ काळातील एक शिल्पकार बहुधा तेव्हाचा बर्निनी, रोदँ वगैरे असावा. किमान ३५-४० ठिकाणी त्याचे नाव कोरलेले सापडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ब
बॅटमॅन Wed, 03/02/2016 - 07:20 नवीन
इतकेच नव्हे तर दगडांच्या खाणींजवळ काही शिलालेख सापडले त्यात कारागिरांची नावेही कोरलेली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 03/02/2016 - 08:00 नवीन
वल्ली सरांचा लेख म्हणजे एका मेजवानीच असते. वाल्गुदशास्त्रींचा सल्ला मनावर घ्याच. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ग
गणामास्तर Wed, 03/02/2016 - 11:05 नवीन
सुरेख माहिती. ___/\___ स्विकारा.
  • Log in or register to post comments
श
शान्तिप्रिय Wed, 03/02/2016 - 12:55 नवीन
प्रचेतस वल्लीजी , आपण या विषयावर इन्ग्रजी आणि मराठी विकीपेडियात लिहावे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
ग
गौरी लेले Wed, 03/02/2016 - 13:33 नवीन
अप्रतिम ! निव्वळ अप्रतिम ! मोडक्या तोडक्या वीरगळांचा येवढा अभ्यास पाहुन आपल्या व्यासंगाचे कौतुक वाटले आहे !
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 03/03/2016 - 04:05 नवीन
कारागिरांची नावे थोडी अभावानेच येतात असं म्हणतोय. महेश तेंडुलकरांच्या शिलालेखाच्या विश्वात हे ९०० रु चे पुसत्क आहे.६०० पानं.खफ पाहा.यामध्ये जे नाही ते लिहावा लागेल अथवा शिलालेख/वीरगळ यांची मूलभूत माहिती वगैरे देणारे दीडशे रुपयांपर्यंतचे पुस्तक काढता/लिहिता येईल.
  • Log in or register to post comments
स
सविता००१ गुरुवार, 03/03/2016 - 09:00 नवीन
ग्रेट वल्लीचा अफाट लेख. अरे कसला भारी आहेस तू... बॅट्मनला अनुमोदन माझं. आणि तुला फक्त आणि फक्त _________/\_________
  • Log in or register to post comments
स
सतीश कुडतरकर गुरुवार, 03/03/2016 - 11:49 नवीन
कुंजरगडाच्या पायथ्याला असलेल्या विहीर गावातील एका झाडाखाली झुडूपांमध्ये दडलेले हे विरगळ कि थडी? यावर प्राणी/पक्षी कोरलेल आहेत. Image removed.From Tivai, Taleran (Malshej) Image removed.From Tivai, Taleran (Malshej) Image removed.From Tivai, Taleran (Malshej)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 03/03/2016 - 12:19 नवीन
ही थडी आहेत. रतनवाडीत अमृतेश्वराच्या उजवीकडे असलेल्या हनुमान मंदिराच्या आसपास असे प्राणीपक्षी कोरलेले भरपूर दगड विखुरलेले आहेत. हे मुख्यत: स्थानिकांनी कोरलेले असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर
स
सतीश कुडतरकर Fri, 03/04/2016 - 10:19 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ग
गणेशा गुरुवार, 03/03/2016 - 13:16 नवीन
अतिसुंदर धागा
  • Log in or register to post comments
र
रिकामटेकडा Fri, 03/04/2016 - 14:14 नवीन
मुंबई गोवा महामार्गावर कोलाड जवळ अगदी रस्त्याला लागून हे आहेत Image removed. Image removed. Image removed. तसेच हरीश्चंद्रगडा वरील मंदिरात हा स्तंभ आहे. हा सुद्धा विरगळ आहे का? Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 03/04/2016 - 14:32 नवीन
हो. सर्वच वीरगळ आहेत. धारातीर्थी पडलेला वीर, वीराला स्वर्गात घेऊन जाण्यास आलेल्या अप्सरा, शिवलिंगाची पूजा ही सर्व ठळक लक्षणे दृश्यमान आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रिकामटेकडा
म
माहितगार Sat, 03/05/2016 - 16:15 नवीन
टाइम्स ऑफ इंडीयातला अशातला हा लेख पहाण्यात आला का ?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 03/05/2016 - 18:34 नवीन
नाही हो. आत्ताच पाहिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
अ
अभ्या.. Sun, 03/06/2016 - 13:50 नवीन
आपल्या प्रचेतसरावांच्या ह्या लेखाची दखल मी मराठी ह्या ऑनलाइन वॄत्तपत्राने घेतलीय. पूर्ण लेख प्रकाशित होऊन आलाय. http://digital.mimarathilive.com/detail.php?cords=16,1006,1462,2294&id=story2&pageno=http://digital.mimarathilive.com/06032016/Mumbai/Page16.jpg अभिनंदन प्रचेतसराव. आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 03/06/2016 - 19:54 नवीन
@आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा.>> +१ आणि आगोबासाठी टाळ्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
च
चांदणे संदीप Mon, 03/07/2016 - 05:59 नवीन
@आगामी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.>> +१ आणि टाळ्याचा कडकडाट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
स्वच्छंदी_मनोज Mon, 03/07/2016 - 07:40 नवीन
अगदी हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
अ
अन्नू Fri, 04/01/2016 - 10:53 नवीन
अरे वा! अभिनंदन!! =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 03/07/2016 - 06:07 नवीन
वल्लीसेठ. असंच मोठं नाव होऊ दे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
य
यशोधरा Sat, 04/02/2016 - 06:47 नवीन
अरे वा! अभिनंदन! आता एकदा पुस्तकाचे मनावर घ्याच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
A
Anand More Mon, 03/07/2016 - 06:27 नवीन
अतिशय सुंदर सचित्र संकलन…. धन्यवाद…. तो गधेगळ पाहिला आणि डोंबिवलीच्या गावदेवी मंदिराच्या जवळील शिलालेखाची आठवण झाली। आज उद्या कडे जाऊन फोटो काढतो आणि इथे टाकतो तुमच्या संग्रहासाठी
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 03/07/2016 - 10:56 नवीन
मी टाकलाय फोटो इथे वर परंतू फोटो चांगला आला नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Anand More
श
शान्तिप्रिय Mon, 03/07/2016 - 07:00 नवीन
हार्दिक अभिनंदन वल्ली. असाच मनापासुन तुमचा छंद जोपासा.
  • Log in or register to post comments
V
Vasant Chavan Fri, 04/01/2016 - 07:49 नवीन
सर आमच्या येथे पन वीरगळ आहे.मी फोटो पाटवतो.
  • Log in or register to post comments
V
Vasant Chavan Fri, 04/01/2016 - 07:50 नवीन
सर आमच्या येथे पन वीरगळ आहे.मी फोटो पाटवतो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा