Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वीरगळांच्या शोधात

प
प्रचेतस
Sun, 02/28/2016 - 11:34
💬 154
a २००२ सालचा साधारण मार्चचा महिना. आता नक्की आठवत नाही, पण तेव्हा नासिकवरुन रतनगडला निघालो होतो. घोटीनंतर एक घाट चढून कळसूबाईच्या पायथ्याचं गाव बारी गाठलं. तिथून शेंडी. शेंडी हे भंडारदरा धरणालगतचं गाव. तिथून रतनवाडी साधारण २० किमी. २००२ साली हा भाग फारच दुर्गम होता. वाहतुकीची साधनं अत्यल्प होती, रस्ताही खूप खराब आणि बराचसा कच्चा होता. शेंडीवरुन तेव्हा जवळपास पाऊण तास लागला होता रतनवाडीला पोहोचायला. वाडीच्या सुरुवातीलाच अमृतेश्वर मंदिर. तेव्हा आजूबाजूचा परिसर अगदी साधाचाच होता. आजमितीस मात्र खूपच बदल झाला आहे. तर मंदिराच्या शेजारीच एक पुष्करणी आहे, त्याच्याजवळच एक भलामोठा वृक्ष. त्याच्या बुंध्यापाशी काही भल्यामोठ्या शिळा रचून ठेवलेल्या. जवळपास पुरुषभर उंचीच्या शिळा आणि त्यावर काही युद्धांचे प्रसंग कोरलेले. कुठल्याही प्रकारच्या वीरगळांशी तो माझा प्रथम परिचय. त्याआधीही कित्येकदा वीरगळ पाहिले असतील, नाही असं नाही पण ते आता आठवत नाही किंवा त्यांना काहीतरी कोरलेली अशी शिळा ह्या दृष्टीनेही पाहिलं गेलं असावं किंवा त्यांचं महत्व तेव्हा माझ्या गावीही नसावं. पण रतनगडाची ती भ्रमंती काही नवं असं देणारी ठरली. रतनवाडीतले वीरगळ a ह्यानंतरही जवळपास ७/८ वर्षे गेली. भटकंत्या चालूच होत्या. पण केवळ त्या एका ठराविक दिशेने जात नव्हत्या. मौजमजेसाठी निरुद्देश भटकंती असेच काहीसे स्वरूप येत होते. पण त्याच वेळी मूर्तींविषयी, वीरगळांविषयी, स्मारकशिळांविषयी सुप्तावस्थेतील आकर्षण हळूहळू वाढत होते. नंतरच्या बर्‍याच फिरस्त्यांमध्ये असंख्य वीरगळांशी परिचय होत गेला. त्यापैकी एक आठवतोय तो राजमाचीवरचा. राजमाची किल्ला बहुतेकांना माहितच असेल. लोणावळ्याहून रात्री ११ ला निघालो ते उढेवाडीला पहाटे ४ च्या आसपास पोहोचलो. वाडी खूपच छान, भोवताली सगळं गच्चं रान, मोरांची केकावली तर सततच. बिबट्याच्याही डरकाळ्या काही वेळा ऐकू येतात. वाडीपासून श्रीवर्धनच्या जायच्या पायवाटेने एक हलकसं टेपाड चढून आपण श्रीवर्धन-मनरंजनच्या खिंडीत येतो. तिथेच मध्यभागी भैरवनाथाचं शिवकालीन राऊळ. भोवताली घनगर्द राई. तर राउळाला लागूनच एक वीरगळ आहे. त्याची एकंदर रचना पाहता तो अलीकडचा म्हणाजे शिवकालीन असावा हे तसं लक्षात येतं. शिल्पपट्टीका नाहीत. फक्त लढणारा आणि नंतर मृत झालेला वीर. इतकंच. राजमाचीचा वीरगळ a आपल्या पुण्याजवळच्या बाणेर गावात एक टेकडी आहे. त्या टेकडीत प्राचीन लेणं आहे हे माहित होतं पण जायचा योग आला नव्हता. एकदा मात्र निघालोच. बाणेर गावातल्या हनुमान मंदिरापासूनच लहान बोळांतूनच लेणी मंदिरापर्यंत वर जायला पायर्‍या आहेत. एकाच अखंड कातळात खोदून काढलेलं हे शैव लेणं हे बहुधा ९/१० व्या शतकातलं असावं. त्या लेण्यात आणि लेण्यांबाहेर काही वीरगळ पडलेले आहेत. बहुधा इथे पूर्वी लहानशी लढाई झालेली असावी. ह्या लेणीच्या बाहेरच एक बलीवेदी पण मिळाली. बलीवेदी म्हणजे बळी ज्या शिळेवर देतात तो दगड. ही एक लहानशी चौकोनी सपाट शिळा असून चारही कोपर्‍यांवर बकर्‍याची मुंडकी कोरलेली आहेत. बाणेर वीरगळ a - a बलीशिळा a एकदा अंजनेरीला गेलो होतो. अंजनेरी नाशिकपासून साधारण १०/१२ मैलांवर. भल्यामोठ्या कातळकड्यावर निर्मिलेला अजस्त्र किल्ला आणि पायथ्याला गावात १६ प्राचीन मंदिरांचं संकुल. ह्या मंदिरांत असंख्य भग्नावशेष आहेत. आमलक, स्तंभांचे भाग, मूर्ती, वीरगळ इत्यादी. तिथेच आहे एक आगळावेगळा वीरगळ. आगळावेगळा असं म्हणण्याचं कारण वीरगळाच्या खालच्या पट्टीत एक वीर दुसर्‍या वीराचे केश धरुन त्याचं मस्तक धडावेगळं करताना दाखवलाय. पूर्वीच्या काळी युद्धांत मस्तकाचे केश धरुन सैनिक शत्रूंची मस्तके धडावेगळी करायचे हे टाळण्यासाठी म्हणून बहुतेकवेळा प्रतिस्पर्धी सैनिक मुंडण करुन युद्धात उतरायचे. अंजनेरी वीरगळ a माळशिरस हे लहानसं गाव यवतच्या भुलेश्वरापासून चारेक किमी अंतरावर, अगदी दुर्लक्षित पण पुरातन संपन्न गावची लक्षणे जागोजागी आढळतात, गावची वेस विस्तीर्ण वाड्यांचे भग्नावशेष, १२/१३ व्या शतकातले एक प्राचीन शिवमंदिर जे आता हनुमान मंदिरात परावर्तीत केलं गेलं आहे पण मूळची मंदिरातली आतली शिवपिंड भग्नावस्थेत मंदिराच्या बाहेर झाडोर्‍यांत पडलेली आहे. त्या मंदिराच्या आवारात काही वीरगळ आहेत तर काही थेट गावच्या वेशीवरच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीत चिणलेले आहेत. तीन तीन शत्रूंशी एकहाती युद्ध करुन धारातीर्थी पडलेल्या वीराला चार चार अप्सरांनी स्वर्गास पोहोचवतात. माळशिरस वीरगळ a माळशिरस वीरगळ a- a ह्या माळशिरसपासून जवळच नायगांव हे अगदीच लहानसं गाव. इथेही एक हल्लीच जीर्णोद्धार केलेलं प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर पुष्करिणी. प्रथमदर्शनी मंदिर तसं अनाकर्षकच वाटतं. मंदिराच्या पुढ्यातच नंदीमंडप. ह्या मंदिराच्या आवारात एक वीरगळ अर्धाअधिक जमिनीत पुरलेला आढळेला. सर्वात वरचं 'यावच्चंद्रदिवाकरौ' हे नीटपणे दृश्यमान आहे. ह्याच मंदिराच्या आवारात दोन तीन सतीशिळाही आहेत. ह्यातली एक सतीशिळा तर थेट मंदिराच्या अंतर्भागातल्या भिंतीत चिणलेली आहे. सतीशिळा म्हणजे पतीनिधनानंतर सती गेलेल्या स्त्रीच्या स्मरणाअर्थ तिचे स्मारक म्हणून सतीचा आशीर्वादपर हात कोरलेली शिळा बनवणे. ह्या प्राचीन निष्ठुर परंपरांचा भाग असणार्‍या शिळा मला कायमच अवस्थ करतात. नायगावच्या सिद्धेश्वर मंदिरातील अर्धाअधिक पुरलेला वीरगळ आणि तिथलीच सतीशिळा aa नायगाव सतीशिळा a सतीशिळेवरनं आठवलं. सासवडच्या नाझरे गावानजीक कोथळे नावाचं एक लहानसं गाव आहे. तिथे एकदा फिरत गेलो होतो. गावाशेजारी एक अगदी लहानशी टेकडी आणि टेकडीवर लहानसं प्राचीन शिवमंदिर. ह्या मंदिराच्या आवारातही एक सतीशिळा आहे. a ह्या कोथळ्यातही बरेच वीरगळ आहेत. हया शिवाय वीरगळांसाठी सपाट केलेल्या कित्येक शिल्पविहिन शिळादेखील तिथे पडलेल्या आहेत. तिथे आहेत गोवर्धन वीरगळ. गोवर्धन वीरगळ म्हणजे गाईगुरे पळवण्यास आलेल्या चोरट्यांविरुद्ध्/शत्रूंविरुद्ध युद्ध करुन आपले बलिदान केलेल्या वीरांचे स्मारक. ह्या वीरगळआंमध्ये सर्वात खालच्या पट्टीकेवर मृत वीराच्या बाजूने गाईगुरे कोरलेली आढळतात. गोवर्धन वीरगळही बर्‍याच ठिकाणी आहेत. मी किमान ३० ते ४० तरी आतापर्यंत पाहिलेले आहेत. कोथळ्याचा गोवर्धन वीरगळ a एकदा पूरच्या नारायणेश्वरास गेलो होतो. हे पूर म्हणाजे आताचे सासवडनजीकचे पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याचे नारायणपूर. ह्या गावचा रामचंद्रदेव यादवाचा पूर शिलालेख प्रसिद्ध आहे. ह्या शिलालेखात रामदेवरायच्या दंडनायक बाईदेव व अजून कुण्या एका प्रधान सेनापतीचा उल्लेख आला असून हेमाद्री पंडिताला 'लोककर्माधिकारी' अर्थात लोकोपयोगी कामे करणारा म्हणून नियुक्त केले गेल्याचा उल्लेख आहे. प्रस्तुत लेख सध्या भारत इतिहास संशोधक मंडळात आहे. तर ह्या पुरात नारायणेश्वराचे यादवकालीन मंदिर असून त्याच्या पुढ्यातल्या रस्त्याच्या पलीकडे एका खोपटात व तिथेच एका शेतात अशा दोन सतीशिळा आहेत. ह्यातील एक सतीशिळा फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे. एक.दोन नव्हे तर सतीचे तब्बल चार हात एकाच शिळेवर कोरलेले आहेत ह्यांखेरीज लढाईचे दृश्यही आहेच. कदाचित एकाच वेळी सती गेलेल्या अनेक स्त्रियांचे स्मारक म्हणून ही शिळा कोरलेली असावी. पूरची सतीशिळा a तिथलीच एक दुर्लक्षित सतीशिळा a आताच डिसेंबर महिन्यात रत्नांग्रीस मित्रांबरोबर होतो. तिथे पावसला जाण्याचा योग आला. मग तिथेच गणेशगुळे आणि पावसच्या आसपास भटकत राहिलो. पावसजवळ गुरववाडी म्हणून एक लहानशी वाडी आहे. तिथल्या मंदिरात काही शिळा पडलेल्या दिसल्या. त्या सर्वच सतीशिळा. जवळपास १०/१२ सतीशिळा तेथे इतरत्र विखुरलेल्या आहेत. गुरववाडी, पावस सतीशिळा a भर उन्हाळ्याचे दिवस. साधारण एप्रिल महिन्याची अखेर. उन्ह अगदी रणरणतं. अशा तापत्या दुपारी पेडगावला गेलो होतो पेडगावची ती पहिली भेट. नंतर तीनचार वेळा पुन्हा पुन्हा पेडगावला जाऊन आलो. पेडगावला विस्तीर्ण भुईकोट आहे. सध्या पुर्ण भग्न झालेला. औंरंगजेबाचा सरदार बहादुरखानाने बांधलाय. किल्ल्याचा कोट शिल्लक आहे. आतमध्ये मात्र बांधकामे हुडकावी लागतात. किल्ल्यात फिरणे तसे धोक्याचे कारण सगळीकडे वेड्या बाभळीचे जंगल माजलंय. ह्याच पेडगावच्या बहादूरगडात संभाजी महाराजांना हात लाकडांना बांधून आणि विदुषकाची टोपी घालून औरंगजेबाने मिरवत आणलं होतं, नंतर येतेच राजांचे डोळे काढले होते. तर ह्या पेडगावातच पाच यादवकालीन मंदिरे आहेत. ती पण एकापेक्षा एक सरस आणि अतिशय शिल्पसमृद्ध अशी. ह्या मंदिरांवरुन येथे पूर्वी यादवांचं मोठं ठाणं असावं असं वाटतं. तसंही इथल्या आजूबाजूच्या परिसरात भीमेकाठी असंख्य मंदिरे आहेत. तर पेडगावला अशी सरस पाच मंदिरे असूनही वीरगळ मात्र मला एकच दिसला, येथेच एक सतीशिळाही आहे. पेडगाव वीरगळ a पेडगाव सतीशिळा a एकदा मोरगावजीकच्या लोणी भापकरला गेलो होतो. लोणी भापकर तिथल्या एका प्राचीन मंदिरामुळे आणि तिथे असलेल्या यज्ञवराहाच्या देखण्या मूर्तीमुळे मूर्तीअभ्यासकांत प्रसिद्ध आहे. हा भाग कायमचाच दुष्काळी. ऐन पावसाळ्यातही येथे पावसाचे दुर्भिक्ष्य असते. मात्र येथेही तीन चार मंदिरे आहेत आणि असंख्य सुस्पष्ट वीरगळ. जवळपास २५ ते ३० वीरगळ ह्या गावात आहेत. खास येथील मंदिरे आणि हे वीरगळ बघण्यासाठी गावात यावं. गावात एक पूर्ण बेवसाऊ झालेला गढीवजा किल्लाही आहे. लोणी भापकर वीरगळ a लोणीभापकरच्या जवळच पांडेश्वर हे गाव. तिथून सुमारे १०/ १२ किमी अंतरावर. येथेही एक प्राचीन मंदिर शिवाय असंख्य वीरगळ आहे. मात्र येथे वेगळाअच वीरगळ आहे तशा प्रकारचा मी इतरत्र कुठेही पाहिलेला नाही. तो आहे वाघाशी लढून मृत झालेल्या वीराचा. ह्या वीरगळाच्या मधल्या पट्टीत वीर वाघाशी झुंज घेताना दाखवलाय. पांडेश्वरचा आगळा वेगळा वीरगळ a आता मध्ये मागच्या पावसाळ्यात किकलीला गेलो होतो. किकली मंदिराबदल आणि तिथल्या वीरगळांबद्दल मी लिहिलेलंच आहे. किकली हे जणू वीरांचंच गाव- वीरगळांचंच गाव. सुमारे दोनशेच्या आसपास वीरगळ किकलीत आहेत ते अगदी कुठेही सापडतात. घराच्या भिंतीत चिणलेले, मंदिरांपाशी, विहिरीपाशी, पारावर, अगदी गटारावर देखील. किकलीचे वीरगळ a तर ह्या किकलीपासून शेरी लिंबच्या बारा मोटेची विहिर पाहण्यास निघालो. ही विहिर म्हणजे मराठेकालीन शैलीत बांधलेलं मोठं अद्भूत प्रकरण. शेरी लिंबला जाताना वाटेत गोवे नावाचं एक लहानसं गाव लागतं. ते गाव ओलांडून जाताच वाटेत एक भग्न वीरगळ दुर्लक्षित अवस्थेत दिसला. गोवे वीरगळ a शेरी लिंबवरुन पाचवडमार्गे वाई गाठलं तिथून मेणवलीचा नाना फडवणीसांचा वाडा पाहून धोम गाठलं. धोम गाव बहुत सुंदर. झाडांनी वेढलेलं आणि पेशवेकालीन स्थापत्याची अप्रतिम मंदिरे असलेलं. ह्या धोमच्या अलीकडेच भोगाव आहे. भोगाव प्रसिद्ध आहे ते वामनपंडिताच्या समाधीसाठी. अर्थात मूळ समाधी सातारा जिल्ह्यातच कोरेगाव येथे आहे आणि भोगाव येथील समाधी वामनपंडितांच्याच कुण्या एका शिष्याने गुरुस्मरणार्थ बांधली आहे. ह्या भोगावमधेच अर्धनिम्म यादवकाळातलं मंदिर शिल्लक आहे. छताचा भाग पेशवेकाळात जीर्णोद्धारीत केला गेलेला आहे. ह्या मंदिराच्या पुढ्यातच प्रचंड गचपण आहे. तिथल्या त्या झाडीतच जमिनित पुरला गेलेला एक भग्न वीरगळ दिसला. काट्याकुट्यांतून मार काढत तिथवर पोहोचलो. लढाई आणि धारातीर्थी पडलेला वीर हे भाग गाडलेले गेलेले आहेत तर वरचा अप्सरा वीराला नेतात हा भाग फक्त दृश्यमान आहे. भोगाव वीरगळ. a आता मध्ये परत एकदा अमृतेश्वराला गेलो होतो. अगदी दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट. रतनवाडीला किमान ४/५ वेळा जाऊनही एक गोष्ट ध्यानात आली नव्हती ती तेव्हा आली. मंदिराच्या पाठीमागच्या प्रवेशद्वारातून आत जाताच वर छताकडे पाहिले असता तिथे छताची भिंतउलटे वीरगळ रचलेले आहेत. मंडिराच्या बाहेरील वीरगळांची येथल्या धुव्वाधार पावसामुळे खूपच हानी झालेली दिसते पण येथले आतले वीरगळ अगदी उत्तम स्थितीत आहेत. अर्थत हे पाहण्याकरीता उताणे झोपून वर पाहावे लागतात शिवाय विजेरीचा झोतही मारावा लागतो नाहीतर अंधारामुळे ते दिसत नाहीत. रतनवाडी अमृतेश्वर मंदिरातील छतांत असलेले वीरगळ a ह्याच अमूतेश्चर मंदिराच्या आवारात एक गधेगाळसुद्धा आहे. गधेगाळावरील शिलालेख पूर्णपणे झिजल्याने वाचता येत नाही, शिवाय ह्याचे वाचन पूर्वीही कधी झाले नाही मात्र हा लेख अमृतेश्वर मंदिराला दिलेल्या दानाबद्दलचा असावा व ह्या दानाचा लोप करणार्‍यांविषयी शापवाणी कोरलेली असावी हे निश्चित. रतनवाडी गधेगाळ a गधेगाळावरनं आठवलं. मध्यंतरी एकदा नागावला गेलो होतो. नागावच्या अलीकडेच अक्षी हे गाव. अतिशय सुंदर. गावाच्या सुरुवातीलाच काष्ठमंडप असलेलं सोमेश्वराचं एक सुरेखसं मंदिर आहे. मंदिराच्या बाजूलाच रस्त्याच्या पलीकडे गटारावर एक गधेगाळ आहे. हा शके १२१३ मधला लेख असून रामदेवरायाची राजवट चालू असता त्याचा पादपद्योपजीवि श्री जाईदेव पुत्र इश्वरदेव क्षत्रिय ह्याने अक्षी गावातील कालिकादेवीच्या ब्राह्मणास एक गद्याण दिल्याचा उल्लेख आहे आणि त्याखाली 'तेहाची माएसी गाढौ घोडु..' अशी शापवाणी कोरलेली आहे.. ह्याच गावात मंदिराच्या दुसर्‍या बाजूस सरकारी कचेरीनजीकच अजून एक गधेगाळ आहे. डॉ. तुळपुळे ह्यांच्या मते तो मराट्गीतील आद्य शिलालेख. अर्थात हे मत काही संशोधकांना मान्य नाही कारण काल्लोलेख अस्पष्ट आहे. हा शिलाहार केशीदेवाचा लेख असून त्यात पश्चिमसमुद्राधिपती, कोंकणचक्रवर्ती श्री केशिदेवराय राज्य करत असता त्याचा प्रधान भइर्जु सेणुई ह्याने देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य मोजून दिले. त्याखाली शापवाणी कोरलेली आहे. हे दोन प्राचीन लेख आज पूर्ण दुर्लक्षित अवस्थेत आहेत. यादव रामदेवरायाचा अक्षी गधेगाळ a शिलाहार केशिदेवाचा अक्षी गधेगाळ a मध्ये खिद्रापूरला गेलो होतो. तिथले महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि शिल्पकलेने समृद्ध असलेले कोपेश्वर मंदिर तीन चार वेळा पाहिलेले आहे. तिथल्या सुदर मूर्तींसारखेच सुंदर तिथले वीरगळही. मी आतापर्यंत पाहिलेला लेख असलेला एकमात्र वीरगळ हा तिथल्या मंदिराच्या ओसरीत भिंतीत बसवलेला आहे. लेख असलेले इतरही वीरगळ आहेत पण ते मात्र कर्णाटकात. महाराष्ट्रातला हा पाहिलेला मी एकमेव. ह्या लेखही महत्वाचा. भोजराजा दुसरा ह्याचा सेनपाती बम्मेश ह्याचा हा वीरगळ. हा बम्मेश महापराक्रमी यादवसम्राट सिंघण दुसरा ह्याचेबरोबर झालेल्या युद्धात वीरगतीस प्राप्त झाला. अतिशय देखणा असा हा वीरगळ. ह्याच मंदिराच्या आवारात अजून दोन तीन वीरगळ आहेत. कोपेश्वराच्या ओसरीतील भिंतीत असलेला एक वीरगळ a भोज सेनापती बम्मेशाचा अत्यंत देखणा असलेला वीरगळ a कालचीच गोष्ट, म्हणजे कालपरवाचीच असं नाही, अगदी कालचीच. काल हिंजवडी परिसरातले वीरगळ पाहायला गेलो होतो. हिंजवडीतला वीरगळ माझ्या रोजच्या पाहण्यातला. अगदी जायच्या यायच्याच वाटेवर पण कधी थांबून नीट पाहता आला असं झालं नाही. काल मात्र अगदी ठरवून बाहेर पडलो. हा वीरगळ आहे हिंजवडीतल्या स्मशानाच्या समोरच्या दहाव्याच्या घाटावर. चारी बाजूंनी शिल्पे कोरलेली आहेत. बरेच दिवस तो इथल्याच लहानश्या मंदिराला टेकवून ठेवलेला होता. ४/५ दिवसांपूर्वीच तो नव्या जागेवर उभा केलेला आहे. हिंजवडी वीरगळ a हिंजवडीवरुन निघालो ते नेरे गावात जायला. नेरे गावात बरेच वीरगळ आहेत अशी माहिती मिळाली होती. नेरे गाव मारुंजीच्या पुढे. मारुंजी कासारसाई च्या मध्येच एक उजवीकडे जाणारा फाटा लागतो. तिथून अर्धाकच्च्या रस्त्याने नेरे गाव. गाव असं दिसत नाहीच अधून मधून घरं आणि बाजूला शेतं. तिथेच रस्त्यावर एक शिवकालीम शिवमंदिर आहे. जवळपास पन्नासेक वीरगळ तिथे हारीने मांडून ठेवलेले आहेत. तिथेही गोवर्धन वीरगळ आहेत. ढालाईताशी युद्ध, तीरयुद्ध, अश्वयुद्ध असे बरेच प्रस्ग तिथल्या वीरगळांवर कोरलेले आहेत. तिथेच काही वैशिष्ट्यपूर्ण वीरगळ देखील आहेत. वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे तिथल्या त्या वीरगळांवर नेहमीसारख्या पट्टीका नसून शिळेचा निम्माधिक भाग तलवार हाती घेतलेल्या एकाच वीराने व्यापलेला आहे. असे कित्येक पुरुषभर उंचीचे वीरगळ तिथे आहेत. नेरे वीरगळ a नेरे वीरगळ a नेरे गोवर्धन वीरगळ a नेरे एकाकी योद्धा a नेरे वीरगळ a a आतापर्यंतच्या एकंदरीतच वीरगळ भेटींचा हा सारांश, ह्य लेखांत मुद्दामूनच पुनरुक्ती न व्हावी, म्हणून माझ्या आधीच्या लेखांमध्ये शक्यतो न आलेले वीरगळ घेतलेले आहेत. काही मोजके आधीच्या लेखांमध्ये आलेले असतीलच. वीरगळावर लिहित असताना सतीशिळा आणि गधेगाळांविषयी लिहिणं हे अपरिहार्य होतंच. तसं ते लिहिण्याच्या ओघात लिहूनही झालं ह्या अनाम वीरांचं माझ्यावर काही ऋण असणार. ते फेडण्याचा अल्पसा प्रयत्न मी येथे केला आहे. _/\_

प्रतिक्रिया द्या
57470 वाचन

💬 प्रतिसाद (154)
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 07/25/2016 - 09:21 नवीन
सासवड अलीकडे 5 कि. मी. वर-हिवरे गावातील शिवमंदिरा बाहेरील वीरगळ. Image removed.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतु हिरवा Tue, 06/20/2017 - 19:08 नवीन
परवा 18 तारखेला रविवारी कळसूबाई ला गेले होते. तेव्हा बारी गावात एक विरगळ आढळला. इथे मला फोटो टाकायला जमला तर टाकते
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतु हिरवा Tue, 06/20/2017 - 19:08 नवीन
परवा 18 तारखेला रविवारी कळसूबाई ला गेले होते. तेव्हा बारी गावात एक विरगळ आढळला. इथे मला फोटो टाकायला जमला तर टाकते
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Wed, 06/21/2017 - 03:40 नवीन
वाईमध्ये जांभळी गावात दोन स्तंभाच्या आकाराचे दोन वीरगळ आहेत, म्हणजे वीरगळच असावेत कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणेच प्रसंग कोरलेत फक्त नक्षीकाम जास्त आहे आणि आकार ही वेगळा आहे तुम्ही आतापर्यंत इथे टाकलेल्या फोटोमध्ये तशा आकाराचे वीरगळ नाही पाहिला.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा