Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काटा वजनाचा --५

स
सुबोध खरे
गुरुवार, 03/17/2016 - 17:07
💬 66 प्रतिसाद
काटा वजनाचा --४ मागच्या चार भागात आपण पाहिले कि वजन का वाढ्ते? adipostat म्हणजे काय आणि वजन थोडे कमी होऊन परत का वाढते? यात एक मूळ विचार मी अंतर्भूत करू इच्छितो कि कोणते अन्न आहे ज्याने वजन पटकन वाढते. आपल्याला २४ तास उर्जेची गरज भासत असते आणि हि उर्जा ग्लुकोज जाळून मिळवली जाते. आपल्या मेंदूला चोवीस तास ग्लुकोज चा पुरवठा लागतो मग तो जागा असो कि झोपेत. झोपेत मेंदूचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या वेळी कार्यरत होत असतात. हि ग्लुकोज तुम्हाला अन्नातून थेट मिळते किंवा इतर पिष्टमय पदार्थांचे( रवा मैदा आटा तांदूळ ज्वारी बाजरी बटाटा रताळे इ) विघटन करून अथवा चरबी पासून तयार करून मिळवता येते. तुम्ही खाल्लेल्या अन्नातील अतिरिक्त ग्लुकोज/ किंवा पिष्टमय पदार्थ हे यकृतात ग्लायकोजन या स्वरुपात साठवले जातात. ग्लायकोजन हे ग्लुकोज चे polymer आहे म्हणजे शेकडो ग्लुकॊज चे रेणू एकत्र बांधून त्याची साखळी केली जाते आणि हे घट्ट स्वरुपात थोड्या जागेत (tightly packed) साठवले जाते. आपल्या यकृतात साधारणपणे ५-६ तास पुरेल इतकी ग्लुकोज ग्लायकोजन या स्वरुपात साठवली जाते.म्हणजे तुम्ही काहीही खाल्ले नाहीत तर तुमच्या शरीरातील ग्लुकोज/ग्लायकोजन हे सहा तासांत संपून जाईल.आणी यामुळे आपल्याला या कालावधी नंतर "भूक" लागते. यानंतरहि आपण काही खाल्ले नाही तर आपल्या शरीरात चरबीचे रुपांतर ग्लुकोज मध्ये व्हायला सुरुवात होते आणि आपली चरबी कमी होऊ लागते. हीच प्रक्रिया जेंव्हा आपण व्यायाम करतो तेंव्हा जोरात व्हायला लागते. साखर, ग्लुकोज हे पदार्थ पटकन शरीरात शोषले जातात( म्हणूनच खेळाडूना त्वरित उर्जा मिळण्यासाठी ग्लुकोज दिली जाते). त्या मानाने स्टार्च किंवा इतर गुंतागुंतीचे पिष्टमय पदार्थ त्यांचे विघटन करायला वेळ लागत असल्याने हळूहळू शोषले जातात. त्याशिवाय त्यात असणारे तंतुमय पदार्थ (फायबर्स)किंवा चोथा या पदार्थांचे शोषण लांबवतात. यामुळेच केक बिस्किटे शीतपेये वेफर्स यासारखे प्रक्रिया करून त्यातील चोथा काढून टाकल्याने पदार्थ फार पटकन शोषले जातात आणि त्यामुळे लठ्ठ्पणाला आमंत्रण मिळते. हे "प्रक्रिया करून चोथा काढून टाकलेले" असे अन्न पदार्थ आहेत ज्याने वजन पटकन वाढते आपण खातो त्या अन्नात चरबी आणि पिष्टमय पदार्थ हे दोन घटक आहेत ज्यापासून मुख्यत्वे आपल्याला कॅलरिज मिळतात. परंतु या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्या तर त्यातील पिष्टमय पदार्थ हे उर्जा मिळवण्यासाठी "प्रथम" वापरले जातात आणि चरबी हि तुमच्या शरीरातील ग्लुकोज संपली कि मग वापरली जाते. म्हणजे काय होते? आपण उपाशी पोटी एक छान क्रीम असलेला केक खाल्ला कि त्यातील पिष्टमय पदार्थाचा वापर शरीराला कॅलरी मिळवण्यासाठी चालू होतो आणि त्यावर असलेली मलई( साय/क्रीम) किंवा चरबी युक्त पदार्थ हे सरळ आपल्या शरीराच्या चरबीच्या पेशींकडे जातात. जोवर केक मधील पिष्ट्मय पदार्थ पूर्ण वापरले जात नाहीत तोवर त्यातील चरबीचा वापर होणार नाही. पुढचे बरेच दिवस उपास घडेल या हिशेबाने ती चरबी आपल्या शरीरात साठवली जाते. हा तुमच्या शरीरातील गुणसूत्रे आणि जनुकानी शतकानुशतके अन्नाच्या दुर्भिक्ष्याने शिकलेला धडा आहे तो असा एक दोन पिढ्यात जाणार नाही. दुर्दैवाने असा उपास १९७० नंतर (हरित क्रांती) आपल्या देशात फारच कमी लोकांना घडतो. ( आणी ज्यांना घडतो उदा. आदिवासी. त्यांना लठ्ठपणा म्हणजे काय ते माहितीही नसते.). अशा दुर्भिक्षामुळे आपली संस्कृती काय झाली आहे कि तुमच्या घरी कोणी येणार असेल तर त्याला सुग्रास चमचमीत खाऊ घालणे. किंवा तुम्ही कुणाकडे जाणार असणार तर तेथे भेट म्हणून मिष्टान्न घेऊन जाणे. कोणत्याही साध्या किंवा ओल्या पार्टी मध्ये येणारे खाद्य पदार्थ काय असतात ते पहा- वेफर्स, तळलेले दाणे किंवा काजू, चीज येथपासून पनीर /चिकन टिक्का, मटण कबाब, luncheon meat. कोणत्याही लग्नाच्या जेवणात काय असते तेही पहा, पनीर बटर मसाला, चिकन माखनवाला,व्हेज तवा, चिकन हंडी याबरोबर बटर रोटी किंवा नान चार पाच फरसाण पदार्थ( कॉर्न कबाब, भजी,दाल वडा, चीज सामोसा) शेवटी दाल माखनी किंवा दाल तडका आणि जीरा फ्राईड राइस. सरते शेवटी तीन ते पाच मिष्टान्ने( रसमलाई, तुपातील गाजर हलवा, आइस क्रीम, शाही टुकडा,मलईयुक्त मालपुवा). यावर अजुन होणारा आग्रह इ.तर मी बोलतच नाही. यातील बहुसंख्य पदार्थ high Glyacemic index असलेले आहेत. म्हणजे काय? तुम्ही ते पदार्थ खाल्ले कि तुमच्या शरीरातील ग्लुकोज फार झपाट्याने वाढते. आता हि एकदम वाढलेली ग्लुकोज कमी करण्यासाठी तुमचे स्वादुपिंड इन्स्युलीन तयार करते ज्याने या ग्लुकोजचे रुपांतर ग्लायकोजन मध्ये होते आणि उरलेल्या ग्लुकोजचे रुपांतर लगेच चरबी मध्ये होते. असे "एक भरपेट" जेवण तुम्ही करत असलेल्या दहा दिवसांच्या(DIET) मिताहाराच्या इतके असते. म्हणूनच बरेच लोक महिनोन महिने "डाएट" करत असतात तरीही त्यांचे वजन काही कमी होत नाही. कारण मी दहा दिवस डाएट केला आता एक दिवस तरी मला "पोटभर खाऊ दे" असे ते स्वतःला( आणि इतरांना) सांगत असतात त्यातून तुम्ही लोक कसे ताट भरून घेततात ते पहा. रोटी, चिकन, पनीर, भाज्या फरसाण यांनी ताट पूर्ण भरून जाईल असे एकदाच घेतात (परत परत उठायला नको म्हणून) आणी मग तब्येतीत जेवत राहतात. त्यात मग कबाब, समोसा वगैरे आवडले तर ते अजून घेऊन यायचे आणि शेवटी परत एक डिश भरून गाजर हलवा, रसमलाई आईस्क्रीम वगैरेने पोट "भरून" घेतात. आता यावर सर्वसाधारण उत्तर हेच असते कि डॉक्तर, "म्हणजे आम्ही लग्नात जेवायचेच नाही का?" याचे उत्तर असे आहे. पहिल्यांदा आपले ताट छान पैकी सलाडने भरून घ्या त्यावर मीठ लिंबू चाट मसाला टाकून ते खाऊन घ्या. शिवाय बहुसंख्य लठ्ठ माणसांचे पोट "भरल्या"शिवाय समाधानच होत नाही. त्यामुळे एक पेला ताक पिऊन घ्या. या सर्व गोष्टीनी आपले पोट भरल्याची संवेदना होते. यानंतर आपल्याला कोणते पदार्थ "हवे" आहेत ते ठरवा. केवळ समोर आहेत म्हणून खाणे बरोबर नाही.केवळ समोर आहे म्हणून बटाट्याची भाजी किंवा अळवाचं फतफतं पानात घेण्याला काय अर्थ आहे? मग असे हवेत ते पदार्थ निवडूनच ताटात घ्यावेत आणि चवीने खावेत . केवळ पोट भरण्यासाठी मैद्याचे नान किंवा भात खाल्ला तर लगेचच तो आपल्या चरबीला भेटायला जाईल. स्वामी चिन्मयानंदानी सांगितलेला एक किस्सा मला इथे उद्धृत करावासा वाटतो.-- एक माणूस आपल्या मित्राच्या लग्नाला जातो. तेथे तो चाळीस गुलाब जाम खातो. आणि त्यामुळे त्याला कसंसंच व्हायला लागतं. यावर त्याचा दुसरा मित्र म्हणाला कि अरे तुला इतका त्रास होत आहे तर घशात दोन बोटे घालून तू उलटी का करून टाकत नाहीस त्याने तुला बरे वाटेल. यावर हे महाशय म्हणाले अरे जर "दोन बोटं" घालायला जागा असती तर अजून दोन गुलाब जाम नसते का खाल्ले? तात्पर्य -- पोट फुटेस्तोवर खाण्यात काय अर्थ आहे? जीवनात खाणे हा एकच आनंद नाही. उत्तम संगीत, उत्तम मित्र, उत्तम पुस्तके, उत्तम साथीदार असे अनेक आनंद असताना माणसे मात्र फक्त "खाण्यात" आनंद शोधात असल्याने ते "अंगावर" चढणारच. क्रमशः

Book traversal links for काटा वजनाचा --५

  • ‹ काटा वजनाचा --४
  • Up
  • काटा वजनाचा --६ ›

प्रतिक्रिया द्या
29989 वाचन

💬 प्रतिसाद (66)
प
पिलीयन रायडर गुरुवार, 03/17/2016 - 17:18 नवीन
Uttam!!
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 03/17/2016 - 18:20 नवीन
पुभाप्र!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 03/17/2016 - 18:27 नवीन
डॉक... या विषयावरचा हा धागा पाहुत आता त्रास व्हायला लागला आहे, कारण आजच कंपनीत रक्त दान करण्याच्या आधी वजन केले आणि काटा पाहिला ! ;) {वजनाच्या आणि पोटाच्या घेर्‍याच्या चिंतेत असलेला }

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तू तू तू तू मेरी री री री मे तेरा रा रा होने लगा, में में में में तेरा रा रा रा तू मेरी री री होने लगी... :- BANG BANG
  • Log in or register to post comments
अ
अभिदेश गुरुवार, 03/17/2016 - 18:42 नवीन
पहिल्यांदा आपले ताट छान पैकी सलाडने भरून घ्या त्यावर मीठ लिंबू चाट मसाला टाकून ते खाऊन घ्या. शिवाय बहुसंख्य लठ्ठ माणसांचे पोट "भरल्या"शिवाय समाधानच होत नाही. त्यामुळे एक पेला ताक पिऊन घ्या. या सर्व गोष्टीनी आपले पोट भरल्याची संवेदना होते.> पण बाहेरचे सलाड खायची हिम्मत होत नाही आणि मी ते कधीच खात नाही. न धुतलेले , कच्चे पदार्थ खाणे म्हणजे आजाराला आम्नत्रण....
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 03/17/2016 - 18:43 नवीन
डॉक, प्रोटीन फॅट्स फायबर्स आणि ग्लायकोजेनची थेरी सोप्या भाषेत सांगितलीत, एकदम समजली. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
अ
अगम्य गुरुवार, 03/17/2016 - 19:14 नवीन
पार्टी आणि लग्नाचा मेनू वाचून तोंडाला पाणी सुटले :-) असा काही मार्ग नाही का की हे सर्व खाऊन सुद्धा वजनाचा काटा आटोक्यात राहील? उदाहरणार्थ दोन तास पोहायचे आणि नंतर हे सर्व हादडायचे :-)
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र गुरुवार, 03/17/2016 - 21:52 नवीन
पार्टी आणि लग्नाचा मेनू वाचून तोंडाला पाणी सुटले :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगम्य
व
विंजिनेर गुरुवार, 03/17/2016 - 20:06 नवीन
व्यायामाची सवय नसल्यास उर्जा निर्मिती साठी शरीर ९०%+ वेळा केवळ कर्बोद्कांवर अवलंबून राहते ही खरी गोष्ट आहे. चरबी जाळून उर्जा निर्मिती जास्त कठिण असते. नियमीत व्यायामाने (एंड्युरन्स/एरोबिक वर्गातील प्रकार) केवळ ग्लुकोज्/कर्बोदकांचा वापराच्या ऐवजी शरीराला चरबी आणि कर्बोदके या दोन्ही जाळून उर्जा निर्मिती करायची सवय लावता येते. पण हे एकूण उर्जा निर्मितीचे (आणि त्यासाठी वापरल्या जाणार्‍या इंधनाचे) गणित गुंतगुंतीचे आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 03/17/2016 - 21:03 नवीन
वजन कमी करायच्या गोळीचे नाव नाही :( :'(
  • Log in or register to post comments
ब
बेकार तरुण Fri, 03/18/2016 - 03:18 नवीन
लेख आवडला
  • Log in or register to post comments
स
सामान्य वाचक Fri, 03/18/2016 - 05:16 नवीन
खूपच सोप्या शब्दात सांगत आहात छान लेखमाला डॉ साहेब पुढचा भाग जर लवकर टाका
  • Log in or register to post comments
झ
झेन Fri, 03/18/2016 - 06:07 नवीन
थियरी सोपी प्रॅक्टीकल जरा अवघड. धन्यवाद डॉक्टर साहेब. पणउअभिदेश यांनी लिहील्या प्रमाणे बाहेरचे न शिजवलेले खावे की नाही प्रश्न पडतो, इतकेच काय आजकाल साधे दूध सुद्धा नैसागीक का रासायनीक कळत नाही
  • Log in or register to post comments
त
तिरकीट Fri, 03/18/2016 - 07:40 नवीन
आमच्या माहीतीत एका काकुंनी वजन कमी करायचे म्हणून आयुर्वेदीक उपचार सुरु केले. त्यानुसार,फक्त काकडी आणी टोमॅटो चे पाणी (सूप नाही) त्या जवळपास २ महीने घेत आहेत आणी काही आयुर्वेदीक गोळ्याही चालू आहेत. भात, पोळी यांचे प्रमाण अत्यल्प. त्यांच्या सांगण्यानुसार त्यांचे वजन साधारण १५-१६ किलोनी उतरले आहे. जे आम्हालाही दिसतय.(वय- ३८) पण आता त्या रोडावल्यासारख्या दिसतायत. दोन महीन्यांमध्ये इतके वजन कमी होणे योग्य आहे का?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 03/18/2016 - 07:51 नवीन
दोन महिन्यात १५-१६ किलोने वजन कमी केल्यास त्वचेला सुरकुत्या येउन तुम्ही अकाली वृध्द दिसू लागाल. फुगा फुगवून एकदम हवा काढल्यास जशा सुरकुत्या येतात तसेच होते. तुमच्या त्वचेला चरबी मुळे आलेला ताण एकदम कमी केला तर तिची लवचिकता किंवा स्थितीस्थापकत्व(ELASTICITY) तेवढे नसल्याने असे होते. याहून महत्त्वाचे म्हणजे काकडीचे पाणी किंवा फक्त लिम्बु सरबत घेतले तर शरीराला अन्नातून मिळणाऱ्या जीवनसत्त्व आणी क्षार ई आवश्यक सूक्ष्म द्रव्यांची अतिशय कमतरता भासून शरीराचे अपरिमित नुकसान होऊ शकते. तेंव्हा असे उपाय करू नयेत. आहार तज्ञांकडून व्यवस्थित आहाराची आखणी करून मगच तसे करावे. मुळात तुमचे वजन दोन महिन्यात पंधरा किलोने वाढत नाही तर ते दोन महिन्यात कमी करण्याचा अट्टाहास कशासाठी. मी पैसे देतो आहे तर त्याचा मोबदला मला ताबडतोब मिळाला पाहिजे अशा आजच्या जमान्यातील इन्स्टण्ट मनोवृत्तीचे हे फळ आहे. साधारण महिन्याला दोन किलोने वजन कमी करणे हा हेतू ठेवून एक वर्षात २० किलो पर्यंत वजन कमी करणे हे बरोबर ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिरकीट
म
मन१ Fri, 03/18/2016 - 08:38 नवीन
आहार तज्ञांकडून व्यवस्थित आहाराची आखणी करून मगच तसे करावे.
कोण आहारतज्ञ ? . . सध्या पुणे मुंबैत बर्रेच आहेत. आणि त्यातले खूपसे एकमेकांच्या उलट सांगतात. जिममध्ये उत्साहात शिरलेल्या माणसाला व्हे प्रोतिनमध्ये बुचकाळून घ्यायचा सल्ला मिळतो. विविध हेल्थ फॅडंही असतात. )कोथ्रुडात मध्ये मोठी बॅनर्स लागली होती वजन वगैरे आटोक्यात आणायची.) ते लोक अन्नवैगैरेचं चक्क रिप्लेसमेण्ट म्हणून कुठलीशी तयार पावडर पीत रहायला सांगतात. . . प्रश्न असा की आहारतज्ञ नेमकं कोण ? जिममध्ये डाएटिशिअनची पाटी लावून बसणारं कुणीतरी; की फेम्स पुस्तकाच्या लेखिका रुजुता दिवेकर ? ( हे " आता शरण कोणा जावे " च्या चालीवर वाचा.) फॅमिली डॉक्टरचं व्यवस्थित ऐकणे, पालन करणे हा एक मार्ग वाटतो, पण त्यात माझ्या वडिलांची पिढी नशीबवान होती. हल्ली फॅमिली डॉक्टर भेटतात तरी कुठे ? ( कारणं वगैरे स्वतंत्र विषय आहे; आणि त्यात गुंतलेल्या सगळ्य घटकांच्या आपापल्या मजबुर्‍या , प्राधान्य असतील; ह्याची कल्पना आहे; आदरही आहे. .............ओम कॉर्पोरेटायझेशनाय नम:.................. ) . . अर्थात ह्यामुळेच डॉक्टरांकडून थेट लिहून येणार्‍या मजकुराचं महत्व वाढतं. ( अभय बंग -- "माझा साक्षात्कारी हृदयरोग " बद्दलही तेच. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 03/18/2016 - 09:07 नवीन
आपले म्हणणे मान्य आहे. दुर्दैवाने अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे आहार तज्ञ फार आहेत आणी चांगले डॉक्टर या क्षेत्रात उतरू पाहत नाहीत. याचे कारण त्यात येणारे अपयश. बहुसंख्य लोकप्रिय आहार तज्ञ उदा. VLCC TALVALKAR हे इन्स्टण्ट रिझल्ट देण्याच्या मागे असतात आणी तसे कमी केलेले वजन थोड्या दिवसात परत मूळ पदावर येते. माझ्या माहितीतील किंवा उच्चभ्रू मित्रांच्या बायका VLCC मध्ये जाऊन ४०,०००/- भरून तीन महिन्यात १० किलो वजन कमी करून येतात आणी पुढच्या सहा महिन्यात परत ये रे माझ्या मागल्या. या बर्याच बायका "जाता जाता" आमचाही सल्ला मागत होत्या परंतु सवंग लोकप्रियता या पासून आम्ही दूर आहोत त्यामुळे आमचा परखड सल्ला त्यांना झेपणारा नव्हता म्हणून त्यांनी आमचा( मी आणी माझी पत्नी) नाद सोडला. नवर्याला आम्ही "चांगल्या" दिसायला पाहिजे तर खर्च करायलाच लागतो या पालूपदावर असणार्या बायकांना आम्ही काय सल्ला देणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१
त
तिरकीट Fri, 03/18/2016 - 10:30 नवीन
मुळात तुमचे वजन दोन महिन्यात पंधरा किलोने वाढत नाही तर ते दोन महिन्यात कमी करण्याचा अट्टाहास कशासाठी. +१ हे मात्र अगदी बरोब्बर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
स्थितप्रज्ञ Fri, 05/20/2016 - 13:52 नवीन
मुळात आयुर्वेदात इतके अघोरी उपचार नाहीत. त्या ज्यांच्याकडून हे उपचार घेताहेत ते आयुर्वेदाचे नाव वापरून स्वतःचे पोट भरणारे (थोतांड) दुकान आहे हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिरकीट
अ
अजया Fri, 03/18/2016 - 07:46 नवीन
छान लेख.पुभाप्र
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Fri, 03/18/2016 - 07:46 नवीन
डॉक, म्हणजे थोडक्यात खाण्यातुन पोटात गेले फॅट्स हे कर्बोदके आधी जळत असल्याने चरबी स्वरुपात साठतात. ते जाळायचे असतील तर व्यायामाला पर्याय नाही. रोजची पोळी - भाजी - वरण - भात - कोशींबीर खाल्लं तर वजन वाढायला नको. कारण घरी बनवताना आपण प्रमाणात तेल, साजुक तुप वगैरे वापरतो. जे आरोग्याला घातक निश्चित नसावे. मग लोक डाएट म्हणुन नुसती भाजी खातात. पोळी / भात सोडतात. त्याने काय फायदा होणार? व्यायाम केल्याशिवाय चरबी जळणार नाहीच. केवळ एकच प्रकार खाणे, कर्बोदके टाळणे, स्निग्ध पदार्थ न खाणे ह्याचेही तोटे असतीलच ना? कारण हे ही घटक आरोग्याला आवश्यक असतीलच.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 03/18/2016 - 07:56 नवीन
व्यायाम केल्याशिवाय चरबी जळणार नाहीच. असे नाही जर तुम्ही खात असलेल्या अन्नापेक्षा तुमच्या शरीराची मुलभूत गरज जास्त असेल तर शरीर हि उर्जा शरीराच्या चरबीतूनच मिळवते. म्हणजे आपले वजन कमी होईलच. पण व्यायाम केला तर अधिक प्रमाणावर चरबी जळेल शिवाय आपले स्नायू आणी शरीर जास्त सशक्त आणी निरोगी होईल. तुम्ही आहारातून कर्बोदके आणी चरबी कमी केली पाहिजे परंतु प्रथिनयुक्त पदार्थ, जीवनसत्त्वे क्षार आणी खनिजे यांचे सेवन चालू ठेवले पाहिजेत कारण शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी हे पदार्थ आवश्यक आहेतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Fri, 03/18/2016 - 08:13 नवीन
अच्छा म्हणजे कमी खा, पण जे खाल त्यात सलाद, ताक, भाजी / वरण जास्त (साधारणतः पोळी आणि भात जास्त घेतला जातो.). चरबी नंतर जळणार असल्याने, शक्यतो स्निग्ध पदार्थ मर्यादित व्यायाम भरपुर पण तरी तो adipose चा मॅटर आहे.. पण तरी नियमितपणे आणि रोज थोडा वाढवत नेला, तर व्यायामाचा फायदाच होइल, हे बरोबर का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 03/18/2016 - 08:58 नवीन
बरोबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
व
वेल्लाभट Fri, 03/18/2016 - 08:03 नवीन
सुप्पक धागा! पसरवतोय.
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Fri, 03/18/2016 - 08:12 नवीन
माहिती मिळते आहे. पुभाप्र.
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 03/18/2016 - 08:24 नवीन
नियमीत व्यायाम सध्या जमत नाही पण नेमाने चालायला जातो साधारण ४-५ किमी आणी खाणे मर्यादीत आहे. वय वर्ष १५ मुलासाठी काही सुचवण्या असल्या तर हा पालक दुवा देईल. विवंचनी पालक नाखु
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Fri, 03/18/2016 - 10:47 नवीन
वाचतोय. बाकी कितीही खा आम्ही पहिल्या पासुन बारीक म्हणुन टेन्शन इल्ले.
  • Log in or register to post comments
श
शि बि आय Fri, 03/18/2016 - 10:48 नवीन
सुंदर लेखमाला… खुप खुप धन्यवाद... पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 03/18/2016 - 10:55 नवीन
भारी!! आधीच्या चार लेखांच्या लिंका हापिसातल्या एकदोन टाळक्यांनी वाचायला मागून घेतल्यात.
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 03/18/2016 - 12:10 नवीन
भारी!!
सूड ने चक्क खर्यांचे कौतुक केले? बाबो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Fri, 03/18/2016 - 12:31 नवीन
आहे ते आहे. जिथे आवडलं नाही तिथे तसं लिहीलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा Fri, 03/18/2016 - 12:51 नवीन
आँ, अच्च जाल्ल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Fri, 03/18/2016 - 13:54 नवीन
ओह आय सी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
सस्नेह Fri, 03/18/2016 - 11:10 नवीन
आणि तीही सहज समजेल अशा भाषेत ! डॉक, तुम्ही अगदी नेमके आणि अचूक लिहिताय. पुभाप्र. रच्याकने, बाहेरचे खाणे संतुलित नसल्याने, ते टाळतेच. अगदी अभ्या म्हणतो तसे सलाडही सुरक्षित नसते असा अनुभव आहे. कित्येकदा सलाड कापण्याची सुरी धुतलेली नसते. तिचे डाग काकडी किंवा मुळ्याच्या कापांवर स्पष्ट दिसतात. भाज्या कमी आणि ग्रेव्ही/मसाला जास्त असतो. आमटी तेलयुक्त तिखट जाळ. अगदी वरण असले तरी त्यात तडका/गरम मसाला असतोच. ताक बाहेरच्या जेवणात कधी दिसले नाही. मठ्ठा असतो. पण त्यातल्या पाण्याची ग्यारंटी नसते. स्वीट 'तुपातले' म्हणून कसल्यातरी अगम्य ओशट चरबीतले बनवलेले असते. तस्मात, घरीच जेवणे, जड आहार टाळणे. या तत्वामुळे आजवर वजन आणि पचन नेहमी आटोक्यात राहिले आहे.
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 03/18/2016 - 11:58 नवीन
सारखा असल्याने घरी लेकाशी किरकिर होते (मी बाहेर न खाण्याबद्दल आग्रही असतो.) मध्यममार्ग म्हणून विशेषतः कन्येसाठी आणि लेकासाठी बाहेरून फक्र भाजी मागवून घरीच जेवणे पसंत करतो. किमान ५०% साफ्+सकस खाण्याची हमी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सस्नेह Fri, 03/18/2016 - 12:07 नवीन
तुम्ही आमच्याच गावचे दिसता. एरवी पुरुषांचे डायेटिंग म्ह्णजे ...! ह घ्यावे.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
अ
असा मी असामी Fri, 03/18/2016 - 13:01 नवीन
रात्री पंजाबी अथवा पिझ्झा खाल्यावर दुस-या दिवशी सकाळी चालायला अथवा धावताना दम लवकर लागतो ( असा माझा अनुभव / भ्रम आहे) ह्या मागे काही शास्त्रीय कारण आहे कि मनाचे खेळ?
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Sun, 03/20/2016 - 17:23 नवीन
पंजाबी जेवल्यावर दुसऱ्यादिवशी व्यायाम सुसह्यरीत्या मस्त होतो! पण ते पंजाबी पनीर नसून पंजाबी चिकन असते ... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असा मी असामी
स
सुबोध खरे Mon, 03/21/2016 - 07:33 नवीन
आदल्या दिवशी जडान्न( अति चरबीयुक्त) खाल्ले तर त्याचे पचन होण्यास वेळ लागतो.(आणि बहुसंख्य लोक रात्री भरपूर रिकामा वेळ असल्याने रात्रीच असे जडान्न खातात आणि लगेच झोपायला जातात.) यामुळे दुसर्या दिवशी पोटाला जडत्व येते. हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जसे अजगर भक्ष्य गिळल्यावर बरेच दिवस संथ पडून राहतो ते अन्न पचवण्यासाठी अशीच स्थिती आपली असते. चरबी युक्त अन्न खाल्ले कि आपले जठर अन्न जास्त वेळ साठवून ठेवते आणी त्याचे पचन होण्यासाठी थोडे थोडे अन्न लहान आतड्यात सोडते. याला लहान आतड्यातील सिक्रीटीन नावाचे एक संप्रेरक(HORMONE) जबाबदार असते. यामुळे असे जेवण जेवल्यावर लगेच आडवे पडलात तर अन्न आणि त्याबरोबर असलेले आम्ल घशाशी येते. याला सोपा उपाय म्हणून लोक डायजिन सारख्या antacid चं गोळ्या घेतात.परंतु लोक कमी खाण्याचे नाव काही घेत नाहीत. याच कारणासाठी आपल्याला जेवण झाल्यावर शतपावली करण्याचा उपदेश आपल्या संस्कृतीत लिहिलेला आहे. पण कोला सारखी पेये अति चरबीयुक्त अन्न आणि शेवटी आईस्क्रीम( ११% चरबी आणि २४% साखर) सारखे पदार्थ खाऊन लोक सरळ झोपायला जातात.यामुळे लोक वयाच्या २५ पासूनआम्लपित्ताला आणि लठ्ठपणाला बळी पडताना दिसतात. योगाचार्य सुद्धा आपल्याला भरल्या पोटावर योगासने( किंवा कोणताही व्यायाम) करू नका सांगतात याचेही हेच कारण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असा मी असामी
र
रेवती Fri, 03/18/2016 - 18:06 नवीन
वाचतिये. उत्तम माहिती. असे मेणू असलेली लग्ने फारशी न अनुभवल्याने आजकाल नक्की काय चालते ते माहित नाही. आपले पूर्वीचे लग्नप्रंग आठवले की वरण भात, अळूची भाजी, बटाटा भाजी, पुरी, श्रीखंड्/जिलबी/गुलाबजाम, मठ्ठा, चटणी, कोशिंबीर, भजी असेच डोळ्यासमोर येते. ते किती चवदार असते. वर सांगितलेले प्रकार आजकाल असतील तर लग्नाच्या सीझनला असली चारएक लग्ने जेवली म्हणजे त्यात तृप्ती कुठली? सतत वजनाची काळजीच! शिवाय पंगत असली म्हणजे एका जागेवर बसून स्वस्थ चित्ताने जेवता येते. बुफे प्रकार मलातरी अजिबात आवडत नाही पण आजकाल इलाज नसतो. जागेच्या व मनुष्यबळाच्या आभावाने उभ्याउभ्या जेवणे करावे लागते. शिवाय खूपवेळ परतलेल्या, शिजवलेल्या अन्नामध्ये न्यूट्रीशन किती? क्राऊडला फीड करण्याचे चांगले पदार्थ वेगळेच असतात. पूर्वी लग्न, जेवणे झाल्यावर लग्नाच्या हॉलमध्ये/मांडवात जवळचे नातेवाईक गप्पा मारत बसायचे. आताशा आधी घरी जाऊन झोपण्याशिवाय इलाज रहात नसेल.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 03/19/2016 - 04:52 नवीन
या जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक खाण्यासाठी जगणारे व दुसरे जगण्यासाठी वा जगण्यापुरत खाणारे. आता हा धागा वाचल्यानंतर पहिल्या प्रकारातील लोक म्हणतील. जाउ दे मरु दे ते डाएट. मरायचच आहे तर खाउन मरु.खाण्यात खरोखर जग जगते. हे लोक दुसर्‍या प्रकारच्या लोकांची कीव करतात. हॅ या लोकांना जगण्यातला आनंद्च घेता येत नाही. खाओ पिओ मजा करो. कल क्या होगा किस को पता अभी जिंदगीका ले लो मजा!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 03/19/2016 - 05:44 नवीन
घाटपांडे साहेब हा फार टिपिकल प्रतिसाद आहे. माझे लोकांना हेच सांगणे आहे कि उत्तम पदार्थ तुम्ही खाता कशासाठी? चवीसाठी/ स्वादासाठी. नुसते विपुल प्रमाणात/ दाबून खाणे म्हणजे खाओ पिओ मजा करो नव्हे. ज्यांच्या नाकातून नळी घातली आहे किंवा पोटाला भोक पाडले आहे असे कर्करोगाचे असंख्य रुग्ण मी पाहिलेले आहेत. त्यांच्या दृष्टीने केशर घातलेला साखरभात आणि लाकडाचा भुसा यात फरक नाही. आपल्याला समोर असलेला साधा वाफाळता भात खाता येत नाही याचे दुःख काय असते हे शब्दात वर्णन करता येणार नाही इतके भयंकर असते. याचा अर्थ असा कि आपण दीड इंचाच्या जीभेसाठी( चव आणि स्वाद) पदार्थ खातो तर ते लहान घास घेऊन बत्तीस वेळा चावून त्याचा आस्वाद घ्या. वजनदार माणसं मोठ्या मोठ्या घासात पदार्थ संपवतात कारण पोट "भरल्या" शिवाय त्यांचे समाधान होत नाही. शिवाय आपले ताट भरून खाल्लेच पाहिजे असे नाही तर आपल्या आवडीचे निवडक पदार्थ तेवढे खा उगाच रोटी नान किंवा भाताने पोट का भरायचे? "पु लं " नि म्हटल्याप्रमाणे जास्त खाणार्याला खवैया म्हणायचे तर जास्त गाणार्याला गवैया म्हणायला पाहिजे. असे नसून कोणता पदार्थ कसा "झाला" पाहिजे याचे ज्ञान असणारा आणि कोणता पदार्थ कोणत्या ठिकाणी उत्तम मिळतो आणि का उत्तम आहे हे ज्याला कळले तो "खवैय्या". नुसते म्हशीसारखे जे समोर येईल त्याला तोंड लावणार्याला किंवा दिवसभर चरत राहणार्याला खवैय्या म्हणणे हा "अन्नब्रम्ह" चा अपमान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Sat, 03/19/2016 - 07:09 नवीन
माझे लोकांना हेच सांगणे आहे कि उत्तम पदार्थ तुम्ही खाता कशासाठी? चवीसाठी/ स्वादासाठी. नुसते विपुल प्रमाणात/ दाबून खाणे म्हणजे खाओ पिओ मजा करो नव्हे.
यावर ते म्हणतात की उत्तम स्वादामुळे आमची जीभ चाळ्वली जाते. मग भरपूर खाल्ल जात. शिवाय आपल्याकडे आदरातिथ्य हे आग्रहाशिवाय होत नाही. आग्रह केला नाही तर पाहुण्यालाही आपला पाहुणाचार केल्यासारख वाटत नाही व यजमानालाही. एक प्रश्न- पोट भरणे व भूक शमल्याचे समाधान वाटणे व शरीरास आवश्यक असलेले अन्न आता पुरेसे आहे असे वाटणे यात काहि फरक आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Sat, 03/19/2016 - 07:28 नवीन
पोट भरणे व भूक शमल्याचे समाधान वाटणे व शरीरास आवश्यक असलेले अन्न आता पुरेसे आहे असे वाटणे मी अगोदर म्हटले आहे काटा वजनाचा -३ "आपले शरीर आपल्याला संकेत देत असते . उदा. तहान लागली कि आपण पाणी पितो. पण हे पाणी पोटात गेले कि लगेचच आपली तहान भागते. याचे कारण जठरात संवेदक(OSMORECEPTORS) असतात जे आपल्या मेंदूला संदेश देतात कि पोट पाण्याने भरलेले आहे. यामुळे आपण अजून पाणी पिणे थांबवतो. पोट भरले आहे हे संदेश देणारे संवेदक (STRETCH RECEPTORS) सुद्धा जठरात असतात. दुर्दैवाने आवडीचे अन्न दिसले कि आपले पोट भरले आहे या संदेशाकडे माणूस दुर्लक्ष करत राहतो आणी मग काही काळाने हे संवेदक नीट काम करेनासे होतात किंवा मेंदू त्यांच्याकडे "दुर्लक्ष" करायला शिकतो. एकदा माणूस या दुष्टचक्रात शिरला कि जठराचे स्नायू पण ताणले जातात आणी हे ताणाची जाणीव करणारे संवेदक वरच्या पट्टीत काम करू लागतात. यामुळे जास्त अन्न खाल्ले नाही तर पोट "भरल्यासारखे" वाटतच नाही. लोक शेवटी ताक /आमटी/ दाल भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखे वाटत नाही म्हणतात ते हेच. दुर्दैवाने या "पोट भरल्या" नंतर सुद्धा लोक आईस क्रीम, गुलाब जाम ई स्वीट डिश खातातच. वर आईस क्रीमला पोटात जागा लागत नाही हे पालुपद." असे झाल्याने जठराचे संवेदक उर्जेच्या गरजेपेक्षा जास्त प्रमाणात अन्न खाल्ले तरीही पोट भरल्याची संवेदना देत नाहीत आणि माणूस गरजेपेक्षा जास्त खात राहतो.
  • Log in or register to post comments
R
Ram ram Sat, 03/19/2016 - 07:39 नवीन
पु. लं. च म्हणणे डोळे झाकुन मान्य, सर्वांना धन्स
  • Log in or register to post comments
म
मितान Sat, 03/19/2016 - 07:51 नवीन
अतिशय सोपे व मार्गदर्शक लेखन !!! नियमित व्यायाम आणि आहार तज्ञांचा सल्ला यांच्या मदतीने गेल्या 3 महिन्यात 7 किलो वजन कमी केले आहे. अजून बराच मोठा पल्ला आहे पण समुद्रातील बादली तरी निघाली हे ही आशादायी आहे. तुमच्या लेखामुळे मी योग्य वाटेवर चालतेय हे समजतंय. धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sat, 03/19/2016 - 08:33 नवीन
वाखु साठवलेली आहे.. चार दिवस हा धागा वाचायचा आअळस करत होतो. पण उघडल्यावर एकदम अलिबाबाची गुहा उघडल्यासारखेच झाले.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Sun, 03/20/2016 - 17:27 नवीन
मस्त लेख डॉक्टरसाहेब. उजळणी परत होतेय सगळ्या थेअरीची. अन सोबत आता प्रॅकटीकल उत्तम हो रे है!
  • Log in or register to post comments
ज
जय२७८१ Mon, 03/21/2016 - 09:10 नवीन
'काटा वजनाचा' हे पाच ही धागे सलग वाचले. आजतागायत न वाचलेली माहिती मला आपल्या या लेखातून मिळाली त्याबद्दल धन्यवाद.....! एक वैयक्तिक प्रश्न आहे. मी व माझी पत्नी आम्ही दोघे ही उंचपुरे आहोत. माझी उंची ६ फुट आहे वजन ९६ किलो इतके आहे. तर माझ्या पत्नीची उंची ५.३ आहे. वजन ७० किलो आहे. आम्ही दोघे ही ओवर वेट आहोत याची पूर्ण कल्पना आहे. मात्र प्रश्न माझ्या ४.६ वर्षाच्या मुलीचा आहे. तिचे वजन २३ किलो इतके आहे. तर उंची ४४ इंच इतकी आहे. ही सतत काहीना काही खायला मागत असते. आवडीचे म्हणजे, मांसाहारी असेल तर ती दोन दोन दा ही जेवते. नाही सांगून अयकत नाही. हट्टच करते. चपाती आवडत नाही. भातच जास्त प्रमाणात खाते. नेमका काय आणि कसा उपाय करावा कळत नाही. तरी जमल्यास उपाय सांगावा.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 03/21/2016 - 16:40 नवीन
आपल्या मुलीचे साडे चार वर्षाला सरासरी सोळा किलो वजन असायला हवे. यात २५ % फरक मान्य केला तरीही ते २० किलो पेक्षा जास्त नको. २३ किलो म्हणजे आपल्या मुलीचे वजन ४२ % जास्त आहे. या स्थितीत तिचे वजन नियंत्रण करणे अतिशय आवश्यक आहे अन्यथा तिच्या चरबीच्या पेशींची संख्या वाढून तिला hyperplastic obesity मोठेपणी लठ्ठ पण येऊ शकतो. आपल्या म्हणण्याप्रमाणे आवडीचे म्हणजे, मांसाहारी असेल तर ती दोन दोनदा ही जेवते. नाही सांगून अयकत नाही. हट्टच करते. चपाती आवडत नाही. भातच जास्त प्रमाणात खाते. या स्थितीत आपल्याला मुलीला शिस्त लावणे अतिशय आवश्यक आहे. तिला दोनदा जेवायला न देणे, आवडीचे पदार्थ तिने खाऊ नये म्हणून तुम्ही पण कमी किंवा वर्ज्य करणे आवश्यक आहे. साडे चार वर्षाच्या मुलीच्या आहारावर आपण कठोर पणे नियंत्रण ठेवले नाहीत तर तिचा पुढच्या काळात तुम्ही घात करता आहात असे मी स्पष्टपणे नमूद करीत आहे. मुलीचा रडका चेहरा पाहून आपण विरघळून जात असलात तर स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकणे आवश्यक आहे. पोळी, भाजी आणि सलाड रोज दोन्ही वेळेस खाणे आवश्यक आहे हे तिला स्पष्टपणे सांगा आणि त्यावर अंमल करा. घरात भात करणेच बंद करा. सामिष जेवण देण्याबद्दल अनमान नाही पण मासे भाजून किंवा चिकन मसाला किंवा तेल अत्यंत कमी लावून तयार करा.असं "बिनमसाल्याचं" तिला "आवडत नाही" तिला नॉन व्हेजच लागतं असं "लोकांसमोर" तिचे कौतुक करणे बंद करा. असे कौतुक केल्याने आपण बरोबरच करत आहोत असा मुलाचा (गैर)समज होतो. हट्ट करत असेल तर सरळ उपाशी ठेवा आणि कठोरपणे बायकोला स्पष्ट पणे तशी ताकीद द्या. घरात रडारड होते. बायका( बायको, आई इ) फार लवकर पाघळतात. तुम्हाला निर्दय वगैरे म्हणतील. त्याची तयारी ठेवा अन्यथा पुढे जाऊन आठ किंवा नवव्या वर्षी पाळी येणे, पाळी अनियमितपणे येणे आणि लठ्ठ पण येणे असे विकार होण्याची "बरीच शक्यता" आहे हे गृहीत धरा. मुलीच्या डोळ्यात पाणी येणे हे कुठल्याही बापाला मानवणारे नसते( माझी मुलगी पण माझी राजकन्या आहे) परंतु जेंव्हा तिला तुम्ही लस टोचता तेंव्हा तिला दुखते आणि ती रडतेच पण तुम्ही जे करीत असता ते तिच्या भल्यासाठीच असते हे लक्षात घ्या. (मी माझ्या मुलीला स्वतः लशिचे इंजेक्शन टोचत असे). "कर्तव्यकठोर" होणे हे बापाला आवश्यक असते. हे जर आपण करणार नसाल तर आपण बाप म्हणून आपले कर्तव्य नीट पार पडत नाही असेच मला खेदाने म्हणावे लागेल. कृपया हे "वैयक्तिक" घेऊ नये. कारण अशाच शंका मला अजूनही काही मित्रांनी विचारल्या आहेत. त्या सर्वाना प्रातिनिधिक उत्तर देत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जय२७८१
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा