रजा घेणे हक्क, पाप का गुन्हा ??
पोलिसांच्या राजेबद्द्ल ची हि बातमी वाचून एक सलत असलेला विषय मांडावासा वाटतोय.
आपल्या कडे एकूणच रजा घेणे हे काहीतरी चूक, पाप, अनैतिक किंबहुना अनावश्यक आहे ...नाईलाज म्हणून रजा हा प्रकार अस्तित्वात आहे अशी काहीशी मानसिकता आहे. रजा देणारा, स्वत:च्या खिशातून काहीतरी मेहेरबानी म्हणून दिल्यासारखी रजा देतो आणि घेणारा रजा मिळाली कि 'हुश्श' करतो असे सर्वसाधारणपणे दिसते. पुलंनी म्हटल्याप्रमाने (विनोदाने का होईना) "कॅज्युअल लिव्ह मिळवण्याची १२०० सुलभ कारणे" वगैरे हे ह्याच मानसिकतेची अपरिहार्य परिणती आहे. आपल्याकडे आपण जनरली १ २ दिवस रजा घेतो पण ती घेतांना काहीशी चोरटे पणाची भावना असते... रजेवर गेलास तरी फोनवर उपलब्ध राहा अशी मूक आज्ञा बॉसच्या चेहेऱ्यावर स्वच्छ लिहिलेली असते ...आणि क्वचित वेळीप्रसंगी रजा रद्द करून परत यावे लागण्याची उदाहरणे पाहिलेली आहेत.
पाश्चात्य जगात लोक २ -२/ ३- ३ आठवडे रजा वर्षातून एका पेक्षा जास्त वेळा अगदी सहज घेतांना दिसतात .. ...कामाची काही का आग लागेना रजा रद्द करून परत आलाय किंवा रजेवर गेलाच नाही ...असे मी कधीही पहिले नाही ...
जे हक्काच्या रजेचे तेच सार्वजनिक/साप्ताहिक सुट्ट्यांचे, आपल्याकडे कुणीही कधीही कुणालाही फोन करून कामाचे बोलू शकतो, पाश्चात्य जगात सुट्टी सोडा कामाचे तास सोडून कुणी फोनवर एरवी प्रतिसाद सुद्धा देणार नाहीत (ह्याला अपवाद म्हणजे खरोखरीचे काहीतरी जबरदस्त कारण असते).
ह्याच्यावर कडी म्हणजे रजा किती साठवता येते ह्यावर दिवसेंदिवस येणारी बंधने ...म्हणजे वरच्या रजांचे नं पैसे मिळणार नं त्या पुढे घेण्याची सुविधा मिळणार ...आणि त्या फक्त वाया जाणार म्हणजे पर्यायाने कर्मचार्याचे नुकसान ...
माझा अनुभव खाजगी क्षेत्रातला आहे पण सार्वजनिक क्षेत्रात फार बरी परिस्थिती असेल असे वाटत नाही ..
हे असे का ? बदलायला नको का ?काय करता येईल ?
जाता जाता : माझ्यापुरते बोलायचे तर मी माझ्या टीम्स मध्ये रजेला कधीही नाही म्हणत नाही, कारणांची उलटतपासणी नाही किंबहुना रजा घेण्यासाठी उद्युक्त करतो ... जेणेकरून टीम मध्ये एक तणावरहित वातावरण निर्माण होते .. लोक एकमेकांची जास्त काळजी घेतात आणि एकमेकांच्या रजांमध्ये कामाची खोटी होऊ देत नाहीत ...आणि त्यातून काही खोटी झालीच तर मी जबाबदारी घेऊन कुणाला झळ बसू देत नाही आणि ह्यामुळे खरे तर उरला सुरला तणाव सुद्धा नाहीसा होतो ...
माझ्या कनिष्ठांना जमण्यासारखे नव्हतेहे वाक्य बरेच काही सांगुन जाते. खुप लोकांना मीच काय तो एकटा शहाणा, माझ्याशिवाय सगळे अडले पाहिजे, बॉस व कनिष्ट माझ्या मागे फिरले पाहिजे हा दृष्टीकोन डुबवतो . उद्या माझ्याशिवाय काम चालायला लागले तर मला कोण विचारणार ही भीतीच आज प्रायवेट मध्ये जास्त आहे. मग अश्या सुट्या घेतल्या की काम अडणारच.. त्याचा बाऊ कशाला ?