फार्म हाऊस की नुसतीच हौस???????
डिस्क्लेमर : खालील लेख हा संपूर्ण काल्पनिक आहे.केवळ माझा वेळ जात नाही म्हणून लिहिला आहे.तुमचा वेळ जर अमुल्य असेल तर, खालील लेख नाही वाचलात तर फार उत्तम.
============================================
शेती करण्यापुर्वी बर्याच जणांचा सल्ला घेतला.त्यापैकी ज्यांनी खूप विरोध व्यक्त केला, ते सगळेच शहरातील.त्यातही बर्याच जणांचे मत असे पडले की, शेतीत पैसे घालवण्यापेक्षा , एखादे टूमदार फार्म हाऊस विकत घेतलेले परवडते.पुढे मग "फार्म हाऊस." ह्या संकल्पनेतील धोका लक्षांत यायला लागला आणि मी फार्म-हाऊस ही माझी नुसतीच हौस ह्या सदरांत मोडेल म्हणून तो विचार बाजूला सारला.
पण गेल्याच आठ्वड्यांत आमच्या एका हितचिंतकाने, हा विचार परत मला ऐकवला म्हणून हा धागा प्रपंच.
आमचा थोडक्यात संवाद असा.
तो : तुम्ही शेत विकत घेताय म्हणे?
मी : हो.
तो : काय भावात पडले?
मी : साधारणे सर्व खर्च वजा जाता एकरी २,५०,०००/- ला पडेल.
तो : अरे.मग शेत घेण्यापेक्षा फार्म हाऊस विकत घ्यायचे.मी मागच्याच वर्षी एक विकत घेतले.
मी : कितीला?
तो : साधारण पणे ३०,००,०००/- खर्च झाले.जवळपास अर्धा एकर जागा आहे.शिवाय त्यात आंबा,नारळ इत्यादी झाडे पण आहेत.
मी : अरे व्वा!!! मस्तच.
तो : आता ६-७ वर्षांनी आम्ही तिथेच रहायला जावू.
मी : मस्त.
तो : सध्या आम्ही तिथेच एक कुटुंब ठेवले आहे.ते सध्या देखभाल करत आहेतच.
मी : छान.
तो : आता अजिबात शक्यच नाही झाले तर, ज्याने विकले आहे तो परत विकत घ्यायला किंवा विकायला मदत पण करणार आहे.
मी : ओके. हे तर फारच उत्तम.
तो : तुमच्या शेती पेक्षा, आमचे फार्म हाऊस फायदेशीर ठरणार बघ.
मी : असे झाले तर फार उत्तम.
तो : तू पण फार्म-हाऊसच विकत घ्यायला हवे होतेस.
मी : हो ना.पण काय आहे, माझी जागे बाबतची संकल्पना फार वेगळी आहे.मी सामान्य माणूस असल्याने, अन्न-वस्त्र-निवारा, अशीच माझी चढती भाजणी आहे.शेतात जर अन्नच पिकत नसेल तर शेताचा उपयोग काय?
तो : अरे, तू एकदा माझे फार्म हाऊस बघायला हवेस.
मी : अरे हो.नक्कीच येईन.पण हे आहे कुठेशी?
तो : अरे ते ढिकणेवाडीला आहे.म्हणजे फलाणेवाडी पासून साधारण १०-१२ किमी अंतरावर.
मी : अरे व्वा!!!! मग कधी जावू या.
तो : आता इतक्यात तरी काही शक्य नाही.ह्या डिसेंबरला त्या टलाण्या हॉटेल स्कीम मध्ये पैसे गुंतवले आहेत ना.ते थोडे वसूल करायला गोव्याला जाणार आहे.त्यामुळे उन्हाळ्यात नक्की जावू.
मी : उन्हाळ्यात मला जमेल असे वाटत नाही.कारण ह्या उन्हाळ्यात शेतात बरेच खड्डे खणायचे आहेत.
तो : बघ. ही शेती म्हटली की असे अडकायला होते.म्हणूनच फार्म हाऊस घ्यायचे.आपण मनांत आले की, लगेच निघू शकतो.
मी : हो ना.पण ते जावू दे.मग उन्हाळ्यात तू नक्की जाणार ना? कारण वहिनी म्हणत होत्या की, इथला उन्हळा त्यांना झेपत नसल्याने तुम्ही ह्यावर्षी युरोपला किंवा कूलु-मनालीला जाणर म्हणुन.
तो : हं.ते पण आहेच म्हणा.सध्या उकाडा इतका वाढला आहे की, एक स्वयंपाकघर सोडले तर प्रत्येक खोलीत ए.सी.
मी : (मनांत.आता बाथरूम आणि संडासात पण ए.सी. लावतो की काय? असेल ही.) आता आजकाल उन्हाळा जरा जास्त्च वाढला आहे.
तो : अरे ह्यावर्षी आम्ही नेमके उन्हाळ्यातच फार्म-हाऊस वर गेलो होतो.आमच्या फार्म हाऊसच्या इथे रेंज मिळत नाही.खूप प्रयत्न केला पण त्या आमच्या घरगड्याशी काही संपर्क होइना.घरी पोहोचलो तर घरी कुणीच नाही.आणि शेजारचे सगळेच बंगले रिकामे.मग काय? परत फलाणेवाडीला आलो आणि तिथल्याच एका हॉटेलमध्ये जेवलो आणि तिथेच राहिलो.
मी : गूड.हे मस्त.शहर जवळ असल्याचा हा एक फायदाच की.
तो : हो ना.मग दुसर्या दिवशी आम्ही तिथे गेलो तर काय.घरात बरीच घाण.दारे आणि खिडक्या बंद असल्याने घरात कोंदट हवा.शिवाय सध्या तिथे आसपास कुणीच नसल्याने, मुख्य टाकीत पाणीच न्हवते.रखवालदार पण नेमका उशीरा आला.तेंव्हा समजले की पंप जळालेला आहे आणि सोसायटीला अद्याप सेक्रेटरी नसल्याने, तो पंप काही दुरुस्त झालेला नाही.मग त्याच्या मदतीने कसे तरी संध्याकाळी वायरमनला गाठले.वायरमन म्हणाला आधी मागच्या कामाचे पैसे द्या.मगच हात लावतो.मग काय? वायरमनला पटवून त्या दिवसापुरता पंप चालू करून घेतला.चांगले ५००/-रु दिले.
अर्थात सुरुवातीला ह्या अडचणी येणारच.
पाणी सुरु होता-होता रात्र उजाडली तेंव्हा समजले की, घरातील काही ट्युब लाईट चालत नाही आहेत.खरे तर मागच्या वेळीच त्या बदलल्या होत्या पण आता परत बिघडल्या.रखवालदार म्हणाला की, तिथे लाईटचे फ्लक्च्युएशन जास्त असल्याने सगळ्याच घरातील ट्यूब लाईट जातात.
कसे-बसे जेवण घेतले आणि झोपायची तयारी केली...तर काय? सगळ्या चादरींना कुबट वास आणि उंदरांनी पाडलेली भोके.
आता घरी झोपायचा नाद सोडला आणि परत मुक्काम पोस्ट फलाणेवाडी.
आता तिसर्या दिवशी माझी परत एक चक्कर फार्म हाऊसवर करायचा विचार होता.पण तो दिवस समुद्र किनार्यासाठी राखीव असल्याने मग सरळ समूद्र किनार्यावर गेलो.मुले तिथेच जास्त रमल्याने मग तिथेच २ दिवस राहिलो आणि मग परत मुंबईला आलो.
आता परत एकदा फार्महाऊसवर जावे म्हणतो.
मी : का रे?
तो : अरे मागच्या वेळी, तो पंप दुरुस्त करण्याच्या वेळी, तो रखवालदार बोलता बोलता म्हणाला की, इथल्या एका सभासदाला त्याचे फार्म हाऊस विकायचे आहे.साधारण २-३ वर्षांपुर्वी त्याने २५ लाखाला विकत घेतले पण सध्या त्याला फारच आर्थिक अडचण असल्याने, तो २२ लाखाला पण द्यायला तयार आहे.बघ तुझी इच्छा असेल तर, आपण लगेच बोलणी करू.
मी : बरे मला एक सांग.हे जर ३०,००,०००/- तू बँकेत ठेवले असतेस तर तुला ह्या वर्षी किती मिळाले असते.
तो : आता फिक्स मध्ये ठेवले असते तर ह्या वर्षी २,५०,०००/- नक्की.पण का रे?
मी : काही नाही.इतक्या व्याजाच्या पैशांत माझी आणि माझ्या बायकोची, एक १५-२० दिवसांची कंबोडिया ट्रिप नक्कीच झाली असती.
तो : अरे कंबोडिया काय बघतोस? त्यापेक्षा आमचे फार्म हाऊस बघ.
आता पुढे मला काही बोलवेना.
जे शहरात राहतात व भविष्यात शहरातच राहणार आहेत त्यांनी गावाकडील शेती, फार्म हाऊस वगैरे भानगडीत पडून पैसे अडकवू नये, हे माझे वैयक्तिक मत आहे.+१ दुकान भाड्याने दिले तर २० हजार महिना मिळेल असे वडिलानी सांगितले नी ह्या आशेवर मी खिशातले नी कर्ज काढून १५ लाख घालून दुकान नि घर बांधले. गेल्या ३ वर्षापासून वडिलांनी एकही भाडेकरू दुकानात घुसू दिला नाहीये, दुकान तसेच पडून आहे. नी वरचा मजला भाड्याने देऊन ६ हजार रुपये स्वत ठेवताहेत. मला मिळाले तर काही नाही पण गेली ३ वर्षे एचडीएफसी बँकेचा १०७८० रुपयाचा हफ्ता नियमित भरतोय. :(