Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संकटातून संधी

न
नाखु
Tue, 07/12/2016 - 06:35
🗣 164 प्रतिसाद
आडते आणि घाऊक दलाल यांनी बंद पुकारला निमित्त होते सरकारच्या शेतीमाल थेट (विनानियंत्रण) कुठे विकण्याच्या सुधारीत आदेश अंमलबजावणीचे. दुर्दैवाने ज्यांचे पोट रोजच्या हमालीवर/हजेरीवर अवलंबून आहे त्यांनीही (मापाडी/तोलारी/हमाल) विरोध दर्शवण्यासाठी बंद मध्ये भाग घेतला. खर्या शेतकरी संघटनेने नुसती गझल(गजाली) करून वाहव्वा मिळवण्यापेक्षा प्रत्यक्ष मैदानात शड्डू ठोकून उभे राहिले आणि अधिकार्यांच्या मदतीने-सहकार्याने शेतीमालाची थेट विक्री करून शेतकर्याला उचीत भाव मिळवून दिला. मधले दलाल आडते आणि त्यांचे आश्रयदाते प्रचंड नफा कमावतात हे जगजाहीर आहे पण त्याला चाप लावताच बंदचा डाव खेळून स्वतःची नाचक्की तर केली आहेच पण शेतकर्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी दिल्याबद्दल समस्त आडत्यांचे मी अभिनंदन करतो. शेतकरी बांधवांनी व त्यांचे सदोदित हित जपणार्या राजू शेट्टींच्या संघटनेने पर्यायी व्यवस्था उभी करून अडते असाेसिएशनची दंडेली आणि अडवणूक (मुद्दम भाव पाडणे) मोडून काढावी हिच ईच्छा. यानिमित्ताने संगणकीकरण / आंतर्जाल यांच्या साहाय्यने एकाच वेळी एकच नाशवंत भाजी (उदा टोमॅटो,कोथींबीर) प्रमाणाबहेर आवक होऊन भाव मातीमोल होऊ नये म्हणून शेतक्र्यांना आलटून पालटून भाजीपाला घेण्यास प्रवृत्त करणे.आवक समाधान्कारक रित्या नियंत्रीत करणे त्याकरता शेतीमाल भाव थेट बोर्‍डावर जाहेर करणे. आणि शेतकर्यांना प्रतवारीचे महत्व सम्जावून त्यांचा रास्त फायदा कसा होईल हे करावे अशी ईच्छा आहे. कुणाची ईच्छा असो नसो पण यावेळी एक सच्चा तळमळीचा कार्यकर्ता सदाभाऊ खोत मंत्री झाले आहेत तेंव्हा ही अपेक्षा अवाजवी ठरू नये. मिपाकरांना आवहान त्यांच्या भागातील भाजीपाला वितरणावर काय परिनाम झाला ते टंकणे, विषतः आत्मुदा यांची मार्केट्यार्‍डात फेरी असल्याने आंखो देखा हाल मिळाला तर उत्तमच. पण परगावच्या विशेषतः अभ्यादा,इरसालभौ,कपील्मुनी,जेप्या यांचेही काही विचार अनुभव असतील तर ते यावेत हिच ईच्छा.. विशेष सूचना: मी पाच पैशाचाही शेतकरी नसून कुठल्याही शेतकरी संघटनेचा सभासद नाही. असलोच तर मिपावरच्या शेतीचा वाचक सभासद आहे आणि मिपाकरांच्या सदिच्छामुळे (नजिकच्या भविष्यात) शेती घेऊन फुलवायचा प्रयत्न करणार आहे.

अ‍ॅग्रोवन मधील बातमी

पुणे - बाजार समित्यांमधून फळे-भाजीपाला नियमनमुक्तीला विराेध करत अडते, व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद धुडकावत शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ११) स्वतः भाजीपाला विक्री केली. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्यासह बाजार समितीचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या वेळी उपस्थित राहून शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी मदत केली. नियमनमुक्तीला विराेध करण्यासाठी बाजार समित्यांमधील अडते, व्यापाऱ्यांनी साेमवारपासून बेमुदत बंद जाहीर केला हाेता. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी स्वतः शेतमाल विक्री करावी, असे आवाहन शेतकरी संघटनांसह बाजार समिती प्रशासनाने केले हाेते. या आवाहनानुसार पुणे जिल्ह्यासह साेलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्यांनी छाेट्या छाेट्या वाहनांमधून शेतमाल विक्रीसाठी आणला हाेता. तर परराज्यांतून कर्नाटक, मध्य प्रदेशातून काही प्रमाणात शेतमालाची आवक झाली हाेती. या वेळी शेतकऱ्यांनी स्वतः थेट भाजीपाल्याची विक्री केली. या वेळी शेतकरी जगन्नाथ देवराम कटके (रा. भिवरी, ता. पुरंदर) म्हणाले, ‘‘बाजार समिती बंदनंतर ॲग्राेवनमध्ये आलेल्या बातम्या वाचून आत्मविश्‍वास वाढला. मी शेपू ३००, मेथी २५०, काेथिंबीर २५० जुड्या, तर काकडी २, दाेडका १, टाेमॅटाे २ क्रेट आणले हाेते. या वेळी शेपूला ८ ते १० रुपये, मेथीला १० ते १२, काेथिंबीर १५ रुपयांपर्यंत विकली. तर काकडी ८ ते १०, दाेडका ४० ते ४५, टाेमॅटाे ५० रुपये दराने विकला.
हाच शेतमाल अडत्याकड पाठविला असता, तर निम्मेसुद्धा पैसे झाले नसते. टेम्पाे स्वतःचाच आहे. डिझेलला ५०० रुपये गेले. सगळा खर्च जाता आज १५ हजार रुपये मिळाले.
उद्या आणखी भाजीपाला आणणार आहे.’’ या वेळी प्रदीप जगदाळे, अमर बाेऱ्हाडे (रा. गराडे, साेमाेर्डी), संताेष भाेसले (रा. जेजुरी) यांनीही विविध शेतमाल विक्रीसाठी आणला हाेता. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील म्हणाले, ‘‘फळे, भाजीपाला नियमनमुक्तीचे शेतकरी संघटनेने स्वागत केले आहे. नियमनमुक्तीमुळे लगेच शेतकऱ्यांच्या घराला साेन्याची काैले बसणार नाहीत. पण शेतकऱ्यांना कायद्याची विविध बंधने असल्याने शेतकरी अडचणीत आहेत. त्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळणेदेखील मुश्‍किल झाले आहे. नियमनमुक्तीला विराेध करण्यासाठी बाजार समित्यांनी पुकारलेला बंद आडमुठेपणाचा आहे. त्यांनी संप तातडीने मागे घ्यावा, अशी विनंती मी त्यांना करताे. आज शेतकऱ्यांनी थेट भाजीपाला विक्री करून व्यापाऱ्यांना दाखवून दिले आहे, की आम्ही तुमच्याशिवायही शेतमाल विक्री करू शकताे. अडत्यांनी आतापर्यंत खूप पैसे कमविले आहेत. यापुढे स्वतः पारदर्शी व्यवहार करा, शेतकरी तुम्हाला साेडून कुठे जाणार नाही.’’ बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे म्हणाले, ‘‘अडत्यांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीने शेतमाल विक्रीची सर्व यंत्रणा सज्ज ठेवली हाेती. सर्व संचालक स्वतः हजर राहून शेतमाल विक्रीवर लक्ष ठेवून हाेते. सर्व शेतकऱ्यांच्या शेतमालाची विक्री करण्यात आली. बंदच्या पार्श्वभूमीवर आवक खूपच कमी हाेती. मात्र, शेतकऱ्यांनी आणलेल्या सर्व शेतमालाची विक्री हाेऊन त्यांना चांगले पैसे मिळाले. शेतकऱ्यांनी बंद संपेपर्यंत आणि नंतरही शेतमाल घेऊन यावा विक्री करण्याची जबाबदारी बाजार समिती घेईल.’’ व्यापारी ठाम बंदबाबत अडते असाेसिएशनची बैठक झाली. या वेळी अध्यक्ष शिवलाल भाेसले म्हणाले, ‘‘अडत समितीमध्ये आम्ही विविध मुद्दे उपस्थित केले हाेते. मात्र, समितीचा अहवाल अंतिम करताना आम्हाला विश्‍वासात घेतले नाहीत. अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना खूष करण्यासाठी अहवाल नियमनमुक्तीला पाेषक बनविला. व्यापार करताना आमच्यावर सुमारे ८०० काेटींचे कर्ज आहे. नियमनमुक्तीमुळे व्यापारावर परिणाम हाेऊन आम्ही कर्ज कसे फेडायचे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आम्ही आमच्या बंदवर ठाम असून, बेमुदत बंद कायम असणार आहे.’’

दैनीक पुढारीमधून साभार

नगर : प्रतिनिधी व्यापार्‍यांच्या विरोधाला न जुमानता काल(दि.11) सकाळी शेतकर्‍यांनी भाजीपाला व फळांची विक्री केली. त्यामुळे त्यांना मालाचे दामही चांगले मिळाले. दरम्यान, आडते व्यापार्‍यांनी बेमुदत बंद पुकारल्याने त्यांची दुकाने बंद होती. परंतु, बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव वगळता सर्व व्यवहार सुरळीत पार पडले. राज्य सरकारने शेतीमालाची आडत शेतकर्‍यांऐवजी खरेदीदारांकडून वसूल करण्याचा, तसेच शेतीमाल बाजार समितीकडून नियमनमुक्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यास व्यापार्‍यांनी कडाडून विरोध केला. त्यासाठी राज्यव्यापी बंदही पुकारला आहे. त्यानुसार बाजार समितीमधील कडबा मार्केटही बंद ठेवण्यात आले. मात्र, शेतकर्‍यांनी विक्रीसाठी आणलेला ऊस व चार्‍याची विक्री करण्यात आली. बाजार समितीने गेल्या काही वर्षांपासून शेतीमाल विक्रीसाठी शेतकर्‍यांसाठी खुला बाजार सुरू केला आहे. त्यास शेतकर्‍यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बाजार समितीने त्यासाठी जागाही उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे शेतकर्‍यांना सुविधाही देण्यात येत असल्याचे समितीचे सभापती हरिभाऊ कर्डिले यांनी सांगितले. शेतीमाल विक्रीसाठी शेतकर्‍यांना प्रतिबंध केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. काल समितीत शेतीमाल विक्रीत अडथळा निर्माण करण्यासाठी काही मंडळी समितीत आली होती. परंतु, त्यांना समितीच्या कर्मचार्‍यांनी हुसकावून लावले. त्यामुळे शेतमालाचे व्यवहार सुरळीत पार पडले. शेतीमाल विक्रीसाठी शेतकर्‍यांकडून कुठलाही कर आकारण्यात आला नाही. उलट, त्यांना इलेक्ट्रॉनिक वजन काटे, मापाईस मालाची सुरक्षितता आदी सुविधा समितीमार्फत दिल्या जातील. तशा सूचना आ. शिवाजीराव कर्डिले यांनी बाजार समितीच्या प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले.
वर्गीकरण
माहिती मिळवणे व साधक बाधक चर्चा
शेती आणि शेतकरी
चालू घडामोडी
आत्मपरीक्षण

प्रतिक्रिया द्या
61484 वाचन

💬 प्रतिसाद (164)
क
कपिलमुनी Fri, 11/25/2016 - 09:09 नवीन
@ विशुमित : १.पाण्याचा कसा काय आहे तुमच्याकडे ? २.कोणती सिंचन पद्धत वापरता ? ३. त्यासाठीची इनवेस्तंमेंट किती आहे ? दर किती वर्षांनी ते बदलता? तुमची प्रगती पाहून आनंद वाटला आणि काही शिकायला मिळेल म्हणून प्रश्न विचारले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
व
विशुमित Fri, 11/25/2016 - 10:31 नवीन
मुनी जी... -आमच्या शेतापासून ६-७ कमी दुरून कॅनॉल जातो पण आम्ही फाट्याचं पाणी नाही वापरत . - शेतात २ विहिरी आहेत त्यामध्ये एक सामाईक आहे भावकीची आणि दुसरी स्वतःची. - गाळ आणि बांधून घेतल्या मुळे विहिरींना ८ माही पाणी बरे असते पण उन्हाळ्यामध्ये २ तासच चालतात. - शेता शेजारून साखर कारखाण्याचं सांडपाणी वाहून नेणारा ओढा आहे. त्याचे आणि विहिरीचे पाणी मिक्स करून उसाला वापरतो. (परवानगी आहे कि नाही मला माहित नाही, असावी बहुतेक कारखानावाले गप्प बसले नसते) या पाण्यामुळे शेताला मळी आणि राख टाकायची गरज पडत नाही. जमिनीचा पोत सुद्धा सुधारला आहे. पूर्वी या ओढ्याचं पाणी वापरायला सगळे भीत होते पण आमच्या आजोबांनी यावर प्रयोग करून पाहिला. फायदा होतोय. -२ वर्ष पूर्वी उसाला ड्रीप केली होती, एकरी २५ हजारापर्यंत खर्च आला होता पण ऊस मोठा झाला आणि ड्रीप बऱ्याच ठिकाणी ब्लॉक झालेली समजले नाही. त्यावर्षी वर्षी ऊस थोडा अचकला होता. आजोबांच्या मते आमच्या जमिनींना गरगरीत पाणी लागते तरच ऊस चांगला येतो. त्यांच्या अनुभवाची आम्ही कदर करतो. उसासाठी ड्रीप एकदाच वापरली जाऊ शकते कारण १३ महिने रानात असल्यामुळे त्याचे तुकडे पडतात. - माझ्या अनुभवानुसार तरी ड्रीप चा उसासाठी मला जास्त उपयोग नाही झाला - गहू, बाजरी, हरबऱ्यासाठी सरळ पाणी कारण ह्या पिकांना जास्त पाणी नाही लागत. - टोमॅटोसाठी मात्र ड्रीप वापरतो कारण आम्ही उन्हाळी पीक घेतो. उत्पादन २०-३०% अधिक निघतं. त्याच बरोबर औषधे आणि खते ड्रीप द्वारे देऊ शकतो. मल्चिंग पेपर पण अंथरतो पाणी कमी लागते. (चालू वर्षात ड्रीपच्या खर्चाचा तपशील आता माझ्या कडे नाही २ दिवसांनी चौकशी करून सांगतो )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
व
विशुमित Fri, 11/25/2016 - 06:44 नवीन
टीप- मी शेती बरोबर नोकरी सुद्धा करतो.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 11/25/2016 - 07:05 नवीन
रयतु बाजार महाराष्ट्रात चालू झालाय काय?
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 11/25/2016 - 07:15 नवीन
काही माहिती नाही. पीक पाणी लावतात ७/१२ वर एवढे माहिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 11/25/2016 - 09:25 नवीन
नाही? पण आता तर कल्याणकारी सरकार आहे ना गेल्या एक वर्षापासून राज्यात आणि अडिच वर्षापासून केंद्रात? किती ठिकाणी रयतु बाजार सुरु झालेत ते विचारणार होतो. कि रयतु बाजार सुरु न होण्यामागे माजी कृषीमंत्र्यांची अंशतः जबाबदारी असे काही आहे? रयतु बाजारचे इतके कौतुक ऐकतोय म्हणून विचारावे म्हटले की महाराष्ट्रात तरी सुरु झाला की नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Fri, 11/25/2016 - 10:47 नवीन
आमच्याकडे टोमॅटो साठी रयतु बाजारासारखीच एक थेरी शेतकऱ्यांकडून चालू होती काही वर्षा पासून. पण आंधळं दळतंय आणि कुत्रा पीठ खातंय अशी गत झाली नंतर. मागच्या हंगामात उत्पादक कमी आणि अजन्ट्स जास्त झाले होते. टोमॅटोच्या धाग्यावर विस्तृत सांगतो. अश्या उपक्रमांना सातत्य पाहिजे आणि यंत्रणेतील लोक खमकी पाहिजेत. जाणता राजा काही तरी करेल म्हणून विसंबून राहिलेली जनताच आत्महत्या करत आहेत. बाकीचे गाव सोडून पुण्यामुंबईला घरे घेऊन राहिली आहेत. तिकडे आपली आई बाभळी अंगावर घेऊन भूमिपुत्रांची वाट पाहत आहे. असो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सुबोध खरे Fri, 11/25/2016 - 07:21 नवीन
क्रिटिकल मास -- हि संकल्पना जशी अणु बॉम्ब मध्ये आहे तशीच कुणी तरी लातूरच्या भूकंपा नंतर शेती बद्दल मांडली होती. यात जर कमीत कमी दोन एकर बागायती किंवा ५ एकर जिरायती जमीन असेल तरच ती एका कुटुंबाला फायद्यात जाऊन थोडा फार पैसे शिल्लक राहू शकतो असे मांडले होते. अन्यथा दुष्काळ आणि सुकाळ या चक्रातून शेतकरी बाहेर येऊ शकत नाही. ( सुकाळ असताना जमवलेली माया दुष्काळात संपूर्ण नष्ट होऊन शेतकरी परत आहे तिथेच राहतो). आज शेतीचे तुकडे इतके झालेले आहेत कि एका कुटुंबाला वर दिलेलय पेक्षा शेती कमी असल्याने इतर कोणताच उत्पन्नाचा स्रोत नसेल तर खर्चाची तोंडमिळवणी कठीण झालेली आहे.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 11/25/2016 - 08:18 नवीन
बऱ्याच अंशी सहमत. पण २ एकरापेक्षा कमी जमीन असणाऱ्यांना दूध आणि शेळीपालन हे जोडधंदे तारू शकतात. या मध्ये दूध धंद्याचे आताच्या सरकारने ३-१३ वाजवले आहेत हे खेदाने नमूद करू इच्छितो. पण गोवंश हत्या कायद्यामुळे कुकूट आणि शेळीपालनाला सुगीचे दिवस आले आहेत. घरातील एकाला तरी नोकरी मस्ट..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
झ
झेन Sat, 11/26/2016 - 10:03 नवीन
आधीच कबूल करतो कि ज्यांच्या कडे शेती आहे आणि त्यात जे नविन प्रयोग करत असतात त्यांचा मी आदरयुक्त हेवा करतो. तूम्ही शेती आणि नोकरी दोन्ही करता, balanced combination. "बाकीचे गाव सोडून पुण्यामुंबईला घरे घेऊन राहिली आहेत. तिकडे आपली आई बाभळी अंगावर घेऊन भूमिपुत्रांची वाट पाहत आहे", ही बोच पूर्णपणे पोचली. .... नाखूचाचा fan club च्या मेंबरशीपसाठी अर्ज टाकलेला झेन
  • Log in or register to post comments
व
विशुमित Sat, 11/26/2016 - 10:22 नवीन
धन्यवाद..!! खरे सांगू का मी काहीच नवीन प्रयोग केले नाहीत . उलट जुन्या लोकांच्या अनुभवाचा वापर करून फक्त त्याला आणखी चांगली दिशा देण्याचा प्रयत्न केला. आम्ही खूप निवांत शेती करतो. कोणाला कधीच असं जाणवणार पण नाही हे खूप काबाड कष्ट करतो ते. तरी सुद्धा इतरांपेक्षा १० % उत्पादन जास्तच काढतो. बरेच कथित प्रगत म्हणवणारे शेतकरी शोबाजी करत असतात. त्यांचे तंत्रज्ञान बऱ्याच वेळा व्यवहार्य नसते. सांगेल पुढे कधी तरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेन
त
तेजस आठवले Sat, 11/26/2016 - 14:34 नवीन
विशुमित जी, तुम्ही शेती आणि नोकरी दोन्ही व्यवस्थित सांभाळता हे वाचून थक्क झालो. तुम्हाला खूप शुभेच्छा . तुमचे शेतीबद्दलचे अनुभव , निर्णय, फसलेले प्रयोग,यशस्वी प्रयोग इत्यादी गोष्टींबद्दल लिहावे ही विनंती. तुम्ही शांतपणे समजावून काही गोष्टी सांगा, लोक नक्की ऐकून घेतील. फटकळपणा आणि शेतीबद्दल सगळे मलाच कळते असे समजणारे काही आयडी मिपावर होते / आहेत , त्यांच्या एकांगी दृष्टिकोनामुळे आणि आक्रस्ताळेपणामुळे ज्यांना ह्या विषयात रुची होती असे लोक पण शेतीबद्दलच्या धाग्यांपासून दूर गेले. ते परत येऊन एक चांगली चर्चा होऊ शकते. नक्की तुमचे लिखाण येऊ द्या.
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 11/28/2016 - 06:08 नवीन
फटकळपणा आणि शेतीबद्दल सगळे मलाच कळते असे समजणारे काही आयडी मिपावर होते / आहेत , त्यांच्या एकांगी दृष्टिकोनामुळे आणि आक्रस्ताळेपणामुळे ज्यांना ह्या विषयात रुची होती असे लोक पण शेतीबद्दलच्या धाग्यांपासून दूर गेले. ते परत येऊन एक चांगली चर्चा होऊ शकते.
+११११ अ‍ॅग्रोवन मधून साभार थेट शेतमाल विक्रीचा तेलंगणा सरकारचा उपक्रम शेतकऱ्यांचा वाहतूक, हमाली, तोलाई खर्च वाचला ‘तेलंगणा राज्यात तेथील पणन विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी ‘आपला भाजीपाला’ ही याेजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत राज्यात थेट शेतमाल विक्रीची २१ केंद्रे उभारण्यात आली आहेत. यासाठी संबंधित विभागातील बाजार समितीतर्फे खरेदी, संकलन, प्रतवारी आणि विपणनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात वाहतूक, हमाली, तोलाई अादी सर्व खर्चात बचत करणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. त्याचा हा प्रातिनिधिक आढावा. गणेश कोरे शेतमाल विक्री व्यवहारातील मध्यस्थांच्या लांबच लांब साखळीमध्ये हाेणारी शेतकऱ्यांची लूट राेखण्यासाठी विविध राज्ये प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्रामध्ये शेतकरी आठवडे बाजार, पंजाबमध्ये ‘अपना बाजार’ तर आंध्र प्रदेशात ‘रयतू बाजार‘ हे उपक्रम त्यादृष्टीने सुरू झाले. तेलंगणा राज्यात फळे भाजीपाला नियमनमुक्तीचा कायदा आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी हाेत नसल्याने शेतमाल विक्री बाजार समित्यांच्या अखत्यारितच आहे. या विक्री व्यवस्थेत शेतकऱ्यांची मध्यस्थ वा व्यापाऱ्यांमार्फत हाेणारी लूट राेखण्यासाठी तेथील पणन विभागाने थेट शेतमाल विक्रीसाठी ‘आपला भाजीपाला‘ (our vegetable) ही याेजना दाेन वर्षांपासून राबविण्यास सुरवात केली आहे. त्याअंतर्गत हैदराबाद व सिकंदराबाद या जुळ्या शहरांमध्ये एकूण २१ केंद्रे उभारण्यात आली आहेत. या केंद्रांचा तेथील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळू लागला आहे. येथून ग्राहकांना मालाची थेट विक्री करणे त्यांना शक्य झाले आहे. विशेष म्हणजे या उपक्रमास ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद लाभत आहे. मनाकुराजायेरा व बोवनपल्ली ही त्यातील दोन प्रातिनिधिक ठिकाणे म्हणता येतील. माल वाहतूक, संकलन, प्रतवारी, पॅकिंग आदी पायाभूत सुविधा या केंद्रांसाठी उभारण्यात आल्या आहेत. यासाठी राष्ट्रीय कृषी विकास याेजनेतून दाेन टप्प्यांत ५ काेटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘आपला भाजीपाला’ उपक्रमाची प्रक्रिया -पणन विभागाच्या नियंत्रणाखाली शेतमालाची खरेदी. शेतकरी आपला माल घेऊन परिसरात असलेल्या ‘कलेक्शन सेंटर’मध्ये घेऊन येतो. तेथे एका खाजगी एजन्सीद्वारे पुढे शहरातील ‘रिटेल आऊटलेट’पर्यंत पोचवला जातो. - यातील एका एजन्सीकडे भाजीपाल्याची प्रतवारी, पॅकिंग ही जबाबदारी असते. तर दुसरी एजन्सी विक्री व अर्थव्यवहार पाहते. - बाजार समिती तसेच रयतू बाजारातील भाजीपाल्यांचे दर पाहिले जातात. त्यानुसार येथील सरासरी दर निश्‍चित केला जाताे. यात शेतकऱ्यांना अधिकाधिक चांगला दर देण्याचे नियोजन असते. वाहतूक, हमाली, तोलाई खर्चापासून मुक्तता या उपक्रमात वाहतूक, हमाली, आडत आदी कोणताही खर्च वा कर द्यावा लागत नसल्याने त्या खर्चापासून शेतकऱ्यांची मुक्तता होते. उदा. एखाद्या मालापोटी शेतकऱ्याला बाजार समितीत १०० रुपये मिळत असतील तर अन्य खर्च कापून त्याच्या हाती ७० रुपयेच पडायचे. इथे त्याला शंभर रुपयेच हाती पडतात. -शेतमालाची खरेदी झाल्यावर बाजार समितीमधील संकलन केंद्रामध्ये संकलन, प्रतवारी, बारकाेड सह पॅकिंग -त्यानंतर विविध विक्री केंद्रांवर मालाचे वितरण - अतिरिक्त शेतमालाची शीतगृहात साठवणूक केली जाते. - या उपक्रमात साडेसातहजार शेतकऱ्यांचे नोंदणी करणे. पैकी २ हजार शेतकरी सध्या सक्रीय - पॅकिंगशिवाय सुट्टा शेतीमाल देखील ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला जाताे. - जी केंद्रे अगदी जोमात चालतात त्यांची दैनंदिन उलाढाल सरासरी एक ते दीड लाख रुपये तर उर्वरित केंद्राची सुमारे ६० ते ७० हजार रुपयांपर्यंत - दाेन वर्षांत १८ काेटी रुपये शेतकऱ्यांना वितरित. -विविध केंद्रांतून ४० प्रकारचा भाजीपाला तसेच या भागात उत्पादित द्राक्षे, कलिंगडे यांचीही विक्री. -येथे न पिकणाऱ्या अन्य फळेही बाहेरून आणून विक्री चार शीतगृहे थेट शेतावरून खरेदी करण्यात आलेल्या शेतमालाचा दर्जा कायम राखण्यासाठी व अतिरिक्त माल साठवण्यासाठी बाेवनपल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाजार समितीमध्ये प्रत्येकी चार मेट्रिक टन साठवणूक क्षमतेची चार शीतगृहे उभारण्यात आली आहेत. प्रतवारी, पॅकिंग केलेला शेतमाल शीतगृहात ठेवला जाताे. गरजेनुसार शहरांतील विक्री केंद्रांमध्ये त्याचा पुरवठा केला जाताे. आपला भाजीपाला याेजनेंतर्गत तेलंगणा सरकारच्या वतीने २१ ठिकाणी ताजा भाजीपाला विक्री केंद्रे उभारली आहेत. यासाठी वाहतुकीपासून ते शीतगृहांपर्यंत विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच माेबाईल (स्थलांतरित हाेणारी) भाजीपाला विक्री केंद्रे देखील उभारण्यात आली आहेत. उपक्रमास शेतकऱ्यांसह ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाय. जे. पद्म हर्षा सचिव आणि पणन उपसंचालिका, बोवनपल्ली बाजार समिती सध्या हैदराबाद व सिकंदराबाद येथे सुरू असलेल्या या उपक्रमाचे यश पाहून राज्यातील विविध भागांत अशी केंद्रे उभारण्याचा प्रयत्न राहील. ग्राहकांना या ठिकाणी अन्य मार्केटच्या तुलनेत स्पर्धात्मक दरांत शेतमाल खरेदी करता येतो. वर्तमानपत्रात केंद्रात दररोज उपलब्ध होणाऱ्या मालाची जाहीरातही आम्ही केली होती. एकदा केवळ एका आठवड्यात सगळा माल हातोहात खपल्याचे उदाहरणही सांगता येईल. श्री. हर्षवर्धन पणन विभाग, अापला भाजीपाला, उपक्रम संपर्क वाय. जे. पद्म हर्षा- ०७३३०७३३७८९ श्री. हर्षवर्धन- ०७३३०७३३२१२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
व
विशुमित Tue, 11/29/2016 - 06:37 नवीन
<<<<फटकळपणा आणि शेतीबद्दल सगळे मलाच कळते असे समजणारे काही आयडी मिपावर होते / आहेत , त्यांच्या एकांगी दृष्टिकोनामुळे आणि आक्रस्ताळेपणामुळे ज्यांना ह्या विषयात रुची होती असे लोक पण शेतीबद्दलच्या धाग्यांपासून दूर गेले. ते परत येऊन एक चांगली चर्चा होऊ शकते. नक्की तुमचे लिखाण येऊ द्या.>>> -- मिपा वर शेती विषयी बऱ्याच चर्चा वाचल्या आहेत. या चर्च्यांमध्ये प्रकर्षाने जाणवलं की शेतीत काहीच चांगलं होत नाही, पण वस्तुस्थिती अगदीच रसातळाला गेली आहे असं नाही. खूप लोकांनी प्रतिकूल परिस्थिती मध्ये मेहनत करून आपली नापीक शेती फुलवली आहे. आमच्याकडे काही लोकांनी कर्जे काढून १०-१२ किमी पाण्याची लिफ्ट (पाईप लाईन) केली आहेत. ती कर्जे यशस्वीपणे फेडली सुद्धा आहेत. प्रसंगी ग्लासने पाणी घालून भाजी पाला जगावला आहे. फळबागा, ऊसशेती, टोमॅटो सारखी नगदी पिके, भाजी पाला आणि धान्य याच्या माध्यमातून सुबकता आणली आहे. पण त्याच बरोबर शेती विषयी असणारे पूर्वग्रहदूषित विचार सुद्धा या साधक बाधक चर्चे मध्ये अडथळे ठरले आहेत. ऊस शेतीवर असणारा आकस, सेंद्रिय शेतीबद्दल असणारे आंधळे आणि अव्यवहार्य समर्थन, आडती-व्यापारी यांच्या बद्दल असणारा तिरस्कार, इतर देशातील तंत्राद्यानशी बरोबरी करण्याचा अट्टाहास या गोष्टी चर्चेला योग्य दिशेने घेऊन न जाता, लोक शेती या विषयापासूनच दूर पळू लागले आहेत. ऊस या पिकाविषयी धागा लवकरच पूर्ण करून मिपावर प्रकशित करणार आहे. विविध पिकांचे एक एक धागे तदनंतर प्रकाशित करेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा