Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काटा वजनाचा --६

स
सुबोध खरे
गुरुवार, 10/13/2016 - 17:32
💬 64 प्रतिसाद
काटा वजनाचा -१ काटा वजनाचा -२ काटा वजनाचा -३ काटा वजनाचा --४ काटा वजनाचा --५ अति खाण्याचे सामाजिक मानसशास्त्र-- आता हे आणिक काय ? अशी कल्पना करून पहा आपण आपले वजन कमी करण्याचा सु(दृढ) निश्चय केलेला आहे आणि नेमका त्यात आपल्या मित्रांबरोबर मेजवानीचा बेत ठरला आहे. आपण निश्चय केला आहे आहे कि उगाच तेथे अरबट चरबट खायचे नाही. चखणा खाताना अवास्तव कॅलरी पोटात जातील म्हणून तुम्ही निघतानाच एक सॅलड म्हणून काकडी टोमॅटो असे खाऊन निघता. "पण" मेजवानी संपेस्तोवर आपण वाजवीपेक्षा "किती तरी जास्त" खाल्ले आहे हे आपल्या लक्षात आल्यामुळे आपण स्वतःवर फारच चिडलेले असता. हि अशी परिस्थिती आपल्यापैकी ९० % लोकांनी अनुभवलेली असेल. पण यात केवळ आपलाच दोष आहे का? कि त्या वातावरणाचा? कि ती वेळच "तशी" होती. समाजशास्त्रज्ञ आणि मानस शास्त्रज्ञ सभोवतालच्या वातावरणाचा आपल्यावर किती परिणाम होतो याचे संशोधन करीत असताना त्यांना समोर आलेल्या निष्कर्षांचा सारांश येथे मी देत आहे. आपण जरुरीपेक्षा जास्त केवळ भुकेसाठी खात नाही तर त्याला अनेक पैलू आहेत ज्यात चव आणि स्वाद हा एक महत्त्वाचा घटक आहेच परंतु सभोवतालच्या वातावरणाचा परिणाम हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे असे लक्षात आले आहे. आपल्या बरोबर असणारी मित्र मंडळी, आपली मानसिक स्थिती, सभोवतालचे धुंद वातावरण, आपण पीत असलेले मद्य असे अनेक घटक आपल्या गरजेपेक्षा जास्त खाण्याला कारणीभूत आहेत. ( पहा मी म्हणत नव्हतो मी काही दारुडा नाही. पण मित्रांनी जबरदस्तीने पाजली असेच काहीसे वाटले कि नाही?.... मुझे दुनिया वालो शराबी न समझो ..... ) परिस्थिती आपल्या नियंत्रणाच्या बाहेर का आणि कशी जाते? १) केवळ बाहेर / हॉटेलात जेवल्यामुळे असत खाल्ले जाते असे नव्हे तर आपण मित्र मंडळींबरोबर असला कि आपले जेवण जास्त वेळ रमत गमत चालते. म्हणजेच जितका जास्त वेळ आपण जेवाल तितके जास्त अन्न खाल्ले जाते. आपण दुसऱ्या व्यक्ती बरोबर असता तेंव्हा आपण २८ % जास्त जेवता आणि तेच एका ५-६ जणांच्या गटात असलात तर हेच ७५ % पर्यंत अधिक खाल्ले जाते. लोकांचे असे म्हणणे असते कि आम्ही संगतीत जेवताना सावकाश / कमी वेगाने चवीचवीने जेवतो त्यामुळे अन्नाची मात्रा / प्रमाण कमी असते. पण वस्तुस्थिती अशी नाही. एकटे जेवण्यापेक्षा मित्रांच्या संगतीत आपण जेवणाला दीड पट वेळ घेता. पण आपल्या अन्न सेवन करण्याचा वेग मात्र तेवढाच असतो. म्हणजेच सरासरी मित्रांच्या संगतीत आपण दीड पट जेवता. २) अनियंत्रण गृहीतक --म्हणजेच आपण इतरांच्या उपस्थितीत आपण किती खातो आहे यावर आपले बारकाईने लक्ष राहत नाही. आपले मन सारखे गप्पा आणि हास्य कल्लोळ सारख्या गोष्टीने विचलित होत असल्यामुळे प्रत्यक्ष आपण किती खातो आहोत याच्या कडे आपले लक्ष राहत नाही. यात दुहेरी फास असा असतो कि आपले मित्र चांगले चाटून पुसून जेवतात आणि वर शेवटी काहीतरी स्वीट डिश/डेझर्ट मागवतात आणि आपण गतानुगतिक म्हणून त्यांच्यात सामील होतो.. अर्थात काही वेळेस याच्या उलट आढळते. म्हणजे आपण आपल्या वरिष्ठाच्या बरोबर जेवायला गेलो असता किंवा बायका लग्नाच्या अगोदर "डेट"वर गेल्या असता आपले वर्तन प्रसंगाला "साजेसे' असावे म्हणून कमी खातील परंतु त्याच एकदा लग्न झाल्यावर मनावरील प्रतिबंध दूर झाल्याने "व्यवस्थित" जेवताना आढळतात. कोणत्याही तर्हेची गोष्ट जर आपले लक्ष विचलित करणारी असेल तर त्याने आपले मनाचे पोट भरण्याच्या संवेदनेकडे दुर्लक्ष होते आणि आपण अनवधानाने जास्त खातो. यात टीव्ही पाहणे जेवताना मोबाईल वर व्हॉट्स अँप, चेपू वर गप्पा मारणे, पुस्तक वाचन या गोष्टी आपल्याला गरजेपेक्षा जास्त खाण्यास कारणीभूत होतात हे आढळून आलेले आहे. वाईट गोष्ट म्हणजे अर्धे जेवण झाल्यावर या गोष्टी बाजूला ठेवल्या तरीही माणसे परत जास्त खाताना आढळतात कारण आपण किती जेवलो आहोत याची त्यांच्या मनाने नोंदच घेतलेली नसते. या नकळत होणाऱ्या गोष्टींमुळे माणसाना असहाय्य असल्यासारखे वाटते. याला सोपा उपाय म्हणजे काय १) बाहेर/ मित्र मंडळींबरोबर जेवताना आपण किती खात आहोत याचे भान असावे. लोक हे म्हणतील कि अहो डॉक्टर मित्रांबरोबर गप्पा मारताना असे भान कसे ठेवणार? याला उत्तर एकच. घोळक्यात गप्पा मारताना बायकांना आपल्या पदराचे भान असतेच ना? तसे तुम्ही ठेवा यात अवघड काहीच नाही २) जेवताना जेवणाकडेच लक्ष द्या आणि प्रत्येक घास चवी चवीने तोंडात घोळवून खा. ३) मित्रांबरोबर बसलेले असताना चमचमीत गोष्टी येतात उदा चिकन/ पनीर टिक्का हे खाताना भान ठेवा आणि याच्या बरोबर येणारे सॅलड पण चवीने आणि सावकाश खा. दिवाळी पूर्वी या गोष्टींचे भान ठेवून सर्व तर्हेची पक्वान्ने प्रमाणात खाऊनही आपला मिताहार चालू ठेवा पण दिवाळी नंतर आपले मन आपल्याला खात राहिल (guilt) असे खाऊ नका. शेवटी पदर ढळला तर त्याची किंमत आपल्यालाच चुकवावी लागते. आपल्या सर्वाना दिवाळी आनंदाची आणि वैभवाची आणि आरोग्यपूर्ण जावी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना.

Book traversal links for काटा वजनाचा --६

  • ‹ काटा वजनाचा --५
  • Up
  • काटा वजनाचा --७ ›

प्रतिक्रिया द्या
27368 वाचन

💬 प्रतिसाद (64)
च
चित्रगुप्त Mon, 10/17/2016 - 22:59 नवीन
धागा वजनावरून पदरावर घसरलाच आहे तर मीही चार ओळी लिहीतो. डॉक्टर साहेबांचे क्लिनिक महराष्ट्रात असल्याने सोनोग्राफीसाठी येणार्‍या स्त्रियांच्या सन्दर्भात त्यांनी जे निरीक्षण नोंदवले आहे, तसे सगळीकडेच असते असे नाही, हे मी दिल्लीत पस्तीस वर्षे राहून सांगू शकतो. मी जेंव्हा दिल्लीत प्रथम रहायला आलो, तेंव्हा मोबाईल, मॉल्स, चोविस तासाचे टीव्ही मनोरंजन वगैरे नव्हते. घरोघर मोटारी नसल्याने शॉपिंगसाठी भटकंती, किट्टी पार्ट्या, वरचेवर सिनेमाला जाणे वगैरे काहीच नव्हते. तात्पर्य म्हणजे अधिकांश स्त्रिया दिवसभर घरीच असत, आणि टाईमपाससाठी सरकारी क्वार्टर्सच्या सार्वजनिक अंगणात घोळक्या-घोळक्याने खाटांवर हाताच्या पंखांनी वारा घेत पहुडलेल्या - टिपिकल पंजाबी भारदस्त लठ्ठ स्त्रिया जिकडे तिकडे दिसत. रात्रीही बहुतांश लोक उघड्यावरच खाटा टाकून झोपत, तेंव्हाही हेच दृश्य दिसायचे. याचा या धाग्याशी संबंध असा, की या स्त्रिया हमखास खुशाल पदर पाडून बसलेल्या वा लोळलेल्या असत (उकाड्यामुळे असणार नक्कीच) आणि कोणीही तिकडून येत जात असले तरी त्याची तमा त्यांना नसे. माझ्यासारखे बॅचेलर्सच उलट लाजेने खाली मान घालून तिकडून सटकत. सलवार-कमीज घालणार्‍या स्त्रियांची चुन्नी तर कधीच जागेवर नसते, हे तर मी अजूनही बघतो. आता परिस्थिती बदलली आहे, आता घरोघरी एसी, चोवीस तास गळणारा टीव्ही, मोबईल, मोटारी यामुळे असे उघड्यावर वावरणे बंद झालेले आहे. मुळात साड्या नेसणेच दुर्मिळ झाल्याने पदराचा प्रश्नच येत नाही. मी पहिल्यांदा धागा वाचला, तेंव्हा मलाही पदराची उपमा अप्रस्तुत/कालबाह्य वाटली होती. साहित्यिक दृष्ट्या मात्र तशी ती चपखल वाटते, त्यामुळे डॉक्टर साहेबांना त्यांचे निरिक्षणातून ती सुचावी, हे स्वाभाविकच.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 10/18/2016 - 10:14 नवीन
बायका, त्यांचा पदर हे उल्लेख टाळले तरी चालतील मान्य आहे. मला सुद्धा पहिल्यांदा असेच वाटले होते परंतु दुसरी "समर्पक" उपमा सुचली नाही. ही माझ्या विचारशक्तीची मर्यादा समजा हा माझा पहिला प्रतिसाद स्पष्ट आहे. स्त्रिया आपल्या पदराविषयी जशा "जागरूक" असतात . तसेच लठ्ठ माणसांनी आपल्या आहाराविषयी सदा सर्वदा जागरूक राहायला पाहिजे इतका साधा अर्थ होता त्यावर लोकांनी टी आर पी, चीप, ऑफेन्सिव्ह, मॉरल पुलिसिंग, विनोदनिर्मितीचा दुबळा प्रयत्न इ विविध विशेषणांची राळ उडवली. कुणीही दुसरी समर्पक उपमा मात्र सुचवली नाही. मला मी दिलेली उपमा चुकली आहे असे अजिबात वाटलेले नाही. लोकांनी त्याचच विपर्यस्त अर्थ घेतला तो त्यांच्या विचारसरणीचा भाग आहे. असो. साधा एक समोसा जास्त खाल्ला तर तितक्या कॅलरी जाळण्यासाठी चार ते पाच तास "वेगाने" चालावे लागते आणि जो माणूस रोज १८०० च्या ऐवजी १४०० कॅलरीचा आहार घेतो आहे त्याच्या दृष्टीने एक समोसा खाणे म्हणजे एका दिवसाचा मिताहार फुकट गेल्यासारखा आहे. किंवा एक साधे ६० ग्रॅमचे चॉकलेट खाल्ले तर ३१५ कॅलरी आपल्या पोटात जातात त्या जाळण्यासाठी २ तास वेगाने चालावे लागेल. http://www.idiva.com/news-health/what-does-300-calories-look-like/1883 याच साठी आपण "जाता जाता काय तोंडात टाकतो" आहोत याचे सदा सर्वकाळ "भान" असणे आवश्यक आहे इतका साधा अर्थ त्या उपमेत आहे.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 10/18/2016 - 10:55 नवीन
चालताना समोर बघण्याचं भान असतं पाणी पिताना ग्लास नाकाकडे जात नाही याचं भान असतं पैसे देताना एक नोट जास्त देत नाही याचं भान असतं स्कूटरवर बसताना तोल जात नाही याचं भान असतं हज्जार गोष्टींचं भान असतं, तसंच तब्येतीचंही असावं. तुम्हाला दुसरी उपमा सुचली नाही तुमचा प्रश्न आहे. पण म्हणून जी सुचली ती कशी योग्यच्च होती हे पटवण्याचा प्रयत्नही दुबळा वाटला. नाही तर नाही ब्वा सुचली करावं कबूल व्हावं मोकळं. कॅलरीज थोडीच जातायत त्याने पोटात? असो. मोजून मापून खाण्यापेक्षा चांगलं खावं, भरपूर खावं आणि काहीही झालं तरी नियमित व्यायाम करावा. मग कॅलरीज ची गणितं बसवावी लागत नाहीत. शरीराचं विज्ञान बरोब्बर आरोग्याचं रसायन तयार करतं.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 10/18/2016 - 15:25 नवीन
वेल्लाभट, तुमच्याशी असहमत. चालताना समोर नाय बघितलं तर धाडकन पडायला होतं. पाणी पिताना ग्लास नाकाकडे गेला तर नाकात पाणी जाऊन जीव कासावीस होईल. पैसे देताना एक नोट जास्त गेली तर आपलंच नुकसान आहे. स्कूटरवर बसताना तोल गेला तर कपाळमोक्ष ठरलेलाच आहे. मात्र पदर ढळला वा चार घास जास्त खाल्ले तर लगेच परिणाम दिसून येत नाही. म्हणून पदराचं भान आणि उपरोक्त चार गोष्टींचं भान वेगळे आहेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Tue, 10/18/2016 - 19:48 नवीन
मात्र पदर ढळला वा चार घास जास्त खाल्ले तर लगेच परिणाम दिसून येत नाही
रियली, गा.पै? आय सजेस्ट यू थिंक ओवर इट वन्स मोअर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Wed, 10/19/2016 - 08:19 नवीन
वेल्लाभट, दुष्परिणाम लगेच दिसले नाही तरी थोड्या थोड्या मात्रेने वाढंत राहतात. जेव्हा ध्यानात येतं तेव्हा वेळ बहुधा निसटून गेलेली असते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Wed, 10/19/2016 - 08:38 नवीन
माझा पास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
सुबोध खरे Tue, 10/18/2016 - 15:30 नवीन
मोजून मापून खाण्यापेक्षा चांगलं खावं, भरपूर खावं आणि काहीही झालं तरी नियमित व्यायाम करावा. मग कॅलरीज ची गणितं बसवावी लागत नाहीत. शरीराचं विज्ञान बरोब्बर आरोग्याचं रसायन तयार करतं. एवढं सोपं असतं काय ? अरेरे उगाच एवढे सहा भाग लिहायचा खटाटोप केला. वेल्लाभट तुम्ही लिहा कि डिटेलवारीने याबद्दल. आम्ही थांबतो.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 10/18/2016 - 20:02 नवीन
लिहू की. आमच्या आगोदरही अनेकांनी लिहिलंय याबद्दल. अगदी भारताच्या लाडक्या डैटिशन रुजुता ताई पण हेच म्हणतात वारंवार; तिथे आमची काय पोच त्यांच्यापुढे. बाकी तुम्ही मात्र तलवार उपसूनच असता नेहमी डॉक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चित्रगुप्त Tue, 10/18/2016 - 16:05 नवीन
मोजून मापून खाण्यापेक्षा चांगलं खावं, भरपूर खावं आणि काहीही झालं तरी नियमित व्यायाम करावा.
कित्येकांना लठ्ठपणामुळे, वाढत्या वयामुळे, गुडघेदुखी, गाऊट, फ्लॅट फूट वा तत्सम त्रासामुळे व्यायाम करणे शक्य वा हितावह नसते (... "वेळच मिळत नाही" हे कारण मला पटत नाही, कारण वेळ हा काढावा लागतो. हल्ली शिरेल बघणे इत्यादि मनोरंजनात, वॉट्सअ‍ॅप, फेसबुकात वगैरे जो वेळ घालवला जातो, तो व्यायामासाठी वापरणे सहज शक्य व्हावे ...) त्यामुळे आहाराबद्दल नेहमी जागरूक रहाणे आवश्यक आहे. जिभेच्या 'चोचल्यां'पायी वाटेल तेंव्हा, वाटेल ते, वाटेल तितके खाऊन मग न झेपणारा व्यायाम करण्यापेक्षा स्वतःवर ताबा ठेवणे योग्य. योगाची पतंजलीनी केलेली व्याख्याच मुळात 'योगश्चित्तवृत्ति निरोधः अर्थात चित्त्वृत्तींवर ताबा ठेवणे अशी आहे. जगातील अनेक वैयक्तिक आणि सामाजिक समस्या, अनारोग्य, अन्याय, जुलूम, क्रौर्य यांचे मुळाशी मोकाट सुटलेल्या मानवी वृत्ती आहेत, असे दिसून येते. दुसरे म्हणजे हल्ली कित्येकांना व्यायाम म्हणजे एकदम महागड्या जिममधे जाऊन बघता बघता सलम्या किंवा जॉन इब्राहिम वगैरेंसारखी बॉडी बनवायची असते... मग जिम सुरू करणे लांबणीवर पडत जाते, किंवा सुरू केले तरी लवकरच ते कंटाळून जाणे सोडतात, त्यातून आलेल्या नैराश्यापायी घरी कोणत्याच प्रकारचा व्यायाम न करता खाणे मात्र तसेच चालू ठेवतात. खाण्यावर ताबा ठेवला, तर जिम वा मेहनतीचे व्यायाम करण्याऐवजी घरच्या घरी हलकाफुलका व्यायाम, आसने, नृत्य किंवा गेलाबाजार नुसते बसून वा लोळत राहण्याऐवजी नेहमी काही ना काही शारीरिक हालचाल करत रहाणे, एवढेही पुरेसे असते.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 10/18/2016 - 16:35 नवीन
(... "वेळच मिळत नाही" हे कारण मला पटत नाही, कारण वेळ हा काढावा लागतो. हल्ली शिरेल बघणे इत्यादि मनोरंजनात, वॉट्सअ‍ॅप, फेसबुकात वगैरे जो वेळ घालवला जातो, तो व्यायामासाठी वापरणे सहज शक्य व्हावे ...)
रोजचे १० तास ऑफिसात (वेळेवर निघणे सणासुदीलाच असते), ३ तास प्रवासात, झोपेचे ८ तास, सकाळी ऑफिसच्या आधी आन्हिके आणि तयारी यात १.५ तास, संध्याकाळी घरी आल्यावर थोडा आराम १ तास = २३.५ तास...उरलेला ०.५ तास व्यायाम?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
म
मोदक Tue, 10/18/2016 - 17:17 नवीन
सकाळी ऑफिसच्या आधी आन्हिके आणि तयारी यात १.५ तास, संध्याकाळी घरी आल्यावर थोडा आराम १ तास यातला वेळ कमी करता येतो का ते बघ. किंवा या तब्बल अडीच तासातला वेळ वाचव आणि किमान एक तास सायकल चालव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ख
खटपट्या Tue, 10/18/2016 - 18:18 नवीन
हाफीसात जेव्हा वेळ मिळतो,मीटींग नसतात कींवा कामाचा बोजा नसतो तेव्हा आवारात चालून यावे. हाफीसात जीम असेल तर त्यावर व्यायाम करुन यावा. काहीच जमत नसेल तर उभे राहून काम करावे.(यासाठी वेगळ्या डेस्कची गरज असते हे खरे). शनिवार, रवीवार कमीतकमी एक तास वेगाने चालावे. त्याहून जास्त चालले तरी बरे. दोन महीन्यात परीणाम दीसतील. आणि डाक्टरांनी सांगीतल्याप्रमाणे आहारावर नियंत्रण तर हवेच. जौदे जरा जास्तच उपदेश झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
व
वेल्लाभट Tue, 10/18/2016 - 20:01 नवीन
"वेळच मिळत नाही" हे कारण मला पटत नाही, कारण वेळ हा काढावा लागतो. हल्ली शिरेल बघणे इत्यादि मनोरंजनात, वॉट्सअ‍ॅप, फेसबुकात वगैरे जो वेळ घालवला जातो, तो व्यायामासाठी वापरणे सहज शक्य व्हावे ...)
सहमत. सद्ध्या याचसाठी स्वतःशी भांडण चालू आहे. कामामुळे, प्रवासामुळे प्रामाणिकपणे वेळ्/उत्साह उरत नाही व्यायामाचा. इच्छा खूप असते, आणि तत्व हेच सांगतं... की वेळ काढावा लागतो इत्यादी. पण बॉडी डिमांड्स स्लीप. इट गिव्ह्स अप अ‍ॅट द एंड ऑफ द डे. असो. यातूनही वेळ काढीन असा निश्चय आहेच. आणि जिम, व्यायाम याबद्दल एकंदरच जे खत्तरनाक गैरसमज लोकांमधे बघायला मिळतात ना, ते कमाल असतात. आणि मग उगाच कुठल्यातरी अतर्क्य थियरीवर विश्वास ठेवणे, चालल्यानेच सर्वात अधिक फायदा होतो, किंवा साखर सोड बघ एक महिन्यात काय फरक होतो ते, किंवा मग चहा सोडून ग्रीन टी इत्यादी सोयीस्कर आणि ईझी ऑप्शन्स लोकं निवडतात. स्वतःला फसवत बसतात. फिटनेस सोडून वजन या एका डिराइव्हड नंबरवर लक्ष केंद्रित करून वेळ, पैसा, आणि उमेद सगळं वाया घालवतात. व्हेरी फ्यू अंडरस्टँड फिटनेस. द रेस्ट आर बिझी कंपेरिंग देमसेल्व्ह्ज विथ अदर्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा