Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"काय करता येईल?"

उ
उपयोजक
Sat, 08/12/2017 - 12:28
🗣 55 प्रतिसाद
गेल्या काही महिन्यांपासून जिथे मिपाकर आहेत असे WhatsApp,फेसबुक समुहांवर एक वाक्य हमखास ऐकू येतं,"पूर्वीचं मिपा राहिलं नाही आता!" याच विषयावर काही मिपाकरांशी बोलताना तीन मुख्य मुद्दे समोर आले ते असे. १. काही जुने वाचनीय लिहिणारे मिपाकर आता फारसे लिहित नाहीत.या लेखकांचा मिपावर दबदबा होता.त्यामुळे सकस लिखाणात थोडा कमी असणारा मिपाकर लिहिण्यापूर्वी अनेकदा विचार करायचा.आपण यांच्यासारखं दर्जेदार लिहू शकू की नाही याबद्दल धाक असायचा.तो सध्या कमी झालाय.कोणीही,कोणताही विषय आणतं मिपावर!किंवा काहीही प्रतिसाद दिला जातो.लेखनाचा दर्जा सुधारायला हवा;तसाच प्रतिसादांचाही सुधारायला हवा. आता हे जुने बौध्दीकदृष्ट्या सकस असं लिहिणारे मिपाकर सध्या का लिहित नाहीत? त्यांना काही खटकतंय का? की लिहिण्यासाठी खरंच पूर्वीइतका वेळ नाहीये त्यांच्याकडे?त्यांनी कृपया इथे व्यक्त व्हावं. किंवा नवीन लेखकांच्या लेखनाचा दर्जा उंचावण्यासाठी मिपा जे प्रयत्न करतं आहे ते कुठे कमी पडताहेत का? २. मिपाचं डिझाईन बदललंय.पूर्वी प्रत्येक नवीन धाग्याचं संपूर्ण शीर्षक वेबपेजवर दिसायचं.आता तसं होत नाही.यात वेळ जातो.हे स्वरुप थोडं किचकट वाटतं. पूर्वीचंच सुटसुटीत डिझाईन परत नाही का ठेवता येणार? काय हरकत आहे? ३. काही वेळा अकारण ट्रोलिंग किंवा कंपुबाजी होते.(यामुळे कदाचित नवीन चांगले लेखक मिपाकर अव्यक्त राहू शकतात.)अर्थात ती इतर मराठी संस्थळांवरही कमी- अधिक प्रमाणात होतच असते.पण त्यामुळे इथल्या ट्रोलिंग किंवा कंपुबाजीचा प्रश्न निकालात किमान कमी नाही होऊ शकणार.त्यासाठी इतर संस्थळांचा विचार न करता मिपावर असं होऊ नये म्हणून काय करता येईल? WhatsApp किंवा अशाच सोशल ग्रुप्सवर मिपाकर गप्पा मारतात,चर्चा करतात.मग त्यांना इकडे यायला वेळच मिळत नाही.लिहिणं होत नाही.सगळं तिथेच बोलून घेतात.असाही एक मतप्रवाह आहे. तर इथे सांगायला आवडेल की वरील विषयाची चर्चा आधी अशाच एका समुहात झालेली आहे.बरेच मिपाकर तिथे आहेत.त्या चर्चेतूनच हा धागा बनवला आहे. तर एकंदरीत मिपाचा पूर्वीचा किंबहुना शक्य झाल्यास त्याहूनही अधिक चांगला स्तर,दर्जा निर्माण करण्यासाठी काय करता येईल,काय उपाय करता येतील यावर चर्चा अपेक्षित आहे. हे सगळं तुम्ही का करताय? मिपाची काळजी घ्यायला मिपाचे चालक,मालक,संपादक मंडळ समर्थ आहे.तुम्ही का काळजी करताय मिपाची? मिपा जसं आहे तसं पुढे जाईल.मिपाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरुच आहेत.असंही विचारलं जाऊ शकतं. पण मग याला विलंब का लागतो आहे?कि जे आहे जसं आहे तसं स्विकारत पुढे जायचंय? सगळेच काही उत्तम लेखक होऊ शकत नाहीत.पण आताशा मिपावर हे चांगल्या लेखकांचं प्रमाण खुपच कमी झालंय.ही चिंतेची बाब नाही का? सामान्य मिपाकराने ही चिंता व्यक्त करावी की नाही? तेवढा अधिकार सामान्य मिपाकराला असावा की नाही? धाग्यावर वरील समस्यांच्या उपायांबद्दल चर्चा अपेक्षित आहे. याच समस्या परत वेगळ्या शब्दांत मांडून धागा भरकटवू नये ही विनंती!
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
12926 वाचन

💬 प्रतिसाद (55)
द
दीपक११७७ Sat, 08/12/2017 - 13:12 नवीन
काही जण, अनेक अत्यंत फालतु या प्रकारात मोडावा असे धागे काढतात आणि त्यामुळे एकुण धाग्यात ७०% धागे हे फालतु या प्रकारात मोडत असल्याने , सर्वच धागे हे फालतु आहेत असा समज होतो किंवा चांगला धागा लगेच मागे पडतो आणि फालतु धागा ट्रोल होत रहातो. शेवटी काय तर फालतु धाग्याला जरब बसवायला पाहिजे, असे वाटते.
द
दुर्गविहारी Sat, 08/12/2017 - 13:53 नवीन
या निमीत्ताने मला माझा जुनाच प्रतिसाद आठवला आणि तो दिल्यानंतर एक जाणत्या सदस्याने केलेल्या व्य. नि. ही आठवला. आपली त्या ग्रुपवर चर्चा झाल्यानंतर मला हा प्रतिसाद सापडला. पुन्हा एकदा चिकटवतोय. या निमित्ताने दोन शब्द माझेही. खरेतर मित्रामुळे हे संकेतस्थळ कळाले. सह्याद्रीतले ट्रेक हीच एकमेव पॅशन असनार्या मला मिसळपाव खुप आवड्ले. रोज न चुकता मिसळपाव एक फेरी ठरलेली. इथके अनेक लेख नुसते वाचले नाहीत तर डि.व्ही.डि. वर सेव्ह करून इतराना वाचन्यास दिले. राजकारणामध्ये मला काडीचाही रस नव्हता आणि समजही नव्हती. मात्र आज राजकारणावर जे काही बोलू शकतो आणि आमच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रूप वर लिहू शकतो, त्याचे १००% श्रेय मिपाला. माझ्या गड्किल्ल्याविषयी माहितीचा इतराना उपयोग व्हावा, या साठी मिपावर आयडि काढला.( आणि आता लेखनही करतोय) माझा एक मित्र नविन हॉटेल काढणार आहे, त्याला पेठकरकाकाच्या प्रतिसादाची लिंक दिली. मात्र नवख्या लेखकाने लिहीलेल्या लेखावरती ज्या पद्धतीने प्रतिक्रीया येतात, त्या बघता इथे लिहावे की नाही हि शन्का मनामध्ये निर्माण झाली आहे. मला विषेश करुन खटकतो तो पॉपकॉर्न नामक प्रकार. माझ्या माहितीत तरी प्रत्येक धाग्यावरती प्रतिक्रीया देणे हे बन्धकारक नाही, असे असताना, उगाच मी वरच्या फान्दीवर बसते, तिकडे सरकून मला जागा दे, चखणा आण, पहील्या सिटवर बसलोय या सर्व प्रतिक्रीया कशासाठी ? जर काथ्थाकूट करायचा नसेल, तर त्या धाग्यावर फिरकू नका किंवा या विषयावर पूर्वी चर्चा झाली असल्यास, त्याची लिन्क तिथे द्या, धाग्यात नविन मांड्णी असल्यास नव्याने चर्चा सुरु करता येइल. पण हे टोमणे का ? प्रत्येकजण इथे केंव्हा ना केंव्हा तरी नवीन होतेच ना? अशाने बरेच वाचनमात्र असलेले वाचक की ज्यान्च्या कडे कदाचित खुप चान्गली माहिती किन्वा प्रतिभा असेल ते मिपावर लेखन करायचे की नाही याचा दहादा विचार करतील. मलाही इथे लिहावे की नाही याची शन्का वाटु लागली आहे. बर्याच नवीन आयडिच्या मिपा सदस्यत्वाच्या कालावधीवरून बोलले जाते. सदस्यत्व किती काळाचे आहे हे महत्वाचे की त्याने मांडलेले विचार ? असो. जर माझ्या लेखनामुळे कोणी सदस्य दुखावले गेले असतील तर क्षमस्व. माझी टिका गैरलागू आहे असे वाटले, तर जरूर हा प्रतिसाद उडवावा. मात्र मिपासारख्या चान्गल्या संस्थळाविषयी आतून वाटणार्या कळकळीतुन हा प्रतिसाद आला आहे याची नोद व्हावी. इति लेखनसीमा. ह्याच संदर्भात आलेला हा धागा महत्वाची सूचना आज यात थोडे बदल झालेत. उदा- अंताक्षरी खेळणे. एखाद्या आय.डी. ने काही टुकार धागे काढले याचा अर्थ प्रत्येक धागा वाईटच असा होत नाही. कदाचित मागे चर्चा झाली असली तरी कालानुरुप बदलेल्या परिस्थितीचा विचार करता काही नवे मुद्दे येउ शकतीलच कि. काही नवे सदस्य आलेत, कदाचित ते काही नवी मांडणी करु शकतीलच ना? पण हे न होता त्या व्यक्तीला हतोत्साहीत केले जाते. मला स्वताला काही चर्चात्मक धागे काढायची ईच्छा होती मात्र सध्याचे वातावरण पहाता, मी तरी असे धागे नक्कीच काढणार नाही. बाकी मला तरी सध्याचा मि.पा. ईंटरेफेस आवडतो. उगाच एकाच पानावर सर्व घाग्यांची मिसळ करण्यापेक्षा, ते ते सदर वेगळे असल्याने आपल्या आवडीच्या क्षेत्रातील धागे पटकन वाचता येतात. या संदर्भात मला असे वाटते कि एखादा सदस्य जाणून बुजुन किंवा कदाचित अजाणता असे आक्षेपार्ह लेखन करित असेल किंवा ट्रोलिंग चालत असेल तर त्या सदस्याला व्य.नि. मधुन वॉर्निंग देण्यात यावी. त्यातुनही तो सुधारलाच नाही तर योग्य कारवाई होईलच.
A
arunjoshi123 Sat, 08/12/2017 - 14:21 नवीन
छान मुद्दा. ============= मी सुरुवातीला प्रचंड टरकून असायचो. मिपा आहे तेव्हा पासून मी ते वाचायचो (मंजे कधी कधी). पण रजिस्टर करून लिहायला प्रचंड हिम्मत लागली. ३-४ वर्षे लागली असतील. सुरुवातीला मांडणी देखिल खूप विस्कळित असायची. टंकताना खूप चूका व्हायच्या. काही गोष्टी टाईपताना जमायच्याच नाहीत. ============== आशय समर्पक रित्या मांडायला विषयाचं ज्ञान, विचारांची सुसुत्रता यांबरोबरच भाषा आणि कम्यूनिकेशन यांवर प्रभूत्व लागतं. प्रत्येकाकडे एवढं सगळं नसतं. =========================== लोक आपली काही मतं पाहून इतकी मतं बनवून टाकतात कि त्यात पुरल्यासारखं होतं. आपल्याला "असं असं" समजणारा लोकांत जायला नको होतं. बोलताना समजावणं, समजून घेणं सोपं असतं, तेच लिहून करताना कंटाळा येतो तरी पॉईंट सांगता येत नाही. ================= आपण अदृश्य आहोत म्हणजे आपण कसेही वागायला मोकळे आहोत असे बर्‍याच सदस्यांना वाटते. कधी कधी अशांची चौकडी देखिल बनते. इथे असं काही नसलं तरी प्रत्यक्ष आयुष्यात जितक्या वाईटपणे लोक वागतात त्यापेक्षा थोडे जास्तच जालावर वागतात. ========================= मतांतर असणं आणि समोरचा व्यक्ति दुष्ट असणं या गोष्टी भिन्न आहेत. मतांतराचा मान नाही राखला तरी ठीक, पण "सूड फिटेपर्यंतचा शत्रू" स्टॅटस देणे टाळावे. एखादा शब्द वर खाली झाला तर विसरून जावे. ==================== अगदी प्रामाणिक कबुली द्यायची झाली तर जालावरचं वातावरणच असं आहे कि ज्या अदबीने वागावं असं मला पूर्वी वाटे, तसं मला आता वाटत नाही आणि ते माझ्या अलिकडच्या लेखनातून दिसतं. हा एक माहौल असतो वाटतं. पण तो सुधरावा अशी इच्छा मनी असणं उत्तम.
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
य
योगेश लक्ष्मण बोरोले Sat, 08/12/2017 - 19:59 नवीन
प्रश्नाच्या मुळ्यांवर उत्तम प्रकाश टाकलात.
↩ प्रतिसाद: arunjoshi123
व
विशुमित Sat, 08/12/2017 - 20:20 नवीन
१००००० वेळा सहमत..!!
↩ प्रतिसाद: arunjoshi123
उ
उपेक्षित Sat, 08/12/2017 - 16:27 नवीन
अतिशय उत्तम प्रतिसाद सायबा, १००० वेळा सहमत आहे.
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
अ
अत्रे Sun, 08/13/2017 - 03:45 नवीन
मला विषेश करुन खटकतो तो पॉपकॉर्न नामक प्रकार. माझ्या माहितीत तरी प्रत्येक धाग्यावरती प्रतिक्रीया देणे हे बन्धकारक नाही, असे असताना, उगाच मी वरच्या फान्दीवर बसते, तिकडे सरकून मला जागा दे, चखणा आण, पहील्या सिटवर बसलोय या सर्व प्रतिक्रीया कशासाठी ? जर काथ्थाकूट करायचा नसेल, तर त्या धाग्यावर फिरकू नका किंवा या विषयावर पूर्वी चर्चा झाली असल्यास, त्याची लिन्क तिथे द्या, धाग्यात नविन मांड्णी असल्यास नव्याने चर्चा सुरु करता येइल. पण हे टोमणे का ?
+१०० मिपावर असे प्रतिसाद त्वरित उडवून लावण्यात यावेत असे वाटते. आशा आहे की संपादक मंडळ दखल घेईल.
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी
उ
उपयोजक Sat, 08/12/2017 - 14:45 नवीन
मुद्देसूद प्रतिसाद! धन्स दुर्गविहारीजी!
ख
खटपट्या Sat, 08/12/2017 - 16:33 नवीन
वरील प्रतिसाद हे काथ्याकूट या प्रकारच्या लेखनासाठी चपखल आहेत. पण ललित लेखन करणाऱ्यांना तरी ट्रोल करू नये. ललीत लेखन ही त्या लेखकाची स्वतंत्र कलाकृती असते. शुध्दलेखन आणि व्याकरणाची मदत करावी. अजून खुलावता कसे येईल हे सुचवावे.
व
विशुमित Sat, 08/12/2017 - 20:21 नवीन
सहमत ..!!
↩ प्रतिसाद: खटपट्या
ए
एमी Mon, 08/14/2017 - 07:47 नवीन
ट्रोल करू नये ठीक आहे. पण ललित लेखनावर चर्चा करणे का योग्य आहे याबद्दल http://www.maayboli.com/node/22044 इथे चर्चा झालेली. मला पटली.
↩ प्रतिसाद: खटपट्या
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 08/12/2017 - 16:52 नवीन
उपयोगी धागा. धन्यवाद ! मिपाकरांनी त्यांचे विचार, कल्पना, सूचना, मनोगत, इत्यादी इथे मोकळेपणाने मांडल्यास; प्रशासनाला त्या सगळ्याचा सकारात्मक उपयोग करून मिपाला उत्तरोत्तर अजून सकस संस्थळ बनवायला मदतच होईल.
उ
उपयोजक Sat, 08/12/2017 - 17:43 नवीन
आभार म्हात्रे साहेब! धागा उपयोगी आहे असं वाटणार्‍या सर्वांनीच या बद्दल अन्य मिपाकरांना याबद्दल सांगावं.कदाचित विकांत आणि जोडून येणार्‍या सुट्यांमुळे धागा नजरेआड राहू नये असं वाटतं!
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
संदीप डांगे Sun, 08/13/2017 - 08:35 नवीन
अतिशय हास्यास्पद प्रतिसाद! इथल्या चार सहा कंपुबाजांच्या इशार्‍यावर मिपा प्रशासन चालतं. सदस्यांच्या सूचना, विनंती, तक्रारीला ढुंकूनदेखील न पाहाणारे इथले प्रशासन या धाग्यावर येऊन मात्र शाहाजोगपणा करत आम्ही कितीकिती महान आहोत याचे प्रदर्शन मांडणार.... यांच्याच जाणीवपूर्वक नाकर्तेपणामुळे मिपा सकस नव्हे तर भंकस संस्थळ बनत चालले आहे. बसा घेट्टोगिरी करत! शुभेच्छा!
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
पगला गजोधर Mon, 08/14/2017 - 07:42 नवीन
वरचा प्रतिसाद सुद्धा पटतोय, व डांगेचा प्रतिसाद ही पटतोय...
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
पगला गजोधर Mon, 08/14/2017 - 13:10 नवीन
आताशा तर संदीप यांचा प्रतिसाद अजूनच पटायला लागलाय. विशेषतः
या धाग्यावर येऊन मात्र शाहाजोगपणा करत आम्ही कितीकिती महान आहोत याचे प्रदर्शन मांडणार....
हे वाक्य. इन ऍडिशन टू दॅट समोरच्याला/धाग्याला ब्रिगेडी, ट्रोल वैगरे विशेषणे देणार किंवा, संपादक मंडळाला, सदर धागा / धागाकर्त्यावर कारवाईची मागणी करणार, अथवा मिपावर फिरकणार नाही. मिपा लोकप्रियता कमी होईल अशी भीती दाखवणारं ! वा रे दुनिया, इथं मनुस्मृती वरील लेख सर्व मिपाकर सहनशीलतेने वाचून, सहिष्णुता दाखवणारं , पण ह्यांच्या मनाप्रमाणे हा ट्रोल, तो चांगला विचारवंत, हा देशभक्त तो दोन समाजात फूट पाडणारा वै वै सर्टिफिकेट देऊन मोकळे होणार ..... _/\_ खरंच नमन अश्या लोकांना
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
M
mayu4u Mon, 08/14/2017 - 16:25 नवीन
... इथं धुण्याचा प्रयत्न वाटला. असो.
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
म
मोदक Mon, 08/14/2017 - 19:17 नवीन
+१११ दोन्ही आयडींकडून अनावश्यक प्रतिसाद.
↩ प्रतिसाद: mayu4u
ए
एमी Tue, 08/15/2017 - 02:19 नवीन
पटतंय. झुंड दिसतेय...
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मोदक Tue, 08/15/2017 - 04:59 नवीन
सहमत. :)) (आणखी दोन तीन आयडींच्या प्रतिक्षेत.)
↩ प्रतिसाद: एमी
ध
धर्मराजमुटके Sat, 08/12/2017 - 17:47 नवीन
काय करता येईल ? खरचं प्रश्न आहे. तुमची कळकळ जाणवली. पण सध्या हळहळ करणे आणि लैच झालं तर स्वतःला सुधारण्यापलीकडे काही करता येईल असे वाटतं नाही. ( नकारात्मक प्रतिसादाबद्द्ल आगाऊ माफी )
ध
धर्मराजमुटके Tue, 08/15/2017 - 11:50 नवीन
मागच्या रविवारी रागावून एका मागोमाग एक जुने आणि वाचनीय धागे वर काढले. नवीन धागे अगदी गाडूनच टाकले म्हणा ना ! मात्र त्यामुळे बर्‍याचजणांना त्रास झाला. काहींनी व्यक्तीगत संदेशाद्वारे कळविले. शिवाय आत्तापर्यंत गुडबुकात असलो तरी मला मालकांची बोलणी खावी लागली. (त्यांनी अगदी सयंत शब्दात कान टोचले. त्याचा राग अजिबात नाही. त्यांना परत ते धागे गाडण्याचा उद्योग करावा लागला. माझ्यामुळे बरेच जणांना त्रास झाला त्याचा नंतर विचार केल्यावर वाईट वाटले. वरच्याच प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे स्वतःला सुधारण्यापलीकडे काही करता येईल असे वाटतं नाही. त्यामुळे आता राजकीय धाग्यांवर अजिबात फिरकायचे नाही असे ठरविले आहे. त्याव्यतिरिक्त जिथे जिथे वाद होतात त्या धाग्यांवर अजिबात फिरकायचे नाही आणि प्रतिक्रिया पण द्यायचे नाही असे ठरविले आहे. आता फक्त कविता, कथा, प्रवासवर्णन अशाच प्रकारच्या धागे वाचायचे आणि प्रतिक्रिया द्यायचे ठरविले आहे. शिवाय ज्या कवितांना, लेखांना एकही प्रतिक्रिया मिळत नाहीत, त्यांच्यावर आवर्जुन प्रतिक्रिया देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे अशा लेखकांना इथे वावरण्याचे बळ मिळेल. प्रतिक्रिया अर्थातच सकारात्मक आणि सयंत नकारात्मक भाषेत देण्याचे ठरवले आहे. मात्र मिपा सोडण्याचा सद्या कोणताही विचार नाही. अगदीच मालकांनी हाकलून काढले तर बात वेगळी :)
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
अ
अभ्या.. Tue, 08/15/2017 - 12:18 नवीन
त्यामुळे आता राजकीय धाग्यांवर अजिबात फिरकायचे नाही असे ठरविले आहे. त्याव्यतिरिक्त जिथे जिथे वाद होतात त्या धाग्यांवर अजिबात फिरकायचे नाही आणि प्रतिक्रिया पण द्यायचे नाही असे ठरविले आहे. आता फक्त कविता, कथा, प्रवासवर्णन अशाच प्रकारच्या धागे वाचायचे आणि प्रतिक्रिया द्यायचे ठरविले आहे. शिवाय ज्या कवितांना, लेखांना एकही प्रतिक्रिया मिळत नाहीत, त्यांच्यावर आवर्जुन प्रतिक्रिया देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे अशा लेखकांना इथे वावरण्याचे बळ मिळेल. प्रतिक्रिया अर्थातच सकारात्मक आणि सयंत नकारात्मक भाषेत देण्याचे ठरवले आहे. मात्र मिपा सोडण्याचा सद्या कोणताही विचार नाही. अगदीच मालकांनी हाकलून काढले तर बात वेगळी :)
हे तर लै आधीपासून करतो आम्ही. राजकारणाचे लैच फेकायले तर असह्य होतं कधीकधी पण आता भविष्यात तेही नाही. नवीन येणार्‍या लेखकांना प्रतिसादाचे बळ मिळत नाही, बिचारे कानकोंडे होऊन गप्प बसतात. चांगल्या प्रथितयश लेखक कविंनाही आजकाल प्रतिसादाचे दुर्भिक्ष्य जाणवायलेय. एकूणच वाचले की प्रतिसाद द्यायची मनोवृत्ती कमी झालीय. काही काहि लोक फक्त स्वत:चे अजेंडे राबवण्यापुरते येतात. त्यांना आयुष्यात ललित, कविता, कला, प्रवास, मिपापरिवार ह्याच्याशी काहीच देणेघेणे नसल्यागत करतात. अशांच्या लेखनालाच फाट्यावर मारुन नवीन लेखकांना प्रतिसाद द्या, काही चुकत अस्ल्यास सांगा आणि त्यांच्यासहित सदृढ मिपापरिवार वाढवा. इतके झाले तरी लै झाले.
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
म
मनिमौ Sat, 08/12/2017 - 18:28 नवीन
छान मुद्दा मांडलाय. दुवि यांचा प्रतिसाद ही समर्पक आहे. चांगल्या लेखमाला आणी धागे प्रतिसाद देऊन वर ठेवले आणी फुकट ट्यार्पी मिळवायला काढलेले धागे अनुल्लेखाने मारले तरी काही काळानंतर असे धागे कमी होत जातील. हे माझे दोन पैसे अर्थात अगदीच विश फुल थिंकिंग करते आहे मी. पण खरच अस झाल तर फार बरे होईल
ज
जेम्स वांड Sat, 08/12/2017 - 19:25 नवीन
अतिशय उत्तम धागा काढलात, अन विषयाला तोंड फोडायला हिम्मत लागते ती दाखवल्याबद्दल सुद्धा तुमचं कौतुक. अरुण जोशींचे विचार खरंच आवडले , खासकरून मतांतर असणं आणि समोरचा व्यक्ति दुष्ट असणं या गोष्टी भिन्न आहेत. मतांतराचा मान नाही राखला तरी ठीक, पण "सूड फिटेपर्यंतचा शत्रू" स्टॅटस देणे टाळावे. एखादा शब्द वर खाली झाला तर विसरून जावे. हे तर फारच वाटले, आजच एका धाग्यावर मोहितेंना एक अतिशय कल्पक, समृद्ध अनुभवविश्व असणारे आणि उत्साही वरिष्ठ सदस्य 'ट्रक फिरवणे सुरु आहे/ लागले' असं काहीसे बोलले आहेत, मला त्याचा पूर्वसंदर्भ काहीच ठावकी नाही, तरी ते विचित्र नक्कीच वाटले होते. सदस्यकाळावरून बोलणे सुद्धा मला, नाहीच काही तर स्वतः वरिष्ठ असल्यामुळे इतरांना 'सेकंडरी सिटीझन' सारखं वागवू पाहणारे काही सदस्य हे कीव करायचे विषय वाटतात, असो. वाटेल ते बोललो, मनाला न लावून घेणे (कोणीच) शेवटी सोसंल तितकं सोशल नेटवर्किंग हाच एक सुखी जीवनाचा मूलमंत्र उरतो _/\_
म
मोदक Mon, 08/14/2017 - 19:14 नवीन
मोहितेंचे ट्रक फिरायला लागले असे मी म्हणालो होतो कारण ते निरर्थक आणि स्वतःचे म्हणणेच खरे आहे अशा अर्थाचे प्रतिसाद टाकत होते. ..बाकी ट्रकचा रेफरन्स फार जुना नाहीये मात्र तेथे चपखल वाटला म्हणून लिहिला. :) मला "वरिष्ठ सदस्य" म्हणून उगाचच म्हातारा आहे असे भासवल्याबद्दल वांड साहेबांचा निषेध. ;)
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड Tue, 08/15/2017 - 10:03 नवीन
ओके, त्यांचे प्रतिसाद निरर्थक असतीलही, पण त्याला जुने रेफरन्स लावायचा संबंध कळला नाही दादा, म्हणजे कार्यकारण भाव वगैरे, जिथला हिशेब तिथे बरं वाटतं, वरती तुम्हीच दुसऱ्या धाग्यावरची इथे धुणी धुतल्याबद्दल पगला गजोधारला टार्गेट केले आहेत, तिथे तुम्हीही तेच केले होतेत का (ताज्या घडामोडीवर) ? तुम्हाला आम्ही एका वेगळ्या उंचीवर असलेलं पाहत आलोय दादा, तुम्ही तरी ह्या प्रकारात दिसणे नक्कीच आवडले नाही, बाकी तुम्ही फर्स्ट सिटीझन ऑफ मिपा, आम्ही दुय्यम नागरिक, जास्त काय बोलणार.
↩ प्रतिसाद: मोदक
प
पिशी अबोली Sat, 08/12/2017 - 21:50 नवीन
1. जुने, चांगले धागे, एखाद्या माणसाने प्रतिसाद दिला तरी वर येतात. त्यामुळे अजून काही नवीन लोकांना ते दिसतात, वाचता येतात. कोणत्याही कंपूच्या बाहेर असणाऱ्या सामान्य मिपाकराला ते समोर दिसू शकतात. ही एक गोष्ट मिपावर चांगलं लिखाण येत नाही असं वाटणाऱ्या कुणालाही निश्चित करण्यासारखी आहे. 2. माहितीपूर्ण आणि चांगले लेख आताही येत आहेत. सिक्कीम बद्दलचा, किंवा अमेझॉन सफरीचा लेख अजूनही लोक वाचत आहेत, प्रतिसाद देत आहेत. चांगलं लिखाण येतं, त्याला प्रतिसाद मिळतातही. त्याचा कुठे उल्लेखही न होता सतत हा निराशेचा सूर का हे कळत नाही. जुने तेच चांगले, आणि विद्वान सगळे हरवले, हा इतके अभ्यासपूर्ण लेख येत असतानाही बोलण्याचा विषय असेल, तर कठीण आहे. 3. नुसतं नवीन लेखनच नाही, तर आलेल्या नवीन आयडीच्या प्रतिसादांनाही भरपूर खेळीमेळीने आधीपासूनच टार्गेट केलं जातं. उगाच गंभीर चेहरे इस्त्री करून आपल्या virtual आयडीलाही चिकटवणे, हा जुन्या मिपाचाही स्वभावधर्म नसावा. पातळी घसरून प्रतिसाद न देणं, हे मात्र त्या त्या आयडीच्या हातात आहे, नाही का? तरीही स्वानुभवावरून सांगते, की अतिशय वाईट भाषेतील वैयक्तिक टीका संमंच्या निदर्शनास आणून दिली असता त्यावर नेहमी लगेच काहीतरी कारवाई होतेच. लोकांची बोलण्याची पद्धत आपण बदलू शकत नाही. पण एखादा प्रतिसाद नवीन लेखकाला विनाकारण हतोत्साहित करणारा वाटला, असभ्य वाटला, तर त्याचा किमान निषेध करणं आपल्या हातात असतं (तसं होतंही, अतिशय balanced विचार असणारे लोक मिपावर भरपूर आहेत.). एक सामान्य मिपाकर म्हणून प्रतिसाद देणं ही किमान गोष्ट by default आपल्या हातात आहेच आहे. 4. पुन्हा हा वैयक्तिक अनुभव म्हणा, पण मिपावर मी जेवढं लिहिलं, त्याला तथाकथित कंपू वगैरे बाजूला ठेवून लोकांनी आवर्जून प्रतिसाद दिलेले आहेत. चुकलं तिथे चांगल्या भाषेत, कधी व्यनि करून सांगितलेलं आहे. लेखमालेत लिहिताना तर प्रचंड पेशन्सने लेख नीट लिहून घेणारे मिपाकरच. सगळं काही गोग्गोड नक्कीच नाही, पण जे तसं नाही, त्यासाठी जे चांगलं आहे त्याला पण नाकारायचा प्रकार करणं मला, पुन्हा वैयक्तिकरित्या, पटत नाही. 5. मिपाचं नवीन रूप आधी पचनी पडायला जड गेलं. पण आता ते बरं वाटू लागलं आहे. जुन्याच पद्धतीने वाचू इच्छिणाऱ्यांना अजून एका क्लिकने त्या पानावर जाता येतंच की..
उ
उपयोजक Sun, 08/13/2017 - 04:30 नवीन
http://www.misalpav.com/node/34952
ध
धर्मराजमुटके Sun, 08/13/2017 - 08:42 नवीन
मला वाटतं आपण सर्वांनी काही दिवस राजकीय विषयांवर न लिहिण्याचा निर्धार केला की आपोआप वातावरण निवळेल. सध्या राजकीय चर्चांमुळेच सदस्यांमधे शत्रुत्त्व, विखार आला आहे. चातुर्मासातला एक महिना म्हणून उपवास करुन केवळ ललित, कथा, पाककृती लिहिल्या की नक्कीच वातावरण पालटेल. सध्या जुने धागे वर काढण्याचा विडा उचलला आहे.
M
mayu4u Sun, 08/13/2017 - 08:59 नवीन
राजकीय विषयांवर काही सदस्य अत्यन्त अभ्यासपूर्ण मतं मांडतात. केवळ काही जण खोडसाळपणा करतात म्हणून राजकीय विषयांवरचे धागे थांबवणं माझ्या मते योग्य नाही. ट्रॉलिंग वर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
अ
अभ्या.. Tue, 08/15/2017 - 09:03 नवीन
आपल्याला पटतात तेव्हढेच प्रतिसाद अभ्यासपूर्ण आणि बाकीच्यांचा तेवढा खोडसाळपणा असा दांभिकपणा पहिल्यांदा सोडून देणे गरजेचे आहे. एखाद्या विरोधी मताला नामोहरम करण्यासाठी कशा पध्दतीने त्या मतकर्त्यालाच म्हणायला सांसदीय पण अ‍ॅक्चुअली विषारी भाषेत टार्गेट केले जाते हे अत्यंत प्रभावी रीतीने दिसून आलेले आहे. प्रचंड शब्दांची लयलूट करत, गरज नसलेले मोठमोठे संदर्भ चिकटवून मी लै अभ्यासू विचारवंत असा आव आणायचा आणि त्यामागून पोलिटिकल अजेंडा पुढे रेटायचा हे सध्याचे राजकारणी धाग्याचे वास्तव आहे. नाण्याच्या दोन/खरेतर जास्त बाजू असतात हेच नाकारुन आपले मत, आपले इंटरेस्टस सतत गोबेल्सप्रमाणे रेटत नेल्याने थोड्याच दिवसात एकाच पक्षाचेपेक्षा एकाच विचारसरणीचे मुखपत्र असे चित्र मिपाचे बनत आहे एवढे मात्र खरे.
↩ प्रतिसाद: mayu4u
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 08/15/2017 - 10:19 नवीन
असहमत! अशा एकांगी विचारसरणीला उघडे पाडण्याचे सामर्थ्य असलेले अनेक अभ्यासू आयडी इथे आहेत. एखाद्या पक्षाच्या समर्थनार्थ टोकाची मते मांडणारे जसे आहेत तसेच विरोधी पण टोकाची मते मांडणारे आणि अत्यंत निष्पक्षपणे मते मांडणारेही आहेत. त्यामुळे मला नाही वाटत कि चर्चा अगदीच एकांगी चालतात. तसे पहायला गेले तर मिपा बदलले वगैरे आहे हेच मुळी पटत नाही. इथे अजूनही कित्येक ताकदीचे लेखक नित्यनियमाने लिहीत आहेत. नवीन येणारेही कितीतरी लेखक उत्तम लिखाण करीत आहेत. आपल्याला न आवडणारे लिखाण किंवा काथ्याकूट प्रतिसादांमुळे वरती राहतो याचा अर्थ बाकीचे लिखाण दुर्लक्षित होते हा मुद्दाच मुळी तर्कशुद्ध नाही. नको असलेले धागे दुर्लक्ष करण्याचा पर्याय मिपा आपल्याला देतच आहे. कुणाला कुठला धागा आवडतो कुणाला कुठला हे जाणून दुर्लक्ष करावे. बाकी देशात जशी अचानक असहिष्णुता जागी झाली तशी मिपावर ट्रोलिंग वगैरे पण अचानक जागृत झाली की काय असे वाटू लागले आहे.
↩ प्रतिसाद: अभ्या..
क
कपिलमुनी Tue, 08/15/2017 - 10:27 नवीन
तू अभ्या आहेस, अभ्या'सू नाहीस म्हणून तसे वाटतं असेल ;)
↩ प्रतिसाद: अभ्या..
व
विशुमित Tue, 08/15/2017 - 12:24 नवीन
+1
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
अ
अभ्या.. Tue, 08/15/2017 - 12:35 नवीन
कप्या, विशुपाटील, मापं नै काढायची हां. आमी हावो ते ठिक हावोत.
↩ प्रतिसाद: विशुमित
M
mayu4u Sun, 08/13/2017 - 09:01 नवीन
... प्रतिसादांना श्रेणी देण्याची सोय केली तर?
उ
उपयोजक Sun, 08/13/2017 - 17:02 नवीन
मिसळपाव वर लिहिण्यासाठी बरेचजण बरहाचा वापर करतात.पण बरहा शक्यतो संगणकावरच वापरता येतं.बिझी शेड्युलमुळे मग लिहायच राहून जाऊ शकतं लिहायला वेळच मिळत नाही या समस्येचं करायचं काय? हे लेखन स्मार्टफोन मधे करुन, सहज साठवून नंतर हवं तिथं कॉपी पेस्ट करता आलं तर? अशी एक अॅप आहे. Simple Notepad नावाची.फक्त 2 MB आकाराची. १) यात लेखन सहज साठवून ठेवता येतं.दीर्घ लेख ही लिहिता येतात.दुसरीकडचे कोणत्याही भाषेतील लेखन इथे कॉपी करुन ठेवता येतं. २) जुने लेख लेखाच्या नावाने,लेखनातील मजकुरातील शब्द सर्च मधे देऊन,तारखेनुसार शोधताही येतात.तारखेनुसार लेखांचं सॉर्टींगही करता येतं. ३) लेखनासाठीचा background चा wallpaper हवा तो ठेवता येतो. ४) लेखनासाठी रेघांची सोय आहे.किंवा ती नको असेल तर बंद करुन कोरे बिनरेघांचं पानही लेखनासाठी वापरता येतं. ५) यात Revert नावाचा option आहे.याचा उपयोग असा की समजा केलेल्या लेखनात तुम्ही काही बदल केलेत आणि तुम्हाला वाटलं की नाही आधीचाच मजकूर योग्य होता.तर हा option वापरुन तुम्ही तो जुना मजकूर परत आणू शकता.फक्त हे सेव्ह करण्याआधी करावे लागेल. ६) पोस्टसचा बॅकअप घेता येतो. ७) इथे न बनवलेल्या पोस्टस इथे इंपोर्ट करुन वाचता येतात.इथल्या पोस्टस मेमरी कार्डवर एक्सपोर्ट करता येतात. याची अँड्रॉईड आवृत्ती आपण खाली दिलेल्या लिंकवरुन प्राप्त करु शकता. https://play.google.com/store/apps/details?id=org.mightyfrog.android.simplenotepad या अॅपला इतरही भरपूर सेटींग्ज आहेत.
M
mayu4u Mon, 08/14/2017 - 07:26 नवीन
... docs.google.com वापरतो मी. एकच फाईल मोबाईल आणि संगणक, दोन्ही कडे सहज उघडता येते. ऑटो सेव्ह आणि सिंक असल्याने टाईपलेला मजकूर हरवायची भीती नसते.
↩ प्रतिसाद: उपयोजक
प
पैसा Sun, 08/13/2017 - 18:48 नवीन
धाग्यासाठी अभिनंदन! तुम्ही मिपावर चांगले लिखाण यावे यासाठी एवढे कळकळीने विचार करता आहात आणि प्रत्यक्ष पावले उचलत आहात यासाठीही अभिनंदन. मी मिपा प्रशासन नक्कीच नव्हे. पण मिपा आणि मायबोलीवर वावरताना माझे अनुभवातून जमा केलेले दोन पैशे.
"पूर्वीचं मिपा राहिलं नाही आता!"
ही फार जुनी आणि सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे. यावर मला असे वाटते की सदस्यसंख्या वाढत जाते तसे हौशे नवशे गवशे सगळे लोक जास्त येत रहाणार, लिहीत रहाणार. त्यात कमी जास्त दर्जाचे लिखाण येत रहाणार. मिपावर लिखाणाच्या ओढीने आलेले सदस्य आणि नवीन लहान संस्थळ असताना जास्त चांगले लिखाण असणे साहजिक आहे. अर्थात दर्जा हा प्रत्येकाच्या दृष्टीने सबजेक्टिव्ह असतो. त्याला एक सर्वसमावेशक फूटपट्टी लावता येणार नाही. जुने मिपाकर का येत नाहीत याबद्दल आपण कोणी काही बोलू शकत नाही. प्रत्येकाकडे काहीतरी कारण असेल आणि त्याच्यासाठी ते बरोबर असेल. कोणत्यातरी वैयक्तिक इश्श्यूजना बाजूला ठेवून मिपावर यावे असे त्यांना कदाचित वाटत नसेल. ओके. आता जे येत आहेत त्यांच्यात चांगले लिहिणारे नक्कीच आहेत. त्यांच्या चांगल्या लिखाणाला प्रतिसाद देणे एवढेतरी आपण करू शकतो.
काही वेळा अकारण ट्रोलिंग किंवा कंपुबाजी होते.
हेही सगळीकडे होते. माझा इंटरनेटचा अनुभव असे सांगतो की दर तीन वर्षांनी इंटरनेटची पिढी बदलते. नोकरीतल्या, संसारातल्या वाढत्या जबाबदार्‍या हे प्रमुख कारण आहे. शिवाय सगळे सवयीचे झाले की केवळ कंटाळा येणे हेही होते. नवे लोक येतात ते घाबरत येतात. काही काळात आपल्या समानशीलाचे लोक ओळखीचे होतात आणि कळत नकळत कंपू होत जातात. अशा कंपूनी त्रासदायक प्रकार करून लोकाना मिपावरून हाकलून लावलेले अक्षरशः पाहिले आहे आणि माझ्यावर हा प्रयोग केलेला पचवला देखील आहे. एक कंपू निष्प्रभ झाला की काही काळाने दुसरा तयार होतो. ज्यांच्याकडे सकारात्मक करण्यासारखे काही नसते बहुधा तेच लोक कळप करून दुसर्‍यांना त्रास देतात. या गोष्टीला कोणी कसे उत्तर द्यावे हा प्रत्येकाचा चॉईस आहे. मात्र खूप दिवस झाले एक गोष्ट पहते आहे की राजकीय विचारसरणीमुळेलोकात उभी दुफळी पडली आहे. मतभेद असतानाही सकस, निकोप चर्चा करणे शक्य असते पण लोक भांडताना अगदी नको इतके घसरतात आणि तेढ वाढत जाते. इंटरनेट म्हणजे आयुष्य नव्हे. एका धाग्यावरचे भांडण इतर धाग्यांवर घेऊन जाऊ नये हा साधा संकेत आहे. पण तो पाळावा इतके कोणीच भानावर नसते. एखादा माणूस समजा तुम्हालाआवडत नसेल पण म्हणून त्याने मिपा सोडून निघून जावे इतका त्याला त्रास देऊ नये. सगळ्या मतभेदासकट लोक राहिले तरच मिपाचे बहुरंगी रूप कायम राहील.
मिपाचं डिझाईन बदललंय.
हे कायम होत असते आणि होत रहाणार. एखादे डिझाईन सगळ्याना आवडेल किंवा कंफर्टेबल वाटेल असे सांगता येत नाही. बहुधा द्रुपल अपग्रेड होते तसे डिझाईन बदलणे आवश्यक होते.
WhatsApp किंवा अशाच सोशल ग्रुप्सवर मिपाकर गप्पा मारतात,चर्चा करतात.मग त्यांना इकडे यायला वेळच मिळत नाही.लिहिणं होत नाही.सगळं तिथेच बोलून घेतात.असाही एक मतप्रवाह आहे.
होय. हे नक्कीच होते. आणि कंपूने ठरवून लोकांना त्रास देण्याचे प्रकारही व्हॉट्स अ‍ॅपवर शिजून कार्यवाहीत येतात. तुमच्या ग्रुपवर हे होणार नाही याबाबत तुम्हाला जागरूक रहावे लागेल. व्हॉट्स अ‍ॅपवरच्या भांडणांमुळे मिपावरच्या वावरावर परिणाम झाल्याचे प्रकारही अनुभवले आहेत. याबाबतही काळजी घ्यावी लागेल. व्हॉट्स अ‍ॅपबद्दल माझे मत तुम्ही व्हॉट्स अ‍ॅप सकारात्मकरीत्या वापरून बदलू शकलात तर मलाच आवडेल.
हे सगळं तुम्ही का करताय? मिपाची काळजी घ्यायला मिपाचे चालक,मालक,संपादक मंडळ समर्थ आहे.तुम्ही का काळजी करताय मिपाची? मिपा जसं आहे तसं पुढे जाईल.मिपाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरुच आहेत.असंही विचारलं जाऊ शकतं.
मला असे वाटत नाही. मिपा जे काही आहे ते सदस्यांमुळेच आहे. आणि प्रत्येकाला जे वाटते ते बोलायचा अधिकार आहेच. त्यावर काही कार्यवाही करावी का नाही हे मालक त्यांच्या सवडीनुसार आणि रिसोर्सेसच्या उपलब्धतेनुसार ठरवतील. सामान्य सदस्य म्हणून बोलायचे तर थोडक्यात म्हणजे मिपावर यावे हा आपला चॉईस असेल. दुसर्‍या कोणाचा नव्हे. इतरांच्या वागण्याचा त्रास झाला म्हणून कोणी जर मिपा सोडून गेल्यास तो त्याच्या विरोधात असलेल्या ट्रोलांचा विजय असेल. ते का होउ द्यावे? नकारात्मक गोष्टींबद्दल तक्रार करत रहाण्यापेक्षा किंवा दुसर्‍या कोणावर राग काढण्यापेक्षा आपल्या हातात जेवढे आहे तेवढे करावे. ट्रोल धाग्यांवर सगळ्यानी बहिष्कार घालणे, चांगल्या धाग्यांवर प्रतिक्रिया देणे एवढे पथ्य प्रत्येकाने पाळले तरी पुरेसे आहे. प्रत्येकाची भाषा चांगली असावी याबद्दल मी नक्कीच आग्रही आहे. त्यावर मतभेद असू शकतात. मात्र एखाद्या सदस्याशी वागताना असेच आपल्याशी कोणी वागलेले आपल्याला आवडेल का एवढा विचार एखादी प्रतिक्रिया लिहिण्यापूर्वी नक्कीच करा.
M
mayu4u Mon, 08/14/2017 - 07:27 नवीन
विचार करायला लागेल असं लिहिलंय!
↩ प्रतिसाद: पैसा
म
मोदक Mon, 08/14/2017 - 19:39 नवीन
मात्र खूप दिवस झाले एक गोष्ट पहते आहे की राजकीय विचारसरणीमुळेलोकात उभी दुफळी पडली आहे. मतभेद असतानाही सकस, निकोप चर्चा करणे शक्य असते पण लोक भांडताना अगदी नको इतके घसरतात आणि तेढ वाढत जाते. इंटरनेट म्हणजे आयुष्य नव्हे. एका धाग्यावरचे भांडण इतर धाग्यांवर घेऊन जाऊ नये हा साधा संकेत आहे. पण तो पाळावा इतके कोणीच भानावर नसते. एखादा माणूस समजा तुम्हालाआवडत नसेल पण म्हणून त्याने मिपा सोडून निघून जावे इतका त्याला त्रास देऊ नये. सगळ्या मतभेदासकट लोक राहिले तरच मिपाचे बहुरंगी रूप कायम राहील. माझा अनुभव असा आहे की, राजकीय चर्चांमध्ये स्वतःला सोयीस्कर भूमीका घेऊन ट्रोलिंग करणारे आणि दुसर्‍या बाजूकडे कै च्या कै लॉजिक लाऊन उत्तर मागणारे लोक एखादी बाजू त्याच प्रकारे त्यांच्यावर उलटवली की प्रचंड आकांडतांडव करतात आणि विनाकारण प्रशासन, संपादक मंडळावर चिखलफेक करून सरतेशेवटी मिपा सोडून जातात.. अरे भाऊ.. तुच सुरूवात केलीस ना..? मग आता बुमरँग उलटले तर रडारड करण्यात काय अर्थ आहे..? तसेच राजकीय धाग्यांच्याच बाबतीत बोलायचे झाले तर, "आपण वापरू ती भाषा समोरच्याने चालवून घ्यावी मात्र समोरच्याने एकही वावगा शब्द उच्चारू नये" ही विलक्षण अपेक्षा अनेकांची असते. एकूण काय.. राजकीय चर्चांमुळे परस्पर संबंधांचे नुकसान होते आहेच आणि ते कसे टाळायचे ते कळत असूनही वळत का नांही हा सोपा प्रश्न विनाकारण अनुत्तरीत राहतो.
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 08/14/2017 - 20:21 नवीन
फार पूर्वी लोक आधी मिपाकर असायचे, नंतर चर्चांमध्ये आपल्या आवडीच्या भूमीकेचा पाठपुरावा करायचे. चर्चा संपली की पुन्हा गाडे मूळपदावर यायचे. आता निदान काही लोक तरी मिपावर येताना एखादा अजेंडा किंवा एखाद्या पक्षाचा झेंडा घेऊन येतात. त्यांना इतर मिपा किंवा मिपाकर, ते काय लिहितात याच्याशी देणे घेणे नसते. ते सदासर्वकाळ आपला झेंडा खांद्यावर घेऊन फिरतात. अशा वेळी एखाद्या अस्सल मिपाकरालाही वैताग येऊन त्यांना पुरे पडावेसे वाटते आणि मग न संपणारी भांडणे सुरू होतात. हाच प्रकार मायबोलीवरही झाला आहे. येणारे सगळेच एका उद्देशाने येत नसतात. हे सध्याच्या प्रचारकी पद्धतींना धरूनच घडते आहे. राजकीय पक्षांचे नेते दिवसा वाद खेळतात आणि संध्याकाळी एका गलासात पितात. आपण सामान्य लोकांनी ते सगळे किती गंभीरपणे घ्यावे हे प्रत्येकाच्या स्वभावानुसार ठरते. काही जण झक मार म्हणून सोडून देतात तर काही दुखावाले जातात, याला काही उपाय मला तरी दिसत नाही. अजेंडा घेऊन काढलेल्या धाग्यांपासून मी शक्यतो लांब रहाते, पण वेळ असेल तर शांत राहूनही लोकांचे अजेंडे उघड करता येतात.
↩ प्रतिसाद: मोदक
ट
टवाळ कार्टा Tue, 08/15/2017 - 11:07 नवीन
तर तर... i miss संक्षी
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अत्रे Mon, 08/14/2017 - 04:30 नवीन
मिपाच्या कोडर्सना एक विनंती - मिपावर प्रतिसाद एडिट करण्याची सुविधा कृपया ईनेबल करावी. माझ्या मते प्रतिसाद लिहिल्यावर किमान २ तास ही सुविधा असावी.
व
विशुमित Mon, 08/14/2017 - 11:50 नवीन
एडिट ची सुविधा पाहिजे.
↩ प्रतिसाद: अत्रे
प
पैसा Mon, 08/14/2017 - 12:46 नवीन
सुरुवातीला उपप्रतिसाद येईपर्यंत प्रतिसाद संपादित करता येत असे. मध्यंतरी द्रुपल अपग्रेडनंतर सगळे प्रतिसाद संपादित करता येऊ लागले. त्यानंतर काही लोकांनी याचा गैरफायदा घेत आपले उपप्रतिसाद आलेले सुद्धा प्रतिसाद संपादित करून त्याचा आशय बदलून "तो मी नव्हेच" अशी भूमिका घेतल्याने ही सुविधा बंद करण्यात आली.
↩ प्रतिसाद: अत्रे
क
कंजूस Mon, 08/14/2017 - 05:22 नवीन
ट्रेनमधल्या शंभर लोकांना बदलण्यापेक्षा आपणच ट्रेनचा डबा अथवा ट्रेन बदलावी.
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Mon, 08/14/2017 - 13:01 नवीन
मी नेहमीच मिपावर सकस लेखन करायचा प्रयत्न करत असतो.माझ्यासारख्या आयडींना त्रास देणारे इथे कमी नाहीत. जुन्या मिपाकरांची गरज नाही.नविन लोक येत असतात.
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 08/14/2017 - 18:40 नवीन
>>>>मी नेहमीच मिपावर सकस लेखन करायचा प्रयत्न करत असतो. हो, ते याचि देहि याची डोळा आम्ही पाहात असतो. :) >>>>>>माझ्यासारख्या आयडींना त्रास देणारे इथे कमी नाहीत. खरंय....! प्रामाणिक लोकांना नेहमीच असा त्रास सहन करावा लागतो. :) >>>>जुन्या मिपाकरांची गरज नाही. खरंय,सारखे मधे मधे येऊन फुकाचे सल्ले देऊ पाहतात. ;) >>>>नविन लोक येत असतात. मिपा जसं आहे ते उत्तम आहे म्हणूनच ''तरि तेणें अधिकें चि पान्हा फूटे'' प्रमाणे लोक येतच राहतात. :) -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा