श्रद्धेमुळे विकृती
श्रद्धेमुळे विकृती........यनावाला
................................
रविवारच्या वृत्तपत्रात -(दि.२०-मार्च-२०१६)-"नातवासह आजोबांचा अंत" ही बातमी वाचून मन सुन्न झाले. आजोबा ( सुधीर शहा,
वय ६५ वर्षें ) यांनी पहाटेच्या वेळी नातू (जिनय, १० वर्षे) याचा गळा दाबून खून केला. नंतर त्यांनी आठव्या मजल्यावरून खाली उडी टाकून आत्महत्या केली. मृत्युपूर्वीच्या पत्रात त्यांनी लिहिले., "कोर्टातील खटल्याला कंटाळून आत्महत्या करीत आहे. जिनयवर माझे खूप प्रेम आहे. त्याला बरोबर घेऊन जात आहे. "
"जिनयला माझ्याबरोबर नेत आहे." हे वाक्य त्यांच्या चिठ्ठीत दोनदा आहे.
असंभवनीय वाटणारी ही घटना सकाळी वृत्तपत्रात वाचल्यापासून डोक्यात घोळत राहिली. खटल्याला कंटाळून आत्महत्या का ? आणि लाडक्या नातवाची हत्या ? छे ! प्रतिष्ठित वृत्तपत्रात नावानिशी छापून आली म्हणून ही बातमी खरी म्हणायची. अन्यथा विश्वास बसतच नाही. आत्महत्येचा निर्णय का घेतला असेल? बहुधा सुधीर शहांची बाजू सत्याची असावी. विश्वास ठेऊन त्यांनी काही कागदांवर सह्या दिल्या असतील. प्रतिपक्षाने विश्वासघात करून त्यांच्याविरुद्ध खोटा पुरावा बनवला असेल. आपली बाजू सत्याची असूनही आपल्याला आता न्याय मिळणार नाही. हे दिसून आल्यावर सुधीर शहांना सात्त्विक संताप आला असेल. त्यांतून ,"हे जग काही सत्याचे नाही" अशी अगतिकता आली असेल म्हणून आत्महत्येचा निर्णय घेतला असेल. हे एक वेळ समजू शकते.
पण लाडक्या नातवाचा जीव जाईपर्यंत गळा का दाबला ? श्वास कोंडल्यावर त्याने जगण्यासाठी धडपड केलीच असेल. हातपाय झटकले असतील. प्रत्येक सजीवाची ही नैसर्गिक प्रेरणा असते. तरी प्रेमळ आजोबांच्या हाताची पकड सैल कशी पडली नाही ? एवढे क्रौर्य कुठून आले ? कसे आले ? कशामुळे आले ? त्या दहा वर्षांच्या मुलाला अजून खेळायचे होते. शिकायचे होते. जग समजून घ्यायचे होते. अनुभवायचे होते. कर्तृत्व दाखवायचे होते. मोठे व्हायचे होते. पण वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षीच सगळे संपले. त्याच्या आवडत्या दादाजीनींच स्वहस्ते सारे संपवले. आपले आजोबा हे असे काय करीत आहेत हे त्याला समजले नसेल. सगळेच कल्पनेच्या पलीकडचे. सकाळी वाचले ते सारे असंभवनीय, अनाकलनीय वाटत होते. पण ही घटना सत्य असणार यात शंका नव्हती. बातमी पुन्हा शांतपणे वाचली.
"जिनयवर माझे खूप प्रेम आहे. त्याला बरोबर घेऊन जात आहे." या दोन वाक्यांनी आता उलगडा झाला. स्पष्टीकरण सापडले. अनाकलनीयता संपली.
हे आजोबा आपल्या प्रिय नातवाला बरोबर घेऊन जात आहेत. ते कुठे निघाले आहेत ? मृत्युनंतर ते कुठे जाणार आहेत ? सुधीर शहा धार्मिक आहेत. देव-धर्माचे संस्कार त्यांच्या मनावर बालपणापासून बिंबवले असणार. त्यांना ठावूक आहे की मृत्युपश्चात् माणूस नरकात पडतो, किंवा स्वर्गात जातो अथवा मोक्षपदाला पोचतो. मोक्ष प्राप्त होणे दुर्मीळ. तो योगी, संन्यासी, साधु-संत यांना क्वचित् मिळतो. दुष्ट, पापी माणसे नरकात पडतात. हे शहांनी ऐकले आहे. वाचले आहे.....मी आयुष्यभर नीतीने वागलो. धर्माचरण केले. परंपरा पाळल्या. म्हणून मी स्वर्गाला जाणार. तिथे कोर्ट-कचेर्या, वकील-साक्षी-पुरावे काही नाही. शांत जीवन. केवळ सुखच सुख. पण स्वर्गात कितीही सुखे असोत. तिथे जिनयशिवाय मी राहूच शकणार नाही. त्याला बरोबर घेऊन जायला हवे. कसे न्यायचे ते ठरविले आहे. जिनय तर निरागस, निष्पाप, मुलगा आहे. त्याला स्वर्ग मिळणारच. आम्ही दोघे स्वर्गात जाणार. "हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम् ।" असे साक्षात् श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितले आहे. ते भगवद्वचन असत्य कसे असेल ? मी आणि जिनय स्वर्गात जाणार यात शंकाच नाही.
आकाशाच्या पलीकडे स्वर्गलोक आहे. तिथे नंदनवन आहे. कल्पतरूंच्या बागा आहेत. कामधेनूंची खिल्लारे आहेत. काठोकाठ भरलेले अमृताचे घट आहेत. नृत्य करणार्या अप्सरा आहेत. स्वर्गात राहाणे किती आनंददायी, किती सुखाचे असेल ! मी आणि जिनय तिथेच राहाणार. .....
असल्या स्वर्गवासावर त्यांची दृढ श्रद्धा होती. स्वर्ग संकल्पना खरी वाटत होती...स्वर्ग आहे असे धर्मग्रंथांत लिहिले आहे. साधु-संत, योगी-संन्यासी यांनी सांगितले आहे. त्यांची वाणी खोटी असूच शकत नाही. मृत्युसमयी आम्हा दोघांना काही क्षण वेदना होतील. पण पुढच्या निर्भेळ सुखासाठी ते सहन करायला हवे....
सुधीर शहा हे मध्यमवर्गीय सांसारिक गृहस्थ होते. त्यांनी व्यवसाय केला. पैसे मिळविले. आर्थिक स्थिती सुधारली. मुलाला शिक्षण दिले. ( त्यांच्याविषयी वृत्तपत्रात जे छापून आले आहे त्यावरून हे दिसते.) म्हणजे सर्वसाधारणपणे ते बुद्धिमान गृहस्थ होते. देव-धर्म-श्रद्धा आणि त्याच्याशी निगडित गोष्टी हे त्यांचे श्रद्धा-क्षेत्र होते. ते सोडता अन्य क्षेत्रांत त्यांनी स्वबुद्धी वापरून विचारपूर्वक निर्णय घेतले असणार असे दिसते.
परंतु स्वर्ग ही संकल्पना त्यांच्या श्रद्धा क्षेत्रात मोडते. अशा संकल्पनेवर विचार करताना मन श्रद्धेने लिप्त होते. (म्हणजे मनावर श्रद्धेचा लेप चढतो). भावना प्रबळ होते. त्यामुळे बुद्धी पांगळी होते. ती तर्कशुद्ध विचार करू शकत नाही.....मृत्युनंतर आमच्या दोघांच्या (आजोबा आणि नातू) शरीरांचे दहन होईल. मग हे देह परत कसे मिळतील.? शरीरे नसतील तर स्वर्गात आम्ही कोणत्या स्वरूपात राहाणार ? एकमेकांना कसे ओळखणार ? कसे बोलणार ? देह नसतील तर स्वर्गातील सुखे कशी उपभोगणार? अशा शंका बुद्धीत उद्भवतच नाहीत. त्यामुळे आम्ही दोघे आहोत तसेच स्वर्गात जाणार. हे त्यानी गृहीत धरले. परगावी किंवा परदेशी नाही का जात? तसेच स्वर्गात जायचे. त्यामुळे "जिनयला बरोबर घेऊन जात आहे." असे वाक्य त्यांनी सहजतेने लिहिले. याप्रमाणे बुद्धी बाजूला पडून श्रद्धेच्या प्रभावाखाली निर्णय होतो. त्यामुळे प्रिय नातवाचा खून आणि आत्महत्या या गोष्टी अगदी योग्य किंबहुना आवश्यक वाटतात. त्याप्रमाणे कृती घडते.
काही दिवसांपूर्वी "क्रौर्याची परिसीमा " या शीर्षकाखाली छापून आलेली बातमी अशाच स्वरूपाची होती.
हस्नाईल वरेकर (वय ३५ वर्षे) याने आपले आई-वडील, पत्नी, मुले, बहिणी, त्यांची मुले अशा चौदा जणांचे गळे चिरून त्यांना ठार केले आणि स्वत: आत्महत्या केली. एवढे क्रूर कृत्य का घडले ? त्याची वैयक्तिक अथवा कौटुंबिक अशी कितीही गंभीर समस्या असती तर त्यातून सुटका करून घेण्यासाठी त्याने केवळ आत्महत्या केली असती. इतरांना मारले नसते. स्वत:च्या चार महिन्यांच्या मुलीचा गळा चिरला नसता. काही जण म्हणतील की तो वेडा झाला होता. एका अर्थी हे खरे असले तरी वेडाच्या झटक्यात केलेले हे कृत्य नव्हे. सगळे पूर्व नियोजित होते. जेवणाचा कार्यक्रम ठरवला. बहिणींना मुलांसह येण्याचे आमंत्रण दिले. मेव्हण्यांना बोलावले नाही. ते हस्नाईलचे रक्ताचे नातेवाईक नव्हते. पत्नीशी रक्ताचे नसले तरी प्रेमाचे नाते असते. तसेच चार महिन्यांच्या मुलीला स्वर्गात बघणार कोण ? दूध कोण पाजणार? असाही विचार असू शकतो.
सुधीर शहांची जशी दृढ समजूत होती की ते आणि नातू स्वर्गात जाणार, तशीच हस्नाईलची ठाम कल्पना होती की आम्ही सर्वजण स्वर्गात जाणारच. तिथे गेल्यावर कुठली अडचण उरणारच नाही. स्वर्गात सगळ्यांना सुख मिळेल.आकाशाच्या मागे स्वर्ग आहे, असे त्याने अनेक मुल्ला-मौलवींकडून ऐकले होते. कुराणात तसेच लिहिले असणार अशी त्याची श्रद्धा होती. स्वर्गाविषयींच्या अनेक गोष्टी त्याने चित्रपटात पाहिल्या होत्या. गाण्यांत ऐकल्या होत्या. धर्मावर श्रद्धा असेल तर स्वर्गाच्या अस्तित्वावर श्रद्धा ठेवलीच पाहिजे.
हस्नाईल या भ्रामक स्वर्गकल्पनेच्या पूर्णतया आहारी गेला होता. त्याला कळत होते की कोणी सगे-सोयरे सर्व मृत शरीरांचे दफन करतील. मूठमाती देतील. आम्हा सर्वांचे मृत देह कबरस्थानात मातीखाली असतील. ..ते जिवंत होऊन स्वर्गात कसे येतील ? असा विचार त्याची बुद्धी करीत नाही. कारण स्वर्गाविषयीच्या श्रद्धेमुळे ती लुळी पडलेली असते. पवित्र ग्रंथातील वचने सत्यच असणार. त्यांविषयी शंका घेणे पाप आहे असे तो मानतो. आम्ही सगळे तिथे भेटणार. स्वर्गात सुखाने राहणार. असेच त्याला वाटत राहाते. त्यामुळे चौदा जणांचे गळे तो सहजतेने चिरतो. आपण काही वाईट कृत्य करतो आहोत असे त्याला वाटतच नाही. स्वर्गात जाणे वाईट कसे असेल ? मी जे करतो आहे ते या सर्वांच्या भल्यासाठी आहे. अशीच त्याची समजूत असते.
आत्मघातकी आतंकवाद्यांची धर्मश्रद्धा अशीच अतूट असते. त्यांना वाटते आपण धर्माची आज्ञा पाळत आहो. देवाच्या मनात आहे ते करीत आहो. हे पवित्र धर्मकार्य करताना मृत्यू येणार. मग आपण स्वर्गात जाणारच. तिथे सर्व सुखे आपली वाट पाहात आहेत. या भ्रामक श्रद्धेमुळे ते मरणाला सामोरे जातात. आपला मुलगा देवा-धर्माच्या पवित्र कार्यासाठी शहीद होणार. त्याच्यावर अल्लाची कृपा होणार. तो स्वर्गात जाणार . तिथे तो इथल्यापेक्षा अधिक सुखात रहाणार. अशी त्याच्या पालकांचीही श्रद्धा असते. त्यामुळे ते या आत्मघातकी प्रकाराला विरोध करीत नाहीत. "आतंकवाद्याला धर्म नसतो." हे विधान भोंगळ आहे. आतंकवादी नखशिखान्त धार्मिक असतो. आतंकाची प्रेरणा त्याला धर्मामुळेच मिळते. प्रत्येक सजीवाची नैसर्गिक प्रेरणा अधिकाधिक जगण्याची असते..
श्रद्धेमुळे घडणार्या अशा विकृत भयानक घटनांच्या बातम्या अधून-मधून येतच असतात. दहा-पंधरा वर्षांपूर्वी वाचलेली एक विलक्षण बातमी लक्षात राहिली. थोडक्यात गोष्ट अशी:
दादा आणि बाबू हे दोन भाऊ म्हणजे राम-लक्ष्मणाची जोडी. परस्परांवर खूप प्रेम. त्यांचे तीन बैल. त्यांतील राजा बैलाचा दोघांनाही फार लळा. आधी स्वत:च्या हाताने राजाला हिरवा चारा भरवल्याविना दादा जेवत नसे. दादाचे सर्पदंशाने अकाली निधन झाले. बाबू व्याकूळ, सैर-भैर झाला. एके दिवशीं तो राजा बैलाच्या मानेवर कुर्हाडीने घाव घालू लागला. हंबरडा ऐकून लोक धावून आले. तोवर राजा मरणासन्न अवस्थेत पोचला होता. "तू हे असे का केलेस ?" हा प्रश्न विचारल्यावर बाबू म्हणाला," गेले दोन दिवस दादा माझ्या स्वप्नात येत होता. त्याने सांगितले की तिथे स्वर्गात सगळी सुखे आहेत. पण त्याला राजाची सतत आठवण येते. त्याच्यावाचून चैन पडत नाही. " त्यावर विचार केला आणि राजाला मारले. त्याच्यासारखे गुणी जनावर आता स्वर्गातच जाईल. तिथे दादाला भेटेल. दादाला खूप आनंद होईल. दादाला पाहून राजाही खुष होईल."
अशी ही श्रद्धा. इथे हा मरून पडलेला बैल देहासह स्वर्गात कसा जाईल ? अशी शंका त्याच्या मनाला शिवतसुद्धा नाही. माणसाचे मन श्रद्धेने लिप्त झाले की त्याची बुद्धी पंगू होते हेच खरे.
कोणी म्हणतील अशा दु:खद घटनांवर का लिहावे.? त्यांवर कायमचा पडदा टाकणे योग्य नव्हे काय ?
या सत्य गोष्टी आहेत. काल्पनिक नव्हेत. अशा घटनांचे सर्वांगांनी विश्लेषण व्हायला हवे. कारणमीमांसा करायला हवी. ती बुद्धीला पटली तर त्यानुसार आपल्या कल्पना, विचार- आचार यांत योग्य ते बदल करायला हवेत. चुकीच्या, हानिकारक समजुतींचा त्याग करायला हवा. समाजस्वास्थ्यासाठी हे आवश्यक आहे. असे मला वाटते. या तीन हृदयद्रावक घटनांवर साकल्याने, तर्कसंगत विचार करता वर लिहिलेल्या कारणमीमांसेपेक्षा अधिक समर्पक स्पष्टीकरण मला सुचत नाही. कोणी निदर्शनाला आणून दिल्यास ते मान्य करीन.
सर्वसामान्यपणे माणूस आपल्या प्रिय व्यक्तींची आत्महत्या करण्यापूर्वी हत्या करतो, आणि त्याचे कारण त्यांनी म्रुत्युपश्चात आपली सोबत करावी हे नसून माझ्या माघारी त्यांना संकटांचा सामना करावा लागू नये असे असते.हाच तर्क बरोबर वाटतो. शहांच्या घरातील परिस्थिती आपल्याला माहित नाही, त्यांची मानसिक स्थिती माहित नाही. उगाच एखाद्या दुर्दैवी घटनेचा आपल्याला सोयीस्कर अर्थ कशाला काढावा? खाली या प्रतिसादात अॅमी म्हणतात तसे सामूहिक धार्मिक आत्महत्या, जिहाद, नरबळी वगैरेवर निशाणा साधला असतात तर बहुतांशी सर्वांनी सहमती दर्शवली असती. पण या लेखात मात्र तुम्ही सगळंच गृहीत धरून लिहीत आहात.याचे उत्तर" स्वर्गात" असेच असू शकते- एवढीच पापपुण्याची भीती असती तर त्या भीतीने त्यांनी हत्या केली नसती ना? कारण श्रद्धाळूंच्या समजुतीप्रमाणे हत्या हे पाप आहे आणि पापी लोक नरकात जातात. आपल्या एवढ्या लाडक्या नातवाला ते कशाला नरकात घेऊन जातील?प्रत्येकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहेचहा मानभावीपणा म्हणावा का? एखाद्याला देव मानावासा वाटणे, रोज देवळात जावेसे वाटणे किंवा देवाची स्तोत्रे/ मंत्र म्हणावेसे वाटणे हे त्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का? आणि तुम्ही अश्या लोकांना बेअक्कल, मती भ्रष्ट झालेले म्हणता, त्यांनी श्रद्धा ठेवणे सोडून द्यावे म्हणता ही त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी म्हणायला पाहिजे.तुमच्या पहिल्या उदाहरणातली श्रद्धा मुर्खपणाचे लक्षण नाही. प्रेम, करूणा, जिव्हाळा या उदात्त भावनांचेच ते प्रकटीकरण आहे.आता आईविषयीच्या याच भावना एखाद्या आईला कधीही न पाहिलेल्या मुलामध्ये सुद्धा असू शकतात. त्या मुलाचे वडील किंवा आजी आजोबा आईविषयी जे सांगतात त्यावरून त्या मुलाच्या मनात एक प्रतिमा निर्माण होते आणि जरी आईला बघितलं नसेल, तिचा स्पर्श आठवत नसेल तरी त्या मुलाची मात्र आई आपल्या जवळपास आहे आणि थोडं आपल्या पाठीशी आहे अशी गाढ श्रद्धा असते. हे श्रद्धेचं उदात्त रूप झालं. आता जेव्हा प्रेम या उदात्त भावनेचं विकृतीकरण होते, तेव्हा मग आईचा मृतदेह दाहसंस्कार न करता घरातच ठेवणारे पण लोक आहेत. थोडक्यात सांगायचं उद्देश असा की भावनेचा अतिरेक झाला की विकृतीकडे वाटचाल होते. मग प्रेम असो वा श्रद्धा.तुम्ही त्यांना महामुर्ख म्हणतामी त्यांना कधीच महामूर्ख काय दुसरा कुठलाही अपशब्द वापरलेला नाहीये. असल्यास दाखवून द्यावा, मी बिनशर्त सपशेल माफी मागेन. या उलट मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही त्यांचे सगळे लेख, धागे, (जे काही देतात ते) प्रतिसाद वाचावेत. ते प्रतिसाद देत नाहीत किंवा सोयीस्कर प्रतिसाद देतात असा माझ्यासकट बरेच जणांचा आक्षेप आहे. जिथे त्यांच्या विरोधी मते मांडली जातात किंवा प्रश्न विचारले जातात तिथे प्रतिसाद देत नाहीत, त्यामुळे तुम्ही म्हणताय तशी चर्चा करणे शक्य नाही.माझ्या मते, तुम्हाला अभिव्यक्ति करण्यापासून रोखणे म्हणजे तुमचा जो व्यक्त होण्याचा न्याय्य हक्क आहे तो बजावण्यापासून रोखणे. यनावाला ढीग सांगतील देवळात जाऊ नका, पण ते थोडेच एन्फोर्सर आहेत या हक्काचे? तो हक्क तुम्हाला यनावाला देत नाहीत तद्वत ते काढूनही घेत नाहीत, घेऊ शकत नाहीत. ते जास्तीत जास्त तसे सांगू शकतात, त्यांचे न ऐकणार्यांचा निषेध करू शकतात. माझ्या मते ती अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी नाही.एखाद्याला चारचौघात त्याच्या श्रद्धेवरून बोलणे, हेटाळणी करणे, मूर्ख, बिनडोक, बुद्धी गहाण ठेवलेले म्हणणे हे फक्त निषेध व्यक्त करणे आहे का? मानसिकरित्या अस्थिर असलेल्या व्यक्तीने केलेल्या कृत्यावरून समस्त श्रद्धावान लोकांना विकृत ठरवणे हे निषेध वाक्य करणे आहे का? त्यांना जसे हे बोलण्याचे स्वातंत्र्य आहे तसेच इतरांना देवावर श्रद्धा ठेवण्याचे, देवळात जाण्याचे स्वातंत्र्य का नसावे? त्यांच्या या लेखात इतर लोक त्यांच्या नास्तिकते विषयी बोलतात म्हणून आक्षेप घेतात पण मग इतके लेख लिहून ते आस्तिकांना दूषणे देतात त्याचं काय? बादवे - एक मुद्दा स्पष्ट करतो मी आस्तिक नाही. रोज किंवा एखाद्या ठराविक दिवशी मी देवळात रांग लावून दर्शन घेत नाही. रोज मंत्र, स्तोत्र ई म्हणतो असेही नाही. उपास करणे मला झेपत नाही. पण म्हणून जर कोणी हे करत असेल तर माझा काही आक्षेप नसतो. अगदी माझी बायको, मुली हे करायला लागल्या तरी माझा काही आक्षेप नसेल. पण नवरात्राचे ९ दिवस निर्जळी उपास किंवा बाकी कामं सोडून देव देव करायला लागल्या तर नक्कीच आक्षेप घेईन. त्या उप्पर कोणा बाबा बुवाच्या नादी लागणार नाहीत याची दक्षता आधीच घेईन.नातू काही पोरका नव्हता. त्याचे आई-वडील होतेआईवडीलांचे परस्पर संबंध बिघडलेले असू शकतात किंवा ते त्या मुलाकडे लक्ष देतात की नाही या संबंधी तुम्हाला काही माहिती आहे का? या सारखेच अजूनही काही पैलू असू शकतात हे तुम्ही का लक्षात का घेतलं नाही? हस्नैल वरेकरच्या बाबतीत तो घरातला कर्ता पुरुष असू शकतो. त्यामुळे आपल्या नंतर आपल्या कुटुंबाचे कसे होणार याची काळजी त्याला वाटत असेल तर ते स्वाभाविक आहे.