Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

श्रद्धेमुळे विकृती

य
यनावाला
Fri, 12/01/2017 - 16:37
🗣 97 प्रतिसाद
श्रद्धेमुळे विकृती........यनावाला ................................ रविवारच्या वृत्तपत्रात -(दि.२०-मार्च-२०१६)-"नातवासह आजोबांचा अंत" ही बातमी वाचून मन सुन्न झाले. आजोबा ( सुधीर शहा, वय ६५ वर्षें ) यांनी पहाटेच्या वेळी नातू (जिनय, १० वर्षे) याचा गळा दाबून खून केला. नंतर त्यांनी आठव्या मजल्यावरून खाली उडी टाकून आत्महत्या केली. मृत्युपूर्वीच्या पत्रात त्यांनी लिहिले., "कोर्टातील खटल्याला कंटाळून आत्महत्या करीत आहे. जिनयवर माझे खूप प्रेम आहे. त्याला बरोबर घेऊन जात आहे. " "जिनयला माझ्याबरोबर नेत आहे." हे वाक्य त्यांच्या चिठ्ठीत दोनदा आहे. असंभवनीय वाटणारी ही घटना सकाळी वृत्तपत्रात वाचल्यापासून डोक्यात घोळत राहिली. खटल्याला कंटाळून आत्महत्या का ? आणि लाडक्या नातवाची हत्या ? छे ! प्रतिष्ठित वृत्तपत्रात नावानिशी छापून आली म्हणून ही बातमी खरी म्हणायची. अन्यथा विश्वास बसतच नाही. आत्महत्येचा निर्णय का घेतला असेल? बहुधा सुधीर शहांची बाजू सत्याची असावी. विश्वास ठेऊन त्यांनी काही कागदांवर सह्या दिल्या असतील. प्रतिपक्षाने विश्वासघात करून त्यांच्याविरुद्ध खोटा पुरावा बनवला असेल. आपली बाजू सत्याची असूनही आपल्याला आता न्याय मिळणार नाही. हे दिसून आल्यावर सुधीर शहांना सात्त्विक संताप आला असेल. त्यांतून ,"हे जग काही सत्याचे नाही" अशी अगतिकता आली असेल म्हणून आत्महत्येचा निर्णय घेतला असेल. हे एक वेळ समजू शकते. पण लाडक्या नातवाचा जीव जाईपर्यंत गळा का दाबला ? श्वास कोंडल्यावर त्याने जगण्यासाठी धडपड केलीच असेल. हातपाय झटकले असतील. प्रत्येक सजीवाची ही नैसर्गिक प्रेरणा असते. तरी प्रेमळ आजोबांच्या हाताची पकड सैल कशी पडली नाही ? एवढे क्रौर्य कुठून आले ? कसे आले ? कशामुळे आले ? त्या दहा वर्षांच्या मुलाला अजून खेळायचे होते. शिकायचे होते. जग समजून घ्यायचे होते. अनुभवायचे होते. कर्तृत्व दाखवायचे होते. मोठे व्हायचे होते. पण वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षीच सगळे संपले. त्याच्या आवडत्या दादाजीनींच स्वहस्ते सारे संपवले. आपले आजोबा हे असे काय करीत आहेत हे त्याला समजले नसेल. सगळेच कल्पनेच्या पलीकडचे. सकाळी वाचले ते सारे असंभवनीय, अनाकलनीय वाटत होते. पण ही घटना सत्य असणार यात शंका नव्हती. बातमी पुन्हा शांतपणे वाचली. "जिनयवर माझे खूप प्रेम आहे. त्याला बरोबर घेऊन जात आहे." या दोन वाक्यांनी आता उलगडा झाला. स्पष्टीकरण सापडले. अनाकलनीयता संपली. हे आजोबा आपल्या प्रिय नातवाला बरोबर घेऊन जात आहेत. ते कुठे निघाले आहेत ? मृत्युनंतर ते कुठे जाणार आहेत ? सुधीर शहा धार्मिक आहेत. देव-धर्माचे संस्कार त्यांच्या मनावर बालपणापासून बिंबवले असणार. त्यांना ठावूक आहे की मृत्युपश्चात् माणूस नरकात पडतो, किंवा स्वर्गात जातो अथवा मोक्षपदाला पोचतो. मोक्ष प्राप्त होणे दुर्मीळ. तो योगी, संन्यासी, साधु-संत यांना क्वचित् मिळतो. दुष्ट, पापी माणसे नरकात पडतात. हे शहांनी ऐकले आहे. वाचले आहे.....मी आयुष्यभर नीतीने वागलो. धर्माचरण केले. परंपरा पाळल्या. म्हणून मी स्वर्गाला जाणार. तिथे कोर्ट-कचेर्‍या, वकील-साक्षी-पुरावे काही नाही. शांत जीवन. केवळ सुखच सुख. पण स्वर्गात कितीही सुखे असोत. तिथे जिनयशिवाय मी राहूच शकणार नाही. त्याला बरोबर घेऊन जायला हवे. कसे न्यायचे ते ठरविले आहे. जिनय तर निरागस, निष्पाप, मुलगा आहे. त्याला स्वर्ग मिळणारच. आम्ही दोघे स्वर्गात जाणार. "हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम् ।" असे साक्षात् श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितले आहे. ते भगवद्वचन असत्य कसे असेल ? मी आणि जिनय स्वर्गात जाणार यात शंकाच नाही. आकाशाच्या पलीकडे स्वर्गलोक आहे. तिथे नंदनवन आहे. कल्पतरूंच्या बागा आहेत. कामधेनूंची खिल्लारे आहेत. काठोकाठ भरलेले अमृताचे घट आहेत. नृत्य करणार्‍या अप्सरा आहेत. स्वर्गात राहाणे किती आनंददायी, किती सुखाचे असेल ! मी आणि जिनय तिथेच राहाणार. ..... असल्या स्वर्गवासावर त्यांची दृढ श्रद्धा होती. स्वर्ग संकल्पना खरी वाटत होती...स्वर्ग आहे असे धर्मग्रंथांत लिहिले आहे. साधु-संत, योगी-संन्यासी यांनी सांगितले आहे. त्यांची वाणी खोटी असूच शकत नाही. मृत्युसमयी आम्हा दोघांना काही क्षण वेदना होतील. पण पुढच्या निर्भेळ सुखासाठी ते सहन करायला हवे.... सुधीर शहा हे मध्यमवर्गीय सांसारिक गृहस्थ होते. त्यांनी व्यवसाय केला. पैसे मिळविले. आर्थिक स्थिती सुधारली. मुलाला शिक्षण दिले. ( त्यांच्याविषयी वृत्तपत्रात जे छापून आले आहे त्यावरून हे दिसते.) म्हणजे सर्वसाधारणपणे ते बुद्धिमान गृहस्थ होते. देव-धर्म-श्रद्धा आणि त्याच्याशी निगडित गोष्टी हे त्यांचे श्रद्धा-क्षेत्र होते. ते सोडता अन्य क्षेत्रांत त्यांनी स्वबुद्धी वापरून विचारपूर्वक निर्णय घेतले असणार असे दिसते. परंतु स्वर्ग ही संकल्पना त्यांच्या श्रद्धा क्षेत्रात मोडते. अशा संकल्पनेवर विचार करताना मन श्रद्धेने लिप्त होते. (म्हणजे मनावर श्रद्धेचा लेप चढतो). भावना प्रबळ होते. त्यामुळे बुद्धी पांगळी होते. ती तर्कशुद्ध विचार करू शकत नाही.....मृत्युनंतर आमच्या दोघांच्या (आजोबा आणि नातू) शरीरांचे दहन होईल. मग हे देह परत कसे मिळतील.? शरीरे नसतील तर स्वर्गात आम्ही कोणत्या स्वरूपात राहाणार ? एकमेकांना कसे ओळखणार ? कसे बोलणार ? देह नसतील तर स्वर्गातील सुखे कशी उपभोगणार? अशा शंका बुद्धीत उद्भवतच नाहीत. त्यामुळे आम्ही दोघे आहोत तसेच स्वर्गात जाणार. हे त्यानी गृहीत धरले. परगावी किंवा परदेशी नाही का जात? तसेच स्वर्गात जायचे. त्यामुळे "जिनयला बरोबर घेऊन जात आहे." असे वाक्य त्यांनी सहजतेने लिहिले. याप्रमाणे बुद्धी बाजूला पडून श्रद्धेच्या प्रभावाखाली निर्णय होतो. त्यामुळे प्रिय नातवाचा खून आणि आत्महत्या या गोष्टी अगदी योग्य किंबहुना आवश्यक वाटतात. त्याप्रमाणे कृती घडते. काही दिवसांपूर्वी "क्रौर्याची परिसीमा " या शीर्षकाखाली छापून आलेली बातमी अशाच स्वरूपाची होती. हस्‍नाईल वरेकर (वय ३५ वर्षे) याने आपले आई-वडील, पत्‍नी, मुले, बहिणी, त्यांची मुले अशा चौदा जणांचे गळे चिरून त्यांना ठार केले आणि स्वत: आत्महत्या केली. एवढे क्रूर कृत्य का घडले ? त्याची वैयक्तिक अथवा कौटुंबिक अशी कितीही गंभीर समस्या असती तर त्यातून सुटका करून घेण्यासाठी त्याने केवळ आत्महत्या केली असती. इतरांना मारले नसते. स्वत:च्या चार महिन्यांच्या मुलीचा गळा चिरला नसता. काही जण म्हणतील की तो वेडा झाला होता. एका अर्थी हे खरे असले तरी वेडाच्या झटक्यात केलेले हे कृत्य नव्हे. सगळे पूर्व नियोजित होते. जेवणाचा कार्यक्रम ठरवला. बहिणींना मुलांसह येण्याचे आमंत्रण दिले. मेव्हण्यांना बोलावले नाही. ते हस्नाईलचे रक्ताचे नातेवाईक नव्हते. पत्‍नीशी रक्ताचे नसले तरी प्रेमाचे नाते असते. तसेच चार महिन्यांच्या मुलीला स्वर्गात बघणार कोण ? दूध कोण पाजणार? असाही विचार असू शकतो. सुधीर शहांची जशी दृढ समजूत होती की ते आणि नातू स्वर्गात जाणार, तशीच हस्‍नाईलची ठाम कल्पना होती की आम्ही सर्वजण स्वर्गात जाणारच. तिथे गेल्यावर कुठली अडचण उरणारच नाही. स्वर्गात सगळ्यांना सुख मिळेल.आकाशाच्या मागे स्वर्ग आहे, असे त्याने अनेक मुल्ला-मौलवींकडून ऐकले होते. कुराणात तसेच लिहिले असणार अशी त्याची श्रद्धा होती. स्वर्गाविषयींच्या अनेक गोष्टी त्याने चित्रपटात पाहिल्या होत्या. गाण्यांत ऐकल्या होत्या. धर्मावर श्रद्धा असेल तर स्वर्गाच्या अस्तित्वावर श्रद्धा ठेवलीच पाहिजे. हस्‍नाईल या भ्रामक स्वर्गकल्पनेच्या पूर्णतया आहारी गेला होता. त्याला कळत होते की कोणी सगे-सोयरे सर्व मृत शरीरांचे दफन करतील. मूठमाती देतील. आम्हा सर्वांचे मृत देह कबरस्थानात मातीखाली असतील. ..ते जिवंत होऊन स्वर्गात कसे येतील ? असा विचार त्याची बुद्धी करीत नाही. कारण स्वर्गाविषयीच्या श्रद्धेमुळे ती लुळी पडलेली असते. पवित्र ग्रंथातील वचने सत्यच असणार. त्यांविषयी शंका घेणे पाप आहे असे तो मानतो. आम्ही सगळे तिथे भेटणार. स्वर्गात सुखाने राहणार. असेच त्याला वाटत राहाते. त्यामुळे चौदा जणांचे गळे तो सहजतेने चिरतो. आपण काही वाईट कृत्य करतो आहोत असे त्याला वाटतच नाही. स्वर्गात जाणे वाईट कसे असेल ? मी जे करतो आहे ते या सर्वांच्या भल्यासाठी आहे. अशीच त्याची समजूत असते. आत्मघातकी आतंकवाद्यांची धर्मश्रद्धा अशीच अतूट असते. त्यांना वाटते आपण धर्माची आज्ञा पाळत आहो. देवाच्या मनात आहे ते करीत आहो. हे पवित्र धर्मकार्य करताना मृत्यू येणार. मग आपण स्वर्गात जाणारच. तिथे सर्व सुखे आपली वाट पाहात आहेत. या भ्रामक श्रद्धेमुळे ते मरणाला सामोरे जातात. आपला मुलगा देवा-धर्माच्या पवित्र कार्यासाठी शहीद होणार. त्याच्यावर अल्लाची कृपा होणार. तो स्वर्गात जाणार . तिथे तो इथल्यापेक्षा अधिक सुखात रहाणार. अशी त्याच्या पालकांचीही श्रद्धा असते. त्यामुळे ते या आत्मघातकी प्रकाराला विरोध करीत नाहीत. "आतंकवाद्याला धर्म नसतो." हे विधान भोंगळ आहे. आतंकवादी नखशिखान्त धार्मिक असतो. आतंकाची प्रेरणा त्याला धर्मामुळेच मिळते. प्रत्येक सजीवाची नैसर्गिक प्रेरणा अधिकाधिक जगण्याची असते.. श्रद्धेमुळे घडणार्‍या अशा विकृत भयानक घटनांच्या बातम्या अधून-मधून येतच असतात. दहा-पंधरा वर्षांपूर्वी वाचलेली एक विलक्षण बातमी लक्षात राहिली. थोडक्यात गोष्ट अशी: दादा आणि बाबू हे दोन भाऊ म्हणजे राम-लक्ष्मणाची जोडी. परस्परांवर खूप प्रेम. त्यांचे तीन बैल. त्यांतील राजा बैलाचा दोघांनाही फार लळा. आधी स्वत:च्या हाताने राजाला हिरवा चारा भरवल्याविना दादा जेवत नसे. दादाचे सर्पदंशाने अकाली निधन झाले. बाबू व्याकूळ, सैर-भैर झाला. एके दिवशीं तो राजा बैलाच्या मानेवर कुर्‍हाडीने घाव घालू लागला. हंबरडा ऐकून लोक धावून आले. तोवर राजा मरणासन्न अवस्थेत पोचला होता. "तू हे असे का केलेस ?" हा प्रश्न विचारल्यावर बाबू म्हणाला," गेले दोन दिवस दादा माझ्या स्वप्नात येत होता. त्याने सांगितले की तिथे स्वर्गात सगळी सुखे आहेत. पण त्याला राजाची सतत आठवण येते. त्याच्यावाचून चैन पडत नाही. " त्यावर विचार केला आणि राजाला मारले. त्याच्यासारखे गुणी जनावर आता स्वर्गातच जाईल. तिथे दादाला भेटेल. दादाला खूप आनंद होईल. दादाला पाहून राजाही खुष होईल." अशी ही श्रद्धा. इथे हा मरून पडलेला बैल देहासह स्वर्गात कसा जाईल ? अशी शंका त्याच्या मनाला शिवतसुद्धा नाही. माणसाचे मन श्रद्धेने लिप्त झाले की त्याची बुद्धी पंगू होते हेच खरे. कोणी म्हणतील अशा दु:खद घटनांवर का लिहावे.? त्यांवर कायमचा पडदा टाकणे योग्य नव्हे काय ? या सत्य गोष्टी आहेत. काल्पनिक नव्हेत. अशा घटनांचे सर्वांगांनी विश्लेषण व्हायला हवे. कारणमीमांसा करायला हवी. ती बुद्धीला पटली तर त्यानुसार आपल्या कल्पना, विचार- आचार यांत योग्य ते बदल करायला हवेत. चुकीच्या, हानिकारक समजुतींचा त्याग करायला हवा. समाजस्वास्थ्यासाठी हे आवश्यक आहे. असे मला वाटते. या तीन हृदयद्रावक घटनांवर साकल्याने, तर्कसंगत विचार करता वर लिहिलेल्या कारणमीमांसेपेक्षा अधिक समर्पक स्पष्टीकरण मला सुचत नाही. कोणी निदर्शनाला आणून दिल्यास ते मान्य करीन.
वर्गीकरण
काथ्याकूट

प्रतिक्रिया द्या
33613 वाचन

💬 प्रतिसाद (97)
म
महेश हतोळकर Mon, 12/04/2017 - 08:46 नवीन
तुमचा लेख पटला(संपूर्ण नाही पण गाभा पटला)
सांप्रतकाळी सर्व जगत् अशाच एका "श्रद्धेमुळे विकृती"च्या संकटाचा सामना करत आहे. फक्त "ते" नेत नाहीत तर पाठवतात आणि स्वतः जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पुंबा Mon, 12/04/2017 - 06:45 नवीन
या सत्य गोष्टी आहेत. काल्पनिक नव्हेत. अशा घटनांचे सर्वांगांनी विश्लेषण व्हायला हवे. कारणमीमांसा करायला हवी. ती बुद्धीला पटली तर त्यानुसार आपल्या कल्पना, विचार- आचार यांत योग्य ते बदल करायला हवेत. चुकीच्या, हानिकारक समजुतींचा त्याग करायला हवा. समाजस्वास्थ्यासाठी हे आवश्यक आहे. असे मला वाटते.
+१११ असे विश्लेषण सर्व बाजूने व्हायला हवे. वाद विवाद व्हायलाच हवेत. सश्रद्धांनी सुद्धा यनावालांना झोडपणे एवढेच ध्येय न ठेवता त्यांच्या धाग्यावर साधक बाधक चर्चा, तार्किक वाद झडावा असे प्रयत्न करावेत असे माझे वै. म.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 12/04/2017 - 08:17 नवीन
यनावालांनी देखील सरसकटपणे सर्व सश्रद्धांना झोडपणे सोडले पाहिजे. आम्ही पण त्यांना झोडपणे सोडू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
प्रकाश घाटपांडे Tue, 12/05/2017 - 04:58 नवीन
तो त्यांचा पिंड नव्हे! सश्रद्धांना झोडपणे हा त्यांच्या प्रबोधनाचा भाग आहे.ते म्हणतील तुम्ही आम्हाला झोडपले तरी चालेल पण आम्ही सश्रद्धांना झोडपणार. कारण आमच्या प्रबोधनाला तुम्ही झोडपणे म्हणता त्याला आम्ही काय करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Tue, 12/05/2017 - 05:17 नवीन
झोडपणे आणि प्रबोधन यात फरक आहे.. समोरच्याच्या वागण्यातील विसंगती नेमक्या शब्दात दाखवून त्याला विचार करायला प्रवृत्त करणे म्हणजे प्रबोधन. प्रबोधन करणारा नेहमी चर्चेला तयार असतो, कारण तो आपल्याला समोरच्यापेक्षा उच्च मनात नाही समोरच्याच्या वागण्याचा कशाशीही बादरायण संबंध जोडून तलवारबाजी करणे याला झोडपणे म्हणतात. त्यांनी तालावर काढली तर आम्हाला पण तलवार काढण्याशिवाय पर्याय नाही.. यनावालांचे मागचे दोन लेख वाचले तर हे सहज लक्षात येईल की ते काही अपवादात्मक घटनांचा आधार घेऊन सरसकट सगळ्यांना झोडपतायत.. त्याला तुम्हाला प्रबोधन म्हणायचे असेल तर म्हणा बापडे.. अजून एक अंधश्रद्धा, दुसरे काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Tue, 12/05/2017 - 05:56 नवीन
तुमच्या दृष्टीने असलेले झोडपणे हे त्यांच्या दृष्टीने डोळ्यात अंजन घालणे कि जो प्रबोधनाचा भाग आहे अशी ती गोष्ट आहे. त्यांचे पुर्वी उपक्रमावर भरपूर लेख आले आहेत अंगारकी चतुर्थी http://mr.upakram.org/node/3844 गॅस गणराज http://mr.upakram.org/node/3941 गुरुविण कोण लावितो वाट http://mr.upakram.org/node/3789 विवेकवाद अध्यात्म आणि आत्मघात http://mr.upakram.org/node/3719 कपिलाश्रमातील घृतोत्पादन प्रकल्प http://mr.upakram.org/node/3665 नरसोबाच्या वाडीचा यज्ञ (इ.स १८९०) http://mr.upakram.org/node/3645 त्या मोरयाची कृपा http://mr.upakram.org/no de/3597 महाकाव्याचा विषय http://mr.upakram.org/node/3579 ज्ञानेश्वरील अकरा ओव्या http://mr.upakram.org/node/3526 चालविली भिंती मृत्तिकेची http://mr.upakram.org/node/3474 बुद्धीदाता http://mr.upakram.org/node/3379 अध्यात्मिक प्रवचन http://mr.upakram.org/node/3356 बिनडोकपणाचा कळस http://mr.upakram.org/node/3362 देव धर्म आणि गाजरचित्रे http://mr.upakram.org/node/3323 उदकी अभंग रक्षिले http://mr.upakram.org/node/3313 अशी एक शक्यता केवळ तर्क http://mr.upakram.org/node/3276 भयसूचक बातमी http://mr.upakram.org/node/3216 चंद्राचा पुष्य नक्षत्रात प्रवेश http://mr.upakram.org/node/3161 ईश्वरे तृणे करुन रक्षण केले http://mr.upakram.org/node/2928 यात आश्चर्य ते काय? http://mr.upakram.org/node/2883 हा खेळ बाहुल्यांचा http://mr.upakram.org/node/2820 गूढ आश्चर्यकारक अनुभव http://mr.upakram.org/node/2525 कार्यकारण भाव http://mr.upakram.org/node/2503 विवेकवादी लेखनावर आक्षेप http://mr.upakram.org/node/2580 भ्रमाचा भोपळा http://mr.upakram.org/node/2388 सामान्य समज (कॉमनसेन्स) http://mr.upakram.org/node/2450
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Tue, 12/05/2017 - 11:22 नवीन
यनावालांच्या पूर्वीच्या लेखनावर काहीच आक्षेप नाही, किंवा जिथे जिथे तो आहे, तिथे तो मी माँडलेलादेखील आहे, चर्चेचा प्रयत्न माझ्या बाजूने केलेला आहे, त्यांनी उत्तरे दिली नसली तरीही. परंतु हल्लीचे त्यांचे काही लेख पाहता ते आता असंबद्ध लिहायला लागले आहेत केव काय अशी शंका येते, आणि या असंबद्ध लेखनाचा पुरस्कार काहीजण ते केवळ विवेकवादी आहेत म्हणून हिरीरीने करायला येतात तेव्हा तर भयंकर मनस्ताप होतो. एखाद्या माणसाने कोठेतरी अक्कलखाती 30 लाख घालवले म्हणून आम्ही सगळे श्रद्धाळू दोषी कसे ठरतो? आणि या वरच्या लेखातील तर्कांबद्दल बोलनेदेखील हास्यास्पद आहे इतके ते बाळबोध आहेत. ते स्वीकारून आम्ही आमच्या श्रद्धा त्यागाच्या अशी त्यांची अपेक्षा आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Tue, 12/05/2017 - 12:43 नवीन
तुम्ही म्हणता त्यात तथ्यांश आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
ध
धर्मराजमुटके Tue, 12/05/2017 - 14:28 नवीन
अगदी सहमत ! मी त्यांच्या बाजुचा (नास्तिक नसलो) तरी त्यांचे पुर्वीचे लेख बरे असायचे. आताचे लेख म्हणजे बाळासाहेबांनी लिहिलेले अग्रलेख आणि आता संजय राऊत लिहित असलेले अग्रलेख नावाचे विनोदी लिखाण एवढा फरक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
म
मूकवाचक Wed, 12/06/2017 - 11:32 नवीन
चंद्रु तेथ चंद्रिका l शंभु तेथ अंबिका l संत तेथ विवेका l असणें कीं जी ll असे ज्ञानेश सांगतात. पण विवेकवादी असणे आणि विवेकी असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे तथाकथित विवेकवादी व्यक्तींच्या लिखाणातून वारंवार अधोरेखित होत आलेले आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
प
पुंबा Tue, 12/05/2017 - 06:08 नवीन
मी केवळ झोडपणे एवढेच ध्येय न ठेवता असे म्हटले आहे. झोडपले तर चालते. परंतू, त्यामुळे चर्चा वेगळ्याच वळणाने जाऊ नये असे मी म्हणतो आहे. सांगोपांग चर्चा व्हावी. शेवटी, आपल्याला वाद -विवादातून एकमेकांकडून थोडेसे शिकायचेच आहे, नविन माहिती, विचारव्युह मिळाला तर ते हवेच आहे. जिंकणं किंवा हरणं अपेक्षित कुठे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Tue, 12/05/2017 - 11:27 नवीन
मला त्यांच्या आशयाबद्दल आधीच आक्षेप नाही. किंबहुना श्रदधांवर प्रश्न विचारलेच पाहिहेत, अन्यथा घुसळण कशी होणार? पण हे प्रश्न विचारताना सरसकटीकरण करू नये, जे यनावाला नेहमी करतात. मिपावरच अन्य कोणतेही नास्तिक टीकेचे लक्ष्य का बरे होत नाहीत? ते जे करत आहेत ते झोडपणेच आहे, त्यांचा बाज चर्चेचा नसून एखादे अंधश्रद्धेचे उदाहरण घेऊन मग सगळ्यांना 'बघा तुम्ही असेच आहात' असे खिजवण्याचा आहे असा संशय येतो. अश्याने प्रबोधन होत नाही, माझेही नाही आणि त्यांचेही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
A
arunjoshi123 Mon, 12/04/2017 - 08:00 नवीन
अत्यंत विचारप्रवर्तक लेख.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 12/05/2017 - 06:09 नवीन
अश्रद्धेतून देखील विकृती निर्माण होते. हे काही डॊक्टरांनी ,माझ्याशी बोलताना व्यक्त केलेले मत आहे संदर्भ- स्वानुभवावर केलेले भाकित पुर्वीच वर्तवले आहे. मानसशास्त्र हा विषयच अजब आहे.
  • Log in or register to post comments
अ
अँड. हरिदास उंबरकर Wed, 12/06/2017 - 13:06 नवीन
श्रद्धा या आशयावर चर्चा सुरु असल्याने सहभाग घेत आहे.. एका धर्मग्रंथात स्पष्टपणे म्हटलं आहे की, जी बदलते ती ‘श्रद्धा’ आणि जो कायम असतो, तो ‘विश्वास’! त्या ग्रंथामध्ये श्रद्धेला ‘पार्वती’ म्हटलं असून विश्वासाला ‘शिव’ म्हटलं आहे. जे त्रिकालबाधीत सत्य असते, त्यावर विश्वास असावा लागतो आणि जे काही काळापुरते असते, त्याला ‘श्रद्धा’ असावी लागते. यानुसार आपला देवावर विश्वास आहे की, श्रद्धा? जर विश्वास असेल तर तो सीध्द करण्याची आवश्यकता नाही आणि श्रद्धा असेल तर ती काळा नुरूप बदलनार आहे.. लेखाबाबत बोलायचे झाले तर मांडणी सुरेख आहे.. पण कुणी स्वर्गात जाण्यासाठी ह्त्या करेल हे थोड़ काल्पनिक वाटते.. जी तिन उदाहरणे लेखकानी दिली आहेत.. त्या घटनांमगिल वास्तव वेगळच् असाव.. कुटुंबियांची हत्या करुण आत्महत्या करण्याच्या बहुतांश घटनेत राग, किंव्हा आपल्या नंतर यांचे काय होणार? ही मानसिकता असते..
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Wed, 12/06/2017 - 18:44 नवीन
पुणे- भूत उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा व्यावसायिक कुटुंबातील सासू-सुनेवर अत्याचार
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 12/07/2017 - 05:53 नवीन
खरे तर अश्या लोकांना चाबकाचे फटके दिले पाहिजेत.. बाकी याच्या मागे देखील काही लॉजिक असते, पण दुसर्‍याच्या असहायतेचा/ विश्वासाचा फायदा घेउन पैसे उकळणे यासारखा गुन्हा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ग
गामा पैलवान Wed, 12/06/2017 - 19:35 नवीन
ट्रेड मार्क,
मुळात आक्षेप त्यांच्या नास्तिकतेविषयी नाहीये फक्त ते ज्या पद्धतीने विषय मांडतात, इतरांना दूषणे देतात, सोयीस्कर उत्तरं देतात, चर्चा करायला येत नाहीत त्यावर आहे.
अगदी शंभर टक्के सहमत. यनावाला मोठ्या आवेशात जाहीर करतात की तर्कशास्त्रात शब्दप्रामाण्यास थारा नाही. ठीके बुवा! मग त्यांना विचारलं की आधुनिक विज्ञानाचं महत्त्वाचं अंग क्वांटम मेकॅनिक्स आहे तिथे शब्दप्रामाण्याखेरीज पान हलंत नाही (मुद्दा क्रमांक १५). हे कसं का? तर यावर यनावालांनी कसलंही उत्तर दिलं नाही. जे आक्षेप ते अध्यात्मावर घेतात तेच आक्षेप आधुनिक विज्ञानास लागू केले की त्यांची अळीमिळी गुपचिळी होते. ही परिस्थिती खुल्या चर्चेस पूरक नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Wed, 12/06/2017 - 21:07 नवीन
ज्या विज्ञानावर एवढा भरवसा ठेवतात त्या विज्ञानाने किती कोलांट्या उड्या मारल्यात याची काही उदाहरणं देतो. १. प्रकाशापेक्षा जास्त वेगाने काही प्रवास करत नाही असं आपण शिकत आलो आहोत. पण अलीकडेच लागलेल्या शोधामुळे असं म्हणतात की युनिव्हर्स ६८ किमी प्रतिसेकंद प्रति मेगापारसेक या वेगाने प्रसरण पावत आहे. १ मेगापारसेक म्हणजे ३.२६ मिलियन प्रकाश वर्षे. म्हणजेच १ मेगापारसेक अंतरावर असलेली आकाशगंगा आपल्यापासून प्रतिसेकंद ६८ किमी लांब जात आहे, २ मेगापारसेक असेल तर १३६ किमी प्रतिसेकंद लांब जाते. म्हणजेच आपण आपल्याला स्थिर वाटत असलो तरी आपण एवढ्या प्रचंड वेगाने प्रवास करत आहोत. मग हेच समजा कोणी १०० वर्षांपूर्वी सांगितलं असतं तर त्याला मूर्खातच काढलं असतं ना? अजूनही आता सध्याचं विज्ञान म्हणून आपण ते सत्य मानतो पण अजून २५ वर्षांनी कोणी वेगळी गोष्ट सिद्ध केली तर? २. शास्त्रज्ञांना अजूनही ब्लॅक होल मध्ये नक्की काय असतं हे समजलेलं नाहीये. ब्लॅक होल सगळं ओढून घेतं एवढंच आपल्याला माहित आहे. पण आता शास्त्रज्ञ ब्लॅक होल म्हणजे पॅरलल युनिव्हर्सचं दार असावं असं म्हणायला लागलेत. ना जाणो काही वर्षांनी ते सिद्धही करू शकतील आणि मग आपण ते मानायला लागू. ३. पाहिली उदाहरणे जरा वरच्या स्तरातील होती. हे उदाहरण आपल्या रोजच्या जीवनातलं घेऊ. इतके वर्ष डॉक्टर लोक ओरडत होते कोलेस्टेरॉल तब्येतीला वाईट असतं, त्यात हृदयासाठी तर खूपच वाईट. त्यामुळे फॅट असलेलं खाणं लोक टाळायचे. आता म्हणायला लागलेत की कोलेस्टेरॉल आपल्यासाठी आवश्यक आहे आणि कोलेस्टेरॉल वाईट नसतं. इथे अधिक माहिती वाचा. ४. डीएनए वरून आपण एखाद्याचे आईवडील सहज शोधून काढू शकतो हे आपल्याला माहित आहे. पण जगात अश्याही व्यक्ती आहेत की ज्यांचे डीएनए त्यांच्या आईबरोबर सुद्धा जुळत नाहीत. याची माहिती फारच कमी लोकांना आहे. पोलिसही अजूनसुद्धा डीएनए मॅच सर्रास वापरतात. थोडक्यात सांगण्याचा उद्देश हा की आपण सर्वच कोणा ना कोणावर अतिविश्वास ठेऊन जगतोय. आज माहित असलेल्या विज्ञानाने एक गोष्ट खरी सांगितली की आपण ती मानतो उद्या विज्ञानानेच विरोधी गोष्ट सांगितली की ती पण मानायला लागतो. हा अंधविश्वासच नाही का? पुढे जाऊन मी तर असं म्हणेन की माणूस (मग तो शास्त्रज्ञ असो वा बुवा) तुम्हाला चुकीची गोष्ट सांगू शकतो कारण तो त्याच्या ज्ञानावर विसंबून सांगतोय. पण त्या वैश्विक शक्तीचं तसं नाही. ती शक्ती तुम्हाला चुकीचं सांगणार नाही. मग ज्या मार्गाने तुम्हाला त्या शक्तीचा उपयोग करता येईल त्या मार्गाचा वापर करावा. मग ते ध्यानधारणा करून असो वा मंत्र म्हणून असो वा पूजा करून वा अजून कुठल्या मार्गाने, त्यासाठी बुवाबाबांची गरज नाही. अट फक्त एकच, की तो मार्ग चांगला असावा आणि त्याने दुसऱ्याला त्रास, इजा, हानी होऊ नये. आणि महत्वाचं म्हणजे त्याबरोबर कर्म पण करत राहणं आवश्यक आहे. असेल हरी तर देईल खाटल्यावरी ही म्हण सिद्ध करायला जाऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
S
sagarpdy गुरुवार, 12/07/2017 - 05:17 नवीन
धर्मावर विश्वास ठेवला जातो तसा विज्ञानावर ठेवूच शकत नाही.
I often use the analogy of a chess game: one can learn all the rules of chess, but one doesn't know how to play well. The present situation in physics is as if we know chess, but we don't know one or two rules. But in this part of the board where things are operation, those one or two rules are not operating much and we can get along pretty well without understanding those rules. That's the way it is, I would say, regarding the phenomena of life, consciousness and so forth. God was invented to explain mystery. God is always invented to explain those things that you do not understand. Now, when you finally discover how something works, you get some laws which you're taking away from God; you don't need him anymore. But you need him for the other mysteries. So therefore you leave him to create the universe because we haven't figured that out yet; you need him for understanding those things which you don't believe the laws will explain, such as consciousness, or why you only live to a certain length of time--life and death -- stuff like that. God is always associated with those things that you do not understand. Therefore I don't think that the laws can be considered to be like God because they have been figured out. - Richard Feynman, Superstrings: A Theory of Everything, edited by P.C.W. Davies and J. Brown
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
आ
आनन्दा गुरुवार, 12/07/2017 - 05:47 नवीन
बरोबर आहे.. आपण चमत्काराला देवाचे लेबल लावून टाकतो. कद्दचित त्या चमत्कारामागचे विज्ञान काही वर्षांनी जगासमोर येइलही, पण तोपर्यंत अश्या चमत्कारांचे अस्तित्व नाकारणे योग्य नाही असे माझे मत. काही लोक त्याला देव म्हणतात, काही लोक वैश्विक शक्ती म्हणतात, काही लोक अमानवीय म्हणतात, पण अनेक लोकांना असे अनुभव वेगवेगळ्या वेळेस येत असतील तर ते मला का येत नाहीत म्हणून नाकारणे हे सर्वथा अयोग्य आहे. त्याच वेळेस वर गावडेसरांनी लिहिलेली घटना देखील तितकीच दुर्दैवी आहे. केवळ हेच नव्हे, तर अश्या अनेक भामट्यांच्य नादी लागून आयुष्य बरबाद केलेले लोक मी माझ्या आयुष्यात पाहिले आहेत. जेव्हढे अध्यात्म मी वाचले आहे त्यानुसार तुमच्याकडून पैसे मागणारा माणूस हा काम करण्याला विश्वासार्ह नाही. कारण हे पैसे त्याच्या साधनेची किंमत असते, आणि जसे जसे त्याला पैसे मिळत जातात तसे त्याचे साधनेचे बळ संपत जाते त्यामुळे कालांतराने असा माणूस केवळ एक भोंदू म्हणूनच शिल्लक राहतो. लवकरच मी काही ऐकलेल्या (पण ज्यांच्या सत्यतेबद्दल मनात शंका नाही) अश्या घटनांवर एक लेख लिहीन, अश्या घटना अपवादात्मक असल्या, तरी विचारात घेण्यासारख्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 12/07/2017 - 05:47 नवीन
शेवटचा परिच्छेद जरा गुंतागुंतीचा वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
अ
अर्धवटराव गुरुवार, 12/07/2017 - 08:04 नवीन
पण आता वाटतय यांना मानसोपचारतज्ञाची गरज आहे. इट्स अ केस ऑफ मेण्टल सिकनेस.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 12/07/2017 - 08:36 नवीन
आपली मते आग्रहाने व सातत्याने मांडणे हा एक ओसीडीच असतो. परफेक्शनिस्ट असण्याचा प्रयत्न हा देखील ओसीडी च. अनेक समाजसुधारक या डिसऑर्डरचे बळी असतात. अनेक 'वेडी' माणसे ओसीडी वालेच असतात. समाजात आता शहाणी माणसे उदंड झाली आहेत देशाला गरज आहे ती वेड्या माणसांची! ध्येयवेड्या माणसांची नेहमी समाजात उपेक्षा होते. टिंगल होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
व
विशुमित गुरुवार, 12/07/2017 - 09:01 नवीन
चर्च अंती असे दिसतंय की कथित आस्तिक लोकांना यानावालांनी गुंडाळलेले आहे . बाकी कोणी त्यांना वेडे समजले तरी त्यांना बहुदा काही फरक पडणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
आ
आनन्दा गुरुवार, 12/07/2017 - 10:27 नवीन
यनावालांच्या नास्तिकतेपेक्षा आमचे रोजीरोटी महत्वाची आहे हो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
प
प्रकाश घाटपांडे Sat, 12/09/2017 - 05:18 नवीन
खर आहे तत्वज्ञान भरल्या पोटीच सुचत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
अ
अर्धवटराव गुरुवार, 12/07/2017 - 09:56 नवीन
पण यात एक प्रॉब्लेम असा कि अनेक वेडी माणसं देखील स्वतःला समाजसुधारक, ध्येयवेडी वगैरे समजायला लागतात. आपल्याला एखादा डिसॉर्डर आहे हेच जिथे कळत नाहि तिथे पर्फेक्शनीस्टचं लेबलच कामाला येतं. शिवाय हस्तिदंती मनोर्‍यातलं पोकळ इट्लेक्चुअल सुख. फार डेडली कॉकटेल आहे ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ग
गंम्बा गुरुवार, 12/07/2017 - 11:32 नवीन
पटतय अर्धवटराव. ह्या स्पेसिफिक केस मधे तर फारच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
स
सुबोध खरे गुरुवार, 12/07/2017 - 16:14 नवीन
@अर्धवटराव याचीच पुरवणी म्हणा पाहिजे तर. हुशार माणसं विक्षिप्त असतात असे म्हणतात. म्हणून लोकांनी स्वतःला हुशार समजावे म्हणून काही लोक विक्षिप्तपणे वागताना दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अभ्या.. गुरुवार, 12/07/2017 - 19:48 नवीन
अगदी अगदी इतकं परफेकट. ते परफेक्शनिस्ट लेबलाची मीमांसा तर लैच पटली इथली काही उदाहरणे बघून. जिओ अर्धवटराव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
ब
बांवरे Fri, 12/08/2017 - 05:17 नवीन
तिथे पर्फेक्शनीस्टचं लेबलच कामाला येतं. शिवाय हस्तिदंती मनोर्‍यातलं पोकळ इट्लेक्चुअल सुख. फार डेडली कॉकटेल आहे ते.
हा भाग जरी खरा वाटला, तरी एक दोन लेख वाचल्यावर मला, यनावाला कुठल्या तरी चौकात बसून लोकांशी बडबडणार्‍या फॉरेस्ट गंप सारखे वाटतात. त्यांना या कॉकटेलचं फार काही पडलं असावं असं वाटत नाही. मला त्यांचे लेख आणि व्रतवैकल्याच्या कथा यात फार साम्य वाटते. दोन्हीत अंश एकच असतो " ढोबळमानाने असे वागा"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Fri, 12/08/2017 - 06:37 नवीन
फॉरेस्ट गंप सर्वकालीन एक्स्प्लोरर आहे. त्याचं बडबडणं म्हणजे त्याचा जीवनाशी संवाद आहे. आपल्यातल्या विद्यार्थ्याची गळचेपी करुन वर आपल्या दुराग्रहांचं इतरांवर लेपन करणारं पुण्यकर्म तो करत नाहि. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बांवरे
प
प्रकाश घाटपांडे Sat, 12/09/2017 - 05:17 नवीन
मला त्यांचे लेख आणि व्रतवैकल्याच्या कथा यात फार साम्य वाटते. दोन्हीत अंश एकच असतो " ढोबळमानाने असे वागा"
आपल्या मताशी/निष्कर्षाशी सुसंगत अशी बोधकथा पाडणारे पुर्वीपासून आहेत. किर्तनकार ,प्रवचनकार,वगनाट्य वाले एकपात्री कलाकार अनेक म्हणता येतील. दै.सकाळ मधे न.म. जोशींच्या अशा कथा असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बांवरे
म
मूकवाचक Sat, 12/16/2017 - 15:56 नवीन
कट्टर नास्तिक्य हा विरोधाभक्तीचाच एक प्रकार आहे शेवटी. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
A
arunjoshi123 Fri, 12/08/2017 - 07:32 नवीन
पण लाडक्या नातवाचा जीव जाईपर्यंत गळा का दाबला ? श्वास कोंडल्यावर त्याने जगण्यासाठी धडपड केलीच असेल. हातपाय झटकले असतील. प्रत्येक सजीवाची ही नैसर्गिक प्रेरणा असते. तरी प्रेमळ आजोबांच्या हाताची पकड सैल कशी पडली नाही ? एवढे क्रौर्य कुठून आले ? कसे आले ? कशामुळे आले ? त्या दहा वर्षांच्या मुलाला अजून खेळायचे होते. शिकायचे होते. जग समजून घ्यायचे होते. अनुभवायचे होते. कर्तृत्व दाखवायचे होते. मोठे व्हायचे होते. पण वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षीच सगळे संपले. त्याच्या आवडत्या दादाजीनींच स्वहस्ते सारे संपवले. आपले आजोबा हे असे काय करीत आहेत हे त्याला समजले नसेल. सगळेच कल्पनेच्या पलीकडचे. सकाळी वाचले ते सारे असंभवनीय, अनाकलनीय वाटत होते. पण ही घटना सत्य असणार यात शंका नव्हती.
मध्ये
एवढे क्रौर्य कुठून आले ? कसे आले ? कशामुळे आले ?
तर श्रद्धेमुळे आले. -------------------- तर लोकहो, आदिम मनुष्य अत्यंत प्रेमल होता. कारण त्याकाळात ईश्वर, इ संकल्पना नव्हत्या. म्हणून आदिमकाळात विकृती, क्रौय, इ इ काही नव्हतं.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 12/16/2017 - 18:21 नवीन
म्हणून आदिमकाळात विकृती, क्रौय, इ इ काही नव्हतं. इतकं मागे कशाला जायला पाहिजे ? सद्यकाळातील नास्तिक व निधर्मी लोकांमध्येही विकृती व क्रौर्य औषधापुरतेही सापडत नाही. उदाहरणार्थ, "धर्म अफूची गोळी आहे" असे म्हणणार्‍या कम्युनिस्ट पंथाची चाओ-माओ, स्टालीन, पोल पॉट इत्यादी नास्तिक संत मांदियाळी... आणि हो, उत्तर कोरियाच्या सद्य कम्युनिस्ट सत्ताधार्‍यांची अपार मानवी करुणेने समृद्ध वंशावळ सुद्धा यात सामील आहे !! ;-) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 12/16/2017 - 18:52 नवीन
नीतिमत्ता, प्रामाणिकपणा, भूतदया, करूणा, प्रेम, परिपक्वता, वैचारिक समतोल, विचारशील आत्म-नियंत्रण, इत्यादी उच्च मानवी गुण हे प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक जडण-घडणीवर अवलंबून असतात... त्यांचा ती व्यक्ती आस्तिक/धार्मिक अथवा नास्तिक/निधर्मी असण्याशी तडक संबंध नसतो. दोन्हीही गटांत हे उच्च मानवी गुण किंवा त्यांचा अभाव आढळतात. एखाद्या समान परिस्थितीत, गैरकृत्य केल्यास होणार्‍या "भौतीक शिक्षेची भिती", सर्वांनाच समान असते असे गृहित धरूया. अश्या परिस्थितीत, "खरोखरच्या (हितसंबंध साधण्यासाठी तशी बतावणी करणारा नाही) आस्तिकासाठी" चुकीची न कृती करण्यासाठी देवाच्या कोपाची भिती हे एक अधिक कारण असते. "खरोखरच्या नास्तिकासाठी" हे कारण आस्तित्वातच नसते. तर मग, समान मानवी गुण असलेल्या व्यक्तींमध्ये, चुकीची कृती करण्यात "खरे नास्तिक" पुढे असणार, नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अर्धवटराव Sat, 12/16/2017 - 22:00 नवीन
तुमच्या विधानाला काहि 'वैज्ञानीक' पुरावा आहे का? :ड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 12/17/2017 - 08:03 नवीन
तर्क हा वैज्ञानिक विचाराचाच एक भाग आहे. किंबहुना, निरिक्षण आणि भूतकालातील प्रयोग/अनुभव हेच "थिअ‍ॅरिटिकल सायन्स" या उच्च दर्जाच्या शास्त्राचा पाया आहेत. सद्य आणि इतिहास यांच्याकडे मोकळ्या मनाने पाहिले तर, "आस्तिक व नास्तिक या दोन्हीही गटांत उच्च मानवी गुण किंवा त्यांचा अभाव आढळतात" या सत्यस्थितीबद्दल सहज समजून येईल. वर सांगितलेले उच्च मानवी गुण हा केवळ आस्तिक किंवा नस्तिक यांच्यापैकी कोणा एक गटचा मूलभूत गुणधर्म (पक्षी : मक्ता) आहे आणि उरलेल्या दुसर्‍या गटात त्याचा अभाव असतो असे मत असले तर मग बोलणेच खुंटले ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Sun, 12/17/2017 - 09:54 नवीन
ऐकणार्‍याला कान नसतील तर बोलणे खुंटलेच आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 12/17/2017 - 18:04 नवीन
याबाबत सहमती आहेच. कारण वर म्हटलेच आहे की... निरिक्षण आणि भूतकालातील प्रयोग/अनुभव हेच "थिअ‍ॅरिटिकल सायन्स" या उच्च दर्जाच्या शास्त्राचा पाया आहेत. मात्र, ही सर्व निरिक्षणे आणि प्रयोग नि:पक्षपातीपणे आणि प्रामाणिकपणे "करणे व स्विकारणे" आवश्यक आहे, हेवेसांन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
P
palambar Sun, 12/17/2017 - 18:22 नवीन
यनावालांच्या लेखांमुळे एक वेगळि दृृष्टी मिळते धार्मिक गोष्टिंंकडे बघण्याची, पण त्यांंना उगाचच अति विरोध केला जातो आहे. असे वाटते.
  • Log in or register to post comments
ए
एमी Sun, 02/11/2018 - 11:06 नवीन
समीर गायकवाड यांची ब्लॉगपोस्ट (मीच अजून पूर्ण वाचली नाहीय; पण सुरुवात वाचून हा धागा आठवला https://sameerbapu.blogspot.in/2015/05/blog-post_22.html
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 02/14/2018 - 08:20 नवीन
यात मुद्दा धर्मसुधारणेचा आहे . अश्रद्धेचा नाही. झिया सेक्यूलर वातावरणातून राहून सुद्धा धर्म समजावून घेवून मग त्यात सुधारणाबद्दल बोलतो आहे. तो नास्तिक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी
A
arunjoshi123 Wed, 02/14/2018 - 13:48 नवीन
नातवासह आजोबा विज्ञानामुळे मरायला मंगळावर निघाले.
Missions to Mars. Our aspirational goal is to send our first cargo mission to Mars in 2022. The objectives for the first mission will be to confirm water resources and identify hazards along with putting in place initial power, mining, and life support infrastructure. A second mission, with both cargo and crew, is targeted for 2024, ...
लोक मंगळावर मरायला का निघालेत? - गार्डीयन. https://www.theguardian.com/science/2016/sep/30/elon-musk-spacex-mars-mission-volunteers
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Wed, 02/14/2018 - 13:51 नवीन
या बातमीत ज्या ज्या दीडशहाण्याला कोट केलं आहे त्याचे मृत्यूबद्दलचे विचार बघा. आणि विज्ञानाचा प्रभाव बघा. मला यनावालांच्या लेखातले आजोबा त्यामानाने थोडे बरे वाटतात. http://www.thehindu.com/sci-tech/science/3-indians-in-100-shortlisted-for-one-way-trip-to-mars/article6902154.ece
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा