Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मतमोजणीपूर्व धागा: गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुक-२०१७

ग
गॅरी ट्रुमन
Tue, 12/12/2017 - 10:05
🗣 109 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, गुजरातमध्ये दुसर्‍या टप्प्यात मतदान १४ डिसेंबरला होईल. हिमाचलमध्ये मतदान नोव्हेंबर महिन्यातच पार पडले आहे. दोन्ही राज्यात मतमोजणी १८ डिसेंबरला होईल. एक्झिट पोलचे निकाल १४ (किंवा १५) तारखेला येतील. ते निकाल यायच्या आत नेहमीप्रमाणे मतमोजणीपूर्व धागा प्रकाशित करत आहे. एक्झिट पोलचे निकाल यायच्या आतच हा धागा प्रकाशित करत आहे कारण नाहीतर एक्झिट पोलचे निकाल बघून काही प्रमाणात बायस्ड व्हायची शक्यता आहे. माझ्या मते गुजरातमध्ये भाजप १३० ते १३५ आणि काँग्रेस ४० ते ४५ जागा जिंकेल. तर हिमाचल प्रदेशात भाजप ४० ते ४५ तर काँग्रेस २० ते २५ जागा जिंकेल. मी निवडणुकांच्या निकालांचे अंदाज गेल्या अनेक वर्षांपासून वर्तवत आलेलो आहे. काही वेळा ते बरोबर आले आहेत. तर काही वेळा ते चुकलेही आहेत. तेव्हा या धाग्यात सर्वच शक्यतांचा विचार करून त्याचे नक्की काय परिणाम होतील यावर माझे मत मांडणार आहे. गुजरात गुजरातमधील निवडणुक ही भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. सप्टेंबर १९९६ ते मार्च १९९८ हा काळ वगळता मार्च १९९५ पासून सतत भाजप गुजरातमध्ये सत्तेत आहे. त्यामुळे लोकांमध्ये 'भाजप फटिग' आला असल्यास त्याचा उपयोग करून निवडणुक जिंकायची यापेक्षा मोठी संधी काँग्रेसला मिळणार नाही. तरीही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची एकूणच देहबोली आणि त्यांनी केलेल्या गोष्टी यावरून काँग्रेसला ही निवडणुक जिंकायची खात्री नाही असे वाटायला लागले आहे. राहुल गांधी लवकरच काँग्रेस अध्यक्ष बनणार ही बातमी गेल्या साडेचार-पाच वर्षात कित्येक वेळा आली होती. पण प्रत्येकवेळी या बातम्या म्हणजे वावड्याच सिध्द व्हायच्या. पण यावेळी मात्र राहुल गांधी दिवाळीच्या आसपास नक्कीच अध्यक्ष बनणार असे काँग्रेसच्या नेत्यांनीही म्हटले. राहुल गांधींनी गुजरात निवडणुकांची तयारी बर्‍याच आधीपासून सुरू केली होती. अशावेळी निवडणुकांच्या तारखांची घोषणा व्हायच्या आधीच त्यांनी अध्यक्षपदाची सुत्रे हातात घेऊन मग गुजरातमध्ये विजय मिळाल्यावर लोकांनी राहुल गांधींचे नेतृत्व स्विकारले असा प्रचार करायची नामी संधी काँग्रेसकडे होती. तसे त्यांनी केले नाही. याचे कारण तसे करणे ही एक दुधारी तलवार होती. जर निवडणुकांपूर्वी राहुल अध्यक्ष झाले असते आणि पराभव झाला असता तर मग राहुलचे नेतृत्व लोकांनी नाकारले असे म्हणायलाही जागा राहिली असती. अध्यक्षपद नंतर स्विकारायचे तर जर गुजरातमध्ये पराभव झाल्यास त्यानंतर लगेच अध्यक्षपद स्विकारणेही अप्रशस्त होईल. आता राहुल गांधींची अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली असली तरी त्यांनी अध्यक्षपद स्विकारायची तारीख १६ डिसेंबर म्हणजे गुजरातमधील मतदान झाल्यावर पण निकाल लागायच्या आधी अशी ठरवली गेली आहे. यावरून मला तरी वाटते की मुळातच काँग्रेसला निवडणुक जिंकायची खात्री नाही. अन्यथा आधी अध्यक्षपद स्विकारून विजय झाल्यावर त्याचा अर्थ राहुल गांधींचे नेतृत्व लोकांनी स्विकारले असा प्रचार करायची संधी काँग्रेसनी नक्कीच सोडली नसती. दुसरे म्हणजे गुजरात काँग्रेसकडे स्वतःचा खमका नेताच राहिलेला नाही. एक शंकरसिंग वाघेला होते. ते कितपत लोकप्रिय होते, पूर्ण राज्यात मते ते फिरवू शकले असते का वगैरे प्रश्न आहेतच. पण त्यांना प्रत्यक्ष फिल्डवर काम करायचा उदंड अनुभव होता आणि संघटना कौशल्यही त्यांच्याकडे होते. त्यांची मागणी होती की पंजाबमध्ये अमरिंदरसिंगांना जसे स्वातंत्र्य दिले गेले तसे आपल्याला द्यावे. पण तसे केले असते तर इतर नेते-- अर्जुन मोडवाढीया आणि भरत सोलंकी नाराज झाले असते.त्यामुळे वाघेलांना स्वातंत्र्य दिले गेले नाही. त्यातूनच ते नाराज झाले आणि पक्षाबाहेर पडले. आजही काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार दिलेला नाही. विरोधी पक्षांनी लोकप्रिय मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार दिला तर भाजपचा जोरदार पराभव करता येतो हे दिल्ली आणि बिहारच्या अनुभवावरून समजतेच. पण काँग्रेसकडे असा कोणी लोकप्रिय चेहराच नाही ही समस्या आहे. आणि आता हार्दिक-अल्पेश-जिग्नेश या त्रिकूटावर विसंबून राहायची वेळ कॉंग्रेसवर आली आहे. काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला स्वतःचा एकही नेता मिळू नये आणि बाहेरच्या त्रिकूटावर विसंबून राहायची वेळ येणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. असो. आता बघू विविध परिस्थितींमध्ये काय परिणाम होऊ शकतील. परिस्थिती १: भाजप १५०+, काँग्रेस २० ते २५ अमित शहा भाजपला १५० पेक्षा जास्त जागा जिंकता याव्यात यासाठी प्रयत्न करत आहेत. तसे झाल्यास देशाच्या राजकारणावर भाजपपेक्षाही नरेंद्र मोदी यांची पकड किती घट्ट झाली आहे याचे ते द्योतक असेल. डिसेंबर २०१३ मधील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू होण्यापूर्वी योगेन्द्र यादव म्हणाले होते: "१९८० च्या दशकाच्या मध्यापर्यंत आपल्याला आपला पंतप्रधान निवडायचा आहे असे समजून मतदार विधानसभा निवडणुकांमध्ये मत देत असत. पण १९८० च्या दशकाच्या शेवटापासून आपल्याला आपला मुख्यमंत्री निवडायचा आहे असे समजून लोकसभा निवडणुकांमध्ये मत द्यायला मतदारांनी सुरवात केली." म्हणजे १९५२ पासून १९८० च्या दशकाच्या मध्यापर्यंत भारतीय राजकारणाचा पहिला टप्पा होता आणि १९८० च्या दशकाच्या शेवटपासून दुसरा टप्पा सुरू झाला. मार्च २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात मोदींनी सर्व विरोधकांना एकहाती झोपवल्यानंतर आपण परत एकदा पहिल्या टप्प्याकडे जात आहोत का हा प्रश्न नक्कीच उभा राहिला. एप्रिल २०१७ मध्ये दिल्ली महापालिकांच्या निवडणुकांच्या निकालावर परत एकदा योगेन्द यादव यांनीच म्हटलेली एक गोष्ट द्यायचा मोह आवरत नाही. ते म्हणाले होते: "मतदार घराबाहेर पडले त्यांचा स्थानिक नगरसेवक निवडायला. पण त्यांनी प्रत्यक्षात मते दिली दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांविरोधात आणि देशाच्या पंतप्रधानांच्या बाजूने". गुजरातमध्ये भाजपने १५०+ जागा जिंकल्या तर आपण परत भारतीय राजकारणातील पहिल्या टप्प्याकडे गेलो आहोत असे म्हणायला हवे. त्या परिस्थितीत मोदींची अगदी 'लार्जर दॅन लाईफ' प्रतिमा बनेल. राहुल गांधींच्या पक्षाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत अगदी सुरवातीलाच 'प्रथमग्रासे मक्षिकापात:' होईल. तसेच निवडणुक जिंकायची असेल तर लोकांना विकता येण्याजोगा (सेलेबल) एक कार्यक्रम आणि एक लोकप्रिय नेता पुढे आणणे गरजेचे आहे, आपले नेते सोडून आयत्या वेळी बाहेरच्या त्रिकूटाला बरोबर घेऊन निवडणुक जिंकता येऊ शकणार नाही हे राहुल गांधींना समजायला हवे. शेवटी अशी जातीपातींवर आधारीत आवाहने करून निवडणुक जिंकणे हे १९९० आणि २००० च्या दशकातले गणित झाले. मोदी-शहांनी गेल्या काही वर्षात हे सगळे गणित बदलून टाकले आहे.तेव्हा या बदललेल्या गणिताला सामोरे जाऊन निवडणुकांसाठी आखणी करायला हवी हा धडा राहुल गांधींना मिळेल. भाजपला असा जोरदार विजय मिळाला (म्हणजेच हार्दिक प्रभृतींचा पराभव झाला) तर त्याचा एक फायदा चांगला होईल. इतर राज्यांमध्ये असे कोणी हार्दिक उभे राहणार असतील तर लोक त्यांना महत्व देत नाहीत हे लक्षात येऊन त्या प्रक्रीयेला पायबंद बसायला मदत होईल. भाजपने (खरे तर मोदींनी) गुजरातमध्ये एवढा मोठा विजय मिळवला तर त्याचे २०१९ वर काय परिणाम होऊ शकतील? एक तर मोदींना हरवायला म्हणून सगळे विरोधक एकत्र यायची शक्यता वाढेल. त्या विरोधकांच्या आघाडीला मोदींचे भाजपमधील पक्षांतर्गत विरोधक (यशवंत सिन्हा, अडवाणी इत्यादी) खुलेपणाने किंवा पडद्याआड मदत करतील. १९७१ ची लोकसभा निवडणुक इंदिरा गांधी विरूध्द इतर सगळे अशी झाली होती. त्याप्रमाणेच २०१९ ची लोकसभा निवडणुक नरेंद्र मोदी विरूध्द इतर सगळे अशी होईल ही शक्यता आणखी वाढेल. सगळे विरोधक एकत्र आले तर त्या आव्हानाला मोदी कसे परतवून लावतात हे बघायचे. (त्या दृष्टीनेच बिहारमध्ये नितीशकुमारांना विरोधी पक्षांमधून फोडून आपल्या बरोबर घ्यायची खेळी हा एक मास्टरस्ट्रोक होता असे मला वाटते). २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकांच्या आधी पुरस्कारवापसी, वाढती असहिष्णुता वगैरे गोष्टींवरून पुरोगाम्यांनी मोठा हलकल्लोळ उठवला होता. आता ती शस्त्रे बोथट झाली आहेत त्यामुळे परत ती शस्त्रे वापरता येणार नाहीत. पण पुरोगामी दुसरा कुठलातरी मार्ग शोधून सर्वत्र-- मिडिया, सोशल मिडिया वगैरे ठिकाणी मोठा आवाज उठवतील हे नक्कीच. तसेच काही महिन्यांपूर्वी राहुल गांधी ऐन डोकलाम प्रश्न जोरात असताना चीनी वकिलाला भेटले होते. मागच्या आठवड्यात मनमोहन सिंग आणि मणीशंकर अय्यर पाकिस्तानी हायकमिशनरला भेटले. ही चिन्हे बरी दिसत नाहीत. आपले मोदींपुढे चालत नाही हे बघून काँग्रेसने पाकिस्तान, चीन असल्या परकीयांची मदत घ्यायचा प्रयत्न अधिक जोरात केला तर ते फारच धोक्याचे ठरेल. असा मोठा विजय मिळाल्यास भाजपच्या दृष्टीने आणखी एक धोक्याची घंटा वाजेल. तशी ती आधीपासूनच वाजायला लागली आहे पण त्या घंटेचा आवाज आणखी मोठा होईल. भाजपला विजय मिळत आहे हे बघता भाजपचे खालच्या पातळीवरचे लोक (नगरसेवक, पदाधिकारी इत्यादी) अधिक माजतील हा धोका मोठा आहे. काही महिन्यांपूर्वी चंडीगडमध्ये हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्षांच्या विकास बराला नामक दिवट्या चिरंजीवाने एका मुलीचा पाठलाग करायची घटना घडली होती. मी भाजप प्रदेशाध्यक्षाचा मुलगा आहे, माझे कोण काय वाकडे करणार असा काहीसा आविर्भाव त्याचा होता. लोकांचे मोदींविषयीचे मत चांगले असले तरी अशा घटना वारंवार व्हायला लागल्या तर लोक मोदी या एका नावावर किती वर्षे मत देणार हा प्रश्नही उभा राहिलच. काहीही झाले तरी 'लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटीलीटी' कधी चुकत नसतो. ती मार्जिनल युटीलिटी अधिक वेगाने कमी करायचे काम असले माजलेले लोक करायला लागले तर ती भाजपसाठी धोक्याची घंटा असेल. तसेच भाजप जिंकत आहे म्हटल्यावर इतर पक्षांमधली फालतू मंडळी भाजपमध्ये येऊ बघतील. आसामात सरबानंद सोनोवाल या चांगल्या माणसाला पक्षात घेतले हे चांगलेच झाले. पण महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या लोकांना, उत्तराखंडमध्ये विजय बहुगुणासारख्यांना पक्षात घेण्याविषयी तेच बोलता येणार नाही. अटकपूर्व जामीन असतो त्याप्रमाणे 'अटकपूर्व भाजप प्रवेश' हा घातक पायंडा पडायला नको. अशा लोकांना पक्षात घेतल्यामुळे नंतर अडचणी वाढतील आणि लोकांचा विश्वास कमी होईल. परिस्थिती २: भाजप ११५-१५०, काँग्रेस २०-६० ही दुसरी परिस्थिती म्हणजे भाजपला राज्यात मागच्या वेळेपेक्षा मोठा विजय मिळेल ही आहे. या परिस्थितीत वर दिलेल्या पहिल्या परिस्थितीप्रमाणेच परिणाम (काहीशा कमी तीव्रतेने) होतील. परिस्थिती ३: भाजप ९५ ते ११५ , काँग्रेस ६० ते ८५ आणि परिस्थिती ४: भाजप ६० ते ८५ , काँग्रेस ९५ ते ११५ यातील तिसर्‍या परिस्थितीत भाजपला विजय मिळेल पण तो मागच्या वेळेपेक्षा कमी असेल. तांत्रिकदृष्ट्या भाजपच जिंकेल पण भाजपची 'ऑथोरिटी' मात्र नक्कीच कमी झाली आहे असे चित्र उभे राहिल. आणि चौथ्या परिस्थितीत तर भाजपचा पराभवच होईल. तरीही मोदींची लोकप्रियता या परिस्थितीतही कायम असेलच आणि त्याचा भाजप २०१९ मध्ये फायदा करून घेईलच. युपीए-१ सरकारच्या कार्यकाळात काँग्रेसचा उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, बंगाल, बिहार या राज्यांमध्ये पराभव झाला होता पण २००९ मध्ये परत युपीएचेच सरकार सत्तेत आले होते. आतापर्यंत मोदी सरकारच्या कार्यकाळात भाजपने अनेक विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. तेव्हा एका राज्यात यश कमी मिळाले किंवा अगदी पराभव जरी झाला तरी २०१९ मध्ये त्याचा फार फरक पडणार नाही. तरीही मोदींच्या राज्यातच भाजपचा पराभव करणे ही काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षांसाठी मोठी उत्साहवर्धक घटना असेल. काँग्रेस आणि इतर सर्व विरोधी पक्षांना मात्र मोदी आता परतीच्या मार्गावर आहेत असा प्रचार करायची संधी मिळेल. काँग्रेसने या निवडणुकांमध्ये स्वतःचा नेता पुढे न आणता हार्दिक-अल्पेश-जिग्नेश या त्रिकूटावर आणि त्यांच्या जातीपातींच्या गणितावर विसंबून राहून काँग्रेसने यश मिळवले तर ती धोक्याची घंटा असेल. कारण इतर राज्यांमध्येही असेच जातीपातींचे राजकारण खेळायचा प्रयत्न केला जाईल. भविष्याकडे वाटचाल करताना जातीपातींचे राजकारण मागे सोडायचे सोडून जर त्यावरच भर देण्यात येणार असेल तर आपण परत १९९० च्या दशकातील घाणेरड्या राजकारणाकडे वाटचाल करू हा सगळ्यात मोठा धोका या परिस्थितीत उद्भवेल. चौथ्या परिस्थितीत जर भाजपचा पराभव झाला तर तो पक्षासाठी मोठा धक्का मानला जाईल. पण त्यातूनच काँग्रेसला आपण पुनरागमन करायच्या मार्गावर आहोत असा समज होऊन २०१९ मध्ये सर्व विरोधकांची आघाडी उभी करायच्या प्रयत्नांमध्ये काँग्रेस अधिक आक्रमकपणे बार्गेन करेल आणि त्यातून प्रस्तावित आघाडीपुढे संकट उभे राहू शकेल ही पण शक्यता आहेच. १९८९ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने १९७ जागा जिंकल्या होत्या त्यावेळी तो काँग्रेसचा मोठा पराभव मानला गेला होता. पण २००९ मध्ये त्यापेक्षा थोड्याच जास्त म्हणजे २०६ जागा जिंकल्यावर तो काँग्रेसचा नेत्रदीपक विजय वगैरे मानला गेला होता. तेव्हा थोडेसे यश मिळाले तर आपले आभाळाला हात टेकले आहेत हा समज काँग्रेसचा व्हायची शक्यता आहेच. तसेच या निवडणुकांमध्ये काँग्रेसने काही प्रमाणात सॉफ्ट हिंदुत्व वापरले. राहुल गांधींनी अनेक मंदिरांना भेटी दिल्या. जर तिसर्‍या किंवा चौथ्या परिस्थितीप्रमाणे निकाल लागले तर या सॉफ्ट हिंदुत्वाचा उपयोग होतो असा अर्थ काढला जाऊन १९८० च्या दशकात इंदिरा आणि राजीव गांधींनी ज्याप्रमाणे 'हिंदू अपीजमेन्ट' करायचा प्रयत्न केला होता त्याची पुनरावृत्ती काँग्रेसकडून व्हायची शक्यता आहे. यातून पुढे मुस्लिम मते समाजवादी पक्ष, राजद यांच्यासारख्यांकडे जातील ही शक्यता आहे. ती एम.आय.एम कडे जाणार नाहीत हीच इच्छा आणि अपेक्षा. हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशात काँग्रेसचा विजय व्हायची शक्यता त्यामानाने बरीच कमी आहे. तर भाजपच जिंकायची शक्यता जास्त. फक्त जागा किती मिळणार हा प्रश्न असेल. तेव्हा हिमाचलमध्ये मी वेगवेगळ्या शक्यता न घेता एकच शक्यता--- भाजपचा विजय आणि काँग्रेसचा पराभव ही ध्यानात घेत आहे. काँग्रेसनेही हिमाचलकडे फार लक्ष दिले नव्हते आणि सगळी शक्ती गुजरातवरच केंद्रित केली होती. तेव्हा हिमाचलमध्ये जिंकू ही अपेक्षा स्वतः काँग्रेसवाल्यांची नाही असे दिसते. हिमाचल हे फार मोठे राज्य नाही आणि देशाच्या राजकारणावर त्याचा विशेष परिणाम होतही नाही. तरीही हिमाचलमध्ये पराभव झाल्यास काँग्रेसच्या हातात केवळ पंजाब आणि कर्नाटक (आणि गुजरातमध्ये जिंकल्यास गुजरात) ही मोठी (१० पेक्षा जास्त लोकसभा जागा असलेली) राहतील. त्यातही गुजरातमध्ये विजय झाल्यास काँग्रेसला मोठाच दिलासा मिळेल. पण गुजरातमध्येही जिंकता आले नाही आणि हिमाचलही गेले ही परिस्थिती काँग्रेससाठी फार उत्साहवर्धक नसेल. भाजपच्या दृष्टीने हिमाचलमध्ये विजय मिळाला (किंवा मिळाला नाही) तरी त्याचा फार फरक पडणार नाही. दोन्ही राज्यांमधील एकत्रित परिस्थितीवर भाष्य वर म्हटल्याप्रमाणे माझ्या मते भाजपला गुजरातमध्ये १३० ते १३५ तर हिमाचलमध्ये ४० ते ४५ जागा मिळतील. म्हणजे माझ्या मते दोन्ही राज्यात काँग्रेसचा पराभव होणार आहे. वर म्हटल्याप्रमाणे काँग्रेसने सगळी शक्ती गुजरातवर केंद्रित केली होती आणि हिमाचलकडे त्यामानाने दुर्लक्ष केले होते. गुजरातमध्ये राहुल गांधींनी जो प्रचार केला त्यात नोटबंदी आणि जी.एस.टी विरूध्द त्यांनी रान उठवले होते. जी.एस.टी ला गब्बर सिंग टॅक्स असेही राहुल गांधी म्हणाले होते. जर काँग्रेसचा या निवडणुकांमध्ये पराभव झाला तर नोटबंदी आणि जी.एस.टी या मुद्द्यांचा फार उपयोग होणार नाही हे स्पष्ट होईल. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत जी.एस.टी च्या अंमलबजावणीमधील अडचणी नक्कीच दूर झाल्या असतील. तेव्हा अजून १६-१७ महिन्यांनी या मुद्द्यांचा रेलेव्हन्स काहीही राहणार नाही. असहिष्णुतेच्या मुद्द्यात टीव्हीवर चर्चा करणारे, मोठेमोठे विचारवंत इत्यादी मूठभर मंडळी सोडली तर ९९% भारतीयांना फार रस होता असे वाटतही नाही. त्यातच बिहार विधानसभा निवडणुकांच्या वेळी ते शस्त्र आधीच वापरून झाले आहे. आता त्याचा परत उपयोग करायला गेले तर तो प्रयोग नक्कीच फसेल.तेव्हा २०१९ मध्ये मोदींना नक्की कोणत्या मुद्द्यावरून घेरायचे हा प्रश्न विरोधकांपुढे नक्कीच पडेल. आपले या मुद्द्यांवर मत काय? तसेच माझ्या हातून कुठचा मुद्दा निसटला असल्यास तो लक्षात आणून द्यावा ही विनंती. असो. आता वाट बघत आहे १८ डिसेंबरची.
वर्गीकरण
राजकारण

प्रतिक्रिया द्या
22190 वाचन

💬 प्रतिसाद (109)
श
शाम भागवत गुरुवार, 12/14/2017 - 12:21 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
म
मंदार कात्रे गुरुवार, 12/14/2017 - 13:23 नवीन
TimesNow Exit Polls Bjp 109 Cong 70
  • Log in or register to post comments
म
मंदार कात्रे गुरुवार, 12/14/2017 - 13:24 नवीन
Republic TV- C Voter Exit Poll Survey Bjp 115 Cong 64
  • Log in or register to post comments
S
SHASHANKPARAB गुरुवार, 12/14/2017 - 13:44 नवीन
#TCExitPoll Himachal Elections Vote Forecast BJP 51% ± 3% Congress 38% ± 3% Others 11% ± 3%
  • Log in or register to post comments
S
SHASHANKPARAB गुरुवार, 12/14/2017 - 13:46 नवीन
Seat Projection BJP 55 ± 7 (Plus / Minus 7) Seats Congress 13 ± 7 (Plus / Minus 7) Seats Others 0 ± 3 (Plus / Minus 3) Seats
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: SHASHANKPARAB
S
SHASHANKPARAB गुरुवार, 12/14/2017 - 14:40 नवीन
#TCExitPoll Gujarat Elections 2017 Seat Projection BJP 135 ± 11 (Plus / Minus 11) Seats Congress+ 47 ± 11 (Plus / Minus 11) Seats Others 0 ± 3 (Plus / Minus 3) Seats 33 replies 444 retweets 381 likes Reply 33 Retweet 444 Like 381 #TCExitPoll Gujarat Elections 2017 Vote Forecast BJP 49% ± 3% Congress+ 38% ± 3% Others 13% ± 3%
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 12/14/2017 - 14:44 नवीन
चाणक्यने गुजरातमध्ये भाजपला १२४ ते १४६ तर काँग्रेसला ३६ ते ५८ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशात चाणक्यने एक्झिट पोलमध्ये भाजपला सर्वात जास्त २८५ जागा दिल्या होत्या. आणि त्यांचा एक्झिट पोल प्रत्यक्ष निकालाच्या सर्वात जवळ होता.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 12/14/2017 - 14:49 नवीन
चाणक्यचे गुजरात आणि हिमाचलमधील एक्झिट पोल्सः गुजरात

#TCExitPoll Gujarat Elections 2017
Vote Forecast
BJP 49% ± 3%
Congress+ 38% ± 3%
Others 13% ± 3%
For more info kindly visit our website https://t.co/WvdmQF363w

— Today's Chanakya (@TodaysChanakya) December 14, 2017

#TCExitPoll Gujarat Elections 2017
Seat Projection
BJP 135 ± 11 (Plus / Minus 11) Seats
Congress+ 47 ± 11 (Plus / Minus 11) Seats
Others 0 ± 3 (Plus / Minus 3) Seats

— Today's Chanakya (@TodaysChanakya) December 14, 2017
हिमाचल प्रदेश

#TCExitPoll Himachal Elections
Vote Forecast
BJP 51% ± 3%
Congress 38% ± 3%
Others 11% ± 3%
For more info kindly visit our website https://t.co/WvdmQF363w

— Today's Chanakya (@TodaysChanakya) December 14, 2017

#TCExitPoll Himachal Elections
Seat Projection
BJP 55 ± 7 (Plus / Minus 7) Seats
Congress 13 ± 7 (Plus / Minus 7) Seats
Others 0 ± 3 (Plus / Minus 3) Seats
For more info kindly visit our website https://t.co/WvdmQF363w

— Today's Chanakya (@TodaysChanakya) December 14, 2017
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 12/14/2017 - 15:31 नवीन
आतापर्यंत आलेले सगळे एक्झिट पोल गुजरातमध्ये भाजपचा विजय होणार आहे असे म्हणत आहेत. विजय किती मोठा असेल याविषयी वेगवेगळ्या पोल्सचे आकडे वेगवेगळे आहेत पण विजय भाजपचाच असेल यावर सगळ्यांचे एकमत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांनंतर सर्व एक्झिट पोल्सचे एकमत असायची ही पहिलीच वेळ असावी. २०१४ मध्ये प्रत्यक्षात निकाल लागले ते चाणक्यच्या अंदाजासारखे लागले होते. जर हे निकाल प्रत्यक्षात लागले तर भाजपने १९९५, १९९८, २००२, २००७, २०१२ आणि २०१७ या सहा विधानसभा निवडणुका लागोपाठ जिंकल्या असतील. बंगालमध्ये डाव्या आघाडीने ७ निवडणुका लागोपाठ जिंकल्या होत्या. अलीकडच्या काळात असे दुसरे उदाहरण पटकन आठवतही नाही.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 12/14/2017 - 15:48 नवीन
यशवंत देशमुखांनी थोड्या वेळापूर्वी आकडेवारी जाहिर केली. त्या आकड्यांप्रमाणे पाटीदार समाजाच्या मतांत काँग्रेसने मोठी आघाडी मिळवली आहे. पाटीदारांमधील विविध गटांमध्ये काँग्रेसने १०% ते २०% इतकी मते मागच्या वेळेपेक्षा जास्त मिळवली आहेत असा अंदाज आहे. पण त्याचवेळी इतर समाजघटकांमध्ये काँग्रेसची मोठी पिछेहाट होण्याचा अंदाज आहे. ती मते भाजपकडे जायचा अंदाज आहे. त्यामुळे काँग्रेसने पाटीदार समाजाकडून बरीच जास्त मते मिळवूनही निकाल फिरायची शक्यता नाही. यशवंत देशमुखांनी अजून एक इंटरेस्टींग आकडेवारी सादर केली. त्यांच्या मते १८ ते २२ वर्षे वयोगटात काँग्रेसला ४६% तर भाजपला ४३% मते मिळतील आणि जसे वय वाढत जाते त्याप्रमाणे भाजपला मत द्यायचे प्रमाण वाढत जात आहे. हा कल भविष्यात कायम राहिला तर ते भाजपसाठी धोक्याचे असेल. १८ ते २२ वयोगटातले मतदार म्हणजे गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार कधीच न अनुभवलेले मतदार आहेत. बहुदा हार्दिक पटेल वगैरे तरूण नेत्यांमुळे ते प्रभावित झालेले दिसतात. तसे असेल तर ती वाईट गोष्ट असेल. कारण असल्याच मतदारांमधून आणखी एखादा जातीपातीचे राजकारण करणारा हार्दिक पुढे यायचा.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 12/15/2017 - 08:19 नवीन
१८ ते २२ वयोगटातले मतदार म्हणजे गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार कधीच न अनुभवलेले मतदार आहेत.
अजून एक, साधारण याच वयात राजकीय धारणा पक्क्या होत जातात, त्यामुळे असे होत राहणे भाजपासाठी दीर्घकालीन धोक्याचे आहे. माझे व्यक्तीगत मत - रहुल गांधी सिरिअस आहे, किंवा त्याच्या मागची जी कोनती लॉबी अहे ते सेरिअस आहेत, पण २०१९ साठी नव्हे, तर ते २०२४ मध्ये संपूर्ण काँग्रेस सरकार आण्ण्याचा प्लॅन बनवत आहेत असे वाटते. साधारण लोकांची मेमरी ३-४ वर्षे असते, त्यानंतर बर्याच संवेदना बोथट होत जातात, जसेजसे २०२० सरेल, तसे २जी ३जी कोळसा वगैरे चे गांभीर्य कमी होत जाईल, आणि त्यावेळेस राहुलला एक गंभीर राजकारणी म्हणून सादर करायला लागेल. त्याची ही आत्ता फक्त पूर्वतयारी चालू आहे. बोलायला बाकी सर्व ठीक आहे. गुजरात ही एक प्रयोगशाळा होती, आणि त्यात काँग्रेस बर्‍यापैकी यशस्वी झाली आहे असे माझे मत आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
श
श्रीगुरुजी Fri, 12/15/2017 - 10:09 नवीन
यशवंत देशमुखांनी अजून एक इंटरेस्टींग आकडेवारी सादर केली. त्यांच्या मते १८ ते २२ वर्षे वयोगटात काँग्रेसला ४६% तर भाजपला ४३% मते मिळतील आणि जसे वय वाढत जाते त्याप्रमाणे भाजपला मत द्यायचे प्रमाण वाढत जात आहे. हा कल भविष्यात कायम राहिला तर ते भाजपसाठी धोक्याचे असेल. १८ ते २२ वयोगटातले मतदार म्हणजे गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार कधीच न अनुभवलेले मतदार आहेत. बहुदा हार्दिक पटेल वगैरे तरूण नेत्यांमुळे ते प्रभावित झालेले दिसतात. तसे असेल तर ती वाईट गोष्ट असेल. कारण असल्याच मतदारांमधून आणखी एखादा जातीपातीचे राजकारण करणारा हार्दिक पुढे यायचा. हा अंतिम निष्कर्ष नाही. हा सर्सेक्षणातून निघालेला एक अंदाज आहे. हा अंदाज प्रत्यक्षात खरा निघाला तरी ३% फरक हा फार कमी आहे. हार्दिक सारख्या तरूण नेत्यांचे पितळ उघडे पडायला सुरूवात झाली आहे. हार्दिकमध्ये काँग्रेसने व्हेन्चर कॅपिटलसारखी गुंतवणू़क केलेली दिसते. द्वितीय श्रेणीत बी कॉम झालेल्या एका निरूद्योगीला काँग्रेस जेव्हा मर्सेडिझ, भारी हॉटेले, बायका इ. पुरविते तेव्हा त्याच्याकडून तितक्याच परताव्याची अपेक्षा असणार. कॉंग्रेसला अपेक्षित परतावा त्याच्याकडून मिळाला नाही तर काँग्रेस आपली गुंतवणूक त्याच्याकडून दामदुपटीने वसूल करेल आणि त्यावेळी त्याच्यामागे गेलेल्या तरूणांचा भ्रमनिरास होईल. तो दिवस फार दूर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ट
ट्रेड मार्क Fri, 12/15/2017 - 15:04 नवीन
हार्दिक पटेलचा साथीदार आता हार्दिक ने कसं फसवलं याची हकीकत सांगतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सिंथेटिक जिनियस गुरुवार, 12/14/2017 - 16:23 नवीन
असल्याच मतदारांमधून आणखी एखादा जातीपातीचे राजकारण करणारा हार्दिक पुढे यायचा. >>> मोदी जातियवादी नाहीत हा आपला समज आहे काय? मी तेली जातीचा आहे,बहुजन आहे वगैरे बरेचदा रडून झाले आहे मोदींचे.पण या बहुजनाचे बोलवते धनी नागपुरात बसले आहेत.व ते जातीयवादी आहेत हे सत्य आहे.आरएसएसच्या संघप्रमुखांची यादी बघितली की बहुजनांना वापरुन घ्यायचे व पदं द्यायची वेळ आली कि आपलाच जातबंधू बघायचा हा त्यांचा आजपर्यंतचा इतिहास आहे.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 12/14/2017 - 17:45 नवीन
ब्राह्मणांना १९४८ मधे मस्त मार बसला आणि पुढेही असा बसावा, बसेल अशी खात्री आहे म्हणणारा जिनियस मोदींचा जातीयवाद काढतो? काय पुरोगामी स्टँडर्ड आहे म्हणावं!! ================== नागपुरच्या ब्राह्मणांनी गुजराती तेल्यासाठी जीवाचं रान करावं, त्याला पक्षापेक्षा मोठं करावं, होऊ द्यावं, तो गेला तर पक्ष हारेल इतका मोठा करावा हा जातीयवाद कसा? ====================
आरएसएसच्या संघप्रमुखांची यादी बघितली की बहुजनांना वापरुन घ्यायचे व पदं द्यायची वेळ आली कि आपलाच जातबंधू बघायचा हा त्यांचा आजपर्यंतचा इतिहास आहे.
जणू काही संघाची पद बहुजनांना देऊन ब्राह्मण राष्ट्रपती, पंतप्रधान झाले असते तर तुम्ही कौतुकच करणार होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिंथेटिक जिनियस
स
सुबोध खरे गुरुवार, 12/14/2017 - 18:07 नवीन
जिनियस राव आपली पातळी फारच खाली उतरली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिंथेटिक जिनियस
अ
अर्धवटराव गुरुवार, 12/14/2017 - 18:07 नवीन
जातीयतेचे प्रॉब्लेम्स, त्याचा परिघ, आणि त्याचे सद्यःस्थितीतले/भविष्यकालीन परिणाम फार गंभीर आहेत. येऊन जाऊन आर.एस.एस च्या नावाने नको ति बिलं फाडुन त्या समस्येच्या आकलनाचा बोजवारा का उडवतोस ? आर.एस.एस सुद्धा एक समस्या आणि संधी आहे. पण त्यांना असं चुकीच्या खिंडीत पकडता येणार नाहि. तुझ्याच डोक्याला टेंगळं येतील. ट्रोलींग म्हणुन असले विषय काढायचे असतील तर गोष्ट वेगळी. पण मुद्दाम चुकीचे विचार करुन स्वतःच्या बुद्धीची हानि करुन घेऊ नकोस. अधिक काय बोलणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिंथेटिक जिनियस
M
mayu4u Fri, 12/15/2017 - 07:46 नवीन
आरएसएसच्या संघप्रमुखांची यादी बघितली की बहुजनांना वापरुन घ्यायचे व पदं द्यायची वेळ आली कि आपलाच जातबंधू बघायचा हा त्यांचा आजपर्यंतचा इतिहास आहे.
सध्या देशाच्या पंतप्रधानांची आणि राष्ट्रपतींची जात काय आहे? अजूनही तुम्ही जाती आणि धर्मावरच अडकून पडलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिंथेटिक जिनियस
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 12/14/2017 - 16:24 नवीन
माझ्या मते गुजरातमध्ये भाजप १३० ते १३५ आणि काँग्रेस ४० ते ४५ जागा जिंकेल. गॅरी ट्रुमन अभिनंदन....!!!! आज जवळ जवळ सर्वच एक्झिट पोल आपल्याच अंदाजापर्यन्त बोलत आहेत. ग्रेट....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 12/14/2017 - 17:46 नवीन
सर्व पुरोगाम्यांचे मनःपूर्वक सांत्वन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 12/15/2017 - 05:32 नवीन
असं म्हणतात, वाईट दिवस असले की उंटावर बसलेल्या माणसालाही कुत्रा चावतो. खरं तर आमची बांधीलकी आधुनिक जगाशी आणि आधुनिक विचारांशी....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
स
सुबोध खरे Fri, 12/15/2017 - 05:36 नवीन
वाईट दिवस असले की उंटावर बसलेल्या माणसालाही कुत्रा चावतो. ह ह पु वा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
A
arunjoshi123 Fri, 12/15/2017 - 07:07 नवीन
वाईट दिवस असले की उंटावर बसलेल्या माणसालाही कुत्रा चावतो.
वाईट दिवस वैगेरे काही नसतं. या सगळ्या मागास संकल्पना आहेत. किमान कुत्रा चावल्यावर तरी आपण ज्या उंटावर तोर्‍यात निघालो होतो तो फार काही योग्य दिशेने जास्त नाहीये हे कळायला हवं. कुत्री उठून अश्शीच कुणालाही चावत नाहीत. ======================== आधुनिकता एक भंकस संकल्पना आहे. मनुष्याची प्राथमिक बांधिलकी चांगुलपणाशी हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अ
अभ्या.. Fri, 12/15/2017 - 07:13 नवीन
आधुनिकता एक भंकस संकल्पना आहे. मनुष्याची प्राथमिक बांधिलकी चांगुलपणाशी हवी..
जोशानु क्वचित कधीतरी लै भारी लिहून जाता तुम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
च
चिनार Fri, 12/15/2017 - 08:15 नवीन
बरोबर आहे रे अभ्या तुझं.. पण एका वाक्यासाठी त्यांचे सगळे प्रतिसाद वाचणं नाही ना परवडत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
आ
आनन्दा Fri, 12/15/2017 - 08:20 नवीन
हो ना, आणि ते करतात तेव्हा गठ्ठा मतदान करतात.. त्यामुळे त्या गठ्ठ्यातून असले मोती शोधंणे फार जिकीरीचं काम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
A
arunjoshi123 Fri, 12/15/2017 - 10:22 नवीन
उपमा कशाचीही कशालाही द्या, पण तिच्यात बेसिक तांत्रिक चूक नसावी ना? ================= बाकी आपल्या देशात अभिव्यक्तिस्वातंत्र्य सर्वात स्वस्त असल्याने आम्ही तेच स्टेपल फूड म्हणून वापरतो, अचार म्हणून नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 12/15/2017 - 16:26 नवीन
निसंशयपणे राजकीय अथवा गैरराजकीय चर्चांमध्ये सर्वात जास्त लॉजिकल प्रतिसाद देणारे एकमेव म्हणजे अ. जो. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
न
नाखु Fri, 12/15/2017 - 18:05 नवीन
एकदा एकांगी शिक्का मोर्तब केलं की कितीही मनापासून सांगीतले तरी फरक पडत नाही. अश्याच जेष्ठ पुरोगामी संपादकांच्या ​ न पुसता येणार्‍या शिक्क्याचा बळी नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 12/16/2017 - 06:08 नवीन
दुर्दैवाने खरे आहे :(.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ग
गॅरी ट्रुमन Fri, 12/15/2017 - 04:35 नवीन
२०१४ मध्ये लोकसभेच्या वेळी माझे अंदाज चुकले होते त्याप्रमाणे आताही चुकले तर चांगले वाटेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क
कापूसकोन्ड्या Sat, 12/16/2017 - 04:07 नवीन
गॅरी ट्रुमन अभिनंदन....!!!! आज जवळ जवळ सर्वच एक्झिट पोल आपल्याच अंदाजापर्यन्त बोलत आहेत. बीजेपी येणार याचे वाईट वाटत असले तरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
D
damn गुरुवार, 12/14/2017 - 17:59 नवीन
भाजपा: 160+ congress: 10
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 12/14/2017 - 20:39 नवीन
गॅरी ट्रुमन, मतदानाची टक्केवारी ६८% च्या आसपास आहे. इथे वर्तवलेल्या भाकिताप्रमाणे भाजपला १३० तर काँग्रेसला ५२ जागा मिळायला पाहिजेत. या तक्त्यात मतदान टक्केवारीनुसार पक्षांचा हिस्सा आणि जागांचा अंदाज बांधला आहे. सहसा अशा प्रकारचा तक्ता कुणी बनवंत नाही. म्हणून मला या तक्त्याच्या भाकिताबद्दल जाम कुतूहल आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Fri, 12/15/2017 - 04:34 नवीन
मला वाटते भाजपला पाहिजे होते तितके मतदान झालेले दिसत नाही. जर जास्तीत जास्त लोकांना घराबाहेर काढून मतदान करायला उद्युक्त करणे हा उद्देश असेल तर तो सफल झालेला दिसत नाही. अन्यथा मागच्या वेळेपेक्षा कमी मतदान का झाले याचे उत्तर देता येणार नाही. याविषयीचा माझा तर्क हा की २२ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर काही प्रमाणावर भाजप सरकारविरूध्द नाराजी होतीच. पण तरीही काँग्रेस हा पर्याय वाटत नसल्यामुळे अनेकांना मतदान न करणे अधिक श्रेयस्कर वाटले असेल. या गोष्टीची कल्पना करता येते. समजा काही कारणाने मोदी सरकारविरूध्द माझे मत बनले तरीही अफजल गुरूला हुतात्मा वगैरे समजणार्‍यांना मी तरी कधीच मत देऊ शकणार नाही. असेच अनेकांना वाटले असेल ही शक्यता आहे. जर काँग्रेसने या मतदारांना आपल्याकडे वळवून घेतले असते तर काँग्रेसला विजय मिळवणे सोपे गेले असते. हा तर्क खरा असेल तर यावरून एक गोष्ट चांगली घडेल. लोकांना मोदींना पर्याय हवा असेल तर तो पर्याय मोदींपेक्षा चांगला हवा असा त्याचा अर्थ होईल. मोदींना काही प्रश्न सोडविण्यात अपयश आले म्हणून मोदींना मत द्यायचे नाही पण नेमके तेच प्रश्न निर्माण करणार्‍यांना मत द्यायचे हा विचित्र प्रकार सुशिक्षित-पुरोगामी इत्यादी वर्गात दिसत आहे.पण इन जनरल लोकांचे ते मत नाही असा अर्थ त्यातून निघत असेल तर ते चांगलेच असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
सुबोध खरे Fri, 12/15/2017 - 05:18 नवीन
नवऱ्याबरोबर भांडण झालं म्हणून कोणी स्त्री शेजाऱ्याबरोबर लफडं करणार नाही. पुरोगाम्यांची तशी अपेक्षा होती असे वाटते. त्यामुळे त्यांचा अपेक्षा भंग झाला तर त्याला ते स्वतः जबाबदार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 12/15/2017 - 11:56 नवीन
मोदींना काही प्रश्न सोडविण्यात अपयश आले म्हणून मोदींना मत द्यायचे नाही पण नेमके तेच प्रश्न निर्माण करणार्‍यांना मत द्यायचे हा विचित्र प्रकार सुशिक्षित-पुरोगामी इत्यादी वर्गात दिसत आहे. चपखल ! एकदम कानाखाली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
स
सौन्दर्य गुरुवार, 12/14/2017 - 23:36 नवीन
मी राजकारणातला आपल्या सगळ्यांसारखा अभ्यासू, जाणकार वगैरे काही नाही त्यात गेली दहा एक वर्ष भारतात राहतही नाही, त्यामुळे गुजरातमधील निवडणुकांवर अधिकार वाणीने बोलू शकत नाही. पण मी, १९९० ते २००४ पर्यंत जवळजवळ चौदा वर्षे गुजरातमध्ये नोकरी निमित्त्ये घालवली. अगदी सुरत ते कच्छ आणि संपूर्ण सौराष्ट्र कामानिमित्ते पालथं घातलं. मार्केटिंगची नोकरी असल्यामुळे अनेक स्थानिक गुजराती व्यापार्यांशी अगदी जवळून संबंध आला. ह्या संपर्का दरम्यान गुजराती माणसाची व्यापारी वृती अगदी जवळून पाहिली आणि अनुभवली. ह्याच निरीक्षणावरून मला असे वाटते की ही निवडणूक बीजेपीसाठी संघर्षाची ठरणार आहे. निश्चलनीकरण, कॅशलेस व्यवहार आणि जीएसटी ह्या तिन्ही गोष्टींचा भारतातील बहुसंख्य व्यापार्यांना त्रास झाला आणि गुजरातमधील व्यापारी देखील त्याला अपवाद नसावेत. त्यामुळे जातीयवाद, आरक्षण, धर्म वगैरेपेक्षा आर्थिक निकषांवर मतदान होईल असे मला वाटते. जर तसे झाले तर माझ्या मते बीजेपीला ८०-८५ जागा, काँग्रेसला देखील तितक्याच म्हणजे ८०-८५ व उरलेल्या जागा इतर पक्षांना मिळतील. जर तसे झाले तर गुजरातमध्ये सरकार स्थापन करायला ह्या दोन्ही मुख्य पक्षांना, इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 12/15/2017 - 08:12 नवीन
ही गोष्ट खरी आहे, मी पण भाजपा सरकारला कंटाळलोय, पण माझ्याकडे पर्याय आहे कुठे? मी भाजपाला मत दिलं नाही तर काँग्रेस येइल, आणि ते मला परवडणार अहे का? इन्ग्रजीत एक म्हण आहे - known devil is better than unknown angel यावरून काय ते समजून जा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौन्दर्य
ट
टर्मीनेटर Fri, 12/15/2017 - 08:30 नवीन
आपल्या गुजरात विधानसभा निवडणुक-२०१७ ह्या आधीच्या धाग्यावर मी खालील प्रतिसाद दिला होता : काल पहिल्या फेरीत झालेले ६८% मतदान आणि गुजरात मध्ये राहणारे नातेवाईक, मित्र व व्यावसायानिमित्ताने ओळखीचे झालेले काही व्यापारी ह्यांच्याशी झालेल्या बोलण्यावरुन असा अंदाज वर्तवायचे धाडस करतोय कि (अमित शहा व बाकीच्या कार्यकर्त्यांचा अंदाज १५०+ असला तरी) बीजेपी १४० चा आकडा गाठण्याची शक्यता आहे. काल दुसऱ्या फेरीत झालेले ६८.७०% मतदान विचारात घेता मी माझ्या १४० ह्या अंदाजावर कायम राहतोय. कारण २०१७ मध्ये झालेले ६७.४०% मतदान हे २०१२ मध्ये झालेल्या ७१.३२% पेक्षा कमी आहे परंतु आपल्या हक्काच्या मतदारांची मते दोन्ही पक्षांनी म्हणजे काँग्रेस आणि बीजेपी ह्यांनी नक्कीच मिळवली असतील. २०१७ मध्ये झालेली हि घट माझ्या मते काठावरचे मतदार, बीजेपी वरील नाराज मतदार तसेच कुठलाही सक्षम पर्याय उपलब्ध नसल्यामुळे उदासीन राहिलेले मतदार ह्यांच्यामुळे झाली असावी. अर्थात पटेल आंदोलन व ईतर काही प्रश्न सोडवण्यात आलेले अपयश ह्या कारणामुळे आपल्याला मिळणाऱ्या मतांमध्ये ह्यावेळी घट होणार आहे हे आधीच विचारात घेऊन अमित शहांनी हि तूट भरून काढण्यासाठी उपाययोजना करून ठेवलेली असणार. नोटबंदी हा मुद्दा निरर्थक असल्याचे उ.प्र. मध्ये सिद्ध झालेले आहे. जी.एस.टी हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असून त्या कारणा मुळे व्यापाऱ्यांमध्ये कितीही नाराजी असली तरी राज्यात विरोधात मतदान करून गुजराती पंतप्रधानांचे त्यांच्याच राज्यात नाक कापण्याची आमची मानसिकता नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. आपण परिस्थिती १: भाजप १५०+, काँग्रेस २० ते २५ मध्ये म्हंटल्याप्रमाणे भाजपला विजय मिळत आहे हे बघता भाजपचे खालच्या पातळीवरचे लोक (नगरसेवक, पदाधिकारी इत्यादी) अधिक माजतील हा धोका मोठा आहे. असे होण्याचा धोका नक्कीच मोठा आहे पण नरेंद्र मोदी व अमित शहांच्या एकंदरीत विचारपद्धती, तसेच अनेक कटू निर्णय व धोके पत्करण्याची त्यांची क्षमता ह्यांवरून असे वाटते कि त्यांनीही हा धोका विचारात घेतला असावा. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकलेली असल्यामुळे सध्यातरी त्यांचे मुख्य उद्दिष्ट राज्यसभेत बहुमत मिळवणे असून ते पूर्ण झाले कि शेवटच्या वर्षभरात लोकप्रिय निर्णय घेऊन जनमानसात आपली प्रतिमा आणखीन उंचावण्याचा त्यांचा हेतू असावा. हा हेतू साध्य झाला कि २०१९ ची लोकसभा व त्यापुढील निवडणुकांत कोणत्याही आयाराम गयारामांना उमेदवारी नाकारून दिल्ली महानगर पालिकांत सर्व नवीन उमेदवार देण्याचा यशस्वी झालेला प्रयोग (काही अपवाद वगळता) देशभर करण्याचा धाडसी निर्णय ते घेऊ शकतात.
  • Log in or register to post comments
च
चिर्कुट Fri, 12/15/2017 - 11:29 नवीन
>>गुजराती पंतप्रधानांचे त्यांच्याच राज्यात नाक कापण्याची आमची मानसिकता नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. काय ही वैचारिक दिवाळखोरी.. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर
ग
गॅरी ट्रुमन Fri, 12/15/2017 - 13:44 नवीन
धन्यवाद टर्मिनेटर.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकलेली असल्यामुळे सध्यातरी त्यांचे मुख्य उद्दिष्ट राज्यसभेत बहुमत मिळवणे असून ते पूर्ण झाले कि शेवटच्या वर्षभरात लोकप्रिय निर्णय घेऊन जनमानसात आपली प्रतिमा आणखीन उंचावण्याचा त्यांचा हेतू असावा.
हो. मोदींना लवकरात लवकर राज्यसभेत बहुमत मिळवायचे आहे असे दिसते. पण त्यासाठी मोदी ज्याप्रकारे पावले उचलतात त्यामुळे विरोधकांना नेहमीच कात्रजचा घाट दाखवण्यात यशस्वी होतात. उत्तर प्रदेशात शेवटी २ दिवस मोदी वाराणसीमध्ये तळ ठोकून होते. तेव्हा ल्युटिन्स मिडियामध्ये म्हटले जात होते की बहुमताला जागा कमी पडतील हे लक्षात आल्यामुळे मोदी ताकद पणाला लावून हातातून निसटत चाललेले बहुमत मिळवायचा प्रयत्न करत आहेत. पण प्रत्यक्षात मोदी स्वतःची ताकद पणाला लावून नुसत्या बहुमताला आवश्यक असलेल्या २०० जागांपलीकडे नाही तर ३०० च्या पुढचा पल्ला मारायचा प्रयत्न करत होते. त्यावेळी त्यांना राष्ट्रपती निवडणुक आणि राज्यसभेत लवकरात लवकर बहुमत मिळवायचे हे दोन उद्देश होते असे दिसते. यावेळीही मोदींनी मणीशंकर अय्यर, मनमोहन यांना अधिकाधिक जाळ्यात कसे पकडले याविषयी भाऊ तोरसेकरांनी http://jagatapahara.blogspot.in/2017/12/blog-post_14.html हा आणखी एक जबरदस्त लेख लिहिला आहे. एकूणच मोदी नक्की काय करतात आणि कशाकरता करतात हे लगेच लक्षात येत नाही तर काही काळ गेल्यानंतरच समजते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर
श
श्रीगुरुजी Fri, 12/15/2017 - 10:17 नवीन
२०१५ मधील दिल्ली व बिहार विधानसभा निवडणुकीनंतर सर्वेक्षणावरील विश्वास पूर्ण उडाला आहे. त्यामुळे वरीलपैकी कोणत्याही एक्झिट पोल्सच्या आकड्यांवर विश्वास नाही. भाजप दोन्ही राज्यात जिंकणार हा माझा सुरवातीपासूनच अंदाज आहे व त्यासाठी कोणत्याही एक्झिट पोल्सच्या आकड्यांचा आधार घेण्याची गरज नाही.
  • Log in or register to post comments
B
babu b Fri, 12/15/2017 - 12:19 नवीन
राम करो अन ह्यावेळीही सर्व सर्वेंवरचा तुमचा विश्वास उडो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मराठी कथालेखक Fri, 12/15/2017 - 13:39 नवीन
भाजप ९० च्या आसपास काँग्रेस ८० च्या आसपास
  • Log in or register to post comments
B
babu b Fri, 12/15/2017 - 14:03 नवीन
गुजरात निवडणुकीत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिष्ठा पणाला लागलेली असतानाच भाजपला पक्षातूनच घरचा अहेर मिळाला आहे. गुजरात निवडणुकीत पक्षाचा पराभव होणार, असं धक्कादायक वक्तव्य करून भाजपचे खासदार संजय काकडे यांनी भाजपमध्ये खळबळ उडवून दिली आहे. तर पक्षातील इतर नेत्यांनी मात्र काकडेंचं भाकीत फेटाळून लावलं आहे. णे महापालिका निवडणुकीत भाजपला ९२ जागा मिळतील असा अंदाज काकडे यांनी वर्तवला होता. हा अंदाज जवळपास खरा ठरला होता. पालिका निवडणुकीत भाजपचा ९८ जागांवर विजय झाला होता. गुजरातमधील निवडणुकीचं सर्वेक्षण अशाच निकषांवर केलं आहे. यामुळे भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता कमीच आहे, असं काकडेचं म्हणणं आहे. https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/bjps-kakade-predicts-loss-for-his-party-in-guj-polls/articleshow/62085035.cms
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 12/15/2017 - 14:35 नवीन
काकडे फेक (ऊ) माणूस आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: babu b
ग
गामा पैलवान Fri, 12/15/2017 - 17:37 नवीन
श्रीगुरुजी,
भाजप दोन्ही राज्यात जिंकणार हा माझा सुरवातीपासूनच अंदाज आहे व त्यासाठी कोणत्याही एक्झिट पोल्सच्या आकड्यांचा आधार घेण्याची गरज नाही.
भाजप बहुमत जिंकणार हे नक्की. त्यासाठी उत्तरचाचणींची आवश्यकता नाही. मात्र किती जागा मिळवेल हे कुतूहल आहेच. त्यासाठी या चाचण्या बऱ्या पडतात. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ज
जेसीना Sat, 12/16/2017 - 07:02 नवीन
माझ्या मते मोदींचा सगळ्यात मोठं ध्येय आहे कि त्यांनी २०१४ च्या इलेकशन च्या वेळेला दिलेली आश्वासन पूर्ण करणं, त्यात सगळ्यात मोठा घोडा आहे तो म्हणजे त्यांची राज्यसभेतली संख्या ती वाढवणे त्यांच्यासमोर खूप मोठा प्रश्न आहे (उदाहरण म्हणजे काश्मीर मधील ३७० कलम ) आता उत्तर प्रदेश मध्ये मोठ्या बहुमताने त्यांचे आमदार निवडून आले त्याने निश्चितच त्यांचे संख्याबळ राज्यसभेत वाढले आहे , पण तरीसुद्धा थोडी जी कमी आहे ती जर गुजरात मध्ये मोठ्या बहुमताने जर त्यांचे आमदार निवडून आले तर खूप प्रमाणात वाढेल. आणि मोदी-शहा जोडीने सध्या त्याच उद्धेशाने गुजरात मध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रचार केला खरे पाहता त्यांच्या प्रचारात एव्हडा भाग न घेता सुद्धा त्यांना आरामात निवडून येणं शक्य होता पण त्यांच्या खरा हेतू हा त्यांच्या आमदारांची संख्या वाढवणं हा होता जे कोणी म्हणत होते कि काँग्रेस चा ह्या वेळी खूप दबदबा असणार आहे म्हणून मोदी शहा जोडी खूप मोठ्याप्रमाणात प्रचार करते हे माझ्या मारे तरी खूप चुकीचे आहे, काँग्रेस , हार्दिक किती पण बोलले तरी ५०-५५ च्या पुढे जाणं कठीण आहे माझ्या मते तरी गुजरात मध्ये भाजप १३५ च्या आसपास जाईल कदाचित पुढे सुद्धा २०१९ मध्ये निश्चितच मोदी येतील पण त्या अगोदर २०१८ मध्ये ते खूप मोठे निर्णय घेतील असे वाटते (लोकसभे मध्ये त्यांच्याकडे निर्विवाद बहुमत आहेच, राज्यसभेत सुद्द्धा येईल आणि राष्टपती सुद्धा आता त्यांचेच आहेत ) त्यामुळे त्यांना आता कोणत्याही निर्णयात कोणताच घोड़ा मध्ये येणार नाही अपेक्षा हीच कि जो काही निर्णय घेतील तो जनतेच्या हिताचा निर्णय असावा ३७० हा खूप गुंतागुंतीचा कलम आहे पण २०१८ च्या अखेरीस पर्यंत नक्की सुटेल असा वाटते , बाकीचे आश्वासन जसे काळा पैसा साथीचे विधेयक जे कदाचित खूप कठीण असेल ते राज्यसभेत सध्या तरी अडकण्याची शक्यता खूप आहे ते सुद्धा २०१८ च्या अखेरीस येईल असा अंदाज आहे कदाचित हेच दोन महत्वाचे निर्णय त्यांना २०१९ मध्ये ३५०+ घेऊन जाईल असे वाटते ... आणि हेच मोदींचे सध्याचे टार्गेट आहे असा माझा तरी अंदाज आहे बघूया १८ तारखेची वाट बघत आहे
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 12/16/2017 - 10:21 नवीन
जेसीना, १००% सहमत !!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा