भाव तेथे(च) देव:......यनावाला
भाव तेथे(च) देव:......यनावाला
आमच्या कोकणात गणेश चतुर्थीचे महत्त्व अन्य धार्मिक सणांच्या तुलनेत सर्वाधिक असते. उत्सव दीड दिवसाचाच, पण त्या काळात गणपतीच्या मूर्तीला सतत जिवापाड जपावे लागते. मूर्तीला कुठे तडा गेला, टवका उडाला, देवापुढील समई-निरांजन विझून अंधार झाला तर ते अगदी अशुभ मानतात. लहानपणी मी एकदा आईला विचारले," आई, या मूर्तीत खरोखरच देव असतो का? " त्यावर ती म्हणाली, " अरे, मानला तर देव. नाहीतर मातीचा बाहुला."
......म्हणजे देव हा केवळ मानण्यावर आहे. काल्पनिक आहे. त्याला खरे अस्तित्व नसावे. असे मला तेव्हापासून वाटू लागले. पुढे "गणपती म्हणजे मातीचा बाहुला." हेच बुद्धीला पटले.
"जगनिर्माता, जगन्नियंता, पूजा-अर्चा-प्रार्थना-आरती-नैवेद्य यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटात धावून येणारा देव अस्तित्वात आहे." हे विधान कोणत्याही तर्कसंगत युक्तिवादाने बुद्धीला पटविता येत नाही. देवाचे गुणवर्णन आहे की तो सर्वसमर्थ-सर्वसाक्षी-सर्वव्यापी-करुणेचा सागर-दीनांचा कैवारी-दुष्टांचा निर्दालक आहे. त्यांतील एकाही गुणधर्माचा कधीही प्रत्यय दिसत नाही. अनुभव येत नाही. मानवाच्या अधिकृत ज्ञानभांडारात देवाला स्थान नाही. आपण शाळा-कॉलेजात असताना भौतिकी, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, अशा विषयांचे जे ज्ञान शिकतो ते या अधिकृत ज्ञानसंग्रहातील असते. त्या विषयांच्या अभ्यासक्रमाच्या कोणत्याही पुस्तकात "देव अस्तित्वात आहे." असे विधान नसते. तसेच देव जर आहे तर आपले अस्तित्व सर्वांना पटावे असा काही प्रत्यय तो का देत नाही ? इतका दडून, दडून का राहातो ? याचे कारण कळत नाही. त्याला कसली अडचण आहे ? कोणती भीती आहे ? याचे उत्तर मिळत नाही. त्यामुळे "देव अस्तित्वात आहे." हे विधान खरे कसे मानायचे ? आस्तिक लोक ते विधान पूर्वसंस्कार, ग्रंथप्रामाण्य, शब्दप्रामाण्य, संतवचने यांच्या आधारे केवळ श्रद्धेने सत्य मानतात. "देव अस्तित्वात आहे. असेच आम्हाला वाटते. आमची तशी श्रद्धा आहे." एवढेच त्यांना देवअस्तित्वाच्या समर्थनार्थ सांगता येते. देवाच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा नाही.
कुणी म्हणेल, "प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही पुरावा काय मागता? असे पुरावे देता येतात काय?"
इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. हा पुरावा म्हणजे न्यायालयात लागतो तसला लेखी पुरावा नव्हे. जे विधान तत्त्वत: खरे असण्याची शक्यता असते ते आम्ही सत्यच मानतो. त्यासाठी पुरावा मागत नाही. मग ते विधान प्रत्यक्षत: सत्य असो वा नसो. ते विधान खरे असणे शक्य असले म्हणजे झाले. ही शक्यता ज्ञान, वाचन, अनुभव -विवेक (कॉमनसेन्स) यांच्या आधारे आपल्याला समजू शकते. लेखी पुराव्याची आवश्यकता नसते. समजा तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे पन्नास लक्ष रुपये किंमतीचा हिरा आहे. तर ते विधान मी तत्त्वत: सत्य मानणार. पुरावा मागणार नाही. कारण वैयक्तिक मालकीचा असा हिरा असू शकतो हे मला समजते. आणि तुमच्याकडे तो आहे असे तुम्ही स्वत: सांगत आहात. तेव्हा ते खरे आहे असेच मी मानणार. प्रत्यक्षात तो हिरा तुमच्याकडे आहे किंवा नाही याच्याशी मला काही कर्तव्य नाही. मात्र या हिर्यासंबंधी त्रयस्थाशी बोलताना, "अमुक एक गृहस्थ असे म्हणत होते." असे सांगणार. कारण तुमच्याकडे तसा हिरा आहे की नाही याची मला निश्चित अशी माहिती नाही.
पण समजा कोणी एक म्हणाला की त्याच्याकडे परीस आहे. तर मी ते सत्य मानणार नाही. कारण ते खरे असण्याची शक्यताच नाही. ज्याच्या स्पर्शामुळे लोखंडाचे सोने होते असा मणी अस्तित्वात नाही हे मला समजते. आता, "माझ्याकडे परीस आहेच. " असा जर कोणी हट्टी दावा केला तर त्यासाठी पुरावा मागणे, तुमचा दावा सिद्ध करून दाखवा असे सांगणे, भाग आहे. तसेच ज्या विधानाने कुणाचे चारित्र्यहनन होते असे विधान सत्य असणे शक्य असले तरी काही आधाराविना मी ते सत्य मानणार नाही.
"देव अस्तित्वात आहे." हे जर बुद्धीला पटत असेल ,त्याविषयी कोणत्याही प्रकारची शंका नसेल तर देवावर विश्वास ठेवावा. तिथे श्रद्धेची आवश्यकता काय ? पायथ्यागोरसच्या प्रमेयाची सिद्धता बुद्धिगम्य आहे. म्हणून त्यावर आपण विश्वास ठेवतो. तिथे श्रद्धेची आवश्यकता नसते. एखाद्या गोष्टीची/तत्त्वाची/संकल्पनेची सत्यता बुद्धीला पटली तर विश्वास ठेवतात. ती बुद्धीला पटत नसता भावनेच्या आधारे सत्य मानणे म्हणजे श्रद्धा ठेवणे
काही आस्तिक म्हणतील, "देव अस्तित्वात आहे " हे आम्हाला सिद्ध करता येत नाही. ठीक आहे. मग "देव अस्तित्वात नाही" हे तुम्ही नास्तिक लोक सिद्ध करा ना!"
एखादे विधान सत्य नाही, एखादी गोष्ट अस्तित्वात नाही हे सिद्ध करता येईलच असे नाही. ती गोष्ट अस्तित्वात आहेच असे जे दावा करतात त्यांच्यावरच ते अस्तित्व सिद्ध करण्याचे उत्तरदायित्व (जबाबदारी) असते. न्याय व्यवस्थेत सुद्धा हेच तत्त्व आहे. या संदर्भात "बर्टरॅंड रसेल यांची किटली (रसेल्स टी पॉट)" हे उदाहरण कदाचित् आपल्या वाचनात आले असेल. रसेल म्हणतात, "समजा पृथ्वी आणि मंगळ ग्रह यांच्या मधे कुठेतरी एक किटली आहे. ती आपल्या विवक्षित कक्षेत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. मला तसा साक्षात्कार झाला आहे." असे विधान कोणी केले तर ते खोटे आहे हे आपल्याला कॉमनसेन्सने कळते. पण अशी किटली नाहीच हे सिद्ध करणे शक्य नाही. म्हणून ते विधान खरे मानायचे का ? ज्याचा खोटेपणा अनुभव-विवेकाने सहज समजतो पण तसे सिद्ध करता येत नाही अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. "एवंगुणविशिष्ट देव अस्तित्वात आहे ." हे विधान तशाच प्रकारचे आहे. ते सिद्ध करण्याचे उत्तरदायित्व (जबाबदारी) सर्वस्वी आस्तिकांवर आहे.
एवंच काय तर "देव अस्तित्वात आहे." हे केवळ श्रद्धेनेच सत्य मानता येते. "आमची तशी श्रद्धा आहे." असे म्हटल्यावर पुढचे बोलणेच खुंटते.
श्रद्धा ही एक मनोभावना आहे. आपण जाणताच की बुद्धी आणि भावना यांचा उद्भव माणसाच्या मेंदूत होतो. आनंद-दु:ख, क्रोध-मद-मत्सर इ.अनेक भावना आहेत. भावनांच्या समुच्चयाला मन म्हणायचे. ते अमूर्त आहे. व्यक्तीकडून भावनांचे प्रकटीकरण होते तेव्हा त्या भावनांचा आविष्कार दिसतो. त्यातून मनाचा प्रत्यय येतो. श्रद्धेला मनोभाव अथवा केवळ "भाव" असेही म्हणतात. संत साहित्यात "श्रद्धा " या शब्दापेक्षा त्याच अर्थाचा "भाव" हा शब्द अधिक वेळां वापरलेला दिसतो. तसेच श्रद्धाळू या अर्थी भाविक हा शब्द वापरला आहे. "श्रद्धा" हा शब्द ज्ञानेश्वरीत आहे. गीतेत आहे. पण तुकाराम गाथेत श्रद्धा हा शब्द मला अजून सापडलेला नाही. कुठल्यातरी अभंगात तो असेलही. पण माझ्या पाहण्यात नाही. ज्यात श्रद्धा हा शब्द आहे असा संत नामदेव, संत एकनाथ यांचा एकही अभंग माझ्या वाचनात नाही. "भाव" असा शब्द अनेक अभंगांत आहे. "भाव तेथे देव ." असे एक सुवचन आहे. ते पटण्यासारखे आहे. पुढील वचनांत "भाव" शब्दाचा अर्थ "श्रद्धा’ असाच आहे.
* देह जाओ अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो॥
* भावबळे आकळे एरव्ही नाकळे। करतळीं आवळे । तैसा हरी ॥
* देव भावाचा भुकेला ॥
* भाव धरा S रे । अपुलासा देव करा रे ॥
* करीतसे ध्यास हृदयीं सकळ । भाव तो सबळ । धरियेला ॥
* भाव देवाचा उचित । भाव तोची भगवंत ॥...(या वचनात तर श्रद्धा म्हणजेच देव -दुसरा देव नाही- असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे.)
* आमुचिया भावे तुज देवपण । हे का विसरोन । राहिलासी ? । असे तुकाराम महाराजांनी देवाला खडसावले आहे.तसेच "आम्ही तुझ्यावर श्रद्धा ठेवतो म्हणून तुला देवपण प्राप्त झाले आहे. (श्रद्धा नसती तर तू म्हणजे निर्जीव मूर्ती असे झाले असते.)
या संदर्भात एक संस्कृत श्लोक आहे. तो असा:-
न काष्ठे विद्यते देवो न पाषाणे न च मृत्तिके* । भावे हि विद्यते देवो तस्मात् भावो हि कारणम् ॥( *खरे तर हे रूप "मृत्तिकायाम्।" असे हवे. पण मूळ श्लोकात मृत्तिके आहे.ते तसेच ठेवले आहे.)
अर्थ :- लाकडी मूर्तीत (उदा.पुरीचा जगन्नाथ) देव नसतो. दगडी मूर्तीत (उदा.बालाजी) देव नसतो. मातीच्या मूर्तीत देव नसतो.(उदा. गणपती). देव केवळ श्रद्धेत असतो. (म्हणजे श्रद्धेने मानता येतो.) म्हणून श्रद्धा हेच देवाच्या अस्तित्वाचे कारण आहे.
वरील सत्य वचनांवरून कोणता तर्कसंगत निष्कर्ष निघतो ? निष्कर्ष असा निघतो की देवाचे अस्तित्व सत्य मानण्यासाठी श्रद्धा आवश्यक असते. श्रद्धा असेल तरच देव आहे. श्रद्धा नसेल तर देव नाही. कुणी म्हणतील की तुम्ही वरील वचने सत्य मानली म्हणजे तुम्ही शब्दप्रामाण्य मानता. तर तसे नव्हे. वरील वचने संतसाहित्यातील आहेत म्हणून सत्य आहेत असे म्हटलेले नाही. ती बुद्धीला पटतात, अनुभवाशी सुसंगत आहेत, म्हणून सत्य आहेत.
"देवाच्या अस्तित्वासाठी श्रद्धा आवश्यक आहे. श्रद्धा नसेल तर देव नाही." असा निष्कर्ष निघाला. म्हणजे देवाचे अस्तित्व खरे मानण्यासाठी श्रद्धेची अट आहे, असे स्पष्ट झाले.
आता, एखादी गोष्ट जर खरोखर प्रत्यक्षात अस्तित्वात असेल तर त्यासाठी कुठली अट असू शकते का ? आपण जाणतो की खरे अस्तित्व व्यक्तिनिरपेक्ष असते. तसेच ते अटनिरपेक्ष असले पाहिजे. थोडक्यात म्हणजे एखादी गोष्ट अस्तित्वात आहे हे सत्य असेल तर त्या अस्तित्वाला कोणतीही अट लागू असू शकत नाही. देवाचे अस्तित्व मानण्यासाठी श्रद्धेची अट आहे असे अनेक सत्य वचनांवरून दिसते. त्याअर्थी देव प्रत्यक्ष असित्वात नाही. देवाचे अस्तित्व केवळ मानीव आहे, हे सिद्ध होते.
कांहीजण सांगतात:"ज्याला देव मानायचा असेल त्याच्यासाठी देव आहे. ज्याला मानायचा नसेल त्याच्यासाठी नाही. "
ही दोन्ही विधाने भोंगळ आहेत. १) देव अस्तित्वात आहे. २) देव अस्तित्वात नाही. या दोन विधानांतील एक, आणि केवळ एकच, विधान सत्य असले पाहिजे. तिथे कोण्या व्यक्तीचा संबंध नाही.
******************************************************************************
इथे माझ्या लेखांवरील अनेक प्रतिसादांतील विचार आणि उपस्थित केलेले प्रश्न हे माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडचे असतात. त्यांवर कांही उत्तरे लिहिण्याची क्षमता आणि विद्वत्ता माझ्यापाशी नाही."एखाद्या मुक्त माध्यमांतल्या लेखातल्या मजकूराला (मुद्दे / तर्क / विधाने / विश्लेषणे / निश्कर्ष / इत्यादींना) धरून कोणी प्रश्न विचारले / विवरण मगितले / प्रतिवाद केला तर त्याला उत्तर देण्याची जबाबदारी लेखकावर असते", असा सर्वसाधारण दंडक आहे. तुमच्यासारख्या विद्वान (व विशेषतः प्राध्यापक असलेल्या) व्यक्तीला हे सांगण्याची गरज आहे असे नाही. विशेषतः, वादग्रस्त ठरू शकेल अश्या विषयावर लेखन करून, मग "एकतर पाय काढून गप्प बसणे किंवा असा वरच्यासारखा हात झटकाणारा प्रतिसाद टाकून बाजूला होणे" असे केल्याने लोकशिक्षणाच्या कामात फायदा तर निश्चितच होणार नाही. तसेच, ते काही शास्त्रिय अथवा न्याय्य वर्तनही ठरणार नाही, हे सांगायला नकोच. याशिवाय, त्या कृतीची तुलना कोणी "दगड मारून पळून जाणे" या कृतीशी केली तर ते असत्य होणार नाही, ते वेगळेच. विशेषतः आपल्याबरोबर सहमत होत नाहीत त्यांचा, निर्बुद्ध, (अंध)श्रद्ध, अडाणी, अश्यासारख्या शेलक्या विशेषणांनी सत्कार करणार्या (पक्षी : स्वतः बुद्धीवान व तार्कीक असण्याचा दावा करणार्या) व्यक्तीने आपल्याला शास्त्रिय पद्धतीने सिद्ध करता येणार नाहीत असे दावे करणे "कसे दिसते" हे सांगायलाच हवे का ? हे वरचे "सर्वसामान्य माणसांना" सुचतील असे विचार मनात आले, ते इथे मांडले आहेत. बाकी, तुम्हाला आम्ही अज्ञ लोक काय सांगू शकणार म्हणा !