Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उपनिषदांत देव पडताळणे

श
शरद
Fri, 03/09/2018 - 15:27
🗣 58 प्रतिसाद
उपनिषदांत देव पडताळ्णे ? श्री. क्रिप्ट यांनी आस्तिक-नास्तिक या दोघांना देव आहे की नाही हे स्वत:पडताळून पहावयास सांगितले. छान. आजच्या काळात कोणावर विश्वास ठेऊन देव आहे की नाही हे ठरविण्याऐवजी स्वत: जर काही पडताळणे शक्य असेल तर उत्तमच की. पुढे जाण्या आधी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की श्री. क्रिप्ट यांनी "देव" याची व्याख्या केली नाही. आपण असे धरून चालू की आज सर्वसाधारण माणुस ज्याला देव म्हणतो, ज्याची देवळे बांधतो, ज्याची पूजा करतो तो देव. मग तो विष्णु असेल, शंकर असेल वा देवी असेल. हा सर्वशक्तीमान देव दयाळू, भक्तांना मदत करणारा, भवसागरातून तारून नेणारा असतो. त्यालाच श्री. क्रिप्ट देव म्हणतात. याहून दुसर्‍या कशाला श्री क्रिप्ट यांना देव म्हणावयाचे असते तर त्यांनी तसे स्पष्ट केले असते. असो. तर आता ही व्याख्या स्विकारून पुढे सरकू. आता श्री.क्रिप्ट यांना काय सांगावयाचे आहे ते त्यांच्याच शब्दांत बघू. गेल्या हजारो वर्षात अनेकांना स्वतःच्या अस्तित्वाच्या प्रयोजनावर, देव आहे कि नाही यावर अनेक प्रश्न पडले आणि ते शोधताना आजच्या काळातील शास्त्रज्ञांनी जसे प्रयोग केले तसे अनेक प्रयोग या भारतभूमीत झाले. त्यावरून ज्यांना या जगापलीकडील रहस्य गवसले, जो काही शोध लागला तो ज्या पद्धतीमुळे लागला त्या पद्धती नोंदवून ठेवल्या. या पद्धती ज्यांनी वापरल्या त्या अनेक लोकांना मग ते विविध काळातील का असेनात काही अनुभव आले आणि या पद्धती प्रमाण झाल्या. आता वर गणिताचे उत्तर जसे काढले तसे आपल्याला एका समंजस विद्यार्थ्यांप्रमाणे फक्त एवढेच करायचे आहे कि या पद्धती शिकायच्या आहेत आणि त्याचा वापर करून उत्तर स्वतः पडताळून पाहायचे आहे. बस्स काम झाले. बाकी आस्तिक किंवा नास्तिक यापैकी कोणत्याही एकाबद्दल दुराग्रही असण्याची अवशक्यताच काय? भारतीय अध्यात्मशास्त्र थोडेजरी वाचले तरी या वेगवेगळ्या पद्धतींची तुम्हाला ओळख होईल. त्यात प्रामुख्याने उपनिषदे, पातंजल योग, ब्रह्मसुत्रे आणि गीता यांचा समावेश होतो. उपनिषदे सरळ सरळ सांगत आहेत कि बाबांनो देव आहे कि नाही या वादात न पडता स्वतः पडताळून पाहण्याचा प्रयत्न करा आणि ठरवा. त्यामुळे तुम्ही नास्तिक जरी असाल तरी उपनिषदांचा अभ्यास करा आणि त्यात सांगितलेल्या पद्धतींचा वापर करून ठरवा. पतंजली तर दुसऱ्या आणि तिसऱ्या सूत्रात स्पष्टपणे म्हणतात - योगश्चित्तवृत्तिनिरोधः| तदा द्रष्टुः स्वरूपेऽवस्थानम् || अर्थात योग म्हणजेच चित्तवृत्तींचा निरोध थोडक्यात चित्ताला निरनिराळी रूपे धारण करू न देणे अथवा सजगपणे मनातील विचारलाटा पूर्णपणे थांबवणे. असे केले तर द्रष्टा (ईश्वर म्हणा, देव म्हणाला किंवा शक्ती म्हणा) आपल्या स्वरूपात प्रकट होतो. इथे तर पतंजली सरळसरळ असंख्य लोकांना ईश्वर, देव का दिसत नाही अथवा केंव्हा दिसेल याचे स्पष्टपणे उत्तर देत आहेत. "उपनिषदांचा अभ्यास करून "देव" आहे की नाही हे पडताळता येते" हे न पटल्याने मी त्यांना नम्रतेने विचारले की "असे कोणत्या उपनिषदात आहे त्याचे नाव, अध्याय, मंत्रक्रमांक द्या." प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी त्यांनी "108 उपनिष्दे आहेत; त्यातील ही दहा प्रमुख, या स्वामींचे व्याख्यान ऐका ,अभ्यास करा" असा उपदेश केला. हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नसल्याने मी परत तोच प्रश्न विचारला. ते तर रागावलेच. त्यांनी सांगितल्यातच माझ्या प्रश्नाचे उत्तर आहे असे त्यांनी सांगितले. पण तरीही त्यांना माझ्या चिकाटीचे कौतुक वाटले असावे. त्यांनी "मांडुक्य व केन " ही उपनिषदे वाचावयास सांगितली "केन" मधील शेवट वाचा हे सांगितले पण हा चुकार विद्यार्थी कष्ट करण्याचे टाळेल म्हणून (त्यांना माहीत असूनही) ’मांडुक्य" मधील मंत्र क्रमांक मात्र दिले नाहीत. मलाच शोधाण्याचे कष्ट घ्यावयास सांगितले ही झाली ह्या लेखाची पूर्वपीठिका. आता सुरवातीला ’देव" याची व्याख्या का करावी लागली याचे कारण बघा. उपनिषद्काली देव नव्हता. इंद्र, वरुण, अग्नी इत्यादि वैदिक देवता होत्या. आज त्यांना कोणी देव म्हणून पडताळून बघावयाचा प्रश्नच नाही. तेव्हा उपनिषदांत देव पडताळता येईल हा पायाच चूकीचा आहे. पण त्यांनी मांडुक्य उपनिषद पहा असे सांगितले आहे म्हणून तेथे पाहिले तर काय दिसते ? सहाव्या मंत्रात ॐ च्या तिसर्‍या पादाला लावलेले सर्वेश्वर हे एक विशेषण सोडले तर संपूर्ण बारा वाक्यात कोठेही "देव" हा शब्दच नाही. संपूर्ण उपनिषद ॐ ची महती सांगते. ॐ ला "ब्रह्म" म्हटले आहे. आता ब्रह्म म्हणजे देव नाही हे श्री क्रिप्टही मान्य करतील . दुसरे उपनिषद "केनोपनिषद". येथे आपणास संपूर्ण उपनिषद बघण्याची खरी म्हणजे गरज नाही कारण श्री. क्रिप्ट यांनी, (माझ्यावर कृपा करून,) शेवट बघावयास सांगितले आहे. पण तेथे जाण्याआधी केनोपनिषदाचा गाभा पाहिला तर असे दिसते की संपूर्ण उपनिषद "ब्रह्म" चे महत्व शिष्याला पटविण्याकरिता आहे. शिष्याने "कोणत्या देवाने डोळे, कान यांचे कार्य सुरू केले " ? ( इथे देव म्हणजे वैदिक देवता) असा प्रश्न विचारल्यावर आचार्य, देवाला कटवून, "ब्रह्म"चे महत्व सांगतात व नीट ध्यानात यावे म्हणून परत सांगतात. हे देव "ब्रह्म "पुढे कसे निर्बळ आहेत हे तिसर्‍या खंडातील कथेवरून स्पष्ट केले आहे. इंद्र, वायू, अग्नी आदि प्रमुख देवता "ब्रह्म"समोर कस्पटाप्रमाणे आहेत हे स्पष्ट करून "हे ब्रह्म भजनीय असल्यामुळे त्याची उपासना करतात. जो कोणी त्याची अशी उपासना करतो, त्याला सर्वही प्राणिमात्र आपले मानतात" असे सांगून आचार्य थांबतात. या नंतर शिष्य त्यांना म्हणतो, "भगवन्, मला उपनिषद म्हणजे उपदेश द्या." आचार्य म्हणतात ,"तुला मी उपदेश दिला आहे. ब्रह्मज्ञान कथन केले आहे." म्हणजे येथे जे काही सांगितले आहे ते देव पडताळण्या करिता नसून "ब्रह्म " संबंधी आहे. थोडक्यात श्री. क्रिप्ट यांनी सांगितलेल्या दोनही उपनिषदांशी "देव" पडताळून पाहण्याचा किंवा पद्धती स्विकारण्याचा दूरान्वयेही संबंध नाही. आता वळू पातंजल योगदर्शनाकडे. तिसर्‍या सूत्रा संबंधी श्री. क्रिप्ट म्हणतात ...... " तर द्रष्टा (ईश्वर म्हणा, देव म्हणाला किंवा शक्ती म्हणा) आपल्या स्वरूपात प्रकट होतो." श्री. क्रिप्टजी, आम्हाला काय ठरवावयाला सांगता, तुम्हीच सांगा की तुम्हाला देव म्हणावयाचे आहे की शक्ती आणि शक्ती ही काय भानगड आहे ? येथे देव वगैरे काही नाही. द्रष्टा हा द्रष्टा-दृश्य-दर्शन या त्रिपुटीतील द्रष्टा आहे, म्हणजे ब्रह्म (येथे शरीरात आहे म्हणून जीवात्मा) जेव्हा तुम्ही सर्व चित्तवृत्तींचा निरोध करता तेव्हा तुम्ही बाह्य जगाकडे पाहण्याऐवजी दृष्टी अंतर्मनाकडे वळविता. तेथे चित्तनिरोधामुळे काहीच नाही. त्यामुळे त्रिपुटी नाहिशी होऊन आत्मा आता आपल्या "स्व"रूपात असतो. अवस्थित याचा अर्थ "प्रकट होतो" असा करणे योग्य नव्हे. आणि समजा केलात तरी " देव " प्रकट होत नाही, इथेही देव पडताळणे वगैरे काही भानगड नाही. कोणी जर म्हणाले श्री.क्रिप्ट यांना "ॐ", "आत्मा", "ब्रह्म" यानाच देव म्हणावयाचे आहे तर मग मात्र माझे दंडवत. काही लोक "बिग बी" रजनीकांत", जयललिता" यांनाही देव मानतात. मग "ब्रह्म"ने काय घोडे मारले आहे ? असो. श्री. क्रिप्ट यांनी " थोडे कष्ट घेऊन उपनिषदे वाचण्याची सुरवात करा " हा उपदेश केल्याबद्दल आचार्यांना शिरसा नमस्कार. शरद. (समित्पाणी)
वर्गीकरण
अध्यात्म

प्रतिक्रिया द्या
13461 वाचन

💬 प्रतिसाद (58)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 03/09/2018 - 16:21 नवीन
दोन मोठी गुरुवर्य माणसं मिपावर वावरताहेत म्हणून मी खूश आहे, सर, मी तासा अर्ध्या तासाला (वाट्सॅपचे मेसेज पाहावे तसे) झाल्या घटनेत, गेलेल्या वेळात देवाचा काय रोल आहे का पडताळून पाहतो पण, देवाचा काय पत्ता नाय लागला. :) बाय द वे, केनेषितं पतति प्रेषितं मनः केन प्राण : अशी केनोपनिषदाची सुरुवात आहे म्हणे, बाकी हे रायटर, सॉरी लेखक लैच हुशार होते हो सर...! माणसाला कोणते प्रश्न पडतील आणि त्याची उत्तरं दिली की लोकं कसे परमात्म्याच्या नादाला लागतील त्याची उत्तम व्यवस्था ग्रंथात करुन ठेवलेली दिसते. ''ज्याच्या योगे इंद्रिये, प्राण, मन, बुद्धी इत्यादि कार्यान्वित होतात ते तत्त्व म्हणजे परब्रम्ह'' .... वा...! अहाहा..! परब्रम्हाची उपासना आणि ते तत्व समजावून घेण्यासाठी नेमकं मी जाऊ कुठे....? आज ड्राय डे तर नाही, ना ? ;) -दिलीप बिरुटे (वालावलकरसेठ आणि शरदसरांचा विद्यार्थी)
  • Log in or register to post comments
र
राही Fri, 03/09/2018 - 19:10 नवीन
सुंदर विवेचन. माझ्या मते आत्मशोध हाच खरा शोध आहे. एकदा ' कोsहं' हे कळले की ' होय होय , तोच मी. सोsहं' हे येतेच. चित्तवृत्ती स्थिर झाल्या की आपण आपल्याला लख्ख दिसू लागतो. यालाच साक्षात्कार म्हणता येईल म्हटले तर. समर्थांनीदेखील ' पाहावे आपणासी आपण' असे लिहून ठेवले आहे. आत्मपरीक्षण ही शहाणपणाकडे (शहाणीव ) नेणारी पायरी आहे. परीक्षा म्हणजेसुद्धा वेगवेगळ्या तऱ्हेने तपासणे, कसाला लावणे. अशा कसोटीनंतर सोने उजळते. अर्थात ही मते मी अनेकवेळा इथे मांडलेली आहेतच.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 03/10/2018 - 11:35 नवीन
सुंदर विश्लेषण ! वेद-उपनिषदे, इतर तत्वज्ञानविषयक ग्रंथ किंवा इअतर गंभीर लिखाण फार थोड्या लोकानी वाचलेले असते आणि त्याहूनही फार थोड्या लोकांना त्यांचा अर्थ माहीत असतो आणि त्यातल्या फार थोड्या लोकांना तो उमजलेला असतो. मात्र, त्यांच्यावर पोकळ टीका करायला खूप लोक पुढे येतात असाच अनुभव आहे. विशेषतः पाश्च्यात्य मानसिकतेची गुलामी पत्करलेल्या तथाकथित सुधारणावाद्यांना तर त्या ग्रंथांच्या नावांचाही अर्थ माहीत नसतो असे अनेकदा दिसून येते ! पण त्यातील माहित असलेल्या, तेही बहुदा दुसर्‍या कोणी, दुसर्‍या कोठेतरी उर्धृत केलेल्या वचनांचा आधार घेऊन आपले मत ठासून सांगणे नेहमीचेच आहे. त्यातही, त्या मूळ वचनाची मोडतोड करणे (सोईचा अर्धवट भाग उर्धृत करून बाकीचा गैरसोईचा भाग गुप्त ठेवणे, अपभ्रंश करून सांगणे, नसलेला मजकूर आहे असे ठासून सांगणे, इत्यादी) हे तर केवळ अशास्त्रिय, अज्ञानी आहे असे नव्हे तर चलाखी/बदमाषी/गुन्हेगारी या सदरात मोडणारी कृती आहे. स्वतःला आधुनिक म्हणविणार्‍यांना अनेकदा आधुनिकता ज्या शास्त्रिय न्यायिक मूलतत्वाच्या पायावर उभी आहे त्याचाच विसर पडलेला असतो. ते शास्त्रिय तत्व असे... कोणत्याही गोष्टीचा समतोल शास्त्रिय स्विकार अथवा विरोध करण्याअगोदर आपल्याला त्या गोष्टीबद्दल संपूर्ण नसली तरी स्वतःशी प्रामाणिक असण्या इतपत तरी माहिती असावी आणि त्या माहितीच्या बळावर प्रामाणिकपणे जेवढे मत देता येईल तेवढेच द्यावे (अथवा प्रामाणिकपणे जेवढा निर्णय घेता येईल तेवढाच घ्यावा)... शास्त्रिय शब्दांत सांगायचे झाले तर आपल्या (आणि एकंदर मानवाच्या) सत्याच्या शोधात व निवेदनात निर्विवादपणे असणार्‍या मर्यादा (कन्स्ट्रेन्ट्स अ‍ॅन्ड लिमिटेशन्स) नेहमीच लक्षात ठेवाव्या, तसे न करणे जगाशी आणि स्वतःशी अप्रामाणिकपणा केल्यासारखे होईल. या विषयाबद्दल अनेक खर्‍या विचारवंतांनी खूप काही लिहिले आहे. त्यातले काही मोजके... १. या जगात, प्रामाणिक अज्ञान आणि प्रामाणिक मूर्खपणा, यांच्याइतके धोकादायक अजून काही नाही. (Nothing in the world is more dangerous than sincere ignorance and conscientious stupidity.) २. ज्ञानाचा सर्वात मोठा शत्रू 'अज्ञान' नाही तर 'ज्ञानाचा (ज्ञान असल्याचा) आभास' आहे. (The greatest enemy of knowledge is not ignorance, it is the illusion of knowledge.) आणि हे माझे अत्यंत आवडते वाक्य... ३. स्वतःच्या अज्ञानाच्या सीमा माहीत होणे, हेच खरे ज्ञान. (Real knowledge is to know the extent of one's ignorance.)
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sat, 03/10/2018 - 17:42 नवीन
मात्र, त्यांच्यावर पोकळ टीका करायला खूप लोक पुढे येतात असाच अनुभव आहे. विशेषतः पाश्च्यात्य मानसिकतेची गुलामी पत्करलेल्या तथाकथित सुधारणावाद्यांना तर त्या ग्रंथांच्या नावांचाही अर्थ माहीत नसतो असे अनेकदा दिसून येते ! पण त्यातील माहित असलेल्या, तेही बहुदा दुसर्‍या कोणी, दुसर्‍या कोठेतरी उर्धृत केलेल्या वचनांचा आधार घेऊन आपले मत ठासून सांगणे नेहमीचेच आहे. त्यातही, त्या मूळ वचनाची मोडतोड करणे (सोईचा अर्धवट भाग उर्धृत करून बाकीचा गैरसोईचा भाग गुप्त ठेवणे, अपभ्रंश करून सांगणे, नसलेला मजकूर आहे असे ठासून सांगणे, इत्यादी) हे तर केवळ अशास्त्रिय, अज्ञानी आहे असे नव्हे तर चलाखी/बदमाषी/गुन्हेगारी या सदरात मोडणारी कृती आहे.!
>>>> खंपलीटली अ‍ॅग्री !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
क
कंजूस Sat, 03/10/2018 - 16:36 नवीन
विनोदी उत्तरच द्यायचे झाले तर - देव शोधा, सापडला नाही तर मला भेटा. ------------------------------ सतत दुसय्राचा विचार करा. तुम्हाला नाही पण दुसय्रांना देव नक्कीच भेटेल. आपल्या एकट्यालाच भेटण्यापेक्षा तो इतर बरेच लोकांना भेटवणे आपल्या हातात आहे.
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Sat, 03/10/2018 - 23:12 नवीन
या धाग्याच्या निमित्ताने एक अवांतर प्रश्न (मूढ, अज्ञानी ही विशेषणं लागण्याची शक्यता असूनही) विचारून घेते. तर प्रश्न असा की सत्याचा शोध म्हणजे नक्की कसला शोध घ्यायचा असतो? यात 'सत्य' म्हणजे 'खरे' असा अर्थ अभिप्रेत नसावा असं वाटतं. संस्कृतात 'सत्य' या शब्दाचा नेमका अर्थ वेगळाच आहे का? असा शोध घेण्याचा ध्यास फक्त ज्ञानी लोकांतच असतो की सर्वांत तो कमी-अधिक प्रमाणात असतो?
  • Log in or register to post comments
द
दिगोचि Sun, 03/11/2018 - 02:31 नवीन
हे श्री. क्रिप्ट कोण? त्यन्च्या पुस्तकाचे नाव सान्गाल का? धन्यवाद.
  • Log in or register to post comments
श
शरद Sun, 03/11/2018 - 05:00 नवीन
श्री. क्रिप्ट हे मिपावरील नवीन सभासद आहेत. त्यांच्या देव आहे की नाही .. या लेखावरून प्रतिसाद म्हणून हा धागा लिहला. त्यांच्या लेखाची लिन्क .misalpav.com/node/42094 ते पुस्तक लिहतात का माहीत नाही. शरद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिगोचि
प
प्रचेतस Sun, 03/11/2018 - 05:11 नवीन
उत्तम.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 03/11/2018 - 07:45 नवीन
उपनिषदांचा अभ्यास करणारे लोक दोन प्रकारचे असतात.. 1. भक्तीमार्गातून अद्वैताचा अभ्यास करताना गीता वगैरे पाडाव घेत कुठेतरी उपनिषदांकडे येणारे एक. हे मुख्यत: भक्तीमार्गी असल्यामुळे, आणि सगुण भक्तीचे अंतिम ध्येय निर्गुण साक्षात्कार असल्यामुळे त्यांचा मुख्य भर तत्वमसि वर असतो, आणि खरे तर हे महावाक्यच उपनिषदांचे सारभूत आहे असा त्यांचा विश्वास असतो. (मी या वर्गात येतो) 2. दुसरा वर्ग येतो तो अभ्यासकांचा. ते बऱ्याच वेळेस सांस्कृतिक ठेवा म्हणून अभ्यास करत करत उपनिषदाम्पर्यंत पोचलेले असतात. त्यांचा अभ्यास हा प्रामुख्याने ईश्वर सिद्धांताचा उगम कसा झाला वगैरे याचा अभ्यास करण्याचा असतो. या दोन विचारांचा समन्वय साधने फार कठीण काम आहे, भक्तीमार्गातून उपनिषदांचा अभ्यास करणारे ते उपनिषदांमध्ये सांगितलेले ब्रह्म हाच आमचा देव आहे असे मानतात, तर दुसऱ्या वर्गातले ब्राह्मसिद्धांत हा सर्वशक्तिमान ईश्वरविषयक कल्पनांची सुरुवात मानतात (असे मला वाटते) त्यामुळे हा वाद अनंत आहे. दोघांपैकी कोणीही एकाने दुसऱ्याला कमी लेखणेही चूक आणि आपले ज्ञान पूर्ण आहे असे मानणे देखील चूक. असो.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 03/12/2018 - 02:29 नवीन
ब्रम्ह. परमात्मा, ग्रांथिक तत्वज्ञान हे सर्व शाब्दिक बुडबुडे वाटतात. हजारो वर्षात एखाद्याला तरी त्या परमात्यमाचं दर्शन व्हायला पाहिजे होतं. विश्वरूप दर्शन नाही किमान आपल्याबरोबर सुख दुःख शेयर करायला गळ्यात हात घालून मित्रासारखा भेटून अंतर्धान जरी पावला असता तरी चाललं असतं. जगात इतकी विषमता दारिद्र्यता दुःख यात कुठेही त्या ब्रम्हाचा रोल दिसत नाही, किंबहुना तो कुठेही कोणाच्याही जखमेवर फुंकर घालतांना दिसत नाही. ईश्वर ही अतिशय सुन्दर कल्पना आहे. दिल बहलाने के लिये एक अच्छा खयाल आहे इतकेच वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
म
माहितगार Mon, 03/12/2018 - 05:22 नवीन
सर मागच्या वेळी तुम्ही घातलेली फुंकर ज्याने अनुभवली असेल त्याला देव दिसला असण्याची शक्यता असते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
माहितगार Mon, 03/12/2018 - 09:39 नवीन
.
....उपनिषदांचा अभ्यास करणारे लोक दोन प्रकारचे असतात..
भारतीय तत्वज्ञानात नास्तीक ते आस्तीक इतक्या सगळ्या विचारधारेचे विद्वान उपलब्ध असूनही पश्चिम आशियातून येणार्‍या तत्वज्ञानांशी वैचारीक स्तरावर दोन हात करण्यास नेमके कुठे कमी पडतात. आदी शंकराचार्यांनी शास्त्रार्थ करुन त्यांच्या ततवज्ञानाने तत्कालीन विवीध मतप्रवाहीना खासकरून विरोधी प्रभावित केले तसे नंतरचा ते आता पर्यंत कुणाला का जमले नसावे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
प
प्रचेतस Mon, 03/12/2018 - 09:58 नवीन
पश्चिम आशियातून येणारी तत्वज्ञानं तलवारीच्या धारेवर प्रेरित आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 03/12/2018 - 10:05 नवीन
आदी शंकराचार्यांनी शास्त्रार्थ करुन त्यांच्या ततवज्ञानाने तत्कालीन विवीध मतप्रवाहीना खासकरून विरोधी प्रभावित केले तसे नंतरचा ते आता पर्यंत कुणाला का जमले नसावे ? त्या काळी "प्रामाणिक वादविवाद" होत असत. याचा उत्तम पुरावा म्हणजे महत्वाचा आणि गाजलेला "आदी शंकराचार्य आणि मंडनमिश्र वादविवाद", ज्याच्यात आदिशंकराचार्यांनी मंडनमिश्रांच्या पत्निला मध्यस्त नेमून निर्णयाचे अधिकार दिले होते. "नेता/गट/धर्म/जातीच्या/झेंडा/विचारप्रणाली/हितसंबंध/इत्यादींच्यापैकी जे फायद्याचे आहेत, त्यांच्या बाजूचे ते सगळे खरे आणि त्यांच्या विरुद्ध ते सगळे चूक" असा निर्णय प्रथम घेण्याची आणि मग मग त्याला उपयुक्त असे पुरावे जमवून/बनवून, ठासून सादर करून, एन केन प्रकारेन (गदारोळ (केऑस) , असंवैधानिक कारवाई, अहिंसा, इत्यादी काहीही करून) विरोधकाला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करण्याची प्रथा सद्या प्रचारात आहे... सत्याचा शोध, समतोलपणा, सभ्यता, इत्यादी सर्व अंधश्रद्धा किंवा मूर्खपणा समजल्या जातात ! :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ज
जानु Sun, 03/11/2018 - 08:14 नवीन
@आनंदा, योग्य प्रतिसाद. आपण जे वर्गीकरण केले आहे त्यातील प्रथम भागातच ९९% आस्तिक येतील. भारतातील बहुसंख्य घरात जन्मजात धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न असतो. त्यात भारताच अनेक संत आणि धार्मिक पुरुषांच्या प्रभावामुळे हे साहजिक आणि नैसर्गिक पणे होत जाते. पण जेव्हा सगुण भक्ती करतांना वयाने, ज्ञानाने मोठा होतो तेव्हा या विचारांशी फारकत होण्याची शक्यता निर्माण होतो. जर नास्तिक विचार बळावले तर मग आपणास इतरांनी फसवले असा विचार करुन कडवेपणाने आस्तिकांच्या विरोधात विचार प्रकट होतात. जर सगुण भक्ती वाढली तर तिच्यात मग आपल्या मनाप्रमाणे देव शोधणे आणि त्याची भक्ती सुरुच राहते. त्यानुसार आपल्याकडे पुराणांची निर्मिती झालेली दिसेल. आवडीनुसार देव आणि त्याच्या संदर्भिय कथा यांची रेलचेल आणि उद्दात्तीकरण. पण जर कोणी सगुण भक्तीच्या पुढे जायचे म्हटले की मग उपनिषदे यांचे ज्ञान सुरु होते, ते निव्वळ तात्विक आणि टोकाचे तार्किक आहे, त्यात सगुणांपैकी ९०% गळुन जातात कारण सगुण भक्तीचे भरलेल्या भावनांचा समुळ नाश केल्याशिवाय उपनिषदे मान्यच होत नाहीत. जो जन्माला आला त्याला मृत्यु मग देवांचे काय? आपल्या प्रिय देवाला हे नियम लावणे कठीण जाते. नास्तिक लोक या सगुण आस्तिकांवर त्यांच्या याच दुबळेपणाचा लाभ घेउन प्रहार करतात. सगळे आस्तिक हे सगुण, तर्कविहीन असल्याचा भाव मनात ठेवुन विचार मांडतात. मुळात आस्तिक आणि नास्तिक या दोन टोकांच्या मध्ये असंख्य बिंदु आहेत, प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळ्या बिंदुंवर असु शकते आणि जगात कोणी १००% आस्तिक अथवा नास्तिक असेल असे मला तरी वाटत नाही.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 03/11/2018 - 18:33 नवीन
बाकी सगळे ठीक आहे, पण अनंता ला मृत्यू कसला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जानु
म
माहितगार Sun, 03/11/2018 - 08:23 नवीन
वाचतोय
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 03/11/2018 - 10:35 नवीन
स्मिता.,
संस्कृतात 'सत्य' या शब्दाचा नेमका अर्थ वेगळाच आहे का?
तुमचा प्रश्न अजिबात मूढ नाही. खरंतर विचारप्रवर्तक आहे. त्यावर माझं मत सांगतो. अस् या धातूचा अर्थ म्हणजे 'अस्तित्वात असणे'. त्यावरून सत् म्हणजे 'मूळ अस्तित्व' हा शब्द उगम पावला. या सत् ला कसलीही उपाधी नाही. मात्र त्याची उपाधी दुसऱ्या एखाद्या गोष्टीस द्यायची झाली तर तिला तर सत् य: म्हणजे सत्य असं म्हणतात. तर सत्याचा शोध म्हणजे 'जे अस्तित्वात आहे ते' त्याचा शोध. आपण स्वत:च सत्य आहोत असा भारतीय पारंपरिक विचार आहे. हे झालं माझं मत. तुम्ही तुमचं स्वत:चं मत बनवा म्हणून सुचवेन. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Sun, 03/11/2018 - 18:09 नवीन
सत्य या शब्दाचा नेमका अर्थ सांगितल्याबद्दल आभार! आणखी कीस पाडायचा झाल्यास मी सध्या हयात आहे म्हणजे अस्तित्वात आहे. त्यात शोध घेण्यासारखे काही नाही. मग मी सत्याचा शोध घेणे म्हणजे मी माझ्या आयुष्याचं ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करणे असं अपेक्षित असावं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
आ
आनन्दा Sun, 03/11/2018 - 18:22 नवीन
यात मी कशाला? जे आहे त्याचा शोध, इतके सोपे आहे ते. एका वेगळ्या अर्थाने, हे जे विश्व आहे त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न म्हणजे सत्याचा शोध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.
आ
आनन्दा Sun, 03/11/2018 - 18:24 नवीन
आणि मुळात सत्याचा शोध घ्यायचा नसतो, तर अनुभव घ्यायचा असतो.. हे सगळे विश्व म्हणजे मीच आहे याचा अनुभव घेणे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
ग
गामा पैलवान Sun, 03/11/2018 - 20:30 नवीन
स्मिता.,
मी सत्याचा शोध घेणे म्हणजे मी माझ्या आयुष्याचं ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करणे असं अपेक्षित असावं का?
जवळजवळ हो. जवळजवळ अशासाठी की आयुष्याचं ध्येय ओळखता आलं असेल तरंच हो. अन्यथा आयुष्याचं ध्येय निश्चित करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. मी म्हणजे काय? मी हयात आहे म्हणजे काय? काही वर्षांपूर्वी स्मिता नामे देह बालिकेचा होता. तो आता प्रौढ कसा झाला? जर तो बदलंत असेल तर तो सत्य नव्हे. तो मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे असत्य नसून बदलतं सत्य. तर मग स्मिता नामक देहाच्या मागे मूळ अस्तित्व काय? त्याचा शोध कुणी घेतला आहे का? असा शोध घेण्यास गामा पैलवान असमर्थ आहे. केवळ देहाची मालकीणच असा शोध घेऊ शकते. 'मी' चा शोध घेणं हे आयुष्याचं एक ध्येय असू शकतं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.
स
स्मिता. Sun, 03/11/2018 - 22:25 नवीन
@गामा पैलवान, @आनन्दा: प्रतिसादांकरता आभार! ते भिन्न असले तरी नक्कीच विचार करायला लावणारे आहेत. विचार करून बघते काही उमगतंय का :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 03/12/2018 - 02:18 नवीन
देवाची पड़ताळणी करता करता माणूस चक्रम होण्याची शक्यता असते. मस्त आनंदायी जीवन जगा. ह्याव अ गुड्डे...!!:) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.
ब
बिटाकाका Mon, 03/12/2018 - 06:06 नवीन
पडताळणी करण्याच्या भानगडीत न पडणारे चक्रम आजूबाजूला जास्त दिसतात असे माझे वैयक्तिक मत! मला नाही ना दिसला देव मग तो नाहीये हे मत चक्रम बनवण्यास कारणीभूत/पुरेसे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ======================== "देरे हरी खाटल्यावरी" ही म्हण अशीच आलेली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सतिश गावडे Mon, 03/12/2018 - 06:50 नवीन
ज्याअर्थी तुम्ही इतक्या आत्मविश्वासाने लिहीले आहे त्याअर्थी तुम्हाला नक्की देव भेटला/दिसला असणार. तुमच्या देव दिसण्याच्या/भेटण्याच्या अनुभवाबद्दल नक्कीच अधिक वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
ब
बिटाकाका Mon, 03/12/2018 - 07:40 नवीन
ज्याअर्थी, त्याअर्थी म्हणजे कोणत्या अर्थी ते आधी विस्कटून सांगा. माझ्या वक्तव्यातून मला देव (आणि तोही नक्की) भेटला असणार हा अर्थ कसा काय निघतो ते सांगा! ============================ मुळात माझ्यासाठी देव म्हणजे काय हे तुम्ही गृहीतच धरले आहे वाटते. म्हणजे साधारणपणे मित्रासारखा खांद्यावर हात टाकणारा, डोक्याचा मागे वलय असणारा असा कोणीतरी मला (नक्की) भेटला असणार असे आपले मत आहे तर! ============================ मलाही खरेतर आधी माझा देव कसा आहे आणि मला तो कसा कसा कधी भेटला आहे वगैरे लिहिण्यास खूप आवडेल पण असे अनुभव व्यवस्थित पोहीचावणारे लेख लिहिण्याची क्षमता माझ्यात आहे का हे नक्की ठरवता येत नाही. अर्धवट लेख पाडले तर अंधश्रद्धाळू शिक्का बसण्याची भीती वाटते. थोडक्यात असे लेख लिहिणे, राजकारणावर मते टाकण्याइतके सोपे नसते याची जाणीव आहे. ============================ मला जरी व्यवस्थित मांडता आले नाही तरी माझ्या भावना साधारणपणे रामनरेश त्रिपाठींच्या अन्वेषण या नितांत सुंदर काव्यात व्यक्त झालेल्या आहेत. खालील लिंकवर आहे (साभार). एकदातरी नक्की वाचावे असे काव्य - https://kaavyaalaya.org/anveshan
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
च
चौथा कोनाडा Mon, 03/12/2018 - 13:02 नवीन
+११,१११ गुड्डे अ‍ॅण्ड ह्यॅप्पी थॉटस ..... !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क
क्रिप्ट Mon, 03/12/2018 - 02:21 नवीन
सत्य याचा अर्थ चिरकालापासून अस्तित्वात आहे आणि यापुढेही अस्तित्वात राहील असे. थोडक्यात काय तर अशी गोष्ट जी निर्माण झाली नाही किंवा नष्टही होणार नाही. या जगातील प्रत्येक वस्तू ही कोणत्यातरी गोष्टीपासून निर्माण झाली आहे. त्यामुळे ती एक दिवस नष्टही होईल. त्यामुळे ती सर्व माया. परंतु केवळ एकच तत्व जे सर्व नष्ट झाले तरी राहील ते च केवळ सत्य. आणि जगातील सर्व गोष्टी त्यांच्यापासूनच निर्माण झाल्यात आणि त्यामद्येच विलय पावतील. परंतु त्या तत्वाचे अस्तित्व तसेच राहील (होते आणि आहे देखील. त्यात काहीच बदल नाही). तेच सत्य. त्यालाच दुसरे नाव म्हणजे ब्रह्म (किंवा ब्रह्मन). आता सत्याचा शोध घेणे म्हणजेच त्या ब्रह्मतत्वाचा शोध घेणे. कारण ते तत्व आपल्यातच आहे. वेद म्हणतात अयम आत्मा ब्रह्म: किंवा अहं ब्रह्मास्मि वगैरे. त्या ब्रह्माची अनुभूती येत नाही कारण आपण मायेने वेढले गेलेलो आहे. माया म्हणजे हा संसार, षड्रिपू किंवा तू आणि मी यातला भेद वगैरे. गीता सार सांगते त्याप्रमाणे "परिवर्तन हाच संसाराचा नियम आहे" त्यामुळे अश्याचा शोध घ्या जे अपरिवर्तनशील आहे, सत्य आहे (थोडक्यात ब्रह्म)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.
म
मारवा Mon, 03/12/2018 - 03:34 नवीन
त्या ब्रह्माची अनुभूती येत नाही कारण आपण मायेने वेढले गेलेलो आहे. माया म्हणजे हा संसार, षड्रिपू किंवा तू आणि मी यातला भेद वगैरे. वरील विधान थोडे विस्तारपुर्वक उदाहरणा सहीत मांडावे ही विनंती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रिप्ट
क
क्रिप्ट Tue, 03/13/2018 - 04:32 नवीन
ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या ६ व्या अध्यायात मायानदीचे (मायेला त्यांनी नदीची उपमा दिली आहे) खूप सुंदर वर्णन केले आहे. जरूर वाचा. थोडक्यात सांगायचे म्हणजे कि आपण जे रोज चे जग अनुभवतो ते केवळ तेवढेच जेवढी आपली इंद्रिय अथवा बुद्धीची क्षमता आहे. उदा द्यायचे झाल्यास एका मुंगीला सर्व जग हे 2 Dimensional आहे असेच वाटते. कारण तिची इंद्रियक्षमता तेवढीच आहे. तसेच अनेक जिवाणू विषाणू हे केवळ one Dimensional मध्येच जगतात आणि त्यांच्या दृष्टीने तेवढेच जग आहे. आपलेही तसेच आहे. आपण केवळ ३ dimension मध्ये जगतो आणि ४ठ्या dimension (space-time) चा केवळ विचार करू शकतो. परंतु सध्या त्यापलीकडील मिती आपल्यासाठी अस्तित्वात नाहीत. आणि आपण हे जगच खरे समजतो. तीच माया आहे. आणि खरे स्वरूप म्हणजे केवळ एक अखंड सत्ता जिला ब्रह्म असेही म्हंटले जाते ती अस्तित्वात आहे. परंतु आपली चेतना या देहापुरतं मर्यादित असल्याने आपल्याला इंद्रियगोचर आणि बुद्धिगोचर जगच केवळ दिसते (तीच माया) आणि त्यापलीकडील अखंड सत्ता अथवा ब्रह्म नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
स
सतिश गावडे Mon, 03/12/2018 - 06:57 नवीन
परंतु केवळ एकच तत्व जे सर्व नष्ट झाले तरी राहील ते च केवळ सत्य. आणि जगातील सर्व गोष्टी त्यांच्यापासूनच निर्माण झाल्यात आणि त्यामद्येच विलय पावतील. परंतु त्या तत्वाचे अस्तित्व तसेच राहील (होते आणि आहे देखील. त्यात काहीच बदल नाही). तेच सत्य. त्यालाच दुसरे नाव म्हणजे ब्रह्म (किंवा ब्रह्मन). आता सत्याचा शोध घेणे म्हणजेच त्या ब्रह्मतत्वाचा शोध घेणे. हे तत्व कसे असते? त्यातून सर्व गोष्टी कशा काय निर्माण होतात आणि त्याच्यातच विनाश कशा पावतात? याबद्दल जरा अधिक खोलात लिहू शकाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रिप्ट
क
क्रिप्ट Tue, 03/13/2018 - 02:18 नवीन
सतिशजी, ब्रह्मतत्त्वाचे वर्णन करणे सर्वात अवघड. अगदी वेदांनी देखील ब्रह्मतत्वाचे वर्णन करून झाल्यावर शेवटी नेति नेति म्हंटले आहे. म्हणजे तुम्ही ज्याचा विचार कराल ते ब्रह्म नाही अकारण ते बुद्धीला अगम्य आहे. तरीही थोडक्यात सांगायचे झाल्यास ते निर्गुण, निराकार, निर्विकल्प, आणि सच्चीदानंद स्वरूप आहे. सत म्हणजे सत्य (Ever Existing), चित म्हणजे सचेतन (Ever Conscious) आणि आनंद म्हणजेच नित्य नवीन आनंद (Ever Blissful) . आता या ब्रह्मातून किंवा निर्गुण निराकारातून हि सगुण आकार रुपी सृष्टी किंबहुना मनुष्य कसा निर्माण झाला याचे एक लांबलचक स्पष्टीकरण आहे. त्याला सांख्ययोग असेही म्हणतात. तुम्हाला जाणून घ्यायचे असल्यास स्वामी श्रीयुक्तेश्वरांचे (परमहंस योगानंदांचे गुरु) 'The Holy Science' किंवा हिंदीमध्ये कैवल्य दर्शनम हे पुस्तक वाचा. त्यात अगदी आकृतीसकट स्पष्टीकरण आहे. पुस्तक online सुद्धा आहे उपलब्ध आहे. परंतु विकत घेऊन वाचलेले अधिक चांगले. पुस्तक छोटेसे आहे आणि किंमत बहुतेक ७०-७५ च्या आसपास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
क
क्रिप्ट Mon, 03/12/2018 - 02:10 नवीन
शरदजी लेखाबद्दल धन्यवाद. या निमित्ताने का होईना आपण उपनिषद वाचलेत आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न केलात यातच माझ्या लेखाची इतिश्री आली. <<कोणी जर म्हणाले श्री.क्रिप्ट यांना "ॐ", "आत्मा", "ब्रह्म" यानाच देव म्हणावयाचे आहे तर मग मात्र माझे दंडवत >> खरं तर हो. आपण पतंजली योगसूत्र वाचले असतील तर तेथे त्यांनी ईश्वराची (किंवा देव. आता मी ईश्वराला देव म्हणतो म्हणून दंडवत घालायची गरज नाही) व्याख्या केली आहे. ती अशी: "दुःख, कर्म, कर्मफळ, वासना यांचा उपसर्ग नसलेला विशिष्ट पुरुष म्हणजे ईश्वर" (समाधीपाद: २४) . पुढे ते म्हणतात "तस्य वाचक: प्रणव:" (समाधीपाद: २४) म्हणजेच त्याचे स्वरूप व्यक्त करणारा शब्द आहे "ॐ". थोडक्यात काय तर ईश्वर आणि ओम हे एकच आहेत. जनसामान्यात ब्रह्मन (किंवा ब्रह्म), आत्मा/परमात्मा हे शब्द कमी प्रचलित आहेत त्यामुळे तिथे देव हा साधासुधा शब्द वापरला. भारतात साधारणपणे कृष्ण, शंकर, राम, गणपती या सगळ्यांना देव म्हणून संबोधले जाते परंतु ते ईश्वराचे किंवा ब्रह्माचेच रूप आहेत (इथे ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव नाही). मी फक्त सामान्यजनांमध्ये प्रचलित असलेला शब्द - देव हा त्या अर्थाने घेतला. त्यासाठी वेगळ्या व्याख्येची गरज नाही. जर कोणी येथे वेड किंवा उपनिषद यांचा अभ्यासक असेल तर त्याच्यासाठी ब्रह्मन हा शब्द योग्य आहे. देव न्हवे. परंतु माझ्या पूर्वी लिहिलेल्या लेखाचा उद्देश्य सर्वांना समजेल अश्या भाषेत लिहिण्याचा होता. परंतु लिहिलेले technically चुकीचेही नाही कारण 'एकम खलु इदं ब्रह्म:' मग त्यात ईश्वर आला, देव आला आणि माणूस देखील आला. असो.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 03/12/2018 - 05:10 नवीन
अहो तुमची फिरकी घेतायत. उपनिषदांचे जुने अभ्यसक अहेत तेमाते जर अभ्यसक नसते तर एव्हढा संगतवार लेख एका आठवड्यात मांडला असता का याचा विचार करा. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रिप्ट
क
क्रिप्ट Tue, 03/13/2018 - 00:36 नवीन
आनंदा ते उपनिषदांचे अभ्यासक असतील तर आनंदच आहे. परंतु वरच्या संगतवार लेखाचा विचारच करावयास झाला तर त्याचे दोन भाग पडतात. पहिल्या भागामध्ये त्यांनी माझ्याच एका लेखाचा बराचसा भाग संदर्भ म्हणून दिलेला आहे आणि दुसऱ्या भागात मी सुचवलेल्या दोन उपनिषदातील काही भाग डकवला आहे. आता कोणीही अभ्यासक नसला तरी वरीलप्रमाणे लेख लिहायला १ आठवडा काय १ दिवसदेखील खूप झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
श
शरद Mon, 03/12/2018 - 12:45 नवीन
सप्रेम नमस्कार. आपण मिपावर मवीन सभासद आहात असे समजून आपल्याला येथील पद्धती सांगतो. जनातले-मनातले यात लेख असतात. त्यात काही गफलत झाली तर वाचक ते समजावून घेतात. पण जेव्हा तुम्ही काथ्याकूटमध्ये चर्चा म्हणून लेख लिहता त्यावेळी जास्त अचूकपणाची अपेक्षा असते. मला तुमच्या लेखात काही न पटणारी विधाने दिसली. मी नम्रत्रेने कोठे शोधावयाचे ते विचारले. तुम्ही गोलमाल उत्तर दिले. मी परत विचारल्यावर तुम्ही केन व मांडुक्य वाचावयास सांगितले. तेथे देव सापडत नाही म्हटल्यावर योगदर्शनातील तिसरा पाद आपण बघितला. तेथेही तीच गत. आता आपण एका बोटावरील थुंकी दुसर्‍या बोटावर नेणार्‍या जादूगारासारखी समाधीपाद 24 वर उडी मारली ! असो. आपण देव आणि ईश्वर यांना एकच म्हटला म्हणूम मी दंडवत घातलेला नाही. आपण ब्रह्म व देव यांना एक म्हणता का ? सर्वसामान्य अडाणी माणसांचे सोडा; आम्हा अडाणी लोकांना तुकोबांचा "देव तेथेची जाणावा " हा अभंग पुरेसा आहे. तुमच्यासारख्या विद्वानांचे काय ? मी अजून दंडवत घालावयास तयार आहे.. आता थोडे मिपावरील उपनिषदांवरील लेखांबद्दल. श्री. आनंदा यांनी लिहलेच आहे म्हणून मी आपणास पुढील दुवे पहावयाची विनंती करतो. आपला अभ्यास आहेच, नवीन काही सापडणार नाही पण येथेही अडाणी लोकांकरिता सोप्या भाषेत उपनिषदांची माहिती करून देणारे लेख दिसतील. (1) उपनिषदे 1 misalpav.com/node/36022 (2) उपनिषदे (२) misalpav.com/node/36095 (3) ऊपनिषदे (३) misalpav.com/node/36147 (4) उपनिषदे (४) misalpav.com/node/36284 (5) उपनिषदे-५ misalpav.com/node/36296 (6) उपनिषदे-६ misalpav.com/node/36376 (7) उपनिषदे-७ उपनिषदांनी आम्हाला काय दिले ? misalpav.com/node/36422 (8) ईशावास्योपनिषद .misalpav.com/node/36511 (9) केनोपनिषद misalpav.com/node/36565 (10) अविद्या misalpav.com/node/36641 (11) मुंडकोपनिषद misalpav.com/node/36692 (12) प्रश्नोपनिषद (१) misalpav.com/node/36775 (13) प्रश्नोपनिषद (२) misalpav.com/node/36825 (14) कठोपनिषद (१) misalpav.com/node/36887 (15) कठोपनिषद (२) .misalpav.com/n /३६९७० आग्रहाची विनंती की आपण दशोपनिषदातील उरलेल्या उपनिषदांची माहिती मिपाच्या वाचकांना कळेल अशा भाषेत अवष्य करून द्यावी. आपला नम्र, शरद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रिप्ट
म
मारवा Mon, 03/12/2018 - 16:04 नवीन
डिट्टो ! विटगेन्स्टीन !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद
क
क्रिप्ट Tue, 03/13/2018 - 00:14 नवीन
<आपण ब्रह्म व देव यांना एक म्हणता का ? >-- हो. ते माझे मत आहे आणि मी माझ्या मतावर मी ठाम आहे. त्यात काही चूक असेल तर सांगा. आता मी तसे का म्हणतो ते वर सांगितले आहेच. तरीपण अजून १-२ उदाहरणे देतो. तुम्ही राम, कृष्ण, गणपती यांना देव नाही मानत का? मानत असाल ते ब्रह्मरूप नाहीत असे म्हणायचे आहे का तुम्हाला? गणपती अथर्वशीर्षामध्ये सांगितलेच आहे- त्वमेव खलु इदं ब्रह्मासि. राम आणि कृष्ण हे सुद्धा सगुण रुपी ब्रह्मच आहेत. आता तुकारामांचे उदाहरण दिलेच आहेत म्हणून सांगतो- तुकारामांनी विठ्ठलाला सावळे परब्रह्म म्हणले आहे. आता तुम्ही विठ्ठलाला देव म्हणत नसाल तर तुम्हाला माझा दंडवत. परंतु माझ्यासारखा अडाणी मात्र वरील सर्व देव आणि ब्रह्म यामध्ये भेद आहे असे मानत नाही. << आता आपण एका बोटावरील थुंकी दुसर्‍या बोटावर नेणार्‍या जादूगारासारखी समाधीपाद 24 वर उडी मारली !--> मी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले. तुम्ही दाखला मागितला मी दिला. तो तुम्हाला सापडला नाही किंवा माहिती नव्हता त्यात माझी चूक नाही. -- पण जेव्हा तुम्ही काथ्याकूटमध्ये चर्चा म्हणून लेख लिहता त्यावेळी जास्त अचूकपणाची अपेक्षा असते. मला तुमच्या लेखात काही न पटणारी विधाने दिसली. मी नम्रत्रेने कोठे शोधावयाचे ते विचारले. तुम्ही गोलमाल उत्तर दिले. ---> मीदेखील तुम्ही विचारलेल्या भाषेतच उत्तर दिले. तुम्हाला दाखले हवे होते मी अगदी नंबर सकट दिले. त्यावर तुम्ही "आता आपण एका बोटावरील थुंकी दुसर्‍या बोटावर नेणार्‍या जादूगारासारखी समाधीपाद 24 वर उडी मारली " असे प्रतिउत्तर केले. यावरून तुमचा कल हा नम्रतेने जिज्ञासू म्हणून प्रश्न विचारण्याचा नसून माझ्या चुका दाखवण्याचा होता हे सिद्ध होते. तुम्ही केवळ देव, ब्रह्म शब्दभेद करून माझ्या चुका काढण्याचा प्रयत्न करत होतात आणि मी तो प्रयत्न हाणून पाडला एवढेच. लेखात चूक झाली असेल तर मी ती नक्की मान्य करेन. परंतु चूक नसताना मला उगीचच चुकीचे ठरवण्याचा जो तुम्ही घाट घातला आहे तो स्तुत्य नाही. आत्तापर्यंत मी तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची दाखल्यासकट उत्तरे दिली तरीही तुम्हाला ती जादूगाराच्या बोटावरची थुंकी वाटत असेल तर माझे काही म्हणणे नाही. माझे मत मान्य करावे असा आग्रहदेखील नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद
म
मारवा Tue, 03/13/2018 - 04:57 नवीन
शरदजी म्हणतात म्हणून मी आपणास पुढील दुवे पहावयाची विनंती करतो. आपला अभ्यास आहेच, नवीन काही सापडणार नाही पण येथेही अडाणी लोकांकरिता सोप्या भाषेत उपनिषदांची माहिती करून देणारे लेख दिसतील. त्यांनी तुम्हाला किती सन्मानाने वागवलेले आहे तुमच्या लक्षात कसे येत नाहीत ? त्यांनी वर म्हटलेले आहे की आपला अभ्यास आहेच. शिवाय शरदजींनी अडाणी लोकांकरीता सोप्या भाषेत उपनिषदांची माहिती करुन देणारे लेख लिहीलेत ते ही सांगितले त्याचे दुवेही दिलेत तरी तुम्ही ते वाचत नाहीत याला काय म्हणावे ? म्हणजे आपला अभ्यास आहे हा मान आपल्याला शरदजींनी दिला म्हणुन तुम्ही शरदजींनी अडाणी लोकांकरीता लिहिलेले लेख तुम्ही वाचणार नाहीत का ? खरच थुंकीचे वाक्य फारच विनम्रतेने लिहीलेले होते. पुन्हा शरदजी किती मोठ्या मनाने म्हणतात आग्रहाची विनंती की आपण दशोपनिषदातील उरलेल्या उपनिषदांची माहिती मिपाच्या वाचकांना कळेल अशा भाषेत अवष्य करून द्यावी. शिवाय शरदजींनी किती मोठ्या मनाने तुम्हाला उरलेल्या उपनिषदांची माहीती अडाणी मिपाकरांना करुन देण्याची परवानगी दिलेली आहे. ज्यावर ते अगोदरच बोललेले आहेत तो अंतिम शब्द आहेच हे सत्य तुम्ही एकदा समजुन घ्या. शरदजींनी भाष्य केल्यानंतर तुम्हाला असे त्यावर नविन लिहीण्यासारखे किंवा इतरही कोणाला सांगण्यासारखे काही शिल्लक आहे का ? असु शकते का ? अडाणी मिपा करा करीत इतके मोठे कार्य केल्यानंतर उरलेल्या उपनिषदांवर तुम्ही बोला हवे तर ती परवानगी तुम्हाला देणार्‍या शरदजींचा किमान मान तरी ठेवा त्यांची विनम्रता तरी बघा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रिप्ट
क
क्रिप्ट Tue, 03/13/2018 - 05:18 नवीन
मारवाजी, अहो त्यांच्या विनम्रतेचा अंदाज मला माझ्या धाग्यावरच्या त्यांच्या प्रतिसादावरून आला होताच. वरुन त्यांनी धागा चुकीचा कसा आहे दाखवण्यासाठी नवीन धागा उघडला. आपल्या ज्ञानाची ओळख व्हावी म्हणून कि काय त्यांनी स्वतः लिहिलेले लेखदेखील दिले. माझ्या धाग्यामुळे त्यांना उपनिशदांचा ज्ञानसूर्य हि मिपावरील त्यांना मिळालेली अलिखित पदवी धोक्यात आली असे वाटत असावे म्हणूनच माझ्यावर शक्य तितका प्रहार चालू असावा. तसे असेल तर मी शरदजींना सांगू इच्छितो कि मी इतर मिपाकरांप्रमाणेच अडाणी आहे आणि आपल्यासारख्या ज्ञानसूर्यापुढे का काजवा काय चमकणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
माहितगार Mon, 03/12/2018 - 07:13 नवीन
...उपनिषद्काली देव नव्हता. इंद्र, वरुण, अग्नी इत्यादि वैदिक देवता होत्या. आज त्यांना कोणी देव म्हणून पडताळून बघावयाचा प्रश्नच नाही. तेव्हा उपनिषदांत देव पडताळता येईल हा पायाच चूकीचा आहे.
१) शरद सर देवता आणि देव मध्ये फरक का करत आहेत. २)
ये देवासो दिव्येकादश स्थ पृथिव्यामध्येकादश स्थ । अप्सुक्षितो महिनैकादश स्थ ते देवासो यज्ञमिमं जुषध्वम् ॥११ The Rigveda states in hymn 1.139.11,
यात देव शब्द येताना दिसतो, पुराणांमध्ये देवाचे उल्लेख येताना दिसतात मग उपनिषदातून ते का हरवतात ? नाही म्हणायला
यस्य देवे परा भक्तिः यथा देवे तथा गुरौ । तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः ॥ २३ Shvetashvatara Upanishad, 6.23, असे सापडले
आंतरजाल गुगलल्यास सगुण ब्राह्मण अशी काही एक संकल्पना दिसते आहे .कदाचित परफेक्ट नसेल पण इंग्रजी विकिपीडियावर Saguna_brahman लेख दिसतो आहे. या सर्व बाबतीत मी अनभिज्ञ आहे अधिक जाणून घेण्यास आवडेल.
  • Log in or register to post comments
क
क्रिप्ट Tue, 03/13/2018 - 00:20 नवीन
शरद सर देवता आणि देव मध्ये फरक का करत आहेत.---> तेच ना. त्यांच्यामते देव म्हणजे वेदांमध्ये असलेले इंद्र वरून आणि अग्नी अथवा आजच्या काळातले जयललिता नाव रजनीकांत (हो. असा उल्लेख त्यांनीच एका प्रतिसादात केला आहे .असो) परंतु माझ्यासारख्या सामान्य माणसाचे देव म्हणजे राम, कृष्ण , विठ्ठल, दत्त, गणपती, शंकर वगैरे वगैरे जे माझ्यासाठी (खरेतर केवळ माझ्यासाठी नाही तर खरोखरच) ब्रह्मच आहेत. शरद सरांनी वर नोंदवलेले देव त्यांना सगुण ब्रह्म म्हणून का मान्य नाहीत याचा विस्तार करावा. तसेही आता सामान्य माणसाला जर देवांची नावे सांग असे म्हंटले तर तो राम कृष्ण, शंकर अशी नावे सांगेल कि वरुण, अग्नी, गंधर्व अशी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
क
क्रिप्ट Tue, 03/13/2018 - 00:27 नवीन
माहितगार, उपनिषदात ईश्वर हा शब्द अधिक प्रचलित होता. आजच्या काळात ईश्वर हा शब्द प्रचलित आहे परंतु त्यापेक्षा जास्त देव शब्द अधिक सोयीचा आणि प्रचलित देखील आहे. काळाप्रमाणे त्यात बदल होतीलही. त्याचा गाभा लक्षात घ्यावा. परंतु इथे शरद सरांसारखे ज्ञानी लोकही विनाकारण शब्दभ्रमाच्या जंजाळात अडकतात याचेच दुःख. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
श
शरद Tue, 03/13/2018 - 03:18 नवीन
लेखाच्या सुरवातीला "आज" आपण देव कुणाल म्हणतो त्याबद्दल माझे मत दिले आहे. त्यात वेदातील देवता बसतात का ? देव, देवता, ईश्वर या निनिराळ्या नावात फरक नाही हे कोणीही मान्य करील. पण आजचा देव उद्याचा देव असेल असे नाही. वेदांत उल्लेखलेल्या प्रमुख देवता इंन्द्र, वरुणं, अग्नी, वायू.. (त्या काळी शंकर, विष्णु, गणपती राम कृष्ण इत्यादी आजच्या स्वरूपात नव्हते), इतर गौण देव (किंवा देवता म्हणा) सोडून दिल्या तरी यां पैकी किती जणांना आपण आज देव मानतो ? किती जणांची देवळे आहेत ? कोणाची आज पूजा होते ? वेदकाळ तर फार पुरातन झाला. ऐतिहासिक कालात आलो तर कुबेर हा वैश्यांचा प्रमुख देव होता. आज काय परिस्थिती आहे ? मंत्रपुष्पांजली हे कुबेराचे स्तोत्र आहे हे ते म्हणाणार्‍या 100 पैकी 99 लोकांना माहीत नसते. आणि अगदी आजची सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे पुण्यातील सर्वसाधारण भाविकाला कसबा गणपती जास्त माहीत की दगडूशेट गणपती ? तेव्हा लक्षात घ्या, मी देव आणि देवता यात फरक करत नसून वेदकालीन देव व आजचे देव यात फरक करत आहे. पुराणकालीन देव उपनिषदात हरवले नाहीत तर पुराणांनी नवीन देव घुसडले असे म्हणणे जास्त कालसापेक्ष होईल. आता "ब्रह्म" कडे वळू. ब्रह्म या कल्पनेचा उगमच मुळी वेदकालीन देवता विचारवंतांना समाधानकारक नव्हत्या म्हणून झाला. इंद्रादी देवता म्हणजे शक्तिमान माणुसच.(आजचे शंकर, विष्णु, त्यातच आले) ब्रह्म हे या कल्पनेपेक्षा फार वेगळे कल्पिले गेले. त्याचे वर्णन "नेति, नेति " असेच होते. मग त्याला "सगुण" हे विशेषण कसे चिकटवले गेले ? सर्वसामान्य माणसाला ब्रह्म पेक्षा देव पसंत असतो हे पाहून धर्माचार्यांनी दोघांची सांगड घाळण्याकरिता "ब्रह्म" ला सगुण केले. आता याचा साक्षाकार केव्हा झाला हे मात्र पाहिले पाहिजे शरद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
क
क्रिप्ट Tue, 03/13/2018 - 04:52 नवीन
"देव, देवता, ईश्वर या निनिराळ्या नावात फरक नाही हे कोणीही मान्य करील" ---- चला म्हणजे आपण ईश्वर आणि देव यात फरक मानत नाहीत तर. आता पतंजली योगसूत्राचा आधार घेवून मी वर लिहिले आहे तेच पुन्हा लिहितो- पतंजली योगसूत्रात ईश्वराची व्याख्या केली आहे. ती अशी: "दुःख, कर्म, कर्मफळ, वासना यांचा उपसर्ग नसलेला विशिष्ट पुरुष म्हणजे ईश्वर" (समाधीपाद: २४) . पुढे ते म्हणतात "तस्य वाचक: प्रणव:" (समाधीपाद: २७) म्हणजेच त्याचे स्वरूप व्यक्त करणारा शब्द आहे "ॐ". थोडक्यात काय तर ईश्वर आणि ओम हे एकच आहेत. आता तुम्ही ईश्वर म्हणजेच देव असे वर मान्य केलेलच आहे. थोडक्यात काय तर देव आणि ओम हेदेखील एकच होतात. आता तुमच्या लेखातील वाक्याकडे वळू. तुम्ही वरील लेखात म्हणाला आहात: "कोणी जर म्हणाले श्री.क्रिप्ट यांना "ॐ", "आत्मा", "ब्रह्म" यानाच देव म्हणावयाचे आहे तर मग मात्र माझे दंडवत" आता तुमच्या स्वतःच्या मतांमध्येच विरोधाभास दिसून येतो. एवढेच नाही तर वरच्या प्रतिसादात तुम्ही म्हणालात : "आता "ब्रह्म" कडे वळू. ब्रह्म या कल्पनेचा उगमच मुळी वेदकालीन देवता विचारवंतांना समाधानकारक नव्हत्या म्हणून झाला......."त्याचे वर्णन "नेति, नेति " असेच होते"" - इथे आपल्या वाक्यामध्येच पुन्हा विरोधाभास आहे. जर ब्रह्माचे वर्णन नेति नेति असे होते तर ब्रह्म हि कल्पना कशी असू शकेल? तो प्रत्यक्ष अनुभव आहे. ब्रह्माचा अनुभव आल्यावर त्याचे वर्णन करता आले नाही म्हणून वेदांनी नेति नेति असे वर्णिले. ती काही विचारवंतांच्या डोक्यातून आलेली कल्पना नाही. "मग त्याला "सगुण" हे विशेषण कसे चिकटवले गेले ?"--- ब्रह्म जरी निर्गुण असले तरी ते सगुण रूप धारण करू शकत नाही असे तुम्हाला का वाटते? जर निर्गुण ब्रह्मातून सगुण सृष्टी साकार होते तर निर्गुण ब्रह्मदेखील सगुण रूप घेऊन येऊ शकतोच नव्हे येतोच. त्यामुळे सगुण हे निर्गुण ब्रह्माला चिटकवलेल विशेषण नसून पूर्णसत्य आहे. कृष्णाने गीतेमध्ये म्हंटलेलच आहे 'यदा यदा हि धर्मस्य......संभवामी युगे युगे. जेंव्हा मी देव ही संज्ञा वापरली तेंव्हा अभिप्रेत असलेला अर्थ हा विष्णू, शंकर, गणपती या अर्थाने होता जे आजच्या काळात देव म्हणून प्रचलित आहेत आणि ब्रह्मस्वरूप देखील आहेत. आपण त्या देव शब्दाचा अर्थ वेदकालीन देवता घेऊन त्याचा विपर्यास केलात यात माझा दोष नाही. मला जर वेदकालीन देवता सांगायच्या असत्या तर मी तसे नमूद केले असते. आमच्या सारख्या सामान्य माणसासाठी देव हे विष्णू, शंकर, गणपती, राम, कृष्ण हेच आहेत. परंतु तुमच्यासारखा वेदाभ्यासू लोकांनी माझ्या देव शब्दाचा अर्थ वेदकालीन देवता घेऊन लावला तर त्याला मी तरी काय करणार? बाकी तुम्हाला सांगावेसे वाटते कि आपण मिपा वर जुने सभासद असलात तरी आपल्याला येथील पद्धती सांगतो. जनातले-मनातले यात लेख असतात. त्यात काही गफलत झाली तर वाचक ते समजावून घेतात. पण जेव्हा तुम्ही काथ्याकूटमध्ये चर्चा म्हणून लेख लिहता त्यावेळी जास्त अचूकपणाची अपेक्षा असते. तेथे निदान स्वमतांचाच विरोधाभास ठळकपणे दिसून येणार नाही एवढी माफक अपेक्षा तरी असतेच. पुढे तशी काळजी घ्या अथवा हा लेख काथ्याकूट मधून 'जनातलं मनातलं' मध्ये टाका. मिपावर तुम्ही दिलेल्या उपनिषदांच्या link एकदा तुम्हीदेखील पुन्हा पहा. काहीतरी योग्य नक्कीच गवसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद
म
माहितगार Tue, 03/13/2018 - 12:42 नवीन
माझ्या काही शंका शिल्लक आहेत पण आधी वादातील पद्धती बद्दल मला शंका वाटावयास लागली आहे कारण प्रांजळपणे कबूल करायचे तर मी क्रिप्ट यांचा लेख आणि शरद सरांचे उपनिषदावरील लेख दोन्ही आता पर्यंत इग्नोर मारले होते. (वादामूळे सगळे वाचून काढले) या दोघांच्या वादावरून सत्तेतील भागीदार पक्ष आधी काँग्रेस राष्ट्रवादी आणि आता भाजपा शीवसेना माध्यमांच्या चर्चेत विरोधी पक्ष येऊ नयेत म्हणून आपापसात लुटूपुटूची लढाई खेळतात आणि मतदारांना विरोधीप्क्षाचा ऑपश्न आपल्या दोघातून घेतला जावा असा प्रयत्न करतात , स्ट्रॅटेजी चांगली आहे. क्रिप्ट यांच्या स्ट्रॅटेजीवरून नेटवर्क मार्केटींग वाले आठवले तुम्हाला कायपण पायजे तर आमच्याकडे हाय म्हणून ओढून एक्सपर्टच्या सभेत ओढून आणायचा ( तेवढ्यावर काही लोक मानणार नाहीत गुरुकडे चला गुरू कडे चला म्हणून लोक येणार नाहीत त्यापेक्षा शिष्य चुकला शिष्य चुकला म्हणून वाद झाला की लोक गुरुच्या शोधात निघतात तत्वज्ञानपण ऐकतात वाचतात) आणि नंतर एक्सपर्ट लोक नवी बकरी बरोबर गठवतात तशी काय स्ट्रॅटेजी हाय का म्हणतो . ;) आणि आशी काय गूप्त स्ट्रॅटेजी असेल (आणि नसेल तरी ) मार्केटींग प्रिंन्सीपलवर जवळपास बरोबर आहात पण होतय काय ना की ज्यांना आधी विकून झालय त्यांनाच पुन्हा विकल्यासारखे आहे की नाही ? मी काय म्हणतो हीच स्ट्रॅटॅजी आणि एनर्जी जरा हिंदी, उर्दू इंग्रजी शिकून आपल्या संस्कृतीचा परिचय नसलेल्या लोकांच्या घरवापसीसाठी वापरली तर ? विचार करुन पहा म्हणतो , काय म्हणता गुरुजन हो ;) ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रिप्ट
ग
गामा पैलवान Mon, 03/12/2018 - 08:50 नवीन
स्मिता.,
विचार करून बघते काही उमगतंय का :)
जिज्ञासू असल्याने तुम्ही विचार तर करालंच. याविषयी शंका नाही. सोबत नामजपसुद्धा करा म्हणून सुचवेन. अनेक योग्यांनी आणि संतांनी नामजपाचं महात्म्य सांगितलंय. तुम्हांस येणारी प्रत्यक्ष अनुभूती हेच नामाचं प्रमाण आहे. शुभास्ते पन्थान: सन्तु. :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 03/12/2018 - 09:10 नवीन
प्राडॉ, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. काही भाष्य करेन म्हणतो. १.
ब्रम्ह. परमात्मा, ग्रांथिक तत्वज्ञान हे सर्व शाब्दिक बुडबुडे वाटतात.
एका अर्थी हे खरंय. 'साखर गोड आहे' या विधानांत गोड हा शब्द म्हणजे केवळ बुडबुडाच आहे. तुम्ही लिहिता त्या गझलादेखील शाब्दिक बुडबुडेच आहेत. उपमादि अलंकार तर उघडपणे बुडबुडे आहेत. तुम्हाला गझल लिहिल्यावर व/वा ऐकल्यावर आनंद होतो ना? तेव्हा तुमच्याकडे संतोषजनक ठोस पदार्थ काय असतो? २.
हजारो वर्षात एखाद्याला तरी त्या परमात्यमाचं दर्शन व्हायला पाहिजे होतं. विश्वरूप दर्शन नाही किमान आपल्याबरोबर सुख दुःख शेयर करायला गळ्यात हात घालून मित्रासारखा भेटून अंतर्धान जरी पावला असता तरी चाललं असतं.
ईश्वर मित्रासारखा भेटायला पाहिजे ही एक प्रकारची जबरदस्तीच नव्हे काय? बाकी, दर्शन म्हणाल तर प्रत्येकास वेगवेगळ्या प्रकारेच ईशदर्शन होतं. कोणत्याही दोन माणसांना एकसारखं दर्शन होणार नाहीये. पण तुमची अपेक्षा रास्त आहे. ईशदर्शन झालेला निदान एखादा तरी महात्मा निपाजायला हवा होता. नरेंद्रनाथ दत्त नावाच्या एका माणसाने अगदी नेमका हाच प्रश्न एका पुजाऱ्याला विचारला. त्या पुजाऱ्याने ते सुप्रसिद्ध उत्तर दिलं : 'नरेंद्रा, तुला आता मी जितका स्पष्ट पाहतो त्याहून अधिक लख्खपणे ईश्वरास बघितलंय.' तो नरेंद्र पुढे स्वामी विवेकानंद म्हणून विख्यात झाला. आणि तो पुजारी म्हणजे श्रीरामकृष्ण परमहंस. साधना केली की मगंच ईश्वर दिसतो. ३.
जगात इतकी विषमता दारिद्र्यता दुःख यात कुठेही त्या ब्रम्हाचा रोल दिसत नाही, किंबहुना तो कुठेही कोणाच्याही जखमेवर फुंकर घालतांना दिसत नाही.
एका विशिष्ट स्वरुपात ईश्वर दिसावा ही अपेक्षा देखील एक प्रकारची जबरदस्तीच आहे ना? तुम्ही स्वत: कधी कोणाची सेवा केलीये का? अगदी एखाद्या भिकाऱ्याला भीक तरी दिली आहे का? दिली असेल तर त्याच्या डोळ्यांत तुम्हाला ईश्वर नक्की दिसेल. हां, पण बहुतांश भिकारी धंदेवाईक असतात. त्यामुळे खरा गरजू दिसेपर्यंत तुम्हांस भीक वाटंत हिंडावं लागेल. त्यात बराच पैसा अपात्री दानांत वाया जाऊ शकतो. आहे तयारी? सांगायचा मुद्दा काये की ईश्वर शोधावा लागतो. ४.
ईश्वर ही अतिशय सुन्दर कल्पना आहे. दिल बहलाने के लिये एक अच्छा खयाल आहे इतकेच वाटते.
तशी ती आहेच. पण जिज्ञासूला पुढे जाऊन ईश्वर स्वत:त बघायचा असतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा