Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अप्रिय आठवणींपासून सुटका

श
शाम भागवत
Mon, 07/06/2020 - 05:55
💬 145 प्रतिसाद
मे २००७ च्या सुरवातीला जीवनविद्या मिशने मांडलेल्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायला मला सुचवले गेले होते. मला माझ्यातल्या नकारात्मक भावनांवर ताबा मिळवण्यासाठी हे सुचवले गेले आहे हे मला त्यावेळी माहीत नव्हते. २००७ च्या सुरवातीपासून अंदाजे दीड वर्षे मी अभ्यास करीत होतो. मे २००७ च्या पहिल्या आठवड्यात घडलेली ही गोष्ट आहे. एक दिवस रात्री गाढ झोपलेलो असताना एकदम जाग आली. पहाटेचे साडेचार पाच वाजले असतील. मनात विचार सुरू होत असतानाच माझा जपही सुरू झाला होता. एवढ्यात मला नेहमी त्रास देणाऱ्या एका माणसाची आठवण आली आणि मन एकदम संतापाने भरून गेले. हातात पिस्तूल घेऊन गोळ्या माराव्याश्या वाटत होत्या. मी ही अचंबित झालो. असा विचार करणे बरोबर नाही असे एकीकडे वाटत होते. जपाचा जोरही अचानक वाढला होता. पण त्याच बरोबर सूडाचे मानसिक समाधानही मिळत होते. विशेष म्हणजे जप चालू असल्याने ह्या सगळ्याकडे त्रयस्थ नजरेने पाहणेही चालू होते. खरे तर आदला सगळा दिवस चांगला गेला होता. झोप पण चांगली लागली होती. त्रास देणाऱ्या माणसाची सावलीसुद्धा बरेच दिवस शिवली नव्हती. पण आज पहाटे त्या माणसाच्या विचाराने माझा कब्जा घेतला होता. मी सोडून आजूबाजूचे जग शांतपणे झोपले होते. मनात असा विचार आला की, तो माणूसही आता स्वस्थ झोपला असेल आणि मी मात्र इकडे तळमळतोय. रागाने तडफडतोय. सद्गुरू पैंच्या तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या ग्रंथामुळे, सकारात्मक विचाराचे महत्त्व माझ्या लक्षात आलेले होते. तसेच नकारात्मक विचारांनी नुकसान होते हेही लक्षात आले होते. तसेच यासगळ्यासाठी मनात येणाऱ्या विचारांवर जागृत राहून लक्ष ठेवायची आवश्यकता नव्याने कळली होती. अप्रिय घटना किंवा आठवणी नव्याने मनात साठणार नाहीत याची काळजी घेणे हा फक्त निम्माच भाग समजला पाहिजे. कारण भूतकाळातील आठवणी अजून त्रास देऊ शकतात हे आज लक्षात आले होते. त्या आठवणींचा बीमोड हा दुसरा भागही तितकाच महत्त्वाचा आहे याची आज खात्रीच पटली होती. कारण ह्या आठवणींवर माझा काहीही ताबा नाही, उलट त्याच माझा ताबा घेताहेत याचा नुकताच अनुभव आला होता. त्यावर काहीतरी उपाय करायला पाहिजे होता. विचार चालू झाला. आणि वर उल्लेखलेल्या ग्रंथातील एका वाक्याची आठवण झाली. जितक्या पोटतिडकीने तळहातावर तळहात घासून व दात-ओठ चावून दुसऱ्यांना "तुझे तळपट होवो" असा शाप तू देतोस, तितक्याच पोटतिडकीने ’दुसऱ्यांचे कल्याण होवो, त्यांचे भले होवो, ते सुखी होवोत" अशी देवाची प्रार्थना केली तर त्या प्रार्थेनेने भगवंत, संत, सद्गुरू व सर्व देव-देवता तुझ्यावर प्रसन्न होतील. अंघोळ व पूजा झाल्यावर शांतपणे बसलो. वर दिलेल्या वाक्याच्या आधारे उपाययोजना करायचे निश्चित केले आणि तो माणूस समोर आहे असे समजून, त्याचे भले व्हावे, कल्याण व्हावे वगैरे कल्पना करायला लागलो. पण अजिबातच जमेना. उलट संताप वाढायला लागला. तरीही प्रयत्न वाढवत राहिलो. तरीही मला ते जमत नव्हते. एकवेळ अशी आली की, माझ्या मुठी घट्ट वळल्या गेल्या, सर्वांगाला घाम फुटला. तरीही मला त्या माणसाचे शुभचिंतन करता येईना. भले किंवा कल्याण हे शब्द सुद्धा आठवेनात. तरीही जे शब्द सुचतील ते वापरून मी पुढची पाच मिनिटे प्रयत्न करत राहिलो. गंजीफ्रॉक घामाने ओला झाला होता. शरीरपण थोडेसे थरथरत होते. पण शेवटी कसेबसे शुभचिंतन करायला जमले होते. त्यावेळी एक लक्षात आले की, मनावरचा ताण हलका झाला आहे. मोकळे मोकळे वाटत आहे. शांतपणे डोळे मिटून बसलो. तर थोड्या वेळाने आणखी एका अप्रिय माणसाची आठवण आली. ही जरा जुन्या काळातील आठवण होती. परत वरील प्रमाणे त्याच्यासाठीही शुभचिंतन केले. त्रास झाला पण फारसा झाला नाही. विचार करता असे लक्षात आले की, ही आठवण पहिल्या आठवणी इतकी त्रासदायक नव्हती त्यामुळे शुभचिंतन करणे त्यामानाने सोपे झाले. पुढचे अनेक तास थांबून थांबून अशाच जुन्या जुन्या आठवणी एकामागोमाग येत होत्या व मी शुभचिंतन करायचा प्रयत्न करत होतो. मात्र शुभचिंतन करायला त्रास फारसा होत नव्हता, कारण या आठवणींत तेवढा कडवटपणा भरलेला नव्हता. एव्हाना भावासहित शुभचिंतन करण्यासाठी विश्वप्रार्थना ही खूप उपयोगी पडते आहे हे लक्षात आल्याने तिचाच वापर करू लागलो होतो. यासगळ्या प्रकारात शब्द महत्त्वाचे नसतात तर भाव महत्त्वाचा असतो. अन्यथा मनापासून शुभचिंतन करणे शक्य होत नाही. शुभचिंतनामध्ये आपल्याला जे हवेहवेसे वाटते तेच समोरच्या व्यक्तीला मिळते आहे ही भावना धरायची असते. त्या दृष्टीनेही विश्वप्रार्थना उत्कृष्ट आहे. या जुन्या जुन्या आठवणी मनांत येत असताना, मधूनच पहिल्या माणसाची परत आठवण यायची. पण ती प्रत्येक वेळेस आणखीनच सौम्य झालेली जाणवत असे. त्यामुळे शुभचिंतन करण्यांस सहज जमत असे. दातओठ खाऊन किंवा मुठी वळायची कधीच आवश्यकता भासत नव्हती. मलाच माझे आश्चर्य वाटत होते. असे हळूहळू सगळ्याच अप्रिय आठवणींबद्दल व्हायला लागले होते. माझा हा प्रयत्न ३ दिवस चालू होता. आता कुठलीच आठवण त्रासदायक वाटत नव्हती. एकदाच शुभचिंतन करूनही किंवा शुभचिंतन करायच्या नुसत्या विचारासरशी त्या आठवणीतून आरामात मुक्त होतो येत होते! काही दिवसांनी मला त्रास देणारा त्या माणसाला मी लांबून पाहिले. पूर्वी माझ्या मनांत या माणसाच्या फक्त दर्शनाने तात्काळ तिडीक उठत असे. पण यावेळी असे काही झाले नाही. मी शांतपणे माझ्या मनातल्या प्रतिक्रियांकडे पाहत होतो. मन खूपच शांत होते. अगदी त्रयस्थपणे त्या माणसाकडे पाहत होते. आपल्याला कोणत्याही प्रकारचे अशुभ चिंतन करायचे नाहीये हे मन स्वत:लाच शांतपणे समजावत होते!!. मी त्या माणसाच्या त्रासातून मुक्त झालो होतो. खूप हायसे वाटत होते. यानंतर बरीच वर्षे उलटून गेली. हा माणूस नंतर माझ्याशी आपणहून बोलायला आला. मीही जास्ती सलगी वाढणार नाही याची काळजी घेऊन बोलायला सुरवात केली. मतभेद कायम असूनही, आवश्यक तेवढा संवाद ठेवणे सहज जमायला लागले.पुढे तर त्याच्या बोलण्यात माझ्याबद्दल आदरही दिसायला लागला होता. असेच अनुभव इतर बऱ्याच जणांबद्दल आल्याने हा योगायोग नाही हे स्पष्ट झाले. वर दिलेले व ठळक केलेल्या वाक्याने त्याची सत्यता पटवली होती. त्यानंतर नकोशा वाटणाऱ्या आठवणींवर हाच उपाय मी वापरू लागलो व आजपर्यंत निर्भेळ यश मिळाले आहे. ज्यांना ज्यांना मी हा उपाय सुचवला व ज्यांनी ज्यांनी तो वापरला त्यांना फायदा झाला. अर्थात ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे त्यांनाच मी हे सांगितले आहे. त्यामुळे "शंकाविरहित वापराचा परिणाम", हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहेच. याबाबतीत माझ्या मनांत जे विचार वेळोवेळी आले ते, मी मांडतोय. मी आजपर्यंत कोणतेही मानसशास्त्राचे पुस्तक वाचलेले नसल्याने मी शास्त्रीय पद्धतीने या सगळ्याचे विवेचन करू शकणार नाही. हे जे मी लिहितोय ते सर्व अप्रिय, त्रासदायक अथवा नकारात्मक गोष्टींबद्दलच्या आपल्यातल्या साठवणीबाबत लिहीत आहे. त्याला फक्त स्वानुभवाचा आधार आहे.
१. आपल्या आयुष्यात जे काही घडत असते त्या सर्वांची नोंद होत असते. घडलेली घटना, काळ, वेळ त्यावेळच्या भाव व भावना, याचबरोबर या सगळ्याची तीव्रता पण नोंदवली जात असते. त्यामुळे ती आठवण होताच आपले मन परत सर्वार्थाने ती घटना जशीच्या तशी परत अनुभवू शकते. साधारणत: आपण कसे बरोबर व दुसरा कसा चुकीचा हाच उहापोह आपले मन यावेळी करते. तसेच काही जमलेली नवीन माहिती किंवा मुद्दे यांचा उहापोह होऊन, ही नवीन माहिती पण मग जुन्या माहितीच्या शेजारी साठवली जाते. मूळ माहितीत भर घातले जाणारे हे नवीन मुद्दे साधारणत: रिव्हर्स इंजिनीअरिंगचा उत्तम नमुना असण्याची शक्यताच जास्त असते. थोडक्यांत जुन्या आठवणींवर आणखीन एक घट्ट व भक्कम वीण घातली जाते. ती आठवण आणखीन धष्टपुष्ट होते. २. घडलेल्या घटनेची कोणतीही नोंद पुसली जाऊ नये किंवा ती आमूलाग्र बदलली जाऊ नये यासाठी काही एक यंत्रणा काम करत असते. याच कारणामुळे आठवणीतला कडवटपणा निघून जाईल असे (शुभचिंतन) जर आपण काही करायला लागलो तर त्याला सुरवातीला विरोध होतो. मात्र हा विरोध मावळेपर्यंत जर आपण प्रयत्न चालू ठेवले तर मात्र हे शुभचिंतनही स्वीकारले जाते व या आठवणींच्या जवळ साठवले जाते. पुन्हा जेव्हा ही आठवण होते, तेव्हा त्या आठवणीतील कडवटपणा बरोबरच हे शुभचिंतनही अंतर्भूत असल्याने ही आठवण सौम्य झालेली असते. तसेच नव्याने शुभचिंतन केले गेल्यास त्याला फारसा विरोध होत नाही. ते कुठे साठवायचे हा प्रश्न मागच्या वेळेसच निकालात निघालेला असतो. ३. सर्व नोंदींची प्रतवारी केलेली असते व सर्वात जास्त वेटेज असलेली आठवण सर्वात वर व त्याचपध्दतीने बाकीच्या आठवणी त्याखाली साठवलेल्या असतात. याच कारणामुळे एखादी सर्वोच्च अप्रिय घटना त्यात मिसळलेल्या शुभचिंतनाने जेव्हा सौम्य होते तेव्हा तिची प्रतवारी तात्काळ घसरते. थोड्यावेळाने त्या खाली असलेली दुसऱ्या क्रमांकाची अप्रिय घटना आपोआप वर येते. अशा रीतीने आपण आणखी आणखी भूतकाळात शिरायला लागतो. अशा रितीने भूतकाळातील जुन्या जुन्या आठवणी हळूहळू वर यायला लागतात. ४. वर सांगितलेला क्रम सदैव अद्ययावत केला जात असतो. एखादी गोष्ट महत्त्वाची असेल तर तिचा वापर वारंवार होणे साहजिकच असते. पण ; एखाद्या अप्रिय घटनेची जर बराच काळ उजळणी झाली नाही तर त्याची फेरप्रतवारी करण्याची गरज भासायला लागते. त्यामुळे ती आठवण परत स्मृतीतून किंवा जिथे कुठे साठवलेली असेल तिथून मनांत प्रक्षेपित केली जाते. या आठवणीबाबत, मनाच्या मिळालेल्या नवीन प्रतिक्रियेवरून मग तिचे फेरमुल्यांकन केले जाते व त्याप्रमाणे ती योग्य क्रमाने परत साठवली जाते. ५. या फेरप्रतवारी करण्याच्या अंतर्गत आवश्यकतेमुळे, एखादी जुनी आठवण अचानक आठवते व काही कारण नसताना आपल्याला हे मध्येच कसं काय आठवतंय? याचे आपल्याला आश्चर्य वाटत राहते. प्रत्यक्षात हीच वेळ असते या अप्रिय आठवणीवर हल्ला करण्याची. ६. कोणतीही अप्रिय आठवण नष्ट करता येत नसल्याने ती फक्त सौम्य करता येऊ शकते. त्यासाठी जिथे ही आठवण साठवलेली आहे तिथेच शुभचिंतन साठवले जावे हा आपला हेतू असायला लागतो. पण कोणती अप्रिय गोष्ट नक्की कुठे साठवलेली असते हेच आपल्याला नीट माहीत नसते. ७. त्यामुळेच अचानकपणे मनांत येणारी ही आठवण, म्हणजे जणू आपला एखादा लपलेला शत्रू बिळातून अचानक बाहेर आलेला असतो व तो परत बिळात लपायच्या आत त्याच्यावर हल्ला करायची संधी असते. इथे आपले शस्त्र असते शुभचिंतनाचे. आपल्या या शस्त्राचा वार झाल्यावर, हा शत्रू गोंधळून जातो व हा घाव अंगावर वागवत, जखमी होऊन परत मूळ जागी परततो. काही काळाने हा शत्रू आपली ओली जखम घेऊन परत मनात अवतीर्ण होतो. त्याची अपेक्षा असते, अशुभ चिंतनाच्या औषधाने आपण बरे होऊ. गमावलेली ताकद परत मिळवू. पण परत शुभचिंतनाचा हल्ला झाल्यास तो आणखीनच नाउमेद होतो. त्यांचा क्रमांक आणखीनच घसरतो व अप्रिय आठवणींच्या साठ्यामध्ये गलितगात्र व क्षीण होऊन आणखीनच तळाशी जातो. ८. या सर्व नोंदी आपल्यातच होत असतात. मग त्याला अंतर्मन म्हणा किंवा चित्त म्हणा किंवा अंतरंग म्हणा किंवा स्मृती म्हणा. कोणी त्याला मेंदू म्हणेल. साठवणीच्या जागेचे नाव काहीही असले तरी, ती जागा आपल्या शरीरातच कुढेतरी असते. थोडक्यांत कोणत्यातरी पेशींद्वारेच सगळे कार्य चालू असते. आपल्या शरीरातील पेशी म्हटल्यावर, त्या पेशींची भरणपोषणाची जबाबदारी आपण उचलत असतो हे मान्यच करायला लागते. त्यामुळे आपलेच नुकसान करणाऱ्या अशा अप्रिय गोष्टी व त्यांचा कडवटपणा टिकवून ठेवण्यासाठी तसेच प्रसंगी तो कडवटपणा वाढवण्यासाठी आपण आपली शक्ती खर्च करणे हा किती आतबट्ट्याचा व्यवहार आहे याची कल्पना येईल. ९. पण जर या अप्रिय गोष्टींमधील कडवटपणा आपण सौम्य करू शकलो तर या साठ्याची वाढ होण्याचे ताबडतोब थांबते. अप्रिय व्यक्तींची मनातल्या मनात उजळणी करणे, त्यांना शिव्याशाप देणे, म्हणजे आपल्याच शरीरातील काही पेशी त्या अप्रिय व्यक्तीला आंदण देणे होय. इतकेच नव्हे तर त्यांची पालनपोषणाची जबाबदारी उचलणे व भविष्यांत त्यांना जागा पुरेनाशी झाली तर आणखी जागा उपलब्ध करून देण्याचे वचन देण्यासारखे आहे. १०. जर घटना एकदा घडली व नोंदही एकदाच झाली तर सगळं ठीक चालले आहे असे म्हणता येईल. जी घटना प्रिय अथवा अप्रिय नाही अशा गोष्टीच्या बाबतीत असेच घडते. मात्र प्रिय व अप्रिय गोष्टी याला अपवाद असतात. ११. असे म्हटले जाते की, आपला केला गेलेला मान, सन्मान फार काळ लक्षात राहत नाही, पण आपला झालेला छोटासा अपमान शेवट पर्यंत लक्षात राहतो. आपली झालेली फसवणूक आपल्याला कायम त्रास देते. विशेष करून ज्याच्यावर आपण उपकार केलेले आहेत, त्याने जर त्या उपकाराची परतफेड अपकाराने केली असेल तर मात्र अशा घटना फार खोलवर घर करून राहतात. साधारणत: अशा घटना सात्त्विक संताप निर्माण करतात. तिथे फार फार जपायला लागते. अशा प्रसंगात या कडवट आठवणी किंवा त्यातील अप्रिय व्यक्ती अत्यंत वेगाने आपल्या शरीरातील जागा बळकावत असतात. स्मृती साठवणाऱ्या पेशी या खूप महत्त्वाच्या व दुर्मिळ समजल्या पाहिजेत. नेमक्या त्याच पेशी आपल्या शत्रूला देणे हा आपणच आपल्यासाठी केलेला घोर अपराध समजला पाहिजे. १२. वेगळ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, अप्रिय घटनेतील अप्रिय व्यक्ती आपल्याशी अयोग्य रितीने वागून आपल्या अंतर्मनात प्रथम जागा व्यापते. त्यानंतर मात्र त्या घटनेच्या प्रत्येक उजळणी बरोबर ह्या व्यापलेल्या जागेवर ही अप्रिय व्यक्ती इमारत बांधायला लागते. आपण जितक्या वेळेस उजळणी करू तितकी ही इमारत आणखी भक्कम व मोठी व्हायला लागते. साधारणत: प्रत्येक उजळणीत, आपण कसे बरोबर होतो व ती व्यक्ती कशी चूक होती हेच आपण आपल्यालाच समजावून सांगत असतो व वाढत्या श्रेणीत त्या व्यक्तीला शिव्याशाप देत असतो. आपल्याला असे वाटत असते की आपण देत असलेले हे सर्व शिव्याशाप कोठेतरी बाहेर जात आहेत. वास्तविक हे सर्व शिव्याशाप आपण आपल्याच शक्तीने आपल्यातच नोंदवून ठेवत असतो व आपले चित्त दूषित करत असतो. १३. आपण आपल्या जीवनात जे काही निर्णय घेत असतो, ते नेहमी आपण आपल्यात साठवलेल्या माहितीचे विश्लेषण करून घेत असतो. त्यामुळे आपण आपल्यात साठवत असलेली माहिती ही नेहमी सकारात्मक राहील याची काळजी घेणे ही आपलीच जबाबदारी आहे. १४. अप्रिय घटना प्रत्येकाच्या जीवनात घडतच असतात. त्याची नोंद होणे अपरिहार्य असते. पण या नव्याने घडणाऱ्या अप्रिय घटनांची काही कारण नसताना उजळणी केली जाऊन या नोंदीची वाढ होणार नाही एवढेच आपल्या हातात असते. ते जर जमू शकले तर आपले चित्त नव्याने मलिन होऊ शकणार नाही. तसेच शुभचिंतनाचे हत्यार वापरून भूतकाळातील नकोशा किंवा नकारात्मक आठवणी सौम्य करून, तीही साफसफाई आपण करू शकतो. १५. नामस्मरणासारख्या किंवा इतर कोणत्याही अंतरंग शुद्ध करणाऱ्या पद्धतींमुळे मनाला सूक्ष्मता येते. त्यामुळे मन खूप संवेदनशील बनते. पण म्हणून विकार संपलेले नसतात. त्यामुळे त्यांचे उद्दीपन लवकर होते. त्यामुळे या जुन्या आठवणी जेव्हा जागृत होतात तेव्हा त्या मनाला पूर्वीपेक्षा खूपच जास्त ताकदीने व्यापतात. यामुळे बऱ्याच दिवसांची साधना खर्ची पडते. यासाठी साधनी माणसाने नेहमी या जुन्या आठवणींच्या बाबतीत सावध राहिले पाहिजे. १६. प्रत्येक माणसात गुण व दोष दोन्हीही असतात. पण अप्रिय माणसांत फक्त दोषच आहेत अशी आपली भावना असते. ह्या अप्रिय माणसांबद्दल कलुषित झालेले आपले मन त्या माणसातील चांगले गुण टिपायलाही नकार देते. कोणी दाखवायचा प्रयत्न केला तरी त्यातही आपण नकळत खुसपटच काढत बसतो. पण हा नकारात्मक भाव गेल्यावर मात्र त्या माणसातले गुणही हळूहळू दिसायला लागतात. १७. माणूस जितका सज्जन असेल त्याप्रमाणात त्याने याबाबतीत सावध राहायला लागते. आपण सज्जन असल्याचा त्याने अभिमान बाळगला तर मात्र त्याच्या हातून नकोश्या घटनांची उजळणी फार मोठ्या प्रमाणात व्हायची शक्यता बळावते. त्यामुळे सज्जन माणसाला सर्वात जास्त दु:ख भोगायला लागते असे दिसून येते. यास्तव सज्जन माणसाने अशा आठवणीतून मुक्त होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत असे म्हणावेसे वाटते.

प्रतिक्रिया द्या
75851 वाचन

💬 प्रतिसाद (145)
ग
गवि Mon, 07/06/2020 - 07:12 नवीन
विचार आवडले.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 07/06/2020 - 07:22 नवीन
विचार आवडले.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 07/06/2020 - 07:36 नवीन
जितक्या पोटतिडकीने तळहातावर तळहात घासून व दात-ओठ चावून दुसऱ्यांना "तुझे तळपट होवो" असा शाप तू देतोस, तितक्याच पोटतिडकीने ’दुसऱ्यांचे कल्याण होवो, त्यांचे भले होवो, ते सुखी होवोत" अशी देवाची प्रार्थना केली तर त्या प्रार्थेनेने भगवंत, संत, सद्गुरू व सर्व देव-देवता तुझ्यावर प्रसन्न होतील.
लेखामधील हे वाक्य ठळक करायचे राहिलेय. ते कृपया ठळक करावे ही प्रशासकांना विनंती
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Wed, 07/08/2020 - 18:02 नवीन
धन्यवाद. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 07/06/2020 - 08:24 नवीन
लिहिण्यामागची तळमळही पोचली, तुमचा धागा वाचताना मनात काही ओळी उमटल्या पण कदाचित ते या धाग्यावर विषयांतर होईल असे वाटले म्हणुन वेगळा धागा काढला आहे https://www.misalpav.com/node/47151 पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Mon, 07/06/2020 - 08:36 नवीन
मन आणि शरीर (Mind and matter) ह्यावरचं हे मिपावरचं सर्वोत्तम विवेचन आहे! जे काही #३ आणि ४ मधे सांगितले आहे ते ‘कर्मसंस्कार’ क्रियामाण कर्म. तेच पुढे जाऊन संचित होते.
कोणतीही अप्रिय आठवण नष्ट करता येत नसल्याने ती फक्त सौम्य करता येऊ शकते
. अप्रिय / प्रिय साठवणी (कर्मसंस्कार) नष्ट करता येतात. त्यांचं समूळ उच्चाटन म्हणजेच मुक्ती किंवा निर्मूलन म्हणजेच निर्वाण (निब्बान). किंबहूना ते करण्याचं मुक्त स्वातंत्र्य (फ्री वील) हेच आपल्या आयुष्याचं खरं उद्दीष्ट! अतिशय सशक्त लेखन!! - (साधक) सोकाजी
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Mon, 07/06/2020 - 09:39 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
श
शाम भागवत Mon, 07/06/2020 - 11:08 नवीन
अप्रिय अथवा प्रिय आठवणी म्हणजे घडलेल्या घटना + त्यावर झालेले “मी व माझे“ चे संस्कार. त्यामुळे एकच घटना प्रत्येकाला वेगवेगळी दिसते. म्हणूनच प्रत्येकाचे जग वेगळे आहे असे म्हटले जाते. माझ्या मते घडलेल्या घटनांच्या स्मृती नष्ट करता येत नसाव्यात. मात्र त्यावर झालेले “मी व माझे“ चे संस्कार कमी जास्त करता येतात. हे संस्कार प्रत्येक उजळणीत कसे वाढत जातात हे स्पष्ट करून मग ते संस्कार कमी कसे करता येतात ते सांगितले आहे. त्यानंतर “मी व माझे“ चे, हे संस्कार कमी करणे कसे साधायचे ते लिहिलेले आहे. मात्र वरील लेखात क्लिष्टता येऊ नये यासाठी “मी व माझे“ याचा बिलकूल उल्लेख झालेला नाही. मुक्ति म्हणजे घटनांचे किंवा त्याच्या स्मृतींचे समूळ उच्चाटन नसून, नोंदवले गेलेल्या सर्व घटनातील “मी व माझे“ चे संस्कार संपूर्णपणे नाहीसे होणे होय. असे होणे म्हणजेच त्या घटनांना साक्षीरूपाने आकळणे होय. तरीही आपल्या मतांचा आदर आहे. कारण मीही अजून शिकतोच आहे. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
क
कोहंसोहं१० Mon, 07/06/2020 - 20:53 नवीन
"माझ्या मते घडलेल्या घटनांच्या स्मृती नष्ट करता येत नसाव्यात" >>>>>>>>>>नाही येत. तसे झाल्यास मिपा वरच्या सर्वज्ञ व्यक्तीने मांडलेले मेमरी स्ट्रिंग्स बद्दलचे मत/संशोधन चुकीचे ठरेल (जे होणे शक्य नाही :)). या स्मृती नष्ट होत नाहीत म्हणूनच कधी कधी चुकून त्या अंतराळात रिलीज होतात आणि नवजात अभ्रकाच्या मेंदूमध्ये पेस्ट होतात आणि त्याला स्मृतींचे ज्ञान होते. आता हे अंतराळात रिलीज आणि पेस्टींग व्यक्तीच्या जीवनकाळात पण शक्य आहे कि केवळ गेल्यावरच शक्य आहे ते मिपावरचे आपले वस्तुनिष्ठ, निभ्रांत, आणि सर्वज्ञ शात्रज्ञच सांगू शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
स
सोत्रि Tue, 07/07/2020 - 01:18 नवीन
मुक्ति म्हणजे घटनांचे किंवा त्याच्या स्मृतींचे समूळ उच्चाटन नसून, नोंदवले गेलेल्या सर्व घटनातील “मी व माझे“ चे संस्कार संपूर्णपणे नाहीसे होणे होय
भागवतजी, एकच घटना प्रत्येकाला वेगवेगळी दिसते हे तुम्ही म्हणालात ते एकदम चपखल आहे. कारण मी व माझेचे संस्कार त्या घटनेत अडकवून ठेवतात, त्या घटनेशी संलग्न करतात. मी व माझेचे संस्कार नाहीसे होणे हा अनात्म बोध आहे. ही पहिली पायरी आहे मुक्त होण्याची. पण अंतिम ध्येय नाही. अंतिम ध्येय मनावरील प्रिय व अप्रिय संस्कारांचे पूर्ण निर्मूलन. मी व माझे ह्या अहंभावनेमुळेच सगळे विकार शांतता अनुभवू देत नाहीत. एकदा का अहंभाव गळून पडला की विकार गळून पडतात कारण त्यांना धरून ठेवणारा ‘मी’ गळून पडलेला असतो. माझ्या आकलनानुसार, आधि मी गळून पडणे तद्नंतर त्याच्याशी संलग्न असलेले समस्त विकार (संचित) गळून पडणे, हे दोन्ही झाल्यास मुक्ती किंवा निर्वाण! - (साधक) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
स
संजय क्षीरसागर Mon, 07/06/2020 - 10:18 नवीन
आधारित हा निष्फळ प्रयोग आहे. अर्थात, मानसशास्त्राचा तुमचा अभास नाही हे तुम्ही लेखात कबूल केलं आहेच. तरीही या निमित्तानं अप्रिय स्मृतींशी कसं डील करायला हवं ते लिहितो. १. क्षमेच्या मेथडनं प्रसंगाचं वस्तुनिष्ठ विश्लेषण होत नाही. नाईलाजामुळे वरुन मलम लावून अप्रिय आठवणींची धार काही काळ बोथट करण्याचा तो प्रकार आहे. २. ही मेथड व्यक्तीला भेकड करते. ज्या व्यक्तीमुळे हा त्रास होतो तिच्या मेहेरबानीवर तुमची चित्तदशा अवलंबून राहते. ३. तस्मात, प्रसंगाचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करुन, नक्की काय आणि कोणाचं चुकलं हे पाहून, खालीले पैकी एक गोष्ट करणं श्रेयस आहे : अ) आपली चूक असेल तर त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष बोलून चूक कबूल करणं आणि पुन्हा ती होणार नाही याची खबरदारी घेणं ब) आपली काहीही चूक नसेल तर दुसर्‍या व्यक्तीला त्याची योग्य समज देऊन, झालेला मॅटर वैध मार्गानं निस्तरणं. (लेखात लिहिल्याप्रमाणे पिस्तुल वगैरे भावनिक प्रकार करुन नाही) अशाप्रकारे प्रत्येक प्रसंग डील केल्यास कोणतीही अप्रिय स्मृती डेटाबेसमधे रहात नाही
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 07/06/2020 - 10:44 नवीन
माझ्या अनुभवाशी जुळत नसल्याने असहमत. मात्र दुसऱ्यांचा अनुभव वेगळा असू शकतो याचेशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
सोत्रि Mon, 07/06/2020 - 10:57 नवीन
वस्तुनिष्ठ विश्लेषण
वस्तुनिष्ठतेत अडकणं म्हणजे मोह (अविद्या). त्यापलिकडे जाणं म्हणजे उलगडा!
अप्रिय स्मृतींशी कसं डील करायचं
डील करणं म्हणजे परत मोह (अविद्या). अप्रिय स्मृतींच्या पलीकडे जाणं म्हणजे उलगडा!
भेकड, कोणाचं चुकलं
हे सापेक्ष आहे आणि पारिप्रेक्षानुसार असणं आहे त्यामुळे त्यांच्या पलिकडे जाणं म्हणजे उलगडा!
३ अ आणि ब
लोकल गुंड (राजकिय सामर्थ्य असलेला) जेव्हा आपली जागा हडपतो तेव्हा अ आणि ब किती तकलादू असतात हे लक्षात घेऊन त्याला क्षमा करून मानसिक शांती आणि जीव टिकवणं हे कळणं हा उलगडा!
अशाप्रकारे प्रत्येक प्रसंग डील केल्यास कोणतीही अप्रिय स्मृती डेटाबेसमधे रहात नाही
डील करणं हे निर्मूलन नाही हे कळणं म्हणजे उलगडा! - (मुमुक्षू) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ग
गवि Mon, 07/06/2020 - 11:00 नवीन
संक्षी, मुद्दे पटण्यासारखे आहेतच, पण श्री भागवत यांना मिळालेला मार्ग, कसाही असला तरी, it has worked, हे लक्षात घेतल्यास त्याला केवळ तात्विक बेसिसवर पूर्ण मोडीत काढता येणार नाही.
ज्या व्यक्तीमुळे हा त्रास होतो तिच्या मेहेरबानीवर तुमची चित्तदशा अवलंबून राहते.
हा मुद्दा सर्वाधिक चपखल आहे. मला वाटतं या केसमध्ये सध्या नव्याने त्रास देणं चालू नसू शकेल (म्हणजे सर्वकाही पूर्वी घडून क्लोज झालं आहे आणि आता केवळ स्वतःच्या मनात आठवणींनी होणारे क्लेश टाळण्यापुरता उपाय हवा आहे). अशा वेळी वाईट चिंतणे, तळतळाट होणे या प्रकारापेक्षा तुलनेत शांत वाटेल असा उपाय स्वतःपुरता सापडला असेल तर तो योग्य म्हणावा लागेल. पुन्हा पुन्हा नव्याने त्रास देणाऱ्या कोणाबाबत मधल्या काळात हा उपाय योग्य नव्हे हे तुमचं म्हणणं मान्य. तिथे विशिष्ट सहनशक्ती पार होताच कायदेशीर उपाय बरा. किंवा दुर्लक्ष.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
श
शाम भागवत Mon, 07/06/2020 - 11:59 नवीन
(म्हणजे सर्वकाही पूर्वी घडून क्लोज झालं आहे आणि आता केवळ स्वतःच्या मनात आठवणींनी होणारे क्लेश टाळण्यापुरता उपाय हवा आहे).
गवि, तुम्हाला माझा मुद्दा बरोबर कळलाय. सगळं काही फार पूर्वीच संपलंय. तरीही आठवण येताच त्रास होतोय, अशाच स्मृतिंबद्दल बोलतोय. त्या अप्रिय घटनेतील अप्रिय माणसाशी मुकाबला झालेला असू शकतो. प्रसंगी विजयही मिळालेला असतो. पण तरीही वेळ, पैसा गेलेला असतो. किंवा विनाकारण मनस्तापही झालेला असतो. त्यामुळे विजय मिळवूनही, जेव्हां ती घटना आठवते तेव्हां तेव्हां शिव्याशापच तोंडात येतात. यावरही हा उत्तम उपाय आहे. पण नामस्मरण करणारा माणूस भेकडच असतो अशी समजूत असणऱ्यांशी...... ओ शामराव, वाहवत चाललाय हं तुम्ही. तुमचं म्हणणं मांडून झालंय तेव्हां थांबायला काही हरकत नाही. काय? कळलं का? (मोठ्ठा) हो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
आ
आनन्दा Mon, 07/06/2020 - 12:14 नवीन
तुम्ही अजूनही सर्वज्ञानींशी वाद घालताय? आधी क्षमा मागून मोकळे व्हा बघु, नाहीतर पुन्हा कोणत्यातरी पहाटे आठवेल! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
प
प्रसाद गोडबोले Mon, 07/06/2020 - 12:23 नवीन
क्षमा नाही हो बेशर्त स्वीकृती =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
श
शाम भागवत Mon, 07/06/2020 - 12:28 नवीन
आनंदा, :))) नाही, आता नाही तसं होतं. संक्षींबद्दल अजिबात राग वगैरे नाहीये. शिव्या शाप तर फारच लांब. ते त्यांच्या विचाराने वागतात बोलतात. बस्स् एवढेच फक्त मनात शिल्लक राहते. तरीपण मी अजून परिपूर्ण नसल्याने सावधगिरी बाळगायलाच लागते. माझ्याकडून नकळत ती कशी बाळगली जाते, त्याचा फक्त नमुना पेश केला. :) हा सर्व लेख क्षमा करण्याबाबतचा नाहीये. मी कोणालाही क्षमा वगैरे काहीही केलेली नाही. मी फक्त माझा स्वार्थ पाहिलाय. माझ्याच स्मृतींच्या पेशी कोणितरी बळकावल्या होत्या, त्या मी परत मिळवतोय इतकेच. ज्यांचे भले चिंतीतोय त्यांचे खरोखरच काय होतंय ह्याच्याशी माझा खरोखरच संबंध नाहीये. हे सगळे शब्दांत सांगणे अवघड आहे. पण तरीही प्रयत्न केलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Mon, 07/06/2020 - 12:45 नवीन
मी फक्त माझा स्वार्थ पाहिलाय. माझ्याच स्मृतींच्या पेशी कोणितरी बळकावल्या होत्या
दहा लाखाची गोष्ट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
र
राघव Tue, 07/07/2020 - 07:19 नवीन
एक सुभाषित आठवले हा प्रतिसाद वाचून - क्षमा बलमशक्तानां शक्तानां भूषणं क्षमा । क्षमा वशीकृते लोके क्षमया किं न सिध्यति ॥ अर्थात् क्षमा करणं म्हणजे कर्तव्य न करणं होऊ शकत नाही. आपल्या घरावर चाल करून आलेल्या शत्रूला फोडून काढणं, हे कर्तव्य. आणि त्यातून झालेल्या हानीतून स्वतःचं मन मोकळं करणं, ही क्षमा. दोन्ही मनापासून झालं तर ती श्रीकृष्णांची वृत्ती ठरते! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
स
संजय क्षीरसागर Mon, 07/06/2020 - 12:37 नवीन
> त्याला केवळ तात्विक बेसिसवर पूर्ण मोडीत काढता येणार नाही. हा तात्विक बेसिस नाही ! हे प्युअर मानसशास्र आहे. it has worked ? असंभव ! मॅटर अजून तसाच आहे आणि परत केंव्हा उसळी मारेल, (या बाजूनं किंवा त्या बाजूनं), काही नेम नाही. पाहा : यानंतर बरीच वर्षे उलटून गेली. हा माणूस नंतर माझ्याशी आपणहून बोलायला आला. मीही जास्ती सलगी वाढणार नाही याची काळजी घेऊन बोलायला सुरवात केली. मतभेद कायम असूनही, आवश्यक तेवढा संवाद ठेवणे सहज जमायला लागले.पुढे तर त्याच्या बोलण्यात माझ्याबद्दल आदरही दिसायला लागला होता. > थोडक्यात, काही तरी कारणानी तो माणूस ठीक वागतोयं. यांनी मनातल्या मनात काय केलंय याचा त्याला पत्ताच नाही ! प्रकरण व्यवस्थित खोललं न गेल्यानं वरनं फक्त चादर घातली आहे. लेखक आतून त्या व्यक्तीबद्दल अजूनही साशंक आहेत. शिवाय तो (उगीच) आदर का दाखवतोयं हे गौडबंगाल कायमच आहे. अशाप्रकारे क्षमा ही ज्याची काही चूक नाही आणि अपराध केलेला, तो उमजून माफी मागायला आला, तर (बदल्याचा चान्स असूनही) मॅटर संपवण्याच्या दृष्टीनं केलेला समंजसपणा असेल, तर त्याला काही तरी अर्थ आहे. अन्यथा हा सगळा बोगस प्रकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 07/06/2020 - 13:39 नवीन
केवळ आपला मुद्दा व्यवस्थित समजावा म्हणून प्रतिसाद लिहीत आहे. आपंण म्हणता की :- आपली काहीही चूक नसेल तर दुसर्‍या व्यक्तीला त्याची योग्य समज देऊन, झालेला मॅटर वैध मार्गानं निस्तरणं. समजा मी फुटपाथ वरुन चालत चाललो आहे, आणि समोरुन एक भरधाव बाईकस्वार येउन मला धडक मारुन गेला. मला बाजुला व्हायची संधीच मिळाली नाही. मी जखमी झालो आणि बाजुला पडलो. रात्रीचा अंधार असल्याने त्या बाईक चा नंबर कोणी पाहिला नाही आणि तो मनुष्य पळून गेला. (यातल्या बर्‍याचशा गोष्टी सत्य आहेत. उदाहरणासाठी मी थोडेसे बदल केले आहेत) माझा मीच धडपडत उठलो, डॉक्टर कडे गेलो आणि उपचार घेउन घरी गेलो. यात माझी कुठे काही चुक झाली असावी आहे असे मला वाटत नाही. तर अशा परिस्थितीत मी कोणता वैध मार्ग निवडुन माझ्या मनाला होणारे क्लेश दूर करु? मी प्रत्येक वेळी त्या फुटपाथ वरुन चालू लागलो की मला ती घटना आठवतेच. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Mon, 07/06/2020 - 14:10 नवीन
आणि लेखनाचा विषय पूर्णतः वेगळे आहेत. ज्या प्रसंगात समोर व्यक्तीच नाही (किंवा आयडेंटीफाय होणार नाही) तिथे नशीबाला दोष देणं हा सुद्धा वेडगळपणा आहे. १. अ‍ॅक्सिडेंटच्या केसमधे पोलिस कंप्लेंट लॉज करणं (मेडी-क्लेमसाठी) गरजेचं आहे आणि प्रसंगाचा अजिबात अ‍ॅनॅलिससस न करता उपचार घेऊन बरं होणं श्रेयस आहे. २. थोडा विचार केलात तर अगदी सेम केस करोना बाधितांच्याबाबतीत होईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
श
शाम भागवत Mon, 07/06/2020 - 14:38 नवीन
यातल्या बर्‍याचशा गोष्टी सत्य आहेत. उदाहरणासाठी मी थोडेसे बदल केले आहेत
ज्ञानोबाचे पैजार, अरे बापरे, खरे की काय? जगदंब. माझ्या अनुभवावरून सांगतो. चिडचीड होतेच. खरतर जेव्हां कधी अशा प्रकारची आठवण येते तेव्हा त्या बिनचेहऱ्याच्या माणसाला काहीतरी होऊन शिक्षा व्हावी अशाच प्रकारचा विचार माझ्या मनात यायचा. कित्येकवेळेस तर मी मनातल्या मनात तो प्रसंग परत घडवून त्या बिनचेहऱ्याच्या माणसाला भरपूर ठोकून काढलेले आहे. :))) पण शुभ चिंतनाच्या साहाय्याने मी अशा अनोळखी व्यक्तिंवरही मात करू शकलो आहे. “होतं असं कधीकधी“ अशा प्रकारचा काहीसा भाव मनात येऊन मन शांत होते. अर्ध्या एक सेकंदात किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळात मन मोकळं झालेलं असतं. म्हणजे एकाबाजूने आठवण येते, तर दुसऱ्या बाजूने प्रतिक्षिप्त क्रियेसारखी ती झटकूनही टाकली जाते. पूर्वी अशा प्रकारच्या आठवणी मनात आल्यावर त्या शमायला बराच वेळ लागायचा. कोणाला पटो अथवा न पटो. मला फायदा झाला म्हणून इथे मांडलं. ज्याला पाहिजे तो घेईल, अन्यथा इथेच राहील. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
स
संजय क्षीरसागर Mon, 07/06/2020 - 14:42 नवीन
त्या बिनचेहऱ्याच्या माणसाला भरपूर ठोकून काढलेले आहे ? असल्या सॅडिस्ट प्रकारामुळेच, त्यावर उतारा म्हणून क्षमापनेसारखा दुसरा बाष्कळ उपाय करावा लागतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Mon, 07/06/2020 - 14:44 नवीन
ॐ शांती ॐ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
प
प्रसाद गोडबोले Mon, 07/06/2020 - 11:09 नवीन
मी आधीच सांगितल्या प्रमाणे - अप्रिय आठवणींपासून सुटका करुन घेण्याचा सोप्पा उपाय म्हणजे गांजा ! आपण उगाचच आयुष्याला अनावष्यक गांभीर्याने हाताळत आहोत, विनाकारण कॉम्प्लिकेटेड करुन टाकलं आहे सगळं . येवढं सीरीयसली घेऊ नका , झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे ! जे घडुन गेलं त्यात बदल करणं आपल्या हातात नाही, जे अत्ता घडत आहे त्यात प्रिय काय अप्रिय काय दोन्ही समानच अशी समबुध्दी आणणे महत्वाचे. आणि उद्याचं उद्या बघु! हे सगळं बोलायला सोप्पे अन करायला अवघड , अशा वेळी वस्तुस्थीती मध्ये जगायला उत्तमप्रतीचा गांजा नक्कीच उपयुक्त ठरतो. गांजाचे काहीही भयानक दुष्परिणाम नाहीत. गांजा मुळे झालेल्या मृत्युंची संख्या शुन्य आहे शुन्य. शुध्द मराठीत झिरो झेड ई आर ओ ! केवळ अमेरिकेच्या मेक्सिकोद्वेषामुळे गांजा स्चेडुल्ड १ कंट्रोल्ड सबस्टन्सेस लिस्ट मध्ये घातला गेला आहे . आणि आता आपली सरकारे अल्कोहोल विक्रि मधुन येणार्‍या महसुलावर अवलंबुन असल्याने गांजा लिगलाईझ करणे परवडणार नाही म्हणुन गांजा बॅन आहे . शिवाय सीबीडी ऑईल मुळे पेन्किलरस चा सेल्स मोठ्ठ्या प्रमाणात घट होते हे देखील पहाण्यात आल्यामुळे फार्मासुटीकल कंपन्यांच्या लॉब्या गांजाला बदनाम करण्यात कचकुन पैसा ओतत आहेत ! तिकडे अमेरिकेत लोकांना अक्कल यायला लागलीय, अख्ख्या कॅनडाने लिगलाईझ केलाय , तसेच अमेर्तिकेतील अनेक राज्यांनीही केलाय ! आपल्याला कधी अक्कल येणार देव जाणे ! असो. शिक्षणाच्या निमित्ताने दिल्लीला होतो तेव्हा आमचे हॉस्टेल मेसचे शेफ पांडेजी, ह्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वहस्ते पाट्यावरवंट्यावर गांजा वाटुन , अन मस्त काजु बेदाणे ड्रायफ्रुट्र्स घालुन घट्ट दुधात भांग उर्फ विजया बनवली होती ते आठवले. दुसर्‍या दिवशी जी अवस्था होती ती अक्षरशः अवर्णानीय होती !! लाईफ इतकं सीरीयसली घेऊ नका , एकदा गांजा ट्राय जरुर करुन पहा. ;)
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 07/06/2020 - 11:30 नवीन
:))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
आ
आनन्दा Mon, 07/06/2020 - 12:16 नवीन
नको रे बाबा. सध्या विजय द्रव्य प्यालेले एक सद्ग्रुहस्थ पाहत आहे.. त्यांचे चाळे पाहिल्यानंतर गांजाच नव्हे, तर एकूण नशा या विषयाबद्दल जरा भीतीच वाटायला लागली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Mon, 07/06/2020 - 12:32 नवीन
हीच चुक अनेक लोकं करताहेत . एखाददुसरे टोकाचे उदाहरण पाहुन वाईट मत बनवणे . अहो गांजा चे सोडा , आपली साधी साखर अतिप्रमाणात खल्ली तरी दुष्परिणाम होणारच की ! डायबेटीस झालेल्या एका व्यक्तीचे हाल अतिषय जवळुन पाहिले आहेत मी पण मग म्हणुन काय आपण साखर बॅन करतो का ? मी म्हणत आहे तसा मर्यादित आणि औषधाप्रमाणे केल्यास गांजा भुतकाळातील अप्रिय आठवणीच काय तर सभोवतालची सर्वच निगेटीव्हिटी कमी करण्यास हमखास मदत करेल हे मी पैजेने सांगतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Mon, 07/06/2020 - 12:43 नवीन
तुम्हाला माझ्या प्रतिसादाचा रोख कळला नाही.. असो. तुमच्या बोलण्याशी संबंधित नव्हता. काही विशिष्ट सद्गृहस्थांना उद्देशून होते ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
आ
आनन्दा Mon, 07/06/2020 - 12:44 नवीन
ते सद्गृहस्थ मिपावरती नाहीत हे आधीच नमूद करून ठेवतो. उगीच नंतर वाद नकोत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
स
संजय क्षीरसागर Mon, 07/06/2020 - 12:50 नवीन
स्वतःच्या बुद्धीमत्तेवर आणि तर्कसंगत विचारसरणीवर भरोसा नसणं आणि मानसशास्त्राची अजिबात जाण नसणं या दोन गोष्टी व्यक्तीला व्यसनाकडे वळवतात. तुम्ही मागे मला विचारलं होतं की मी कुठली ती दारु घेतलीये का ? आता स्वतःला विचारुन पाहा : स्वतःची सजगता वाढवून मन पूर्णपणे काह्यात आणण्याचा एकतरी मार्ग तुम्हाला माहिती आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Mon, 07/06/2020 - 13:36 नवीन
अहो भाग्यम !! अहो तुम्ही तर म्हणाला होतात ना की तुमच्या लेखी माझा मताला काडीची किंमत नाही , मग कशाला किंमत देताय माझ्या प्रतिसादांना =)))) बाकी ते आयाहुअस्च्का आहे हो आयाहुअस्च्का , दारु म्हणुन अपमान करु नका =)))) ही मीही पिली नाहीये अजुन, आणि पिण्याचा काही योगही दिसत नाही, ती केवळ उपमा म्हणुन वापरलेली . त्याचा रोख असा होता की " ज्या गोष्टींचा आपल्याला अनुभव नाही त्या विषयी तुम्ही मौन बाळगणार की स्वतःच्या पुर्वग्रहातुन काहीतरी मते बरळत बसणार ?"
स्वतःची सजगता वाढवून मन पूर्णपणे काह्यात आणण्याचा एकतरी मार्ग तुम्हाला माहिती आहे का ?
मी स्वच्छंदपणे जगतो, ते निर्भ्रांत की की म्हणतात तसे मन अन त्याच्गी सजगता वाढवणे अन त्याला कह्यात आणणे असले सव्यापसव्य करायचे दिवस संपले कधीच ! तुम्हीच तुमच्याच कुठल्यातरी लेखात लिहिलं होतं की - समोर जे जसं आहे ते तसं स्विकारणे हा ह्या सगळ्यातुन बाहेर पडण्याचा सोप्पा मार्ग आहे ! ( तुम्ही म्हणाला नसलात तर लगेच मी कॉपीराईट घेऊन टाकतो ;) ) सो हे आहे हे इतकं सोप्पं आहे . Just accept it as it is and you are done. ! पण म्हणुन मी खंडनमंडन करुन इतरांची मते खोडीत काढत बसणे असे उपद्व्यापही करत नाही , आहे हे असं आहे, जो तो आपापल्या मार्गाने चालला आहे आपल्याला काय पडली आहे लोकांना आपली मते पटवुन द्यायची ! बरं बाकी ते व्यसन व्यसन म्हणताय म्हणुन एक प्रश्न विचारतो : तुम्ही कधीतरी भांग पिलि आहे का ? काही स्वानुभव आहे की नुसतेच आपले इतर लोकं व्यसन व्यसन म्हणुन बोंबलतात म्हणुन तुम्हीही तेच करताय ? =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Mon, 07/06/2020 - 14:38 नवीन
> काडीची किंमत नाही अर्थात, कारण गांजा मारणं हा त्रासदायक स्मृतींपासून सुटकेचा मार्ग नाही. १. > ज्या गोष्टींचा आपल्याला अनुभव नाही त्या विषयी तुम्ही मौन बाळगणार की स्वतःच्या पुर्वग्रहातुन काहीतरी मते बरळत बसणार ? गांजा मारणार्‍यांची मनोदशा बघितली की सूज्ञ व्यक्तीला परिणाम कळतात. अनुभव घेण्याची गरजच नाही. २. > आपल्याला काय पडली आहे लोकांना आपली मते पटवुन द्यायची ! मग तुमचं हे गांजा महात्म्य कशापायी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Mon, 07/06/2020 - 14:53 नवीन
तिकडे कॅनडात , कॅलिफोर्नियात , इन जनरल वेस्ट कोस्ट वर संपुर्ण लीगल झालाय , तिकडे सगळे यझ लोकं आहेत आणि मीच एकटा सुज्ञ असे तुमचे मत आहे की काय ? तुम्हाला सीबीडी ऑइल आणि टी एच सी आणि अन्य कित्येक कॅनाबनॉईड्स वर चाललेल्या संशोधनाचे दुवे देऊ शकतो पण तुमची वृत्ती " जे मला माहीत नाही ते सगळंच खोटं " अशी असल्याने काहीही उपयोग होणार नाही =)))) "आपल्या मर्यादित अनुभवविश्वाच्या पलीकडे आणि आकलन क्षमतेच्या परेही जग असु शकते" हा एकदा तरी विचार करुन पहा राव , थोडी तरी झिंग उतरेल, सारखंच काय हाय रहायचं स्वमतांधतेच्या नशेत =))))
मग तुमचं हे गांजा महात्म्य कशापायी ?
मला टायपिंग करायला आवडतं म्हणुन =)))) तुम्ही किंवा अन्य कोणीही गांजा स्विकारला काय किंव्वा धिक्करला काय मला शष्प फरक पडत नाही. लोल्स =)))) तुम्ही आहात हे असेच आहात , कायम मीच कसा योग्य असे प्रतिसाद टाकत रहाणारे ही फॅक्टय आणि मी त्याची बेशर्त स्वीकृती केली असल्याने मी ह्या सगळ्यातुन बाहेर पडलो आहे ! आता माझा संपुर्ण मिपावावर केवळ मजेसाठी आहे ! =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
सुबोध खरे Wed, 07/08/2020 - 16:12 नवीन
@मार्कस ऑरेलियस ज्या गोष्टींचा आपल्याला अनुभव नाही त्या विषयी तुम्ही मौन बाळगणार की स्वतःच्या पुर्वग्रहातुन काहीतरी मते बरळत बसणार ?" हे म्हणजे पुरुषाने स्त्रीरोग तज्ज्ञ होऊच नये असे म्हणण्यासारखे आहे. किंवा जोवर मला एड्स( किंवा तत्सम दुर्धर रोग) झाला नाही तोवर मी त्याबद्दल बोलूच नये. गांजा मध्ये तसे पाहिले तर फार वाईट आहे असे नाही. परंतु बऱ्याच वेळेस ज्याचा स्वतःवर ताबा नाही तो गांजा वर न थांबता कोकेन किंवा गर्द हेरॉईन सारख्या व्यसनांकडे वळतो. स्वतःवर पूर्ण ताबा असण्याबद्दल फाजील आत्मविश्वास असणाऱ्या अनेक व्यक्ती नंतर व्यसनांना ( यात दारू, चरस कोकेन हेरॉईन सर्व येतं) का बळी पडतात याचा वैद्यकीय कार्यकारण भाव जोवर समजत नाही तोवर समंजस व्यक्तींनी त्यापासून दूर राहावे असाच वैद्यकीय तज्ज्ञ सल्ला देतात. माझा पूर्ण ताबा आहे असे म्हणणाऱ्या व्यक्तीत आणि उंच इमारतीच्या छ्ज्यावर उभे राहून सेल्फी घेणाऱया व्यक्ती यात फारसा फरक नाही. बाकी चरस किंवा गांजावर( त्याचे तेवढे ADDICTION POTENTIAL नाही म्हणून) बंदी असावी कि नाही हा विषय साफ वेगळा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Wed, 07/08/2020 - 20:21 नवीन
सर्वप्रथम तर्कशुध्द खंडन केल्याबद्दल मनापासुन धन्यवाद. ह्याविशयावर आपली आधीही चर्चा झाल्याचे स्मरते पण नक्की काय बोललेलो ते आठवत नाही म्हणुन काही प्रश्न परत विचारत आहे :
पुरुषाने स्त्रीरोग तज्ज्ञ होऊच नये असे म्हणण्यासारखे आहे. किंवा जोवर मला एड्स( किंवा तत्सम दुर्धर रोग) झाला नाही तोवर मी त्याबद्दल बोलूच न
>>> स्त्रीरोग असे काही नसतेच , नसती बायकांची नाटकं , किंव्वा एड्स ही एक काल्पनिक बिमारी आहे अशा अर्थाची विधाने चालतील का? मी अमेरिकेत / न्युयॉर्क मध्ये होतो तेव्हा गांज्याच्या लीगलायझेशन आणि आणि बॅन्निंग बाबतच्या चर्चेत दोन्ही बाजुंनी व्यवस्थित लॉजिकल अर्ग्युमेन्ट्स ऐकली आहेत. त्याला ना कधीच नाही ! ़कअ‍ॅलिफोर्निया आणि कॅनडात रीतसर लोकशाही मार्गाने चर्चा वादविवाद होऊन गांजा रीतसर लीगल झालेला आहे तसाच तो आपल्या देशातही व्हावा हे माझे स्पष्ट मत आहे. तुम्ही माझ्या मताचे खंडन करायला स्वतंत्र आहात , पण मी मतच व्यक्त करु नये असे म्हणायला तुम्ही स्वतंत्र नाही.
बऱ्याच वेळेस ज्याचा स्वतःवर ताबा नाही तो गांजा वर न थांबता कोकेन किंवा गर्द हेरॉईन सारख्या व्यसनांकडे वळतो.
ह्या विधानाला आपण सबळ सांख्यकीय पुरावा द्या किंव्वा कोणत्याही प्रसिध्द विद्यापीठात प्रकाशित झालेल्या संशोधनाचा पुरावा द्या . आणि हो ते प्रेसिडेंट निक्सनच्या काळातील नसावे ही अट आहे ! शक्य तितके आधुनिक संशोधन असावे. आपले विधान पुराव्याने शाबित झाल्यास मी माझे विधान बदलुन हे असे "गांजा हे स्टेप अप ड्रग आहे आणि मेडीकल प्रिस्क्रिप्शन्शिवाय घेऊ नये" विधान करत जाईन. आणि पुराव्याने शाबित न झाल्यास - तुम्हीही तुमचे विधान रीफ्रेज कराल अशी आशा आहे. बाकी सीबीडी ह्या मुख्य कॅनाबनॉईड्चे मेडीकल उपयोग डॉक्टर असल्याने तुम्हाला माहीत असतीलच. पण केवळ फार्मासुटीकल कंपन्या तुम्हाला सीबीडी ऑईल चे प्रिस्क्रिप्शन लिहायला "बेनिफिट्स" देत नाहीत तोवर प्रिस्क्रिप्शन लिहिणार नाही असा तुमचा दृष्टीकोन नसेल अशी भाबडी आशा आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 07/09/2020 - 07:42 नवीन
Conclusion: A large proportion of individuals who use cannabis go on to use other illegal drugs. The increased risk of progression from cannabis use to other illicit drugs use among individuals with mental disorders underscores the importance of considering the benefits and adverse effects of changes in cannabis regulations and of developing prevention and treatment strategies directed at curtailing cannabis use in these populations. https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/25168081/ .Lifetime cumulative probability estimates indicated that 44.7% of individuals with lifetime cannabis use progressed to other illicit drug use at some time in their lives. Several sociodemographic characteristics, internalizing and externalizing psychiatric disorders and indicators of substance use severity predicted progression from cannabis use to other illicit drugs use. https://europepmc.org/article/pmc/pmc4291295 marijuana use during pregnancy is linked to lower birth weight and increased risk of both brain and behavioral problems in babies. If a pregnant woman uses marijuana, the drug may affect certain developing parts of the fetus's brain. Children exposed to marijuana in the womb have an increased risk of problems with attention, memory, and problem solving compared to unexposed children. Some research also suggests that moderate amounts of THC are excreted into the breast milk of nursing mothers. With regular use, THC can reach amounts in breast milk that could affect the baby's developing brain https://d14rmgtrwzf5a.cloudfront.net/sites/default/files/drugfacts-marijuana.pdf बाकी भांग हि भारतात काही राज्यात कायदेशीर आहे आणि काही नाही. जर दारू सिगरेट (बिडी किंवा तंबाखू) कायदेशीर आहेत तर भांग चरस गांजा कायदेशीर का नसावे हा प्रश्न वेगळा आहे. मी दारू तंबाखू किंवा चरस यातील कशाचेच समर्थन करीत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/09/2020 - 07:57 नवीन
पहिल्या दोन लिंक महत्वाच्या वाटतात त्या तपासुन पहातो. आमच्या कॅलिफोर्नियातील मित्राला विचारुन पहातो की कॅलिफोर्नियाने ह्या मुद्द्यांवर काय मते मांडली आहेत ते! बाकी तीसर्‍या लिंक बाबत मतभेद नाहीच. त्याला पास. धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मदनबाण Mon, 07/06/2020 - 14:39 नवीन
अशा वेळी वस्तुस्थीती मध्ये जगायला उत्तमप्रतीचा गांजा नक्कीच उपयुक्त ठरतो. गांजाचे काहीही भयानक दुष्परिणाम नाहीत. गांजा मुळे झालेल्या मृत्युंची संख्या शुन्य आहे शुन्य. शुध्द मराठीत झिरो झेड ई आर ओ ! केवळ अमेरिकेच्या मेक्सिकोद्वेषामुळे गांजा स्चेडुल्ड १ कंट्रोल्ड सबस्टन्सेस लिस्ट मध्ये घातला गेला आहे . आणि आता आपली सरकारे अल्कोहोल विक्रि मधुन येणार्‍या महसुलावर अवलंबुन असल्याने गांजा लिगलाईझ करणे परवडणार नाही म्हणुन गांजा बॅन आहे . शिवाय सीबीडी ऑईल मुळे पेन्किलरस चा सेल्स मोठ्ठ्या प्रमाणात घट होते हे देखील पहाण्यात आल्यामुळे फार्मासुटीकल कंपन्यांच्या लॉब्या गांजाला बदनाम करण्यात कचकुन पैसा ओतत आहेत ! संस्कृतप्रभुंच्या टंकन सामर्थ्यातुन गांजा महात्म्य लिहले गेल्यामुळे मला खालील व्हिडियो आठवला ! Image removed. बाकी अजुन काही ओळी याच गांजा महात्म्यामु़ळे आठवणीस आल्या... अकाल मृत्यु वह मरे जो काम करे चांडाल का काल उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chale The Saath Milke... :- Hasina maan jayegi
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Mon, 07/06/2020 - 17:55 नवीन
मदनबाण राव , तुम्हाला गांजाचा सर्वात भारी उपयोग काय आहे माहीत आहे का ? गांजा ने " मदनबाण " चालवण्यात खुप फायदा होतो म्हणे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Tue, 07/07/2020 - 09:20 नवीन
तुम्हाला गांजाचा सर्वात भारी उपयोग काय आहे माहीत आहे का ? हो. गांजा ने " मदनबाण " चालवण्यात खुप फायदा होतो म्हणे ;) खी खी खी ;) उत्तराखंड मध्ये कायदेशिर रित्या शेती करण्यास परवानगी आहे, मला वाटतं काही इतरही राज्यात याची परवानगी आहे. कोरोनावर या वनस्पतीतुन काही औषध मिळते का ? ते सरकार ने आणि इतर संस्था ज्या करोनावर औषध बनवण्याच्या प्रयत्नात आहे त्यांनी संशोधन करुन पहायला हवे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yeh Wadiyan Yeh Fizaayein... :- Aaj Aur Kal
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
म
मदनबाण Tue, 07/07/2020 - 09:27 नवीन
वरील प्रतिसाद लिहल्यावर सहज जालावर शोध घेण्याची लहर आली आणि काही बातम्या दिसल्या ! Jamaican scientist waits approval for ganja-based coronavirus drug Cannabis May Reduce Deadly COVID-19 Lung Inflammation: Researchers Explain Why

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yeh Wadiyan Yeh Fizaayein... :- Aaj Aur Kal
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Tue, 07/07/2020 - 09:45 नवीन
झाडाची नर प्रजाती म्हणजे भांग आणि मादा प्रजाती म्हणजे गांजा. गांजात THC [ tetrahydrocannabinol ] चे प्रमाण भांगे पेक्षा जास्त असते. भांग म्हणजे फक्त पानांचा चुरा तर गांजा म्हणजे झाडाची फुले,पाने आणि मुळ यांचे संमिश्रण.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yeh Wadiyan Yeh Fizaayein... :- Aaj Aur Kal
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
उ
उन्मेष दिक्षीत Mon, 07/06/2020 - 15:35 नवीन
तुम्ही गांजावर निबंध लिहीलाय कि लेखकांना त्रासदायक आठवणींपासून सुटका होण्यासाठी आयडिया देताय ते क्लिअर करा. एकीकडे म्हणताय गांजा लीगल नाही आणि दुसरीकडे तेच काम करायचा फ्रेंडली सल्ला देताय. तुम्ही गांजा बाळगता का ? आणि आल्या आठवणी तर गांजा मारता का ? वरचं सगळं फक्त आधीच्या गांजाच्या आठवणीतुन लिहिलेलं दिसतंय. आणि तुम्ही जर असं वागताय, >> जे घडुन गेलं त्यात बदल करणं आपल्या हातात नाही, जे अत्ता घडत आहे त्यात प्रिय काय अप्रिय काय दोन्ही समानच अशी समबुध्दी आणणे महत्वाचे. आणि उद्याचं उद्या बघु! - ही समबुद्धी गांजा हे औषध म्हणून वापरल्याने डेवलप होते का तेवढं स्पष्ट करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Mon, 07/06/2020 - 17:53 नवीन
तुम्हाला काय वाटतंय ? तुमचा पुर्वग्रह काय आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उन्मेष दिक्षीत
उ
उन्मेष दिक्षीत Mon, 07/06/2020 - 20:24 नवीन
म्हणण्यापेक्षा मी ठाम आहे, कि गांजा ही सुटका होउ शकत नाही (मी मारुन बघितलाय, कॅलिफोर्नियातच) तुमच्या, आणि माझ्याही आवडीचा एकच विषय अध्यात्म हेच एकमेव सोल्युशन आहे आणि ते व्यसन नाही. मार्कस ऑरेलियस किंवा अ‍ॅरिस्टॉटल गांजा मारा असं म्हणणार नाहीत. फक्त सांयटीफिक दृष्टिकोन ,शोधवृत्ती किंवा वृत्तीचा शोध महत्वाचा आहे. सगळ्यातून आपण काय शोधतोय शेवटी ? फ्रिडम किंवा फ्री विल ! आपण एक प्रकारचा High शोधतोय टु एक्स्प्रेस अवर्सेल्व्स बेटर अँड लाईटर, बर्डन लेस ! ---- मी संक्षी फॅन आहे आणि त्यांचंच एक वाक्य आहे, 'निराकार ही अंतीम नशा आहे' आणि ते असं काही टच झालंय कि बास !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Mon, 07/06/2020 - 22:14 नवीन
छन छन तुम्ही ठाम आहात हे उत्तम , बरं आता माझे प्रतिसाद नीट वाचा आणि सांगा त्यात कुठेतरी असे मी तुमच्या मानगुटीवर बसलोय अन "घे घे मारच कश गांजाचा पी पी" असे म्हणतोय असे दिसत आहे का ? किमान मला तरी दिसत नाही. मी तुमच्या मतस्वातंत्र्याचा आदर करतो , तुम्हाला नाही प्यायचा गांजा नका पिऊ ना भाऊ कोणी सक्ती केली आहे का ? आमचा काही हट्ट नाही ! तुम्हाला दुसर्‍यांच्या मतभिन्नतेचा स्विकार का करता येत नाही? कारण शोधायचं आहे? , खरेच उत्स्तुकता आहे ? तर तुमचा प्रतिसाद नीट वाचा आणि त्यातील ह्या शब्दांवर लक्ष द्या - एकमेव ... अंतीम हे दोन्ही शब्द मध्यपुर्वेतील वाळवंटी धर्मांचे प्रतीक आहेत , आम्ही म्हणतो तोच एक देव अन अमुक तमुकच एक त्याचा शेवटचा मेसेंजर ही वृत्ती तुम्हाला हिंदु तत्वज्ञानात तरी कुठेच दिसणार नाही ! अगदी नासदीय सुक्तातही - "एक विश्वनिर्माताच ह्या जगाचे खरे रहस्य जाणतो" अशा अर्थाच्या श्लोकानंतर लगेच "किंव्व कदाचित तोही जाणत नाही" अशा अर्थाचा श्लोक आहे ! इयं विसृष्टिर्यत आबभूव यदि वा दधे यदि वा न। यो अस्याध्यक्षः परमे व्योमन्त्सो अंग वेद यदि वा न वेद ॥७॥ एकं सत विप्रा बहुधा वदन्ति . सत्य एक आहे पण त्यात कुठेही मी म्हणतो च एकमेव किंव्वा अंतीम असा अर्थ नाही, त्याला भिन्न लोकं भिन्न नावाने ओळखतात. पण एक मान्य की ह्या "मी म्हणतो तेच एकमेव सत्य अन हाच अंतीम मार्ग " ह्या विचाराची नशा जालीम असते , नुसता जगभर हैदोस घातलाय ह्या वृत्तीच्या लोकांनी . आजही चालु आहे ! मिपाही काही त्याला अफवाद नाही . असो. चालायंचेच . मला तुम्हाला काहीही पटवुन द्यायचे नाहीये , तुम्ही ठाम आहात ना की गांजा उत्तर होऊ शकत नाही , मग झालं तर की ! नका पिऊ गांजा,. तुमच्यावर सक्ती करायला माझ्याकडे वेळ, हौस आणि पैसाही नाही ! मी माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मनसोक्त आस्वाद घेत अत्यंत मोकळे पणाने माझी मते मांडतो , त्याला काहीही "ग्रेटर परपज" वगैरे नाही !
सगळ्यातून आपण काय शोधतोय शेवटी ? फ्रिडम किंवा फ्री विल ! आपण एक प्रकारचा High शोधतोय टु एक्स्प्रेस अवर्सेल्व्स बेटर अँड लाईटर, बर्डन लेस !
तुमचं माहीत नाही पण मी तरी आता काहीही शोधत नाहीये . कारण मुळातच काहीतरी शोधायचे आहे हा विचारच भ्रांती आहे , जे आहे हे असं आहे, इथे आहे अत्त्ता आहे, काहीही शोधाशोध ही व्यर्थ आहे ! आतां अविद्या नाहींपणें । नाहीं तयेतें नासणें । आत्मा सिद्धुचि मा कोणें । काय साधावें ? ॥ ६-९७ ॥ :) शुभं भवतु !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उन्मेष दिक्षीत
उ
उन्मेष दिक्षीत Tue, 07/07/2020 - 10:57 नवीन
वगैरे राहु दे. >>अप्रिय आठवणींपासून सुटका करुन घेण्याचा सोप्पा उपाय म्हणजे गांजा हे तुम्हीच लिहिलंय, प्रश्न गांजा कुणी मारावा की नाही हा नाही. तो उपाय कसा होउ शकतो, म्हणजे समबुद्धी कशी तयार होते त्यानी ते सांगा. आणि तो अमलात आणण्यासाठी आणि अंमलाखाली येण्यासाठी रोज ( म्हणजे Daily, Flavor नव्हे ) Marijuana ही ट्रिटमेंट आहे का ते सांगा कारण अशा आठवणी केव्हाही अचानक जागृत होतात. शाम भागवतजींनी लिहिल्याप्रमाणे , पहाटेच्या चार वाजता त्यांना अचानक जाग येऊन हा त्रास सुरु झाला. आता त्यांनी गांजा कुठून आणायचा ? आणि त्यांना तो घ्यायचा नसेल, जसे व्यसन सगळेच करत नाहीत तर काय करायच ? (त्यासाठी त्यांनी काय केले ते लिहिले आहेच) तुमच्या पूर्वग्रह या प्रश्नांला मी माझं उत्तर दिलेलं आहे, आता माझ्या वरच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची कि नासदिय सुक्त, वाळवंटी धर्म वगैरे काय अवांतर करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. आणि मत-स्वातंत्र्याचा विषय, तर मी समजा मत मांडले कि इल्लिगल किंवा इम्प्रॅक्टीकल कामे हा त्यावर उपाय आहे, बिन्धास्त करा, तर ते मतस्वातंत्र्य किंवा त्यात मतभिन्नता वगैरे होऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा