नुसत्या वाफेने करोनाचे विषाणू मरतात?
गेल्या महिन्यात फेसबूकवर पोस्ट वाचली होती. गरम पाणी पिऊन अन्ननलिकेतला वायरस तुम्ही माराल, पण श्वसननलिकेतला वायरस मारायचा असेल तर वाफ घेणे किती गरजेचे आहे. त्यासाठी मग पॅरानेझल सायनस काय, लाॅकिंग मेकॅनिझम काय अशा शब्दांची पेरणी त्या पोस्टमध्ये केली होती. दिवसातून किती वेळा बाहेर बोंबलत हिंडताय, त्यावर किती वेळा आणि कोणत्या तापमानाची वाफ घेतली म्हणजे तुम्हाला करोना होणार नाही आणि झाला तरी त्याचे विषाणू फुप्पुसात जाण्याआधीच मरून जातील वैगेरे थोर(?) ज्ञानामृत लोकांना वाटण्याचे काम त्या लेखकांना करायचे होते बहुधा. हीच पोस्ट काही दिवसांनी व्हाॅट्सअपवरही तुफान वायरल झाली होती. मला स्वतःला नातेवाईकांच्या, सोसायटीच्या, मित्रांच्या अशा किमान दहा ग्रुपवर ही पोस्ट फाॅरवर्ड म्हणून आली होती.
व्हाॅट्सअपवरच्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतात आणि त्यावर विश्वास ठेवायचा असतो अशी एकुणात आपल्या भारतीय लोकांची मानसिकता झालीये गेल्या काही वर्षात. व्हाॅट्सअपवरचे मॅसेजेस, मग ते नासाच्या तुटणाऱ्या ग्रहांचे असोत, युनेस्कोने जाहीर केलेल्या राष्ट्रगीताचे असोत, वा पाच तोंड असलेल्या शेषनागाच्या दर्शनाचे असोत, आपली लोक त्यावर शंभर टक्के विश्वास ठेवून, डोळे झाकून आणखी शंभर लोकांना पुढे ढकलून देणार. अगदी त्याच मानसिकतेतून आपल्या लोकांनी वाफ घेण्याच्या गोष्टीची शहानिशा न करता, बहुतेकांनी अडगळीत पडलेले स्टीमर शोधून काढले. काहींनी लगोलग मेडिकल गाठून नवे विकत आणले, आणखी काहींनी अॅमेझाॅनवर चांगल्या प्रतीचे स्टीमर आॅर्डर केले आणि औषधांचा डोस घेतो त्याप्रमाणे सकाळ-दुपार-संध्याकाळ वाफ घ्यायला सुरूवात केली.
केवळ उत्सुकतेपोटी, नाकाच्या पाठी हे अशा प्रकारचे पॅरानेझल सायनस असते का? त्याचे लाॅकिंग मेकॅनिझम म्हणजे नेमके काय? आणि त्यातून खरंच विषाणू थेट फुप्पूसात जावू शकतात हे मी गुगलबाबाला विचारून पाह्यले, पण शेवटी गुगलबाबा म्हणजे कुणी डाॅक्टर नव्हे असं स्वतःची समजूत घालून तो नाद सोडला आणि गपगुमान दुसऱ्या दिवशी मेडिकलमधून साधे स्टीमर विकत घरी आणले.
या मॅसेजच्या वायरलनंतर काही दिवसांनी कूपर हाॅस्पीटलच्या दोन डाॅक्टरांमधला संवाद म्हणून एक आॅडीओ क्लिप व्हाॅट्सअप युनिवर्सिटीवर पसरू लागली. इतके दिवस दुर्लक्षित केलेली ती क्लिप आज सकाळी प्रत्यक्ष एेकली आणि आपला बेंबट्या झाला आहे याची शंभर टक्के खात्री पटली. त्या एकंदर संवादात त्यातल्या कथित डाॅक्टर भोसलेंच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द हा त्या मॅसेजमधलाच होता. अगदी समोर मॅसेज ठेवून वाचत असल्यासारखा, फक्त अविर्भाव मात्र विश्वातले मोठे गुपीत सांगितल्यासारखा होता. खरेच डाॅक्टर होते कि व्हाॅट्सअॅप युनिवर्सिटीतल्या फाॅरवर्ड्समधून शिकलेले स्वयंघोषित डाॅक्टर होते, ते त्यांचे त्यांनाच ठाऊक. आधी वायरल झालेल्या मॅसेजप्रमाणेच, क्लिपमधल्या संभाषणातली ती व्यक्तीही लोकांपर्यंत अर्धवट आणि चुकीची माहिती पोहचवत होती. एकुणातच आधीच्या मॅसेजमुळे आणि या आॅडीओ क्लिपमुळे, लोकांच्या घाबरलेल्या मानसिकतेला अशा सगळ्या खोट्या गोष्टींतून खतपाणी घालून वेगाने गैरसमज पसरवण्याचे काम आपोआप झालेय यात काही शंकाच नाही.
डाॅ. संग्राम पाटील यांचा या संदर्भातला युट्यूबवर व्हिडिओ आहे. त्या क्लिपमधल्या तीन महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यातला आवर्जून लक्षात घेण्याजोगा असा दुसरा मुद्दा म्हणजे, ४०° ते ६०° तापमानातली वाफ घेण्यामुळे करोनाचे विषाणू मरत नाहीत, तर त्यामुळे आपलाच चेहरा भाजण्याची शक्यता जास्त होते. करोनाचा विषाणू ७०° किंवा त्यावरील तापमानात जिवंत राहू शकत नाही आणि त्याखालील तापमानाची वाफ घेतली तर त्यामुळे आपल्याला भाजण्याचे चान्सेस जास्त या गोष्टीला अधोरेखित करणे महत्वाचे. करोनाचा विषाणू सुरूवातीचे तीन-चार दिवस घशात/पॅरानेझल सायनसमध्ये राहतो आणि तिथून मग फुप्पूसात शिरतो वैगेरे आॅल बुलशीट !!
ट्रेकिंग करताना सर्वात पुढे वाटाड्या चालत असतो आणि त्याच्या मागोमाग इतर लोक चालत असतात. ठरलेल्या ठिकाणी पोचण्यासाठी, ज्या दिशेेने वाटाड्या वाटेने चालत राहील, त्याच्या पाठोपाठ जात रहायचे एवढेच लोकांना ठाऊक असते. पुढे मग तो वाटाड्या चुकीच्या वाटेने चालत राहीला, तरी डोक्याने सारासार विचार करणे थांबवून लोक चुकलेल्या वाटेवरून चालतच राहतात, प्रश्न न करता !! वाट चुकल्याचे जेव्हा कळते, तेव्हा शारीरिक त्रास तर होतोच पण त्यापेक्षा जास्त मानसिक त्रास होतो. फेसबूक, व्हाॅट्सअॅपसारखी समाजमाध्यमे ही त्या वाट चुकवलेल्या वाटाड्यासारखी झालीयेत सध्या. जनता सारासार विचार न करता, चुकीच्या गोष्टींमागे डोळे बंद करून पळते आहे निव्वळ !!
सध्याच्या कठीण काळात, शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासोबतच अशा सगळ्या सरसकट येणाऱ्या मॅसेजेसकडे डोळस नजरेने बघणेही तितकेच महत्वाचे ठरणार आहे.
- किसन शिंदे
मी म्हणजे मी म्हणजे मीच बरोबर
हे काहीही करून सिद्ध केलेच पाहिजे हा अट्टाहास आहे आणि हा मनोविकार आहे (delusion of grandeur) त्याला उपाय नाहीविषय भरकटवणे,
मूळ विषय काय आहे त्यात श्री मोदी कुणी आणलं? आपण हसे लोकाला आणि शेम्बूड आपल्या नाकाला