Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुलंचा एक सुरेख लेख !

स
संजय क्षीरसागर
Fri, 08/14/2020 - 15:15
💬 57 प्रतिसाद
हा लेख लोकांनी वाचला असण्याची शक्यता आहे म्हणून तो खफवर टाकणार होतो; पण लेखाचा कंटेंट इतका भारी आहे की तो सरकत्या पोस्टींबरोबर सहज हरवून गेला असता. त्यामुळे इथे पेस्ट करतोयं. पुलंसारख्या हुशार, चतुरस्त्र आणि इतक्या निर्विवाद विचारसरणीच्या व्यक्तीचं कौतुक कलौघात फिटणारं नाही याची नोंद रहावी म्हणून हा लेख. _______________________________________________ एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही. पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही. देव, धर्म या कल्पना धूर्त सत्ताधाऱ्यांनी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत, याविषयी मला यत्किंचितही शंका नाही. आपल्या देशात इतके संत जन्माला यायच्याऐवजी ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर हा देश अधिक सुखी झाला असता. मला कुठल्याही संतापेक्षा अॅनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनाहीन करणारा संशोधक हा अधिक मोठा वाटतो. विज्ञान जन्मजात श्रेष्ठत्वकनिष्ठत्व मानत नाही. सत्याचे दर्शन घडवणाऱ्या वैज्ञानिकांचा, देवाचे नाव घेणाऱ्या धर्मगुरूंनी आणि त्यांच्या दहशतीखाली असणाऱ्या अडाणी राजे लोकांनी सगळ्यात अधिक छळ केला आहे. धर्म धर्म करणाऱ्या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे शत्रू नसतील. मग ते बायकांना नवऱ्याच्या चितेवर जिवंत जाळतील, नरबळी देऊन आपले राजमहाल आणि देवळे टिकाऊ करतील, कुणाला अस्पृश्य म्हणतील, कुणाला वाळीत टाकतील, काय वाटेल ते करतील. धर्म आणि पंथाच्या दुरभिमानातून माणसाचे रक्त सगळ्यात अधिक सांडलेले आहे; आणि या साऱ्या खटाटोपातून शेवटी नवे हुकूमशहाच उदयाला आलेले दिसतात. पण आपला इतिहास हा मुख्यतः राजे लोकांनी मुलूख बळकावण्यासाठी केलेल्या लढायांचा, जयापराजयाचा इतिहास आहे; आणि प्रत्येक विजयी राजाच्या भाट-चारणांची ही प्राचीन परंपरा आजही कशी टिकून आहे, ते आपण पाहतोच आहो. विजयी राजाच्या भाट-चारणांनी त्यातील सत्यावर स्तुतिस्तोत्रांच्या इतक्या झुली पांघरल्या आहेत, की भूतकाळातल्या त्या तसल्या व्यक्तींना झाकणारी शब्दांची आरास म्हणजे इतिहास हीच आपली समजूत आहे. संजय गांधीला बुध्द आणि ख्रिस्ताच्या पंक्तीला नेऊन बसवणारे नेते (?) निघाले. अशा ह्या देशात बुध्दीला आणि निश्चित पुराव्याला साक्ष ठेवून काही लिहिणे आणि बोलणे हा गुन्हा ठरतो. त्यातून आपल्या देशात नाममहात्म्याला फार मोठे स्थान आहे. नामस्मरणाने तरून जाता येते ही श्रद्धा. कुठे जाता येते आणि तरणे म्हणजे काय याचा विचार नाही. अंधश्रद्ध समाजात कुठलीही घटना पारखून घेण्याची शक्तीच उरत नाही. भाषेचा वापर मूठभर लोकांच्या स्वार्थासाठी भरमसाट रीतीने केला जातो. उच्चार आणि आचार यांच्यात मेळ नसल्याचे कुणालाही दुःख नाही. ‘सहनाववतु सहनौ भुनक्तु’ ही आमच्या वेदातील प्रार्थना, त्यातल्या मानवतेवेषयी गळा काढून बोलायचे आणि ‘सहनाववतु’ म्हणताना “दूर हो. विटाळ होईल.” म्हणून माणसाला दूर लोटायचे. पुन्हा वेद श्रेष्ठ ते श्रेष्ठ, ते धडाधड पाठ म्हणणारे त्याहूनही श्रेष्ठ. त्यांना शासनाच्या वतीने शाली पांघरणारे आणखी श्रेष्ठ. सकाळी रेडियो लावला की देव दीनांचा वाली असल्याचे कुणी ना कुणी तालासुरात सांगत असते; आणि गॅलरीत आल्यावर समोरच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बेवारशी पोरे शिळेपाके शोधून काढताना दिसत असतात. त्या देवावर आणि सत्तेवर असलेल्या माणसांवर विशेषणांची खैरात चालू असते. दुर्दैवाने वास्तवाला विशेषणे मंजूर नसतात. कल्पनारम्यतेला मात्र ती पोषक ठरतात. अस्पृश्य मानल्या गेलेल्यांना ‘हरिजन’ म्हटले, की जादूचा मंत्र म्हटल्यासारखी अस्पृश्यता नष्ट होईल असे मानणे किंवा स्त्रियांना देवता म्हटल्यानंतर त्यांची गुलामी नष्ट होईल असे धरून चालणे, हे ह्या असल्या वास्तवापासून दूर असलेल्या कल्पनारम्यतेचे लक्षण आहे. पुण्याच्या फुले मंडईत त्या भिक्षुकशाहीविरोधी सत्यशोधकांच्या नावावर टिच्चून सार्वजनिक सत्य(?)नारायणाची पोथी वाचली जाते. लोक तीर्थप्रसाद घेऊन धन्य होतात आणि दिवसेंदिवस ह्या अंधश्रद्धेला शासनाकडून भरपूर खतपाणी घातले जात आहे. माझ्या वयाची साठ वर्ष मी ओलांडली पण गेल्या काही वर्षांत मी ही जी काही हिंदी सिनेमा नट-नटींसारखी देवदेवता आणि बुवा-माताजी मंडळींची चलती पाहतोय, तशी माझ्या तरुणपणीही पाहिली नव्हती. देऊळ बांधणे हा सत्तेवरच्या राजकीय पक्षात जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे. कधी कुठल्या शंकराचार्यांचे नावदेखील ऐकले नव्हते. त्यांची दीड दीड हजार रुपये भरून पाद्यपूजा करायला भक्तांचा क्यू लागतो. आमच्या सेक्युलर भारताच्या पंतप्रधानबाई त्यांच्या दर्शनाला जातात. चर्चेस्, मशिदी यांचे उत्पन्न भरमसाट वाढते आहे. यातून आपण विशिष्ट जातीचे किंवा पंथाचे अनुयायी या अहंकाराखेरीज पदरात काहीही पडत नाही. ह्या साऱ्या सामाजिक वास्तवाकडे पाहिले, की प्रबोधन हा शब्दच निरर्थक वाटायला लागतो. खुर्ची जाईल या भयाने ग्रस्त असलेले नेते, श्रीमंती जाईल या भयाने अस्वस्थ असलेले धनिक आणि असहायतेने निदान देव तरी आपल्या मदतीला येतो की काय हे पाहू या म्हणणारे दरिद्री लोक असाच देखावा दिसतो अाहे. वैचारिक आधुनिकतेचा समाजाला स्पर्शही झालेला दिसत नाही. शेवटी हेच खरे आहे असे वाटायला लागते. ‘Justice is Simply the interest of the Stronger’. मनाच्या निराश मूडमध्ये हे लिहिले आहे असे तुम्हाला वाटेल. व्यक्तिगत जीवनात दुःख बाळगत राहावे असे माझ्या बाबतीत काहीही नाही. उद्या मला जेवायला मिळणार आहे किंवा नाही आणि आज रात्री झोपायला जागा सापडणार की नाही, ह्या चिंता घेऊन ज्या देशात लाखो लोक जगताहेत, तिथे माझ्यासारख्याने वैयक्तिक दुःख हा शब्दही उच्चारू नये, ह्या जाणिवेने मी कसलेही वैयक्तिक दुःख माझ्याभोवती रेंगाळू देत नाही. साहित्य, संगीत, नाट्य असल्या कलांत रमण्यात आणि थोडेफार इतरांना रमवण्यात आयुष्य गेले. उर्दू शायराच्या ढंगात बोलायचे झाले तर आजवर आयुष्याच्या वाटेत काट्यांपेक्षा फुलेच जास्त लाभली. ‘उपरा’, ‘बलुतं’, ‘आठवणीचे पक्षी’ ह्या पुस्तकांसारखे काही वाचले, की आपले जगणे सामाजिक दृष्ट्या असंबद्ध वाटायला लागते. कुणी मोठेपणा द्यायला लागले की ओशाळल्यासारखे वाटते. पु.ल.देशपांडे (धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही..एक शुन्य मी’ या पुस्तकातून)

प्रतिक्रिया द्या
20302 वाचन

💬 प्रतिसाद (57)
श
श्रीरंग_जोशी Sat, 08/15/2020 - 04:56 नवीन
पुलंचा हा लेख आज प्रथमच वाचायला मिळाला. इथे प्रकाशित करण्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्रलयनाथ गेंडा… Sat, 08/15/2020 - 04:56 नवीन
वा सुरेख लेख... संक्षीजी हा लेख इथे पुनःप्रसारित केल्याबद्दल धन्यवाद. आजका दिन बना दिया आपने १+
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sat, 08/15/2020 - 06:39 नवीन
आजही समयोचित वाटते हे दुर्दैव.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 08/15/2020 - 09:07 नवीन
आजही समयोचित वाटते हे दुर्दैव.
क्या बात है ! याचं एक गंमतीशीर कारण आहे. लेखात जे लिहिलंय ते आपल्याला किंवा सांप्रताला अ‍ॅप्लिकेबलच नाही असं हरेक काळात वाटतं ! लोकांना वाटतं आपण प्रबुद्ध झालो, पुलं जे सांगतायंत त्याच्या आपण फार पुढे गेलो आहोत; परिणामी तीच व्यवस्था कायम राहते. आजही राममंदीर ही घटना अभूतपूर्व आणि ती घडवणारे ते युगपुरुष हाच विचार देश करतोयं की नाही पाहा. देशाला सर्व प्रष्णांपासून मुक्ती मिळाली आहे आणि रामराज्य आलं आहे या भावनेनी वस्तुनिष्ठता आणि बुद्धीला पार झाकोळून टाकलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री
च
चौकस२१२ Sat, 08/15/2020 - 11:53 नवीन
देशाला सर्व प्रष्णांपासून मुक्ती मिळाली आहे आणि रामराज्य आलं आहे या भावनेनी वस्तुनिष्ठता आणि बुद्धीला पार झाकोळून टाकलं आहे. असहमत ... त्यांना मत देणाऱ्या सर्वसामान्याला एवढं समजतंय कि मोदी / भाजप जादूची कांडी फिरवून देशाचे सर्व प्रश्न सोडवानर नाहीत...त्यामुळे "रामराज्य" वैगरे कोणी भ्रमात नाही सुधृढ लोकशाही मध्ये एकांगी सतत जी सत्ता काँग्रेस कडे होती त्याला पर्याय निर्माण झाला/ नि व्हायला पाहिजे होता हेच डोक्यात बऱ्याच जणांच्या आहे उगाच त्यांना "भक्त" किंवा " रामराज्याचा " रमणारे वैगरे बिरुदे लावून तुम्ही हिणवू शकता पण जाणणारा जाणून आहे कि आज तो भाजपाला का मत देतोय ते... उद्या कदाचित नाही देणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
म
मराठी_माणूस Sat, 08/15/2020 - 08:00 नवीन
आधी वाचलेला होता. पण परत एकदा वाचला. पारायणा योग्यच असा लेख.
  • Log in or register to post comments
J
Jayant Naik Sat, 08/15/2020 - 08:28 नवीन
पूल हे श्रद्धावान माणूस होते. पण त्यांची श्रद्धा माणसातील चांगले पणावर होती. नास्तिक असून हि मनुष्यातील देव ओळखायची हातोटी त्यांच्याकडे होती. उत्तम लेख.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 08/15/2020 - 10:46 नवीन
व्यक्ती पूजेच्या विरूद्ध असल्या मुळे p.l. Deshpande ni लिहलेले आहे म्हणून ते योग्य आहे असे मी samjat नाही. त्यांच्या ह्या मताशी बिलकुल सहमत नाही. ते विनोदी साहित्य लिहतात तेच योग्य . गंभीर विषयांच्या नादाला त्यांनी न लागणे हेच उत्तम. गंभीर विषयावर लिखाण करणे हा त्यांचा प्रांत नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रलयनाथ गेंडा… Sat, 08/15/2020 - 10:59 नवीन
तुमचे हे मत तुम्ही त्यांना (पुलं ना), ते जिथे असतील तिथे जाऊन, प्रत्यक्ष भेटून सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
म
मराठी_माणूस Sat, 08/15/2020 - 11:16 नवीन
व्यक्तीपुजा बाजुला ठेवा. त्यांनी लिहलेल्या लेखात न पटण्यासारखे काय आहे ते स्पष्ट करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
च
चौकस२१२ Sat, 08/15/2020 - 12:09 नवीन
राजेश असे कसे म्हणता ...पुलंच्या "विनोदी" लिखाणात किती समाजाची/ मानवाची स्वभावासंबंधी ची "गंभीर" निरीक्षणे आहेत याची आपल्याला कल्पना नाही का? अंतू बरवा वाचा , व्यक्ती आणि वल्लीतील तो गुंड मित्र, किंवा नाथा कामत ..लिहिणारा लेखक "गंभीर " लिहू शकत नाही ! व्यक्तिपूजा कोणीच करू नये हे मान्य पण पुलंच्या लेखांकडे फक्त विनोदी म्हणून बघणे म्हणजे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
श
शा वि कु Sat, 08/15/2020 - 16:29 नवीन
तुम्ही वाचू नका ना ? त्यांनी गंभीर विषयाच्या नादी लागू नये ही अपेक्षा कशाला ? माफ करा, पण गंभीर लेखन हा पु. ल यांचा प्रांत नाही हे त्यांच्या लेखनाची व्याप्ती माहीत नसण्याचे लक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
म
मिसळलेला काव्यप्रेमी Sun, 08/16/2020 - 12:27 नवीन
तुमचा अभ्यास फारच तोकडा आणि अपूर्ण आहे. कदाचित शाळेतसुद्धा तुम्ही अभ्यास केला नसावा. मला आठवतय बालभारतीमध्ये एक धडा होता निळाई नावाचा, बघा सापडला तर. काय तर म्हणे गंभीर विषयावर लिखाण करणे हा त्यांचा प्रांत नव्हे. हॅ.. आपण कोण आहोत, आपले एकूण कर्तृत्व काय............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
G
Gk Sun, 08/16/2020 - 13:02 नवीन
मुन्शीपालटी , उंदीर विभाग तेही ह्यांचेच वाक्य ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
G
Gk Sun, 08/16/2020 - 13:04 नवीन
उद्या तमाशातील कान्हा अन गवळणी बघून गीता लिहिणे तुझे काम नव्हे असेही हे भगवंतास सांगतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Gk
R
Rajesh188 Sun, 08/16/2020 - 15:17 नवीन
माझी कमेंट फक्त ह्या लेखा पुरतीच मर्यादेत आहे. गंभीर विषय त्यांचा प्रांत नाही ह्याचा अर्थ सुद्धा ह्या लेखा पुरताच मर्यादित आहे. ह्या लेखात त्यांनी सरळ लिहला आहे जगात सर्वात जास्त लढाया धर्मा मुळे झाल्या सर्वात जास्त लोक लोक धार्मिक संघर्ष मध्ये मेले. पाहिले महा युद्ध,दुसरे महा युद्ध झाले ते धर्मा वरून झाले का? हिरोशिमा,नागासाकी वर अणु bomb टाकला तिथे धर्माचा संबंध होता का? जलियान वाला बागेत गोळीबार झाला तिथे धर्माचा संबंध होता का? चीन मध्ये तरुणांवर बुलडोझर चालवला तिथे धर्माचा संबंध होता. धर्माचा संबंध नसलेल्या घटनेत च जास्त मनुष्य हानी झाली आहे. फक्त धर्म ह्या बाबतीत त्यांनी केलेल्या मताला प्रमाण मानून त्यांनी गंभीर विषयात लिहू नये तो त्यांचा प्रांत नाही अशी माझी कमेंट आहे. समाजातील विषमतेवर,अन्यायवर वर लीहणे हे निरीक्षण शक्ती त्यांची चांगली होती हे दर्शवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
R
Rajesh188 Sun, 08/16/2020 - 15:17 नवीन
माझी कमेंट फक्त ह्या लेखा पुरतीच मर्यादेत आहे. गंभीर विषय त्यांचा प्रांत नाही ह्याचा अर्थ सुद्धा ह्या लेखा पुरताच मर्यादित आहे. ह्या लेखात त्यांनी सरळ लिहला आहे जगात सर्वात जास्त लढाया धर्मा मुळे झाल्या सर्वात जास्त लोक लोक धार्मिक संघर्ष मध्ये मेले. पाहिले महा युद्ध,दुसरे महा युद्ध झाले ते धर्मा वरून झाले का? हिरोशिमा,नागासाकी वर अणु bomb टाकला तिथे धर्माचा संबंध होता का? जलियान वाला बागेत गोळीबार झाला तिथे धर्माचा संबंध होता का? चीन मध्ये तरुणांवर बुलडोझर चालवला तिथे धर्माचा संबंध होता. धर्माचा संबंध नसलेल्या घटनेत च जास्त मनुष्य हानी झाली आहे. फक्त धर्म ह्या बाबतीत त्यांनी केलेल्या मताला प्रमाण मानून त्यांनी गंभीर विषयात लिहू नये तो त्यांचा प्रांत नाही अशी माझी कमेंट आहे. समाजातील विषमतेवर,अन्यायवर वर लीहणे हे निरीक्षण शक्ती त्यांची चांगली होती हे दर्शवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
R
Rajesh188 Sun, 08/16/2020 - 15:17 नवीन
माझी कमेंट फक्त ह्या लेखा पुरतीच मर्यादेत आहे. गंभीर विषय त्यांचा प्रांत नाही ह्याचा अर्थ सुद्धा ह्या लेखा पुरताच मर्यादित आहे. ह्या लेखात त्यांनी सरळ लिहला आहे जगात सर्वात जास्त लढाया धर्मा मुळे झाल्या सर्वात जास्त लोक धार्मिक संघर्ष मध्ये मेले. पाहिले महा युद्ध,दुसरे महा युद्ध झाले ते धर्मा वरून झाले का? हिरोशिमा,नागासाकी वर अणु bomb टाकला तिथे धर्माचा संबंध होता का? जलियान वाला बागेत गोळीबार झाला तिथे धर्माचा संबंध होता का? चीन मध्ये तरुणांवर बुलडोझर चालवला तिथे धर्माचा संबंध होता. धर्माचा संबंध नसलेल्या घटनेत च जास्त मनुष्य हानी झाली आहे. फक्त धर्म ह्या बाबतीत त्यांनी केलेल्या मताला प्रमाण मानून त्यांनी गंभीर विषयात लिहू नये तो त्यांचा प्रांत नाही अशी माझी कमेंट आहे. समाजातील विषमतेवर,अन्यायवर वर लीहणे हे निरीक्षण शक्ती त्यांची चांगली होती हे दर्शवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
न
नेत्रेश Mon, 08/17/2020 - 20:32 नवीन
जगाच्या ईतिहासात धर्मावरुनझालेल्या लढायांत तुम्ही दीलेल्या लिस्टच्या कमीत कमी १०० पट मृत्यु झाले आहेत. १०० पट हा आकडा सुध्दा कमी असेल. आपल्याकडे जगाचा ईतिहास फारसा शिकवला जात नाही, त्यामुळे अशा घटनांचा अभ्यास नसतो. पण पु. ल. सारख्या अभ्यासुव्यक्तीचे विधान खोडुन काढायला आपणही तेवढा अभ्यास करायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
R
Rajesh188 Mon, 08/17/2020 - 20:44 नवीन
तुम्हाला माहीत असेल तुम्ही आकडे ध्या. धार्मिक कारणाने जास्त लोक मेली आहेत ह्याचे. पू ल नी ते वाक्य अभ्यास करून वापरले नाही. त्या लेखाची गरज होती म्हणून वापरले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश
ड
डॅनी ओशन Tue, 08/18/2020 - 06:06 नवीन
How Many People Have Been Killed in the Name of Religion? How many deaths have been caused by religion? Here's a list of religiously motivated wars and genocides and their death tolls. Let me know if I missed any! The Crusades: 6,000,000 Thirty Years War: 11,500,000 French Wars of Religion: 4,000,000 Second Sudanese Civil War: 2,000,000 Lebanese Civil War: 250,000 Muslim Conquests of India: 80,000,000 Congolese Genocide (King Leopold II): 13,000,000 Armenian Genocide: 1,500,000 Rwandan Genocide: 800,000 Eighty Years' War: 1,000,000 Nigerian Civil War: 1,000,000 Great Peasants' Revolt: 250,000 First Sudanese Civil War: 1,000,000 Jewish Diaspora (Not Including the Holocaust): 1,000,000 The Holocaust (Jewish and Homosexual Deaths): 6,500,000 Islamic Terrorism Since 2000: 150,000 Iraq War: 500,000 US Western Expansion (Justified by "Manifest Destiny"):20,000,000 Atlantic Slave Trade (Justified by Christianity): 14,000,000 Aztec Human Sacrifice: 80,000 AIDS deaths in Africa largely due to opposition to condoms: 30,000,000 Spanish Inquisition: 5,000 TOTAL: 195,035,000 deaths in the name of religion.
इथून मिळालेले आकडे. यातले काही धार्मिक बाबींमुळे नाहीयेत असे जरी आर्ग्युमेन्ट केले तरी सुद्धा मोठ्ठा आकडा राहील. आणि हा आकडा इतर कारणांमुळे झालेल्या युद्धपेक्षा कमी/जास्त आहे हे बाजूला ठेवलं, आणि केवळ खूप मोठा आकडा आहे इतकेजरी मान्य केलं तरी पुलंच्या मुद्द्यात काही फरक पडत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
न
नेत्रेश Tue, 08/18/2020 - 07:13 नवीन
हे आकडे गोळा करुन चिटकवायचा कंटाळा आला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॅनी ओशन
श
शा वि कु Tue, 08/18/2020 - 09:57 नवीन
बऱ्याचश्या गोष्टी विवादास्पद आहेत. उदा- होलोकास्ट- ज्यूइश धर्मियांच्या हत्येमध्ये वरकरणी तरी धर्माचा संबंध नव्हता. (माझ्या महितीप्रमाणे)...इतर कारणांमुळे झालेल्या युद्धपेक्षा कमी/जास्त आहे हे बाजूला ठेवलं, आणि केवळ खूप मोठा आकडा आहे इतकेजरी मान्य केलं... +१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॅनी ओशन
R
Rajesh188 Tue, 08/18/2020 - 10:34 नवीन
फक्त दुसऱ्या महायुद्धात साडे सात कोटी लोक मारले gele होते आणि हा मानवी इतिहास मधील सर्वात मोठा नरसंहार होता. ह्या युद्धाचा आणि धर्माचा काहीच संबंध नव्हता. साडे सात कोटी हा पण एक अंदाज आहे प्रतक्षात मरणा र्या लोकांचा आकडा त्या पेक्षा पण मोठा होता. धार्मिक संघर्षात सर्वात जास्त मृत्यू झाले हे वाक्य सत्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश
प
प्रकाश घाटपांडे Sun, 08/16/2020 - 14:34 नवीन
दुर्गाबाईंनी एकदा पुलंना समज दिली या आशयचा एक किस्सा वाचला होता. वाद होण्याआधीच तो संपला. पुल तुमच ते गल्लीत वगैरे ठीक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
च
चौकस२१२ Sat, 08/15/2020 - 11:46 नवीन
या लेखावरून कदाचित असे वाटेल कि पुलं किती डावे आणि नास्तिक होते... खरं चित्र कि ते "प्रामाणिक " होते एवढेच पुलंचे सावरकरांवरील हे भाषण जरूर बघावे https://www.youtube.com/watch?v=dOjSsHKqmug https://www.youtube.com/watch?v=Nbt-TMvdgaA
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 08/15/2020 - 11:55 नवीन
1) ते स्वतः देव मानत नाहीत. * बहुसंख्य जनता मानते 2) पुनर्जन्म वर विश्वास नाही * पुनर्जन्म म्हणजे काय हा प्रश्न अनुत्तरित आहे आज पर्यंत. 3) सर्वात जास्त राज्य धार्मिक लढाई मध्ये सांडले. * लढाया ह्या वर्चस्व साठी होतात त्यांना काही ही कारण चालत धर्म नसता तर दुसरे कारण पण चालले असते. 4) विज्ञान नी चांगला समाज निर्माण होईल. * विज्ञान एक सज्ञा आहे . विज्ञान च वापर चांगल्या कामासाठी करायचा की वाईट कामासाठी हे मनुष्य च ठरवतो आणि मनुष्य ची राग,लोभ,प्रेम ह्या भावनेशी विज्ञान चा काहीच संबंध नाही. ५) संताच्या कामना कमी लेखणे. * आता ज्या काही सामाजिक सुधारणा झाल्या आहेत त्या मध्ये संताचेच प्रयत्न कारणीभूत आहेत. आणि काय आहे त्यांच्या लेखात. सर्वच पॉइंट शी असहमत होण्यासारखं च लेख आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sat, 08/15/2020 - 12:29 नवीन
"पूल महान लेखक होते म्हणून त्यांनी मांड्लेलंय मुद्यांशी सहमत व्हायलाच पाहिजे असे नाही" हे आपले म्हणणे मान्य आहे .. माझा मुद्दा एवढाच कि 'गंभीर विषयावर लिखाण करणे हा त्यांचा प्रांत नाही. हे साफ चूक.. त्यांनी लोहिलेले किती तरी "गंभीर आहे" आत डोकावून पहिले तर वपु सुद्धा हसवत हसवत विषयातील गंभीर पणा ते मांडतात.. बघा परत पूल आणि वपु वचह आणि मग बघा तुम्हाला अजून असे वाटते का ते बाकी वरील पाच मुद्यात आपल्याला पुलंशी असहमत होण्याचा अधिकार आहेच
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Sat, 08/15/2020 - 16:31 नवीन
योग्य प्रतिसाद चौकस साहेब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
च
चौकस२१२ Sun, 08/16/2020 - 11:40 नवीन
राजेश आपण माझ्य किंवा शा वि कु यांचं प्रतिसादाचा चुकीचा अर्थ लावीत आहात कृपया परत वाचा मी काय लिहिलंय ते! पुलनचं त्या लेखातील पाच मुद्दे आपल्याला पटले नाहीत यात काहीच गैर नाही .. (एवढेच काय कदाचित त्यातील १-२ मुद्य्यांत आपल्या मताशी मी हि सहमत असेंन ) आपला मूळ प्रतिसाद जो आपण 'लेखाशी अनुसरून' ' असे म्हणत आहेत तो तसा नाही कारण कि आपले खालील विधान नुसतेच चुकीचे नाही तर हशयास्पद वाटते ते विधान म्हणजे : 'गंभीर विषयांच्या नादाला त्यांनी न लागणे हेच उत्तम. गंभीर विषयावर लिखाण करणे हा त्यांचा प्रांत नाही. आता हे सांगा कि १) अंतू बरवा हा विनोदी कि २) अंतू बरवा हे त्याखालील परिक्षितीचे आणि त्यात भरडून निघालेल्या एक व्यक्तीचे "गंभीर" असे चित्रण पुलंनी केलाय आपले उत्तर १) असेल तर शब्द खुंटले आणि जर २) असले तर शा वि कु काय म्हणत आहेत ते आपल्याला कळले असे म्हणू ३) पुलंचे सावरकरांवरील ते भाषण ऐका ... त्यात ते "सावरकरांना समाजाने कसे चुकीचे समजले " यावर ते सडेतोड बोलतात.. याचाच अर्थ लगेच पूल काय हिंदुत्ववादी होतात का? एक जागरूक लेखक म्हणून ते बोलले... तसेच ते आणीबाणीच्या वेळेस हि बोलले होते , तसेच त्यांचा एकदा "अंतुले तुम्हारा चुक्याच " नावाचा लेख हि आलं होता या सर्व उधारणावरून तरी असेच वाटते कि पूल हे एक फक्त "इनोदी" लेखक नवहते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
G
Gk Sat, 08/15/2020 - 13:24 नवीन
छान
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Sat, 08/15/2020 - 14:04 नवीन
हे वाचण्यात आले नव्हते, विचार चाळवणारे लेखन आहे खरे. इथे टंकल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
G
Gk Sat, 08/15/2020 - 15:52 नवीन
त्यांनी त्यांना जे आवडले नाही , पटले नाही , ते लिहिले आहे, सगळे बंद करून टाका, तुम्ही करू नका, असे काही बोलले नाहीत
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Sat, 08/15/2020 - 17:03 नवीन
जी. ए. कुलकर्णींच्या लिखणातला भाग द्यावा वाटतो: "पर्वतापलीकडील सम्राटाच्या आदेशानुसार तुम्ही तुमचं जीवन जगता, त्या गुलामगिरीत तुम्ही समाधान मानता. आतापर्यंत अनेक अन्यायी क्रूर आदेश आले आणि ते तुम्ही शरणवृत्तीने पाळले; पण त्या आदेशांच्या सत्यतेविषयी एकालाही शंका येऊ नये, इतकी तुम्ही आपली मनं कशी दडपली आहेत? पण आता त्या अदृश्य बंधनातून मुक्त व्हायचा क्षण आला आहे. मी तुम्हाला सांगतो, तो सगळा प्रकार म्हणजे जाणीवपूर्वक केलेली एक निर्लज्ज प्रतारणा होती. मी त्या खडकाजवल जाऊन बसत असे, तेदेखील क्षुद्र स्वार्थासाठी:स्वतःची कातडी बचावण्यासाठी! मला कसलेही आदेश येत नसे; सम्राट माझ्या तोंडून बोलत नसे; इतकंच नव्हे, तर पर्वतापलिकडे कोणी सम्राट खरोखरीच आहे का, याचीदेखील मला शंका वाटत आली आहे.!" (ह्याच्यावर चिडून ती टोळी वक्त्याला मारण्यास सरसावते) "हे माझे शब्द मी पुन्हा उच्चारतो, पण एका बाबतीत मात्र मी चुकलो.मला वाटलेले या अदृश्य बेड्या हातावरून पडताच निदान एकाला तरी मुक्त वाटेल. (...) तुमच्या झापडी काढून मी तुमच्या डोळ्यांवर प्रकाश टाकला, पण त्यामुळे स्वच्छ दिसण्यऐवजी तुम्हांला पूर्वीचा काळोखाच जास्त प्रिय झाला.एकंदरीत मुक्तता अशी बाहेरून देता येत नाही, हेच खरं. (...)तुमची प्रतारणा झाली, याचं खरं म्हणजे तुम्हाला दुःख नाही, तर ही प्रतारणा आहे हे दाखवले गेले, याचा तुम्हाला संताप आहे." — ‘कळसूत्र’ , काजळमाया .
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 08/15/2020 - 17:03 नवीन
पु ल देशपांडे हे महान लेखक आहेत हे कोणीच नाकारत नाही. त्यांच्या विषयी नितांत आदर च आहे. फक्त वरील लेखाशी अनुसरून च माझा प्रतिसाद होता. वरील लेखात त्यांनी ज्या विषयावर मत व्यक्त केले आहे ते विषय खूप विवादित आहेत .
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Sat, 08/15/2020 - 19:11 नवीन
पु लं चा सर्व रोख व्यवस्थेच्या exploitation वर आहे. आणि ते बरोबर आहे. रशीयातली साम्यवादी राजवट ध्यानात आणा आणि या लेखातले देव-धर्म वगैरे शब्द वगळुन त्या ऐवजी कम्युनीस्ट तत्वे कन्सीडर करा. लेख जशाचा तसा वैध राहातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
R
Rajesh188 Sat, 08/15/2020 - 19:20 नवीन
ज्या मार्क्स ला काही काळ लोकांनी डोक्यावर घेतला पण त्यांच्या विचारांचे घातक परिणाम दिसून आल्यावर त्यांचे पुतळे लोकांनीच तोडले.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Sat, 08/15/2020 - 19:42 नवीन
.
  • Log in or register to post comments
ब
बेकार तरुण Sun, 08/16/2020 - 07:27 नवीन
छान लेख... पहिल्यांदिच वाचला.... ईथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद..
  • Log in or register to post comments
G
Gk Sun, 08/16/2020 - 07:57 नवीन
सेनेला उद्देशून पुलं बोलले होते , लोकशाही की ठोकशाही , तेंव्हा सेनावाले चिडले होते आज हे वाचून भा xxवाले चिडले.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sun, 08/16/2020 - 11:43 नवीन
आज हे वाचून भा xxवाले चिडले. चालू जि के तुमचा परत! संक्षींनी एक दुर्मिळ वाचनीय लेख दगावला .. त्यावर राजेश यांनी पुलंना जे लेबल लावले त्यावर बोलणं चाललंय ... भाजपचा काय संबंध?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 08/16/2020 - 15:42 नवीन
पू ल चे अनेक चांगले लेख आहेत त्या मधील नेमका हाच लेख इथे का टाकला. दुसरा कोनी टाकला असता तर काही वाटले नसते. नेमके संजय क्षीरसागर ह्याच व्यक्ती नी कसा टाकला. स्टिफन ह्यांची फक्त दोनच ठराविक वाक्य,आईन्स्टाईन ह्यांची काही मत,आता पू ल ह्यांचा selected लेख असे प्रसिद्ध करून आमच्या मताला कसा विद्वान लोकांचा पाठिंबा आहे हे सिद्ध करण्याचा सारा खटाटोप आहे.
  • Log in or register to post comments
G
Gk Mon, 08/17/2020 - 05:04 नवीन
त्यांचे मत अगदी पूर्वापार काळापासून आहे , नास्तिक प्रणाली ही आइन्स्टाइन , पुलं ह्यांच्याही आधीपासून आहे , त्यात नवीन काही नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
च
चौकस२१२ Mon, 08/17/2020 - 01:19 नवीन
राजेश ...बरं असेल संक्षींचा अजेंडा काहीतरी... जसा माझा असले तुमचा असेल .. पण मूळ प्रश्न हा राहतोच कि जी लेबले अतिशय चुकीच्या पद्धतीने तुम्ही पुलंनी लावताय...त्याबद्दल किती उथळ होते आपले विधान हे जरा तपासा ... तुम्ही तो प्रश्न टाळताय !
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 08/17/2020 - 05:26 नवीन
ते विनोदी साहित्य लिहतात तेच योग्य . गंभीर विषयांच्या नादाला त्यांनी न लागणे हेच उत्तम. गंभीर विषयावर लिखाण करणे हा त्यांचा प्रांत नाही. माझ्या कमेंट मधील वरील मजकूर हा अत्यंत चुकीचा असून त्या चुकीची मला जाणीव झाली आहे. सत्याशी विपरीत माझी कमेंट असल्या मुळे मी सर्व सदस्य ची माफी मागतो. आणि ज्यांनी चूक दाखवून दिली त्यांचे आभार मानतो.. पण तो भाग delete करणे माझ्या हातात नाही तरी वेबमास्टर नी ती पूर्ण कमेंट delete करावी ही विनंती.
  • Log in or register to post comments
ह
हरवलेला Tue, 08/18/2020 - 00:33 नवीन
अभिनंदन. तुम्ही जे केलं आहे, ते फार कमी लोकांना जमतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188
च
चौकटराजा Tue, 08/18/2020 - 14:59 नवीन
सदर लेख जणू मीच लिहिला आहे असे वाटून तो इथे टाकल्याबद्द्ल संक्षीन्चे आभार.साहित्यिक म्हणून पुलं हे मुख्यतः विनोदी सहित्यिकच आहेत. परन्तू ज्यानी त्यांच्या एकूण कारकीर्दीचा अभ्यास जवळून केला आहे त्यानीच पुलं गाम्भीर्य या विषयावर बोलावे ,लिहावे. चाप्लिन चे चित्रपट मुलाना आवडतात म्हणून तो मुलांसारखाच पोरकट विचारांचा कलावंत होता असे म्हणायचे का ? पूर्ण जगाचा इतिहास पाहिला तर साम्राज्यवाद व धर्मवाद यातून नक्की कोणत्या कारणाने नरसंहार जास्त झाला याचे उत्त्तर तसे सोपे नाही हे कळून येईल.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Tue, 08/18/2020 - 17:10 नवीन
काॅपीराईटचा प्राॅब्लेम येणार नाही ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
स
संजय क्षीरसागर Tue, 08/18/2020 - 18:13 नवीन
नाही > पुलंनी त्यांच्या पश्चात, स्वतःच्या लेखनाचे सर्व हक्क लोकार्पण केलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Tue, 08/18/2020 - 18:37 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा