Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इतकी शहाणीसुरती माणसं मुळी देवच का मानतात?

S
Shantanu Abhyankar
Wed, 02/10/2021 - 11:23
💬 169 प्रतिसाद
इतकी शहाणीसुरती माणसं मुळी देवच का मानतात? एका अवैज्ञानिक कल्पनेची वैज्ञानिक चिकीत्सा डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. ‘इतकी शहाणीसुरती माणसं मुळी लग्नच का करतात?’, असा प्रश्न ‘लेकुरे उदंड झाली’, या नाटकात एका जोडप्याला पडलेला असतो. अर्थात यांचे रीतसर लग्न झालेलेच असते. याच चालीवर, ‘इतकी शहाणीसुरती माणसं मुळी देवच का मानतात?’, असा प्रश्न विचारता येईल. आस्तिकांच्या मते देव आहेच, आपले अस्तित्व तो विविध लीलांनी दाखवून देत असतो आणि नास्तिकांच्या मते देवाचे अस्तित्व सिद्ध करता आलेले नाही सबब तो नाहीच. तेंव्हा देव आहे का नाही ह्याची चर्चा फारशी उद्बोधक ठरणार नाही. पण देव मानणारे, ‘असे कसे काय बुवा देव मानतात?’ ह्या प्रश्नाचा शास्त्रीय मागोवा बरंच काही शिकवून जाईल. अशा काही मागोव्यांचा हा मागोवा. आधुनिक काळात मानसविद्येमध्ये महत्वपूर्ण संशोधन झाले आहे आणि या प्रश्नाच्या उत्तराची निदान रूपरेषा आता स्पष्ट आहे. जगातील यच्चयावत धर्मकल्पनांमध्ये विलक्षण साम्य आढळून येतं. आढळणारच; कारण यच्चयावत देव-दानव नरे निर्मिलेलेच आहेत. माणसाच्या मन-मेंदूचीच ही करामत. या सर्व-धर्म-समभावांची ही छोटीशी जंत्री. अतीनैसर्गिक शक्तींवर विश्वास. सचेतन आणि अचेतन शक्तींवर विश्वास. मरणोत्तर घटिताबद्दल दावे. ‘आपले’(धर्मबांधव) आणि ‘इतर’, असा सरासर भेद आणि इतरांप्रती दुष्टावा. नित्य आणि नैमित्तिक कर्मकांडे. स्वप्नांचा, शकुनांचा अर्थ लावणारे ठोकताळे. नृत्य आणि संगीत. काही शब्द आणि काही अन्नपदार्थांवर बंधने. पावित्र्य-अपावित्र्य, सोवळे-ओवळे अशा कल्पना, विभूति-शरणता, धार्मिक आणि म्हणून नैतिक अशा जबाबदाऱ्या, आपोआप होणारी दैवी शिक्षा आणि बक्षिसी, वगैरे, वगैरे. इतकी सारी साम्य आहेत म्हटल्यावर ज्या मनात आणि समाजमनात धर्म उगम पावला त्यांचाही अभ्यास आलाच. त्यातही बरीच साम्यस्थळे गवसली आहेत. भावनाप्रधान माणसं अधिक देवभोळी आणि विवेकप्रधान, विचार करणारी माणसं, अधिक नास्तिक असल्याचं आढळून आलं आहे. एकलकोंडी, समाजापासून तुटलेली माणसं, अनिश्चिततेच्या गर्तेतील माणसं, मृत्यू समोर दिसत असलेली माणसं; देवात सोबत शोधतात, आधार शोधतात. छुपी नास्तिक किंवा ‘भोंदू आस्तिक’ मंडळीही असतात. आसपासची इतकी सगळी प्रजा आस्तिक असताना आपले नास्तिकपण मिरवणे सोपे नसते. फायद्याचे तर नसतेच नसते. बरेचदा तोट्याचेच असते. तेंव्हा मनातून नास्तिक आणि तोंडदेखले आस्तिक असतात. मानसिकतेबरोबर सामाजिक रचनेचाही भाग येतो. उत्तम सामाजिक, आर्थिक, मानवविकास निर्देशांक असलेल्या देशी, नास्तिकांचे प्रमाण जास्त असते. समृद्ध, सर्वार्थी अर्थव्यवस्था असलेल्या देशात नास्तिक जास्त. इथे अस्मानी संकट आलं तर सुलतान मदतीला येईल अशी सोय असते. मग आपोआपच आभाळातल्या बापावरचे अवलंबित्व कमी होते. पण या सगळ्याला ओलांडून जाणारे, देवकल्पनेची उत्क्रांती मांडणारे, काही संशोधन आता पुढे येते आहे. उत्क्रांतीच्या ओघात आपले कपी वा मानवरुपी पूर्वज देव मानत नसावेत. मग नेमक्या कोणत्या टप्प्यावर हा देव नामक किडा माणसाच्या मेंदूत शिरला असावा बरे? ही कल्पना सर्व खंडात, सर्व संस्कृतीत आढळते. तेंव्हा भाषेचे प्रारूप जसे माणसाच्या मेंदूत आदिम काळापासून कोरले गेले आहे तसेच देव-धर्माचा एक तयार कोनाडा, एखादं मखर, काही रूपरेषा, मेंदूत आदिम काळापासून आहेच की काय? मेंदूत निश्चित असे ‘देवाचे केंद्र’ (God Centre), ‘चेतापेशींची खास वीण’ (Network) किंवा (तीर्थ)‘क्षेत्र’ (God Area) नाहीये. इतर अनेक कार्यांसाठी कार्यरत असणाऱ्या अनेक यंत्रणा, देवाधर्माचं करताना उद्दीपित होतात. या यंत्रणा देवकल्पनेच्याही आधीच्या आहेत. यांच्याच पायऱ्या करून, देवाचे देव्हारे सजवले गेले आहेत. म्हणजे देव, हा तर करायला गेलो एक आणि झाले भलतेच, असा प्रकार आहे. इतर व्यवहारांसाठी म्हणून जी कौशल्ये, उत्क्रांत झाली; त्यांचा उपयोग देवकल्पना, धर्मभावना वगैरे रुजायला झाला. हे काहीसं लिहिण्या-वाचण्यासारखं किंवा संगीतासारखं आहे. मेंदूत लिहिणे-वाचणे उपजत नाहीये. भाषा (व्याकरणाचे प्रारूप) आहे, दृष्टी आहे, चिन्हांची समज आहे आणि बोटांच्या नेमक्या हालचाली उपजत आहेत. या साऱ्यांचा उपयोग इतर अनेक गोष्टींसाठी होतो म्हणून ह्या उपजत आहेत. माणसाने आपलं डोकं वापरुन ह्या कौशल्यांचा वापर करून लिहिणे-वाचणे ही भलतीच गोष्ट शोधून काढली आहे. भाषेतील स्वर आणि व्यंजनांची नादमय रचना करून, सुरवातीला हृदयाशी ठेका जुळवत, संगीत ही भलतीच गोष्ट शोधून काढली. तसेच मुळात समाज-धारणा करणारी, लोकव्यवहार सुलभ करणारी, मनरचना देव-धर्म धार्जिणी ठरली आणि देवाधर्माचं तण माजलं असं ताजं संशोधन सांगतं. देव-कल्पनेचं बीज तरारून फुटेल अशी मेंदूच्या कार्याची मऊसर रचना उत्क्रांत झाली. तेंव्हा ही कशी उत्पन्न झाली?, कोणत्या औत्क्रांतिक ताण्याबाण्यातून उत्पन्न झाली?, ह्याचा शोध उद्बोधक ठरेल. मेंदूतील औत्क्रांतिक कोरीवकाम गवतात खसखस ऐकू आली तर आपल्या भटक्या पूर्वजांच्या मनात दोन शक्यता चमकायच्या, गवतात कोणी जनावर तर नाही? वाघ? का नुसतीच वाऱ्याची सळसळ? जर वाघ समजून लांबची वाट धरली आणि तिथे वाघोबा नसेलच तर थोडे सावध, थोडे दुरून निघून जाण्याने, फारसं काही बिघडलं नाही. पण जर वाघ असताना, वाघ नाही असं समजलं तर? तर मग जीवावर बेतेल ना! मग वाघोबा तुमचा चट्टामट्टा करेल, तुम्ही उत्क्रांतीच्या स्पर्धेतून बाद. तुमचा वंशखंड. वाघ आहे हा गैरविश्वास (श्रद्धा) आपलं फारसं काही बिघडवत नाही पण वाघ नाही असा फाजील विश्वास जीवावर बेततो. आपल्या पूर्वजांच्या लाखो वर्षाच्या अतूट साखळीचे आपण वारसदार. आपले पूर्वज सावधपणे वागले, नसलेल्या वाघोबालासुद्धा घाबरले, म्हणून आपण आहोत. थोडक्यात आपण सारे, अतीसावध, सतत वाघोबा शोधणाऱ्या, मेंदूंचे वारस (Hyperactive Agency Detection) आहोत. त्यामुळेच जिथेतिथे, ज्यातत्यात आपण वाघोबा शोधत असतो. निसर्गात वाघोबा क्वचित आणि वाऱ्याची सळसळ अधिक. पण आपल्या मेंदूला निरनिराळी टिंब जोडून वाघोबाचं संगतवार चित्र जुळवायची खोड आहे. भासणारी चित्रसंगती हेच सत्य असं आपला मेंदू मानून चालतो. आपण प्रत्येकवेळी सत्यान्वेषी विचार करत नाही. बहुतेक श्रद्धांमागे माणसाचे हे संगती-शोधक, संगती-रत मन आहे. ह्याच मनानी, मनानी लावलेल्या सावध संगतीने तर आपण आजवर तगलो आहोत, वाघापासून वाचलो आहोत. अतीसावध संगती बरोबर प्रत्येक घटीताला कर्ता आणि प्रत्येक कर्त्याला हेतू चिकटवण्याचीही आपल्याला अभिजात खोड आहे (Folk Psychology). हिसका दिला की फांदी तुटते, झाड हलवले की फळे पडतात, आपल्या हेतुतः केलेल्या कृतीतून काही परिणाम घडतो, हे लक्षात येताच तोच तर्क माणसांनी आसपास सगळ्यालाच लावायला सुरवात केली. हा कर्ता मग कधी प्राणी असतो, कधी मनुष्यप्राणी असतो वा कधी निसर्ग असतो. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे कोणीतरी ‘घडवणारा’ आहे आणि त्या घडवणाऱ्याचा काहीतरी ‘हेतू’ आहे, अशी समजूत मानवी मनात दृढ झाली. मग वाऱ्यात वरूण, पावसात इंद्र, जलाशयात अप्सरा आणि वडा-पिंपळावर हडळ सहजच सापडायला लागते. त्यातून वाऱ्या-पावसाची, जळा-पिंपळाची, एकूणच निसर्गाची ‘वागणूक’ इतकी बेभरवशाची, इतकी बेदरकार, की त्यांना कोणतेही नियम किंवा नियमन अशक्य. तेंव्हा त्यांच्या वागणुकीला ‘त्यांची इच्छा’ हे कारण फिट्ट बसणारे. गोष्टीरूप पुराव्यावर झटकन विश्वास हा देखील आपल्या संगती–रत मनाचाच छंद. माझ्या काकाचा कॅन्सर होमिओपॅथिने बरा झाला, मंत्राने सापाचे विष उतरले, वास्तूशास्त्राने भरभराट झाली, अशी विधाने सहज स्वीकारली जातात. संगतींचा सत्यान्वेषी शोध दरवेळी शक्य असतोच असं नाही. भासलेल्या संगतीची सत्यासत्यता पडताळून पहाणारी पद्धत म्हणजे विज्ञान. तर्कदुष्टतेचं हे पाप फक्त पूर्वजांच्या माथी मारण्यात अर्थ नाही. आजचेही बरेचसे तसाच विचार करत असतात. सृष्टी सत्असत् शक्तींनी भरलेली आणि भारलेली आहे, झाडापानाफुलाला आणि मानवनिर्मित गोष्टींनाही; ‘मन’ आणि ‘इच्छा’ आहे आणि ह्या साऱ्याची आपल्यावर कृपादृष्टी अथवा वक्रदृष्टी आहे; अशा कल्पना आजही सर्व संस्कृतीत आहेत. काही कृतींनी अथवा पूजा-प्रार्थनेनी, या अचेतन वस्तूंना पाझर फुटतो, त्या आपल्या भल्यासाठी सहाय्यभूत होतात, ही ह्याच विचाराची पुढची कडी. नव्या गाडीला नारळ फोडणे असो वा नव्या कॉम्प्यूटरची पूजा करणे असो, हे सारे प्रकार या चीजांना आपण स्वतंत्र ‘इच्छा’, ‘मन’ बहाल केल्याचे दर्शवतात. मोठ्या टोळ्या आणि देवकल्पना सुमारे २,५०,००० वर्षापूर्वी माणूस म्हणावा असा प्राणी या ग्रहावर उत्क्रांत झाला. अगदी परवा परवापर्यंत तो भटक्या शिकारी होता. शे-दीडशेच्या टोळ्या टोळ्यांनी रहात होता. याहून मोठा गट भटकत, शिकारीवर गुजराण करूच शकत नाही. शेतीचा शोध लागला आणि शे-दिडशे माणसाची टोळी हजारांची झाली. अर्थात आपल्या कपी पूर्वजांच्या टोळ्यात तर वीस-पंचवीसजणच असायची. त्या मानानी मानवी टोळ्या मोठ्ठ्याच मोठ्ठ्या म्हणायच्या. ह्या मोठ्या टोळ्या टिकायच्या आणि तगायच्या तर अंतर्गत सहकार्य अत्यावश्यक ठरते. सहकार्यासाठी काही खास जाणीवा असणे अनिवार्य ठरते. या अशा जाणिवांतून देव कल्पनेचा उगम झाला असावा. पुढे गावं, शहरं वसली. आता बरेचसे व्यवहार अनोळखी माणसांत होऊ लागले. छोट्याश्या टोळीत बनेल कोण, लबाड कोण, हे सहज ओळखणं शक्य होतं. तिथल्यातिथे शासन शक्य होतं. पण हजारोंच्या टोळीत हे कसं जमावं बरं? मग युक्त व्यवहारांना संरक्षण देणारे आणि फसवेगिरीला शासन करणारी अशी व्यवस्था आणि असे रखवालदार आले. हे अपुरेच. तेंव्हा ‘काल्पनिक रखवालदार’ आले. ह्या रखवालदारांच्या काठीला आवाज नसतो, ह्यांचे कुणालाही ज्ञात न होणारे विचित्र नेमानेम असतात. शिक्षा होते खास, पण ती मृत्युनंतरही असू शकते, पुढच्या जन्मीही असू शकते; अशा अनेक कल्पना आल्या. शपथ देणे, शपथ घेणे, दिव्य करणे, पापपुण्य, त्यांचा संचयाचे आणि क्षालनाचे अनेकविध मार्ग हे सारे ह्याच कल्पनांचे विलास. नागरी जीवनाबरोबरच, समाजव्यवहार सुरळीत चालू रहायला धर्मकल्पना विकसित झाल्याचं दिसतं. जगरहाटी चालायची तर सहकार्य वाढेल पण त्याचवेळी ऐतखाऊ पोसले जाणार नाहीत अशी रचना पुरवणाऱ्या दोन संस्था, धर्मसंस्था आणि राज्यसंस्था. टोळीपासून स्थिर समाज निपजला तशा ह्या दोन्ही संस्था उदयाला आल्या. धर्मामुळे समाजाच्या संघशक्तीला एक दिशा मिळते. गाव करील ते राव काय करील, या उक्तीचा प्रत्यय धार्मिक (अथवा इतर) संघटनेमुळे वारंवार येतो. एक मन, एक मनगट; असा समाज दिलेली उद्दिष्टे सफल करू शकतो. प्रत्यक्ष देवाजीची इच्छा न मानणाऱ्यास; या, अथवा पुढील, अथवा जन्मोजन्मी शिक्षा; म्हटल्यावर माणसं ऐकतात. शिस्त पाळतात. प्रचंड पिरॅमिड देखील बांधतात. पण शेवटी धर्मानी दिलेला ‘आदेश’, ‘दिशा’, ‘उद्दिष्ट’, म्हणजे धर्म-धुरीणांच्या दृष्टिकोनाची परिणीती. प्रत्यक्षात कुठलाही देव येऊन कोणताही आदेश देत नाही. तेंव्हा धर्माचार्य जी ठरवतील ती दिशा असाच मामला असतो. काल्पनिक कार्यकारणभावावर बेतलेली, वास्तवाची बूज न राखणारी ही दिशा अर्थातच चुकू शकते. नव्हे बरेचदा चुकते असाच इतिहासाचा दाखला आहे. टोळ्या म्हटलं की युद्ध आलीच. धर्माचे युद्धोपयोगी गुण तर आजही उधळले जात आहेत. लढायचं तर अनेक गुणांचा समुच्चय लागतो. सहकाऱ्यांप्रती निष्ठा, निधडी छाती, विजयाचा विश्वास, शौर्याचा उदोउदो, आपलीच बाजू नीतीची अशी खात्री आणि प्रणार्पणाची तयारी. धर्म हे सगळं सहज जुळवून आणतो. कर्मकांडातून लहानपणापासूनच धर्मसंघटनेला निष्ठा वाहिलेल्या असतात. आपलीच बाजू धर्माची असल्याचा विश्वास असतो, शत्रू दानव असल्याची खात्री असते, विजयाची खात्री असते आणि धर्मासाठी प्राणाहुती देणाऱ्यांना स्वर्गसुखाची गॅरंटी असतेच असते. शत्रूसंगे संगरासाठी धर्म असा एकोपा पुरवतो. म्हणून तो रूजला, वाढला. अर्थातच ज्याच्या बुडाशी धर्मपीठाची गादी, ज्याच्या तोंडाशी धर्मप्रवक्तेपदाचा माइक, त्याच्या हाती युद्धाचे रणशिंग अशी अवस्था होती आणि काही प्रमाणात आहे. धर्माधिष्ठित देशात एकदा ‘धर्मयुद्ध’ म्हटलं की प्रश्न बंद होतात. पण धर्मनिरपेक्ष देशात युद्धाच्या अपरिहार्यतेची साधकबाधक चर्चा शक्य आहे. नागर व्यापार उदीम बहरायचा तर विश्वासार्हता महत्वाची. ती विश्वासार्हता पूर्वी (आणि काही प्रमाणात आजही) धर्म बहाल करतो. तुमच्या धर्मबांधवांवर तुमचा चटकन विश्वास बसतो. ‘न्यू मराठा खानावळीला’ मराठाच भाजी पुरवतो आणि ‘अंजुमन इस्लाम’ शाळेचं बांधकाम स्वाभाविकपणेच मुसलमान कंत्राटदाराला मिळतं. आंतरधर्मीय विवाह म्हणजे महदाश्चर्याचा दुख:द धक्का. ज्यू, पारशी, मारवाडी, बोहरी इत्यादी समाज दुरदूरच्या देशी, पूर्वापार व्यापार करू शकले त्याचं एक कारण धर्मानी दिलेली ही हमी, हा ‘विमा’. आज विमा आणि विश्वासार्हतेच्या तत्सम साधनांमुळे धर्माचं हे अंग आता दुर्बल झालं आहे. पण संपलेलं नाही. उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय व्यापारातही, भ्रातृभावाच्या सिमेंटनी लिंपलेली आणि परभावाच्या काटेरी कुंपणांनी राखलेली, ज्यूंची चिरेबंदी धर्मवर्तुळे आहेत. टोळ्यांनी रहाण्याची आपली आदिम सवय आपल्याला आप-परभाव शिकवून गेली आहे (Kin Psychology). आपला तो जातभाई, धर्मबंधू, देशबांधव. बाकीचे ते परजातीय, परधर्मीय, काफिर, शत्रु. टोळ्यांत एक सामाजिक उतरंड असते, खालच्यांनी वरच्यांना सलाम ठोकण्याच्या, आदर दाखवण्याच्या तऱ्हा असतात. वरीष्ठांचा अनादर म्हणजे टोळीतून बहिष्कार जणू ठरलेला. नेते, सामाजिक वरिष्ठांचा सन्मान, व्यवस्थेशी बांधिलकी हे सारं यातूनच येतं. ग्रंथप्रामाण्य, शब्दप्रमाण्य, बाबा वाक्यं प्रमाणं, हेही यातूनच येतं. आजही घरांघरांतून, शाळाशाळातून, हे मुलांच्या मनावर बिंबवलं जातं. लहानपणी असं प्रामाण्य आवश्यक आणि संरक्षक असतं. प्रत्येक प्रसंगी, प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक गोष्ट, पुराव्याने शाबीत करून पहाण्याची गरज नसते. एक सामायिक शहाणपणाचं संचित प्रत्येक समाजापाशी असतं. ते वापरणं नक्कीच परवडतं. पण या सवयीनी चिकित्सक विचार, जिज्ञासू वृत्ती आणि पुराव्याइतकाच विश्वास ही विचारधारा रोखली जाते. चिकित्सक अविश्वासाला धर्मात मुळीच थारा नाही. उपजत मानवी विचारधारेतही नाही. आंधळा विश्वास हा मानवी विचारधारेचा वहिवाटीचा मार्ग आहे, धोपट मार्ग (Default Pathway) आहे. हे धर्माला सोयीचेच आहे. माणूस हा विचारी प्राणी आहे म्हणे. तेंव्हा पुढ्यात आलेल्या माहितीचा तो योग्य शहानिशा करून, खात्री करून, काटेकोर शास्त्रीय निकष लावून; मगच स्वीकार वा नकार ठरतो; असं आपल्याला वाटत असतं. पण प्रत्यक्षात जे पुढ्यात येतं त्याकडे आपण आपल्या मगदुरानुसार, मतानुसार, श्रद्धांनुसार, पूर्वग्रहांनुसार बघतो. त्यातले सोयीचे तेवढे स्वीकारतो, आणि त्याच्या समर्थनार्थ युक्तिवाद शोधतो. जे गैरसोयीचे असेल त्याकडे दुर्लक्ष तरी करतो किंवा ते तर्कशुद्ध नसल्याचा तर्क लढवतो. (Biases and heuristics) अविश्वास दाखवणे, चिकित्सा करणे, कष्टसाध्य आहे, ते शिकावे लागते. जन्मजात तर्कदुष्ट मानवी बुद्धीला शिस्त लावायचं काम विज्ञान करतं. सिद्धतेच्या प्रमाणात विश्वास ही विज्ञानाची बाजू आणि ‘संशयात्मा विनश्यति’ ही सर्व धर्मांची शिकवण. प्रत्येक बाबतीत शंका घ्या, पुरावा तपासा, असं विज्ञान सांगतं; तर डोळे मिटून आधी विश्वास ठेवा, पुरावा कसला मागता? थेट प्रचीतीच पहा, असं धर्मशास्त्र सांगतं. बहुतेक सत्तांना, अर्थसंस्थांना, सामाजिक संस्थांना, राजकीय विचारांना ही दुसरी पद्धत सोयीची असते. निमूट स्विकारवादी बरे, शंकेखोर म्हणजे शंकासूर. समाजात रहायचं तर दुसऱ्याच्या मनातलं ओळखता येण्याला अनन्यसाधारण महत्व आहे (थिअरी ऑफ माइंड). ही कला माणसात उदय पावली आणि माणसाची जमात फळफळली. या कलेतून समोरचा कसा वागेल याचा अंदाज बांधता यायला लागला आणि सामाजिक अभिसरण सुरळीत व्हायला मदत झाली. सामनेवाला हा स्वतंत्र मन, विचार, बुद्धी आणि हेतु असलेला जातभाई आहे ही समज उगवली. अर्थात समोरच्याच्या कृतींमागे हेतू आहे हे ओळखणं तसं सोपं गेलं माणसाला, प्रत्येक गोष्टीला हेतू चिकटवायची खोड माणसाला होतीच! मनकवडेपणाबरोबरच इतर अनेक गुणांमुळे देवाधर्माच्या खेळात मानवी मन खिळून रहातं. शरीर आणि मन असं द्वैत आपण गृहीत धरून चालतो. ही मूळ धारणा, धर्म द्विगुणित, त्रिगुणीत, अनंतगुणीत करतो. अशरीर आत्मे-परमात्मे, भुते-खेते सर्व धर्मात ठाण मांडून आहेत ती या मूळ गृहितकाची अपत्ये. पण शरीराशिवाय मनाला स्वतंत्र अस्तित्व नाही अशी विज्ञानाची अद्वैतवादी शिकवण आहे. मनुष्याला इतरांच्या वेदनेची जाणीव असते आणि परपीडेपासून दुःख होते. शिवाय आजचे मदतरूपी (सत्)कृत्य, म्हणजे उद्याच्या परतफेडीची पेरणी असते. मी तुला तेंव्हा मदत केली तू आज मला मदत कर, अशी देवघेव असते. अशी देवघेव न्याय्य असावी ह्या अपेक्षेतून न्याय, हक्क, वगैरे जाणीवा विकसित झाल्या आहेत. आपल्या मेंदूतील चेतातंतूंच्या जाळ्यातील विवक्षित भाग समोरच्याच्या हालचालींनुसार उद्दिपीत होतो, असं आता लक्षात आलं आहे. म्हणजे समोरच्याने डावा हात वर केला, तर माझा डावा हात नियंत्रित करणाऱ्या चेतापेशी क्षणिक उद्दीपीत होतात आणि समोरच्याचा डावा हात कोणी जोरात पिरगळला तर माझ्याही मेंदूतील वेदनेच्या चेतापेशी क्षणिक उद्दिपीत होतात. स्वतःत वेदनेचे प्रतिबिंब पाहून, वेदनेला सहवेदनेचा आयाम देणारे हे दर्पण-चेतातंतू (Mirror Neurons). अनुकंपा, सहानुभूती आणि सहाय्य करण्याची उर्मी इथे उगम पावते. हेच पहा ना, आफ्रिकेच्या गवताळ सवाना प्रदेशात, कोट्यवधी वर्षापूर्वीचा, एका होमो इरेक्टस स्त्रीचा, सांगडा सापडला आहे. हिला, बहुधा कोण्या प्राण्याच्या मांसातून, अ जीवनसत्वाची विषबाधा झाली असावी. परिणामी सांध्यात रक्तस्त्राव होऊन ती मृत्यूपूर्वी काही महीने तरी जायबंदी असावी. अर्थात काही कोटी वर्षापूर्वी, कोणी जागेवर अन्नपाणी पुरवल्याशिवाय, इतके महीने, कोणी जगूच शकणार नाही. तेंव्हा सोबतचे होमो इरेक्टस तिची सुश्रूषा करत होते खास. थोडक्यात वेदनेला कारुण्याचा प्रतिसाद धर्माने शिकवलेला नाही तो तर माणसाच्या वागणुकीत आधीच वसलेला दिसतो. सहवेदनेबरोबर सह-सौख्यभावनाही आहे. सणासुदीला सगळेच खुशीत दिसतात, वर्ल्ड कप जिंकल्यानंतर चराचर सृष्टी आनंदाने डोलू लागते वगैरेमागेही हेच दर्पण तंतू आहेत. हा उपजत गुण धर्माच्या पुरेपूर कामी आला आहे. माणसाच्या मनी वसलेले असे अनेक गुण धर्मभावनेला उपयुक्त ठरलेले आहेत. धर्माशी निगडीत, आभास, साक्षात्कार, सृष्टीशी तादात्म्यभाव असे अनेक घटक आधुनिक मानसाभ्यासाचे विषय आहेत. मायकेल परसिंगर याने असं दाखवून दिलं आहे की आपली स्वत्वाची भावना, ‘आपण’ आणि ‘इतर व्यक्ती’ हा भेद करण्याची क्षमता, मेंदूच्या डाव्या आणि उजव्या अशी दोन्ही टेम्पोरल लोबमध्ये (कानशिलापुढील भाग) असते. जागेपणी आपण फक्त मेंदूच्या डाव्या भागतील क्षमता वापरत असतो. पण भीती अथवा नैराश्याच्या छायेत, संकटकाळी, गुदमरल्यावर, रक्तशर्करा घटल्यास उजव्या बाजूची क्षमताही बरोबरीने जागृत होते आणि आपल्या सोबत ‘अन्य कोणीतरी’ आहे असा अनुभव येतो. अगदी अस्साच अनुभव ‘देव टोपडे’ (God Helmet) घालून कृत्रिमरीत्या घेता येतो. ‘देव टोपडे’ ही परसिंगरची निर्मिती. हे टोपडे घालून अंधाऱ्या, शांत, खोलीत एकटेच बसायचं, ह्या टोपड्यातील यंत्रणा त्या व्यक्तीच्या मेंदूच्या उजव्या टेम्पोरल भागाला उद्दिपीत करते आणि त्या बंद खोलीत बरोबर अन्य कोणी असल्याचा भास त्या व्यक्तीला व्हायला लागतो. मदर मेरीपासून ते मेलेल्या आत्यापर्यंत आणि साईबाबांपासून ते आईबाबांपर्यंत; आपापल्या सुप्त इच्छा अपेक्षांनुसार, कुणाचेही दर्शन होऊ शकते. इतकेच कशाला टेम्पोरल लोब एपिलेप्सीच्या (एक प्रकारचा अपस्माराचा आजार) पेशंटना अगदी असेच उद्दीपन मिळते आणि अगदी असाच अनुभव येतो. या मुळे की काय, असे पेशंट बरेचदा आत्यंतिक धार्मिक असतात. चराचर सृष्टीशी एकरूप झाल्याचा अनुभव हा देखील असाच एक साक्षात्कारी अनुभव. ही झपूर्झा अवस्था प्राप्त होते तेंव्हा मेंदूतील फ्रॉन्टल लोब (कपाळा मागील भाग) उद्दिपीत असतो तर वामांगी परायटल लोब (डाव्या कानाच्यावरचा भाग) शांत स्थितीत असतो. हाच तो मेंदूचा भाग ज्यामुळे आपल्याला आपण सृष्टीपासून अलग आहोत ही जाणीव होत असते. आपण कुठे ‘संपतो’ आणि ‘सृष्टी’ कुठे सुरू होते, ते हा भाग आपल्याला सांगत असतो. तळमळीने केलेला देवाचा धावा, ध्यान-धारणा, नामस्मरण, भजन-कीर्तन वगैरे सांगीतिक संकेत, मंत्रजप अशा क्रियांनी या वामांगी परायटल लोबला तात्पुरती गुंगी येते, फ्रॉन्टल लोब उद्दिपीत होतो आणि ‘मी’ पण सरते. मंत्रचळ (Obsessive compulsive disorder) नावाचा एक आजार आहे. ह्यात ती व्यक्ति अगदी निरर्थक क्रिया वारंवार करत रहाते. सतत हात धुणे, एकच वाक्य बडबडत रहाणे, येरझाऱ्या घालणे असं काहीही. देवाधर्माचे ‘करणे’ या सदराखाली धडधाकट माणसेही असे प्रकार करताना दिसतात. वारंवार तीच तीच क्रिया केल्याने चिंता, भीती, वगैरे कमी होते आणि धीर, आत्मविश्वास वाढतो. जप, प्रदक्षिणा वगैरेंनी हाच परिणाम साधला जातो. ‘धर्म हा समाजाचा मंत्रचळ आहे आणि मंत्रचळ हा त्या त्या व्यक्तीचा वैयक्तिक धर्म आहे’; असं फ्रॉइडने म्हणून ठेवले आहे. भातुकली खेळताना किंवा नाटक पहाताना आपण सारासार विचार क्षणभर हेतुतः बाजूला ठेवतो. पडद्यावरच्या लटक्या जगात ठाकुर खरोखरच थोटा झाला आहे, जय खरोखरच मेला आहे, गब्बरचे हात जायबंदी झाले आहेत आणि बसंती अन् विरुचा खट्याळ शृंगार पुढे फुलणार आहे असं मानून चालतो आपण. ते विश्व आणि आपलं विश्व अशी मानसिक फारकत शक्य असते आपल्याला. (Decoupled Cognition) स्थळ, काळ, वेळेचा असा हेतुतः विसर, विपर्यास हा आपल्या मेंदूचा आणखी एक धर्म-धार्जिणा गुण आहे. ह्या गुणाचा एरवीही उपयोग होतो आपल्याला. ऑफिस मधली बाचाबाची आपल्याला पुनःपुन्हा आठवते आणि आपण प्रतिवाद तयार ठेवतो. उद्याच्या भिशीबद्दल बायकोला काय थाप मारायची ह्याची उजळणी आपण आजच करून ठेवतो. बॉसशी, बायकोशी, काय आणि कसं बोलायचं ह्याची तालीम त्यांच्या अनुपस्थितीत करतो आपण. मनातल्या मनात अदृश्य इतरेजनांशी असा मानसिक संवाद अगदी सहज शक्य आहे आपल्याला. प्रेतात्म्यांशी संवाद, देवात्म्याशी संवाद ही सुद्धा ह्याच गुणाची प्रचिती. लहान मुलं बाहुलीशी, टेडी बेअरशी बोलतात. देव म्हणजे मोठ्या माणसांचं टेडी बेअरच आहे. दोन व्यक्तीत संवाद होताना मेंदूत जे भाग प्रदीप्त होतात तेच भाग टेडीशी संवाद होतो किंवा देवाची प्रार्थना केली जाते, तेंव्हाही प्रदीप्त होतात. आपलेपणाची भावना, ही एक आदीम भावना आहे. या जगात माझं म्हणून कोणी आहे, मला माझे म्हणणारे कोणीतरी आहे या भावनेसाठी (Attachment) खास सर्किटस आहेत मेंदूत. कित्येक प्रार्थना काकुळतीने करूणाकराला ‘माझे म्हणा’ अशी आळवणी करतात; कित्येक भक्त, अशी आर्जवे करताना एखाद्या तान्ह्या मुलाने आईकडे ‘घे’ म्हणून हात पसरावेत तसे मूर्तीकडे किंवा आभाळाकडे हात फैलावतात, ते काही उगीच नाही. माणसं; मृत्यू, गैरसमज किंवा परदेशगमनामुळे हिरावली जाऊ शकतात पण देव कायमचा सखा, कायमचा सुहृद. आपलेपणाची ही घट्ट भावनिक गरज, देवाचा स्वीकार सुलभ करते आणि देवाचा त्याग अतिशय दुष्कर करते. बालपणी नात्यागोत्यांच्या व्यवस्थापनाची शिकवण आपल्याला मिळत असते. पालक, वडीलधारी माणसं, यांच्याकडून अपेक्षा आणि त्यांच्या जबाबदाऱ्या आपण शिकत असतो. मोठं होता होता इतर नातीही आपण याच कोंदणात बसवत जातो (Transference). नसलेल्या देवाशी असलेले नातेही सर्व धर्मियांनी या कोंदणात बसवलेले दिसते. त्वमेव माता, पिता त्वमेव, त्वमेव बंधू, सखा त्वमेव; अशी प्रार्थनाही सर्व धर्मात आढळते, ती यामुळेच. शुद्धाशुद्धतेच्या, पावित्र्य आणि अपवित्र्याच्या कल्पनांना देखील प्राचीन आयाम आहेत. स्वच्छतेकडे नैसर्गिक ओढा आहे आपला आणि शिसारी, किळस ही भावनाही नैसर्गिक आहे. वातावरण, वर्तन, विचार असं सगळंच पवित्र अथवा किळसवाणं वाटू शकतं आपल्याला. धर्म मिथके वास्तवाला किंचित किंचित पीळ देत असतात. किंचित पीळ मानवी मन सहज स्वीकारतं. मनाच्या ह्या गुणामुळे पुराणकथा सहज सत्य मानल्या जातात. अन्यथा पुराणकथा या परिकथाच असतात. तुमचं घर तुमचे इन्कमटॅक्सचे रिटर्न भरेल आणि सकाळ संध्याकाळ तुम्हाला चहा करून देईल, असं सांगितलं तर कुणाचाही विश्वास बसणार नाही. यात घराचं ‘घरपण’ हरवून गेलेलं आहे. पण वास्तू प्रसन्न होताच तुम्हाला गुप्तधन सापडेल, यावर चटकन विश्वास बसेल. यात वास्तूची बरीचशी गुणवैशिष्ठ्ये शाबूत आहेत आणि काही अवास्तव गुण खास चिकटवलेले आहेत. जी कथा कथांची तीच कथानायक आणि खलनायकांची सुद्धा. सर्व देव, दानव, देवदूत, एकूणच स्वर्गलोकातील आणि पाताळलोकातील लोक, म्हणजे मानवाची किंचित सुधारून किंवा बिघडवून घडवलेली आवृत्तीच. एकाच वेळी बऱ्याचशा मानवी आणि काही अतीमानवी गुणांनी युक्त अशी ही पात्रे असतात. ही खातात, पितात, हसतात, रूसतात, झोपतात, कोपतात, दोन बायकांनी कावतात, अगदी तुमच्या आमच्या सारखीच असतात ती. ह्या कथानायकांचे वागणे आदर्श असल्याचे सांगितले जाते. त्यानुसार आपली वागणूक बेतावी अशी शिकवण दिली जाते पण प्राचीन कथा पुराणांचा आजच्या जगण्याशी थेट संबंध नसतोच. कोणत्याही धर्माचा कितीही कट्टर माणूस धर्मग्रंथ शब्दश: पाळतच नसतो, पाळूच शकत नाही. नीती थेट धर्मग्रंथातून येत नाही. आजच्या भिंगातून बघत, बघत, धर्मशास्त्रातले सोयीचे ते वेचले जाते. आजचे धार्मिक पुराणातली वानगी गरजेनुसार घेतात अथवा सोडून देतात. मग कर्मकांडे प्रचलित सामाजिक नीती-अनीतीच्या कल्पना घट्ट करतात. त्यामुळे पौराणिक कथानकातील विरोधाभास दाखवून, धर्मभावना फारतर तीळभर ढळते आणि हा ढळ पळभर टिकतो. विरोधाभास दाखवून देणाऱ्याबद्दल कटुता मात्र मणभर साठते आणि मनभर दाटते. पुराणकथांबरोबरच कर्मकांडं हा तर धर्मावर हल्ला करण्यास अत्यंत सोपा, सोयीचा, सर्वात कमकुवत भाग असं नास्तिकांना वाटतं. पण काही कर्मकांडे समाजधारणा करतात, काही शेतीच्या चक्राशी निगडीत आहेत आणि काही तर चक्क मजेदार आहेत. सोडमुंज होताच, कोणी मुलगी देत नाही म्हणून मुलाने रुसून, संन्यास घेत, काशीयात्रेला प्रस्थान ठेवणे आणि मामाने मुलगी देतो म्हणताच परत फिरणे; अशी खेळकर आहेत काही. पण वरवर निरर्थक भासणारी ही कर्मकांडं धर्माचा कणा आहेत! कित्येक कर्मकांडे ही तर उघड उघड अविवेकी, निर्बुद्ध आणि निरर्थक भासतात. असतात. पण प्रत्यक्षात अशा कर्मकांडातील सहभाग हा नि:शंक निष्ठा निदर्शक असतो. निष्ठेचे, प्रामाणिक, आचरण्यास कठीण आणि नक्कलण्यास अवघड संकेत समाजव्यवहारासाठी आवश्यक असतात. सर्व कर्मकांडे म्हणजे निष्ठेची आचमने असतात. ऋण काढून साजरे केलेले सण, स्वतःला जाच करून केलेली व्रते, कष्टप्रद तीर्थयात्रा, अव्वाच्या सव्वा दानधर्म, देवाच्या नावाने अंगावर आसूड ओढणे, स्वतःला बगाडाला टांगणे, इत्यादीमुळे सामाजिक पतप्रतिष्ठा, स्विकार, वाढत असतो. उद्यापनाला व्रतार्थीच्या पायाचे तीर्थ घेण्यापर्यंत प्रथा परंपरा आहेत त्या हेच अधोरेखित करतात. अशा सहभागातून हळूहळू इथे प्रश्न विचारायचे नाहीत, हा कुलाचार आहे, सबब असाच चालू ठेवायचा, अशी धारणा गडद केली जाते. माणूस आपोआप त्या त्या कळपात सामावून जातो. हे सामावणे कळपाला आणि त्या व्यक्तीला सोयीचे असते. स्थलकाल लंघून, कर्मकांडे धर्मश्रद्धा संक्रमित करतात, फोफावत ठेवतात, तेवत ठेवतात. इथे वाईत भोंडल्याला ‘मिडल क्लास’ म्हणून नाके मुरडणारी मुलगी वॉशिंग्टनमध्ये गेली की हौसेनी चार सख्या जमवून फेर धरते. मानवी मन धर्मकल्पनेला धार्जिणे आहे हे आपण पाहीलंच आहे. पण कर्मकांडातून आत्मसन्मान, साफल्य, अत्यानंद, काळभय, समर्थ प्रेरणा, वेदना-शमन, तीव्र स्वकीयभाव; असे आत्यंतिक टोकाचे भावानुभाव उचंबळून येतात. सेरोटोनिन, डोपामीन, एपिनेफ्रीन, नॉर-एपीनेफ्रीन, ऑक्सिटोसिन आणि एंडोर्फीन अशी अती भावानुकूल रसायने मेंदूत स्रवत जातात. अनुभव मालिकांची बेरीज होत नाही, तर चक्क गुणाकार होतो. प्रत्येक घटितामागे कोणी हेतुधारी कर्ता-करवीता असतो हा तर माणसाचा आदिम मनगुण. मग या रसायनांच्या खेळात चल-अचल सृष्टीतील कोणत्याही सोयीच्या घटकाला तन-मन-हेतु वगैरे मानवी गुणांनी मढवले जाते. देवाचे देवत्व असे घट्टमुट्ट होत जाते. कर्मकांडानी आणि प्रार्थनेनी परिस्थितीत बदल होत नसला तरी प्राप्त परिस्थितीला तोंड द्यायला आस्तिकांना बळ मिळतं. धर्म ही खरोखरच अफूची गोळी आहे. मेंदू वैज्ञानिकांच्या मते कोणत्याही आनंदानुभूतीच्या वेळी, म्हणजे अगदी संभोगापासून ते संगीतापर्यंत आणि चॉकलेट पासून ते गांजासारख्या आनंद-औषधांच्या सेवनादरम्यान मेंदूतील जे भाग उद्दीपित झालेले दिसतात तेच देवाधर्माचं करतानाही होतात. इतकी लोकं देवाधर्माच्या भजनी लागतात ते काही उगीच नाही. आशा, आधार, सांत्वन, धीर, विश्वास, सुरक्षितता, निश्चितता, विस्मय, विरेचन, मृत्युंजय भावना आणि अडचणीच्या वेळी सामजिक आधार अशा सर्व भावभावनांचा स्त्रोत आहे धर्म. हे सगळं सोडून उघडं, नागडं, रौद्र, सत्य, ज्याला त्याला दाखवण्याचं कारणच काय? कारण लवकरच ह्या सकृतदर्शनी साध्या आणि उपयुक्त वाटणाऱ्या कल्पनातून शोषण सुरु होतं. अविवेकी निर्णयांची आणि चुकीच्या आडाख्यांची मालिकाच सुरु होते. उत्साहवर्धक असतात तशाच हतोत्साही करणाऱ्याही असतात ह्या कल्पना. चुकीच्या मार्गानेही ढकलतात त्या. विशेषतः देव-धर्म ही बाब वैयक्तिक न रहाता सार्वजनिक, राजकीय होते तेंव्हा तर असं होतच होतं. व्यक्तिगत धर्मही तापदायक ठरू शकतो. साधी, दानधर्मात रमणारी, कुणाच्या अध्यात न मध्यात, स्वांत:सुखाय देव मानणारी, देवभोळी माणसं; ही व्यक्तिश: चांगलीच असतात. त्यांचा धर्मही वैयक्तिक आणि इतरांना त्रास न देणारा असतो. पण हीच माणसं त्यांच्या धर्मियांच्या टोकाच्या धर्मांध विचारांना आदर आणि प्रतिष्ठा मिळवून देत असतात. धर्म आणि विज्ञान ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत वगैरे तत्वज्ञान ह्याच मंडळींना भावतं. पण असल्या बंडलबाजीमुळे विज्ञानाची समज बोथट होते. ह्या समजावून घेण्यात तीन संकल्पना महत्वाच्या. हे विश्व निर्हेतुक आहे, ह्याची जडणघडण सुघटित आणि सुरचित वाटत असली तरी ती निव्वळ अपघात मात्र आहे आणि मीच का? हा प्रश्न बराचसा अप्रस्तुत आहे. निर्हेतुक विश्व इतक्या अफाट, मती गुंग करणाऱ्या आणि गुंतागुंतीच्या विश्वाची निर्मिती आपोआप, निर्हेतुकपणे झालेली आहे अशी विज्ञानाची मांडणी आहे. त्यातही ही मांडणी सध्याची आहे, कदाचित उद्या काही वेगळे प्रत्ययास आले तर ही मांडणी बदलण्यास प्रत्यवाय नाही, अशीही विज्ञानाची मांडणी आहे. थोडक्यात ‘अंतिम सत्य’ वगैरे भानगड विज्ञानाला वर्ज्य आहे. ही मांडणी, सहसा सगळ्यांना वैफल्यवादी, अर्थशून्य आणि निराशाजनक वाटते. इतकी अनिश्चितता आणि निर्हेतुक करामत ज्यांना झेपत नाही ते आस्तिक बनून हरएक नैसर्गिक अथवा मानवी घटिताला हेतू आणि कारणे डकवतात आणि ‘अंतिम सत्य’ सापडल्याची तृप्ती कुरवाळत बसतात. अपघातमात्र विश्वरचना विश्वाची रचना कितीही सुघटित आणि सुरचीत वाटली तरी प्रत्यक्षात ही निर्मिती देव कल्पनेविनाही समजावून घेता येते. विश्वरचनेचा संपूर्ण उलगडा झाला नसला तरी देवाची जी सर्वोच्च करामत, जी की सजीव सृष्टी, तिच्या विलासाचा उलगडा बराचसा शक्य झाला आहे. सजीवांची शरीरे वरवर पहाता कितीही सुबक, सर्वांगसुंदर, सुघटीत आणि सुरचित वाटली तरी उत्क्रांतीचा अभ्यास असं दर्शवतो की उत्क्रांतीच्या अनाहूत ओघात सजीवांच्या शरीररचनेत कित्येक दोष, चुका, कमअस्सल कारागिरी आणि ओबडधोबड घडण उतरलेली आहे. सजीवांची शरीरे ही कोणा बुद्धीवान निर्मिकाच्या परिपूर्ण निर्मितीची सजीव लेणी नसून; निर्बुद्ध नैसर्गिक निवडीच्या, खळाळत्या प्रवाहाने घडवलेले गोटे मात्र आहेत. ह्यांची गोलाई प्रवाहाने घोटवलेली आहे कोणी सहेतुक घडवलेली नाही. सजीव शरीरे हा बुद्धिमंत निर्मितीचा पुरावा नसून निर्बुद्ध नैसर्गिक निवडीच्या प्रतापाचा पुरावा आहे. हाच कार्यकारणभाव निर्जीव सृष्टीलाही लागू आहे असा विज्ञानाचा दावा आहे. मीच का? जे भोग आपल्या वाट्याला आले ते आपल्याच वाट्याला का आले? हा तर चिरंतन प्रश्न. चवचाल बायकोपासून ते चमडीच्या कर्करोगापर्यंत कशासाठीही हा प्रश्न विचारता येतो, विचारला जातो. याला योगायोग वगळता कोणतेही कारण नाही आणि स्वीकार वगळता कोणताही उपाय नाही. हे समजावून घेणे अतिशय अस्वस्थ करणारे असले, तरीही अंतिमतः गोलमाल, निरर्थक विचारव्युहातून मुक्तीदायी असते. पण इतकाही विचार करण्याची गरज नाही. जर देव सर्वव्यापी, सर्वज्ञ आणि कनवाळू आहे तर मग दवाखान्यांची गरज काय? आरोग्य विम्याची गरज काय? आस्तिकांनी सीट बेल्ट लावायची गरज काय? असे अनेक प्रश्न उपस्थित करता येतील. या प्रश्नांना श्रद्धावानांकडे उत्तरेही तयार असतील. पण सत्य हेच की देवबिव कोणी आपली काळजी घेत नसतो. आपल्या मगदुरानुसार आपल्यालाच ते करावे लागते. पण आस्तिकांना हे सत्य कळले तरी वळत मात्र नाही. तसं बघायला गेलं तर आपापले देव वगळता अन्य देवतांवर आस्तिकांचा विश्वास नसतो. थोडक्यात ‘त्यांचा देव’ वगळता इतर देवांच्या बाबतीत ते नास्तिकच असतात. अल्लाचा बंदा राम-कृष्णावर विश्वास ठेवत नाही आणि सच्च्या रामभक्त येशूच्या बापाला जगाचा बाप मानत नाही. अशा हिशोबात नास्तिकांची संख्या जास्त भरेल!! दैनंदिन जीवनात धर्माचे स्थान पूर्वीसारखे सर्वव्यापी राहिलेले नाही. देवशरण, दैवशरण, निष्क्रिय, आंधळ्या, आस्तिकतेपेक्षा; प्रयत्नवादी, क्रियाशील, शोधक, डोळस, नास्तिक विचार उन्नत खराच. विज्ञान, विवेक, मानवता आणि उदारमतवादाची कास धरून माणसानी तूफान प्रगती केली आहे. पण धर्म संपेल का, या प्रश्नाचं उत्तर देणं अवघड आहे. धर्मामागे भगवंताचे अधिष्ठान नसले तरी त्यामागे मानसशास्त्रीय आणि उत्क्रांतीशास्त्रीय अधिष्ठान आहे. तेंव्हा धर्माला हद्दपार करणे, नजीकच्या भविष्यकाळात तरी, अशक्य नसले तरी अवघड आहे, असं वाटतं. नास्तिकांनी धर्माचा दुस्वास आणि धार्मिकांचा उपहास करण्याऐवजी दोहोंचा अभ्यास केला पाहिजे एवढं मात्र खरं. प्रथम प्रसिद्धी:- नवभारत डिसेंबर २०२० काही संदर्भग्रंथ :- Why We Believe In God(S) J. Anderson Thomson In Gods We Trust Scott Atran Religion Explained Pascal Boyer The Skeptic’s Guide to the Universe Steven Novella The Faith Instinct Nicholas Wade A History of God Karen Armstrong

प्रतिक्रिया द्या
40032 वाचन

💬 प्रतिसाद (169)
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/11/2021 - 09:35 नवीन
माझे एक स्नेही कठीण समय आला कि त्यांच्या घराण्यातील परंपरे प्रमाणे एक पोथी वाचतात ( ती पोथी म्हणजे केवळ एका व्यक्तीचे जणू काही देवत्व दिल्यासारखेच वर्णन .. ताई महाराज कि कोण त्यांनी म्हणे ह्याला बरे केले त्याला बरे केलं ..) १) त्यांनी पोथी वाचल्याने तुम्हाला किंवा समाजाला काही त्रास झाला का? २) त्यांनी पोथी वाचल्याने तुमचे किंवा समाजाचे काही हक्क हिरावले गेले का? ३) त्यांनी पोथी वाचल्याने घटनेच्या एखाद्या कलमाचा भंग झाला का? ४) त्यांनी पोथी वाचण्यास घटनेची बंदी आहे का? ५) त्यांना पोथी वाचून मिळत असलेल्या शांतीमुळे तुमचे मानसिक स्वास्थ्य विचलित होते का? ६) त्यांना पोथी वाचण्यासाठी तुमची, समाजाची, पोलिसांची, न्यायालयाची, संसदेची, विधीमंडळाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे का? वरीलपैकी एकही गोष्ट होत नसेल तर त्यांनी पोथी वाचल्याने तुमचा पोटशूळ का उठतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
च
चौकस२१२ गुरुवार, 02/11/2021 - 10:00 नवीन
१) त्यांनी पोथी वाचल्याने तुम्हाला किंवा समाजाला काही त्रास झाला का? सांगतो ... - त्या व्यक्तीचा कधी कधी रोख असा असतो कि "हे बघ he असले वाचत नाहीस . अश्या गोष्टींवर काही श्रद्धा ठेवत नाहीस म्हणून तुला यश येण्यात अडचणी येत असणार" हे म्हणणे हेच खटकते ..आणि त्रास होतो .. आता घटनेने बंदी केली आहे का वगैरे बाकी तुमच्या इतर ५ मुद्यांचा काही संबंध नाही ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/11/2021 - 10:10 नवीन
म्हणजे हा व्यक्तीदोष आहे, पोथी वाचनाचा येथे संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
च
चौकस२१२ गुरुवार, 02/11/2021 - 10:30 नवीन
व्यक्तीदोष.. तो तर आहेच पण तो aalaa या "श्रद्धेमुळे" पोथी काय ओवी काय गझल काय किंवा एखादे सुंदर गाणे म्हणून/ ऐकून एखाद्याला आंतरिक समाधान होत असेल तर कशाला हो करू विरोध.. विरोध आहे वृत्तीला "पोथी नाही तुझ्य जीवनात, देव नाही .. मग काय अर्थ, गुरु पाहिजेच .." या वृत्तीला विरोध बहुतेक तुम्हाला मी काय म्हणतोय ते लक्षात येत..आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 02/11/2021 - 10:06 नवीन
१ ते ६ उत्तर नाही असेच आहे. पण म्हणून पोथी वाचणार्‍याबद्दल किंवा वाचण्याबद्दल आपली मत विश्लेषण मांडण्याच्या एखाद्याच्या स्वातंत्र्याला बाधा येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/11/2021 - 10:13 नवीन
निश्चितच. परंतु १ ते ६ या प्रश्नांंचे उत्तर नाही असूनही (म्हणजे एखाद्याच्या आस्तिकतेने कोणालाही कसलाही त्रास होत नसूनही, आस्तिकतेवर घटनेची बंदी नसूनही, आस्तिकता ही पूर्णपणे वैयक्तिक आवड असूनही) काही जणांना त्यावर का आक्षेप घ्यावासा वाटतो ते मला अजूनही समजले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 02/11/2021 - 10:17 नवीन
मत भिन्नता व्यक्त करण्याच्या त्यांच्या स्वातंत्र्यातून तो आक्शेप निर्माण होतो. आक्षेप घेतल्याने आक्षेपित व्यक्तीच्या हक्क व स्वातंत्र्यावर बाधा येत नाही. वा गुन्हाही दाखल होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/11/2021 - 10:25 नवीन
जोपर्यंत आक्षेप मतभिन्नता दर्शविण्यापर्यंतच्या मर्यादेत असत़ो तोपर्यंत समस्या नसते. परंतु जेव्हा आक्षेप मर्यादा ओलांडून दुसऱ्यांंच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर, हक्कांवर अतिक्रमण करू पाहतो, तेथे मात्र संघर्ष निर्माण होतो. कोणत्याही प्रकारे समाजाला त्रासदायक नसलेल्या वैयक्तिक श्रद्धांंची (पोथीवाचन, देवपूजा, नामस्मरण वगैरे) जेव्हा अंधश्रद्धा म्हणून संभावना करून हेटाळणी सुरू होते, तेव्हा संघर्ष सुरू होतो. तो टाळणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 02/11/2021 - 10:28 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
च
चौकस२१२ गुरुवार, 02/11/2021 - 10:55 नवीन
. या गोष्टी वयक्तिक राहतात तेव्हा काही प्रश्न नसतो हो जेवहा त्यावर विस्म्बणारे जवळच्यांची हेटाळणी करतात कि "असे कसे कशी नाही श्रद्धा त्याशिव्या अपुरे आहे प्रयत्न फोल आहेत वैगरे " तेव्हाच आणि फक्त तेव्हाच आम्ही प्रश्न उभा करतो . ४ वेळा उदाहरण दिले .. जिवंत माणसाची / त्याच्या प्रयत्नांना नाही किंमत आणि अज्ञाताला कुरवाळत बसलेत असेच म्हणावेसे वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
शा वि कु गुरुवार, 02/11/2021 - 10:27 नवीन
विज्ञानवादी असण्याचा आणि विज्ञानातून तयार झालेल्या तंत्रज्ञानाचा गैरवापर यांचा काडीचा संबंध नाही.. . . पण मग हाच न्याय मग धर्माला, दैववादाला किंवा आध्यात्माला लावता येणार नाही का?
मी हाच न्याय लावला आहे माझ्या प्रतिसादात. दैववादी असणे किंवा विज्ञानवादी असणे माणसाला नैतिक किंवा अनैतिक बनवत नसते. तुमच्या देव मानण्यावर आमचे मत तुम्हाला पोटशूळ वाटत असेल, किंवा आम्ही तुम्हाला येडा म्हणतोय असं वाटत असेल तर ती तुमची मर्जी. तुमच्या देव मानण्याचा स्वातंत्र्यावर शंकाच नाहीच. देव आहे असे मानणे हे अतार्किक आहे, असे म्हणण्याचा हक्क नास्तिकाला सुद्धा आहे. जसं राजकीय पक्षाच्या समर्थकांना इतर लोकं वेडे किंवा गुलाम किंवा देशद्रोही किंवा भक्त, किंवा कुठे ना कुठे चुकलेले वाटतात, तसेच आहे हे, ह्यात नवीन काहीसुद्धा नाही. मी जर उद्या उठून म्हणालो, कि ड्रॅगन अस्तित्वात होते, तर चार आस्तिक जमून मला वेडे म्हणतील ह्याचीच शक्यता जास्त आहे. त्यामुळे, जेव्हा एखादी गोष्ट कशी आहे याबद्दल मतभेद असतात, तेव्हा समोरच्या व्यक्तीकडून जजमेंट प्रत्येक वेळेस होतच असते. हे काय फक्त आस्तिक नास्तिक वादात नसते, सार्वत्रिक असते. त्यामुळे केवळ इथेच त्याबद्दल दुःख करण्याची काही गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
R
Rajesh188 गुरुवार, 02/11/2021 - 11:52 नवीन
विज्ञान म्हणजे तरी काय असते स्वतःचा फायदा होण्यासाठी स्वतःच शोध घेण्याचा केलेला प्रयत्न. आता जे शोध लागत आहेत ते फक्त आणि फक्त स्वतःचे आर्थिक हित डोळ्यासमोर ठेवून लागत आहेत आणि त्या साठी त्याच शोधाचे अनिष्ट परिणाम लपवून सुद्धा ठेवले जात आहेत. जेव्हा प्लास्टिक निर्मिती केली तेव्हाच त्याचे अनिष्ट परिणाम सुद्धा माहीत होते तरी ती गोष्ट दस्वताच्या आर्थिक फायद्या साठी लपवून ठेवले गेले . हे अनिष्ट नाही का असे आताच्या प्रतेक शोधा विषयी म्हणता येईल. पण जे शोध आर्थिक फायदा देण्याची शक्यता धूसर असते त्या क्षेत्रात शोध लावण्याचे प्रयत्न च होत नाही . आताचा corona हा साथीचा रोग का आटोक्यात आला नाही कारण व्हायरस वर अभ्यास च झाला नाही त्याला पैसे च पुरवले गेले नाहीत कारण त्या मधून आर्थिक फायदा नाही साथ येईल की नाही यायची ह्याची शास्वती नाही. मग ह्यांची शोधलेली औषध कोण विकत घेणार. मंगळवार जाणाऱ्या माणसाचा पृथ्वी वरील च व्हायरस चा अभ्यास नाही ह्याचा अर्थ काय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु
R
Rajesh188 गुरुवार, 02/11/2021 - 07:22 नवीन
माणूस ही निसर्गाची सर्वोच्च निर्मिती आहे हा गैर समज असल्या मुळे आहे.निसर्ग अपघाताने (सायन्स नुसार ) माणसासारखा बुध्दीमान प्राणी निर्माण करू शकतो तर त्या पेक्षा ही अती बुद्धिवान जीव का निर्माण करू शकत नाही. निर्माण झालाच असला पाहिजे फक्त आपण तो अनुभवू शकत नाही. मुंगी ह्याच ग्रहावर राहते नेहमी संपर्कात असते तिला कुठे माणूस कसा दिसतो हे माहीत असेल आणि कधी माहीत पण पडणार नाही. शेवटी सुश्म रुपात निर्जीव आणि सजीव ह्यांच्या मध्ये काहीच फरक नसतो . निर्जीव आणि सजीव हे मूलद्रव्य रुपात असतात तेव्हा ते एकच पातळीवर असतात. झाडाचे बी हे निर्जीव च आहे कुठे हालचाल करते ते सजीव च्य व्याख्येत बसत नाही. पण अनुकूल वातावरण मिळाले की ते सजीव होते. व्हायरस सुद्धा असेच आहेत जो पर्यंत होस्ट मिळत नाही तो पर्यंत ते निर्जीव च असतात.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा गुरुवार, 02/11/2021 - 07:58 नवीन
धागाकर्ते काडी टाकून गायब झालेत. यनावालांनी डु आयडी घेतला की काय?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/11/2021 - 10:38 नवीन
यनावालांनी देव, श्रद्धा, आस्तिकता, अध्यात्म याविरूद्ध अत्यंत कळकळीने धाग्यांचा पाऊस पाडूनही एकाही मिपाकराचे मतपरिवर्तन झाल्याचे ऐकिवात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/11/2021 - 10:50 नवीन
यनावालांनी देव, श्रद्धा, आस्तिकता, अध्यात्म याविरूद्ध अत्यंत कळकळीने धाग्यांचा पाऊस पाडूनही एकाही मिपाकराचे मतपरिवर्तन झाल्याचे ऐकिवात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 02/11/2021 - 10:02 नवीन
प्रश्न -श्रद्धा व अंधश्रद्धा यात फरक काय? यनावाला- पहिला शब्द दोन अक्षरी आहे व दुसरा चार अक्षरी. इतक्या समर्पक शब्दात आतापर्यंत कुणीही उत्तर दिल नव्हते. पण याचा दुसरा अर्थ की घटनेने श्रद्धा बाळगायचे स्वातंत्र्य दिले आहे म्हणजे अंधश्रध्दा बाळगायचे ही स्वातंत्र्य दिले आहे असा होतो.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु गुरुवार, 02/11/2021 - 10:14 नवीन
झक्कास ! एकदम जबराव उत्तर आहे. आणि पुढचे वाक्यसुद्धा बरोबरच आहे. अंधश्रद्धा बाळगण्याचा पूर्ण हक्क आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/11/2021 - 10:07 नवीन
देवाच्या आहारी जाणे चुकीचे आहे, देवाला आमचा विरोध नाही पण आहारी जाण्यास आहे अशा अर्थाचे अनेकांनी लिहिले आहे. त्यावर काही प्रश्न - १) देवाच्या आहारी जाणे हेच फक्त अयोग्य आहे का दारू, विडीकाडी, बाई, आंतरजाल, वाचन, भ्रमंती, गडरोहण, खेळ, पत्ते वगैरेंच्या आहारी जाणे सुद्धा अयोग्य आहे? २) देवाच्या आहारी गेल्याने कोणाला नक्की कोणता त्रास होतो? ३) देवाच्या आहारी गेल्याने कोणाचेचे काही हक्क हिरावले जातात का? ४) देवाच्या आहारी गेल्याने घटनेच्या एखाद्या कलमाचा भंग होतो का? ५) देवाच्या आहारी जाण्यास घटनेच्या कोणत्या कलमाने बंदी घातली आहे? ६) कोणी देवाच्या आहारी गेल्याने कोणाचे मानसिक स्वास्थ्य विचलित होते का? ७) देवाच्या आहारी जाण्यासाठी समाजाची, पोलिसांची, न्यायालयाची, संसदेची, विधीमंडळाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे का?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 02/11/2021 - 10:45 नवीन
आता तुम्ही इरेला पेटलेलेच आहात तर हि काही उत्तरे देवाच्या आहारी जाणे चुकीचे आहे, देवाला आमचा विरोध नाही पण आहारी जाण्यास आहे अशा अर्थाचे अनेकांनी लिहिले आहे. हो हाच मुद्दा मांडत आहेत काही जन त्यावर काही प्रश्न - १) देवाच्या आहारी जाणे हेच फक्त अयोग्य आहे का दारू, विडीकाडी, बाई, आंतरजाल, वाचन, भ्रमंती, गडरोहण, खेळ, पत्ते वगैरेंच्या आहारी जाणे सुद्धा अयोग्य आहे? हो आहेच कि , अति करणे हे वाईट हे तुम्हाला हि माहित आहे नि आम्हालाही .. उगाच काय मुद्दा घालताय २) देवाच्या आहारी गेल्याने कोणाला नक्की कोणता त्रास होतो? समाजाला काही बाबतीत होऊ शकतो... समाजाच्या मदतीने साज तुम्ही ब्रेन सर्जन झाला आहात तर त्यात काम करणे याची थोडी तरी जबाबदारी असते ना तुमची मग जर "आहारी" गेलात तर समाजाचे नुकसान नाही का? काही अंधश्रदाहळू ( ख्रिस्ती धर्मातील) लस घ्यायला श्रद्धेमुळे विरोध करतात ( नवीन लस नाही लहानपणी दिल्या वर्षानुवर्षे जाणार्या लसूण बद्दल म्हणतोय) ३) देवाच्या आहारी गेल्याने कोणाचेचे काही हक्क हिरावले जातात का? आटा उत्तर सुचत नाही ४) देवाच्या आहारी गेल्याने घटनेच्या एखाद्या कलमाचा भंग होतो का? अहो कसा होईल हा पण श्रद्धेपोटी "नागरिक जीवांवर " चुकीचा परिणाम होऊ शकतो मग ते नामजसाठी रस्ते अडवणे किंवा रात्री बेरात्री पर्यंत गणेश उत्सवात मोठ्याने गाणी वाजवणे ५) देवाच्या आहारी जाण्यास घटनेच्या कोणत्या कलमाने बंदी घातली आहे? काय विचित्र प्रश्न ६) कोणी देवाच्या आहारी गेल्याने कोणाचे मानसिक स्वास्थ्य विचलित होते का? आहारी जाणाऱ्यांचे कि आजूबाजूचंच,, आहारी जनरीचे माहित नाही पण आजुबाजुचंय लोकांना त्रास होऊ शकतो याची उद्धरणे दिली आहेत ७) देवाच्या आहारी जाण्यासाठी समाजाची, पोलिसांची, न्यायालयाची, संसदेची, विधीमंडळाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे का? म्हणजे परत "व्यक्तिस्वातंत्र्य " हा मुद्दा आणताय ना? तर एकाच उत्तर "व्यक्तिस्वातंत्र्यबरोअबर सामाजिक जबाबदारी चे हि भान असावे लागेल " ते कायदा करून लोकांकाह्य डोक्यात घुसवत येत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/11/2021 - 11:18 नवीन
म्हणजे तुमचा एकंदरीत देव, अध्यात्म वगैरेंच्या सार्वजनिककरणाला विरोध आहे. माझा सुद्धा आहे. फक्त देव, अध्यात्म वगैरेच नाही तर सण, समारंभ, पुढाऱ्यांच्या सभा, १५ ऑगस्टला दिवसभर लावलेली गाणी, लग्नाच्या वराती, रस्त्यावर येऊन केलेली आंदोलने, नेत्यांची जयंती/मयंती अशा सर्व उपद्रवी गोष्टींना माझा विरोधच आहे. परंतु या धाग्याचे शीर्षक व लेख हे वैयक्तिक श्रद्धेचा उपहास करणारे आहे, हे मला मान्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
च
चौकस२१२ गुरुवार, 02/11/2021 - 12:22 नवीन
म्हणजे तुमचा एकंदरीत देव, अध्यात्म वगैरेंच्या सार्वजनिककरणाला विरोध आहे गाडी कुठून कुठे नेताय गुरुजी आता मी हो म्हणले तर तुम्ही अर्थ लावणार कि म्हणजे माझा काय गणपतीउत्सवाला विरोध आहे का! सर्वसकट धार्मिक सणांना आणि त्याच्या सार्वजनिक साजराकरण्याला आहे .. असे अजिबात नाही ..सार्वजनिककरण हा एक भाग झाला .. त्यातील अति पणा नको यावर बहुतेक श्रवणचे एकच मत आहे ... माझ्य सर्व प्रतिक्रिया वाचल्यास तर हे लक्षात येईल कि माझा विरोध हा आपल्या श्रद्धेमुळे जवळच्या श्राद्धाळु वैगरे नसलेललंय व्यक्तीला हेटाळणे (प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष ) याला आहे अजून काही वेगळं अर्थ कृपया काढू नका असो एवढे बोलून मी माझे २०० शब्द पुरे करतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
च
चौकस२१२ गुरुवार, 02/11/2021 - 12:22 नवीन
म्हणजे तुमचा एकंदरीत देव, अध्यात्म वगैरेंच्या सार्वजनिककरणाला विरोध आहे गाडी कुठून कुठे नेताय गुरुजी आता मी हो म्हणले तर तुम्ही अर्थ लावणार कि म्हणजे माझा काय गणपतीउत्सवाला विरोध आहे का! सर्वसकट धार्मिक सणांना आणि त्याच्या सार्वजनिक साजराकरण्याला आहे .. असे अजिबात नाही ..सार्वजनिककरण हा एक भाग झाला .. त्यातील अति पणा नको यावर बहुतेक एकच मत आहे ... माझ्य सर्व प्रतिक्रिया वाचल्यास तर हे लक्षात येईल कि माझा विरोध हा आपल्या श्रद्धेमुळे जवळच्या श्राद्धाळु वैगरे नसलेललंय व्यक्तीला हेटाळणे (प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष ) याला आहे अजून काही वेगळं अर्थ कृपया काढू नका असो एवढे बोलून मी माझे २०० शब्द पुरे करतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/11/2021 - 12:44 नवीन
श्रद्धाळूने अश्रद्धाळूंची हेटाळणी करणे अयोग्य आहे. अश्रद्धाळूंनी सुद्धा श्रद्धाळूंची हेटाळणी करणे (अंधश्रद्धा, अवैज्ञानिक वगैरे उल्लेख करून) अयोग्यच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
प
प्रकाश घाटपांडे Fri, 02/12/2021 - 11:05 नवीन
http://misalpav.com/node/46501
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 02/12/2021 - 12:42 नवीन
डॉ. अवचट, डॉ. दाभोळकर, पु ल देशपांडे हे नास्तिक असले व त्यांचे काही विचार पटत नसले तरी त्यांनी आस्तिकांची निर्भत्सना, टवाळी वगैरे केली नाही. त्यांच्याबद्दल आदर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
च
चिगो गुरुवार, 02/11/2021 - 10:57 नवीन
लेख आवडला.. काहीतरी नवीन वाचल्याचेदेखील समाधान लाभले. लेखनखुण साठवली आहे.
वाघ आहे हा गैरविश्वास (श्रद्धा) आपलं फारसं काही बिघडवत नाही पण वाघ नाही असा फाजील विश्वास जीवावर बेततो. आपल्या पूर्वजांच्या लाखो वर्षाच्या अतूट साखळीचे आपण वारसदार. आपले पूर्वज सावधपणे वागले, नसलेल्या वाघोबालासुद्धा घाबरले, म्हणून आपण आहोत. थोडक्यात आपण सारे, अतीसावध, सतत वाघोबा शोधणाऱ्या, मेंदूंचे वारस (Hyperactive Agency Detection) आहोत. त्यामुळेच जिथेतिथे, ज्यातत्यात आपण वाघोबा शोधत असतो. निसर्गात वाघोबा क्वचित आणि वाऱ्याची सळसळ अधिक. पण आपल्या मेंदूला निरनिराळी टिंब जोडून वाघोबाचं संगतवार चित्र जुळवायची खोड आहे.
हे मार्मिक आहे. 'मानल्याने काही बिघडते का?' हा आयुर्वेदीक औषधांप्रमाणेच (घेतलं तर फायदाच आहे, नुकसान काहीच नाही) बहूतेक जनतेचा 'च्यवनप्राश अप्रोच' असतो धर्माच्या बाबतीत. माझ्यामते धर्म आणि देव मानण्याचे फायदे आहेत म्हणून बहुतांश लोक तसे मानतात. (ह्यावर लेखकाने लहीलेले आहेच.) It's a matter of immense convenience and benefits. आता समजा कि मी देव मानत नाही, तर मग मला कळपाचा भाग असण्याचे जे काही फायदे आहेत जसं की परस्पर-सहचर्य, सणासुदीत मनापासून रमणं, त्यातील कर्मकांडातील जो काही आनंद असेल तो मिळवणं, कर्मकांड स्पेशल चविष्ट खाणं हे मनापासून एन्जॉय करायला मिळणार नाही. मला नकोश्या असलेल्या घटना घडल्या तर त्याची जवाबदारी कुठल्यातरी देवाव/बाबा/अम्मावर टाकून निश्चिंत होऊन बसण्यापेक्षा, वाढत्या रक्तदाबाला सामोरं जावं लागेल. माझ्या प्रिय व्यक्तिचा मृत्यु झाल्यास 'ही/शी इज इन अ बेटर प्लेस' किंवा तो/ती आता देवाच्या प्रेमळ सहवासात किंवा स्वर्गात आहे, किंवा पुढच्या जन्मात ती तुला पुन्हा भेटेल असल्या दिलास्याऐवजी त्या व्यक्तिच्या कायमच्या शारीरीक तसेच भासात्मक दुराव्याला तोंड द्यावं लागेल. त्याविरुद्ध जर मी देव आणि धर्म मानला, तर मला त्याचे फायदेच आहेत. समजा माझ्या सुदैवाने माझा जन्म एखाद्या वरच्या जातीत, पुरुष म्हणून झाला, तर त्या जातीचे आणि लिंगाचे जे धर्ममान्य आणि त्यायोगे समाजमान्य जे फायदे आहेत, ते मला मिळतात. मग मला मिळालेल्या जन्मामागे कुठलीही पुर्वपिठीका नसून तो केवळ माझ्या मात्यापित्यांच्या लैंगिक मिलनाचा परीणाम आहे, हे दुर्लक्षित करुन privileges चा फायदा करुन घेता येतो. त्याप्रमाणे धर्मसत्ता नावाची बंदूक चालवून आपल्या धर्मदत्त प्रिव्हीलेजेसद्वारा दुसर्‍यांना पिळता येतं. देवस्थानाची जमीन व संपत्ती ही जणू देवानेच त्यांना बांधून/ लिहून दिली आहे, व त्यावर मानव-निर्मित संस्थांचा कसलाही हस्तक्षेप चालणार नाही, असा आपमतलबी स्टॅन्ड घेता येतो. जर दुर्दैवाने जन्म एखाद्या मागासलेल्या जातीत झाला तर 'देवाची मर्जी ब्वॉ' म्हणून जन्म कंठता येतो. ही अशीच लांबड लावता येईल. सांगायचा मुद्दा म्हणजे देव/धर्म मानणे हे स्वतःच्या आणि स्वकीयांच्या फायद्याचे असते म्हणून बव्हांश लोक तो मानतात. जे थोडे मानत नाहीत, त्यांना 'तुम्ही जास्तच शहाणे समजता स्वत:ला / प्रचिती आली म्हणजे कळेल/ देवाची काठी वाजली कि मग कळेल' इत्यादी डायलॉग्सद्वारे समोरच्या व्यक्तिच्या ताकदीनुसार सौम्य वा कडक समज दिली जाते. शेवटी नास्तिक आणि आस्तिक आपआपला खेळ खेळत राहतात. - नास्तिकतेकडे मार्गबद्ध, चिगो
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Fri, 02/12/2021 - 02:55 नवीन
सांगायचा मुद्दा म्हणजे देव/धर्म मानणे हे स्वतःच्या आणि स्वकीयांच्या फायद्याचे असते म्हणून बव्हांश लोक तो मानतात.
अगदी बरोबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
श
श्रीगुरुजी Fri, 02/12/2021 - 04:50 नवीन
सांगायचा मुद्दा म्हणजे देव/धर्म मानणे हे स्वतःच्या आणि स्वकीयांच्या फायद्याचे असते म्हणून बव्हांश लोक तो मानतात. मी माझ्यापुरतं सांगतो. देव ही कल्पना नसून सत्य आहे याचे काही व्यक्तीगत अनुभव आहेत. अध्यात्ममार्गाने मला आनंद व मानसिक शांती लाभते. देव/धर्म मानत नाही असे जाहीर करीत राहून जाहिरात करीत राहणे हे सुद्धा हे स्वतःच्या आणि स्वकीयांच्या फायद्याचे असते म्हणून तथाकथित नास्तिक तसे करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
च
चौकस२१२ Fri, 02/12/2021 - 05:03 नवीन
देव/धर्म मानत नाही असे जाहीर करीत राहून जाहिरात करीत राहणे हे सुद्धा हे स्वतःच्या आणि स्वकीयांच्या फायद्याचे असते हो कसला डोंबलाचा फायदा? जे मला सिद्ध करीत येत नाही किंवा जे इतरांनी सिद्ध केलेलं आहे याचा ठोस पुरावा नाही त्याची भलावण मी कशी करेन? तुम्ही मात्र "काही व्यक्तीगत अनुभव आहेत. " म्हणता पण काय प्रत्यक्ष ते सांगत नाही... सगळंच गौड्गाम्बल "अनुभूती झाली..." काय कपाळ सिद्ध करणार... याउलट साधी भौतिक शास्त्राची गोष्ट घ्या " उतारावर गोष्ट घसरू शकते ती किती घसरेल हे २-३ गोष्टींवर अवलंबून असते " हे प्रयोगाने सिद्ध करता येते आता परत "मला शांतता मिळते तुम्हला काय त्याचे" किंवा "घटनेने बंदी आणली आहे का " असली विधाने करू नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 02/12/2021 - 05:26 नवीन
प्रचंड फायदा आहे की. पुरोगामी, विचारवंत, विज्ञानवादी आशी समविचारींकडून प्रमाणपत्रे मिळतात. माध्यमातून प्रसिद्धी मिळते. देवाला रिटायर करा असले लेख पाडता येतात. समविचारींच्या टोळीत प्रवेश मिळतो. झोडपायला अनेक पर्याय उपलब्ध होतात. गेलाबाजार थुकरटवाडी जागतिक साहित्य संमेलनासारख्या समारंभात मानाचे पान मिळते. अजून काय पाहिजे? परंतु जंग जंग पछाडून सुद्धा यांना एक गोष्ट अजूनही साध्य झालेली नाही व ती कधीच साध्य होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
उ
उपयोजक Fri, 02/12/2021 - 06:11 नवीन
संभव असंभव या नावाचं निरंजन घाटे यांचं पुस्तक आहे.ते फक्त एकदा वाचून पहा. https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5204425155696328227?BookName=Sambhav-Asambhav
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
च
चिगो Fri, 02/12/2021 - 07:36 नवीन
अध्यात्ममार्गाने मला आनंद व मानसिक शांती लाभते. देव/ धर्म मानण्याचा हा फायदाच झाला की तुम्हाला.. मी तेच तर म्हणतोय. मी तर मान्यच करतोय की देव मानण्याचे फायदे (मानसिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय इ.इ.) हे नास्तिकतेऐवजी तुलनात्मकरित्या जास्तच आहेत. It’s well ingrained in our psyche and society. Majority rules!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
R
Rajesh188 गुरुवार, 02/11/2021 - 11:06 नवीन
समाजात जे कमजोर लोकांवर अन्याय करणारे असतात. म्हणजे जमीन हाडपणे. काम करून घेवून त्याचा पगार न देणे. पैसे लुबडणे. विनाकारण मारझोड करणे . विविध अत्याचार करणे. अशा वेळी तो कमजोर व्यक्ती आस्तिक असेल तर असा विचार करेल देव बघून घेईल त्याला नक्की च देव त्याच्या पापाची शिक्षा देईल. हा विचार पुढील खून खराब टाळतो . देव नाहीच म्हंटल्यावर शिक्षा कोण देणार. ती स्वतः च द्यावी लागेल असा विचार मनात आला तर खून पडण्याचे प्रमाण नक्कीच वाढेल. अन्याय करणाऱ्या व्यक्ती ला जीवन नाकारणे हाच त्या वर न्याय असतो. त्याच्या विरुध्द अन्याय करणारे सांड पण विचार करतात आपण पाप करतोय देव आपले वाईट करेल आणि तो थोडा आटोक्यात येतो.
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत गुरुवार, 02/11/2021 - 11:33 नवीन
म्हणजे भगवान असे जर म्हटले तर प्रत्येक जण स्वतःला भगवान म्हणू शकतो ! मग भगवान विज्ञानवादी असु दे, नास्तिक असु दे नाहीतर आस्तिक असु दे, वी आर दॅट !बिकॉज दॅट ईज एवरिथिंग ! तो, हमे भगवान जैसा जीना है जो हम भूल गये है !
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 02/11/2021 - 12:21 नवीन
वेल्कम ब्याक! बर्‍याच दिवसांनी परत आलात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उन्मेष दिक्षीत
उ
उन्मेष दिक्षीत गुरुवार, 02/11/2021 - 12:59 नवीन
संक्षींचा आय डी ब्लॉक झाल्यामुळे वैयक्तीक निषेध मोड मधे होतो ! तसंही माझं इथलं काँट्रिब्युशन नगण्यच आहे, तरीही थँक्स !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
म
मदनबाण गुरुवार, 02/11/2021 - 14:01 नवीन
नारायण नारायण !!! मृत्यू लोकात मर्त्य मानव अजुन गुरुत्वाकर्षण कसे उत्पन्न होते किंवा गुरुत्वाकर्षण म्हणजे नक्की काय हे समजु शकला नाही, तर यांना परमेश्वर कसे समजणार ? ;) असो... याच मृत्यू लोकात घडलेली कथा हिंदी भाषेत कॉपी पेस्ट करुन इथे देउन जातो. बोध घेणारे घेतीलच. :) अजमेर के सुप्रसिद्ध मेयो कालेज के प्रथम छात्र रहे राजा मंगल सिंह अलवर के पांचवे महाराज थे। सन्यास लेने के बाद 7 फरवरी 1891 को स्वामी विवेकानंद पहली बार अलवर आए थे। उन्होंने 31 मार्च 1891 तक यहां के अलग-अलग स्थानों पर प्रवास किया था। वर्तमान में जहां विवेकानंद चौक है, कभी वहां विशाल टीला था। स्वामी विवेकानंद इसी टीले पर बैठकर प्रवचन सुनाते थे। महाराज मंगल सिंह के दीवान कर्नल रामचंद्र भी यहां प्रवचन सुनने के लिए आया करते थे। ओजस्वी प्रवचनों की अहमियत दीवान के माध्यम से राजा तक पहुंची। इसके बाद राजा ने उन्हें शहर में आने के लिए आमंत्रित किया। मुलाकात के दौरान जब राजा ने स्वामी जी से कहा की मूर्तिपूजा मे उनका कोई विश्वास नहीं है और वे लकड़ी , पत्थर ,पेड़ या धातु की पूजा नहीं कर सकते। इसके उत्तर मे, स्वामी जी ने राजा की एक तस्वीर लाने के लिए कहा। उस तस्वीर को हाथ मे रखकर स्वामी जी ने राजा के दिवान से उस तस्वीर पर थूकने को कहा। दिवान ने स्वामी जी से कहा , यह हमारे महाराज की तस्वीर है। मे ऐसा नहीं कर सकता हूँ। तब स्वामी जी राजा से बोले ,"देखिये महाराज ,यद्यपि आप इस तस्वीर पर मे मौजूद नहीं है ,तो भी आपका सेवक इसमें आपकी छाया देखता है। यह तस्वीर मात्र कागज की बनी है ;परन्तु आपके सेवक इसे श्रद्धा की द्रष्टि से देखते है क्यूकि इसके द्वारा उन्हें आपका स्मरण होता है। राजा से स्वामी जी ने कहा , "स्वामी जी आजतक मैंने मूर्तिपूजा का अर्थ नहीं समझा था। आपने मेरी आँखे खोल दी। जाता जाता :--- २०० प्रतिसाद झाल्यावर मी परत इथे चक्कर टाकीन, तोवर तलातल लोकात भ्रमण करुन यावे म्हणतो. नारायण ! नारायण !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chinese Sabotage – DRDO scientist studying Uttarakhand floods
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक गुरुवार, 02/11/2021 - 17:22 नवीन
या कलर्स मराठीवरच्या मालिकेत एका श्रीमंत कुटूंबाला मुलगा दत्तक घ्यायचा असतो.एक गरीब कुटूंब त्यांची १२ वर्षाची मुलगी मुलग्यासारखी कपडे घालून मुलगा म्हणून दत्तक देते.आता स्वामी समर्थ ते पितळ उघडे पडू नये म्हणून चमत्कार करुन त्या मुलीचा मुलगा बनवणार आहेत म्हणे!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/11/2021 - 17:42 नवीन
बरं मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
च
चौकस२१२ Fri, 02/12/2021 - 02:21 नवीन
ह्याला म्हणतात अरेरावी प्रतिसाद.. श्रीगुरुजी अहो ते काय दाखवून देता आहेत ते बघाना.. काय काल्पनिक भोंदूगिरी दाखवली जाते आणि लोक त्याला कसे भुलतात याच्या बद्दल म्हणत आहेत ते! जाऊद्या तुंहाला नुसतेच अरे ला कारे करायचे आहे असे दिसते आहे अमुक अमुक स्वामींनी म्हणे असेल दैवी चमत्कार केला (किंवा ख्रिस्ती धर्मगुरू ने लुळ्याला बरे केलं ) ... अहो कोण बघायला गेलाय आणि त्याचा उपयोग काय आज करून दाखवा आणि तशी शक्ती असेल तर हवेतून विभूती आणि माला निर्माण करण्यापेक्षा ४ नांगर, १० फेस मास्क आणि २ कॅट स्कॅन मशीन बनवून दाखवा आणि राजेश भाऊ हो सक्ती कोणीच कोणाला केली नाहीये मूळ मुद्दा सोडून असला काहीतरी भरकटायचा तर तुमचं जवळ जवळ प्रत्येक लेखांतून दिसतंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 02/12/2021 - 04:43 नवीन
अज्ञान ते हेच. मालिका, चित्रपटासारख्या संपूर्ण काल्पनिकाधारी कथेवरील प्रसंगांवर हळहळ, दु:ख, आनंद वगैरे भावनांचे प्रकटीकरण करीत राहणे अत्यंत हास्यास्पद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
स
सौंदाळा Fri, 02/12/2021 - 04:55 नवीन
हेच म्हणतो, साय फाय चित्रपटांमध्ये सुद्धा असल्या अतर्क्य गोष्टी दाखवत असतात. असल्या उथळ प्रकाराला गंभीरपणे घ्यायची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 02/12/2021 - 05:19 नवीन
ही माणसे दोरीला साप साप म्हणून धोपटत राहतात आणि आपण साप मारला म्हणून समविचारींकडून पाठ खाजवून घेतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
श
शा वि कु Fri, 02/12/2021 - 06:49 नवीन
साय फाय मधल्या फाय चा अर्थ आहेफिक्शन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
श
श्रीगुरुजी Fri, 02/12/2021 - 09:34 नवीन
जनू बांंडेचे चित्रपट, टर्मिनेटर चित्रपटांंची मालिका, स्टार वॉर्स चित्रपटांची मालिका, कालयंत्र असलेले चित्रपट, स्टार ट्रेक मालिका अशा तथाकथित वैज्ञानिक चित्रपट/मालिकातून अशाच अतर्क्य गोष्टी असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
च
चौकस२१२ Fri, 02/12/2021 - 10:45 नवीन
वैज्ञानिक चित्रपट/मालिकातून अशाच अतर्क्य गोष्टी असतात. हे चित्रपट वैन्यानिक तथ्य आहे असे नास्तिकांचे मानणे असते असे सुचवताय कि काय? फिक्शन चा अर्थ माहित आहे ना कुठला हा तर्क ! धन्य आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
उ
उपयोजक Fri, 02/12/2021 - 06:13 नवीन
सदर प्रसंग/घटना स्वामी समर्थांच्या चरित्रातसुद्धा लिहिलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 02/12/2021 - 09:31 नवीन
बरं मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
R
Rajesh188 गुरुवार, 02/11/2021 - 18:13 नवीन
सक्ती नी ती मालिका बघायला सांगितली आहे का? नाही पटत तर बघू नका ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा