करोनाची लस : एक थोतांड
नमस्कार लोकहो!
करोना नामे मायावी थोतांड चालूच आहे. मायावी अशासाठी म्हंटलंय की पूर्वी एका मायावी राक्षसाच्या रूपातनं दुसरा राक्षस जन्म घ्यायचा, त्याचा धर्तीवर करोना या पहिल्या थोतांडातनं लस नावाचं दुसरं थोतांड उत्पन्न होतंय. आजवर कोणत्याही लशीने कुठल्याही रोगांची साथ आटोक्यात आलेली नाहीये. हां, लशीमुळे रोग नाहीसा होतो असा सार्वत्रिक भ्रम प्रचलित आहे. कारण की भरपूर प्रमाणावर तसा प्रचार केला गेलाय.
या बाबतीत आपल्याला दोन नेते जाम आवडले. मोदींनी मुखपट्टी उघडपणे नाकारली तर राज ठाकऱ्यांनी तिच्यासंबंधी भीडमुर्वत बाळगली नाही.
डॉक्टर सुझन हम्फ्रीज या अमेरिकेतल्या खऱ्याखुऱ्या म्हणजे मेडिकल डॉक्टर असून पेशाने मूत्रपिंडतत्ज्ञा आहेत. त्यांनी लशींकरणाविषयी प्रचंड शोधाशोध करून माहिती मिळवून २०१३ साली एक पुस्तक लिहिलं आहे. पुस्तकाचं नाव : Dissolving Illusions - Disease, Vaccines, and The Forgotten History (2013) by Suzanne Humphries MD. हे पुस्तक येथे उपलब्ध आहे :
१. https://www.amazon.in/Dissolving-Illusions-Disease-Vaccines-Forgotten/dp/1480216895
२. https://www.amazon.co.uk/Dissolving-Illusions-Disease-Vaccines-Forgotten/dp/1480216895
हे पुस्तक लिहितांना डॉक्टरबाईंनी रोमन बिस्त्रियांक या विदातत्ज्ञाची मदत घेतली आहे. सदर लेख या पुस्तकाची तोंडओळख करवून देण्यासाठी लिहिणार होतो. पण थोडं लिहिल्यावर कळलं की पुस्तकपरिचय हा आपला प्रांत नव्हे. मग म्हंटलं की सरळ सारांशच लिहून टाकूया. माझ्यासारख्या आळश्याला तेव्हढंच जमण्यासारखं आहे.
तर आता मुद्द्याकडे वळूया.
प्रकरण १ : गेले ते दिन गेले ( एकदाचे ) ....
हे प्रकरण १९ व्या शतकातल्या ( म्हणजे इ.स. १८०० चं शतक ) जुन्या जमान्यातील सामान्य माणसाच्या आरोग्य अवस्थेचं किंवा अनावस्थेचं वर्णन करतं. गरीब माणसाचं सरासरी आयुर्मान १५ ते १६ वर्षं होतं. ते इतकं कमी असण्याचं कारण साथीचे रोग हे होतं. इंग्लंडमध्ये रोगांच्या साथी नेमेची येत असंत. भरीस भर म्हणून दाटलेली वस्ती व अंधारी घरं अशा रोगट वातावरणात रोग फोफावायला उत्तेजन देत. शिवाय अन्नपाण्याची ददात होतीच. पोषक अन्न केवळ उच्चभ्रू लोकांच्या मुलांनाच मिळे. पाणीही अशुद्धच प्यावं लागंत असे. संडास व पिण्याचं पाणी एकत्र होणं सर्वसामान्य बाब असे. घोड्याची लीद, डुकराचं प्रेत व खाण्याची टपरी लंडनच्या रस्त्यावर सुखेनैव एकत्र नांदत. वा न्यूयॉर्कमध्ये रोगट डुकरांचं मांस गरीब लोकांना बिनधास्तपणे विकलं जाई.
प्रकरण २ : बालकांची हलाखी ....
या प्रकरणांत १९ व्या शतकातल्या ( म्हणजे इ.स. १८०० चं शतक ) गरीब कुटुंबातल्या बालकांची हलाखीची स्थिती वर्णिलेली आहे. त्यांना दिवसाचे बाराबारा तास मजुरी करावी लागे व पगार जेमतेम खाण्यापूरता मिळे. अगदी मुलीसुद्धा खाणीसारख्या प्राणघातक जागेत बिनदिक्कीतपणे कामाला जुंपल्या जात. तिसाव्या वर्षापर्यंत कोणी जगली तर ती अपवादात्मक घटना असे. पारा, शिसे, आर्सेनिक वगैरे विषारी पदार्थांशी बालकांचा संपर्क येणे ही एक किरकोळ बाब असे. जखमा व दुखापती नित्याच्याच असंत.
जगातल्या सर्वात श्रीमंत राष्ट्र असलेल्या अमेरिकेत दरवर्षी २,५०,००० बालकांचा कुपोषणाने मृत्यू होई. बालकामगार ठिकठिकाणी असले तरी बालकामगार हा शब्द मात्र आजून अस्तित्वात यायचा होता. अतीव व जीवघेण्या श्रमांतनं सुटायचा मार्ग नव्हता. मग कष्टांचा विसर पाडण्यासाठी व्यसनांचा आधार घेतला जाई. त्यामुळे तब्ब्येत अधिकंच खराब होई. ऐन वाढीच्या वयांत व्यसनं केली की प्रजनन व आयुर्मान यांवर विपरीत परिणाम होई.
प्रकरण ३ : रोग हा नियम तर निरामय जीवन हा अपवाद
रोग हा आयुष्याचा अविभाज्य घटक कसा होता, ते या प्रकरणांत सांगितलं आहे. औद्योगिक क्रांतीमुळे गावं ओस पडून शहरांत अनियोजित व प्रचंड गर्दी झाली होती. शहरी जागामालकांनी नफ्यावर डोळा ठेवून श्रमिकांसाठी अतिशय दाटीवाटीने निवासालये बांधली. तिथे राहायची व्यवस्था अत्यंत अस्वच्छ असे. हे रोगांना आमंत्रण असे. रोगांच्या साथीत माणसं आषाढी माश्यांसारखी टपाटप ( की पटापट ? ) मरून पडायची. मलनि:सारण यंत्रणा नामक प्रकार अस्तित्वात नसल्याने विषमज्वर ( = टायफस ), पटकी ( = कॉलरा ), हगवण वगैरेंची सतत मांदियाळी असे.
रोग्यांना हाताळण्याच्या आधी डॉक्टर व परिचारिका यांनी स्वत: निर्जंतुक होणं १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरु झालं. वैद्यकीय क्षेत्राची काय अवस्था होती ते कळलं ना ? पुढे अनेक रोगांनी उडवलेल्या हाहाकाराच्या कहाण्या दिल्या आहेत. किमान स्वच्छता पाळल्याने लागणीचं प्रमाण कसं झपाट्याने घसरू लागलं ते ही दिलं आहे.
लशीमुळे कुठलाही जीवघेणी साथ आटोक्यात आली नाही. या साथी मंदावल्या त्या किमान स्वच्छता पाळल्याने.
प्रकरण ४ : देवीचा रोग व पहिली लस
देवीच्या लशीने माणसं कशी मेली, ते या प्रकरणात सांगितलं आहे. रोगापेक्षा औषध भयंकर. कारण की लस तयार करतांना लागण झलेला विषाणूत फेरफार ( = म्युटेशन ) होत असे. हा फेरफार हाताळायचा निश्चित मार्ग कोणाकडेही नव्हता. सब घोडे बारा टक्के या हिशोबाने एकंच लस सरसकट सर्वांना दिली जाई. परिणामी एकाच आजाराचे वेगवेगळे विषाणू निर्माण झाले. वेल डन. इ.स. १७५० च्या सुमारास ज्या लशी विकसित झाल्या त्या गोऱ्यांपेक्षा काळू लोकांना जास्त हानीकारक होत्या. हा मुद्दाही चर्चेत घेतला पाहिजे. १९०८ च्या सुमारास लशींमुळे मिळणारं संरक्षण तात्पुरतं असतं हे लक्षांत आलं.
लान्सेट जर्नलने डॉक्टर जेन्नरच्या देवीच्या लशीवर रोचक टिपणी केली आहे. त्यानुसार ही लस गाईच्या सडांपासून विकसित केलेली नसून घोड्याच्या पुळीपासनं मिळवलेली होती. ही लस नंतर गाय, माणूस व इतर पशूंतून फिरवण्यात आली. आजच्या घडीला देवीची लस म्हणून जे काही आहे ते नैसर्गिक नसून कृत्रिम एजंट आहे. तरीही जेन्नरला देविच्या लशीचा संशोधक म्हणून जगभर मान्यता मिळाली आहे. तत्कालीन डॉक्टरांनी लगेच दाखवून दिलं की गाईच्या सडांपासून लस मिळालेल्या अनेकांना नंतर देवी आल्या होत्या.
या परिस्थितीत दयाळू इंग्रज सरकारने इंग्लंडात जबरदस्तीने लशी टोचवल्या. परिणामी लशींच्या या कृत्रिम हस्तक्षेपामुळे देवी रोगाची साथ अधिक तीव्र झाली. १८४४ ला लंडन च्या देवीच्या रुग्णालयात १७८१ पेक्षा जास्त रोगी दाखल झाले. रोगापेक्षा लस भयंकर ठरली. बोस्टन (इंग्लंड) मध्ये सुमारे ४० वर्षं नाहीसा झालेला देवीचा रोग लशी टोचल्यावर परत उफाळून आला. पुढे लशीकरणामुळे निर्माण झालेल्या नवीन रोगांची व मृत्यूंची महिती दिलेली आहे.
प्रकरण ५ : दूषित लशी
रोगजंतूंमुले रोग होतात हे मत स्वीकारलं जाण्यापूर्वी दूषितत्वाचं मोजमाप केलं गेलं नव्हतं. त्यामुळे जंतुसिद्धांतावर ( = Germ Theory वर ) प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. नंतर खूर असलेल्या जनावरांना होणारा मुखपादरोग दूषित लशींमुळे माणसांना कसा होऊ लागला याची सुरस व चमत्कारिक कहाणी वर्णिलेली आहे.
प्रकरण ६ : भली थोरली निदर्शने
एका बापाचं पहिलं मूल लशीमुळे मेलं होतं. साहजिकंच त्याने दुसऱ्या मुलाच्या लशीकरणाला विरोध केला. त्याबद्दल बापाला तुरुंगात पाठवलं गेलं. कित्ती सुंदर न्याय !
या प्रकरणात इंग्लंडमधल्या लेस्टर ( = Leicester ) नगरात लोकांनी लशीकरणाच्या थोतांडाविरुद्ध कसा लढा दिला ते सांगितलंय. लोकांना लशीकरण नको होतं कारण लहान बालकांचे भयानक हाल व्हायचे. कोण आई आपल्या तान्ह्या मुलाला सरकारी कसायांच्या तावडीत सोपवेल ?
आर्थर वॉर्ड गरीब मजूर होता. त्याची पहिली दोन मुलं लशीमुले जखमी झाली होती. त्याने तिसऱ्यास लस टोचायला नकार दिला. त्यामुळे सरकारी कसाई त्याच्या घरी पोहोचले. तो घरी नव्हता तर त्याच्या पोटुशा बायकोला धमक्या देऊन दंड भरायला लावला. तिच्याकडे पैसे नव्हते व घरातली चीजवस्तू दंडमूल्याची भरपाई इतकी नव्हती. तिला कसाई खेचडत तुरुंगात घेऊन गेले. त्यामुळे तिच्या मुदतपूर्व प्रसूतीतून मृत बालक जन्मलं. आवडली तुम्हाला कथा ?
लेस्टरचे लोकं देवीच्या लशीचा जनक डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांस बालहत्यारी म्हणायचे.
प्रकरण ७ : चाकोरीबाह्य प्रयोग
देवीच्या रोगाविरुद्ध लेस्टर नगरात उदयाला आलेली अलगीकरणाची पद्धत ( = quarantine ) कशी होती ते या प्रकरणात वर्णिलेलं आहे. देवीची लस टोचण्याऐवजी अलगीकरण हा उपाय बराच प्रभावशाली होता. डॉक्टर मिलर्ड यांनी १९१० साली निष्कर्ष काढला की अर्भकांना दिलेल्या देवीच्या लशीमुळे रोगफैलाव कमी झाला नाही. सक्तीची लसटोचणी आजिबात समर्थनीय नाही.
पण सरकारी कसायांनी घबराट माजवली की कधीतरी मोठ्ठी साथ येणार. तशी साथ कधीच आली नाही. उलट लेस्टर मधली देवीच्या रोग्यांची संख्या लशीकृत झालेल्या उर्वरित इंग्लंडच्या मानाने काबूत राहिली होती.
लस म्हणजे जणू अमृत आहे असा अपप्रचार धूमधडाक्याने केला जातो. प्रत्यक्षात लस हे एक थोतांड आहे. लेस्टर पद्धत नंतर युगोस्लाव्हियात १९७२ साली वापरण्यात आली.
प्रकरण ८ : सरकारी दडपशाही
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस व विसाव्या शतकाच्या सुरुवातीस इंग्रज सरकारने इंग्लंडमध्ये लसटोचणीच्या सक्तीच्या मोहिमा राबवल्या. भले बालकं मरोत अथवा जायबंदी होवोत. पर्यायी वैद्यकीय दृष्टीकोनास अर्थातंच केराची टोपली दाखवण्यात आली. या मोहिमांना न्यायालयाचाही पाठींबा मिळे. जो नागरिक या सक्तीस विरोध करेल त्यास दंड, जप्ती, इत्यादिस सामोरे जावे लागे. अमेरिकेतही अशी प्रकरणे घडली.
त्या वेळेस युजेनिक्स नामक दुर्बलोच्छेदक शास्त्र जाम प्रचलित होतं. लस घेतलेल्यावर त्रास होणारे लोकं जगण्यास नालायक आहेत असा युजेनिक्सचा सिद्धांत असल्याचं लोकांनी मनावर घेतलं. मानसिक दृष्ट्या अस्थिर लोकांचं निर्बीजीकरण करण्यात येत असे. त्याच धर्तीवर लस न घेतलेल्यांचे निर्बीजीकरण करण्यात येईल अशी भीती व्यक्त होत असे. युजेनिक्स ( = दुर्बलोच्छेदन ) आणि सक्तीची लसटोचणी यांचा घनिष्ट संबंध आहे. नाझी राजवटीत युजेनिक्स ला राजमान्यत्व लाभलं होतं.
प्रकरण ९ : आर्थर स्मिथ या बालकाची यातनामय कहाणी
या यातना आर्थर स्मिथ नामे ११ वर्षीय बालकाला झालेल्या आहेत. ही लशीच्या दुष्परिणामांची कहाणी आहे. तो कसाबसा वाचला खरा, पण अंगावर डाग पडले ते कायमचे. काही बालकं इतकी सुदैवी नव्हती. त्यांच्याही कहाण्या या प्रकरणांत आहेत.
प्रकरण १० : आरोग्यक्रांती
गटाराचं पातळलेलं पाणी हे प्रमुख पेय नसेल तर आरोग्य सुधारणार नाही काय ? या प्रकरणात वैयक्तिक व खासकरून सार्वजनिक स्वच्छतेमुळे आरोग्य कसं सुधारलं ते वर्णिलेलं आहे. गलिच्छपणामुळे रोग होतात हे १९ व्या शतकाच्या मध्यात युरोप-अमेरिकेच्या जणू गावीच नव्हतं. धारणा बदलल्याने हळूहळू आरोग्यात वाढ होत गेली. अर्थात, झोपडपट्टीदादांनी स्वच्छतेच्या सुधारणांना विरोध केलाच. कारण झोपडपट्ट्यांपासनं त्यांचा फायदा होत होता. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात लंडनमध्ये हळूहळू मलनि:सारण सुविधा उभारण्यात आल्या. जलकक्ष म्हणजे water closet म्हणजे WC ही संज्ञा उदयास आली. त्याआधी मानवी विष्ठा कुठेही टाकली जायची. २० व्या शतकाच्या पहिल्या दशकांत ( म्हणजे १९०० सालच्या आसपास ) हे जलकक्ष लंडन पालिकेच्या गटारांना जोडले जाऊ लागले. आज आपण युरोप-अमेरिका-भारत इत्यादी देशांच्या शहरांत जी गटारव्यवस्था पाहतो ती केवळ शंभर सव्वाशे वर्षंच जुनी आहे.
दुधाचं पाश्चरीकरण सुरु झालं. त्यमुळे बालमृत्यू प्रचंड प्रमाणावर उणावले. याखेरीज इतर सामाजिक सुधारणाही राबवल्या जाऊ लगल्या. उदा. : किमान वेतन, नोकरीच्या जागी सुरक्षितता नियम, बालकांची पिळवणुकीविरुद्ध कायदा, इत्यादि. त्यामुळे जीवनमान ( life standard) उंचावलं.
या सर्व सुधारणांत लशीचं योगदान नगण्य होतं. पण हवा अशी केली गेली की लशीमुळे म्हणे रोग नाहीसे होतात.
प्रकरण ११ : साथीच्या रोगांत आश्चर्यजनक घट
अमेरिकेत देवी ५ पैकी १ ठार मारीत. हे प्रमाण घटून ५० पैकी १ वर आलं व नंतर ३८० पैकी १ वर घसरलं. १८९७ च्या अखेरीस अमेरिकेत तीव्र देवी जवळजवळ नामशेष झाला. १९५० पर्यंत इंग्लंड व अमेरिकेतनं देवीच्या साथी नामशेष झाल्या होत्या. पूर्ण लशीकरण न करताही हे साध्य झालं. स्कार्लेट ताप ( स्कार्लेट फीव्हर ) तर कुठल्याही लशीशिवाय नाहीसा झाला.
अशाच अनेक रोगांची घट ( विषमज्वर, डांग्या खोकला, डिप्थेरिया, क्षय, हगवण ) आलेखांसह दर्शवली आहे.
रुग्णालये ही अस्वच्छ व दाटीग्रस्त असल्याने लागणकेंद्रे होती. ती हळूहळू सुधारू लागली होती. एकंदरीत आहार, पोषण, स्वच्छता, इत्यादि आरोग्यविषयक जाणिवांत सुधारणा होत गेल्या. यांत लशीचा सहभाग जराही नव्हता.
प्रकरण १२ : पोलियो परतून आलाय
पोलियोची लस पहिल्यांदा शोधणाऱ्या जोनास साल्कने ( डॅरल साल्क सह ) म्हंटलंय की ही दुर्बळ विषाणूयुक्त लस कधीकधी पोलियोस रोखण्याऐवजी रोगाचा प्रादुर्भाव घडवून आणू शकते. दुसरी लस डॉक्टर साबिनने शोधलेली मौखिक लस आहे. तिच्यानेही आज पोलियो होऊ शकतो. पोलियोचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी बुल्बर पोलियो हा सर्वात गंभीर प्रकार आहे. तो मेंदूच्या लंबमज्जेस ( = ब्रेनस्टेम ) हानी पोहोचवतो. त्यातून पुढे पक्षाघात होतो. पण हा पक्षाघाती पोलियो फार कमी प्रमाणावर आढळतो. नैसर्गिक पोलियोचा विषाणू अनेक शतकांपासून मानवी आतड्यांत सुखेनैव नांदंत आला आहे. मग विसाव्या शतकात नेमकं काय घडलं की, ज्यामुळे त्याच्यापायी पक्षाघात होऊ लागले ?
मौखिक लशीचे जनक डॉक्टर अल्बर्ट साबिन यांनी नेमका प्रश्न विचारलाय. अमेरिकी नेटिव्हांत पोलियोरुद्ध आपसूक प्रतिकारशक्ती उत्पन्न झाली होती. मात्र प्रगत व स्वच्छतेबाबत दक्ष असलेल्या अमेरिकी वसाहतींत पोलियोची लागण का होतेय ? हा पोलियो विसाव्या शतकांतच का उदयाला आला ? विषाणू तर हजारो वर्षांपासून माणसाच्या आतड्यांत रहात आलाय. तर पोलियोचं कारण आहे कृत्रिम आहार. साखर, मैदा, दारू, तंबाखू, इत्यादी सवयी तसेच डीडीटी, अर्सेनिक, विविध लशी, प्रतिजैविके यांच्यामुळे माणसाची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी झाली. म्हणून पोलियोसारख्या रोगांमुळे पक्षाघात होऊ लागले.
पोलियोच्या छत्राखाली अनेक रोग समाविष्ट केले गेले. तसेच इतर कारणामुळे पक्षाघात झाला तरी त्यावर पोलियो म्हणून छाप मारण्यात यायचे. आज जसं काही झालं की लगेच करोनाचा छाप मारला जातो, अगदी तसंच पूर्वीही झालंय. पुढे लेखिकेने पोलियोच्या व्याख्येविषयी प्रश्न उपस्थित केलेत.
वाव्या शतकाच्या पूर्वार्धात पोलियोच्या उपचारांत बाधित स्नायूस जखडून टाकीत असंत. जखडल्यामुळे स्नायूची अधिकंच हानी होई. उलट स्नायू मोकळे केले व ठराविक व्यायाम केले तर तो बरा ( = रीकव्हर ) व्हायचं प्रमाण वाढे. याबाबत सिस्टर केनी हिचे व्यायामोपचार प्रसिद्ध झाले. पण ऐकणार कोण. लशीचे मार्केटिंग करायला जखडलेली बालकं अधिक उपयुक्त ठरतात, मोकळेपणे बागडणारी नव्हे.
पोलियो पूर्णपणे गेलेला नाहीये. त्याला ट्रान्सव्हर्स मायलिटीस असं नवीन नाव मिळालंय. माझ्या अंदाजाप्रमाणे मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा देखील पोलियोचाच एक प्रकार असावा. ट्रान्सव्हर्स मायलिटीस होण्याच्या संभाव्य कारणांमध्ये लस हे ही एक कारण आहे.
पुढे लेखिकेने डीडीटी मुळे पोलियोसारखं एक लक्षण बळावतं, त्याचा सांगोपांग उहापोह केला आहे. भारतातल्या डीडीटी चा सुळसुळाट असल्याने त्यावरही भाष्य केलं आहे. नंतर लेखिकेने अर्सेनिक विषबाधेवर चर्चा केली आहे. या विशाबाधेतून पोलियो सदृश लक्षणं उत्पन्न होतात. अर्सेनिक हे औषध म्हणून सुरक्षित मानलं जाई. साहजिकंच अर्सेनिकच्या विषबाधेचे रोगी पोलियोचे म्हणून गणले जात. यानंतर लेखिकेने सिफिलीसच्या पोलियोसदृश काही लक्षणांचा विचार केला आहे.
पुढे लेखिकेने पोलियोच्या व्याधीमूल्याचा ( = मॉर्बिडिटी चा ) विचार केला आहे. कालानुक्रमे व्याधीमूल्य कसकसं बदलंत गेलं हे मांडलं आहे. बालकांच्या टॉन्सिल ग्रंथी उचकटून काढल्याने पोलीयोत कशी वाढ झाली ते चर्चिलेलं आहे. क जीवनसत्वामुळे पोलियो कशा बरा झाला याच्या अभ्यासकथा ( = केस स्टडीज ) वर्णिलेल्या आहेत.
यापुढे प्रयोगशाळेतल्या लशीमुळे रोगाची साथ कशी आली व बळावली ते लिहिलं आहे.
यापुढे पोलियोचा विषाणू कृत्रिम पद्धतीने निर्माण करता येतो, हे लिहिलेलं आहे. ही पद्धत रासायनिक असून अजैविक आहे.
यापुढे साल्कच्या लशीमुळे उत्पन्न झालेली कटर नामे कुप्रसिद्ध रोगाची साथ वर्णिलेली आहे. यांत लशीतल्या जिवंत विषाणूमुळे अनेक बालकं व नजीकचे लोकं विनाकारण मेले, तर काहीजण जन्मभरासाठी लुळेपांगळे झाले. सक्तीच्या लस टोचणीचा समर्थक पॉल ऑफिट याने मान्य केलंय की कटर रोग हा कृत्रिम असून नैसर्गिक पोलियोपेक्षा कैक पटीने जास्त हानिकारक आहे. कटर व वायथ या दोन आस्थापनांच्या लशी वैज्ञानिक चाचणीप्रक्रिया पार न पडताच बाजारात येऊ दिल्या गेल्या.... यासाठी सुरक्षा निकष धाब्यावर बसवण्यात आले.... बाकी सगळं मी सांगंत बसंत नाही.
यानंतर माकडाच्या उतींतून निर्मिलेल्या लशीत कर्करोगजन्य पदार्थ सापडल्याचं लिहिलंय. या दूषित लशीमुळे कर्करोग होण्याचं प्रमाण वाढलं.
आता या प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे भारतातील पल्स पोलियोच्या लशीचा गोंधळ वर्णिलेला आहे. प्रयोगशील लस असल्याने रोगाचं उच्चाटन तर झालं नाहीच, वर अतिरिक्त रोग बळावले. नैसर्गिक पोलियोपेक्षा कृत्रिम पोलियो जास्त प्राणघातक ठरला. भारतात नैसर्गिक पोलियोची जागा कृत्रिम पोलियोने घेतली आहे. वेल डन ! ५ वर्षाच्या बालकाला ३२ डोस दिले गेलेत. फार छान !!
निष्कर्ष : मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक पोलियो नाहीसा होत चाललाय. आता फक्त कृत्रिम पोलियो उरेल आणि नवजात बालकाला जन्मत:च मिळणारी पोलियोची रोगप्रतिकारक शक्ती निरुपयोगी ठरेल. आता बसा बोंबलंत.
प्रकरण १३ : डांग्या खोकला (Pertusis)
या रोगाने अमेरिकेत १९११ साली सुमारे १ लाख लोकांचा बळी घेतला. तर १९६० साली याने त्यामानाने नगण्य बळी घेतले. १९४० च्या दशकांत डांग्या खोकल्याची लस वापरांत पसरली, पण त्यापूर्वीच रोगाचा मृत्यूदर ९२ % ने खालावला होता. इंग्लंड व वेल्स मधले निकाल याहून ठाशीव आहेत. त्यांनुसार लशीकरणापूर्वी मृत्यूदर ९९ % ने खालावला होता. तसेच १९८४ साली उघडकीस आलं की डांग्या खोकल्याची लसटोचणी बंद केल्यावर त्याचे रोगी कमी झाले.
शिवाय लस टोचल्याने रोग बळावण्याची नेहमीची रड आहेच. क्यालीफोर्नियातल्या सान रफायेल येथल्या रुग्णालयात २०१२ सालच्या अभ्यासानुसार डांग्या खोकला झालेल्या बालकांपैकी बहुसंख्य बालकांना लस टोचली होती. याचा अर्थ ही लस आजीव सुरक्षा देण्यास पूर्णपणे असमर्थ ( की अपयशी ? ) ठरली होती. मग द्यायचीच कशाला ? झक मारायला ?
यापुढे लेखिकेने प्रतिपिंड आद्यपराध अर्थात Original Antigenic Sin ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे. थोडक्यात सांगायचं तर लस टोचल्याने प्रतिकार यंत्रणा पंगू होते किंवा वेडीवाकडी वागू लागते. त्यामुळे नैसर्गिक प्रतिकारशक्ती क्षीण होते. परिणामी ज्या रोगाची लस टोचली आहे, नेमक्या त्याच रोगाला माणूस बळी पडतो. लशीद्वारे दुर्बळ विषाणू सोडल्याने प्रतिकारयंत्रणेची फसवणूक होते. ही फसवणूक सुधारता येत नाही. मग टोचून घेत बसा आयुष्यभर लशी एकापाठोपाठ एक. यापायी डांग्या खोकला आता बालकांना न होता प्रौढांना होतोय.
कोणीही लशीकरण तत्ज्ञ प्रतिपिंड आद्यपराधाविषयी काहीही बोलंत नाही. लशीसंबंधी मूलभूत प्रश्न उपस्थित होतात ना ! बोलायला तोंड आहे कुठे !
प्रकरण १४ : गोवर
१९ व्या शतकात ( १८०० चं शतक ) इंग्लंड व अमेरिकेत दर दोनेक वर्षांनी गोवराची साथ यायची. दाखल मुलांपैकी २० % परलोकवासी व्हायची. पण हे प्रमाण १९६० पर्यंत प्रचंड घसरलं. ही घसरण लशीकरणाच्या अगोदर झालेली आहे. स्वच्छता, आहार व पोषण यांत सुधारणा झाल्याने हा फरक पडला आहे.
गोवराच्या मृत विषाणूंच्या लशीमुळे अधिक तीव्र रोगाची लागण होई. हा नेमका उलट परिणाम आहे. रोगप्रतिकारक यंत्रणेत लशीने अनावश्यक हस्तक्षेप केल्याने झालेला प्रतिपिंड आद्यपराध हे मूळ कारण आहे. तसंच जिवंत लशीमुळेही गोवर होई. या गोवरामुळे ताप येऊन पुरळ उठे. हा परिणाम टाळण्यासाठी गोवराची प्रतिपिंडे टोचली जात. त्यांच्यामुळे रोगप्रकरण अधिक गुंतागुंतीचं होई.
यानंतर अमेरिकेतल्या गोवर लशीकरण प्रकल्पाचं अपयश वर्णिलेलं आहे. अनावश्यक लशीकरणामुळे गोवर मोठ्या माणसांनाही होऊ लागला. परत डांग्या खोकल्यासारखीच परिस्थिती उद्भवली. गोवराच्या लागणी व्हायच्या. मात्र अमेरिकेत सगळं खापर लस न घेतलेल्यांवर फोडण्यात आलं. खरा प्रकार असा होता की लशीमुले नैसर्गिक प्रतिकारक्षमतेवर प्रतिकूल परिणाम झाला होता. २००० साली अमरिकेतनं गोवर संपल्याचं जाहीर करण्यात आलं, परंतु हे जाहीर विधान २०१२ साली मागे घेतलं गेलं. एकदा का लस घेतली की आयुष्यभर परत परत घ्यावी लागते. करोनाचं असंच होणारे. याविषयी शंका नको.
यानंतर प्रतिपिंडांविषयी प्रश्न उपस्थित केला आहे. प्रतिपिंडे ही खरोखरंच रोगजंतूंना ठार मारतात की ती केवळ अंगुलीनिर्देशक लेबल असतात ? प्रतिपिंडांची कमतरता ( agamma-globulinemia ) असतांनाही गोवर बरा झाल्याची काही प्रकरणं घडलीत. यावरून लस व तिची उपयुक्तता यावर भलं थोरलं प्रश्नचिन्ह चिकटतं.
यानंतर प्रतिपिंड प्रोत्साहन प्रक्रिया वर्णिली आहे. कधीकधी प्रतिपिंडांमुळे विषाणूस यजमान पेशीस ओळखणं सोपं पडतं. यांस antibody dependent enhancement म्हणतात. याचा अर्थ लस टोचल्याने तिच्या परिणामामुळे लागण व्हायची शक्यता वाढते. हा नेमका विपरीत परिणाम आहे.
काही लशींमुळे पुरळ न उठता गोवर होतो. गोवराच्या विषाणूमुळे पुरळ येत नसून शरीराने विषाणूंवर हल्ला केल्याने उठतं. जर लस टोचली तर प्रतिकारक्षमता बिघडल्याने पुरळ उठंत नाही, तरीपण रोग होतोच. असा बिनलक्षणी गोवरही झाल्याची प्रकरणं उजेडांत आलेलीआहेत. मग लस घेतलेल्यांना कळणार कसं की लस अपयशी ठरली आहे ते ? बसा बोंबलंत.
यानंतर गोवराची लागण कमी होण्याविषयी संभाव्य कारणांचा विचार केला आहे.
यानंतर लशीमुळे अर्भकाच्या मातृदत्त प्रतिकारशक्तीचा कसा ऱ्हास होतो ते वर्णिलेलं आहे. गोवरावर आईचं दूध व लस यापैकी आईचं दूध अधिक परिणामकारक आहे.
यानंतर जीवनसत्वांचा योग्य पुरवठा प्रतिकारशक्ती कशी वाढवतो ते सांगितलं आहे.
प्रकरण १५ : उपासमार, स्कर्व्ही व क जीवनसत्व
शीर्षकावरनं कळतं या प्रकरणात काय असणारे ते.
स्कर्व्ही म्हणजे धातुविदरण या व्याधीचं लक्षण हिरड्यांवर सर्वप्रथम दिसून येतं. मात्र ही पूर्ण शरीराची व्याधी आहे. हिच्यात शरीरास धरून ठेवणारी कोलाजेन ( collagen ) नामे ऊती विदीर्ण पावते. त्यामुळे शरीर अक्षरश: खिळखिळे होते. आहारातनं क जीवनसत्व न मिळाल्याने ही व्याधी होते. हिचा परिणाम हिरड्यांवर सर्वप्रथम दिसून येतो. त्या हुळहुळ्या होऊन जराशा धक्क्याने रक्त पाझरू लागतं. ही व्याधी बळावल्यावर रोगी थकव्याने वारंवार झोपू लागतो व एके दिवशी कायमचा झोपतो.
अमेरिकेत इ.स. १८५० च्या दशकात क्यालिफोर्नियात सोन्यासाठी धडपड अर्थात गोल्ड रश ऐन भरात होती. तेव्हा धातुविदरण व्याधीने पटकी ( = कॉलरा ) पेक्षा जास्त बळी घेतले. अमेरिकी नागरी युद्धात ( इ.स. १८६१ ते १८६५ ) प्रत्यक्ष लढाईत कामी आलेल्या सैनिकांची संख्या अवघी १ % होती. बाकीचे ९९ % रोगराई व इतर कारणांनी मृत्युमुखी पडले होते. यांत धातुविदरण व हगवण आघाडीवर होते.
क जीवनसत्वात अस्कॉर्बिक आम्ल असतं. त्यामुळे पेशींचं चयापचय सुधारतं. मुडदूस ही व्याधी ड जीवनसत्वाच्या कमतरतेने होते. मात्र हिच्यातनं बरं होण्यासाठी ड संगे क जीवनसत्वही आवश्यक असतं. क जीवनसत्व एखाद्या प्रतिजैविकासारखं काम करतांनाही आढळून आलंय.
कालांतराने आहारात सुधारणा झाल्याने धातुविदरण व्याधी उतरणीस लागली. उदा. : इंग्लंडध्ये धातुविदरण व्याधीची लागण इतर सांसर्गिक आजारांसारखी झपाट्याने खाली आली. क जीवनसत्व केवळ व्याधींवर उपयुक्त नसून सर्वसाधारण रोगप्रतिकारशक्ती देखील बळकट करतं. कुठल्याश्या निरर्थक लशी टोचून घेण्यापेक्षा आहारात सुधारणा केलेली काय वाईट ?
क जीवनसत्व जर इतकं गुणी आहे तर मग आपले डॉक्टर हे आपल्याला समजावून का सांगंत नाहीत, असा प्रश्न पडतो. क जीवनसत्वाच्या परिणामाविषयी नियोजित स्वैरचाचण्या ( = randomised controlled trials ) आजवर कोणीही घेतल्या नाहीयेत. इतक्या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष करून नेमकं काय साध्य होतं ? उत्तर सोप्पंय, औषध आस्थापनांचा फायदा !
प्रकरण १६ : हरवलेले उपचार
शीर्षकावरनं कळतं या प्रकरणात काय असणारे ते.
आधुनिक वैद्यकातल्या अनेक घातक संकल्पना केवळ अंधविश्वासाच्या आधारे प्रचलित करण्यात आल्या. उदा.: दुर्बलोच्छेद ( = Eugenics ), थालीडोमाईड, डाय-ईथाईल-स्टिल-बेस्ट्रॉल. यांत एक भर म्हणजे केवळ लस टोचल्याने रोग बरा होतो. प्रत्यक्षात लस ही रोगापासून संरक्षण करीत नाही. या प्रकरणात इतर सुलभ, स्वस्त व अधिक परिणामकारक उपायांचा विचार केला आहे.
विषय बराच मोठा आहे. या छोट्याशा प्रकरणांत दालचिनी, कांदा, लसूण, एन्चिनेशिया, जिकामा, ताज्या फळांचा रस, सफरचंदाचे सायडर व्हिनेगर, कॉड माशाच्या यकृताचे तेल, रजतभस्म द्राव ( चांदीचे कोलॉयडल सोल्युशन ), इत्यादि पदार्थांच्या जंतुघ्न गुणांचा परामर्श घेतला आहे.
काही उदाहरणे : प्रतिजैविकांना दाद न देणारे नफ्फड ब्याक्टेरिया दालचिनीमुळे आटोक्यात येतात. कांदा भरपूर खाणाऱ्या जवळजवळ सर्व ( इटालियन, पोलिश, हंगेरियन, इत्यादि ) लोकांना देवी येत नाहीत. लसणाने क्षय व डांग्या खोकला यांवर उतार पडतो.
प्रकरण १७ : भीती व धारणा
लोकांची समजूत करवून दिलीये की जग धोकादायक आहे. म्हणून तुम्ही तुमची सुरक्षा सरकार व मोठ्या आस्थापनांच्या हाती सोपवा. ती तशी खरोखरंच सोपवावी का ? उत्तर नकारार्थी आहे. लोकांनी आपला शहाणपणा व सुरक्षा का म्हणून गहाण ठेवायची ? या विषयाचा सदर प्रकरणांत उहापोह केला आहे. या भीतीच्या कचाट्यातनं डॉक्टरांचीही सुटका नाही. खूपदा ते ही स्वतंत्र विचार त्यागून प्रचारतंत्रास बळी पडतात.
आज अलोपथीच्या मते मानवी शरीर म्हणजे रसायनांचा समूह असून त्यास शल्यकर्म, रसायने, प्रतिजैविके वगैरेंच्या सहाय्याने कसंबसं नियंत्रणात ठेवायचं असतं. हे नियंत्रण कुठवर, तर जीव जाणार नाही या बेताने. असो.
डॉक्टर चार्ल्स क्रेटन ( Dr. Charles Creighton ) याने १९०३ साली देवीच्या लशीचे धोके, परिणामकारकता, पुनर्लशीकरण व कायदेशीर बाबी यांविषयी बरंच लेखन केलं. त्याचा एक अहवाल बनवला व तो एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका मध्ये प्रसिद्धही झाला. पण १९२२ साली हा मजकूर गाळून त्या जागी लसोपचार नामे मजकूर घुसडण्यात आला. त्यात कसलाही पुरावा नसतांना लशीमुळे रोगप्रतिकारक शक्ती मिळते असा धादांत असत्य दावा केला गेला. कोणी केलं हे ? ओळखा पाहू ! ही विलक्षण लस म्हणे एडवर्ड जेन्नरने शोधली. घंटा तिच्यायला संशोधन.
यापुढे जेन्नरचा हवाला देऊन 'घातक रोगजंतू व जीवनरक्षक लस' ही बिनबुडाधी धारणा ठासून वारंवार मांडली जाऊ लागली. १९२० च्या दशकांत व नंतर अमेरिकेत अनेक चित्रविचित्र ( bizzare ) लशींचा सुळसुळाट झाला आणि त्यांच्या पोकळ व भरमसाट दाव्यांना ऊत चढला. तो आजवर टिकून आहे. साहजिकंच आजचं अलोपथी वैद्यक हा एक रिलीजन होऊन बसला आहे. दुसरं काय !
लागणप्रवर्तक हे लागणकारक नव्हेत. Infection agents are not cause of infections. या सत्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. उदा. : पेलाग्रा या विकारापायी हगवण, त्वचादाह, निद्रानाश होतो असं मानण्यात येई. आज खरंतर ही व्याधी बी-३ या जीवनसत्वाच्या अभावी होते हे स्पष्ट झालंय. पण एके काळी पेलाग्राचा विषाणू असल्याचा समज प्रचलित होता. आज 'करोनाचा विषाणू' ही अशीच एक थोतांडी संकल्पना प्रचलित आहे.
लस अयशस्वी ठरली की मग लस न घेतलेल्या जागरूक लोकांवर साथीच्या रोगांचं दोषारोपण करणं हा वैद्यकीय प्रस्थापितांचा एक आवडता खेळ आहे. हल्ली हे खापर विषाणूचं जनुकीय उत्परिवर्तनावर ( = जेनेटिक म्युटेशन वर ) फोडलं जातं. हे एक उपथोतांड आहे. मग 'नवीन व अधिक प्रभावी' लशी शोधण्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. जुन्या लशीचे दोष व अपयश यांवर आपसूक पांघरूण टाकता येतं. मुळांत लस ही रोगनिवारण करणारी नसतेच. पण लक्षांत कोण घेतो. लोकंही भीतीपायी नवीन लशीवर विश्वास ठेवतात. असा एकंदरीत मामला आहे.
यानंतर इंग्लंडात लशी टोचण्यापूर्वीच साथींचे रोग कसे आटोक्यात आले होते त्याची आकडेवारी व आलेख दिलेले आहेत.
अमेरिकेत स्कार्लेट ताप हा पूर्वी एक जीवघेणा रोग होता जो आता नामशेष झाला आहे. तो लशीशिवाय नाहीसा झाला. अर्थात, लसनिर्मितीचे प्रयोग करण्यांत आलेच. अशीच एक प्रयोगशील लस निरोगी असलेल्या शिकाऊ परिचारिकांना टोचल्यावर सगळ्या एका वर्षभरांत मृत्युमुखी पडल्या. आता कळलं स्कार्लेट तापावर लस का काढली नाही ते ?
असो.
संपलं एकदाचं पुस्तक.
विचार, मनन व चिंतनाचं उपकंत्राट देता येत नाही. या गोष्टी स्वत:च्या स्वत:च कराव्या लागतात. एव्हढं जरी ध्यानी आलं तरी पुस्तक सार्थकी लागलं, म्हणेन मी.
---------------x---------------x---------------
लांबलचक सारांश वाचून कंटाळलात ? आता थोडा इतरत्र फेरफटका मारूया. सांगायचा मुद्दा असा की केवळ प्रपकांडाद्वारे ( = प्रोपोगंडा द्वारे ) लस हे जणू अमृत आहे असा आभास उत्पन्न केला आहे. तर असा गोबेल्सी अपप्रचार पूर्वी कधी झाला होता याचा धांडोळा घेतला. तेव्हा महाभारतात एक उदाहरण सापडलं.
पुष्ट, बलवान, नम्र व सतेज पांडव पाहून हस्तिनापुराची लोकं त्यांनाच भावी राजे मानू लागली. त्यामुळे दुर्योधनाचा जळफळाट झाला. पांडवांचा काटा काढण्यासाठी त्यांना दूरदेशी पाठवावं असं त्यानं ठरवलं. तो बापाला म्हणजे धृतराष्ट्राला म्हणाला की एकदा का पांडव दूर गेले की मी राज्यावर बसेन. मग कुंती व ते परत जरी आले तरी काही हरकत नाही. मी त्यांना बघून घेईन. प्रत्यक्षात त्याला पांडवांची हत्या करायची होती. मात्र हा गुप्त हेतू कोणालाही कळू न द्यायची काळजी घेतली.
आता, पांडवांना निघून जा असं थेट सांगणं शक्य नव्हतं. तेव्हा दुर्योधन बापाला आपली योजना समजावतांना म्हणाला की भीष्म मी व पांडवांप्रति समानदृष्टी बाळगून आहे. द्रोण व अश्वत्थामा माझे आहेत. कृप या दोघांना सोडणार नाही कारण हे त्याचे मेहुणा व भाचा आहेत. राहता राहिला विदुर, पण तो आपल्या अन्नाचा ओशाळा आहे. यावर धृतराष्ट्र या योजनेस राजी झाला. मग दुर्योधनाने धनमानादि पारितोषिकांद्वारे प्रधानवृंदास आपल्याकडे वळवून घेतलं. या वश झालेल्या मंत्र्यांनी धृतराष्ट्राच्या आज्ञेवरून वारणावत नगरीची प्रशंसा आरंभली. तसंच धृतराष्ट्राच्या भाट व चरणांनी त्या नगरीची वारेमाप स्तुती केली. तिथे शिवपुजेची पर्वणी आल्याची खरीखुरी बातमीही विशेषकरून पसरवली. पांडवांच्या मनात वारणावताविषयी उत्सुकता निर्माण झाल्याचं कळताच धृतराष्ट्र त्यांना म्हणाला की जत्रेला जाऊन विपुल दानधर्म करून या. धृतराष्ट्राची इच्छा युधिष्ठिरास कळून आली. पण विदुराचे सहाय्य आहे म्हणून त्यानं ही योजना स्वीकारली.
गमनदिनी जेव्हा पांडव हस्तिनापुरातल्या प्रतिष्ठित ब्राह्मणांचा निरोप घ्यायला गेले तेव्हा त्या विप्रांनी धृतराष्ट्रास बराच दोष दिला. पंडू सर्वांना पित्याप्रमाणे वाटंत असे, याउलट धृतराष्ट्रास पांडव डोळ्यासमोर नको झालेत. भीष्माने पांडवांना जाण्याची परवानगी दिलीच कशी, असा प्रश्न उपस्थित केला. भीष्माची बुद्धी चळली आहे, सबब आपण हस्तिनापुर त्यागून धर्माच्या मागे गेले पाहिजे असं म्हणू लागले. ब्राह्मणांनी आपणहून निर्वासित होणे हा त्याकाळी राज्याचा फार मोठा अपमान मानला जाई. परिस्थिती इथवर फिसकटली होती. तरीपण युधिष्ठिराने धृतराष्ट्राच्या चांगुलपणाचा भरवसा देऊन ब्राह्मणांना तिथेच थांबायची विनंती केली. ती त्यांनी मानली.
पुढे मग पांडव वारणावतात गेले, नंतर सुमारे वर्षभराने लाक्षागृह प्रकरण घडलं. त्यातनं ते सुखरूप निसटले खरे, पण त्यांना रानोमाळ भटकावं लागलं. भटकतांना हिडींब व बकासुर वगैरे प्रकरणेही घडली. एकदा युधिष्ठिराच्या मनांत विचार आला की आपण असेच फिरंत राहिलो तर दुर्योधन आपल्यास कुठेतरी गाठून ठार मारेल. काहीतरी उपाय शोधायला हवा. फिरताफिरता पांडव व कुंती काम्पिल्य नगरीपाशी आले. तेव्हा पांडवांना कृष्ण यादव नामे एक अत्यंत लबाड इसम भेटला. शिवाय तो नेमका पांडवांचा आतेभाऊही निघाला. त्याच्यापाशी युधिष्ठिराने आपली व्यथा बोलून दाखवली. कृष्णाला कळलं की पांडव आपल्या बरेच उपयोगाचे आहेत. आज दुर्योधानामुळे ते रानोमाळ हिंडताहेत. उद्या जरासंधापायी मथुरेकर यादवांवर हीच वेळ येऊ शकते.
तेव्हा त्या लबाड माणसाने द्रौपदीस वरण्याचा आपला हेतू बाजूला सारला व आपल्या जागी पांडवांपैकी एकाची मनोमन नियुक्ती केली. वरकरणी मात्र त्याने युधिष्ठिरास एखाद्या प्रबळ राजाचं सहाय्य घ्यायला सुचवलं. पुढे असंही म्हणाला की जरा घाई करा. कारण की काम्पिल्य नगरीचा राजा द्रुपद याची मुलगी उपवर आहे, तेव्हा तुम्ही त्याचीच सोयरिक करून घ्या. आजंच तिचं स्वयंवर आहे. पुढे अर्जुनानं द्रौपदी जिंकली व कुंतीच्या अहैतुक आशीर्वचनामुळे ती इतर चार पांडवांचीही पत्नी झाली. आता पांडवांची ओळख पटली होती. मग हस्तिनापुरास परत कसं जायचं याविषयी विचारविनिमय चालू होता. इतक्यात तिथनंच विदुराकरवी पांडवांना सपत्नीक आगमनाचं आमंत्रण आलं.
लोकहो, पहा, आत्ताप्रमाणेच सुमारे दहा पंधरा वर्षांपूर्वी पंडू व माद्रीच्या मृत्यूनंतर कुंती पांडवांना घेऊन हस्तिनापुरास आली होती. तेव्हा तिला लोकांची सहानुभूती तरी होती. भीष्माने तिला बाहेरच्या बाहेर न फुटवता मोठ्या मनाने आश्रय दिला. यावेळेस मात्र भीष्मानेच तिला व पांडवांना हाकून लावलं होतं. मात्र असं असलं तरीही आता द्रौपदीच्या केवळ अस्तित्वाने पांडवांना अपरिमित बळ प्राप्त झालं. इतकं जबर बळ मिळालं की तुरुंग फोडून इतस्तत: भटकणारा युधिष्ठीर कालांतराने चक्क राजसूय यज्ञ करता झाला. द्रौपदी ही काय चीज आहे ते यातनं कळतं.
असो. आता आपण परत वर्तमानकाळात येऊया किंवा जाऊया.
---------------x---------------x---------------
आलांत वर्तमानांत ? उत्तम. आता आपल्यासाठी म्हणजे सामान्य माणसासाठी काही प्रश्न हजर आहेत.
१. हस्तिनापुरातल्या ब्राह्मणांनी भीष्माची उलटीसुलटी घेतली. त्यांच्याकडे तितकी नैतिक शक्ती होती. करोनाच्या लशीच्या थोतांडाविरुद्ध कोण नैतिक शक्तिशाली ब्राह्मण आपल्यासाठी उभा राहणार आहे ?
उत्तर : कोणीच नाही. आपली लढाई आपल्यालाच लढावी लागणार आहे. त्यासाठी नैतिक शक्ती म्हणून कर्मसाधना करायला पाहिजेच.
२. कोणती द्रौपदी आपल्यासाठी वरमाला घेऊन सज्ज आहे ?
उत्तर : कोणीच नाही. आपणंच आपल्याला लशीच्या शोधार्थ रानोमाळ हिंडण्यापासून वाचवायचं आहे. त्यासाठी मजबूत भक्तीसाधना हवीच.
३. कोण विदुर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे ?
उत्तर : मी आहे ना गामा पैलवान, विदुरासारखा मार्गदर्शन करणारा. मी नीतिमत्तेचा महामेरू असून स्वयंघोषित धर्ममार्तंडही आहे. मी सांगतो की आपण सारे मिळून युधिष्ठिरासारखी धर्मसाधना करूया.
सांगायचा मुद्दा काये की कर्म, भक्ती, धर्म यांमध्ये साधना हा सामायिक घटक आहे. ती साधना म्हणजे नामजप. तो करायला हवाच. चांगला सणकून करूया आणि या करोना नामे थोतांडास पार पळवून लावूया.
॥ जयजय रघुवीर समर्थ ॥
आपला नम्र,
-गामा पैलवान
💬 प्रतिसाद
(255)
च
चेतन सुभाष गुगळे
Sat, 05/29/2021 - 20:12
नवीन
https://www.loksatta.com/agralekh-news/loksatta-editorial-on-fm-nirmala-sitharaman-promise-over-free-covid-vaccine-zws-70-2311086/
च
चेतन सुभाष गुगळे
Sat, 05/29/2021 - 20:20
नवीन
https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-on-pfizer-serum-institute-and-bharat-biotech-launch-three-vaccines-on-extension-abn-97-2351449/
फायझरची लस देण्यास इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असली तरी त्या देशाच्या आरोग्य नियंत्रकांनी त्यानंतर लशीबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. ही लस घेणाऱ्या दोघांच्या अंगावर मोठय़ा प्रमाणावर पुरळ आले. ते जीवघेणे नाही. पण तरीही त्या देशाच्या वैद्यकीय नियंत्रकांनी याबाबत इशारा दिला. हे एका अर्थी घोडा तबेल्यातून गेल्यावर खिट्टी लावण्यासारखे.
विशेषत: इंग्लंडमध्ये जे घडले ते हेच अधोरेखित करते. लस टोचून घेण्यास सुरुवात झाल्यानंतर त्या देशाच्या आरोग्य नियंत्रकास नागरिकांसाठी धोक्याचा इशारा द्यावा लागला. ज्यांना अॅलर्जी आहे, त्यांनी लस घेण्याची घाई करू नये असे हा इशारा सांगतो. पण तोपर्यंत अशा अनेकांनी लस टोचून घेतली असेल त्याचे काय? करोनाचा अखंड धुमाकूळ लक्षात घेता त्यास रोखणाऱ्या लशीचे महत्त्व कोणीही नाकारणार नाही. तसेच, वर उल्लेखलेल्या लशी उपयुक्त नाहीत असेही कोणी म्हणणार नाही. पण मुद्दा इतकाच आहे की त्यांची सुरक्षितता, उपयुक्तता आणि परिणामकारकता शास्त्राच्या कसोटीवर आधी सिद्ध तर होऊ द्या. तशी ती व्हायच्या आधीच सरकारांनी आपापल्या गळक्या खजिन्यातील कोटय़वधींची रक्कम या लशी खरेदी करण्यासाठी या कंपन्यांना देण्याची तयारी दर्शवली आहे वा देऊ केली आहे. हे धोकादायक नव्हे काय? बाजारात येणारे उत्पादन काय आहे, कसे आहे, त्याचे चांगलेवाईट काय हे काहीच माहीत न करता ते उत्पादन खरेदी करण्यासारखेच हे. पण अधिक गंभीर. कारण येथे प्रश्न लाखो जीवांचा आहे. सरकारांनी या लशींच्या संशोधनाच्या खर्चाचा भार उचलणे वेगळे आणि अन्य कोणी केलेल्या संशोधनाची उपयुक्तता सिद्ध व्हायच्या आत लस खरेदी करण्याचा उत्साह दाखवणे वेगळे. त्याची काही गरज नाही. सर्वच काही इतरांच्या आधी करून दाखवण्याची घाई कशाला?
च
चेतन सुभाष गुगळे
Sat, 05/29/2021 - 20:21
नवीन
सरकारांनी या लशींच्या संशोधनाच्या खर्चाचा भार उचलणे वेगळे आणि अन्य कोणी केलेल्या संशोधनाची उपयुक्तता सिद्ध व्हायच्या आत लस खरेदी करण्याचा उत्साह दाखवणे वेगळे. त्याची काही गरज नाही. सर्वच काही इतरांच्या आधी करून दाखवण्याची घाई कशाला? टाळेबंदी आपण अशी इतरांच्या आधी ‘करून दाखवली’. लसीकरणातही पहिल्या क्रमांकाची आस बाळगण्याची गरज नाही. आणि दुसरे असे की या घाईमुळे अन्यत्र कोणी लशीवर प्रामाणिकपणे संशोधन करीत असेल आणि त्याची लस ही बाजारात आधीच आलेल्या लशींपेक्षा अधिक परिणामकारक असेल तर त्याकडे दुर्लक्षच होण्याची शक्यता अधिक. कारण आधीच ‘नावारूपा’ला आलेल्या लशींची नोंदणी झाली असेल तर या मागून येणाऱ्यांकडे पाहणार कोण? सबब लशीसाठी घाई न करण्यात आणि मागे राहण्यातच शहाणपण आहे.
च
चेतन सुभाष गुगळे
Sat, 05/29/2021 - 20:27
नवीन
https://www.loksatta.com/agralekh-news/covaxin-indias-first-indigenous-covid-vaccine-mppg-94-2372305/
करोनावरील लस भारतात विकसित होणे अभिमानाचेच. परंतु या लशीची परिणामकारकता व सुरक्षितता सिद्ध होण्याआधीच तिला मान्यता का?
बग्गी ही ज्याप्रमाणे घोडय़ाच्या मागे असावी लागते, पुढे असून चालत नाही, त्याप्रमाणे लशीची उपयुक्तता सिद्ध व्हायच्या आधीच सरकारने तीस प्रमाणपत्र देऊन चालत नाही. आपल्याकडील विविध तज्ज्ञांनी आपल्याच मायबाप सरकारला या किमान सत्याची जाणीव करून दिली. मुद्दा आहे ‘कोव्हॅक्सिन’ नामक लशीचा. हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीच्या या निर्मितीस आपल्या सरकारच्या विविध यंत्रणांनी लस म्हणून मान्यता दिली म्हणून आपल्या विविध लसशास्त्रतज्ज्ञ, वैद्यकीय अभ्यासक यांनी सखेद आश्चर्य, संताप, काळजी आदी भावना व्यक्त केल्या.
करोनावरील लस भारतात विकसित होणे या तज्ज्ञांसाठीही अभिमानाचेच. फक्त त्यांचे म्हणणे इतकेच की, या लशीची परिणामकारकता व सुरक्षितता आधी सिद्ध होऊ द्या आणि मग तिच्या वापराची घोषणा करा. ही सिद्धता व्हायच्या आधीच तिच्या उपयोगाची घोषणा करणे म्हणजे टांगा घोडय़ापुढे जोडण्यासारखे. इतके ‘धाडस’ (?) फक्त दोन देशांनी केले आहे. चीन आणि रशिया. या दोन देशांच्या करोना लस उपयुक्ततेचे कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत. तरीही त्या देशांच्या दांडगट राजवटींनी लशीकरण मोहिमा हाती घेतल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर भारतीय लशींची परिणामकारकता शास्त्राधारे सिद्ध व्हायला हवी. अन्यथा आपण या दोन देशांच्या पंगतीतील ठरू. इतकी सुस्पष्ट, नि:संदिग्ध भावना व्यक्त करण्याचे धाडस आपले तज्ज्ञ दाखवत असतील, तर सर्वसामान्यांसाठीही हे प्रकरण गंभीर ठरते. त्यामागील काही प्रमुख कारणांची चर्चा व्हायला हवी.
यातील पहिला मुद्दा या लस-विकसनाच्या तंत्राचा. ही लस संपूर्णपणे ‘इनअॅक्टिव्हेटेड व्हायरस’ पद्धतीने विकसित केली गेली. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते ही पद्धतच मुळात अत्यंत जुनी असून प्रचलित काळात फक्त अर्भकांना दिल्या जाणाऱ्या लशींच्या विकासासाठी ती वापरली जाते. करोनाची लस तशी नाही. ती लहानमोठय़ा सर्वानाच टोचली जाणार आहे. दुसरा मुद्दा या लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यातील निष्कर्षांचा. ते अद्याप आलेले नाहीत. यांतील काही चाचण्या तर नोव्हेंबर महिन्यातच सुरू झाल्या. या चाचण्यांचे निष्कर्ष तपासणे दूरच, पण ते हातीही आलेले नाहीत. त्याआधीच या लशीस मंजुरी कशी? तिसरा मुद्दा या लशीच्या उपयुक्ततेच्या दाव्यांच्या तपासणीचा. शास्त्रीय पद्धत अशी की, ती विविध पातळ्यांवर होते. औषधक्षेत्रातील मातबर शोधपत्रिकांत नव्या औषध/लसीचे प्रबंध सादर केले जातात आणि त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडूनच त्यांची छाननी होते. आपल्या भारतीय लशीबाबत ही प्रक्रिया पूर्णत्वास गेलेली नाही. आपत्कालीन परिस्थितीत या प्रचलित पद्धतीस फाटा देऊन लशीस थेट मान्यता दिल्याचे सरकार सांगते. त्यावर अविश्वास नाही. पण आपत्कालीन परिस्थितीतही सुरक्षा आणि परिणामकारकता चाचण्या वगळल्या जात नाहीत. पण कोव्हॅक्सिनचा मात्र याबाबत अपवाद झाल्याचे तज्ज्ञ दाखवून देतात. हा चौथा मुद्दा.
पाचवा मुद्दा या लशीस परवानगी देताना आपल्या सरकारी यंत्रणेने वापरलेल्या भाषेचा. ही लस ‘राखीव’ (बॅक अप) म्हणून वापरली जाईल असे या संदर्भात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणते. म्हणजे काय? क्रिकेटमधील ‘राखीव खेळाडू’ ही संकल्पना वैद्यकीयक्षेत्रातही आणण्याचा विचार स्तुत्य. क्रिकेटमध्ये त्याचा अर्थ ‘कामचलाऊ’ वा ‘वेळ मारून नेणारा’ असा होतो. लस कशी तशी असू शकते? ‘‘अन्य लस नाही का, मग ती मिळेपर्यंत राखीव ‘कोव्हॅक्सिन घ्या,’’ असे करोनाग्रस्तास सांगणे कसे वाटेल याचा विचार सरकारी यंत्रणांनी करून पाहावा. सहावा मुद्दा, ही लस ‘वैद्यकीय चाचणी’ गटात (क्लिनिकल ट्रायल मोड) दिली जाईल. या शब्दप्रयोगास काय म्हणावे? चाचण्या आधी होतात. मग त्या निष्कर्षांवर संबंधित औषधास लशीचा दर्जा दिला जाऊन ती बाजारात येते. बाजारात आलेले उत्पादन मग ‘चाचणी गटात’ कसे काय ठेवणार? तसे ते ठेवायची सरकारची इच्छा असली तरी मग या चाचण्यांचे नियंत्रण करणार कोण? या प्रश्नाचे कारण म्हणजे, सरकारी मंजुरीनंतर ही लस खुल्या बाजारात विक्रीस येऊ शकते. तशी ती आल्यावर तिच्या वापराचा पाठपुरावा करणार कसा? चाचण्या करावयाच्या तर त्यासाठी वैद्यकीय समित्या स्थापन करणे, वापरानंतरच्या परिणाम-मापनाची व्यवस्था करणे आदी उपाययोजनाही कराव्या लागतात. त्यांचे काय? या लशीस ‘जनतेचे हित’ (पब्लिक इंटरेस्ट) लक्षात घेऊन तिच्या ‘अत्यंत काळजीपूर्वक’ (अॅबंडंट कॉशन) वापरासाठी मंजुरी दिल्याचे सरकार म्हणते. जनतेच्या हिताची इतकी काळजी आहे, तर मुदलात ती दूर करूनच या लशीच्या वापराची परवानगी हवी. लस वापरायला परवानगी द्यायची आणि ‘अत्यंत काळजीपूर्वक’ ती वापरा असा इशाराही द्यायचा. याचा परिणाम त्यामुळे ती न वापरण्यावरच होण्याची शक्यता अधिक. सरकारला ते अपेक्षित आहे काय, हा सातवा मुद्दा. ही सर्व माहिती आणि हे सर्व शब्दप्रयोग लशीची घोषणा करणाऱ्या पत्रकार परिषदेतील. पण ती एकतर्फी झाली. माहिती दिल्यावर तिच्यावर आधारित पत्रकारांच्या प्रश्नांना संबंधित सरकारी अधिकारी सामोरे गेलेच नाहीत. आता सरकारी यंत्रणेचे अधिकारीही पत्रकार परिषदा टाळणार असतील आणि तेही करोनाकालीन आरोग्यासारख्या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर- तर कठीणच म्हणायचे. आणि आठवा मुद्दा असा की, सरकारी अधिकाऱ्यांच्या या अशा वर्तनामुळे या लशीस मान्यता देण्यासाठी दबाव होता किंवा काय असा संशय घेण्यास जागा राहाते, त्याचे काय? सरकारला असे होणे निश्चितच अभिप्रेत नसणार. मग या इतक्या सव्यापसव्याचा अर्थ आणि त्यामागील कारण कोणते?
‘‘वैद्यकीय विश्वात असे कधी झालेले नाही. मी हे पहिल्यांदाच पाहाते आहे,’’ अशी यावर आपल्याकडील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या साथआजारतज्ज्ञ डॉ. कांग यांची प्रतिक्रिया म्हणूनच महत्त्वाची ठरते. तिसऱ्या चाचणीफेरीसाठी स्वयंसेवकांची नोंदणी सुरू होत असताना या लशीस थेट मान्यताच मिळाली यामुळे डॉ. कांग आश्चर्यचकित झाल्या. वैद्यकीय नीतिमत्तेविषयी सजग संघटनेशी संबंधित डॉ. भान यांनी तर यावर ‘हे असे चीन वा रशियात होते’ अशी प्रतिक्रिया दिली, यातच काय ते आले. सरकार वा त्यांच्या भक्तांस चीन वा पाकिस्तानशी आपली तुलना होणे अभिमानास्पद वाटते किंवा काय हे कळावयास मार्ग नाही. पण ही काही आनंदून जावे अशी बाब नाही.
म्हणून सरकारने तरी असे प्रकार टाळायला हवेत. ही लस कमअस्सल आहे असे खचितच नाही. ही लस जगात सर्वोत्तम ठरावी, अशीच पंतप्रधानांप्रमाणे नागरिक तसेच या तज्ज्ञांचीही इच्छा. त्यांचे म्हणणे फक्त इतकेच की, ते तसे सिद्ध होऊ द्या आणि त्याचा तपशील जाहीर करा. स्वत:च स्वत:ला सर्वोत्तमतेचे प्रमाणपत्र राजकारणात देता येते. विज्ञानास पुरावा लागतो. तो येथे नाही, हे सत्य. पण अशा काही सिद्धतेशिवाय अलीकडे अनेक उत्पादने ९९.९९ टक्के जिवाणू/ विषाणूमुक्तीचा दावा करतात. वास्तविक प्रश्न असतो तो ०.१ टक्क्याचा. त्याविषयी मात्र मौन. यामुळे ही अशी उत्पादने आणि त्यांचे दावे हास्यास्पद ठरू लागले आहेत. स्वदेशी लशीबाबत असे होता नये इतकेच काय ते.
च
चेतन सुभाष गुगळे
Sat, 05/29/2021 - 20:32
नवीन
वर दिलेला अग्रलेख हा ५ जानेवारी २०२१ रोजी प्रसिद्ध झाला आहे. पाच महिन्यात असे काय घडले आहे की लस जीवन वाचविण्याचा एकमेवाद्वितीय पर्याय बनली आहे?
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6