Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

‘शेजाऱ्या’चे ओझरते दर्शन

ह
हेमंतकुमार
Mon, 11/29/2021 - 10:18
💬 181 प्रतिसाद
गेल्या २५-३० वर्षांत आपल्यापैकी अनेक जणांच्या कुटुंबात वा नात्यात कोणी ना कोणी परदेशी गेलेले किंवा जाऊन आलेले आहे. पर्यटन, शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय अशा अनेक हेतूंनी लोक परदेशात जातात. त्यामुळे अनेक कुटुंबांच्या गाठीशी परदेश प्रवासाचे विविध अनुभव साठलेले असतात. जेव्हा विविध कारणांमुळे होणाऱ्या कौटुंबिक मेळाव्यांना लोक एकत्र जमतात तेव्हा हटकून परदेशातील अनुभवांची देवाणघेवाण होते. असाच एक मेळावा एकदा आमच्या घरी भरला होता. त्या समूहातील ६ जण विविध देशांमध्ये जाऊन आलेले होते. अमेरिका कॅनडापासून ते ऑस्ट्रेलिया जपानपर्यंत अनेक देशांच्या अनुभवांवर गप्पा चालू होत्या. सांगणाऱ्यांच्या अनुभवांचे धबधबे कोसळत होते आणि ऐकणारे त्यात न्हाऊन निघत होते ! मला एकदम लहर आली आणि म्हटलं, आता जरा यांची फिरकी घेऊ. मग मी सर्वांना म्हणालो, “तुम्ही बरेच जण जगातील अनेक प्रगत व सधन देशांमध्ये जाऊन आलेले आहात. पण माझे एक वैशिष्ट्य आहे. मी अशा एका देशामध्ये जाऊन आलेलो आहे की जिथे तुमच्यापैकीच काय पण माझ्या माहितीतील अन्य कोणीही तिथे गेलेले नाही. मी ९९.९% खात्रीपूर्वक सांगू शकतो की तुमच्यापैकी कोणीही त्या देशाला आयुष्यात भेट देण्याची शक्यता नाही. तर आता माझा प्रश्न असा आहे की तुम्ही तो देश ओळखा” ! इतका वेळ हसत खिदळत गप्पा चालल्या होत्या. माझ्या या निवेदनानंतर एकदम सन्नाटा पसरला. अनेकांना आश्चर्य वाटले की मी एवढे छातीठोक कसे सांगू शकतोय. सगळ्यांचे चेहरे आश्चर्यचकित झालेले. मग मी म्हणालो, “प्रयत्न करा, सुरुवात तर करा ओळखायला, पाहिजे तर मी पैज लावतो”! मग आशिया, युरोप, दक्षिण अमेरिका व आफ्रिका या खंडांतील अनेक आणि काही अतिपूर्वेकडील देशांची नावे लोकांनी सांगितली. तरीपण अद्याप त्यांनी माझे उत्तर काही ओळखले नव्हते. मग मी थोडी भर घातली, “देश आपल्यासारखाच आहे. प्रगत किंवा सधन म्हणता येणार नाही. मग अजून काही न ऐकलेल्या देशांची नावे पुढे आली. तरीसुद्धा अजून उत्तर सापडत नव्हते. शेवटी एकमुखाने सगळे म्हणले, आम्ही हरलो बुवा. मग मी जाहीर केले, “मी ज्या देशाला भेट देऊन आलेलो आहे तो म्हणजे पाकिस्तान” ! माझे उत्तर ऐकल्याबरोबर मागच्यापेक्षाही अधिक सन्नाटा पसरला. अनेकांचे चेहरे वाकडे झाले. काहींच्या कपाळावर आठ्या उमटल्या. मग एक जण म्हणाले, “तुम्ही काही सरकारी अधिकारी, खेळाडू, सैनिक, कलाकार किंवा पत्रकार असे काही नाहीत ते माहित आहे. तसेच तुम्ही इतिहास संशोधक, राजकीय अभ्यासक किंवा गेला बाजार, जातिवंत पर्यटक देखील नाही. मग असं वाटतंय की कशाला मरायला हा माणूस गेला होता पाकिस्तानात ? तुम्ही तिम्बक्तूला गेलो असे म्हटला असतात तरी आमचा विश्वास बसला असता ! पण पाकिस्तान, छे, काहीतरीच काय“ ! मी हसलो आणि म्हणालो, “बरोबर आहे तुमचा तर्क. पण मी तिथे जाऊन आलोय हे वास्तव आहे. आता तिथे मी का जाऊन आलो ते मी तुम्हाला सांगतो”. .. वाचकमित्रहो, असा हा आमच्या आप्तस्वकीयांसमवेत घडलेला संवाद होता. थोडे पुढे जाऊन मी म्हणतो की, हा लेख जे वाचक वाचणार आहेत त्यांच्यापैकीही कोणी पाकिस्तानला गेले असण्याची शक्यता जवळजवळ नाही. पुन्हा एकदा मी हे विधान ९९% खात्रीने करतोय. अर्थात उरलेला १ टक्का मी बाकी ठेवतोय याचे कारण असे : ध्यानीमनी नसताना मी नाही का गेलो त्या देशात? तसा चुकून एखादा इथेसुद्धा सापडू शकतो. तर मग आता तुमच्याही मनात प्रश्न आला असेल, की कशाला उठून गेला हा बाबा तिकडे पाकिस्तानात ? 😀 तर आता ती कथा सांगतो. सुरुवातीला एक स्पष्ट करतो, की मी काही कामासाठी तिथे गेलो होतो आणि अगदी अल्पकाळ म्हणजे जेमतेम ३ दिवस वास्तव्य करून लगेच भारतात परतलो होतो. त्यामुळे रूढ अर्थाने हे पर्यटन नाही याची नोंद घ्यावी. आपल्याकडील ज्या लोकांचे नातेवाईक पाकिस्तानात आहेत असे लोक (व अन्य काही अपवाद) वगळता, सामान्य भारतीय नागरिक पाकिस्तानला हौसेने जाण्याचा विचार स्वप्नात देखील करत नाही. म्हणून माझा हा एक वेगळा अनुभव लिहिणे असा या लेखाचा हेतू आहे. ….. तर मग सुरुवात करतो. घटना आहे १९८० च्या दशकातल्या पूर्वार्धातील. तेव्हा मी नुकताच एमबीबीएस झालो होतो. आता पुढे काय करावे या विचारात एक गोष्ट अशी ठरवली, की अमेरिकेत जाण्याच्या डॉक्टरांसाठीच्या स्पर्धात्मक परीक्षेला बसावे. ही स्पर्धात्मक परीक्षा आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांमध्ये होते पण त्याकाळी भारतात मात्र त्याची केंद्रे नव्हती. १९६० च्या दशकामध्ये भारतात ती केंद्रे होती पण पुढे ती बंद करण्यात आली. त्यामागील हेतू हा असावा की जर आपल्या देशात केंद्रच ठेवले नाही तर परीक्षेला बसणाऱ्या लोकांची संख्या आपोआपच मर्यादित राहते. आपले डॉक्टर्स शक्‍यतो आपल्याच देशात राहावेत हा या सगळ्या मागचा उद्देश असावा. ज्या देशांचे धोरण असे नव्हते, त्यांनी आपापल्या देशांमध्ये अमेरिकेच्या परीक्षेसाठी केंद्रे ठेवली होती. माझे एक नातेवाईक सिलोनला (आताच्या श्रीलंकेला) जाऊन ही परीक्षा देऊन आल्याचे मला माहित होते. तेव्हाची आमची कौटुंबिक आर्थिक स्थिती सामान्य होती. परीक्षेसाठी लागणारे डॉलर्समधील शुल्क अमेरिकेतील नातेवाईकांच्या मेहेरबानीने मिळाले. आता प्रत्यक्ष परीक्षेस जाऊन बसण्याचा खर्च एवढी बाजू आम्ही सांभाळायची होती. त्यामुळे जो काही प्रवासखर्च होईल तो कमीत कमी असावा असेच ठरवणे भाग होते. त्या काळी जे विद्यार्थी पुरेसे सधन होते ते अशा निमित्ताने सिंगापूर, फिलिपिन्स आणि तत्सम देशांनाही भेट देऊन परीक्षेच्या जोडीने सहल व मौजमजा करून येत. आम्ही जेव्हा परीक्षा केंद्रांच्या तक्त्यावर नजर टाकली तेव्हा लक्षात आले, की आपल्याला परवडण्यासारखी केंद्रे दोनच असून ती पाकिस्तानात आहेत. त्यापैकी एक म्हणजे कराची आणि दुसरे लाहोर. मग जरा आजूबाजूला चौकशी करून आम्ही अधिक माहिती काढली तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली. भारतातील बरेच डॉक्टर्स या कामासाठी पाकिस्तानला जायचे. सर्वसाधारण आपल्या भौगोलिक प्रांतानुसार केंद्र निवडीची विभागणी झालेली होती. संपूर्ण उत्तर आणि मध्य भारतातील डॉक्टर्स लाहोरला जात. तेव्हा अमृतसर ते लाहोर ही रेल्वेसेवा सुद्धा उपलब्ध होती. त्यामुळे त्यांच्यासाठी हा प्रवास तर अगदी स्वस्तातला. तर पश्चिम आणि दक्षिण भारतातील विद्यार्थी कराची केंद्र निवडायचे. माझ्यासाठी मुंबई ते कराची हा विमानप्रवास हाच मार्ग सगळ्यात स्वस्त ठरणार होता. मग अर्ज भरला आणि कराचीची निवड केली. आता पुढचा टप्पा होता पाकिस्तानचा व्हिसा मिळवणे. तेव्हा काहीतरी कारणामुळे मुंबईतील पाकिस्तानी दूतावासाचे उपकेंद्र बंद होते. त्यामुळे दिल्लीला जाणे हाच एकमेव पर्याय शिल्लक होता. त्या आधी सांगितले पाहिजे, की मी नुकताच पदवीधर झालेला असल्याने माझ्या जवळ कुठल्याही प्रकारची आर्थिक बचत वगैरे नव्हती. किंबहुना पासपोर्ट म्हणजे काय हे फक्त ऐकून माहित होते. मग तातडीने मुंबईला जाऊन आयुष्यातील पहिला पासपोर्ट काढला. तेव्हाच्या पासपोर्टच्या पहिल्या पानाच्या मागच्या बाजूस एक ठळक सूचना दिलेली असायची : “ सदर पारपत्रधारकाला दक्षिण आफ्रिका सोडून जगातील अन्य सर्व देशांना जाण्यास परवानगी दिलेली आहे”. ok याचे कारण म्हणजे तेव्हा दक्षिण आफ्रिकेचे वर्णद्वेषी धोरण चालू होते. म्हणून भारताने त्यांच्याशी राजनैतिक संबंध ठेवलेले नव्हते. मग दिल्लीला जायचे ठरले. अशा तऱ्हेने आयुष्यातील पहिली दिल्लीवारी या कामाच्या निमित्ताने झाली. दिल्लीमध्ये त्यांच्या दूतावासात गेलो आणि परीक्षेसंबंधी माहिती दाखवल्यावर त्यांनी ७ दिवसांसाठी फक्त कराचीचा व्हिसा मंजूर केला (व्हिसावर तसे वाक्य बॉलपेनने लिहून त्यावर सेलोटेप लावला होता ते आठवते). आम्ही व्हिसा मिळवण्यासाठी जेव्हा दिल्लीला गेलो होतो तेव्हा तिथे कडाक्याची थंडी होती. तोपर्यंत महाराष्ट्र न सोडलेल्या मला उत्तरेतील मरणाची थंडी म्हणजे काय असते ते समजले. हे सर्व तांत्रिक सोपस्कार पूर्ण झाले. एकीकडे जमेल तसा अभ्यास चालू होता. अखेर परीक्षा जवळ आली. आता पहिला प्रश्न होता तो म्हणजे तिथे कराचीमध्ये राहायचे ठिकाण ठरवणे. त्याकाळी आपल्याकडे आंतरजाल तर जाऊद्या पण संगणक सुद्धा नव्हते. मग काही ओळखीच्या लोकांना कामाला लावले आणि थोडीफार माहिती काढली. आमची परीक्षा होती ‘ताज इंटरनॅशनल’मध्ये. नावावरुनच लक्षात आले की तिथे राहणे काही आपल्याला परवडायचं नाही. मग थोडेफार नकाशे पाहिल्यावर असे लक्षात आले की या परीक्षेच्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरावर ‘मेहरान’ नावाचे एक हॉटेल आहे जे आपल्या खिशाला परवडू शकेल. आणि मुख्य म्हणजे तिथे मिश्राहारी भोजन व्यवस्था होती. मग मेहरान हॉटेल मोजून ३ दिवसांसाठी फोनद्वारा आरक्षित केले. आता परीक्षा एक दिवसावर येऊन ठेपली होती. मुंबई ते कराची विमान प्रवासाचे तिकीट काढले होते. म्हटलं, चला या निमित्ताने आयुष्यातला पहिला विमान प्रवास घडतो आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी मुंबईमध्ये विमानात बसलो. कुठलीही गोष्ट प्रथम अनुभवताना माणूस हरखून जातो तसे माझेही झाले. साधारण एक तास वीस मिनिटात कराचीला पोहोचलो. जेव्हा आपण भारतातून श्रीमंत देशांमध्ये जातो तेव्हाची प्रवासवर्णने वाचली की एक गोष्ट लक्षात येते. मुंबईतून जेव्हा विमान उडते तेव्हा आपल्याला सुंदर इमारतींच्या जोडीने झोपडपट्ट्यांचा महासागरही दिसतो आणि परदेशात विमान उतरत असताना मात्र एकदम सगळेच चकचकीत, लखलखीत, परीराज्यासमान दृश्य वगैरे दिसते. माझ्या या परदेश प्रवासात मात्र हा फरक उद्भवणार नव्हता. इथून उडताना आणि तिथे उतरताना दोन्हीकडे समानच दृश्य नजरेस पडले. अखेर कराचीमध्ये उतरलो. तेव्हा त्या विमानतळावर नूतनीकरणाचे वगैरे काम चालू होते. तसा तो सामान्य दर्जाचा वाटला. (पुढे काही वर्षांनी मात्र पाकिस्तानने त्यांचे सर्व विमानतळ अत्यंत शाही रीतीने सजवले होते. ते भारतापेक्षा अधिक डामडौलाचे आहेत असे वर्णन मी खुशवंतसिंग यांच्या एका पुस्तकात नंतर वाचले होते). विमानतळापासून हॉटेलकडे जाताना रस्त्यावर नजर टाकली. थोडा परिसर बघितला आणि लक्षात आले की या शहराचा तोंडवळा आणि रचना साधारण मुंबईप्रमाणेच आहे. एक प्रकारे ही पाकिस्तानची मुंबई म्हणता येईल. गरीबी -श्रीमंतीचा निकट सहवास हे दोन्ही शहरांचे समान वैशिष्ट्य. आम्ही ज्या टॅक्सीत बसलो होतो ती जपानमधून आयात केलेली कार होती तोपर्यंत भारतात मारुती कार सामान्य माणसाच्या हातात फारशी दिसत नव्हती. पाकिस्तानात बहुतेक कार उद्योग यथातथाच असावा. त्यामुळे तेव्हा ते परदेशी गाड्या थेट आयात करत होते. आमचे हॉटेल आल्यावर टॅक्सीतून उतरलो व आपल्या फियाटच्या सवयीनुसार धाडकन ते दार लावले ! तो मोठा आवाज ऐकल्यावर ड्रायव्हर माझ्यावर चांगलेच डाफरले. यावरून ही नाजूक प्रकारची गाडी आहे आणि दार हळुवार लावायचे असते हा धडा प्रथम मिळाला. मग हॉटेलच्या खोलीत पोचलो. दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्याने फार काही करायला वाव नव्हता. अभ्यास करणे भाग होते. परीक्षेचा दिवस उजाडला. परीक्षा एकूण दोन दिवस होती रोज सहा तास. त्यापैकी दर दोन तासांनी थोडावेळ विश्रांतीचा असे. परीक्षेच्या २ सत्रांमध्ये त्यांनी दुपारच्या खाण्याची किरकोळ व्यवस्था केली होती. ही परीक्षा संपूर्ण वस्तुनिष्ठ स्वरूपाची होती उत्तरपत्रिकेवर योग्य त्या पर्यायांच्या पुढे पेन्सिलने खूण करायची होती. संपूर्ण परीक्षेत कुठेही पेन लागणार नव्हते. परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून स्कर्ट परिधान केलेल्या दोन जाडजूड अमेरिकी बायका आलेल्या होत्या. त्यांच्या देहबोलीवरूनच त्या कडक असल्याचे लक्षात आले. त्यांनी सुरुवातीला महत्वाची सूचना केली, “जेव्हा परीक्षेचा वेळ संपल्याची घोषणा होईल तेव्हा सर्वांनी आपापल्या पेन्सिली ताबडतोब खाली ठेवल्या पाहिजेत. या शिस्तीचे पालन न केल्यास तुमची उत्तरपत्रिका रद्द ठरवण्यात येईल”. ही सूचना ऐकल्यावर लगेच काही त्याचे गांभीर्य जाणवले नाही. दुपारच्या सत्रात वेळ संपल्याचे जाहीर झाल्यावरही (पेपर गोळा करेपर्यंत) तीन विद्यार्थी लिहीतच होते. हे त्या बायकांच्या लक्षात आल्यावर त्या तातडीने पळत त्या विद्यार्थ्यांकडे गेल्या. त्यांनी त्या मुलांना तुम्ही नियम मोडल्याचे सांगून लगेचच त्यांच्या उत्तरपत्रिकांवर काट मारून त्या रद्दबादल ठरवल्या. इतकी करडी शिस्त मी आयुष्यात प्रथमच पाहिली. परीक्षेच्या शुल्कामध्ये त्यांनी खाण्यासाठीचे पैसे घेतलेले होते. त्यातून त्यांनी एका कागदी खोक्यामध्ये आम्हाला अल्पोपहार दिला. ते खोके उघडून पाहिल्यावर त्यात फक्त एक केळ व एक कबाबचा तुकडा असे खाद्य होते. मला केळ अजिबात आवडत नाही. पण आता करतो काय ? थोड्याशा वेळात काहीतरी खाणे भागच होते. तेव्हा मी मिश्राहारी होतो ते एका दृष्टीने बरेच झाले. भुकेच्या वेळी जे अन्न समोर येईल ते खाण्यात शहाणपण असते. पुढे माझ्या मुलांना मी हा किस्सा सांगितला आणि एक सल्ला दिला, “जरी परंपरेने आपण घरी शाकाहारी असलो तरी जगाच्या पाठीवर कुठेही वेळप्रसंगी तरुन जायचे असेल तर सर्व काही खायची सवय असलेली बरी असते”. पहिल्या दिवशीचा पेपर संपल्यानंतर ताजमधून बाहेर पडलो आणि चालतच मुक्कामाच्या हॉटेलकडे जायचे ठरवले. तेवढेच टॅक्सीच्या पैशांची बचत आणि थोडेफार काहीतरी बघता यावे हा उद्देश. सहज रस्त्यावरील एक-दोन दुकानांमध्ये डोकावलो. दुकानाची रचना अगदी आपल्यासारखीच होती. दुकानदारांनी, “आप इंडियासे आये है ना” असे म्हणून स्वागत केले व आदराने बोलले. चहा मागवला. आपल्या व त्यांच्या प्रमाणवेळेत अर्ध्या तासांचा फरक असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. एकंदरीत पाहता पाकिस्तानी माणूस आपल्या कुठल्याही उत्तर भारतीय माणसाप्रमाणे दिसतो. तिथून भ्रमंती करीत हॉटेलात पोचलो. रात्री हॉटेलमध्ये अगदी पोटभर वरण-भात खाऊन घेतला तेव्हा कुठे जीव शांत झाला. परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी सर्वसाधारण पहिल्या दिवसाप्रमाणे सर्व काही झाले. आता कालच्या प्रकारानंतर विद्यार्थ्यांना कडक शिस्तीची कल्पना आलेली होती. त्यामुळे आज कोणीही वेळ संपल्यानंतर लिहित बसायची आगळीक केली नाही. अखेर पूर्ण परीक्षा संपली. एकंदरीत ही वस्तुनिष्ठ परीक्षा म्हणजे बुद्धीला खुराक होता. वस्तुनिष्ठ प्रश्नांचे अनेक अवघड आणि गोंधळात टाकणारे प्रकार इथे अनुभवायला मिळाले. एखाद्या विषयाचे सखोल वाचन असल्यासच आपण अचूक उत्तर देऊ शकतो हे लक्षात आले. परीक्षा केंद्राला टाटा केल्यावर पुन्हा एकदा चालतच रस्त्याने निघालो. साधारणपणे आपण भारतातच आहोत अशीच भावना होती. काही खास वेगळे असे त्या भागात तरी जाणवले नाही. रस्त्यांवरील अ/स्वच्छता आणि बे/शिस्त अगदी आपल्याप्रमाणेच. एकेकाळचे आपण भाऊ भाऊच आहोत हा विचार मनात बरेचदा येऊन गेला. आता उरलेल्या वेळात ओळखीने एकच कार्यक्रम ठेवलेला होता तो म्हणजे तिथल्या एका रूग्णालयाला भेट देणे. मग घाईत तिकडे पोचलो. दोन-तीन डॉक्टरांशी गप्पा झाल्या. त्यापैकी एक डॉक्टर मुकेश हा सिंधी होता. त्याने आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्याच्या कुटुंबामध्ये फाळणीच्या वेळेस बऱ्याच हत्या झालेल्या होत्या. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर कायमस्वरूपी खिन्नतेचे सावट होते. त्याचे काही नातेवाईक भारतात येऊन स्थायिक झाले होते. त्यापैकी काही तर पिंपरी-चिंचवडला असल्याचे त्याने सांगितले. त्यासंदर्भात 1947 साली एक एकतर्फी करार दोन्ही देशांदरम्यान झाल्याचे त्याच्याकडून समजले. या करारातील तरतूद अशी आहे : जर पाकिस्तानातील एखाद्या व्यक्तीला भारतात येऊन वास्तव्य करावेसे वाटले तर भारत सरकार विचार करून त्या व्यक्तीला एक वर्षाचा व्हिसा देते. पुढे दरवर्षी त्याचे नूतनीकरण काही अटींवर होऊ शकते. याला अनुसरून मुकेशचे काही नातेवाईक भारतात आले. त्यापैकी काहींना येथे स्थिरस्थावर होणे जमले व कालांतराने त्यांनी भारताच्या नागरिकत्वासाठी अर्ज केलेला होता. परंतु त्याच्या अन्य काही नातेवाईकांना इथे काही जम बसवता आला नाही. त्यातून निराश होऊन पुन्हा पाकिस्तानात परतही जावे लागले होते. हे सर्व पाहता मुकेशची मनस्थिती द्विधा होती. त्याच्या मनात आज ना उद्या मध्यपूर्वेतील देशांमध्ये दीर्घकाळ रहावे असे होते व तेथून जमल्यास पाश्चिमात्य देशांमध्ये जायचा त्याला प्रयत्न करायचा होता. मुकेशला मनापासून शुभेच्छा देत आम्ही ती रुग्णालय भेट आटोपती घेतली. आता लगेचच हॉटेलवर जाऊन सामानाची बांधाबांध करून परतीच्या प्रवासास निघायचे होते. त्यांनी व्हिसा जरी ७ दिवसांचा दिलेला असला तरी मला तिथे उगाच भटकणे परवडणारे नव्हते. मग काही तासातच आम्ही परीक्षेला बसलेले काही जण परतीच्या प्रवासासाठी कराची विमानतळावर हजर झालो. तिथे एकमेकांना आलिंगन देत निरोप घेतला. आमच्या सर्वांच्या बोलण्यात एक समान मुद्दा होता. भविष्यात आम्ही मनाप्रमाणे विविध देशांचे पर्यटन करू शकू. पण त्या पर्यटनाच्या यादीमध्ये एरवी पाकिस्तानचा समावेश चुकूनही झाला नसता. या परीक्षेच्या निमित्ताने आपण एकेकाळी अखंड भारताचाच भाग असलेल्या प्रदेशाला भेट दिली एवढे साध्य झाले होते. तसेच खुद्द परीक्षेचा अनुभवही अविस्मरणीय होता.(यथावकाश त्या परीक्षेचा निकाल लागून मी त्या परीक्षेत ८० पर्सेंटाइल गुणांनी उत्तीर्ण झालो). जेमतेम तीन दिवसाच्या या छोट्या मुक्कामात माझ्या मनात कराची म्हणजे दुसरी मुंबई एवढीच भावना निर्माण झाली. त्या काळी भारतात सिंधी लोकांनी चालवलेली ‘कराची स्वीट मार्ट’ अशी मिठाईची प्रसिद्ध दुकाने असायची. त्या दुकानांमधून आम्ही वेफर्स वगैरे आवडीने आणायचो. त्या दुकानांचे नाव ज्या गावावरून आले ती कराची आपण पाहिली असे एक मानसिक समाधान लाभले. तिथल्या सामान्य माणसांवर नजर टाकता ते आणि आपण सामाजिक वावरात तसे सारखेच आहोत हे दिसून आले. दोन राष्ट्रांमध्ये स्वातंत्र्यापासूनच वैरभाव निर्माण झालेला आहे खरा. परंतु तिथल्या काही सामान्य नागरिकांशी गप्पा मारताना तो काही जाणवला नाही. भविष्यात जर दोन देशांदरम्यानचे राजनैतिक संबंध कधी सुधारलेच तर निदान दोन्हीकडच्या नागरिकांना मुक्तपणे एकमेकांच्या देशात पर्यटनासाठी जाता येईल का, असा एक भाबडा विचार तेव्हाच्या तरुण मनामध्ये येऊन गेला. परंतु आजचे अजूनच बिघडलेले वास्तव आपण जाणतोच. असो. लेखातील घटनेनंतर पुढील आयुष्यभरासाठी पाकिस्तानला जाणे हा विषय मी बाद करून टाकलेला आहे. परदेश पर्यटन करायचे ठरल्यास कुटुंबाकडून अर्थातच अन्य देशांना पसंती मिळेल. पण, आयुष्यातील पहिला विमान व परदेशप्रवास आणि पहिल्या आंतरराष्ट्रीय परीक्षेचा अनुभव या कारणांसाठी का होईना पाकिस्तान माझ्या आठवणीत राहील. ........................................................................................................................................................

प्रतिक्रिया द्या
54576 वाचन

💬 प्रतिसाद (181)
ह
हेमंतकुमार Sun, 04/24/2022 - 01:31 नवीन
२००४ साली म्हटले होते (एका मित्राने)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump
स
सुधीर कांदळकर Wed, 12/01/2021 - 02:28 नवीन
फर्स्ट हॅन्ड अनुभव फ्रॉम हॉर्सेस माऊथ वाचून बरे वाटले. राजकीय वा प्रचारकी लेखन नसल्यामुळे असे अस्सल आणि खरे अनुभव आचायला छानच वाचले. आपण कोणी सेलिब्रिटी नसल्यामुळे अस्सलतेची खात्रीच. पाकिस्तानी लोकांच्या क्रिकेटप्रेमाबद्दल आणि भारतीयांना त्यांच्याकडून मिळणार्‍या वागणुकीबद्दल चेंडूफळी खेळाडू वीरेन्द्र सेहवागनेही चांगलेच उद्गार काढले आहेत. पण तो सेलिब्रिटी असल्यामुळे त्याचे अनुभव चांगलेच असणार. जाता जाता: कराचीमधील ट्राम आणि बस सेवा स्वातंत्र्यपूर्व काळी मुंबईची बीईएसटी चालवीत असे. तेथील बसेस आणि ट्रामवर बीईएअटी हीच इंग्रजी अक्षरे असत. वीजपुरवठा देखील बीईएसटीच पाही की नाही ठाऊक नाही. माझ्या एका मित्राच्य वडिलांना फाळणीवेळी कराचीतले ब्राह्मण आळीतले घरदार सोडून यावे लागले होते. छान लेखाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 12/01/2021 - 03:56 नवीन
१. चंसुकु >>+११ २. सुधीर >> माहितीपूर्ण छान प्रतिसाद. ...... गेले ते दिन ... एकेकाळी पाकमध्ये असलेल्या मराठी पाऊलखुणा : १. कराचीतील मराठी शाळा (संस्थापक: लागू खाडिलकर ). २. कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ: https://kmspmandal.in/history-of-karachi-maharashtriya-shikshan-prasarak-mandal/ ३. लाहोरच्या भारतीय संगीत विद्यालयाबद्दल काही वाचनात आले होते. बहुतेक पंडित पलुस्कर किंवा पंडित भीमसेन यांच्यापैकी कोणाचा तरी तिथे बऱ्यापैकी संबंध होता, असे अंधुकसे आठवते.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 12/01/2021 - 04:17 नवीन
लाहोरच्या भारतीय संगीत विद्यालयाबद्दल काही वाचनात आले होते. बहुतेक पंडित पलुस्कर किंवा पंडित भीमसेन यांच्यापैकी कोणाचा तरी तिथे बऱ्यापैकी संबंध होता, असे अंधुकसे आठवते.
हो. लाहोरमध्ये पंडित दि. वि. पलुसकर यांनी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
ह
हेमंतकुमार Sat, 04/23/2022 - 17:28 नवीन
पंडित विष्णू पलुसकरांनी संगीत विद्यालयाची स्थापना प्रथम लाहोरला का केली यांची कथा पंडित विकास कशाळकर यांच्या कार्यक्रमात सह्याद्री वाहिनीवर ऐकली. पंडित पलुस्कर गिरनार येथील मंदिरात गात होते. त्यांचा आवाज एका सत्पुरुषांना खूप आवडला. त्यांनी पलुसकरांना सांगितले की तुम्ही तुमची कला अनेकांपर्यंत पोचवली पाहिजे. तुम्ही पंजाबला जा. तिथे तुमचा चांगला विकास होईल. म्हणून पलुसकर १९०१मध्ये लाहोरला पोचले. आज त्यांनी स्थापन केलेल्या महाविद्यालयांचा समूह खूप मोठा आहे. सुमारे अडीच लाख विद्यार्थी त्यात शिक्षण घेतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार
श
श्रीरंग_जोशी Wed, 12/01/2021 - 04:38 नवीन
नेहमीपेक्षा अनपेक्षित अनुभवकथन खूप आवडले. आश्चर्याची बाब ही वाटली की त्या अमेरिकन संस्थेला भारतात परीक्षाकेंद्र का ठेवावेसे वाटले नाही. माझ्या वडीलांचे मामेभाऊ बहुधा याच परीक्षेत (आग्नेय आशियातल्या केंद्रावर) उत्तम यश मिळवून ७० च्या दशकात अमेरिकेत स्थायिक झाले होते. त्या परीक्षेत ते पहिल्या ३०० मधे आले होते. हा प्रदेश शेकडो वर्षांपासून आपल्या देशाचा भाग होता या कारणाने किमान एकदा मलाही तेथे जावेसे वाटते. त्यापूर्वी स्वतःचाच देश अन राज्यही फारसे पाहिले नसल्याने माझ्या पर्यटन-प्राधान्ययादीत पाकिस्तान कुठेच नाही. प्रत्यक्षात जाणे शक्य नसले तरी इतरांचे लेखन व आजकाल व्हिडिओजमधूनही उत्तम माहिती मिळत राहते.
  • द्वारकानाथ संझगिरी यांच्या स्थंभलेखनातून भारतीय संघाच्या क्रिकेट दौर्‍यांच्यावेळच्या पाकिस्तान भेटींबाबत काही वेळा वाचले होते.
  • पवन जेसवानी या पाकिस्तानी युवकाच्या युट्युब चॅनेलवर काही व्हिडिओज पाहिले होते.
  • लोकमाध्यम या हिंदी ब्लॉगवर असग़र वजाहत - पाकिस्तान का मतलब क्या ही लेखमालिका सध्या सुरु आहे.
  • पाकिस्तानातल्या देवळांबाबत युट्युबवर काही व्हिडिओज मी गेल्या वर्षी पाहिले होते.
अमेरिकेत सार्वजनिक ठिकाणी भेटलेले मूळचे पाकिस्तानी माझ्याशी आपुलकीने बोलले आहेत. कामाच्या ठिकाणीही एखादेवेळेस मूळचे पाकिस्तानी सहकारी चांगले वागले आहेत. आखातात राहणार्‍या किंवा राहिलेल्या काही मिपाकरांनी पाकिस्तानी माणसांबद्दल मिपावर पूर्वी लिहिले आहे. (बिपिन कार्यकर्ते, प्रभाकर पेठकर) प्रभाकर पेठकर यांनी बहुधा ८० च्या दशकात पाकिस्तानला भेट देखील दिल्याचे वाचले आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 12/01/2021 - 04:54 नवीन
श्रीरंग, आभार ! **आश्चर्याची बाब ही वाटली की त्या अमेरिकन संस्थेला भारतात परीक्षाकेंद्र का ठेवावेसे वाटले नाही. >>> याबद्दल लेखात दिलेली ही माहिती पहा:
१९६० च्या दशकामध्ये भारतात ती केंद्रे होती पण पुढे ती बंद करण्यात आली. त्यामागील हेतू हा असावा की जर आपल्या देशात केंद्रच ठेवले नाही तर परीक्षेला बसणाऱ्या लोकांची संख्या आपोआपच मर्यादित राहते. आपले डॉक्टर्स शक्‍यतो आपल्याच देशात राहावेत हा या सगळ्या मागचा उद्देश असावा.
......... 1960 मध्ये माझ्या एका नातेवाइकांनी ही परीक्षा मुंबईत दिली होती. तेव्हाची परिस्थिती खूप वेगळी होती. ज्या दिवशी या परीक्षेचा निकाल लागे, तेव्हा अमेरिकेचे एजंट इथल्या उत्तीर्ण झालेल्या डॉक्टरांशी स्वतःहून संपर्क करून त्यांना अक्षरशः 'उचलून' नेत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Wed, 12/01/2021 - 05:03 नवीन
लेख वाचल्यावर दोन दिवसांनी प्रतिसाद दिल्याने लेखातला हा मुद्दा माझ्याकडून निसटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
म
मनो Wed, 12/01/2021 - 05:28 नवीन
हे काही समजले नाही, असे का? >लेखातील घटनेनंतर पुढील संपूर्ण आयुष्यभरासाठी पाकिस्तानला जाणे हा विषय मी कायमचा बाद करून टाकलेला आहे. पाकिस्तानी लोकांशी अनेकदा माझा संवाद झाला आहे, आणि लाहोरमधील बसंत उत्सवबद्दल भरभरून बोलणारा अहमदखान आजही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. वर अजून कुणी लिहिल्याप्रमाणे माझेही नगरचे शेजारी मुसलमान, त्यामुळे त्यांची भीती कधी वाटली नाही. सरसकट बहिष्कारवादी भूमिका म्हणून अर्थातच पटत नाही. दोन्ही देश एकत्र होतील हे मानणे हा भाबडेपणा आहे, पण किमान एकीकडून दुसरीकडे सुलभरित्या जाता येईल (उत्तर/दक्षिण आयर्लंडप्रमाणे) असं होणें निश्चितच शक्य आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 12/01/2021 - 05:32 नवीन
मी काही जातिवंत पर्यटक नाही. परदेश पर्यटन करायचे झाल्यास तशा मर्यादा असतात. मग अन्य काही देश पाहण्यात अधिक उत्सुकता असेल. पाकिस्तान एकदा झाला तो ठीक असा लिहीण्याचा हेतू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो
ज
जेम्स वांड Wed, 12/01/2021 - 05:46 नवीन
तुमची संयत प्रतिक्रिया खूप आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो
स
सौंदाळा Wed, 12/01/2021 - 06:08 नवीन
कराचीत 'नारायण जगन्नाथ वैद्य' नावाची प्रख्यात शाळा आहे असे वाचले आहे. गुगल मॅप वर शोधल्यावर तर शाळा लगेच सापडली. रिव्ह्युसुद्धा उत्तम दिसत आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Wed, 12/01/2021 - 06:43 नवीन
@ कुमार१, तुम्ही सुदैवी आहेत, तुमचा अनुभव थरारक आहे. आता पाकिस्तानचा व्हिसा मिळणे जवळपास अशक्य आहे. पिताश्री आणि मी गेली १६ वर्षे प्रयत्न करीत आहोत. :-( मला मोहनजोदरो, थट्टा-सिंध, हुंझा, गिलगिट-बाल्टिस्तानला भेट तर द्यायची आहेच पण त्यापेक्षा जास्त मला लाहोरला संग्रहित हजारो कलाकृती डोळे मिटण्याच्या आत प्रत्यक्ष पाहायच्या आहेत. विशेषतः कांगरा-डोगरी-पहाडी शैलीतली चित्रे. मालदीवमध्ये संग्रहित अनेक इस्लामपूर्व कलाकृती तालिबानी प्रवृत्तींनी नष्ट केल्या तसे पाकिस्तानात होण्याच्या आधी हे जमवायचे आहे, शक्यता फारच कमी दिसतेय ! लेख उत्तम, नेहमीप्रमाणेच.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 12/01/2021 - 07:17 नवीन
**पाकिस्तानचा व्हिसा मिळणे जवळपास अशक्य आहे. पिताश्री आणि मी गेली १६ वर्षे प्रयत्न करीत आहोत. >>> माझ्या माहितीतील पर्यटनास उत्सुक असे काही लोक खालील 'डॉन' मधील वाक्याचा आधार घेतात : पाकिस्तानको जाना मुश्किलही नही बल्की नामुमकीन है‘ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य
स
सुबोध खरे Wed, 12/01/2021 - 07:28 नवीन
पाकिस्तानचा व्हिसा एकदा घेतला असेल तर इस्रायल किंवा अन्य काही देशात जाण्यासाठी तुम्हाला अजिबात व्हिसा मिळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 12/01/2021 - 07:55 नवीन
पाकिस्तानचा व्हिसा एकदा घेतला असेल तर इस्रायल किंवा अन्य काही देशात जाण्यासाठी तुम्हाला अजिबात व्हिसा मिळत नाही.
आपला देश जगात कसा कुख्यात आहे हे बहुदा पाकिस्तान्यांनाही माहित आहे. बहुदा त्यामुळे कर्तारपूर कॉरीडॉरला जाताना भारतीयांचा पासपोर्ट स्टॅम्प होत नाही. आपल्या पासपोर्ट नंबरशी संलग्न असा त्यांचा एन्ट्री पास मिळतो आणि त्या पासवर पाकिस्तानात गेल्याची एन्ट्री होते. पण पासपोर्टवर शिक्का येत नाही. तसा शिक्का पासपोर्टवर आला असता तर कदाचित तिथे जाणार्‍या भारतीयांची संख्या बरीच कमी झाली असती. तिथे दररोज ५ हजार भारतीयांना पास दिले जातात. समजा तितके लोक तिथे दररोज गेले तर प्रत्येकाकडून २० डॉलर असे दररोज १ लाख डॉलर म्हणजे वर्षाला ३६.५ मिलिअन डॉलरचे परकीय चलन पाकिस्तानला मिळू शकते. https://tradingeconomics.com/pakistan/foreign-exchange-reserves वर दिलेल्या आलेखावरून समजते की ही रक्कम पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत दरवर्षी भर पडते त्याच्या एक-दीड टक्का आहे. चार किलोमीटरच्या कॉरीडॉरमधून इतके उत्पन्न त्यामानाने बरेच आहे त्यामुळे अशी भारतीयांची संख्या कमी होणे त्यांनाही परवडायचे नाही. कर्तारपूर कॉरीडॉरवर बरेच युट्यूब व्हिडिओ आहेत. त्यातील एक--
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अभिजीत अवलिया Wed, 12/01/2021 - 10:14 नवीन
अगोदर इस्राईलला जाऊन यायचे मग पाकिस्तानचा व्हिसा अप्लाय करायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ज
जेम्स वांड Wed, 12/01/2021 - 10:16 नवीन
पण असे केल्यास पाकिस्तानात गेल्यावर आयएसआय पाकिस्तानी लष्कर पाहुणचार करण्याची संभावना पण वाटते भरपूर, ह्या विषाची परीक्षा कोणी पहावी म्हणे मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
अ
अभिजीत अवलिया Wed, 12/01/2021 - 10:55 नवीन
:) समजा आपण पाकिस्तानला टुरिस्ट व्हिसावर जाऊन आलो तर परत भारतात देखील खूप बारीक नजर ठेवली जात असेल आपल्यावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ह
हेमंतकुमार Wed, 12/01/2021 - 11:05 नवीन
:)) गेली ३५ वर्षे माझ्यावर तरी कुणी ठेवलेली नाही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
च
चौकस२१२ गुरुवार, 12/02/2021 - 01:30 नवीन
"पाकिस्तानचा व्हिसा एकदा घेतला असेल तर इस्रायल किंवा अन्य काही देशात जाण्यासाठी तुम्हाला अजिबात व्हिसा मिळत नाही. " हे खरे का? कि खरे आहे ते फक्त भारतीय नागरिकांपुरते ? कारण असे कि आमची एक निर्यात बघणारी व्यक्ती होती ती ( श्रीलंकन जन्माने, पण ऑस्ट्रेलियन नागरिक) ती निर्याती साठी पाकिस्तान आणि इतर देशात जायची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ह
हेमंतकुमार गुरुवार, 12/02/2021 - 03:10 नवीन
**पाकिस्तानचा व्हिसा एकदा घेतला असेल तर इस्रायल किंवा अन्य काही देशात जाण्यासाठी तुम्हाला अजिबात व्हिसा मिळत नाही. >> याचे साधारण सूत्र मला समजले. पण अजून कोणी विस्कटून सांगेल का ? म्हणजे, पाकिस्तान किंवा इस्रायलला आपण कोणीही गेलो तर अन्य काही देश आपल्याकडे दहशतवाद्यांशी संबंधित व्यक्ती म्हणूनच पाहतात का ?? की काही व्यक्ती अपवाद पण धरल्या जातात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 12/02/2021 - 03:35 नवीन
गेल्या काही वर्षांत ट्रॅव्हल ब्लॉगर्समधे २०० देशांत पाऊल ठेवण्याचा विक्रम करण्याची चढाओढ निर्माण झालेली आहे. उत्तर व दक्षिण कोरियाच्या सीमेवर एका ठिकाणी फोटो काढण्यापुरते सीमा ओलांडून जाता येते. त्यायोगे उत्तर कोरियासारख्या देशाला भेट दिल्याची नोंद करता येते. कुठलाही देश असे सरसकटीकरण करत असेल असे वाटत नाही. अधिक कडक बॅकग्राउंड चेक नक्कीच होत असेल. व्हिसाचा अर्ज करणार्‍याची पार्श्वभूमी तसेच कोणत्या देशाचा नागरिक आहे यानेही फरक पडत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 12/02/2021 - 03:58 नवीन
कुठलाही देश असे सरसकटीकरण करत असेल असे वाटत नाही.
८-१० वर्षांपूर्वी मला उगीच वेगवेगळ्या देशांचा व्हिजा मिळवायची काय पध्दत आहे, त्याचे नियम काय आहेत हे बघायची सवय लागली होती. मी आयुष्यात कधीही जायची सुतराम शक्यता नाही अशा देशांचे (मंगोलिया, बुर्किना फासो वगैरे) पण नियम मी त्यावेळी बघितले होते. त्यावेळी कळले होते की पासपोर्टवर इस्राएलचा शिक्का दिसला तर काही देशांमध्ये प्रवेश नाकारला जातो. आता इस्राएल आणि युएई-सौदीमधील संबंध सुधारत आहेत तेव्हा नियम कदाचित बदलले असतील. कल्पना नाही. मागच्या वर्षी आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये नागोरनो-काराबाख या प्रांतांवरून युध्द झाले होते. नागोरनो-काराबाख हे आर्मेनियन बहुसंख्येचा अझरबैजानमध्ये असलेले बेट आहे. हा प्रदेश अधिकृतपणे अझरबैजानचा भाग होता पण १९९४ मध्ये सोव्हिएट रशियाचे विघटन झाल्यानंतरच्या अस्थिर परिस्थितीत आर्मेनियाने आपल्या अप्रत्यक्ष नियंत्रणाखाली आणला होता. आर्मेनियाला या भागाशी जोडणारा प्रदेशही आर्मेनियाच्या ताब्यात होता. मागच्या वर्षीपर्यंत ही परिस्थिती होती. मागच्या वर्षी अझरबैजानने युध्द करून हा भाग ताब्यात घेतला. त्यापूर्वी नागोरनो-काराबाखला भेट देऊन मग अझरबैजानमध्ये प्रवेश करायचा प्रयत्न करणार्‍या परदेशी नागरीकांना थेट तुरूंगात टाकायचे प्रकार अझरबैजानने केले होते. https://www.france24.com/en/20170720-azerbaijan-jails-russian-israeli-blogger-three-years नागोरनो-काराबाखला भेट दिलेल्या लोकांना अझरबैजानने आपल्या देशात प्रवेश मिळणार नाही असे जाहीर केले होते (पर्सोना-नॉन-ग्राटा). अशा लोकांच्या यादीत अमेरिकन हाऊसची सदस्या तुलसी गॅबार्डच्या नावाचाही समावेश आहे. मी नोमॅडिक इंडिअन हा व्ही-लॉग नेहमी बघतो. दिपांशू सांगवान या भारतीय युवकाचा हा व्ही-लॉग आहे. त्याने धोका पत्करून नागोरनो-काराबाखला भेट दिल्यानंतरही अझरबैजानमध्ये प्रवेश केला. तो तिथे गेला होता हे त्याने खूप खटपटी करून लपवले. हे पुढील व्हिडिओत बघायला मिळेल. आजही त्याचे नाव अझरबैजनाच्या पर्सोना-नॉन-ग्राटा या यादीत आहे. https://mfa.gov.az/files/shares/illegally_visited.pdf तेव्हा असे सरसकटीकरण होत नाही हे सरसकटीकरण करता येईल असे वाटत नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
ह
हेमंतकुमार गुरुवार, 12/02/2021 - 04:05 नवीन
**"कुठलाही देश असे सरसकटीकरण करत असेल असे वाटत नाही. >> असेच मलाही वाटत होते. तसेच सनदी व लष्करी अधिकारी आणि इतर काही सरकारी मंडळी यांच्यासाठी तर नक्कीच वेगळे नियम असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 12/02/2021 - 04:13 नवीन
हो. ऑफिशिअल आणि डिप्लोमॅटिक पासपोर्टला आणि सामान्यांना मिळणार्‍या पासपोर्टला वेगळ्या प्रकारे वागवले जात असेल ही शक्यता आहे. त्यातही देशाप्रमाणे नियम बदलत असावेत. तुलसी गॅबार्ड अमेरिकन संसदेची सदस्या असल्याने तिला सामान्यांपेक्षा वेगळा (ऑफिशिअल किंवा डिप्लोमॅटिक- अमेरिकेतले नियम असतील त्याप्रमाणे) मिळाला असेल तरीही तिचे नाव अझरबैजानच्या पर्सोना-नॉन-ग्राटाच्या यादीत आहे. भारताचे इस्राएलबरोबर राजनैतिक संबंध १९९२ मध्ये प्रस्थापित झाले. मला वाटते त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेप्रमाणे इस्राएललाही भेट द्यायला भारतीय पासपोर्टधारक सामान्यांना बंदी होती (चुभूदेघे). तरीही मधू लिमये, नाथ पै हे समाजवादी खासदार इस्राएलला जाऊन आले होते असे वाचले आहे. खासदार असल्याने त्यांच्याकडे सामान्यांपेक्षा वेगळा पासपोर्ट होता म्हणूनच हे शक्य झाले असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 12/02/2021 - 04:39 नवीन
काही लोक बोटावर मोजता येतील एवढे अपवाद वगळता वळपास सर्व देशांमधे पाऊल ठेवू शकतात या गृहीतकावर मी वरचा अंदाज व्यक्त केला होता. कदाचित असे विक्रम करणारे लोक, जाचक अटी असणार्‍या देशांना आधी भेट देत असावेत. संख्याशास्त्रातले Critical Path Method इथे कामी येत असावेत. अशा काही व्यक्तींची उदाहरणे:
  • Drew Binsky : On October 29, 2021, Binsky visited Saudi Arabia, completing his feat of visiting every United Nations recognized country on Earth.
  • Cassandra De Pecol: n 2017, she had officially set Guinness World Records in two categories: "Fastest time to visit all sovereign countries" and "Fastest time to visit all sovereign countries - Female".[1] Both records have since been broken.
दिपांशूचे अफगाणिस्तान भेटींचे व्हिडिओज मी पाहिले आहेत. जोरदार भटकेगिरी करतो हा युवक,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार
ह
हेमंतकुमार Wed, 12/01/2021 - 07:39 नवीन
इतिहासात वाचले होते की, जेव्हा लाहोर फाळणीच्या वेळेस तिकडे गेले त्यानंतर आपण 'लाहोर कि याद भुला दे', या इर्षेने पेटून चंदीगडची उभारणी केली. हे वाचल्यावर लाहोरबद्दल कुतूहल वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 12/01/2021 - 14:48 नवीन
पाकिस्तानको जाना मुश्किलही नही बल्की नामुमकीन है‘ ! काहीही. समजा भारताने पाकिस्तान वर हल्ला केला ( जे ईंद्रा गांधींनी केलं होतं.) तर सैन्यामागे आपणही जाऊ शकतो की.पानिपतवेळी नाही का ऊत्तरेत लाखाचं लटांबर गेलं होतं? :) किंवा सैन्यात भरती होऊन पाकिस्तानात जाता येईल, किंवा अतिरेकी बनून बोर्डर क्राॅस करून ही घूसता येईल/ किंवा गुप्तहेर बनून ही जाता येईलच की. किंवा ईसीस मध्ये भरती होऊन सिरीया मग तिथून प्रमोशन घेऊन पाकिस्तान :) किंवा भारतात मोठा धमाका केला तर ऊदार अंतकरनाने पाकिस्तान आपल्याला आपल्या आत सामावून घेईल. :) त्यामुळे पाकिस्तानात जाणा मूश्किल ही नही भऊत आसान हय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 12/01/2021 - 07:32 नवीन
गिलगिट-बाल्टीस्तानला रवी प्रभू हा पहिला भारतीय युट्यूब व्हीलॉगर जाऊन आला आहे. तो तिथे कसा गेला याची कल्पना नाही. कारण पाकिस्तानचा भारतीयांना व्हिसा मिळतो तो लाहोर किंवा कराची अशा ठराविक शहरांचा मिळतो आणि दररोज स्थानिक पोलिस ठाण्यात जाऊन हजेरी लावावी लागते. वायव्य सरहद्द प्रांतातील खैबर खिंडीचा भाग किंवा पीओकेमध्ये भारतीयांना जाऊ देत नाहीत असे वाचल्याचे आठवते. कदाचित पीओकेमध्ये पत्रकारांना वगैरे जाऊ देत असतील (असलेच तर) पण पर्यटक तर नाहीच असे वाटत होते. त्यामुळेच पीओकेच्या गिलगिटला भेट देणारा पहिला भारतीय असे त्याने व्हिडिओला शीर्षक दिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य
ह
हेमंतकुमार Wed, 12/01/2021 - 08:04 नवीन
व्हिडिओ भारी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार
म
मनो Wed, 12/01/2021 - 08:13 नवीन
अनिंद्य +१ माझी हीच इच्छा आहे. इकडे अमेरिकन पासपोर्ट जेंव्हा कधी घेईन, तेंव्हा तिथला व्हिसा सहज मिळेल, त्यामुळं आयुष्यात एकदा जमेल असे वाटतंय. पण त्याआधी इराण पाहून घेतला पाहिजे, अमेरिकन पासपोर्टवर ते अशक्य आहे, युरोपीय त्यामानाने सुदैवी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य
स
सुबोध खरे Wed, 12/01/2021 - 06:45 नवीन
माझे १०-१२ वर्गमित्र जे सध्या अमेरिकेत कायम वास्तव्यसाठी आहेत ते सर्व कारची याच केंद्रात हि परीक्षा देऊन पुढे अमेरिकेत गेले होते कारण दुसरे केंद्र असलेले ठिकाण सिंगापूर परवडण्यासारखे नव्हते. त्या काळात एकच पेपर सर्व केंद्रांवर मिळत असे या त्रुटींचा फायदा घेऊन आमच्या एका मित्राने टोकियोवरून पेपर ४-५ तास अगोदर मिळवला आणि कराचीत परीक्षा देऊन तो न भूतो न भविष्यति असे गुण मिळवून पास होऊन अमेरिकेत गेला. यात काहीतरी पाणी मुरतंय हा संशय येऊन अमेरिकी बोर्डाने चार केंद्रात चार वेगवेगळे पेपर( प्रश्नांच्या बँक मधून संगणकाने रँडमायझेशन करून चार वेगळ्या प्रश्नपत्रिका तयार करतात) देण्यास सुरुवात केली. अशाच अमेरिकेत गेलेल्या आमच्या एका मैत्रिणीने पुढे पाकिस्तानी डॉक्टरशी अमेरिकेत प्रेम विवाह केला आहे त्यामुळे होणाऱ्या कटकटी हा वेगळा आणि स्वतंत्र विषय आहे. नंतर नौदलात असताना पाकिस्तानात पूर्वी नौदलाचे प्रतिनिधी म्हणून राहून आलेले काही अधिकारी माझ्या रोजच्या उठण्या बसण्याच्या गटात होते. सर्वच लोकांचे पाकिस्तानी जनतेबद्दल मत चांगले आहे. विशेषतः आपले सिनेमे आणि संगीत याबद्दल त्यांना आत्मीयता आहे. पूर्वी सामान्य पाकिस्तानी माणसाला भारताबद्दल आकस वाटत नसे. पण झिया उल हक या पाकिस्तानी हुकूमशहाने पाकिस्तानी शिक्षणात भारताबद्दल द्वेषमूलक गोष्टींचा अंतर्भाव केल्यापासून (भारतीय लष्कर काश्मीर मध्ये जनतेवर अत्याचार कसे करते हि रसभरीत वर्णने ७वी ८ वी च्या इतिहासात अंतर्भूत केली आहेत) पाकिस्तानी तरुणांची मने कलुषित होण्यास सुरुवात झाली आहे. इतर सर्व देश आपल्या रक्षणा साठी लष्कर ठेवतात. या तर पाकिस्तानात लष्कराने स्वतःसाठी देश ठेवला आहे असे म्हटले जाते.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 12/01/2021 - 07:30 नवीन
**त्या काळात एकच पेपर सर्व केंद्रांवर मिळत असे या त्रुटींचा फायदा घेऊन आमच्या एका मित्राने टोकियोवरून पेपर ४-५ तास अगोदर मिळवला >> भारी डोकं लढवलेले आहे. चोर-पोलिस खेळ असाच चालू राहतो आणि नवनवीन युक्त्या काढल्या जातात. मग यंत्रणा बंधनेही वाढवत जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ज
जेम्स वांड Wed, 12/01/2021 - 08:18 नवीन
जायचं कश्याला पण ? न आपल्याला वेलींग वॉलचं कौतुक, न आपल्याला अल अक्सामध्ये नमाज पढायची, न चर्च ऑफ नेटिव्हीटीचं. डायबेटिसची औषधं आता भारतात पण उत्तम मिळतात, सत्तर रुपये कधीच वारलेत (कॉमेंट अतिशय लाईट मूडमध्ये घेणे) - वांडो (माने)
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 12/01/2021 - 08:27 नवीन
आपल्याला चर्च किंवा सिनॉगॉजमध्ये प्रार्थना करायची नसली किंवा मशीदीत नमाज पढायचा नसला तरी एक ऐतिहासिक ठिकाण म्हणून इस्राएल बघावेसे वाटू शकतेच की. आपल्या मंदिरांमध्येही कलाकुसर बघायला अनेक अहिंदू परदेशी पर्यटक येतात. युरोपमधील कॅथेड्रल्समध्ये तिथली कलाकुसर बघायला किंवा अगदी काही नाही तरी जुन्या इमारतींमध्ये गेल्याचा वेगळा अनुभव घ्यायला तिथे प्रार्थना करायची नसली तरी जावेसे वाटू शकतेच. बेथलेहॅममधील जिससचे जन्माचे ठिकाण किंवा जेरूसलेममध्ये त्याला क्रूसावर चढवले ते ठिकाण या ऐतिहासिक वारशासाठी बघायला मला पण आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड Wed, 12/01/2021 - 08:55 नवीन
मग चॉईस करायला लागेल ना, कारण असली पॉलिसी बनवली खुद्द इस्राएलनं, त्यांना नको असतील पाकिस्तानात जाऊन आलेले पर्यटक तो त्यांचा प्रश्न झाला, पण जर हजारो वर्षे जुना आपल्या भारतीय संस्कृतीचा वारसा पाकिस्तानात जाऊन पाहणे अन पूर्ण जगाच्या डोक्याला ताप करणाऱ्या तीन अब्राहमीक धर्मांचा वारसा पाहायला इस्राएलमध्ये जाणे ह्या दोन (ह्या केसमध्ये इस्राएलनिर्मित) चॉइसेसपैकी एक करायचा असेल तर मी कधीही तक्षशिला, हडप्पा, मोहेंजोदरो, हिंगलाज माता मंदिर, पेशावर (आमच्यालेखी पुरुषपूर) इत्यादी पाहण्याचाच करेन. आपापले चॉइसेस, इस्राएलने पाकिस्तानी विजा वगैरे असल्यास विजा न देणे वगैरे मला तरी क्लिअर ऑप्टिक वाटते कारण हाच इस्राएल खाशा सौदी अरेबिया ते मध्यपूर्वेतील इतर मुस्लिम देशांत आपले कृषी उत्पादन वगैरे बिनदिक्कत विकतो, तेव्हा त्यांना अरबी/ मुस्लिम बाट लागत नाही &#128578 &#128578 स्पष्टीकरण - इस्राएलची स्थापना, ज्यू धर्मियांना झालेला जाच, त्यांचे नृशंस नाझी पार्टी प्रणित हत्याकांड, त्यातूनही त्यांनी बालफोर जाहीरनाम्याचा करून घेतलेला चतुर उपयोग, इस्रायली राष्ट्रबांधणी, त्यांचे शौर्य इत्यादीबद्दल मला पण आदर आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 12/01/2021 - 09:16 नवीन
चॉइसेसपैकी एक करायचा असेल तर मी कधीही तक्षशिला, हडप्पा, मोहेंजोदरो, हिंगलाज माता मंदिर, पेशावर (आमच्यालेखी पुरुषपूर) इत्यादी पाहण्याचाच करेन.
मलाही ही ठिकाणे बघायला तिथे जायला आवडेलच. पण तिथे जाऊन आपण जो खर्च करू तो कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्याविरोधातच वापरला जाईल ही शक्यता बरीच जास्त त्यामुळे तिथे जायला आवडले तरी जावेसे वाटायचे नाही. तसा त्रास इस्राएलला* जाऊन आपल्याला होणार नाही त्यामुळे तिथे जायला मला तरी काही वाटणार नाही. *: इस्राएलने पॅलेस्टिनींना ठोक ठोक ठोकले म्हणून उजव्या गटातील अनेकांना इस्राएलविषयी ममत्व असते. सध्या आपले आणि त्यांचे हितसंबंध एकमेकांविरोधात नाहीत आणि त्यांनी आपल्याला (कारगील युध्द वगैरे वेळेस) मदतही केली आहे. ठीक आहे. पण इस्राएल हे आपले 'नॅचरल' मित्रराष्ट्र वगैरे आहे का याविषयी साशंक आहे. किंबहुना ज्यू लोक असे कोणाचेही मित्र होऊ शकतात का याविषयीही साशंक आहे. त्यांच्या देवाने अ‍ॅब्रॅहॅमला पॅलेस्टाईनमधील जमिन दिली म्हणून त्यांनी त्या जमिनीवर हक्क सांगितला. समजा त्यांच्या देवाने हिंदी महासागर ते हिमालय यामधील जमिन तुमची म्हणून अ‍ॅब्रॅहॅमला दिली असती तर त्या परिस्थितीत ज्यू लोक भारतात घुसले नसते आणि आपल्यालाच आपल्या घरातून हाकलून लावले नसते असे म्हणता येईल असे वाटत नाही. ते लोक सुध्दा तितकेच कट्टर असतात. फक्त आपले आणि त्यांचे वाकडे व्हायचा कधी प्रसंग आला नाही म्हणून ते आपले शत्रू नाहीत इतकेच. पण ते आपले 'नॅचरल' मित्र वगैरे नसावेत. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ज
जेम्स वांड Wed, 12/01/2021 - 09:33 नवीन
तुमचे म्हणणे पटलेच, पण पाकिस्तान जिंकून तो चॉईस मिळाला तर मात्र मी नक्की जाणार तक्षशिलेला &#128539 बाकी तुमचे ज्यू जमातीचे विश्लेषण आवडले, तरीही एकंदरीत ज्यू लोकांवर अत्याचार सुद्धा झालेत, नाझी पक्षाच्या अगोदर झारीस्ट रशियात पण अगणित अत्याचार त्यांच्यावर झाले आहेत, हे नाकारता यायचे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 12/01/2021 - 15:15 नवीन
चंसूकू सर शत्रूचा शत्रू तो आपला मित्रच असतो. आपला नी जपान्यांचा काय संबंध?? तरी त्यानी सुभाषबाबूंना फौज ऊभी करूनच दिली ना? ईस्राईल आजच्या घडीला भआरताचा सगळ्यात चांगला मित्र आहे. ऊद्या पाकिस्तान बांग्लादेश आखातीदेशानी एकत्र भारतावर हल्ला कोला तर निरपेक्ष भावनेने भारताच्या बाजूने फक्त ईस्राईसच ऊभा राहील. पारिस्तानची अणूभट्टी ऊडवण्याच्या योजनेत भारताला ईस्राईलचीच मदत मिळाली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 12/01/2021 - 15:19 नवीन
बाकी भारताने ईस्राईल ला युध्दावेळी किती मदत केली असावी हा संशोधणाचा विषय असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
र
रात्रीचे चांदणे Wed, 12/01/2021 - 15:35 नवीन
मदत करायचं जाऊ द्या माझ्या महतीप्रमाणे मोदी हे पाहिले भारतीय पंतप्रधान आहेत ज्यांनी इस्राएल ला भेट दिली. UN मध्ये ही इस्राईल विरोधी ठरावाला भारताने एकतर पाठिंबा दिलाय नाहीतर तटस्थ तरी राहिलो. आपल्यासाठी अरब देशही महत्वाचे आहेत म्हणूनही ही कसरत करावी लागत असेल. इस्रायल पंतप्रधान भरतभेटीवर आलेले त्यावेळीं भारतात त्याविरोधात मोठी निर्दशने झाली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
ह
हेमंतकुमार Wed, 12/01/2021 - 15:55 नवीन
भारत, इस्रायल आणि अरब ही उपचर्चाही रंगते आहे. विविध मतांतरे वाचायला मिळत आहेत आणि माहितीत भर पडत आहे धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे
र
रंगीला रतन Wed, 12/01/2021 - 16:48 नवीन
काही वेळाने काँग्रेस भाजप ममता मोदी राहुल यांचीही उपचर्चा रंगेल :=) मिस यू १८८ प्रभु __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
स
सुबोध खरे गुरुवार, 12/02/2021 - 07:06 नवीन
जगाच्या पाठीवर भारत हा असा एक देश आहे जेथे ज्यू लोकांचे शिरकाण झाले नाही किंवा ज्यू लोकांना कोणताही त्रास झाला नाही. याबद्दल सर्व इस्रायली लोक कृतज्ञ आहेत याची साक्ष आपण इस्रायली (किंवा भारतीय ज्यू)लोकांशी संभाषण केले तर जाणवते. ज्यू लोक जसे दुसऱ्या लोकांना बाटवून ज्यू करत नाहीत तसेच हिंदू लोक करत नाहीत याबद्दल त्यांना नक्कीच आत्मीयता वाटते आणि त्यामुळेच भारतात त्यांना सुरक्षित वाटते. याउलट ख्रिस्चन आणि मुसलमान लोकांबद्दल त्यांना असा भरोसा वाटत नाही. ( ज्यू लोक एकंदर कर्मठ आहेत यात शंका नाही परंतु त्यांच्या कर्मठपणाचा दुसर्यांना फारसा त्रास होत नाही) इतकी वर्षे अरबांच्या तेलासाठी आणि भारतीय मुसलमानांच्या तुष्टीकरणासाठी काँग्रेसने इस्रायल शी राजनैतिक संबंध ठेवले नसले तरीही त्याबद्दल इस्रायलने कधीही पूर्वग्रह ठेवला नाही. कारगिलच्या युद्धच्या वेळेस इस्रायल ने आपल्याला अमेरिकेने पोखरण २ चे अणुस्फोट केल्यावर घातलेल्या निर्बंधांना न जुमानता कोणतीही अट न ठेवता मदत केली होती. याबद्दल दोन मनोरंजक दुवे देतो आहे. मुद्दाम वाचून पहा. https://www.ndtv.com/india-news/how-israel-helped-india-win-the-air-war-during-kargil-2058511 आजही आपल्याला अनेक तर्हेच्या तंत्रज्ञानात मदत करणाया इसरायल हात आखडता घेत नाही. https://caravanmagazine.in/vantage/planes-drones-missiles-kargil-indo-israeli-relations बाकी इस्रायल ला भेट देण्यासाठी व्हिसा देण्यापुर्वी मोसादच्या एजंट आपली आडून सर्व चौकशी करून घेतात. माझा अस्थिरोग तज्ज्ञ मित्र त्याच्या एक रुग्णाच्या आग्रहामुळे इस्रायलला भेट देऊन आला. हि व्यक्ती भारतातील ज्यू समुदायांची पुढारी होती आणि एका सिनेगॉग मध्ये रब्बीचे काम करणारी होती. त्यांनी माझ्या मित्राला आडून सुचवले होते की इस्रायली हेर आपल्या नकळत दवाखान्यात येऊन जातील आणि तुमच्यावर थोडी फार पाळत ठेवतील. साधारण पणे भारतीय "हिंदूं"ना इस्रायलचा व्हिसा मिळण्यास कोणतीही अडचण येत नाही. पण भारतीय (आणि इतर देशातील) मुसलमानांची मात्र कसून चौकशी होते. ते गेल्या काही वर्षात कुठे कुठे गेले होते, कुणाला भेटले, नातेवाईक कोण आहेत, त्यांचे ब्रेन वॉशिंग झालाय का इ इ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ह
हेमंतकुमार गुरुवार, 12/02/2021 - 07:13 नवीन
पूर्वी अंतर्नाद मासिकात इसराइल मधील मराठी बांधव यावर एक लेख आला होता. त्यातील एकाने त्यांच्या देशाच्या नावाबद्दल स्पष्टीकरण दिले होते. त्या शब्दाचा खरा उच्चार इ स रा ए ल असा असून त्याचा अर्थ : "ज्याने ईश्वरासह झुंजून यश मिळवले तो" असा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 12/02/2021 - 10:22 नवीन
ज्युं च्या इतिहासाबद्द्ल कणव असली आणि वर्तमानातील संघर्षाबद्द्ल आदर वाटला तरी अमेरिका आणि एकंदरीतच मित्र देशांनी त्यांना "पवित्र भुमी" चे गाजर दाखवून आणि त्यांनी देखील ते गाजर घेऊन मोठीच चुक केली आहे. जर्मनी किंवा इतर युरोपीय देशांना आपल्या नाझी कृत्यांबद्दल एवढी लाज वाटत होती तर स्वत:च्या देशातील एखादा भुभाग तोडून त्यांना द्यायला हवा होता. त्याऐवजी पवित्र भूमी देऊन इतर धर्माचे नवीन शत्रू उपलब्ध करुन दिले आणि पिढ्यान पिढ्या संघर्ष करण्यातच त्यांची हयात संपेल हेच बघीतले. असो. पण तो या धाग्याचा विषय नाही त्यामुळे अवांतराबद्द्ल क्षमस्व !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
स
सुबोध खरे गुरुवार, 12/02/2021 - 15:31 नवीन
ज्यू लोकांच्या इतिहासात जेरुसलेम या शहराचे महत्व अनन्य साधारण आहे. जगभर छळ झालेल्या आणि अनन्वित अत्याचार सहन केलेल्या असंख्य ज्यू लोकांना "पुढच्या वर्षी जेरुसलेम" हे स्वप्न उराशी बाळगून स्वतःची धर्म भूमी इस्रायल ची स्थापना करण्यासाठी प्रेरित केलेले होते. अशी कुठली दुसरी भूमी त्यांना प्रेरित करू शकली नसती हे सत्य आहे. मुळात इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्माची स्थापना होण्यापूर्वी साधारण १००० वर्षे ज्यू लोक जेरुसलेमच्या पवित्र भूमीत राहत आले आहेत असा इतिहास आहे. उद्या मक्केवर ख्रिश्चनांनी ताबा मिळवला आणि मुसलमानांना सांगितले कि तुम्ही रक्तपात टाळण्यासाठी दुसरीकडे स्थायिक व्हा तर जगभरातील मुसलमान त्याला तयार होतील का? त्या साठी हजार वर्षे युद्ध झाले तरी ते करण्याची मुसलमान युवकांची तयारी असेलच याच जेरुसलेम ला इस्लामी सत्तेपासून मुक्त करण्यासाठी ख्रिश्चन तरुणांनी छातीवर क्रूस लावुन अनेक युद्धे केली त्याला क्रुसेड असे नामाभिमान आहे. तेंव्हा जगभरातील एकत्र येणाऱ्या ज्यू लोकांना तुम्ही जेरुसलेम सोडून तिसरीकडेच आपली पवित्र भूमी स्थापन करा असे कसे सांगणार. साधी एक पडकी बाबरी मशीद सोडून दुसरीकडे मशीद बांधण्यासाठी मुसलमान तयार होत नाहीत तर भारतात राम जन्मभूमीवर असलेल्या बाबरी मशिदी च्या जागेऐवजी तिसरीकडेच प्रचंड आणि भव्य राम मंदिर बांधा सांगितले तर लोकांना मान्य होईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
क
कॉमी Wed, 12/01/2021 - 09:44 नवीन
लेख आवडला, रोचक अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 12/01/2021 - 10:42 नवीन
मस्त लेख कुमार१ साहेब 👍 बरीच नविन माहीती मिळाली. पुर्वी आपल्या पासपोर्टवर दक्षिण आफ्रिकेसंबंधी असा शेरा असायचा हे माहित नव्हते. अत्तापर्यंत भटकंती केलेल्या ११ देशांमध्ये मला भेटलेल्या पाकीस्तानी लोकांबाबत माझाही अनुभव तुमच्या प्रमाणे चांगलाच आहे! उडदामाजी काळे गोरे म्हणतात तसे असतीलही काही लोक नीच प्रवृत्तीचे (तसे ते सगळीकडे असतातच, आपल्या देशात काय कमी आहेत 😀) पण मला अजुन तरी त्या लोकांचा वाईट अनुभव आलेला नाही त्यामुळे सगळेच मुस्लीम कींवा सगळेच पाकीस्तानी हरामखोर असतात अशा सरसकटीकरणावर माझातरी काडीमात्र विश्वास नाही (अर्थात प्रत्येकाचे व्यक्तीगत अनुभव वेगवेगळे असु शकतात हे मान्य!). बाकी राहीली गोष्ट पाकिस्तानला पर्यटनासाठी भेट देण्याची, तर मला मोहेंजोदडो-हडप्पा संस्कृतीचे अवशेष पहाण्यासाठी नाईलाजाने का होईन पण तिथे जायला नक्कीच आवडेल (हे मी दुबईवरील मालिकेच्या पहील्या भागातही लिहीलेले आहे 😀). एका चांगल्या अनुभवाधारीत लेखासाठी आभार 🙏
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा