तेव्हा जागतिकीकरण हे शोषण आहे का असे विचार करण्यापेक्षा या सगळ्यातून मी पुढे कसा जाईन हा विचार करणे आणि त्यादिशेने पावले उचलणे श्रेयस्कर ठरेल.
जागतिकीकरण आणि शोषण हा मुद्दा पूर्ण वेगळ्या स्वरूपाचा आहे. शोषण हा जागतिकीकरणाचा एक परिणाम असतो. त्या परिणामाची प्रतिक्रिया म्हणून जागतिकीकरणाला विरोध होतो. तो विरोध नको असेल तर तो परिणाम होणार नाही अशी व्यवस्था करावी लागते. अशी व्यवस्था करायला जाणे म्हणजे त्या आर्थिक प्रतिमानाचाच प्रश्न असतो. कारण ही अशी व्यवस्था करणारी उपाययोजना त्या प्रतिमानाच्या काही मूलाधारानाच छेद देते. त्यामुळे हा मुद्दा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने मांडला जाणे आवश्यक आहे.
मी पुढे कसा जाईन हा विचार केला पाहिजे - बरोबर! माझ्यासारख्यांपुढे प्रश्न येतो तो इतकाच, की माझे तसे पुढे जाणे शोषणावर आधारलेले असेल काय? तशी शक्यताही दिसली तरी माझा मी पुढे जाण्याचा विचार थांबतो. म्हणजे या परिस्थितीत मला पुढेच जावयाचे असेल तर न-नैतीक भूमिका घ्यावी लागेल. किंवा सोशल डार्विनिझ्म हेच खरे हे म्हणावे लागेल.
हो कोणत्याही भ्रष्ट मार्गाने पैसा मिळवणे वाईटच.अनेकदा खाजगी कंपन्यांमध्ये विशेषत: सप्लाय चेन मध्ये आणि कॉन्ट्रॅक्ट देताना सरकारी कार्यालयाला लाजवेल असा भ्रष्टाचार चालतो. जागतिकीकरणाचा अर्थ आपले पैसे खायचे कुरण पूर्ण जगात पसरले असा अर्थ कोणी घेतला तर ते अत्यंत चुकीचे आहे.
पण शोषण म्हणजे काय हे पण स्पष्ट केले पाहिजे.मागे मी शिव खेरांच्या पुस्तकातील घोड्याचे उदाहरण दिले होते.जिंकणारा घोडा हरणार्या घोड्याच्या दहापट पैसे कमावतो.याचा अर्थ तो दहा पटीने जोरात धावतो का?तर तसे नक्कीच नाही.तो धावतोच थोडासाच अधिक जोरात पण त्याचा मोबदला दहापटीने अधिक असतो.आता हे हरलेल्या घोड्याचे शोषण झाले का?असेलही कदाचित.मला आय.आय.एम मध्ये कोणत्याही भ्रष्ट मार्गाचा अवलंब न करता प्रवेश मिळाला आहे.तेव्हा मी ’माझा प्रवेश हे प्रवेश न मिळालेल्याचे शोषण आहे का?’ हा विचार का करू?सध्या मी पायाच्या हाडाच्या जखमेतून सावरत आहे आणि घरच्या घरी थोडेफार लंगडत चालता येऊ लागले आहे.यावेळी मला स्टेशनवरील गाडी पकडून खिडकीतील जागा मिळवायची म्हटले तर ते शक्य होणार नाही.मग खिडकीतली जागा मिळवणारे माझे शोषण करतात का?तेव्हा माझ्या म्हणण्याचा अर्थ असाच की स्पर्धेतून स्वत:च्या प्रयत्नाने पुढे जाणे म्हणजे इतरांचे शोषण नाही.आणि असा विचार करण्यापेक्षा प्रत्येक घोड्याने आपण अधिक जोरात कसे धावू शकू हे बघावे किंवा सरळ शर्यतीतूनच माघार घ्यावी. माझ्या बोलण्याचा अर्थ भ्रष्टाचार करावा किंवा इतरांना फसवून पुढे जावे असा नक्कीच नाही.
**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन
माझी मराठी अनुदिनी माझी इंग्रजी अनुदिनी
**************************************************************
क्लिंटन,
पहिल्या परिच्छेदाशी पूर्ण सहमत. दुसऱ्याशीही सहमत. पण तुमचा दुसरा परिच्छेद आणि माझे मूळचे मत यात काही अंतर असल्याने ही स्पष्टीकरणे :
घोड्याचे उदाहरण - शोषणाच्या संदर्भात हे उदाहरण गैरलागू आहे. कारण येथे शोषण होते, असे मी मानतच नाही. ही स्पर्धा आहे. स्पर्धेनुसार निकाल लागेल. हरणारा घोडा बिनकामाचा असेल तर त्या शर्यतीपुरता.
शोषण म्हणजे काय? एक काल्पनिक परिस्थिती मांडतो - जागतिकीकरणाने माझ्यासमोर एका व्यवसायाची संधी आणली आहे. ती करण्यासाठी मला मोठ्या प्रमाणात जमिनीची गरज आहे. ती मी सरकारच्या माध्यमातून संपादित करून घेतो. जमीन ज्यांची आहे त्यांना भरपाई देतो. ही भरपाई आणि त्या जमिनीचे त्यांच्यालेखी जगण्यात असलेले मूल्य यांच्यात ताळमेळ नसेल तर तिथे शोषण होते आहे. कारण जमिनीचा खुला व्यापार झालेला नाही त्या घडीला. तो करण्याऐवजी व्यवस्थेतील भूसंपादनाच्या तरतुदीचा अवलंब करून जमीन हिरावून घेतली गेली आहे. अशा व्यवसायातून माझी उन्नती होणार आहे. ती मी साधावयाची का?
आयआयएम प्रवेश - माझे मत तुमच्यासारखेच आहे. पण एक सूक्ष्म फरक आहे. आयआयएम अॅट व्हॉट कॉस्ट हा माझा मुद्दा असेल. शिक्षण हाही व्यापार हे तत्व ध्यानी घेऊन तिथे सारे होत असेल तर माझा मुद्दा निकालात निघतो. पण आयआयएमसाठी इतर शिक्षणाचा बळी दिला जात असेल तर आयआयएममधला तुमचा प्रवेश रास्त असला तरी, न्यायाच्या भूमिकेत तो बसेलच असे नाही. पण याही ठिकाणी व्यवस्था नामक घटक असतो. त्यानेच हा बदल करावयाचा असतो. तो बदल करण्याची क्षमता जागतिकीकरणाच्या प्रतिमानात नाही. कारण तेथे मुळातच माझे हित, मी पुढे जाणे हाच विचार मूलाधार म्हणून आहे.
पायाची जखम आणि खिडकीची जागा - तुमच्या भूमिकेतून अगदी योग्य. तेथे शोषण झाले का? नाही. जखमी माणूस कमी पडला. पण त्याच्या जायबंदी असण्याच्या जोरावर त्याला मागे ढकलून एखादा खिडकीची जागा मिळवत असेल तर येथे त्या जायबंदी माणसाचे शोषण होते असे म्हणता येऊ शकते.
शोषण कशाला म्हणायचे? माझे उत्तर असे - समान ताकदीची, क्षमतांची, संधीची परिस्थिती नसताना कमकुवतांना व्यवस्थेतील तरतुदींच्या आधारे बलवानांनी नमवून आपले हित साधताना त्या कमकुवतांपुढे जगण्याचा संघर्षच उभा करणारा परिणाम म्हणजे शोषण असे स्थूल मानाने म्हणता येईल.
श्रावण
पण आयआयएमसाठी इतर शिक्षणाचा बळी दिला जात असेल तर आयआयएममधला तुमचा प्रवेश रास्त असला तरी, न्यायाच्या भूमिकेत तो बसेलच असे नाही.
अर्थातच प्राथमिक शिक्षणाचे महत्व कोणीच नाकारत नाही आणि नाकारू नयेच.कोल्हापुरच्या शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण यावर एक मार्मिक टिप्पणी केली होती.ते म्हणाले,’बहुसंख्यांच्या मीठ भाकरीचे आधी बघू आणि मग मूठभरांच्या पुरणपोळीचे’. तेव्हा आय.आय.एम मध्ये शिक्षण देण्यासाठी प्राथमिक शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असेल तर ते चुकीचे आहे.पण हा सरकारचा निर्णय आहे आणि यात शोषण होतच असले तरी ते एकूण व्यवस्थाच करत आहे कोणी व्यक्ती नाही.आणि जर असे शोषण होत असेल तर कोणत्या वेगळ्या प्रकारे समाजाचे देणे दिले तरी काही प्रमाणात परतफेड होईलच.आणि त्यासाठी खूप भव्यदिव्य काही करायला हवे असे नाही तर आपल्या कंपनीच्या प्रगतीत चांगल्या मार्गाने हातभार लावला आणि त्याद्वारे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या तरी ते चालू शकेल.
बाकी कर्क साहेबांनी म्हटले की शोषण हा जागतिकीकरणाचा डायरेक्ट परिणाम नाही हे मान्य.गोरगरीबांना लुबाडणारे सावकार हे जागतिकीकरण हा शब्द वापरात येण्यापूर्वीपासून आहेतच. मोडक साहेबांनी म्हटलेले जमिन संपादनाचे उदाहरण योग्य आहेच.जर ज्या जमिनीवर सर्वस्व अवलंबून आहे ती ताब्यात घेतली आणि पुरेसा मोबदला दिला नाही तर ते नक्कीच शोषण आहे.पण असे शोषण करणारे अनेक वेगवेगळे लोक असू शकतात त्याचा जागतिकीकरणाशी अर्थाअर्थी संबंध आहे असे नाही.शोषणाचा मुद्दा इथे आणायचे कारण म्हणजे या लेखमालेच्या एका लेखावर प्रा.बिरूटे आणि विजूभाऊ यांच्यासारख्या ज्येष्ठ मिपाकरांच्या प्रतिक्रियांमध्ये शोषणाचा उल्लेख होता. अनेकदा जागतिकीकरण म्हणजे शोषण असा अर्थ unwittingly घेतला जातो. द हिंदू या वर्तमानपत्रातील न्या.व्ही.आर. कृष्ण अय्यर यांच्यासारख्या डाव्या विचारांच्या लेखकांचे लेख वाचल्यावर असा अर्थ वरचेवर घेतला जातो ही गोष्ट माझ्या लक्षात आली.
अवांतर: भारतासारख्या आध्यात्मिक परंपरेच्या देशात पैसा कमावणे हे पाप असे एका अर्थी समजले जाऊ लागले.गुरूचरण दास यांनी त्यांच्या इंडिया अनबाऊंड या पुस्तकात एक मत व्यक्त केले आहे.ते म्हणतात की स्वातंत्र्य आणि दुसरे महायुध्द या काळात लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.धान्याची टंचाई,महागाई हे नियमच झाले.तेव्हा स्वातंत्र्य नुकतेच मिळालेले असलेल्या भारलेल्या वातावरणात व्यापारी,उद्योजक हे चोरच असणार ही भावना एकाप्रकारे प्रबळ झाली.पैसे चांगल्या मार्गाने मिळवले जाऊच शकत नाहीत आणि पैसे मिळविणारा इतरांना लुबाडूनच श्रीमंत होतो हे मत याच भावनेचा spill over effect असेल का?
**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन
माझी मराठी अनुदिनी माझी इंग्रजी अनुदिनी
**************************************************************
एकदम सहमत.
कर्क आणि क्लिंटन म्हणतात त्याप्रमाणे शोषण हे होतच असते. जागतिकीकरणातून त्या शोषणाला समर्थन मिळते. 'आपल्या (देशी)' टाटांना स्पर्धाशील रहायचे असेल तर त्यांना सिंगूरमध्ये किंवा दाहोदमध्ये खुल्याबाजारातून जमीन घ्या असे सांगून कसे चालेल? ती सरकारच्या माध्यमातून जबरदस्तीने संपादन करूनच द्यावी लागणार!! असे म्हणून या शोषणाचे समर्थन दिले जाते.
अवांतरः अशा सार्या सवलती सरकारकडून मिळवून परत लोकांचे स्वस्त गाडीचे स्वप्न पूर्ण केल्याची टिमकी मात्र टाटा आपले 'कर्तृत्व' म्हणून वाजवणार.
खराटा
(रंग माझा वेगळा)
उत्तर भारतीय भाजी विकतात तेव्हा ३०-४० टक्के नफा मिळवतात. भैय्या एव्हढ्याच सामान्य बुध्दीची ब्राह्मण मुले भाजी अथवा फळे का विकू इछीत नाहीत? त्यांना कमी पगाराची सरकारी किंवा खाजगी नोकरीच ( साहेबाला नावे ठेवत ) का करायची असते ? भाजी विकल्यास त्याला ब्राह्मण बायको मिळणार नाही म्हणून !!! ही मानसिकता बदलली तरच स्पर्धेत टिकाव लागेल. यशस्वी ( मग तो मराठी असो किंवा कोणीही असो ) माणसाचा दुस्वास करुन आपण यशस्वी होउ शकत नाही.
खुसपट ( व्यवसाय आणि जातीचा अभिमान यांचा अभ्यासक )
आवडला. जागतिकीकरणामुळे पुढे काय होईल हा विचार करताना थोडी सांस्कृतिक दृष्टीनेही विचार केला पाहिजे असं मला वाटतं. परस्परांच्या जवळ येणारे समाज, त्यांच्यात होणारी देवघेव हा फायदा असला तरी प्रत्येक समूहाच्या वेगळ्या ओळखीवर - मग त्यात भाषा, संस्कृती, खाद्यपद्धती अशा सार्याच गोष्टी आल्या - होणारा परिणाम आणि त्या गोष्टी टिकवून ठेवण्यासाठी करावी लागणारी धडपड ('सर्व्हाय्वल ऑफ द फिटेस्ट'च्या प्रवाहाविरुद्ध जाऊन) हे मुद्देही या संदर्भात महत्त्वाचे वाटतात.
नंदनने मांडलेल्या मताशी सहमत. मात्र लेखमालेचे अधिक्षेत्र केवळ अर्थकारणापुरते मर्यादित असल्याने संस्कृतीबद्दलचा विचार व त्याचा अंतर्भाव लेखमालेत केला नसणे हे समजण्यासारखे वाटते.
एका चांगल्या विचारप्रवर्तक, सुटसुटीत लेखमालेचा आटोपशीर, समयोचित अंत असा हा लेख वाटतो.
(वाचक)बेसनलाडू
नमस्कार मंडळी,
ही लेखमाला आपल्याला चांगली वाटली याबद्दल आपला आभारी आहे. हा विषय खूपच मोठा आहे आणि सरासरी १०० ओळींच्या ७ लेखांमधून माहिती करून देणे म्हणजे समुद्रातील पाणी शिंपल्याने काढल्यासारखे झाले. पण याचा उपयोग जागतिकीकरणाविषयी वरवरची माहिती करून द्यायला जरी झाला तरी ते चांगले आहे असे वाटते.
चर्चेत भाग घेऊन चांगले योगदान दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.
**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन
माझी मराठी अनुदिनी माझी इंग्रजी अनुदिनी
**************************************************************
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी