सगळे रंग विरळ होत होत सर्वत्र शुभ्रतेची चादर समोर पसरत होती, वेडावाकडा मार्ग तुडवत पुढे पुढे जात राहिलो, अनंत अडथळे बाजूला सारत. मनात प्रश्न नाहित ना कुठले विचार. प्रत्येक जिवाला उपजतच ज्ञान होते की, श्वेतवाळवंटाच्या राज्यात कुठेतरी एक झरा आहे, ज्याचे अमृतमय पाणी अक्षय आनंद देतं, चिरंजीवीत्व देतं. हा शोध माझा नाही आहे. प्रत्येक जीव ते अमृत मिळवण्याचा अनंतकाळापासून प्रयत्न करत आहे, अगदी पहिला एकपेशीय जीव ते स्वतंत्र बुद्धी असलेला हा मानव! सर्वांनीच याचा शोध घेतला, घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून निष्पन्न काय झाले माहिती नाही, पण एका गुणसुत्रातून दुसऱ्या गुणसूत्रात ही लालसा जीवागणिक पसरत गेली.