Welcome to misalpav.com
लेखक: साहित्य संपादक | प्रसिद्ध:
एका बरोबर एक आला. त्यातून झाले पाच. कोणी असे तर कोणी तसे. पण सुखात राहू लागले सात. संपत्ती तरी अजून कशाला म्हणतात हो ? पाचांच्या बरोबर पाच आले. त्यातून झाले दहा. कोणी असे तर कोणी तसे. पण सुखात राहू लागले वीस. संपत्ती तरी अजून चांगलीच जमत होती. दहांच्या बरोबर सहाच आले. त्यातून झाले सहा. कोणी असे तर कोणी तसे. पण सुखात राहू लागले बावीस. संपत्ती तरी अजून हवीशी वाटत होती. सहांच्या बरोबर शून्य आले. त्यातून झाले शून्य. तरी पण सुखात राहत होते सहा. संपत्तीच्या कल्पना कालानुरूप बदलणारच आणि बदलल्या तर कोणाला फरक पडतो ? सगळ्यांनाच शून्य आवडू लागले तर आपले कसे होणार !
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

कथा वाचून थेट महाभारतातल्या कूटश्लोकाचीच आठवण आली एकं हन्यान्न वा हन्यादिषुर्मुक्तो धनुष्मता | बुद्धिर्बुद्धिमतोत्सृष्टा हन्याद्राष्ट्रं सराजकम् || एकया द्वे विनिश्चित्य त्रींश्चतुर्भिर्वशे कुरु | पञ्च जित्वा विदित्वा षट्सप्त हित्वा सुखी भव || मात्र ही कथा त्यापलीकडची असल्याने -१

धनुर्धराने सोडलेला बाण एकालाच ठार करील किंवा करणारही नाही, परंतु एखाद्या मुत्सद्द्याची बुद्धी सर्व राष्ट्राचा विनाश करते, म्हणून एकाने दोहोंचा निर्णय करून चाराने तिघांना ताब्यात ठेवावे, पाचांवर विजय मिळवून सहांना समजून सातांचा त्याग करून सुखी व्हावे. धनुर्धराने सोडलेला बाण एकालाच ठार करील किंवा करणारही नाही, परंतु एखाद्या मुत्सद्द्याची बुद्धी सर्व राष्ट्राचा विनाश करते, म्हणून एकाने (सुबुद्धीने) दोहोंचा (कर्तव्य-अकर्तव्याचा) निर्णय करून चारांनी (साम, दाम, दंड, भेद) तिघांना (शत्रू, मित्र, तटस्थ) ताब्यात ठेवावे, पाचांवर (पंचेद्रिये) विजय मिळवून सहांना (संधी, विग्रह, यान, आसन, द्वैधीभाव व आश्रय) समजून सातांचा (स्त्री, जुगार, मृगया, मद्य, कठोर भाषण, कठोर दंड व द्रव्याचा अपव्यय) त्याग करून सुखी व्हावे.

दोन लोकांनी लग्न केले मग त्यांना पाच मूल ंझाली , मग सात झाले . मग पाच मुलांची लग्ने झाली …….मग ते दहा झाले. दहांना सहा मुले झाली. मग त्या मुलांनी पुढे मूलं होऊ दिली नाहीत. अशी कथा आहे./असावी.

जर लग्न या संकल्पनेला धरून लिहिले असेल तर शून्य आवडणे म्हणजे अविवाहित राहणे असे काय? :)

कथा इतकी पण क्लिष्ट असू नये की वाचणार्‍याला समजणारच नाही... मी सुचवेन की लेखकाने आपली कथा आधी आसपासच्या कुणाला व्यक्तीला (मिपावर नसलेल्या) वाचायला द्यावी. त्या व्यक्तीला कोणत्याही हिंटशिवाय कळते का ते बघावे

१, १ = ५ = ७ ५, ५ = १० = २० १०, ६ = ६ = २२ ६, ० = ० = ६ एकंदरीत बाकी शुन्य ! बाबो, केवडं ते अवगड गनित, शशक अश्यानं दुर्बोध व्हायची ! अशा शशक सेन्सॉर व्ह्यायला हव्यात !

दहांच्या बरोबर सहाच आले
यामुळे वाटते की लोकसंख्येतील स्त्रियांचे घटते प्रमाण (स्त्रीभ्रूणहत्या) हा विषय लेखकाने घेतला असावा.. पण खात्री नाही कारण काही प्रश्न पडलेत. पण ६०% इतके कमी? आणि पुढे तर शून्य मुली ? आणि शून्य मुली असतानाही समाज सुखाने जगत होता ? आणि संपत्तीचा अर्थही लागला नाही. असो.. स्पर्धा संपल्यानंतर लेखक सांगतीलच

मला वाटतंय हे कुठल्यातरी पक्षाच्या आमदारांचं गणीत आहे.
दहांच्या बरोबर सहाच आले. त्यातून झाले सहा. कोणी असे तर कोणी तसे. पण सुखात राहू लागले बावीस. संपत्ती तरी अजून हवीशी वाटत होती. सहांच्या बरोबर शून्य आले. त्यातून झाले शून्य.
दहांचेया बरोबर सहा आले. :~ १०६?? पण सुखात काहू लागले २२ :~ १२२?? सहांच्या बरोबर शून्य आले त्यातून आले शून्य :~ म्हणजे १०६ बरोबर शून्य आला. (म्हणजे सत्ता आली नाही?) :)

मला वाटतंय हे कुठल्यातरी पक्षाच्या आमदारांचं गणीत आहे.
दहांच्या बरोबर सहाच आले. त्यातून झाले सहा. कोणी असे तर कोणी तसे. पण सुखात राहू लागले बावीस. संपत्ती तरी अजून हवीशी वाटत होती. सहांच्या बरोबर शून्य आले. त्यातून झाले शून्य.
दहांच्या बरोबर सहा आले. :~ १०६?? पण सुखात राहू लागले २२ :~ १२२?? सहांच्या बरोबर शून्य आले त्यातून आले शून्य :~ म्हणजे १०६ बरोबर शून्य आला. (म्हणजे सत्ता आली नाही?) :)

मला समजली ती अशी- कि आपल्या नात्याची भरपूर माणसे असणे ही संपत्तीची कल्पना बदलून पैसा, प्रॉपर्टी हि संपत्तीची संकल्पना झाली.

+१ समजली नाही. पण विक्रमी प्रतिसाद घेतलेत या कथेने या स्पर्धेत म्हणून +१

मला कथेचा अर्थ काही पोचला नाही. पण ती लय लै आवडली. एकाबरोबर पाच आले सहा झाले. दहाबरोबर बारा आले बावीस झाले. सहाबरोबर शुन्य आले. अमुक झाले धमुक झाले. ही जी आयडिया आहे, ती आवडली. मेरी तरफ से हा. -दिलीप बिरुटे (अमुक-धमुक)

ते स्पर्धेत असते ना अमक्याला जिंकवायचं तर एसेमेस पाठवा आणि मग लोकही सुपारी घेतल्यासारखे एसेमेस पाठवतात तसे एकाहून एक रद्दड शशकना +१ पाऊस पडतोय हे पाहिल्यावर अभिजात साहित्य लवकरच लोप पावणार आहे असं दिसतंय.

नमस्कार मित्रांनो ! कथालेखन हा माझा प्रांत नाही. ‘संपत्ती’ ही मी लिहिलेली आयुष्यातील पहिलीवहिली कथा. गेली अनेक वर्षे आपल्या संस्थळातर्फे ही सुंदर स्पर्धा घेतली जाते आणि प्रत्येक वेळेस मी त्या स्पर्धेचा फक्त वाचक आणि प्रतिसादकच असतो. “कथा लिहून पाहणे आपल्याला काही जमणार नाही”, असा ग्रह मनामध्ये पक्का होता. यंदा जेव्हा स्पर्धेला सुरुवात झाली तेव्हा मी मनातल्या मनात मलाच फटकारले, “अरे, आयुष्यात एकदा तरी शशक लिहून बघायला काय हरकत आहे ? परीक्षेलाच न बसण्यापेक्षा परीक्षेला बसून नापास झालेले कधीही चांगले, हा मूलमंत्र आपण अनेक ज्येष्ठांकडून ऐकलेला असतो ना ?” झालं, मग मनाची चलबिचल झाली आणि मग म्हटलं बघू तरी लिहून. सर्वप्रथम शिकायचे होते ते म्हणजे शंभर शब्दात हा सगळा प्रकार कसा बसवायचा असतो. एक भूमिका घेतली की ठराविक वाक्ये आपण वारंवार वापरू, जेणेकरून आपले कष्ट कमी होतील ! मग आधी कथेचे भरतवाक्य तयार केले ८ शब्दांचे. आता उरले ९२ शब्द. मग सरळ २३ शब्दांचा एक असे चार लघुपरिच्छेद करायचे ठरवले. सुरुवातीस परिच्छेदांमध्ये बरेच साम्य होते. पण नंतर प्रत्येकातील शेवटचे वाक्य बदलून विविधता आणली. कथा लिहून तयार झाल्यावर (वर तर्कवादी यांनी म्हटल्यानुसार) सर्वप्रथम माझ्या “हक्काच्या गृहमंत्र्यांना” दाखवली. म्हटलं, जरा विचार करून यावर प्रतिक्रिया द्या. मग जरा वेळाने उत्तर आले, “कुटुंबसंस्थेवर दिसतीय ! “ मी म्हणालो, बरोबर . अशा तऱ्हेने पहिल्या पायरीवर तरी उत्तीर्ण झालो होतो. आता म्हणलं, द्या पाठवून, ही मुळात कथाच नाही असं वाटलं तर संपादकच नाकारतील आणि प्रश्न मिटेल. पण इथून पुढे ती सरकली. पुढचे चित्र वर आपणासमोर आहेच. आता थोडेसे कथा विषयाबद्दल (जो वर काहींनी ओळखलाय). ‘कुटुंबव्यवस्था आणि अपत्य जन्मास घालण्यासंबंधीचे कालौघात बदललेले विचार’ हा गाभा आहे. सुमारे ७५ वर्षांपूर्वीचा काळ बघूया. भारतीय समाजातील अनेक जोडप्यांना पाच मुले असणे हे अगदी सर्वसाधारण चित्र होते. हळूहळू लोकसंख्येची समस्या, कुटुंब नियोजनाचे विचार, ‘दोन किंवा तीन पुरेत’ च्या घोषणा असे करता करता पिढीगणिक जोडप्यांची अपत्यसंख्या कमी होऊ लागली. तरी पण लग्न करावे आणि घरात मुलेबाळे (= संपत्ती) असावी असा विचार प्रबळ होता. गेल्या दोन दशकांमध्ये महानगरी उच्चशिक्षित समाजात या संदर्भात जाणवावा इतका बदल दिसतो. या विचारांमध्ये सुरुवातीस एकच अपत्य पुरे हा विचार बर्‍यापैकी आला. पुढे लग्न करायला हरकत नाही पण मूल नको, आपापले स्वातंत्र्य उपभोगावे, भरपूर मौजमजा करावी, हा विचार प्रबळ झाला. त्याही पुढे जाऊन विचारांमध्ये आमूलाग्र बदल दिसू लागले. ‘लग्न ही काही इतिकर्तव्यता नाही’, त्यामुळे लग्नाविना सुद्धा एकत्र रहावेसे वाटले तर का राहू नये? आणि मग अशा प्रकारच्या सहजीवनामध्ये पुनरुत्पादन या गोष्टीला फाटा दिलेला बरा. अर्थात हे जे काही विचार व कृती आहेत त्या ठराविक महानगरी पांढरपेशा वर्गात दिसून येतात. आपल्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात हा वर्ग तसा अल्प आहे. पण माझ्या आजूबाजूला मला जे काही नित्य दिसते तो माझ्या लेखनाचा विषय होणे स्वाभाविक आहे. कथेच्या प्रत्येक परिच्छेदात दिलेल्या संख्या आणि त्यांची बेरीज म्हणजे एका पिढीपुरती असलेली कुटुंबसंख्या. कथेच्या भरतवाक्यातून थोडी ताणलेली कल्पना सूचित केली. एखाद्या क्षणी जर जगातील सर्वांनाच वाटले, की आता नव्याने मुले जन्माला घालायलाच नको, तर मग पुढे काय होईल? फारशी तरुण पिढीच अस्तित्वात नसलेल्या समाजाचा गाडा खरंच नीट चालू शकेल का ? .... आता वाचकांच्या प्रतिसादांबद्दल. “कथा समजली नाही” असे म्हणणाऱ्या वाचकांबद्दल मी प्रथम आदर व्यक्त करतो. कथा सुस्पष्ट नाही हे मलाही मान्य आहे. काही मोजक्या वाचकांनी कथेला +१ असे मत दिले आहे. त्यांना धन्यवाद देतो व त्यांचे मत माझ्यासाठी उत्तेजनार्थ समजतो. कुठल्याही प्रकारचे मत (+१/-१) न देता कथेतून विविध अर्थ काढू पाहणाऱ्या वाचकांचेही आभार. तुम्हा सर्वांमुळे या प्रथम प्रयत्नात मला बरेच काही शिकायला मिळाले आहे. संयोजक, स्पर्धक आणि सर्व वाचकांचे मनापासून आभार !

पण तरी प्रत्येक वाक्य नेमकेपणाने समजत नाही. निदान माझा तरी एक वाचक म्हणून प्रत्येक वाक्य नेमकेपणाने समजून घेण्याचा प्रयत्न असतो --नुसता मतितार्थ नव्हे , त्याशिवाय पुर्ण मजा येत नाही. उदा:
दहांच्या बरोबर सहाच आले. त्यातून झाले सहा. कोणी असे तर कोणी तसे. पण सुखात राहू लागले बावीस. संपत्ती तरी अजून हवीशी वाटत होती.
म्हणजे नेमके काय ? दहा कोण त्यांच्याबरोबर आलेले सहा कोण ?कोणी असे तर कोणी तसे म्हणजे काय ?

दहा जणांपैकी फक्त सहा जणांनी लग्न केली. त्या ६ जोडप्यांना प्रत्येकी एक मूल झाले. कोणी असेल तर कोणी तसे म्हणजे >> त्यांपैकी काही मुलगे तर काही मुली. .. प्रत्येक वाक्य नेमकेपणाने समजत नाही >>> हे मान्य आहे. 😀