Welcome to misalpav.com
लेखक: रुमानी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

१९५५ नंतर युयुत्सु ऑन>वटपौर्णिमेचे व्रत पाळणे हे पुरुषांसाठी अन्यायकारक आहे. युयुत्सु ऑफ> ;) आम्हाला सात जल्म हीच बाइल हवी आहे का त्याचा काही विचार?

१)वटसावित्री पौर्णिमेची (वडाच्या पुजेची )आज ह्या गोष्टीची खरंच गरज आहे का? नाही. २) आपल्या पैकी किती जणींना /जणांना ते योग्या वाटते ? मला असं काही करणं योग्य वाटत नाही. ३) ह्या मागे कहि श्स्त्रीय कारण आहे का? यापाठीमागे काहीही शास्त्रीय कारण नाही असं माझं मत आहे. >>>कि उगाच एक पद्धत आणि पारंपारिक पणा म्हणून आपण ते करतो का? पारंपरिकपणा म्हणून आपण हे सारे उद्योग करतो. ४) आणि करायचे असेल तर ते कोणत्या पद्धतीने केले गेले पाहिजे असे आपल्या वाटते ?. अजिबात वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारुन पुरुष संस्कृतीवरच आम्ही डिपेंड आहोत हे स्त्रीयांनी सिद्ध करु नये असे वाटते. अशा कोणत्याही पद्धतीने आपण जाऊ नये असे वाटते. ५)खरंच प्रत्येकीला सात जन्म हाच नवरा हवा असतो का? काय सांगता येत नाही आणि याची शक्यता कमी वाटते. पण मी सात जन्म समजतो ते असे. मूलीचे जेव्हा लग्न होते तेव्हा एक जन्म, मुलं होतात तेव्हा बाईचा दुसरा जन्म सुरु होतो. मुलांचे पालनपोषण जवाबदारीने करणे, नवर्‍याला सांभाळणे, कुटुंबाला सांभाळणे तेव्हा तिचा तिसरा जन्म सुरु होतो. तिला जेव्हा सून येते तेव्हा तिचा चौथा जन्म सुरु होतो. नाती-पणती होतात तेव्हा पाचवा जन्म. आपला मुलगा सुनेच्या ताब्यात जाऊन तिचे सर्व काही तिला सोडून कशावरही मालकी हक्क राहात नाही तेव्हा तिचा सहावा जन्म सुरु होतो आणि शेवटी आपल्याला या म्हातार्‍या नवर्‍याला सांभाळण्याशिवाय पर्याय नाही तेव्हा तिचा सातवा जन्म सुरु होतो. तेव्हा या सातही जन्मात तिला नवर्‍याने फूलटू सपोर्ट करावा असे वाटते म्हणून ती वडाला दोरा बांधते. (भारी जमलं राव) ६) ह्या मागील सत्यवान सावित्रीच्या कथेचा जो सबंध लावला जातो तो कितपत योग्या समजावा .? सावित्रीची कथा लिहिणारा चतुर होता असे माझे मत आहे आणि त्य कथेला चतुर सावित्री असं नाव दिलं पाहिजे होतं असं माझं मत आहे, इतकाच तो कथेचा संबंध आहे. जसे, सावित्री चतुर होती तिने यमाशी गोड गोड संवाद साधून त्याच्याकडून आयड्याने वर मागितला. यम म्हणाला की नवरा परत मिळणार नाही, वाटल्यास एखादा वर माग. सावित्रीने आयड्याने पुत्रप्राप्तीचा आशिर्वाद मागितला आणि यम कोणत्या तरी भोणग्यात असावा किंवा अन्य कामात गुंतलेला असावा त्याने गडबडीत 'तथास्तू' म्हणून टाकलं आणि यमाला आपली चूक उमगली. नवराच नाही तर पुत्रप्राप्तीचा आशिर्वाद कसा सक्सेस होणार म्हणून त्याने बै तुझ्या चतुरपणावर मीप्रचंड खूश झालो असून तु तुझा नवरा घेऊन जा असे सांगितले आणि यमाने सावित्रीच्या पतिव्रतेची तारिफ केली. मनापासून कौतुक केलं. चोळीबांगडी केली आणि सत्यवानाला आणलं तसं तिच्यासोबत परत पाठवलं (अशी कथा मी वाचली आहे, काळानुरुप काही कमी जास्त झालं असेल तर माझी चूक) ७) ह्याला अंधश्रधा समजावे / कि पुरुष प्रधान संस्कृती म्हणून पाहावे ?(स्री साठी कोणतेच व्रत पुरुष करत नाहीत ) अंधश्रद्धाच आहे. स्त्रीयांसाठी पुरुषांनी कोणती व्रतं केली आहेत काय ? केली पाहिजेत काय ? हा जरा दुसरा विषय सुरु होतो माझं त्या विषयावर मौन. बाकी, बोन्साय काय, वडाचे झाड काय, वडाच्या झाडाची फांदी काय, काहीही करुन अशा पुजा-बिजा करु नयेत. बाकी, अशा कोणी स्त्रीया करत असतील तर त्यांचं प्रबोधन करावे आणि नाहीच जमलं तर दोरा तुटू नये म्हणून भारीतलं दोर्‍याचं बंडल घेऊन द्यावे, असे वाटते. :) -दिलीप बिरुटे

अहो बायका हाच नवरा सात जन्म हवा का म्हणतात? एक जन्म त्याला(नवऱ्याला) सुधारण्यात गेलेला असतो मग पुढचे सहा जन्म नवरा हुकुमाप्रमाणे तयार मिळतो (made to order). वर बायका नवर्याला बदलण्यात बरेच कष्ट काढतात आणि तो बदलला कि वर तक्रार करतात कि तुम्ही पुंर्वी सारखे राहिलात नाही. विनोद अलाहिदा. मूळ सावित्रीने सत्यवान हा वर स्वतः निवडलेला होता. तो अल्पायुशी असूनही सर्व गुणसंपन्न असल्याने तिने स्वतःच्या इच्छेने त्याच्याशी लग्न केले होते म्हणून यमाशी भांडण/ युद्ध करून त्याचे प्राण परत मिळवले आणि हाच सर्व गुणसंपन्न नवरा पुढचे सात जन्म मिळावा हि इच्छा केली होती. मूळ या व्रताचा हेतू हाच आहे कि स्त्रीने आपला पती स्वतः निवडावा आणि त्यानंतर त्याच्या बरोबर प्रदीर्घ सहजीवनाचा आनंद मिळवावा. परंतु काळाच्या ओघात गोष्टी बदलल्या. मुक्त संस्कृती जाऊन पुरुषप्रधान संस्कृती आली आणि सर्व सत्ता आणि पैसा पुरुषांच्या हातात आल्यामुळे स्त्री हि पुरुषावर अवलंबित झाली. र धों कर्वे यांचे १९३१ साली लिहिले वाक्य आजही मनावर आघात करीत आहे " बहुतांश स्त्रिया चरितार्थासाठी लग्न करतात" याच कारणासाठी नवर्याचे आयुष्य स्त्रीसाठी अत्यंत महत्वाचे झाले. राहता राहिला व्रताचा भाग- यात ज्या स्त्रीला श्रद्धा आहे तिने व्रत करावे. श्रद्धा हि आत्मिक बळ देते. जिची श्रद्धा नाही तिने केवळ कर्मकांड म्हणून वडाला दोरा बांधायचा आणि नवर्याच्या उखाळ्या पाखाळ्या शेजारीणीला सांगायच्या हा दांभिकपणा काय कामाचा?

मी तर काही ठिकाणी बोन्साय वडाच्या झाडाची पुजा करताना काही महिलांना पाहिले आहे . यात मला त्या स्त्रियांच्या दुरदर्शीपणाचा (? चलाखपणाचा) संशय येतोय... त्यांच्या पुढच्या जन्मापर्यंत चीन एकुलती एक जागतीक महासत्ता बनण्याची दाट शक्यता आहे, तेव्हा बुटका चिनी नवरा मिळविण्यासाठी ही आयडिया असावी ;)

कल्पना नै बॉ ! मी हे असलं कै करत नै. मुंबई वेग्रे बर्‍याच बायकांना झाडाच्या फांद्या कापुन ते विकतात त्यांच्याकडुन त्या फांद्या घेउन घरातच त्याला दोरे गुंडाळताना पाहीलंय..झाडं तोडुन नेमकं काय साधतं हे समजलं नाही. एकदा नात्यातल्या एका सुशिक्षीत बाईला - माझ्यापेक्षा ४-५ वर्षांनी मोठी असेल फारतर - मी वटपौर्णिमा करत नाही सांगितल्यावर तिने "काय ही धर्मबुडवी !" अशा अर्थाने माझ्याकडे प्रचंड आश्चर्याने पाहीलं होतं.

नाय बे. सौदीत जायचे असेल तर खजुराला, अम्रीकेत कॅनडाला जायचे असेल तर मेपलला दोरे गुंडाळायचे अशी काही स्कीम आहे का? असे विचारतीय ती. ;)

उलट्या फेर्‍या मारल्या तर याच जन्मी लवकर सुटका होते का ? असे एका मित्राची बायको म्हणताना ऐकले आहे. बाकी एकाच व्यक्तीबरोबर आयुष्यभर झोपणे ही कल्पनासुद्धा डँजरसच वाटते. सात जन्म वगैरे फार दूरच्या गोष्टी झाल्या.

ही व्रते वगैरे ज्यांना कराविशी वाटतात, त्यांनी करावीत, वाटत नाहीत, त्यांनी करू नयेत. प्रत्येक गोष्टीला तर्क, बुद्धी, विश्लेषण, इ. ने पारखून करणे बरे हे खरे, तरी काही गोष्टी रूढी, परंपरा, उत्सव, सण, कुळाचार, वगैरे म्हणून करण्यातही आनंद असतो. अति बुद्धीवादी व्यक्ति अश्या आनंदांना मुकत असते. अश्या परंपरांमागील मूळ कारणे आता कालबाह्य झालेली असू शकतात, किंवा अज्ञात असू शकतात. पुराणात सांगितलेल्या कथा बहुतांशी कपोलकल्पित असतात, परंतु यातून काही दुय्यम गोष्टी-फायदे साध्य होत असतील - किंवा नसले तरी- ज्यांना कुणाला हे करणे योग्य वाटते, त्यांनी अश्या परंपरा चालू ठेवण्यात काही गैर नाही, आणि इतरांनी त्यांचा उपहास करणे योग्य नाही.

मी पूर्वी या रूढीवादी लोकांची टिंगल करायचो. मला वाटते ज्यात दुसर्‍या मनुष्यास त्रास तर नाही अशा काही गोष्टी पाळावयास हरकत नाही. मी गणपती बसवतो. पण यापुढे धातूची मूर्त आणून दरवर्षी तिचीच प्राणप्रतिष्ठा करणार आहे. ( मी पक्का एक नंबर सगुण - निरिश्वर वादी असूनही)

३ दिवस उपास करणे, पावसातून वडावर जाऊन तासंतास चालणारी पूजा करणे याला आता तसा फार अर्थ राहिला नाही. पण ते केल्याने कोणाला समाधान मिळत असेल तर मिळू दे की! त्याबद्दल कोणालाच आक्षेप असू नये. पण खरे पाहता आता अशी सगळीच व्रते कालबाह्य झाली आहेत. वडाच्या फांद्या तोडून त्यांची पूजा करणे किंवा बोन्साय वडाची पूजा वगैरे अजिबात पटत नाही. यापेक्षा कहर मी लहान असताना पाहिला होता. एका बाईची घटस्फोटाची केस कोर्टात चालू होती आणि ती वडाच्या पूजेला आलेली पाहिली तेव्हा माझ्या मनावर एक ओरखडा उठला होता. पूर्वी बायकांना घरकामातून वेगळे काही मनोरंजन, अ‍ॅक्टिव्हिटीज म्हणून अशा गोष्टी सुरू करण्यात आल्या असाव्यात. पूजेच्या निमित्ताने इतर बायका निवांतपणे भेटत, गप्पागोष्टी होत आणि उच्च वर्गीय बायकांमधे दागिने व साड्यांचे प्रदर्शन घडत असे. तेव्हा उपास करण्यासाठी फळे वगैरे मुबलक आणि स्वस्त मिळत असत. आता साबुदाणे वगैरे खाऊन उपास करून आजारी पडायची शक्यता जास्त! सावित्रीची कथा त्या काळात स्रियांना आपला पती निवडायचा अधिकार होता आणि त्या परिणामाची पर्वा न करता तो अधिकार बजावत असत हे दाखवून देणारी आहे. आपल्या निवडीसोबत राजवाडा सोडून जंगलात राहून कष्टाचे आयुष्य जगण्याचे धैर्य सावित्रीने दाखवले. कालौघात स्त्रियांचे हे स्वातंत्र्य संकुचित होत गेले आणि "न स्त्री स्वातंत्र्यमर्हति पर्यंत आले. सावित्रीची कथा आजही लागू आहे पण त्या कथेच्या निमित्ताने आलेली कर्मकांडे टाळता आली तर अवश्य टाळावीत. बाकी ७ जन्म वगैरे गोष्टीही नक्कीच पुरुषमंडळींनीच या कथेत घातल्या असाव्यात. कारण आपली बायको या जन्मातच काय सगळ्या जन्मात आपलीच असावी ही पुरुषांची मालकी हक्काची भावना प्रबळ असण्याच्या काळात असली व्रते वगैरे जन्माला आली असावीत. मात्र ज्यांना या जन्मानंतर मोक्ष मिळाला किंवा किडा/प्राणी यांचे आयुष्य मिळाले किंवा जे जन्म न घेता भुते होऊन लटकत राहतील त्यांच्या बायकांनी काय करावे हे कोणी सांगेल काय? तसेच ज्या बायका नवर्‍यांचे खून करतात्/घटस्फोट घेतात/नवर्‍याला फसवून दुसर्‍याबरोबर मजा मारतात त्यांना ७ जन्म हाच नवरा हवा असेल असे काही वाटत नाही. पुढचा जन्म आहे का नाही माहित नाही, आप मेला-जग बुडाला एवढेच माहित असल्याने ७ जन्म वगैरेबद्दल बोलण्याचा आपल्याला काय अधिकार नाही! बरं नवर्‍याला तरी ७ जन्म तीच बायको हवी असेल कशावरून!

पूर्वी बायकांना घरकामातून वेगळे काही मनोरंजन, अ‍ॅक्टिव्हिटीज म्हणून अशा गोष्टी सुरू करण्यात आल्या असाव्यात. हे शंभर टक्के खरे आहे . अगदी आत्ता पुरता बोलायचं झालं तरी हा उपयोग अगदीच काल बाह्य झालेला नाही . पूर्वी स्त्रिया घरकामात व्यस्त असायच्या आता त्या career मध्ये बुडाल्यात . त्यांना विरंगुळा मिळायला आज ही हवाच आहे. फक्त आता त्या साठी जास्त साधनं उपलब्ध अहेत. मात्र वडाचा आणि पिंपळाचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की ते highest source of oxygen आहेत. मी असं notice केलंय की पर्यावरणासाठी महत्वाच्या झाडांना कुठल्या न कुठल्या कथा attached आहेत . तुळस कृष्णाला प्रिय. वड पूजायचा अखंड सौभाग्यासाठी . पिंपळ मात्र भूताशी का associated आहे कोण जाणे . पण भुताच्या निमित्ताने का होईना लोक पिंपळ तोडायला घाबरतात किंवा घाबरायचे हे महत्त्वाचं . यातून जे साधायचं आहे ते बरोबर साधलं जातं . आज आपल्याला हे सगळं पटत नाही पण म्हणून या झाडांचा scientifc महत्त्व कमी होत नाही . ही व्रत वैकल्य पूर्वीच्या काळाचे laws - कायदे होते असं म्हणायला हरकत नाही . तोच परिणाम साधण्यासाठी जर आपण पर्यायी व्यवस्था उभी करणार असू तर हे व्रत वैकल्य जरूर बंद करावीत . पण त्या निमित्तानी का होईना आपला पर्यावरण अबाधित राहणार असेल तर त्यांचा स्वागत करायला हरकत नाही . नाही तर रस्ता रुंदीकरण आहे, constructions आहेत, आपले राजकारणी पैसा कमावणाऱ्या समाजातील घटकांशी भांडण ओढवून घेत नाहीत क्षुल्लक झाडांसाठी आणि पर्यावरणासाठी आज सावित्री ची कथा कुणाला पटत नाही . मी स्वतः सुद्धा कधी वड पूजला नाही . पण आपली commitment तीच असते आणि ती जास्त महत्त्वाची आहे या उपचारांपेक्षा . मात्र जो पर्यंत आपण तितकीच समर्थ अशी प्रति system उभारत नाही to make sure कि पर्यावरण वाचेल , तोपर्यंत मला तरी आपल्या पूर्वजांच्या दूरदृष्टीचं कौतुकच वाटेल . आपल्याकडे हे सगळं पाळताना विचार कमी आणि भाबडा विश्वास जरी जास्त असला तरी हे शिक्षणातून वाचनातून बदलता येईल . rather ते बदलायलाच हवं . पण हा दोष तेंव्हाच्या law makers चा नसून नंतर आलेल्या पिढ्यांचा जास्त आहे असं वाटतं . प्रतिसाद थोडा मोठा झालाय. हा माझा पहिलाच प्रतिसाद आहे . तरी लांबी आणि एखाद दुसरा संदर्भ चुकला असेल तर समजून घ्या please .

प्रतिसाद आवडला. अशा पूजांच्या निमित्ताने झाडाझुडपांचे संवर्धन होत होते हा एक फायदाच! पण आता त्याच्या फांद्या तोडून विकणार्‍यांमुळे मूळ उद्देशाला हरताळ फासला जातो.

अहो म्याडम, आमचा सर्वांचा झाला वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून. आता आपलं मतं मांडून आभाराचा दोरा गुंडाळता काय ? :) (आता त्याची गरज आहे का, म्हणू नका फक्त) -दिलीप बिरुटे

आलेच हो सर.... सर्वांचे मनापासून आभार ……। आणि धन्यवाद. हो जरा उशीरच झाला प्रतिसादाला पण काल आमची सुट्टी वटपौर्णिमेची नाही हो! रविवार ओफीसला आणि आज बगतो तर काय नेट ला प्रॉब्लेम ……… :( आणि ऒफ़िसच्या कामाचा गुंता ……. असो एकंदरीत सर्व प्रतिसाद पाहता एकाच नकाराचा सूर लागतोय तर , म्हणजे कोणालाही हि बांधीलकि नको आहे सात जन्माची पण त्यात हि प्रा डॉ . बिरुटे सरांनी मस्तच शॉट कट मारलाय सात जन्माचा ते मात्र भारी :) आवडले . @ सुबोध खरे सर्व गुणसंपन्न नवरा पुढचे सात जन्म मिळावा हि इच्छा केली होती. मूळ या व्रताचा हेतू हाच आहे कि स्त्रीने आपला पती स्वतः निवडावा आणि त्यानंतर त्याच्या बरोबर प्रदीर्घ सहजीवनाचा आनंद मिळवावा.…………… तसे सुबोध खरे नी जे मत माडलय ते काहीस रुचतय पण खरे तर केवळ सात जन्मासाठी नवरा हवा म्हणून हि पूजा करण्या पाली कडे जाऊन केवळ निसर्गाच्या सानिध्यात आपल्या रोजच्या रटाळ चाकोरी बद्ध आयुश्यातुन वेळ कढून काहीतरी नवीन करायला मिळ्ण्याच आनंद खरंच आपल्या ला ह्या सणावारा मुले घेतायेतो हेही खरेच आहे पण त्यामागचा हेतू समजून घेऊन केलेली पूजा निशितच जगण्याला बळ देते त्याच बरोबर वृक्ष संवर्धन हि होते हाही मुद्दा विचारकरण्यासारखा आहे . पण सद्याची परिस्थिती पाहता नात्यांची विनच जिथे इतकी विसविशीत झालीये तिला एका दोरयाच्या धाग्याने काय सावरता येणार आहे मग ते नात कुठलेही असो . @आनंदी गोपाळ खरंच अश्या धाग्यांची गरज आहे का? हो नक्कीच आहे कारण आताच्या काळात ना सत्यावाना सारखे पती राहिलेत ना सावित्री सारखी पतनी ……… असो शेवटी विचार आणि व्यक्ती स्वातंत्र सर्वांनाच आहे . @पैसा आणि स्रुजा अतिशय मस्त आणि योग्य प्रतिसाद . अशा रीतीने विचार केला तर हे व्रत करणे वावगे निश्चीतच ठरणार नाही . पण तरीही कितीतरी महिलां व्रत केवळ करायचे म्हणून करताना मी पहिले आहे . मनात कुठलेच प्रेम नसते पण केवळ करत आलो म्हणून करायचे सामाज काय म्हणेल ह्या भीती पोटी , मला वाटते खरी वट पोर्णिमा स्री एकदाच करत असेल ती म्हणजे ल्गना नंतर पहिल्या वर्षी कारण तोपरेंत काहीच माहित नसते आपल्याला कि कोणाशी पाला पडलाय आपला ………. मग मात्र आयुष्यभर पदरी पडले आणि पवित्र झालेचा नारा ठरलेला असतो. पण एक मात्र नक्की कि कोणालाच बधंन नको आहे . हेच खरे..! :)

गरज बर्‍याच गोष्टींची खरे सांगायची तर नसतेच. बहिणीने भावाला राखी कशाला बांधायला हवी? बायकोने नवर्‍याला पाडव्याला ओवाळायला कशाला हवे? नवर्‍याने बायकोला मंगळसूत्र कशाला बांधायला हवे? या सगळ्याच गोष्टी प्रतिकात्मक आहेत. त्या तेवढ्यापुरत्याच घ्याव्यात. जमल्यात तर कराव्यात. न जमल्यास न कराव्यात. फक्ता बायांनीच का वडाला फेर्‍या माराव्यात हा खुप सयुक्तिक प्रश्न आहे. जर नसतील मारायच्या तर नका मारु. बहुतेक पुरुष खुषच होतील ;) असो. उगाच दळण दळत बसण्यात अर्थ नाही. ज्यांना पटते त्यांनी करावे आणि ज्यांना पटत नाही त्यांनी शांत बसावे. दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या मतांचा आदर करावा इतकेच.

@तेव्हा या सातही जन्मात तिला नवर्याने फूलटू सपोर्ट करावा असे वाटते म्हणून ती वडाला दोरा बांधते. >>> स ला म __/\__/\__/\__ @(भारी जमलं राव)>>> :-))

काही प्रतिसादांत या व्रतांमुळे काही वृक्षांना संरक्षण मिळून पर्यावरणहानि टळते असा मुद्दा मांडलाय. पण हे काही वृक्ष, खासकरून वड, पिंपळ, उंबर हे दाट वसतीच्या शहरी भागांत लावण्यायोग्य नाहीत. यांची मुळे अतिशय शक्तिशाली असून सीमेंट्काँक्रीटची बांधकामे (अगदी पदपथ, रस्ते, पुलांचे कठडे पर्जन्यवाहिन्या, सर्वच) उद्ध्वस्त करू शकतात. यांचा प्रसारही फार झपाट्याने होतो. इमारतींच्या सांडपाणी आणि मलवाहिकांवर ही बांडगुळे वाढतात आणि वाहिकांतून गळती होऊन संपूर्ण इमारतीला धोका पोहोचतो .मुंबईत खाजगी इमारतींमधून वृक्षतोडीला गेल्या आठवड्यापर्यंत रहिवाशांना मनाई होती. महापालिकेची परवानगी मिळवणे जिकिरीचे आणि वेळखाऊ असते. धर्मश्रद्धेमुळे मजूरलोक ही झाडे तोडावयास तयार होत नाहीत. संकुचित जागेमुळे शाखाभार एका बाजूला झुकतो. आमच्याच इमारतीमध्ये एक मोठे झाड गेल्या पावसात पडले. जीवितहानि होता होता काही क्षणांनी वाचली. शिवाय त्या अख्ख्या झाडाची विल्हेवाट (डिस्पोजल) लावण्यास महापालिकेने सहा महिने घेतले. पुण्यात सूस रस्त्यावरच्या एन.एच.४ च्या पुलानजीक अगदी लहान जागेत दहा-पंधरा वटवृक्ष लावले आहेत ते वाहत्या एन.एच.वरील पुलाला अगदी धोकादायक वाटतात

रोज आपलं एशी हापिसात गुबगुबीत खुर्च्यांवर बसून बसून (श्रेयअव्हेर : तात्याभैय्या देवासकर) तब्येतीची वाट लागलेली असतेय, एखाद दिवस एक जरा वडासारख्या भरपूर आक्षिजन देणार्‍या झाडाच्या आसपास थोडं थांबलं तर तेव्हढंच फ्रेश वाटेल. बंडलभर दोरा वडाच्या बुंध्याला गुंडाळता गुंडाळता तेव्हढाच चालण्याचा व्यायाम होतो. (आपल्या भावी मांज्याचं बंडल आयशीनं ढापलं म्हणून पोरं रुसली तरी ते काय लै महत्वाचं नाही.) तिथं आलेल्या कित्येक ओळखीच्या-अनोळखी बायाबापड्यांसोबत बर्‍याच दिवसांच्या साचलेल्या गफ्फा (एऽऽ...कोण रे तो गॉसिप म्हणतोय?) होतात. कधी नव्हे ते कपाटाच्या कोपर्‍यात मुरुन बसलेल्या साडीला जरा बाहेरची हवा लागते. तेव्हढंच जरा रेशीम झळाळतं, कसर बिसर काय लागायला लागली असेल तर झटकून स्वच्छ होते. मग, वडाच्या पाराशी चुकून कोणी नवीकोरी साडी हिंडताना दिसली तर नव्या फ्याशनची आणखी जोरात चर्चा होऊन आपली माहिती अपडेट होते. झालंच तर तुझे दागिने, माझे दागिने ह्यावरचा ठराविक लडिवाळ संवाद होऊन बर्‍याच दिवसांपासून कुणाची जिरवायची राहिली असेल तर तेही साधता येतं. एक जरा उपास केला म्हणजे त्या पाव-भिस्कुटांच्या मार्‍यानं थकलेलं पोट जरा सावरतं. फळंफिळं खाऊन उगं जरा तरतरी आल्यासारखं वाटतं. ( आणी नंतर डब्बल कोट्यातून पुरणपोळी हाणता येते!) यमासोबत सात जन्मांची मांडवली केल्याचं दाखवून नवर्‍याला दमात घेता येतं... ..... .............. असे अनंत फायदे दिसत असूनही वर्षातल्या ह्या एका दिवसातल्या तासाभराच्या भानगडीसाठी इतका विरोध का दर्शवतात ह्या बायका हेच कळत नाही.

धेस्मुका लका अम्रीकेत जाउन हे लिवायला लै ग्वाड वाटतया. आँ. खंदकात बसून कोनबी गोळ्या हानतय की. परत येयाचं हाय नव्हं? (म्या तर आम्च्या पाटलिणीला फ्लेक्सावर वडाचं चित्र छापून देणारे. गुंडाळ रोज म्हणावं ;) )

आपल्याला टेन्शन नाय! लाज नाय मला, कायपन बोला. आली लहर, तर केला कहर! ;) >>(म्या तर आम्च्या पाटलिणीला फ्लेक्सावर वडाचं चित्र छापून देणारे. गुंडाळ रोज म्हणावं तेच्यावर परत प्रश्न विचारला की 'ह्या काही अर्थ आहे का?' तर?

मग फ्लेक्स गुंडाळायचं. =)) =)) =)) एकूण काय.......................................;)

पूर्वीच्या काळी समाज अशिक्षित असताना पर्यावरणाच्या महत्वासाठी, अनेक महत्त्वाच्या झाडांच्या पाना-फुलांचा देवाच्या पुजेशी संबंध जोडून त्या त्या झाडांचे संवर्धन आंणि संरक्षण करण्याचे कार्य समाजधुरीणांनी केले आहे. वड, आंब्याची पाने, तुळशीची पाने, रुई, दुर्वा, आघाडा, जास्वंद, भाताच्या लो़ंब्या, दर्भ वगैरे वगैरे अनेक झाडांना, फुलांना, फळांना देवपुजेत मानाचे स्थान दिले. एक विनोद ऐकण्यात आला तो असा, सत्यवानाचे प्राण सावित्रीने मोठ्या हुशारीने परत मिळविले आणि देवाच्या चरणी सुद्धा बायकांची कशी 'वट' आहे हे समस्स्त नवर्‍यांना दाखवून दिले म्हणून 'वटसावित्री' साजरी केली जाते. जी बाई, सात जन्म एकच पुरुष नवरा म्हणून मिळावा म्हणून देवाला प्रार्थना करते ती 'वट सावित्री' आणि एका जन्मातच सात पुरुष मिळावेत अशी आशा बाळगते ती........'चावट सावित्री'.

वट किंवा चावट सावित्रीपेक्षा आजूबाजूला वटवट सावित्र्या लै दिस्तात मात्र ;) (पळा पळा कोण पुढे पळे तो | वाचेल खाण्यातुनि मार रे तो ||)

डोळ्यांद्वारे बोलण्याच्या बायकांच्या कुशलतेस डोळे वटारणे म्हणतात (असे असावे) का?

देवाच्या पूजेला लागणार्‍या वनस्पतींचे सद्ध्याच्या काळात संरक्षण तर होत नाहीच उलट बेसुमार तोड होते. तेरड्यासारख्या व नस्पतीचा तर कित्येक ठिकाणी बीमोड झाला आहे. दिवाळीत आंब्याच्या पानांचे तोरन पाहिजे म्हणून मोहोरावर आलेल्या झाडांच्या फांद्याच्या फांद्या कापल्या जातात.संक्रांतीत आपट्याचेही तसेच. आपट्याची पाने अशी कितीशी लागतात? पण विकत घेतान एक छोटी मोळीच विकत घ्यावी लागते. ह्यापैकी कुठल्याच वनस्पती (आंबा सोडून) आता शहरात शिल्लक राहिलेल्या नाहीत. त्या दूरवरून आणाव्या लागतात. फायद्याचे गणित जुलवण्यासाठी त्या मोठ्या प्रमाणावर ओरबाडून आणल्या जातात, नको असताना जास्त भावाने माथी मारल्या जातात. सगळ्या वनस्पती खपणार नसतातच. या मालाची किम्मत अर्थातच थोड्याफार खपत असलेल्या मालातूनच वसूल केली जाते. सणानंतरच्या दिवशी या न खपलेल्या जुड्यांचे भारे कचराकुंड्यांतून टाकलेले दिसतात. खरे तर आपण पूजेसाठी कमीत कमी फुले- पाने वापरली पाहिजेत. त्यामुळे नाहक वृक्षतोड तर कमी होईलच पण निर्माल्यनिर्मितीही कमी होऊन त्याच्या विल्हेवाटीची समस्या आटोक्यात येईल.

कुठल्याही गोष्टीचा कमी वापर हा आजच्या उपभोक्तावादाच्या (चंगळवादच की!) जमान्यात बसत नाही. सणांच्या मोसमावर लक्ष ठेवून शेतकरी झेंडू, मोगर्‍याची लागवड जोपासतात. मल्लिगेसारखी फुले दूर कर्णाटकांतून मुंबईत येतात. मुंबईच्या फूलबाजारातली अवाढव्य उलाढाल पाहिली तर यात कितीजणांची रोजीरोटी आणि हितसंबंध गुंतलेले आहेत ते लक्षात येते. ह्या विक्रीमालाची खरेदी कमी करा असे म्हणणे मूर्खपणाचेच. प्रचंड मोठे गलेलट्ठ हार, तशीच सजावट ह्याचे निर्माल्य जरी जैवविघटनशील असले तरी छोट्याश्या जागेत टनावारी निर्माल्याचे विघटन होऊ शकत नाही. घरगुती निर्माल्याची आणखी वेगळी गोष्ट. ते कचर्‍यात टाकायचे नाही म्हणून (मुंबईपुरते) समुद्रकिनार्‍यावर, माहीमच्या/वसईच्या/वाशीच्या/ठाण्याच्या खाडीत जाता येता भिरकावून द्यायचे. मग त्या शेकडो पिशव्या भरतीच्या वेळेस पुन्हा किनार्‍याला येतात. ही ठिकाणे लांब पडतात म्हणून आजकाल तर जवळच्या एखाद्या वडा-पिंपळाखालीच त्या गुपचुप ठेवून दिल्या जातात. एकूणातच श्रद्धा आणि पर्यावरण हा चक्रव्यूह भेदणे कठिण दिसते. धार्मिक पर्यटनाच्या बाबतीतही हेच म्हणता येईल.