Welcome to misalpav.com
लेखक: धन्या | प्रसिद्ध:
एक होती सगुणा. तिच्या नवर्‍याचे नाव ईश्वर. तिच्या नवर्‍याला आणखी एक बायको होती. तिचे नाव निगुणा. दोघींचंही आपल्या नवर्‍यावर खुप प्रेम होते. पण दोघींच्या प्रेमाची तर्‍हा मात्र पुर्णपणे वेगळी. सगुणेचा सारा भर असण्यावर आणि दिसण्यावर. ती आपले नवर्‍यावरील प्रेम आपल्या कृतीतून, आपल्या बोलण्यातून व्यक्त करायची. त्याला चांगलं चुंगलं करुन खाऊ घालायची. त्याच्याशी प्रेमाच्या गोष्टी करायची. तो समोर दिसला नाही की बैचैन व्हायची. निगुणेचं सारंच उलट. तिचं प्रेम करणं कुणाला दिसायचं नाही. कारण ती ते शब्दांमधून व्यक्त करायची नाही. नवरा सतत आपल्या समोर असायला हवा असा तिचा मुळीच अट्टाहास नसायचा. किंबहूना "तो आपला नवरा आहे" या भावनेनंच ती आनंदी असायची. नवर्‍यावरील प्रेम व्यक्त करायला तिला कृती करण्याची किंवा शब्दांचा आधार घ्यायची गरजच भासायची नाही. सगुणा आणि निगुणा या एकमेकींच्या सवती असून कधी त्यांच्यात भांडण झालेलं कुणी पाहिलेल नव्हतं. मात्र त्या दोघी एकमेकींच्या अध्यात मध्यात नसायच्या हे मात्र खरं. ईश्वर तसा गावातील मोठा माणूस होता. सारा गाव त्याला ईश्वरशेठ म्हणून ओळखायचा. गावाला लागून असलेल्या उंच टेकडीवर त्याचं घर होतं. म्हणजे प्रत्यक्षात त्याला कुणी पाहिलेलं नव्हतं. परंतू वरुन सार्‍या गावावर त्याचं लक्ष असतं असं सारेच म्हणायचे. अडल्या नडल्याने त्याच्यापर्यंत निरोप पाठवून त्याच्याकडे मदत मागितली की तो काही ना काही मदत पाठवून देतो असं लोक ठामपणाने म्हणायचे. अर्थात हा निरोप सगुणा किंवा निगुणेच्या मार्फतच त्याच्यापर्यंत पोहचायचा. बहुतांश सारे लोक आपलं गार्‍हाणे सगुणेच्याच कानावर जाईल याची व्यवस्था करायचे. कारण बघावं तेव्हा सगुणाच नवर्‍याचे गुणगाण गात असायची. निगुणा नवर्‍याबद्दल क्वचितच बोलायची. त्यामुळे निगुणेमार्फत आपलं गार्‍हाणं ईश्वरपर्यंत पोहचवलं तर ते त्याच्यापर्यंत पोहचू शकेल याची गावकर्‍यांना खात्री नसायची. खुपच कमी लोक असं मानायचे की ईश्वरशेठ आपल्या दोन्ही बायकांवर सारखंच प्रेम करतात. गावात एक हिशोबनीस राहत होता. तो मात्र या सार्‍यांपासून वेगळा होता. म्हणजे तो स्वतःला वेगळं समजायचा. त्याचा टेकडीवरच्या घरात कुणी ईश्वर नावाची श्रीमंत व्यक्ती राहते याच गोष्टीवर विश्वास नव्हता. सगुणा आणि निगुणा या लोकांनीच आश्रय दिलेल्या स्त्रीया आहेत असं तो मानायचा. लोक ईश्वरशेठ नावाची कुणी व्यक्ती टेकडीवरच्या घरात राहते असं मानतात म्हणून त्यांना मूर्खात काढायचा. त्यानं म्हणे एक "असा मी, कसा मी, जसा मी, तसा मी" नावाचं महाकाव्य लिहिलं होतं. त्याला कुठेतरी नाचणीच्या सत्वाची पुरचूंडी सापडली होती. त्या पुरचूंडीचा त्याला खुप अभिमान होता. गावच्या चावडीवर लोक जमले की तो गावकर्‍यांना त्या नाचणीच्या सत्वाच्या पुरचूंडीबद्दल आवर्जून सांगायचा. गावकर्‍यांनी ते सत्व आम्हालाही दाखवा असे म्हटले की तो हजार बहाणे शोधायचा. या हिशोबनीसाचे अनेक गावकर्‍यांशी खटके उडायचे. चावडी अगदी दणाणून जायची. गावकरी हतबलतेने डोक्याला हात मारून घ्यायचे. गावच्या पंचांकडे हिशोबनीसाला वाळीत टाकावे अशी मागणी करायचे. गावचे पंच मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करायचे. ज्या गावकर्‍यांशी हिशोबनीसाशी वारंवार खटके उडायचे त्यातल्याच एका गावकर्‍याने शेजारच्या गावातील मठात जाऊन हरदासाची संथा घेतली. हा नव्याने हरदास झालेला गावकरी टेकडीवरच्या ईश्वरशेठच्या कथा गावकर्‍यांना रंगवून सांगू लागला. उठता बसता जून्या पीढीतील लोकांचे दाखले देऊन ईश्वरशेठच्या गोष्टी सांगू लागला. ईश्वरशेठची पत्नी सगुणा आपल्याच नात्यातील आहे असं दाखवत लोकांकडून वाहवा मिळवू लागला. जूना हिशोब चुकता करायचा म्हणून म्हणा किंवा टेकडीवरच्या ईश्वरशेठची पत्नी सगुणा ही आपल्या नात्यातील आहे असं गावकर्‍यांना सांगून ईश्वरशेठच्या खोटयानाट्या गोष्टी सांगून गावकर्‍यांची वाहवा मिळवतो हे सहन होईना म्हणा, हिशोबनीस गावातल्या बोळा-बोळात, चावडीवर हरदासाशी भांडू लागला. हरदासही तसा मुळचा सामान्य गावकरीच होता. परंतू हरदासाचं उपरणं खांद्यावर घेतल्यानंतर त्याला हजार हत्तींचं बळ आलं. आधी हरदासधर्माला जागून शांतपणे वागण्याचा त्याने आव आणून पाहीला. परंतू हिशोबनीस शांत वागून शांत राहणार्‍यातला नाही हे लक्षात येताच हरदासबुवांनी आपलं उपरणं खुंटीला लटकवलं आणि हिशोबनीसाशी टक्कर दयायला तयार झाले. चावडीवर गावकी जमली. खडाजंगी झाली. कुणीच हार घ्यायला तयार नाही. हिशोबनीस एका बाजूला, हरदास आणि काही गावकरी दुसर्‍या बाजूला. गावात अजूनही काही लोक होते ज्यांना टेकडीवरच्या घरात ईश्वरशेठ नावाची कुणी व्यक्ती राहते की नाही याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. त्यांना टेकडीवरच्या घरातून कसलीच मदत नको असायची. त्यामुळे त्यांनी सगुणा किंवा निगुणा यापैकी कुणाशीच कधी काही बोलणं केलं नव्हतं. हे तिसर्‍या गटातील लोकही चावडीवर हजर होते. ईतर गावकरी जरी अधून मधून आपले मत मांडत होते तरी मुख्य वाद हिशोबनीस आणि हरदास यांच्यातच होता. कुणीच माघार घ्यायला तयार होत नाही हे लक्षात येताच पंचांनी गावकीत बोल टाकण्यास बंदी करुन विषय तिथेच थांबवला. सारे गावकरी आपापल्या घरी गेले. एक नुकतंच मिसरुड फुटलेला तरुण मात्र तिथेच होता. तो पुरता गोंधळला होता. त्याने या गुंत्याची उकल करण्याचे ठरवले. तो गेला गावातल्या एका ऐंशी वर्षाच्या वृद्धाकडे. जाऊन प्रश्न केला, "आजोबा, ईश्वरशेठ नावाची कुणी व्यक्ती टेकडीवरच्या घरात राहते यावर तुमचा विश्वास आहे का?" आजोबा म्हणाले, "त्या टेकडीवरच्या घरात कुणी ईश्वरशेठ राहतात की नाही याचा विचार करायची मला कधी गरजच भासली नाही. जेव्हा जेव्हा मी संकटात सापडलो तेव्हा तेव्हा माझा मार्ग मीच शोधला. ईश्वरशेठच्या मदतीवर अवलंबून राहीलो नाही." "तुम्ही सगुणा आणि निगुणा यांना तरी पाहीले आहे का?" तरुणाचा पुन्हा प्रश्न. "सगुणेला खुप वेळा भेटलो आहे. निगुणा मात्र क्वचितच नजरेला पडते." आजोबांनी उत्तर दिले. "सारेच लोक तुमच्याप्रमाणे आपला मार्ग आपणच का शोधत नाहीत?" संभ्रमीत तरुणाने पुढचा प्रश्न केला. "व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रवृत्ती. कुठल्याही व्यक्तीची जडणघडण ही त्या व्यक्तीचा पिंड, त्या व्यक्तीवर झालेले संस्कार आणि आजूबाजूची परिस्थिती यावर अवलंबून असते. काहींच्या मनावर लहानपणापासून बिंबवले आहे की आपण संकटात सापडलो तर ईश्वरशेठ आपल्यासाठी नक्की काहीतरी मदत पाठवतात. या श्रद्धेपोटी माणसे धडपड करतात. आणि मार्गही सापडतो. मग त्यांना वाटते की ईश्वरशेठनीच आपल्याला मदत केली. लोक काहीही समजोत, मार्ग सापडणे महत्वाचे." "हरदास आणि हिशोबनीस यांच्या मतांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?" "जगामध्ये मतमतांचा गलबला असणारच. कुठलीही गोष्ट पुर्णतः टाकावू कधीच नसते.समोरच्याने एखादी गोष्ट देऊ केली तर ते गोष्ट आपल्याला मानवेल की नाही याची चाचपणी करुन ती गोष्ट घ्यायची की टाकून दयायची हे आपण ठरवायचं असतं. हरदास आणि हिशोबनीस ही दोन्ही माणसं आहेत. माणसांमध्ये असणारे गुणावगुण त्यांच्यात असणारच. ते चार गोष्टी योग्य सांगतील चार गोष्टी चुकीच्या. आपण योग्य गोष्टी घ्यायच्या आणि चूकीच्या गोष्टी सोडून द्यायच्या." वृद्धाच्या या उत्तरांनी तरुणाचे समाधान झाले आणि तो आपल्या घराच्या दिशेने चालू लागला.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

रूपककथा लै भारी! धन्याशेठचा धागा ज्या अपेक्षेने उघडाल त्याला नेहमीच धक्का देऊन जातो!

इश्र्वरशेठ, सगुणा, निगुणा,नाचणीच सत्व आणि उपरणं भयंकर लाईकल आहे. (हरदास, हिशेबनीस यांनी आपापली कथा सांगतच रहावी. गावकर्‍यांनी, पंचांनी त्यात पडु नये असे वाटणारा.)

एsssssssss धनाजीराव झिंदाबाद,माणूसशाही झिंदाबाद। https://encrypted-tbn1.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcQgY6Zztyvbt4Y2jF8AOZgkDUnwa3ktE64ta9Rn_AK5cjBLnkbY अहो,धनाजी वाकडे या जरा इकडे,चारू पेढा तुम्हाला..॥ अतिशय योग्य रेचक दिलत हो धनाजी-वैद्य। आता हे औषध घेतील का? मग ते पचेल का? गुण येइल का? आणी मुळात आपण रोगी आहोत हे मान्य होतं का? हे सारं पहाणं रोचक ठरेल.

पण यात मूळात ईश्वर शेट अस्तित्वात आहेत फक्त ते आहेत की नाहीत यावरून हरदास आणि हिशेबनीस भांडतायत असं कळतंय. थोडक्यात धागाकर्त्याचा कल ईश्वरशेठच्या अस्तित्वाकडे आणि म्हणूनच हरदासाकडे दिसतोय. त्यामुळे इथे मूळात गृहितकच हिशेबनीसाच्या विरुद्ध बाजूने आहे. याऐवजी 'ईश्वर शेठ रहातात असे म्हणत' असे लिहिले असते आणि फक्त सगुणा निगुणा बायकांचे अस्तित्व दाखविले असते तर कथा अनबायस्ड झाली असती. ;)

माझी शब्दांची निवड चुकली त्यामुळे माझा कल हरदासाच्या बाजूने आहे असं वाटू शकतं. मात्र तसं नाही. माझा कल कुठल्याच बाजूला नाही. मी "अपनी अकल लगाओ" प्रिन्सिपल वापरतो. :)

मुळात लेखापालाला हरदासाशी काय कुणाशीच वाद घालण्यात काही रस नव्हता. पण गावकरी ज्याम नाराज होते कारण इश्वरशेठला फुल्ल फाट्यावर मारुन सुद्धा तो मजेत होता. बहुसंख्य गावकरी चाकरमाने होते. इथेतिथे राबत सुट्ट्यांचा मेळ घालत अधूनमधून मजा करयाचे आणि इश्वरशेठ काळजी घेईल या आधारावर जगायचे. पण अशी थोडीफार मजा केली की पुन्हा गुमान खाली मान घालून कामाला लागायचे. गावत कट्टे झाले की इश्वरशेठ आहे का आपण येड्यासारखे त्याच्या आरत्या आणि पूजापाठ करतोय असा विषय आडूनआडून हमखास निघायचा. आणि हा लेखापाल कसा जगत असेल हा प्रश्न यायचा. नाही तर लोकांना काय पडली होती असल्या विषयाची? याला इश्वराशिवाय जगायची काही तरी किल्ली सापडलीये असं म्हणतोयं मग आहे तरी काय ती किल्ली असा (पूर्वापार) कुतूहलाचा विषय होता. गावकरी खवळायचं मुख्य कारण असं होतं की तो म्हणायचा आधी `इश्वरशेठ नाही' हे मान्य करा. पण ती हिम्मत कुणात नव्हती. गावकरी एकदम साळसूदपणे त्यालाच शिकवायचे, अरे, ज्याला वाटतंय इश्वरशेठ आहे त्याला वाटू दे, तू तुला काय गवसलंय ते सांग. तो म्हणायचा, हाच तर पेच आहे, तुम्ही आधार सोडल्याशिवाय निर्भय आणि स्वछंद कसे होणार? आणि तुम्ही सुखात असाल तर चर्चा कशाला करता? तुम्हाला कशाला हवी मला कळलेली गोष्ट? यावर गावकरी कमालीचे नाराज व्हायचे. मग गावकर्‍यांनी एक नामी शक्कल लढवली. त्यांनी आपापसात ठरवलं की हा फ्रस्ट्रेटेड आहे! तो म्हणाला, "दादानुं, मी तुम्हाला दु:खात आहात म्हणत नाही आणि मी फ्रस्ट्रेटेड असेन तर माझ्याविषयी चर्चा कशाला? तुमची खरी परिस्थिती तुम्हाला माहितीये. अश्या चर्चा करुन ती पुन्हापुन्हा उघडी कशाला करता? मजेत असलेला माणूस दुसर्‍याला किल्ली विचारायला जात नाही. दुसर्‍यानं कितीही सांगितलं की त्याच्याकडे किल्ली आहे तरी तो बधत नाही. तो इतका मजेत असतो की असल्या भंपक चर्चा आणि गावकर्‍यांची मतं यानं त्याला काहीही फरक पडत नाही."

किती किती ते फ्रस्ट्रेशन असावं =)) मिपावर अनाहितामध्ये काय चालतं याची उत्सुकता आहे म्हटलं तर एकवेळ मान्य करू ;) पण या लेखापालाकडे कसली किल्ली आहे याचि उत्सुकता आजिबात नाही, कारण फक्त बडबडीशिवाय लेखापालाकडे काहीच नाही. आणि जर
तो इतका मजेत असतो की असल्या भंपक चर्चा आणि गावकर्‍यांची मतं यानं त्याला काहीही फरक पडत नाही."
हे खरं असेल तर इतके टंकनश्रम करून असले प्रतिसाद लिहिणे हे फरक पडत नसल्याचेच लक्षण आहे, नाही का =)) आणि बाकी गावकरी चाकरमाने असतील, ते काय लेखापालाकडे काम करतात का? कट्ट्यांच्या वर्णनाने झालेली जळजळ स्पष्ट दिसते आहेच =)) मिपा म्हणजे चार टाळक्यांचा एक ग्रूप. त्याची इतकी असूया वाटत असल्याचे पाहून एक कट्टेकरी मिपाकर म्हणून अंगावर मूठभर मांस चढलं उगीचच =))

धन्या - Thu, 26/12/2013 - 11:08 कोणताही शब्द (उदाहरणार्थ : आत्मभान) केवळ माहिती आहे म्हणून वापरणं आणि ती निराधार स्थिती आहे त्यासाठी कोणतंही आलंबन नसायला हवं हे समजणं यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. मानसशास्त्रामध्ये आत्मभान (सेल्फ अवेअरनेस) चा अर्थ मला काय वाटत आहे (व्हॉट आय अ‍ॅम फीलींग), मी काय विचार करत आहे (व्हॉट आय अ‍ॅम थिंकींग) आणि मी काय कृती करत आहे (व्हॉट आय अ‍ॅम डूईंग) याची नेमकी जाणिव असणे. तुम्हाला अध्यात्माच्या अनुषंगाने "आत्मभान" या संकल्पनेत काय अभिप्रेत आहे?

स्वतः धृतराष्ट्राला त्याचे पुत्र कोण आहेत हे कळू नये म्हणजे आश्चर्यच =)) पण त्याच्या दिव्यदृष्टीमुळे होत असणार तसं. वय अन फ्रस्ट्रेशन हेही फ्याक्टर आहेतच म्हणा =))

श्शी बाबा. हल्ली या ब्याट्या आणि सूडक्याशी सहमत व्हावं लागतय.. आणि शिवाय वल्लीशीपण सहमत! काही मजाच नाही राहिली!! :( ;)

@ साती, सहमत. मला जे लिहायचे होते ते आपण लिहून टाकलेत. @धना, कथा फारच छान आहे. उगीच झणझणीत नाही (म्हणून पचनास उत्तम) हे विशेष. गेले कित्येक दिवस चित्रवाहिन्यांना जसे केजरीवाल-मोदी चघळायला मिळालेत. अगदी तसेच हे सगुण-निर्गुण प्राणी मिपा व्यापून राहिलेत. असोत बापडे. जोपर्यंत गोडी कमी होत नाही तोपर्यंत चघळायला काहीच हरकत नाही.

ईश्वरशेठ टेकडीवरच्या घरात राहतो की नाही ह्याच्याशी कसलंच देणंघेणं नसलेल्या लोकांची मात्र भलतीच कुचंबणा होऊ लागली. हिशेबनीस त्यांजवर हे हरदासी बुवाच्या बाजूने आहेत असा निरर्थक आरोप करू लागला तर हरदासी बुवा मात्र हा आरोप झिडकारून त्या लोकांना लबाड ठरवू लागला. शेवटी हे सर्व लोकांनी ग्रामसभेत येऊन हिशेबनीस आणि हभप बुवांमध्ये चाललेल्या चिखलफेकीत काहीही रस नाही असे सांगते झाले. मात्र त्यांच्यातले काही लोक आपले नाव उगा मध्ये आल्याने फारच भडकलेले होते. हिशेबनीस हा निब्बर कातडीचा असल्याने त्याच्यापाशी बोंबलून काहीही फायदा होणार नाही हे ओळखून त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून हरदासी बुवांची मात्र खरडपट्टी काढू लागले. शेवटी पंचांच्या ठरावानंतर सारे काही शांत झाले.

>>>एक होती सगुणा. मुद्दलात चूक झालेली आहे. होती या शब्दाने भूतकाळ आणि (कधी काळी असलेले) अस्तित्व सूचित होत आहे. अस्तित्वाचा पुरावा नाही. काळाचा विषय जरावेळ बाजुला ठेवू. सगुणाचे अस्तित्व सिद्ध होत नसल्याने आणि केवळ रुपककथांमधे ज्यापद्धतीने एक दरिद्री ब्राह्मण होता अशी सुरवात करुन भंपक नितीमत्तेचे डोस पाजणार्‍या पुराणकथा वा भाकडकथा रचल्या गेल्या त्याच पठडीतील कथा असल्याचे सिद्ध होते. हिशेबतपासनीसाचा आक्षेप अशा प्रकारच्या अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीरेखांच्या गुणवैशिष्ट्याचे मंडन करणार्‍या कथांना असल्याने, मुद्दाम हिशेबतपासनीसाचे पात्र कमकुवत दाखवून आपल्याला हवा तसा निष्कर्ष काढण्याचे लेखकाने जे स्वातंत्र्य वापरले आहे त्याचा मी निषेध करतो. अशा प्रकारे गेल्या पाच हजार वर्षांत विशिष्ट वर्गांकडून तेच ते लोकांच्या माथ्यावर जे मारले गेले त्याचीच नवी आवृत्ती म्हणजे सदर लेख आहे. ज्याचा स्व जागृत आहे असा कुणीही अशा भ्रममुलक लेखनाला बळी पडणार नाही आणि असे भ्रमाचे पडदे फाडण्याचे कार्य आम्ही सदैव करत राहु. -- दत्तोबा ओढचादर

पडदे फाडणार्‍यांसाठी 'फाडचादर' हे उपनाव कदाचित अधिक समर्पक ठरावे!

धन्या एक सॅल्यूट!!!!! बाकी "ही आमची सगुणा. आमचा हिच्यावर फार जीव." असे लिहून तिचा फोटोबिटो लावला असतास तर सगुणेच्या मागे सगळे लोक का धावतात त्याचे उत्तर अगदी चुटकीसरशी मिळाले असते हो ;) -बॅटुतात्या गॉथमकर.

ह्याच्याशी कसलंच देणंघेणं नसलेल्या लोकांची मात्र भलतीच कुचंबणा होऊ लागली.
विषय इतका सोपा असता तर दोघांनाही गावकार्‍यांनी केंव्हाच फाट्यावर मारलं असतं! पण गावकरी काही आकाशातून आलेले नव्हते. इश्वरशेठ आहे ही की नाही याबद्दल ते ही उत्सुक होते. वरपांगी काहीही दाखवोत अनिश्चितता तर प्रत्येकाच्या जीवनात होतीच. कितीही पांघरुण ओढून झोपलं तरी वृद्धत्व आणि मरण कुणाला चुकलंय? गावकर्‍यांच्या लक्षात आलं की `इश्वरशेठ ही तुमची कल्पना आहे' असं सांगणारा हिशेबनीस नाही लेखापाल आहे. त्याच्याकडे निर्विवाद मुद्दा आहे की टेकडीवर कुणीही नाही. आणि असेल तर तिथे जाऊन बघू. पण गावकरी इतकी हिम्मत करायला तयार नव्हते. मायला, असला इश्वरशेठ तर उगीच पंगा नको, आपली रसद थांबायची. आणि गावत थोरथोर लोक होऊन गेलेत त्यांचे दाखले देत हरदासबुवा प्रवचनं ठोकतात म्हटल्यावर भ्रमाच्या पांघरुणात राहणं केव्हाही सोपं होतं. त्यांच्या पूर्वजांनीपण तोच मार्ग निवडला होता त्यामुळे `सेफ बेट खेळणं बरं' असं गावकीचं धोरण होतं. पंचायत समितीतली मंडळी मुळचे गावकरीच त्यामुळे बहुतेकांचा कल इश्वरशेठ आहे याकडेच होता. मुळात लेखापालाचा मुद्दा निर्विवाद होता पण गोची अशी होती की तो मान्य केला की सगुणा भ्रमिष्ठ ठरत होती! यावर आता उपाय निघत नव्हता, मग सगुणाच्या साथीनं सगळ्या गावकर्‍यांनी एक आयडीया केली. लेखापाल अहंमन्य आहे, तो स्वतःचंच खरं करतो तस्मात त्याच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही अशी खबर पसरवली. विषय संपला! अशा प्रकारे गावकरी पुन्हा पांघरुण घेऊन झोपून गेले!

>>लेखापाल अहंमन्य आहे, तो स्वतःचंच खरं करतो तस्मात त्याच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही अशी खबर पसरवली. विषय संपला! हिशोबनिसान् स्वतःला लेखापाल म्हणवून घेतलंन् यातच सगळ आलं, नाय का? पुराव्यान् शाबित केलंन्!! लोक जे दिसतं तेच बोलतात येवढं त्यास कळ्ळं तरी फार हो!! नायतर शिंच्या स्व गवसण्याच्या बोंबा मारणार्‍यांना आपण स्वतः काय आहोत हेच माहित नसतं.

एक साधी फॅक्च्युल करेक्शन काय केली की बसला आतवर फटका! माणासाचं कसंय की स्वतःकडे काही नसलं तरी चालेल पण दुसर्‍याकडे आपल्यापेक्षा काही जास्त आहे असं दिसलं तरी लगेच स्वतःचं सामान्यत्त्व उफाळून येतं. पण उघडपणे म्हणायचं `बघा त्याचा अहंकार'! कसं?

>>पण उघडपणे म्हणायचं `बघा त्याचा अहंकार'! कसं? ऑ?? वरच्या प्रतिसादात मी त्या सो कॉल्ड लेखापालाच्या अहंकाराबद्दल चकार शब्द तरी काढलाय का? आणि हिशोबनिसाने स्वत:ला लेखापाल म्हणवून घेण्यावर कमेंट टाकली तर तुम्ही का चवताळताय ?

विषय इतका सोपा असता तर लेखपालाला गावकार्यांनी केंव्हाच फाट्यावर मारलं असतं! पण विचीत्र विधाने करून आपण लेखपाल न्हवे तर जोकपाल आहोत हे वारंवार सिध्द होउनही लोकपाल बनायची खुमखुमी त्याला गावाकर्यांचा सर्वात मोठा शत्रु बनवत गेली. सगुणा अथवा निगुणा यांना मान्य असलेले बहुपत्नीत्व व इश्वरसेठ वर असलेली अव्याभिचारी निष्ठा स्विकार असल्यान त्यांनी कधिच इतरांच्या संसारात / व्यापात ढवळा ढवळ केली नाही पण जोकापालची प्रवृत्ती नेमकी उलट होती. त्याला इतरांना न मागतासल्ले द्यायची फार हौस असायची म्हणून लोक अडचणीत असताना अथवा आनंदात असतानाही सगुण निर्गुण करू लागले कि त्याला होणारी पोटदूखी थांबावी म्हणुन तो गरळ ओकायला सुरु करत असे

पहिले सात आयडी स्त्रियाँच्या चुकीच्या वर्तणुकिचा निसन्धिग्ध धिक्कार केला म्हणून ब्ळि जातील/ब्यान होतील व आठवा आयडी मात्र अवतारी असून सगळ्या गोष्टीत दूध का दूध व पानी का पानी करेल असं माज्या नाडी भविष्यात लिहलं आहे.... तू मोजत रहा कारण हे रोखणे तुझा घास नाही

रूपक आवडले ..पण ( कोणाला समजावयचा प्रयत्न करतोयस अभ्या ...ते गाढवापुढ वाचली ....तुला माहीत आहेच ;) )

तहे दिलसे सहमत. लेखापालाचा मूर्खपणा जगजाहीर असून तो त्याचे प्रदर्शन करण्यात कसलीही कसूर ठेवत नाही तस्मात लोकांची दिशाभूल तरी होत नाही. हरदास मात्र लै बेरकी!!! त्याचा लघळपणा अन दांभिकपणा अजून एक्सपोज झाला असता तर अजून मजा आली असती.

कथा 'सगुणा' ची आहे. लोक विषय भरकटवतायत! :) शिवाय लेखकानीदेखिल त्याच्या आकलनक्षमतेनुसार मूळ विषयातच गोंधळ घातलाय! ;) स्वगतः काय मजा येते असे प्रतिसाद द्यायला! =))

एक नुकतंच मिसरुड फुटलेला तरुण मात्र तिथेच होता. तो पुरता गोंधळला होता. त्याने या गुंत्याची उकल करण्याचे ठरवले. तो गेला गावातल्या एका ऐंशी वर्षाच्या वृद्धाकडे. जाऊन प्रश्न केला, "आजोबा, ईश्वरशेठ नावाची कुणी व्यक्ती टेकडीवरच्या घरात राहते यावर तुमचा विश्वास आहे का?" आजोबा म्हणाले, "त्या टेकडीवरच्या घरात कुणी ईश्वरशेठ राहतात की नाही याचा विचार करायची मला कधी गरजच भासली नाही. जेव्हा जेव्हा मी संकटात सापडलो तेव्हा तेव्हा माझा मार्ग मीच शोधला. ईश्वरशेठच्या मदतीवर अवलंबून राहीलो नाही."
तरुणाचा प्रश्न तसा स्ट्रेटफॉर्वर्ड होता.. आणि क्लोज्ड एन्डेड.. तेव्हा पाल्हाळ लावण्यापेक्षा आजोबांनी "नाही" किंवा "हो" किंवा सद्य कथेनुसार "मला माहीत नाही" इतकं उत्तर आगोदर द्यायला हवं होतं. तरीही फक्त मदतीकरिताच तथाकथित ईश्वरशेठ सर्वांना हवा असतो, आणि त्याच्या अस्तित्वाची चर्चा ही मदतीकरिताच असते, हे मान्य केल्याबद्दल आजोबांचं अभिनंदन.
"सारेच लोक तुमच्याप्रमाणे आपला मार्ग आपणच का शोधत नाहीत?" संभ्रमीत तरुणाने पुढचा प्रश्न केला. "व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रवृत्ती. कुठल्याही व्यक्तीची जडणघडण ही त्या व्यक्तीचा पिंड, त्या व्यक्तीवर झालेले संस्कार आणि आजूबाजूची परिस्थिती यावर अवलंबून असते. काहींच्या मनावर लहानपणापासून बिंबवले आहे की आपण संकटात सापडलो तर ईश्वरशेठ आपल्यासाठी नक्की काहीतरी मदत पाठवतात. या श्रद्धेपोटी माणसे धडपड करतात. आणि मार्गही सापडतो. मग त्यांना वाटते की ईश्वरशेठनीच आपल्याला मदत केली. लोक काहीही समजोत, मार्ग सापडणे महत्वाचे."
हरकत नाही.. मार्ग सापडल्यानंतर तो ईश्वरशेठमुळे सापडला असं वाटायला अजिबातच हरकत नाही, उत्तम आहे. फक्त एक संभाव्य धोका असा, की ईश्वरशेठचं फक्त अस्तित्व मानून आपले प्रयत्न चालू ठेवणे.. त्यावर ईश्वरशेठच्या प्रत्यक्ष असण्या/नसण्याचा परिणाम न होऊ देता.. हे दुर्मिळ आहे. हा निसरडा रस्ता आहे. ईश्वरशेठला गृहीत धरुन, तो आहेच इतकंच नव्हे तर तो मला मदत करेलच या विश्वासाने जेव्हा लोक प्रयत्न करतात (किंवा अनेकदा करण्याचं सोडतात) त्याचं प्रमाण फार असतं.. आणि मग होतो भ्रमनिरास. अशा वेळी ईश्वरशेठ आहे की नाही या प्रश्नाचं वेदनादायक उत्तर शोधण्यापेक्षा लोक पुन्हा स्वतःलाच दोष देतात आणि पुढे चालू पडतात. म्हणजे श्रेय ईश्वरशेठला, अपश्रेय स्वतःला, स्वतःच्या प्रयत्नांना.. या विचारसरणीने हळूहळू "प्रयत्न" या प्रकाराचं अवमूल्यन होत जाण्याचा धोका असतो. आपण स्वतःच फक्त आहोत.. ईश्वरशेठ नाही हे गृहीत धरुन(मान्य करुन म्हणत नाही), स्वतःच्या हातात सर्व सूत्रे घेण्याच्या धाडसाने गावकर्‍यांमधे प्रयत्नवाद आणि प्रयत्नप्रतिष्ठा हा अत्यंत "उपयोगी" आणि "मदत करणारा" गुण वाढतो. शेवटी मदतीच्या वेळीच सर्व लागत असल्याने हा गुण ईश्वरशेठच्या अज्ञात अस्तित्वापेक्षा जास्त वास्तव असतो. अर्थात ईश्वरशेठचं अस्तित्व मानून प्रयत्न करता करता ईश्वरशेठला नाहीसं करणं हीच दिशा असली पाहिजे. ईश्वरशेठ हा गणितातला "हातचा" आहे. त्याला गणिताच्या शेवटी एक आकडा म्हणून अस्तित्व राहात नाही.. आणि त्यामुळेच हातचा हा एक खरोखरचा जास्तीचा लाभदायक आकडा आहे असं मनापासून न समजता हातच्याशिवाय गणित करण्याकडे सर्वांनी वाटचाल करावी. अर्थात पुन्हा हे एक व्यक्तिगत मत आहे अशी स्टेपलर पिन मारणे आवश्यक आहेच म्हणा. बाकी लिहितोस एकदम पॉलिटिकली करेक्ट रे धन्या तू.. !! ;)