Welcome to misalpav.com
लेखक: समीरसूर | प्रसिद्ध:
आज आम्हाला (म्हणजे मला आणि माझ्या बायकोला) अमेरिकेत राहून जवळपास सहा महिने होत आलेत. अजून साधारण १५-२० दिवसांनी आमची भारताभूमीकडे परत जाण्याची वेळ येऊन ठेपणार आहे. २००८ मध्ये मी शिकागोमध्ये काही काळ राहिलो होतो; तेव्हा मला माझ्या तिथल्या वास्तव्यात फक्त एकच मराठी व्यक्ती भेटली होती आणि कालांतराने आम्ही चांगले मित्र झालो. नाही म्हणायला आमच्याच पुण्याच्या कार्यालयात काम करणारा आणि थोडीशी ओळख असलेला एक मर्द मावळा मराठी माणूस मला पहिल्याच दिवशी दिसला. मी आश्चर्याने हसून त्याला अभिवादन केले. त्याने नाक उडवून माझ्याकडे दुर्लक्ष केले आणि अर्नोल्ड शिवाजीनगरकर हातात गन घेऊन शिवाजीनगर बस स्टँडकडे झेपावा तसा तो झेपावत पुढे निघून गेला. तो मर्द मराठी माणूस मला नंतर बर्‍याचदा दिसला. माझ्या इमारतीमध्येच रहायचा. पण त्याने माझ्याकडे कधीच पाहिले नाही. मी समोरून आलो की तो मान वळवून निघून जायचा. असो. आपण नुसतेच नावाचे "मर्द मराठे, राकट आणि कणखर देशातले, मावळे-बिवळे, वगैरे वगैरे". ही सगळी विशेषणे मला कधी-कधी फार पोकळ आणि फिल्मी वाटतात. मराठी माणूस (अगदी माझ्यासकट) या गाण्यांमध्ये जसे मराठी माणसाचे वर्णन असते तसा अजिबात नाहीये. किंवा आताच्या जमान्यात हे वर्णन आपल्याला लागू पडत नसावे. किंवा म्या पामराची वयोमानापरत्वे दृष्टी (आणि मती) अधू झाली असावी. काहीतरी असेल किंवा नसेल पण हे नाटकीय वर्णन आणि वास्तव यामध्ये कुठेतरी काहीतरी गोची आहे हे नक्की. बाकी काहीही असले तरी आपले कवी खूप प्रतिभावान होते हे मात्र मान्य करायलाच हवे. असो. हा मुद्दा निराळाच आहे. यावेळी मी मूर्सव्हीलमध्ये (नॉर्थ कॅरोलायना) मध्ये राहिलो आणि मला बरीच मराठी मंडळी भेटली. अर्थात या गावात तेलुगू लोकांच्या तुलनेत मराठी लोकांची संख्या अगदी नगण्य आहे. मला वाटते तमाम अमेरिकेत तेलुगू लोकांची संख्या लक्षणीय आहे. आणि त्याखालोखाल तमिळ! मी ज्या कम्युनिटीमध्ये राहतो तिथे जवळपास २५०-३०० अपार्ट्मेंट्स आणि १५०-२०० टाऊनहाऊसेस आहेत. साधारण १००-१२० एकरांच्या विस्तीर्ण क्षेत्रात वसलेली ही कम्युनिटी म्हणजे आमच्या गावातल्या ५ ते ६ मोठ्या कम्युनिटीजपैकी एक आहे. आणि सगळ्या कम्युनिटीजमधे तेलुगू लोकांची संख्या मोठी आहे. आमच्या कम्युनिटीमध्ये ५०% पेक्षाही जास्त तेलुगू लोकं आहेत. त्यांची संख्या इतकी जास्त का यामागचं कारण मला अजूनही कळालेलं नाही. आमच्या कम्युनिटीमध्ये फिरतांना क्षणभर आपण हैदराबादमध्ये तर नाही ना अशी शंका यावी इतके तेलुगू लोकं आहेत. मी एकाला यामागचं कारण विचारलं तर तो म्हणाला अमेरिकेत यायला मिळावं म्हणून तेलुगू लोकं काही खास तांत्रिक (आयटी) कौशल्ये आत्मसात करतात. तेलुगू जनता मुख्यत्वेकरून तंत्रज्ञान क्षेत्रात जास्त आढळते. तंत्रज्ञानाशी फारसा संबंध नसणारी क्षेत्रे (उदा. मार्केटींग, सेल्स, पब्लिक रिलेशन्स, बिझनेस अॅनॅलिसिस, मनुष्यबळ, इत्यादी) त्यांना खुणावत नाहीत. पण मुळात त्यांना अमेरिकेचं इतकं वेड का असतं हे कोडं मला अजून सुटलेलं नाही. परवा आमच्या प्रोजेक्टमधली एक (तेलुगू) मुलगी भारतात परत जायला निघाली. तिने हजार प्रकारे प्रयत्न करून अमेरिकेत राहण्याचा प्रयत्न केला पण काही जमलं नाही. शेवटी तिला तिकीट काढावंच लागलं. इथपर्यंत ठीक आहे. राहण्यासाठी प्रयत्न करणं, पैसे वाचवणं, इथल्या कंफर्टेबल आयुष्याची सवय होणं वगैरे मी अगदीच समजू शकतो. पण ही मुलगी इतकी हताश झाली की शेवटच्या २-३ दिवसात ती कुणाशीच धड बोलत नव्हती. तिचं अगदी तुसडेपणाने बोलणं आणि वारंवार सगळ्या गोष्टींना विनाकारण नावं ठेवणं मला (आणि अजून बर्‍याच लोकांना) अनाकलनीय वाटलं. असं का? आमची इथल्या ७-८ मराठी कुटुंबांशी ओळख झाली. आणि बहुतेक सगळे इथे २-३ वर्षांपासून राहत आहेत. मराठी म्हणून ओळख-परिचय तेवढा असतो पण त्यापुढे जास्त काही नसतं. तेलुगू लोकं मात्र अगदी गळ्यात गळे घालून राहतात. प्रत्येक सणाला, प्रसंगाला ते एकमेकांच्या घरी जातात. सुटीच्या दिवशी देखील एकमेकांच्या घरी अंगत-पंगत वगैरे करून एकत्र वेळ घालवतात. त्यांच्यापैकी कुणी नवीन आलंय किंवा परत निघालंय तर मदत करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. जवळच्या तेलुगू मित्रांसाठी शेवटच्या क्षणाची सामानाची ने-आण, कचराकुंडीत नको असलेले सामान टाकणे वगैरे कामे ते आनंदाने करतात. हे लोकं आपल्या कंपूमध्ये सहसा इतर कुणाला प्रवेश देत नाहीत. त्यांना तशी गरजच पडत नाही. त्यांची संख्या इथे एक चांगली सपोर्ट सिस्टीम उभारण्याइतकी नक्कीच असते त्यामुळे त्यांना इतर कुणाचीच गरज पडत नाही. मराठी लोकांचं मात्र जरा वेगळं असतं. मी इकडे येण्याआधी पुण्यात असतांना एका मराठी व्यक्तीला फोन केला. ती व्यक्ती मूर्सव्हीलमध्येच राहणारी होती आणि काही दिवसांसाठी पुण्यात आमच्या कार्यालयात आली होती. मी स्वच्छ मराठी मध्ये बोलायला सुरुवात केली. "हॅलो, क्ष बोलताय का?" (हा क्ष मराठी, आडनावात शेवटी 'कर') "येस्स्स" (का फोन करतात घाटी लोकं कुणास ठाऊक!) "हॅलो, मी समीर बोलतोय" "येस्स" "मी क्ष युनिटचा आहे आणि य बिल्डिंगमध्ये बसतो. पुढच्या आठवड्यात मी मूर्सव्हीलला फॅमिलीसहित येणार आहे. मला असं कळलं की आपण तिथे राहता म्हणून फोन केला...म्हटलं तुम्ही काही माहिती देऊ शकाल...तिथलं राहणं कसं आहे, कुठे राहता येईल वगैरे..." मी थोडं अनौपचारिक होण्याचा प्रयत्न केला. "वेल, आय वुईल बी गोईंग बॅक धिस वीक. व्हॉट डू यू वाँट टू नो?" (धादांत खोटा आणि हास्यास्पद अ‍ॅक्सेंट! असा खोटा अ‍ॅक्सेंट मारण्यात लोकांना काय आनंद मिळतो कुणास ठाऊक. लठ्ठ माणसाने अतिसैल कपडे घालून सडपातळ झाल्याचा आनंद मानण्यासारखं आहे हे!) "आपली जनरल माहिती...अपार्टमेंट कुठे कसं मिळवता येईल वगैरे..." "वेल, आय डोंट नो...आय स्टे अलोन...आय वुईल बी गोईंग विथ माय फॅमिली नाऊ...देअर आर हॉटेल्स अल्सो...यू कॅन चेक ऑनलाईन...यू वुईल गेट इन्फर्मेशन..." (शांतता. त्याने त्याचं बोलणं संपवलं होतं आणि मला कळतच नव्हतं की आता काय बोलावं.) "ओके क्ष, थँक यू" आणखी काही बोलण्याचा स्कोपच नव्हता. मला असं झालं की कुठून आपल्याला दुर्बुद्धी झाली आणि क्ष ला फोन केला. नंतर मिपावरच्या सगळ्या मित्रांनी खूप चांगली माहिती पुरवली आणि इथे पोहोचल्यावर मदत करण्याची तयारी देखील दर्शवली. बर्‍याच मिपाकरांनी फोन नंबर्स, ईमेल आयडीज देखील दिले. काहींशी मी बोललो पण सगळ्यांशी संपर्क साधणं शक्य झालं नाही. त्याबद्दल अर्थातच क्षमस्व! मिपाकरांचे मनोमन धन्यवाद मानून मी मोर्चा तिथे प्रोजेक्टवर असणार्‍या आमच्या कंपनीच्या कर्मचार्‍यांकडे वळवला. त्यातल्या १-२ लोकांनी खूप मदत केली. माझं अपार्टमेंट बुक करून टाकलं, त्यासाठी एकूण $२०० भरून टाकले, माझ्यासाठी इस्त्री, फिल्टर, डिनर सेट वगैरे अशा किरकोळ वस्तू घेऊन ठेवल्या. मला ही मदत खूप उपकारक ठरली. हे मदत करणारे उत्तर भारतीय आणि तेलुगू होते. इथे पोहोचल्यानंतर बँकेत घेऊन जाणं, सुरुवातीच्या खरेदीसाठी नेणं, इन्शुरन्ससाठी कार्ड वापरू देणं, डिपॉजिटसाठी कार्ड वापरू देणं वगैरे मदत खूप महत्वाची होती. काही दिवसांनंतर क्ष महाशय मला कार्यालयात भेटले. माझी टीममध्ये ओळख करून दिल्यावर क्ष ने मला आपण आधी पुण्यात बोललो असल्याची ओळखच दाखवली नाही. अजिबात नाही! मग मीच जो ओळख करून देत होता त्यास म्हटलो "आय गेस आय स्पोक विथ हिम इन पुणे." असं म्हणून मी प्रश्नार्थक मुद्रेने क्ष कडे पाहिलं. क्ष ने कसेबसे हो म्हटले. आजपर्यंत क्ष माझ्याशी इंग्रजीमध्येच बोलतो. एकदा असाच तो त्याच्या कुटुंबकबिल्यासोबत फिरत होता आणि आम्हाला (म्हणजे मला आणि माझ्या बायकोला) भेटला. त्याने इंग्रजी पाजाळायला सुरुवात केली पण दोघांच्याही बायका मराठीमध्ये सुरु झाल्या; मग मी मराठी बोलल्यानंतर नाईलाजाने तो ही मराठी बोलायला लागला. मला एकदम हुश्श झालं; म्हटलं चला बोळा निघाला. पण कसचं काय, नंतर तो प्रत्येक ठिकाणी माझ्याशी पुन्हा इंग्रजीमध्येच बोलायला लागला. आता बोला! अजूनही तो माझ्याशी इंग्रजीमध्ये किंवा हिंदीमध्ये बोलतो. माझ्यामुळे काही त्रास होईल म्हणून त्याने मला पुण्यात भीक घातलीच नाही. त्यामुळे मूर्सव्हीलमध्ये भीक घालायचा प्रश्नच उद्भवणारच नाही असे त्याला वाटले असावे. अर्थातच मला त्याच्याकडून काही मदतीची अपेक्षा नव्हतीच. त्याच्या अशा विचित्र वागण्यामुळे आमची फक्त ओळखच राहिली; मैत्री नाही होऊ शकली. बाकी ५-६ मराठी लोकांशी ओळख झाली आणि त्यापैकी एका कुटुंबाशी खूप चांगली मैत्री झाली. पण बाकीचे मराठी लोकं मात्र अंतर ठेवूनच संपर्क ठेवत असल्याचे लक्षात आले. आमच्या प्रोजेक्टमध्ये एक हैदराबादचा मराठी मुलगा आहे. त्याच्याशी प्रयत्न करूनही मला मराठीत बोलता आले नाही. तो माझ्याशी एकही शब्द मराठीत बोललेला नाही. आता काय करावे? अजून एक मराठी कुटुंब अमेरिकेत ११ वर्षापासून राहते आहे पण आम्ही अमेरिकन आहोत हे ठसवण्यातच त्यांचा बराचसा वेळ खर्ची पडतो. आम्ही काही मराठी कुटुंबांना घरी बोलावले. आमचे वास्तव्य कमी काळाचे असल्याने सगळ्यांना एकत्र बोलवण्याइतपत सामग्री आमच्याकडे नाही. आश्चर्य म्हणजे इथे वर्षानुवर्षे राहणार्‍या मराठी लोकांनीदेखील तसा विचार कधीच केलेला नाही. पण ही मंडळी नेहमी धास्तावलेली असतात. यांच्याकडे गेलं म्हणजे यांनाही बोलवावं लागेल; मग ती लफडी करावीच कशाला? म्हणून मग मराठी लोकं एकमेकांकडे क्वचित जातात किंवा भेटतात. तेलुगू लोकं एकत्र येऊन दणक्यात सण-समारंभ साजरे करतात. बिनधास्त अमेरिकन क्लायंटसमोरदेखील धाडधाड तेलुगूमध्ये बोलतात. कुणाच्या बापाला भीत नाहीत आणि लाजत तर अजिबात नाहीत. तेलुगू माणूस आहे म्हटल्यावर दिलखुलासपणे तेलुगूमध्येच बोलतात. चुकूनही इंग्रजीमध्ये बोलत नाहीत. हिंदीचा तर संबधच नाही. आमच्या इथे मॅनेजरने फतवा काढला होता की अ‍ॅट लिस्ट गोरा समोर असतांना तेलुगू बोलू नका. दोन दिवसांनंतर या फतव्याचं फदंफदं झालं. आम्ही जिथे बसतो तिथे सतत तेलुगू कानावर आदळतं. असं वाटतच नाही की आपण अमेरिकेत आहोत. आजकाल दोन गुज्जू आमच्यासोबत कार्यालयात येतात (मी पण कुणासोबतच जातो; माझ्याकडे कार नाही). ते दोघे गुजरातीमध्येच बोलतात. अगदी एकमेकांना नवीन होते तेव्हादेखील नावे कळल्यावर ते सरळ गुजरातीमध्ये सुरु झाले. तसे ते त्यांच्या चेहर्‍यावरून पक्के गुज्जू वाटतातच. त्यांच्या डोळ्यातच ढोकळा, डॉलर, आणि दांडियाचं अजब मिश्रण असतं. या पार्श्वभूमीवर मराठी लोकांच्या धास्तावलेल्या आणि बुजर्‍या वागण्याचे मला कुतुहल वाटते. इथे आपला मर्द मावळा स्वभाव कुठे जातो कुणास ठाऊक. तेलुगू लोकांच्या इथल्या राहण्याची काही ठळक वैशिष्ट्ये जाणवली. ते बिनधास्त कुठेही असतात आणि जातात. दिवसातले जवळ-जवळ २४ तास त्यांच्या मेंदूमध्ये डॉलर - रुपया कन्वर्टर कार्यान्वित असतो. जिथे डील्स असतात तिथे तेलुगू लोकं नाहीत असं शक्यच नाही. कुठे किती कसं खर्च केल्यावर किती डॉलर्स परत मिळणार आहेत आणि काय आणि कसं घेतल्याने किती डॉलर्स वाचणार आहेत याची खडानखडा माहिती हवी असल्यास तेलुगू लोकांकडे बिनधास्त जाऊन विचारावे. ते सांगतीलच असं नाही पण विचारायला हरकत नाही. एकाने तर थँक्सगिवींगच्या वेळेस त्याचा चालू फोन नंबर बदलून टाकला कारण की नवीन सिमकार्ड अर्ध्या किमतीत मिळत होते. एक-दोन डॉलर्सच्या फायद्यासाठी ही मंडळी नाना तर्‍हेच्या क्लृप्त्या योजत असतात आणि अमलांत आणत असतात. राहणं तसं यांचं गचाळच असतं. ग्रीनकार्ड मिळवण्यासाठी बहुतेक सगळेच तेलुगू धडपडत असतात. मला एकाने खूप सल्ले दिले; अमुक एक क्रेडिट कार्ड घे, त्यावर १०% कॅशबॅक आहे; भारतात फोन करण्यासाठी अमुक एक सेवा वापर, ४० मिनिट्स जास्त मिळतात...वगैरे वगैरे. मी त्याला सरळ विचारले की तुला माझी एवढी काळजी कशासाठी. तो चक्क दात काढत म्हणाला "आय वुईल गेट रेफरल बेनेफिट"! मी हात जोडले. इथे बहुतेक डॉलर-रुपया या तोलकाट्याच्या मध्यावर लोकं जगतात. सोशल लाईफ खर्चिक प्रकरण आहे. मी पाहिलं आमच्या इथे लोकं दुसर्‍यांच्या घरी जायला आसुसलेले असतात. आढेवेढे न घेता येतात. अर्थात मराठी लोकं फारसे येत नाहीत. फुकट काही मिळत असल्यास भारतीय लोकं अग्रक्रमाने पळतात. आमच्या कम्युनिटीच्या कार्यालयात स्नॅक्स ठेवतात कळल्यावर आपले महान भारतीय रोजच्या रोज घरी स्नॅक्स घेऊन जायला लागले. दोन-दोन पाकिटं चिप्सची, प्रेट्झेल्सची पाकिटं...येऊ द्या...घरी न्यायची आणि ठेवून द्यायची. शेवटी कार्यालयातल्या लोकांनी स्नॅक्स ठेवणं बंद केलं. कुणाला कार्यालयात काही काम असेल तर त्यावेळेस वेळ काढण्यासाठी म्हणून थोडे स्नॅक्स ठेवलेले असत. आता बंद! बसा बोंबलत. आणखी एक महान भारतीय तत्व म्हणजे वस्तू विकत घेऊन, वापरून, साळसूदपणे परत करून टाकायची. थोडे दिवस काम असेल तर भारतीय लोकं चक्क विकत घेऊन येतात आणि वापरून परत करून टाकतात. माझ्या एका तेलुगू मित्राने मला कंफर्टर विकत न घेण्याचा सल्ला दिला होता. पहिले तीन महिने घेऊन परत करायचा आणि पुन्हा घेऊन तीन महिन्यांनी परत करून पैसे घेऊन घ्यायचे. खल्लास! म्हणजे पैसे खर्च करायची गरजच नाही. अर्थातच हे मी करणं शक्यच नव्हतं आणि आमच्या इथल्या वास्तव्यात मी एकही वस्तू परत केली नाही. याचं इथल्या लोकांना खूप आश्चर्य वाटतं. मला या प्रकारच्या चोरी-मारी मध्ये खरोखर रस नव्हता आणि नाही. वस्तू सगळ्या हव्यात पण त्यासाठी आम्ही शक्यतो पैसे खर्च करणार नाही आणि वाट्टेल ते उलट-सुलट मार्ग बिनधास्तपणे चोखाळू हा आपला भारतीयांचा खाक्या असतो. अशा देशात 'आप' सत्तेत आलं काय किंवा देवाचा 'बाप' आला काय, काहीही फरक पडणं शक्य नाही. आपण सगळेच मुळात एक नंबरचे चालू, भ्रष्ट, अप्रामाणिक, मुजोर, आणि आळशी आहोत. असो. मी थोडी अजून चौकशी केली असता अजून बरीच मराठी मंडळी असल्याचे कळले; पण अर्थात कुणाचाच कुणाशी संबंध नाही. एकत्र गणेशोत्सव नाही; एकत्र दिवाळी नाही; गुढी पाडवा नाही, काहीच नाही. सगळे आपापल्या कोषात मग्न. याउलट हिंदी भाषक आणि दाक्षिणात्य एकत्र येऊन त्यांचे त्यांचे सण साजरे करतात. कडवाचौथ काय, सरस्वतीपूजन काय, पोंगल काय...सगळं एकत्र. तेलुगू लोकांचा अंगत-पंगतवर जास्त भर. उगीच जास्त डॉलर्स खर्च करत बसायचे म्हणजे त्यांचं डोकं दुखायला लागतं. त्यापेक्षा दोन-तीन प्रकारचे भात बनवायचे, त्यात दही-बिही टाकायचं, लिंबू-बिंबू पिळायचं आणि लेमन राईस, टॅमॅरिंड राईस सारखी नावे देऊन सगळ्यांनी खात बसायचं. फार झालं तर अतांक्षरी-बिंताक्षरी खेळायची. संपलं सेलिब्रेशन! नो कॉम्प्लिकेशन्स! याउलट हिंदी भाषक! शक्य तेवढा फिल्मी माहोल केल्याशिवाय त्यांना सेलिब्रेशनची मजाच वाटत नाही. महागड्या गोष्टी खरेदी करायच्या, साध्या साध्या वाढदिवसाला महाग कपडे, गालिचे, भरपूर पदार्थ, भडक मेकप करवून घ्यायचा, त्यासाठी भरमसाठ डॉलर्स खर्च करायचे, भरपूर नट्टापट्टा करून मिरवायचं आणि साधारण ६०% वेळ चहाटळकी करायची असं यांच्या सेलिब्रेशनचं स्वरूप. भडकपणा ठासून भरलेला. पण मराठी लोकांचं मला असं काहीच दिसलं नाही. अहो निदान चहा आणि दोघात एक बिस्कीट देऊन तर सेलिब्रेशन करा! पण नाही, कौन झंझट मे पडेगा यार!! जान देव! मराठी बोलायचं तरी यांची बोबडी वळते; एवढं सेलिब्रेट वगैरे कोण करत बसेल...आम्ही गरीब असलो म्हणून काय जाहले, आमुच्या मनाची श्रीमंती अपरंपार, चला हवा येऊ द्या.... शनि-रवि मॉल्समध्ये फिरायला किंवा शॉपिंगला जायचा हा ट्रेंड एक अनाकलनीय आहे. दूध, दही, अंडी, पाव आणणं हेच माझ्यादृष्टीने शॉपिंग असतं. पण नाही, काहीतरी छान-छान (बहुधा बिनकामाचं) विकत घेतल्याशिवाय शॉपिंग पूर्ण होत नसते. मॉलमध्ये का फिरायचं असतं हे मला अजून कळलेलं नाही. एखाद्या वेळेस गेले तर ठीक आहे पण महिन्यातून दोन-तीनदा मॉलमध्ये फिरायला जाण्याने काय साधतं हे मला अजून कळालेलं नाहीये. माझ्या एका सहकार्‍याची अर्धांगिनी (हिंदी) खूप उत्साही आहे. ती कोण भारताला परत जातंय आणि कोण नवीन येतंय याची सगळी माहिती ठेवते. जे भारतात परत जाणार असतात त्यांच्याशी ती ओळख वाढवते. शेवटच्या काही दिवसात तिचं भारतात परत जाणार्‍या कुटुंबाविषयीचं प्रेम अक्षरशः उतू जातं. खायला घेऊन जाणं, चहा घेऊन जाणं वगैरे युक्त्या करून ती त्या कुटुंबाविषयी आपल्याला किती काळजी आहे असं दाखवते. आणि मग त्यांना नको असलेल्या सगळ्या वस्तू पदरात पाडून घेते. काही विकत तर काही फुकट! मग त्यात कुकर, भांडी, इस्त्री, कपबशा, ब्लँकेट्स, खुर्च्या अशा वस्तू असतात. मग जे भारतातून येतात त्यांना ती त्या वस्तू किफायतशीर भावात विकते. तिचा वेळ मजेत जातो आणि चार डॉलर्स गाठीशी येतात ते निराळे. आहे की नाही गंमत? साहजिकच तिला सगळे दचकून असतात. एक मराठी कुटुंब आम्हाला अचानक भेटलं. त्यांच्या घराजवळच भेट झाल्याने त्यांनी खूप वेळ दारातच गप्पा मारून आम्हाला घरात बोलावलं आणि सरबत दिलं. त्यांचं ४-५ बेडरूम्स असलेलं मोठं घर आहे. आम्हाला मराठी कुणी भेटल्याचा आनंद झाला. नंतर काही दिवसांनी आम्ही त्यांना चहा आणि न्याहारीसाठी बोलावलं. त्यानंतर त्यांनी आमच्याशी संपर्क ठेवला नाही. आम्ही सुरुवातीला फोन केले परंतु प्रतिसाद उत्साहवर्धक नसल्याने आम्ही फोन करणे बंद केले. एक दिवस अचानक त्यांनी आम्हाला जेवायला बोलावलं. मग काही दिवसांनी आम्ही देखील त्यांना बोलावलं. आमच्या सामग्रीच्या मानाने जसं जमलं तसं केलं. नंतर पुन्हा त्यांनी संपर्क तोडला. फोन केला तर जुजबी काहीतरी बोलून बंद केला. त्यांना शेवटचा फोन करून आता जवळपास दोन ते अडीच महिने झालेत. आता पुन्हा तरी काही संपर्क होण्याची शक्यता दिसत नाही. असे का? कसली ही भीती? कुणी घरात येऊन ठाण मांडून बसेल याची? पैसे मागेल याची? सतत बाहेर घेऊन जाण्याची विनंती करेल याची? कुणी आजारी पडलं तर उगीच मदत-बिदत करत बसावी लागेल याची? अनाकलनीय. अजून एक मराठी कुटुंब आहे. त्यांची फिलॉसॉफी वेगळीच आहे. ज्यांना भारतात परत जाण्यासाठी काहीच दिवस राहतात त्यांच्याशी ते हळूहळू संबंध कमी कमी करत पूर्णपणे तोडून टाकतात. कारण काय, तर उगीच इमोशनल अ‍ॅटॅचमेंटचा नंतर त्रास होतो म्हणून!! खूप छान एकत्र वेळ घालवल्यानंतर शेवटी शेवटी हे कुटुंब भेटायला देखील येत नाही किंवा फोनही करत नाही. त्यांचे मित्र भारतात परत गेल्याचं मग त्यांना दुसर्‍या कुणाकडून कळतं. सोयीस्कररीत्या ते त्यांच्या मित्र कुटुंबाची भारतात जाण्याची तारीख विसरून जातात आणि ते कुटुंब कधी संपर्कातच नव्हते असे मानून त्यांना त्यांच्या आयुष्यातून हद्दपार करतात. आता बोला! काय म्हणावे या तर्‍हेवाईक वागण्याला? पण असे खरेच आहे आणि आम्ही आता सध्या त्याचा अनुभव घेत आहोत. तर असे आहेत काही कडू-गोड अनुभव आणि काही निरीक्षणे. माझी निरीक्षणे चुकीची देखील असू शकतील. कुठ्ल्याच भाषेला, जातीला, भाषिक समुदायाला नावे ठेवण्याचा किंवा त्यांची उणी-दुणी काढण्याचा माझा प्रयत्न नाही आणि अधिकारही नाही. नकळत तसे घडले असल्यास क्षमस्व...अजून काही अनुभव मिळाल्यास नक्कीच सांगतो...
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

(मी पण कुणासोबतच जातो; माझ्याकडे कार नाही) तुम्ही सहा महिने दुसर्‍याच्या कारने जात होता?? हे इंपोझिशन नाही का? म्हणूनच लोक अंतर ठेवतात.

कारने जाण्याचे महिन्याचे पैसे देत होतो. नियमितपणे कारमध्ये कार्यालयात येणारे पैसे देतात त्यामुळे कारमालकाचा खर्च बराच कमी होतो. आधीच कारचा इन्शुरन्स, मेंटेनन्स वगैरे खूप महाग असतो असे ऐकले आहे. आणि बरेच कारमालक मित्रत्वाच्या भावनेने देखील ऑफीसमध्ये घेऊन जातात. त्याचे पैसे वगैरे घेत नाहीत.

एनीवे, चिन्मयसाहेब, मी महिन्याचे पैसे देत होतो. मी फुकट जात होतो असा तुम्ही समज का करून घेतलात कळलं नाही. आणि मदत करणे हे दोन्ही अंगांनी व्हायला पाहिजे. जशी आम्हाला बर्‍याच लोकांनी मदत केली तशी आम्ही देखील जिथे जमेल तिथे आणि जशी जमेल तशी लोकांना मदत केली. आम्हाला खूप मदत करणारे पण भेटले पण ते कमी होते. शुद्ध मराठी लोकांचा अनुभव तसा फार काही आठवणीत ठेवण्यासारखा नव्हता. ते शुद्ध मराठीत आपुलकीचे फक्त चार शब्द जरी बोलले असते तरी आम्ही भरून पावलो असतो. पण त्यांना ते ही नीट जमलं नाही. असो. हा मराठी स्वभावच आहे.

सोय म्हणून carpooling करणं आणि इंधनाच्या किंवा पार्किंगच्या खर्चात भाग घेणं वा इतर काही स्वरूपात परतफेड करणं ही खूप common adjustment असते. समीरसूर: दीर्घ लेखातली निरीक्षणे आवडली, यातली तेलुगु लोकांची बरीच उदाहरणं पाहिली आहेत त्यामुळे पटली, मराठी लोकांच्या वागण्याचा इतका टोकाचा अनुभव ऐकून असलो तरी प्रत्यक्षात अशी मराठी कुटुंबं मला फार कमी वेळा भेटली आहेत.

मी माझ्या व्यक्तिगत अनुभवावरून लिहिलं आहे. लेखकाने परतफेड केली असेल असं मानू. -मी अमेरिकेत नवीनच आलो तेव्हा मला राईड देणार्‍या मित्राचे गॅसचे पैसे भरत असे -एका शहरात माझ्या गाडीने कायमचा राम म्हटल्यावर समोरच्याच अपार्टमेंट मध्ये जुन्या ओळखीचा मित्र रहात असे. पण त्याला तोशीस नको म्हणून नवी गाडी घेईपर्यंत रेंटल चालवत असे. याउलट माझ्याशेजारी एक मराठी माणूस रहायला आला. त्याचे सगळे सोशलायझेशन आमच्याच अपार्टमेंटमधल्या (त्याच्याच जातीच्या) एका दुसर्‍या माणसाबरोबर होत असे. मात्र त्याला रोज ऑफिसला राईड देण्याचं काम तेवढं त्याने माझ्याकडे टाकलं! पुढे त्याचा एक तेलगू रूममेट आला, त्याला सोडण्याचे कामही माझ्या गळ्यात. हे काही महिने चाललं. त्याने मला खर्च वगैरे देण्याची कधीही वार्ता केली नाही. बरं हे ठीक! पण त्याच्या त्या (सजातीय) मित्राबरोबर प्यायला वगैरे जाण्याचा प्रोग्राम ठरला की हे साहेब मला सांगण्याचीही तसदी न घेता (बोलावणं सोडाच) निघून जात. इथे टॅक्सी ड्रायव्हर, उर्फ आम्ही, बसलोय वाट बघत! म्हणून म्हटलं, खाली म्हटल्याप्रमाणे बोट दिलं की हात पकडणारेही असतात. बाकी मराठी माणूस आहे तसा आहे. तेलगु लोक कळपात राहतात, मराठी माणूस नाही रहात. त्यात नवीन काय?

बऱ्याचशा निरीक्षणांशी सहमत. ऑफिस मधून खाद्यपदार्थ चोरणे हे तर अगदी सगळीकडे आढळणारे. वस्तू योग्य पद्धतीने न वापरणे, त्या खराब करणे इ. इ. मदत करण्याच्या बाबतीतही कमी जास्त प्रमाणात हेच. मदत सुद्धा फार दूरची गोष्ट आहे, ओळखच न दाखवणे हे पण खुपदा अनुभवले. मराठी लोकांना मराठी का बोलायचे नसते हे कोडे तर कधीच सुटले नाही. बाकी उसगावात सगळे सण उत्सव अगदी जोरात साजरे होतात असे वाचून/ऐकून आहे. हे असे अनुभव पहिल्यांदाच वाचतेय. अजून बरेच काही आहे लिहिण्यासारखे. दुसऱ्या बाजूने सुद्धा. म्हणजे मदतीचे बोट दिलेत की हात पकडणारे सुद्धा खूप असतात. लेखात बरेच मुद्दे एकत्र आलेत. जरा वेळ काढून लिहावे लागेल.

काही मराठी लोकांच्या हात राखून वागण्यामुळे बाकी लोकही तसेच वागू लागले असावेत. आमच्याही ग्रुप मध्ये मराठी फार कमी आहेत, पण बऱ्याचदा मराठीतुन गप्पा होतात आणि बाकी तमीळ, गुजराती, वगैरे सुध्धा मराठी गप्पात सामील होतात. अर्थात सगळे मुंबई, पुण्याचे असल्यामुळे हे शक्य आहे.

लेखाशी संपूर्ण सहमत. तेलगु लोकांचा अनुभव तर घेत आहेच. हे लोक तर बिगर तेलगु ला रूम पार्टनर सुद्धा करून घेत नाहीत. मी माझा मराठी लोकांचा ग्रुप बनवायचा प्रयत्न केला पण व्यर्थ. हा, मराठी लोक मात्र माझ्याशी मराठीतच बोलतात. मी तर मुंबई मध्ये जन्म झालेल्या हिंदी भाषिक आणि तेलगु लोकांबरोबर सुद्धा मुद्दामून मराठीतच बोलतो. आता तर एक तेलगु रूम पार्टनर मराठी चित्रपट बघू लागला आहे. मराठी चित्रपटातील विषयाचे वैविध्य त्याने मान्य केले आहे.

तेलगु रूम पार्टनर मराठी चित्रपट बघू लागला साधारण असेच म्हणते. आमचे एक सिंधी मित्र मुंबईत बरीच वर्षे राहिले. एकदा हामेरिकेत आलेले त्यांचे आईवडील अलका कुबलचा मराठी सिनेमा भक्तीभावाने (म्हणजे डोळ्यात पाणी आणून) बघत होते. अलका कुबलचा सिनेमा तर मीही पाहिलेला नाही अजून!

ही ही ही. यासाठी अलकानं किती पुण्य केलं असेल मागल्या जल्मी! तो शिनेमाही तिच्या तरुणी म्हणवून घेण्याच्या शेवटच्या टप्प्यातील असावा. ;) या सिंधी काकू म्हणाल्या "किती गं चांगली बाई आहे, सासरचे उगाच त्रास देतात तिला. तुम्ही नेहमी हे शिनेमे पहात असाल नै." मी नाही म्हणताच, "अगं ये ये इथे बैस, चांगले सिनेमे बघत जा" ;)

=)) धन्य =)) धन्य =)) धन्य =)) त्यावर उतारा म्हणून त्यांना दादा कोंडक्यांचे पिच्चर दाखवायला पाहिजे होते ;)

हे, असे, यापेक्षा विरूद्ध अनुभव सगळ्यांना येऊन जात असतील असे वाटते. आम्हालाही आलेत, येत राहतील. मिपाकर श्री. नाटक्यांकडे डिसेंबरात जाणे झाले होते. श्री व सौ नाटक्या यांनी बरेच आधीपासून आगत्याने आमंत्रण करून ठेवले होते. त्यांनी हौसेनं पाहुणचार केला. बेसनलाडूही भेटायला आला होता. अपरात्रीपर्यंत गप्पा मारत बसलो होतो. अगदी मनापासून त्यांनी सगळे केले. ते आमच्याशी मराठीतच बोलले, पण मला एरवी इतके मराठी बोलायला मिळत नसल्याने आधी गडबडून गेले. तेलुगु लोकांबाबत सहमत पण चांगले तेलुगुही भेटतात. एकंदरीतच सगळ्याप्रकारचे सगळे भाषिक भेटतात. आपणही त्यांच्यासाठी थोडेफार (किंवा खूप) विचित्र असू शकतो. या सगळ्याची नंतर सवय होत जाते. आत्ताशी कुठे ६ महिने राहून तुम्ही परत चाललायत. पुन्हा याल तेंव्हा वेगळे अनुभव येतील. ते इतके बोचणारे नसतील कारण मनाची तयारी झाली असेल. अमेरिकन वास्तव्यातील पहिली काही वर्षे ही बर्‍याच अपेक्षांची व अपेक्षाभंगांची असतात असे वाटते. परिस्थितीशी जुळवुन घेणे शिकायचे असेल तर प्रत्येक भारतियाने (आपण भारतीय आहोत म्हणून आपल्यापुरतेच लिहितिये) ;) निदान दोन ते तीन वर्षे परदेशात जाऊन रहावे असे वाटते. आमच्या आजूबाजूला फारसे मराठी लोक नाहीत. एक मराठी फ्यामिली ओळखीची पण लांब राहणारी व एक जवळ राहणारी (बाकी सगळे परभाषिक!). संपले! आणखी एक मराठी फ्यामिली आहे पण मी एकदा तिला बोलावल्यावर तिनेही मला बोलावले. " सॉरी हं, इकडं तिकडं बघू नकोस, गेले वर्षभर फारसे क्लिनिंग केलेले नाही घरात!" असे म्हटल्यावर तिथून कधी एकदा घरी येते असे झाले होते. त्याआधी माझ्याकडे आल्यावर ती "तुझं बाई स्वच्छतेचं फारच असतं" असं का म्हणाली ते समजलं. त्यानंतर ८ वर्षांनी जवळ राहणार्‍या मराठी मैत्रिणीला फोन करून विचारले की रेवतीचे स्वच्छतेचे भूत उतरले असेल तर आपण भेटायचे का? यावर मैत्रिणीने परस्पर "नाही अजून ते भूत तसेच आहे. भेटायचा विचारही करू नकोस" असे सांगितले व मला फोन केला. मी तिचे आभार मानले. ;) हामेरिकनही फार वेगळे नसतात. मनुष्याला असणारे सगळे स्वभावगुण त्यांनाही असतात. व्यक्त होण्याची पद्धत थोडीफार इकडे तिकडे! माणूस असून असून किती वेगळा असणार? लिहिण्यासारखे खूप आहे पण थांबते! तुम्ही मात्र चांगल्या आठवणी बरोबर घेऊन जा! वाईट वाटले असेल त्या आठवणींना नंतर 'अनुभव' खात्यात जमा करता येईल. ;) अगदी निघेपर्यंत येणारा एकटेपणा नकोसा वाटत असेल तर कळवा, माझा फोन नंबर व्यनितून कळवीन.

नक्कीच. चांगले अनुभव आम्हाला देखील आले. तेलुगू लोकांचा वैयक्तिक पातळीवर माझा अनुभव चांगलाच आहे. मी फक्त त्यांच्या समुदायाविषयी आणि एकंदरीत अमेरिकेतल्या सामजिक जीवनाविषयी माझे निरीक्षण नोंदवत होतो. मला तेलुगू लोकांनी खूप मदत केली. एका मूळच्या मराठी पण २-३ पिढ्यांपासून आंध्रप्रदेशात स्थायिक असलेल्या एका कुटुंबाने आमची खूप मदत केली. एका अमराठी परंतु मराठी बोलणार्‍या कुटुंबाचादेखील आम्हाला चांगला अनुभव आला. अर्थात आम्ही देखील शक्य तेवढी मदत इतरांना केलीच. मिपावरच्या धमाल मुलगा, श्रीरंग जोशी, हेमांगीके आणि अजून बर्‍याच मिपाकरांनी मार्गदर्शन केले होतेच आणि कुणी मिपाकर इथे असता तर त्याने मदत नक्कीच केली असती यात शंका नाही. सामान्यपणे मराठी लोकं बाकीच्या मराठी लोकांशी इथे फटकून राहतात असा माझा (आणि इथल्या बर्‍याच जणांचा) अनुभव आहे. उगाच नसतं झेंगट नको असा अ‍ॅटीट्युड असतो त्यांचा. या विरुद्ध तेलुगू लोकांचं असतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये असले विषय चर्चेला कधी येतच नसतील. एकमेकांना सांभाळून घेण्याची त्यांची वृत्ती खरंच शिकण्यासारखी आहे. सहा महिन्यात तसे आम्हाला बरेच बरे-वाईट अनुभव आलेत. आणि ते अपेक्षित होतंच. कडू गोड असणारच. सगळंच कडू किंवा सगळंच गोड असणं शक्य नाही. त्यामुळे आयुष्य बेचव होऊन जाईल. :-) आणि ते आम्ही अनुभव म्हणूनच जवळ ठेवणार आहोत. तक्रार कसलीच नाही. सहा महिने तसा बर्‍यापैकी मोठा काळ आहे. आणि एखादी व्यक्ती आपलं सोशल लाईफ कसं ठेवते यावर अनुभवाच्या शिदोरीचा आकार ठरत असावा. इथे ३ वर्षे राहून युएस शटडाऊनविषयी एक अक्षरही माहित नसलेले महाभाग आहेत. आम्ही नायगाराला गेलो तेव्हा एक भारतीय कुटुंब आमच्या बसमध्ये होतं. तीन वर्षांपासून ते न्यू जर्सी मध्ये राहतात. त्याला मी म्हटलं की आपल्याला वॉशिंग्टनमध्ये काही विशेष बघायला मिळणार नाही. त्याने कारण विचारलं. मी सांगीतलं की युएस गव्हर्नमेंट शटडाऊन असल्याने तिथले पार्क्स, मेमोरियल्स, म्युझियम्स वगैरे बंद आहेत. त्याच्या चेहर्‍यावर अमावस्येच्या रात्री स्मशानात सलिना जेटलीला पाहिल्यासारखे भाव आले. "वो क्या होता है?" असं त्याने विचारल्यावर मी त्याला समजावून सांगीतलं. आत्मस्तुतीचा हेतू नाही किंवा त्याच्या अज्ञानाला नावे ठेवण्याचा हेतू तर अजिबात नाही. तो इतर बर्‍याच क्षेत्रात माझ्यापेक्षाही जास्त ज्ञानी आणि कुशल असणार यात शंका नाही. परंतु तुम्ही भारतीय म्हणून तुमचं आयुष्य अमेरिकेत कसं ठेवता यावर तुम्हाला येणारे अनुभव आणि येणारे भान अवलंबून आहे याचं हे उदाहरण. बरेच भारतीय इथे भारतातल्यासारखंच राहतात. म्हणजे फक्त रुपयाच्या ऐवजी डॉलर मोजतात आणि इथले कायदे नीट पाळतात एवढाच काय तो फरक. मराठी लोकं कवाडे एरवी नीट उघडतात पण ती मराठी माणसांसाठी थोडी किलकिलीच उघडतात. तेलुगू लोकं स्वजातीयांसाठी सताड उघडतात पण अमेरिका म्हणून घेता येणार्‍या विविध अनुभवांसाठी त्यांची कवाडे किंचित उघडतात. असा कदाचित हा फरक असावा. असो.

+१ रेवाक्का. अमेरिकन वास्तव्यातील पहिली काही वर्षे ही बर्‍याच अपेक्षांची व अपेक्षाभंगांची असतात असे वाटते. -- सौ टके की बात! तुम्हाला असे अनुभव आल्याचे वाटुन वाईट वाटले. कदाचित यात बरेच लोक अ‍ॅम्बेसारख्या कंपनीत लागुन खूपदा फारच मागे लागतात, माझ्या ओळखीतल्या काही लोकांची (३-४ उदाहरणे आहेत) मैत्री यामुळे तुटली आहे, त्यामुळे नविन लोकांशी जरा सांभाळुनच वागायचं असही असु शकेल. आनंदाने सांगावेसे वाटते की आम्ही आमच्या मित्र+मैत्रिणींसाठी आणि त्यांनी आमच्यासाठी सामानाची ने-आण, कचराकुंडीत नको असलेले सामान टाकणे वगैरे कामे आनंदाने केलेली आहेत. पण या गोष्टी लगेच होत नाहीत, मैत्री जुळावी लागते, आमच्याकडे इथे आल्यावर ६ महीन्यांनी एक मराठी कुंटुब काहीतरी ऑफीससाठी सीडी नेण्यासाठी आले होते, ते ३०-४० मि. ड्राईव्ह करुन येणार होते, म्हणुन मला वाटले की १०-१५ मि. तरी बसतील, मी पोहे वगैरे पण केले, पण त्यांना अजुनही ब-याच ठिकाणी जायचे होते त्यामुळे ते लगेच बाहेरच्या बाहेर गेले, त्यादिवशी खूप वाईट वाटले, पण आता समजु शकते की स्नोमधुन फक्त ३-४ कामं करत जायची म्हणजे किती वैताग असतो. आता अगदी चांगली मैत्री आहे :) आमच्या कम्युनिटीमध्ये ५०% पेक्षाही जास्त तेलुगू लोकं आहेत. त्यांची संख्या इतकी जास्त का यामागचं कारण मला अजूनही कळालेलं नाही. यावर मागे पण चर्चा झाली आहे वाटतं इथेच. बहुतेक तेलगु पब्लिक शिकलेले, डिग्र्या घेतलेले असतात पण नोकरीच्या इंटरव्ह्युच्या वेळेस वाट्टेल त्या थापा मारणे, एकजण चिकटला अगदी झेरॉक्स असल्यासारखा दुस-या, तिस-याचा बायोडेटा असणे ही कारणे तर नक्कीच आहेत. खाली पिरा म्हणाली तसे मिटींगच्या वेळेसही आजुबाजुला इतरभाषिक/परदेशी लोक असली तरी त्यांच्या भाषेत बोलत बसणे या गोष्टी खरचं डोक्यात जातात.

मराठी माणूस महाराष्ट्रातही मराठी बोलताना कचरतो. बाहेरची तर गोष्टच सोडा. उत्तर भारतातील एका महाराष्ट्र मंडळात गणपतीसाठी गेलो होतो. (जे दिसले ते) सर्व सदस्य उच्चभ्रू वर्गातले होते. पण "सोहळा" अगदीच हात राखून केला होता. कदाचित उत्तर भारतीय भपक्यापुढे तो तसा वाटत असावा. मूर्ती, मखर, समई. बस्स! समोर जुनाट जाजमे बसायला टाकली होती. प्रसादसुद्धा असाच काहीतरी साधा सुंठसाखर वगैरे. महाराष्ट्रातून एक गायिका कार्यक्रम करायला आल्या होत्या. त्यांना वारंवार सांगावे लागत होते, "जरा टाळ्या वाजवाल तर उत्साह वाढेल" इत्यादि. दाखवेगिरी नव्हती हे जरी मान्य केले, तरी ए़कूण प्रकार नरम वाटला.

आणि तेलगु (आणी बर्‍याच इतर भारतीय) लोकांचे खिडकीत/टेरेसमधे अंतर्वस्त्रे वाळत घालणे दिसले का? ;)
ऑफिस मधून खाद्यपदार्थ चोरणे
तस्मात बेंबट्या आपल्या लोकांच्या ढुंगणावर सदैव हंटर हवा, कसें ? (इति पुल) असो. परतीच्या प्रवासासाठी शुभेच्छा. आल्यावर चित्रपट परीक्षणांचा जोरदार धडाका पाहीजे.

मजेशीर अनुभव्.मराठी माणसाची वृत्ती सहसा 'मदत करणार नाही,मदत घेणार नाही' अशी असते.तेलुगु लोकांबरोबर आलेल्या अनुभवांविषयी सहमत.

त्यामाणाणे आम्ही नशीबवान आहोत कारण आमच्या शेजारी कुणीही राहतच नाही :p :D बरेच वेळा युरोपियन लोक १-२ महिन्यांसाठी येतात आणि जातात पण त्यांना त्यांची भाषा सोडून फारस बोलत येत नाही . पण खरच जर्मन लोक खूप सज्जन ,प्रेमळ आणि मदतीला तयार असतात आतापर्यंत आम्हाला भेटलेले लोक तरी असेच होते . पुढचे माहित नाही. बाकी तुमच्या मराठी माणसाच्या निरिक्षणाशी बर्यापैकी सहमत .

कार्यालयातल्या जर्मन लोकांचा अनुभव चांगला आहे. ते खरच सज्जन असतात. अमेरिकन देखील तसे चांगले असतात. अंतरी काय असते माहित नाही पण सहसा वाईट अनुभव येत नाही. त्यांचे शिष्टाचार, प्रामाणिकपणा, दुसर्‍यांच्या अडचणींची जाण असणे, काम व्यवस्थित करण्याची वृत्ती, कष्टाळूपणा, वक्तशीरपणा हे गुण भारतीय ज्यादिवशी शिकतील तो सुदिन! अरेरावी हाच आपला धर्म! :-) वरून 'देसी है तो ऐसा ही रहना पडता है' असं म्हणून स्वतःच्या अयोग्य वागण्याचा वृथा अभिमान पैदा करणारे फक्त भारतीयच असू शकतात....

'देसी है तो ऐसा ही रहना पडता है' >>>+++ १. अगदी बरोबरच ...देसी हा शब्द कोणी शोधलाय देव जाणे, एकदा भेटावे म्हणते त्या माणसाला ... *beee* :D माझ्या तर अगदीच डोक्यात जातो हा शब्द . नेमकी मी हा मुद्दाच विसरून गेले असो ...बरोबर मुद्दा पकड्या. :)

छान लेख.. हे तेलगु लोकांचा नक्की काय प्रॉब्लेम असतो? मला भेटलेल्या "सगळ्या" तेलगु लोकांमध्ये मी हा गुण पाहिलाय, दोन तेलगु लोक एकत्र आले की ताबडतोब यंड्य गुंडु सुरु होतं.. समोर बाकी लोक आहेत, त्यांना आपलं बोलणं कळत नाहीये, शिवाय हे ३ लोकांच संभाषण चालु असताना मध्येच दोघांनी आपल्या भाषेत बोलणं शिष्टाचाराला धरुन नाही.. अगदी मीटींग सुम मध्येही ह्यंचं यंडु गुंडु सुरुच.. शेवटी आमच्या (प्रेमळ आणि मायाळु) बॉसने सुद्धा "नो लोकल लॅग्वेजेस इन मीटिंग" अशी तंबी दिली.. अणि कहर म्हणजे, मी आणि दुसरा मराठी माणुस जर पटकन एखादं वाक्य (१०० वाक्यांनतर) एकमेकांना मराठीत बोललो तर "तुम्ही मराठीत कसे बोलता?" म्हणुन हेच सरळ अंगावर धावुन येतात.. पुण्यात "मराठीत का बोलता" हा काय प्रश्न झाला? शिवाय तुम्ही देखील वेगळं काय करता? भाषेमुळे हे लोक माझ्या फार डोक्यात जातात..

मला भेटलेले तेलुगु शक्यतोवर बरे होते आणि आहेत. मात्र असलं डबल स्ट्यांडर्ड असेल तर फटकावणे हेच उत्तम. मी उत्तर भारतीयांनाही असेच फटकावतो.

फटकावलं म्हणजे पहिल्याच आठवड्यात ओरिएंटेशन मध्येच मी हा मुद्दा उचलुन धरला की मराठी लोक उलट हिंदीत बोलुन समोरच्याला कंफरटेबल करतात. पण स्वतः वचर वचर तेलगु बोलत वर तोंड करुन "मराठी" लोकांना नाव ठेवायच काम नाही.. इतका प्रॉब्लेम असेल तर इथे यायचं नाही.. एम्.एन्.सी असली तरी पुण्यात मराठी बोलायची नाही असं एका तेलगु माणसान सांगितलेलं अजिबात खपवुन घेऊ शकत नाही मी.. शिवाय ४ लोक ते ही ऑफिसचे असल्यावर मुद्दाम मराठीतच बोलणारा माणुस पाहिला नाहीये मी.. आपण ताबडतोब हिंदी वर येतो.. हे गधडे लोक मात्र यत्र तत्र सर्वत्र तेलगु.. अरे, नवर्‍याच्या कंपनीत २-४ मराठी लोक मराठीत का गप्पा मारतात म्हणुन एक टकल्या यु.पी वाला बॉस नवर्‍याला बोलला.. की तुच सिनियर म्हणुन सगळ्यांना हिंदी / एंग्लिश मध्ये बोलायला लाव.. आता घरगुती गप्पा का म्हणुन हिंदी मध्ये मारायच्या? येडचॅप आहेत नुसते..

सहमत! घरगुती गप्पा कुठल्या भाषेत मारायच्या हे सांगणारे हे टिकोजीराव कोण????? काही कॉन्व्हेंट शाळांत इंग्लिश सोडून अन्य भाषांत बोलल्यास दंड होतो ते या निमित्तानं आठवलं. तसा रूल तिथे शिकलेल्या काही मित्रांनी सांगितल्यावर महदाश्चर्य वाटलं होतं आणि त्याचबरोबर रागही आला होता. मूर्खागमनी कुठचे! असो.

मस्त अनुभवकथन.. मराठी लोकांचे असे वागणे पाहून आश्चर्य वाटले. मी नॉर्वेत जवळ जवळ ५ वर्ष होतो. तेथील मराठी लो़क खुपच चांगले आणि बिलकूल असला अनुभव नाही आला. तेथील मराठी लोकांना अजुनही miss करतोय. कदाचित अमेरीकेतले पाणीच वेगळे असावे. बाकी तेलगू/तामिळ लोकांबद्दल लिहीलेले मात्र पटले.

ही डॉलरची माया आहे. त्यामुळे वागणे बदलत असावे कदाचित. जे ८-१० वर्षांपासून राहतात त्यांचे अनुभव तसे ठीक होते पण आम्ही लवकर परत जाणार म्हणून त्यांनी आमच्याशी जास्त संबंध ठेवला नाही. हे काय गौडबंगाल आहे? चांगले संबंध ठेवले आणि कुणी एक परत भारतात गेले तर त्याने काय फरक पडतो? नंतर ते संबंध टिकवता येत नाहीत? "आता हे काय परत जाणार, मग यांच्याशी कशाला जास्त संबंध वाढवा..." या विचारांमागचा बुद्ध्यांक काय असेल हेच मला कळत नाही. जे ८-१० वर्षे इथे राहतात त्यांनी असा विचार करावा हे आश्चर्य वाटण्यासारखे आहे.

परत जाणार म्हणून त्यांनी आमच्याशी जास्त संबंध ठेवला नाही असे मनात तर अजिबात ठेवू नका. तेच सांगतीये, आणखी तीनेक वर्षे तिथेच राहिलात की कित्येक गोष्ती आपओआप समजतील. मला ते सगळे आणखी स्पष्ट करता येईल पण त्याने निबंध तयार होईल. हा अनुभव आम्हाला भारतात, महाराष्ट्रात आला आहे किंवा आम्हीही कोणालातरी असा अनुभव देऊन गेलो असू. सतत बदल्या होणारी नोकरी असली की असे अनुभव येतात. तुम्ही तिथले तात्पुरते रहिवासी असता व आपल्याला नेहमी अनेकवर्षे संबंध (त्यात हक्क असतो एकमेकांवर)ठेवण्याची खोड असते. सगळ्याच मानवजातीला! तुम्ही त्यांच्या आयुष्यात तात्पुरते येऊन जाणारे कदाचित शंभरावे असाला. वाईट वाटायचे रहात नाही. उद्या तुमच्या जागी दुसरे कोणी महाराष्ट्रीय येणार असायची शक्यता जरी धरली तरी पुन्हा पुन्हा ही जोड आणि तोड इथे एकटे रहात असताना नको वाटत असेल. स्वत:ला मिटून घेण्याचा एक प्रकार आहे तो! तुम्ही काय झाले म्हणून जवळ जाऊ पहाल तर आणखी नकोसे कटाक्ष मिळायची शक्यता जास्त! त्यांनी ती नकोशी अ‍ॅडजस्टमेंट स्विकारण्याचा विचित्र पर्याय स्विकारला आहे म्हणा हवे तर! चला मी तरी कटते या धाग्यावरून! मी काही त्या राज्यात रहात नाही तरी ऑनलाईन मदत लागल्यास कळवा.

मस्त अनुभव कथन. तेलगु, गुजराती त्यांच्या त्यांच्यात सुरु होतात. आपल्या लोकांचं मात्र तसं नसतं. काही निमित्ताने सात दिवसांसाठी परदेशगमनाचा योग आला होता. तिथे अगोदरपासूनच असलेल्यांची जेव्हा ओळख करुन देण्यात आली त्यात एक निंबाळकर होता. एक माझ्यासोबतच तिकडे आलेला तेलगु कर्मचारी मला हळूच बोलला 'ये म्हराटी हे'. पण त्या निंबाळकराला हापिसात लंचच्या वेळी जरा गुडमॉर्निंग वैगरे केलं तर ओळख नाहीच असं वागत होता. बरं ही गत दोघंही एका टीममध्ये काम करत असताना. अ‍ॅमस्टरडॅम विमानतळावरचा किस्सा तर अगदी भन्नाट होता. एक अस्खलित मराठी बोलणारे अरे आणि अगं समोर बसले होते. तिथेच एक दिसायला आणि पेहरवाने दाक्षिणात्य वाटावे असे आजी आजोबा कसलीशी चौकशी करायच्या बेतात इकडे तिकडे फिरत होते. अगं गेली मदत करायला. पण ते आजी आजोबा मराठीच असल्याचं कळलं तशी हळूहळू बाजूला होत दोघेही अगदी मुंबईला येईस्तोवर दोन हात लांब राह्यले.

. पण ते आजी आजोबा मराठीच असल्याचं कळलं तशी हळूहळू बाजूला होत दोघेही अगदी मुंबईला येईस्तोवर दोन हात लांब राह्यले.
याला मराठीपणाची लाज वाटणे म्हणता येइल...! तिकडे जाउन आता आपण मराठी नाही याचा निश्वास टाकत असावेत पण लक्षात येत असेल ते या जन्मात जात नाही त्यामुळे फ्र्स्ट्रेट असावेत. मनामधे अशी मोठी कमीपणाची भावना रुजलेले अनेक परदेश रिटर्न असेच वागतात हे निरीक्षण आहे. नाहीतर मग देखावी माणुसकीचे प्रदर्शन भरवतात.

माझे निरीक्षण असे आहे की येथे विद्यार्थी दशेत असताना आलेले लोक जरा आपुलकीने वागतात पण कंपनीने पाठवलेले असेल तर जरा ताठ्याने वागतात. बहुतेक विद्यार्थी दशेत असताना इतरांनी केलेली मदत स्मरून इतरांना आपसुकच मदत केली जात असेल.

तमाम अमेरिकेत तेलुगू लोकांची संख्या लक्षणीय आहे.
फक्त अमेरीकेतच नाही तर हा अनुभव मी सिडनी, लंडन व आता स्टॉकहोल्म मध्ये पण अनुभवतोय... आमचा थोडाफार जो काही मराठी ग्रुप आहे तो असल्या तेलुगू लोकांना 'आयटी मधील भय्ये' असे चेष्टेने म्हणतो. पण कळप करुन रहावा तर ह्या दक्षीणेच्या लोकांनीच नाहीतर आपले मराठी लोकं साधी तोंडओळख ही नाही दाखवत.

बहुतेक सगळ्यांचे मराठी लोकांबद्दलचे अनुभव थोड्या फार प्रमाणात सारखेच दिसतायेत.... :-) बहुतेक तेलुगू लोकं स्वतःला इंटेलेक्चुअल वगैरे समजत नाहीत. मराठी लोकांची तिथे गोची होते. मराठी माणूस स्वतःला इंटेलेक्चुअल वगैरे समजतो...आणि बरंच काही काही समजतो आणि आपल्या त्या कोषात आराम करत राहतो. :-)

मला तर वाटतं की "मराठी माणूस मराठी माणसाला मदत करत नाही, मराठी बोलायला लाजतो" वगैरे कमी कमी होत चाललंय. किंबहुना मला तरी हे अनुभव आलेले नाहीत. नवीन नोकरीच्या ठिकाणी असलेल्या एकमेव मराठी माणसाने भरपूर मदत केलेली आहे.

हाच अनुभव मला यूके मध्ये पण आला आहे. थोडक्यात आपल्या रक्तातच आहे हे. भेटल्या भेटल्या लोक पहिल्यांदा ह्याच्याकडे गाडी घोडा आहे का नाही, हां आपल्याला सुट होतो का, नपेक्षा हां आपल्या लायकीचा आहे का हे पाहतात. थोडी ओळख झाली की पुन्हा तपासून बघतात की हां कामाला येईल का? आणि मराठीच असल्यानं कामाला येणार नाही ह्याची खात्री असते. घरात घेतले की आपल्या नियाम्प्रमाणे वागतो का नाही आणि ह्याची जातीने पहाणी केली जाते. थोडक्यात कोणाशीच संबंध जुळू नयेत ह्याची पूर्ण तजवीज केली जाते. मदत करताना प्रचंड हाताचे राहून कारण अनुभव विचित्र आलेले असतात विशेषतः जे १-६ महिने कालावधी साठी आलेले असतात त्यांच्याकडून. ही मंडळी पण बाकीच्या तेलेगु लोकांसाराखीच डॉलर-रुपया करतात आणि जमेल तितका पैका वाचवतात. ते करताना बिन्दक्कात निलाजरेपणा करतात मग त्यामुळे आधीच अख्डलेला हात समोरचा अजून जास्त आखडून घेतो.

शक्य आहे. असे असेल ही. पण स्वतःला मिटवून घ्यायचेच का? आणि संबंध चांगले जोडणे म्हणजे सतत एकमेकांच्या घरी जाणे-येणे आणि हक्क बजावणे असेच आणि एवढेच नसावे. आपुलकीने बोलणे, कधीतरी भेटणे, आणि इन जनरल संपर्काची प्रत चांगली ठेवणे यात काय असा मोठा प्रॉब्लेम असावा? धड बोलायचे देखील नाही आणि सोयीस्कररीत्या संबंध तोडूनच टाकायचे या प्रकाराबद्दल थोडा आक्षेप वाटतो. मी भारतात देखील ७-८ ठिकाणी राहिलो पण गुंतून न पडतादेखील सौहार्दाचे संबंध तयार करता येतात हाच माझा अनुभव आहे. मुळात अपेक्षा ठेवून संबंध तयार करायचेच कशाला? संबंध संबंध म्हणजे तरी काय? काही शेअर करण्यासाठी कुणाची तरी भावनिक गरज भासणे. एवढं काही कॉम्प्लिकेटेड असेल असं वाटत नाही. आणि असे त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात किंवा खूप खर्च करावा लागतो असे अजिबात नाही. आमच्या गावात आमचं एक घर आहे आणि त्याशेजारी दोन छोट्या खोल्या आहेत. गेल्या ३०-३५ वर्षांपासून आम्ही त्या खोल्या भाड्याने देतो. म्हणजे माझे वडील देतात. त्याकाळी आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तात्पुरत्या बदलीवर कर्मचारी आमच्या गावात यायचे. तेच लोकं भाडेकरू म्हणून आमच्या त्या खोल्यांमध्ये रहायचे. कुणी ६ महिने, कुणी एक वर्ष, कुणी तर अगदीच २-३ महिने असे येऊन राहून जायचे. आम्ही मात्र सगळ्यांशी चांगल्या प्रकारचे संबंध ठेवले. आई-वडील नोकरी करणारे होते तरी भाडेकरुंना काही मदत लागल्यास ती नेहमीच पुरवली जायची. आणि वरचेवर गप्पा-टप्पा, पापड-लोणच्यांची, विशेष खाद्यपदार्थांची देव-घेव हे चालूच असायचे. भाडेकरु सोडून जातांना कुठलाही मेलोड्रामा न होता प्रसन्न मनाने जायचा आणि आई-वडील देखील त्यांना प्रसन्न मुद्रेने निरोप द्यायचे. नंतर काही काळ (मोबाईल आणि फेसबुक नव्हते त्या काळातदेखील) संपर्क रहायचा देखील. कालांतराने तो आपसूकच बंद व्हायचा. आमच्या ३५ वर्षांपूर्वीच्या एका दीर्घकाळ राहिलेल्या भाडेकरुचा संपर्क आता मागच्या वर्षी पुन्हा झाला. त्यांना सगळ्या आठवणी येत होत्या. ते पुण्याला आमच्या घरी येऊन गेले. दोघांनाही बरे वाटले. आई-वडील आता गावी राहत नाहीत. ८-९ वर्षांपासून ते पुण्यातच राहतात पण त्या दोन खोल्यांमध्ये २००२ पासून एकच भाडेकरू आहेत. त्यांच्याशी फारसा संपर्क नसतो पण आई-वडील गावी गेले की प्रेमाने विचारपूस, पिण्याचे पाणी देणे, चार भाकरी देणे हे नेहमीच होते. आई-वडील पुन्हा पुण्याला यायला निघतात तेव्हा आवर्जून भाडेकरुंच्या नातवांसाठी खाऊ, कपडे वगैरे घेतात. त्यांची मोफत शिकवणीदेखील माझ्या वडीलांनी काही काळ घेतली होती. पुन्हा पुण्याला परत आल्यावर संपर्क कमी होतो पण तुटत नाही. या सगळ्या प्रकारात 'पुन्हा भेटू' हा एक आशावाद दिसतो. भावनिक गुंतवणूक अगदी कमी पण संबंध मात्र सौहार्दाचे! आणि व्यवस्थित आपुलकीने आणि आस्थेने बोलणे, विचारपूस करणे ही त्यातली पहिली पायरी. पण गुंतून पडायचे नाही म्हणून संबंधच आणि संपर्कच तोडून टाकायचे आणि परत जाणार्‍या व्यक्तीला आयुष्यातून हद्दपार करून टाकायचे हे जरा अनाकलनीय वाटते. तसे पाहिले तर कुणाचेच कुणावाचून काही अडत नसते. कुछ तो हो ही जाता है...मग हे तोडून वागणं कशासाठी? आणि तेलुगू लोकांना कसं व्यवस्थित जमतं संबंध ठेवणं? ते तर अगदी १-२ महिन्यासाठी आलेल्या तेलुगू व्यक्तीशी देखील व्यवस्थित संबंध ठेवतात आणि शेवटी गोड 'बाय' करून पुढे निघतात. त्यांना जमतं मग मराठी लोकांना का जमत नाही? डायरेक्ट तोडूनच टाकायचं? किंवा इतकं तुटक वागायचं की समोरचा माणूस पुन्हा बोलायची हिम्मतच करणार नाही. हा कुठला मराठी बाणा? तमिळ लोकांना जमतं, तेलुगूंना जमतं, गुजरात्यांना जमतं, सरदारांना जमतं मग मराठी पाऊल का 'धड'पडते? अर्थात ही आमची तक्रार नाही; फक्त एक अनुभव आहे. कुणी तोडून टाकल्याने आमचं काही नुकसान नाही झालं. आम्ही एक करमणूक म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं. :-) असो. अनुभव निरनिराळे असतात. माणसं निरनिराळी असतात. आमचेदेखील कुणाला वाईट अनुभव आले असतील; ठाऊक नाही. आमच्या ते लक्षात आलं नसेल. स्टोरी ही दोन्ही बाजूंची असते. एकांगी नसते. त्यामुळे नो प्रॉब्लेम! :-) तुम्ही म्हणता ते बरोबर असेल; खूप काळ इथे राहिल्यावर जे आकलन होते ते कदाचित आम्हाला झाले नसावे. पुढच्या वेळेस थोडा अधिक प्रयत्न करावा लागेल. :-)

तेलेगु आणि बाकीचे एकमेकांच्या जवळ असतात असे लांबून दिसते पण नक्की कसे असतात हा खरा प्रश्न आहे. उलट त्यांच्यात फार जास्त जळजळ असते असे माझे मत आहे. दुसरा असा की तुम्ही २ भिन्न गोष्टींची तुलना करता आहात. भारतात असताना तुम्हाला एक सपोर्ट सिस्टम असते. ती असते हेच कळत नाही कारण तो आपोआप होणारी गोष्ट आहे. बाहेर आल्यावर खाडकन तो फरक जाणवतो मग "आपले" कोणतरी शोधायचा प्रयत्न होतो आणि धरून ठेवायला बघतो. ते करताना बऱ्याच गोष्टींची नकळत पायमल्ली होत असते पण ते फारसे कोणी मान्य करत नाही. शिवाय बाहेर आलेले जरा जास्तच स्वतःला हुशार समाजात असतात आणि तसेही फार हुशार लोक जास्त काळ एकत्र राहू शकत नाहीत. बरेच तेलेगु काय आणि बाकीचे हे आधीच खूप वर्षांपासूनचे मित्र असतात तसे मराठी लोकांचे नसते असा माझा अनुभव आहे. दुसरा प्रकार म्हणजे कुटुंबाची मैत्री आणि स्वतःची मैत्री हा फार मोठा फरक असतो. तुमचे एकट्याचे अनेक मित्र होतात पण सगळ्या कुटुंबाचे मित्र बनणे हे कठीण असते. सगळ्यात जास्त कटकट लहान मुलांमुळे होते. मूळ मुद्दा माझ्या मुलावर अन्याय झाला नाहीच पाहिजेल आणि माझा दिवटा वा दिवटी एकदम चांगलीच आहे असे सगळ्याच पालकांना वाटत असते. त्यामुळे बरेचदा संबंध तुटतात फक्त बोलून कोणी दाखवत नाही. ह्याबाबत मात्र गुज्जू लोक सही असतात असा माझा अनुभव आहे. अश्या अनेक गोष्टी असतात त्याचे विश्लेषण करणे अवघड असते. शिवाय भारतात चालता है प्रकार आहे तो इथे आल्यावर एकदम कमी होतो पण नाहीसा होत नाही. मग त्यात काय इतके केले थोडे सहन तर काय होते असा विचार आपण करतो पण तीच वेळ आपल्यावर आली की लोक बदलतात त्यामुळे हे सगळे फार रिलेटिव्ह आहे. शिवाय कोणाच्या जास्त जवळ गेल्याशिवाय तो माणूस नक्की कसा आहे हे कळत नाही. अगदी आठवडयातून एकदा २ तास भेटणारे घराच्या जवळ राहायला आल्यावर खरे रूप दिसते आणि भ्रमनिरास होतो.

अगदी आठवडयातून एकदा २ तास भेटणारे घराच्या जवळ राहायला आल्यावर खरे रूप दिसते आणि भ्रमनिरास होतो.
+१०० असे माझ्या २ लंगोटी मित्रांबरोबर घडले आहे... त्यांचे एकाच बिल्डींग मध्ये एकाच मजल्यावर अगदी समोरासमोर फ्लॅट होते... छोट्याछोट्या कुरबूरींवरुन भांडण आता एवढे विकोपाला गेले आहे की आता ते एकमेकांचे तोंड देखील पहात नाहीत. :(

>> अगदी आठवडयातून एकदा २ तास भेटणारे घराच्या जवळ राहायला आल्यावर खरे रूप दिसते आणि भ्रमनिरास होतो. खरे आहे. म्हणून अतिपरिचयात अवज्ञा होईल इतकी घसट वाढवू नये आणि समोरून गेल्यावर ओळख ही न दाखवणे इतका दुरावा देखील येऊ देऊ नये या मताचा मी आहे. आमच्या कम्युनिटीमध्ये बायकांचे खूप जवळ येणे आणि मग भांडण होणे आणि मग इकडे-तिकडे एकमेकींना नावे ठेवणे हे खूप कॉमन आहे. आणि हे उत्तर भारतीय बायकांमध्ये खूप जास्त प्रमाणावर घडते. त्यापेक्षा नीट, हसून-खेळून रहावे, चांगले वागावे, खूप कुणाच्या खाजगी आयुष्यावर अतिक्रमण करू नये, गरज असेल तिथे मदत द्यावी-घ्यावी, आणि महत्वाचे जीभ ताब्यात ठेवावी हा मार्ग बरा वाटतो. जीभेमुळे खूप नुकसान होत असते. काही लोकं जीभेला दांडपट्टा समजतात. :-) माणसे जोडण्याचे महत्व हे माणसे तोडण्यापेक्षा कितीतरी पट अधिक आहे असे मला वाटते. माणसे जोडावीत म्हणजे तुटण्यासारखे दुसरे काही राहतच नाही आयुष्यात.

मला एकाने खूप सल्ले दिले; अमुक एक क्रेडिट कार्ड घे, त्यावर १०% कॅशबॅक आहे; भारतात फोन करण्यासाठी अमुक एक सेवा वापर, ४० मिनिट्स जास्त मिळतात...वगैरे वगैरे. मी त्याला सरळ विचारले की तुला माझी एवढी काळजी कशासाठी. तो चक्क दात काढत म्हणाला "आय वुईल गेट रेफरल बेनेफिट"! मी हात जोडले.
हात जोडण्यापेक्षा हात पुढे करायचा. रेफरल शेअर मागायचा, ते लोक (आणि इतरही बरेचसे) तसेच करतात. घर भाड्याने घेताना तर जास्तच (कारण रेफरल जास्त असतो). एखादी कम्युनिटी जर रेफरल बोनस देत असेल तर तिथे राहणारा परिचित गाठायचा , त्याला सांगायचे बाबारे माझे नाव रेफर कर. तिथले घर जर आवडले तर रेफरल बोनस दोघात शेअर करायचा. खूप लोक असेच करतात.