Welcome to misalpav.com
लेखक: प्रमोद देर्देकर | प्रसिद्ध:
माझं कोकणातलं गांव :- भाग - १
टीपः- वर्णन जरी माझ्या लहानपणीचे असले तरी सर्व छायाचित्र मी मे-२०१३ साली गावी गेलो होतो तेव्हा माझ्या मायक्रोमॅक्स एच. डी. ११६ मोबाईलने काढलेली आहेत. तेव्हा आताच्या जंगलापेक्षा तेव्हाचं जंगल अधिक घनदाट होतं, आता बेसुमार वृक्षतोड झालेली आहे.
मागील भागात>>

मग सगळी मुलं पळत अंथरुणात झोपायला जायाची. धरणावरच्या बागेत जाताना काय काय पहायला मिळणार या धुंदित केव्हा तरी गाढ झोप लागायाची.

तिथुन पुढे ....>>> सकाळी लवकर उठलो की, काकांच्या मागोमाग गोठयात पेला घेवुन जायचं, तिथंच आपण स्वःताहाच्या हाताने काढलेलं निरसं दुध प्यायचं. मग घरातील इतर मंडळींचा चहा झाला की सगळे बागेत जायला तयार. आमच्या घरासमोर एका उभा डोंगर आहे. बागेच्या निवडूंगाच्या कुंपणाला अगदि चिटकून. या निवडूंगाच्या कुपणांच्या आणि डोंगराच्या मधून एक चिंचोळी पायवाट जाते. जेमतेम दोन तीन माणसे चालत जात येईल एवढी. या पायावाटे ने पुढे पुढे गेलं की आमची बाग संपल्यावर आमच्या चुलत चुलत्यांची (वडिलांचे चुलत बंधु)यांची बाग आहे. आता बागेविषयी थोडसं आमच्या सुपारीच्या तीन बागा आहेत. एक घराला लागुन, दुसरी चुलत्यांची आणि गावातल्या इतर खोतांची बाग आहे त्या पलिकडे मधली बाग आणि मग शेवटची तिसरी धराणाला लागुन असलेली बाग. घरा पासून थोडी दूर असलेल्या मधली बागेच्या बाजूला रस्त्याच्या दोन्ही बाजूला गावातले इतर लोकांची वस्तीं म्हणजे कुणबी,कुळवाडी, महार, मांग, तलाठी, लिंगायत, वाणी, यांची वस्ती आणि त्यांच्यासाठी पाणवठा म्हणुन पाटाच्या पाण्याने भरलेली बांव लागते. हा पाणवठा म्हणजे जी आमची तिसरी बाग आहे तिच्या जवळ असलेल्या पर्‍यातील धरणापासून निघालेला एका पाट जो या वस्ती पर्यंत येवून मग पुढे आमच्या घराजवळील पहिल्या बागेला जातो. गावांत प्रत्येक खोतांची बाग असते त्याला या धरणाचं पाणी आलटून पालटून वापरायला मिळत असते. त्याला पालट म्हणतात. आमचे पालट असले की आम्ही धरणावरची किवा मधली बाग शिंपून घ्यायची. या मधल्या बागेतून पुढे गेलो की खरं जंगल सुरु होतं. आता पाटातून चालत जावं लागतं.खालील फोटोत झुडुपांच्या खाली जो काळोख दिसतोय तो पाण्याचा पाट वाहतोय. हा पाट चोखळंत जायचे असते, म्हणजे त्यात पडलेला पालापाचोळा, म्हशीचे शेण, बाजुला काढत पायाने साफ करत त्याच्या उगम स्थानापर्यन्त जायचे असते. पाण्याचा पाट नाहीतर थोडासा डोंगर चढून बागेला समांतर रस्ता जातो त्याने जायच. त्या रस्त्याने गेलो कि पडलेले आंबे, काजू, गोळा करता येतात. शिवाय विविध रंगाचे, विविध आवाज काढणारे पक्षी किलबिलाट करत आमच्या सोबतीला असायचेच. a 1 इथे काकांना अर्जुनारिष्टाची वेल दिसली ती आम्हांला दाखवताना. 1 हेच जर पाटातून चालत गेलं की एका बाजूने बागेतील सुपारीची झाडे तर एका बाजूने डोंगरावरिल दाट झाडं झुडपं यातून रस्ता काढता जावं लागतं. काही ठिकाणी तर खुप काळोख असतो, जिथे कधीच सुर्यप्रकाश पोहचत नाही अशी जागा असते. 1 खरं तर काकांबरोबर मी याचा वाटेने जायचा आग्रह करतो कारण असतो, जिथे कधीच सुर्यप्रकाश पोहचत नाही तिथं एक वेगळं विश्व साकारलेलं असतं. विविध जमातीतले कोळी, किडे, कीटक, बारीक बारीक असंख्य जीव, रंगीबेरगी माश्या, आणि डास यांच सम्राज्य असे. पण खरी धास्ती असायची ती ही की कधी विंचु, इंगळी तर पाया खाली येणार नाही ना याची. पायवाटेनं धरणात पोहचलो की जे पाणी वस्तीवर जायचे त्याचं दारणं मोडून(पाटाचे पाणी मातीचा बांध घालून हवे तिकडे वळविणे) ते पाणी आपल्या बागेला वळवायचे . या बागेत डोंगर उतारावर खाली खाली जात पोफळीच्या (पोफळी=सुपारीचे झाड)दोन रांगा व प्रत्येक रांगेत १०/१५ समांतर झाडे असे वाफे असायचे. मध्यल्या मोकळ्या जागेत काका अननस, चिक, केळी असे काहितरी लावायचे. त्याचा फडशा पाडायला माकडे नाहीतर वांदर, साळिंदर, मोठया घुशी, खारी इत्यादिंची ये जा चालायची. माकडांच्या उड्या मारण्याने सुपारीचे रोठे खाली पडायचे, पोफळीच्या फांद्या ज्याला "विरी" असे म्हणतात त्या संपूर्ण बागेत पडलेल्या असायच्या तर नव्या पोफळी मुरगळून जायच्या. खालील फोटोत पहा सगळ्या बागेची नासधुस केलेली दिसत आहे तर एक केळीचा खांब उखडुन पडलाय. 1 त्या सगळ्या विरी(या जेवायला, झाडांना पाणी उपसुन घालायाला उपयोगी)आणि छोट्या मोठ्या काटक्या (सरापानाला उपयोगी म्हणून)यांची एक मोळी बांधायची, मग वरच्या रांगेतून खालच्या रांगेला असे एक एक करत दारणं मोडंत सर्व बागेला पाणी देत खाली खाली उतरत जायचं. बागेत पडलेल्या सुपार्‍या गोळा करून आणायच्या. धराणाच्या बागेभोवतालची काही छायाचित्र. 1 1 आता पर्यंत सकाळचे ९ वाजलेले असायचे की घरातून कोणी तरी आमच्यासाठी नाश्ता घेवून यायचं. मग या विरीचा उपयोग ताटली सारखा करायचा. नाश्या मध्ये दडपे पोहे, फोडणीचे पोहे , चिवडा लाडू, दशम्या , घावण असे काही तरी असायचं. पार नदीच्या पात्रापर्यंत उतरत पाणी देवून झाले की, परत घराकडे निघायचे.पण त्या आधी धरणावर जावुन पाण्याची टाकी, बंधारा सर्व बघुन एकदा नजरे खालुन घालायची. या पाणवठ्यावर हमखास जंगलातील सर्व प्राणी अगदि वाघ सुध्दा हजेरी लावतात असे काका म्हणतात. मला एकदा तिथल्या एका झाडावर मचाण बांधुन राहयला हवे असते, एक दोन रात्र तिथे वस्तीच करायची, पण काका तयार होत नाहित. नुसतं हसतात. खालील फोटो धरणाच्या परिसरातील आहेत. पाणी जिथुन बाहेर झिरपते ती जागा. 1 1 वरुन आलेला पर्‍या व त्याचे उन्हाळ्यातील कोरडं पात्र. 2 1 आता गावातील इतर कुळवाडी यांना पाणी मिळावं म्हणुन सरकारंनं धरणाच्या टाकीतुन पाईप काढुन मधल्या बांवे पर्यंत पाण्याचा पुरवठा केला आहे. 1 पाटातलं थंड पाणी 3 काकांचा धाकटा मुलगा पाट चोखाळतांना. 1 पाटाच्याकडेने वर जंगलाकडे, सडयाकडे व पुढिल गांवाकडे(आमच्या पुढचा ए.स्टी चा शेवटचा गाव) जाणारा रस्ता 1 काका डोक्यावर मोळी घेवून पुढे, तर आम्ही त्याच्या मागे. पुन्हा डोंगरावरिल त्याच वाटेने परतताना गावातले गुराखी पोरे आपापली गुरें ढोरें घेवुन वर सड्याकडे(डोंगराचा माथ्यावरील सपाट भाग) जाताना निघालेली असत. या ठिकाणी एकदा काका शिपणं आटोपुन घराकडे येत असताना बिबट्या वाघ पाटाच्या पाण्याला ओलांडुन वर जंगलात निघुन गेला. माकडांच ची ची असं ओरडणं, पक्षांचा चिवचिवाट पाहुन काका जागच्या जागी थांबले त्यांना जाणवलं की काहीतरी गडबड आहे. थोड्याच वेळात त्या रुबाबदार राजाचं काकांना अगदि थोडावेळच दर्शन झालं. 1 मध्यंतरी २०१० ला कोकणात वाड दळ झाले त्यावेळी पाटाच्या वाटेतच उन्मळुन पडलेला एक वृक्ष. 1 घरात आल्यावर पुन्हा म्हशींना , चारा घालणे त्यांना हौदावर पाणी प्यायला सोडणे, मांडावावर चढून आत्या, आई यांनी काही पापड, फेण्या, सांदण ( फणसाचा रसाचा पदार्थ), फणस पोळी , आंब्याचा रस अथवा पोळी असे काहीना काही वाळत घातलेलं असायचं तिथं लुडबुड करायची म्हणजे मदतीला जायचं म्हणजे मग तेवढेच ते पदार्थ चाखायला मिळत. अगदीच काही नाही जमलं तर पुन्हा सर्व मुलांना गोळा करून पती खेळायचे किंवा सरळ शेतात जावून गावातल्या समवयस्क मुलांशी क्रिकेट खेळणे असं काही बाही करायचं तेव्हा वेळ कुठल्या कुठे निघुन जायचा. मग दुपारचे बारा वाजले की आंघोळी उरकुन लगेच आमच्या स्वःताहाच्या गणपतीच्या देवळात जावुन पुजा आटोपायची असते. हे देऊळ परत घरापासुन लांब बागेच्या विरुद्ध बाजुला पुन्हा दुसर्‍या पर्‍याला ओलांडुन जावे लागते. ही पुजा कितीही अडचणी आल्या, कितीही पाऊस असो, ऊन असो वर्षाचे ३६५ दिवस कारावीच लागते. या गणपतीला नैवेद्य दाखवल्या शिवाय घरी कोणीही जेवत नाही. पण त्या विषयी पुढिल लेखात ..
-- क्रमांश --
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

मस्त, आधी प्रतिसाद मग वाचन, हेच धोरण या मालिकेबद्दल राहणार आहे :)

बाकी लेख ठीक ठाक. ज्या जातीयतेच्या भिंती आपल्या आधीच्या पिढ्यांनी पाळल्या आहेत त्या आपल्या पिढीने बाजूला सारल्या, लेखातही या गोष्टी टाळल्या असत्या तर फार छान वाटले असते. ह्या गोष्टी सोडल्या तर कोकणच्या लाल मातीला स्वतःची शान आहे!

हेच म्हणणार होतो. काय गरज होती ह्या लेखात या गोष्टींची?

@ अनन्या, स्वअ‍ॅ स्वॅप्स, :- मला वाटलेच होते की कोणाला तरी याचं दु:खं होणार आहे खरे तर मी त्याबाबतीत लेखामध्ये अजुन २/३ ओळीत सविस्तर लिहणार होतो. पण हे फोटो काही केल्या डकविता येईना. त्यातुन मी.पा. वर सर्व्हरला पण काही तरी अडचण निर्माण झाली होती. माझा पुर्ण दिवस गेला. त्या गडबडीत राहुन गेले. तुमच्या कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व! पण माझं म्हणणे हे आहे की जगातल्या कोणत्याही गावचे वर्णन हे बारा बलुतेदार, अलुतेदार या शिवाय पुर्ण होतच नाही. शिवाय ज्या जातीयतेच्या भिंती आपल्या आधीच्या पिढ्यांनी पाळल्या आहेत त्या आपल्या पिढीने बाजूला सारल्या, हे कश्याच्या आधारावर तुम्ही सांगत आहात. ह्या जाती ना तुम्ही निर्माण केल्या ना मी. त्या शतकानुशतके आहेत आणि राहतील. ते काही एका रात्रीचं काम नाही कि जादुची कांडी फिरवावी नी नाहिश्या व्हाव्यात. वर्णाश्रम आता नावाला आहे, असे म्हटले तर १) जे नेते आज सत्तेवर आहेत ते निवडुन कशाच्या बळावर आलेत. आपल्या कडे जातीनिहाय पक्ष स्थापन केले जातात. त्याचे काय? नेत्यांचे तर सोडाच विविहमंडळांच काय? ती सुधा सुद्धा सरकारी दरबारी रजिस्टर्ड आहेत ही कोणी काढायची काय गरज होती? २) एका बाजुला जातपात मानायची नाही सांगणारे हेच लोक सरकारी दरबारी नोकर्‍यात, शिक्षणात, सवलतीच्या मागे का लागतात. ताठ मानेने ते नकार देवु शकतात का? ३). प्रेमविवाहातुन जाती बाहेर लग्न होवु शकतं त्याचं ट्क्का प्रमाण कीती? आजही जातीबाहेर रोटीबेटी व्यवहार खुल्या मनानं होतात का? ४). गावाकडच्या बाजुला तर हेच लोक अभिमानानं जातपालन स्वःताहा करत्तात. प्रत्येक सणावाराला पुर्वांपार चालत आलेल्या रितीरीवाजा प्रमाणे वाटचाल होते. मानधन, बिदागी, वतन ठरलेले असते. त्याचेच अनुकरण पुढिल पिढ्या करतात. अन आज तुम्ही मुंबईत राहाता म्हणुन कदाचित सगंळ सरमिसळ झालेली पाहायला मिळते आहे. म्हणजे उदा. एखाद्या सवर्णाने शहरात वावरताना ज्या ग्लासातुन चहा, लस्सी, ताक,लिम्बु सरबत पितो तो ग्लास आधी कोणी वापाराला आहे का ही चौकशी करताना दिसत नाही. ट्रेन, बस , रिक्षा , यांतुन प्रवास करताना माझ्या बाजुला कोणत्या जातीच्या व्यक्ती आहे हे पाहताना दिसत नाही. लेखाच्या अनुशंगाने त्यांचा उल्लेख अनिवार्य होता म्हणुनच केला . पुन्हा एकदा क्षमस्व,
लेखक: एस वेळ: गुरुवार, 02/20/2014 - 18:20 Permalink

प्रमोदराव, आपला प्रतिसाद मी निदान वीसपंचवीस वेळा तरी पुनःपुन्हा वाचून काढला असेल. पहिल्यांदा जेव्हा वाचला तेव्हा प्रचंड हास्यास्पद वाटला होता. रागही आला होता. पण आता असं वाटतंय की एकतर तुम्ही एकच बाजू मांडत आहात, आणि दुसरे म्हणजे अनन्न्यांचा आक्षेप नेमका कशाला आहे ह्याबद्दल तुम्हांला क्लिअर झालेले दिसत नाही. तुमचे चारही मुद्दे आजही विशेषतः सुशिक्षित सवर्णांच्या मनात असलेली शिकलेल्या दलितांची प्रतिमा अधोरेखित करतात. ते संपूर्णपणे वेगळ्या धाग्यांचे विषय आहेत हे सौंदाळा यांचे मत माझेही आहे. तुम्ही तसे धागे काढणार असाल तर नक्कीच त्यांच्याविषयी तेथे चर्चा करू. मलातरी अशा सामाजिक वादांच्या दोन्ही बाजूंना किमान दोन प्रकारचे लोक असल्याचे दिसते. एक म्हणजे स्वार्थी असंवेदनशील लोक, जे या वादांचा आणि तद्अनुषंगाने आपापल्या सामाजिक स्थानांचा व रूढीपरंपरांचा वापर स्वतःच्या तात्कालिक फायद्यांसाठी करून घेतात आणि त्यासाठी प्रसंगी विरोधकांशी हातमिळवणी करण्याचीही त्यांची तयारी असते. ज्या आर्थिक-राजकीय-सामाजिक लाभांचा उल्लेख तुम्ही केला आहे त्या लाभांसाठी एकीकडे सहानुभूतीचा उपयोग करून आपल्या मतांना स्वजातीत किंवा स्वसमूहात पाठिंबा मिळवणे आणि दुसरीकडे संघटीत वा परंपरागत शक्तिस्थळांचा वापर करून विरुद्ध समूहाशी नियंत्रित संघर्ष छेडणे हा या लोकांचा कार्यक्रम असतो. दुसरे लोक म्हणजे जे चाललंय ते योग्य नव्हे ह्याची जाणीव असून त्याबद्दल हळहळणारे, पण तरीही आपापल्या पूर्वग्रहांच्या चौकटीबाहेर न पडता त्यांनाच घट्टपणे मनाशी जोडून घेऊन अविश्वास आणि द्वेष यांचा सुप्त कडवटपणा स्वतःत जिवंत ठेवणारे. गंमत म्हणजे विरुद्ध बाजूच्या काही व्यक्तींच्या चांगल्या अनुभवांमुळे ह्यांचा मतभेदांच्या तीव्रतेबद्दल स्वतःशी एक गोंधळही उडालेला असतो. आणि लोकांचे हे दोन्ही प्रकार वादाच्या दोन्ही बाजूंना अस्तित्त्वात असतातच. आता आक्षेपाकडे वळल्यास - इथे ग्रामीण भागातील विशेषतः कोकणातील परिसराचे वर्णन करताना जातींचा व अशा तत्सम परंपरांचा उल्लेख येण्यात काही गैर नाही. पण तो कसा असावा हे मात्र समानतेच्या मूल्यांचा सर्वसाधारणपणे सकारात्मक उद्घोष करणार्‍या आजच्या काळात अतिशय महत्त्वाचे ठरते. कारण लेखकाचा दृष्टिकोन त्यातून झळकत असतो. जर तुम्ही निव्वळ वस्तुस्थितीचे आजच्या काळातलेही यथार्थ चित्रण करण्याचा प्रयत्न करत आहात तर किमान या प्रथा आजही तशाच आहेत का, हे वेगळे पाणवठे आणि शिवाशिव अजूनही आहे का अशा प्रश्नांची उत्तरेही तुमच्या मांडणीने द्यावयास हवी होती. इथे तसे काही दिसत नाही. लेखकाचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही अजूनही परंपरागतच आहे असा संशय त्यामुळे नक्कीच निर्माण होतो. आणि त्यामुळे अशा साहित्यावर जर टीका झाली व त्यावर जातीयतेचा शिक्का बसला तर हा दोष समीक्षकांचा किंवा वाचकांचा नसून तो लेखनाचा आहे हे मान्य करण्यास अडचण येऊ नये. अशा निंदाजनक रूढीपरंपरांचा उल्लेख साहित्यात अतिशय ताकदीने, कधी त्रयस्थपणे तर कधी आक्रमक संवेदनशीलपणेही वेळोवेळी मांडला गेला आहे. यात तथाकथित उच्च जातीच्या व मागासवर्गीय लेखकांचाही समावेश होतो. पण त्या साहित्यात विद्वेष निर्माण करण्याची बीजे नसून वाचकाला अंतर्मुख करून विचार करण्यास भाग पाडण्याची क्षमता असते. आपल्या लेखात दुर्दैवाने असे काही दिसत नाही. म्हणून हा आक्षेप. असोत. माझ्याकडून ह्या धाग्यावर सध्यातरी इतकेच. पुढील भागात अजून चांगले वर्णन व छान छायाचित्रे येऊ द्यात. आम्हांलाही घडवत रहा कोकणच्या लाल मातीची सफर. पुलेशु.

@ स्वॅप्स साहेबः- तुम्ही मी अनन्या यांची मी अधोरेखीत केलेलं वाक्य पाहिलंत का त्यांनी असं स्पष्ट म्हटलंय की >> आधीच्या पिढिने ज्या पाळल्या त्या आपल्या पिढीने बाजूला सारल्या >> माझं म्हणणे हे होते की काही बाजुला सारल्या गेल्या नाहित त्या अजुनही आहेत तशाच आहेत. किंबहुना त्याचे तुम्ही वर म्हंटल्याप्रमाणे फायदा घेणारेच त्याच्या आड येतात (अगदि दोन्ही बाजुने) म्हणुन मी म्हटलं की त्या कधीच नाहिशा होणार नाहियेत. दुसरे असे की मी काही तुम्ही म्हटलंय तसा चांगला लेखक नाहिच आहे. जे जसं आठवंत गेले तसे लिहत गेलो. अगदि सर्वांगीण विचार करुन लिहणारा हाडाचा लेखक नाहिच आहे मी. मी पा ने संधी दिली म्हणुन लिहता झालो आत्तापर्यंत जे मनात होतं ते सगळं लिहण्यास एक हक्काची जागा मिळाली. तेव्हा चुभुदेघे.

जातीच्या उल्लेखाशिवाय कोकणच काय इतरही कुठल्या ग्रामीण जीवनाचे यथार्थ दर्शन अशक्य आहे. आमच्या गावातच भटाची बाग, कुळाचा आडवा, म्हाराची कोंड अशी अस्सल जातीवाचक स्थळे आहेत. त्यात फरक इतकाच की म्हारवाडीची आता बौद्धवाडी झाली. गमतीचा भाग म्हणजे आजही काही गावांत चांगली पैसेवाली झालेली कुळवाडी कुटुंबे दिवाळीला मालकाकडे दिवाळीचा फराळ मागायला जातात. मालक कुटुंबेही फवगै, चहा वगैरे देतात. अजूनही शिमग्याच्या पालखीला वाजंत्री न्हाव्याचीच असतात (जरी ते न्हाव्यांचे वंशज व्यवसायाने आता न्हावी न राहता चाकरमानी झाले असले तरी).

वर्णन झकास.काही अपरिहार्य उल्लेख जरी असले तरी ते अनावश्यक ताणु नका. बाकी लेख उत्तम...!

हा भागही छान जमलाय . झाडीतले फोटो कमी उजेडामुळे ऑटोफोकस गंडलाय .मध्यभागी एखादी ठळक वस्तु धरल्यास बरोबर येईल असं वाटतं . मुंबई पुण्याकडच्या बऱ्याच जणांचे आजोळ कोकणात होतं आणि ती मुलं सट्टीत मजा करायची तशी मजा आताच्या मुलांना मिळेल का ही शंकाच आहे . रत्नागिरी ,चिपळूण ,महाड ,कुडाळ सर्वठिकाणी वाड्या जाऊन 'सोसायट्यां'ची बने उभारली जात आहेत .निसर्ग कोकणचा गाभा आहे तोच हरवायला नको .पर्यटनाच्या नावाने मॉलसारखी हॉटेल्स किनाऱ्याने टपकत आहेत . श्रीवर्धनच्या समुद्रावर 'तीखा कम' भेल मिळते . कोकणातल्या फळांना मार्केट का नाही याबद्दल शाळेतल्या बाई सांगायच्या की फणस ,आंबे ,करवंदं ,कोकम एकाच वेळी ऐन पावसाळयाच्या तोंडावर पिकतात त्यामुळे ती वाळवून ठेवायला पुरेसा वेळ मिळत नाही .फार घाई होते .नारळाला गडी लागतात .छोट्या शेतकऱ्याला परवडत नाही . साधे लोणचे करायचे तर मीठ आणि कैऱ्या फक्त कोकणातल्या बाकी सर्व पैकिंग ,बाटल्या ,तेल ,मोहोरी ,हळद ,हिंग कोल्हापुरातून आणायचे आणि तिकडेच विकायला पाठवायचे . असो . सहज सुचलं म्हणून लिहिलं .

अगदि लाख बोललात कंजुसभावु तुम्ही. माझा पुढिल काही लेखात मी या पदार्थां विषयी लिहाणारच होतो. फोटो विषयी म्हणाल तर मला फोटोग्राफीचा अजिबात अनुभव नाही आणि त्यावेळी मला माहितही न्हवते की मी ते फोटो एक इकडे डकवेन म्हणुन , म्हणजे मी मी.पा. चा सदस्यच न्हवतो तेव्हा. नाहीतर खुप चांगल्यारितीने कौशल्य वापरुन फोटो काढले असते. पुढल्या वेळी नक्की प्रयत्न करेन. धन्स

हा ही भाग आवडला , जातीयता लेखात नाही मात्र प्रतिसादातून नक्कीच जाणवली, लेखात जाणवले लेखकाच्या आठवणीचे मोहोळ त्याला लेख लिहितांना सारे बालपण डोळ्यासमोर येत असेल , त्या जुन्या भूतकाळाच्या धुंदीत त्याच्या हातून उस्फूर्त लिखाण होत आहे , ते होऊ दे सर्व वाचकांना एक विनंती आहे फुकाचे समीक्षक होऊन लेखकाला फुकाचे सल्ले देऊ नका वाचनाचा निखळ आस्वाद घ्या,

आपलेपणाने केलेल वर्णन आणि फोटो. मला वाटतं श्री देर्देकर जातीयतेचं समर्थन करत नाहीयेत, तसं अजूनही चालू आहे एवढंच वर्णनाच्या ओघात सांगितलंय.

llपुण्याचे पेशवेl आणि पैसातैशी सहमत. आजही गावागावातुन दोन्ही बाजुंनी सोईस्कररीत्या जातीयता पाळली जातेच. बाकी लेख उत्तम. पु भा प्र.