Welcome to misalpav.com
लेखक: अनिल तापकीर | प्रसिद्ध:
मंत्रयोग - जपयोग शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात. याला मंत्रयोग देखील म्हटले जाते. मंत्राचा अर्थ आहे मनाला एका तंत्रात बांधणे. आणि ज्यावेळी मन एका तंत्रात एका नियमात बांधले जाते तेव्हा ती व्यक्ती मनाने खूप सामर्थ्यशाली बनते. कारण नेमाला खूप महत्व आहे माऊलींनी एका ठिकाणी म्हटले आहे कि, ।। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ।। जपयोग हि साधना खूप पुरातन आहे. म्हणूनच सर्व धर्मामध्ये या योगाचे अनुसरण करतात. हा एक चमत्कारी योग आहे. याचा प्रभाव व्यक्तीच्या मनावर व मस्तकावर जबरदस्त पडतो. जप योगामुळे सर्व प्रकारचे रोग आणि दु:ख यातना संपतात. जपयोगाचे चार प्रकार आहेत १ - वैखरी - आपल्या वाणीने स्पष्ट व मोठ्याने करतात तो वैखरी जप होय. २- मध्यमा - या मध्ये ओठातल्या ओठात जप केला जातो. ३- पश्यंती - या मध्ये मनातल्या मनात केला जातो यामध्ये ओठ हलत नाही. ४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो. पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते. दु:ख- शोक दूर कसे होतात - ज्यावेळी व्यक्ती खूप काळजीत तणावात चिंतेत असते . त्यावेळी ती नकारात्मक विचारांनी घेरली जाते. आणि पहिल्यापेक्षा जास्त संकटात आणि दु:खात पडते. विचार करून करून हैराण होते. सर्वप्रथम या सर्व विचारातून सुटण्यासाठी मन एकाग्र झाले पाहिजे कुठल्याही देवतेच्या सततच्या मंत्र जपाने मन एकाग्र व्हायला लागते आणि मनामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण व्हायला लागते. आणि तुमच्या सर्व दुःखाचा हळू हळू विनाश व्हायला सुरुवात होते. काही दिवसातच तुम्ही एक आनंदी आणि सामर्थ्यशाली होता. आपल्या आराध्य देवतेच्या निरंतर जपाने मनुष्य त्या दैवी शक्तीशी जोडला जातो आणि त्या दैवी शक्तीकडून त्याला सर्व प्रकारचे सहाय्य प्राप्त होते. जप योगामुळे दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि तो सामर्थ्यशाली तर होतोच पण अंतर्ज्ञानी देखील बनतो. जपयोगाच्या चमत्काराविषयी सर्व धर्म ग्रंथामध्ये उल्लेख आलेले आहेत. वेदांमध्ये विविध प्रकारच्या मंत्रांचा उल्लेख केलेला आहे. देवतेच्या नाम मंत्रामध्ये खूप शक्ती असते. त्याचा जप केला कि साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होतो मंत्रजपाने जे ध्वनी तरंग उठतात त्याने त्या व्यक्तीचे स्थूल व सूक्ष्म अशी दोन्ही शरीरे कंपित होतात. यालाच मंत्रयोग - जपयोग म्हणतात.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

अनिलराव एकदा वर लिहिलेले सर्व आत्मप्रचितीला उरतते का हे तपासुन पहा ! असो ! म्हणोनि जितुका भोळा भाव । तितुका अज्ञानाचा स्वभाव । अज्ञानें तरी देवाधिदेव । पाविजेल कैचा ॥ ११ ॥ अवांतर : ह्यावरुन एक जोक आठवला : परांजपे ह्या शब्दाची व्युत्पत्ती : परा + जपे अर्थात परावाणी मधे जप करणारे अशी आहे ... पण आमच्या एका बीग्रेडी मित्राने ती व्युत्पत्ती पर्+अन्न्+जपे म्हणजे दुसर्‍याच्या अन्नावर जगणारे अशी केली होती =))

बराच वेळ चिंतन केल्यावर ह्या प्रश्नाचा अर्थ उमगला ... फारच गहन आणि खोल प्रश्न विचारलात माऊली !!
तत्वें साक्षत्वें वोसरतीं| साक्षत्व नुरे आत्मप्रचिती |आत्मा असे आदिअंतीं| आपण कैंचा ||१४||
जिथे "आपण"ही नाही ... साक्षित्वच नाही ...तिथे आत्मप्रचिती कशी आणणार ! मनापासुन धन्यवाद :)

तुम्ही ज्ञानेश्वरीचे पारायण करता का? ज्ञानदेवांनी नऊ हजार ओव्यांच्या ज्ञानेश्वरीत कोणत्या अध्यायात, कोणत्या ओवीत काय म्हटले आहे हे तुमच्या कसे लक्षांत राहते?

हे समर्थांनी म्हणले आहे ...ज्ञानेश्वरांनी नाही आणि लक्षात कसे रहाते हे समजण्यासाठी तुम्हाला आधी समष्टी व्हावी लागेल *biggrin*

हे समर्थांनी म्हणले आहे ...ज्ञानेश्वरांनी नाही
यापुढे ओवीचा उल्लेख करताना तिचा संदर्भ देत जा राव. आमच्यासाठी ओवीपेक्षा ओवीचा संदर्भ जास्त महत्वाचा आहे. :)

अनिल'जी... खूपच उपयुक्त माहिती... :) मंत्रसामर्थ्य अगाध आहे. मंत्र व नामस्मरण या दोन्हीबद्दल आपण या आधीदेखील लेख लिहिले आहेत. प्रत्येक वेळी आपण जी विस्तृत स्वरूपात माहिती देता, त्यावरून देव, मंत्र या गोष्टींशी कमी संबंध असणार्‍या किम्बहुना काहीही सम्बन्ध नसणार्‍यांना सुद्धा उचित बोध मिळू शकतो...... तुम्हाला शुभेच्छा!!!! .. :) || जय मल्हार ||

नीट आटवत नाय. पण अस कायतर आहे. युद्ध माझे बॅट्या करणार ........... धाग्यावर मंत्र बसणार निश्चीत. (जेपी फ्राम तामीळनाडु)

समर्थक प्रवचने देणार।विरोधक खोडून काढणार॥ व्यष्टी समष्टीची अंत्येष्टी होणार। राडा घडणार निश्चित॥ ;)

समष्टीच्या व्यामिष्रतेची आपणास कल्पना नसल्याने आपण सदर ओवी लिहिण्यास उद्युक्त झालात. वास्तविक पाहता समष्टीवर भाष्य करताना समष्टी आणि तिची व्यामिष्रता यांच्या जोडीनेच भ्रम (इल्यूजन), प्रमाद(चुका करण्याचा स्वभाव), करणापटव (लिमिटेशन्स), विप्रलिप्सा (लोभीपण), कूटार्थ, मनाची निर्वासन (वासनारहित) अवस्था, विचारांची क्लॅरिटी, भगवदतत्त्व, त्रैमूर्ती ज्या 'मोडस' मध्ये (अनुषंगाने) ती काम करते ते त्रिगुण तसेच ज्ञानरुपी तृतीय नेत्र इत्यादी बाबींचा साकल्याने विचार करावा लागतो.

दंग्याची सगळी लक्षणं दिसत आहेत... सगळे कंपूबाज टवाळ जमले आहेत... दंगा होणार निश्चित...

खेकडे, अमावस्या, दहीवडा नरकोंडम बेट, बाली,शाही ? अंडी..पोपट , जाम+ इ एम आय ई. ई. च्या प्रतीक्षेत

मन एकाग्र करणे..... च्यायला ,पाचरुपयाची गायछाप आणि चूना डबीसुद्धा हे करु शकते, त्यासाठी एवढ्या देवांच्या नावाने कशाला शंख करत बसायचे....

पाचरुपयाची गायछाप आणि चूना डबीसुद्धा हे करु शकते
हायला ५ रुपाय्ला झाली होय ? पुर्वी दीडरुपायला तबाकु आणि ५० पैशात चुना मिळायचा .... गेले ते दिवस !

मंत्रजपावरुन आठवले, सहस्त्रार्जूनाच्या नावाने कसलासा मंत्र आहे म्हणे. तो जपला की हरवलेली वस्तू मिळते असे म्हणतात. आमच्या एका मित्राचा परवा भीमाशंकर मंदीराच्या प्रांगणात भ्रमणध्वनी संच हरवला. मित्र मंत्रपठणाच्या क्षेत्रातील निष्णात असल्यामुळे त्याने तो मंत्र जपलासुद्धा मात्र भ्रमणध्वनी संच काही सापडला नाही. बहुतेक चपलांच्या स्टँडजवळ उभ्या असणार्‍या आजीबाईंना दहा रुपये न दिल्यामुळे त्यांनी दिलेला "देव पावंल तुमाला" हा शाप भोवला असावा. सहस्त्रार्जुनाच्या "हरवलेले सापडते" मंत्रापेक्षा आजीबाईंचा तळतळाट जास्त पावरफुल ठरला.

ह्या मंत्राच्या स्मरणाने तुमच्या त्या मित्राला समष्टी झाली आणि हरवलेली मनःशांती परत मिळाली असे ऐकीवात आहे ! म्हणजे कार्तवीर्यही जिंकला आणि आज्जी बाईही जिंकली असे अध्यात्मिक अनुमान काढतायेईल. पण हे कळण्यासाठी तुमचा कर्मविपाकाचा पुरेसा अभास असावा लागेल तरच तुम्हाला अध्यात्मिक आणि आधिभौतिक जगतातील व्यामिश्रतापुर्ण कार्यकारणभाव लक्षात येईल ! *biggrin*

सध्या आम्हाला सर्दी झालेली असल्यामुळे आम्ही आलेपाक खात आहोत. सर्दी गेली की कर्मविपाकाचा अभ्यास करु. रच्याकने, आधिभौतिकला इंग्रजीत काय म्हणतात? पॅराफिजिकल? सुपरश्टीशीयस?

शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे.
१. हे नेमके कोणत्या शास्त्रात सांगितले आहे, मूळ श्लोक कोणता, हे जरा तपशीलात लिहावे, अशी विनंती करतो. २. 'जप' ही एक मानसिक क्रिया असल्याने तिचे परिणाम -- "साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होणे" वगैरे नेमके कसे घडून येतात, वगैरेंवर धागाकर्त्याने प्रकाश टाकावा. ३. धागाकर्त्याचा या बाबतीत स्वानुभव काय आहे ? कोणता, किती जप केला, त्याचा काय परिणाम घडून आला, वगैरेही विशद करावे. 'जप' या संकल्पनेच्या मोघम माहिती ऐवजी नेमकी आणि स्वानुभवाधिष्ठित माहिती मिळावी, या हेतूने ही विचारणा करत आहे.

शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे.
नेमकं हेच विचारायचं होतं, की नुसतं "ज" म्हणजे जन्माचं थांबणं आणि "प" म्हणजे पाप नष्ट होणं असं नक्की कुठे लिहीलं आहे? असे एकाक्षरी शब्दावरून एवढा सगळा अर्थ कसा काय होतो याचं खरंच कुतूहल आहे.