Welcome to misalpav.com
लेखक: आतिवास | प्रसिद्ध:
मीटिंग संपली. बाया लगबगीने घराकडे परतल्या. “माज्या घरी चल,” रखमामावशीने हुकूम सोडला. मला तिच्याबद्दल अधिक जाणून घ्यायची संधी हवीच होती. गेले . चहा झाल्यावर ती म्हणाली, “येक पत्तुर लिवायचंय. लिवशील?” तेवढी मदत मी नक्कीच करू शकते. तिने एक ‘कार्ड’ आणलं. ती सांगत गेली तसंतसं मी लिहिलं. नव-याला होतं पत्र. त्या वीसेक ओळींत मला तिच्या जगण्याचं चित्र दिसलं. “पत्ता?” मी विचारलं. “नाय ठावं”, रखमामावशी म्हणाली. मी चमकून तिच्याकडे पाहिलं. “कुठलं गाव?” “त्याचं एखादं पत्र?” मी विचारलं. मावशी गप्पच. “मावशे, पत्र पोचणार कसं?” मी म्हटलं. तिने डोळे पुसले. तिची लहानगी पोर बाजूला खेळत होती. ती म्हणाली, “गावात कुणालाबी नाय ठावं आबाचा पत्त्या”.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणे शतशब्दकथा आवडली. तिचे २० ओळीचे पत्र देखील लिहा नं, तेही चटका लावणारंच असेल.

तिचं पत्र वाचण्याची उत्सुकता आहे. त्याविना कथा अधुरी वाटली.

त्या विसेक ओळीत तिच्या जगण्याच् चित्र मला दिसल.... तुम्हाला तिच्या जगण्याच् चित्र दिसाव म्हणून बाकी काही न बोलता मावशीने एक पत्र लिहून घेतल... अप्रतिम गोष्ट

अप्रतिम… तुमच्या शतशब्दकथांचे एक पुस्तक छापावे ही विनंती

सुंदर मांडणी. अस्वस्थ करणारी... ग्रामीण लोकांच्या असंख्य समस्या - तुम्ही त्या क्षेत्रात काम करत असल्याने जवळून पहात असाल. त्या निरागस मुलांसाठी मात्र काहीतरी करायला हवं !