जनातलं, मनातलं
संस्कृती..
Primary tabs
सर्व मंडळींचे मिसळपाववर स्वागत!
ऋणनिर्देश -
नीलकांत
गमभनकार ओंकार जोशी
===============================================
आमची आदरस्थाने -
मनोगत
उपक्रम
मायबोली
माझे शब्द
मराठीगझल
सुरेशभट डॉट कॉम
===============================================
राम राम मंडळी,
आज गणेशचतुर्थीच्या शुभमुहूर्तावर हे संकेतस्थळ सुरू करण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आपणा सर्व सभासद मंडळींचा या संकेतस्थळावर सक्रीय सहभाग आणि सहकार्य राहील अशी आम्ही आशा व्यक्त करतो.
श्री पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे! महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व! त्यांच्या 'संस्कृती' या विषयाची फार सुंदर व्याख्या करणार्या चार ओळी इथे लिहून आम्ही या संकेतस्थळाचा शुभारंभ करत आहोत!
कळावे,
आपले नम्र,
मिसळपाव पंचायत समिती!
===============================================
संस्कृती!
"शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, गणपतीबाप्पा मोरया ची मुक्त आरोळी, केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचे वरण, उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ, मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळाचे पाणी, दुसर्याचा पाय चुकून लागल्यावरदेखील आपण केलेला प्रथम नमस्कार, दिव्या दिव्या दीपत्कार, आज्जीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टी, मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहानमोठी होणारी शेपटी, दसर्याला वाटायची आपट्याची पाने, पंढरपूरचे धूळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे, सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मूठभर अस्थिंचा गंगार्पणाच्यावेळी झालेला स्पर्श, कुंभाराच्या चाकावर फिरणार्या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूल हात लागून घाटदार मडके घडावे तसा ह्या अदृष्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो.
कुणाला देशी मडक्याचा आकार येतो, कुणाला विदेशी कपबशीचा!
-- पु ल देशपांडे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी पु.लं.नी लिहिलेल्या या ओळी लिहून खर्या अर्थाने या संकेतस्थळाचा श्रीगणेशा झाला आहे, असं वाटलं. सुसंस्कृतपणा म्हणजे सुतकी चेहरे, जे बहुसंख्यांना आवडते त्याला नाक मुरडणे इ. गोष्टी अभिप्रेत असतात असा जो समज बहुधा पसरलेला असतो त्याला हा परिच्छेद अगदी साध्या साध्या गोष्टींतून छेद देतो. आहार-निद्रा-भय-मैथुन या पलीकडे जाऊन आपण जे काही उत्सव साजरे करतो, लहान-सहान कृतींतून दुसर्यांचा विचार करण्याची आणि आपला इतिहास आणि पूर्वज यांच्याविषयी कृतज्ञता बाळगण्याची जी शिकवण मिळते, असे आणि इतर बरेच काही म्हणजे संस्कृती. विनोबांच्या एका ओळीच्या व्याख्येनंतर संस्कृती म्हणजे काय?, हे इतक्या स्पष्टपणे सांगणारी मराठमोळी व्याख्या इतर दुसरी क्वचितच असेल.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
>> असा जो समज बहुधा पसरलेला असतो त्याला हा परिच्छेद अगदी साध्या साध्या गोष्टींतून छेद देतो.
>>विनोबांच्या एका ओळीच्या व्याख्येनंतर संस्कृती म्हणजे काय?, हे इतक्या स्पष्टपणे सांगणारी मराठमोळी व्याख्या इतर दुसरी क्वचितच असेल.
नंदनशेठशी सहमत आहे.. संस्कृती या शब्दाचा इतका साधासोपा आणि खास करून मराठमोळा अर्था भाईकाकांव्यतिरिक्त क्वचितच कुणी उलगडून सांगितला असेल!
यातलं,
सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मूठभर अस्थिंचा गंगार्पणाच्यावेळी झालेला स्पर्श,
हे वाक्य तर काळजालाच हात घालतं!
असो..
आपला,
(पुलंप्रेमी!) तात्या.
१४ पैकी ५ गोष्टी खाण्याच्या अाहेत ... अाणखी पुरावा नकोच
शिवाजीराव भोसलेंच्या व्याख्यानात नेहमी ऐकायला मिळते. आपल्याला भूक लागली असता भाकरी खाणे ही प्रकृती, इतरांना भुक लागली असता आपल्या वाटची भाकरी त्याला देणे ही संस्कृती, आणि इतरांची भाकर आपण ओरबाडुन खाणे ही विकृती.
प्रकाश घाटपांडे
हे मी न्या. रानडे (प्रार्थनासमाजाचे नाही, नंतरच्या काळातले) यांचे एक रामावरचे पुस्तक वाचले होते त्यात पण याच पद्धतीची व्याख्या होती. कदाचीत या व्याख्येचा उगम जुना आणि निनावी असावा (अर्थात हे म्हणताना मी शिवाजी रावांना आणि रानड्यांना चूक म्हणत नाही अथवा नावे ठेवत नाही आहे).
"स्वतः भुकेला असताना इतर भुकेल्याकडे लक्ष न देता खाणे ही प्रकृती, स्वतःचे पोट भरलेले असताना देखील इतर भुकेल्याकडे लक्ष न देता अजून खाणे ही विकृती, आणि स्वतः खाण्याआधी इतरांच्या भुकेकडे बघणे ही संस्कृती"
पुढे अजून साधी व्याख्या: "जो आपल्या कृतीतून संस्कृती निर्माण करतो तो देव, प्रकृती करतो तो मानव आणि विकृती करतो तो दानव".
माफ करा
तुमच्या आणि माझ्याही आदरस्थानांबाबत थोडेसे बोलू ईच्छितो.
ओंकार जोशींना गमभनमुळे आणि नीलकांत यांना माझे शब्द पासून ओळखतो
या आदरस्थानांमधुन माझे शब्द कमी झाले याची मला खंत वाटते.
पण हे संकेतस्थळ सुरुवात जशी करु शकले तसा सदस्यांचा विश्वास जपू शकले नाही.
आणि बंद पडले. मनोगत बाबत मला फारसा अनुभव नाही. पण माझे शब्दचा अनुभव नक्कीच व्यथित करणारा आहे.
मराठी लोकांच्या सेवेसाठी सुरु झालेले हे संकेतस्थळ आता बंद पडले आहे,
त्यासाठी काही व्यावसायिक वा अन्य कारणे असतील.
पण या गोष्टीची मला खंत तर नक्की च आहे
असो. कालाय तस्मै: नमः
- सागर
माझे शब्द चे उदाहरण माझ्या मनात अनेक दिवसांपासून घोळते आहे.
सुदैवाने आपल्याला मनमोकळी चर्चा करण्यास हे संकेतस्थळ लाभले आहे.
ह्यावर चर्चा विषय टाकल्यास, कुठल्या स्थळाचे काय चुकले, आणि काय बरोबर होते, अशी चर्चा करणे जास्त योग्य ठरेल. ह्या चर्चेत मी ते उपस्थित करणे योग्य वाटत नाही.
- सर्किट
सर्किट महोदय,
जरुर लिहा कारण माझ्या प्रत्येक चूकीतून काही ना काही सर्वानांच शिकण्यासारखे आहे.
जरुर पडली तर मला जीमेल वर निसंकोच पणे संपर्क साधा.
राज जैन
सगळ्यांना नमस्कार
सागर,
माझे शब्द बंद झाले यामागे कुठलेही प्रत्यक्ष व्यवसाईक कारण नाही. राज यांनी घेतलेला सेवा प्रदाता फार बंधनकारक होता. संकेतस्थळाचा माहितीओघ खुप जास्त होता. त्यामुळे ते संकेतस्थळ अधिकमागणी या नावाखाली सेवाप्रदात्याने स्थगीत केले.
राजने नवा सेवा प्रदाता घेतला. मात्र मधेच माझेशब्दच्या विदाचा अपघात झाला. मागे राज तो विदा दुरुस्त करीत असल्याचे बोलला होता.
आता सद्य परिस्थिती अशी आहे की राज ला त्याच्या व्यवसाईक कामात वेळ मिळत नाहीये. माझे शब्द पुन्हा सुरू करने म्हणजे भरपुर वेळ खर्ची घालावा लागेल. तसा राज एवढ्यात नेटवर नसतोच. मिसळपाव वर आता दिसायला लागला आहे. ही चर्चा तो वाचेल व अधिक खुलाशेवार उत्तर देईल अशी अपेक्षा.
नीलकांत
म्हणजे शनी वक्री, रवि मकरेत आणि इतर ग्रह मसणात असल्याने विदाच्या अपघाताची साडेसाती सर्व मराठी संकेतस्थळांना आहे तर.
संकेतस्थळचालकांनी डोक्यावर निळा दगड बांधणे यासारखे काही ज्योतिषशास्त्रीय उपाय योजता येतील का?
(उत्तरोत्सुक) आजानुकर्ण
आजानू,
ही सुचना तुम्ही खुप वेळाने दिलीत हो, नाहीतर मी देखील नवरत्ने आपल्या २० च्या २० बोटांमध्ये धारण केली असती !
डोक्यावर बाधल्यावर काही फरक पडेल का हो ? ;)
राज जैन
असे त्यांनीच मला सांगितले. आता त्यांचा त्यावर ताबा नाही असेही ते म्हणाले.तेव्हा ते चालू होईल अथवा नाही ते नव्या मालकावरच अवलंबून आहे असे दिसते.
आपल्या सर्वांचे आभार की तुम्ही सर्व मित्र मंडळी माझे शब्द विषयी लिहताय, पण माझे शब्द चे दुखः मला तेवढेच आहे जेव्हढे एखाद्या आईचे लहानगे मुल वयात येण्याच्या आधीच देवा घरी जाते, माझ्या परीने मी खुप काही प्रयत्न केले. थोड्या आर्थिक लाभाच्या मोहापायी मी संकेतस्थळ विकले होते हे कबूल करण्यास मला जरा ही संकोच वाटत नाही, पण ती माझी खुप मोठी चूक होती असे आज वाटते.
ज्यांना संकेतस्थळ दिले होते त्यांना मदत व्हा वी ह्या उद्देशाने मी काही काळ त्यांना सोबत देखील दीली व दोन वेळा संकेतस्थळ दुरुस्त करुन दिले, पण काही कारणामुळे अथवा दैवामुळे समजा ते संकेतस्थळाला व्यवस्थीत राखु शकले नाहीत.
मागील महीण्यामध्ये त्यांच्या शी अर्थपुर्ण बोलणी करुन स्थळ परत हाती घेतले होते पण सेवादात्याने पुन्हा माझी गोची केली व जो विदा व साहित्य संकेतस्थळावर होते त्याची सीडी देण्याचे नाकारले, विदा व साहित्य मिळून ८९० एमबी ची झिप फाईल महाजालावरुन २४ तासाच्या आत (सेवादात्याची अट होती) संगणकावर उतरुन घेणे मला येथे भारतात तरी शक्य नाही आहे, माझ्याकडे अजून एक महीना आहे जर कोणी साह्य केले तर शक्य होईल, (मी त्या व्यक्तीस संकेतस्थळ व सर्व विदा स्वाधीन करेन एकच अट संकेतस्थळ व्यवस्थीत चालवावे)
संकेतस्थळावर जी स्पर्धा घेतली होती त्याचे बक्षीस व ईतर गोष्टी त्या नवीन संस्थेने पुर्ण करण्याचे वचन दिले होते व मी काही काळ महाजाल्याच्या संपर्कामध्ये देखील नव्हतो त्यामुळे देखील मी त्या गोष्टीमध्ये लक्ष घालू शकलो नाही व सदस्यांचा विश्वास गमावून बसलो :(
परत एकदा नवीन सेवादाता घेतला आहे व नवीन संकेतस्थळाचे काम चालू करतच होतो तेव्हा अचानक उपक्रमवर मला ह्या मिसळ-पाव संकेतस्थळाविषयी कळाले तेव्हा नवीन संकेतस्थळ चालू करण्याचा विचार रद्द केला.
आपलाच मित्र,
राज जैन
अभिनंदन तात्या!
मिसळपाव अगदी झोकात सुरू झालंय. इथे येऊन खूप आनंद वाटला, आपुलकी वाटली. इथले काही लेख,कविता वाचल्या. खूपच छान आहेत. रौशनीही वाचते आहे. विषय आणि लेखन दोन्हीही भन्नाट आहे, हाताळणीही खास तात्याशैलीतली आहे. काही वादविवाद वाचले, काही भांडणंही वाचली. खूप मजा आली. अगदी तात्यांना साजेसं असंच त्यांचं संकेतस्थळही झालं आहे! -:)
नीलकांतरावांचे, ओंकाररावांचे व पंचायत समितीचे हार्दिक अभिनंदन! पुलंचा लेखही फारच अप्रतीम!
मिसळपाववर आता बर्याचदा येणं होईल. तात्या, तुम्हाला आणि तुमच्या पंचायत समितीच्या सर्व टीमला माझ्या हार्दिक शुभेच्छा!
- डॉ माधवी गाडगीळ.
मॅडम तुम्ही कुठं आहे सध्या? दिसत नाही इकडे अलिकडॅ..
आता वरचेवर येणार म्हणाला होतात
- नंदा
मिपा ने अंतार्जालावर बरीच मजल मारली आहे.
एक मिपा संस्कृतीच तयार झाली आहे म्हणाना.
ही तयार होण्याला तात्या /नीलकांत यांच्या बरोबरच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सर्वच मिपाकरांचा हातभर आहे.
धम्या चे खट्याळ प्रतीसाद / डॉन्याचे मेग्या बायटी तसेच थत्तेचाचांचे अभ्यासपूर्ण प्रतिसाद , जागुतै स्वाती तै राजेश ( बरेच महीने झाले कुठे गायबलीय कोण जाणे),पेठकर काका गणपा भौ( याने चित्रमय रेशियांचा ट्रेन्ड सेट केला) यांच्या भन्नाट रेशीप्या , सोत्रि ( तोच तो....कॉकटेल गुरू)
सेंटी लिखाण करणारा आनंदयात्री , लिखाणाला वेगळीच उंची देणारा सर्किट , केशवसुमार , प्राजु , चेतन गुगळे ( हे सगळेच बे पत्ता आहेत) ३_१४ अदिती( हीच ती १/६ गोरी यमी गोखले) आणि तिच्या अंतारजालीय मारामार्या , धम्माल आगरी भाषेत बोलणारा ब्रिटीश, व्यक्ती चित्रक तात्या , चित्रमय प्रतिसादक जयपाल , विनोबा ,चतुरंग ,राजे .धनंजय ,नंदन,
क्रिप्टीकप्रभु मास्तर , पिवळा डांबीस आणि रामदास ,सर्वसाक्षी ,टार्या , सखाराम गटणे , परीकथेतला राजकुमार ,श्रामो , विकास ,प्रदीप ,वहीदा ,गवि ,बिपीन कार्यकर्ते,पैसा , इरसाल या आणि अशा , वेगवेगळ्या क्षेत्रातले अनुभव असणार्या बर्याच जणानी त्यांचे जग आपल्या समोर आणत आपले विश्व समृद्ध केले. ही संस्कृती जोपासली.
मिपामुळे आम्ही लिहीते झालो असे बरेच जण सांगतात.
मिपाने आपल्या सर्वाना काय दिले हे सांगणे कठीण आहे. वैयक्तीक बोलायचे झाले तर एक मोठ्ठा मित्रपरीवार दिला.
बहुतेक मोठ्या गावात हक्काचे मित्र दिले. कामाच्या रगाड्यात आपलेही एक वेगळे जग असू शकते हा विश्वास दिला.
हसतखेळत रट्टे देता येतात आणि ते हसतखेळतच सहनही करावे लागतात याची जाणीव करुन दिली.
.
मिपा इज मिपा !
चीयर्स मिपा & चांगभले मिपाकर्स !
मिपावर, नक्की कधी ते आठवत नाही, सदस्यत्व घेण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. तसेही वाचनमात्र असतांनाच काही सदस्यांचे आपापसातले जास्त मैत्रीचे संबंध, त्याच्या अनुषंगाने डोळ्यावर येईल इतपत पंक्तीप्रपंच, विदेशात राहणारे आणि देशी, सामान्य आणि उच्च अशा वर्गवारी ध्यानात आल्या होत्या.
परत एकदा प्रयत्न केला तेव्हा सदस्यत्व मिळाले. त्याच दरम्यान राजकीय चर्चांनी जोर पकडला. पण या चर्चा सर्रास एकतर्फी असायच्या आणि त्या चर्च्यांमध्ये सामान्यतः संघीय बाळकडू ठिबकायचे. जसे नेहरूंनी काश्मिर प्रश्न संयुक्त राष्ट्रात नेऊन घाण केली, वगैरे. एक नितीन थत्ते म्हणून होते तेच काय तो विरोध करायचे. त्यांची टर उडवण्यासाठीच मला वाटते त्यांना अगोदर चिच्चा आणि मग चाचा असं उपनाम दिले गेले.
या सर्वाचा परिणाम म्हणून मी कधी कुणाशीही वैयक्तिक मैत्री संबंध साधण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे जिवाभावाचे मैतर वगैरे काही नाही. जेव्हा सर्वजण उच्चरवात काही तरी बोलत असतात तेव्हा आपला एक तात्विक मुद्दा धीटपणे मांडावा एवढाच उद्देश असतो. अर्थात त्याची किंमतही मोजावी लागते.
मिपावर आता सतरा वर्ष होतील. सगळाच कमालीचा आणि भारी प्रवास राहिला. जालीय प्रवास भारी अनुभव असतो. नितीन थत्तेंची आठवण येतेच. एकमेव काँग्रेसचे विचार मांडणारे होते आणि तेव्हाचे विरोधक थत्ते चाचा म्हणायचे तेही भारी होतं. बाकी, दोन पाच मिपाकर सोडले तर, मिपावर आपली मैत्री कोणाशीही फार नाही. मिपावर उत्तम लिहिणारे, भारी पंच, काही विशेष असे सगळेच लिहिणारे आवडले ते सर्व मित्रच म्हणायचे इतकंच. बाकी, मिपा आपलं पहिलं प्रेम राहीलं. मनोगत आणि मायबोलीवरही आहे, पण तिकडे इतकं दळण नसतं. मिपानं लिहितं बोलतं केलं. समृद्ध केलं. कायम ऋणी आहे. :)
-दिलीप बिरुटे
थत्ते चाचा, सुनील, सर्वसाक्षी, रामदास काका हे सर्व हल्ली दिसतच नाहीत. आपण यांना पहिलंत का (मिपावर) असा एक धागा काढा रे. किमान तीस चाळीस एकेकाळचे ॲक्टिव आणि रोचक प्रतिसाद देणारे आयडी आठवतील.