जनातलं, मनातलं

न्यूनगंडाचे नवनिर्माण

Primary tabs

मुंबईत उत्तर भारतीय लोकांविरूद्ध ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन छेडले ते पाहता, परप्रांतीयांना विरोधापेक्षा मराठी माणसाचा न्यूनगंडच जास्त दिसून आला. किंबहूना न्यूनगंडातूनच हे आंदोलन उभारले गेले असे वाटते. मराठी लोकांची प्रगती ही परप्रांतींयांच्या विरोधाच्या पायावर अवलंबून आहे, की स्वतःच्या कर्तृत्वावर हेच अजून नेत्यांना समजले नाही, असे वाटते.

मुंबईमध्ये परप्रांतीय टॅक्सीवाले, चणे-फुटाणेवाले, भेळवाले भाजी विकणारे असे आहेत. या मंडळींनी मराठी मंडळींचा कोणता हक्क हिरावून घेतला? मुळात हे व्यवसाय करण्यासाठी परप्रांतीय येण्यापूर्वी मराठी माणसाला पुरेशी संधी होती. पण रस्त्यावर येऊन काही विकण्याची लाज आणि आळशीपणा हाच स्वभाव असेल तर प्रत्यक्ष परमेश्वर खाली उतरला तरी मराठी माणसाची प्रगती होणार नाही. मुंबईतला हा 'व्हॅक्युम' परप्रांतीयांनी ओळखला आणि तो भरून काढला. कारण मुंबईत तो जेवढे कमावतो तेवढेही कमाविण्याची संधी त्यांच्या स्वतःच्या राज्यात त्यांना मिळत नाही.

वास्तविक मुंबईची आर्थिक सत्ता युपी, बिहारी लोकांपेक्षा इतर अमराठी लोकांच्या हाती आहे. हे अमराठी म्हणजे गुजराती, मारवाडी, पंजाबी, सिंधी आहेत काही प्रमाणात दाक्षिणात्य आहेत. पण यांना विरोध करण्याची आपली छाती नाही. म्हणून युपी व बिहारी लोकांना लक्ष्य केले जाते. वास्तविक या श्रीमंत परप्रांतीयांपुढे मराठी माणूस दबतो. आपल्या मुंबईत हे बाहेरून येऊन श्रीमंत झाले याचा एक शूळ आपल्या पोटात असतो. म्हणूनच एक न्यूनगंड आपल्यात तयार होतो आणि आपण त्यांच्यापुढे दबतो. मुंबईतल्या उच्चभ्रु भागात फिरताना आपण याच न्यूनगंडाच्या प्रभावामुळे घाबरतो. म्हणूनच या श्रीमंत मंडळींना संस्कृती नाही. फक्त पैसा कमावतात. त्यांना आपल्या संस्कृतीशी देणे घेणे नाही, म्हणून टीका करतो. पण ही शुद्ध आत्मवंचना आहे.

या व्यावसायिकांच्या बाबतीत चरफड व्यक्त करून काहीही होणार नाही. कारण याच मंडळींनी मुंबईत व्यवसाय थाटले आहेत. त्यांच्याकडे मराठी माणसे नोकर्या करत आहेत. त्यांचे व्यवसाय नसते तर या मंडळींनी कुठे नोकर्या केल्या असत्या? बरे मराठी मंडळींना उद्योग करण्यापासून कुणीच रोखलेले नाही. पण ती मानसिकताच मराठी माणसात रूजलेली नाही. अमेरिकेत जाऊन तेथे व्यवसाय स्थापन करणारी मंडळी आपल्यात आहेत. पण आपल्याच देशात आपल्याच राज्यात व्यवसाय स्थापन करण्याची धमक आणि तो यशस्वी चालविण्याची व्यावसायिकता मात्र, आपल्याकडे नाही.

'मनसे'म्हणते सरकारी नोकर्यांत मराठी माणसाला स्थान मिळत नाही. पण मुळात सरकारी नोकर्यांची संख्या कमी झाली असताना हे तरूण नोकरीच्या शोधात का आहेत? त्यांना उद्योगाकडे वळविण्याची गरज आहे, त्यासाठी 'मनसे' काय करत आहे? बिहारी वा युपीच्या सर्व तरूणांनाही नोकर्या मिळत नाही. पण मुंबईत आपल्या घरापासून दोन तीन हजार किलोमीटरवर येऊन धंदा करण्याची धमक ते दाखवतात. ते मराठी तरूणांना का जमत नाही? बिहारी वा युपी या तरूणांचा संघर्ष हा 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट' सारखा आहे. जिवंत रहायचं आहे, तर काही तरी केले पाहिजे. तोच तो करतो आहे.

मराठी माणसाला तेवढी गरज वाटत नाही. खूप पैसा कमवावा. मुंबईत आपलंही घर असावं असं स्वप्न त्याचं कधीच नसतं. त्यामुळे माफक पैशांतही तो आनंद मानतो. पैशांपेक्षा सांस्कृतिक घडामोडीत तो आनंद मानतो. मराठी भाषा टिकावी यासाठी संघर्ष करूया वगैरे असे तो म्हणतो. पण बाजारचा नियम असा आहे, की ज्याचा पैसा असतो, त्याचीच भाषा बोलावी लागते. मुंबईवर वर्चस्व ज्या परप्रांतीयांचे आहे, त्यांचीच भाषा बोलावी लागते. शेअर बाजार, बांधकाम क्षेत्र यात गुजराथी, मारवाडी लोकांचे प्राबल्य आहे. बॉलीवूडमध्ये पंजाबी आहेत. इतर ठिकाणी राजस्थानी आहेत. या सर्वांची मिळून बनलेली बंबईय्या हिंदी हिच बोलायची भाषा रहाणार. या सर्व व्यवसायांत मराठी माणसाचे वर्चस्व असते तर सर्वांनीच मराठी शिकली असती. पण तसे घडणे नाही.

बाजारात सर्वांना समान संधी असते. सर्व व्यवसाय, नोकरी करण्यासाठी समान संधी आहे. पण कॉस्मोपॉलिटिन कल्चर म्हणून आपण त्याला घाबरत असू तर मग आपल्यासारखे मुर्ख आपणच. खरे तर मला आश्चर्य वाटते ते बॉलीवूडमध्ये येणार्या परप्रांतीयांचे. किती स्वप्न डोळ्यात घेऊन ही मंडळी मायानगरी मुंबईत येतात. येथील कॉस्मोपॉलिटिन कल्चर त्यांच्या सवयीचे नसते. लोक सवयीचे नसतात. पण तरीही ही मंडळी येथे निश्चयाने टिकून रहातात आणि नाव कमावतात. आपल्याला हे का जमत नाही?

आपल्याकडील नाना पाटेकरचा अपवाद सोडला तर बॉलीवूडवर मराठी लोकांचे का वर्चस्व नाही. इतर प्रांतीयांच्या तुलनेत तरी त्यांना कमी संघर्ष करावा लागतो. तरीही तिकडे जाण्याचे धाडस मराठी तरूण का दाखवत नाही. दिल्लीतून शाहरूख कसलीही पार्श्वभूमी नसताना, गॉडफादर नसताना मुंबईत येतो आणि बॉलीवूडचा बादशहा बनतो. हे आपल्याला का जमत नाही. एखादीच माधुरी दीक्षित टॉपच्या पोझिशनला जाते. पण सर्वांनाच का जमत नाही. दिग्दर्शक म्हणून एखादा आशुतोष गोवारीकर दिसतो. पण निर्माता म्हणून एकही बडे मराठी बॅनर दिसत नाही. सध्या तर एकही मराठी संगीतकार हिंदीत नाही.

मराठी संस्कृती टिकविण्यसाठी आणि ती इतरांनी आत्मसात करण्यासाठी केवळ सांस्कृतिक आंदोलने करून चालत नाही. त्यासाठी परिस्थितीवर वर्चस्व लागते. मराठी लोक सांस्कृतिक कार्यक्रमात रमतात. पण त्या कार्यक्रमांचे प्रायोजकत्व कुणाकडे असते? अर्थातच अमराठी लोकांकडे वा त्यांच्या कंपन्यांकडे. (अपवाद वगळून) म्हणजे आपले संस्कृती टिकवणारे कार्यक्रमही परप्रांतीयांच्या पैशावरच चालत असतात, मग आपली संस्कृती परप्रांतीय बिघडवत आहेत, असे आपण कसे म्हणू शकतो.

ज्या राज ठाकरेंनी म्हटले आहे, की मुंबईत रहाणार्यांनी मराठी संस्कृतीशी आपुलकी दाखवली पाहिजे, त्याच राज ठाकरेंनी मुंबईत असताना शिवउद्योग सेनेच्या प्रमोशनसाठी मायकल जॅक्सनला आणून नाचवले होते. त्यावेळी 'मराठी संस्कृती' कुणाच्या घरी पाणी भरत होती? संस्कृती टिकविण्यासाठी साहित्य संमेलनांची 'बोंब' आणि 'नवनिर्माणा'ची हिंसक आंदोलने करून चालत नाही. त्यासाठी मराठी लोकांची आर्थिक स्थिती सुधारायला हवी.

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेवेळी दाक्षिणात्यांविरोधात आंदोलन सुरू केले होते. पुढे ते आंदोलन आपोआप थंडावलेही गेले. कारण दाक्षिणात्यांना विरोध करून मराठी माणसाची प्रगती होणार नाही हे त्यांना कळले. आता. राज युपी व बिहारी लोकांना विरोध करून त्याच 'न्यूनगंडा'चे 'नवनिर्माण' करताहेत. पण या मुंबई बदलली आहे. मराठी माणसाचीची मानसिकता बरीच बदलली आहे हे राज यांनी आता लक्षात घ्यायला हवे.

हर्शल


न्यूनगंडा शिवाय दुसरे काहिहि नाहि.

अविनाश ओगले

नोकर्या हा शब्द नोकर्‍या असा लिहावा... शिफ्ट `आर' दाबताच र्‍ हे मिळते. मग अक्षर जोडा. उदा. तर्‍हा, वार्‍याने... चांगले विचार वाचताना `खडे' सोसेनात...

विसोबा खेचर

अतिशय सुरेख लेख! आत्मपरिक्षण करायला लावणारा, विचार करायला लावणारा!

भोचकगुरुजींना मनापासून धन्यवाद...

तात्या.

पाहिजे. सडेतोड आणि पूर्णपणे पूर्वग्रहमुक्त लेख. झकास.

शुभेच्छा.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

परेड मनसे (मंचसे) गुजरेगी | असे शिरोमणी (सेरिमोनियल) परेडमध्ये आज्ञावली असे. असो.
हित लोक काय म्हंत्यात ते पघा.
प्रकाश घाटपांडे

शानबा५१२

तुम्ही हा लेख लिहण्यमागचा उद्देश एक नवीन लेख लिहुन स्पष्ट करावा म्हणजे सर्वांना तुम्हाला समजुन घेता येईल
*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****

स्वानन्द

'मराठी च्या मुद्द्यावर चालू असलेल्या घडामोडींवर आपले विचार मांडणे' हाच उद्देश आणखी दुसरं काय?
मला तरी दुसर्‍या लेखाची गरज वाटत नाही उद्देश समजाऊन घेण्यासाठी.

भोचकराव, लेख आवडला.

स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

लेख २००८ चा असल्याने दोन वर्षात काय घडले याचे अवलोकन करणे असे म्हणावयाचे आहे का?
समुह मानसिकतेतुन काय काय घडले हे वाचनीय ठरावे ही अपेक्षा.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

मेघवेडा

सद्यपरिस्थितीचा त्रयस्थपणे घेतलेला आणि सुयोग्य शब्दांत मांडलेला आढावा.. लेख आवडला!! खरंच विचार करण्यास लावणारा लेख!

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

अभिज्ञ

मुंबईत उत्तर भारतीय लोकांविरूद्ध ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन छेडले ते पाहता, परप्रांतीयांना विरोधापेक्षा मराठी माणसाचा न्यूनगंडच जास्त दिसून आला. किंबहूना न्यूनगंडातूनच हे आंदोलन उभारले गेले असे वाटते. मराठी लोकांची प्रगती ही परप्रांतींयांच्या विरोधाच्या पायावर अवलंबून आहे, की स्वतःच्या कर्तृत्वावर हेच अजून नेत्यांना समजले नाही, असे वाटते.

मुंबईत जे काहि घडले वा घडतेय त्याला बरेच आयाम आहेत.
जे काही घडतेय किंवा राज ठाकरे जे करत आहेत ते बरेच आधी व्ह्यायला पाहिजे होते अशी इथल्या स्थानिक मराठी माणसाची भावना आहे.न्युनगंड वगैरे विधान पटत नाहि.

मुंबईमध्ये परप्रांतीय टॅक्सीवाले, चणे-फुटाणेवाले, भेळवाले भाजी विकणारे असे आहेत. या मंडळींनी मराठी मंडळींचा कोणता हक्क हिरावून घेतला? मुळात हे व्यवसाय करण्यासाठी परप्रांतीय येण्यापूर्वी मराठी माणसाला पुरेशी संधी होती. पण रस्त्यावर येऊन काही विकण्याची लाज आणि आळशीपणा हाच स्वभाव असेल तर प्रत्यक्ष परमेश्वर खाली उतरला तरी मराठी माणसाची प्रगती होणार नाही. मुंबईतला हा 'व्हॅक्युम' परप्रांतीयांनी ओळखला आणि तो भरून काढला. कारण मुंबईत तो जेवढे कमावतो तेवढेही कमाविण्याची संधी त्यांच्या स्वतःच्या राज्यात त्यांना मिळत नाही.

अतिशय हास्यास्पद विधान.
समजा ह्या परप्रांतीयांनी जर का मुंबईत चणे,भेळ वा भाजी विकली नसती तर काय?मराठी माणुस उपाशी मेला असता?अन संपुर्ण महाराष्ट्रात काय फक्त परप्रांतीयच हे व्यवसाय करतात का ह्या व्यवसायात मराठी माणुस कुठेच नाही?
मग ह्यात आळशीपणा वगैरे गोष्टी आल्याच कुठे?

वास्तविक मुंबईची आर्थिक सत्ता युपी, बिहारी लोकांपेक्षा इतर अमराठी लोकांच्या हाती आहे. हे अमराठी म्हणजे गुजराती, मारवाडी, पंजाबी, सिंधी आहेत काही प्रमाणात दाक्षिणात्य आहेत. पण यांना विरोध करण्याची आपली छाती नाही. म्हणून युपी व बिहारी लोकांना लक्ष्य केले जाते. वास्तविक या श्रीमंत परप्रांतीयांपुढे मराठी माणूस दबतो. आपल्या मुंबईत हे बाहेरून येऊन श्रीमंत झाले याचा एक शूळ आपल्या पोटात असतो. म्हणूनच एक न्यूनगंड आपल्यात तयार होतो आणि आपण त्यांच्यापुढे दबतो. मुंबईतल्या उच्चभ्रु भागात फिरताना आपण याच न्यूनगंडाच्या प्रभावामुळे घाबरतो. म्हणूनच या श्रीमंत मंडळींना संस्कृती नाही. फक्त पैसा कमावतात. त्यांना आपल्या संस्कृतीशी देणे घेणे नाही, म्हणून टीका करतो. पण ही शुद्ध आत्मवंचना आहे.

भोचक साहेब,
हा विरोध नक्की कशाला आहे ते समजावून घ्या.
विरोध हा लोंढ्याच्या राजकारणाला आहे.अन तो असलाच पाहिजे असे मला वाटते.

या व्यावसायिकांच्या बाबतीत चरफड व्यक्त करून काहीही होणार नाही. कारण याच मंडळींनी मुंबईत व्यवसाय थाटले आहेत. त्यांच्याकडे मराठी माणसे नोकर्या करत आहेत. त्यांचे व्यवसाय नसते तर या मंडळींनी कुठे नोकर्या केल्या असत्या? बरे मराठी मंडळींना उद्योग करण्यापासून कुणीच रोखलेले नाही. पण ती मानसिकताच मराठी माणसात रूजलेली नाही. अमेरिकेत जाऊन तेथे व्यवसाय स्थापन करणारी मंडळी आपल्यात आहेत. पण आपल्याच देशात आपल्याच राज्यात व्यवसाय स्थापन करण्याची धमक आणि तो यशस्वी चालविण्याची व्यावसायिकता मात्र, आपल्याकडे नाही.

त्यांचे व्यवसाय नसते तर या मंडळींनी कुठे नोकर्या केल्या असत्या?

लै लै लैच बालिश व पोरकट विधाने.

'मनसे'म्हणते सरकारी नोकर्यांत मराठी माणसाला स्थान मिळत नाही. पण मुळात सरकारी नोकर्यांची संख्या कमी झाली असताना हे तरूण नोकरीच्या शोधात का आहेत? त्यांना उद्योगाकडे वळविण्याची गरज आहे, त्यासाठी 'मनसे' काय करत आहे? बिहारी वा युपीच्या सर्व तरूणांनाही नोकर्या मिळत नाही. पण मुंबईत आपल्या घरापासून दोन तीन हजार किलोमीटरवर येऊन धंदा करण्याची धमक ते दाखवतात. ते मराठी तरूणांना का जमत नाही? बिहारी वा युपी या तरूणांचा संघर्ष हा 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट' सारखा आहे. जिवंत रहायचं आहे, तर काही तरी केले पाहिजे. तोच तो करतो आहे.

अहो पण मराठी माणसाला सरकारी नोकरी मिळावी म्हणून मनसे आंदोलन करत आहेच ना? त्यात कोणाला वा काय प्रॉब्लेम असावा?
मनसेने काही केले कि म्हणायचे कि न्युनगंडाचे नवनिर्माण,अन खालती लिहायचे कि मनसे हे का करत नाही अन ते का करत नाही?
हा दुटप्पिपणा नव्हे काय?

मराठी माणसाला तेवढी गरज वाटत नाही. खूप पैसा कमवावा. मुंबईत आपलंही घर असावं असं स्वप्न त्याचं कधीच नसतं. त्यामुळे माफक पैशांतही तो आनंद मानतो. पैशांपेक्षा सांस्कृतिक घडामोडीत तो आनंद मानतो. मराठी भाषा टिकावी यासाठी संघर्ष करूया वगैरे असे तो म्हणतो. पण बाजारचा नियम असा आहे, की ज्याचा पैसा असतो, त्याचीच भाषा बोलावी लागते. मुंबईवर वर्चस्व ज्या परप्रांतीयांचे आहे, त्यांचीच भाषा बोलावी लागते. शेअर बाजार, बांधकाम क्षेत्र यात गुजराथी, मारवाडी लोकांचे प्राबल्य आहे. बॉलीवूडमध्ये पंजाबी आहेत. इतर ठिकाणी राजस्थानी आहेत. या सर्वांची मिळून बनलेली बंबईय्या हिंदी हिच बोलायची भाषा रहाणार. या सर्व व्यवसायांत मराठी माणसाचे वर्चस्व असते तर सर्वांनीच मराठी शिकली असती. पण तसे घडणे नाही.
बाजारात सर्वांना समान संधी असते. सर्व व्यवसाय, नोकरी करण्यासाठी समान संधी आहे. पण कॉस्मोपॉलिटिन कल्चर म्हणून आपण त्याला घाबरत असू तर मग आपल्यासारखे मुर्ख आपणच. खरे तर मला आश्चर्य वाटते ते बॉलीवूडमध्ये येणार्या परप्रांतीयांचे. किती स्वप्न डोळ्यात घेऊन ही मंडळी मायानगरी मुंबईत येतात. येथील कॉस्मोपॉलिटिन कल्चर त्यांच्या सवयीचे नसते. लोक सवयीचे नसतात. पण तरीही ही मंडळी येथे निश्चयाने टिकून रहातात आणि नाव कमावतात. आपल्याला हे का जमत नाही?

आपल्याकडील नाना पाटेकरचा अपवाद सोडला तर बॉलीवूडवर मराठी लोकांचे का वर्चस्व नाही. इतर प्रांतीयांच्या तुलनेत तरी त्यांना कमी संघर्ष करावा लागतो. तरीही तिकडे जाण्याचे धाडस मराठी तरूण का दाखवत नाही. दिल्लीतून शाहरूख कसलीही पार्श्वभूमी नसताना, गॉडफादर नसताना मुंबईत येतो आणि बॉलीवूडचा बादशहा बनतो. हे आपल्याला का जमत नाही. एखादीच माधुरी दीक्षित टॉपच्या पोझिशनला जाते. पण सर्वांनाच का जमत नाही. दिग्दर्शक म्हणून एखादा आशुतोष गोवारीकर दिसतो. पण निर्माता म्हणून एकही बडे मराठी बॅनर दिसत नाही. सध्या तर एकही मराठी संगीतकार हिंदीत नाही.

भोचक अहो तुम्ही हे काहिहि काय लिहित्॑य?
कसले बॉलिवूड?अन त्याचा दर्जा तो काय? अन तिथे मान्यता मिळविण्याकरिता मराठी माणसाने कशाला जीव काढायचा?
तमिळ वा तेलगु सिनेमेवाले तर विचारत पण नाहित बॉलिवूडला.त्यांचे बरे काहि अडत नाही?

मराठी संस्कृती टिकविण्यसाठी आणि ती इतरांनी आत्मसात करण्यासाठी केवळ सांस्कृतिक आंदोलने करून चालत नाही. त्यासाठी परिस्थितीवर वर्चस्व लागते. मराठी लोक सांस्कृतिक कार्यक्रमात रमतात. पण त्या कार्यक्रमांचे प्रायोजकत्व कुणाकडे असते? अर्थातच अमराठी लोकांकडे वा त्यांच्या कंपन्यांकडे. (अपवाद वगळून) म्हणजे आपले संस्कृती टिकवणारे कार्यक्रमही परप्रांतीयांच्या पैशावरच चालत असतात, मग आपली संस्कृती परप्रांतीय बिघडवत आहेत, असे आपण कसे म्हणू शकतो.

सांस्कृतिक आंदोलन म्हणजे काय? निश्चित अर्थ कळाला नाही.
ज्या राज ठाकरेंनी म्हटले आहे, की मुंबईत रहाणार्यांनी मराठी संस्कृतीशी आपुलकी दाखवली पाहिजे, त्याच राज ठाकरेंनी मुंबईत असताना शिवउद्योग सेनेच्या प्रमोशनसाठी मायकल जॅक्सनला आणून नाचवले होते. त्यावेळी 'मराठी संस्कृती' कुणाच्या घरी पाणी भरत होती? संस्कृती टिकविण्यासाठी साहित्य संमेलनांची 'बोंब' आणि 'नवनिर्माणा'ची हिंसक आंदोलने करून चालत नाही. त्यासाठी मराठी लोकांची आर्थिक स्थिती सुधारायला हवी.

अहो तुम्हीच तर मान्य करताय कि राज ठाकरेंनी शिवउद्योग सेनेच्या प्रमोशनसाठी मायकल जॅक्सनला आणून नाचवले होते.
त्यांनी मराठी संस्कृती वाढविण्याकरिता हा प्रकर नव्हताच.मग तो प्रश्न येतोच कुठे?
संस्कृती टिकविण्यासाठी साहित्य संमेलनांची 'बोंब' आणि 'नवनिर्माणा'ची हिंसक आंदोलने करून चालत नाही. त्यासाठी मराठी लोकांची आर्थिक स्थिती सुधारायला हवी.

काहिहि काय विधान करतय तुम्ही.
म्हणजे नक्की काय करायच?

भोचक,
हा लेख फारच असंबध्द वाटला.
नवभारत टाईम्स व सीएनएन आयबीएन सारख्या मराठीद्वेष्ट्या संकेतस्थाळावर ह्या असल्या लेखाचे कौतुकच होईल ह्यात काही शंका नाही.
:)

अभिज्ञ.

पाषाणभेद

अभिज्ञशी सहमत आहे.

तुमच्या नोकर्‍या किंवा कामे तुमच्या डोळ्यादेखत काहीही लायकी नसणार्‍या भैट्याने (केवळ कमी मोबदला घेतो म्हणून) हिरावलेली असती म्हणजे तुम्हाला त्याचे शल्य जास्त बोचले असते. स्वातंत्र्यापुर्वी मुंबईत कमी भैट्ये होते त्या वेळी आमचे कुठे अडत होते? स्वातंत्र्याचे सोडा. त्या आधी मुंबईतल्या ज्या ईमारती बांधल्या, जी कलाकुसरीची कामे केली गेली त्या वेळी होते का हे भैट्ये दुध द्यायला? येथील स्थानिक जनताच एकमेकांना सेवा देत असे ना?

उत्तरप्रदेशी व इतर प्रदेशी राजकारण्यांनी, लोकांनी आपल्या लढावू बाण्याचा व मराठी मातीत आपसूक येणारा भोळसटपणाचा योग्य कालानुरूप योग्य फायदा घेतला.

योगायोगाने जरी हा जुना लेख वरती आला तर आता तुम्हीच बघा की मराठी माणसात काय बदल घडलाय ते.

तुम्ही राहता त्या इंदूरात देखील अशीच अठरापगड संस्कृती तयार झालेली आहे. (काही लोकं तर इंदूरला 'मिनी बाँबे' )म्हणतात. हे कसले लक्षण आहे? इंदूरच्या मुळ लोकांना ही उपरी संस्कृती चालेल काय?

मी स्वत: या भैट्यांबरोबर बरीच कामे केलीत. ते कशा प्रकारे बस्तान बसवतात, कशा प्रकारे आपल्याच माणसाची वर्णी लावतात, कशा प्रकारे उपकामे आपल्याच माणसाला देतात हे मी जवळून बघीतले आहेत. (बाकी काही ठिकाणी मी मराठी व्यावसायीकाचीही मानसिकता कामाच्या प्रती कशी असते ते ही जवळून बघितले आहे. परंतु तो झाला आपल्या मराठी रक्तातला गुण). तरीही बाहेरून आलेल्या माणसांच्या व्यावसायिकतेत असणारा बदल संस्कृतिक दृष्ट्या आपल्याला मारक ठरतो.

अन राजठाकरेंचा मुद्दा केवळ मुंबईपुरताच लागू होतो असे नाही. तो तर आता जागतीक मुद्दा होतो आहे.

बाकी मी राज ठाकरेंच्या परप्रांतियांच्या लोंढ्याच्या मुद्याला पुर्णपणे अनुमोदन देईल. (जरी त्यांनी तो मुद्दा भविष्यात बदलला तरीही.)

जय मनसे प्रवृत्ती!
मी मराठी! जय मराठी!!
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

नितिन थत्ते

>>तुमच्या नोकर्‍या किंवा कामे तुमच्या डोळ्यादेखत काहीही लायकी नसणार्‍या भैट्याने (केवळ कमी मोबदला घेतो म्हणून) हिरावलेली असती

हे वाक्य पुढीलप्रमाणे वाचून पहावे.

तुमच्या (अमेरिकनांच्या) नोकर्‍या किंवा कामे तुमच्या डोळ्यादेखत काहीही लायकी नसणार्‍या काळ्याने (भारतीयाने) (केवळ कमी मोबदला घेतो म्हणून) हिरावलेली असती ....

नितिन थत्ते

चिरोटा

हा h1-B(non-immegrant visa for skilled labor) चा मुद्दा अमेरिकेतही मध्यंतरी जोरदार चर्चिला गेला होता.सुदैवाने त्याला वांशिक/व्यक्तिगत हल्याचे स्वरुप आले नाही.भारतिय लोक स्वस्तात काम करतात त्यामुळे अमेरिकनांच्या नोकर्‍या जातात असा तेथील स्थानिक लोकांचा आरोप होता.
अवांतर- बर्‍याचश्या कंपन्या-ज्या भारतिय/चिनी वंशाच्या लोकांनी स्थापन केल्या आहेत त्या अमेरिकन लोकांपेक्षा भारतिय/चिनी लोकांना प्राधान्य देतात असे आढळून आले आहे.
भेंडी
P = NP

Dhananjay Borgaonkar

कमी मोबदला घेतो म्हणुनच भारतात बर्‍याच नोकर्‍या टिकुन आहेत.
नाहीतर इकडच्या संगणक पेशेवराला एवढ्या पैशाची नोकरी मिळालीच नसती.

पण लायकी नसताना हा उल्लेख खटकला. आपली लायकी नसती तर का नोकर्‍या मिळाल्या असत्या.

आपल्या पे़क्षा कमी पैशामधे काम करायला अफ्रिका खंडातील लोक तयार आहेत. तिकडे का नाही नोकर्‍या जात?

मदनबाण

बिहारी वा युपीच्या सर्व तरूणांनाही नोकर्या मिळत नाही.
हो त्यांच्या राज्यात नाही पण आपल्या राज्यात नक्कीच मिळतात...
मी आत्ता पर्यत पाहिलेला टेलिफोन(मी या व्यवस्थेला बीटीएनएल म्हणतो :--- भय्या टेलिफोन निगम लिमिटेड) लाईनमन मिश्रा,तिवारी किंवा पांडेच होता...आज कुठल्याही सिक्युरिटी सेवा देणार्‍या एजन्सी मधे याच सर्व मंडळींची भरती कशी ?कुठल्याही कंपनीत्,एटीमच्या बाहेर्,कॉलनी मधे असणारे सुरक्षा रक्षक (वॉचमन) हे सर्व उत्तरभारतीयच आहेत !!! त्यांना कशा नोकर्‍या मिळाल्या ?
सीएसटी पासुन कर्जत पर्यंत सर्व खानपान सुविधा देणार्‍या दुकानांचे परवाने याच मंडळींना कसे मिळाले ?

मदनबाण.....

स्वतःच्या बंगल्यांवर जनतेचे कोट्यावधी रुपये उधळणार्‍या आणि याच जनतेच्या डोक्यावर व्हॅटचा तडाखा देणार्‍या सरकारचा मी निषेध करतो !!!

http://bit.ly/dlmzCy

सन्जोप राव

वरील तीन प्रतिसाद वाचून अतिशय मनोरंजन झाले. आपल्या दोषांचेच उदात्तीकरण करायचे असे ठरवले तर मराठी माणसाला मुद्दे कधीच कमी पडणार नाहीत. एकंदरीत जनतेला घाऊक बोलणे-लिहिणे फार आवडते. बिहारी गचाळ आणि अस्वच्छ, उत्तर प्रदेशी लोंढेखोर, मराठी माणूस स्वाभिमानी व बाणेदार वगैरे. त्यामुळे चालू द्या. 'वन गेट्स व्हॉट वन डिझर्व्हस' या न्यायाने मराठी माणसाला जे मिळते आहे ते त्याने स्वीकारत राहावे.
जय महाराष्ट्र!
सन्जोप राव
कल और आयेंगे नगमोंकी खिलती कलियां चुननेवाले
मुझसे बेहतर कहनेवाले, तुमसे बेहतर सुननेवाले
कल कोई मुझको याद करें, क्यों कोई मुझको याद करें
मसरुफ जमाना मेरे लिये, क्यूं वक्त सुहां बरबाद करे

तिमा

कर्तृत्व नसताना पूर्वजांची नांवे घेऊन मिशांवर ताव देणे हा काही मंडळींचा स्थायीभाव असतो. तेंव्हा कितीही सांगितले तरी अशा लोकांना थोडेच पटणार? तेंव्हा संजोपराव, दुर्लक्ष करा.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

II विकास II

>>कर्तृत्व नसताना पूर्वजांची नांवे घेऊन मिशांवर ताव देणे हा काही मंडळींचा स्थायीभाव असतो. तेंव्हा कितीही सांगितले तरी अशा लोकांना थोडेच पटणार? तेंव्हा संजोपराव, दुर्लक्ष करा.

अगदी योग्य टोला.

समीरसूर

भोचकसाहेबांचे विचार पटले.

बॉलीवूडचा दर्जा नसला तरी त्यात पैसा आणि ग्लॅमर आहे. दाक्षिणात्य बॉलीवूडला विचारत नाहीत कारण ते ही तितकेच श्रीमंत आहेत. मराठी चित्रपटसृष्टी आहे का इतकी श्रीमंत? नाही!

आणि ज्याचा पैसा त्याची भाषा हे तत्व तर खूप जुने आहे. मराठीचा माज आर्थिक क्षेत्रात दिसत नाही म्हणून मराठी कुठे दिसत नाही. अमेरिकन एम्बासीमध्ये देखील गुजरातीमध्ये सूचना आहेत. मराठीत नाहीत. जे वरचढ त्यांची संस्कृती रुजणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. मूळ लेखानुसार हे वर्चस्व प्राप्त करण्याचा प्रयत्न मराठी माणूस करत नाही आणि म्हणून त्याची मुस्कटदाबी होते. हे अगदी खरे आहे. आणि मराठी असे प्रयत्न करत नाहीत कारण मराठी लोकं कामचुकार, आळशी, मुजोर, 'चलता हैं' अ‍ॅटीट्यूड असणारे, कष्टाला घाबरणारे असे असतात. हे सत्य नाकारून चालणार नाही.

जालन्याला खूप मोठी स्टील इंडस्ट्री आहे. तिथे हजारो डिग्री तापमानात रस होणारे लोखंड सळया बनून बाहेर पडते त्या ठिकाणी कुणीच मराठी माणसे काम करायला तयार होत नाहीत कारण त्यांना त्या तापमानाचा आणि त्या कष्टांचा त्रास होतो. आता अशा ठिकाणी कमी पैशात, जोखमीचे काम करणारे आणि वरून प्रोफेशनल असणारे युपी, बिहारीच काम करायला तयार होत असतील तर त्यात त्यांचा काय दोष?

आमच्या गावातला एकमेव मराठी सुतार डबघाईला आलेला आहे कारण दहा वेळा बोलावून न येणे, थापा मारणे, काम नीट न करणे, दांड्या मारणे, लवकर घरी निघून जाणे, ४ दिवसाच्या कामाला १५ दिवस लावणे, गरज असली की गोड बोलणे, पैसे अगदी टेचात घेणे असला माज आता त्याला (किंबहुना आता त्याच्या मुलांना) महागात पडतोय कारण अत्यंत कुशल राजस्थानी सुतार आमच्या गावात दाखल झाले आहेत. ते काम अगदी चोख, दिवस-रात्र जागून, वेळेवर करून देतात. आता बोला? अशी असंख्य उदाहरणे आहेत.

मुंबईतल्या भय्यांनी त्यांची स्पेस तयार केली आहे. कुणाचेच कुणावाचून अडत नाही पण त्यातून बिझनेस ऑपॉर्च्युनिटी शोधून, अपार कष्ट करून आपापली स्पेस निर्माण करणे हे खचितच कौतुकास्पद आहे आणि ते युपी, बिहार च्या लोकांना नीट जमते आणि म्हणून मराठी लोकांच्या पोटात दुखते. गरज निर्माण करून त्यातून पैसा कमवणे हे एक तंत्र आहे आणि ते मराठी लोकांना जमत नाही.

त्यामुळे युपी, बिहार्‍यांना हुसकावून लावण्या आधी (याची गरज आहेच कारण नाहीतर आधीच कोकरासारखा असणारा मराठी माणूस अगदीच गोगलगाय होऊन जाईल) मराठी लोकांनी, नेत्यांनी आपला अ‍ॅटीट्युड बदलणे अत्यंत आवश्यक आहे.

--समीर

चिरोटा

गरज निर्माण करून त्यातून पैसा कमवणे हे एक तंत्र आहे आणि ते मराठी लोकांना जमत नाही.

सहमत आहे.व्यवसाय्/धंदा करण्यासाठी जे गोड बोलावे लागते त्यात उत्तर भारतिय हुशार असतात.
बाकी वर रेल्वेच्या भरतीबाबत मात्र मनसेचे मुद्दे योग्य वाटतात्.सर्वच्या सर्व रेल्वे कँटिन्स्मध्ये/तिकिट तपासनिस उ.प्र./बिहारचे कसे काय? हे व्यवसाय् चालवण्यासाठी काही प्रचंड मेहनत/hifi skill ची गरज नाही. स्थानिक लोक हे जॉब्स नक्कीच करु शकतात.
काही वर्षापूर्वी कर्नाटकातही रेल्वे भरतीचा प्रश्न झाला होता.संपूर्ण कर्नाटकात रेल्वे कँटिन्स्/तिकिट तपासनीस तामिळ्/उ.प्र्.चे. अजुनही आहेत.
भेंडी
P = NP

प्रशु

राज विषयीची मळमळ ओकणारा अजुन एक भिकार लेख... गेले काहि दिवस मिपा वर हे असल्या लेखांची मालिका सुरु आहे...

चालु द्या...

समीरसूर

लेख राजविषयी मळमळ ओकतोय असे वाटले नाही. आधी आपल्यात काय दोष आहेत हे तपासून, त्यांचे निराकरण करून मग आपण मैदानात उतरलो तर जिंकण्याच्या शक्यता कैकपटीने वाढतात. मराठी माणसातले दोष (आळशीपणा, अकारण माज, मुजोरी, काम न करण्याची वृत्ती, शब्द न पाळण्याची वृत्ती इ.) ठळक करून दाखवणारा हा लेख होता असे मला वाटते.

शिवसेना काय किंवा मनसे काय, या सगळ्या गोष्टींचा राजकीय लाभ करून घेण्याच्या दृष्टीने रान पेटवत आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे आणि त्याने जर मराठी लोकांचा आणि मराठीचा फायदा होणार असेल तर त्यात गैर काहीच नाही. पण त्यासाठी ठराविक असा कार्यक्रम हवा आणि तो कार्यक्रम परिणामकारकरीत्या राबविण्याची इच्छा आणि तळमळ हवी जी आजकालच्या राजकीय पक्षांमध्ये दिसून येत नाही. क्षुल्लक गोष्टींवर मारझोड करून प्रश्न सुटण्यासारखे नाहीत.

--समीर

प्रशु

विनोदी प्रतिक्रिया...

वरील लेखात मायकल ज्यक्सन चा उल्लेख आहे. पण प्रश्नकर्तांना एका गोष्टीचा विसर पडला आहे कि ज्या राज ने मायकलला येथे आणुन नाचवले त्याच राज ने लता मंगेशकर संगीत रजनी पण सादर केली होती. मनसे स्थापन झाल्यावर शिव तिर्थांवर मराठी पुस्तक प्रदर्शन भरवले होते....

क्षुल्लक गोष्टींवर मारझोड करून प्रश्न खरच सुटत नाहित पण मनसे प्रथम कायदेशिर पाठपुरावा करते आणि सांगुन ए॑कत नाहीत हे पाहुन मगच कानफाटात मारते... (उदा. अबु, मोबाईल कंपन्या )

Dipankar

जेवढे राज च्या मराठी माणसाला डावलले जाते हा आरोप खरा आहे तेवढाच मराठी माणूसही याला जबाबदार आहे, मराठी माणसाला डावलले जाते कारण त्याचा हातात आर्थिक नाड्या नाहीत. जेव्हा मराठी माणूस नोकरीच्या मानासिकतेतून, एका सुरक्षित कोशातून बाहेर येईल तेव्हाच त्याला कोणी डावलू शकणार नाही

भैयांमुळे खरा प्रॉब्लेम तेव्हा जेव्हा निर्माण झाला जेव्हा मुंबईतल्या भैया नेतेमंडळींनी त्याचा पध्दतशीर राजकिय फायदा उठवायला सुरवात केली.
मुंबईत दाक्षिणात्य/गुजराती मंडळीही बरीच आहेत पण त्यांच्या त्यांच्या धार्मिक उत्सवात (अय्यपास्वामींचा उत्स्व/नवरात्र गरबा .इ.इ.) त्यांच्या प्रदेशातील कुणा राजकीय नेत्याला त्यांनी बोलवल्याचे ऐकले नाही.किंवा तसे झालेही असले तरी त्याच्या दखल घेण्याजोगा इतपत त्यांचा सहभाग नव्हता.
पण भैयांनी छटपुजेसाठी लालु/मुलायम सारखी नासक्या मानसिकतेचे नेतेमंडळी बोलावली आणि मग ह्या मंडळींना आताच थांबविले नाही तर उद्या काय परिस्थिती ओढवेल ह्याचा साक्षात्कार मराठी हौश्या गवश्या नेत्यांना झाला.
बिहार युपी सारखे राजकारण महाराष्ट्रात शिरले तर महाराष्ट्र ही मागासलेपणात त्या प्रदेशांच्या पंक्तित जाऊन बसेल.
बाकी राज ठाकरेंबद्दल अपेक्षा तर आहेत.
(किणी प्रकरण पुन्हा उपटले नाही म्हणजे मिळविली.)
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

विसोबा खेचर

वास्तविक मुंबईची आर्थिक सत्ता युपी, बिहारी लोकांपेक्षा इतर अमराठी लोकांच्या हाती आहे. हे अमराठी म्हणजे गुजराती, मारवाडी, पंजाबी, सिंधी आहेत काही प्रमाणात दाक्षिणात्य आहेत. पण यांना विरोध करण्याची आपली छाती नाही. म्हणून युपी व बिहारी लोकांना लक्ष्य केले जाते. वास्तविक या श्रीमंत परप्रांतीयांपुढे मराठी माणूस दबतो.

खरं आहे..!

बरे मराठी मंडळींना उद्योग करण्यापासून कुणीच रोखलेले नाही. पण ती मानसिकताच मराठी माणसात रूजलेली नाही.

हे मात्र खरं!

पण बाजारचा नियम असा आहे, की ज्याचा पैसा असतो, त्याचीच भाषा बोलावी लागते. मुंबईवर वर्चस्व ज्या परप्रांतीयांचे आहे, त्यांचीच भाषा बोलावी लागते. शेअर बाजार, बांधकाम क्षेत्र यात गुजराथी, मारवाडी लोकांचे प्राबल्य आहे. बॉलीवूडमध्ये पंजाबी आहेत. इतर ठिकाणी राजस्थानी आहेत. या सर्वांची मिळून बनलेली बंबईय्या हिंदी हिच बोलायची भाषा रहाणार. या सर्व व्यवसायांत मराठी माणसाचे वर्चस्व असते तर सर्वांनीच मराठी शिकली असती. पण तसे घडणे नाही.

सहमत आहे..

मराठी संस्कृती टिकविण्यसाठी आणि ती इतरांनी आत्मसात करण्यासाठी केवळ सांस्कृतिक आंदोलने करून चालत नाही. त्यासाठी परिस्थितीवर वर्चस्व लागते.

अगदी खरं!

ज्या राज ठाकरेंनी म्हटले आहे, की मुंबईत रहाणार्यांनी मराठी संस्कृतीशी आपुलकी दाखवली पाहिजे, त्याच राज ठाकरेंनी मुंबईत असताना शिवउद्योग सेनेच्या प्रमोशनसाठी मायकल जॅक्सनला आणून नाचवले होते. त्यावेळी 'मराठी संस्कृती' कुणाच्या घरी पाणी भरत होती?

रास्त सवाल..

भोचकगुरुजी, लेख आवडला..

मराठी माणसाने आत्मपरिक्षण करावे.. त्याला प्रगती करायला कुणीही रोखलेले नाही..

(मराठी) तात्या.

II विकास II

>>मराठी माणसाने आत्मपरिक्षण करावे.. त्याला प्रगती करायला कुणीही रोखलेले नाही..
अगदी बरोबर.
उगाच भांडायचे म्हणुन भाडांयचे आणि जेव्हा वेळ येते तेव्हा शेपुट घालुन पळुन झाले सोडायला हवे.