जनातलं, मनातलं
विडंबनासंबंधी निवेदन
Primary tabs
मि.पा. वर चालू असलेले विडंबनसत्र आता बर्याचवेळा विटंबनसत्र होते की काय असे वाटू लागले आहे!
आणि त्यावरील वेगवेगळ्या प्रकाराचे चर्वितचर्वण वाचून मला उबगल्यासारखे झाले आहे.
तेव्हा माझ्यापुरते एक बंधन मी घालून घेतो आहे की कोणत्याही अभंगाचे वा देवाच्या गाण्याचे विडंबन मी करणार नाही व तशा कुठल्याही विडंबनांना चांगला/वाईट प्रतिसादही देणार नाही.
चतुरंग
प्रत्येकाची श्रद्धा अभंगात किंवा देवाच्या गाण्यात असेलच असे नाही.
माझ्या सारखे काही लोक भट, विंदा वगैरे लोकांच्या रचनांची देखील भावभक्तीने पारायणे करतो.
तेव्हा स्वतःवर बंधनेच घालून घेणार असाल, तर आमच्या भावनांची देखील पर्वा करावी, ही विनंती.
तोवर आम्ही "घालून लोटांगण वर करी ढुं**" म्हणतो, चालीत.
- सर्किट
पण ते उत्तम असेल तर मला वर्ज्य नाही कारण अभंग/देवाची गाणी ह्यातल्या भावना ते लिहिणारी संत मंडळी आणि गज़ला ह्यात मी फरक करतो.
बाकी तुमचं ते "घालून लोटांगण वर करी ढुं**" चालू दे!!
चतुरंग
कारण अभंग/देवाची गाणी ह्यातल्या भावना ते लिहिणारी संत मंडळी आणि गज़ला ह्यात मी फरक करतो.
हम्म! हे मात्र पटले...!
इव्हन, उद्या कुणी उठून जर बाबूजींच्या,
'दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगति पुत्र मनवाचा'
या अत्यंत उच्च दर्जा असलेल्या गाण्याचे जर काही वायफळ विडंबन करू लागला तर मलाही ते सहन होणार नाही!
असो, गेल्या काही दिवसांपासून मिपावरील विडंबनाचं गळू खूप सुजलं होतं. या चर्चाप्रस्तावाच्या निमित्ताने रंगाने त्या गळवाला सुई लावलीन हे एका अर्थी बरंच झालं! आता मिपावरील मंडळींचे याला काय नी कसे प्रतिसाद येतात, त्या प्रतिसादांतील एकंदरीत सूर कसा आहे हे पाहून मिपावर केले गेलेले विडंबन तसेच ठेवायचे की अप्रकाशित करायचे यावर जनरल डायर काय तो निर्णय घेतीलच!
अर्थात, मिपावरील मंडळींचे या विषयावरील एकंदरीत सारासार मत लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला जाईल!
तात्या.
एकसाथ पेले भरता, दोष ना कुणाचा
सुराधीन आहे जगती, पुत्रमानवाचा
पण हे गाणे गदिमांनी लिहिलेले आहे. आता अपमान त्यांचा झाला की बाबूजींचा ?
- सर्किट
हे वाचून गदिमांनी हा विषय, पेले भरणे, ढोसणे, सुराधीनता इ. इ. त्यांच्या रचनांमधून/विडंबनांतून किती वेळा चघळले आहे, याची सांख्यिकीय तपासणी करायचा मोह झाला.
(संख्याशास्त्री)बेसनलाडू
मुळात गदिमांनी विडंबने केली आहेत का ? माझ्या तरी वाचण्यात नाहीत.
तुमचे सांख्यिकीचे अर्धे काम तर निपटले.
- सर्किट
कान्ट से! त्याकरता मला विडंबन पूर्ण वाचावं लागेल. शिवाय मूळ गाणंही गदिमांचंच आहे तेव्हा त्यांना त्याच गाण्याच्या विडंबनाचाही अधिकार आहे असं मला वाटतं! आणि मुळात त्याकरता,
जरा मरण यातून सुटला कोण प्राणिजात,
दु:खमुक्त जगला कुणी जीवनात
वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा!
यासारख्या ओळी लिहायची विडंबनकाराची ताकद हवी, आणि ती गदिमांची होती! तेव्हा त्यांच्याच गाण्याचं विडंबन जर गदीमांनी केलं तर तो त्यांचा अधिकार आहे असं मला वाटतं, परंतु उद्या खुद्द गदिमांनी जरी 'गर्जा जयजयकार क्रांतीचा' या कुसुमाग्रजांच्या कवितेचं काही वायफळ विडंबन केलं तरी ते मला खटकेलच!
आणि मी बाबूजींचा अपमान होतो आहे असं कुठेही म्हटलेलं नाही! आपण कृपया माझे प्रतिसाद नीट वाचत जावे ही विनंती...
तात्या.
यासारख्या ओळी लिहायची विडंबनकाराची ताकद हवी, आणि ती गदिमांची होती!
हेच तर म्हणतो. विडंबनकाराची ताकद असती तर त्याने विडंबने का केली असती ? अशा ताकदवान ओळीच लिहिल्या असत्या की !
तेव्हा त्यांच्याच गाण्याचं विडंबन जर गदीमांनी केलं तर तो त्यांचा अधिकार आहे असं मला वाटतं
म्हणजे, फक्त स्वतःच्याच कवितांचे/गझलांचे/अभंगांचे विडंबन करावे, असे तुमचे म्हणणे आहे का ?
परंतु उद्या खुद्द गदिमांनी जरी 'गर्जा जयजयकार क्रांतीचा' या कुसुमाग्रजांच्या कवितेचं काही वायफळ विडंबन केलं तरी ते मला खटकेलच!
केशवसुतांच्या "आम्ही कोण म्हणूनी.." चे अत्र्यांनी केलेले विडंबनही तुम्हाला वायफळ वाटते का ? की फक्त अत्रे इतरही काही लिहायचे, म्हणून ते विडंबन चांगले ?
- सर्किट
मि.पा. वर चालू असलेले विडंबनसत्र आता बर्याचवेळा विटंबनसत्र होते की काय असे वाटू लागले आहे!
आणि त्यावरील वेगवेगळ्या प्रकाराचे चर्वितचर्वण वाचून मला उबगल्यासारखे झाले आहे.
अगदी खरे बोललात... मलाही असेच झाले आहे. आणि आपल्या निर्णयाचा मी आदर करते.
- (सर्वव्यापी)प्राजु
आम्हाला आपल्या भावनांची कदर आहे.
पण मग तुम्ही पण भट, विंदा वगैरे लोकांच्या रचनांची विडंबने करू आणि वाचू नका. वाचलात तर प्रतिसाद देऊ नका.
तोपर्यंत आम्ही पण "भिजूनी पाण्यात सार्या बो* माझा कोरडा" असे म्हणतो चालीत.
पुण्याचे पेशवे
माझ्या सारखे काही लोक भट, विंदा वगैरे लोकांच्या रचनांची देखील भावभक्तीने पारायणे करतो.
हे पटले.
सन्जोप राव
संजू,
तुला पटणारच !
वेगळे काहीतरी असेल तर सांग !
- सर्किट
का कुणास ठाऊक, पण (जर तरी) बरे वाटले :)
(वाचक)बेसनलाडू
स्पष्ट समजतील अशा दिल्यात तर आभारी होईन - असे तळ्यात - मळ्यात, का कुणास ठाऊक, पण फार घातक वाटते हो!!
चतुरंग
मि.पा. वर चालू असलेले विडंबनसत्र आता बर्याचवेळा विटंबनसत्र होते की काय असे वाटू लागले आहे!
आणि त्यावरील वेगवेगळ्या प्रकाराचे चर्वितचर्वण वाचून मला उबगल्यासारखे झाले आहे.
--- सहमत आहे. येथे कोणीतरी समदु:खी भेटल्याचे/ने बरे वाटले.
तेव्हा माझ्यापुरते एक बंधन मी घालून घेतो आहे की कोणत्याही अभंगाचे वा देवाच्या गाण्याचे विडंबन मी करणार नाही व तशा कुठल्याही विडंबनांना चांगला/वाईट प्रतिसादही देणार नाही.
--- हे वाचूनही बरे वाटले.
म्हणूनच एकूण निवेदन वाचून ((प्राप्त परिस्थिती कशीही असली तरी) जरा तरी)बरे वाटले, असे म्हटले.
(स्पष्टीकारक)बेसनलाडू
आधीच्या प्रतिसादातल्या 'जर तरी' मधे तो 'जरा तरी' होता हे मला समजले नाही आणि म्हणून विचारले.
धन्यवाद!!
चतुरंग
चुकीबद्दल क्षमस्व.
(हलगर्जी)बेसनलाडू
की कोणत्याही अभंगाचे वा देवाच्या गाण्याचे विडंबन मी करणार नाही व तशा कुठल्याही विडंबनांना चांगला/वाईट प्रतिसादही देणार नाही.
मी ही हेच म्हणू पाहतो! परंतु अद्याप नक्की नाही! :)
बाकी, रंगाचं निवेदन पाहून थोडासा विचारात पडलो आहे!
तात्या.
तात्या काय हे? विडंबना सारखा आमच्या जीव्हाळ्याच्या विषयावर चक्क तुम्ही बंदी आणायची भाषा करता आहात?
(व्यथित) कारकुन
योग्य विडंबनांनाही इतके पटापट प्रतिसाद येत नाहीत पण इथे चर्चा मात्र कशी घसरवत न्यायची त्याला फाटे कसे फोडायचे बघण्यासारखे आहे!
का कोण जाणे पण वैफल्यग्रस्त मनोवृत्तीचे निदर्शक आहे की काय असे वाटते.
चतुरंग
अहो, चर्चा म्हटले की हे होणारच. स्वानुभवावरून सांगतो !
असे वाईट नका वाटून घेऊ बुवा.
सार्वजनिक संकेतस्थळावर वावरण्यासाठी गेंड्याची कातडी लागते.
:-)
- सर्किट
अजूनही मिपावर आणिबाणी सुरू आहे, त्यामुळे विडंबनांच्या बाबतीत जनरल डायर काय घ्यायच तो निर्णय घेतीलच! :)
तात्या.
अहो मग कशाला टाकता ह्या चर्चा इथे? नाही आवडत तर नका लिहू ना विडंबने!त्याचा डंका का पिटताय?
--(व्यथित) कारकुन
या विषयाला हात घातल्याबद्दल चतुरंगांचे आभार.
मी मिपाचा नव्यातला सदस्य आहे..आणि कवितांमधे जास्त स्वारस्य असलेला.
परंतु, गेले काही दिवस विडंबनाच्या अतिरेकामुळे अक्षरशः उबग आला आहे. (उबग येण्याच्या पुढच्या परिस्थितीला काय म्हणतात ते माहीत नाही..).
कशाचे आणि कसे विडंबन करावे यावर कोणी काही बंधने (स्वतःवर अथवा दुसर्यावर) - घालोत वा न घालोत, पण कवितांचे वाचन बंद करून मी माझ्यापुरता प्रश्न सोडविला आहे. कविता वाईटच आहेत असे मी म्हणत नाही, मीही काही कविता आवडल्याचे प्रतिसाद दिले आहेत, पण अशा कवितांचा अतिरेक मात्र निश्चितच झाला आहे, आणि "जे न देखे..." मधले वैविध्य नष्ट झाले आहे.
(वि.सू. : कोणत्याही विडंबनकारास दुखावण्याचा हेतू नाही..)
पण कवितांचे वाचन बंद करून मी माझ्यापुरता प्रश्न सोडविला आहे.
हा अगदी अचूक निर्णय. कुणी काय लिहावे किंवा लिहू नये, ह्याबद्दल उपदेशामृत पाजण्यापेक्षा, स्वतः काय वाचावे अगर वाचू नये, हा निर्णय घेण्याइतपत येथील सदस्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे, असे वाटते.
- सर्किट
अचूक निर्णय. मीही असेच प्रश्न सोडवतो!
डायर साहेबांना जर बंदीच घालायची आहे आणि ती सदस्यांच्या आवडी निवडीवर आधारीत आणायची आहे तर मला, हिंदुत्ववादी/सनातनी, ज्योतिष, तंत्र मंत्र स्तोत्र, भाकड अंधश्रद्धा आणि चारोळ्या असल्या लिखाणावर विडंबनांआधी बंदी आणलेली आवडेल.
(बिल्ला क्र. २१) कोलबेर
मिपा वर आणि लेखननियंत्रण?
मला वाटत होतं की मिपा चा जन्मच मुळी अशा प्रकारच्या नियंत्रणांविरुद्ध बंडखोरी म्हणून झाला होता...
कुणी काय लिहावे किंवा लिहू नये, ह्याबद्दल उपदेशामृत पाजण्यापेक्षा, स्वतः काय वाचावे अगर वाचू नये, हा निर्णय घेण्याइतपत येथील सदस्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे, असे वाटते.
संपूर्ण सहमत!
डायर साहेबांना जर बंदीच घालायची आहे आणि ती सदस्यांच्या आवडी निवडीवर आधारीत आणायची आहे तर मला, हिंदुत्ववादी/सनातनी, ज्योतिष, तंत्र मंत्र स्तोत्र, भाकड अंधश्रद्धा आणि चारोळ्या असल्या लिखाणावर विडंबनांआधी बंदी आणलेली आवडेल.
भावनांशी सहमत, पण त्याची जरूर आहे असे वाटत नाही!!
अर्थात, मिपावरील मंडळींचे या विषयावरील एकंदरीत सारासार मत लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला जाईल!
संपादकांनी वरील वाक्य म्हटल्यामुळेच आम्ही आमचे विचार इथे मांडत आहोत (नाहीतर या साठमारीत शिरण्याची आमची छाती नाही!!!!:))
विडंबन हा एक मान्यताप्राप्त साहित्यप्रकार आहे. कवीने कोणत्या काव्याचे विडंबन करावे आणि कोणत्या नाही हे ठरवण्याचा वाचकांना अधिकार आहे असे मला वाटत नाही. वाचकांना असे लिखाण न वाचण्याचा वा त्या लिखाणावर त्यांची अनुकूल/ प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा जरूर अधिकार आहे.
व्यक्तिगत टीका किंवा भांडणे चालू असतील तर संपादक मंडळाने जरूर हस्तक्षेप करावा. कोणी जर संकेतस्थळाच्या नियमांचे उल्लंघन करीत असेल (कॉपीराईट वगैरे) तर जरूर लेखकाला समज द्यावी पण विषयाच्या/ लेखनाच्या प्रकाराच्या निवडीत हस्तक्षेप करू नये असे मला वाटते. जर विषय वा केलेले लिखाण फालतू असेल तर त्याचा प्रतिक्रियेतून समाचार घ्यायला सभासद समर्थ आहेतच की!! :)))
मिपा चा सभासदवर्ग हा विस्तृत आहे त्यामुळे इथे वेगवेगळ्या विचारांची/ स्वभावांची माणसे येणार हे सहाजिकच आहे. सर्वांना सर्वच विषय/ लेखनप्रकार आवडतील असे मुळीच नाही. तेंव्हा आपल्याला जे रुचते ते वाचावे/ लिहावे, त्यावर प्रतिक्रिया द्यावी हे उत्तम!! आम्हाला खादाडी करायला आवडते पण पाककलेतील काही शष्प कळत नाही. तरीसुद्धा मामलेदाराच्या मिसळीची अचूक रेसेपी मिळाल्याबद्दल त्या लेखकांचे (स्वाती राजेश आणि पेठकरबुवा) आम्ही अनंत आभारी आहोत. मन जरा मोकळं ठेवलं की असे अनेक अनाहूत लाभ होतात...
मिपा वर काय विषयावर लिखाण होतं आणि काय लेखनप्रकार हाताळले जातात यापेक्षा मिपावर अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे ही आम्हाला सर्वात आवडणारी गोष्ट आहे. आता अभिव्यक्तिस्वातंत्र्य असलं की त्याचा थोडाफार डावा-उजवा उपयोग केला जातोच. पण त्याविरुद्ध उपाय म्हणून एखाद्या विषयावर किंवा साहित्यप्रकारावर बहिष्कार टाकायचा ही भूमिका पटू शकत नाही. विशेषतः विडंबन हे अतिप्रसिध्द साहित्याचंच होतं. हे विडंबन आहे हे माहिती व्हायला वाचकांना मूळ साहित्यकृती माहिती असणे आवश्यक असते. अप्रसिद्ध साहित्याचे विडंबन करण्यात काहीच अर्थ नसतो. त्यामुळे प्रसिध्द गाणी/ कविता, अभंग/ओव्या यांचे विडंबनच प्रामुख्याने होणार! आता सेन्सेटिव्ह व्यक्ती त्यामुळे नाराज होण्याची शक्यता आम्ही नाकारीत नाही, पण त्यांच्यापुढे अशा प्रकारचे लेखन न वाचण्याचा पर्याय असतो. आणि ही सेंन्सिटिव्हिटी कालानुरूप बदलत असते. "आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेतही न वाली" हे काव्य रविकिरणमंडळाच्या काळात अनेकांना धक्का देउन गेलेच असते...
असो. मिपा बद्दल आमच्या मनात आत्मियता व कौतुक आहे ते त्याने केलेल्या प्रस्थापितांविरुद्धच्या बंडखोरीबद्दल आणि येथील अभिव्यक्तिस्वातंत्र्याबद्दल! त्यामुळे आम्ही इतर कुठेही न लिहिता फक्त मिपावर लिहितो. म्हणून रहावले नाही आणि चार शब्द लिहिले. बाकी सर्व संपादकमंडळाच्या आणि मालकांच्या हाती! अधिकउणे लिहिले गेले असेल तर क्षमा असावी.
-पिवळा डांबिस
सर्कीट साहेब आणी सर्व विडंबन समर्थक, त्या जोनी लिव्हर नावाच्या आचरट माकडान मागे एकदा राष्त्रगितावर नृत्य केले होते त्याविशयी आपले मत काय? उद्या इथे कोणि जन गण मन चे विडंबन केलेतर तुम्ही त्याचे स्वागतच करनार का? उत्तराचि वाट पहात आहे.
नक्कीच. तो त्याचा अधिकार आहे !
(आता, जन गण मन चे विडंबन प्रकाशित करणार, नक्कीच. सर्व माकडांनी आपापल्या शेपट्या आवश्यक ठिकाणी घालाव्यात, ही विनंती.)
- सर्किट
ते विडंबन प्रकाशित करू देणार का/मिपावर राहू देणार का, याची उत्सुकता राहील. त्यावरून मिपाचे विडंबनविषयक धोरणही (हळूहळू)स्पष्ट होईल(च!)
(उत्सुक)बेसनलाडू
आपले तिरके प्रतिसाद कितीही आले, तरी आम्ही ते इथे टाकणारच, बेला !
आमच्या नावाखाली टाकणार, इतरांच्या नव्हे !
त्याची पूर्ण जबाबदारीही आमचीच, इतरांच्या टोपणनावाखाली नाही ते आम्ही ढकलणार.
शेपट्या घालणारे माउली भक्त आम्ही नाही !
- सर्किट
आम्ही फक्त काय होईल, काय नाही याबद्दल जास्त उत्सुक. धोरणांबद्दल उत्सुक. विडंबनाबद्दल कमी किंवा नल्. कुणी सांगावे, कदाचित एखादे जबरा टाकालही, जेणेकरून आपल्या पुढच्या कलाकृतींची उत्सुकता वाढेल. आपल्या हातचे असे काही वाचले नाही ना अजून! बाकी चालू द्यात तुमचे.
(उत्सुक)बेसनलाडू
आमच्या मताला फारशी किंमत नाही हे आम्ही जाणून आहोत म्हणून आमच्या पुढील संभाव्यतः प्रक्षोभक वाक्यावरून गदारोळ होवू नये.
जन, गण, मन हेच विडंबन आहे असे आमचे मत आहे.
व्यंकट
व्य॑कोबा,
आपल्याशी सहमत. राजा जॉर्ज च्या स्तुतीप्रित्यर्थ हे गायले (भारतभाग्यविधाता) अस॑ वाचल्याच॑ स्मरत॑.
असो, पुन्हा ह्यावर वाद होतील. सध्या वातावरण बिघडल॑ आहे !
आपला,
-(सहमत) ध मा ल.
>>राजा जॉर्ज च्या स्तुतीप्रित्यर्थ हे गायले (भारतभाग्यविधाता) अस॑ वाचल्याच॑ स्मरत॑. <<
ही नविन माहिती ..
मिपा वर काय विषयावर लिखाण होतं आणि काय लेखनप्रकार हाताळले जातात यापेक्षा मिपावर अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे ही आम्हाला सर्वात आवडणारी गोष्ट आहे. आता अभिव्यक्तिस्वातंत्र्य असलं की त्याचा थोडाफार डावा-उजवा उपयोग केला जातोच. पण त्याविरुद्ध उपाय म्हणून एखाद्या विषयावर किंवा साहित्यप्रकारावर बहिष्कार टाकायचा ही भूमिका पटू शकत नाही. विशेषतः विडंबन हे अतिप्रसिध्द साहित्याचंच होतं. हे विडंबन आहे हे माहिती व्हायला वाचकांना मूळ साहित्यकृती माहिती असणे आवश्यक असते. अप्रसिद्ध साहित्याचे विडंबन करण्यात काहीच अर्थ नसतो. त्यामुळे प्रसिध्द गाणी/ कविता, अभंग/ओव्या यांचे विडंबनच प्रामुख्याने होणार!
डांबीसरावांशी ह्या बाबतीत सहमत आहे.
मि.पा. वर चालू असलेले विडंबनसत्र आता बर्याचवेळा विटंबनसत्र होते की काय असे वाटू लागले आहे!
रंगरावांशी ह्या बाबतीत सहमत आहे. ह्यातला विटंबनसत्र हा शब्द महत्वाचा.
आता माझे मतः
विडंबन कुणी करावे,का करावे,कशाचे करावे आणि कसे करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्यात एक किमान दर्जा असावा अशी अपेक्षा मी एक वाचक म्हणून करतो. तसेच घेतले एखादे गीत,कविता,अभंग वगैरे वगैर आणि पँटमध्ये शर्ट खोचावा त्या पद्धतीने त्यात बाई,बाटली(हे फारच वाढलंय हल्ली) आणि तत्सम शब्द अधून मधून पेरले की झाले विडंबन.... असे बर्याच जणांना वाटते. क्षणभर एक गंमत म्हणून ते चालूनही जाते. पण माझ्या मते ते विडंबन नसून विटंबन(ना) असते. हातात कुंचला आणि काळ्या रंगाचा डबा आहे आणि दिसेल तिथे तो रंग फासायचा... अशा तर्हेचा अट्टाहास वाटतो त्यामागे.
तेव्हा समस्त प्रतिभावंतांना माझी विनंती आहे की.... विडंबन आपण जरूर करा. त्यात दारू,बाई वगैरे विषय वर्ज्य नाहीत. पण दळण दळल्यासारखे प्रत्येक विडंबनात तीच तीच रुपके वापरू नका. त्यात खरे तर तुमचेच कल्पनादारिद्र्य दिसून येते. म्हणून त्यात वैविध्य आणा आणि मुख्य म्हणजे विडंबनात कुठेही वैयक्तिक आकस,दुस्वास,शेरेबाजी असल्या गोष्टी येऊ देऊ नका.
इथल्या समस्त विडंबनकारांनी हे आव्हान ताकतीने पेलावे असे मी त्यांना आवाहन करतो.
तेव्हा समस्त प्रतिभावंतांना माझी विनंती आहे की.... विडंबन आपण जरूर करा. त्यात दारू,बाई वगैरे विषय वर्ज्य नाहीत. पण दळण दळल्यासारखे प्रत्येक विडंबनात तीच तीच रुपके वापरू नका. त्यात खरे तर तुमचेच कल्पनादारिद्र्य दिसून येते. म्हणून त्यात वैविध्य आणा आणि मुख्य म्हणजे विडंबनात कुठेही वैयक्तिक आकस,दुस्वास,शेरेबाजी असल्या गोष्टी येऊ देऊ नका.
प्रमोदकाका,
हे म्हणणे तुमचे एकदम पटले... पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी.
- (सर्वव्यापी)प्राजु
पण दळण दळल्यासारखे प्रत्येक विडंबनात तीच तीच रुपके वापरू नका.
प्राजुताई तुम्ही काही बोलु नका. मध्यंतरी दळण दळल्या सारखं तुम्ही देखिल चारोळ्या टाकल्या होत्यात तेव्हा सगळयांच्या टिकेमुळे मलापण माझे लिखाण थांबवावे लागले. मला खरं तर चारोळ्या लिहायला खुप आवडत पण त्यामुळे लिहु शकलो नाही ना. प्रामाणीकपणे सांगतो आहे कृपया राग मानु नका.
प्राजुताई तुम्ही काही बोलु नका.
मी बोलायचं की नाही हे तुम्ही नका ठरवू. तुम्हांला जे जमतं ते करा.
मध्यंतरी दळण दळल्या सारखं तुम्ही देखिल चारोळ्या टाकल्या होत्यात तेव्हा सगळयांच्या टिकेमुळे मलापण माझे लिखाण थांबवावे लागले. मला खरं तर चारोळ्या लिहायला खुप आवडत पण त्यामुळे लिहु शकलो नाही ना.
माफ करा.. पण मी त्या एकटिने नव्हत्या टाकल्या, मिपावरचे बरेच लोक होते इथे आणि मुख्य म्हणजे त्यामध्ये एकच विषय नव्हता. तेव्हा सगळ्यांनी टिका केली असे कोणी सांगितले तुम्हाला? तेव्हा काय झाले हे माहिती नसेल तर तुम्हांला बोलण्याचा अधिकार नाही. आणि जमल्यास तो धागा काढून वाचा आणि तुम्ही लिहिलेल्या चारोळ्या आणि त्या धाग्यातील चारोळ्या यांचि तुलना करा.. म्हणजे तुम्ही कुठे आहात हे तुम्हालाच समजेल.
आणि तुमच्या चारोळ्या जर चांगल्या असत्या तर त्याला नक्की प्रतिसाद मिळाला असता.. यावरूनच तुम्हि लक्षात घ्या काय ते.
- (सर्वव्यापी)प्राजु
माफ करा प्राजुताई मी राग मानु नका म्हणुन पण तुम्ही रागावलात. पण मला सांगा चारोळ्या टाकणारे अनेकजण असले तरी विडंबन टाकणारेपण अनेकच आहेत. आणि त्यामध्ये बहुतेक वेळा प्रेम वगैरे असा एकच विषय पण होता. तसेच माझ्या चारोळीना आलेले प्रतिसाद पुन्हा बघा. प्रतिसाद आणि वाचने मिळाले होते. मि कुठे आहे ते मला माहित आहे पण तुम्ही अशी माझी जागा दाखवुन तुम्ही कुठे आहेत ते दाखवले. यापुढे मला तुमच्याशी बोलायचे नाहि.
तुमच्या या निर्णयाचा तुमच्या पेक्षा मलाच जास्ती आनंद झाला.... कीप इट अप.
- (सर्वव्यापी)प्राजु
तेव्हा माझ्यापुरते एक बंधन मी घालून घेतो आहे की कोणत्याही अभंगाचे वा देवाच्या गाण्याचे विडंबन मी करणार नाही व तशा कुठल्याही विडंबनांना चांगला/वाईट प्रतिसादही देणार नाही.
मात्र चांगला/वाइट प्रतिसाद लिहिण्याचे शहाणपण सुदैवाने येथील वाचकाजवळ आहे, ज्याचा त्याचा निर्णय ज्याने त्याने घ्यावा. आम्ही आम्हाला आवडणार्या विडंबनांना विषय कोणतेही असले तरी दाद देत राहू .
कुणी काय लिहावे किंवा लिहू नये, ह्याबद्दल उपदेशामृत पाजण्यापेक्षा, स्वतः काय वाचावे अगर वाचू नये, हा निर्णय घेण्याइतपत येथील सदस्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे, असे वाटते.
सहमत आहे.
मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर कोणत्याही लेखनावर बंदीचा विचार येणार नाही, किंवा असे लेखन अप्रकाशित होणार नाही, याची आम्हास पुर्ण खात्री आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर कोणत्याही लेखनावर बंदीचा विचार येणार नाही, याची आम्हास पुर्ण खात्री आहे.
आपण प्राडॉ डायर आहात का ?
- (अचंभित) सर्किट
आपण प्राडॉ डायर आहात का ?
नाही, आम्ही येथे आपल्यासारखेच एक वाचक आहोत. वाचक म्हणुन अशा लेखनावर बंदी किंवा असे लेखन अप्रकाशित होऊ नये असे वाटते.
( आपण कामात असता त्याचा आम्हाला आनंद असतो. आपण हे असे रिकामे झाले की आम्हाला आपल्याला प्रत्येक शब्दा शब्दाचे स्पष्टीकरण द्यावे लागते. )
सर मी पण तुम्हाला संपादक समजत होतो तुम्ही जर फक्त वाचक आहे म्हणता आहात तर इतक्या ठोसपणे हे कसे म्हणालात?
मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर कोणत्याही लेखनावर बंदीचा विचार येणार नाही, किंवा असे लेखन अप्रकाशित होणार नाही, याची आम्हास पुर्ण खात्री आहे.
सर,
कोणत्याही प्रकारच्या लेखनावर बंदी येणार नाही म्हणालात; पण आध्यात्मिक लेखन किंवा त्याच्या माध्यमातून पसरवले जाणारे (गैर)समज, (अंध)श्रद्धा, चमत्कार याबाबत अंतिम निर्णय डायर साहेबांचा असेल, असे जाहीर झाले आहे ना इकडेच? काय वाचावे, काय वाचू नये हे ठरवायचा वाचकांना अधिकार आहे, तर आध्यात्मिक गुरूंना बापड्यांन लिहऊ देत की. त्यावर बंदीची भाषा, पूर्वभाष्य अगर त्याची अंमलबजावणी कशासाठी? वाचायचे अगर नाही, मुद्दे खोडायचे की उचलून धरायचे हे सगळे सहभागी वाचक बघून घेतीलच ना?
(मुद्देसूद)बेसनलाडू
त्यावर बंदीची भाषा, पूर्वभाष्य अगर त्याची अंमलबजावणी कशासाठी? वाचायचे अगर नाही, मुद्दे खोडायचे की उचलून धरायचे हे सगळे सहभागी वाचक बघून घेतीलच ना?
आणीबाणीसदृष परिस्थितीत प्रश्न विचारायचे नसतात अशी आमची माहिती आहे! बाय द वे, जनरल डायर आत्ता या क्षणी काल रात्री चिक्कार उसाचा रस प्यायल्यामुळे गाढ झोपले आहेत! :) ते उठल्यावर तुमचे हे प्रश्न इथे शिल्लक राहतील किंवा नाही या बाबत आम्ही साशंक आहोत! :)
बाकी चालू द्या! :)
तात्या.
जनरल डायर आणि उसाचा रस? च्यायला वाया गेले म्हणायचे म्हणजे ;)
(कर्नल)बेसनलाडू
बाय द वे, जनरल डायर आत्ता या क्षणी काल रात्री चिक्कार उसाचा रस प्यायल्यामुळे गाढ झोपले आहेत!
:)))))))))))))))))))))
मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर कोणत्याही लेखनावर बंदीचा विचार येणार नाही, किंवा असे लेखन अप्रकाशित होणार नाही, याची आम्हास पुर्ण खात्री आहे.
मिसळपावाच्या मालकांविषयी वैयक्तिक टिप्प्णी करणारा एक तुकडा इथे वाचला होता. तो आता दिसत नाही, हे कसे काय ,प्राध्यापक डॉक्टरसाहेब?
सन्जोप राव
.
खरे तर अजिबात तोंड घालायची इच्छा नव्हती; कारण आम्ही विडंबने वाचायची तर सोडलीच आहेत इव्हन त्यावर गप्पा मारण्याचे पण सोडले आहे. या अशा कविता पडल्या पडल्या दुसर्या मिनिटाला होणार्या विडंबनांची तुलना मी रेल्वे स्टेशन वर मिळनार्या पिवळ्या पुस्तंकाशी मी करतो; रद्दी; दुर्लक्ष करण्याजोगी.
चला पण वरिल चर्चेत अनेकांचा दुटप्पीपणा दिसुन आला, एरवी विडंबन पडल्या पडल्या त्यावर लगेच "वा वा","शवटुकार तुमच्या प्रतिभेला सलाम" वैगेरे वैगेरे प्रतिसाद देणारे लोक आता वेगळी वेगळी मते मांडतांना दिसत आहेत.
एकिकडे आपण,
कारण आम्ही विडंबने वाचायची तर सोडलीच आहेत इव्हन त्यावर गप्पा मारण्याचे पण सोडले आहे.
असं म्हणता, व लगेच
एरवी विडंबन पडल्या पडल्या त्यावर लगेच "वा वा","शवटुकार तुमच्या प्रतिभेला सलाम"
विडंबनांना कुणाचे काय प्रतिसाद येतात हेही आपल्याला ठाऊक आहे याचे राहून राहून नवल वाटले! गंमतच आहे बॉ!:)
यावरून विडंबनांचे आपले वाचन कुठपर्यंत सुरू होते आणि नेमकी कुठून आपण विडंबने वाचायची सोडून दिलीत हा एक अवांतर प्रश्न आम्हाला पडला आहे! :)
असो,
आपलाच,
तात्या.
बापडा तो प्रश्न की काय तुम्हाला !!
:)))))
आपपसातील वादानेच किंवा हेव्यादाव्याने मराठेशाही बुडाली ...... याचे स्मरण असुद्या.
- शेखर
शेखरशेठ,
आपपसातील वादानेच किंवा हेव्यादाव्याने मराठेशाही बुडाली ...... याचे स्मरण असुद्या.
अगदी लाख बोललात !
हल्ली काय चालल॑य काही कळत नाही. लवकर ही परिस्थिती सुधारो हीच श्रीश॑भूचरणि प्रार्थना!
-(व्यथित) ध मा ल.
विडंबने कशी असावित, असावित का? इत्यादी मते वैयक्तिक आहेत. वाचकांनी चांगले वाईट प्रतिसाद द्यावेत. त्यातून जे राहिल ते इथल्यांना आवडते असे समजले जाईल.
बंदी वगैरे आणावी असे वाटत नाही. चतुरंग यांनी सुद्धा असे काही सुचवले नाही हे चांगलेच.
--लिखाळ.
सामर्थ्य आहे बडबडीचे जो जो करील तयाचे - पुल.
काय चाल्लंय्...चारोळ्याही आपण सगळ्यांनी एन्जॉय केल्या आणि बरीचशी विडंबनंही आपल्याला आवडली...थोडी अतिशयोक्ति झाली असेल तर होईल कमी आपोआप कुणी प्रतिसाद दिले नाहीत तर्..जी छान विडंबन असतील ती वाचूया बाकीची सोडून देऊ....सुशील तुम्हालाही आवडत होतं चारोळ्या लिहायला आणि तिथे लिहावसं वाटत नव्हतं तर वेगळा धागा उघडायचा माझ्या वेगळ्या चारोळ्या म्हणून....उगाच कशाला बोलता... आम्ही तर मस्त एन्जॉय केलं....
हल्ली काय चालल॑य काही कळत नाही. लवकर ही परिस्थिती सुधारो हीच श्रीश॑भूचरणि प्रार्थना!
धमु १००% सहमत....
अरे तुम्ही सगळे एप्रिल फुल नाही ना करत?
कालपर्यंत तर आपण सगळे धमाल करायचो मधेच काय झालं काय?
सारखी ऑफिस आणि घरची टेन्शन्स असह्य झाली की आपण इथे येतॉ जरावेळ मजा करतो कीती बरं वाट्टं..इथेही तसच असेल तर कसं वाटेल यावसं?
वरदा, तुझे प्रतिसाद वाचताना कॉलेजातली तेरावी, चौदावीतली एखादी मुलगी माझ्याशी बोलते आहे की काय असं वाटतं! :)
स्वभावातला अवखळपणा, निरागसपणा असाच राहू दे! जप त्याला नेहमी...
तात्या.
वरदा, तुझे प्रतिसाद वाचताना कॉलेजातली तेरावी, चौदावीतली एखादी मुलगी माझ्याशी बोलते आहे की काय असं वाटतं! :)
सांभाळून राहा हो !
अशा प्रतिसादांमुळे "तेराव्या चौदावीतल्या" मुलींना किती धोका आहे, हे सहज लक्षात येते !
- (खट्याळ) सर्किट
विडंबन काव्यावरील ही साधक-बाधक चर्चा अतिशय मोलाची असून ती एखाद्या पुस्तकात जतन करून ठेवली पाहिजे. ऑरकुट व इतर संकेत स्थळावरील जाणकार रसिकांसाठी सुध्दा ती उपलब्ध झाली पाहिजे म्हणून हा छोटासा प्रयत्न.
पहा. http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=28868095&tid=2591450425237531522…;...
»
प्रत्येक वाचकाचा वाचनाधिकार अबाधित आहे. विडंबनकारांवर बंदी आणू नये. वाचकांनी आपापला वाचनाधिकार वापरावा. 'मला आवडत नाही ते साहित्य वाईट' असा संकुचित एप्रोच नसावा. (हा कुणावरही वैयक्तिक शेरा नाही.)
प्रत्येक वाचकाचा वाचनाधिकार अबाधित आहे. विडंबनकारांवर बंदी आणू नये. वाचकांनी आपापला वाचनाधिकार वापरावा. 'मला आवडत नाही ते साहित्य वाईट' असा संकुचित एप्रोच नसावा. (हा कुणावरही वैयक्तिक शेरा नाही.)
» श्री. प्रभाकर पेठकर(खरं खुरं नांव वाचून आनंद झाला) यांच्या मताशी सहमत. चांगले/वाईट साहित्य असा भेद असूनही "माझ्या आवडीचे/नावडीचे" असाहि भेद नक्कीच असू शकतो.
श्री. प्रभाकर पेठकर(खरं खुरं नांव वाचून आनंद झाला)
अहो पण 'प्रभाकर पेठकर' हे नांव तरी खरंखुरं कशावरून? त्यांचं खरं नांव 'धुरंधर भाटवडेकर' असंही एखादं असू शकतं! :))
आपला,
तात्याभैय्या देवासकर.