जे न देखे रवी...

मुलीनेच का नेहमी सासरी जायचं ? - कविता

Primary tabs

एका ई-मेल मधून आलेली कविता - कवी / कवयित्री माहित नाहित.

ती एकदा आजीला म्हणाली...
मुलीनेच का गं नेहमी सासरी जायचं ?
आपली माणसं सोडून तीनेच का
परकं घर आपलं मानायचं?
तिच्याकडूनच का अपेक्षा
जूनं अस्तित्व विसरायची?
तिच्यावरच का जबरदस्ती
नवीन नाव वापरायची?
आजी म्हणाली अगं वेडे
हा तर सॄष्टीचा नियम आहे
नदी नाही का जात सागराकडे
आपलं घर सोडून!
तो येतो का कधीतरी तिच्याकडे
आपली वाट मोडून!
तीचं पाणी किती गोड... तरीही ती
सागराच्या खारट पाण्यात मिसळते
आपलं अस्तित्व विसरून ती
त्याचीच बनून जाते
एकदा सागरात विलीन झाल्यावर
तीही सागरच तर होते
पण म्हणून नेहमी तीच्यापूढेच
नतमस्तक होतात लोकं
पापं धुवायला समुद्रात नाही
गंगेतच जातत लोकं!

आजीने मुलीला किती छान शब्दात उत्तर दिले.
कविता आवडली.
पण म्हणून नेहमी तीच्यापूढेच
नतमस्तक होतात लोकं
पापं धुवायला समुद्रात नाही
गंगेतच जातत लोकं!
खरेच आहे.

मला वाटतं की ही नदी आणि सागराची उपमा ठीक आहे पण याचा अर्थ असा घ्यावा का की लग्नं झालेल्या पुरुषांना कोणीही नमस्कार करत नाही.
मला अजूनही काही प्रश्न पडले आहेत, लग्न झालं म्हणून मुलगी "बेकार"ची "गृहिणी" (housewife) का होते, मुलींनीच लग्न झाल्याची जाहिरात (मंगळसुत्र, बांगड्या घालणे इत्यादी) का करावी, नाव नाही बदललं तर काय जातं?
मुली दुसरं घरही आपलं मानतात पण पुरुष नाही बायकोच्या माहेराला स्वतःचं घर मानू शकत याचं कारण पुरुषी अहंकार (male ego) हेच असावं असं मला (माझ्या स्वतःच्या अहंकारामुळे) वाटतं.

आजच्या जगात जिथे दोघंही नोकरी-व्यवसाय करतात, कामानिमित्त दुसय्राच ठिकाणी जाउन रहातात, लग्नापूर्वी दोघांनाही स्वतःची ओळख (identity) असते त्या काळात ही कविता "इतिहास" म्हणून ठीक आहे पण सामाजिक मूल्यं शिकवण्यासाठी नाही. कविता म्हणून ठीक आहे पण विचार अगदीच मागस आणि सुमार आहेत.

संहिता

या कवितेत स्त्रीयांनीच फक्त जन्मभर त्याग करत रहावं, पुरुषांच्या ईगो पुढे झुकावं, जेणेकरून पूढे जाउन त्यांना दैवत्व दिले जाईल असा; किंवा लग्नं झालेल्या पुरुषांना कोणीही नमस्कार करत नाही असा मतितार्थ नाही असं मला स्पष्ट वाटतं.पुरूषार्थ या उक्तीत, पुरूष हा शब्द असला तरी ती काही पुरुषाची मक्तेदारी नाही हे बर्याच स्त्रीयांनी सिद्ध केले आहे. आणि खरे तर पुरूष आणि स्त्री किंवा आज काल चे पुरुष आणि स्त्री, त्यांचे ईगो आणि त्यामुळे होणारे प्रश्न या गोष्टी या कवितेमुळे पुढे येउ नयेत.
शब्दांच्या पलीकडचा अर्थ समजून घ्यावा. स्वतःकडील उत्तमोत्तम गुणधर्म इतरांना जे देऊ शकतात तेच, आजही श्रेष्ठ ठरतात, असा संदेश मला या कवितेतून मिळाला. जसे, नदी! स्वतःचे गोड पाणी समुद्राला देऊन, नदीचे गोड पाणी कधीच कमी होत नाही.
हा विचार, हा संदेश नक्कीच मागास नाही. सुमार तर नाहिच!... सनातन. हो, सनातन! नित्य नूतनः इति सनातनः. जे कधीही जूने नाही होउ शकत, नेहमी नवे असेच राहते ते सनातन. याअर्थी हा विचार सनातन आहे.
जितका अधिक समाजाशी आपण बांधिल राहू तितका, या मूल्याचा प्रत्यय, परत परत येत राहील, असे मला वाटते.

प्राजु

बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतेल्या काही ओळी..

लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते.....

बस्स!

- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

मनस्वी

बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतेल्या काही ओळी..

लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते.....

वा.. या ओळी झकासच!
पण माझ्यामते आज काळ खूप बदलला आहे. आज माहेराशी, आईबाबांशी केवढे संबंध ठेवावेत हे सर्वस्वी मुलीच्या मनावर अवलंबून आहे... हो, आज आईबाबांकडे दुर्लक्ष्य करणार्‍या मुलीदेखील आहेत. आपण बरे, आपला नवरा बरा आणि आपली मुले बरी!
आज मुलगी इतकी स्वावलंबी झाली आहे की ती स्वबळावर आईबाबांकडे पूर्ण लक्ष देउ शकते.
आणि आजचे सासरही पूर्वीइतके कडक नसते, जर द्यायचेय मुलीला आईबाबांकडे लक्ष तर कोणी तिला आडवत नाही. चांगला जावई असेल तर तोही मुलासारखा रहातो.
काहीठीकाणी नसते अशी परिस्थिती. पण अंतिमदर्शी सर्व मुलीच्याच मनावर असते.

विजुभाऊ

मला प्रश्न पडतो :लग्नापूर्वी खूप काही तरी करत असणार्‍या मुली उदा: चांगली चित्रकला/ गाणे/ क्राफ्ट वर्क ई करत असणार्‍या मूलींचे नन्तर काय होते?त्यांची हुशारी कोठे जाते?

मीनल

हा तर सॄष्टीचा नियम आहे

नदी ,सागरापुरत ठिक आहे.
पण मुलींनी सासरी जायच हा काही सॄष्टीचा नियम नाही.
तो आपण माणसाने बनवलेला ,सामजिक नियम आहे.तोही भारतात मुख्यत्वे.
तसं चीन ,कोरिया ,जपान वगैरे आशियी देशातही आहे .
म्हणजे होता असं म्हणाव लागेल.
चीन मधे तर ,मुलाच स्वतःच घर नसेल तर मुली लग्न करत नाहित.तश्याच एकत्र राहतात. हुशार आहेत की मुल होऊ देत नाहित.
जपान, कोरिया अजूनही थोड परंपरा जपणार आहे .पण भारत सर्वात `बाप` आहे. अजूनही.

मुलींनी का आपल अस्तित्व विसराव?
पूर्वी असेल तस जेव्हा स्त्रीयांना स्वयंपाकघरात डांबून ठेवल होत.
पण आता `आपल ओपिनियन` नसलेली बेअक्कल स्त्री कोणी बायको म्हणून स्विकारेल का?
आपली बायको ही एक स्वतंत्र व्य क्तिमत्व आहे हे पुरूषांनी मान्य केले पाहिजे.नेहमीच.आपल्या सोयीनुसार नव्हे.

लग्नापूर्वी खूप काही तरी करत असणार्‍या मुली उदा: चांगली चित्रकला/ गाणे/ क्राफ्ट वर्क ई करत असणार्‍या मूलींचे नन्तर काय होते?त्यांची हुशारी कोठे जाते?

मी याच प्रकारातली.
पण ते केले आही म्हणजे हुशारी जाते का?
चित्र काढल नाही म्हणून ती कला जाते ?नाही.फक्त त्याचा व्यासंग चालू रहात नाही.
जिवनातल्या प्रायोरिटिज बदलतात.जबाबदा-या वाढतात.
हॉबी जपायला वेळ मिळत नाही.पण वेळ /संधी आलीच तर ती कला समोर येतेच अपोआप.
आनंद देते ,आठवणींना उजाळा देते.

त्यातून मिपासारखी स्थळ आहेतच आपली लेखन कला /बुध्दी /वैशिष्ट्य दाखवण्याचा.