जे न देखे रवी...

नाकावर झाली ही सर्दी बहाल

Primary tabs

माझ्या एका मैत्रिणीला हिवाळ्यात खूप सर्दी होते.
सोबतीला ताप ,खोकला ही असतो कधी कधी.
तिच्या त्या त्रासाचे वर्णन ऐकून मला चेष्टा कराविशी वाटली .
ती देते आहे ह्या विडंबनात.
मूळ गाण्याबद्दल लिहायची जरूरी वाटत नाही.

नाकावर झाली ही सर्दी बहाल

नाकावर झाली ही सर्दी बहाल ,
जरा सोडून जा हो ,मोठा रूमाल ॥ धॄ॥

औषधाची गोळी ठेऊन जिव्हेवरती ,
ती कडू रिचविते, पाकिटातली पुरती,
डोक दुखाव, नाक गळाव ,पुशित रहाव खुशाल ॥१॥

फुरफुर अशी की ओढ म्हणे अन सोड,
भरे इंच इंच की आत येतसे फोड,
घसा जाळिता कसा ताप ही पसरी काया हाल ॥२॥

जाडे जाडे पांघरूण घेता गरम ते बाई,
सरदीचा ओसरला रोग तो सर्वा ठायी ,
असेच जावे झोपी, आणिक कधी न व्हावी सकाळ ॥३॥

व्यंकट

हे आवडलं.

लहानपणी आमचे एक काका 'तसल्या' रुमालाला शेंबूड-दाणी असे संबोधत असत. त्या काळी मला त्या शब्दाची फार गंम्मत वाटत असे.

व्यंकट

प्राजु

फुरफुर अशी की ओढ म्हणे अन सोड,
भरे इंच इंच की आत येतसे फोड,
घसा जाळिता कसा ताप ही पसरी काया हाल ॥२॥

लय भारी.... ही तुझी कविता वाचून तुझ्या मैत्रिणीची सर्दीतून मुक्तता व्हावी हीच इच्छा.
विडंबन आवडले..

- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

मदनबाण

डोक दुखाव, नाक गळाव ,पुशित रहाव खुशाल
हे सर्व मी बर्‍याच वेळा अनुभवले आहे.

( व्हिक्स चा वाफारा घेणारा)
मदनबाण

धमाल मुलगा

हे: हे: मी पण सहमत रे मदन दा...

अवा॑तरः माझा एक दूरचा भाऊ होता त्याच॑पण नाव मदन होत॑ आणि आम्ही त्याला मदन दा म्हणायचो!!!

- (शे॑बडा) ध मा ल.

विसोबा खेचर

डोक दुखाव, नाक गळाव ,पुशित रहाव खुशाल ॥१॥

ही ओळ सर्वात मस्त..!

परंतु,

औषधाची गोळी ठेऊन जिव्हेवरती ,

ही ओळ चालीत मुळीच बसत नाही.. त्यामुळे खटकते.

असो, 'राजसा जवळी जरा बसा..' आणि 'तुम्हावर केली...' ची आमचीही एक झलक इथे पाहा! :)

आपला,
(रामभाऊ कदमांचा शिष्य) तात्या.

मी तात्यांशी सहमत आहे.
सॉरि प्राजु, पण जिव्हेवरती हा शब्दप्रयोग लावणीत शोभत नाही! हे कसबसं मात्रा जुळवल्यासारखं वाटतं!
लावणीतले शब्दप्रयोग अधिक साधे अपेक्षित असतात!!
आय विश आय कॅन सज्जेस्ट द अल्टेर्नेटिव्ह, बट आय ऍम नॉट द्याट गिफ्टेड लाईक यू!!
मे बी यु कॅन डू द्याट फॉर मी पुतणीबाई!!!!:))

मीनल

मला वाटत `जिव्हेवरती`शब्दप्रयोग लावणीत ठिक नसला तरी चालीत बसतो आहे .

मीनल.

विसोबा खेचर

तसं बसवायचं तर बसतं आहे, परंतु 'गोळी' हा शब्द बेमालूमपणे ऍडजस्ट करावा लागतो, सहजसुंदररित्या बसत नाही. 'तोरणं' हा शब्द जसा सहजसुंदर बसला आहे तसा 'गोळी' हा शब्द बसत नाही.

तसेच 'पांघरूण' ह शब्ददेखील खटकतो आहे. चालीत बसतो आहे परंतु तो तेवढा स्मूथ वाटत नाही.

असो, ही माझी वैयक्तिक मतं. पटली तर घ्या, नायतर सोडून द्या...

तात्या.

बेसनलाडू

विडंबन आवडले.
जाडे जाडे पांघरूण घेता गरम ते बाई,
सरदीचा ओसरला रोग तो सर्वा ठायी ,
असेच जावे झोपी, आणिक कधी न व्हावी सकाळ ॥३॥
मस्त!
(वाचक)बेसनलाडू

चतुरंग

सुंदर कल्पनाविलास.

औषधाची गोळी ठेऊन जिव्हेवरती ,
ती कडू रिचविते, पाकिटातली पुरती,
डोक दुखाव, नाक गळाव ,पुशित रहाव खुशाल

पहिल्या दोन ओळीत वजन थोडं इकडंतिकडं करावं लागतंय ते करायचा एक प्रयत्न -

औषधाचं चूर्ण, ठेऊन रसनेवरती
ती कडू रिचविते, जहर काढा वरती
डोकं दुखावं, नाक गळावं, पुशीत रहावं खुशाल

चतुरंग

वाचक आणि श्रोत्यांमध्ये सामान्य रसिक व जाणकार असे दोन प्रकार नेहमीच असतात. गेली २५ वर्षे मी स्वरचित विडंबन काव्य गायनाचे सादरीकरण
( कविसंमेलनात तसेच स्वतंत्रपणे)करीत आहे.सामान्य रसिक नेहमीच मात्रा वगैरेची तमा न बाळगता मस्त आनंद घेतात. माझ्यामते सर्वांग निर्दोष रचना निर्माण होणे व तरीही ती सर्वांना आवडणे केवळ अशक्य.
http://www.orkut.com/Community.aspx?cmm=28868095( झेंडूची फुले परंपरा)

विसोबा खेचर

सामान्य रसिक नेहमीच मात्रा वगैरेची तमा न बाळगता मस्त आनंद घेतात.

माझ्या मते हे समर्थन हास्यास्पद आहे!

'तुम्हावर केली मर्जी बहाल' या सांगितिकदृष्ट्या अत्यंत श्रीमंत असलेल्या गाण्याचं विडंबन करताना त्यातल्या सांगितिक अंगाला, त्यातल्या लयीच्या, शब्दांच्या वजनाला कुठेही धक्का लागू नये असं वाटतं! कवीने, संगितकारांने, गायकाने एखादं गाणं घडवताना, खूप कष्ट घेतलेले असतात याची विडंबनकाराला जाणीव असावी!

तात्या.

बेसनलाडू

विडंबन करताना त्यातल्या सांगितिक अंगाला, त्यातल्या लयीच्या, शब्दांच्या वजनाला कुठेही धक्का लागू नये असं वाटतं! कवीने, संगितकारांने, गायकाने एखादं गाणं घडवताना, खूप कष्ट घेतलेले असतात याची विडंबनकाराला जाणीव असावी!
--- सहमत आहे. ऐका हो ऐका!!!!! :)))))))
(दवंड्या)बेसनलाडू

चतुरंग

(कॄपया माझे लिखाण हे भावनावश होऊन न वाचता परखडपणे वाचावे माझ्यासकट सर्वांनाच उपयोगी ठरेल असे वाटते. कमी अधिक शब्द झाला असल्यास माफी असावी.)

रसिक व जाणकार श्रोते ही कल्पना आपण म्हणता त्याप्रमाणे गाण्यात जास्त चपखल बसते असे मला वाटते. याचं कारणही देतो.
समजा माझ्यासारख्या रसिकाला, ज्याला शास्त्रीय संगीतातलं ज्ञान नाही त्याला, रशीद खान आवडेल, जसराजजीही आवडतील, भीमसेनही आवडतील.
त्यांच्या गाण्यातला, घराण्यातला फरक मला कळला नाही तरी बिघडत नाही. पण कळला तर वैविध्यतेतला अपार आनंद देऊन जाईल.
त्याही पुढे जाऊन मी शास्त्रीय संगीताचा अभ्यास केला, तर मला त्यांच्या गाण्यातल्या वेगवेगळ्या जागा, एकच राग गाण्याची प्रत्येकाची बारकाव्यांसहित पध्दत या सगळ्याचा अपूर्व आनंद मिळेल. हे सगळे आनंद चढत्या क्रमाने असतील हे तुम्ही नाकारु नये कारण ती वंचना असेल!

आता विडंबनाकडे वळूयात. मुळात विडंबनाचा हेतू काय आहे हे नीट ठरवले पाहिजे. मनोरंजन हा तर आहेच. पण आपल्याला सवंग मनोरंजन हवे आहे का दर्जेदार हे ठरवायला नको का? मूळ काव्याचा दर्जा जसा असेल त्याप्रमाणे विडंबनात सुध्दा तीच ताकद यावी असा आग्रह का नसावा, नव्हे तो तसा नसला तर ती रसिकांची कमजोरी आहे असे मी म्हणेन! ओढून ताणून, कोणतेही शब्द कुठेही टाकून, एकदाचे विडंबन 'रसिकां'च्या माथी मारणे म्हणजे तद्दन खालच्या दर्जाच्या एखाद्या चित्रपटासारखे वाटेल! कारण 'विडंबन' म्हटले की मूळ रचना आलीच - त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, एकावर दुसरे आधारलेलेच आहे. तुम्ही नाकारुच शकत नाही.
आता मात्रांची काळजी करु नका - म्हणजे विडंबन करणार्‍या कवीने काहीही अभ्यास करायला नको, चांगले काव्य वाचायला, लय, ताल, ठेका, मात्रा यांचा अभ्यास करायला नको, ही शुध्द पळवाट आहे. म्हणजे कवी, संगीतकार, गाणार्‍याने मरमर मरायचे चांगले काव्य/गीत निर्माण करायचे आणि विडंबनकाराने त्याची दोन मिनिटात वाट लावायची हे पटतच नाही! अगदी निर्दोष होणार नाही कबूल आहे, पण दोष निदान ढळढळीतपणे समोर येतील, बेरंग होईल अशी तर नक्कीच नको नाही का?

तुम्हाला मी एकच प्रश्न विचारतो - तुमची स्वतःची एखादी सुंदर रचना अशी वेडीवाकडी विडंबून दिली तर तुम्हाला चालेल का?

चतुरंग

सॉणा

अशि सर्दि झलि कि कहि सुचत नहि तेहअ हे विद्म्बन वचुन तहोद तिमे पस्स करव बकि कवय झकस.

विसोबा खेचर

तेहअ हे विद्म्बन वचुन तहोद तिमे पस्स करव बकि कवय झकस.

अरे का मारतोयस एवढी मराठीची?? :))

अरे शुद्धलेखनाचे ढोबळ नियम तरी पाळा रे! त्याचं वावडं नाहीये मिपाला! :)))

छ्या! साला तात्या हारला आज! :))

मीनल

सर्व प्रथम माझ्या बद्दल.
`पद्य` हा माझा प्रांत नाही.त्यामानाने गद्य जरा (जरासच) बरे म्हणावे लागेल.
त्यात विडंबन म्हणजे जरा कठिणच .कारण एक तर जुन्या चांगल्या गाण्याची `वाजवायची` आणि ती ही असले विषय घेऊन!
मी घाबरत बिचकतच मिपावर टाकले हे विडंबन.
मला ही ते समाधानकारक वाटत नव्हते.का ते कळत नव्हते .
वरील प्रतिसादावरून ते कळले .विडंबन म्हणजे जुन्या /परिचित चालीवर म्हणायचे /गायचे दुसरे शब्द नाही हे पटले.
ते शब्द चपखल बसावे लागतात. नाही तर ओढाताणी ऑबव्हिअस होते.सहज लक्षात येण्याजोगी होते.
जशी माझ्या विडंबनात झाली आहे.
लावणीतील शब्द ही सहज सोपे पाहिजे ,ते ही बरोबर.
ब-याच ठिकाणी मला ते विषयानुरूप मिळत नव्हते.माझी कमतरता!
दर्जेदार मनोरंजन सर्वांना हवे असते .पण तसे मनोरंजन देणारी ताकदीची माणस सर्वच नसतात.
काही पी.जे. ही असतात.सर्वच `पु.ल.`कसे जन्मतील?
याचा अर्थ सामान्यांनी /नवशिक्यांनी पी.जे .करूच नयेत असा नाही.
त्या पी जे चा आस्वाद घेणारे ही रसिक असतात.
तेवढच नाही तर त्याची दाद देणारेही असतात.
लेखकाला ,वाचकाला दोघांनाही माहित असत की लेखनाचा दर्जा काय?
त्यात काही उत्तम सजेशन देणारी भेटतात ,तर काही न दुखवणा-या शब्दात दोष दाखवणारे असतात.काहीजण चुका आयत्याच दूरुस्त करून देतात.
याअश्या प्रतिसादांमुळे नवी उमेद मिळते.एन्करेजमेंट मिळते.
काही लिहिणयाची ,प्रयत्नांची उमेद नाहीशी होत नाही.

ज्यांनी कौतुक केले त्यांचे आभार.पण इतरांना अधिक धन्यवाद.
पुन्हा काही ही लिहिताना त्या गोष्टींचे भान ठेवेन. निदान प्रयत्न करेन.
पुन्हा एकदा थँक्यू.

मीनल.

प्राजु

वरील प्रतिसादावरून ते कळले .विडंबन म्हणजे जुन्या /परिचित चालीवर म्हणायचे /गायचे दुसरे शब्द नाही हे पटले.
ते शब्द चपखल बसावे लागतात. नाही तर ओढाताणी ऑबव्हिअस होते.सहज लक्षात येण्याजोगी होते.
जशी माझ्या विडंबनात झाली आहे.
लावणीतील शब्द ही सहज सोपे पाहिजे ,ते ही बरोबर.
ब-याच ठिकाणी मला ते विषयानुरूप मिळत नव्हते.माझी कमतरता!

पण तू यापेक्षा सुद्धा छान नक्की लिहू शकतेस याची माझी खात्री आहे.

- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

विसोबा खेचर यांना,
"सामान्य रसिक नेहमीच मात्रा वगैरेची (फारशी)तमा न बाळगता मस्त आनंद घेतात.

माझ्या मते हे समर्थन ( ही वस्तुस्थिती असल्यामुळे हे समर्थन करण्याची आवश्यकता नाही)हास्यास्पद आहे!

'तुम्हावर केली मर्जी बहाल' या सांगितिकदृष्ट्या अत्यंत श्रीमंत असलेल्या गाण्याचं विडंबन करताना त्यातल्या सांगितिक अंगाला, त्यातल्या लयीच्या, शब्दांच्या वजनाला कुठेही धक्का लागू नये असं वाटतं! कवीने, संगितकारांने, गायकाने एखादं गाणं घडवताना, खूप कष्ट घेतलेले असतात याची विडंबनकाराला जाणीव असावी! ( अगदी बरोबर व मान्य) "
======================================================

१. विडंबने जावू द्या, किती तरी चांगल्या मूळ गीतांमध्ये संगीतबद्ध करतांना अडचणी येतात.
२. दुसरे उदा. स्त्रीसौंदर्याबाबत बोलतांना नाक,डोळे इ. अवयवांचे आदर्श असण्याचे प्रत्येकी वेगळे निकष असुनही सर्व अवयव आदर्श असणारी जीवंत स्त्री अतिशय विरळा नव्हे अशक्य , तरी सुध्दा अनेक स्त्रिया मोहक दिसतात (तिरकस अर्थ काढू नये).
३. तसेच प्रत्यक्ष निसर्ग सौंदर्य ,त्याच्या चित्रांत येणे कधी तरी शक्य आहे कां ?
४. नाटकातला शिवाजी किती ही चांगला वठविला तरी (त्याच्या) महाराजांच्या जवळ जाण्यास मर्यादा आहेत ना?

म्हणजेच आदर्श जरूर हवेत पण वास्तवतेचे भान न ठेवता प्रत्येक वेळी त्याची (कलाक्रुतीच्या प्रत्येक पार्ट कडून )अपेक्षा करणे
( नव्हे दुराग्रह धरणे) केवळ हास्यास्पदच नव्हे तर मुर्खपणाचे वाटते.
.( असा मुर्खपणा आपण सगळे च कमी अधिक प्रमाणात करीत असतो. तरी क्षमा असावी.)

आपला सविस्तर अभिप्राय आवडला. आपण सगळेच कदाचित तेच म्हणतोय. कांही मुद्दे वर आलेले आहेतच.

आता मात्रांची काळजी करु नका - म्हणजे विडंबन करणार्‍या कवीने काहीही अभ्यास करायला नको, चांगले काव्य वाचायला, लय, ताल, ठेका, मात्रा यांचा अभ्यास करायला नको, ही शुध्द पळवाट आहे. म्हणजे कवी, संगीतकार, गाणार्‍याने मरमर मरायचे चांगले काव्य/गीत निर्माण करायचे आणि विडंबनकाराने त्याची दोन मिनिटात वाट लावायची हे पटतच नाही

अगदी मान्य. पण अभ्यास असूनही अनेक वेळेस योग्य अर्थछटा असणारा , मात्रेत बसणारा आणि योग्य भाषेतला(उदा. ग्रामिण/शहरी ) शब्द सापडणे केवळ अशक्य असते. (फिजिक्स वाल्यांना समजेल मी काय सांगायचा प्रयत्न करतोय ते)

चतुरंग

निवेदनाबद्दल धन्यवाद सुरेशजी!

पण अभ्यास असूनही अनेक वेळेस योग्य अर्थछटा असणारा , मात्रेत बसणारा आणि योग्य भाषेतला(उदा. ग्रामिण/शहरी ) शब्द सापडणे केवळ अशक्य असते. (फिजिक्स वाल्यांना समजेल मी काय सांगायचा प्रयत्न करतोय ते)

कबूल. पण मग तसा शब्द मिळालाच नाही असं किती वेळा होतंय किंवा एकाच काव्यात किती वेळा होतंय ह्याप्रमाणे विडंबनाची प्रतवारी ठरते असे मला वाटते. संपूर्ण रचनेत एखाद दुसराच शब्द वावगा असेल तर रसिकही समजून घेतातच ना. पण एकदमच वडाची साल पिंपळाला हे चालणार नाही. असो. मुद्दा समजला हे महत्त्वाचे.

(अवांतर - प्रा. साहेब तसे आम्हीही 'भौतिकातलेच' (फिजिक्स ह्या अर्थी)!; अगदी पक्के अणुविद्युत अभियांत्रिकी मधले त्यामुळे आपले म्हणणे समजले असावे असे वाटते!)

चतुरंग

विसोबा खेचर

इथली दर्जेदार चर्चा मिपा बाहेरच्यांना कळावी म्हणून

धन्यवाद खेडकरशेठ..

तात्या.

धमाल मुलगा

काही पी.जे. ही असतात.सर्वच `पु.ल.`कसे जन्मतील?
याचा अर्थ सामान्यांनी /नवशिक्यांनी पी.जे .करूच नयेत असा नाही.

वा मीनलताई ! क्या बात कही!

- (तद्दन पी.जे.) ध मा ल.

धोंडोपंत

काय भन्नाट विडंबन केलाय? अतिशय सुंदर. खूप खूप आवडले.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

आपला,
(संतुष्ट) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com