जनातलं, मनातलं

गांधी जी

Primary tabs

आज गांधी जयंती. गांधीजींच्या बाबतीत कायमच टोकाचे दोन्हीकडून बोलणे ऐकायला मिळते. त्यांची तोंड फाटेपर्यंत स्तुती करणार्‍यांनी खरा गांधीवाद कधी पाळल्याचे दिसले नाही. (अर्थातच नियमाला अपवाद असतील). असो. म.टा.च्या भारतकुमार राऊत यांचा खालील लेख वाचनात आला, समतोल वाटल्याने आवडला (तोच जर "सुमार साहेबांनी " लिहीला असता तर त्यात हिंदूत्व, संघ, भाजप वगैरेंना शिव्या आणि महात्म्याच्या ऐवजी सोनीयाच्या ओव्या वाचायला लावल्या असत्या!). आपल्यास काय वाटले त्याचे मतप्रदर्शन जरूर करा. फक्त शिळ्या कढीला उत आणू नका अशी विनंती करावीशी वाटते. शिळी कढी म्हणजे नक्की कोणची? - 'सुज्ञास सांगणे न लगे' इतकेच म्हणतो!

'हे राम'

ते अकाली गेले , याचे दु:ख साऱ्या जगाला झालेच ; पण ते 1948 मध्येच गेले , म्हणून त्यांची अलौकिक प्रतिमा भारतीयांच्या मनावर कायमची कोरली गेली , हेही खरेच.

... गांधीजींचा पराभव करण्यासाठी ब्रिटिशांनी जंग जंग पछाडले. त्यांच्या कार्यर्कत्यांवर लाठ्या आणि गोळ्या चालवल्या. पण त्यांना जे जमले नाही , ते स्वकीयांनी करून दाखवले. सर्वांनी मिळून त्या महात्म्याचा दारुण पराभव केला. तो पाहायला गांधीजी नाहीत , तेच बरे. नाहीतर त्यांच्यावर ' हे राम ' म्हणण्याची वेळ क्षणोक्षणी आली असती.

आजचे दिनविशेष हे की , आज महात्मा गांधींची 57 वी पुण्यतिथी. 1948 साली याच दिवशी दिल्लीत गांधीजी नथुराम गोडसे नावाच्या हिंदुत्वनिष्ठाच्या गोळीला बळी पडले. शेवटचा श्वास घेण्यापूवीर् ते ' हे राम ' असे पुटपुटले. या दोन शब्दांनी त्यांच्यावर आकस ठेवणाऱ्यांच्या वादाचा मुख्य मुद्दाच निकालात निघाला. असो. गांधीजी नावाचा महापुरुष गेल्यानंतर 57 वर्षांनीसुद्धा त्यांच्या मृत्यूबाबतची नाटके चालतात आणि त्यांच्या जीवनाबरोबरच त्यांचा भर दुपारचा मृत्यूसुद्धा तितकाच ' नाट्यमय ' व भावनात्मकदृष्ट्या गूढ बनून राहतो , हे त्यांचेच महात्म्य.

गांधीजी गेले , तेव्हा भारत स्वतंत्र होऊन जेमतेम पाच महिने झाले होते. राजकीय स्वातंत्र्य मिळाले , पाकिस्तानची निमिर्ती झाली , तरी भारतीयांमध्येच भावनिक स्वातंत्र्याची बिजे अद्याप नीटशी रुजलेली नव्हती. ब्रिटिशांचे राज्य दीडशे वषेर्च होते , हे खरे असले , तरी त्यापूवीर्ही भारत कोणत्या ना कोणत्या परकीय सत्तेच्या गुलामगिरीतच होता. मोगलांची चारशे वर्षांची सत्ता भारतीयांनीच सहन केली होती. त्यामुळे ' स्वातंत्र्य ' म्हणजे नक्की काय , याची कल्पना फारशी कुणाला नव्हती. चीन आणि रशियात कम्युनिस्टांची राजवट होती , त्याला स्वातंत्र्य म्हणायचे , तर पक्षविरोधी ब्र काढला , तरी राज्यर्कत्यांची नाराजी फार महागडी ठरत होती. अमेरिकेत लोकशाही होती , पण ती भांडवलदारी व्यवस्था भारतीयांना न परवडणारी होती. ब्रिटिश जनता लोकशाही मानत होती पण राजाला नाकारायला मात्र तयार नव्हती. अशा वेळी भारताला स्वातंत्र्य मिळाले , म्हणजे नक्की काय झाले , ते कुणाला कळत नव्हते. काहींना वाटले , स्वातंत्र्य आले , म्हणजे आता ' कायदा ' नाहीच. कारण आतापर्यंत कायदा अंमलात आणणारे गोरे होते. त्यांच्या लाठीचा प्रसाद खाणे , इतकेच भारतीयांना ठाऊक होते. त्यातून गांधीजींनी ' सविनय कायदेभंग ' शिकवला. काहींना वाटले , स्वातंत्र्य आले म्हणजे गोऱ्यांची सत्ता जाऊन जवाहरलाल नेहरू ' राजा ' झाले. या चमत्कारिक परिस्थितीतून भारतीय जनता स्वत:ला सावरत असतानाच गांधीजी गेले.

ते अकाली गेले , याचे दु:ख साऱ्या जगाला झालेच ; पण ते 1948 मध्येच गेले , म्हणून त्यांची अलौकिक प्रतिमा भारतीयांच्या मनावर कायमची कोरली गेली , हेही खरेच. जर गांधीजी पुढल्या काळात हयात असते , तर सत्तेसाठी काँग्रेसची शकले झालेली त्यांनी पाहिली असती. ते गेले आणि तीनच वर्षांत लोकनायक जयप्रकाश नारायण , आचार्य नरेंद देव , आचार्य कृपलानी प्रभूतींनी नेहरूंची साथ सोडून स्वत:ची सोशालिस्ट पाटीर् स्थापन केली. त्यावेळी गांधीजी असते , तर त्यांनी नक्की कुणाची बाजू घेतली असती ? तत्वासाठी काँग्रेसशी फारकत घेणाऱ्या जेपी बाबूंची की , आपल्या लाडक्या जवाहरची ? यापैकी कोणतीही भूमिका घेताना गांधीजींना तीव्र यातना झाल्या असत्या. ते स्वत: आग्रही मनोवृत्तीचे असले , तरी मध्यममागीर् होते. कारण भारतीय संस्कृतीचे मध्यममार्ग हेच महत्त्वाचे लक्षण आहे , असे ते मानत. त्यांना काँग्रेसमधील दुफळी मानवली असती का ?

स्वातंत्र्याबरोबरच समानता आणि अस्पृश्यता निवारण , स्त्री-हक्क , शिक्षणाचे सार्वत्रिकरण , स्वदेशी आदी बाबी गांधीजींना प्रिय होत्या. गांधी हत्येनंतर चार वर्षांत भारतीय प्रजासत्ताकाची पहिली निवडणूक 1952 मध्ये झाली आणि त्याच वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या कर्तृत्ववान दलित नेत्याचा काँग्रेसने मुंबईतच पराभव केला. हा धक्का गांधीजींना सोसावा लागला असता. गांधीजींनी धर्माचे अवडंबर माजवले नाही , तरी ते मनाने आणि वृत्तीने सच्चे हिंदू होते. ' ईश्वर-अल्ला तेरो नाम , भज प्यारे तू सीताराम... ' अशी त्यांची रामावर श्रद्धा आणि भक्ति होती. ते गेले , तेव्हा रामाच्या नावावर मते मागणाऱ्यांचे राजकीय पंथ उदयास यायचे होते. हिंदू- मुसलमान यांच्यात तेढ जरूर होती , पण हिंदूंमधीलच उच्च-नीच वादांमुळे या धर्माचा सामुहिकपणे त्याग करण्याचा विचारही कुणाच्या मनाला शिवला नव्हता. पण काही वर्षांतच डॉ. आंबेडकरांना धर्मांतराचा मार्ग स्वीकारावा लागला. गांधीजी असते , तर त्यांच्या हृदयाला लक्ष लक्ष टाचण्या टोचल्या असत्या.

त्यानंतर तर राम जन्मभूमीचा वाद उद्भवला आणि साऱ्या देशाचे राजकारण बदलले. स्वत:ला गांधीवादी म्हणवून घेणारेही प्रवाहपतीत झाले , तर काहींनी मूग गिळून गप्प बसण्याचा ' समंजसपणा ' चा मार्ग अवलंबला. धर्मासाठी दंगली घडवून आणून रामाचेच नाव बदनाम करणारे आपल्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करतात , हे पाहून गांधीजींचा आत्माही तडफडत असेल. तेच सारे ते जिवंतपणी कसे पाहू शकले असते ? त्यांनी अहिंसेचा मंत्र जपला पण पुढे मात्र सारे जीवनच हिंसक बनले.

पाकिस्तानची स्थापना करण्यास त्यांनी दु:खद अंत:करणाने परवानगी दिली खरी , पण फाळणी ही ' एकदाच घडणारी कृती ' ( श्ाठ्ठद्ग ह्लद्बद्वद्ग ड्डष्ह्ल ) आहे , असे त्यांना वाटत होते. म्हणूनच फाळणी नंतर हे दोन देश सुखात नांदतील आणि विभक्त संसार थाटलेल्या भावांप्रमाणे आनंदात राहतील , अशी त्यांची भाबडी समजूत होती. पण फाळणी ही एकदाच घडणारी घटना नसून ती सतत चालणारी प्रक्रिया ठरली आणि अनेक मानसिक व भावनिक फाळण्या होतच राहिल्या. हा आपल्याच तत्त्वज्ञानाचा पराभव त्यांना बघावा लागला असता.

मुख्य म्हणजे त्यांनी ज्या संघटनेवर जीवापाड प्रेम केले , ती काँग्रेस आणि काँग्रेसजन यांचा ज्या वेगाने नैतिक ऱ्हास होत गेला , तो गांधीजींनाही रोखणे शक्य झाले नसते. त्यांनी काँग्रेसला जनतेची स्वातंत्र्यप्राप्तीची चळवळ मानले आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ही चळवळ संपली म्हणून आता काँग्रेस विसजिर्त व्हावी , असे त्यांना वाटले. हा विचार नैतिकदृष्ट्या अलोकिक असला , तरी व्यवहाराच्या कसोटीवर चालणारा नव्हता. स्वातंत्र्यप्राप्तीत काँग्रेसचा निर्णायक वाटा होता. राजकारण म्हणून पुढच्या निवडणुकांत त्याचा फायदा घ्यायचा , तर काँग्रेस टिकायला हवी , हा व्यवहारी विचार नेहरू , वल्लभभाई पटेल आदी र्कांग्रेसजनांनी केला. गांधीजी त्याला विरोध करत राहिले असते , तर कदाचित पुढील काळात ते एकाकी पडले असते. कारण सत्तेपुढे असले ' शहाणपण ' कुणाला हवे होते ?

एकूण आपण जे अंगिकारले आणि ज्याचे प्रबोधन केले , ती सारी शिकवण आपल्याच नावाने राज्य करणारे विसरल्याचे त्यांना दिसले असते. गांधीजी आणखी जगले असते , तर काँग्रेसवाल्यांना त्यांची ' अडचण ' च झाली असती. ते गेल्यामुळे त्यांचा फोटो प्रत्येक सरकारी कचेरीत लावून त्यांच्या साक्षीनेच सर्व भ्रष्टाचार करण्याची सोय झाली. गांधीजींनी ' ट्रस्टीशिप ' ची कल्पना मानली व ' इदं न मम ' या भावनेने संपत्तीकडे पाहावे , असे उद्योगपतींना सांगितले. त्यांच्या अनुयायांनी त्यांचेच चित्र शंभर रुपयांच्या नोटेवर छापून गांधीजींना ' श्रीमंत ' बनवले. ' सत्य ' हा ज्यांच्या जीवनाचा मूलमंत्र , त्यांचे चित्र असलेली शंभराची नोट सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचाराचे माध्यम आणि प्रतीक बनली.

गांधीजींचा पराभव करण्यासाठी ब्रिटिशांनी जंग जंग पछाडले. त्यांच्या कार्यर्कत्यांवर लाठ्या आणि गोळ्या चालवल्या. पण त्यांना जे जमले नाही , ते स्वकीयांनी करून दाखवले. सर्वांनी मिळून त्या महात्म्याचा दारुण पराभव केला. तो पाहायला गांधीजी नाहीत , तेच बरे. नाहीतर त्यांच्यावर ' हे राम ' म्हणण्याची वेळ क्षणोक्षणी आली असती.

भारतकुमार राऊत


१९२४ साली गांधीजींनी केलेल्या२१ दिवसांच्या उपवासादरम्यान त्यांना ही सहा वर्षाची चिमुरडी मुलगी भेटायला गेली होती. तिचं नाव इंदिरा गांधी.

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

खरंच, ही कढी गेल्या दोन वर्षांपासून तशीच बाहेर ठेवलेली आहे. आता कितीही उकळले तरी तिला ऊत येणार नाही.

ताजी कढी बनवतोय. "शत्रूचा शत्रू हा आपला मित्र" ह्या नेताजींच्या शिकवणीनुसार भारताने ओसामा बिन लादन ला भारतरत्न द्यावे म्हणून. नेताजींनी हिरोहिटो आणि हिटलरला रेकमेंड केले असतेच की नाही?

- सर्किट

सहज

ब्रिटिशांचे शाप लागले म्हणायचे गांधीजींच्या भारताला.

असो शिर्षक "२ ऑक्टोबर - उकळी आली कढीला" किंवा "२ ऑक्टोबर - पुन्हा उकळी"

विकासराव मानले बुवा सगळे दिवस बरोबर लक्षात ठेवता तुम्ही.

-----------------------------------------------------------
सबको सन्मती दे भगवान!

विकास

>>>विकासराव मानले बुवा सगळे दिवस बरोबर लक्षात ठेवता तुम्ही.

अहो असे आहे की काही असामान्य व्यक्तींचे काही वर्तन पटले नाही म्हणून त्यांची असामान्य होण्यातली जिद्द मला भावते. मी काही गांधीवादी नाही की फक्त लताभोक्ता नाही.. पण लता असोत अथवा गांधी, त्यांच्यातील न पटणार्‍या आपल्यास वाटणार्‍या अवगुणांसहीत पण त्यांचे असामान्यपण कमी होते असे वाटत नाही...

"दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल..." वगैरे म्हणणे म्हणजे आचरटपणा आणि इतर स्वातंत्र्यसैनीकांवर राजकीय आणि सामाजीक अन्याय /द्वेषपण वाटतो. तरी देखील गांधीचे पहा, आत्तचा नवीन शब्द "Nest Returned Indian" (NRI)... वयाच्या ४६-४७ व्या वर्षी अफ्रिकेतून येतो आणि एक राष्ट्रीय आंदोलन तयार करतो. ही गोष्ट सामान्य खचीतच नाही. अशा व्यक्तींबद्दल वर्षातून एकदा काहीतरी नवीन माहीती नक्की मिळू शकते असे वाटते. बाकी राहीले त्यांनी केलेल्या चुका आणि त्यांची हत्या (का वध? फरक माहीत असेल तर ह. घ्या.) यावर सतत लिहीणे चाल्तेच. ते होऊ नये इतकेच वाटते.

अवांतरः कदाचीत एक वेगळा विषय होऊ शकेल, पण अशा असामान्य व्यक्ती ज्यांचे वागणे, भले कधी अपयश आले असले तरी निर्विवाद त्यांच्या कार्यात अचूक होते, ज्यांची वैचारीक ठेवण अतिशय स्पष्ट होती अशा हाताच्या बोटावर मोजता येतील अशाच व्यक्ती असतील - त्यातील मला कायम ज्यांच्या बद्दल आदरयुक्त अचंबा वाटतो त्या म्हणजे शिवाजी, टिळक, विवेकानंद इतक्याच पटकन आठवतात. (सावरकर आवडतातच पण त्यांचे वागणे पण बर्‍याचदा भावनेच्या आहारी झाले होते असे वाटते).अमेरिकेच्या बाबतीत लिंकन आणी जेफरसन आहेत. स्वतःच्या राष्ट्राचा स्वार्थ १००% डोक्यात ठेवला आणि स्वतःचा गुडीगुडीपणा नेहेरूंसारखा वापरला पण देशाला मोठे करायला, असे मला क्लिंटनबद्दलपण वाटते (त्याचे इतर उद्योग सोडून द्या).

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विकासराव,

आपले म्हणणे बहुतांश पटले. ते इतके संतुलित आहे, की न पटण्यासारखे काहीच ठेवले नाही तुम्ही. मिट रॉमनीची जागा घ्यायचा विचार आहे का ? (ह. घ्या.)

गेली दीड वर्षे क्रांतिकारकांच्या प्रत्येक जयंती पुण्यतिथीला "मानवतेच्या पुजार्‍याची निंदा" हे तेच तेच दळण दळणार्‍या "इतिहासकारांचे" लिखाण वाचल्यावर तर आपला प्रतिसाद इज अ ब्रेथ ऑफ फ्रेश एअर !

- सर्किट

मी काही गांधीवादी नाही की फक्त लताभोक्ता नाही.. पण लता असोत अथवा गांधी, त्यांच्यातील न पटणार्‍या आपल्यास वाटणार्‍या अवगुणांसहीत पण त्यांचे असामान्यपण कमी होते असे वाटत नाही...
पुर्णपणे सहमत.

"Nest Returned Indian" (NRI)... वयाच्या ४६-४७ व्या वर्षी अफ्रिकेतून येतो आणि एक राष्ट्रीय आंदोलन तयार करतो. ही गोष्ट सामान्य खचीतच नाही. अशा व्यक्तींबद्दल वर्षातून एकदा काहीतरी नवीन माहीती नक्की मिळू शकते असे वाटते.
चला एन आर आय ला एक वेगळेच परिमाण दिल्याने या शब्दाकडे पहाण्याचा कुत्सीत देशीपणा जरा सौम्य होईल.

(सावरकर आवडतातच पण त्यांचे वागणे पण बर्‍याचदा भावनेच्या आहारी झाले होते असे वाटते).
सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध वाचल्यावर मात्र तसे वाटत नाही. " ने मजसी ने परत मातृभूमीला" ऐकताना मात्र त्यांच कवित्व भावतं.

प्रकाश घाटपांडे

शिळी कढी म्हणजे नक्की कोणची? -

उत आणणे याचा अर्थ पुनरुज्जीवन करणे असा घेतला तरी चव कशी लागते हे मह्त्वाचे. आमचेकडे रारापोब ( राज्य राखीव पोलिस बल गट [क्र. १ व २ पुण्यात] ) S R P F मध्ये मेस मधील आमटी वा भाजी बराकीत 'तडका' ( इन्स्टंट फोडणी )देउन खाल्ली जाते. तरच ती खाणे सुसह्य होते. बलगटा ला आम्ही 'बैलगट' म्हणत असू.
( उतलेली शिळी कढी आवडणारा)
प्रकाश घाटपांडे

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कालची शिळी कढी आज छान लागते. पण दर जयंती, पुण्यतिथीला तीच तीच शिळी कढी खाता येईल का? बुरशी देखील आली आहे तिला आता. पोलिसांना देखील ती खाणे सुसह्य होणार नाही. मग कितीही तडका द्या.

असो, एक वचन आठवले: कर्तृत्ववान लोकांना दैवत्व देऊन आपण त्यांच्यावर आणि स्वतःवर खूपच अन्याय करत असतो. कारण त्यामुळे हे कर्तृत्व आपल्यालाही करणे शक्य आहे, हा विश्वासच नाहीसा होतो.

- सर्किट

कर्तृत्ववान लोकांना दैवत्व देऊन आपण त्यांच्यावर आणि स्वतःवर खूपच अन्याय करत असतो.

गांधींकडे आपण 'माणुस' म्हणून न पहाता 'महात्मा 'म्हणुन पहातो. "माणूस" म्हणुन पाहिले तर ते महान वाटतात. भले त्यांच्य विचारांशी सहमत असो वा नसो.
प्रकाश घाटपांडे

विकास

गांधींच्या ऐवजी कढी वरील भाष्ये वाचून ही "कढी जयंती" आहे असे वाटले! अहो हा ड्राय डे आहे तेंव्हा कढी साठीपण ड्राय डे च केला :)

गांधींचे नाव आले की फाळणी, हिंदू-मुसलमान, नथूराम,इत्यादी तत्कालीन विषयांवर चर्चा होते. राऊत यांचा अग्रलेख वाचताना तो वेगळ्या पद्धतीने लिहीलेला असल्याने त्याबाबत काय वाटले ते विचारले होते!

बाकी सर्कीटसाहेबांचे - त्यांनी सांगीतलेले - वचन मात्र १००% बरोबर आहे/पटले. त्याच पद्धतीने कायम म्हणले जाते की थोर माणसांचा पराभव हे त्याचे फॉलोअर्सच करतात.

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सर्कीटसाहेबांचे - त्यांनी सांगीतलेले - वचन मात्र १००% बरोबर आहे/पटले. त्याच पद्धतीने कायम म्हणले जाते की थोर माणसांचा पराभव हे त्याचे फॉलोअर्सच करतात.

हे वचन हार्वर्ड विद्यापीठातील चार्ल्स विली ह्यांचे आहे. डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ह्यांच्या संदर्भात त्यांनी म्हटले होते:

By idolizing those whom we honor, we fail to realize that we could go and do likewise. As I have said on many occasions, honoring Martin Luther King Jr. would be dishonorable if we remember the man and forget his mission. For those among us who believe in him, his work now must become our own.

- सर्किट

प्राजु

कर्तृत्ववान लोकांना दैवत्व देऊन आपण त्यांच्यावर आणि स्वतःवर खूपच अन्याय करत असतो.

हे अगदी खरे आहे. हा लेख वेगळ्या संदर्भाने लिहिला आहे यात काही शंकाच नाही. लेखही चांगला आहे. पण मी गांधी वादी नाही. अहिंसेच्या मार्गाने जाणारे तत्वज्ञान सांगून गांधीजीनी भारतीय नागरिकाला बुळा बनवला... समोरच्याचा उगारलेला हात रोखता येण्याइतकी हिम्मत त्यांच्या तत्वज्ञानातून नाही मिळाली. उलट एका गालावर मारले तर दुसरा पुढे करणे हिच शिकवण सर्वसामान्यांना मिळाली आणि म्हणूनच कदाचित जे आधी होऊ शकले असते ते होण्यासाठी १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस उजाडावा लागला...
नथूरामने गोळी झाडली ती 'गांधी 'या वृत्तीवर... गांधी या व्यक्तिशी त्याचे काही वैयक्तिक भांडण नव्हते.
हे माझे स्वतःचे मत आहे....

- प्राजु.

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

"ट्रिव्हियलायझेशन ऑफ हिस्टरी" या वृत्तीचा उत्कृष्ह्ट नमुना म्हणजे हा प्रतिसाद. इतिहास हा नेहमी सरळ रेषेतच जात असतो अशी बाळबोध भावना मनात असली, की ही वृत्ती निदर्शनास येते.

- सर्किट

नथूरामने गोळी झाडली ती 'गांधी 'या वृत्तीवर... गांधी या व्यक्तिशी त्याचे काही वैयक्तिक भांडण नव्हते.
हे माझे स्वतःचे मत आहे....

ती गोळी मात्र शरीराला लागली. विचारांना नव्हे. वृत्तीवर गोळी झाडताना ती विचारांचीच हवी. वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर त्या विचारांचा स्त्रोत असलेला मेंदू नष्ट करण्यासाठी शरीरावर गोळी झाडावी लागली.
प्रकाश घाटपांडे

कोलबेर

प्रतिसाद आवडला.. +१

टग्या (verified= न पडताळणी केलेला)

>वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर त्या विचारांचा स्त्रोत असलेला मेंदू नष्ट करण्यासाठी शरीरावर गोळी झाडावी लागली.

वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर??? मुळात असा प्रयत्न तरी केला होता काय???

प्रतिसाद आवडला!

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

वैचारिक प्रतिवाद कोण करतो ? ज्याचा स्वतःच्या विचारांवर ठाम विश्वास असतो तो.
जेव्हा स्वतःच्या विचारावरचा विश्वास संपतो, तेव्हा मानव हिंसेची कास धरतो.
गांधीजींनी अहिंसेचा मार्ग धरला, कारण त्यांचा त्यांच्या विचारांवर विश्वास होता, म्हणून.

- (वैचारिक) सर्किट

आजानुकर्ण

पण हिंसा हाच ज्यांचा विचार आहे त्यांनी हिंसा केली तर त्यांचा त्यांच्या विचारावर असलेला विश्वास अधिकच दृढ होत नाही का?

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

हिंसा हाच विचार असणारे मानवी मानसशास्त्रात मनोरुग्ण ठरतात.
नथूराम मनोरुग्ण होते, असे आपल्याला म्हणायचे आहे काय ?

- सर्किट

विकास

>>>ती गोळी मात्र शरीराला लागली. विचारांना नव्हे. वृत्तीवर गोळी झाडताना ती विचारांचीच हवी. वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर त्या विचारांचा स्त्रोत असलेला मेंदू नष्ट करण्यासाठी शरीरावर गोळी झाडावी लागली.

याबाबत सावरकरांच्या तोंडचे एक वाक्य वाचल्याचे आठवले. त्यांना गांधीहत्येत गोवले होते, तेंव्हा ते म्हणाले होते की, "(स्वतंत्र भारतात) माझा विरोध हा मी बॅलेट ने नोंदवीन बुलेटने नाही." त्याच बाबतीत त्यांनी नंतर गैरवापर होवू नये म्हणून स्वतःच "अभिनव भारत" चा सांगता समारोप करून बंद करून टाकला. गांधीजींनी पण तेच काँग्रेसच्या बाबतीत म्हणले होते पण आपण सर्व पाहातोच आहोत की काय झाले...

लबाड बोका

बौध्द आणि गांधी यांनी भारताचे जे नुकसान केले त्यापुढे मुस्लीम व ब्रिटीशांनी केलेले घाव काहिच नाही.
सामान्य माणसाच्या आयुष्यातील लढण्याची उमेद हिरावुन घेणा-या अहिंसेच्या पुजा-यांना नमस्कार (कोपरापासुन)

तो

तुम्हाला गौतम बुद्ध म्हणायचे आहे का?
काय नुकसान केले ते कळले तर बरे वाटेल. तो उगाचच 'भारत' काही शेहे वर्षे बौद्धधर्मिय होता अशा भ्रमात आहे. (म्हणजे बहुसंख्य बरे! भारत जसा हिंदूंचा देश असू शकतो, तसा.)

राजे (verified= न पडताळणी केलेला)

गांधी,

ही व्यक्ती नेता अथवा नायक म्हणून किंवा वयक्तीक जिवनामध्ये कशी ही असो पण एक मात्र ह्या व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळे जरुर होते की करोडो संख्येने त्यांचे अनुयायी त्याच्या एका आवाजावर रस्त्यावर येत ही व परत जात ही.

ह्यांचे महत्व किती अथवा ह्यांनी काय केले ह्या पेक्षा जास्त महत्वाचे आहे की आजच्या दिवशी ह्यांचा उपयोग कोणी व कसा केला ह्या बद्द्ल लिहण्याचा, कारण आम्ही तुम्ही ज्या समाजामध्ये वावरलो त्यामध्ये गांधीला महात्मा तर बनवले गेलेच पण आपले नशिब की त्यांना विष्णूचा अवतार मानून पुजा चालू केली गेली नाही. पण आपली जी येणारी पिढी आहे ती सर्व गोष्टीचे नित विष्लेशन करुन मग ठरवेल की कोण योग्य होते व कोण नाही, आज तुम्ही आम्ही जितके जमेल तितके लेखन करत राहू, उद्याची जी पिढी आहे ती व्यवस्थीत सर्व काही वाचेल व मगच निर्णय घेईल हा नुस्ताच आशावाद नाही आहे तर विश्वास आहे, कारण जितके आम्ही तुम्ही गांधी विरोधात लिहतो वाचतो आहोत इतके भाग्य आपल्या मागील पिढीला नव्हते हे सर्वजण मान्य करतील.

राजे
(*हेच राज जैन आहेत)

विकास

आजचा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून जाहीर केला आहे. (अर्थात त्याला सर्व राष्ट्रांनी अनुमोदन दिलेले नाही!).

त्या निमित्ताच्या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सार्वजानीक सभेपुढे भारतसरकारच्या अधिकृत प्रतिनिधी म्हणून सोनीया गांधींचे भाषण असणार होते. भारतसरकार तर्फे "सोनीयाजी आणि राहूलजी" हे गांधीजींचे नाव रोशन करायला न्यू यॉर्क मधे आले आहेत. त्यांच्याबरोबर परराष्ट्रमंत्री "प्रणव मुखर्जीजी" आणि "आनंद शर्मा जी" पण आलेले आहेत. (मला टूलबार दिसत नसल्यामुळे संपूर्ण लिंक खाली चिकटवत आहे.)

http://news.google.com/news/url?sa=t&ct=:ePkh8BM9EwLbwQq0w4CFGFsy8wCSUw…

आग्या वेताळ

गांधीबाबाला शिव्या घालताय व्हय?कुनी पायतानानं हानत न्हाई म्हनून कायबी कोकलतायसा काय रं? तिच्यायला, बामनांननी माजोरी घातलीया.त्यात हमेशा कोकनी बामनं लई फुडं..
आरं, गांधीबाबा खरा हिंदू व्हता.त्येला कळ्ळं व्हतं खरा हिंदू म्हंजे काय ते. तुमी म्हंतायसा त्यो हिंदू पैल्यापासूनच अहिंसावादी व्हता रं,लेकाच्यांनो. बाबानं फकस्त त्येला तत्त्वज्ञान बनिवलं. त्येला काय खुळा समजता काय रे?
तुमच्या सावरकरानं काय क्येलं?बकबक करून काय मिळ्ळं?"हिंदूहृदयसम्राट". कसलं काय?काय बी झालं न्हाई तेच्या हातनं.

बोला महात्मा गांधी की जय
नाद करायचा न्हाई
---------------
मजकूर संपादित : सदर प्रतिसादात अश्लील शिव्या आढळयाने प्रतिसाद संपादित करण्यात आलेला आहे.
-मिसळपाव पंचायत

विकास

आग्या वेताळ राव,

आपल्या प्रतिक्रीयेतील शाब्दीक हिंसा आणि आपण धारण केलेलेे नाव पाहून "हेची फळ काय मम तपाला" असेच त्या महात्मास वाटेल! या चर्चेची सुरवात करताना श्री. भारतकुमार राऊत यांचा जो लेख दिला होता तो याच संदर्भात होता. पण आपण कुठल्याशा कृष्णधवल चष्म्यातून जग पाहात आहात असे दिसतयं..

अशाच वृत्ती पाहून कुसुमाग्रजांची कविता परत परत आठवते ज्यात शिवाजी, टिळक, आंबेडकर, फुले आणि गांधीजी यांचे पुतळे मध्यरात्री आपापल्या व्यथा व्यक्त करायला भेटतात. शिवाजी म्हणतो की मला फक्त मराठ्यांचे समजले जाते, टिळक म्हणतात मला ब्राम्हण, फुले म्हणतात मला फक्त माळ्यांचा तर आंबेडकर खंत व्यक्त करतात की मला फक्त दलीतांचा... गांधीजी बिचारे गप्प असतात. त्यांना इतर पुढारी जेंव्हा विचारतात तेंव्हा ते म्हण्तात, तुम्ही नशिबवान आहात, तुमच्या मागे तुमच्याअ तथाकथीत जाती तरी आहेत, माझ्या मागे फक्त सरकारी भिंती...

राजे (verified= न पडताळणी केलेला)

तुम्ही नाव देखील आपल्या कार्याला साजेल असेच घेतले आहे, अभिनंदन.

तुम्ही आपल्या मुला-बाळाच्या समोर व स्त्रींच्या समोर समाजामध्ये कसे वागत असाल ह्याची शक्यतो तुम्ही चुणुक दाखवली आहे.
तुमचे विचार व लेखन पध्दती पाहता तुम्ही एकमेव आहात जो गांधीजींच्या विचारांचा वारसा पुढेच नाहीतर युगे न युगे लोकांच्या समोर मनोगत पासून ठेवण्याचा प्रयत्न करत आहात, तुम्ही जे कोणी आहात तुमच्या सारखा महत्वाचा व्यक्ती येथे नव्हता ह्याचा आनंद आज संपला. मिसळपाव वर व्यक्तीस्वातंत्र आहे हे वाचून होतो पण येथे शिव्या व इतर शब्दांचा वापर देखील मुक्तपणे कोणी ही करु शकतो हे पाहून अत्यंत आनंद झाला.
तुमचे देखील स्वागत आहे.

..... दम असेल तर सरळ स्वतःच्या नावाने लेखन करु दाखवा.

असे माझ्या सारखे लिहणारे अनेक जण तुम्हाला भेटतील येथे पण तुम्ही कोणाच्या नादी न लागता असेच लोकप्रिय लेखन चालू ठेवावे ही विनंती, सर्कीट साहबांना तुमचा आयपी सापडलाच असेल , काही प्रतिसाद, लेखन अजून करा तुमचा संपुर्ण पत्ताच येथे कोणी ना कोणी ठेवेल ही आशा.

राजे
(*हेच राज जैन आहेत)

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

हिंदू म्हणजे गांधीबाबाला जे कळले, ते तुमच्या आग्याशब्दांत सांगाल का ?
गांधींनी हिंदू ह्या शब्दाची काय व्याख्या केली ?
ती प्रचलित व्याख्येला कितपत सहमत होती ?
सावरकरांनी असे काय केले, की त्यांना हल्लीचे घरगुती क्रांतीवीर हिंदुहृदय सम्राट म्हणतात ?
असे सगळे छान लिहा.

- (देशस्थ-ऋग्वेदी-ब्राह्मण-हिंदुहृदयसम्राट) सर्किट

प्रमोद देव

मजकूर संपादित : सदर प्रतिसादात अश्लील शिव्या आढळयाने प्रतिसाद संपादित करण्यात आलेला आहे.
-मिसळपाव पंचायत

मूळ प्रतिसाद मी वाचलेला नाहीये.तरीही वरचा शेरा पाहून आश्चर्य मात्र वाटले.

शिव्या आढळल्यामुळे प्रतिसाद संपादित केला हे ठिक झाले , पण काही तास तरी सन्माननीय मिसळप्रेमीने काय लिहिले हे वाचकाला कळू दिले पाहिजे असे वाटते !

अर्थात मिसळपाव पंचायतीने घेतलेला निर्णय योग्यच असेल आणि आम्ही त्याचे (निवडणूकीपर्यंत)समर्थन करतो. पण गावकरी लोकांनाही कळू द्या राव ! गावातल्या कोणता कच-याची विल्हेवाट लावली आहे म्हणून ! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

श्री. वेताळ ह्यांचा मूळ प्रतिसाद मी वाचला होता. त्यात मला तरी आक्षेपार्ह असे काहीही आढळले नाही, म्हणजे "आयमायच्या" शिव्या नव्हत्या. तरीही हा प्रतिसाद संपादित झाला ह्याबद्दल खेद होतो. निवडणुकातील उमेदवारांना असे प्रतिसाद आपण संपादित कराल का, असा प्रश्न विचारायला हवा.

- सर्किट

आजानुकर्ण

खरे आहे. वेताळ यांचा प्रतिसाद वाचला नसला तरी तो संपादित झाला याबद्दल खेद वाटतो.

विसोबा खेचर

खरे आहे. वेताळ यांचा प्रतिसाद वाचला नसला तरी तो संपादित झाला याबद्दल खेद वाटतो.

वेताळाचा प्रतिसाद काय होता हे मलाही माहिती नाही, पण काय रे आजानुकर्णा, वेताळचा प्रतिसाद तू वाचला नाहीस ना? मग तुला खेद कशाचा वाटतो?? ज्या अर्थी तो संपादित झाला आहे त्या अर्थी पंचायत समितीला त्यात काहीतरी आक्षेपार्ह वाटले असणार म्हणूनच तो संपादित केला गेला ना? मग तुला खेद कशाचा वाटतो??

तू स्वतः पंचायत समितीवर आहेस आणि असं असताना पंचायत समितीपैकीच (इतर चौघांपैकी कुणीतरी) तो प्रतिसाद संपादित केला असताना सदर प्रतिसाद संपादित केल्याबद्दल जर तू 'खेद वाटतो' म्हणून जाहीर गळे काढत असशील तर पंचायत समितीवरील इतर चौघांवर तुझा विश्वास नाही असंच म्हणायला हवं!

'खेद वाटतो' असं जाहीरपणे म्हणण्याआधी पंचायत समितीवरील तुझ्या इतर चौघां सहकार्‍यांना एक साधा व्य नि पाठवून, विश्वासात घेऊन सदर प्रतिसाद का व कुणी संपादित केला असं तुला विचारावंसं वाटलं नाही??

'+१ करून खेद वाटतो' असं म्हणणं खूप सोप्प आहे!!

माझा पंचायत समितीवर पूर्ण विश्वास आहे आणि 'ज्या अर्थी त्यांनी हे पाऊल उचलले आहे त्या अर्थी त्यात त्यांना नक्कीच काहितरी आक्षेपार्ह वाटलं असणार असंच मी विश्वासाने म्हणेन!!

असो..

तात्या.

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

एका संपादकाने मूळ प्रतिसादात दिलेल्या शिव्या मला प्रत्यक्ष कळवल्या. त्या वाचून त्या "आयमायच्याच" आहेत ह्याची खात्री पटली. कुठल्याही सार्वजनिक संकेतस्थळावर अशा शिव्या प्रकाशित होऊ नयेत, ह्या मताचा मी आहे. संपादकांवर टीका केल्याबद्दल क्षमस्व. त्यांच्या निर्णयाशी मी सहमत आहे.

- (खजील) सर्किट

एका संपादकाने मूळ प्रतिसादात दिलेल्या शिव्या मला प्रत्यक्ष कळवल्या. त्या वाचून त्या "आयमायच्याच" आहेत ह्याची खात्री पटली. कुठल्याही सार्वजनिक संकेतस्थळावर अशा शिव्या प्रकाशित होऊ नयेत, ह्या मताचा मी आहे. संपादकांवर टीका केल्याबद्दल क्षमस्व. त्यांच्या निर्णयाशी मी सहमत आहे.

हेच म्हणतो !

(खजील आणि शिव्या वाचून बधीर झालेला )
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राजे (verified= न पडताळणी केलेला)

तुमचा उप-प्रतिसाद वाचला नव्हता क्षमा असावी.

*प्रतिसाद पुन्हा लिहला आहे *

राजे
(*हेच राज जैन आहेत)

विसोबा खेचर

मूळ प्रतिसाद मी वाचलेला नाहीये.तरीही वरचा शेरा पाहून आश्चर्य मात्र वाटले.

प्रमोदकाका,

मूळ प्रतिसाद आपण वाचलेला नसताना संपादनाचा शेरा पाहून आपल्याला आश्चर्य कसं वाटलं हे कळेल का?? ज्या अर्थी वेताळाच्या प्रतिसादातला काही भाग संपादित झालेला आहे त्या अर्थी पंचायत समितीला त्यात नक्कीच काहितरी आक्षेपार्ह वाटलं असणार ना??

असो..

(पंचायत समितीवर पूर्ण विश्वास असलेला) तात्या.

मजकूर संपादित : सदर प्रतिसादात अश्लील शिव्या आढळयाने प्रतिसाद संपादित करण्यात आलेला आहे.
-मिसळपाव पंचायत

कारण मूळ विषय बाजूला राहतो व चर्चा इतकी भरकटते कि मूळ पदावर येणे अवघड होते.
प्रकाश घाटपांडे

टग्या (verified= न पडताळणी केलेला)

गांधीजींना अशा संपादनाबाबत नेमकं काय वाटलं असतं?

गांधीजींना अशा संपादनाबाबत नेमकं काय वाटलं असतं?

हा खरंच हायपोथेटिकल निबंधाचा विषय असू शकतो. प.वि. वर्तकांनी गांधीजींच्या आत्म्याला बोलावून हा प्रश्न विचारायला हरकत नाही.
प्रकाश घाटपांडे

राजे (verified= न पडताळणी केलेला)

गांधीजी चे उत्तर असे असून शकेल
"ज्याने लिहले आहे, त्याला आवडले ना ? मग, आपल्याला काही हरकत नसावी, पण हिंसेला हिंसा हेच उत्तर नाही तसेच अपशब्दांना अपशब्द हे देखील उत्तर नाही, कोणी तुमच्या आयाबहीणींना शिव्या घालत असेल तर तुम्ही शिव्या न देता, त्याला प्रेमाने समजावून सांगा"

बघा माझा वरील आग्या वेताळ ह्यांना दिलेला प्रतिसादामध्ये मी शब्दशः गांधी अहिंसेचे समर्थन केले आहे .

[ येथे शब्दशः हा शब्द महत्वाचा आहे, कारण येथे महाजालावर हिंसा करता येत नाही व शाब्दीक हिंसेवर माझा विश्वास नाही, सरळ पकडा, मारा व पुन्हा आपटुन मारा ह्या बाण्यावर पुर्ण विश्वास आहे... ;}]

राजे
(*हेच राज जैन आहेत)

चित्रा

>>आपल्यास काय वाटले त्याचे मतप्रदर्शन जरूर करा. फक्त शिळ्या कढीला उत आणू नका अशी विनंती करावीशी वाटते.

पहिले म्हणजे राऊतांचा लेख चांगला आहे, विचार करायला लावणारा आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे गांधीजी राहिले असते तर काय झाले असते ते राऊतांना वाटले तसे त्यांनी मांडले आहे. ते खरेही आहे. पण दोष केवळ एका राजकिय पक्षाचा नाही, गांधीजींच्या शिकवणुकीचाही नाही. सावरकरांनीही माझ्या माहितीप्रमाणे आपली भूमिका अनेक वेळा स्पष्ट केली आहे, कदाचित गांधी त्यात कमी पडले असावेत. दोष असला तर तो गांधींची /किंवा कोणत्याही नेत्याचीच भूमिका समजून घेण्यात, त्यांना प्रश्न विचारण्यात, त्यातील योग्य/कमी अपायकारक गोष्टी उचलण्यात आणि अयोग्य/जास्त अपायकारक टाकून देण्यात भारतीय कमी पडले याचा आहे (अजूनही पडतात). दोष असला तर तो ज्याप्रकारे आपण नागरिक सत्तेपासून दूर राहण्यात भूषण मानत गेलो त्याचा (हा त्या काळाच्या निरागसपणाचा/ वेडेपणाचाच/का नेत्यांच्या शिकवणुकीचाच एक भाग होता - अंधविश्वास?).

ही बहुतेक शिळी कढी ठरू नये - निदान "इथे" तरी.

प्रियाली

भरतकुमार राऊत यांचा लेख आवडला. प्रतिसादांतील गांधीविरोधी मुक्ताफळांविषयी न बोलणे उत्तम!

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

स्वतःला न पटणार्‍या गोष्टींविषयी न बोलणे उत्त्तम असे विधान आपल्याकडून अपेक्षित नव्हते.

गांधींंचे लिखाण आणि वक्तव्ये वाचून माझे असे मत झाले आहे, की ह्या व्यक्तीला सगळ्या कॉम्प्लेक्स सिचुएशन्स सोप्या शब्दात मांडून स्वतःचे मत त्याविषयी व्यक्त करण्याची शैली होती.

माझ्या अंगी अशी शैली यावी, हे माझे स्वप्न आहे.

अशा प्रकारे आपण लिखाण करू शकू का?

- सर्किट

सहज

>>गांधींंचे लिखाण आणि वक्तव्ये वाचून माझे असे मत झाले आहे, की ह्या व्यक्तीला सगळ्या कॉम्प्लेक्स सिचुएशन्स सोप्या शब्दात मांडून स्वतःचे मत त्याविषयी व्यक्त करण्याची शैली होती.

माझ्या अंगी अशी शैली यावी, हे माझे स्वप्न आहे.

मला देखील तेच वाटते.

कोणी काहीही म्हणा मला महात्मा गांधी एक मोठे व्यक्तिमत्व वाटते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. पण ते आजकालच्या राजकारण्यांकडून, वृत्तप्रत्रातून राजकीय (पक्षीय) विचारसरणी पसरवणार्‍या जेष्ठ पत्रकारांकडून नाही तर स्वतःचे स्व:ताच. त्यांची मत जरूर ऐका पण जे कोणी "मोठी" लोक जे काही लिहतात ते तसेच्या तसे १००% मानणे, घेणे म्हणजे स्वतःच स्वःताच्या बुद्धीला कमी लेखणे आहे.

टग्या (verified= न पडताळणी केलेला)

> कोणी काहीही म्हणा मला महात्मा गांधी एक मोठे व्यक्तिमत्व वाटते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे.

मोठे व्यक्तिमत्त्व तर निश्चितच! किंबहुना मी तर म्हणेन की भारतवर्षात होऊन गेलेला तो सर्वश्रेष्ठ टग्या होता. काहीही होवो, आणि कोणीही काहीही म्हणो, तरीही आपल्याला पटलेल्या मार्गाशी, तत्त्वांशी एकनिष्ठ राहून, आपले म्हणणे खरे करून दाखवण्याची आणि ते जनतेच्या गळी उतरवण्याची हिंमत आणि ताकद या माणसात होती. 'बन्दे में था दम' हे खरेच!

शिकण्यासारखे म्हणाल, तर म्हटले तर बरेच आहे, पण त्यासाठी लागणारी ती स्वयंएकनिष्ठतेची पातळी आपल्यापैकी बहुतांश जणात नसावी. या माणसाला शिव्या देणे सोपे आहे, आणि या माणसाची सगळीच मते, सगळेच विचार पटलेच पाहिजेत असा आग्रहही नाही, परंतु पटलेल्या आणि पत्करलेल्या मार्गापासून कोणत्याही परिस्थितीत विचलित न होता कार्य करत राहणे ही सगळ्यांच्याच "बस"ची बात नाही. आणि तात्त्विक पातळीवर या माणसास हरवू न शकलेली - किंबहुना त्या पातळीच्या जवळपासही पोहोचू न शकलेली - मंडळीच अशा व्यक्तीच्या हत्येचा विचारसुद्धा करू शकतात.

त्या महान टग्यास या लहान टग्याकडून भावपूर्ण आदरांजली!

कोलबेर

अगदी खरंय.. आणि त्यामुळेच 'लगे रहो' चा मी जाम फ्यान आहे. गांधीजींची टींगल टवाळी करुन टाळ्या आणि शिट्टया वसूल करणे सोपे आहे पण अगदी पीटातल्या प्रेक्षकांकडून सुद्धा गांधीजींच्या 'विचारांवर' टाळ्या आणि शिट्ट्या वसूल करणे मला नाही वाटत कुणाच्या कल्पनेत तरी बसले असते का. त्यामुळेच ह्या चित्रपटाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.. माझ्या मते हीच गांधीजींच्या विचारांना वाहिलेली सर्वात मोठी आदरांजली आहे.

- (लगे रहो फ्यान) कोलबेर

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

गांधीजींच्या जीवनाविषयी, त्यांचे लेखन, आणि वक्तव्य हे मी आजवर जे काही वाचले आहे, त्याबद्दल "महान टग्या" हे विशेषण अत्यंत योग्य, आणि आदरार्थी आहे. लहान टग्याच्या क्रिएटिव्हिटीचे अत्यंत कौतुक करावेसे वातते !!!

- सर्किट

तो

गांधी बहोत बडा भाई था. उसने अंग्रेजोंकी वाट लगा दी थी. वगैरे वर्णन लगे रहो मध्ये ऐकल्यासारखे वाटते. टगोबांच्या क्रिएटिव्हिटीवर त्याच्या प्रभाव असणे शक्य आहे.

अर्थात स्वतःही टगे असण्यात क्रिएटिव्हिटी आहे ती आहेच.

तो

किंबहुना मी तर म्हणेन की भारतवर्षात होऊन गेलेला तो सर्वश्रेष्ठ टग्या होता.

प्रियाली

>>स्वतःला न पटणार्‍या गोष्टींविषयी न बोलणे उत्त्तम असे विधान आपल्याकडून अपेक्षित नव्हते.

खरंय! पण जगातल्या सर्व मठ्ठांना सत्यासत्यता दाखवायचा मक्ता घेतलेला नाही मी. गांधींवरती वाट्टेल ती शस्त्रं सोडली म्हणून त्यांचे महत्त्व तसूभर कमी होत नाही आणि होणारही नाही तेव्हा करू दे कंठशोष!

>>सगळ्या कॉम्प्लेक्स सिचुएशन्स सोप्या शब्दात मांडून स्वतःचे मत त्याविषयी व्यक्त करण्याची शैली होती.

मुक्ताफळे उधळणार्‍या व्यक्तींसाठी आय डोण्ट केअर अ xxx! ये अपुनकी शैली है! (कृपया ह. घेणे)

आजानुकर्ण

अवचटांनी लिहिलेला हा लेख सुंदर आहे. विशेषतः"गांधी ही वृत्ती" व "बुळा बनवणे" या वाक्प्रयोगांसंदर्भात.

अजानुकर्णा तुझ्या समयसूचकतेला सलाम रे बाबा! अत्यंत योग्य वेळी योग्य लेख लोकांच्या समोर आणलास.
प्रकाश घाटपांडे

विसुनाना

भरतकुमारांच्या वैचारीक कडबोळ्यापेक्षा हा लेख कितीतरी पटीने स्पष्ट आहे.
गांधीजी या व्यक्तीला समजून घेण्यासाठी अवचटांचा हा लेख फारच उपयुक्त वाटला.

नंदन

म्हणतो. अचूक टायमिंग आणि प्लेसमेंट :). अवचटांचा लेख सुरेख, अप्रतिम वगैरे विशेषणांच्या पलीकडचा आहे.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्णा,

अवचट ह्या माणसाने, गांधींना नुसते दैवत बनवून ठेवलेले नाही, तर त्यांना नीट समजून घेतले आहे, ह्याची प्रचिती आली ह्या लेखांतून. मुरलिधर देविदास आमटे, ह्या व्यक्तीविषयीही माझे असेच मत झाले आहे. गांधींविषयी लिहिलेले वाचावे, तर अशा व्यक्तींचे विचार.

- सर्किट

आजानुकर्ण

+१
युरोपियन माणसाने म्हटलेले "गांधीजी काय फक्त तुमचेच होते का?" हे वाक्य वाचल्यावर गळा दाटून आला.

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

हेच एखाद्या ब्राह्मणाने एखाद्या दलिताला म्हटले असते, तर आणखीच गळा दाटून आला असता.

- सर्किट

खरंच गदगदलो. अजानुकर्णाला धन्यवाद यासाठी की योग्य वेळी, योग्य ठिकाणी ,योग्य लेख पुरवला म्हणुन.
प्रकाश घाटपांडे

प्रियाली

लेख फारच सुंदर. गांधींना इतकं समजून लिहिलेले अद्याप वाचले नव्हते.

सर्किटशेट,

कान सोनारानेच टोचावे असं वाटतं बुवा कधीतरी! या लेखाने ते सफल झाले असे वाटले.

भूमिगत राहून मूठभर इंग्रजांचे खून करून १९४७ पूर्वीच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे वेडे स्वप्न पाहणार्‍यांपेक्षा, त्यांच्यासमोर उभा राहून आपले दात तोडून घेणारा नेता मला नेहमीच आवडला आहे.

----
अस्मादिकांनी येथे सोनाराने कान ओढावे असे लिहिले होते. त्यावर खरडवहीतून आमचेच कान ओढले गेले. हल्ली सगळे कान टोचल्यापेक्षा ओढलेलेच दिसतात त्याला काय करावे? हा दोष त्या लंबकर्ण अजानुचा!

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कान सोनारानेच टोचावे असं वाटतं बुवा कधीतरी! या लेखाने ते सफल झाले असे वाटले.

अगदी खरे आहे. आम्ही ऐरण आणि घण घेऊन बसलो होतो :-)
म्हणजे " सौ लुहार की आणि एक सुनार की" असं उल्टंच योग्य म्हणताय तर !

- (लोहार) सर्किट

तो

दुवा कुठे आहे??

सहज

ह्याला म्हणतात लेख. सोप्या शब्दात, आपल्याला समजू, लागू पडेल, उपयोग होईल असे.

तोवरची चर्चा म्हणजे ती शिळी कढीच. नुस्ते राजकीय भाषण, पुस्तकी छापील वक्तव्य. तेच आरोप..

प्रत्येकाने माझे सत्याचे प्रयोग जरूर (परत) वाचा. त्या पुस्तकाने माझ्यावर खूप प्रभाव केला आहे.

अवचटांनी काय योग्य शब्दात मर्म सांगीतले आहे. अजून काही बोलयची गरज नाही आहे.

विकास

हा लेख फारच चांगला आहे. त्यांच्यावर (गांधीजींवर) अंबरीश मिश्र यांचे "गंगे वरती गगन निवळले" हे पुस्तक वाचताना त्यांच्यातील जे अनेक गुण कळले तसे वाटले - अवचटांची शैली आवडत असल्याने जास्तच वाटले.

फक्त राहून राहून गांधीजींच्या बाबतीत एक प्रश्न पडतो की ते राजकारणी होण्याऐवजी केवळ समाजधुरीणच झाले असते तर ते त्यांच्या साठी आणि देशासाठी अधीकयोग्य झाले असते का?

चित्रा

अवचटांचे सर्व लिखाण उत्तम असते तसाच हा लेख आहे, आवडला. आभारी आहे, आजानुकर्ण.

राघव

सुंदर लेख.
विकास यांनी दिलेला भारतकुमारांचा लेखही चांगला.
पण आजानुकर्णांनी दिलेला अवचटांचा लेख त्याहून छान. दोघांसही धन्यवाद. :)

मुमुक्षू

प्राजु

हा अवचट यांनी लिहिलेला लेख छान आहे. धन्यवाद सदर लेखासाठी.

राजे (verified= न पडताळणी केलेला)

गोंडसे व गांधी दोन वेग-वेगळी मते, दोन वेगळे विचार व दोन अत्यंत टोकाचे आपल्या मतावर ठाम असलेल्या व्यक्ती.

गोंड्से ह्यांच्या जवळ सबळ कारण होते की गांधी हत्या का केली,
तर गोंडसे अथवा इतर कोणी हत्या करावी इतकी अहींसा पुजा गांधीजीं नी केली होती.

शक्यतो, आजच्या घडिला विचार करणे जरा विचित्रच वाटते की गोंडसे ह्यांनी हत्या का केली असावी, जर गांधीजी एक महान व्यक्तीत्व असे न समजता, अथवा त्यांची महात्मा ही पदवी जरा थोडा वेळ बाजूला ठेवली तर लक्षात येते की खरोखर गोंडसे बरोबर होते.

काही मुद्दे जेथे गांधीजीच्या चुकांची किमत इतकी मोठी होती की अनेकांची घरेदारे उधवस्त झाली अनेक देशोधडीला लागली, गांधीजींना मोठे केले ते इंग्रजांनी काय कारण असावे ? जरा विचार केला तर टिळक मृत्यू नंतर कोणी सशक्त असा संपुर्ण देशात नेता कोणीच नव्हता, व काही चांगल्या प्रयत्नामुळे / कार्यामुळे गांधी हे नाव अल्प वेळातच देशातील जनतेच्या तोंडी बसले व इंग्रजांनी त्याचा पुरेपुर फायदा करुन घेतला, जेव्हा भगत सिंग काळ चालू झाला होता तेव्हाच गांधी ह्यांच्या प्रतिमेला व विचारांना धक्का बसला होता कारण एखाद्या नेत्याची संपुर्ण ताकत ही त्याच्या आसपास असणा-या समर्थकांच्यावर अवलंबून असते पण आझाद व भगत सिंगमुळे त्यांच्या समर्थकांमध्येच कुजबुज वाढली व त्याच वेळी गांधीजींनी भगत सिंग ह्यांचा संपुर्ण स्वातंत्र्य हा नारा आपलासा केला व आपल्या नावावर खपवला.

मुस्लीम समाजाला नको तितकी मदत करुन त्यांना डोक्यावर चढवले ते गांधी जींनी.
जिना ह्यांच्या डोक्यात पाकीस्तानचे खुळ कोठून आले हे सर्वांना माहीतच आहे पण त्याला खतपाणी दिले ते गांधी ह्यांनी.
मोठ मोठी आंदोलने शुल्लक गोष्टींसाठी मागे घेतली व त्यामुळे समाजावर पडणारा भार अथवा कमजोर होणारी लढाई ह्यांच्याकडे त्यांनी कधीच लक्ष दिले नाही.
त्यांनी फक्त नेहरु साठी आपला स्पेशल अजेंडा चालवला हे सगळ्या जगाला माहीत आहे,

गरज नसताना पंजाब मधील हिंदूना मुस्लिम मारत आहेत तर मारु देत तुम्ही शस्त्र हाती घेऊ नका हा सल्ला दिला व स्वत: कलकत्तामध्ये जाऊन मुस्लिम समाजाला समजवण्याचे नाटक चालू केले व उपासाला बसले, वीस लाखाच्यावर लोकांना बसलेला विभाजनाचा तडाका त्यांना दिसला नाही मात्र काही मुस्लिम मारले जाताच ह्यांच्या पोटात कळ आली हे विरोधा भास दिसत नाहीत ?

जिना ह्यानी न मागताच ५० कोटी दिले व त्याचा उपयोग आपल्याच देशा विरुध्द केला गेला हे सर्वांना माहीत आहे १९४७-४८ ची भारत-पाक लढाई त्याच पैश्याच्या जोरावर पाकिस्तान ने लढली.

ह्यांच्या उपासामुळे काय झाले हे कधी कळाले नाही पण सुभाष बाबू सारखे नेते मात्र देशा पासून दुर जाऊन लढाई चा मार्ग शोधू लागले, जर तोच कालावधी सुभाष बाबूंचा येथे आपल्या देशात संघटन, लढाई मजबुत करण्यात लागला असता तर विभाजन न होता भारत आझाद झाला असता.

एक मानव म्हणून गांधी खरोखर महान आहे ह्यात वाद नाही पण एक नेता म्हणून ते अपयशीच ठरतात, काय केले हे महत्वाचे नसून काय झाले हे महत्वाचे आहे.

त्यावेळी आपल्या पैकी कोणी सर्व समजेल इतका समजूतदार नसावा [जो अनिल अवचटांचा लेख दिला आहे त्यात ते देखील लिहतात की ते त्यावेळी चार वर्षाचे होते... क्या बात है.. त्यांच्या स्मरणशक्तीची दाद द्यावयास हवीच] अथवा नसावाच.

राजे
(*हेच राज जैन आहेत)

सखाराम_गटणे™

लेख आवडला.
विचार सगळे संतुलित आहेत. गांधीजीचे विचार चांगले आहेत.

----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.