जनातलं, मनातलं

अपयशाचे व्यवस्थापन

Primary tabs

माजी राष्ट्रपती अब्दूल कलाम यांचे व्हार्टन इंडीया इ़कॉनॉमिक फोरम मध्ये भाषण झाले. (२२ मार्च २००८) ते सर्वच वाचण्यासारखे आहे. पण त्यातील खालील भाग मला विरोपातून मिळाला. आवडल्यामुळे त्याचे स्वैर भाषांतर करून येथे देत आहे:

प्रश्नः आपण सांगू शकाल का की नेतृत्वाने अपयशाचे व्यवस्थापन कसे करायचे असते ते?

डॉ. कलामः मी तुम्हाला माझ्याच अनुभवावर आधारीत याचे उत्तर देतो. १९७३ साली मी इस्रोचा एसएलव्ही-३ प्रकल्पाचा डायरेक्टर झालो. रोहीणी उपग्रह हा १९८० मधे आंतराळात सोडण्याचे आमचे ध्येय होते. मला लागणारे वित्तबळ आणि मनुष्यबळ दिले गेले होते पण अशी अटही होती की १९८० मधे हा उपग्रह आंतराळात जायलाच पाहीजे.

१९७९ च्या ऑंगस्टच्या सुमारास आम्हाला वाटले आमची तयारी झाली आहे. आम्ही लाँचची तयारी केली. प्रक्षेपणाच्या आधी चार मिनिटे संगणक सर्व खातरजमा करत होता आणि एक मिनिट आधी त्याने प्रक्षेपण थांबवले. पण तज्ञांनी सांगीतले की काळजीचे कारण नाही. सर्व गणितांप्रमाणे सर्व काही नीट पार पडेल आणि जास्तीचे इंधन आहेच. म्हणून मी संगणकाला बाजूस करुन (बायपास करून) प्रक्षेपणाची तयारी चालू केली. प्रक्षेपण केले, पहीला टप्पा यशस्वी झाला आणि दुसर्‍या टप्प्यात गडबड झाली आणि उपग्रह बंगालच्या उपसागरात कोसळला. खूप मोठे अपयश होते ते.

त्या दिवशी पाऊण तासात इस्रोचे प्रमुख संचालक प्रो. सतीश धवन यांनी श्रीहरीकोटासच पत्रकार परीषद बोलावली. स्वतः धवन - इस्त्रोचे नेतृत्वच, जगभरच्या पत्रकारांसमोर उभे राहीले आणि संपूर्ण अपयशाची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली. ते म्हणाले की खूप कष्ट आमच्या माणसांनी (टीमवर्क ) घेतले पण त्यांना अजून तांत्रीक मदतीची अवशक्यता होती. पुढे ते म्हणाले की पुढच्या वर्षी हीच टीम नक्की यशस्वी होवून दाखवेल. वास्तवीक त्या प्रकल्पाची जबाबदारी डायरेक्टर म्हणून माझी होती, पण इस्रो प्रमुख म्हणून त्यांनी ती स्वतःच्या खांद्यावर घेतली.

पुढच्याच वर्षी जुलै १९८० ला आम्ही यशस्वी पद्धतीने उपग्रहाचे प्रक्षेपण केले. संपूर्ण राष्ट्रभर आनंदी आनंद झाला. परत पत्रकार परीषद भरवली. मात्र यावेळेस प्रो. धवन म्हणाले की, "आज तू माध्यमांशी बोलायचेस".

त्या दिवशी मी आयुष्यातील महत्वाचा धडा शिकलो, अपयश हे कायम नेतृत्वाने घ्यावे पण यश मात्र आपल्या गटाला/टिमला द्यावे. उत्तम व्यवस्थापनाचा (बेस्ट मॅनेजमेंटचा) धडा हा मी पुस्तक वाचून शिकलो नाही तर आयुष्यात अनुभवलेल्या या प्रसंगातून शिकलो.

शितल

डॉ. कलाम या॑च्या बद्दलचा असलेला आदर हे वाचुन अजुनही वाढला, तसे त्या॑चे अग्निप॑ख हे मी वाचले आहे आणि सर्व भारतीया॑नी ते वाचावे अशी इच्छा. अवघ्या ३ ते ४ बॅगा घेऊन राष्टपती भवन सोडणारे ते पहिलेच राष्टपती असावेत.

डॉ. कलाम या॑चा बद्दल अत्य्॑त आदर असलेली.
शितल

मैत्र

हा लेख आणि मूळ दुवा मिपावर आणल्याबद्द्ल... कलामांसारखे दहा जण जर भारतात पुढे आले तर देशात नक्कीच सुधारणा होइल..
त्यांचा एक एक विचार आपल्या व्यक्तिगत प्रॉब्लेम्स वर उपाय ठरेल... आणि काय विलक्षण आशावादी आहे हा माणूस... साध्या रोजच्या त्रासाने - बॉस, सहकारी, कामाचं स्वरुप, कामाचा ताण, सार्वजनिक सोयी, विविध ग्राहक सहाय्य वाल्यांचे अनुभव यानेच वैताग येतो...
कलाम कुठेही काहीही निगेटिव्ह बोलत नाहीत.. सगळे सरकारी अनुभव काय उत्तम असतील ? शक्यच नाही..
सलाम त्यांच्या सरळपणाला... मराठी प्रतिशब्द मिळत नाहीये म्हणून मूळ शब्द तसाच लिहितो त्या लेखातला - Integrity..
मिपाकरांनी लेखानंतर मूळ दुवा जरुर वाचावा...
विकास.. पुन्हा आभार...

सहज

इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. अतिशय अभिमानास्पद कामगिरी त्यांनी केली आहे व करत आहेत. अश्या सकारात्मक अनुभवातुन माणूस नक्कीच जास्त शिकतो व जास्त प्रयत्न करुन दाखवतो. बाकी इतर सरकारी खात्यात बॉस बळीचा बकरा शोधत असेलच. घाटपांडे साहेबांना जास्त माहीती असेल.

बाकी बॉस च्या बाबत फिरोज खानच्या चित्रपटातील [तिथे ते साथिदाराबाबत आहे] एक गाणे आठवते, तितकेच लागु आहे - हर किसीको नही मिलता... :-)

मनस्वी

त्या दिवशी मी आयुष्यातील महत्वाचा धडा शिकलो, अपयश हे कायम नेतृत्वाने घ्यावे पण यश मात्र आपल्या गटाला/टिमला द्यावे. उत्तम व्यवस्थापनाचा (बेस्ट मॅनेजमेंटचा) धडा हा मी पुस्तक वाचून शिकलो नाही तर आयुष्यात अनुभवलेल्या या प्रसंगातून शिकलो.

कलाम यांच्या विषयीच्या आदर हे वाचून नक्कीच वाढला, ह्या अशा व्यक्ती हीच तर भारताची खरी संपत्ती!
विकास,भाषांतराबद्दल धन्यवाद,
स्वाती

धमाल मुलगा

"Learning gives creativity.
Creativity leads to thinking.
Thinking provides knowledge.
Knowledge makes you great."
- डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम.

त्या दिवशी मी आयुष्यातील महत्वाचा धडा शिकलो, अपयश हे कायम नेतृत्वाने घ्यावे पण यश मात्र आपल्या गटाला/टिमला द्यावे. उत्तम व्यवस्थापनाचा (बेस्ट मॅनेजमेंटचा) धडा हा मी पुस्तक वाचून शिकलो नाही तर आयुष्यात अनुभवलेल्या या प्रसंगातून शिकलो.

सुंदर!
विकासराव, धन्यवाद.

'अजातशत्रू' म्हणतात ते कलामसाहेबांसारख्यानाच. मला नाही वाटत उभ्या हिंदुस्थानात त्यांच्याविषयी आदर नसलेला एकही मनुष्य सापडेल.
अतिशय संतुलीत मनोवृत्ती, विज्ञाननिष्ठा, आणि आपल्या कामाप्रती तळमळ असलेल्या त्या महान व्यक्तिबद्दलचा आदर आणखी वाढला.

इथे लिन्क दिल्याबद्द्ल धन्यवाद.
माझे आवडते राष्ट्र्पती म्हणून पण त्या अगोदर एक माणूस म्हणून आवडतात.
त्यांच्या पुस्तकाचे तर पारायण होते

अवांतरः तसेच एक होता कार्व्हर हे एक पुस्तक माझे आवडते आहे.

प्राजु

सुंदर लेख.
हि सगळी माहिती इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
आणि कलाम यांना मानाचा मुजरा...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय

चांगला धडा!

अशा शिकवणुकीच्या बाबतीत बहुतेकदा माझे "कळते पण वळत नाही". इथेच गाडे अडते.

चतुरंग

व्यवस्थापनातला एक अतिशय महान धडा अशा पध्दतीने समोर ठेवावा हे फारच उच्च!
हा दुवा दिल्याबद्दल अभिनंदन विकास!

कलाम महान शास्त्रज्ञ तर आहेतच पण एक माणूस म्हणून ते जास्त महान आहेत असे माझे प्रामाणिक मत.
त्यांचे 'अग्निपंख' एकदा वाचून थांबता येत नाहीच. पुनःपुन्हा वाचावे असे सुंदर पुस्तक!

चतुरंग

राघव

हे विचार येथे आणल्याबद्दल.
डॉ. धवन यांचे कौतुक तर केलेच पाहिजे, अन् सोबत त्या प्रसंगातून योग्य ते शिकण्याची तयारी दाखवणार्‍या द्रष्ट्या व्यक्तीचेही!
आपल्याही आजुबाजुला अनेक गोष्टी घडत असतात. शिकण्याची मानसिक तयारी असेल तर त्याचा उपयोग आपल्याला आयुष्यात करता येतो.

(अभ्यासू) मुमुक्षू