या निमित्ताने ज्या भागात माओवादी झपाट्याने पसरत आहेत तेथिल लोकांची चाललेली लुबाडणूक, त्याबाबत डॉ. सेनसारख्या लोकांनी उठवलेला आवाज, आणि सरकारने नेहमीच्या पद्धतीने आरंभलेला दडपशाहीचा वरवंटा हे सगळेच परत ऐरणीवर येत आहे.
जरा विस्ताराने लिहाल का?
(१)तेथिल लोकांची चाललेली लुबाडणूक,
कोण लुबाडणुक करीत आहे ते समजावुन सांगा
(२)त्याबाबत डॉ. सेनसारख्या लोकांनी उठवलेला आवाज
म्हणजे कोणाविरूध्द आवाज उठवला?
(३)सरकारने नेहमीच्या पद्धतीने आरंभलेला दडपशाहीचा वरवंटा
सरकार कोणावर दडपशाहीचा वरवंटा फिरवत आहे?
ह्याबरोबरच माओवादी म्हणजेच नक्सलवाद्यांबद्दलची माहिती आणि आपले मत वाचायला आवडेल.
या पूर्णच विषयाचे आणि विशेषतः डॉ. सेन यांच्या प्रकरणाबद्दलचे माझे आकलन अगदीच कमी आहे. त्यामुळे उत्तरं मी पण शोधतो आहे. शिवाय लुबाडणूक, दडपशाही वगैरेंवर जालावर तसेच पुस्तकातून भरपूर माहिती उपलब्ध आहेच. मध्यंतरी इथे मिपावरच नक्षलवादावर एक दोन अतिशय उत्तम चर्चा झाल्या.
नक्षलवाद ही विषवल्ली आहेच. पण दुर्दैवाने इथे दुसरी बाजू, सरकारची, ती तितकीच काळी आहे. यात भरडला जातोय सामान्य आदिवासी. असो.
मी ज्याप्रकारे धागा टाकला आहे, त्यावरून मी माओवाद्यांचे समर्थन करीत आहे वगैरे अभिनिवेष कृपया घेऊ नये. माझा तुमच्या प्रतिसादावरून तरी तसा समज होत आहे. तो चुकीचा असावा अशी आशा करतो.
पण लेखानातुन जे दिसत आहे ते दुर्दैवाने तसेच आहे. म्हणूनच मी "खूलासा करा" किंवा "सविस्तर लिहा" असे म्हणले.
तुमच्या प्रतिसादावरून जो माझ्याबद्दल गैरसमज झालेला तो दूर होईल अशी आशा आहे.
आता माहिती बरोबरच तुमचे स्वत:चे समजुन घ्यायचे आहे. हा धागा टाकुन आता दिडवर्षापेक्षा जास्त काळ झाला. एव्हाना तुमचा (स्वतःचा) अभ्यास झाला असेल. नव्हे नक्कीच झाला असणारे.
तेंव्हा आता स्वतःचे मत मांडा. फकत इकडचे तीकडचे रिपोर्ट नका पोस्ट करु.
दीड वर्ष झालंय वगैरे खरं आहेच. एक तर समस्या जटिल व अनंतपदरी आहे. त्यात परत मी काही पूर्णवेळ त्यात पडलो नाही, पडू शकत नाही. लांबून जे काही दिसतं, माझ्यापेक्षा किंचित अजून जवळ असलेल्यांच्याशी बोलताना जे कळतं / जाणवतं, माध्यमांतून जे काही समोर येतं अशा वर्तुळाच्या परिघाच्याबाहेरच्या स्त्रोतांवरच माझे आकलन सध्या तरी अवलंबून आहे. मात्र, माझ्या पद्धतीने, यथामति, यथाशक्ती या समस्येशी कनेक्टेड रहायचा प्रयत्न नक्कीच असतो. त्यामुळे माझा अभ्यास झाला आहे असं विधान करणं अतिशय धाडसी, नव्हे मूर्खपणाचंच ठरेल, आणि तो मूर्खपणा मी करणार नाहीच. ;)
सध्या तरी माझं मत अशा दिशेने आहे : व्यवस्थेतील त्रुटी किंवा व्यवस्थेतील निर्बलांवर सबलांकडून होणारे अन्याय या विरूद्ध न्याय मागण्यासाठी एक चळवळ उभी राहिली. या चळवळीने हिंसेचा, किंबहुना आत्यंतिक हिंसेचा अंगिकार केला. कालौघात ही चळवळही स्वत:च एक व्यवस्था बनली. पण मूलभूत स्वरूपामुळे ती त्या मूळ व्यवस्थेचा एक भाग वगैरे न बनता, तिची प्रतिस्पर्धी बनली. त्यामुळे आता व्यवस्था१ आणि व्यवस्था२ असा झगडा सुरू झाला. व्यवस्था म्हणली की मग हितसंबंध वगैरे आलेच. ते ही तयार झाले. व्यवस्थेत अनेक घटकांचा अंतर्भाव असतो. या घटकांना केवळ स्वत:चा फ़ायदा हवा असतो. त्यामुळे त्यांची बांधिलकी फ़क्त स्वत:शी असते, स्वत:च्या फ़ायद्याशी / अस्तित्व टिकवून ठेवण्याशी असते. हे हेतू येनकेनप्रकारेण साध्य करण्यासाठी ते एकाच वेळी या दोन्ही व्यवस्थांशी हातमिळवणी करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. आणि, या व्यवस्थांनाही, टिकून राहण्यासाठी अशा हातमिळवण्य़ांची गरज असतेच. हळूहळू ’एकमेका साह्य करूं, आणि तगून राहू’ हेच तत्त्व बलाढ्य ठरते. "थोडं तुम्ही सरकून घ्या, थोडं आम्ही सरकून घेतो. अॅडजस्ट करा!" हेच चालू होते. मात्र हे सगळे होत असताना, तो निर्बल ज्याच्यासाठी हे सगळे सुरू झालेले असते तो मात्र पिचतच राहतो. आता तर तो या दोन व्यवस्थांच्या मधे सापडतो. "आम्ही काय वाट्टेल ते करू, तू मात्र आमचंच ऐकायचं!" असं दोन्हीकडून दटावलं जातं. आणि एकाचं ऐकलं तर दुसरा ठोकतो. And the story continues...! :(
उद्या या निर्बलांच्या उद्धारासाठी अजून एक तिसरीच शक्ती दंड थोपटून या दोन्ही व्यवस्थांच्या विरूद्ध उभी राहिली तरी मला आश्चर्य वाटणार नाही.
महेंद्र कर्मा / सलवा जुडुम पुरतं बोलायचं तर, माझं आकलन इतपत : हिंसेचा पुरस्कार करणार्या अतिरेक्यांशी लढताना लोकतांत्रिक, संवैधानिक मार्गाने जात राहूनही अनेकानेक गोष्टी करता येतात / केल्या जाऊ शकतात. काही तुरळक अधिकारी ते करतानाही दिसतात. मात्र, व्यापक पातळीवर, व्यवस्थात्मक पातळीवर फारसे काही केले जात नाही. विकासात्मक अथवा संवैधानिक मार्गाने काही करायचे नाही, आणि एकदम सामान्य आदिवासींच्या हातात शस्त्रं देऊन एक मोकाट टोळी उभी करायची हे कोणत्याही दृष्टीने योग्य नव्हेच. असे केल्याने, सामान्य जनतेलाच हिंसक बनवले गेले. सलवा जुडुम बद्दल सर्वोच्च न्यायालयानेच ताशेरे ओढले आहेत आणि त्यांच्याच आदेशाने ते बंदही करावे लागले. आता आपण सुप्रिम कोर्टालाच जुमानणार नसू तर मग आपल्यात आणि माओवाद्यांमधे फारसा फरक राहत नाहीच.
डॉ. बिनायक सेन यांच्या संदर्भात : या बाबतीत मात्र मी अजूनही संभ्रमावस्थेत आहे. मला मत बनवण्याइतकी पुरेशी आणि विश्वासार्ह माहिती मिळवता आली नाहीये. कधी काही मत बनवलेच तर तुमच्याशी जरूर चर्चा करेन. पण मानवाधिकारवाले काहीही म्हणोत, सेन यांनाही सर्वोच्च न्यायालयाकडूनच दिलासा मिळाला आहे ही बाबही महत्त्वाची आहे. याच धाग्यावर या निकालाच्या अनुषंगाने काही लिहिले गेले आहे ते समजून घ्यावे लागेल.
***
अजून एक : 'हिंदू' मधील रामचंद्र गुहांचा आजचा हा एक लेख जरूर वाचा. खूप चांगल्या पद्धतीने विवेचन केले आहे. त्या संपूर्ण लेखातील एक वाक्य फार महत्त्वाचे आहे. तो संपूर्ण परिच्छेदच इथे उद्धृत करत आहे. (कळीचे वाक्य बोल्ड, अंडरलाइन करत आहे. मूळ लेखात ते तसे नाहीये.)
In the winter of 2006, after my experiences in Dantewada, I gave a public lecture in Bhubaneshwar. The State’s Chief Minister, Naveen Patnaik, was in the audience. I urged that the rash of mining leases being proposed by the State government on tribal land be stopped. As it happened, foreign and Indian mining companies were invited into the State, without any attempt to make adivasis stakeholders in these projects. The consequence is that Orissa, a State once completely free of Naxalites, has seen them acquiring considerable influence in several districts of the State.
मी जेव्हा या सगळ्याबद्दल समजून घेऊ लागलो तेव्हापासून मला पडलेला सगळ्यात मुख्य प्रश्न तो हाच. विकास करताना सामाजिक घटकांना बरोबर घेता येत नाही का? त्यांचा उच्छेद करूनच विकास साध्य होतो? विकासाला विरोधच असतो असे नाही. पण तो करताना ज्यांचा विनाश होणार आहे अशांना त्यात काहीच भूमिका घेऊ देऊ नये असे का? परत त्या विनाशाची किंमत तरी नीट आणि न्याय्यपद्धतीने चुकवावी. काही ठिकाणी, स्थानिकांचा लढा केवळ "आम्ही इथून उठायला तयार आहोत, आम्हाला प्रकल्पात भागिदारीही नको, पण पुनर्वसन तरी नीट आणि न्याय्य करा!" इतपतच मर्यादित आहे. एवढे मागणे नक्कीच फार नाही. फारतर काय, विकास प्रकल्पात भागिदार असलेल्यांचा नफा कमी होईल. पण मग 'लोकशाही, कल्याणकारी' राज्यात हक्क / न्याय महत्त्वाचे की नफा याचा काय सोक्षमोक्ष एकदाचा लागूनच जावा.
असो. लिहिण्यासारखे खूप आहे. पण मी लेखक नाही. नीट मांडणी करता येणे हे ही शिकतो आहे. त्यामुळे, अधिक चर्चा प्रत्यक्ष भेटीत करता येईल.
***
ता. क. : तुम्ही व मी ज्या पुण्यात राहतो, त्या शहराच्या उंबरठ्यावरही असे अनेक उद्योग चाललेले आहेतच. व्यवस्था१ स्वतःच व्यवस्था२ साठी सुपीक जमीन उपलब्ध करून देत आहे याचे भान कुणालाच नाही. आज छत्तिसगढमधे चालू आहे. फारच दूर की म्हणजे. जाउद्या! कोणाला फिकिर करत बसायला वेळ आहे? उद्या मात्र हे असले प्रकार तुमच्या माझ्या अंगणात सुरू झाले तर मग ते बळ वापरून बंद होतील? आणि इथे निपजलाच एखादा महेंद्र कर्मा, तर किती लोक भरती होतील त्या 'सलवा जुडुम'मधे? परत एकदा, असो. मी माझ्या पद्धतीने आकलन वाढवायचा प्रयत्न करत राहीनच, आणि जमेल तेवढे करतही राहीन. त्याहून अधिक माझ्या हाती तरी काहीच नाही.
बेस्ट लक टू ऑल ऑफ अस!
ह्या विषयातील ज्ञान अगदी तोकडे आहे. बिपीन ह्यांनी लिहील्याप्रमाणेच बरीचशी संभ्रमाची परिस्थिती आहे माझीही. श्रावण व आळश्यांचा राजा ह्या दोघांचाही ह्या विषयात चांगला अभ्यास आहे, त्यांच्याकडून काही वाचावयास मिळावे.
आणि अलिकडे माझी ह्या संबंधातील विचारधारणा अगदी एकांगी होऊ लागली आहे. आदिवासींचे, किंबहुना जगातील सर्वच, जाणूनबुजून म्हणा किंवा संवयीमुळे (तेच ते पुन्हा!) म्हणा, जगाच्या प्रवावाशी फटकून रहाणार्या समाजघटकांचे कौतुक इतरांनी कितपत करीत रहायचे, आणि त्यापायी त्या समाजाने, देशांनी काय किंमत खर्चायची असा प्रामाणिक प्रश्न अलिकडे मला पडू लागला आहे. माझे काही खरे नाही, बहुधा!
कुठलाही प्रश्न जर वेळच्या वेळी सोडवण्यात आला नाहि तर शेवटी त्या प्रश्नाकडे बघायचा समाजाचा दृष्टीकोन शेवटी असाच बनतो.
>>माझे काही खरे नाही, बहुधा!
न जाणो, तुम्ही जर अजुन नेटाने या विषयावर विचार केलात तर इतरांना सहजासहजी न दिसलेले पैलू समोर आणु शकाल..
अर्धवटराव
सहमत आहे.
थत्ते चाचांच्या बरोबरच 'निनाद...मुक्काम जर्मनी' ह्यांच्या देखील सर्वच विषयात गाढ अभ्यास आहे. त्यांचे मत जाणुन घ्यायला आवडेल.
आपले दोन पैसे :- १ वर्षाच्या छत्तीसगड मधल्या रहिवासात डॉ. सेन ह्यांचे नाव केवळ आणि केवळ वर्तमानपत्रातच दिसले. त्यांच्या विषयी साधी चर्चा देखील कानावर आली नाही. लोक एकतर त्या माणसाला ओळखतो अथवा हा माणूस माहिती आहे असेच दाखवायचे नाहीत किंवा 'बडे लोगोंकी बाते' म्हणुन विषय टाळायचे.
नक्षलवाद : समजा आणि समजवा.
http://vikramwalawalkar.blogspot.com/2010/01/blog-post_18.html
आणि हा आर.आर.आबांचा ब्लॉक
http://aabapatil.wordpress.com/
( कोणी लिहीले माहीत नाही. पण गोल गोल घुमवले आहे असे मला वाटते.)
Red Alert - नक्षलवादाचा रंग
http://www.vaibhavgaikwad.com/2010/09/red-alert.html
हे सगळे वाचल्यावरमाझे मत बरोबरच आहे. मला वाटते की ही आता चळवळ राहिली नसून स्थानीक पातळीवर "धंदा" अथवा "दरोडेखोरी" आणी ते बदलायची मानसीकता नसलेली राजकीय इच्छाशक्ती (त्यात साटेलोट्यची शक्यता नाकारता येत नाही) एव्हढेच उरलेले आहे.
"....माझ्यामते इंद्रराज काही प्रकाश टाकु शकले तर वाचायला आवडेल...."
धन्यवाद लालसा. डॉ.बिनायक सेन यांच्याबद्दल (झालेल्या शिक्षेबद्दल किंवा ती सुनावण्याच्या कारणाबद्दाल) या क्षणाला देशच काय पण आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील चर्चा चालू असून त्याना आयपीसी १२४ए व १२०बी (ज्यात "Sedition" विरूद्धच्या तरतुदी आहेत....या अंतर्गत क्रांतीविषयी थेट 'शस्त्रांसह अॅक्शन' इतकेच अभिप्रेत नसून 'भाषणातून चिथावणी' बद्दलही एखाद्यास दोषी धरता येते.... डॉ.सेन याना अर्थातच 'भाषण' कलमाखाली गोवले गेले आहे) अंतर्गत छ्त्तीसगड जिल्हा न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे, ज्यावर आता त्यांच्याबाजूने हाय कोर्टात अपील दाखल होईलच.
(लक्षात ठेवा : हा विषय "माओवादी चळवळ" आणि त्या अनुषंगाने घडत असलेल्या घटना अतिशय नाजुक असून मिपा सदस्यांनी इथे मत व्यक्त करताना - बाजूने असो वा विरूद्ध - अतिशय संयमाने भाषेचा वापर करावा ही आग्रहाची विनंती. कारण "माओवाद्या"शी (ज्याची व्याख्या 'देशद्रोही' अशी करण्यात आली आहे) ज्या पद्धतीने केन्द्र आणि राज्य सरकारे लढा देत आहेत ते पाहता माओ-चळवळीशी संबंधित सर्वच हालचालीवर नजर ठेवण्यासाठी PVAA (Prevention of Violent Activists Act) याची खास तरतूद करण्यात आली आहे ("मिसा" माहितच असेल...त्याच धर्तीवर). या अॅक्ट अंतर्गत एखादी संस्था वा व्यक्ती [किंवा व्यक्तींचा समूह] या विषयावर उघडपणे वा लिखित स्वरूपात मत मांडत असेल तर त्याची Implications जनसामान्यावर कोणत्या प्रकारे होतील वा होऊ शकतील हे पाहण्यासाठी Big Brother Is Watching धाटणीच्या काही सरकारमान्य संस्था कार्यरत आहेत (ज्यात जिल्हा बार असोसिएशनशी संबधीत वकील तर श्री.अण्णा हजारेसम (पण सरकारसाठी) व्यक्तीगत पातळीवर काम करणारे कार्यकर्तेही असू शकतात.)
(मिपा संपादक मंडळानेदेखील या धाग्यावर येणार्या प्रतिसादातील भाषेवर विशेष नजर ठेवावी.)
असो...या संदर्भात मला जी माहिती आहे, ती डॉ.बिनायक सेन यांच्या त्या भागातील आदिवासी लोकांसाठी कार्याची. ते कार्य देशातच नव्हे तर जगभर नावाजले जात असून डॉ.सेन अनेक पुरस्कारांचे मानकरीही ठरले आहेत. पण होते असे की, "आदिवासी" समाजाशी कार्य करणारा (तसेच त्यांच्या उन्नतीसाठी झगडणारा) प्रत्येक कार्यकर्ता त्या त्या राज्यातील गृह खात्याचा डोळ्यातील ठसठसणारा किडा असतो.
मला "डांग" या गुजरात राज्यातील एका मोठ्या जिल्ह्यात आदिवासींसाठी चाललेल्या कार्याची माहिती आहे, ज्याची सांगड डॉ.बिनायक सेन यांच्याच कार्याशी घालता येते. तेथेही (डांग मध्ये) आदिवासींसाठी कार्य करण्यासाठी महाराष्ट्रातून आलेले श्री.अविनाश कुलकर्णी (आज वय ५५-५६ असेल) याना गुजरात पोलिसांनी हकनाक "माओवादी" ठरवून आजही त्यांच्यावर तिथे Sedition तरतुदीखाली केस चालूच आहे. त्याना त्या कार्यात मदत करणारे स्थानिक श्री.आशिष पवार आणि श्री.भरत पवार या स्थानिक आदिवासी तरूणाकडून ते (कुलकर्णी) समाजात कोणत्या प्रकारचे भाषण करीत होते हे वदवून घेण्यात गुंतले आहेत. 'तेहेलका' ला दिलेल्या मुलाखतीत तर आशिष म्हणतो 'श्री.अविनाश कुलकर्णी आमच्यासाठी 'देव' आहेत....आणि आम्हाला माओ म्हणजे काय किंवा नक्षल हे काय आहे हे अजिबात माहित नाही'.... पण कायद्याच्या भाषेला असले खुलासे पचनी पडत नसल्याने जात्यात सर्वच भरडले जात आहेत.
विषयाची व्याप्ती मोठी आहे.....ज्वलंतही आहेच ! संपादक मंडळास वाटल्यास येथील अन्य तज्ज्ञांना तो पुढे नेण्याची विनंती करता येईल.
इन्द्रा
(लक्षात ठेवा : हा विषय .......
..........................................
.........................................
............ असू शकतात.)
हा परिच्छेद वाचून मजा वाटली. तिकडे त्यावर नजर ठेवत असतील, पण इथे? मिपावर सुध्दा?
अमेरिकेत म्हणे - अल्ला, प्रेसिडेंट... bomb हे शब्द कोणत्याही क्रमाने, कसल्याही अर्थाने फोनवर बोलताना उच्चारले जरी, तरी लगेच अटक होऊन चौकशी करतात म्हणे!!
तसे इथे भारतात होत असेल यावर माझा काडीमात्र विश्वास नाही. आपण प्रयोग करून बघु या.
जय माओवाद. जय माओवाद जय माओवाद.
"....आपण प्रयोग करून बघु या....!"
~ नो कॉमेन्ट्स.
माझ्या या विषयावरील म्हणण्याला तुम्हीच काय पण कुणीही विरोध करू शकतो, तो घटनेने सर्वांना दिलेला हक्कच आहे. पण "मजा वाटली" असे तरी प्लीज म्हणू नये ही माफक अपेक्षा.
इन्द्रा
तुमच्या म्हणण्याला विरोध करण्याचा काही संबंध नाही. उलट या चर्चेतून अधिक तपशील वाचायला मिळतील, त्यामुळे पुढे चर्चा वाचण्यास इच्छुक आहे.
पण तुमच्या प्रतिसादातील PVAA ...
......या अॅक्ट अंतर्गत एखादी संस्था वा व्यक्ती [किंवा व्यक्तींचा समूह] या विषयावर उघडपणे वा लिखित स्वरूपात मत मांडत असेल तर त्याची Implications जनसामान्यावर कोणत्या प्रकारे होतील वा होऊ शकतील हे पाहण्यासाठी Big Brother Is Watching धाटणीच्या काही सरकारमान्य संस्था कार्यरत आहेत....
....(मिपा संपादक मंडळानेदेखील या धाग्यावर येणार्या प्रतिसादातील भाषेवर विशेष नजर ठेवावी.)....
वगैरे घाबरवून सोडणारा टोन मजेशीर आहे.
महाराष्ट्रात लोक प्रतिनिधींनी जी लोकशाहे मार्गाने लुट चालवली आहे त्या पेक्षा माओ वाद बरा..लुटीतले थोडेफार तरी गरीबांना वाटतात..इथे तर सारे ...सुना..नातवंडे..काका मामा या>च्या सात पिढ्या साठीच.
हिंसेच्या आधारावर उभारलेले कोणतेही तत्वज्ञान निषेधार्ह आहे. पण फक्त निषेध करून (म्हणजेच मग पोलिसी कारवाई करून) काम भागत नाही. त्या हिंसेच्या मूळ कारणांचाही बंदोबस्त झाला पाहिजे.
निकाल लागला. न्याय झाला की नाही, हे माहिती नाही.
वरच्या कोर्टात हा निकाल टिकणार नाही. तकलादू आधारावर तो उभा आहे. निकाल टिकला तर सेन यांनी शिक्षा भोगली पाहिजे. "माझ्या धारणेचा विचार करता, मी गुन्हा केला नाही, पण तुम्ही त्याला गुन्हा मानत असाल तर मी शिक्षा भोगेन" ही भूमिका असली पाहिजे. सेन यांची या प्रश्नाविषयीची भूमिका योग्य आणि मानवी असेल तर त्यांना शिक्षा भोगावी लागणे हे समाजाचे अपयश असेल. ती बाब व्यवस्थेला अधिक निर्ढावली करणारी असेल. अशा वेळी दुसरीकडे हिंसेचा आधार घेऊन उभे राहिलेले लोक अधिक शिरजोर होतील (त्यांचे व्यवस्थेविषयीचे जे आक्षेप आहेत त्यांनाच त्यातून बळकटी मिळणार आहे; अशी बळकटी इतरही बाबींमुळे मिळतेच आणि अनेकदा युक्तिवाद असे केले जातात की बळकटी देण्याजोग्या बाबी नसल्या तरी व्यवस्थेविषयी घेतलेले आक्षेप चिकटतातही). त्या घडामोडीचे तेही एक 'फलीत' असेल. सूज्ञपणा नसेल तर यापलीकडे वेगळे काही अपेक्षीत धरता येणार नाही.
सेन यांना शिक्षा होत असेल तर माझा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडाला, अशा सुराच्या प्रतिक्रिया आत्ताच इंटरनेटवर काही ठिकाणी वाचल्या. त्या लिहिणारी मंडळी म्हणजे कोणी पिडीत, वंचित, गांजलेले आदिवासी, शेतमजूर नाहीत. ज्यांना माहितीचे स्रोत उपलब्ध आहेत अशा मंडळीतून ही प्रतिक्रिया येतेय. मग, त्या पिडीत, वंचित, गांजलेल्या आदिवासीची, शेतमजुराची प्रतिक्रिया तशीच झाली आणि त्यातून त्याने काही कृती केली तर ती, कायद्याच्या दृष्टीने रास्त नसली तरी, स्वाभाविक ठरेल.
संपूर्ण न्याय होण्यासाठी सेन यांच्या एकूण भूमिकेची झाडाझडती झाली पाहिजे. सेन यांच्याच नव्हे तर त्यांच्यासारख्या ज्या कोणाला माओवाद्यांचे सहानुभूतीदार म्हटले जाते त्या साऱ्यांच्याच. हिंसेच्या आधारावर उभ्या राहणाऱ्या गोष्टींचा त्यातून स्वीकार होतो आहे का, हे पाहिले पाहिजे. तसे होत असेल तर त्या मंडळींना अशा शिक्षांना सामोरे जावेच लागेल.
हिंसेचा अस्वीकार करताना शासनाचीही हिंसा अस्वीकृत मानली जाते आणि म्हणून त्याचा अर्थ प्रतिपक्षाच्या (म्हणजेच इथे माओवाद्यांच्या) हिंसेचा पुरस्कार असा घेतला जाणार असेल तर बाकी चर्चेची गरज नाही. निकाल लागला आहे. सेन यांनी न्यायप्रक्रियेला सामोरे जावे.
या धाग्याच्या निमित्ताने आत्ताच माझी या विषयावरील पूर्वीच्या एका चर्चेतील भूमिका पुन्हा वाचून काढली. आजही त्यात बदल झालेला नाही. ती भूमिका आणि वर इंद्रराज पवार यांनी दिलेला इशारा एका चौकटीत बसवला तेव्हा हे ध्यानी आले की, या भूमिकेबद्दल मलाही तशीच शिक्षा होऊ शकते. आता इथे हे जे लिहिले आहे, ते लेखन म्हणजेच राजद्रोहाचा कबुलीजबाब मानला जाऊ शकतो बहुदा. आता हाच युक्तिवाद थोडा ताणायचा ठरवला (जसे आत्ता सेन यांच्याबाबत झालेले दिसते) तर खुद्द आर. आर. पाटलांनाही अशा शिक्षेला सामोरे जावे लागेल असे दिसते. कारण त्यांच्या ब्लॉगवरही 'नक्षलवाद हा विकासाशी, लोकशाही व्यवस्थेशी निगडीत प्रश्न आहे, फक्त कायदा-सुव्यवस्थेचा नाही' असे काहीसे लेखन आहे.
आरांच्या प्रतिसादाची मीही वाट पाहतोय.
आरांच्या प्रतिसादाची मीही वाट पाहतोय.
मी सुद्धा आराराबांच्या प्रतिसादाची वाट पहातोय!
पण त्यांचा मिपावरला आयडी काय आहे?
(तो आयडी "टारझन" नसावा ही एकच त्या परमेश्वरचरणी प्रार्थना!!!!!!!!!!)
पण बाकी हा मुद्दा इतका गहन का व्हावा हे मला कळत नाही.
जर डॉक्टरसाहेब खरोखरच भारतीय घटना, संविधान किंवा लोकशाही किंवा एकंदरीत कायद्याच्या विरुद्ध काही बोलले-लिहिते झालेले नसतील तर त्यांना झालेली शिक्षा वरच्या न्यायालयात टिकणार नाही. आणि जर त्यांच्याकडून तशी कृती झालेली असेल तर त्यांचे त्यामागील हेतू वा पूर्वकार्य लक्षात न घेता त्यांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी.
श्री. जयप्रकाश नारायणांनाही ती झाली होती. कायद्याच्या समोर कोणीही लहान वा मोठा असू नये.....
जर डॉक्टरसाहेब खरोखरच भारतीय घटना, संविधान किंवा लोकशाही किंवा एकंदरीत कायद्याच्या विरुद्ध काही बोलले-लिहिते झालेले नसतील तर त्यांना झालेली शिक्षा वरच्या न्यायालयात टिकणार नाही. आणि जर त्यांच्याकडून तशी कृती झालेली असेल तर त्यांचे त्यामागील हेतू वा पूर्वकार्य लक्षात न घेता त्यांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी.
सहमत आहे.
पण बाकी हा मुद्दा इतका गहन का व्हावा हे मला कळत नाही.
मुद्दा गंभीर होतोय, कारण, आत्ताचा खटला तितका साधा-सरळ झालेला नाही. त्या खटल्याने पायंडा पडण्याची भीती आहे. ती अनेकांना भेडसावते आहे. मी वर म्हटलं तसं, इथं मी जे लिहिलं तेही त्या न्यायाने राजद्रोहाचे ठरेल. माझे सोडून द्या. पण फील्डवर काम करणाऱ्या अनेकांपुढे यातून प्रश्न उभे ठाकणार आहेत. कारण तिथं काहींचा तरी नक्कीच या माओवाद्यांपैकी, माओवाद्यांचे नेते सोडून द्या, पण गावातल्या शेवटच्या माणसाशी तर संबंध येतोच येतो. नुसताच नाही, तर तिथं अनेक प्रकारची देवाणघेवाण होते. त्यात वैद्यकीय सेवा ही प्रमुख असते. शिक्षण हा दुसरा भाग. अशा प्रत्येक माणसावर असा आरोप लावून आत टाकणं आणि लटकवणं सरकारला शक्य होईल असा हा पायंडा आहे. या प्रकरणात सेन यांना जामीन मिळाला तोही प्रदीर्घ काळ तुरुंगात काढल्यानंतर. सर्वोच्च न्यायालयातून. आरोपीला जामीनही मिळत नाही असे कायदे आहेत आणि त्यांच्या आधारावर ही प्रक्रिया चालवली जाते आहे. आजचा निकाल पुढे टिकणार नाही हे खरे, पण तोवर काय? खालच्या कोर्टातली लढाई थोडीच चुकते. म्हणजे त्यात वेळ, पैसा, श्रम हे सारे आलेच. तितका काळ कामाचाही खोळंबा.
राज्यसंस्थेच्या हाती हे नेमके कसले हत्यार जाऊन पडते आहे असा हा प्रश्न आहे.
यामुळं मुद्दा गंभीर होतोय.
खालच्या कोर्टातली लढाई थोडीच चुकते. म्हणजे त्यात वेळ, पैसा, श्रम हे सारे आलेच. तितका काळ कामाचाही खोळंबा.
तुम्ही म्हणता ते खरं आहे! पण आपणच एकदा लोकशाही संविधान स्वीकारलं की त्यामध्ये दिरंगाई ही अध्यारूतच आहे. आणि हुकुमशाहीत तडकाफडकी निर्णय होउन डायरेक्ट शूटिंङ रेंजला सामोरं जाण्यापेक्षा लोकशाहीतली दिरंगाई थोडीशी का होईन क्षम्यच आहे. दिरंगाई होउ नये ही आयडीयल केस पण प्रॅक्टिकल मॅटरवर ते कठीण आहे. सामाजिक काम करणार्या व्यक्तीकडून ते काही कायदाबाह्य वर्तन करत नाहीत ही अपेक्षा बाळगणं चुकीचं ठरू नये. हां, एखाद्या नोकरदार शाळाशिक्षक, नर्सकडून नकळत झालं तर गोष्ट वेगळी. (अर्थात, यांत डॉक्टरसाहेबांकडून तसे काही वर्तन झाले असेलच असे सुचवण्याचा मुळीच हेतू नाही)
राज्यसंस्थेच्या हाती हे नेमके कसले हत्यार जाऊन पडते आहे असा हा प्रश्न आहे.
हेही खरे आहे. पण नक्षलवाद ही इतकी भीषण समस्या झालेली आहे की तिच्याशी मुकाबला करायला कायदेही तसेच हवेत ना! नाहीतर ते इथे गावांत येऊन माणसे मारायचे आणि आपण त्यांच्यासाठी हेबियस कॉर्पसचा आग्रह धरायचो!!! सरकारी अन्यायाच्या कथा अनेक वाचतो आहे पण नक्षलवाद्यानी कधी त्यांना दोषी वाटत असलेल्या माणसांचा न्यायालये भरवून गोतमुखाने निवाडा केल्याचं वाचलेलं नाही. तिथे बंदूकच (भाग्य असल्यास बंदूक, नाहीतर विळे, कुर्हाडी आणि तलवारी) चालते ना!
मला हे समजतं की नक्षलवाद ही आर्थिक दरीतून निर्माण झालेली समस्या आहे. पण सरकारला शस्त्रांच्या बलावर आव्हान देणं हा यशस्वी पर्याय ठरणार नाही. सरकारच्या पाठीशी शस्त्रे, कायदे आणि मुख्य म्हणजे बहुसंख्य समाजाचा पाठिंबा आहे..
अर्थात आपण जाणकार आहां तेंव्हा काही अधिक उणे लिहिले असेल तर क्षमस्व.
खालच्या कोर्टात निकाल देताना जे मुद्दे दाखवले होते ते पहाता असे होणार असे वाटत होते.
(आणि तसे आधी नमूदसुध्दा केले होते.http://www.misalpav.com/node/16012#comment-271932
१) या नंतरसुद्धा कायद्याची प्रतिक्रीया असते.
२) न्याययंत्रणेवर विश्वास ठेवला पाहीजे असे मला वाटते.)
(खालच्या कोर्टात मुद्दामुन ठिसुळ पायावर निकाल दिला जाईल असे घडवुन आणले असेही आता कोणी म्हणतील ;) सेन यांना खालच्या कोर्टात शिक्षा झाल्यावरच्या काही प्रतिक्रीया "घडवुन आणले" अश्याच होत्या.)
चर्चा चांगलीच रंगली होती इथं. मी हा धागा वाचलाच नव्हता.
सुप्रीम कोर्टाने जामीन नुसताच दिला नाही. ज्या रीतीने कोर्टाने सरकारचा युक्तीवाद किंवा खालच्या कोर्टाचा निकाल जोखला आहे ते पाहता ही एक चपराकच दिसते आहे. गांधींचे आत्मचरित्र घरात असल्याने कोणी गांधीवादी होत नसतो, वगैरे कॉमेंट्स अगदीच फंडामेंटल स्वरूपाच्या दिसतात. मला आश्चर्य वाटलं ते गृहमंत्री चिदंबरम यांनी या निकालानंतर आनंद व्यक्त केल्याचं, किंवा वीरप्पा मोईली यांनी आता देशद्रोहाच्या कायद्याविषयी फेरमांडणी करण्याचे सूतोवाच करणे याचं. ही जाग आत्ता का येते? सेडिशनचा कायदा तर अगदी स्वातंत्र्याच्या आधीपासूनचाच आहे ना? गृहमंत्र्यांना आनंद कसला झाला? हे म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निकालाने कानफटात मारली गेली तरी आनंद वाटला म्हणण्यासारखे झाले. हे खरे की, खरी चपराक छत्तीसगड सरकारला आहे, पण केंद्राची जबाबदारी थोडीच संपते.
आता सेन यांची पुढची लढाई सुरू होईल.
मला दोन्ही वक्तव्यांचा अन्वयार्थ कळला नाही.
नक्षलवाद हा मोठा शत्रू असल्याचे सत्ताधारी वर्गाचे/पक्षाचे धोरण आहे असे वाटते. मग नक्षलवाद्यांना मदत करणारा सुटला याचा गृहमंत्र्यांना आनंद का वाटावा?
सेडिशनचा कायदा बदलायला हवा असे सेन यांना शिक्षा झाली तेव्हा मोईली बोलले नाहीत उलट सेन यांची सुटका झाल्यावर बोलले. त्या अर्थी "कायदा ड्रॅकोनियन आहे म्हणून बदलायला हवा" असे मोईली यांना वाटत नसावे. तर या कायद्याच्या सध्याच्या स्वरूपात आरोपी सुटू शकतो म्हणून "सुटताच येणार नाही असे बदल कायद्यात करायला हवे" असे मोईली यांना वाटत असावे.
नितिन थत्ते,
मला या दोघांच्याही वक्तव्यावर तुमच्यासारखेच प्रश्न पडले. म्हणून मी म्हटलं की आश्चर्य वाटलं.
चिदंबरम् यांच्यासंदर्भात तुम्ही म्हणता तेच लागू होते. पण एकूणच या प्रश्नावर हा माणूस मला तरी खोटारडा वाटत आला आहे. टेंभा मिरवणारा असतो तसा. त्यांचा एकूण पवित्रा माओवादासंदर्भात तुच्छतेचा असतो. मला त्यांची एक मुलाखत आठवते. त्यात ते म्हणत होते, "मी युद्ध म्हणत नाही, तेच (माओवादी) म्हणतात. मी त्यांना शत्रू मानत नाही. तेच (माओवादी) आम्हाला शत्रू मानतात." देशाचे गृहमंत्री असे कसे बोलतात? त्यांच्यात ही नैतीक आणि व्यावहारिक हिंमत हवी की, हो माओवाद्यांशी आमचे युद्ध सुरू आहे, कारण त्यांनी युद्ध पुकारले आहे, असं त्यानं म्हटलं पाहिजे. पण चिंदबरम् यांच्यात ही (प्रामुख्याने नैतीक) हिंमत दिसत नाही. मग तुच्छतावाद हा आसरा होतो. त्यातून हा प्रश्न थोडाच सुटणार आहे. चिदंबरम् हे किती नाही म्हटलं तरी एलाईट. ते असेच वागणार म्हणा.
मोईली यांचे मतही संशयास्पद आहे. हा कायदा ड्रॅकोनियन आहे का? सेन यांच्यासंदर्भात खालच्या कोर्टाने दिलेला निकाल आणि त्याची सर्वोच्च न्यायालयाने केवळ एकाच तात्वीक मुद्यावर केलेली चिरफाड पाहता मला असे वाटते की, कायदा ड्रॅकोनियन नाही. कायद्याचा वापर करू पाहणारे त्या वृत्तीने वागतात. कायद्याचा अर्थच चुकीचा, आणि म्हणून ड्रॅकोनियन, लावला तर तो कायद्याचा दोष नाही ठरू शकत, असे मला वाटते, त्यामुळे मोईली यांना नेमके काय म्हणायचे आहे, हा प्रश्न माझ्याही समोर आला.
चिंतामणी,
चिंदबरम् यांचा आनंद त्या राजकीय स्तरावरचा नाही. कारण या मुद्यावर त्यांच्यात आणि रमणसिंग यांच्यात फारसा फरक आहे, असे मला तरी दिसत नाही. दोघं एकाच बाजूचे आहेत. म्हणून चिदंबरम् यांच्या आनंदाविषयी शंकाच आहेत. तो आनंद त्यांनी व्यक्त केला आहे, तो आपण सर्वोच्च न्यायालय मानतो हे दाखवण्यासाठी. एरवी आतमध्ये त्यांची प्रचंड जळजळ झालेली असेल.
देशद्रोह करणे हे भारत देशात फार सोपे झाले आहे असे वाटते. त्यामुळे ब्रिटिश राजवटीची आठवण येते. त्यामुळे स्वातंत्र्य या संकल्पनेविषयी मूलभूत प्रश्न पडतात.
Political language -- and with variations this is true of all political parties, from Conservatives to Anarchists -- is designed to make lies sound truthful and murder respectable, and to give an appearance of solidity to pure wind.
- George Orwell, "Politics and the English Language", 1946
विनायक सेन यांना झालेली शिक्षा ही गंभीर बाब आहे. नक्षलवाद व नक्षली हिंसा यांची चर्चा बाजूला ठेऊन विनायक सेन यांना झालेल्या शिक्षेकडे पहायला हवं. ज्या ‘गुन्ह्याबाबत” हि शिक्षा झाली असं म्हटलं जात आहे त्याबाबत पुरेसा पुरावा नाही. तरीही येवढी मोठी शिक्षा दिली जात असेल तर नक्कीच भारतातील लोकशाहीच धोक्यात यईल. विनायक सेन हे हिसाचाराच्या विरुद्ध होते पन आदिवासींच्या न्यायाच्या बाजूने होते.
"Nobody is giving up violence. Neither the state nor the Maoists are giving up violence. I am interested in furthering my cause, which is the cause of peace with justice.- DR BINAYAK SEN
विनायक सेन यांच्या संबंधी महिती देणारी लिंक:-
http://www.binayaksen.net/2010/12/amnesty-statement/#more-2047
धन्यावद परा
सेन ह्यांना झालेली शिक्षा व त्या शिक्षेचे कारण माझ्या मते मीप वरील तज्ञांना (ह्या विषयावरील ) काही प्रतिक्रिया देण्यात थांबवत असेल बहुदा .
बाकी इंद्रराज ह्यांचा मुद्दा रास्त आहे ,मुळात मुद्दा असा आहे कि सेन ह्यांचा शिक्षा झाली ती योग्य का अयोग्य ह्या पेक्षा सर्वात महत्वाचे ह्या परिस्थितीचा फायदा बाहेरील शक्तींना होऊ नये .मला सेन ह्यांच्या विषयी फारशी माहिती नाही .त्यामुळे त्यांच्या शिक्षेबाबत मी बोलू शकत नाही .पण नक्षलवादाचे कारण प्रादेशिक असमतोल आहे हे कुणीही सांगेन .पण हा प्रादेशिक असमतोल देशात सर्वत्र आहे त्यामुळे काही असंतुष्ट लोक सरकार विरुध्ध हिंसक मार्ग वापरतात .त्यांना खुपदा विदेशी शक्तींचे पाठबळ मिळते . साहजिकच नक्षलवाद देशाला त्याच्या अखंडतेला धोका आहे .पण त्याच वेळी सरकारने हा प्रादेशिक असमतोल भरून काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे (नुकतेच वल्ड बँक मधून भारताला रस्ते बांधण्यासाठी काही करोडोचे कर्ज मिळाले .वृत्तपत्रात त्याचा फायदा छत्तीस गड व आदी राज्यांना होणार असे जाहीर झाले. .पण असे प्रत्यक्षात होत नसेल तर प्रत्येक वेळी शेतकरी आत्महत्या नाही करणार. कधी तरी बंदूक उचलेल ..तेव्हा अश्या राज्यामध्ये उद्योगधंदे वाढले पाहिजे .साक्षरता व विकास ह्या राज्यात झाला पाहिजे असे मला वाटते. ,पाकिस्तानातील प्रसार माध्येमे नेहमीच भारतातील किती जिल्हे नक्षलवादी असून सरकारचे तेथे काहीच चालत नाही असे जेव्हा सांगायचे तेव्हा ह्याहून वेगळे ह्यांना काही बोलता येते का ? अस मला वाटायचे. पण जेव्हा आपल्या माजी गृह मंत्र्यांनी हा नक्षलवाद देशाचा सर्वात मोठा शत्रू आहे . असे सांगितले तेव्हा ह्या विषयाकडे गाभिर्याने पहायची वेळ आली . आपले ७० पोलीस जंगलात बॉम्ब स्फोट ने उडवले जातात . तेव्हा त्याचे प्रसारमाध्यमे/ कागळे काका चर्चा करत नाहीत . .आपल्या चर्चा महाचर्चा शहर व शहरी मुद्दे ह्या भोवती असतात. .आज शेती ह्या विषयाकडे आधुनिक रित्या व यांत्रिकीकरण व पाण्याचे नियोजन करून केली पाहिजे ,गडकरी जेव्हा तेल अलीव ला गेले तेव्हा माओवादी नक्षलवाद संपविण्यासाठी इस्रायेल महत्वाची भूमिका निभावू शकेन असे सांगितले ते योग्यच आहे .त्याची लिंक .खालि देत आहे.
नक्षलवाद हा आधुनिक तंत्र व शस्त्र ह्यांच्या सहाय्याने संपवला पाहिजे . त्यासाठी सम दम दंड भेद सर्वच वापर केल पाहिजे ,आयबी व रॉ ह्यांनी संयुक्त मोहिमा आखल्या पाहिजे .फोडा आणि राज्य करा ह्या जुन्या पण प्रभावी शस्त्राचा वापर केला पाहिजे .उदा एकेकाळची आसामची प्रमुख संघटना उल्फा आज आपापसात भांडणे करून विविध गटात विभागली गेली .म्हणून कमजोर झाली .आज ह्याच अंतर्गत भांडणामुळे त्याचे नेता परेश ह्यांचा मुलाचे अपहरण झाले .आहे सध्या .तसेस त्यांचे अनेक नेते पकडले गेले आहेत ,ह्यासाठी बांगला देशी सरकारने त्यांच्या देशात विशेष महिमा हाती घेतल्या आहेत .(बांगला देश मध्ये आपली प्रचंड व्यापारी गुंवणूक झालेली आहे .व पाकडे त्यामुळे बांगलादेशी सरकार भारताच्या तालावर नाचत आहे असा आरोप करत आहे .पण आजही तेथील कट्टर पंथीय लोकांना पाकिस्तानी आय एस आय जवळचे वाटते . मुळात नक्षलवाद दूर करण्यासाठी स्थानिक जनता आपल्या पाठीशी हवी .त्यासाठी तेथे विकास हवा .दोन वेळचे जेवण व संध्याकाळी टेलीविजन ची अर्थहीन करमणूक शहरात लोकांना मिळते .म्हणून कितीही भ्रष्टाचार झाले तरी शहरी लोक शांत असतात .माझ्या मते भांडवलदरांनी योग्य मार्गाद्वारे ह्या राज्यांमध्ये विकास केला पाहिजे .
राहिला प्रश्न सेन ह्यांचा तर भारतीय न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे ,त्यामुळे हि शिक्षा यीग्या असावी व त्यासाठी अजून वरची कोर्ट आहेत .बाकी प्रश्न राहिला राहिला त्यांच्या विकास कार्याचा तर आपल्याकडे बंग दांपत्य/ प्रकाश आमटे सुध्धा आदिवासी भागात विकास कार्य करत आहेत .पण म्हणून जनतेला सरकार विरुध्ध चिथावणी देत नाही. .हजारे ह्यांनी रावेळ सिद्धी गाव विकसित केले .मात्र अवध्या महारष्ट्रातील गावे ह्याच मार्गाने नेण्यापेक्षा त्यांनी उपोषण करून भ्रष्टाचार ह्या मुद्यावर आवज उठवला .मला वाटते ,जनतेचा विकास जनताच करू शकते अर्थात सरकारने ह्या निन्मित्ताने गरिबांना मध्यमवर्गीय गटात जितके आणता येईल तितके आणण्याचा प्रयत्न करावा . कारण ह्या मध्यमवर्गीय बाजारपेठेचे आकर्षण देशी नाही तर विदेशी उद्योग जगताला सुध्धा आहे .म्हणू ह्या जगताने पुढाकार घेतला पाहिजे .वेदांत समूहाला जेव्हा भारतात उद्योग धंदे करायला अडचण येते तर बिमारू राज्ये कशी विक्सातीत होतील ह्या साठी राज्य सरकार व केंद्र सरकारला आपले राजकीय मतभेद सोडून वागले पाहिजे .मुळात परदेशातून जेव्हा उद्योग धंदे भारतात येतात .तेव्हा यहा पे पैसा खिलाव तो कुचाभी करत सकते है हि धारणा वोडाफोन व वेदांत च्या निम्मिताने समस्त उद्योगजगताला झाली हि चांगली गोष्ट आहे .http://www.indianexpress.com/news/gadkari-seeks-israel-help-against-naxals/725371/
१)राहिला प्रश्न सेन ह्यांचा तर भारतीय न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे ,त्यामुळे हि शिक्षा यीग्या असावी व त्यासाठी अजून वरची कोर्ट आहेत .बाकी प्रश्न राहिला राहिला त्यांच्या विकास कार्याचा तर आपल्याकडे बंग दांपत्य/ प्रकाश आमटे सुध्धा आदिवासी भागात विकास कार्य करत आहेत .पण म्हणून जनतेला सरकार विरुध्ध चिथावणी देत नाही. .हजारे ह्यांनी रावेळ सिद्धी गाव विकसित केले .मात्र अवध्या महारष्ट्रातील गावे ह्याच मार्गाने नेण्यापेक्षा त्यांनी उपोषण करून भ्रष्टाचार ह्या मुद्यावर आवज उठवला .मला वाटते ,जनतेचा विकास जनताच करू शकते अर्थात सरकारने ह्या निन्मित्ताने गरिबांना मध्यमवर्गीय गटात जितके आणता येईल तितके आणण्याचा प्रयत्न करावा .
२)मुळात परदेशातून जेव्हा उद्योग धंदे भारतात येतात .तेव्हा यहा पे पैसा खिलाव तो कुचाभी करत सकते है हि धारणा वोडाफोन व वेदांत च्या निम्मिताने समस्त उद्योगजगताला झाली हि चांगली गोष्ट आहे
निनाद- Well said.
हाहाहाहा... बिका, ही केस कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही वरच्या कोर्टात. कारण तिच्यात दम नाही. पण या खटल्याच्या प्रक्रियेतच अडकून पडता कामा नये, कारण त्याचा फैसला वरच्या कोर्टात होणार आहेच. सेन आणि तत्समांच्या भूमिकांची झाडाझडतीच केली पाहिजे आणि ते अधिक महत्त्वाचे.
"....गोंधळ वाढतो आहे..."
शिक्षा सुनावण्यामागील "न्यायालयीन" भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. मी जाणीवपूर्वक न्यायालयीन ही संज्ञा अधोरेखीत करीत आहे, ते अशासाठी की अगदी थेट १८७२ (होय १८७२) पासूनच्या तरतुदींचा अगदी किस काढून शिक्षेमागील कारणांची मीमांसा करण्यात आली आहे. असे हे करावेच लागते अन्यथा जन्मठेपेची शिक्षा ही काय केवळ आहे हातात कलम, दिला पोलिसांनी आरोपाचा दाखला, आणि सुनावली शिक्षा असे होत नाही. तुम्हा आम्हाला (आणि इथल्या बहुतांशी सदस्यांना) जर माओवाद, नक्षलवादी चळवळी, आदिवासी समस्या, विकास कार्यक्रमाची फळे चाखायला न मिळालेला तत्सम दुर्लक्षित वर्ग, प्रकल्पग्रस्त, वैफल्याने ग्रासलेली बेकारांची फौज, आणि त्यासाठी खर्या अर्थाने झटणारी अगदी बाबा आमटे, प्रकाश, विकास आमटे, मेधा पाटकर, बंग दांपत्य, अवि.कुलकर्णी, सुरेखा दळवी तसेच चर्चेतील डॉ.सेन ही ठळक नावे शिवाय अगदी तळागाळापर्यंत जाऊन प्रतिकूल परिस्थितीही काम करणारे अगणित छोटेमोठे कार्यकर्ते जर माहित असतील तर न्यायालयीन पातळीवर काम करणार्या अधिकारी वर्गाला त्या व्यक्ती किंवा त्यांच्या कार्याची महती माहित नसेल असे मानण्याचे कारण नसते.
पण तरीही शेवटी न्यायसंस्थेला न्यायप्रक्रियेमध्ये भावनिक होऊन चालत नाही. त्याना समोर आलेल्या प्रकरणाला घटनेच्या चौकटीत बसवायचे असते (उदा.भोपाळ गॅस दुर्घटना....तब्बल २५ वर्षांनी निकाल लागून झाले काय तर २० हजार रूपयांच्या जामीनावर ते अब्जाधीश सोडण्यात आले...त्याला कारणही ज्या कलमाखाली त्याना "शिक्षा" झाली त्याच कलमात जामीनाची रक्कम किती असावी याचीही तरतूद असते). डॉ. सेन यांच्या संदर्भात न्यायालियात ही बाब सिद्ध झाली की "देशद्रोहा" संबंधीचा आरोप सिध्द होण्यार्या (आता झालेल्या) पत्रांची देवाणघेवाण त्यांच्यामार्फत झाली, शिवाय देशद्रोह आणि कट याबद्दल अगोदरच शिक्षा सुनावण्यात आलेले माओवादी नेते नारायण संन्याल यांची तुरुंगात डॉ.सेन यानी वारंवार भेट घेतली होतीच आणि ती त्यानी नाकारलेलीदेखील नाही; जरी ते म्हणत असले की, त्यांच्या संन्याल यांच्याशी झालेल्या भेटी ह्या पी.यू.सी.एल. चा जनरल सेक्रेटरी या नात्याने घेतलेल्या होत्या. असे असले तरी भारत सरकारने यापूर्वीच बंदी घातलेल्या 'माओईस्ट पॉलिटब्यूरो या संघटनेशी निगडीत असलेल्या पत्रव्यवहाराची त्यानी (डॉ.सेन) देवाणघेवाण करण्याचे प्रयोजन काय, हा न्यायालयाचा आक्षेप बचाव पक्षाला अनुत्तरीत करणारा ठरला.
न्यायाधिशांनी शिक्षा सुनावताना आणखीन एका बाबीची देखील गंभीर दखल घेतल्याचे दिसते. डॉ.बिनायक सेन यांच्या पत्नी ईलिना सेन छत्तीसगड येथे नागरी स्वातंत्र्यासाठी "रूपांतर" नावाची जी संस्था चालवितात, ती अधिकृत तर नाहीच, शिवाय देशद्रोहाचे आरोप सिद्ध झालेले (पण अद्यापि फरार) नक्षलवादी शंकर सिंग आणि मालती ह्या रुपांतरसाठी काम करीत आहेत, व त्याना आसरा खुद्द डॉ.सेन यानीच दिला होता.
चर्चा चालू राहावी....!
(ही चर्चा डॉ.बिनायक सेन यांच्या "आदिवासी समाजा"च्या उन्नतीसाठी केलेल्या [वा करीत असलेल्या] कार्याची नसून त्याना "देशद्रोह' या आरोपाखाली सुनावण्यात आलेल्या शिक्षेसंबंधी आहे, हे लक्षात घेतल्यास अत्यंत तटस्थेनेदेखील या प्रकरणाकडे आपण पाहू शकतो....इतकेच.)
इन्द्रा
सेन यांच्या प्रकरणात एक न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि तिला आव्हान देण्याची सोय उपलब्ध आहे; त्यामुळे त्याचा पुढे फैसला होत राहणार आहे. हे सारे खरे असले तरी, इंद्रराज यांचा वरील प्रतिसाद वाचता सध्याच्या प्रक्रियेचे इतके सोपेकरण होते आहे का असा प्रश्न निर्माण झालाच, आणि तसे होत असल्यास ते इंद्रराज यांच्याकडून होत असल्याने अधिक धोकादायक. माझा मुद्दा येथे फक्त न्यायालयीन प्रक्रियेपुरता मर्यादित आहे. सेन वगैरेंच्या भूमिकांची झाडाझडती झाली पाहिजे, ही माझी भूमिका कायम आहे.
तुम्हा आम्हाला (आणि इथल्या बहुतांशी सदस्यांना)...अगदी तळागाळापर्यंत जाऊन प्रतिकूल परिस्थितीही काम करणारे अगणित छोटेमोठे कार्यकर्ते जर माहित असतील तर न्यायालयीन पातळीवर काम करणार्या अधिकारी वर्गाला त्या व्यक्ती किंवा त्यांच्या कार्याची महती माहित नसेल असे मानण्याचे कारण नसते.
माहिती असणे वेगळे आणि त्याविषयी नेमक्या धारणा असणे वेगळे. न्यायालयांमध्ये (म्हणजेच न्यायाधिशांमध्ये) धारणा नसतात? तेथील हे मानवी घटक खरोखरच भावनीक वगैरे न होता निखळ तर्कसगंतीने काम करतात? या प्रश्नांची माझी उत्तरे अनुक्रमे 'आहे' व 'नाही' अशी आहेत (माझी उत्तरे अपवादात्मक स्थितीसाठी आहेत, असे वाटल्यास म्हणूया).
देशद्रोह आणि कट याबद्दल अगोदरच शिक्षा सुनावण्यात आलेले माओवादी नेते नारायण संन्याल यांची तुरुंगात डॉ.सेन यानी वारंवार भेट घेतली होतीच आणि ती त्यानी नाकारलेलीदेखील नाही; जरी ते म्हणत असले की, त्यांच्या संन्याल यांच्याशी झालेल्या भेटी ह्या पी.यू.सी.एल. चा जनरल सेक्रेटरी या नात्याने घेतलेल्या होत्या.
मुद्दा स्पष्ट होत नाही. वरकरणी जे दिसते त्यानुसार या न्यायाने कलम १२०(ब) सिद्ध झालेल्या गुन्ह्यात असा इतर कोणताही आरोप सिद्ध झालेल्या गुन्हेगाराची भेट घेणारा गुन्हेगार ठरू शकेल. सेन यांच्या प्रकरणात तर कलम १२० (ब)ची सिद्धता शंकातीत पद्धतीने झालेली नाही हे निकालपत्राच्या वाचनातून दिसून येते.
भारत सरकारने यापूर्वीच बंदी घातलेल्या 'माओईस्ट पॉलिटब्यूरो या संघटनेशी निगडीत असलेल्या पत्रव्यवहाराची त्यानी (डॉ.सेन) देवाणघेवाण करण्याचे प्रयोजन काय, हा न्यायालयाचा आक्षेप बचाव पक्षाला अनुत्तरीत करणारा ठरला.
पुन्हा एकदा निकाल वाचून घेतला. हाही आरोप संशयातीत पद्धतीने सिद्ध झालेला नाही. कारण त्याला पुरेशा पुराव्यांचा आधार नाही. सेन यांचे म्हणणेच आहे की, हे पत्र त्या धाडीमध्ये पोलिसांनीच गुंतवले. त्यावरचे संशयातीत स्वरूपातील उत्तर नाही.
(अवांतर: या पत्रावर काही सही वगैरे नाही. म्हणजे, कायद्याच्या दृष्टीने तो पुरावा ठरू शकत नाही. आता, त्यापलीकडे, माओवादी पत्रावर सही कशाला करतील हा एक मुद्दा असू शकतो. तो मान्य. पण त्याहीपलीकडे सेन जर थेट तुरुंगात भेटू शकत असतील तर माओवादी पत्रं पाठवतील? छ्या. हा त्यांचा 'अवमान' आहे. सेन यांच्यासारखा शिकलेला माणूस भेटत असतो तेव्हा लेखी पुरावा काही देऊ नये, नव्हे तो देण्याची गरज नाही, हे न कळण्याइतके ते बावळट किंवा मूर्ख नाहीत. त्यांना असे समजून जाणारी सरकारेच मूर्ख आहेत आणि म्हणून हे असले प्रश्न निर्माण होतात.)
न्यायाधिशांनी शिक्षा सुनावताना आणखीन एका बाबीची देखील गंभीर दखल घेतल्याचे दिसते. डॉ.बिनायक सेन यांच्या पत्नी ईलिना सेन छत्तीसगड येथे नागरी स्वातंत्र्यासाठी "रूपांतर" नावाची जी संस्था चालवितात, ती अधिकृत तर नाहीच, शिवाय देशद्रोहाचे आरोप सिद्ध झालेले (पण अद्यापि फरार) नक्षलवादी शंकर सिंग आणि मालती ह्या रुपांतरसाठी काम करीत आहेत, व त्याना आसरा खुद्द डॉ.सेन यानीच दिला होता.
ही बाब गंभीर आहे. शंकर आणि मालती यांच्या संदर्भातील आरोपही समाविष्ट झाले पाहिजेत. किंवा ते स्वतंत्रपणे गुन्हा म्हणून तरी सिद्ध झालेले असले पाहिजेत आणि तसे दिसत नाही. या बाबींचा सरकारने काय फैसला केला, असे न्यायाधिशांनी विचारले आहे का? या नक्षलवाद्यांना आसरा दिल्याबद्दल विनायक सेन हे आणि 'रुपांतर'च्या जबाबदार म्हणून इलिना सेन याही आधी आरोपी आणि आरोप सिद्ध झाले तर गुन्हेगार ठरतात. तसे झाले आहे? किंवा न्यायाधिशांनी तसे काही विचारले आहे? 'रुपांतर' अधिकृत नाही म्हणजे काय? ती नोंदणी झालेली नाही, असेच का? तसे असेल, त्याने काय बिघडते? बिघडते फक्त एकाच गोष्टीत - शंकर आणि मालती यांच्याशी असलेला संबंध. अशा मामल्यातही गुन्हा दाखल करायचा आणि न्यायप्रक्रिया चालवायची हे न्यायाधिशांना, आणि सरकारलाही माहिती नाही? तो गुन्हा सिद्ध होण्याच्या आधीच निकालपत्रात त्याचा आधार?
(ताजा कलम: निकालाच्या वाचनातून दिसते ते असे की, 'रुपांतर'शी संबंधित शंकर हा माओवादी असल्याचे फक्त आरोप आहेत. तो सिद्ध गुन्हेगार नाही. मालती नावाची एक माओवादी आहे, पण ती हीच रुपांतरमध्ये काम करणारी हे संशयातीत सिद्ध झालेले नाही. म्हणजे हा आधारही पक्का नाही. हा निकाल वाचला की या खटल्याचा दर्जा काय आहे हे कळते. बाकी लिहिण्याची गरजही पडत नाही. इच्छुकांनी विनायक सेन यांच्यासंबंधी http://www.binayaksen.net या संकेतस्थळावर जाऊन आधी हा निकाल वाचावा. आपली मते बनवावीत, अशी विनंती. नंतर त्यानी या संस्थळावरील इतर लेखन, निकालाविषयीची टिप्पणी वगैरे वाचन करण्यास हरकत नाही.)
ही चर्चा डॉ.बिनायक सेन यांच्या "आदिवासी समाजा"च्या उन्नतीसाठी केलेल्या [वा करीत असलेल्या] कार्याची नसून त्याना "देशद्रोह' या आरोपाखाली सुनावण्यात आलेल्या शिक्षेसंबंधी आहे, हे लक्षात घेतल्यास अत्यंत तटस्थेनेदेखील या प्रकरणाकडे आपण पाहू शकतो....
इन्द्र- Valid Point. फार महत्वाचा मुद्दा आहे हा. बहुतांशी प्रतिक्रीया या डॉ.सेन यांच्या कामाचा (त्याची व्याप्ती मला जास्त माहीत नाही) विचार करूनच ठेवल्या जात आहेत असे वाटते. वरती कोणी तरी म्हणले आहे की कोर्टाने मा. जयप्रकाशजींनासुध्दा दोषी ठरवलेले होते.
या नंतरसुद्धा कायद्याची प्रतिक्रीया असते. ती पुर्ण होईपर्यन्त कुठलेही असे पोस्ट एकांगी वाटतील.
निनादने व्होडाफोन आणि वेदांतची उदाहरणे दिली आहेत. ह्या कंपन्यांना भ्रष्ट यंत्रणेने परवाने दिलेले असले (म्हणजेच राज्यकर्ते आणि शासन यंत्रणा) तरी न्यायालयामुळेच त्यांचे प्रकल्प थांबवले गेले आहेत.
वरील काही मुद्द्यांचा अर्थ असा आहे की तेथील राज्यकर्ते आणि शासन यंत्रणेने डॉ.सेन यांना खोटेच आरोपी केले असा आहे. पण न्याययंत्रणा शासकीय निर्णय चुकीचे असतील तर ते बदलते हे मी (म्हणजे निनादने दिलेल्या) वरती दिलेल्या उदाहरणावरून स्पष्ट होते. न्याययंत्रणेवर विश्वास ठेवला पाहीजे असे मला वाटते.
प्रतिक्रिया