का बघायची मराठी नाटकं?
Primary tabs
कालच "सही रे सही'ची तिकिटं काढून दिली सासू-सासऱ्यांना. पहिलं तिकीट दीडशे रुपयांचं होतं आणि दुसरं एकशेवीस रुपयांचं. त्याच्या खालची तिकिटंच नव्हती! "बाल्कनी' बंदच ठेवली होती. गेली पाच-सहा वर्षं हे नाटक गाजतंय. दोन हजारांच्या आसपास प्रयोग झालेत. मी पहिला प्रयोग तीस रुपयांत खाली बसून पाहिला होता. फार वर्षं नाही झाली त्याला. त्यानंतर दुसऱ्यांना 50 रुपयांत बाल्कनीतून हे नाटक पाहिलं होतं. एवढी तिकिटं का असावीत या नाटकांना?
नाटक म्हणजे काही सर्वंकष मनोरंजन नाही. काही कलाकार जिवंतपणे कला सादर करतात आणि आपण ती अनुभवतो, एवढंच. त्याहून विशेष काही नाही. मग यांनी शंभर-दीडशे रुपयांना का लुटावं प्रेक्षकांना? म्हणजे, घरातल्या चौघांनी जायचं, तर सहाशे रुपये नुसता तिकिटाचा खर्च. आता तुम्ही म्हणाल, मल्टिप्लेक्सला चित्रपट बघायलाही एवढा खर्च येतोच की! पण माफ करा, मी शक्यतो स्वतःच्या पैशांनी मल्टिप्लेक्सला चित्रपट बघत नाही. मला अगदी लक्ष्मीनारायण, प्रभात, विजय, अलका, नीलायम, गेला बाजार "सोनमर्ग', "निशात', "भारत'ही चालतं. गेलोच, तर सिटीप्राइड कोथरूडला पहाटे दहा वाजताचा 50 ते जास्तीत जास्त 60 रुपयांतला चित्रपट मी पाहू शकतो. त्याहून जास्त नाही. त्यातदेखील चित्रपट अगदी भुक्कड असला, तरी त्यातली गाणी म्हणा, एखाद्या कलाकाराचा अभिनय, नुसती कथा, नुसतं उत्तम चित्रीकरण, निसर्गदृश्यं, (आणि एखाद्या हिरॉइननं "नैसर्गिक' ओढीनं दिलेली दृश्यं) यांवर पैसे वसूल होऊ शकतात. त्यामुळं एखादा चित्रपट वाईट आहे, असं कुणी सांगितलं, की मी त्यावर पहिली धाड घालतो. नाटकाच्या बाबतीत तसं नाही. शंभर रुपये देऊन विकतची "रिस्क' कोण घेणार?
नाटकांची गोची काय, की नामवंत कलाकार नसले, की प्रेक्षक येत नाहीत आणि नामवंत कलाकार घेतले, की त्यांचं बजेट वाढतं, त्यातून नाटकाचे तिकीटदर वाढतात. आता, नाटकाच्या एका दौऱ्याचा सगळं मानधन वगैरे धरूनचा खर्च जास्तीत जास्त तीस हजार असेल. प्रेक्षागृहाची सरासरी 500 क्षमता गृहीत धरली, तरी शंभर रुपयांच्या हिशेबानं 50 हजार रुपये गोळा होतात. मी हे चांगल्या संस्थांच्या, चांगले कलाकार असल्याच्या नाटकांच्या स्थितीबद्दल बोलतोय. अप्रसिद्ध कलाकार असलेल्या नाटकांचा खर्चही तुलनेनं कमी असतो, त्यामुळं त्यांचा गल्लाही.
नाटकाच्या हिशेबाचे ठोकताळे मला माहित नाहीत. मात्र, एक सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून एका नाटकाला शंभर-दीडशे रुपये मोजायला मला परवडत नाही. चित्रपटाच्या तुलनेत तर नाहीच नाही! अशा अवस्थेत नाटक जगायचं कसं? मुळात नाटकाची आवड असलेले प्रेक्षक कमी. जे येतात, त्यांच्याही आवडीनिवडी निराळ्या. मग एवढं करून नाटक जगायचं कसं?
------
जर सिनेमाचे तिकीट ५०-६० रुपये असले तर नाटकाचे तिकीट १२०-१५० रुपये ठीक वाटते.
काही कलाकार जिवंतपणे कला सादर करतात आणि आपण ती अनुभवतो, एवढंच. त्याहून विशेष काही नाही.
यात शेवटचे वाक्य समजले नाही. कलाकार जिवंतपणे कला सादर करतात हे विशेष मानावे.
तरी नाटककंपनीने बाल्कनी बंद ठेवली, हे जरा खटकले. जर नाटक हाऊसफुल्ल होणार असते, तर ९०-१०० रुपयांना बाल्कनीतली तिकिटे विकता आली असती का? याबाबत मिळकत-तोट्याचे गणित नाटककंपनीने केले का? असे प्रश्न मनात येतात.
का बघायची मराठी नाटकं?
शीर्षकावरून असं वाटलं की अशी मूर्ख कथानके असलेली नाटके का बघायची? असे काहीसे असावे... ( तो ही महत्त्वाचा आहेच)पण आपला मुख्य मुद्दा इतकी महाग नाटके का बघायची? असा दिसतो... तोही योग्यच आहे....हे सगळे निर्मात्यांनी वाढवलेले गणित आहे, असे आमचे स्पष्ट मत आहे.
पहिलं तिकीट दीडशे रुपयांचं होतं आणि दुसरं एकशेवीस रुपयांचं. त्याच्या खालची तिकिटंच नव्हती!
हा कदाचित कोणत्यातरी संस्थेच्या मदतीसाठी निधी संकलनासाठीचा प्रयोग असणार.... आपल्या माहितीची संस्था नसेल तर असल्या प्रयोगांना मुळीच जाऊ नये....
आमच्याकडे साध्या प्रयोगांची अजूनही ८० आणि १०० अशीच असतात तिकिटे .... मी त्यांनाच जातो...
नाटकाच्या बाबतीत तसं नाही. शंभर रुपये देऊन विकतची "रिस्क' कोण घेणार
( नाटकाच्या तिकिटांच्या किंमती जास्त आहेत या तुमच्या मूळ विषयाशी मी सहमत आहेच्...)परंतु नाटकाची सिनेमाशी तुलनाच अप्रस्तुत आहे असे वाटते...
असो..या विषयावरचे आमचेही विचार इथे टंकतो आहे...
१. निर्माता विविध विषयांवरची १० -१२ नाटके काढतो तेव्हा त्याच्या हाताला ऑल द बेस्ट किंवा सही रे सही सारखे एखादे नाटक लागते...निर्मात्याचे म्हणणे असे असते की इतकी वर्षे रडत खडत तोट्यात ( किंवा कमी फायद्यात ) धंदा केला त्यामुळे यातूनच कमवून घ्यायचे... मग अशा प्रचंड किमतीची तिकिटे लावून प्रयोग सुरू होतात.( म्हणून बरी नाटकं शक्यतो लवकरात लवकर पाहून घ्यावीत. नंतर त्यांची तिकिटे प्रचंड वाढतात आणि कलाकार पाट्या टाकायला सुरुवात करतात.... दोन्हींकडून वैताग))
२... निर्माते आणि तोटा...
माझ्या भागातले नाट्यगृह चांगल्या नाटकांसाठी नेहमीच फुल भरते... खालच्या ८०० सीट्स... म्हणजे सुयोगसारख्या संस्थेची जवळजवळ सर्व, प्रशांत दामलेची बरीचशी...सुयोगच्या नावावरतीच लोक येतात...त्या वेळी मी नेहमी असाच विचार करतो की यांची इतकी नाटके मजबूत चाललेली आहेत, अमेरिका, युरोप नाहीतर गल्फ मध्ये दौरे चालू आहेत,तरी कुठल्याही मुलाखतीत, चर्चेत बघा, सुयोगचे "भट " सतत नाटक व्यवसाय तोट्यात आहे म्हणून दु:खीच... :''( हे काही आपल्याला कळत नाही... सुयोगची तोट्यातली नाटके फारशी आठवतच नाहीत...कधी वाटते म्हणावेसे, " एवढा तोट्यात चाललाय धंदा तर काय तुमच्यावरती सक्ती आहे की काय हाच धंदा करायची??... (|: "
'सुयोग'चे पार्टनर्स २ आहेत. श्री. सुधीर भट आणि श्री. गोपाळ अल्गेरी. दोघेही माणूस म्हणून खूप छान आहेत. पण जिथे 'बिझनेस' चा प्रश्न असतो तिथे श्री. सुधीर भटच बोलतात. आणि ते एकदम व्यावसायिक आहेत.
सगळ्याच मोठ्या कलाकारांना हाताळणे सोपे नसते. दौर्यांवर तर विचारूच नका. रात्रीचा प्रयोग संपल्यावर जे 'दारूकाम' होते त्याने श्री. सुधीर भटांच्या पोटात गोळा येतो. सकाळी पुढची फ्लाईट पकडायची असते किंवा भारतात पुढचा प्रवास सुरू होणार असतो. काही कलाकार पहाटे ४-५ पर्यंत जागतात. पहाटे पहाटे झोपतात आणि सकाळचा प्लॅन बिघडू शकतो. तिथे श्री. सुधीर भटांसारखाच खमक्या निर्माता पाहिजे. अक्षरशः गुरे हाकावित तसे एकेका नटाला बसमध्ये वगैरे ढकलावे लागते.
त्यांना त्यांच्या नाटकांमधून फायदा नक्कीच होत असतो. 'सुयोग' मानधनही चांगले देते. रखडवत नाही. हे मुख्य मुख्य नटांना. तळागाळाच्या , नवोदीत नट्/नट्यांना मानधन कमी मिळते पण निर्मात्याच्या खर्चात परदेशवारी होते आणि 'सुयोग'चा कलाकार हा शिक्काही बसतो.
ह्या लाईन मध्ये, विशेषतः परदेश दौर्यांच्या, 'सुयोग'ची मक्तेदारी टिकून राहावी म्हणून, मला वाटते, श्री. सुधीर भट सतत रडत असतात. असो.
विशेषतः परदेश दौर्यांच्या, 'सुयोग'ची मक्तेदारी टिकून राहावी म्हणून, मला वाटते, श्री. सुधीर भट सतत रडत असतात.
असतात एकेकाच्या बिझनेसची गणिते.... वाचून गंमत वाटली...
रात्रीचा प्रयोग संपल्यावर जे 'दारूकाम' होते त्याने श्री. सुधीर भटांच्या पोटात गोळा येतो. सकाळी पुढची फ्लाईट पकडायची असते किंवा भारतात पुढचा प्रवास सुरू होणार असतो. काही कलाकार पहाटे ४-५ पर्यंत जागतात. पहाटे पहाटे झोपतात आणि सकाळचा प्लॅन बिघडू शकतो. तिथे श्री. सुधीर भटांसारखाच खमक्या निर्माता पाहिजे. अक्षरशः गुरे हाकावित तसे एकेका नटाला बसमध्ये वगैरे ढकलावे लागते.
ही माहिती तर फारच उद्बोधक...धन्यवाद....अगदी डोळ्यापुढे चित्र उभे राहिले.... आता डोक्यात चक्रे चालू झाली की नक्की कोण कोण नट असे करत असतील?
_________________________
अजून एक सुधीर भटांचे वाक्य मुलाखतीमधले लक्षात राहिलेले..... "... अहो, अमेरिकेतसुद्धा प्रेक्षक येत नाहीत हो बघायला नाटक... आम्ही एवढे आलोय तुमच्यासाठी , आणि तरी येत नाहीत.."....
आता दर वर्षी जात राहिलात तर काय सगळं महाराष्ट्र मंडळ लोटणार आहे का तिथे? कदाचित म्हणत असतील, " पुढल्या वेळी बघू..."
दर वेळी भट काहीतरी इन्ट्रेष्टिंग कॉमेंट करतातच... एकदम मजा असते त्यांची मुलाखत म्हणजे...
त्या दोघांना वेगवेगळं का बसवलं बरं? एक१२० आणि दुसरे १५०.
ज्यांना रास्त किंमत वाटते ते जातील .
मल्टीप्लेक्स चा नियम नाटकाला लागू करा.म्हण्जेच दुसर्याच्या पैशानी बघा.(हे तुमचेच धोरण आहे )मल्टिप्लेक्समी शक्यतो स्वतःच्या पैशांनी ला चित्रपट बघत नाही.
छे... मला कळलच नाही नक्की समस्या काय आहे.
वेगवेगळं का बसवलं बरं? एक१२० आणि दुसरे १५०.
अहो वेगळं नाही बसवलं...त्यांना म्हणायचं असावं ,दोनच ( महाग) प्रकारची तिकिटं उपलब्ध होती...
.२२ एप्रिल २००७ ला मी दूरदर्शनवर घटनाचक्र या कार्यक्रमात मोहन वाघ, सुधीर भट आणि मोहन जोशी बसून नाट्यनिर्मिती वगैरे बद्दल बोलत होते....विषय होता " आजची रंगभूमी आणि आव्हाने"...( आम्ही त्याच्या नोट्स काढल्या आहेत)...त्यात एक तासापैकी बराचसा वेळ खालील तक्रारी सांगण्यात गेला.....
१.नट काम करत नाहीत, सीरियल सिनेमाकडे जातात...५० प्रयोगांनंतर हा नट सोडून जाणार हे टेन्शन सतत...मग त्या नाटकावर रिस्क किती घेणार?
२. आमच्या गाड्या जुन्या ( सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे) म्हणून सरकारने भंगारात काढाव्या असे सांगितले... २४ लाखाची गाडी एकदम भंगार ?..
३.दौरे करणं मुष्किल आहे, ... बाहेरगावी प्रयोगाचा खर्च ३५ ते ३८ हजार असतो आणि मिळतात १२ ते १५ हजार ... कोण जाणार दौर्याला?
बाहेरगावी ठराविक प्रेक्षक मिळाला पाहिजे, तरच आम्ही जाऊ वगैरे......
४.हल्ली कोणीही निर्माता होतो आणि चांगल्या चांगल्या तारखा अडवून ठेवतो...
_________________________________
हे सगळे एस्टाब्लिश्ड ,प्रथितयश निर्माते नुसत्या तक्रारी सांगत होते, असा फील आम्हाला आला...म्हणजे हेच इतके रडतात, तर छोट्या निर्मात्यांनी कुठे जायचं , देव जाणे?.... इतकी वर्षं हे नाटकं करताहेत तरी नवीन नवीन निर्माते बनू नयेत , आपल्याला स्पर्धा नको अशी यांची अपेक्षा का? ( पहा तक्रार क्रमांक ४)... सगळ्या महत्त्वाच्या तारखा यांनाच पाहिजेत्..का?मग काय फक्त ठराविक कंपूशाहीसाठीच असते काय नाटक?.आणि हे अगदी बिनधास्त टी व्ही वरती सांगतात की जुन्या संस्थांना ठराविक तारखा दिल्या पाहिजेत....म्हणजे यांनाच अनुदान, यांनाच तारखा... तरीही यांचा नाट्यव्यवसाय तोट्यातच... ..
_______________________________
भडकमकर साहेब,
मोहन वाघ यांचि
१.नट काम करत नाहीत, सीरियल सिनेमाकडे जातात...५० प्रयोगांनंतर हा नट सोडून जाणार हे टेन्शन सतत...मग त्या नाटकावर रिस्क किती घेणार?
२. आमच्या गाड्या जुन्या ( सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे) म्हणून सरकारने भंगारात काढाव्या असे सांगितले... २४ लाखाची गाडी एकदम भंगार ?..
हि मते मला तरी पटतात.
आजकालचे नट घ्या,गायक घ्या,सर्वचजण हे कमि कष्टात जास्त यशस्वी होउ पहात आहेत.(उदा.सिरीयल्स,टॆलेंट हंट वगैरे...)
मग अशा वेळि ह्या लोकांनि काय करायचे? ज्या कलावंतांच्या जिवावर नाटक बेतायचे त्यांनिच
जर अशि पाठ फ़िरवलि तर मग निर्मात्याने काय करावे अशि आपलि अपेक्षा आहे?
टुकार हिंदि चित्रपटांना अगदि ब्लॆक ने तिकीटे काढून गर्दि केली जाते. मग मराठी नाटक वाल्याने लावलि जरा महाग तिकीटे तर कुठे
बिघडले?
अभिजीतजी ,आपला मुद्दा नीटसा कळला नाहि.
गेलोच, तर सिटीप्राइड कोथरूडला पहाटे दहा वाजताचा 50 ते जास्तीत जास्त 60 रुपयांतला चित्रपट मी पाहू शकतो. त्याहून जास्त नाही. त्यातदेखील चित्रपट अगदी भुक्कड असला, तरी त्यातली गाणी म्हणा, एखाद्या कलाकाराचा अभिनय, नुसती कथा, नुसतं उत्तम चित्रीकरण, निसर्गदृश्यं, (आणि एखाद्या हिरॉइननं "नैसर्गिक' ओढीनं दिलेली दृश्यं) यांवर पैसे वसूल होऊ शकतात. त्यामुळं एखादा चित्रपट वाईट आहे, असं कुणी सांगितलं, की मी त्यावर पहिली धाड घालतो. नाटकाच्या बाबतीत तसं नाही. शंभर रुपये देऊन विकतची "रिस्क' कोण घेणार?
तुम्हाला मराठी रंगभुमिवर हिरॉइननं "नैसर्गिक' ओढीनं दिलेली दृश्यं ज्यावर पैसे वसूल होऊ शकतात
असले काही अपेक्षित आहे का?
अबब.
मोहन वाघ यांचे
१.नट काम करत नाहीत, सीरियल सिनेमाकडे जातात...५० प्रयोगांनंतर हा नट सोडून जाणार हे टेन्शन सतत...मग त्या नाटकावर रिस्क किती घेणार?
हे मत पटत नाही. कोणताही नट जास्त पैसे मिळत आसतील तर नाटक सोडून सिरीअलकडे जाणारच. नटच का? जगात कुणालाही असलेल्या नोकरी/धंद्यापेक्षा जास्त पगार्/पैसे मिळणारी नोकरी/धन्दा मिळाला तर तो तिकडे जाणारच. उलट न जाणार्याला लोक मुर्खात काढतील.
मोहन वाघांची काही वर्षापुर्वी लागलेली मुलाखत मी पाहिली होती. त्याला त्यावेळी "ऑल द बेष्ट " या नाटकाची ओरिजीनल टीम नाटक सोडून गेल्याची आणि "पानीपत" बंद पडल्यची पार्श्वभूमी होती. त्यात मोहन वाघ असे म्हणाले होते की "या लोकानी पैसे वाढवून मागितले. मी देणार नाही. याना ढुंगणाला मोबाइल लावून फिरायला मी पैसे देणार नाही". याला काय अर्थ आहे? सेरीअल मधे यांच्यापेक्षा जास्त पैसे मिळत होते. त्यमुळे नट तिकडे गेले. यात नटांचे काय चुकले? का नटानी "रंगभूमीची सेवा" या गोंडस नावाखाली भिकेला लागावे ही अपेक्षा आहे?
या उलट "सही रे सही" यशस्वी झाल्यावर आणि जोरात चालूलागल्यावर निर्माता बाईनी (माफ करा नाव आठवत नाही) भरत जाधवला नाईट वाढवून दिली. (माझ्या माहितीप्रमाणे प्रत्तेक शो ल १००० ची ५००० रु.). पैसे मिळत आसल्यने भरत सोडून गेला नाही. पुढचा "सही" चा इतिहास सर्वानाच माहिती आहे.
बाकी हिरॉइननं "नैसर्गिक' ओढीनं दिलेली दृश्यं आसणारी काही नाटके रंगभूमीवर आहेत.... निदान ती नाटके का बघावीत असा प्रश्न तुम्हाला पडणार नाही अशी अपेक्षा करतो.
लता नार्वेकर.
मोहन वाघांच्या चेतन दातार ने घेतलेल्या एका जुन्या मुलाखतीत हेच ऐकले होते...
" मी एवढे रिस्क घेऊन नाटक काढतो, (प्रसंगी चीजवस्तू गहाण वगैरे ठेवून सुद्धा ) त्यानंतरही माझी नाटके पडली आहेत, त्याचा तोटा मीच उचलतो... तेव्हा नट येतो का विचारायला की मोहनकाका, तुमचा खूप लॉस झालाय या नाटकात , आजचं बूकिंगसुद्धा काहीच नाही, मग आजची नाईट देऊ नका मला..." साहजिकच नाही येत कोणी असं म्हणायला..... मग जेव्हा माझा आधीचा लॉस भरून काढणारं एखादं नाटक चालत असतं , तेव्हा नटांनी जास्तीच्या पैशाची का अपेक्षा करावी?""
......
मला तर हे लॉजिक पटते....
..... पण जेव्हा ( कलाकार कमी पैशामुळे नाटक सोडून जातात आणि )प्रयोगच बंद पडायची वेळ येते त्यावेळी निर्मात्याने नाईटमध्ये थोडी तरी वाढ करणे योग्य आहे असेच वाटते...
शेवटी प्रयोग चालू राहणे महत्त्वाचे...
मोहनकाका, तुमचा खूप लॉस झालाय या नाटकात , आजचं बूकिंगसुद्धा काहीच नाही, मग आजची नाईट देऊ नका मला...
मला श्री. मोहन वाघांचा हा युक्तीवाद पटला नाही. नाटके पडण्याची अनेक कारणे असू शकतात. कुचकामी कथा, ढिसाळ दिगदर्शन, चुकीची प्रकाश योजना, मारक ध्वनी रेखाटन/संयोजन, चुकीच्या वेषभूषा, चुकीची रंगभूषा, आणि नाट्याचा अभाव अशी अनेक अंगे, नटांच्या अभिनयाखेरीज, नाटकाचे यशापयश ठरवतात.
फक्त नटांच्या अभिनयातील तोकडेपणामुळे नाटक तोट्यात गेले तर आणि तरच वरील विधान लागू होते. पण वर दिलेल्या इतर कारणांमुळे नाटक अयशस्वी झाले असेल तर नटांना दोष देण्यात हशील नाही.
कित्येक नटांचे (प्रमुख) ठराविक प्रयोगांचे (जसे २५) काँट्रॅक्ट असते. निर्मात्याने कितीही गल्ला कमावला तरी ह्या (२५) प्रयोगांमध्ये नट मानधन वाढवून मागू शकत नाही. पुढच्या प्रयोगांच्या (२६ ते ५०) काँट्रॅक्टच्या वेळी तो मानधन वाढवून मागतो. (२५ प्रयोग हे उदाहरणादाखल घेतलेले आहे. प्रत्यक्षात प्रयोगांची संख्या निर्माता आणि नट एकत्र 'बसून' ठरवतात.)
यशस्वी नाटकाने फक्त नटांचेच मानधन वाढवून न देता इतर संबंधितांचे मानधनही वाढवून दिले पाहिजे.
जसे नट मंडळी जास्त मानधनासाठी एका निर्मात्याला सोडून दुसर्या निर्मात्याकडे धावतात त्याच प्रमाणे जेव्हा एखादे नाटक त्यातील कलाकारांच्या सुमार अभिनयामुळे पडते तेंव्हा निर्माताही असे कलाकार, दिग्दर्शक बदलतो.
जेंव्हा नाटके सोडून छोट्या पडद्यावरील मालिकांकडे नट मंडळी वळली तेंव्हा प्रलोभन होते जास्तीच्या कमाईचे, जास्तीच्या प्रसिद्धीचे आणि सन्मानाचे. पण जास्तीच्या कमाईचा फुगा लवकरच फुटला. मानधन मिळते पण सहा सहा महिने थांबवून ठेवून. कित्येकदा कबूल केलेले सर्व मानधन मिळतही नाही. त्यामुळे अनेक नट लवकरच कंटाळले. आणि नाटकांकडे परतले. तिथे एक बरे होते प्रयोग होताच मानधन मिळायचे. टांगत ठेवायचे नाहीत.
वरील माहिती काही नटांच्या आणि इतर संबंधितांच्या बोलण्यातून समजलेली आहे. तसा ह्या क्षेत्रातील माझा खोल अभ्यास नाही.
पण वर दिलेल्या इतर कारणांमुळे नाटक अयशस्वी झाले असेल तर नटांना दोष देण्यात हशील नाही.
हो , हे खरे आहे...
पण नाटक नक्की कशामुळे पडले ( किंवा नक्की कशामुळे चालते? ) हे ठरवणे तरी कुठे सोपे आहे ? ....यशाचे धनी सगळे पण अपयशाला वाली कोण?..
त्यामुळे प्रत्येक निर्माता त्याला वाटेल पटेल तसे निर्णय घेतो ,....
अभिजित,तुमचा रोख नक्की कशावर आहे तेच कळले नाही.. नाटकाच्या किंमतींबद्दल असेल तर बरोबर आहे, खूप महाग असतात तिकीटं.. पण मी सिनेमा पेक्शा नाटक पाहायला पैसे गेले तर माफ करीन.. एखाद्याचा अभिनय असा समोर पाहणे हा एक अनुभव आहे! त्यामुळे किंमत जास्त असली तरी काही मोजकी नाटके मी पाहायचेच. अर्थात कुठलंही नाही.. आजकालची काही नाटकं अगदीच काहीतरी असतात.. असो..
आणि मनोरंजन म्हणाल, तर प्रत्येक नाटकाचा साचा मनोरंजनाचाच असला पाहीजे असा काही नियम नाहीय.. आणि नसावा.. अतिशय गंभीर विषयावरची नाटके सुद्धा सुन्न करून जातात, आणि मला ती देखील पाहायला आवडतात.. उदा. नातीगोती,मी नथुराम गोडसे बोलतोय.. सिनेमा मधे जे दिसते , किंवा असते, तसेच नाटकामधे असण्याची अपेक्षा का? रंगभूमी हा वेगळाच प्रकार आहे.. त्यामुळे तुलना नको असे वाटते..
भडकमकरांचे चारही मुद्दे पटले.. आजकाल सगळे नट मालिका आणि चित्रपट यांत गुंतले असताना चांगली नाटकं काढणं, आणि ती यशस्वी करणे अवघड झालंय.. दर पण त्यांना वाढवावेच लागतात, पण सामान्य जनतेला परवडत नाहीत..
तारखांबद्दलचा मुद्दाही पटला.. कंपूशाही नसली पाहीजे.. इतके चांगले कलाकार येत आहेत पुढे, त्यांनाही वाव मिळाला पाहीजे...
हाच विषय मी मनोगतवर वाचला आणि तोच विषय येथेही अगदी तश्याचा तसाच.
माझ्या मते काही लेखक एकच विषय मनोगत, उपक्रम आणि मिसळपाव यावर मांडत असतात.
या तिन्ही संकेतस्थळाच्या प्रशासक आणि सरपंचानी यावर काही विचार करावा अशी नम्र विनंती.
उदा. मनोगत विशेष, उपक्रम लोकाग्रह आणि मिसळपाव भन्नाट असे दुवे दिले तर???
तुम्ही पण .. जाउद्या आता !
वरच्या लेखावर काही बोला ना !
फक्त तिकीट जास्त म्हणुन नाटकं बघायची नाहीत . . कैच्याकैच !
मनोगत वर हाच लेख २८ / ४ / २००८ १६:३४ असा टाकला आहे, तोच लेख काडीमात्र फरक न करता ईथे , २८ / ४/ २००८ १६:४१ टाकला आहे. अभिजित साहेब , हे असे करणे बरोबर दिसत नाही.
त्यात गैर काय आहे, त्यांचाच आहे ना तो लेख.
आम्ही नव्हता वाचला आधी तो.. इथेच वाचला.
७ मिनिटाच्या फरकाने दोन वेगळ्या संकेतस्थळावर एकच लेख आला तर तो शिळा कसा झाला? लेखक तोच, विषय तोच मग त्यात वेगळेपणा का?
अहो, २ /३ वेगवेगळ्या संकेतस्थळावर वेगवेगळे सदस्य असतात. मग का नाही तो २ ३ ठिकाणी प्रकाशित करावा? त्या वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया मिळतील ना त्यात.
आता नाटकाचा विषय आहे तर त्याचेच उदाहरण घ्या.
एकच नाटक तुम्ही ठाण्यात आज बघितले व पुढच्या महिन्यात पुण्यात ते लागले असेल तर तुम्हाला ते शिळे वाटेल. कदाचित तुम्ही नाही पाहणार ते नाटक. पण सर्वच पुणेकरांनी नसेल ना ते नाटक पाहिलेले. त्यांचा वेगळा प्रतिसाद असू शकेल ना?
मी माझा मुद्दा बऱ्यापैकी स्पष्टपणे मांडला होता.
मी एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय आहे आणि मला एका नाटकासाठी सव्वाशे ते दीडशे रुपये देणं शक्य नाही. अर्थात, साठ-चाळीस दराची तिकीटं असतील, तर ते शक्य आहे. पण अशी तिकीटंच नसतात, मोठ्या संस्थांच्या नाटकांना.
मग, कलाकारांच्या आणि नाट्यसंस्थांच्या तुंबड्या भरायला मी एवढ्या भरमसाठ दराची तिकीटं काढायची काय? की सामाजिक हेतू म्हणून हा भुर्दंड सोसायचा?
चित्रपटाशी तुलना एवढ्यासाठीच केली, की नाटकाच्या तिकीटदरांविषयी बोलायला लागलं, की कुणीही उपटसुंभ "सिनेमाला नाही का तुम्ही एवढे पैसे मोजत?' असा प्रश्न विचारतो. म्हणजे, "हम आपके हैं कौन'च्या वेळी चित्रपटगृहांचे तिकीटदर वाढविण्यासाठी सूरज बडजात्याचं स्पष्टीकरण असंच होतं. "ब्लॅक'मध्ये नाही का, तुम्ही एका तिकीटाला दीडशे-दोनशे रुपये मोजत?'
अरे बाबा, आम्ही नाही मोजत!
आम्ही अगदी सोमवारी सकाळी दहा वाजता उठून तिकीटाच्या रांगेत उभे राहतो. तिथली ब्लॅकवाल्यांची दादागिरी सहन करतो. कसंबसं तिकीट मिळवतो. अनेकदा स्टॉलमध्ये बसून ("मल्टिप्लेक्स' कल्चरच्या माणसांना "स्टॉल'ही कळणार नाही!) सिनेमा बघतो. मग तू आम्हाला का गृहीत धरतोस?
नाटकांचंही तसंच आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय जर 10 ते 15 हजार मासिक उत्पन्नगटातील असेल, (असे असंख्य मध्यमवर्गीय आहेत!) तर त्याला एका वेळच्या चैनीसाठी पाच-सहाशे रुपये नाटकावर उधळणं परवडेल काय? आणि का त्यानं खर्च करावेत? नाटकाचा खर्चच तेवढा असेल, तर ठीक आहे. पण तसं नाही ना!
--------
आता, व्यक्तिगत मुद्द्यांकडे वळू.
1. भडकमकर साहेब,
हे नाटक कुठल्याही संस्थेच्या मदतीसाठी नव्हतं. "कबड्डी कबड्डी' मी पाहिलं, त्याचे दरही 100 आणि 120 होते. बाल्कनी बंद. पुण्यात तरी जवळपास सर्वच प्रमुख संस्थांच्या नाटकांचे दर सध्या एवढेच आहेत.
2. रामदास बुवा,
तुम्हाला माझा प्रश्न कळलेला नाही, की नवा प्रश्न निर्माण करायचा आहे?
मल्टिप्लेक्सला मी स्वतःच्या पैशाने चित्रपट बघत नाही, याचाच अर्थ जात नाही. कारण माझ्यावर शंभर-दोनशे रुपये उगाच उधळणारा मित्र-मैत्रीण अजून जन्माला यायचेय.
मला (म्हणजे सर्वसामान्य मध्यमवर्गीय प्रेक्षकाला) नाटकाचे एवढे तिकीटदर परवडत नाहीत, हीच समस्या आहे!
3. भडकमकर, पेठकर,
तुमचे नाट्यव्यवसायाबद्दलचे विश्लेषण आवडले. खूप अभ्यास आहे तुमचा.
4. अबब,
माझा मुद्दा वर मांडला आहेच.
5. भाग्यश्री,
निदान माझा मुद्दा समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.
नाटकातून फक्त मनोरंजन असावं, अशी अपेक्षा नाही माझी. आक्षेप तिकीटांना आहे. सुदर्शन, स्नेहसदन, भावे स्कूल, इथंही मी नाटकं पाहिल्येत. अगदी "ध्यानीमनी', "ज्याचा त्याचा प्रश्न' पासून "तुझ्या माझ्यात'पर्यंत अनेक गंभीर नाटकं तिकीटं काढून पाहिल्येत. तिकीटं जास्त आहेत, म्हणून मी नाटकं बघायचं सोडत नाही. कारण मला जास्त हौस आहे. पण तिकीटं जास्त आहेत, म्हणून अनेक प्रेक्षक नाटकांपासून दुरावतात ना, त्याचं काय?
6. कलंत्री, अप्पासाहेब,
तुमचा वेगळाच आक्षेप दिसतोय. हाच लेख मी ब्लॉगवर पण लिहिलाय. पुढे बोला!
7. आनंदयात्री, मनस्वी,
धन्यवाद!
-------------
नाटकांचे दर मुंबईपेक्षा पुण्यात जास्त आहेत. पुण्यात जिथे १०० रू. दर आहे तिथेच मुंबईत तो ८० रू आहे. सही रे सही नाटकाने दर वाढविले त्याच बरोबर बालगंधर्वच्या खुर्च्या मोडकळीस अलेल्या होत्या, वातानुकुलीत यंत्रणा २० टक्के चालू होती, ध्वनीक्षेपण यंत्रणा कुचकामी होती. प्रेक्षकांना संवाद ऐकू येत नव्हते. काही वेळ प्रेक्षकांनी सर्व सहन केले पण सहनशक्ती पलीकडे गेले तेंव्हा प्रेक्षकांनी आरडाओरडा सुरू केला. नाटक बंद पाडले. व्यवस्थापकाने धावपळ करून पंखे आणून उभे केले. नाटक पुन्हा सुरु झाले. प्रेक्षकांकडून A.C. चे पैसे वसूल करून त्यांना पंख्याची सोय पुरविण्यात आली. तेही प्रेक्षक सहन करयला तयार झाले. पण काही केल्या संवाद ऐकूच येत नव्हते पुन्हा आरडाओरडा झाला. नाटक थांबलं. श्री. भरत जाधव भांबावले, दु:खी झाले. त्यांनी मायबाप प्रेक्षकांना आदराने नमस्कार केला आणि ते विंगेत गेले. पुन्हा पडदा पडला. व्यवस्थापकांनी सर्व प्रेक्षकांची क्षमा मागितली. १० -१५ मिनिटे गेली आणि ध्वनीक्षेपण यंत्रणा दुरुस्त झाली. नाटक सुरू झाले. आणि शांततेत पार पडले.
माझ्या मते ज्या नाटकांचे तिकिट दर जास्त असतात त्यांचे नाट्यगृह भाडेही जास्त असते. मग असे जास्त भाडे घेऊन प्राथमिक सुविधाही न पुरवणार्या नाट्यगृहांवरही कारवाई झाली पाहिजे. पण तसे होत नाही.
पण तिकीटं जास्त आहेत, म्हणून अनेक प्रेक्षक नाटकांपासून दुरावतात ना, त्याचं काय?
ज्या नाटकांना प्रेक्षक नाहीत त्यांचे दर जास्त नसतात. सही रे सही , मराठी बाणा अशी नाटके जास्त तिकीटदर ठेवतात. सर्व नाटके नाही. जास्त तिकिट दराच्या नाटकांना प्रेक्षकांनी जाऊ नये. प्रेक्षक नाही आले तर कशी चालतील ती नाटके? पण वरील दोन्ही नाटके, आजही, इतक्या प्रयोगा नंतरही, पुण्यात हाऊस फुल्ल जात आहेत. म्हणजेच प्रेक्षकांना परवडते आहे. बाहेर सगळीकडेच महागाई वाढली आहे. नटांचे दर वाढले आहेत, सेट्सचे वाहतुक खर्च, मेंटेनन्स, टेक्निशियन्सचे खर्च इत्यादी सर्व गेल्या काही वर्षात वाढलेले आहे. त्याचा थोडाफार भार प्रेक्षकांवर पडणारच.
तरी देखिल नाटकांचे दर थोडेफार कमी करावेत, निर्माते प्रेक्षकांना 'लुटणार' नाहीत ह्याकडे सरकारने लक्ष द्यावे असे मलाही वाटते.
दरवाढ प्रत्येक गोष्टीत आहे कशा कशा बाबत बोंबलायच? ज्यानं त्यानं ठरवावे प्राधान्य कशाला द्यायचं!
अतीअवांतर - काल्पनीक - स्फुट - मुक्तक -
आजकालचे काही पत्रकार उचलली जीभ लावली टाळ्याला लिहतात. स्व:ताला लई शहाणे, मध्यमवर्गीयांचे स्वयंघोषीत नेते समजतात. एकाच्या ब्लॉगवर बरेच सिनेमांचे संदर्भ आढळतात ती काय मित्राने काढलेले टिकीटे का नवपत्रकारता स्टाईल ने न बघताच ठोकून दिलेले? सकाळमधे ग्राफीटी लिहणारे कोण बॉ? अगदी महिनाभर ग्राफीटी लिहुन देखील दोन टिकीटे नाही येत, फारच पिळवणूक करतात तर सकाळवाले? काही ग्राफीटी वाचुन तशी शंका आली होती म्हणा. ;-)
१ नंबर बोललात साहेब. नसेल नाटक परवडत तर सिनेमाला जा ना. नाहीतर घरी बसून टी व्ही बघा. त्यावर चर्चा कसल्या झोडताय?
(सिनेमापेक्षा) जास्त पैसे देऊन नाटक बघण्यात मला स्वारस्य वाटेल कारण तेथे थेट अभिनय असतो. ते कलाकार आपल्यासमोर एका दमात पूर्ण २ ते ३ तास नाटक दाखवतात.
सिनेमाप्रमाणे २ ३ मिनिटांचा शॉट चित्रित करून मग एकत्र सिनेमा बनविणे ही वेगळी कला आहे. पण एकदा का तो बनला की वर्षानुवर्षे तेच दिसते. नाटकाचे तसे नाही.
बाकी तिकिट महाग असणे ह्यावर आपण हेच करू शकतो की नाही जायचे बघायला. मग प्रेक्षक नसले तर येतील दर खाली. पण एक आहे, त्यांना कळायला पाहिजे की प्रेक्षक का कमी झाले ते. अन्यथा पुन्हा ओरड चालू होईल की मराठी नाटकाला प्रेक्षक नाही म्हणून.