जनातलं, मनातलं

अब्दुल खान - ३

Primary tabs

(पूर्वसूत्रः अब्दुल खानला हिंदी सिनेमे खूप आवडायचे! त्यातही प्रत्यक्ष सिनेमापेक्षा गाणी छायागीत सारखी बघायला आवडायची. या बाबतीत त्याची आणि माझी आवड सारखी होती. "पूरी फिलम क्या देखनी, सबकी स्टोरी तो एकही होती है!!" हे त्याचं मत मला पूर्ण मान्य होतं!!! पण त्याची इतर काही काही मतं एकदम भन्नाट होती. एकदा काय झालं....)

एकदा काय झालं...
एका रविवारी दुपारी इक्बाल मला भेटायला आला होता. अब्दुल खान कुठेतरी बाहेर गेला होता. आम्ही व्हिडिओवर एक हिन्दी फिल्म लावून बसलो होतो. पिक्चर यथातथाच होता. आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करून गप्पा मारण्यात रंगलो होतो....

अचानक घराचा दरवाजा उघडून अब्दुल खान आत आला. इक्बालचं आणि त्याचं नेहमीचं सलाम आलेकुम झालं.

"क्या चल रहा है मियां?"
"कुछ नही, बस गप्पे लडा रहे है!" इक्बाल
अब्दुल खानने थोडावेळ टीव्हीकडे पाहिलं....
"ये क्या बकवास देख रहे हो? कुछ अच्छे जीनत अमानके गाने लगावो यार!!"

हे त्याचं आणखी एक वेड होतं. त्याला सगळ्या भारतीय नट्यांमध्ये झीनत अमान विलक्षण आवडायची!!!

"ए इक्बाल, उठ!! जरा नीचे जा और कोनेवाले उस सिंधीके दुकानसे जीनत के गानेवा़ली कॅसेट लेके आ!! और देख, साथमें समोसे और जलेबी भी लेके आ, ये ले कॅश!!"
"तू आयेगा मेरे साथ?" इक्बालने मला विचारले....
"अबे कराचीके सांईं! सुलेशको बैठने दे यहां!! वो कोनेवाला और तुम, दोनो सिंधी हो इसलिये तुम्हें भेज रहा हूं! जितना जी चाहे बार्गेनिंग करो. हम दोनो वॉरियर्सको बैठने दो यहां!" आज त्याचा खोड्या काढायचाच मूड होता...
"तू वापस आयें तभीतक हम ड्रिंक्स बनाकर तय्यार रखते है! चलो, आज पार्टी करेंगे....."

मला 'तू जर पार्ट्या करणार असशील तर जागा मिळणार नाही' असे अगोदर खडसावणारा अब्दुल खान स्वतःच म्हणत होता...

मी त्याला त्याच्या झीनत अमानच्या वेडाबद्द्ल विचारायचं ठरवलं. खरंतर झीनत तेंव्हा खूप फेमस होती. सत्यं, शिवं, सुंदरम वगैरे!!! पण म्हणून काय झालं?
"खानसाब, मुझे एक बात सच सच बताओ, आपको झीनत अमान इतनी पसंद क्यों है? वो तो क्रॉस-आईड है!! मुझे बिल्कुल समझमें नही आता की उसमें आप इतना क्या देखते है?"
"अबे उल्लूके पठ्ठे!!" इक्बाल गेल्याची खात्री करून घेउन तो म्हणाला, "उसकी आंखोसे हमें क्या लेना देना? अरे, उसका जिस्म देख जिस्म!! आंखोको लेकर क्या करेगा तू? वैसेभी ऐन मौकेपर तो जिस्मही काम आता है ना!!!"

मी सर्दच झालो. पुढे विषय वाढवला नाही पण त्याच्या परिपक्व रसिकतेला मनातल्या मनात दाद दिली. मनातल्या मनातच फक्त, कारण माझ्या पांढरपेशा मनाला मोठयाने दाद देण्याची लाज वाटली. स्त्रीया आणि नातेसंबंध याबाबत त्याचे विचार अगदी वेगळे होते. जसजशी आमची मैत्री वाढली तसतसे मला ते कळत गेले आणि प्रत्येक वेळी मी अचंबित होत गेलो...

एकदा क्लायंट वेळेवर न पोहोचू शकल्याने माझी एक मोठी मीटींग रद्द झाली. चला, लवकर सुटका झाली म्हणून मी आनंदातच घरी आलो. चार-साडेचारचा सुमार असेल. घरी येऊन लॅच मध्ये चावी फिरवली तरी दरवाजा उघडेना! आतून बोल्ट घालून दार बंद करण्यात आलं होतं. मला आश्चर्य वाटलं. कारण आम्ही बोल्ट कधीच लावत नसू. दोघांकडेही चावी असल्याने त्याची आवश्यकताच कधी भासली नव्हती. मी दरवाजा ठोठावला, उत्तर नाही! पुनः पुनः दरवाजा ठोठावल्यावर अब्दुल खानचा आवाज आला,

"गो अवे!"
"खानसाब, मै सुलेश हूं!"
"अच्छा, ठहरो एक मिनट!"

तब्बल पाच मिनिटांनी दरवाजा उघडला. दरवाजात अब्दुल खान उभा! उघडाबंब, कमरेला फक्त एक लुंगी गुंडाळलेली!! काही न बोलता त्याने मला आत यायला वाट दिली. मी बूट-मोजे काढून फ्रेश व्हायला बाथरूमकडे वळलो तर बाथरूमचा दरवाजा बंद!

"माय फ्रेंड इज इनसाईड!" तो म्हणाला. माझी नजर परत मेन दरवाजाकडच्या जमिनीकडे वळली. तिथे लेडीज सॅन्डल्सची एक जोडी होती...

"ओके, आय विल युज द बाथरूम लेटर" असे म्हणून मी माझ्या खोलीत गेलो. थोडया वेळाने बाथरूममधली ती पंजाबी ड्रेस घातलेली स्त्री बाहेर आली. तिचं आणि अब्दुलखानचं हलक्या आवाजात काहीतरी बोलणं झालं आणि ती गेली. हा विषय इथेच सोडायचा असं मी ठरवलं...

दोन्-तीन दिवसांनी आम्ही गप्पा मारत बसलो असतांना अचानक अब्दुल खानच म्हणाला,
"अरे सुलेश, तुमसे एक बात करनी थी! याद है, उस दिन तुम जल्दी आये तभी वो औरत आयी थी, मैने मेरी फ्रेंड करके बतायी..."
मी काहीच बोललो नाही..
"हालांकि वो फ्रेंड तो है, बट शी इज मोअर दॅन अ फ्रेंड!"
"पता है!" मी म्हणालो. तो आश्चर्याने उडालाच!
"क्या, क्या पता है तुम्हें?"
"दॅट शी इज मोअर दॅन युवर फ्रेंड"
"तुम्हें क्या मालूम? क्या तुम उसे जानते हो?" तो चक्रावला होता.
"उसे तो नही जानता, लेकिन खानसाब, आपको तो अब मैं जानता हूं!! अगर वो सिर्फ दोस्त होती तो आप उसके सामने बिना कुर्ता पहने हुए सिर्फ लुंगी लटकाये कभी नही बैठते! इतने शरीफ तो आपभी हो!!" मी डोळे मिचकावले.
"तुम तो शेरलॉक होम्सके बाप हो यार!" तो हसून उदगारला, "वो बीवी है मेरी!"
माझ्या चेहर्‍यावर मिश्किल हसू कायम होतं. तो थोडा ओशाळला...
"अरे वैसी शादीवाली बीवी नही! वो रखैल है मेरी! लेकिन रखैल कहना अच्छा नही लगता नं!"

म्हणजे त्याला ऍक्चुअली रखेली ठेवायला हरकत वाटत नव्हती पण तिला रखेली म्हणायला 'अच्छा नही लगता!!'

"खानसाब आपको यह सब मुझे कहने की कोई जरूरत नहीं. यू आर ऍन ऍडल्ट! यू डोन्ट नीड टू एक्सप्लेन एनीथिंग टू मी"
"अरे वो तो ठीक है. लेकिन तुम मेरे रूममेट हो. शायद आगेभी कभी उसदिन जैसी नौबत आ सकती है. तुम्हें ऑकवर्ड होगा, उसे ऑकवर्ड होगा, मुझे तो डबल ऑकवर्ड होगा! खामखा झंझट क्यूं? मैने बहुत सोचा और फिर फैसला किया किया तुम्हें साफ साफ बता देनाही अच्छा है, तुम समझ जाओगे!"
"ठीक है!"
"उसका नाम शबनम है. शादी होके पाकिस्तानसे यहां आयी. एक बच्चा होने के बाद उसके शौहरने तलाक दे दिया और दूसरे औरत के साथ रहने लगा. अकेली बच्चे के साथ रहती है. एक डिपार्टमेंटल स्टोअरमें काम करती है"

चला, म्हणजे अगदीच नगरभवानी नव्हती तर! तिला नव्हता नवरा आणि याला नव्हती बायको! दोघे एकमेकांची गरज भागवत होते...

सिम्बियॉटिक जॉईंट व्हेंचर!! माझं ताजंताजं एम्.बी.ए. मनात बडबडलं!!

"तो फिर आप उससे शादी क्यों नही करते?"
"कॉम्प्लिकेशन है, कभी बताऊंगा बादमें"

त्यानंतर तो विषय तिथेच संपला. मला त्याचं वागणं जरी पसंत नव्हतं तरी त्याने मला विश्वासात घेण्याइतकं आपलं मानलं याचं मला बरं वाटलं! त्यानंतर शबनम मी घरी असतांना क्वचितच आली असेल. "हाय, हलो" यापुढे आमची कधीच बातचीत झाली नाही. खान मात्र मला कधी कधी शनिवारी रात्री मोकळेपणे सांगायचा,

"सुलेश, मैं जरा शबनमके यहां जा रहा हुं, वापस आनेको देर होगी" माझ्या चेहर्‍यावरचा संकोच त्याच्या लक्षात यायच्या आधीच तो दरवाजा बंद करुन जात असे.

एके दिवशी मात्र त्याने माझी साफ दांडी उडवली. मला म्हणाला,

"सुलेश, मै देख रहां हूं, यहांपर तुम्हारी कोई गर्लफ्रेंड तो है नही! ऑफिसमें कोई है क्या?"
"नही तो खानसाब!" माझा चेहरा लाजेने लाल झाला असावा.
"अरे इतना शरमानेकी जरूरत नहीं. मेराभी यही अंदाजा था! कैसे होगा रे तुम्हारा?'

मी काही न कळून त्याचाकडे पाहिले...

"मैं शबनमको कहूं, तुम्हारे लिये उसकी कोई सहेली ढुंढने?"

माझ्या डोळ्यांसमोर एकदम काजवे चमकले. मी सुद्धा रखेली ठेवू? तीही लग्नाआधीच? माझ्या डोळ्यापुढे भारतातले माझे आई-वडील उभे राहिले! त्यांना जर कळलं की आपल्या दिवट्या चिरंजीवांनी रखेली ठेवली आहे तर? वडील तर कानाखाली एक आवाजच काढतील. आणि आई? ती चुलीतलं जळतं लाकूड डागून माझा नेमका तोच अवयव निकामी करेल...

मी एकदम शहारलो. माझी ती विचित्र हालचाल पाहून अब्दुल खान म्हणाला,

"कोई बात नही, सोचकर बताना"

क्या सोचना, कपाळ!! तो मित्राच्या काळजीने सांगत होता हे मला कळत होतं पण आपल्या विश्वात ते इतकं भयंकर होतं की मला ते त्याला समजावून सांगताही आलं नसतं!!

मला नेहमी त्याच्या पूर्वेतिहासाबद्दल कुतुहल असायचं. हा कोण असेल, कुठे वाढला असेल, त्याला फॅमिली असेल काय! इथे न्यूयॉर्कमध्ये कसा आला?

आणि एक दिवस मला सगळं सगळं समजलं!! अब्दुल खाननेच सांगितलं!!

ती रात्र मी आयुष्यात कधीच विसरणार नाही.....

(क्रमशः)

अब्दुल खान - १

अब्दुल खान - २

विसोबा खेचर

म्हणजे त्याला ऍक्चुअली रखेली ठेवायला हरकत वाटत नव्हती पण तिला रखेली म्हणायला 'अच्छा नही लगता!!'

सिम्बियॉटिक जॉईंट व्हेंचर!! माझं ताजंताजं एम्.बी.ए. मनात बडबडलं!!

त्यांना जर कळलं की आपल्या दिवट्या चिरंजीवांनी रखेली ठेवली आहे तर? वडील तर कानाखाली एक आवाजच काढतील. आणि आई? ती चुलीतलं जळतं लाकूड डागून माझा नेमका तोच अवयव निकामी करेल...

हा हा हा! हे बाकी सह्हीच रे डांबिसा... :)

लेखमाला मस्तच सुरू आहे... पुढला भाग येऊ दे रे लवकर...

तात्या.

पिवळा डांबिस साहेब,

अब्दुल खान मालिकेचे तिन्ही भाग वाचले. खूप छान लिहिले आहे. उत्सुकता वाढवत ठेवून परमोच्च क्षणी 'क्रमशः' टाकणे आपल्याला मस्त जमले आहे. अभिनंदन.

मी सुद्धा रखेली ठेवू? तीही लग्नाआधीच? माझ्या डोळ्यापुढे भारतातले माझे आई-वडील उभे राहिले! त्यांना जर कळलं की आपल्या दिवट्या चिरंजीवांनी रखेली ठेवली आहे तर? वडील तर कानाखाली एक आवाजच काढतील. आणि आई? ती चुलीतलं जळतं लाकूड डागून माझा नेमका तोच अवयव निकामी करेल...

दुर्दैवाने वरील शब्दरचना पटली नाही. रखेली न ठेवण्यामागे काही वैचारीक, उदात्त भूमिका दिसत नाही. तीही लग्नाआधीच? ही शब्दरचना 'लग्ना नंतर एकवेळ हरकत नाही' असा संदेश पोहोचवतो. (तसा तुमचा उद्देश दिसत नाही.) पुढील वाक्यांमधून 'आई-वडीलांना आवडणार नाही' म्हणून नाहीतर 'रखेली ठेवण्यास व्यक्तीशः तुमची हरकत नाही' असे दिसते. (असो. तसेही तुमचे कॅरेक्टर वाटत नाही.)

मालिकेतील पुढील भागांसाठी शुभेच्छा..!

विसोबा खेचर

रखेली न ठेवण्यामागे काही वैचारीक, उदात्त भूमिका दिसत नाही.

म्हणजे एखाद्याने रखेली ठेवली तर तो काही फार मोठी अवैचारिक, किंवा अनुदात्त गोष्ट करत असतो असं तुम्हाला म्हणायचं आहे का? आणि जळ्ळं, रखेल्या न ठेवणारे सर्वच जण त्यांच्या इतर आयुष्यात काही फार मोठी वैचारिक आणि उदात्त कामं करत असतात की काय? :)

ही शब्दरचना 'लग्ना नंतर एकवेळ हरकत नाही' असा संदेश पोहोचवतो.

हा हा हा! हा आऊटकम आवडला... :)

असो...

तात्या.

तात्या, ह्या विषयातला आपला अधिकार मोठा आहे. आपला आदर राखून माझ्या विधानातली माझी भूमिका मांडण्याचा प्रयत्न मी करतो.

म्हणजे एखाद्याने रखेली ठेवली तर तो काही फार मोठी अवैचारिक, किंवा अनुदात्त गोष्ट करत असतो असं तुम्हाला म्हणायचं आहे का?

त्या कृत्यामागे काही समर्थनीय वैचारिक बैठक असू शकते, अशी काही गोष्ट मला लेखकाच्या कथनात आढळून आली नाही. अविचाराने, फक्त वासनेपोटी रखेली ठेवणे मला तरी अनुदात्त वाटते.

आणि जळ्ळं, रखेल्या न ठेवणारे सर्वच जण त्यांच्या इतर आयुष्यात काही फार मोठी वैचारिक आणि उदात्त कामं करत असतात की काय?

तात्या, सर्वच जणांच्या रोजच्या वागण्यामागे काहीतरी व्यक्त/अव्यक्त विचार असतो. समाजमान्य कृतींसाठी तसा नसेल तरीही चालतो. पण जिथे समाजाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते अशा ठिकाणी बंड करण्यामागे काही समर्थनीय कारण असावे असे वाटते. समाजात राहताना, ठराविक कक्षेबाहेर्, फक्त स्वतःचा विचार करून नाही चालत असे मी मानतो. आणि इच्छा असूनही रखेली न ठेवणारे,आपल्या जीवन साथीदाराचा, समाजाचा विचार करून, त्यांचा योग्य तो सन्मान राखून एकप्रकारे उदात्त कार्यच करीत असतात.
दूसरे, उदात्त आणि अनुदात्त ही संकल्पना सापेक्ष आहे. जीवनातील प्रत्येक गोष्ट विचारांनी, औदत्याने भारीत नसते. (नसावी, नाहीतर जगण्यातली सहजता निघून जाईल). पण आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटनांना विचारांचे पाठबळ असावे. (नॉर्मली, असते).

श्री. पिवळा डांबिस ह्यांच्या लेखावरील माझी प्रतिक्रिया ही मुलतः 'लेखनशैलीतील' चूक दर्शविण्यासाठी आहे. त्यांच्या चारित्र्याविषयी आणि वैचारीक क्षमते विषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही.
असो.

विसोबा खेचर

अविचाराने, फक्त वासनेपोटी रखेली ठेवणे मला तरी अनुदात्त वाटते.

हम्म! प्रत्येकाची मतं!

पण जिथे समाजाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते

का बरं? एखाद्याने रखेली ठेवली म्हणजे त्यामुळे समाजाचे आरोग्य धोक्यात येते हे कशावरून? की असं तुम्हाला वाटतं म्हणून?

आणि आत्तापर्यंत अनेक जणांनी रखेल्या ठेवल्या आहेत, या हिशोबाने समाजाचे आरोग्य धोक्यात येऊन समाज केव्हाच मरून जायला हवा होता! तसं अद्याप तरी माझ्या मते काही झालेलं नाहीये! समाजाचं आरोग्य इतकं तकलादू नाही की ते बारिकसारिक कारणांवरून धोक्यात वगैरे येऊ शकेल! आणि जळ्ळं, सगळीच मंडळी कशी धुतल्या तांदळासारखी असतील तिच्यायला? अहो समाज म्हटला की त्यात हरप्रकारची माणसं असायचीच पेठकरसाहेब! त्यांचं वागणं चूक की बरोबर, वैचारिक की अवैचारिक हे ठरवणारे आपण कोण?

आणि इच्छा असूनही रखेली न ठेवणारे,आपल्या जीवन साथीदाराचा, समाजाचा विचार करून, त्यांचा योग्य तो सन्मान राखून एकप्रकारे उदात्त कार्यच करीत असतात.

हा हा हा! असं म्हणता? बरं बरं! :)

दूसरे, उदात्त आणि अनुदात्त ही संकल्पना सापेक्ष आहे.

यू सेड इट! :)

(नसावी, नाहीतर जगण्यातली सहजता निघून जाईल).

हा हा हा! यू सेड इट अगेन! :)

पण आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटनांना विचारांचे पाठबळ असावे. (नॉर्मली, असते).

अहो मग जेव्हा एखादा इसम रखेली ठेवतो त्यामागे कुठल्याही विचारांचे पाठबळ नसते, किंवा तो अविचार असतो हे कशावरून? आणि काय सांगावं, एखाद्या माणसाने रखेली ठेवली असेल तर त्यामागे त्याचाही काही विचार असेलच की! की सारासार विचार करण्याची क्षमता आपल्यालाच काय ती आहे आणि त्याला नाही?

आणि जळ्ळं तो आपल्याला कशाला विचारायला येतोय की 'मी रखेली ठेऊ का नको' ते?! :))

हां, जेव्हा तो किंवा ती तुम्हाआम्हाला विचारायला येतील तेव्हा त्याना काय ते सोकॉल्ड वैचारिकतेचे आणि संस्काराचे डोस पाजावेत! :))

तात्या.

आत्तापर्यंत अनेक जणांनी रखेल्या ठेवल्या आहेत, या हिशोबाने समाजाचे आरोग्य धोक्यात येऊन समाज केव्हाच मरून जायला हवा होता! तसं अद्याप तरी माझ्या मते काही झालेलं नाहीये! समाजाचं आरोग्य इतकं तकलादू नाही की ते बारिकसारिक कारणांवरून धोक्यात वगैरे येऊ शकेल!

तात्यासाहेब, सिगरेट, तंबाखूचे सेवन शरीराला हानीकारक असते. त्याने कॅन्सर होऊ शकतो. अशी आपल्याला शिकवण मिळते. ती चुकीची असते का? माझ्या मते 'नाही' ती बरोबरच असते. पण तरीही समाजात सिगरेट पिणार्‍यांचे, तंबाखू सेवन करणार्‍यांचे प्रमाण बर्‍यापैकी दिसून येते. तसेच टाटा हॉस्पिटलमधे कॅन्सरग्रस्तांचे प्रमाणही लक्षणीय आहे. पण म्हणून मुळ उपदेश चूकीचा ठरतो का? त्या मुळे सर्व समाजच कॅन्सर ग्रस्त होऊन एक दिवस मरून जाईल असा निष्कर्ष काढावा का? बाबारे!, सिगरेट पिऊ नकोस, तंबाखू सेवन करू नकोस असा सल्ला आपल्या मुलाला, मित्राला, शेजार्‍याला (म्हणजेच समाजातील घटकांना) देऊच नये का?
दारूच्या संभाव्य दुष्परिणामांवर आपणच एक लेखमाला ३ भागांत दिली आहे त्याचे प्रयोजन फक्त 'कशी तात्यांची गंमत झाली' एवढेच आहे का? दारू पिऊन वाहन चालवू नये असा संदेश शिंदेसाहेबांनी दिला. तुम्हाला मला तो पटला. आपण शिंदे साहेबांना (त्यांच्या तोंडावर नाही निदान अपरोक्ष तरी..) असे म्हणू का? की,'अहो दारू पिऊन वाहन चालविल्याने माणसे मरत असती तर आत्ता पर्यंत सर्व समाज मरून गेला असता, काय सांगता राव!' पण आपण असे म्हणत नाही. म्हणून दारू पिऊन वाहन चालविणार्‍यांचे प्रमाण कमी आहे का? माझ्या माहितीत किमान ५० माणसे मी दाखवू शकेन अशी. असे म्हंटल्याने शिंदे साहेबांच्या अनुभवांना आणि तुमच्या लेखातून मिळणार्‍या संदेशाला कुठेही खोटेपणा येत नाही.

आणि जळ्ळं, सगळीच मंडळी कशी धुतल्या तांदळासारखी असतील तिच्यायला? अहो समाज म्हटला की त्यात हरप्रकारची माणसं असायचीच पेठकरसाहेब!

तुम्हाला जाणवत नसली तरी एवढे समजण्याची बुद्धी परमेश्वराने मला दिली आहे.

त्यांचं वागणं चूक की बरोबर, वैचारिक की अवैचारिक हे ठरवणारे आपण कोण?

समाज नांवाच्या कुटुंबातील एक घटक. एक हितचिंतक.
मी माझे मत मांडले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली मते मांडण्याचा प्रत्येक मिपा सदस्याचा अधिकार आहे. आणि तो मिपाच्या ध्येय-धोरणांच्या कक्षेतच आहे असे मला वाटते. चुकले असल्यास माझे सर्व प्रतिसाद उडवून लावण्याचा अधिकार माझ्या प्रमाणेच, ह्या स्थळाला भेट देणार्‍या प्रत्येक सदस्याने तुम्हाला दिला आहेच.

आणि इच्छा असूनही रखेली न ठेवणारे,आपल्या जीवन साथीदाराचा, समाजाचा विचार करून, त्यांचा योग्य तो सन्मान राखून एकप्रकारे उदात्त कार्यच करीत असतात.
हा हा हा! असं म्हणता? बरं बरं!
दूसरे, उदात्त आणि अनुदात्त ही संकल्पना सापेक्ष आहे.
यू सेड इट!
(नसावी, नाहीतर जगण्यातली सहजता निघून जाईल).
हा हा हा! यू सेड इट अगेन!

काय असायला हवे आणि प्रत्यक्षात काय असते ह्या दोन्हींचा सारासर विचार करून मी माझी मते मांडली आहेत. माझ्या मतांनुसार समाज चालावा असा माझा दुराग्रह नाही. माझी काही निरिक्षणे तुम्हाला परस्पर विरोधी वाटली असतील तर ते आपल्या समाजातील वैविध्यामुळेच आहे.

अहो मग जेव्हा एखादा इसम रखेली ठेवतो त्यामागे कुठल्याही विचारांचे पाठबळ नसते, किंवा तो अविचार असतो हे कशावरून? आणि काय सांगावं, एखाद्या माणसाने रखेली ठेवली असेल तर त्यामागे त्याचाही काही विचार असेलच की! /strong>

ज्या मुद्यावरून हा वादंग सुरू झाला तो माझा मुद्दा पुन्हा एकदा नीट वाचावा ही विनंती. लेखकाची शब्द निवड चुकीचा अर्थ ध्वनीत करते आहे असे माझे म्हणणे होते. म्हणजेच, त्यात विचारांना विरोध केलेला नसून लेखनशैलीतील उणीव दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

की सारासार विचार करण्याची क्षमता आपल्यालाच काय ती आहे आणि त्याला नाही?

असा दावा मी कुठेही केलेला नाही.

तो किंवा ती तुम्हाआम्हाला विचारायला येतील तेव्हा त्याना काय ते सोकॉल्ड वैचारिकतेचे आणि संस्काराचे डोस पाजावेत!

तुमच्या उपदेशावर मी जरूर विचार करेन. जरा सौम्य शब्द वापरले असतेत तर मला आवडले असते.

धन्यवाद.

माननीय तात्या आणि पेठकरसाहेब,
अरे तुम्ही कशाला असा वाद घालताय रे? सोडून द्या...

पेठकरांनी त्यांच्या म्हणण्यानुसार माझ्या लेखनशैली तील उणीव दाखवण्याचा पुनःपुन्हा प्रयत्न केला आहे. पेठकरजी, तुमच्या मताची आम्ही इथे जाहीर नोंद घेत आहोत. आता तर झालं?

च्यायला, आमची काही लेखनशैली आहे हे आम्हालाच माहिती नव्हतं!!:)
एक मात्र समजलं नाही की एखाद्याची लेखनशैली बरोबर वा चूक कशी असू शकेल? नाही म्हणजे व्याकरण आणि स्पेलिंग, मानलं तर, चूक किंवा बरोबर असू शकतं. शैली ही आमच्या समजुतीनुसार वैयक्तिक (वन ऑफ अ काईंड) असते. मग ती कोणत्या नियमांनुसार चूक वा बरोबर ठरवता येते? हां, शैली आवडती किंवा नावडती असू शकते पण चूक किंवा बरोबर?
असेल बुवा, आम्हाला काय कळतंय त्यातलं!!

ते एक असो, पण आमच्यासारख्या एका नवोदित ललित लेखकाच्या कथेपायी तुम्ही मित्र आपसांत वादावादी करु नका बुवा! आम्हाला ते बरं वाटत नाही. तितकंच असेल तर तुम्ही सांगा, आम्ही आपलं मिपावरचं लिखाण बंद करतो. आपली ना नाही. आपल्यामुळे दोन मित्रांत वाद निर्माण झालेला आम्हाला आवडणार नाही.

आपल्या दोघांच्याही लोभाची इच्छा धरणारा,
पिवळा डांबिस

इतर सदस्यांच्या वेळेचा अपव्यय होऊ नये म्हणून व्यक्तिगत संदेश पाठवला आहे.

विसोबा खेचर

अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली मते मांडण्याचा प्रत्येक मिपा सदस्याचा अधिकार आहे. आणि तो मिपाच्या ध्येय-धोरणांच्या कक्षेतच आहे असे मला वाटते.

अगदी खरं! परंतु सदर चर्चाविषयात आपली मते मांडावयाच्या आपल्या अधिकाराची कुठे पायमल्ली झाली आहे असं मला वाटत नाही. आपली मते मांडावयास मिपाने आपल्याला कुठेही मज्जाव केलेला नाही, हे मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो...

चुकले असल्यास माझे सर्व प्रतिसाद उडवून लावण्याचा अधिकार माझ्या प्रमाणेच, ह्या स्थळाला भेट देणार्‍या प्रत्येक सदस्याने तुम्हाला दिला आहेच.

अहो पण यात तुमचे प्रतिसाद उडवून लावायचा कुठेच प्रश्न येत नाही. आपली मतं जरी वैयक्तिकरित्या मला पटली नसली तरी आपल्या लेखनात मिपाच्या दृष्टीने आक्षेपार्ह असं काहीच नाही, की जे उडवून लावावं!

लेखकाची शब्द निवड चुकीचा अर्थ ध्वनीत करते आहे असे माझे म्हणणे होते. म्हणजेच, त्यात विचारांना विरोध केलेला नसून लेखनशैलीतील उणीव दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

असो, या विषयावर आता आपल्या दोघांची पुरेशी चर्चा झालेली आहे असं मला वाटतं. आपण दोघेही आपापल्या मतांशी ठाम आहोत आणि आपली या बाबतीतली मतं एकमेकांना पटतील, असं मला तरी वाटत नाही..

जरा सौम्य शब्द वापरले असतेत तर मला आवडले असते.

कबूल आहे. त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो..

बाकी, फोनवर विस्तृत बोलणे झाले आहेच,

कलोअ..

आपलाच,
तात्या.

इतर सदस्यांच्या वेळेचा अपव्यय होऊ नये म्हणून व्यक्तिगत संदेश पाठवला आहे.

मदनबाण

"हालांकि वो फ्रेंड तो है, बट शी इज मोअर दॅन अ फ्रेंड!"
च्या मारी.....मोअर दॅन अ फ्रेंड!!!!! :D
माझ्या डोळ्यापुढे भारतातले माझे आई-वडील उभे राहिले! त्यांना जर कळलं की आपल्या दिवट्या चिरंजीवांनी रखेली ठेवली आहे तर? वडील तर कानाखाली एक आवाजच काढतील. आणि आई? ती चुलीतलं जळतं लाकूड डागून माझा नेमका तोच अवयव निकामी करेल...
=))

सुलेशजी क्या खुबसुरत तरिकेसे लिखते हो आप.....व्वा.....पर ये क्या फिर से (क्रमशः).....कोई बात नही हमे इंतजार रहेगा.....

(मोअर दॅन अ फ्रेंड सॉरी फक्त उत्त्तम मित्राच्या शोधात) :))
मदनबाण

विजुभाऊ

या लेखातले मला सर्वात न आवडलेले वाक्य
आणि एक दिवस मला सगळं सगळं समजलं!! अब्दुल खाननेच सांगितलं!!
ती रात्र मी आयुष्यात कधीच विसरणार नाही.....
(क्रमशः)

डाम्बीस काका तुम्ही खरच डाम्बीस आहात.
तुम्ही जुन्या हिन्दी फिल्मा फार पाहिल्या आहेत असे वाटते
मंद म्युझीक वाजते.हीरो हीरोइन जवळ येतात,आपण जरा सरसाउन बसतो. हीरो हीरोइनच्या डोळ्यात पहातो् हीरोइनच्या डोळ्यात शरम उत्सुकता दोघे आणखी जवळ येतात. आपण आणखीन सरसाउन बसतो दोघे आणखीन जवळ येतात. हातात हात घट्ट पकडले जातात्.कॅमेरा आता फूलदाणीतल्या फुलावर एक भुंगा येतो फुलावर बसतो. हीरोहीरोइन चेहेर्‍याचा क्लोज अप .
ते आणखी जवळ येतात.
ढॅण्ण्ण्ण्ण्ण्ण्ण्...............शॉट बदलतो.....खीडकीवर दुपटी वाळत घातली आहेत असा सीन.........
आपली सरसावलेली पोज ओशाळवाणी होते.
असेच आम्हालावाटते.
हे कसे वाटते? तसेच तुमच्या क्रमशः ने वाटते.
पुढचे ऐकायला सरसावुन बसलेला :विजुभाऊ

इनोबा म्हणे

अगदी हेच म्हणतो.
लेख आवडला हे.सां. न. ल.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

मुक्तसुनीत

अब्दुल्ल्याबद्दलचा हाही लेख आवडला. लेखकाच्या फर्मास शैलीबद्दल प्रश्नच नाही (तसे मी आणि इतरानीही वेगवेगळ्या रीतीने म्हण्टले आहेच !)

पण केवळ शैलीचा खुमासदारपणा हेच या मालिकेच्या यशाचे रहस्य नाही. त्यामधे वर्णिलेला अनुभव फार अस्सल आहे. रोजच्या आयुष्यात सहजासहजी अनुभवाला न येणारा रसरशीतपणा, आडदांडपणा, दिलदारपणा यांचे दर्शन घडवणारा , आणि आपली आतापर्यंतची मूल्ये , आपला समस्त पाकीस्तानी लोकांना एका तागडीत तोलणारा शत्रुभाव , लैंगिक शुचितेबद्दलची आपली मते या सगळ्यांचे पुनर्मूल्यांकन करायला भाग पाडणारा असा हा सारा अनुभव आहे.

अब्दुलखान सारख्या माणसांचा जगण्याचा सूरच निराळा, त्यांची स्वतःची अशी , त्यांनी ठरवून दिलेल्या मूल्यांची अशी एक व्यवस्था आहे. आम्हाला या अनोख्या माणसाचे आणि त्याच्या सृष्टीचे दर्शन घडविल्याबद्दल डांबिसखानका हम तेहे-दिल से शुक्रिया अदा करते हैं ! :)

  • त्यामधे वर्णिलेला अनुभव फार अस्सल आहे. रोजच्या आयुष्यात सहजासहजी अनुभवाला न येणारा रसरशीतपणा, आडदांडपणा, दिलदारपणा यांचे दर्शन घडवणारा , आणि आपली आतापर्यंतची मूल्ये , आपला समस्त पाकीस्तानी लोकांना एका तागडीत तोलणारा शत्रुभाव , लैंगिक शुचितेबद्दलची आपली मते या सगळ्यांचे पुनर्मूल्यांकन करायला भाग पाडणारा असा हा सारा अनुभव आहे.

धन्यवाद....

आनंदयात्री

>>पण केवळ शैलीचा खुमासदारपणा हेच या मालिकेच्या यशाचे रहस्य नाही. त्यामधे वर्णिलेला अनुभव फार अस्सल आहे.

असेच म्हणतो डांबिसकाका :) .. अत्युकृष्ट लेखन .. उत्कंठा इतकी वाढलीये की तुमचा फोन नं मिळवुन तुमच्याशी बोलावे वाटतेय .. कसा आला असेल बॉ पठाण तिथे ?

(अशा प्रतिसांदांमधेच लेखाचे यश दिसुन येते ...नाही ?)

प्राजु

व्य.नि. मधून पाठवला आहेच. पण आता पुढच्या भागाची वाट नका पहायला लावू.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धमाल मुलगा

मागच्या भागात आम्ही डांबिसकाकांना विचारलं होतं "तुमच्या अब्दुल खानाला काही शेरोशायरी-गज़लांचा शौक असेलच" आणि ह्या भागात वाचतो तर हा पठ्ठ्या साक्षात चालती-बोलती गज़ल कवेत घेऊन असायचा तर! :)

काका, बाकी हा अब्दुलखाँ बरेच पैलू असलेल्या व्यक्तिमत्वाचा दिसतोय....

सुलेशबाबू, और भी आने दो....

वो कोनेवाला और तुम, दोनो सिंधी हो इसलिये तुम्हें भेज रहा हूं! जितना जी चाहे बार्गेनिंग करो. हम दोनो वॉरियर्सको बैठने दो यहां!"

:) काय दृष्य आहे, इक पठान का बच्चा आणि येक मरहट्टी शेर मेहफ़िल-ए-दोस्ताना सजवून बसलेत....वा: !

"मैं शबनमको कहूं, तुम्हारे लिये उसकी कोई सहेली ढुंढने?"

ह्याला म्हणतात केल्या दोस्तीला जागणं! :) अगदी एखादी गर्लफ्रेंडही मिळवायला मदत करतो म्हणजे नक्कीच मैत्री चांगली जमली होती तर! (मंडळी, आठवा, आपापल्या कॉलेजातले दिवस...काय? पटलं की नाही माझं वरचं म्हणणं? :) )

क्या सोचना, कपाळ!! तो मित्राच्या काळजीने सांगत होता हे मला कळत होतं पण आपल्या विश्वात ते इतकं भयंकर होतं की मला ते त्याला समजावून सांगताही आलं नसतं!!

अस्सल मराठी घरातलं चित्र!
छोडो.. जाने भी दो यारों !!!!!

डांबिसकाका, पुढच्या क्रमशः ची आतूरतेने वाट बघतोय.

हा 'प्राणी' भन्नाटच दिसतो आहे,
मला नेहमी त्याच्या पूर्वेतिहासाबद्दल कुतुहल असायचं. हा कोण असेल, कुठे वाढला असेल, त्याला फॅमिली असेल काय! इथे न्यूयॉर्कमध्ये कसा आला..
हे वाचायला उत्सुक,
स्वाती

गणपा

डांबिस काका,
अब्दुल खान डोळ्या पुढे उभा केलायत. एकदम साधी सरळ सोप्पी भाषा.
हा कोण असेल, कुठे वाढला असेल, त्याला फॅमिली असेल काय! इथे न्यूयॉर्कमध्ये कसा आला?
:/ अतिशय उत्कंठावर्धक.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.....
-गणपा.

आणि एक दिवस मला सगळं सगळं समजलं!! अब्दुल खाननेच सांगितलं!!

ती रात्र मी आयुष्यात कधीच विसरणार नाही.....

(क्रमशः)

पु.ले.शु. आ.पु.भा.ल.ये.दे.रे!
(पुढिल लेखनाकरिता शुभेच्छा आणि पुढचा भाग लवकर येउ देत रे!)

आनंद

आपली बिनधास्त लेखनशैली आवडली.

दुर्दैवाने वरील शब्दरचना पटली नाही. रखेली न ठेवण्यामागे काही वैचारीक, उदात्त भूमिका दिसत नाही. तीही लग्नाआधीच? ही शब्दरचना 'लग्ना नंतर एकवेळ हरकत नाही' असा संदेश पोहोचवतो. (तसा तुमचा उद्देश दिसत नाही.) पुढील वाक्यांमधून 'आई-वडीलांना आवडणार नाही' म्हणून नाहीतर 'रखेली ठेवण्यास व्यक्तीशः तुमची हरकत नाही' असे दिसते. (असो. तसेही तुमचे कॅरेक्टर वाटत नाही.)


विवाहित पुरुषाच्या मनात दुसर्‍या स्त्री बद्द्ल कधी विचार येत नाहित असे कुणी म्हणु
शकेल का? स्वतःलाच हा प्रश्ण विचारल्यास ह्याचे ९९% लो़कांचे उत्तर 'येतात 'असेच येयील असे वाटते.
समजा याल पाप म्हणु.
चोरी प्रत्यक्ष केली काय आणि तिचा विचार ही मनात आला काय ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच लेवल चे पाप आहेत.
या उलट बिनधास्त पणे आपल्या मनातले विचार खरे प्रकट करणे ,हेच ख्ररे कॅरेक्टर आहे असे वाटते.
---आनंद

विवाहित पुरुषाच्या मनात दुसर्‍या स्त्री बद्द्ल कधी विचार येत नाहित असे कुणी म्हणु
शकेल का? स्वतःलाच हा प्रश्ण विचारल्यास ह्याचे ९९% लो़कांचे उत्तर 'येतात 'असेच येयील असे वाटते.

तुम्ही गल्लत करता आहात. पुरुषाच्या मनात स्त्री बद्दल आणि स्त्रीच्या मनात पुरूषबद्दत विचार येणे हा निसर्ग धर्म आहे. कोणीच नाकारत नाही. पण मनावर ताबा ठेवणे, समाजाच्या चौकटीत आयुष्य काल घालविणे, सामाजिक नियम पाळणे, समाज विघातक गोष्टी न करणे ह्याला संस्कार म्हणतात.

विसोबा खेचर

समाजाच्या चौकटीत आयुष्य काल घालविणे, सामाजिक नियम पाळणे, समाज विघातक गोष्टी न करणे ह्याला संस्कार म्हणतात.

कुणी ठरवली ही समजाची चौकट? आणि कसले आले आहेत सामाजिक नियम? कुठे लिहिले आहेत? कुणी ठरवले? बर्‍याच वेळा ज्यांना योग्य चान्स मिळत नाही अशीच काही मंडळी सामाजिक नियमांच्या आणि संस्कारांच्या गप्पा मारतात असं माझ्या पाहण्यात आहे!

ठराविक प्रकारची वागणूक म्हणजेच समाजाची चौकट हे कशावरून? पेठकरसाहेब, तुम्ही ज्या समाजाच्या चौकटीच्या, किंवा सभ्यतेच्या व संस्काराच्या गोष्टी करताहात त्याच समाजात निरधास्तपणे सुरू असलेली विवाहबाह्य संबंधाची किती प्रकरण मी तुम्हाला दाखवू तेवढं बोला! अगदी माझ्या माहितीतच किमान दहा नावं आहेत ज्याचे मी अगदी पुराव्यासकट दाखले देऊ शकेन! ही सगळी मंडळी देखील समाजातलीच आहेत ना? की तुमचा तो सो कॉल्ड संस्कारित समाज या मंडळींना समाजाबाहेर हाकलणार? आणि कुठल्या अधिकारातून?

आणि ज्या समाजात अशी प्रकरणं आहेत त्याच समाजाच्या चौकटीचा आणि संस्कारांचा तुम्ही दाखला देताय हा भाबडेपणाच म्हटला पाहिजे! :)

तात्या.

मुक्तसुनीत

बर्‍याच वेळा नैतिकता ही ज्याला इंग्रजीमधे "व्हर्चु आउट ऑफ वीकनेस" म्हणतात तशी असते असे आढळून येते. "पकडला गेला नाही तोवर सज्जन" , "बंड करता येत नाही म्हणून समंजस" , "चान्स गावत नाही म्हणून सुसंस्कृत" असेही त्याचे वर्णन करता येईल.

सर्वच सज्जन , समंजस आणि सुसंस्कृत माणसे अशी असतात असे मला म्हणयचे नाही ; पण बुरख्याआडची सुसंस्कृतता , दुबळेपणातून जन्माला आलेली सज्जनता म्हणजे काय हे आपण समजून घ्यायला हवे.

धमाल मुलगा

थोडासा अवांतर आहे, पण रखेली ह्या शब्दाशी अडलो म्हणून विचारावासा वाटला.

एखाद्याला सद्गुणी, गृहकृत्यदक्ष वगैरे वगैरे प्रकारची पत्नी आहे.पण काही कारणांमुळे..त्याची आणि तीची आवडनिवड वेगळी म्हणा किंवा तीची आकलनशक्ती कमी म्हणा..किंवा काहीही...पण अशा काही कारणांमुळे 'तो' जर एखाद्या दुसर्‍या स्त्रीकडे आकर्षित झाला..सहवासाअंती मिळत्याजुळत्या आवडीनिवडी पाहून दोघं एकमेकांत गुंतले...
दोघांचीही भावनीक भूक एकमेकांच्या सान्निध्यात भागू लागली..आणि अशातूनच जर त्यांच्यामध्ये शारिरीक संबंध प्रस्थापित झाले...तर?
त्याचं लग्न झालेलं असतं, तो त्याच्या पत्नीला सोडायला तयार नसतो, आयुष्यात आलेली ही दुसरी स्त्रीही त्याला दुरावू द्यायची नाही..तीलाही ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत आणि ती ते भावनीक आणि शारिरीक संबंध तसेच चालू ठेवते...तर तीला रखेली असेच संबोधले जाईल काय?

इथे फक्त शारिरीक संबंधांचा प्रश्न नाही, भावनिक गुंताही आहे. अशी परिस्थिती जर उद्भवली तर त्या नंतर आलेल्या स्त्रीला रखेली असंच ठरवलं जाईल काय?

मुक्तसुनीत

"रखेली" या शब्दामध्ये त्या स्त्रीच्या आर्थिक दास्यत्वाची कल्पना अभिप्रेत आहे. हा शब्द कुठल्याही स्त्रीबद्दल अपमानजनक वाटू शकतो याचे एक प्रमुख कारण हे आहे. विवाहबाह्य प्रेमपात्र , प्रेयसी इ. इ. शब्दसमूहांमधे बाकी काही असले तरी त्यात दास्यत्वाची , पर्यायाने नीचत्वाची छटा अंतर्भूत नाही.

विसोबा खेचर

त्याची आणि तीची आवडनिवड वेगळी म्हणा किंवा तीची आकलनशक्ती कमी म्हणा..किंवा काहीही...पण अशा काही कारणांमुळे 'तो' जर एखाद्या दुसर्‍या स्त्रीकडे आकर्षित झाला..सहवासाअंती मिळत्याजुळत्या आवडीनिवडी पाहून दोघं एकमेकांत गुंतले...
दोघांचीही भावनीक भूक एकमेकांच्या सान्निध्यात भागू लागली..आणि अशातूनच जर त्यांच्यामध्ये शारिरीक संबंध प्रस्थापित झाले...तर?

च्यायला धम्या! अजून लग्न व्हायचंय ना तुझं? आणि त्याआधीच तुझ्या मनात एवढ्या सगळ्या शंका?! :)

तात्या.

धमाल मुलगा

ओ तात्या....
ते... शंका अशीच आली हो...

आयला, माझ्याबद्दल लै म्हणजे लैच गैरसमज पसरायला लागलेत बॉ :)
जरा कुठं शिरीयस विचार करावा म्हणलं तर डोस्कं हे असं तिरकं चालतं आणि एकदम नाही त्याच विषयात डोस्कं पळापळ करायला लागतं..

च्यायला धम्या! अजून लग्न व्हायचंय ना तुझं? आणि त्याआधीच तुझ्या मनात एवढ्या सगळ्या शंका?!

नाही, म्हणजे...म्हणलं पुर्वतयारी...पुर्वतयारी म्हणजे किती करावी ह्याला काही मर्यादा आहेत की नाहीत? ;)

एखाद्याला सद्गुणी, गृहकृत्यदक्ष वगैरे वगैरे प्रकारची पत्नी आहे.पण काही कारणांमुळे..त्याची आणि तीची आवडनिवड वेगळी म्हणा किंवा तीची आकलनशक्ती कमी म्हणा..किंवा काहीही...पण अशा काही कारणांमुळे 'तो' जर एखाद्या दुसर्‍या स्त्रीकडे आकर्षित झाला..सहवासाअंती मिळत्याजुळत्या आवडीनिवडी पाहून दोघं एकमेकांत गुंतले...
दोघांचीही भावनीक भूक एकमेकांच्या सान्निध्यात भागू लागली..आणि अशातूनच जर त्यांच्यामध्ये शारिरीक संबंध प्रस्थापित झाले...तर?

त्याचं लग्न झालेलं असतं, तो त्याच्या पत्नीला सोडायला तयार नसतो, आयुष्यात आलेली ही दुसरी स्त्रीही त्याला दुरावू द्यायची नाही..तीलाही ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत आणि ती ते भावनीक आणि शारिरीक संबंध तसेच चालू ठेवते...तर तीला रखेली असेच संबोधले जाईल काय?

ह्यात दोन प्रश्न विचारलेले आहेत.

१) आणि अशातूनच जर त्यांच्यामध्ये शारिरीक संबंध प्रस्थापित झाले...तर?

तर काय? ते चांगले की वाईट की समर्थनीय की असमर्थनीय?
पुरूषाचे विवाहबाह्य संबंध अनेक कारणाने असू शकतात. वासनेची ओढ, व्यक्तिमत्वातील अपरिपक्वता जशी अनैतिक संबंधांना कारणीभूत असते तसेच, संसारात झालेली शारीरिक, मानसिक, भावनिक कोंडी आणि ह्या कोंडीने केलेला सहनशक्तीचा अंत, हेही कारण असू शकते. (हिच कारणे स्त्रीयांनाही लागू आहेत असे वाटते.) चांगले -वाईट, समर्थनीय असमर्थनीय हे व्यक्तिसापेक्ष आहे. प्रत्येक केस वेगवेगळी अशू शकते. काही वेळा हे संबंध अनैतिक मानले गेले तरी वेड लागलेला/ली जोडीदार, अंथरुणावर व्याधीग्रस्त जीवन जगणारा जोडीदार, बदफैली जोडीदार, अत्याचारी जोडीदार अशा केसेस मध्ये असे संबंध ठेवणार्‍या जोडीदारास समाजाची सहानुभूती लाभते. त्याच्या/तिच्या कृतीचे उघड समर्थन जरी कोणी केले नाही तरी तिथे दुर्लक्ष्य करण्याकडे समाजाचा कल असतो.

नुसती आवडनिवड वेगळी किंवा आकलनशक्ती कमी म्हणून कोणी विवाहबाह्य संबंध ठेवत नाही, ठेवू नये. दोन व्यक्तींचे (नवरा-बायको, मित्र-मित्र, मैत्रीणी-मैत्रीणी, मित्र-मैत्रीण) स्वभाव, आवडीनिवडी १०० % जुळतातच असे नाही. (सहसा, नाहीच जुळत) पण म्हणून लगेच आपण संबंध तोडत नाही. ऍडजेस्टमेंट करतो, जुळवून घेतो. संसारातही (दोघांनाही) हेच करावे लागते. शक्य असेल तिथे एकमेकांच्या दुर्गुणांना बदलवण्याचा प्रयत्न करावा पण जिथे 'बदल' शक्यच नसतो तिथे ते दुर्गुण संसारास फार घातक नसतील तर त्या व्यक्तीला तिच्या दुर्गुणांसहीत स्वीकारावे लागते. सर्वगुणसंपन्न कोणीच (अगदी आपण स्वतःही) नसतो हे लक्षात घेऊन जोडीदाराकडून अपेक्षा ठेवल्यास ऍडजेस्टमेंट जड जात नाही.

दुसरा प्रश्न - ...तर तीला रखेली असेच संबोधले जाईल काय?

मला वाटतं, नाही. त्याला विवाहबाह्य संबंध असे म्हणतात. 'अमुक अमुक ह्यांचे प्रेमपात्र' असेही म्हणतात. मैत्रीण असेही म्हणता येईल.
'रखेली' हा शब्द माझ्या मते हिन्दीतून आलेला आहे. 'रखना' म्हणजे ठेवणे, 'रखेली' म्हणजे 'ठेवलेली'. मराठीतही 'ठेवलेली बाई' असा शब्द आहे. 'रखेली' किंवा 'ठेवलेली बाई' ही वेश्या नसते. तिला ठेवणारा पुरुष हा एकच असतो. ती त्याच्याशी एकनिष्ठ असते. हा त्या पुरुषाचा एकप्रकारे दुसरा संसार असतो. ह्याला ही समाज मान्यता नसली तरी त्या स्त्रीची संपुर्ण जबाबदारी (मानसिक, भावनिक, आर्थिक, शारीरिक) तो पुरूष उचलत असतो. क्वचित प्रसंगी अशा संबंधातून संततीही असू शकते. तो माणूस मालदार असेल तर आपल्या पश्चात त्या स्त्री आणि तिच्या (त्यांच्या) मुलासाठी इस्टेटीतून वाटणीही काढून ठेवतो. आणि स्वकष्टार्जित मिळकत असेल तर अशी वाटणी कायदेशीरही आहे. (माझ्या अंदाजाने).

असो. माझे विश्लेषण चुकतही असेल पण निदान माझा तरी समज असाच आहे.

धमाल मुलगा

काय मुद्देसुद प्रतिसाद आहे. काकांकडून शिकण्यासारखा हा आणखी एक गुण!

नुसती आवडनिवड वेगळी किंवा आकलनशक्ती कमी म्हणून कोणी विवाहबाह्य संबंध ठेवत नाही, ठेवू नये. दोन व्यक्तींचे (नवरा-बायको, मित्र-मित्र, मैत्रीणी-मैत्रीणी, मित्र-मैत्रीण) स्वभाव, आवडीनिवडी १०० % जुळतातच असे नाही. (सहसा, नाहीच जुळत) पण म्हणून लगेच आपण संबंध तोडत नाही. ऍडजेस्टमेंट करतो, जुळवून घेतो. संसारातही (दोघांनाही) हेच करावे लागते......

पुर्णपणे सहमत...
माझ्या म्हणण्याचा अर्थ थोडासा वेगळा होता.
समजा, एखादी स्त्री कविता करते/कथा लिहिते/नाटकात कामं करते/किंवा ह्या गोष्टी तीला आवडतात...त्याबद्दल अर्थपुर्ण चर्चा आणि रसस्वाद हा ओघाने आलाच.पण जर तीचा आयुष्याचा जोडीदार ह्यात मुळीच आवड नसलेला किंवा ते समजण्याच्या पलिकडला किंवा कामाच्या व्यापातून मुळीच वेळ न मिळणारा असेल, आणि त्या स्त्रीला आणखी कोणीतरी भेटला (मुद्दाम पुरुषाबद्दल बोलतोय..म्हणजे दुसर्‍या मुद्द्याच्या अनुशंगाने विचार करता येइल. पुरुषच नाही स्त्रीही भेटू शकतेच की!) त्याच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी ज्या तीला आवडतात त्याच त्यालाही आवडतात अशा चर्चिल्या जात असताना आणि सतत भेटीगाठी वाढून आपलेपणा वाढला, की सहाजिकच मोकळेपणा वाढीला लागून त्याच्यासमोर आपला भावनिक कोंडमारा (इथे फक्त आवडीचे नाट्य-शास्त्र-विनोद इतकाच अर्थ अभिप्रेत नाही..) वाट काढू पाहतो आहेसं दिसून ती स्त्री त्याच्याकडे ओढली जाऊन दोघांमध्ये एक नाजुक नातं निर्माण झालं आणि एखाद्या बेसावध क्षणी दोघांचाही तोल ढळला..आणि नंतर हे प्रकार दोघांच्या संमतीने चालू झाले तर!
असा माझ्या म्हणण्याचा अर्थ होता.. (इथे स्त्री-पुरुष हा भेद दोन प्रतिसादात मुद्दाम केला आहे..कारण हा प्रकार स्त्री किंवा पुरुष कोणाच्याही बाबतीत घडू शकतो.

त्याला विवाहबाह्य संबंध असे म्हणतात. 'अमुक अमुक ह्यांचे प्रेमपात्र' असेही म्हणतात. मैत्रीण असेही म्हणता येईल.

अच्छा! असे आहे तर.
माहितीबद्दल आभारी आहे.

शितल

>>ह्याला ही समाज मान्यता नसली तरी त्या स्त्रीची संपुर्ण जबाबदारी (मानसिक, भावनिक, आर्थिक, शारीरिक) तो पुरूष उचलत असतो. क्वचित प्रसंगी अशा संबंधातून संततीही असू शकते. तो माणूस >>मालदार असेल तर आपल्या पश्चात त्या स्त्री आणि तिच्या (त्यांच्या) मुलासाठी इस्टेटीतून वाटणीही काढून ठेवतो. आणि स्वकष्टार्जित मिळकत असेल तर अशी वाटणी कायदेशीरही आहे. (माझ्या >>अंदाजाने).

हो तुमचा अ॑दाज बरोबर आहे पण त्याने तसे वाटणी स॑ब॑धी मृत्युपत्रात तसे दाखल केले असले पाहिजे. आणि ते मृत्युपत्र कोर्टात सिध्द करता आले पाहिजे. १९५५ पुर्वी जर कोणी दोन लग्ने केली तर ती मान्य (म्हणजे त्याच्या दोन्ही बायका॑ना आणि त्या॑च्या मुला॑ना ५० % वाटणी देणे भाग होते ) पण १९५५ मे न॑तर दुसर्‍या लग्नास मान्यता देण्यात अटी आहेत. तो मोठा मुद्दा होईल, आणि जर त्या माणसाने त्याच्यासाठी स्वकष्टार्जित मालमत्ते बाबत लेखी वाटणी केली असेल तर काही प्रश्न नाही, पण नसेल तर त्याच्या दुसर्‍या बाईला आणि मुला॑ना अडचणीचे जाईल.

वरदा

माझ्याकडून पण
पु.ले.शु. आ.पु.भा.ल.ये.दे!

चतुरंग

मऊमऊ वाळूतून रमतगमत चालताना अचानक खडकाळ भाग समोर यावा आणि त्यावरुन चालताना मऊ वाळूला सरावलेल्या आपल्या पायांना धारदार खडकाने कापेल की काय अशी भीती मनात बाळगीत चालणे चालूच रहावे, कारण अनेक आश्चर्ये आपल्या पोटात सामावून घेणारा खोल समुद्र तो खडक ओलांडल्यावरच दिसणार आहे, अशी भावना मनात आली!

सुंदर लेखन आणि क्रमशः योग्य जागी टाकण्याचा 'डांबीसपणा' भावला! B)

चतुरंग

मऊमऊ वाळूतून रमतगमत चालताना अचानक खडकाळ भाग समोर यावा आणि त्यावरुन चालताना मऊ वाळूला सरावलेल्या आपल्या पायांना धारदार खडकाने कापेल की काय अशी भीती मनात बाळगीत चालणे चालूच रहावे, कारण अनेक आश्चर्ये आपल्या पोटात सामावून घेणारा खोल समुद्र तो खडक ओलांडल्यावरच दिसणार आहे, अशी भावना मनात आली!

तुम्ही अब्दुल खानाबद्द्लच प्रतिक्रिया देताय ना!
की कुठ्ल्या दुसर्‍या कवितेवरचा अभिप्राय इथे चुकून दिलांत!!:))

चतुरंग

गल्ली शोधण्यात गल्लत झालेली नाही, योग्य गल्लीतच आहे! B)

चतुरंग

मन

जनाब,
हमने सब अभी अभी पढा है.
बहुत खुब रंग ला रही कहानी.
और भी जरा बढने दो आगे. हम बेसब्री से इंतजार कर रहे है.
देर करके युं जुल्म न ढाइए.

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

सुनील

झकास. अब्दुल्ला आणि शबनम प्रकरणाने आता चांगला रंग भरला आहे. पुढील भाग लवकर येउद्यात!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सखाराम_गटणे™

माझ्या डोळ्यांसमोर एकदम काजवे चमकले. मी सुद्धा रखेली ठेवू? तीही लग्नाआधीच? माझ्या डोळ्यापुढे भारतातले माझे आई-वडील उभे राहिले! त्यांना जर कळलं की आपल्या दिवट्या चिरंजीवांनी रखेली ठेवली आहे तर? वडील तर कानाखाली एक आवाजच काढतील. आणि आई? ती चुलीतलं जळतं लाकूड डागून माझा नेमका तोच अवयव निकामी करेल...

हे ऐकदम बरोबर.