क्रिडा जगत

एका कपाची कथा

Primary tabs

हिंदी चित्रपटाची सुरुवात आहे असे समजा. पहिल्याच फ्रेमला एका श्रीमंत शेठच्या बंगल्याचा दिवाणखाना दाखवला जातो. साधारण कुठल्याही मध्यमवर्गीय माणसाची ८ घरे बसतील असा दिवाणखाना असतो. त्यात लाल भडक रंगाचे फर्निचर असते आणि त्याच रंगाचे गुबगुबीत कार्पेट असते आणि साधारण त्या कार्पेट एवढाच गुबगुबीत आणि साधारण तसेच भाव चेहेर्‍यावर असलेला तो श्रीमंत सेठ पेपर, गृहशोभिका असलं तत्सम काहीतरी वाचत असतो. दिग्दर्शकाचा मूड असेल तर तो त्या दिवाणखान्याच्या साइझला साजेश्या टेबलावर बसून ब्रेकफास्ट पण करत असतो. तो काहीही करत असला म्हणजे वाचत असला, खात असला किंवा पचवत असला तरी त्याच्या तोंडात एक भलामोठा चिरुट असतोच. आणि काहीही करत असला तरी चेहेर्‍यावर भाव एकच असतो. आगतिक - शांतपणे बसवुन पचवत असल्यासारखा. कारण तो हिरोइनीचा बाप असतो आणि गरीब हिरोची एण्ट्री होइपर्यंत तो तसाच बापुडवाणा राहणार असतो. आणि तिकडुन हिरोइनी " पप्पा SSSSSSSS " असं लांबड लावत (हे SS.. किमान तिपटीने वाढवुन वाचायचे बरं कं) दुडकत दुडकत येते आणि पप्पाच्या गळ्याला मिठी मारुन म्हणते "पप्पा देखो मै स्वित्झर्लंड से टेनिस का कप जीत के आयी." त्या हिरोइनी मुळे असेल कदाचित किंवा त्या दिवाणखान्याचा प्रभाव असेल किंवा चित्रपटात पाहण्यासारखे अजुन काहीही नसल्याचा परिणाम असेल पण स्वित्झर्लंड जगाच्या नकाश्यावर कुठे आहे हे माहिती नसल्यापासुन (अजुनतरी कुठे नीटसे माहिती आहे म्हणा) आणि टेनिस कशाशी खातात याच्याशी घेणेदेणे नसलेल्या जमान्यापासून मला या कपाचे फार्फार कौतिक आहे. जगातल्या सगळ्या लोकांना कप मिळतात. सिनेमातल्या हिरो हिरोइनींना तर वक्तृत्व स्पर्धा, शैक्षणिक यश, टेनिस, बॅटमिंटन, संगीत खुर्ची, गायन, वादन, नृत्य अश्या कुठल्याही गोष्टीसाठी कप मिळत असतात. आणि आम्ही शिंचे सालं मर मर मरुन सुद्धा आम्हाला कधी अर्धा इंचाचा कप मिळाला नाही. कुठल्याच गोष्टीसाठी नाही. त्यामुळे त्या कपाचे अप्रुप अजुनच जास्त.

कालांतराने ते चित्रपटातले बेगडी कप न मिळाल्याचे वैषम्य वाटुनासे झाले. आपल्याला चमचा लिंबु शर्यतीत उत्तेजनार्थ बक्षीस म्हणुन पण तसला कप मिळणार नाही हे कळुन चुकले. मन सरावले. पण कपाचे कौतुक मात्र कमी नाही झाले. वाढत्या वयानुसार बाटलीपेक्षा चहाला जवळ केले त्यामुळे तर त्या कपाची महती अजुनच वाढली. पण आता ते चित्रपटातले कप नको होते. कुठल्याही सामान्य भारतीयाप्रमाणे टेनिस, फूटबॉल, हॉकी यांच्या कपाच्याही फारश्या प्रेमात मी कधी पडलो नाही. पण भारताच्या अनधिकृत राष्ट्रीय खेळाच्या विश्वचषकाचे अप्रुप मात्र अजुन टिकुन आहे. कपिल देव नावाच्या महामानवाने भारतासाठी तो कप एकदाच उंचावला. त्यानंतर २८ वर्षे उलटुन गेली पण आजाही तो कप उंचावणारा कपिल डोळ्यासमोर आहे. त्यावेळेस मी बराच लहान होतो पण फोटो चिक्कार बघितलेत आण ते डोळ्याच्या केमेर्‍यात बंद आहेत. ही कथा आहे त्या
कपाची. फक्त १९८३ च्या कपाची नाही तर एकुण सगळ्याच्या विश्वचषकांची.

विश्वचषकांचे (चषक = कप) स्वरूप दर स्पर्धेगणिक बदल गेले. पुरस्कर्ता बदलला तसा कप बदलला. १९९९ मध्ये आयसीसी ने स्वतःच्या नावाने विश्वचषक सुरु करेपर्यंत या कपाचे स्वरूप बदलतच गेले. १९७५,१९७९ आणि १९८३ मध्ये प्रुडेंशियल इन्क ने ही स्पर्धा आयोजित केली होती त्यामुळे पहिल्या ३ स्पर्धांसाठी त्यांच्या आवडीचा कप होता.

पहिल्या ३ स्पर्धांचा हा चषक एकदम वरणभात मॉडेल होता. एक आदर्श चषक. एकदम ट्रेडिशनल लूक असणार. पण प्रचंड चकाकी असणार. चांदीच्या लखलखत्या रंगाचा, दोन कान असलेला एक आदर्श कप. सगळ्याच भारतीयांच्या डोळ्यासमोर विश्वचषक म्हटल्यावर हाच कप येत असावा कारण कपिल देवने हाच कप उंचावला होता.

१९८७ नंतर प्रुडेन्शियल चे प्रायोजकत्व संपुष्टात आले आणि कपाचे मॉडेल बदलले. १९८७ ची स्पर्धा चक्क आपल्या रिलायन्स ने प्रायोजित केली होती. १९९२ ची स्पर्धा बेन्सन अँड हेजेस नी तर १९९६ ची स्पर्धा विल्स प्रायोजित होती. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेसाठीचा चषक वेगवेगळा होता. १९८७ सालचा रिलायन्स कप वरणभात मॉडेलशी बरीच जवळीक साधणार होता. फक्त वरणाऐवजी थोडीशी तिखट आमटी होती असे म्हणुयात वाटल्यास. थोडा रेट्रो लूक देण्यासाठी बहुधा या चषकावर एक चेंडु ठेवण्यात आला. चषक मात्र दोन कान वगळता तसाच होता.

१९९२ चा चषक एकदम आधुनिक स्वरुपात सादर करण्यात आला. पहिल्या ४ चषकांसारखा हा पारंपारिक वेषभूशा करुन नव्हता आला. धातू चा त्याग करुन हा चक्क काचेने बनवण्यात आला होता. पृथ्वीच्या आकाराचा आणि पृथ्वीचा नकाशा असलेला हा गोल वेगळा नक्कीच होता, ठळकपणे वेगळा लक्षात देखील राहिला पण का कोणास ठाउक मनात मात्र भरला नाही. यामागे हा चषक पकिस्तानने जिंकला होता हे कारण असु शकेल काय? :)

१९९६ चा चषक या सगळ्यांपेक्षा वेगळा होता. बुर्ज खलिफाच्या सुळक्यासारखा त्याचा वरचा भाग वरवर चढत गेला होता. तो वेगळा होता पण विचित्र होता. त्यामुळेच असेल कदाचित पण त्या चषकापेक्षा जास्त लक्षात राहिला तो अर्जुन रणतुंगाचा कप उंचावतानाचा निरागस पण खोडकर चेहेरा. कसा सेरेलेक च्या जाहिरातीतला गुटगुटीत बाळ दिसतो आहे बघा तो:

या कपाच्या खेळाला कंटाळुन असेल किंवा कपाचे स्टँडर्डायझेशन करायचे असेल म्हणुन असेल कदाचित, पण १९९९ पासुन आयसीसीने कपाचे स्वरूप कायम ठेवले आहे. कपाच्या निर्मितीचे काम चक्क एका दागिन्यांची निर्मिती करणार्‍या इंग्रज जवाहिर्‍याला, गरार्ड आणि कंपनीला देण्यात आले. गरार्ड आणि कंपनी बहुधा या कामात माहिर असावी कारण रग्बीच्या विश्वषकाची निर्मिती पण त्यांचीच. त्यांनी पण २ महिने खपुन दृष्ट लागावा असा चषक बनवला. ठोकळ्यावर ठोकळे रचलेली कलाकृती नाही आहे ही. सध्याचा चषक क्रि़केट्च्या सगळ्या प्रमुख अंगांचे म्हणजे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यांचे प्रतिनिधित्व करतो. ३ यष्ट्यांचा आणि बेल्सचा आभास निर्माण करणार्‍या ३ चांदीच्या स्तंभांवर एक सोन्याचा चेंडु तोलुन धरला गेलेला आहे. साधारण २ फूट (६० सेमी) उंचीचा आणि ११ किलो वजनाचा हा कप सोन्या चांदीपासुन बनवला आहे.
या कपाच्या तळावर विजेत्या संघाचे नाव कोरले जाते. समारंभकपुर्व हा चषक विजेत्या संघाला दिला जातो आणि मग शांतपणे तो काढुन देखील घेतला जातो. त्याच्या जागी अगदी हुबेहुब तशी असणारी एक प्रतिकृती विजेत्या संघाला दिली जाते. मूळ चषकाच्याखाली एक एक करुन सर्व विजेत्या संघांची नावे कोरली जाणार आहेत. दुर्दैवाने १९९९ पासून केवळ एकच संघ जिंकत आला आहे. त्यामुळे त्या चषकावर सध्या तरी ३ वेळा ऑस्ट्रेलियाचेच नाव कोरले गेले आहे. पण फिकर नॉट, त्या चषकावर अजुन १३ नावे कोरली जाउ शकतात म्हणजे पुढच्या १३ स्पर्धांसाठी - पुढच्या ५२ वर्षांसाठी हाच चषक असणार आहे.

आपल्याला अजुन १३ संधी आहेत. १३ वेळा हा चषक उंचावला जाणार आहे. हा चषक कदाचित आपल्या हयातीला पुरुन उरेल. पण आम्हाला मात्र २०११ मध्येच त्याच्यावर भारताचे नाव कोरले गेलेले हवे आहे. सगळ्या बाजुने शुद्ध, समान परिमाणं आणि आकारमान असलेल्या या चषकाचा तळ कुठल्याही बाजूने बघितला गेल्यास आम्हाला त्याच्यावर भारताचे नाव कोरले गेलेले बघायचे आहे. आणि परिस्थितीदेखील नाउ ऑर नेव्हर अशीच आहे. आशा करुयात की हा चंदेरी रुपेरी चषक या वर्षी धोनीच उंचावेल.

ऑल द बेस्ट टीम ईंडिया.

गवि

क्रिकेट फीव्हर सेटिंग इन..

खास लेख.. आवडला..

छोटा डॉन

लै भारी कथा आणि माहिती ...
लेख आवड्या मृत्यंजयशेठ, एकदम कडक ...

आता एकदा हा कप 'सचिन'च्या हातात पाहिला की मी सुखाने सन्यास घ्यायला मोकळा.
नंतर आमचे क्रिकेट संपले :)

असो, असेच अजुन वैविध्यपुर्ण लेख येऊद्यात ही विनंती :)

- छोटा डॉन

"...आता एकदा हा कप 'सचिन'च्या हातात पाहिला की मी सुखाने सन्यास घ्यायला मोकळा.
नंतर आमचे क्रिकेट संपले..."

~ व्वा....हे केवळ छोटा डॉन यांचेच नव्हे तर माझेही वाक्य आहे. त्यामुळे तसे झाले (होणारच....) तर २ एप्रिल २०११ नंतर वानखेडे स्टेडियममधून आम्ही बाहेर पडणार, ते परत कधीच तिकडे न वळण्याच्या बोलीवरच.

मृत्युंजय....वरील अनेकविध फोटोमधील अर्जुन रणतुंगाचा फोटो खरच "निरागस" वाटतो...म्हणजे इतका महान पराक्रम करूनही त्याने दंगा घालण्याचा आव आणलेला नाही. मला काहीसे आठवतो हा प्रसंग... म्हणजे तिथे व्यासपीठावर बेनझीर भुट्टो [पंतप्रधान होत्या त्या वेळी] यानी अर्जुनला कप तर दिला पण त्याच्याशी हस्तांदोलन केले नाही....त्याबद्दल कुठेशी थोडीफार चर्चाही झाली होती असे स्मरते. पण असो. त्या अंतिम सामन्यातील जयसुर्या आणि गुरुसिंघे...शिवाय खुद्द अर्जुनाची खेळी आठवते.

छान लेख....क्रिकेट फीव्हर...!

इन्द्रा

वपाडाव

आम्हा भारतीय जनतेसाठी क्रिकेट म्हणजे--

तेरे नाम से शुरु तेरे नाम पे खतम...

लव्ह यु सचिन...
बेश्ट लक!!!

यशोधरा

मस्त लिहिलेय! आवडले :)
फक्त ती हिंदी सिनेमाची कथा जऽऽऽराशीच जुन्या सिनेमांवर बेतलेली वाटते. :P

मृत्युन्जय

असणारच. माझ्या लहानपणीचे चित्रपट आहेत हो ते. २०-२५ वर्षांपुर्वीचे. त्यावेळेस मला स्वतःचा चॉइस नव्हता. आशा पारेख, जॉय मुखर्जी, लीना चंदावरकर, मुमताझ, सायरा बानू, शम्मी कपूर, साधना, हम्मा मालिनी, शशी कपूर यांचे चित्रपट (हे अजुन जुन्या काळातले असुन सुद्धा). हीच नावे कारण हा असा प्लॉट बर्‍याचदा याच लोकांच्या चित्रपटात असायचा :)

गोगोल

आणि छान निरिक्षण. लेख आवडलाच. फक्त पुढच्या ५२ वर्षांसाठी फक्त एकच डिझाईन ऐकुन जरा बोअर वाट्ले.

सामन्यांच्या वर्णनापेक्षा वेगळा लेख आहे हा.
कहाणी हिन्दी फिल्म वरुन सुरु करुन छान टर्न घेत ह्या कपावर आलेली कपाची स्टोरी आवडली .
मी कप बद्दल १दावाचले होते . तु पन छान लिहिलेस.

लेख आवडला..
हा कपाचा इतिहास माहित होताच...
आत्ताच डिझाईन मला तरी फारसे आवडत नाही.

लेख आवडला, छान लिहिले आहेस रे, मस्तच..
नाऊ..क्रिकेट वर्ल्ड कप इज इन एअर....
स्वाती

गणपा

"दास्तान ए वर्ल्डकप" आवडला.
:)

ए निरागस, लेख आवडला रे. सुरूवातीला अवांतर असेल असं वाटलं, पण माहितीचं संकलन आणि सादरीकरण दोन्ही आवडलं.

मस्त लिवलय रे.. आपण सेमीफायनल आणि फायनल मयुरकडे पाहू म्हणजे भारत नक्कि जिंकेल (टी २०).

निशदे

मस्तच लेख......असेच लेख स्पर्धेदरम्यानसुद्धा येत राहोत हीच आपल्याला प्रार्थना.......
बाकी यावेळी कपावर भारतच असणार हे नक्की......:)
मागच्या स्पर्धेवेळी त्या शेठच्या पोरीलाच पाठवायला हवे होते.......हासुद्धा कप एकटीनेच जिंकला असता. ;)

हरिप्रिया_

छान माहिती मिळाली...
ह्यावेळी भारतानेच जिंकावा वर्ल्डकप ही सर्व भारतीयांची मनापासूनची इच्छा
ऑल द बेस्ट टीम इंडिया!!!

@"...आता एकदा हा कप 'सचिन'च्या हातात पाहिला की मी सुखाने सन्यास घ्यायला मोकळा.
नंतर आमचे क्रिकेट संपले..."
+१
मग अधिकृत रित्या हा खेळ जन्टेलमन लोकांचा उरणार नाही .
मग फुटबॉल लाडे आमचा मोर्चा वळेल
(बायर्न म्युनिक च्या नावाने घोष केला जाईन)
ते देखील ज्या देशाचे मीठ खायचे त्यांच्या धर्माशी इमान राखायचे म्हणून .

योगी९००

लेख चांगला आहे. पण क्रिकेटविषयी असलेल्या रागामुळे खालील प्रतिसाद देत आहे.

काय पण आपली लोकं स्वप्न पाहतात..क्रिकेटचा विश्वकप म्हणे.. या वर्षी बांगलादेश विरूद्ध रडत रडत जिंकलो आणि ब्रिटिशांविरूद्ध ३३८ हा स्कोर पण आपल्याला जिंकवू शकला नाही.

अशा परिस्थितीत पाकीस्तान, श्रिलंका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आपली पुरेपूर वाट लावतील...

बरे झाले की मी क्रिकेट या खेळावर माझा वेळ घालवत नाही आहे ते..

माझे स्वप्न एकच्..लोकांच्यातला क्रिकेटमधला क्रेझ कमी व्हावा. मुख्य म्हणजे IPL ला खुपच कमी प्रतिसाद मिळावा की जेणे करून आपल्या राजकारण्यांना आणि क्रिकेटर्सला अक्कल येईल. इथे महागाईमुळे जीव पोळला जात असताना करोडो रुपयाचा चुराडा या खेळावर होतोय या कडे कोणाचे लक्ष नाही.

बाकी सचिनच्या हातात विश्वकप आला काय आणि नाही आला काय...आपण आणि गोरगरीब जनतेला काय फरक पडणार आहे. माझा सचिनवर राग अजिबात नाही. तो बिचारा तर प्रयत्न करतोय...पण team चा विचार केला तर आपली team फक्त दुबळ्या टिमविरूद्ध जिंकण्याच्या लायकीची आहे.

बाकी मि.पा चे अभिनंदन..त्यानी सुरू केलेला "क्रिकेट विश्वचषक २०११" तक्ता updated नाही आहे. यावरून असे दिसते की मि.पा.करात interest कमी झाला आहे. म्हणूनच जरा बरे वाटले.

गवि

वैयक्तिक म्हणायचे तर मला आयपीएलच्या कन्सेप्टमधे मजा नाही असं वाटल्याने त्यांच्याविषयी आवड नाही. पण तुमचे हे म्हणणे (अँगल) समजला नाही.

इथे महागाईमुळे जीव पोळला जात असताना करोडो रुपयाचा चुराडा या खेळावर होतोय या कडे कोणाचे लक्ष नाही.

करोडो रुपयांचा चुराडा.. पैकी चुराडा म्हणजे काय? खेळाडूंना मिळणारी लठ्ठ रक्कम का? की सामन्यांच्या झगमगाटाचा खर्च..? यात कुठल्या पैशांचा चुराडा होतो आणि चुराडा (वाया जाणे) होतो की सर्क्युलेशन होते हे पाहणे मनोरंजक ठरेल.

क्लिंटनभाऊ.. !! या प्लीज..

प्रीत-मोहर

मस्त लेख ......

बाकी ते क्रिकेट सन्यास आम्हाला जमाय्च नाय!!!

विकाल

नाद खूळा ले़ख...!

११ साल चा कप मिळण जरा अवघड आहे...!!

काय तरी करा बाबा नेहरा, मुनाफ न चावला यांचं..!!

मृत्युन्जय

नेहरा मुनाफ आणि चावलाच काय व्हायच नाही. जे काय करायचय ते झहीर आणि हरभजनलाच करायचय. त्यात पण ते सरदार औट ऑफ फॉर्म आहे. पण जिंकु शकु आपण.

विकाल

भाउ, कुंबळे न श्रीनाथ ला परत आणा.... अजून भारी आहेत... मुनाफ न चावला पेक्षा...!

मृत्युन्जय

संघात ३ कपिल देव, २ कुंबळे आणि ५ सचिन तेंडुलकर असतील तरच धोनी जिंकेल असे काही नाही हो. आहे त्याच्यातही जिंकु शकतो. ऐनवेळेस कच खाल्ली नाही म्हणजे मिळवले.

शिल्पा ब

छान आहे कप आणि माहीतीपण

मला रिकी पाँटींग खुप आवडायला लागलाय...भन्नाट ए नै!!