कोसळत्या सरींचा राजमाची
Primary tabs
कोसळत्या सरींचा राजमाची

शनिवार रविवार राजमाची !!! म्हणताच ब-याच मंडळींची नावे आली होती पण त्यातले १३ मावळेच शब्दाला जागले होते त्यात मी, लकी प्रशांत, राहूल-वसुधा(दांपत्य), शितल जाधव, श्रीकांत, अभिजीत अशा जुन्या मंडळींसोबत विजया, अश्विनी, प्रसाद, महेश आणि शितल ( नावावर जाऊ नका हा मुलगा आहे ) अशी नवी मंडळीही होती. पहाटे ६.३० ची लोकल पकडून लोणावळा गाठायचे असे ठरविले होते. पण कुंभकर्ण लकी आणि दरवेळी उशीर करण्यात पटाईत असलेला प्रशांत यांच्यामुळे ६.३० आणि ८.०५ या दोन्ही लोकल गमावून आम्ही लाल डब्याला शरण गेलो. ८.४० ची फ़लटण-मुंबई गाडी पकडून १०.३० ला लोणावळ्यात पोहोचलो. एस.टी. स्टॅंडवरच नाश्ता उरकून तुंगार्ली धरणाची वाट धरली.

पुण्यातूनच पावसाला सुरुवात झाली होती आणि त्याचा जोर वाढतच चालला होता. कंटाळवाणा डांबरी रस्ता संपून एकदाची तुंगार्लीची भिंत लागली. सुट्टीचा दिवस असल्याने धरणावर बरेच पर्यटक दिसत होते. आमच्या सोबत राजमाचीकडे जाणारेही बरेच लोक होते. धरणाच्या आसपासची रिसॉर्ट्स सोडून आम्ही पुढे निघालो आणि मला आमच्याच लोकांचा आरडाओरडा ऐकू आला. मागे बघतो तर मिस. शितल आणि प्रशांत अक्षरशा: लहान मुलांसारखे रस्त्यांवरच्या डबक्यातलं चिखलपाणी एकमेकांच्या आणि इतरांच्याही अंगावर उडवत होते. उगीच त्यांना खोटाखोटा रागावून मी आपली दादागिरी सिध्द करायचा प्रयत्न करताच त्या दोघांनी माझ्या अंगावरही यथेच्छ चिखल उडवला.थोड्या वेळाने अश्विनीही त्यांना सामील झाली.
राजमाचीकडे जाणारी ती ओली पायवाट धुक्याची दुलई पांघरून बसली होती. पाऊस मन मानेल तसा कोसळत होता. एखाद्या वा-याच्या झोताबरोबर धुके बाजूला होताच खंडाळ्याच्या बाजूच्या दरीचे विहंगम दृश्य मनाला भुरळ घालत होतं. याच ठिकाणी कायमचे वास्तव्यास यावे असे राहून राहून वाटत होते. गो.नि.दां.च्या प्रसिध्द झालेल्या "माचीवरला बुधा" कादंबरीतील संदर्भ डोळ्यासमोरून सरकत होते. त्या कादंबरीचा नायक बुधा अचानक समोर आला तर ??? असा पुसटसा विचार मनाला चाटून गेला आणि कथेचा शेवट आठवताच अंगावर शहारे आले. कादंबरीतून परत वास्तवात आलो आणि मुकाट पायाखालची वाट तुडवू लागलो.

जाताना लागणारा छोटासा घाट उतरल्यावर डाव्या हाताला एक सुंदर धबधबा लागला. लगेचच सगळे त्या दिशेने धावात निघाले. ब-याच प्रयत्नांने मी त्यांना, पुढे अजून सुंदर जागा आहेत !! असे सांगून पुढे दामटले. थोडी नाराजी व्यक्त करून जनता पुढे निघाली. त्यानंतर येणा-या प्रत्येक धबधब्याला आणि ओढ्याला त्यांनी "अमोल ~!! अमोल ~!!" अशा आरोळ्या देत माझाविरूध्द निषेध नोंदवला. राहूल आणि वसुधा हे दांपत्य आपल्याच नादात मागे मागे रेंगाळत होतं. त्यामुळे सगळ्यांना क्षणभर का होईना पण विश्रांती मिळत होती. राजमाचीहून दिसणारा प्रसिध्द कातळधार धबधबा जिथून सुरु होतो त्याजागी आम्ही पोहोचलो. तिथल्याच एकुल्या टपरीत चहा घेऊन पुढे निघालो.

पावसाने सगळ्यांना झोडपून काढायच ठरवलं होतं बहुदा, त्याचा जोर वाढतच चालला होता. त्या धुकट आसमंतात हिरव्या रंगाची झालेली मुक्त उधळण डोळ्यांचे पारणे फ़ेडत होती.वाटेत एक मोठ्ठा ओढा आडवा आला. यावेळेस मात्र मी कोणाला थांबवायचे धाडस केले नाही, नाहीतर या जनतेने मला हाणून काढले असते. लकी, प्रशांत, श्रीकांत, मिस. शितल, शितल्या आणि दांपत्य खांद्यावरच्या सॅक टाकून पाण्यात पळाले. एकमेकांच्या अंगावर यथेच्छ पाणी उडवून झाल्यावर मंडळी पुढचं मार्गक्रमण करु लागली
.
वाटेत लागणारे अगणित ओढे आणि धबधबे एखाद्या मोहजालाप्रमाणे आम्हाला खुणावत होते पण उधेवाडीत वेळेत पोहोचायचे होते त्यामुळे आम्ही त्यास बळी न पडता आम्ही उधेवाडीकडे सरकत होतो. विजया आणि वसुधा दर पंधरा मिनिटांनी "अजून किती राहीलं आहे ??" असा प्रश्न विचारीत होत्या आणि मी त्यांना "आता आलंच .... पंधरा मिनिटात ...." हे माझं ठरलेलं उत्तर देत होतो. अखेरीस साडेचार तासांनी उधेवाडीची वेस आली आणि महिला मंडळाचा जीव भांड्यात पडला. आता मात्र पावसाने चांगलाच जोर धरला होता. तोंडावर तर अक्षरशा: असंख्य सुया टोचल्याचा भास होत होता. शेवटच्या टप्प्यात असलेला चिखलाचा डोह पार करून आम्ही जिथून कातळधार धबधबा दिसतो त्या ठिकाणी आलो. थोडं पुढं जाताच तो मनोहारी धबधबा आपले रौद्ररुप दाखवत होता. तिथल्याच टपरीवरच्या उंबरेंकडुन कळालं की आम्ही किती भाग्यवान आहोत ते !!! सकाळ्पासून सुमारे १५०-२०० लोकं इथून गेली होती पण दरीत साठलेल्या धुक्यामुळे कोणालाच त्या धबधब्याचे दर्शन झाले नव्हते.




याच कातळधार धबधब्याचा मागल्या वर्षी काढलेला फोटॉ.

तिथे थोडे फोटो काढून आम्ही तुकाराम उंबरेच्या घराचा मार्ग धरला. अरे हो सांगायचे राहीले .... या उधेवाडीत उंबरे कुटुंबीयांची संख्या लक्षणीय आहे. दरवेळेस मी ज्या तुकाराम उंबरेकडे उतरतो त्याला मी पुण्यातूनच फ़ोनकरून आगाऊ कल्पना दिली होती त्यामुळे आमचा राहण्याचा अणि जेवणाचा प्रश्न मिटला होता. मुक्कामी पोहोचण्यास नियोजित वेळेपेक्षा उशिर झाला होता म्हणून मनरंजन बालेकिल्ला पहायचा बेत आम्ही रद्द केला.
उधेवाडीतून दिसणारा धुक्याची गोधडी पांघरलेला मनरंजन बालेकिल्ला.

सलग ५ तास चालून मंडळी भलतीच दमली होती. अंगावरचे ओले कपडे बदलून आम्ही जेवण उरकले आणि फ़ावला वेळ सत्कारणी लावण्यासाठी "डम्ब शेराज" चा खेळ सुरु झाला. जनतेची दोन टिम मधे विभागणी झाली. आणि एकेकाची एक्टींग पहाता पहाता सगळे हसून हसून गडाबडा लोळत होते. प्रशांतने तर उच्छाद मांडला होता. त्याच्या मते तो एक्टींगचा बादशहा होता !! त्याच्या या वाक्यावर परत लोक पोट धरधरून हसले. तेवढ्यात तुकारामच्या भावाने आमची जेवणाची ताटं लावायला घेतली. गरम गरम तांदळाच्या भाकरी, भाजी, आमटी-भात आणि पापड असा भन्नाट मेनू होता. यथेच्छ हादडी झाल्या मंडळी पेंगू लागली होती. तरी अंताक्षरीचा मोह काही जणांना आवरता आला नाही आणि मग रात्री २ पर्यंत गाण्यांची मैफ़िल रंगली होती.शेवटी मी थोडा दम भरल्यावर सगळी शांत झाली.
सकाळी सात वाजता पोटोबाला चहा पोह्यांचा नैवेद्य देऊन आम्ही श्रीवर्धनकडे निघालो. वाटेतल्या गुहा पाहून भैरोबाच्या मंदीरापाशी आलो. दर्शन घेउन श्रीवर्धनच्या पाय-यांकडे सरकलो.




महादरवाज्यातून आत शिरताच समोरच्या पायवाटेवर चांगलं ३ फ़ुट खोल आणि जवळ्पास २० फ़ुट लांब पाण्याचा चर तयार झाला होता. तो पार करुन आम्ही किल्ल्याच्या सर्वोच्च भागावर गेलो पण दुर्दैव !!


सगळीकडे दाट धुकं आणि मुसळधार पाऊस असल्यामुळे आम्हाला काहीच दिसत नव्हते. वरुणराजाला साकडं घातल्यावर आमच्या मनाची होणारी तगमग त्याला कळाली असावी. पावसाचा जोर थोडा ओसरला आणि समोरच्या दरीवर दाटलेली धुक्याची दाट साय हलकेच बाजूला गेली. क्षणार्धात कॅमे-यांचा क्लिकक्लिकाट झाला आणि परत ती दरी धुक्याने माखली. मिळालेल्या एक दोन फोटोवर समाधान आणि त्याबद्दल वरूणराजाचे आभार मानत उधेवाडीकडे उतरू लागलो.



श्रीवर्धनहून दिसणारे भैरवाचे राऊळ..

श्रीवर्धनहून दिसणारा कातळधार धबधबा आणि टेहाळणी बुरुज..

गेला दिड दिवस आम्ही राजमाचीच्या कुशीत होतो. वेळ कसा गेला कळालेसुध्दा नाही. परतायची इच्छा नसतानाही चाकरमानी पावले सिमेंटच्या जंगलाकडे चालू लागली. लोकलमधून परत येताना डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा राजमाचीच्या आठवणी नाचत होत्या. दरवर्षी प्रमाणे यंदाच्याही राजमाची ट्रेकने धम्माल आणली होती आणि यावेळेसही माचीवरला बुधा भेटेल ही माझी वेडी इच्छा अपुर्णच राहीली ....
---
जातीवंत भटका
एक नंबर !!
- जांबुवंत चिकणा
जबरा......एकदम कडक फोटू रे भटक्या !
येतोय पावसाळा २-३ महिन्यात .....राजमाचीला कैक दा गेलोय...पण पावसाळ्यात नाई जमल...पण तुझे फोटू बघून नक्की जाणार औंदा
एकदम झक्कास.
राजमाची उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, सर्व ऋतूंमध्ये सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र सर्व वेळी केला आहे. कधीही जा. कायम आनंदच देउन जातो.
अगदी खरं आहे ...
ख ल्ला स ! अवर्णनीय फटू आहेत बॉस !
साला फोटू बघुन आणि वर्णन वाचुनच राजमाची हिंडून आल्यासारखे वाटले.
अवांतर :- पायात बेडी घालायला पाहिजे आता तुमच्या, म्हणजे जरा घरी बसाल.
आमचं बाकी काही करा पण आमच्या पायांना थांबवू नका .... अहो या असल्या धावपळीच्या जगण्यास लागणारं इंधन आणणार कुठून नाहीतर ???
किती आठवणी चाळवणार आहात ???
बेडी पण तुमच्या सारखीच जातिवंत भटकी मिळो असा शाप देतो तुम्हाला. ;)
ती ही माझ्यासारखीच भटक भवानी आहे. मिपावर पण आहे बरं आमची बेडी. :)
आठ हात लाकुड, नऊ हात ढलपी. :)
खुपच सुंदर फोटो आणि तितकेच सुंदर वर्णन!
क्लाआआआआआआअस रे..............
खुपच सुंदर फोटो,तसेच वर्णन....मस्त रे भटक्या...जियो
छान फोटो आणि सुंदर वर्णन, आणि पुन्हा एकदा माझं नाव तुमच्या ग्रुप मध्ये लिहुन घेण्याची विनंती.
जातिवंत भटका, त्यांच्या गुप मध्ये मला घेत नाहीत तो पर्यंत त्यांच्या सर्व धाग्यांना माझा हाच रिप्ल्याय अॅटोमॅटिक जाईल याची व्यवस्था करता येईल का ?
आमच्या डोंगरयात्रा ट्रेकिंग क्लबमधे तुझं हार्दिक स्वागत मित्रा ....
खुप्प मस्त हो तुमची ट्रेक
.
अतिशय सुरेख ..
मनापासुन आवडले सगळे फोटो आणि लिखान ...
फिरत रहा ... कधी तरी त्या वाटेवर आमची ही पावले नक्कीच उमटतील ...
अवांतर :
वल्ली .. जिप्सी ..आणि आता तुम्ही अहो जरा मिपावरील पण माझ्या सारख्या .. हर्शद सारख्या आग्रही लोकांना मिळुन ट्रेक करा की सूरु .. ग्रुप वेगळा असला तरी आनंद देवून जाईलच ..
चला बरे ठरवा आता ..
लवकरच प्लॅन करुयात !! :)
जाउ या की लवकरच.
कधी ते बोला.
आपण काय तयारच असतो कायम.
नक्कीच .. उलट तुम्ही ठरवा .. तुम्ही जिप्सी आणि भटकेश यांना अनुभव जास्त कधी कुठे कसे जायचे हे तुम्हालाच जास्त ठावुक त्यामुळे ठरवा .. हम है तय्यार चलो ..
बाकी ख.व. टाकतो
सांदण ला जाउयात का?
खासच रे मित्रा!!! लई जीव जळतो राव... किती दिवस झाले ट्रेक करून. पुढचा ट्रेक कधी होईल माहीत नाही, पण हे फोटो आणि वर्णन पाहून जीव सुखावला!
येत राहू दे असेच आणखी.
फोटो आणि वर्णन नेहमी प्रमाणे बेष्टच... पण बुधाची आठवण काढल्यामुळे फार मस्त वाटलं.
इतकी अप्रतिम पुस्तक माहीत असलेले फार कोणी नसतात. राजमाची आणि मनरंजन वर जाऊन उल्लेख करणारा खरोखर जातिवंत भटकाच !!
जियो...
(सहमत)बेसनलाडू
सुंदर. भेटले पाहिजे तुम्हाला एकदा
अमोल केळकर
नुसते भटकलात , ठिक!
नुसते क्लिक, क्लिक, क्लिकलात अजुनही ठिक!!
पण भटकता ते भटकता , क्लिकता अन वर लिहिताही चांगल?
काय काय म्हणाव काय तुम्हाला ऑ! अन वर चांगल वाचलेल ऐनवेळी आठवता पण?
डेंजरस काँबीनेशन!
भटक्याची ही भ्रमन्ती नि त्याचा वृत्तांतही फोटोसकट झकास झालेला आहे..... :-)
फोटो चांगले आहेत म्हणावे की वर्णन चांगले या भ्रमात पाहणारे/वाचणारे पडावेत अशी अवस्था श्री.जातीवंत भटका यानी केली आहे. पण दोन्हीबद्दल शेवटी एकच मत तयार होते ~ अप्रतिम.
भाषा आणि मांडणी वरील प्रभुत्व पाहता, भटकंती व्यतिरिक्त अन्य विषयांवरही लेखकाने इथे लेखन करावे असे सुचविल्यास त्याना (वा त्यांच्या "भटकी" ला) राग येणार नाही अशी आशा आहे.
इन्द्रा
>> ...शितल ( नावावर जाऊ नका हा मुलगा आहे ) अशी नवी मंडळीही होती. आणि,
>>मागे बघतो तर मिस. शितल आणि प्रशांत अक्षरशा: लहान मुलांसारखे......
या दोन वाक्यांचा संदर्भ लागत नाहीये....
बाकी लेख आणि फोटो अत्युत्तम.
पुढील सहलीस आणि लेखनास शुभेच्च्छा. :)
-सूर्यपुत्र.
तुम्ही नीट वाचाल तर दोन व्यक्ती होत्या शितला नावाच्या एक मुलगा आणि एक मुलगी.
हे पहा - "मी, लकी प्रशांत, राहूल-वसुधा(दांपत्य), शितल जाधव, श्रीकांत, अभिजीत अशा जुन्या मंडळींसोबत विजया, अश्विनी, प्रसाद, महेश आणि शितल ( नावावर जाऊ नका हा मुलगा आहे ) अशी नवी मंडळीही होती""
फार छान वर्णन केले आहे.
मी ही राजमाचीचा ट्रेक दोनदा केला. एकदा रात्री आणि एकदा सकाळी.
रात्रीच्या ट्रेकच्या वेळी जेव्हा आम्ही त्या कातळापाशी पोहोचलो (२.३०) तेव्हा तो भव्य कातळ पाहून धडकी भरली होती.
पुन्हा राजमाची ट्रेकची आठवण करुन दिल्याबद्दल आभारी आहे.
सह्हिइइइ
मी हा धागा उघडलाच नाही.
मी वर्णन वाचलंच नाही.
फोटो पाहण्याचा प्रश्नच येत नाही... मग जळजळ झालीच नाही.
(स्वगतः अर्धा किलो इनो द्या रे कुणीतरी.....)
धम्याशी कट टु कट शमत
मस्त सफर घडवलीत....
गेल्या वर्षीच याच मोसमात जाउन आलो.... आठवणी ताज्या झाल्यात.
मस्त...
कहर फोटो आणि वर्णन आहे हो. सलाम तुमच्या भटकेगिरीला!! बाकी तुम्ही सगळ्या ग्रपचे मॉनिटर दिसता आहात, सगळ्यांना वेळेत आवरण्याची ताकीद द्यावी लागते त्यावरुन.
अर्पणा आणि इन्द्रा यांच्याप्रमाणेच लिहण्याची शैलीही आवडली. आम्हाला अगदी राजमाचीसमोर नेऊन उभे केलेत, धन्यवाद. त्यात अर्धांगिनीपण भ.भ. आहे म्हणजे दुधात साखरच की हो :)
"...त्यात अर्धांगिनीपण भ.भ. आहे म्हणजे दुधात साखरच की हो ....!!"
~ आणि त्यातही विशेष म्हणजे 'सौ.भ.भ.' इथल्याही सदस्या आहेत म्हणे...! म्हणजे या दुधसाखरेत आता काजू वेलचीही आलेच !
(पण या अर्धांगिनी कोणत्या नावाने इथे वावरत आहेत हे मात्र अजुनी गुलदस्त्यात आहे....! नाव उघड करू नये म्हणून कदाचित त्यानी "जा.भ." वर डोळे वटारले असतील)
इन्द्रा
काहींच्या खरडवह्यात उचकापाचक केलीत तर अर्धांगिनी कोण तेही कळून येईल.:)
सुरेख लिखाण आणि अप्रतिम फोटोज!!!!
आमचं बाकी काही करा पण आमच्या पायांना थांबवू नका .... अहो या असल्या धावपळीच्या जगण्यास लागणारं इंधन आणणार कुठून नाहीतर ???
+१
फोटो खासच.
धुंद वातावरण, अगदी हेवा वाटला तुमचा...फोटो मस्त.
मी कर्जत मार्गे राजमाची ही भटकन्ती केली आहे. जी बरीच दमखाउ आहे आणि उभी चढण आहे. वाटेत सुन्दर कोन्डाणे लेणी आहेत.
राजमाची गावाच्या शेजारी ऐक पुरातन सुन्दर शिव मन्दीर आणि तळे आहे.
मस्त आहे ती वाट सुद्धा. पावसाळ्यात प्रचंड घसरडी असते. आणि त्या शिवमंदीरासमोरील तळ्यात डुंबण्याची मजा काही औरच आहे.
आम्ही मित्र मित्र पण त्याच मार्गे गेलो होतो १५ ऑगस्ट ला. पण मध्येच वाट चुकलो फिरून फिरून कोंढाणे लेण्यांपाशीच परत आलो. शेवटी एका अनुभवी माणसाने वाट दाखवली आणि सांगितले की वर पोचेपर्यंत संध्याकाळ होईल. तेव्हा रात्री तिथेच रहा. पण दुसर्या दिवशी सुट्टी नसल्याने पुढे न जाण्याचे ठरवले. एक मोठा धबधबा शोधला. तिथपर्यंत पोचणे कठीणच होते पण एकदा पोचल्यावर धमाल केली आणी परतलो.
ट्रेकला वाट हरवल्यावर येणारी मजा पण जरा हटकेच असते .... नाही ?? :) खूप वेळा हरवण्यातली मजा अनुभवली आहे...धम्माल येते ...
वाट हरवण्यावरुन सांगतो. आम्ही तिघे मित्र रतनगडावरुन उतरत असता, चुकलो-भरकटलो, पण शेवटी नदी पाहीली नि तिच्या दिशेने चालु लागलो. मध्येच एका ठिकाणी १५-२० फूट उभ्या दगडावरुन उड्या माराव्या लागल्या. पर्याय नव्हता पण रोमांचक / थरारयुक्त /भितीप्रवण मार्गक्रमण केले. फुल्ल मज्जा.
उत्तम फोटो, उत्तम लेखन...
१९८७ सालानंतर राजमाचीला गेलो नाहीये... रात्रीचा दीर्घ चालायचा प्रवास आठवला....
असेच म्हणतो. रात्रीचा दीर्घ चालायचा प्रवास आठवला.
मी शेवटचा गेलो होतो २००० मध्ये.
अशक्य फोटो आणि वर्णन!!!
असेच फिरत रहा दर्या खोर्यातून! :)
आणि निषेध म्हणून कथन वाचले नाही.
फारच छान!
अग्ग्ग्ग्ग! काय ते सुंदर फोटू आणि भन्नाट वर्णन.
सगळ्यात क्युट फोटो आहे तो वरून दिसणार्या देवळाचा!
गडाच्या पायथ्याची असलेली छोटी छोटी गावे अतिषय सुंदर दिसतात एवढेच पूर्वी वाटायचे.
त्या गावांची जमीन कोणता बिल्डर कधी विकत घेइल अशी आता भीती वाटत राहते.
हे असं लिहुन त्यांच्या विचारांना खत-पाणी घालायचे का जा. भ. सारखे नेहेमी नेहेमी तिथे जाउन (५-२५ जण सोबत घेउन) लोकांमध्ये जागृती घडवुन आणायची.
-आपल्या मिपावर वावरत असलेल्या, बिल्डरांकडे काम करणार्या वर्गाची क्षमा मागुन
हे वरचं वाक्य जा. भ. नी चमुचा ठरलेला प्लॅन आम्हाला कळविण्यासाठी.
रेवती ,वपाडाव प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !!
आपल्याला वाटणारी भिती सार्थ आहे, पण याच साठी आपण सर्वांनी गावागावात जनजागृती केली पाहीजे,
वपाडावशी सहमत.
आम्ही हे काम सुरु केले आहे. तिकोना आणि आसपासच्या परिसरात.
वपाडाव : आपण सारे मिपाकर मिळूनच प्लॅन करुयात :)
तुंग, तिकोना अन कोराईगड ५ वर्षांपुर्वी केले होते. सहारा अॅम्बी वॅली विकसित झालिये तिकडे. स्तुत्य उपक्रम. हे नाव इथे घेता येत नाही. ;)
सुंदर फोटो, मस्त वर्णन
भटक्या ही एक झकास भटकंती!
नेहमीचीच विनंती - चित्रे विकी ला द्याल काय? तेथे नेमक्या लेखात दिलीत तर अजून उत्तम!
सर्व सुयोग्य विशेषणं वर आलेलीच आहेत, लिखाण आणि प्रकाशचित्रे दोन्ही पुन्हा-पुन्हा निरखावीत अशी.
विमुक्त यांनी इथेच टाकलेला राजमाचीचा सचित्र वृत्तांत आठवला....ते ही उत्तम भटकंती-विषयक लिखाण करीत असत, हल्ली बर्याच दिवसांत त्यांचं काही लिखाण वाचल्याचं आठवत नाही....
अत्यंत सुंदर! डोळ्याचे पारणे फिटले आणि तिथे जाऊन आल्याच्या आनंदाची पुनरानुभूति मिळाली.
झक्कास !!
फोटो आणि लिखान फारच छान आहे. प्र्स्तुत स्थळाला भेट देऊ न शक्ल्याने पाहुनच दुधाची तहान ताकावर भागवित आहे.
असेच सुन्दर लिहीत चला.
अतिशय अप्रतिम फोटू
एकदम गारेगार वाटलं :D
सुंदर जागा, सुपर्ब फोटोज आणि झक्कास वर्णन... स्वॉलिड कॉम्बीनेशन आहात राव तुम्ही..
भटका मस्त. आम्हाला बसल्या जागी खैरात मिळतेय.. :-)
:)
मस्त फोटो..मस्त लेख..
मस्त जागा..मस्त वेळ..
सगळच अफलातून आहे..
अप्रतिम !!
वर्णन आणि फोटोज... दोन्हीही.
१० वर्षांपूर्वीचे दिवस आठवले.
केवळ अप्रतिम..
पुडच्या ट्रेकच्या आवतानाची वाट पाहतोय..
केवळ अप्रतिम..
पुडच्या ट्रेकच्या आवतानाची वाट पाहतोय..
खूप आवडले. :)
राघव
व्वा रे पठ्ठे
आम्ही नक्की जाऊ
अप्रतिम फोटो :)
गारेगार वाटलं एकदम ! :)
फोटोवर वॉटरमार्क नक्की टाक.
सुरेख वर्णन व अप्रतिम फोटो. खुप आवडले.
म हा न!!