जनातलं, मनातलं

ईशान्य भारत

Primary tabs

ईशान्य भारतातील समस्यांची पहिली चार कारणे खालील प्रमाणे आहेत:-

१) संपर्काचा अभाव - उर्वरित भारतवासीयांमध्ये या भागाबद्दल प्रचंड अज्ञान आहे. या अज्ञानासाठी आपल्या देशाची शिक्षणपध्दती व प्रसार माध्यमे जवाबदार आहेत. देशाच्या कानाकोपर्‍यातील संपूर्ण माहिती सुव्यवस्थीतपणे समाजापर्यंत पोचवण्याची जवाबदारी या दोहोंवर असते. ईशान्य भारताबाबतित त्यांनी उर्वरित भारताला अंधारातच ठेवले आहे.

२) राजकिय उपेक्षा :- स्वातंत्र्यप्राप्ती पासून आजपर्यंत पूर्वांचल राजकीय उपेक्षेचा गंभीर सामना करतांना दिसतो. पूर्वांचल म्हणजे भुतान, चीन, ब्रम्हदेश व बांगलादेश या चार देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमा लाभलेला व केवळ ७० किलोमीटर रुंदीच्या 'सिलीगुडी ग्रीवा' नामक चिंचोळ्या पट्ट्याने उर्वरित भारताशी जोडलेला प्रदेश! वास्तविकपणे राजकीय पुढार्‍यांनी सर्वप्रथम ज्या प्रदेशाच्या विकासांची व संरक्षणाची योजना करावयास पाहिजे होती त्या प्रदेशाला दुर्दैवाने सर्वाधिक उपेक्षित ठेवले गेले.

३) बांगलादेशी मुसलमानांची घुसखोरी :- पूर्वांचलातीस सात राज्यांपैकी बरोबर मध्यभागी असलेला आसाम व बांगलादेशास लागून असलेला त्रिपुरा ही राज्ये बहुतांशी मैदानी राज्ये आ॑हेत. निम्मा त्रिपुरा डोंगराळही आहे पण तो भाग मिझोरम व बांगलादेशाच्या चकमांनी व्यापलेल्या चितगौंग हिल्सट्रैकला लागुन आहे. प्रामुख्याने मैदानी असलेल्या या दोन्ही प्रदेशांमध्ये घुसखोरीने अक्राळविक्राळ् स्वरुप धारण केल्याचे दिसते. २ कोटी २६ लाख लोकसंख्या असलेल्या आसाममध्ये आजमितीस ७५ लाख बांगलादेशी मुसलमान घुसलेले आहेत. तर ३० लाख लोकसंख्या असलेल्या त्रिपुरामध्ये १० लाख बांगलादेशी घुसलेले आहेत.

४) ख्रिस्ती मिशनर्‍यांचे षडयंत्र - मतांतरणाबरोबर समाजामध्ये फुटीरता निर्माण करण्यासाठी ब्रिटिशांच्या मदतीने सुमारे दिडशे वर्षापूर्वी ख्रिश्चनिटीने शिक्षण पध्द्तीचा आधार घेतला शिक्षणाद्वारे पुढील असत्य गोष्टी शिकवून त्यांनी फुटीरता वाढवायला सुरुवात केली. १`) पूर्वांचलातील जनजाती हिंदू नसून मैंगोलॉईडस आहेत. २) हिंदू (भारतीय) समाज हा त्यांचा शत्रू आहे, कारण तो त्यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या परंपरा नष्ट करतोअ व् आर्थिक शोषण करतो. ३) म्हणुन आपले स्वतंत्र अस्तित्व राखण्यासाठी या हिंदूंना आपल्या राज्यांतून घालवून स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे हा आपला स्वतंत्रता संग्राम आहे. शिक्षणातून हा विचार देण्यासाठी त्यांनी पूर्वांचलातील जनजातीय बंधुंवर रोमन लिपी लादली आणि स्वाभाविकपणे त्या लिपीतील त्यांना उपलब्ध साहित्य फक्त बायबलच असे.

वर पाहिलेली पूर्वांचलातील समस्यांची पहिली चारही कारणे तेथे स्पष्ट दिसतात; पण पडद्यामागे दडलेल्या आंतरराष्ट्रीय शक्तींचा या फुटीर कारवायांना असलेला पाठींबा हे पाचवे कारण अत्यंत महत्वाचे आहे. या प्रदेशाला भारतापासून वेगळे करण्यास अमेरिका, पाकिस्तान , चीन उत्सुक आहेत व त्यांचे मोहरे बनून भुतान, बांगलादेश, म्यानमार ही छोटी छोटी राष्ट्रे षड्यंत्रात सहभागी झाली आहेत. अमेरिकेसारख्या महासत्तेला भारताच्या पूर्वांचलत रुची असण्याची तशी बरीच कारणे आहेत. त्यांतील पुढील काही कारणे अधिक महत्वाची आहेत.

अ ) पूर्वी रशिया जेव्हा अमेरिकेचा पहिला शत्रू होता तेव्हा रशियापासुन जवळ असा प्रदेश, जेथून अनेक प्रकारच्या गुप्त हालचाली करता येतील , त्यांना हवा होता. आशिय खंडात आपले प्रभाव क्षेत्र असलेला प्रदेश म्हणून भारतचा ईशान्य प्रदेश अमेरिकेला अत्यंत आवश्यक वाटला, तर चीनने पैन-मंगोलाईड चळवळीद्वारे ईशान्य भारतातील जनतेला आपल्या जवळ खेचण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यास प्रांरभ केला.

ब्) जगातील फक्त ४% लोकसंख्या असलेला अमेरिका जो जगातील ४०% नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपभोग घेतो , त्याला 'पुर्वांचल भारत' महत्वाचा वाटतो कारण भारताच्या एकूण नैसर्गिक साधनसंपत्तीच्या २०% महत्वाची खनिजे फक्त पूर्वांचलात आहेत. खनिज तेल, दगडी कोळशापासुन ते युरेनियम पर्यंत सर्व खनिजे पूर्वांचलात मुबलक प्रमाणात आहेत. शास्त्रज्ञ म्हणतात, 'आसाम खनिजतेलावर तरंगतो आहे.'

क) भारतातील बुध्दिमत्ता, श्रमशक्ती, नैसर्गीक साधनसंपत्ती यांचा सुरेख संगम झाल्यास भारत देखिल जगातिल एक प्रमुख महासत्ता बनू शकतो, याची अमेरिका, पाकिस्तान व चिनला भीती वाटते. म्हणून भारतातील सर्व प्रकारच्या भेदांना व असंतोषाला खतपाणी घालून भारतास कायम अशांत व अस्थिर ठेवणे या आंतरराष्ट्रिय शक्तींना आवश्यक वाटते.

ड्) अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र निर्मिती करणार्‍या, तसेच मादक द्रव्यांचे उत्पादन करणरृया कंपन्या आहेत. त्यांचा धंदा चालावा यासाठी जगामध्ये दहशतवाद जोपासणे ही त्यांची आर्थिक गरज आहे.

खालील कारनांमुळे पूर्वांचलात आंतरराष्ट्रीय शक्तींचे काम अधिक सोपे आहे.

अ) मोठ्या प्रमाणात असलेली भाषांमधील विविधता, भौगोलिक दुर्गमता, राजकीय उपेक्षा आणि यामुळे निर्माण झालेले संघर्ष आधीच मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. त्यांना अश शक्तिंच्या पाठबळाची आवश्यकता असतेच.

ब्) चार देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमा लागलेल पूर्वांचलाचा हा भाग उर्वरित भारताला केवळ ७० कि.मी रुंदीच्या सिलीगुडीने जोडला आहे.

आंतरराष्ट्रीय शक्ती पुढील पाच मार्गातून येथे सुरु असलेल्या आंदोलनास पाठबळ देतात.

विद्यार्थी आंदोलन - पूर्वांचलात अशा अनेक विद्यार्थी संघटना उभ्या राहिलेल्या दिसतात की ज्यांच्या मागण्यांतून फुटीरता डोकावत असते. आंदोलनात्मक मार्गांनी या संघटना अस्थिरता व अशांतता पसरवतात्. विद्यार्थी आंदोलनाला समाजाची सहानुभूती लगेचच मिळत असते.

प्रसार माध्यमे - स्थानीय बुध्दिजीवी, वृत्तपत्रे व अन्य प्रसार माध्यमे तेथील समाजाची दिशाभूल करतात. विद्यार्थी आंदोलनाच्या देशद्रोही मागण्यांना स्वातंत्र्य संग्रामाची संज्ञा देऊन जनमत जागृत करण्याचे काम या मार्गातून केले जाते.

स्थानीय राजकीय पक्ष - काँग्रेस, भाजपा सारखे अखिल भारतीय पक्ष हे विदेशी लोकांचे पक्ष व त्यांचे राज्य म्हणजे भारताची गुलामगिरी असे चित्र उभे करुन विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्यांना आपल्या घोषणापत्रकावर घेउन स्थानीय राजकीय पक्ष निवडणुका लढवतात . विद्यार्थी आंदोलन व प्रसार माध्यमे यांच्याद्वारे निर्माण झालेल्या अनुकूल वातावरणावर हे स्थानीय राजकीय पक्ष निवडून येतात व सत्तेत बसून सर्व फुटीरतावादी कारवायांना पूर्ण मदत करतात.

दहशत वाद - प्रत्यक्ष कृतीचा मार्ग हा दहशत वादाचा मार्ग असतो. समाजातील असंतुष्ट तरुण वर्गाला चिथावून अद्ययावत शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून नेले जाते. गेली पन्नास वर्षे अशाप्रकारे दहशतवादी निर्माण करणारी प्रशिक्षण केंद्रे शेजारी राष्ट्रांमध्ये चालू आहेत. हे दहशतवादी प्रशिक्षण घेऊन आल्यावर आंदोलने व मगण्यांच्या पूर्तीसाठी समाजामध्ये दहशत निर्माण करतात. लुटालूट, हत्यासत्र यांचे दुष्टचक्र चालूअ करतात.

ढोंगी शांतिदूत - वरील चारही मार्गांतून निर्माण झालेल्या अशांततेने व अत्याचाराच्या परिसीमेने सामान्य जनता मात्र त्रस्त होते. तेव्हा 'ख्रिश्चन मिशनरी' शांततेचे दूत बनुन 'येशू' चा शांतिसंदेश पोचवण्यसाठी रस्त्यावर उतरतात. प्रशासन , अतिरेकी, विद्यार्थी , पत्रकार इत्यादींचा समेट घडवून आणण्याचे ढोंग केले जते. या नाटकाचा प्रयोग दरवर्षी डिसेंबर महिना जवळ आल्यावर होतो. कारण ख्रिसमसचा सण शांततेत पार पडणे त्यांच्या दृष्टीने आवश्य क असते.!

अतिरेकी बनण्यासाठी प्रशिक्षण व शस्त्रास्त्रे इत्यादीसाठी लागणारा पैसा खाली दिलेल्या अनेक मार्गांनी येत् असतो.

१) उर्वरित भारतातून व्यापाराच्या निमित्ताने पूर्वांचलात येऊन राहिलेले सर्व भारतीय हे विदेशी आहेत व त्यांनी येथील समाजाला वारेमाप लुटून पैसा कमावला आहे असे मनात बिंबवले असल्याने, अशा व्यापार्‍यांना बळजबरीने उचलून नेणे, खंडण्याच्या चिठ्ठ्या पाठवणे, त्यांच्या हत्या करणे इत्यादी मार्गांतून पैसे लुबाडले जातात. एक लक्षणीय उदाहरण देता यील . उनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) या आसामातील अतिरेकी संघटनेने १५ वर्षात व्यापार्‍यांना लुटून मिळवलेली रक्क्म २१५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

२) मादक द्रव्यांचा व्यापार व त्यांचा प्रसार करुन त्या बदल्यात कोट्यावधी रुपये अतिरेक्यांना पुरविले जातात. मादक द्रव्यांच्या प्रसारातून आपल्याच समाजाच्या युवा पिढीला बरबद करण्याचे काम अतिरेकी करतात. पूर्वांचलातील प्रामुख्याने पहाडी राज्यांच्या शहरी भागांत द्रव्यांचे प्रमाण भयंकर वाढले आहे. काही शहरातील विद्यार्थ्यांच्या संख्येच्या ६०% विध्यार्थी मादक द्रव्यांचे सेवन करतात. मादक द्रव्यांचा व्यापार करण्यास नकार दिल्यास प्रशिक्षण केंद्रे व परकीय मदत ताबडतोब बंद करण्याची धमकी देण्यात येते.

३)बहुराष्ट्रीय कंपन्यांद्वारे कोट्यावधि रुपये अतिरेकी संघटनांना मिळत असतात.

४) खोट्या एन जी ओ (खाजगी स्वयंसेवी संस्था) कागदोपत्री दाखवुन केंन्द्र व राज्य सरकारची त्यांना मिळणारी कोट्यावधी रुपयांची आर्थिक मदत लुबाडुन त्याचा वापर अतिरेकी संस्थांसाठी केला जातो. मणिपूरच्या चुडाचंद्रपूर जिल्याचेच उदाहरण बघू. फक्त पावणे दोन लाख जनसंख्या असलेल्या चुडाचंद्रपुर जिल्ह्यात अकरा हजार एन जी ओ काम करतात. प्रत्यक्षात या संस्थापैकी फार थोड्या अस्तित्वात आहेत पण अधिकतर संघटना बेनामी आहेत.(फेक) मणिपूर मध्ये सर्वांत अधिक दहशतवाद व अतिरेकी प्रशिक्षण चुडाचंद्रपुरमध्ये असण्याचे वेगळे कारण काय असू शकते.

५) ख्रिश्चन मिशन्स जेव्हा एखाद्या क्षेत्रात काम सुरु करतात तेव्हा तेथे ओतलेला पैसा ही त्यंची 'गुंतवणुक' असते. मात्र पुरेसे मतांतरण झाल्यावर ते त्या समाजावर अनेक प्रकारच्या वर्गण्या लादून आर्थिक शोषणास सुरुवात करतात. 'मेघालय ' राज्यातील सर्व चर्चेसना मिळणारा मासिक निधी दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.या व्यतिरिक्त परदेशातून येणारा पैसा! मिशनर्‍यांना मिळणार्‍या पैशावर सरकारचे नियंत्रण नाही. घटनेतील अल्पसंख्यांकांसाठी असलेल्या सवलतींनुसार या पैशाचा जमाखर्च सरकारला दाखविण्यास ते बांधिल नसल्याने या पैशाचा वापर अतिरेकी कारवायांना उत्तेजन देण्यासाठी देखील होत असतो.

आंतरराष्ट्रीय षडयंत्र हे किती भयंकर आव्हान आहे याची कल्पना वरील विवेचनावरुन येऊ शकते. एका विशिष्ट मागणीवर हे चार मार्ग कसे अंमलात येतात याचे मेघालयातील उदाहरण लक्षणीय आहे.

मेघालयातील पश्चिम खासी पहाड जिल्यामध्ये काही वर्षापूर्वी युरेनियम हे खनिज मोठ्या प्रमाणावर आढळले. भारत सरकारने तेथे अणुऊर्जा प्रकल्पाची योजना सुरु केली. मात्र त्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय षडयंत्राचे चारही मार्ग काम करु लागले. सर्व प्रथम 'खासी स्टुडंट्स युनियन' या विद्यार्थी संघटनेने या प्रकल्पास विरोध करुन 'मेघालयातील' युरेनियम काढण्याचा 'भारताला ' अधिकार नसल्याचे घोषित केले. व त्यासाठी आंदोलन छेडले. त्यानंतर बुध्दिजीवीनी स्थानीय प्रसार माध्यमांच्या दुसर्‍या मार्गांद्वारे ही मागणी योग्य असल्याचा प्रचार केला व जनमत जागृती केली. तिसरा मार्ग म्हणजे स्थानीय राजकीय पक्षांनी या मागणीस राजकीय घोषणा पत्रकावर स्थान दिले व चौथ्या दहशतवादाच्या मार्गाद्वारे धमकावण्यात आले की मेघालयातील अणूर्जा प्रकल्पात जर शास्त्रज्ञ व इंजिनिअर्स आले तर त्यांच्या जिवास धोका असेल. मात्र काही दिवसातच बातमी आली की बांगलादेशाच्या सीमेवर अडीच किलो युरेनियमचे खनिज चोरुन ने असलेले अतिरेकी पकडले गेले व अधिक चौकशीनंतर ते खनिज पुढे अमेरिकेत जाणार असल्याचेही लक्षात आले!

पूर्वांचलातील परिस्थिती ही वर उल्लेखलेल्या पाच कारणांची परिणती आहे. पूर्वांचलाल या दुष्ट पंजामधून सोडवण्यासाठी सर्व भारतियांनी विचार मंथन करुन केंन्द्र सरकारवर् लवकरात आवश्यक कृती साठी दबाव आणणे गरजेचे आहे.

संदर्भ -पूर्वांचलाचे आव्हान आणि आवाहन-२००८-श्री सुनिल देवधर यावरुन साभार.

»

पंगा

शिक्षणातून हा विचार देण्यासाठी त्यांनी पूर्वांचलातील जनजातीय बंधुंवर रोमन लिपी लादली आणि स्वाभाविकपणे त्या लिपीतील त्यांना उपलब्ध साहित्य फक्त बायबलच असे.

१. ख्रिस्ती मिशनरी या भागांत येण्यापूर्वी या भागांतील जमातींच्या भाषांकरिता कोणती लिपी अथवा लिप्या वापरल्या जात होत्या? या लिपीचे किंवा लिप्यांचे उच्चाटन करून त्या जागी मिशनर्‍यांनी रोमन लिपी सक्तीने लागू केली का? की या जमातींच्या भाषांकरिता उपलब्ध लिपीअभावी (शिक्षणाच्या किंवा अन्यही सोयींकरिता, धर्मांतराची सोय जमेस धरून) रोमन लिपी उपलब्ध करून देऊन तिचा प्रसार केला? यांपैकी नेमके काय घडले? (दुसर्‍या परिस्थितीत 'रोमन लिपी लादली' असे म्हणता येईलसे वाटत नाही.)

२. ख्रिस्ती मिशनर्‍यांव्यतिरिक्त देशातील इतर तत्कालीन शक्तींनी, विशेष करून तत्कालीन किंवा तत्पूर्वकालीन हिंदुबांधवांनी, या भागातील जमातींच्या शिक्षणाकरिता आणि / किंवा त्यांच्या विकासाकरिता, किंवा, इतर गोष्टी सोडा, पण किमानपक्षी या जमातींच्या भाषांना एखादी लिपी असावी याकरिता, या जमातींना 'साक्षर' करण्याकरिता, नेमके काय प्रयत्न केले होते?

३. रोमन लिपीत केवळ बायबल हेच एकमेव साहित्य उपलब्ध आहे हा दावा पटण्यासारखा नाही. (शेक्सपियर वगैरे नावे चटकन डोळ्यांसमोर येतात.) तरीही, रोमन लिपीतील असे इतर उपलब्ध साहित्य हे (१) या जमातींच्या भाषांमध्ये नसणे, आणि/किंवा (२) रोमन लिपीतील अशा इतर (या जमातींच्या भाषांमधील किंवा इतरही भाषांमधील) साहित्याचे वितरण या जमातींमध्ये करण्यात ख्रिस्ती मिशनर्‍यांना हशील नसणे, हे शक्य आहे, आणि म्हणून या दृष्टिकोनातून या दाव्याचा विचार करता येईल. परंतु रोमन लिपीतून (आता या जमातींमध्ये तिचा प्रसार झाला आहेच, तर) या जमातींच्या भाषांमध्ये इतरही साहित्य निर्माण करण्यापासून आणि अशा साहित्याचे वितरण या जमातींमध्ये करण्यापासून इतरांना, आणि विशेष करून तत्कालीन हिंदुबांधवांना, नेमके कोणी अडवले होते?

सर्व प्रथम आपण हे लक्षात घेतले पाहिजे कि या जमाती ला शिक्षणाचा गंध नव्हता त्यामुळे त्यांच्यात धर्मप्रमुख हाच त्यांच्या साठी एक जाणकार होता. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात या भागात प्रथम ब्रिटिश राज्यकर्ते आले आणि त्यानंतर त्यांचे प्रतिनिधी म्हणजे मिशनरी आले. कनव्हर्शन हा मुळ हेतु त्यांचा होता हे निर्विवाद हे या विषयावरील जगातील अनेक लेखांद्वारे स्पष्ट आहे. त्यांना शिक्षण देणार्‍या शाळा त्याकाळी केवळ ५ वी पर्यंत असत जेणे करुन त्यांना ईग्रजीची ओळख व्हावी आणी त्यांना बायबल वाचता यावे.

स्वातंत्र्यानंतर ६० वर्षानंतरही हा भाग उर्वरित भारतातिल लोकांसाठी आजही दुर्गम च आहे. तेंव्हा त्याकाळी तेही परकीयांच्या सत्तेखाली परिस्थीतीची कल्पनाच केलेली बरी. आणि तसेही आपण आजही याबाबत उदासीनच आहोत.

त्याभागात मिशनरी जेंव्हा एकाच उद्देशाने गेले असतांना त्यांना इतर इंग्रजी साहित्याची ओळख करुन द्यावया इतके ते नक्कीच भोळे नव्हते.

नितिन थत्ते

>>त्यांना शिक्षण देणार्‍या शाळा त्याकाळी केवळ ५ वी पर्यंत असत जेणे करुन त्यांना ईग्रजीची ओळख व्हावी आणी त्यांना बायबल वाचता यावे.

बायबल वाचता यावे म्हणून इंग्रजी शिकवण्याची कल्पना रोचक आहे. ज्याला अंकित ठेवायचे आहे त्याला बायबल वाचता कशाला यायला हवे? उलट त्याने स्वतः बायबल न वाचता पाद्री सांगतो त्यावरच विश्वास ठेवला तर बरे. :)

५वीपर्यंतच शिक्षण दिल्याने बाकी काही वाचता येणार नाही अशी मिशनर्‍यांची समजूत कश्यामुळे झाली असावी?

महाभारत, पुराणे वगैरे मध्ये उल्लेखलेले नागलोक हेच असतील तर मुख्य भारतभूमीवरील लोकांचे त्यांच्याशी शत्रुत्वच राहिले असावे असे वाटते.

पंगा

उलट त्याने स्वतः बायबल न वाचता पाद्री सांगतो त्यावरच विश्वास ठेवला तर बरे.

मुद्दा पटण्यासारखा आहे. मात्र, हे वाक्य पांढर्‍यावरच्या काळ्यात आले असते तर अधिक आवडले असते. असो.

५वीपर्यंतच शिक्षण दिल्याने बाकी काही वाचता येणार नाही अशी मिशनर्‍यांची समजूत कश्यामुळे झाली असावी?

रोचक मुद्दा आहे. याबद्दल सविस्तर लिहिण्यासारखे बरेच आहे. सवडीने पुन्हा कधीतरी. तूर्तास 'या बाबतीतील आपले म्हणणे पटण्यासारखे आहे' एवढेच नमूद करून रजा घेतो.

महाभारत, पुराणे वगैरे मध्ये उल्लेखलेले नागलोक हेच असतील तर मुख्य भारतभूमीवरील लोकांचे त्यांच्याशी शत्रुत्वच राहिले असावे असे वाटते.

या मुद्द्याबद्दल व्यक्तिशः काहीच कल्पना नसल्याने*, पास.

* इतिहास, पुराणे वगैरे आमचा प्रांत नव्हे. त्यामुळे याबाबत काही(बाही) अटकळी बांधणे आमच्या आवाक्याबाहेरचे आहे. क्षमस्व.

arunjoshi123

महाभारत, पुराणे वगैरे मध्ये उल्लेखलेले नागलोक हेच असतील तर मुख्य भारतभूमीवरील लोकांचे त्यांच्याशी शत्रुत्वच राहिले असावे असे वाटते.

किती ते अज्ञान.

मस्त कलंदर

माझं इशान्य भारताबद्दलचं ज्ञान तोकडं आहे. किंबहुना जे काही कळालं ते 'पूर्वांचल' वाचूनच. तुम्ही वरती म्हणता त्या मुद्यांचा उल्लेख श्री. बिनिवाले यांनीही केला आहे. परंतु त्याबरोबरच खूप काळापासून चालत आलेली सरकारी उदासीनता हेही आणखी एक कारण आहे असे ते म्हणतात. तुम्ही जर अगदी अलिकडच्या काळात तिथे जात आहात आणि कार्य करत आहात, तर सध्याचं सरकारचं धोरण कसं आहे याबद्दल काही सांगू शकाल?

ता.क. :- बदल हा दोन्हीबाजूंकडून अभिप्रेत असतो हे मान्य आहे. परंतु ती सारी राज्यं आपल्या देशाचा भाग म्हणून सरकारने किमान पुढाकार्/initiative घ्यायला हवा असं माझं व्यक्तिगत मत आहे..

एका अप्रतिम विषयाला वाहिलेली ही लेखमाला नक्कीच स्पृहणीय आहे .
आमच्या कॉलेजात तेथील काही विद्यार्थी होते .त्यांना नेपाळी असे संबोधीत केले तेव्हा त्यांना खूप राग आला '
'' आम्ही तुमच्याच देशातले आहोत .तुम्हाला ह्याची माहिती नाही '' असे हतबल उद्गार काढले .
पुढे त्यांच्याशी मैत्री झाली .
त्यांनी कधी आम्ही त्यांच्या इकडे आलो तर ''जंगलात मस्तपैकी कुत्र्यांची शिकार करू'' असे सांगितले होते .
किरण बेदी ह्यांच्या आत्मचरित्रातून सुद्धा ह्या भागातील परिस्थिती ची माहिती मिळते .

जुना लेख पण डॉकलाम वाद आणि नुकत्याच झालेल्या निवडुका मुले वर आणत आहे

arunjoshi123

पुरोगाम्यांना देशद्रोह माफ असतो.