कलादालन

मिशन काश्मीर - ७ - पहलगाम

Primary tabs

लुटा जो मुसाफिर दिल की सफर मे, है जन्नत ये दुनिया उसकी नजर मे......

१९६३-६४ साली जेव्हा बिहारींनी जेव्हा हे गाणे लिहायले घेतले तेव्हा त्यानी पहलगामला नजरेसमोर ठेवुन कविता लिहायला सुरुवात केली असावी आणि मग नय्यर च्या विनंतीचा मान ठेवुन त्याचे गाण्यात रुपांतर केले असावे. कारण दिल काढुन "पहलगाम" टाकले की एरवी हे वाक्य पहलगामला चपखल लागु पडते,

काश्मीर - पहलगाम ने अनेक चित्रपटांसाठी लोकेशन्स पुरवली. काश्मीर की कली त्यातले एक. बेताब दुसरे. सन्नी देओल आणि अमृता सिंगचा बेताब इथल्यात एका सदाबहार व्हॅलीत शूट झाला. त्यानंतर या जागेला बेताब व्हॅली हेच नाव पडले. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बांधलेल्या हट्स अजुनही इथे जतन करुन ठेवल्या आहेत. एवढ्या सुंदर जागेत रहायला मिळत असेल तर मरो ती अमृता सिंग आणि मरो तो शम्मी कपूर असे होइल आपल्याला. दुर्दैवाने राहुल रवैल ला तिथे आख्खा चित्रपट शूट करायचा असल्यामुळे त्याने तो मोह बाजूला ठेवलेला असावा. जब हम जवा होंगे आणि चित्रपटाच्या इतर बर्‍याच भागातले शूटिंग याच भागातले

ऐ जिंदगी ये लम्हा जी लेने दे, पहले से लिखा कुछ भी नही रोज नया कुछ लिखती है तु
जो भी लिखा है दिल से जिया है, ये लम्हा फिलहाल जी लेने दे

पहलगाम मधले हवामान हे असेच आहे. इथे पहले से लिखा कुछ भी नही. रोज वेगळे वातावरण, थेट राजकुमार सारखे मूडी. आत्ता पाऊस पदतो आहे तर जानी २ मिनिटात उन सुद्धा पडु शकेल. आम्ही गेलो त्या दिवशी उन पाउसाचा खेळ सुरु होता. दुसर्‍या दिवशी मात्र मुसळधार पाऊस. निसर्गराजापुढे मान तुकवुन आम्हीदेखील आमच्या होटेलमधुनच निसर्गाचा आस्वाद घेत होतो. अखेर भर पावसात बाहेर पडायचे ठरले.

बर्फानु बाबा की जय म्हणत जिथुन भाविक आपल्या अमरनाथ यात्रेचा शुभारंभ करतात त्या चंदनवाडीला जायचे होते. संततधार पाऊस आणि गोठवणारी थंडी याचा अनोखा संगम चंदनवाडीला होता. अजुनही चंदनवाडी पास बर्फात होता. त्यानंतर १५ एक दिवसात सैन्याची लोक येउन बर्फ काढणार होते आणि मग तो मार्ग यात्रेकरुंसाठी खुला होणार होता. यात्रेकरुंना जायचे असतील तर २ मार्ग आहेत. एक बालताल मार्गे जातो. तो सोप्पा आहे. १ दिवसात यात्रा पुर्ण होते आणि हा दुसरा इथुन यात्रा पुर्ण व्हायला २ दिवस लागतात पण निसर्ग इतका सुंदर आहे की २ दिवसात अमरनाथ बरोबर स्वर्गात जाउन आल्यासारखे वाटते. (मध्येच निसरडा रस्ता असल्याने घोडे दरीत पडतात आणि काही पुण्यश्लोक खरेच स्वर्गात जातात ही गोष्ट वेगळी)

चंदनवाडीवरुन अमरनाथच्या यात्रेला सोबत करणार्‍या भाविकांना शेषनाग नदीची साथ असते. हे एकमेव हिंदु नाव इथे अजुन कसे टिकुन आहे हे आश्चर्यच आहे. पुढे याच नदीला लिडार (पुर्वीचे नाव लंबोधिरी) नाव पडले आहे. इथल्या पाण्यात ५ मिनिटे हात घालुन बसणार्‍याला लाखभर रुपयाचे बक्षीस द्यायला हरकत नसावी कारण पाणी प्रचंड थंड आहे. बर्फाचेच पाणी ते.

इथुनच पुढे यात्रेला सुरुवात होते:

चंदनवाडी, बेताब व्हॅली बघुन आम्ही अरु व्हॅलीकडे वळलो. अजुन एक निसर्गरम्य ठिकाण पण जास्त प्रसिद्ध अश्यासाठी की इथे कर्मा आणि अजुन ३-४ चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. निसर्गाला हा चित्रपटांशी जोडण्याचा खटाटोप मला कळत नाही. म्हणजे बेताब व्हॅली ला हे नाव का तर इथे बेताब चे शूटिंग झाले. अवंतिपुरा प्रसिद्ध का तर तिथे आंधी च्या तेरे बिना जिंदगी से चे शूटिंग झाले. वास्तविक ही माहिती दिली नाही तरी त्या जागा डोळ्याचे पारणे फेडणार्‍या आहेत.

अरु व्हॅलीकडे जाण्याचा रस्ता मात्र पावसाने चिखल झाल्यामुळे एकदम अ‍ॅडव्हेंचरस झाला होता. त्यात परत तो जागोजागी पर्यटकांच्या सोयीसाठी तिथे असलेल्या घोड्यांच्या लिदीने पावन झाला होता. चालताना पायाखाली चिखलाचे आणि लिदीचे जे काही मिश्रण झाले होते ते चुकवत चुकवत पाय टाकायचे म्हणजे एक आव्हान होते. उडी थोडी चुकली की पचाक.... एकदम तुमसे मिलकर ऐसा लगाच होणार. पण ते चुकवत चुकवत जेव्हा तुम्ही आत पोचता तेव्हा जी भर के क्लिकक्लिकाट होतो.

अरु व्हॅलीत अजुन एक खुप सुंदर गोष्ट होती ति म्हणजे तिथले दगड. मध्यम आकाराचे जे रंगीबेरंगी गोटे आजकाल घरी कुंड्यांमध्ये शो साठी ठेवण्याची फॅशन आली आहे ते तिथे मुबलक प्रमाणात होते. ते घ्यायचा मोह देखील होत होता. पण दादा कोंडके - जयश्री टी (कदाचित उषा चव्हाण असु शकेल. चुभुद्याघ्या) च्या एका चित्रपटातल्या किश्श्याची आठ्वण झाली. एका चित्रपटात दादा नायिकेला काहितरी चिडवतात आणि नायिका रस्त्यावरचा दगड घेउन दादांना मारतात असा प्रसंग होता. नायिकेने असाच रस्त्यावरचा एक दगड उचलला तसा दादांनी शॉट मध्येच थांबवत नायिकेला सुचना केली की "तो दगड घेउ नये. तो वापरलेला असतोय". आता वापरलेला म्हणजे काय हे काही जयश्रीताईंना कळेना आणि सर्वांसमोर दादांना सांगता येइना. वापरलेला शब्दाचा उलगडा अखेर नायिकेला चित्रपटाच्या प्रिमीयरलाच झाला. त्यानंतर बहुधा त्यांनी रस्त्यावरचा दगड आयुष्यात कधीही उचलला नसावा. आम्हाला वापरलेला शब्दाचा अर्थ माहिती होता आणि तिथला प्रत्येक दगड कसा सगळ्याच घोड्यांनी 'वापरलेला' आहे असे दिसत असल्याने आम्ही त्या भानगडीत पडलो नाही.

परत फिरताना मनात एकच दु:ख होते की ट्रिप संपली पण ज्या आठवणी मनात घेउन आम्ही माघारी येणार होतो त्या चिरकालीन टिकणार्‍या होत्या.

तळटीपः माझी ट्रिप संपलेली असली तरी तुमचे भोग अजुन संपलेले नाहीत. एक भाग अभी बाकी आहे.

न परत फिरलो तेव्हा खुप इच्छा झाली होती

इरसाल

तळटीपेवर जिंकलेस मित्रा. फोटो तर अगदी डोळ्यांचे पारणे फेडणारे आहेत !!!!!!!

स्पा

सगळे फोटू झकास....

दुसरा तर कातीलाच...
पुढचा भाग टाक रे लवकर असे लिहिणार होतो.. पण तळटीप वाचली :)

पियुशा

व्वा !
सगळे फोटो जबरदस्त :)
वरुन दुसरा तर अगदि झक्कासच !

सोत्रि

अगदी हेच टंकायला खाली येत होतो.

मृत्युन्जय मस्त रे!

- (भोग भोगणारा) सोकाजी

गवि

स्वर्ग आहे रे हा स्वर्ग.. आणि वर्णनही उत्तमच.

विलासराव

मस्त झाली तुमची स्वर्गाची सफर.
आम्ही गेलो होतो तेव्हा पहलगाम बस स्टँड्च्या मागच्या बाजुने चालत डोंगरावर गेलो होतो. साधारणपणे ४० मिनिटात आम्ही वरती पोहोचलो. तिथे एक प्रशस्त ग्राउंड्सारखा परिसर होता एका बाजुला उंचऊंच झाडी ,दुसरया बाजुला दरी. आनी वरती मिनिटामिनिटाला बदलणारा निसर्ग. मी त्या जागेच नाव विसरलो.

५० फक्त

१९९९ साली गेलो होतो या भागात जाम भारि आहे आणि त्यावर तुमचं लिहिणं मग तर काय एकदम मजाच येते आहे.

धमाल मुलगा

आम्ही ऑलरेडी स्वर्गात पोहोचलो आहोत. आता पिंडदान काश्मिरातच करा.

प्रचेतस

फोटू एकदमच कातिल रे. वर्णन सुद्धा तितकेच ओघवते आणि सुरेख.
तुझी ही छान लेखमाला वाचताना काश्मिरचे हे सौंदर्य तितकेच शापित असल्याची खंतही मनात डोकावून जाते.

आशु जोग

फोटो अतिशय सुंदर आहेत !

स्वर्गीय अनुभव फोटो पाहताना आला.

धन्यवाद.

नगरीनिरंजन

सलाम नमस्ते!

दोन नंबरचा फोटो पाहून मंत्रमुग्ध का काय म्हणतात ते झालो.

मृत्युन्जय

अर्रे वा. हा धागा अजुन जिवंत आहे म्हणायचा :).दरवेळेस धागा मरत आला की धन्यवाद द्यायचे ठरवतो पण मग नंतर उगाच धाग्याचे पुनरुज्जीवन केल्यासारखे वाटेल म्हणुन लिहायचे राहुन जाते. उत्खनन झालेच आहे तर सर्व वाचकांना मनःपुर्वक धन्यवाद देउन घ्यावे म्हणतो. :).

क्या बात है!!!
सातही भाग सलग वाचून काढले :)
लै आवडलं!!!

सुरुवातीच्या भागातले विनोदी प्रकार वाचता वाचता ढेरीवर ठेवलेला ल्याप्तोप गदागदा हलायला लागलेला. नंतर बसून वाचलं :)

यशोधरा

सातव्या भागात सगळ्या लिंका द्यायच्या ना!
आता शोधते.

मृत्युन्जय

मिशन काश्मीरची ही पुर्ण मालिका लिहुन काही वेळ झाला. त्यावेळेस मला व्यवस्थित लिंक्स देता यायच्या नाहित त्यामुळे या मालिकेच्या बर्‍याच भागात मालिकेतील बाकीच्या लेखाच्या लिंक्स नाहित, त्यामुळे प्रतिसादातुन त्या सगळ्या लिंक्स येथे देत आहे. त्यामुळे काही काळापुरते सगळे लेख उगाच वर येतील त्याबद्दल क्षमस्वः

मिशन काश्मीर १ - http://www.misalpav.com/node/17957

मिशन काश्मीर २ - श्रीनगर - http://www.misalpav.com/node/17973

मिशन कश्मीर - भाग ३ - श्रीनगर - http://www.misalpav.com/node/18019

मिशन काश्मीर - भाग ४ - बर्फ - http://www.misalpav.com/node/18061

मिशन काश्मीर - अवंतिपुरा, पहलगाम - भाग ५ - http://www.misalpav.com/node/18085

मिशन काश्मीर - भाग ६ - पहलगाम - पोशवान पार्क - http://www.misalpav.com/node/18104

मिशन काश्मीर - ७ - पहलगाम - http://www.misalpav.com/node/18162

मिशन काश्मीर - केवळ छायाचित्रे - http://www.misalpav.com/node/22309

पहलगामच्या माझ्या मधुचंद्री आठवणी फार रोमँटिक आहेत. पुन्हा त्या आठवणी 'चाळवल्यात'.

पहलगाम अतिशय सुंदर आहे. तिथे त्याकाळी 'बॉबी' चित्रपटात वापरलेला, 'हम तुम एक कमरेमें बंद हो', ह्या गाण्यात वापरलेला बंगला म्हणजे टुरिस्टांचे आकर्षण होते.

आम्ही आपले 'हम तुम एक कमरेमें बंद हो' हा मंत्रच आवळत, आपलं आळवत बसलो.

सुनील

फोटो छानच. सुमारे दहा वर्षांपूर्वी कश्मिर पाहिल्याच्या आठवणी जाग्या झाल्या. बॉबी चित्रपटातील "चाबी खो जाय" हे गाणे ज्या घरात चित्रीत झाले ते घर पाहिल्याचेही आठवतेय.

शेषनाग नदीची साथ असते. हे एकमेव हिंदु नाव इथे अजुन कसे टिकुन आहे हे आश्चर्यच आहे.

नाही हो. राज्याच्या राजधानीचे नाव अद्यापही श्रीनगरच आहे. झालंच तर अनंतनागदेखिल आहे. शंकराचार्य हिलला तुम्ही भेट दिली असेलच.

खेरीज, बारामुल्ला हेदेखिल इंग्रजांनी केलेला अपभ्रंश. ("मुल्ला"शी त्याचा काही संबंध नाही!) स्थानिक त्याचा उल्लेख वारमूल असा करतात - जो वराहमूल याचा स्थानिक अपभ्रंश असल्याचे कळते.