जनातलं, मनातलं

गरज

Primary tabs

गरज
१. 'साले माजलेत...' या उक्तीखेरीज ज्यांचं वर्णन अपुरं ठरतं असे रिक्षावाले.२. जुनी, पिवळी पडलेली पुस्तकं मेहेरबानी केल्याच्या थाटात पुरवणारं सरकारी वाचनालय आणि तिथले कर्मचारी.३. सदैव कशासाठी तरी उकरून ठेवलेले आणि ट्रॅफिकनं बुजबुजलेले रस्ते, झाकणं चोरीला गेलेली गटारांची असहाय्य तोंडं, उखडलेल्या लाद्या, भाजीवाल्यांनी आणि पायरेटेड सीडीवाल्यांनी हक्कानं व्यापलेले फुटपाथ.४. रात्री अडीच वाजताही आश्चर्यकारक गर्दीनं ओसंडणारं रेल्वे स्टेशन.५. एखादी सीडी सापडेनाशी झाल्यावरच ज्याची नाईलाजानं साफसफाई होते आणि ती करताना त्या सीडीखेरीज आवळ्याच्या बिया, अमृतांजनची बाटली, दोन महिन्यापूर्वीच्या 'लोकरंग'चं मागचं पान, खंडीभर जळमटं-धूळ-गुंतवळ एवढा सगळा ऐवज बक्षिसासारखा मिळतो, तो आपला थकेला दमेकरी पीसी.६. दर आठ दिवसांनी थपडा मारल्यावर एकदम मख्खनके माफिक चालणारा, भांडताना निमित्त आणि मारामारी करताना हत्यार अशी दुहेरी सर्व्हिस देणारा, खिळखिळा झालेला टीव्हीचा रिमोट.७. खूप वापरल्यामुळे बांधणी सैल झालेली पुस्तकं, त्यांची कोपरे दुमडलेली मुखपृष्ठं आणि कसल्याही संदर्भाखेरीज लख्ख आठवून येणार्‍या अधल्यामधल्या ओळी.
माणसांपेक्षाही जास्त तीव्रतेनं या गोष्टी नुसत्याच आठवतात आणि त्यांचा नेहमीइतका राग न येता नुसतीच लख्ख आठवण येतच राहते तेव्हा -
मनसे आणि राज ठाकरेबद्दल शरम, राग आणि संभ्रम हे सगळं एकदम वाटतं, तरीही त्याच्यात आणि आपल्यात असलेला मराठी असल्याचा धागा नाकारता येत नाही आणि इतके दिवस घट्ट असलेली आपली भूमिका भौगोलिक जागा बदलल्यामुळे एकाएकी डळमळीत होऊन अस्थिर झाल्यासारखं वाटतं तेव्हा -
'आयपीलमें किसे सपोर्ट कर रही है? मुंबई या बेंगलोर?' या मुंबईस्थित बिहारी मित्राच्या प्रश्नावर 'अर्थात मुंबई, काय आचरट प्रश्न आहे हा!' हे तोंडावर आलेलं उत्तर मागे परतवून 'हॅट, आय डोण्ट फॉलो आयपील. वोह क्या क्रिकेट है?' हे पायाभूत डिप्लोमॅटिक उत्तर आपसूक दिलं जातं तेव्हा -
घाम न येण्यातली प्रचंड सोय जाणवण्याचे दिवस मागे पडून 'छे, अशानं वजन कमी कसं होणार', 'उष्णतेचा त्रास होतो ब्वॉ फार', 'कायच्या काईच हवा ही.. सतत बदलणारी...' अशी कुरबुर आपोआप तोंडून बाहेर पडायला लागते तेव्हा -
'आयटी हब' असलेल्या शहरातल्या कौतुकाच्या बागा म्हणजे 'फुकट पोसलेले पांढरे हत्ती आहेत..' असं सिरियसली वाटायला लागतं,
अनिश्चित-अवाजवी ट्रॅफिक जॅम्सचा वैताग येऊन आपण रविवार घरीच लोळून काढायला लागतो,
'हे कसली मॉल्सची कौतुकं सांगतात आम्हांला? आमच्याकडे येऊन पाहा एकदा...' हे वाक्य लोकांच्या सनातनी मेण्टॅलिटीपासून ते विमानतळाच्या स्वच्छतेपर्यंत कुठल्याही गोष्टीला चपखल बसायला लागतं,
'इथे रेल्वे होईल काही वर्षांत. मग मुंबईला मागे टाकतंय बेंगलोर...' या कुणाच्याश्या दाव्यावर तोंड उघडण्याचीही तसदी न घेता मनात फक्त कुत्सित हसणं उमटतं,
मीटरप्रमाणे बत्तीस रुपये होणार्‍या ठिकाणी रिक्षावाल्याच्या हातावर ठरल्याप्रमाणे पन्नास रुपये टिकवल्यावर, तो 'और दस रुपया मॅडम. अभी साडेदस बज गया' असं अत्यंत निरागस-निर्विकारपणे म्हणतो. मामाला वचकून असणार्‍या मुंबईतल्या रिक्षावाल्याच्या आठवणीनं गहिवरावं की जिभेवर आलेली पाच अक्षरी कचकचीत शिवी आधी मागे सारावी, हे न कळून आपण हतबुद्ध होतो तेव्हा -
तेव्हा समजावं,
घरी एक पखालफेरी मारून येण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्याखेरीज पुरोगामी आधुनिक ग्लोबल नागरिक म्हणून आपलं निभणार नाही...

स्वयंभू (verified= न पडताळणी केलेला)

लेख झक्कास जमलाय. बँगलोर मधे असाल तर पुढल्या मिपा ओसरी ल या नक्की.

आपला,

ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

विसोबा खेचर

लेख वाचून क्षणभर गरगरलंच!

छ्या! मेघनाताई, अहो तुम्ही किती गोष्टींचा जीवाला त्रास करून घेता बुवा! :)

बाय द वे, लेख बाकी फक्कड जमलाय. तुमची सामाजिक जाणीव फारच तरल आहे बॉ! :)

असो...

माझ्या माहितीप्रमाणे, तुमचं मिपावरील हे पहिलंच स्वतंत्र लेखन आहे. या निमित्ताने आपल्या पहिल्यावहिल्या लेखाचं मी मिपावर मनपासून स्वागत करतो आणि यापुढेही असंच स्वच्छंद व मनमोकळं लेखन आपण मिपावर करावं, अशी आपल्याला विनंती करतो..

तात्या.

राजे (verified= न पडताळणी केलेला)

अहो एवढा विचार नाही करायचा ! नाही तर जगणे अशक्य होऊन जाईल एक दिवस !

लेख मस्त जमला आहे ... पुढील लेखनाची वाट पाहत आहे !

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

धन्यवाद मंडळी. :)

स्वयंभू - मिपा ओसरी हे काय प्रकरण बाय दी वे?

- मेघना भुस्कुटे

कुंदन

शिक्षण वा नोकरी निमित्त घरापासून लांब राहताना असे बरेच प्रसंग येतात. त्यावर उपाय म्हणजे जमेल तेंव्हा अधुन मधुन घरी एक पखालफेरी मारून येणे हे सर्वोत्तम....

बेसनलाडू

लेखन फार आवडले. त्यातली तिडीक जाणवली, सामाजिक भान नि संवेदना जाणवली.
पुढील लेखनसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
(वाचक)बेसनलाडू

वरदा

लिहिलयच गं मेघना..किती वैतागलेयस ते दिसतय..
पखालफेरी काय असतं गं?

देवदत्त

छान लिहिलंय... मनातील विचार बाहेर आल्यासारखे वाटतात :)

गृहिणि

सहिच जमलाय लेख. मी तुमचा ब्लॉग नेहमि वाचते, खुप छान लिहिता तुम्हि नेहमिच. हा लएख एक्दम भिडला कारण असच काहिस इथे (सातासमुद्रापार) नेहमि वाटत असत पण दुदैवाने "पखालफेरि" मारण शक्य नसल्याने "राहिले दुर घर माझे..." अशि अवस्था होते.

यशोधरा

मेघना, आवडलं लिहिलेलं.
मी आत दोन दिवसांनीच मारते आहे पखाल फेरी :)

छोटा डॉन

मेघना तुझ्या लेखातुन अस्सल मराठी असलेल्या परंतु सध्या "बेंगलोरनिवासी" असलेल्या मराठी [ व त्यात पुणेकर ] व्यक्तीची मानसीक स्थिती चांगली मांडली गेली आहे ...

बाकीचे म्हटल्याप्रमाणेच मी विचारतो "किती ग विचार करतेस तु ? अहो एवढा विचार नाही करायचा ! नाही तर जगणे अशक्य होऊन जाईल एक दिवस ! "

बाकी तु म्हटल्याप्रमाणे आहेच तसे बंगलोर,
साले *** रिक्षावाले रात्री ८ नंतर कमीतकमी २० रुपये जादा घेतात....
लोक इथल्या हवेचे कौतुक अगदी तोंड फाटूस्तोवर करतात पण जर दर ८ दिवसांनी पाउस पडून हवा जर ढगाळ होत असेल आणि जीव नकोसा होत असेल तर कसले कौतुक हे मला तरी समजले नाही ...
बाकी "मॉल्स आणि मोठी थेटरे " याबद्दल मला काडीइतके अप्रुप नाही. जर "जोधा-अकबर वा तसाच एखादा तत्सम फालतू " पिक्चर जर तुम्हाला पर हेड ३०० रुपये ची फोडणी लावत असेल तर अजुन "६० रुपयात" पिक्चर दाखवणारे पुण्याचे "मंगला" काय वाईट ?
बाकी "बागांबद्दल " मी सहमत नाही, बेंगलोरमध्ये तेवढीच एक गोष्ट आहे की जिथे "ट्रॅफीक जॅम" नाही. अगदी निवांत बसता येते, कुनाची कटकट नाही. जर मानसीक शांती साठी एवढी किंमत मोजावी लागत असेल तर आजच्या काळात ती बिलकूल जास्त नाही असे मी म्हणेन ...

बाकी एक सिंपल गोष्ट आहे, जास्त त्रास करुन घ्यायचा नाही . कशाकशाचा त्रास करुन घेणार ? ही तर फक्त झलक आहे.
अजुन आपण फक्त "कॉर्पोरेट कल्चर" बद्दल बोलत आहोत, इथले "लोकल आणि सोशल कल्चर" तर अजुन "खतरनाक" आहे आणि मराठी माणसाला तर झेपणे शक्यच नाही.
तर "टेक व चील पील !!!!".....

बाकी "ऍडी" म्हणल्याप्रमाणे पुढच्यावेळी "कट्ट्याला" ये जमले तर ...

मिसळपाव दक्षिण भारत दिग्विजय आणि उत्कर्ष समिती,बंगलोर च्या अध्यक्ष
छोटा डॉन

[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मराठी_माणूस

'इथे रेल्वे होईल काही वर्षांत. मग मुंबईला मागे टाकतंय बेंगलोर...'

जगणे अशक्य होण्याच्या बाबतीत का ?

भाई

मिपावाले बेंगलोरकर महाराष्ट्र मंडळात जातात का? गणेशोत्सवाखेरीज काही कार्यक्रम होतात का आता? मी बेंगलोर सोडून ५ वर्षे झाली. त्यापूर्वी कधी मधी जायचो. बाकी मराठी माणसाला आवडण्यासारख्या फार गोष्टी बेंगलोरमध्ये नाहीत असे वाटते.
-अर्धे तप बेंगलोरमध्ये काढूनही तिथे न रमलेला
भाई

देवदत्त

गणेशोत्सवाखेरीज काही कार्यक्रम होतात का आता?
हो, होत असतात इतरही कार्यक्रम. :)
गेले ३/४ वर्षे २ याहू गृप्सचा मिळून कार्यक्रम होत असतो. 'जल्लोष' त्याचे नाव. आता १ जून ला कार्यक्रम झाला असे ऐकले. मला सध्या वेळ मिळाला नाही नाहीतर मी त्याची माहिती इथे दिलीच असती. :(
सदस्यांच्या कार्यक्रम/स्पर्धांसोबत नामांकित लोकांचे कार्यक्रमही होतात. ह्या वर्षी दिलीप प्रभावळकर येणार होते. मागील वर्षी शिरीष कणेकरांचे 'कणेकरी' ही झाले होते.
तसेच इतर वेळी आणखीही कार्यक्रम असतात. २००५ मध्ये असेच 'आयुष्यावर बोलू काही' सादर केले होते. इतरही काही नाटकांचे प्रयोग झाले होते.

(त्या मित्रांनाही मिपाचे आमंत्रण देतो :) . राहूनच गेले होते :( )

मनस्वी

अक्षरश: असंच वाटतं मेघनाताई.
मी ६ महिने होते तिथे.. ट्रॅफिक, रिक्षा, बागा, हवामान अन् मॉल्स - सगळे अनुभव असेच.
सगळ्यात डोक्यात जातात ते रिक्षावाले.

'इथे रेल्वे होईल काही वर्षांत. मग मुंबईला मागे टाकतंय बेंगलोर...'

वाट बघतीये.

कौतुकाबद्दल आभार मंडळी!
बाय दी वे, मी पुणेकर नाहीय. :(
पखालफेरी: आय वॉज रेफरिंग टु कॅमल! पखाल भरून घेतली की काही महिने पाहायला नको!

श्रीनिवास

मेघनाबाई, लेख मस्तच जमलाय...
पखालफेरी शब्द आवडला..

वरदा

कळ्ळं गं मेघना..
तुम्ही बँगलोर मधे राहून किती वैतागलेले दिसताय..मी तिथे परत आल्यावर बँगलोरला येण्याचा विचार करत होते माझ्या कं. चं ऑफिस आहे म्हणून आता विचार केला पाहिजे..... :S

अभिज्ञ

मेघनाताई,
आपल्या ह्या लेखाचे प्रयोजन कळाले नाही. फारच नकारार्थक भूमिकेतून लिहिल्यासारखा वाटला.
अहो प्रत्येक शहरात असे कमी अधिक उणे मुद्दे असतातच. त्यात एकट्या बंगलोरला टारगेट करणे बरोबर नाही.
मी हि आजपर्यंत दिल्ली,मुंबई,चेन्नई.. बगैरे अशा ब-याच शहरात वावरलो/राहिले आहे.जागोजागी चांगले वाईट अनुभव
हे येणारच.
रिक्षावाले म्हणाल तर प्रत्येक शहरात हे असले प्रकार चालतातच.ती जमातच वेगळी ...
इथे वाईट काय आहे ह्याची उजळणी करत बसण्यापे़क्षा इथे चांगले काय आहे हे सांगितले असते तर जास्त आवडले असते.
असो,
पुढील लेखनाला शुभेच्छा.

अभिज्ञ.

शशांक

मुक्तचिंतन आवडले.

मुंबईतून भारतात कुठेही गेलात तर थोडाफार त्रास होईलच असे वाटते. बरे झाले पुण्यात नाही गेलात. नाहीतर अश्या मुक्तचिंतनाची लेखमालिका लिहावी लागली असती ;)

आपला
(पुणेग्राम(त्र)स्त) शशांक

मनस्वी

बरे झाले पुण्यात नाही गेलात. नाहीतर अश्या मुक्तचिंतनाची लेखमालिका लिहावी लागली असती

असहमत.

मला नाही वाटत पुण्यात इतके वाईट्ट अनुभव येतील अगदी मुक्तचिंतनाची लेखनमालिका वगैरे लिहायला..

त्रस्त शशांक.. तुम्हाला असे अनुभव आले असतील तर जरूर कळवा.
तुम्ही मग तुमच्या आवडत्या गावचे ग्रामस्थ व्हायचा पर्याय का निवडत नाही जर पुण्यात येवढे त्रस्त व्हायला होतेय तर... एक शंका म्हणून विचारतीये.

शशांक

मला नाही वाटत पुण्यात इतके वाईट्ट अनुभव येतील अगदी मुक्तचिंतनाची लेखनमालिका वगैरे लिहायला..

दिवसाकाठी एखादा

  1. पुणेरी रिक्षावाला ('जगात सर्वात उर्मट कोण?' असे झोपेतून उठवून विचारले तरी 'पुणेरी रिक्षावाला' असे उत्तर एक क्षणही न दवडता येईल. पुणेरी रिक्षावाला म्हणजे नुसता पुण्यात रिक्षा चालवणारा नव्हे तर 'पुणेरी' रिक्षावाला. कसा ओळखावा? त्याला ज्या दिशेला जायचे नाही तिकडे जाण्याविषयी विचारले तर तुमच्याकडे अतिशय तुच्छतापूर्ण कटाक्ष टाकून मान हालवणारा किंवा नुसतेच दुसरीकडे पाहणारा किंवा दोन-तीन किलोमीटर साठी 'दोनशे रूपये होतील' म्हणणारा किंवा रात्री ८ वाजल्यापासून 'हाफ रिटन' मागणारा)
  2. दुकानदार (हा मारवाडी, बनिया किंवा बिहारी असेल तर बरे, मराठी असेल तर तुम्ही मेलात. हे दुकानदार धंदा करायला बसतात की दुर्लक्ष/अपमान करण्यासाठी ग्राहकाची वाट पाहत बसतात हा संशोधनाचा विषय आहे. (हे संशोधन पुणे विद्यापीठातल्या मध्यम किंवा उतारवयीन काका/काकूंनी करावे. इतरांनी असा मनस्तापजनक कालापव्यव करू नये))
  3. बस कंडक्टर (यांच्याविषयी काही स्फुट आम्ही इथे लिहिले आहे, अवश्य वाचा)
  4. किंवा नुसता साधा (!!!) पुणेरी पुणेकर (पुण्यात राहणारे सगळेच पुणेरी नसतात ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट)

इतके चार-पाच लोक भेटले तरी एक मुक्तचिंतन लिहिले जाण्याइतपत अनुभव नक्कीच येतील :)

तुम्ही मग तुमच्या आवडत्या गावचे ग्रामस्थ व्हायचा पर्याय का निवडत नाही जर पुण्यात येवढे त्रस्त व्हायला होतेय तर... एक शंका म्हणून विचारतीये.

सर्वांनी असे म्हटले तर पुणेकर सुधरणार कधी?

मनस्वी आणि समस्त पुणेकर काका-काकू हे सर्व जरा हलकेच घ्या. गमतीने लिहिले आहे.

भाग्यश्री

काही गरज नाही 'पुणेकरांनी' सुधरण्याची! ते तसे आहेत, तो त्यांचा स्वभाव आहे असं समजा...
हा रिक्षेवाले सुधरले पाहीजेत, कारण ते बर्‍याचदा कारण नसताना नाही म्हणतात, भाडं जास्त मागतात, तसे असेल तर ते सुधरले पाहीजेत.. अर्थात सगळेच रिक्षेवाले असे नसतात..
पुण्यात येऊन,पुण्याच्या सगळ्या सोयींचा वापर करून वर, पुण्याला नावं ठेवणार्या लोकांची मला कमाल वाटते !!!
तुम्ही मग तुमच्या आवडत्या गावचे ग्रामस्थ व्हायचा पर्याय का निवडत नाही जर पुण्यात येवढे त्रस्त व्हायला होतेय तर
हा सल्ला पटतो अशा वेळी !!

(तसे हलकेच घेतले आहे.. पण गमतीत सुद्धा जरा जास्त वेळेला पुण्याला धोपटले जाते, त्यामुळे हा लेखनप्रपंच.. )

कुंदन

एकदा एका संध्याकाळी सिमला ऑफिस ते बाणेर्/म्हाळुंगे प्रवासाचा योग आला होता. तासभर प्रतिक्षा केल्यावर एक पी एम टी आली , अर्ध्या प्रवासानंतर बसमधील दिव्यांनी मान टाकली , कदाचित भार नियमन असेल म्हणून दुर्लक्ष केले. अजून थोड्या वेळाने इंजिनाने देखील असहकार पुकारला. आई शप्पथ , तेंव्हापासून पी एम टी चा धसका घेतला आपण ...

यशोधरा

>>>पुणेरी रिक्षावाला ('जगात सर्वात उर्मट कोण?' असे झोपेतून उठवून विचारले तरी 'पुणेरी रिक्षावाला' असे उत्तर एक क्षणही न दवडता येईल.

नक्कीच तुम्ही बेंगलोरचे रिक्षावाले पाहिलेले दिसत नाहीत!! त्यांच्या मानाने पुणेरी रिक्षावाले म्हणजे देवमाणसं!! :D

>>>सर्वांनी असे म्हटले तर पुणेकर सुधरणार कधी?

परफेक्शन को और क्या सुधारोगे??? :D

एक

१०००००००% सहमत..

पुणेकरांच्या सुधारण्याची काळजी बाकिच्यांनी करण्याची गरज नाही.

-कट्टर सदाशिव पेठी पुणेकर.